म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
नाशिक-पुणे महामार्गावरील चौकांमध्ये किरकोळ विक्रेते आणि भिकारी यांनी वाहनचालकांना त्रस्त करुन सोडले आहे. त्यांच्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. दत्त मंदिर चौकात दोन दिवसांपूर्वी असाच एक अपघात होता होता टळला. त्यामुळे आता या रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरातील हे महत्त्वाचे चौक आता अपघात क्षेत्र बनलेत की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.
शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून नाशिक-पुणे मार्ग असल्याने या ठिकाणी वाहनांची गर्दी होत असते. परराज्यातून नाशिकला पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले हे विक्रेते अशा वर्दळीच्या चौकांमध्ये सिग्नलवर वाहन थांबले की गजरे, नॅपकिन, खेळणी, गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी धाव घेतात.
चालकाच्या विनवण्या करून वस्तू घेण्यास भाग पाडतात. काही भिकारीही भीक मागतात. हिरवा सिग्नल लागला तरी हटत नाहीत. त्यामुळे वाहनचालक वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि अचानक हे विक्रेते व भिकारी मध्ये आल्याने अपघात होऊन दुचाकी घसरते. द्वारकेजवळील काठे गल्ली सिग्नल येथे वाहन थांबले की, गजरे विक्रेते व भिकारी वाहनचालकापुढे येतात. त्यांना वारंवार विनवणी करतात. अशा परिस्थितीत वाहतुकीला अडथळा आणतात. विजय-ममता चौकातही भिकाऱ्यांची मुले तसेच कडेवर मूल घेऊन महिला चालकाला आडव्या येतात. उपनगर नाका तसेच दत्त मंदिर चौकातही अशीच समस्या आहे. शहरातील सीबीएस, मुंबई नाका, कॅनडा कॉर्नर, त्र्यंबकरोडचा सिग्नल, आयटीआय सिग्नल आदी ठिकाणी विक्रेते दिसतात.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट