Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

वाहनांना फेरीवाल्यांचा ताप

$
0
0

अपघातांची शक्यता; शहरातील रस्त्यांवर विक्रेते, भिकाऱ्यांचे ठाण

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावरील चौकांमध्ये किरकोळ विक्रेते आणि भिकारी यांनी वाहनचालकांना त्रस्त करुन सोडले आहे. त्यांच्यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. दत्त मंदिर चौकात दोन दिवसांपूर्वी असाच एक अपघात होता होता टळला. त्यामुळे आता या रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांमुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. तसेच शहरातील हे महत्त्वाचे चौक आता अपघात क्षेत्र बनलेत की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

शहरातील अत्यंत वर्दळीचा मार्ग म्हणून नाशिक-पुणे मार्ग असल्याने या ठिकाणी वाहनांची गर्दी होत असते. परराज्यातून नाशिकला पोटाची खळगी भरण्यासाठी आलेले हे विक्रेते अशा वर्दळीच्या चौकांमध्ये सिग्नलवर वाहन थांबले की गजरे, नॅपकिन, खेळणी, गृहोपयोगी वस्तू विक्रीसाठी धाव घेतात.

चालकाच्या विनवण्या करून वस्तू घेण्यास भाग पाडतात. काही भिकारीही भीक मागतात. हिरवा सिग्नल लागला तरी हटत नाहीत. त्यामुळे वाहनचालक वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करतात आणि अचानक हे विक्रेते व भिकारी मध्ये आल्याने अपघात होऊन दुचाकी घसरते. द्वारकेजवळील काठे गल्ली सिग्नल येथे वाहन थांबले की, गजरे विक्रेते व भिकारी वाहनचालकापुढे येतात. त्यांना वारंवार विनवणी करतात. अशा परिस्थितीत वाहतुकीला अडथळा आणतात. विजय-ममता चौकातही भिकाऱ्यांची मुले तसेच कडेवर मूल घेऊन महिला चालकाला आडव्या येतात. उपनगर नाका तसेच दत्त मंदिर चौकातही अशीच समस्या आहे. शहरातील सीबीएस, मुंबई नाका, कॅनडा कॉर्नर, त्र्यंबकरोडचा सिग्नल, आयटीआय सिग्नल आदी ठिकाणी विक्रेते दिसतात.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सट्टेबाजांना रोखण्याचे पोलिसांसमोर आव्हान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये आज, रविवारी (दि. १८) भारत-पाकिस्तानचे संघ भिडणार आहेत. या लढतीकडे क्रिकेटविश्वाचे लक्ष लागले असून, सामन्यावर जोरदार बेटिंग होण्याची दाट शक्यता आहे. बेटिंग रोखण्यासाठी, तसेच समाजकंटकांना वठणीवर आणण्यासाठी शहरात पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

भारत-पाकिस्तान यांच्यात चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये पहिल्यांदाच लढत होत आहे. भारताने साखळी सामन्यात पाकिस्तानला धूळ चारली असून, फायनलमधील रोमांच नक्कीच वाढणार आहे. या पार्श्वभूमीवर सट्टेबाजदेखील सरसावले असून, भारताला फेव्हरेट मानले जात आहे. दरम्यान, बेटिंग रोखण्यासाठी पोलिस सरसावले असून, बंदोबस्तात वाढ केली आहे. आयपीएल सामन्यांदरम्यान पंचवटीत सुरू असलेल्या बेटिंग अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकला होता. त्यापूर्वी असे अनेक प्रकार पोलिसांनी उघड केले आहेत. याबाबत बोलताना परिमंडळ एकचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले, की भारत-पाकिस्तान सामन्याच्या निकालानंतर समाजकंटकदेखील सक्रिय होण्याची शक्यता असते. त्यामुळे भद्रकाली परिसरासह वडाळा गाव येथे बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. बेटिंगचे प्रकार रोखण्यासाठी तयारी सुरू असून, त्यादृष्टीने सूचना देण्यात आले असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पावसाचा दुजाभाव

$
0
0

टीम मटा

नांदगाव, येवला, निफाड तालुक्यात शुक्रवारी रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांचे नुकसान झाले. काही ठिकाणी मोठमोठे वृक्ष उन्मळून पडले. याउलट कळवण, दिंडोरी, चांदवड, देवळा, त्र्यंबकेश्वरसह मालेगाव तालुक्याचा पश्चिम पट्टा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

मालेगाव तालुक्यातही असमान पाऊस

मालेगाव - शहरात शुक्रवारी सायंकाळी पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दोन दिवस शहरात उकाडा वाढला होता. शुक्रवारी झालेल्या पावसाने नागरिकांना दिलासा मिळाला . तालुक्यातील झोडगे परिसरात दमदार पावसाने हजेरी लावली. सायंकाळी एक तास पाऊस कोसळला. यामुळे शेतकरी सुखावला असून, पेरणीच्या कामांना वेग आला आहे. याऊलट दाभाडी परिसरात मात्र पावसाने दडी मारली आहे. मालेगाव तालुक्यातील पश्चिम पट्ट्यात तुरळक सरी वगळता दमदार पाऊस झालेला नाही.

निफाडला जोरदार

निफाड ः शहर व परिसरात शुक्रवारी रात्री विजांचा कडकडाट आणि वादळवाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. गेल्या दोन दिवसांपासून विश्रांतीवर गेलेला पाऊस परतल्यामुळे शेतकरी समाधानी झाले असून शेतीच्या कामांना वेग आला आहे. तालुक्यातील उगाव, शिवडी, सोनेवाडी, शिवरे, जळगाव आदी गावांमध्ये पावसाने दमदार हजेरी लावली.

त्र्यंबकेश्वर तालुका अद्याप कोरडाच

त्र्यंबकेश्वर ः शहरासह तालुक्यात पात्र पावसाने दडी मारली आहे. वळावाच्या किरकोळ पावसानंतर अद्यापही या भागात पावसाने पाठ फिरवली आहे. अधूनमधून एखादी सरी कोसळण्यापलीकडे तालुक्यात पावसाने कुठेही दमदार हजेरी लावलेली नाही. त्यामुळे बळीराजा मेटाकुटीस आला आहे.

कळवण, देवळ्यात बळीराजा चिंतेत

कळवण ः गेल्या चार पाच दिवसांपासून पावसाने कळवण, देवळा तालुक्याकडे पाठ फिरवली आहे.कळवण शहरालगतच्या काही भाग वगळता तालुक्यात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. देवळा परिसरही अजून कोरडा असल्यामुळे बळीराजा च‌िंतेत आहे.

