Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

द्राक्ष उत्पादकांच्या पाठीशी

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड, पिंपळगाव बसवंत

सरकारने कालपरवा जाहीर केलेली कर्जमाफी ही शिवसेनेच्या रेट्यामुळे झाली आहे. शेतकऱ्यांनी आणि शिवसेनेने सरकारला ही कर्जमाफीला द्यायला भाग पाडले. परंतु कर्जमाफीमुळे नाशिक जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादकांच्या पदरात फार काही पडले नाही, याची शिवसेनेला जाणीव आहे. यासाठी शिवसेना पुन्हा लढणार आहे. सरळ मार्गाने मागण्या मान्य न झाल्यास काय करायचे, हे मला माहीत असल्याचा इशारा पिंपळगाव बसवंत येथील संवाद यात्रेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.

शिवसेनेच्यावतीने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह शेतकरी संवादला रविवारी निफाड तालुक्यातून सुरुवात झाली. ठाकरे यांनी कर्जमाफीचे निकष, संपकाळात शेतकऱ्यांवरील गुन्हे, नोटबंदी यावर ठाकरे शैलीत टीका केली. ठाकरे यांच्या सोबत परिवहन मंत्री दिवाकर रावते, पर्यावरण मंत्री रामदास कदम, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, खासदार विनायक राऊत, संपर्कप्रमुख सुहास सावंत, निफाडचे आमदार अनिल कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, जिल्हाप्रमुख भाऊलाल तांबडे सहभागी झाले होते.

पिंपळगाव बसवंत येथे उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. ते म्हणाले, कर्जमाफीचा सर्वात जास्त फायदा विदर्भ, मराठवाडा या भागाला होणार आहे. त्यामुळे ठरवले असते तर अगोदर तिकडे जाऊन हारतुरे स्वीकारले असते. परंतु मी मुद्दाम या भागातून संवादयात्रेला सुरुवात करतोय. कारण सरकारने काही नियम टाकल्याने नाशिक आणि नगर भागातील शेतकऱ्यांना याचा लाभ मिळणार नाही याची अशी माहिती आहे. परंतु मी तुम्हाला आश्वस्त करतो, कर्जमाफीचा लाभ मिळवून दिल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही.


निफाड येथे नियोजनात बदल करून बाजार समिती गेटवरच उद्धव ठाकरें बोलतील असे ठरले. पद्धतीने गेटवर जमा झालेले शेतकरी व शिवसैनिक यांच्याशी उद्धव ठाकरे बोलत असताना अनेकानी त्यांना सभागृहातच चला, असा आग्रह धरल्याने अखेर उद्धव ठाकरे बाजार समितीच्या सभागृहात आल्यानंतर त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांशी संवाद साधला. ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही त्यांनी धीर धरा, मी तुमच्या पाठीशी आहे, असे आवाहन केले.

शेतकऱ्यांनी मांडली कैफियत

नैताळे गावाच्या वेशीजवळ ठाकरे यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी रतन बोरगुडे या शेतकऱ्याने आंदोलन काळात पोलिसांनी घरात घुसून केलेली अमानुष मारहाण, शेतकऱ्यांवर दाखल केलेले दरोड्याचे गुन्हे याबाबत कैफियत मांडली. आमदार अनिल कदम यांनी कर्जमाफीची तारीख ३० जून २०१६ ऐवजी २०१७ करावी, अशी मागणी केली. यावेळी भास्करराव बनकर, पंडितराव आहेर, शिवा सुराशे, सोमनाथ पानगव्हाणे उपस्थित होते

मुख्यमंत्र्यांना कळेल का?

निफाड येथे शेतकऱ्यांच्या मागण्या असलेल्या निवेदनाची फाइल जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब क्षीरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना दिली. तेव्हा या मागण्या मला समजतील. पण मुख्यमंत्र्यांना समजतील का? असा टोला उद्धव ठाकरे यांनी मारला आणि सभागृहात एकच हशा उसळला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ज्ञान अन् कौशल्य हीच खरी शिदोरी’

0
0

व्यवस्थापनासारख्या महत्त्वाच्या विद्याशाखेत केवळ अकॅडमिक्स उपयुक्त नाही. त्या सोबतीलाच विद्यमान जागतिक प्रवाहांचा अभ्यासही अद्ययावत ठेवण्याची गरज आहे. हा समतोल साधला गेल्यास व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या चांगल्या संधी आहेत, असा विश्वास महात्मा गांधी विद्यामंदिरच्या एमबीए इन्स्टिट्यूटचे प्राचार्य डॉ. अशोक अग्रवाल यांनी ‘मटा’ शी बोलताना व्यक्त केला.

