दहावी-बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविताना अभ्यासात सातत्य असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने परीक्षेत मिळविण्याच्या गुणांचे टार्गेट कायम समोर ठेवून अभ्यास केल्यास यश नक्की मिळते, असे मत नाशिकच्या स्कॉलर्सनी महाराष्ट्र टाइम्स आयोजित राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये व्यक्त केले. दहावी, बारावी आणि जेईई या परीक्षेत उल्लेखनीय यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांनीही यावेळी भावना व्यक्त केल्या. अभ्यासाचे वेळापत्रक कसे आखले, फोकस कायम राखण्यासाठी त्यांनी कोणते प्रयत्न केले, तसेच त्यांच्या ध्येयप्राप्तीचे रहस्य काय, हे या चर्चेतून जाणून घेण्यात आले.
--
काठीण्यपातळी जाणून केला अभ्यास
सुरुवातीपासून अभ्यास केला, तर कुठल्याही क्षेत्रातला अभ्यास अवघड वाटत नाही. मी सुरुवातीला तीन ते चार तास अभ्यास करायचो. त्यानंतर रोज आठ ते दहा तास अभ्यासाला सुरुवात केली. खरे तर अभ्यास रोज केला पाहिजे. परीक्षा आली म्हणून अभ्यास करणेे योग्य नाही. आपल्या मेंदूमध्ये आपण एकाच वेळी पाच गोष्टी लक्षात ठेवू शकतो किंवा त्याबद्दल आकलन करू शकतो. मी माझ्या अभ्यासाच्या वेळी हेच तत्त्व समोर ठेवून अभ्यास केला. त्यामुळे आज मी हे यश संपादन करू शकलो. जेईई मेन्सनंतर पुढील परीक्षेत यश मिळविणेे अवघड होते. परीक्षेेची काठीण्यपातळी अधिक असल्याने त्यासाठी सतत अभ्यास करणेे आणि मेहनत घेणेे याला पर्याय नाही, हे ओळखून अभ्यास केला. मला मित्रांचीही खूप मदत झाली.
- निखिल चव्हाणके (जेईई अॅडव्हान्स)
--
मेहनत घेतल्यास यशप्राप्ती नक्की
परीक्षेवेळी अभ्यास करण्यापेक्षा रोजरोजचा रोज अभ्यास कधीही सोयीस्कर असतो. सात दिवस एखादा टॉपिक सतत वाचल्यास व महिनाभराने त्याचा पुन्हा सराव केल्यास तो कायमस्वरूपी लक्षात राहतो. दिवसभर अभ्यास करताना काही वेळ ब्रेक घेणे खूप महत्त्वाचे आहे. या ब्रेकमध्ये मेडिटेशन, व्यायाम आणि अवांतर वाचन या गोष्टी करायला हव्यात. त्यामुळे आपल्यातली तल्लखता जोपासायला मदत होते, तसेच आपली ब्रेन पॉवर आणखी बळकट होते. आपल्याला जे ध्येय साध्य करायचे आहे ते कायम आपल्यासमोर असायला हवे, यासाठी एक चार्ट आपल्या स्टडी बोर्डसमोर असावा. अभ्यास करताना स्वतःच्या नोट्स काढणे, तसेच आपल्याला लक्षात राहतील या स्वरूपात सूत्र, पॉइंट्सची आखणी करून घ्यावी. मी सर्वाधिक भर सॅम्पल पेपर सोडविण्यावर दिला. त्यातून मी कुठे कमी पडत आहे, हे समजत होते. - तन्वी चव्हाण (दहावी, ९९.४० टक्के, एसएससी बोर्ड)
--
वेळच्या वेळी अभ्यास गरजेचा
शाळेत जे काही शिकविले त्या थिअरी मी रोजच्या रोज फक्त पंधरा ते वीस मिनिटे वाचायचो. रोजचा अभ्यास वेळच्या वेळी केल्याने अभ्यासाचा जास्त ताण माझ्यावर कधीच आला नाही. मी कायम क्वॉलिटी स्टडीला प्राधान्य द्यायचो. थोडा वेळ अभ्यास करा, पण तो असा करा की कायमस्वरूपी लक्षात राहील. अभ्यासाच्या वेळी आपला स्वतःवर ताबा असायला हवा. आपले मन इतर कुठेतरी भरकट असताना अभ्यासाचे पुस्तक वाचणे गैर आहे. अभ्यासावेळी शांत चित्ताने सराव करणेच महत्त्वाचे आहे. दहवीच्या पूर्वपरीक्षेला मी अभ्यास न करता जायचो. मला जे काही येत आहे, ते लिहून घरी आल्यावर जे अवघड वाटले त्याचा सराव करायचो. आपण कायम स्वतःचे परीक्षण करायला हवे. त्यामुळे चूक सुधारण्याची संधी मिळते. परीक्षा कोणत्याही स्वरूपाची असली, तरी त्याकडे परीक्षा म्हणूनच बघायला हवे.