नांदगावात नुकसान

नांदगाव शहर व परिसरात शुक्रवारी रात्री झालेल्या जोरदार वादळाने अनेक घरांवरचे पत्रे उडाले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडल्यामुळे नुकसान झाले. मविप्र संस्थेच्या नांदगाव महाविद्यालयाला या वादळवाऱ्यासह पावसाचा फटका बसला आहे. महाविद्यालयाचे तब्बल सात लाखांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज आहे. शुक्रवारच्या वादळी वारा व पावसाने महाविद्यालयातील तीन वृक्ष कोसळले. तसेच विद्यार्थ्यांसाठी असलेले पत्र्याचे सायकल स्टँण्ड पडले. महाविद्यालयातील सोलर व्यवस्थेची देखील दुर्दशा झाली. शहर व परिसरात देखील बरीच पडझड झाली. विद्युत तारा तुटल्याने काही ठिकाणी रात्रभर वीज नव्हती.
येवल्यात बरसल्या मृगधारा

येवलाः यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्राने तालुक्यातील बळीराजाला मोठा दिलासा दिला असला, तरी शुक्रवारी रात्री जोरदार वादळी वाऱ्यासह बरसलेल्या पावसाने तालुक्यात अनेक ठिकाणी मोठा तडाखा दिला. विशेषतः तालुक्याच्या उत्तर-पूर्व पट्ट्यातील अनेक गावात या

वाऱ्याच्या तडाख्याने शेतशिवारात राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या घराचे पत्रे उडून गेले. काही ठिकाणी घरांच्या भिंती कोसळल्या. अनेक ठिकाणी चाळींचे पत्रे उडाल्यामुळे उन्हाळ कांदा भिजला. अर्ध्या तास सुरू असलेल्या या वादळीवाऱ्यांच्या तडाख्यामुळे लाखो रुपयांचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

शुक्रवारी दिवसभर दमट वातावरण होते. त्यानंतर रात्री आठ वाजेच्या सुमारास वेगाने वाहणाऱ्या वादळी वाऱ्यासह पावसाला सुरुवात झाली. जवळपास अर्धा तास येवला शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मृगधारा बरसल्या. तालुक्यातील अनेक गावातील घरे, कांदा चाळी, पोल्ट्री फार्मला तडाखा बसला. खबरदारीचा उपाय म्हणून महावितरणने काही वेळ वीजपुरवठा बंद केला होता.

तहसीलदारांकडून पाहणी

तालुक्याच्या पूर्व भागातील सायगाव, पांजरवाडी, गोल्हेवाडी आदी काही ठिकाणी वाऱ्याबरोबरच किरकोळ स्वरुपात गारांचा माराह‌ी झाल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांनी शनिवारी सकाळी नुकसानग्रस्त भागाची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना केल्या आहेत.

अनेकांचे नुकसान

अंदरसूल गोल्हेवाडी रस्त्यावरील गजानन जिवाजीराव देशमुख यांच्या पोल्ट्री फार्मचे पत्रे उडून भिंती कोसळल्या. उंदिरवाडी रस्त्यावरील तुळशीराम मेहतर यांच्या घराचे १५ पत्रे उडाले. नगरसूल येथील गोल्हेवाडीतील विश्वनाथ नारायण शिंदे यांच्या कांदा चाळीचे पत्रे उडली. त्यामुळे चाळीतील दीडशे क्विंटल उन्हाळ कांदा पूर्ण भिजला. गोल्हेवाडीमधीलच संभाजी कोतकर यांच्या राहत्या घराची भिंत पडली. याच गावातील भास्कर कोतकर यांच्या डाळिंब बागेलाही वादळी वाऱ्याने तडाखा बसला. कोतकर यांच्या कांदा चाळीचेही नुकसान झाले. धामोडे येथील सावरगाव रोडवरील वाल्मिक भड, ममदापूर येथील हरिभाऊ साबळे यांच्या घराचे पत्रे उडाले.

येवला तालुक्यातील अंदरसूल, सायगाव, भारम, नगरसूल, राजापूर, ममदापूर या उत्तर-पूर्व पट्ट्यात गेल्यावर्षीच्या पावसाळ्यात सुरुवातीलाच वरुणराजाने जोरदार सलामी दिली होती. यंदाही याच पट्ट्यात मृग नक्षत्राने दमदार श्रीगणेशा केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेश मंदिराच्या प्रवेशद्वारातच आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

हाताची नस कापून घेत स्वतःवर रॉकेल टाकून पेटवून घेत एका व्यक्तीने आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना जेलरोडच्या मॉडेल कॉलनीत घडली आहे. सुभाष रामराव डोहिफोडे (५८, रा. आविष्कार अपार्टमेंट, मॉडेल कॉलनी) असे आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतल्यानंतर मॉडेल कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंदिराला प्रदक्षिणा घालण्याच्या प्रयत्नांत असतांना खाली कोसळून त्याचा मृत्यू झाला.

याप्रकरणी सुभाष डोहिफोडे याचा मुलगा रितेश (१८) याने नाशिकरोड पोलिस ठाण्यात रविवारी सकाळी फिर्याद दिली. नाशिकरोड पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे. रितेशच्या फिर्यादीनुसार, त्याचे वडील सुभाष डोहिफोडे यांनी रविवारी पहाटे घरात हाताच्या नसांसह कमरेखालील भाग कापून घेत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेतले. त्यानंतर घराबाहेर पडून ते जवळच असलेल्या विघ्नहर्ता गणेश मंदिराजवळ गेले. या मंदिराजवळ खाली कोसळून सुभाष डोहिफोडे यांचा मृत्यू झाला. मृत्यूपुर्वी त्यांनी गणेश मंदिराला प्रदक्षिणा घालण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी जेलरोडला खुनाची घटना घडल्याची माहिती जेलरोडला वाऱ्यासारखी पसरली. मात्र, पोलिसांमुळे खरा प्रकार लक्षात आल्याने अफवा बंद झाली. मृत्यूपूर्वी सुभाष डोहिफोडे याने मॉडेल कॉलनीतील विघ्नहर्ता गणेश मंदिर गाठले. तेथे त्याने गणेश मंदिराला प्रदक्षिणा घातल्याचे उमटलेल्या रक्ताच्या पावलांवरून दिसून आले. याशिवाय मंदिराच्या पायऱ्यांसह मुख्य दरवाजावरही रक्त उडालेले दिसले.

विक्षिप्तपणातून कृत्य

सुभाष डोहिफोडेला अध्यात्माचे वेड होते. तो अनेकदा घर सोडून बाहेर कुठेतरी राहत असे, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. विक्षिप्तपणातूनच त्याने असे कृत्य केले असल्याचा संशय आहे.

गणेशा वाचव...!

नसा कापलेल्या व अंगावर रॉकेल टाकून पेटवून घेतलेल्या अवस्थेत वेदनांनी विव्हळणाऱ्या सुभाष डोहीफोडे याने गणेश मंदिरात येऊन याचना केली. ‘गणेशा वाचव...’ अशा हाका त्याने घातल्या. मात्र, स्थानिक नागरिकांना या घटनेची कल्पना आली नाही. त्याचे नेहमीचे गणपती मंदिरातील वागणे परिसरातील नागरिकांना माहित असल्याने कुणीही लक्ष दिले नाही. त्याचे कुटुंबीय घटनास्थळी पोहचेपर्यंत सुभाषचा मृत्यू झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोर्चा नऊ ऑगस्टलाच

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मुंबई येथे काढण्यात येणारा मराठा क्रांती मोर्चा ९ ऑगस्ट २०१७ रोजची काढण्यात येणार असल्याचा निर्णय राज्यस्तरीय बैठकीत घेण्यात आला. राज्यभरातील विविध जिल्ह्यातून आलेल्या सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी या मोर्च्याच्या नियोजनावर चर्चा केली. या मोर्चासाठी राज्यस्तरीय समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चासाठी नांदूर येथील रुख्मिणी लॉन्स येथे रविवारी बैठक झाली. यात औरंगाबाद, नगर, नाशिक, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, जळगाव आदी जिल्ह्यातून आलेल्या समाज बांधवांनी नियोजनाविषयी मत व्यक्त केले. मोर्चा यशस्वी करण्यासाठी सर्वांच्या सूचनांचा विचार केला जाईल. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोर्चाविषयी जो अपप्रचार सुरू आहे तो बंद करण्याची ताकीद देण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रात मोर्चासाठी एकच प्रकारचे बिल्ले, बॅर्नर, शासनाला देण्यात येणारे निवेदन एकच असावे, अशी सूचना औरंगाबादच्या प्रतिनिधींनी केली.

मोर्चा मुंबईला होणार असल्याने यजमान मुंबईकरांना विचारात घेणे गरजेचे आहे. आतापर्यंत मूक मोर्चे झाले आता ठोक मोर्चा झाला पाहिजे, असे मत मुंबईच्या दिलीप जगताप यांनी व्यक्त केले.

मोर्चाला समाजाची नोंदणी करण्यात यावी तसेच जिल्हावार प्रतिनिधींची निवड त्वरित करण्याची सूचना अॅड. राहुल पवार यांनी केली. मागण्या करताना त्या राज्यासाठी कोणत्या आणि केंद्रासाठी कोणत्या याचे विभाजन करावे. ठराविक मागण्यांचा निवेदनात समावेश करावा. मोर्चासाठी राणीचा बाग ते आझाद मैदान असा मार्ग आहे. त्यानुसार रेल्वे आणि महामार्गाच्या वाहतूकीचा विचार करायला हवा. मुंबईत येणे आणि जाणे अडचणीचे होणार नाही या दृष्टीने नियोजन करण्यात यावे, अशा सूचना मांडण्यात आल्या.

आरक्षण मुद्यावर भर

मोर्चात मराठा आरक्षण या विषयावर भर दिला पाहिजे. अॅट्रॉसिटीसारखा विषय हा केंद्राचा विषय असल्यामुळे तो या मोर्चात घेऊ नये. या विषयामुळेच यापूर्वी महाराष्ट्रात प्रतिमोर्चे निघाले आहेत, असेही मुद्दे मांडण्यात आले. तत्पूर्वी, छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन महिलांच्या हस्ते झाले. दिव्या महाले या चिमुरडीने मनोगत व्यक्त केले. गणेश कदम यांनी स्वागत केले. करण गायकर यांनी सूत्रसंचालन केले.

हवी विश्वासू समिती

राज्यस्तरीय १५ पदाधिकाऱ्यांची एक समिती असावी, त्यात ५ महसूल विभागातून ही निवड करावी, ही समिती विश्वासू असावी, शासनाकडून फूट पाडण्याचे प्रकार घडत असल्याचे अनभुव आहे, मोर्चांमध्ये महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग राहिला आहे, त्यांच्याही विचार व्हावा, असे अॅड. शिवाजी सहाणे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सपकाळ’च्या साठ विद्यार्थ्यांची निवड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अंजनेरी येथील कल्याणी चॅरिटेबल ट्रस्ट संचलित सपकाळ नॉलेज हबच्या इंजिनीअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग या शाखेतील विद्यार्थ्यांसाठी कॅम्पस इंटरव्ह्यूचे झाले. यात कॉलेजमधील साठहून अधिक विद्यार्थ्यांची निवड झाली. नामांकित कंपन्यांमध्ये विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळाली आहे.

जानेवारीत विविध डेज संपल्यानंतर कॅम्पस इंटरव्ह्यूची प्रक्रिया कॉलेजमध्ये पार पडली. यामध्ये महिंद्रा अॅण्ड महिंद्रा, इंटर्नस सोल्युशन, जिंदाल, सीएमएस आयटी सोल्युशन्स, पार्ले एलिझाबेथ टूल्स प्रा. लि, ऑपुलांत इंफोटेक प्रा. लि, इ-क्लर्क्स, अॅमेझॉन, एपिक रिसर्च प्रा. लि, क्रियोस इन्फो सोल्युशन प्रा. लि, होस्टप्रपल्स, ई-डिझाईन प्रा. लि. आदी कंपन्यांनी विविध पदांसाठी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या होत्या.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा सपकाळ नॉलेज हबचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. रवींद्र सपकाळ यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. साहेबराव बागल, प्लेसमेंट विभागप्रमुख प्रा. महेश आडके आदींचे मार्गदर्शन लाभले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सामाजिक प्रयत्नातून कोंडीवर तोडगा

$
0
0



म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान वाहतुकीचे नियोजन वारंवार कोलमडत आहे. नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजवळ तर हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबतचे वृत्त ‘मटा’तून प्रसिद्ध होताच महामार्गा प्राधिकरणासह, ठेकेदार व स्थानिक प्रशासन खडबडून जागे झाले. वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या कारणांचा शोध घेत तडकाफडकी सर्व्हिस रोड तयार करण्यासाठी शिंदे येथील हिंदू, मुस्लिम आणि महानुभव समाजबांधवांची स्मशानभूमी स्थलांतरीत करण्यासाठी ग्रामपंचायतीची जागा देण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ मंजुरी दिली.

नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गावाजवळ गेल्या आठवड्यात तब्बल चार तास वाहतूक ठप्प झाली होती. त्याचा फटका हजारो वाहनधारकांना व प्रवाशांना सहन करावा लागला. त्यातच पावसानेही हजेरी लावल्याने प्रवाशांचे आतोनात हाल झाले. वाहनांच्या दुतर्फा कित्येक किलोमिटर रांगा लागल्याने महामार्ग ठप्प पडला होता. शिंदे गावाजवळ महामार्गाच्या रुंदीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. याठिकाणी अरुंद रस्ता असल्याने हा रस्ता रहदारीसाठी अपूर्ण पडत असल्यानेच अशा प्रकारच्या वाहतुक कोंडीचा प्रवाशांना वारंवार सामना करावा लागत आहे.

तहसीलदारांकडून पाहणी

वाहतूक कोंडीनंतर तहसीलदार राजश्री आहिरराव यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता आर. एस. सोमवंशी, सुनील भोसले, सी. आर. सोनवणे, आर. ए. महाजन आदींनी शिंदे येथे धाव घेत वाहतूक कोंडीवर उपाय काढण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरीब मुलांच्या पाठीवर पोलिसांची शाबासकी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अभ्यास केला, मेहनत घेतली तर झोपडपट्टीतील मुलेही मोठे अधिकारी होऊ शकता. बरेचसे मोठे अधिकारी हे गरीब घरातूनच आले आहेत. दहावी पास गुणवंताना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन हवे असल्यास केव्हाही पोलिस अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी केले.

उपनगर येथील इच्छमणी मंगल कार्यालयात शांतता समिती आणि पोलिसांतर्फे झोपडपट्टीतील गुणवंतांचा सत्कार झाला. त्यावेळी डॉ. सिंगल बोलत होते. उपायुक्त विजय मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक आयुक्त राजू भुजबळ, विजय चव्हाण, अशोक नखाते, मोहन ठाकूर, अजय देवरे, वरिष्ठ निरीक्षक बाजीराव जाधव, मधुकर कड, पंढरीनाथ ढोकणे, अविनाश सोनवणे, खुलदास भोये, एस. वाय. बिजली यांची प्रमुख उपस्थिती होती. सचिन पवार यांनी स्पर्धा परिक्षेबाबत मार्गदर्शन केले. शांतता समिती सदस्य मीराबाई कदम, भारत निकम, रामबाबा पठारे यांनी मनोगत व्यक्त केले.

डॉ. सिंगल म्हणाले की, झोपडपट्टीत केवळ गुन्हेगारच जन्माला येत नाहीत तर गुणवंतही जन्माला येतात. गुणवत्तेला जिद्द व परिश्रमाची जोड दिल्यास यश हमखास मिळते. गरीबी हा प्रगतीतील अडथळा ठरू शकत नाही. पोलिसांना नागरिकांची मदत हवी असते तेव्हा सहकार्य करावे. स्वतः शिस्तीचे पालन करावे. तसे झाले तरच गुन्हेगारी नियंत्रणात येईल. शशिकांत मोजाड, दिलीप आहिरे, साहेबराव पवार, राजरत्न पवार, सुनंदा मोरे आदी उपस्थित होते. वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांनी सूत्रसंचलन केले. बाजीराव जाधव यांनी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कर्जमाफी ‘जीआर’ची होळी

$
0
0

कारसूळ गावातील शेतकरी आक्रमक

म. टा. वृत्तसेवा, निफाड

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर केल्यामुळे शेतकरी आंदोलन स्थगित झाले होते. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना अनेक निकष व नियम लावल्याने आपले कर्ज माफ होते की नाही अशी धास्ती ग्रामीण भागात आता व्यक्त होत आहे. यामुळे कारसूळ (ता. निफाड) येथे शेतकऱ्यांनी एकत्र येत या शासकीय ‘जी आर’ची होळी केली.

शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी अशी घोषणा केल्यानंतर तमाम शेतकरीवर्गाने फटाके फोडीत, पेढे वाटून आंदोलनाला यश मिळाले म्हणून आनंदोत्सव साजरा केला होता. मात्र आता शासनाच्या कर्जमाफी घोषणेच्या अनुषंगाने अनेक जी आर बाहेर येत असून, ते सोशल मीडियावरून लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्यात सरसकट, तत्वतः व निकष अशा शब्दांमुळे शेतकऱ्यांना अर्थ उमगत नाही. आता कर्जमाफीसाठी अनेक निकष लावलेले पुढे येत असल्याने ग्रामीण भागातील शेतकऱ्याला आपल्या पदरात काहीच पडणार नाही, अशी शक्यता दिसत असल्याने त्यांचा रोष वाढत आहे. यामुळे कारसूळ (ता. निफाड) येथील शेतकऱ्यांनी एकत्र येत सरकारच्या ‘जी आर’ची होळी करीत संताप व्यक्त केला. शब्दाचे खेळ न करता आणि कोणतेही निकष न लावता कर्जमाफी करावी, अशी मागणी केली आहे.

याप्रसंगी माजी सरपंच देवेंद्र काजळे, सीताराम जाधव, श्रीराम शंखपाळ, भास्करराव गाडे, दत्तू काजळे, जयवंत ताकाटे, बाबाजी उगले, बबन उगले, रंगनाथ पगार, हनुमंत शंखपाळ, शिवाजीराव ताकाटे, दिलीप उगले, माधव क्षीरसागर, केशव काजळे, राजेंद्र ताकाटे, आदी उपस्थित होते.

‘संपूर्ण कर्जमाफी द्या, अन्यथा तीव्र आंदोलन’

तत्वतः, सरसकट व निकषांच्या आधीन राहून राज्यातील फडणवीस सरकारने केलेली कर्जमाफी म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या मुंबई भेटीत शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे प्रदर्शन त्यांच्यासमोर नको म्हणून घाईगडबडीत व शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींच्या डोळ्यात धूळ फेकत कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. संपूर्ण कर्जमाफी व शेतकऱ्यांचा सातबारा कोरा झाला नाही तर झाले त्यापेक्षा तीव्र आंदोलनाची तयारी शेतकऱ्यांनी ठेवावी, अशा शब्दात आपली उद्विग्न प्रतिक्रिया शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी व्यक्त केली.

शेतकऱ्यांच्या तीव्र लढ्याला फसवणुकीच्या नावाने सरकारने कर्जमाफी मान्य केली आहे. मात्र नियम व निकषांत कर्जमाफी कशी शक्य आहे. दहा हजार रुपयांची पीककर्जाची घोषणा फसवी निघाली आहे. संपूर्ण कर्जमाफी व सातबारा कोरा हा एकमेव पर्याय शेतकऱ्यांना आज वाचवू शकतो. याचे भान सर्वांनी ठेवायला हवे. कर्जमाफीचे नियम, निकष हे शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करण्यासाठी बनवले की काय? असा सवालही देवीदास पवार यांनी केला आहे. जिल्हा बँका, राष्ट्रीयकृत बँकांमध्ये शेतकरीवर्गाला उभे केले जात नाही. दहा हजाराचे पीककर्ज हिवाळ्यात देणार का? असा प्रश्न पवार यांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉमर्स क्षेत्रातून घडेल उज्ज्वल भविष्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही वर्षांपासून कॉमर्स या क्षेत्रात विविध संधी निर्माण झाल्या असून, या क्षेत्रातून उज्ज्वल भविष्य घडवता येते. दहावीमधील गुणांच्या आधारावर अकरावी कॉमर्समध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांना या क्षेत्राचा अभ्यास करता येतो. अकरावीच्या विषयांवर या क्षेत्रातील पुढील संधी ठरणार असल्याने विद्यार्थ्यांनी विषय निवडताना योग्य विचार करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पारख क्लासेसचे संचालक प्रा. सीए लोकेश पारख यांनी केले.

पारख क्लासेसतर्फे कॉमर्स शाखेतील करीअर संधींविषयी सेमिनारचे रविवारी (दि. १८) पारख क्लासमध्ये आयोजन करण्यात आले होते. ‘महाराष्ट्र टाइम्स’ या सेमिनारचे मीडिया पार्टनर होते. मागील वर्षात अकरावी, बारावी कॉमर्समध्ये प्रथम आलेल्या विद्यार्थ्यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले. या करिअर सेमिनारला कॉमर्सच्या विविध संधींचा उलगडा विद्यार्थ्यांसमोर करणयात आला.

अकरावी कॉमर्समध्ये इंग्रजी व मराठी माध्यमात पुढील करिअरच्या दृष्टीने काय महत्त्वाचे आहे, हेही यावेळी सांगण्यात आले. तसेच अकरावी कॉमर्ससोबत विद्यार्थ्यांनी सीए परीक्षांची तयारी कशी करावी, त्यासाठी कोणकोणते पर्याय आहेत. तसेच त्यासाठीच्या

कोर्सेसबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. आता दि. ३० जूननंतर सीएचा अभ्यास पूर्णपणे बदलत आहे. त्यामुळे सीएच्या अभ्यासक्रमात होणारे बदल आणि त्यात नव्याने समाविष्ट होणारे विषय, त्या विषयांची संख्या, या नवीन बदलानुसार त्यात उत्तीर्ण होण्याचे निकष, लागणारा वेळ व अनेक इतर बदल

याबद्दलही माहिती देण्यात आली. कॉमर्स शाखेमधून सीए कोर्सचा अभ्यासक्रम करता येतो, असेही यावेळी प्रा. पारख यांनी स्पष्ट केले. तसेच त्यासाठी कशाप्रकारे तयारी करावी याचीही उदाहरणासह माहिती विषद केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वच्छता मोहिमेत दुजाभाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
नाशिक महापालिकेत सातपूर भागातील पदावर असलेल्या नगरसेवकांच्या प्रभागात जोरदार स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. परंतु, इतर नगरसेवकांच्या प्रभागात स्वच्छता मोहीम कधी राबवणार, असा सवाल पदावर नसलेल्या नगरसेवकांनी उपस्थित केला आहे. स्वच्छता मोहीम राबविताना ती सरसकट राबविण्यात यावी असेही मत इतर नगरसेवकांनी व्यक्त केले आहे.
सर्वात प्रथम सभागृहनेता तथा नगरसेवक दिनकर पाटील यांच्या प्रभाग ९ मध्ये स्वच्छता मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या प्रभागाची पूर्ण स्वच्छता झालेली नसताना शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक विलास शिंदे यांच्या प्रभाग ८ मध्ये स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली. त्यातच शनिवारी पुन्हा सातपूर प्रभाग सभापती माधुरी बोलकर यांच्या प्रभाग १० मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. महापालिकेच्या आरोग्य विभागाने स्वच्छता मोहिमेत सर्वच प्रभागांतील घाण, कचरा उचलावा असे नागरिकांनी व्यक्त केले आहे.
सत्ते शिवाय शहाणपण दिसत नाही, असाच काहीसा प्रकार सातपूर विभागात पहायला मिळत आहे. महापालिकेचे सभागृहनेता पाटील यांनी प्रभागात स्वच्छता मोहीम हाती घेण्याबाबत आरोग्य विभागाला सूचना केल्या होत्या. यानंतर महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासह सर्वच विभागातील अधिकारी व कर्मचारी स्वच्छता मोहिमेत सहभागी झाले होते. प्रभाग ९ मधील स्वच्छता मोहीम पूर्ण होत नाही, तोच शिवसेनेचे गटनेते तथा नगरसेवक शिंदे यांनी प्रभाग ८ मध्ये स्वच्छता मोहीम सुरू केली. आता पुन्हा सातपूरच्या सभापती बोलकर यांनीदेखील प्रभाग १० मध्ये शनिवारी स्वच्छता मोहीम हाती घेतली. यामुळे स्वच्छता मोहीम केवळ पदावर असलेल्या नगरसेवकांसाठीच का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. महापालिका आयुक्तांनी सरसकट सर्वच प्रभागांत स्वच्छता मोहीम राबवावी असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे.
उकिरडे करणाऱ्यांना रोखा
उघड्यावर कचरा टाकणारे कोण, याचेही कारण शोधण्याची गरज आहे. उघड्यावर घाण, कचराच टाकला गेला नाही तर स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज पडणार नाही. महापालिका आयुक्तांनी उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांना दोषी ठरवत दंडात्मक तसेच वेळप्रसंगी फौजदारी कारवाई करण्याची आवश्यकता आहे. तरच कचरा टाकणाऱ्यांवर वचक बसेल.

उघड्यावर कचराच पडला नाही, तर स्वच्छता मोहीम हाती घेण्याची गरजच पडणार नाही. आरोग्य विभागाचे कर्मचारी नेमून दिलेले काम रोजच करत असतात. परंतु, उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची जबाबदारी कोणाची, हा खरा प्रश्न आहे.
- नितीन बोरसे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महेश’,‘कर्मचारी’साठी मतदान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मराठा हायस्कूल येथे रविवारी शांततेत मतदान झाले. या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी फेम थिएटरच्या मागे असलेल्या सहस्त्रार्जुन मंगल कार्यालयात होणार आहे. १४ हजार ६० सभासद असलेल्या या बँकेच्या निवडणुकीत सत्ताधारी समता पॅनल व विरोधी गटाच्या सहकार पॅनलमध्ये चुरशीची लढत झाली. मतदानाननंतर दोन्ही पॅनलने विजयाचा दावा केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील पोलिस व शिक्षक सोडून इतर सर्वच खात्यांतील वर्ग १ ते ४ या सर्वच स्तरातील कर्मचारी या बँकेचे सभासद असल्यामुळे या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले होते. गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही पॅनलच्या उमेदवारांनी सर्व सरकारी कार्यालयांत जोरदार प्रचार करुन रंगत वाढवली होती. या निवडणुकीत सत्ताधारी समता पॅनलचे विद्यमान संचालक सहकार पॅनलकडे गेल्यामुळे मतदारांचाही गोंधळ उडाला. सकाळी ८ वाजेपासून सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यासाठी २८ बूथ व १६० कर्मचारी तैनात होते. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अभिजीत देशपांडे व सहाय्यक अधिकारी म्हणून आर. आर. मोरे यांनी काम बघितले.

‘महेश’साठी ३७ टक्के मतदान
आडगाव ः दोन दशकांपासून सहकार क्षेत्रात परिचित असणाऱ्या महेश बँकेच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच मतदान झाले असून, ६४५८ मतदारांपैकी २४२७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. महेश्वरी बालाजी मंदिर ट्रस्ट येथे सोमवारी सकाळी ८ वाजता मतमोजणीस सुरुवात होणार आहे. दुपारी बारा वाजेपर्यंत संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.
या निवडणुकीत १५ जागांपैकी ४ जागा बिनविरोध झाल्या असून, उर्वरित १० जागांसाठी ११ उमेद्वार रिंगणात आहेत. एन. टी. प्रवर्गाची एक जागा रिक्त आहे. नाशिक, नाशिकरोड, सिन्नर आणि मालेगाव या ठिकाणी मतदार केंद्रांची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळच्या सुमारास मतदारांची गर्दी पहायला मिळाली. पण त्यानंतर मात्र वेग मंदावला. एकूण निवडणूक प्रक्रियेसाठी ७ केंद्रांवर ७० कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली होती. सर्व मतदान केंद्रांवर शांततेत मतदान पार पडल्याची माहिती निवडणूक निर्णय अजय गुजराथी यांनी दिली. सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून पी. आर. शिंदे यांनी कामकाज बघितले. सोमवारी सकाळी ८ वाजता श्री महेश्वरी बालाजी मंदिर ट्रस्ट, अभोणकर लेन, रविवार पेठ, येथे मतमोजणी होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक संघटनेचा मागण्यांसाठी मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

सरकारने फेब्रुवारीच्या शासन निर्णयात बदल करावा तसेच यावर्षी सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी करू नये यासह विविध मागण्यांसाठी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने रविवारी (दि. १८) जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.

प्राथमिक शिक्षक व विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यावेळी राज्य प्राथमिक शिक्षण संघटना समन्वय समितीने शासनाशी अनेकवेळा चर्चा केली. मात्र आश्वासनाशिवाय काही ठोस निर्णय झाला नाही. म्हणून सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. धुळे शहरातदेखील शिक्षक समितीने मोर्चा शहरातील कामगार कल्याण भवनापासून जुने जिल्हा रुग्णालयामार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला. यावेळी मोर्चेकरांनी जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले.

प्रामुख्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळेतील शंभर टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळावा, शाळांच्या विद्युत बिलाची तरतूद करून ऑनलाइन करण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात यावी, पटसंख्येची अट न ठेवता अंश निर्देशकांची पदे प्रत्येक शाळेत भरण्यात यावी, पती-पत्नी व एकल शिक्षकांना समान न्याय मिळावा, या मागण्यांचा समावेश निवेदनात करण्यात आला होता. मोर्चात समितीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाटील, किशोर भामरे, रवींद्र खैरनार, भगवंत बोरसे, गमन पाटील, शरद सूर्यवंशी, उमराव बोरसे, मनोहर सोनवणे, अनिल तोरवणे यांच्यासह समितीचे पदाधिकारी व प्राथमिक शिक्षक मोठ्या संख्येने मोर्चात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् प्रवाशाला मिळाले जीवनदान

$
0
0

रेल्वे पोलिस आणि सुरक्षा दलाची तत्परता

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यात योग्य समन्वय असला की रेल्वे प्रवाशाचे मौल्यवान प्राणही वाचतात याचा प्रत्यय नाशिकरोडला आला. हृदयविकाराचा झटका आलेल्या रेल्वे प्रवाशाचे प्राण या दोन्ही दलांच्या समन्वयामुळे वाचले. त्याला जीवनदान मिळाले. प्रवाशांनी या दोन्ही दलांवर अभिनंदनाचा वर्षाव केला.

संतोष काळूराम मंदोरे (३८, मखमलाबाद, नाशिक) हे जळगावहून नाशिकला गीतांजली एक्स्प्रेसने येत होते. त्यांच्यासमवेत पत्नी निता होती. प्रवासादरम्यान मंदोरे यांना अचानक अस्वस्थ वाटू लागले. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागला. सहप्रवाशांनी नाशिकरोड रेल्वे पोलिस आणि रेल्वे सुरक्षा दलाशी संपर्क साधला. नाशिकरोड पोलिस व रेल्वे सुरक्षा दलाने राज्य सरकारच्या १०८ क्रमांकाच्या दूरध्वनीवर संपर्क साधून रुग्णवाहिका आणि डॉक्टर तयार ठेवत मदत कार्याची व्यवस्था केली होती. सायंकाळी पाचला गीतांजली एक्सप्रेस नाशिकरोडला

येताच जवानांनी प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरून मंदोरे यांना खुर्चीवर बसवले. त्यांना रेल्वे रुळ ओलांडून कुली व कर्मचाऱ्यांच्या मदतीने प्लॅटफॉर्म क्रमांक एकवर आणले. तेथून रुग्णवाहिकेत बसवून तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले.

--------------------

रेल्वे प्रवाशांचे प्राण वाचवणे हे आमचे कर्तव्यच आहे. प्रवाशांना काही समस्या आल्यास त्यांनी दलाशी आवर्जून संपर्क साधावा. मदत करायला आम्ही तत्पर आहोत.

- नितीन पवार,

सहाय्यक निरीक्षक, लोहमार्ग पोलिस

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महामंडळांनाही कर्जमाफी द्या’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्यानंतर आता महामंडळेही कर्जमाफीच्या मागणीसाठी सरसावली आहेत. थकीत कर्ज माफ करण्यात यावे, अशी मागणी अखिल भारतीय मातंग संघाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

राज्यातील दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीयांसाठी सरकारने अण्णा भाऊ साठे महामंडळ, महात्मा फुले महामंडळ, चर्मकार उद्योग महामंडळ, शबरी महामंडळ, अण्णासाहेब पाटील महामंडळ, वसंतराव नाईक महामंडळ, मौलाना आझाद महामंडळ आदी महामंडळांच्या माध्यमातून गरजूंना कर्जवाटप करण्यात आले. कर्जाची वेळेवर परतफेड झाली नाही. त्यामुळे महामंडळ कर्जबाजारी झाले. महामंडळांना पुन्हा आर्थिक उभारी देण्यासाठी कर्जमाफी द्यावी, अशी मागणी अध्यक्ष गमाजी घोडे, सुभाष रणखांबे, विठ्ठल कांबळे आदींनी केली आहे.

मातंग समाजाला जातीचे दाखले स्थानिक पातळीवर द्यावेत, अण्णा भाऊ महामंडळाद्वारे बंद पडलेली एनएसएफडीसी कर्ज प्रकरणे सुरू करण्यात यावीत, लहूजी साळवे आयोगाच्या शिफारशींची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी, लहूजी साळवे व अण्णा भाऊ साठे जयंतीन‌िमित्त सरकारी सुटी जाहीर करावी, अण्णा भाऊ साठे विकास महामंडळाचे दोन हजार रुपये कोटी भागभांडवल वाढविण्यात यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत. निवेदनावर किशोर शिरसाठ, रवी डोंगरे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


करचुकवेगिरीला जीएसटीमुळे चाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपल्याकडे टॅक्स चुकवेगिरीचे प्रमाण अधिक असून, जीएसटीमुळे अशा चोरीला आणि काळ्या पैशालाही आळा बसेल, असा विश्वास चार्टर्ड अकाउंटंट जे. के. मित्तल यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केला.

जैन इंटरनॅशनल ट्रेड ऑर्गनायझेशन (जितो)तर्फे ‘जीएसटी’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात मित्तल बोलत होते. कालिदास कलामंदिरात झालेल्या या चर्चासत्रासाठी उद्योग, व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थ‌ित होते. एक जुलै २०१७ पासून प्रस्तावित असलेल्या जीएसटीबद्दलचे समज- गैरसमज दूर व्हावेत आणि जीएसटी करप्रणाली म्हणजे नेमके काय हे लक्षात यावे हा या चर्चासत्राच्या आयोजनाचा मुख्य उद्देश होता.

या वेळी मित्तल म्हणाले, ती वेगवेगळे कर भरण्यापेक्षा अनेक करांना जीएसटीच्या माध्यमातून एका सूत्रात बांधण्यात आले आहे. त्यामुळे करप्रणालीमध्ये सुसूत्रता आणि सुटसुटीतपणा येण्यास मदत होईल. आपलेच लोक अन्य देशांत गेले की तेथे आकारण्यात येणारा कर विनातक्रार भरतात. मात्र, आपल्याकडे कर भरायचा म्हटले, की विरोध सुरू होतो. ज्यांना कर चुकवायचा असतो तेच जीएसटीला विरोध करीत असावेत, अशी टीका या वेळी मित्तल यांन‌ी केली. टॅक्स रिटर्न्स भरण्यासाठी वेळ घेतला जात असल्याने त्यामध्ये अनियमिततेला वाव मिळत असे. जीएसटी ही नवीन प्रणाली रुळण्यास वेळ लागेल. या प‍्रणालीचे दीर्घकालीन फायदे असून, प्रामाणिक करदात्यांना चिंतेचे कारण नाही, असे ते म्हणाले. देशाच्या प्रगतीसाठी जीएसटीचे स्वागत करायला हवे, अशी अपेक्षा त्यांनी या वेळी व्यक्त केली.

प्रत्येक गोष्टीला चांगल्या व वाईट अशा दोन्ही बाजू असतात. जीएसटी प्रणालीमध्येदेखील काही त्रुटी असू शकतात. मात्र, अंमलबजावणीनंतरच या त्रुटी लक्षात येतील. जीएसटीमुळे करसंकलन मोठ्या प्रमाणावर होईल. त्यामुळे भविष्यात कराचे दर कमी होऊ शकतील, अशी शक्यता त्यांनी या वेळी व्यक्त केली. काळा पैसा रोखण्यास जीएसटीमुळे मदत होईल, असा विश्वासही या वेळी व्यक्त करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विजेच्या लपंडावाने हरसूल अंधारात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

हरसूल भागात विजेच्या लपंडावामुळे अनेक गावांना चार दिवस अंधारात राहावे लागले. अनेक गावातील विजेचे खांब गंजले असून, ते पडण्याच्या स्थितीत आहेत. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील महावितरण कंपनीकडून कोणत्याही उपाययोजना केल्या जात नसल्याने जिल्हा परिषद सदस्य रूपांजली माळेकर यांनी हरसूल येथे आयोजित बैठकीत महावितरणचे उपअभियंता नवासरे यांना धारेवर धरले. विजेच्या अपघातातून होणाऱ्या जीवितहानीबद्दल हत्येचे गुन्हे अधिकाऱ्यांवर दाखल करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

बैठकीप्रसंगी ग्रामस्थांनी हरसूल येथे वायरमन मद्याच्या नशेत काम करतात, अशी तक्रार केली. यावेळी आठ दिवसांत गंजलेल्या विजेच्या पोलांचे सर्वेक्षण करून पोल बदलण्याचे आदेश उपसभापती रवींद्र भोये यांनी दिले. हरसूल गटातील गावांना जोडणारे रस्ते दुरुस्त करण्याबरोबरच प्रत्येकाला शुध्द पाणी, आरोग्याच्या सुविधा, वीज आणि शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाच्या विविध योजना गावपातळीपर्यंत पोहोचण्यासाठी पंचायत समिती अधिकारी, कर्मचारी यांनी गावकऱ्यांना मदत करावी, अन्यथा तक्रार आल्यास कारवाई करणार असल्याचे माळेकरांनी सांगितले.

आरोग्य केंद्राचीही दैना

हरसूल आरोग्य उपकेंद्र तयार होऊन पाच वर्षे झाली. मात्र याठिकाणी कर्मचारीच नाही. तसेच, आरोग्य उपकेंद्रांची उडालेली दैना, आरोग्यसेवक, सेविका यांची सतत असलेली गैरहजरी, वैद्यकीय अधिकाऱ्यांचे असलेले दुर्लक्ष यामुळे आरोग्य व्यवस्थेची हेळसांड होत आहे. सारस्ते येथे मलेरियाने एका व्यक्तींची मृत्यू झाल्याने वैद्यकीय अधिकारी व आरोग्य सेवकांना याची माहिती नव्हती. नागरिकांच्या तक्रारीनंतर अरुण चव्हाण या आरोग्य सेवकाची चौकशी करून बदली करण्याचा ठराव बैठकीत करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गावविकासाला खीळ घालू नका

$
0
0

आमदार अनिल कदम यांचा इशारा

म. टा. वृत्तसेवा, निफाड

ग्रामपंचायत स्तरावर गावात विकासकामे मार्गी लावण्यासाठी ग्रामसेवक, कर्मचारी महत्त्वाचा घटक असतो. मात्र काहीवेळा कर्मचारीवर्ग गावाच्या विकासात खीळ घालण्याचे काम करतात. यापुढे असा प्रकार खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा निफाडचे आमदार अनिल कदम यांनी दिला आहे.

निफाड येथील पंचायत समिती सभागृहात जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांच्या अध्यक्षेतेखाली उगाव गटाची आढावा बैठक झाली. या बैठकीस आमदार अनिल कदम, गटविकास अधिकारी वैशाली रसाळ, पंचायत समिती सभापती पंडित आहेर, सदस्य सोमनाथ पानगव्हाणे, शिवा सुरासे आदींसह शिक्षण, आरोग्य, बांधकाम, कृषी, पाटबंधारे, पशुसंवर्धन आदींसह उगाव गटाच्या गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

या आढावा बैठकीत चौदाव्या वित अयोगाच्या निधीबाबत संभ्रम, बंद ट्रान्सफार्मर, थकीत वीज बिलामुळे कट झालेले कनेक्शन, सरपंच-ग्रामसेवकांतील समन्वयाचा अभाव यासह शासनाच्या पीकविम्याचा लाभ, शिवार रस्यांचे प्रश्न यावर सरपंचांनी व्यथा मांडल्या. यावेळी ग्रामसेवकांनी आपल्या गावांच्या विकासाचे प्रस्ताव तातडीने तयार करून द्यावेत, त्यामुळे या कामांचा पाठपुरावा करता येईल, असे जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी सांगितले. नैताळे, रानवड साखर कारखाना वसाहत, काथरगावचे वीजकनेक्शन तातडीने जोडावे, असे आदेश आमदार अनिल कदम यांनी वीज वितरण अभियंत्यांना दिले.

या बैठकीत अधिकाऱ्यांनी सरपंचांनी मांडलेल्या तक्रारींचे उत्तर दिले. बैठकीस खंडू बोडके, संदीप तासकर, उपनगराध्यक्ष जावेद शेख, नगरसेवक मुकुंद होळकर, रामभाऊ पडोळ, रावसाहेब गोळे, संपत डुंबरे, रवि शिंदे, सुधीर कराड, करीम शेख, कैलास क्षीरसागर, शिवाजी तळेकर, संजय बोरगुडे, रामनाथ सानप, प्रमोद क्षीरसागर, लाला कातकाडे, आशिष मोगल, संदीप जेऊघाले, गणपत क्षीरसागर, तुकाराम पिठे आदींसह विविध गावांचे सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

व्यापारी करणार मॉलसंस्कृतीशी स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आयटी युगात मॉलसंस्कृतीशी बरोबरी साधण्यासाठी व्यापाऱ्यांसाठी कॉम्प्युटर अकाउंटिंग, व्यक्तिमत्त्व विकास यांसारखे प्रशिक्षण वर्गांचे आयोजन दि नाशिक रिटेल क्लॉथ मर्चंट्स असोसिएशनद्वारे केले जाईल, अशी घोषणा संघटनेचे अध्यक्ष दिग्विजय कापडिया यांनी नुकतेच केले.

संघटनेतर्फे व्यापारी बांधवांसाठी प्रथमच संगीतसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. कालिदास कलामंदिरात हा कार्यक्रम झाला. त्या वेळी कापडिया बोलत होते. ते म्हणाले, मॉलसंस्कृतीला तोंड देण्यासाठी व्यापाऱ्यांनाही काळानुरूप बदलावे लागेल. म्हणूनच संघटनेच्या सभासदांना प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून, मुंबई, पुणे येथील तज्ज्ञ प्रशिक्षकांची त्यासाठी मदत घेण्यात येणार आहे. दुकानांमधील कर्मचाऱ्यांसाठी विक्रीव्यवस्थापन, आदर्श वागणूक आदींबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे. कर्मचाऱ्यांच्या पाल्यांना शैक्षणिक शिष्यवृत्ती, गणवेश, पुस्तके, पुरविण्याचा मानस या वेळी व्यक्त करण्यात आला. या वेळी सारेगम फेम राहुल सक्सेना आणि अमोल पाळेकर यांच्या सुरेल गीतमैफलीचा आनंद उपस्थ‌ितांनी घेतला. नरेश पारख, नितीन वसानी, संपत काबरा, प्रसाद चौधरी, सतीश शहा आदींनी सहकार्य केले. चेतना सांखला यांन‌ी सूत्रसंचालन केले. सोमेश्वर काबरा यांन‌ी आभार मानले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निराशा अन् संताप!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारत- पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी तब्बल दहा वर्षांनंतर आयसीसी चॅम्पियन स्पर्धेच्या फायनलमध्ये...त्यात सुटीचा दिवस असल्याने मॅचची अधिकच उत्सुकता... दोन दिवस आधीपासूनच भारताच्या बाजूने सोशल मीडियावर पसरत असलेले जोक्स.. या सर्व पार्श्वभूमीवर टीव्हीसमोर ठाण मांडून बसलेल्या क्रिकेट रसिकांना आज ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ अनुभवायला मिळणार अशी खात्रीच होती. पाकिस्तानने तब्बल ३३८ धावांचा डोंगर उभा केल्याने मॅच अटीतटीचीच होणार असे कयास बांधले जात असतानाच, भारतीय फलंदाजांनी सपशेल हाराकिरी केली आणि क्रिकेटरसिकांच्या आनंदावर विरजण पडले. पहिल्या तेरा षटकांतच अर्धा संघ तंबूत परतल्याने आधी उत्साह, उत्सुकता आणि आनंदाची जागा निराशा आणि नंतर संतापाने घेतली.

आयसीसी चॅम्पियन स्पर्धेचा अंतिम सामना पारंपरिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघात रविवारी झाला. हा ‘हाय व्होल्टेज ड्रामा’ अनुभवण्यासाठी संपूर्ण शहरात अघोषित संचारबंदीचे वातावरण होते. भारत पाकिस्तान मॅचची चर्चा आदल्या दिवसापासूनच होती. रविवारी मॅच आल्याने क्रिकेटवेड्यांचा आनंद द्विगुणित झाला होता. शहरातील क्रिकेटप्रेमींनी मॅचचा आस्वाद घेण्यासाठी आधीपासून तयारी केली होती. अनेकांनी मॅच सुरू होताच टीव्हीपुढे ठाण मांडले. काही मित्र मंडळांनी खास मोठा पडदा लावून परिसरातील सर्वांना मॅचचा आनंद घेता येईल, अशी व्यवस्था केली होती. भारत जिंकणारच, यावर पैजा लागल्या जात होत्या. फक्त, किती धावांनी पाकिस्तानला गारद केले जाते, याबाबतीत चर्चा होत होती. मात्र, पाकिस्तानची सुरुवात चांगली झाली. सलामीला आलेल्या अझर अली आणि फकर झमानने पहिल्या विकेटसाठी १२८ धावांची भागिदारी रचली. बाबर आझम, मोहम्मद हाफीज आणि इमादने जलद खेळी करत पाक संघाला ३३८ इतकी मोठी धावसंख्या उभारून दिली. भारतासाठी हे आव्हान मोठे आहे, याची कल्पना क्रिकेटरसिकांना होतीच. मात्र, भारताचे रोहित शर्मा, शिखर धवन, विराट कोहली, युवराज सिंग, धोनी हे भरवशाचे खेळाडू एकामागोमाग एक पहिल्या तेरा षटकांतच तंबूत परतले. त्यामुळे आधी उत्सुकता, उत्साहाची जागा नंतर ‌निराशा आणि संतापाने घेतली. अनेकांनी १५ षटकांनंतर चॅनल बदलून टाकले तर काहींनी टीव्ही बंद करून घराबाहेर पडणे पसंत केले.

दुपारपासून सामसूम

दुपारपासून शहरात सामसूम होती. रस्त्यावर नागरिक व वाहनेही अत्यंत तुरळक प्रमाणात दिसत होती. अनेक व्यावसायिकांची दुकाने उघडी होती. परंतु, तेदेखील मॅचचा आनंद घेण्यात मश्गुल होते. मात्र, सायंकाळी चित्र बदलल्यानंतर बाजारात वर्दळ वाढली.

फटाक्यांचे करायचे काय?

भारत-पाकिस्तान मॅच म्हटली की फटाक्यांची आतषबाजी आलीच. भारत जिंकणारच, या खात्रीमुळे तरुणवर्गाने विजयाचा जल्लोष करण्यासाठी फटाके आणून ठेवले होते. मॅच संपल्यानंतर या फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार होती. पण, भारतीय संघाची वाईट अवस्था झाल्याने आणलेल्या फटाक्यांचे करायचे काय, असा प्रश्न तरुणांना पडला. काहींनी मॅच सुरू असतानाच फटाके वाजवून टाकले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images