आपल्या इन्स्टिट्यूटचे वेगळेपण काय सांगाल?

विद्यापीठ अनुदान आयोगा (युजीसी) च्या वतीने संशोधन केंद्र म्हणूनही या संस्थेला मान्यता दिली आहे. सन १९९४ पासून ही इन्स्टिट्यूट कार्यरत असल्याने या क्षेत्रातील मोठा अनुभव येथील स्टाफच्या गाठीशी आहे. फायनान्स, मार्केटिंग या विषयांच्या सोबतीलाच इंटरनॅशनल बिझनेस मॅनेजमेंट, अॅग्री बिझनेस मॅनेजमेंटसारखे बाजारपेठेच्या दिशेने चालणारे अभ्यासक्रमही येथे राबविले जातात.

गेल्या काही कालावधीतील संस्थेची मोठी अचिव्हमेंट?

सातत्याने लागणारा उत्कृष्ट निकाल आणि विद्यार्थ्यांच्या होणाऱ्या प्लेसमेंट ही मोठी अचिव्हहमेंट आम्ही समजतो. पण त्या ही पलिकडे जाऊन यंदाच्या शैक्षणिक वर्षापर्यंत या संस्थेच्या १५ विद्यार्थ्यांनी पीएच.डी.चे शिक्षण पूर्ण केले आहे.

अकॅडमिक्स आणि प्रत्यक्षात बाजारपेठेची मागणी यात समतोल कसा साधतात?

वर्गात शिक्षण देताना विद्यापीठ किंवा युजीसीच्या तत्त्वांनुसारच जावे लागते. मात्र बाजारपेठेची दिशा अभ्यासता विद्यार्थी या स्पर्धेत मागे पडू नयेत, यासाठी काही अल्पावधीचेही अभ्यासक्रम तयार केले आहेत. बाजारपेठेची मागणी असेल त्या प्रमाणे हे अभ्यासक्रम ‌डिझाइन केले जातात. त्या अभ्यासक्रमांची जोड मिळाल्यानंतर विद्यार्थ्यांना करिअरची आणखी दालने खुली होतात.

आगामी शैक्षणिक वर्षात कोणते नवीन उपक्रम नियोजित आहेत?

बाजारपेठेमध्ये मनुष्यबळाच्या गरजा जागतिक प्रवाहानुसार बदलतात. यादृष्टीने आगामी काही वर्षांचा अंदाज घेऊन भविष्यात मागणी असणारे प्रशिक्षणाचे उपक्रम स्थानिक स्तरावर उपलब्ध करून देण्याचा मानस आहे. त्यासाठी राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील चांगल्या विद्यापीठांशी उपक्रमांबाबत करार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

इन्फ्रास्ट्रक्चर संदर्भात काय सांगाल?

पदव्युत्तर शिक्षणासाठी आवश्यक ती सर्व संसाधने आणि नियंत्रण करणाऱ्या संस्थांना अपेक्षित गुणवत्ता असणारा स्टाफ उपलब्ध आहेत. यात इ‌‌न्स्टिट्यूटमध्ये १५ हजारांवर पुस्तके, २०० कॉम्प्युटर्स, होस्टेल फॅसिलीटी, सहा मजली इमारत, संलग्न असणारे २५ रिसर्च गाईड आदी गरजेच्या सर्व सुविधा देण्यात आल्या आहेत.

व्यवस्थापन शाखेच्या विद्यार्थ्यांसमोरील आव्हाने काय?

व्यवस्थापनाचा विषय व्यापक आहे. अनेकदा विद्यार्थ्यांना आपल्या निवासी शहरात कामामध्ये स्थिर झाल्यानंतर जगाच्या अद्ययावत प्रवाहांचे ज्ञान राहत नाही. व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना हे परवडणारे नाही. जागतिक प्रवाह सातत्याने बदलताहेत. या बदलत्या प्रवाहांमध्ये आपण ज्ञान आणि कौशल्यांच्या दृष्टीने अद्ययावत राहण्याचे मोठे आव्हान आहे.

विद्यार्थ्यांना काय संदेश द्याल?

बाजारपेठतील नवनवे प्रवाह अभ्यासत ते आत्मसात करण्याची सवय अंगी बाणवली पाहिजे. ज्ञान आणि कौशल्यांना सातत्याने अद्ययावत करायला आपण शिकलो पाहिजे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज पूर्ण होणार ‘रॅम’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जगातील सर्वात अवघड सायकल रेसपैकी एक ‘रेस अॅक्रॉस ऑफ अमेरिका’ (रॅम) या आंतरराष्ट्रीय सायकल स्पर्धेत डॉ. राजेंद्र नेहेते व डॉ. रमाकांत पाटील हे नाशिककर पुन्हा एकदा आज इतिहास रचणार असून, मानाची समजली जाणारी रेस पूर्ण करणार आहेत.
ही स्पर्धा १७ ते २६ जूनदरम्यान आयोजित करण्यात आली होती. रात्री उशिरा मिळालेल्या माहितीनुसार ३ हजार १४५ मैलांपैकी ३५० मैल अंतर पार करणे बाकी होते. डॉ. महेंद्र महाजन व हितेंद्र महाजन या बंधूंनंतर डॉ. राजेंद्र नेहते व डॉ. रमाकांत पाटील हे दुसरे भारतीय ठरणार आहेत. त्यांनी तयार केलेल्या सह्याद्री टीममध्ये इंग्लंड येथील डॉ. संदीप शेवाळे व मुंबईचे पंकज मारलेशा हेही आहेत. या चौघा सायकलपटूंना ४८०० किमी एवढे अंतर सुमारे २१६ तासांत पूर्ण करावे लागणार होते. या प्रवासात सायकलपटूंना १२ राज्यांचा प्रवास करताना १ लाख ७० हजार फूट चढाई करावी लागली.
रिले पद्धतीने होणारी ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी सायकलपटूंना दररोज ५५० किमी अंतर कापावे लागले. वातावरणातील विषमतेसोबतच रहदारीच्या नियमांचेही काटेकोरपणे पालन करावे लागले.
एकदा नियम तोडला तर १५ ते ६० मिनिटांचा वेळ कापला जातो आणि सहापेक्षा जास्त वेळा नियमांचे उल्लंघन झाल्यास स्पर्धेतून बाहेर होण्याचा धोका असतो.
या स्पर्धेत स्पर्धकांइतकीच सपोर्ट टीमची भूमिकाही महत्वाची असते. २०१५ मध्ये पेनल्टीचा एकही गुण जाऊ न देण्याचा विक्रम करणाऱ्या सपोर्ट टीमचे प्रमुख डॉ. सुनील वर्तक यंदाच्या टीम बरोबरही सहभागी झाले होते.
बदलते वातावरण हा या स्पर्धेतील अत्यंत आव्हानात्मक घटक असून, त्याकरिता खाण्यापिण्याच्या गरजांसह आहारात आवश्यक ते बदल केले होते. गत वर्षीचे रॅम विजेते डॉ. हितेंद्र व डॉ. महेंद्र महाजन हे या टीमचे घटक असल्याने त्यांच्या अनुभवाचा फायदाही त्यांना मिळाला.
स्पर्धेत सहभागी झालेला सह्याद्री संघ
चालक - डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. रमाकांत पाटील (नाशिक), डॉ. संदीप शेवाळे (इंग्लंड), पंकज मारलेशा (मुंबई)

टीममधील सदस्य
डॉ. सुनील वर्तक, डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. चंद्रकांत संकलेचा, डॉ. महेंद्र महाजन, डॉ. बापू घोडके, डॉ. आशुतोष ठोळे, मोहिंदर सिंग (सर्व नाशिक), डॉ. परिक्षित गोगटे (पुणे), राहुल गुप्ते, अमोल पटवर्धन, पुष्कराज फाटक (तिघे अमेरिका), मधु जोशी, सचिन जपे (इंग्लंड), दीप उदेशी, नीलेश सातभाई (मुंबई), गजानन सहस्रबुद्धे (कॅनडा).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘बिर्याणी’चा अस्वस्थ प्रवास

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संचलित ललित कला केंद्राच्या आजी-माजी विद्यार्थ्यांनी स्थापन केलेल्या ‘काफिला’ मार्फत नाशिकच्या नाट्यरसिकांसाठी रविवारी (दि.२५) परशुराम साइखेडकर नाट्यगृहात बिर्याणी व टायपिस्ट हे दोन दीर्घांक सादर करण्यात आले.

शिल्पा कांबळे लिखीत बिर्याणी ही कथा गोहत्या बंदी या विषयाला स्पर्शून जाते. राजकीय नाटक असले तरीही राजकीय संभाषण न करता सकिना व कुरमुरी या दोन गरीब बायकांची गोष्ट नाटकातून सांगितली आहे. सकिनाच्या नातवाचा सहा डिसेंबरला वाढदिवस असतो. त्यावेळी ती बिर्याणी करते. त्याच दिवशी तिच्या घरी रहात असलेली कुरमुरी आणि तिची गाय गायब होतात. पोलिस त्याचवेळी गोहत्येच्या आरोपावरून सकिनाला जेलमध्ये टाकतात. परंतु, सत्य मात्र वेगळे असते. कुरमुरीच सकिनाला जेलमधून परत आणते. या सगळ्यात दोघींचा फायदा घेण्यासाठी वजीरचा हात असतो.

टायपिस्ट नाटक हे मध्यमवर्गीय मानसिकतेमुळे एखाद्याला इच्छा असूनही केवळ कुठलीही मोठी उडी घेण्याचे धाडस न झाल्याने होणारी परवड आणि त्या अनुषंगाने येणारी अस्वस्थता याविषयी भाष्य करते. या नाटकात एकीकडे बदलत्या काळाने समोर मांडून ठेवलेल्या सुखाच्या अगणित शक्यता आणि दुसरीकडे पायाखालची स्थिर जमीन सुटू न देण्याचे मध्यमवर्गीय संस्कार व नैतिक दबाव यात होरपळून निघत सतत एका अस्वस्थ अनुभवात जगणाऱ्या सामान्य माणसाचा प्रवास उलगडत जातो.

बिर्याणी या दीर्घांकाची निर्मिती शिल्पा कांबळे यांच्या मूळ कथेवर करण्यात आलेली असून, सर्वेश गिरे यांनी लेखन व दिग्दर्शन केलेले आहे. यात पूजा गोरे, अश्विनी पांडे, वैभव राजेंद्र, सर्वेश गिरे, वैभव देव, अपूर्वा कदम, रोहित कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. संगीत संयोजन प्रतीक जाधव याचे आहे. टापपिस्ट या मूळ नाटकाचे लेखक मुरे शिसगल असून, मराठी नाट्यरुपांतर सतीश आळेकर यांनी केलेले आहे. दिग्दर्शनाची धुरा अमोल पाटील यांनी सांभाळली असून प्रथमेश पुराणिक, सोनम म्हसवेकर हे या नाटकात भूमिका साकारल्या आहेत. या दोन्ही नाट्यप्रयोगांसाठी प्रकाश योजना संकेत सीमा विश्वासराव यांची आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अल्पवयीन मुलीचा विनयभंग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अल्पवयीन मुलीची छेड काढल्याप्रकरणी एका युवकावर विनयभंग तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. ही घटना विनयनगर परिसरात घडली असून, पोलिसांनी संशयितास अटक केली आहे.

रोशन बिरेंद्र बिके (वय १९, रा. अमेय कुंज सोसायटी, विनयनगर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या पित्याने पोलिसांकडे तक्रार दिली आहे. या तक्रारीनुसार १६ मे रोजी त्यांची मुलगी ही विनयनगरच्या भाजी मार्केटमध्ये गेली होती. त्यावेळी संशयित बिके याने तिच्याशी बोलण्याचा बहाणा करून हात पकडला आणि अश्‍लिल हावभाव केले. लॉजवर येण्याची बळजबरी करीत त्याने पीडित मुलीला मारून टाकण्याची धमकी दिली. पीडित मुलीने हा प्रकार घरी सांगितल्याने लागलीच तिच्या पालकांनी मुंबई नाका पोलिस स्टेशन गाठले. या प्रकरणी पोलिसांनी संशयिताविरोधात विनयभंग तसेच पोस्कोअंतर्गत गुन्हा केला असून, त्यास अटक केली आहे.

मित्राच्याच घरात डल्ला

चौघा मित्रांनी मिळून एका मित्राच्याच घरात ३४ हजारांचा मुद्देमाल चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे. ही घटना पांडवलेणी परिसरात उघडकीस आली असून, या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित रसिका अमोलिक, नीलेश पवार, रंजना रणधीर गायकवाड, रणधीर गायकवाड (सर्व रा. एकता व्हिल, पांडवलेणीजवळ, पाथर्डी शिवार) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी पराग अज्जुर अमोलिक (रा. जनशांती बंगला, कॅनडा कॉर्नर) यांनी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सर्व संशियतांनी २७ मे ते २३ जून या दरम्यान पराग अमोलिक घरात नसताना त्यांच्या घरातील चांदीचे ताट-दोन ग्लास व रोख रक्कम असा ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये चौघांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयनगरला घरफोडी

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी ५० हजारांचे दागिने चोरी केले. ही घटना विजयनगरमधील बजरंग चौकात घडल्याचे शनिवारी (दि.२४) उघडकीस आले. या प्रकरणी रमेश नानाभाऊ सूर्यवंशी (रा. विजयनगर, नवीन नाशिक) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २१ ते २४ जून दरम्यान सूर्यवंशी हे कामानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यांच्या घराला कुलूप होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला. तसेच, लॉकरमधील ३२ ग्रॅमची सोन्याची चैन, २० ग्रॅमची सोन्याची पोत असा ५० हजार ५०० रुपये किमतीचा सोन्याचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल असून, पोलिस अधिक तपास करीत आहे.

घरात घुसून २९ हजारांची लूट

अपार्टमेंटच्या फ्लॅटमध्ये घुसून महिलेला शिवीगाळ करत तिघांनी कपाटातील २९ हजारांची रक्कम बळजबरीने लुटून नेली. ही घटना शुक्रवारी (ता.२३) दुपारी गंगापूर रोड परिसरात घडली. करूण विठ्ठल ठक्कर (रा. श्रीरंग मंगल अपार्टमेंट, गंगापूर रोड) यांनी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी दुपारी सव्वातीन वाजेच्या सुमारास ठक्कर यांच्या फ्लॅटमध्ये त्यांची आई एकटी होती. त्यावेळी संशयित सोनाली हिरवे यांच्यासह तिचा भाऊ व एक साथीदार असे तिघे घरात घुसले. त्यांनी ठक्कर यांच्या आईला शिवीगाळ करून दमदाटी केली. तसेच घरातील कपाटात ठेवलेली २९ हजार ३०० रुपयांची रक्कम घेऊन गेले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेनवॉटर हार्वेस्टिंगसाठी सरसावला पर्यावरणप्रेमी

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील एका पर्यावरणप्रेमी नागरिकाने घराच्या आवारातच रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग यशस्वीपणे राबविला आहे. परिणामी पावसाच्या पाण्याचा पुनर्वापर करणे शक्य झाले असून, पाण्याची बचत करणेदेखील साध्य झाले आहे.

जेलरोड परिसरातील चंपानगरी येथे गेल्या काही वर्षांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना जपून पाणी वापरण्याची सवय लागली आहे. येथील रो-हाउसमध्ये राहणारे सुरेश भालेराव यांनी आपल्या गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी यंदा वाया न जाऊ देण्याचा निर्धार करून घरीच रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. नेटवरून, तसेच तज्ज्ञांकडून याबाबत माहिती मिळविली. त्यांची पाण्याची टाकी घराच्या मुख्य दरवाजाच्या बाजूला आहे. त्यातील नळाला महापालिकेचे पाणी येते. भालेराव यांनी गच्चीपासून टाकीपर्यंत पीव्हीसी पाइप टाकला. त्याला आणखी छोटा पाइप जोडून तो पाण्याच्या टाकीत सोडलेला आहे.

--

प्रयोगाचा झाला फायदा

गेल्या आठवड्यात नाशिकरोडला जोरदार पाऊस झाला. त्याचवेळी महापालिकेने चेहेडी येथील पाइपच्या व्हॉल्व्ह दुरुस्तीचे काम हाती घेतले. त्यामुळे दोन दिवस नाशिकरोडला पाणीपुरवठा झाला नाही. मात्र, भालेराव यांच्या प्रयोगामुळे गच्चीवरील पावसाचे पाणी त्यांच्या टाकीत साचले होते. त्याचा वापर त्यांना घरगुती कामांसाठी करता आला. पहिल्याच प्रयत्नात प्रयोगाला यश आल्याने त्यांनी इतरांनाही त्यासंदर्भात माहिती दिली. भालेराव हे ‘मटा’चे नियमित वाचक असून, काही दिवसांपूर्वी ‘मटा’मध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंगविषयी वाचले होते. त्यापासून प्रेरणा घेत हा प्रयोग राबविल्याचे त्यांनी सांगितले.

--

शासकीय कार्यालयांचे दुर्लक्ष

नाशिकरोड व जेलरोड परिसरात काही बिल्डर्सने नवीन इमारती बांधताना रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग केला आहे. जेलरोडला खासगी मिळकतधारकांनीही असे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. परंतु, शहरातील अनेक शासकीय कार्यालयांनी सरकारचे निर्देश असतानाही रेनवॉटर हार्वेस्टिंग केलेले नाही. महापालिका नवीन बांधकामांना परवानगी देताना रेनवॉटर हार्वेस्टिंग सक्तीचे करते. परंतु, कोणीच गांभीर्याने अंमलबजावणी करीत नाही. शहरात अनेक खासगी मिळकतधारक व गृहनिर्माण सोसायट्या आहेत. त्यांनी गच्चीवर पडणारे पावसाचे पाणी इमारतीशेजारी सुरक्षित खड्डा करून जिरविल्यास भूजलपातळीत नक्कीच वाढ होईल. तीव्र पाणीटंचाई असलेल्या भागातही हा प्रयोग यशस्वी होऊ शकेल, असे मत भालेराव यांनी व्यक्त केले.

--

सुरेश भालेराव यांचा रेनवॉटर हार्वेस्टिंगचा प्रयोग अनुकरणीय आहे. पावसाचे वेळापत्रक अनिमयित आहे, हे लक्षात घेऊन पावसाचे पाणी वाया जाऊ न देता रेनवॉटर हार्वेस्टिंगसारखे प्रयोग राबवावेत.

-तुळशीदास इंगळे, पर्यावरणप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देहविक्री व्यवसायावर छापा

0
0

बिटको चौकात कारवाई; आठ जण ताब्यात

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोडच्या बिटको चौकातील एका गेस्ट हाऊसमध्ये देहविक्री व्यवसाय चालत असल्याचे पोलिस कारवाईतून उघड झाले आहे. देहविक्री व्यवसाय चालविणाऱ्या पाच महिला व तीन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याशिवाय या गेस्ट हाऊसमध्ये काही मोबाइल फोनही पोलिसांच्या हाती लागले आहेत.

बिटको चौकातील प्रकाश जंगम यांच्या मालकीच्या सदगुरू गेस्ट हाऊसमध्ये देहाविक्रीचा व्यवसाय चालत असल्याची माहिती पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सदगुरु गेस्ट हाऊसवर रविवारी संध्याकाळी छापा टाकला असता देहविक्री व्यवसाय चालविणाऱ्या एका महिलेसह इतर चार महिला व तीन पुरुषांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या छाप्यात ताब्यात घेतलेल्या तीन पुरुषांत या गेस्ट हाऊसच्या मॅनेजरसह सैन्यदलातील एका जवानाचाही समावेश आहे. या करवाई प्रकरणी रात्री उशिरापर्यंत नाशिकरोड पोलिस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम १९५६ च्या कलमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर, नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहाय्यक पोलिस निरीक्षक मंगेश मजगर, पोलिस उपनिरीक्षक संध्या तेली यांच्या पथकाने ही कारवाई केली.