- राहुल डालकरी (दहावी, ९८ टक्के, आयसीएसई बोर्ड)
--
अभ्यासाबाबत मुलांवर बंधन नको
मी कधीही माझ्या मुलीवर अभ्यासासाठी दबाव टाकला नाही. मुलांना सततच्या अभ्यासानंतर थोडा विरंगुळाही आवश्यक असतो. बोर्डाची परीक्षा आहे त्यामुळे तू सतत अभ्यास करायला पाहिजे, अशा प्रकारचा दबाव मी कधीच तिच्यावर टाकला नाही. मुलांना त्यांच्या कलेने अभ्यास करू द्यावा. माझी मुलगी तर गाणेे एेकत गणिते सोडवायची. त्यामुळे मुलांवर अभ्यास करताना बंधन घालणेे योग्य नाही. परीक्षेेच्या शेवटी दोन महिने अनेक तास अभ्यास करण्यापेक्षा दररोज दोन तास पूर्ण एकाग्रतेने केलेल्या अभ्यासाचा फायदा होतो. मुख्य म्हणजे मुले अभ्यास करीत असताना घरातील वातावरणदेखील प्रसन्न असावे लागते. शेवटी मुलांनी घेतलेली मेहनतच त्यांना उपयोगी पडते. मात्र, त्यासाठी पालकांनी त्यांना प्रेरित करणे गरजेचे ठरते.
- अविनाश चव्हाण, पालक
--
अभ्यासाच्या प्लॅनिंगसाठी पालकांनी घ्यावा पुढाकार
विद्यार्थ्यांनी कायम फोकस असायला हवे. पालकांनी विद्यार्थ्यांना सतत अभ्यास कर, असे सांगणे चुकीचे आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यास करायला हवाच. पण, त्यासोबतच खेळ, व्यायाम करीत आपले छंद जोपासायला हवे. पालकांनी विद्यार्थ्यांना अभ्यासासाठीचे प्लॅनिंग करून द्यायला हवे. कोणत्याही गोष्टी प्लॅनिंग नसेल, तर कधीच साध्य करता येत नाहीत. विद्यार्थ्यांनी वर्षाच्या सुरुवातीपासूनच एकाग्रचित्ताने अभ्यास केल्यास परीक्षेच्या अगोदर सराव केला नाही, तरी ते चांगले गुण प्राप्त करू शकतात. मात्र, त्यासाठी सततचा सराव असणे महत्त्वाचे आहे. अभ्यासक्रमाचे व्यवस्थित विभाजन नंतर सराव केल्यास चांगले यश मिळविणे अगदी सोपे आहे.
- ज्ञानेश्वर डालकरी, पालक
--
लक्षवेधी मुद्दे ...
➤ पाठ्यपुस्तकांसोबतच अवांतर वाचन महत्त्वाचे.
➤ नियोजनबद्ध अभ्यासासाठी सुरुवातीपासूनच अभ्यासाचे वेळापत्रक बनवावे.
➤ रोजचा रोज अभ्यास करून रविवारी महिन्याच्या शेवटी सराव करावा.
➤ सेल्फ स्टडी व सेल्फ नोट्सवर भर द्यावा.
➤ सराव पेपर सोडवून आपण कुठे कमी पडत आहोत याचे परीक्षण करावे.
➤ विषय शिक्षकांकडून अडलेले टॉपिक, थिअरी समजून घ्याव्यात.
➤ आपल्याला समजेल अशा बोलीभाषेत किंवा कथेच्या रूपात नोट्स काढाव्यात.
➤ अभ्यासासोबतच रोज व्यायाम, मेडिटेशन, छंद जोपासणेही महत्त्वाचे आहे.
➤ आत्मविश्वास, आत्मपरीक्षण, चिकाटी, मेहनत, फोकस, पालकांचा विश्वास हेच यशप्राप्तीचे गमक आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट