Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पावसाळी गटार योजनेवरून वादंग

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या पश्चिम प्रभाग समितीच्या बैठकीत शहरातील काही भागांत साचलेल्या पाण्यावरून वादळी चर्चा झाली. पावसाळी गटार योजनेसह मलनिस्सारण केंद्र आणि नालेसफाईवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरण्यात आले. आदेश देऊनही नालेसफाई का झाली नाही, असा सवाल सभापती डॉ. हेमलता पाटील यांनी प्रशासनाला केला. मात्र, अधिकाऱ्यांना उत्तरेच देता न आल्याने प्रभागातर्फे येत्या महासभेत थेट लक्षवेधी लावली जाणार आहे. प्रभागाच्या वतीने लक्षवेधी लावण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे.

सभापती डॉ. हेमलता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पश्चिम प्रभागाची बैठक झाली. त्यात प्रभाग क्र. ७, १२ व १३ मध्ये पावसामुळे उद््भवलेल्या स्थितीवर वादळी चर्चा झाली. प्रभाग समितीच्या बैठकीतच पावसाळीपूर्व कामे करण्याचे आदेश दिले होते. तरीही कामे झाली नसल्याने त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सरस्वती नाला साफ केला नसल्याने ही परिस्थिती ओढवल्याचा ठपका ठेवण्यात आला, तसेच एसटीपी प्लँटच्या स्थितीची माहितीच अधिकाऱ्यांना देता आली नाही. पावसाळी गटार योजनेवरही वादळी चर्चा झाली. मात्र, अधिकारी याबाबत समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे सभापतींसह नगरसेवक चांगलेच संतप्त झाले. अधिकारी उत्तरे देऊ न शकल्याने प्रभागाच्या वतीने या विषयावर महासभेत लक्षवेधी उपस्थित करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सोमवारच्या महासभेत प्रभाग समितीच्या वतीने लक्षवेधी दिली जाणार असून, प्रभागाकडून लक्षवेधी देण्याची पालिका इतिहासातील ही पहिलीच घटना असेल. प्रशासनातील अधिकारी सभापतींना दिशाभूल करणारी माहिती देत असल्याचा आरोप सभापती डॉ. पाटील यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जलशुद्धीकरणाची सुरक्षा वाऱ्यावर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेला योग्य पाणीपुरवठा केला जात असल्याने शहरवासीयांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. परंतु, ज्या जलनगरीतून शहराला हा पाणीपुरवठा केला जातो त्याठिकाणी सुरक्षेची जबाबदारी कोणाची आहे. यामुळे जलशुद्धीकरण केंद्र रामभरोसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या जलशुद्धीकरण केंद्रावर सुरक्षारक्षकांची नेमणूकच नाही, तरी त्याठिकाणी सुरक्षारक्षकाची नेमणुकीची गरज आहे. भविष्यात माथेफिरू व्यक्तीने काही घातपात केल्यास त्याच जबाबदार कोण, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.

शहरवासीयांना मुबलक पाणीपुरवठा करणारी महापालिका म्हणून नाशिक पालिकेची ओळख आहे. शुद्ध पाण्याचा पुरवठा महापालिकेकडून केला जात असला तरी ज्या ठिकाणाहून शहरवासीयांना पाणीपुरवठा करण्यात येतो. त्या ठिकाणच्या सुरक्षेचे काय हा खरा सवाल आहे. शिवाजीनगरमध्ये जलनगरी म्हणून ओळख असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर दुपारच्यावेळी फेरफटका मारल्यास तेथे एकही कर्मचारी अथवा अधिकारी उपस्थित नसल्याचे दिसून येते. अशावेळी गंगापूर धरणातून पंप करून जलशुद्धीकरण केंद्रात येणाऱ्या पाण्यात माथेफिरू व्यक्तीने काही केल्यास त्याचा नाहक त्रास शहरवासीयांना होऊ शकतो.

संरक्षक जाळ्या लावणे आवश्यक

या निसर्गरम्य ठिकाणी असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रावर स्वतंत्र सुरक्षारक्षक नेमणे गरजेचे आहे. तसेच कामावर कार्यरत असलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बाहेरील व्यक्तींना जलशुद्धीकरण केंद्रावर येण्यास मज्जाव घालण्याची मागणी होत आहे. जलनगरीच्या बाजूला असलेल्या वनविभागाच्या डोंगरावर जाण्याच्या रस्त्यावर पाणी फिल्टर होत असते. नेमके त्याचठिकाणी सहजपणे प्रवेश करेल अशी जागा ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीत महापालिकेने जलशुद्धीकरण केंद्राच्या सर्वच बाजूंनी संरक्षक जाळ्या बसवल्या पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंढरपूरच्या वारीत सायकलचे रिंगण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंढरपूरच्या वारीमध्ये सर्वांत देखणा सोहळा कोणता असेल, तर तो रिंगणाचा. हजारो वारकरी एकत्र येऊन वारीमध्ये रिंगण घालतात. नाचू कीर्तनाचे रंगी म्हणत विठोबा-रखुमाईचा गजर करीत वारकरी हा सोहळा अनुभवतात. पारंपरिक चालत आलेले रिंगण डोळे भरून पाहण्याच्या या सुखद सोहळ्याचा आनंद यंदा द्विगुणित होणार असून, नाशिक सायकलिस्टतर्फे वारीमध्ये सायकल रिंगण घालण्यात येणार आहे.

नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनतर्फे सालाबादप्रमाणे यंदाच्या वर्षीही आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरपर्यंत सायकलवारीचे आयोजन करण्यात आले आहे. या सायकलवारीच्या नावनोंदणीकरिता नाशिकमधील सायकलप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. यावर्षीच्या वारीमध्ये खेडकलेकर महाराज मैदानावर सायकलचे रिंगण घालण्यात येणार असून, असा प्रयोग पहिल्यांदाच होणार आहे. पंढरपूरपासून अलीकडे दोन किलोमीटर असलेल्या या ठिकाणचे हे सर्व क्षण अनुभवण्यासाठी वारीमध्ये सहभागी होणाऱ्या सायकलिस्टमध्ये कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शुक्रवार, दि. २३ जून रोजी सकाळी ६ वाजता गोल्फ क्लब ग्राउंड येथून पंढरपूर सायकलवारीला प्रारंभ होणार आहे. झीरो प्लास्टिक, झीरो वेस्टेज या घोषवाक्याने वारी सुरू होणार असून, मुंबईहून वाल्मीक पाटील, नीलेश धोटे, कन्हय्या थोरात, रवींद्र क्षीरसागर हे पोलिस अधिकारी सहभागी होणार अाहेत. नाशिकहून अंबडचे पीआय मधुकर कड सहभागी होणार आहेत. ज्यांना महिनाभर पायी चालणे शक्य नाही अशांसाठी ही सायकलवारी आहे. वारीत सिन्नर, औरंगाबाद, जळगाव, तसेच मालेगावहूनही सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. पंढरपूर सायकलवारीचे हे सहावे वर्ष असून, यंदाच्या वर्षी सायकलवारीसाठी ५०० हून अधिक सायकलिस्ट सहभागी होणार आहेत. वारीच्या एक आठवडा आधी २७५ जणांची नोंदणी झाली असून, मागील वर्षीच्या तुलनेत हा आकडा दुप्पट आहे.

यंदा गतवर्षीपेक्षा अनेक सुविधा सुधारित स्वरूपात देण्याचा प्रयत्न करण्यात आला असून, संपूर्ण वारीदरम्यान दोन अॅम्ब्युलन्स, ४ डॉक्टर्स आपत्कालीन परिस्थितीत सेवेसाठी सज्ज राहणार आहेत. जास्तीत जास्त सायकलप्रेमींनी या सायकलवारीत सहभागी होऊन वारीचा एक वेगळ्या प्रकारे आनंद लुटावा, असे आवाहन नाशिक सायकलिस्टतर्फे करण्यात आले आहे. पत्रकार परिषदेला जसपालसिंग बिदी, मिलिंद धोपावकर, श्रीकांत जोशी, तुकाराम नवले, सोफिया कपाडिया, शैलेश राजहंस, कविता नारंग, किशोर काळे, योगेश्वर कोठावदे, योगेश शिंदे उपस्थित होते.

--

येथे करावी नावनोंदणी

जुना गंगापूर नाका येथील शिवशक्ती सायकल्स, लुथरा एजन्सी, गंगापूररोड, भांड सायकल्स, इंदिरानगर या ठिकाणी नाशिक सायकलिस्टतर्फे पंढरपूर सायकलवारीसाठी नावनोंदणी अर्ज उपलब्ध आहेत. वारीसाठी नावनोंदणी करणाऱ्या सायकलप्रेमींना वॉटर बॉटल, सरप्राइज गिफ्ट, सायकलचे पंक्चर किट अशी वेगवेगळी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

--

असा असेल सायकलवारीचा मार्ग

सायकलवारीचा मार्ग नाशिक- सिन्नर-नांदूरशिंगोटे-तळेगाव दिघी-नानज-कोल्हार-राहुरी-अहमदनगर-रुईछत्तीसी-चापडगाव- माही जळगाव-करमाळा-टेंभुर्णी-पंढरपूर असा राहणार आहे. पहिल्या दिवशी म्हणजेच २३ जून रोजी सकाळी ६ वाजता पालखी निघून सायंकाळपर्यंत अहमदनगर शहरात पोहोचणार आहे. नगर शहरात मुक्कामी राहून दुसऱ्या दिवशी २४ जून रोजी टेंभुर्णी येथे मुक्काम करण्यात येणार आहे. तिसऱ्या दिवशी २५ जून रविवारी सकाळी विठुरायाचे दर्शन घेण्यात येईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टँकरची संख्या घटली

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे दुष्काळाची तीव्रता कमी झाल्यामुळे ग्रामीण भागात धावणाऱ्या टँकरची संख्या १५ ने कमी झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून पावसाने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत कमी-अधिक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे ही संख्या घटली असून, येत्या काही दिवसांत त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.

या वर्षात नाशिक शहरामध्ये पाण्याची तीव्रता नव्हती. पण, जिल्ह्यातील ग्रामीण भागात ही तीव्रता पुन्हा जाणवली. तलाव, विहिरी, बंधारे आणि हातपंप अशा जलस्रोतांमधील पाणी आटल्याने जिल्हावासीयांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली होती. पाण्याच्या या भीषण दुर्भिक्षापासून रहिवाशांना दिलासा देण्यासाठी जिल्हा प्रशासनाने गावे आणि वाड्या-वस्त्यांवर टँकरद्वारे पाणी पुरविण्याची व्यवस्था केली होती. पावसाने असेच सातत्य राखले, तर जिल्हा टँकरमुक्त होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांच्या पावसाने मात्र अद्यापपर्यंत धरणाची पातळी किंचितशी वाढली आहे. त्यामुळे येत्या काळात त्यात वाढ झाल्यास सर्वांना दिलासा मिळणार आहे.

--


अशी आहे स्थिती

गेल्या वर्षी चांगला पाऊस झाल्यानंतरही उन्हाळ्यात मात्र काही ठिकाणी पाणीटंचाईची तीव्रता वाढली होती. त्यामुळे ११३ गावे व १३३ वाड्यांत ७४ टँकर सुरू करण्यात आले होते. आता त्यात घट होणार आहे. या टँकरच्या संख्येत घट झाल्यामुळे सध्या ८७ गावे व ८१ वाड्यांवर पाणीपुरवठा केला जाणार आहे. टँकर कमी झालेल्या तालुक्यांत त्र्यंबकेश्वर ५, येवला १, मालेगाव २, नांदगाव ३, चांदवड २, बागलाण २,सुरगाणा १ ,देवळा १ यांचा समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाळीपूर्व कामे गाजणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहरात पहिल्याच पावसामुळे नाशिककरांची उडालेली दैना सत्ताधाऱ्यांची कोंडी ठरणार आहे. पावसाळी पूर्व कामे होवून शहरात ठिकठिकाणी साचलेल्या पाणी आलेल्या पूरस्थितीचे भांडवल आता विरोधकांकडून केले जाणार असून, या कामांवरून सोमवारची महासभा वादळी ठरण्याची शक्यता आहे. पावसाळी गटार योजनेसह पावसाळी पूर्व कामांबाबत महासभेत लक्षवेधी सादर करण्याची रणनिती शिवसेनेसह काँग्रेसकडून आखली जात आहे. सोबतच विकासकामांवरूनही सत्ताधाऱ्यांची कोंडी करण्याची तयारी विरोधकाकडून केली जात असल्याने सोमवारची महासभा सत्ताधाऱ्यांसाठी अडचणीची ठरणार आहे.

गेल्या बुधवारी दोन तास चाललेल्या पावसाने शहराची दैना झाली होती. पावसाळी पूर्व कामे झालीच नसल्याने जुने नाशिक, सराफ बाजार, भद्रकाली, पंचवटी भागांसह सखल भागांमध्ये पाणी साचले होते. त्यामुळे अनेक भागात तलावसदृश्य तर काही भागात पूरस्थिती निर्माण झाली होती. त्यातच महापौर रंजना भानसी यांनी या सगळ्या प्रकरणावर प्रशासनाला जाब विचारण्याऐवजी प्रशासनालाची पाठराखण केली होती. त्यामुळे या सगळ्या प्रकाराबाबत विरोधक आक्रमक झाले आहेत.

शिवसेना आणि राष्ट्रवादीने पावसाळी पूर्व कामे करण्याची मागणी अगोदरच केली होती. परंतु प्रशासनाने सोयीस्करपणे दुर्लक्ष केले. पावसाळी पूर्व कामे झाली असती तर ही परिस्थिती ओढावली नसती, असा दावा केला जात आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाची कोंडी करण्याची संधी विरोधकांना चालून आली आहे.

काँग्रेसने घेतली बैठक

सोमवारच्या महासभेत काँग्रेससह विरोधी पक्ष असलेल्या शिवसेनेकडून पावसाळी पूर्व कामांवरून लक्षवेधी मांडण्याची तयारी सुरू आहे. काँग्रेसने शनिवारी नगरसेवकांची बैठक घेवून रणनिती ठरवली आहे. शिवसेनेच्या नेत्यांनीही भाजपला घाम फोडण्यासाठी प्लॅन तयार केला आहे. पावसाळी पूर्व कामांसह पावसाळी गटार योजनेच्या अपयशावरही चर्चा करण्याची मागणी सेनेकडून केली जाणार आहे. पावसाळी पूर्व कामांवरून सत्ताधारी भाजपमध्येच मतभेद आहेत. महापौर वगळता अन्य नेत्यांनी ही कामे झाली नसल्याचा दावा केला आहे. विरोधकांकडून हेच भांडवल करून भाजपची कोंडी केली जाणार आहे. त्यामुळे सोमवारची सभा वादळी ठरणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

अजमेर सौंदाणे रोडवरील लक्ष्मणवाडी येथील कर्जबाजारी शेतकरी नितीन वामनराव सूर्यवंशी (वय ४८) यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून शनिवारी (दि. १७) विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. नितीन सूर्यवंशी यांची अजमेर सौंदाणे रोडवरील लक्ष्मणवाडी शिवारात दोन एकर शेती आहे. या शेतीवर देना बँकेचे एक लाख २८ हजार रुपये पीककर्ज आहे. तसेच, खासगी सावकारी व हात उसनवार यांची देखील मोठी रक्कम असून, ती देणे अशक्यप्राय असल्याने नितीन सूर्यवंशी यांनी शेतात विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नांदूरची पुरातन बारव जीर्णोद्धाराच्या प्रतीक्षेत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

औरंगाबाद रोडवर नांदूर येथे असलेल्या बारवाची दुरवस्था झाली आहे. या बारवाचे पाणी एकेकाळी परिसरातील नागरिकांचे नव्हे तर वाटसरूंची तृष्णा भागविण्याचे काम करीत होते. त्या पाण्याचा उपसा थांबल्याने पाण्याला दुर्गंधी पसरली आहे. बारवाच्या परिसराची स्वच्छता ठेवल्यास आजही येथील पाणी पिण्यासाठी आणि इतर वापरासाठी उपयोगात आणता येऊ शकेल.

गेल्या वर्षीच्या दुष्काळाच्या परिस्थितीतही या बारवाचे पाणी कमी झालेले नव्हते. याठिकाणी पाणी काढून आणण्यासाठी दगडी पायऱ्या असल्यामुळे सहजपणे हे पाणी काढता येऊ शकते. अहिल्यादेवी होळकरांच्या काळात या बारवाचे बांधकाम करण्यात आलेल्या ज्येष्ठ सांगतात. दगड आणि विटांच्या बांधकाम असलेल्या ही बारव आजही अस्तित्व टिकवून आहे.

प्रशासनाने लक्ष द्यावे

अशा ऐतिहासिक बारवकडे प्रशासनाने केलेले दुर्लक्ष योग्य नाही, अशा प्रतिक्रिया नागरिकांनी दिल्या आहेत. त्यामुळे तातडीने तिच्याकडे लक्ष दिले तर हे पाणी वापरात येईल. बारवात प्लास्टिक, विटा, दगड पडलेले असतात. यामुळे या पाण्यात मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. पिंपळ वृक्ष वाढल्याने बांधकामाला तडे जाण्याचीशक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

८७ वर्षांनंतर होणार जिल्ह्याची पुनर्मोजणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून नाशिक जिल्ह्याची पुनर्मोजणी करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली. ब्रिट‌िशांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १९३० साली जिल्ह्याची मोजणी केली होती. त्यानंतर तब्बल ८७ वर्षानंतर ही मोजणी होणार आहे. यात सॅटेलाईट यंत्रणेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या चतुःसिमांची पुनर्मोजणी बरोबरच शेती व रहिवासी क्षेत्र आणि इतर गोष्टींची माहिती घेण्यात येणार आहे.

राज्य शासनाने संपूर्ण राज्याची पुनर्मोजणी करण्याचा निर्णय घेतला आहे. पण सुरुवातीला महसूल विभागातील जिल्ह्याची निवड करण्यात आली असून त्यात नाशिकचा समावेश आहे. नाशिक प्रमाणेच पुणे, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि कोकण विभागातील जिल्ह्यांचीही पुनर्मोजणी होणार आहे. या पुनर्मोजणीत सॅटेलाईट पद्धतीने करण्यात येणार असल्यामुळे त्यात अचुकताही येणार आहे. या मोजणीमुळे जिल्ह्याच्या चतुसीमांची मोजणी करतानाच जिल्ह्यात झालेल्या बदलांची नोंद घेतली जाणार आहे. वाढती लोकसंख्या, वाढते शहरीकरण व औद्योगीकरण यामुळे मूळ धारण जमिनीचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण होवून जमिनीचे मोठ्या प्रमाणावर पोटविभाजन झाल्याने प्रत्यक्ष वहिवाट, भूमी अभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात मेळ राहिलेला नाही. तो आता सुकर होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या हद्दीचे वाद सोडवण्यासाठी व सिमा मोजणीचे काम सोपे होण्यासाठी ही पुनर्मोजणी उपयोगी पडणार आहे.

या मोजणीमध्ये जिल्ह्यातील वाढलेले रहिवास क्षेत्र, शेती (बागायती, जिरायती, कोरडवाहू क्षेत्र) तसेच धरणे, महत्त्वाची

स्थळे, वनक्षेत्र यांची माहिती घेतली जाणार आहे. ब्रिटीशकाळापासून जिल्ह्यांच्या ठरलेल्या क्षेत्राफळांनुसारच कामकाज सुरू असल्यामुळे त्यात अनेक त्रुटी होत्या. गेल्या काही वर्षांत सर्वच जिल्ह्यांचा झपाट्याने विकास झाला आहे. त्यामुळे या पुनर्मोजणीचा सर्वांनाच फायदा होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आर्किटेक्टच्या पत्राने नवे वादळ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाचे तत्कालीन कार्यवाह यांच्यावर असलेला अनियमिततेचा ठपका, त्यामुळे त्यांच्यावर संस्थेने केलेली कारवाई, त्यानंतर झालेल्या निवडणुका हा धुरळा खाली बसतो न बसतो तोच अनियमित कामाची पाहणी करणारे आर्किटेक्ट अनिल चोरडिया यांनी आजी-माजी कार्यकारी सदस्यांना २५ प्रश्न असलेली प्रश्नावली पत्र पाठवले असून त्यामुळे मोठे वादळ उठण्याची शक्यता आहे.

सार्वजनिक वाचनालयाच्या कामात अनियमितता झाली असल्याने माजी कार्यवाह यांच्यावर पदच्युत होण्याची कारवाई झाली होती. त्यांच्यासमवेत अर्थ सचिव व कार्याध्यक्षांनादेखील कारवाईला सामोरे जावे लागले होते. त्यानंतर त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यात आले आणि त्यांना सावानाची निवडणूक लढवता आली नाही. यानंतर नवी कार्यकारिणी आली. सावानाचे काम सुरू झाले; मात्र पत्रापत्रीचे शुक्लकाष्ठ अद्याप संपले नसल्याचे पुन्हा एकदा आर्किटेक्ट चोरडिया यांच्या पत्राने समोर आले आहे. त्यांनी आजी व माजी कार्यकारी सदस्यांना २५ प्रश्न असलेले पत्र पाठवले असून, त्याचे उत्तर लेखी स्वरूपात द्यावे, असे लिहिले आहे. वीस जून रोजी दुपारी चार वाजता होणाऱ्या बैठकीपूर्वी तीन दिवस अगोदर उत्तर द्यावे, असे पत्रात नमूद केलेले असून, आर्किटेक्ट चोरडिया यांनी सावानाच्या लेटरहेडवर ते पत्र पाठवले आहे. त्यामुळे ते संस्थेचे म्हणणे आहे की काय, असा प्रतिप्रश्न काही कार्यकारी सदस्यांनी केला असून, आर्किटेक्ट चोरडिया यांना मीटिंग घेण्याचा अधिकार आहे काय, असा सवालही या पत्रावरून उपस्थित झाला आहे.

आर्किटेक्ट चोरडिया यांनी ६ जून रोजी हे पत्र पाठवले असून त्यावर जावक क्रमांकही आहे. या पत्रात नूतनीकरण कामासंबंधी आपणास कसे माहीत झाले, नूतनीकरण करणे गरजेचे होते काय, नूतनीकरणामध्ये आपला प्रत्यक्ष सहभाग होता काय, ही कामे करण्याबाबत झालेल्या कार्यकारी मंडळाच्या सभेत आपली उपस्थिती होती काय, यासह २५ प्रश्न उपस्थित करण्यात आले असून, त्यांची उत्तरे लिखित स्वरूपात मागविण्यात आली आहेत. यावर माजी कार्यकारी सदस्य रमेश जुन्नरे यांनी कडाडून विरोध केला असून, आर्किटेक्ट चोरडिया यांना मीटिंग बोलावण्याचे अधिकार कोणी दिले, असा सवाल त्यांनी केला आहे. त्यामुळे पत्रापत्रीचे हे प्रकरण आता कोणत्या स्तराला जाते हे २० जून रोजीच समजणार आहे.

अनियमितता व आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करण्यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीच्या सूचनेनुसार आर्किटेक्ट अनिल चोरडिया यांची नियुक्ती केलेली आहे. त्यांनी तपशीलवार चौकशी करण्यासाठी हे पत्र दिलेले आहे. सर्वांची बाजू ऐकून घेणे हे नैसर्गिक न्यायतत्त्वाला धरून आहे. कायदेशीर काम करीत असताना सर्वांनी त्यांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

- श्रीकांत बेणी, प्रमुख कार्यवाह, सावाना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रावच्या लॅपटॉपमधील त्या फोटोंचा शोध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मुलींचे अश्लील फोटोग्राफ्स पोर्न साइट्सवर टाकणारा अक्षय श्रीपाद राव (वय २७, रा. खोडेनगर, इंदिरानगर) या संशयित आरोपीच्या लॅपटॉपमध्ये आणखी सहापेक्षा अधिक मुलींचे फोटो पोलिसांनी शोधून काढले आहेत. हे फोटोग्राफ्स संशयिताने इंटरनेटवरून डाउनलोड केले आहेत की या मुली संशयिताच्या परिचयाच्या आहेत, याचा शोध पोलिस घेत आहेत. दरम्यान, संशयिताच्या कामाच्या ठिकाणावरील लॅपटॉप, तसेच काही सायबर कॅफेमधील कम्प्युटरमधील डेटाही पोलिस तपासणार आहेत.

अक्षयने काही दिवसांपूर्वी प्रेमसंबंधात आलेल्या दोन मुलींचे फोटोग्राफ्स सोशल साइट्ससह पोर्न साइट्सवर टाकले होते. याच प्रकरणात सायबर पोलिसांनी अक्षयला अटक केली असून, तो १९ जूनपर्यंत पोलिस कोठडीत आहे. संशयिताने पीडित तरुणीचे फोटो तब्बल १४५ पोर्न साइट्सवर अपलोड केले असून, आणखी काही साइट्स शोधण्याचे काम सुरू असल्याचे सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल पवार यांनी सांगितले. दरम्यान, संशयित अक्षयच्या लॅपटॉपमध्ये सहापेक्षा अधिक मुलींचे आक्षेपार्ह फोटोग्राफ्स सापडले आहेत. मात्र, या मुली अनोळखी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले. हे फोटोग्राफ्स संशयिताच्या ओळखीतील मुलींचे आहेत काय, याचा तपास सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले. इंटरनेटवरील फोटोही सहजतेने डाऊनलोड करता येतात. त्यामुळे दोन्ही बाजू पोलिस तपासणार आहेत. दरम्यान, संशयित आरोपी एका आयटी कंपनीत कामास आहे. पीडित तरुणींचे फोटो अपलोड करण्यात, तसेच त्यांचे फोटो जतन करून ठेवण्यासाठी कंपनीच्या कम्प्युटरचा वापर केला गेला आहे काय, याचाही तपास सुरू आहे. दरम्यान, अक्षय कधी कधी सायबर कॅफेतील कम्प्युटरचा वापर करीत होता, असे तपासात समोर आले आहे. या दृष्टिकोनातून संशयित राहतो त्या परिसरातील काही सायबर कॅफेमधील कम्प्युटरचा डेटाही तपासला जाणार असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.

कोर्टाच्या आदेशाकडे लक्ष

संशयिताने पोर्न साइटवर अपलोड केलेले फोटोग्राफ्स काढून टाकण्यासाठी पोलिसांनी कोर्टात अर्ज सादर केला आहे. कोर्टाने आदेश दिल्यानंतर सायबर विभागाच्या पोलिस महानिरीक्षक कार्यालयामार्फत कोर्ट आदेशासह तक्रारीची एक प्रत इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीमकडे (सीईआरटी-इन) पाठवण्यात येणार आहे. ही कमिटी माहिती तंत्रज्ञान आणि इलेक्ट्रॉनिक्स मंत्रालयाच्या अख्यात्यारीत येते. दरम्यान, या प्रकरणी शनिवारी सायंकाळपर्यंत कोर्टाचा आदेश झाला नव्हता, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवार, पगारे चौकशीच्या फेऱ्यात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेत भ्रष्ट व गैरकारभार करणाऱ्या अधिकाऱ्यांना आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी चौकशीचा दणका दिला असताना अजूनही काही विद्यमान बडे अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. भाजपच्या एका कार्यकर्त्याने शहर अभियंता यू. बी. पवार आणि अधीक्षक अभियंता गौतम पगारे यांनी सिंहस्थात भ्रष्टाचार करून अवैध संपती जमा केल्याची तक्रार थेट पीएमओ पोर्टलवर केली आहे. पीएमओ कार्यालयाने या तक्रारीची दखल घेत या तक्रारीची तपासणी करण्याचे निर्देश महापालिकेला दिले आहेत. प्रशासनानेही या तक्रारीची गंभीर दखल घेत छाननी प्रक्रिया सुरू केली आहे. त्यामुळे पवार आणि पगार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहेत.

महापालिकेतील घोटाळेबाज अधिकाऱ्यांवर सध्या संक्रांत आली असून, अनेक निवृत्त तसेच विद्यमान अधिकारी चौकशीच्या फेऱ्यात अडकले आहेत. गेल्या आठवड्यातच महापालिकेतील २०२ कोटींच्या एलईडी घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन कार्यकारी अभियंता नारायण आगरकर दोषी आढळले होते. त्यामुळे त्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे. रुग्णालये, हॉस्पिटल्ससंदर्भातील शासन आदेश दडवून ठेवल्याप्रकरणी अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांचीही चौकशी लावण्यात आली आहे. सोबतच खतप्रकल्पावरील ६० कोटींच्या यंत्र खरेदी घोटाळ्याप्रकरणी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांचीही चौकशी प्रस्तावित करण्यात आली आहे. या तीनही अधिकाऱ्यांची चौकशी सुरू असतानाच महापालिकेत पीएमओ कार्यालयाचा आणखी एक लेटरबाँब पडला आहे.

नाशिकमधील भाजप कार्यकर्ता नरेश नाईक यांनी शहर अभियंता यू. बी. पवार आणि अधीक्षक अभियंता गौतम पगारे यांनी सिंहस्थात कोट्यवधींचा घोटाळा केल्याचा आरोप केला असून, त्यासंदर्भातील तक्रार पंतप्रधान कार्यालयाच्या पोर्टलवर केली आहे. पीएमओ कार्यालयाने त्याची दखल घेत यासंदर्भातील तथ्य तपासण्याचे आदेश महापालिकेला दिले आहेत. या तक्रारीत पवार आणि पगारे यांनी कोट्यवधींची माया जमविल्याचा आरोप केला आहे. पगारे यांनी त्रिमूर्ती चौक व सपना थिएटरजवळ दोन बंगले घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. पवार यांचेही शहरातील उच्चभ्रू वस्तीत प्लॉट्स असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने या तक्रारींची छाननी सुरू केली आहे. तक्रारदाराची पार्श्वभूमी आणि केलेले आरोप तपासले जाणार असल्याचे महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पवार आणि पगारे यांच्या अडचणींत भर पडण्याची शक्यता आहे.

--

साधुग्राम ठेक्याचा वाद

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात साधुग्रामचा ठेका हा वादात सापडला होता .हा ठेका मिळवण्यासाठी राजकीय वाद चव्हाट्यावर आला होता. या वादातूनच ही तक्रार झाली असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. जवळपास ९० कोटींचा हा ठेका देताना गोंधळ केल्याचा आरोप सिंहस्थ काळातच झाला होता. ९० कोटी खर्चूनही साधू-संतांना पायाभूत सुविधा मिळत नव्हत्या, तर लोकप्रतिनिधींचीही या ठेक्याबाबत ओरड होती. परंतु, राजकीय दबावातून ही तक्रार दुर्लक्षित झाली. मात्र, आता थेट पीएमओ कार्यालयाकडे तक्रार झाल्याने या कामांची फाइल चौकशीसाठी बाहेर येण्याची शक्यता आहे.

--


संबंधित कार्यकर्त्याने पीएमओ कार्यालयाच्या पीजी पोर्टलवर तक्रार केली आहे. या तक्रारीची छाननी केली जाणार असून, त्याची तपासणी केल्यानंतर पोर्टलला त्यांसदर्भातला तपशील कळविला जाईल.

-अभिषेक कृष्णा, आयुक्त, महापालिका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सवलती, सेलचा भूलभुलय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

वस्तू सेवाकराच्या भीतीपोटी काही करबुडव्या व्यावसायिकांनी आपल्याकडील वस्तूंची विक्री करण्यासाठी भरघोस सवलती, सेलचा उतारा शोधला आहे. अशा व्यावसायिकांचे पितळ उघडे पाडण्यासाठी ग्राहकांनी जीएसटी लागू होईपर्यंत अशा सेलमधून वस्तूंची खरेदी करू नये, असे आवाहन अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केले आहे.

सध्या सर्वच शहरांत विविध वस्तूंच्या सेलचे पीकच फोफावलेले दिसून येत आहे. त्यात कपडे, फर्निचर, होम अॅप्लायन्सेस, कॉस्मेटिक्स, पादत्राणे, इमिटेशन ज्वेलरी, मोबाइल फोन्स अशा व इतर वस्तूंचा समावेश आहे. या वस्तूंच्या सेलमध्ये वस्तूंच्या खरेदीवर २० टक्क्यांपासून ते थेट ८० टक्क्यांपर्यंत ग्राहकांना सवलत दिली जात आहे. त्यामुळे अशा सेलमध्ये आजवर महाग असलेल्या वस्तू अगदी स्वस्तात ग्राहकांना मिळत आहेत.

काळाबाजार उघड

येत्या एक जुलैपासून देशात जीएसटी करप्रणाली लागू होणार आहे. त्यानंतर देशातील सर्वच व्यापाऱ्यांना खरेदी-विक्रीची माहिती सरकारला द्यावी लागणार आहे. मुळातच ज्या व्यापाऱ्यांनी याआधी कर चुकवलेला आहे, अशा व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. जीएसटी लागू होण्याच्या आत आपल्याकडील माल विक्रीसाठी अशा व्यापाऱ्यांचा आटापिटा सुरू झाला आहे. जीएसटीमुळे करबुडव्या व्यापाऱ्यांचा काळाबाजार उघड होणार असल्यानेच अशा व्यापाऱ्यांनी सेलचा उतारा शोधला आहे.

हवी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट

कोणत्याही वस्तूवर एमआरपीऐवजी मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट छापली गेली पाहिजे, अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने शासनाकडे गेल्या काही वर्षांपासून लावून धरलेली आहे. मात्र, व्यापारीधार्जिण्या सरकारकाने आतापर्यंत या मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत. परिणामी एमआरपीच्या नावाखाली ग्राहकांची मोठी आर्थिक लूट होत आहे.


ग्राहकांची लूट

अशाप्रकारच्या सेलद्वारे ग्राहकांना स्वस्तात वस्तू मिळत असल्या, तरी ग्राहकांची व्यावसायिकांकडून मोठी लूट केली जात असल्याचे त्याद्वारे स्पष्ट होत आहे. सवलतीत वस्तूंची विक्री करूनही संबंधित व्यावसायिकांना नफा मिळत आहे. याचा अर्थ सेलपूर्वी या वस्तू एमआरपी मूल्याने विक्री होत होत्या. एमआरपी मूल्याने विक्री झाल्यामुळे ग्राहकांची मोठी आर्थिक लूट करण्यात येत होती, असा दावा अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सोशल मीडियाच्या माध्यमातून केला आहे.


--

सध्या एमआरपी अॅक्ट आहे. एमआरपीला मर्यादा नाही. त्याऐवजी प्रत्येक वस्तूची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट शासनाने जाहीर करावी, अशी मागणी ग्राहक पंचायतीने लावून धरली आहे.

- विजय सागर, अध्यक्ष, अखिल भारतीय ग्राहक पंचायत, पुणे

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाल्यांचा अतिक्रमणाने कोंडला श्वास

$
0
0

औरंगाबाद रोडवरील नैसर्गिक नाल्यांचे अस्तित्व नष्ट

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

महापालिकेच्या पावसाळी गटार योजनेसह शहरातील नाल्यांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण आणि बांधकाम झाल्याचे गंभीर स्थिती झाल्याचे निदर्शनास आले आहे. अशीच परिस्थिती औरंगबाद रोडवरील नाल्यांवर झाली आहे. या अतिक्रमणाकडे महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी गेल्या दोन वर्षांपासून केली जात आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने जोराच्या पावसात औरंगाबाद रोड जलमय होऊन वाहतूक ठप्प होण्याचे तसेच घरांमध्ये पाणी जाण्याचे प्रकार घडत आहेत. नाल्यावरील अतिक्रमण रडारवर घेणाऱ्या महापालिका प्रशासनाने औरंगाबाद रोडवरील नाल्यांकडे लक्ष द्यावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

औरंगाबाद नाका ते मानूर शिव या महापालिकेच्या हद्दीच्या पाच किलोमीटरच्या या रस्त्यावर १३ नाले असून, त्यातील तब्बल ११ नाले बुजविण्यात आलेले आहे. मुंबई-आग्रा महामार्गापासून दक्षिणेला गोदावरी नदीकडे उताराने पावसाचे पाणी वाहून आणणाऱ्या या नैसर्गिक नाले बुजविण्यात आल्याने पावसाचे पाणी वाहून जाण्याचा मार्गच खुंटला आहे.

या ठिकाणी आहेत नाले

शिंदी ओहळ (कपिला), लक्ष्मी लॉन्ससमोर, सेलिब्रेशन लॉन्ससमोर, सेवा सोसायटी, कैलास नगर, निलगिरी बाग, सिद्धीविनायक चौक, रामसीता लॉन्ससमोर, नांदूर नाला, मजा हॉटेलजवळ, मानूर शिवनाला, मानूर नाला असे नाले आहेत.

औरंगाबाद रोडच्या दोन्ही बाजूच्या परिसरात नव्याने बांधकामे होऊ लागली आहेत. त्या बांधकामांसाठी नैसर्गिक नाले बुजविण्यात येत आहे. गोदावरीकडे थेट पाणी वाहून जाण्याचे मार्ग बंद केल्यास भविष्यात मोठे संकट येऊ शकते. त्यामुळे त्यावर महापालिका प्रशासनाने वेळीच दक्षता घेऊन हे अतिक्रमण रोखले पाहिजे.

- देवांग जानी, गोदाप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोनशेवर दुचाकीस्वारांना दंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेटचा वापर न करता वाहन चालविणाऱ्या जवळपास दोनशेपेक्षा अधिक दुचाकीस्वारांवर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. गेल्या काही दिवसांपासून ही मोहीम थंडावली होती. मात्र, शनिवारी अचानक शहराच्या विविध भागात वाहतूक पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. त्यामुळे अनेक दुचाकीस्वारांची तारांबळ उडाली.

हेल्मेटचा वापर करीत नसलेल्या दुचाकीस्वारांवर शहर वाहतूक शाखेमार्फत कारवाई करण्यात येते. या वर्षाच्या सुरुवातीलाच हेल्मेटसक्तीच्या नियमाबाबत पोलिस आग्रही झाले. गेल्या काही दिवसांपासून या कारवाईकडे काहीसे दुर्लक्ष झाले होते. शुक्रवारी ४५ दुचाकीस्वारांवर कारवाई झाली. गुरुवारी हा आकडा ९५ होता.

वाहतूक विभाग सतत कारवाई करतो. दुचाकीस्वारांनी हेल्मेटचा वापर करायला हवा, याकडे आम्ही कटाक्षाने पाहतो. मात्र, वाहतुकीच्या इतर नियमांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवरदेखील कारवाई होते, असे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी स्पष्ट केले. दुचाकी अपघातात अनेक मृत्यू डोक्याला मार लागून होतात. त्यामुळे हेल्मेटचा वापर दुचाकी चालकांनी करावा, यासाठी कारवाईला वेग दिला जात असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

--

येथे झाली कारवाई

शनिवारी सकाळी शहरातील कॉलेजरोड, शरणपूररोड, मायको सर्कल, मुंबई नाका, नाशिकरोडसह इतर प्रमुख चौकांत पोलिसांनी कारवाईवर जोर दिला. सायंकाळपर्यंत दंडात्मक कारवाई सुरू होती. दिवसभरात दोनशेपेक्षा अधिक दुचाकीस्वारांकडून दंड वसूल करण्यात आला. हेल्मेटचा वापर न केल्यास वाहनचालकाकडून ५०० रुपये दंड वसूल करण्यात येतो. मात्र, त्यावेळी वाहनचालकाने पैसे भरण्यास असमर्थता दर्शविली, तर वाहन जप्त करण्यात येते. वाहनचालकाने तडजोड शुल्क भरल्यानंतरच त्यास वाहन परत करण्यात येते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राज्य सरकारकडे १०० कोटींची मागणी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळेपर्यंत राज्य सरकारने तातडीची आर्थिक मदत म्हणून दहा हजार रुपये देण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्हा बँकेसाठी राज्य सरकारकडे १०० कोटी रुपयांची आर्थिक मदत माग‌ितली आहे. त्यासाठी त्यांनी दिवसभर मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांसह विविध अधिकाऱ्यांशी संपर्क करून जिल्हा बँकेच्या सध्यस्थितीची माहिती दिली. यामुळे आर्थिक कोंडीत सापडलेल्या जिल्हा सहकारी बँकेला थोडासा दिलासा मिळण्याची चिन्हे आहेत.

पुणे येथे आयोजित केलेल्या राज्यातील महसूल अधिकाऱ्यांच्या दोन दिवसाच्या बैठकीला जिल्हाधिकारी गेले होते. त्यानंतर त्यांनी शनिवारी बँक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. बैठकीत त्यांनी बँका अधिकाऱ्यांना शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यासाठीच्या सूचना केल्या. बैठकीत बँक अधिकाऱ्यांनी बाजू मांडली. ते म्हणाले, राज्य शासनाने बँकांना ३० जून २०१६ रोजी थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना यंदाच्या खरिपासाठी तातडीची मदत म्हणून दहा हजार रुपयांपर्यंतचे पीककर्ज शासन हमीवर देण्याच्या सूचना केली आहे. पण, एनपीएमध्ये असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी रिझर्व्ह बँकेकडून सूचना आल्यास कर्ज देणे सुकर होईल.त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिझर्व्ह बँकेला पत्र दिले असल्याचे सांगितल्यानंतर बैठकीत उपस्थित बँक अधिकाऱ्यांनी सुस्कारा सोडला.

जिल्ह्यात १० हजार रुपयांच्या मदतीसाठी ८१ हजाराच्या आसपास शेतकरी पात्र आहेत. या बैठकीसाठी जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे, लीड बँकेचे अशोक चव्हाण उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षकांचा गौरव

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संदीप विद्यापीठ आणि प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनतर्फे शनिवारी संदीप विद्यापीठात नाशिक जिल्ह्यातील सर्व क्लासेसच्या दहावी व बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा साजरा करण्यात आला, तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. या वेळी शिक्षकांना विविध पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

प्राचार्य प्रशांत पाटील यांच्या हस्ते पीटीएचे अध्यक्ष प्रा. जयंत मुळे यांचा सत्कार करण्यात आला. यशस्वी, उत्तीर्ण विद्यार्थ्यांना या वेळी गौरविण्यात आले. संदीप पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रा. प्रशांत पाटील यांनी नाशिक जिल्ह्याचा यशस्वी शैक्षणिक वाटचालीचा उत्तरोत्तर वाढणारा टक्का पाहता शिक्षकांचे योगदान कसे महत्त्वाचे आहे याची माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने मागोवा घेणाऱ्या शिक्षकांच्या अथक प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. संदीप इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलाजी अँड रिसर्च सेंटरचे प्राचार्य डॉ. एस. टी. गंधे यांनी शिक्षणाच्या माध्यमातून स्वतःचा व पर्यायाने समाजाचा विकास करणे कसे शक्य आहे, याविषयी मार्गदर्शन केले. संदीप इन्स्टिट्यूटच्या वेगवेगळ्या कॉलेजांचे प्राचार्य, नाशिक जिल्हा खासगी क्लासेस संघटनेचे पदाधिकारी व खासगी क्लासेसचे संचालक, तसेच सर्व विभागप्रमुख व प्राध्यापक उपस्थित होते.

यशवंत बोरसेंना जीवनगौरव

श्री साई कम्प्युटर, टायपिंग अँड कोचिंग क्लासेसचे संचालक यशवंत बोरसे यांना ‘शिक्षक जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले. प्रा. गिरीश कश्यप, प्रा. जगदीश शेलार, प्रा. गोरक्षनाथ लांडे, प्रा. विजय जाधव, प्रा. धनंजय शिंदे, प्रा. सचिन जाधव, प्रा. घनश्याम अहिरे, प्रा. निरामय भट्ट, प्रा. हितेश सिंग, प्रा. प्रीतीश कुलकर्णी, प्रा. प्रमोद गुप्ता, प्रा. चंद्रकांत सुपेकर, प्रा. नीलेश दुसे, प्रा. यशवंत भामरे, प्रा. नीलेश सुराणा, प्रा. उमेश गारे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. प्रा. हर्षा कश्यप, प्रा. नीता आहेर, प्रा. लीना ठाकरे, प्रा. राजकमल हेलकर यांना आदर्श शिक्षका पुरस्काराने गौरविण्यात आले. खासगी क्लासेसच्या प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या सर्व यशस्वी सातशे विद्यार्थ्यांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसांना धक्काबुक्की

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अतिक्रमण काढत असताना विरोध करणाऱ्या दोन महिलांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली. ही घटना ओमकारनगर भागात घडली असून, या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जयश्री चव्हाण आणि मोना उर्फ धनश्री केदारे (रा. रुक्मिणी मंदिराजवळ, ओमकारनगर) अशी धक्काबुक्की करणाऱ्या महिलांची नावे आहेत. ओमकारनगर भागात शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास महापालिकेने अतिक्रमण निर्मूलन मोहिम राबविली. त्या वेळी ही घटना घडली. रुक्मिणी मंदिराजवळ राहणाऱ्या चव्हाण व केदारे यांच्या घराजवळील अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाल्यानंतर हा प्रकार घडला. संतप्त महिलांनी अतिक्रमण काढण्यास विरोध करीत संबंधित कर्मचाऱ्यांना शिवीगाळ केली. या वेळी महिला पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी महिला पोलिस कर्मचारी जाधव आणि बोरसे यांना धक्काबुक्की केली. या प्रकरणी शैलजा माळोदे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून, उपनिरीक्षक जोपळे तपास करीत आहेत.

कारमध्ये चोरी

सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी म्युझिक सिस्टीमसह किमती मुद्देमाल लंपास केल्याची घटना कलानगर भागात घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
जयेश टेकचंद तन्ना (रा. मित्रविहार सोसायटी, कलानगर) यांच्या तक्रारीनुसार, तन्ना यांची कार (एमएच १५/एफएफ ०७९१) बुधवारी रात्री त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावली होती. चोरट्यांनी कारची चालकाच्या बाजूची काच फोडली, तसेच म्युझिक सिस्टीम, स्क्रीन टच प्लेअर व स्पीकर असा सुमारे १३ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. सहाय्यक निरीक्षक मेश्राम तपास करीत आहेत.

तरुणीचा विनयभंग

कामावरून घराकडे परतणाऱ्या तरुणीस रस्त्यात अडवून ओळखीच्या तरुणाने विनयभंग केल्याप्रकरणी उपनगर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली. ही घटना डीजीपीनगर भागातील कॅनॉल रोड परिसरात घडली. आशिष अंकुश थोरात (रा. जगदीश अपार्टमेंट, इच्छामणी लॉन्समागे, उपनगर) असे या संशयिताचे नाव आहे. मूळची पनवेल येथील २६ वर्षीय तरुणी इंदिरानगर परिसरातील कॅनॉल रोड भागात राहते. ती शुक्रवारी सायंकाळी कामावरून घराकडे परतत असताना आशिषने तिला अमृत बारसमोरील रोडवर अडवले. तू आता माझ्याशी पहिल्यासारखी वागत नाही, असे म्हणत त्याने तरुणीचा विनयभंग केला. या वेळी त्याने तरुणीस शिवीगाळ करीत, जर माझ्याशी लग्न केले नाही तर माझ्याशी गाठ आहे, अशी धमकी दिल्याचे तरुणीने तक्रारीत नमूद केले आहे. उपनिरीक्षक तेली तपास करीत आहेत.

पॉलिशच्या बहाण्याने दागिने लंपास

दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने घरात घुसलेल्या दोन भामट्यांनी महिलेच्या बांगड्या हातोहात लांबवल्या. ही घटना सिडकोतील बडदेनगर भागात घडली. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. सुनीता दिलीप सोनवणे (वय ५१, रा. घोडेमळा, बडदेनगर) यांच्या तक्रारीनुसार, शुक्रवारी सकाळी सोनवणे घरात एकट्या असताना ही घटना घडली. साडेअकराच्या सुमारास दागिने पॉलिश करून देण्याच्या बहाण्याने दोन संशयित घरात घुसले. दोन्ही तरुणांनी सुमारे एक लाख २० हजार रुपयांच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या गरम पाण्यात टाकल्या. काही वेळाने बाहेर काढण्याचा सल्ला देत संशयितांनी बांगड्या हातोहात लंपास केल्या. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार गायकवाड तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अमरधाम सुविधांपासून वंचितच

$
0
0

पिंपळगाव बहुल्यातील स्मशानभूमी दुर्लक्षित

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या पिंपळगाव बहुला गावात आजही नागरी सुविधा मिळत नसल्याचा गावकऱ्यांचा आरोप आहे. त्यातच गावात असलेल्या अमरधाम सुविधांपासून वंचित असल्याने नगरसेवक व महापालिका अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. अंत्यविधीसाठी येणाऱ्या आप्तेष्ट व नातेवाईकांना बसण्याचीही व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत असते. तसेच लाकडांसाठी शेड नसल्याने ओल्या लाकडांचाच पुरवठा होत असतो.

महापालिकेच्या हद्दीत समाविष्ट करण्यात आलेल्या २३ खेड्यांमध्ये पिंपळगाव बहूलाचाही समावेश करण्यात आला होता. परंतु, अनेक वर्ष महापालिकेत समावेश होऊनदेखील आवश्यक सुविधा ग्रामस्थांना दिल्याच गेल्या नाहीत. रस्ते, स्ट्रिट लाइट व पाण्याची समस्या आजही पिंपळगाव बहुला गावात कायम आहे. यात काही प्रमाणात समस्या जरी सुटल्या असल्या, तरी गावातील अमरधाम मात्र सुविधांपासून वंचितच आहे.

शेडही उपलब्ध नाही

अंत्यविधीसाठी येणाऱ्यांना साधी आसन व्यवस्था अमरधाममध्ये झालेली नाही. तसेच उभे राहण्याचीही व्यवस्था नसल्याने मोठी गैरसोय होत असते. किमान अंत्यविधीला येणाऱ्यांना बसण्याची अथवा उभे राहण्याकरीता शेडची उभारणी महापालिकेने करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पावसाळ्यात अंत्यविधीला लागणाऱ्या लाकडांसाठीही छोटे पत्र्याचे शेड देण्याचीही मागणी होत आहे. अंत्यविधीसाठी असलेले पलंगही मोडकळीस आले असून, पलंग तुटून अंत्यविधीचे शव खाली पडण्याची शक्यता असल्याने तात्काळ दुरूस्तीची गरज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गानतंत्र’साठी नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्ल्ड म्युझिक डे (दि. २१ जून)निमित्त ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’तर्फे ‘गानतंत्र’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठी ई-मेलद्वारे गाणे मागविण्यात आले होते. नाशिककरांनी या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून, शनिवारी रात्री उशिरापर्यंत पावणेदोनशे नाशिककरांनी यात सहभाग नोंदवला आहे. सोमवारी (दि. १९) या स्पर्धेचा स्टुडिओ राउंड रेडिओ मिर्चीमध्ये होणार आहे. २० स्पर्धकांमधून १० स्पर्धक या ठिकाणी निवडले जातील आणि या १० स्पर्धकांना २१ जून रोजी होणाऱ्या लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गाण्याची संधी मिळणार आहे. अंतिम तीन विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे रेडिओ मिर्ची हे म्युझिक पार्टनर आहेत. आपल्याकडील सांग‌ीतिक वारशाला अभिवादन हा तर या स्पर्धेमागचा हेतू आहेच; त्याशिवायही आतापर्यंत लोकांच्या कानापर्यंत न पोहोचलेल्या उत्तमोत्तम आवाजांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचाही उद्देश यामागे आहे. आपला आवाज उत्तम असूनही आपल्याला केवळ चांगले व्यासपीठ न मिळाल्यामुळे आणि तज्ज्ञांचे योग्य मार्गदर्शन न मिळाल्यामुळे लोकांपर्यंत पोहोचता आले नाही, अशी खंत वाटणाऱ्या सर्वांसाठी ‘गानतंत्र’ ही स्पर्धा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कॅशलेस’ कॉलेजकडे वाटचाल

$
0
0

‘कॅशलेस’ कॉलेजकडे वाटचाल

देशाची वाटचाल सध्या ‘कॅशलेस’कडे सुरू आहे. तंत्रज्ञानाच्या साह्याने व्यवहार व्हावेत यासाठी विविध स्तरांवर सरकारी व्यवस्थेकडून प्रयत्न केले जात आहेत. यामध्ये कॉलेजांची भूमिकाही महत्त्वाची आहे. त्यामुळे ‘कॅशलेस’ कॉलेजकडे आमचे कॉलेज वाटचाल करीत आहे, असे केव्हीएन नाईक आर्टस, कॉमर्स व सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. वसंत वाघ यांनी सांगितले. याविषयी तसेच कॉलेजविषयी अधिक जाणून घेण्यासाठी त्यांच्याशी साधलेला संवाद...

कॉलेजमध्ये कोणकोणते अभ्यासक्रम शिकवले जातात?

आर्टस, कॉमर्स, सायन्स शाखांशी संबंधित विविध अभ्यासक्रम आमच्या कॉलेजमध्ये शिकवले जातात. बीए, बी.कॉम., बी.एस्सी., बीसीएस, बीबीए, बीसीए, एम.एस्सी. फिजिक्स, झूलॉजी, केमिस्ट्री, एमए, एम. कॉम. आदी अभ्यासक्रमांचा त्यात समावेश आहे.

विद्यार्थी विकासासाठी राबविले जाणारे उपक्रम कोणते?

विद्यार्थ्यांचा विकास हेच आमचे उद्दिष्ट आहे. अभ्यासेतर कौशल्यांचाही त्यांच्यात विकास व्हावा, या हेतूने विविध उपक्रम राबवले जातात, तसेच त्यांच्यात सामाजिक भान रुजावे, याची काळजीही आम्ही घेत असतो. त्यासाठी शहरातील चामरलेणी, पांडवलेणी, गोदाघाट अशा पर्यटनाच्या ठिकाणी स्वच्छता अभियान राबवले जातात. याबरोबरच दरवर्षी गणेशमूर्ती संकलन, रस्तासुरक्षा अभियान, कन्यारत्न वाचवा, स्कील डेव्हलपमेंटविषयी कार्यशाळाही घेण्यात येतात. स्पर्धापरीक्षांकडे विद्यार्थ्यांचा कल वाढावा, यासाठी एमपीएससी, यूपीएससीविषयी मार्गदर्शनही केले जाते. याशिवाय राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदा आयोजित केल्या जातात. याशिवाय मुलींच्या सुरक्षेच्या दृष्टीने निर्भयकन्या अभियानही आम्ही राबवतो.

कॉलेजचे वैशिष्ट्य काय?

सध्या देशात कॅश व्यवहारापेक्षा ऑनलाइन व्यवहाराला प्राधान्य देण्याचा प्रयत्न सरकारी व्यवस्थेकडून केला जात आहे. याचाच एक भाग म्हणून कॅशलेस कॉलेजकडे आम्ही वळलो आहोत. प्रवेशप्रक्रियेची रक्कम विद्यार्थ्यांना थेट ऑनलाइन ट्रान्स्फर करता येईल, अशा सुविधा आम्ही उपलब्ध करून दिल्या आहेत. त्यामुळे आम्ही ७० टक्के कॅशलेस व्यवहारापर्यंत पोहोचलो आहेत. ते शंभर टक्के करण्यासाठी आमचा प्रयत्न आहे. त्याचबरोबर कॉलेज स्तरावरील परीक्षादेखील आम्ही ऑनलाइन पद्धतीने घेतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचा तांत्रिक दृष्टीनेही विकास होत आहे. कॉलेज व विद्यार्थ्यांशी निगडित प्रत्येक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी एसएमएसची सुविधादेखील आहे. एसएमएसद्वारे आम्ही विद्यार्थ्यांना ही माहिती देतो.

गरजू विद्यार्थ्यांसाठी काय सुविधा कॉलेजकडून उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत?

‘एक रुपया सन्मानाचा, माझ्या गरजू मित्र-मैत्रिणीचा’ हा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. जे विद्यार्थी अनाथ, निराधार आहे त्यांना यामार्फत मदत होते. या उपक्रमातून मिळालेली रक्कम आम्ही या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी वापरतो, तसेच जे विद्यार्थी अजिबात फी भरू शकत नाही, त्यांना वेळप्रसंगी मोफत शिक्षणही दिले जाते.

विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी काय सल्ला द्याल?

पारंपरिक शाखांमधून मोठ्या संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या शाखांचा विचार केला पाहिजे.

(शब्दांकन ः अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images