लष्करी जवानांची पोलिस ठाण्यात धाव

सदगुरु गेस्ट हाऊसवरील पोलिस कारवाई दरम्यान तेथे आढळून आलेल्या लष्करी जवानांपैकी तीन लष्करी जवान फरार होण्यात यशस्वी झाल्याची माहिती सहाय्यक पोलिस आयुक्त मोहन ठाकूर यांनी दिली. एक लष्करी जवान पोलिसांच्या जाळ्यात अडकला. या कारवाईची माहिती समजताच नाशिकरोड पोलिस ठाण्यात रात्री काही लष्करी जवानांनी धाव घेत पोलिस अधिकाऱ्यांकडे चौकशी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावात वीजपुरवठा खंड‌ित

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील कॅम्प रस्त्यालगत असलेल्या पार्वती प्लाझाजवळील जीर्ण झाड शनिवारी पहाटे दोन वाजेच्या सुमारास अचानक कोसळले. विजेच्या तारांवरच हे झाड कोसळल्याने तीन खांबही पडले. त्यामुळे शहरातील कॅम्प रॉड, संगमेश्वर, सटाणा नाका परिसरात सोळा तासांहून अधिक वेळ वीजपुरवठा खंडित झाला होता. दरम्यान विद्युत तारा व खांब दुरुस्तीकार्य शनिवारी सायंकाळपर्यंत सुरू असल्याने रात्री वीजपुरवठा सुरळीत झाला.

शुक्रवारी रात्री वनविभागाच्या कार्यालयासमोरील असलेले हे जीर्ण झाड विजेच्या तारांवर कोसळल्याने नवदुर्गा अ‍ॅग्रो एजन्सीजवळील तीन विजेचे खांब वाकले. रात्रीचा वेळ असल्याचे सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नाही. झाड कोसळल्याने मात्र या परिसरात रात्रभर वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिक हैराण झाले होते .

याबाबत माहिती देण्यासाठी नागरिकांनी महावितरण कार्यालयात फोन केले. मात्र कुणीही फोन उचलला नाही. अखेर सकाळी खांब उभे करण्याबरोबर त्यावर वीजतारा ओढण्याच्या कामाला महावितरणकडून सुरुवात झाली. पावसाळा सुरू होण्याआधीच ही कामे करणे गरजेचे नव्हते का, असा प्रश्न आता परिसरातील नागरिकांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


प्रेमगिरी डोंगरावर बहरणार वृक्षवल्ली

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सर्वत्र जलसंधारण, पर्यावरण संरक्षण, जलसंवर्धन वृक्ष लागवड असे अनेक उपक्रम शासन स्तरावर सुरू आहेत. मात्र स्वयंप्रेरणेने पर्यावरणासाठी लोकसहभाग देखील वाढला आहे. कळवणमधील युवकांनीही यात पुढाकार घेतला आहे. येथील चाळीस ते पन्नास तरुणांनी एकत्र येत ‘टीम ग्रीन रिव्हॅल्यूशन’ या ग्रुपच्या माध्यमातून रविवारी तालुक्यातील पाटविहीर या आदिवासी गावाजवळील लांबा (प्रेमगिरी) डोंगरावर एक हजारपेक्षा जास्त वृक्ष लागवड केली.

पाटविहिर या आदिवासी गावाजवळ असलेल्या वनविभागाच्या लांबा डोंगरवर कळवण शहरातील व्यावसायीक, वैद्यकीय क्षेत्रातील काही तरुणांनी एकत्र येत वृक्ष लागवड व संवर्धन करण्याचा संकल्प केला होता. जवळपास ४० ते ५० तरुणांचा ग्रुप असलेली टीम ग्रीन रिव्हॅल्यूशनने गेल्या तीन महिन्यांपासून दर शनिवारी व रविवारी सकाळी ६ ते ९ वाजेपर्यंत स्वयंस्फूतीने श्रमदान करून वृक्षारोपणसाठी लांबा डोंगरावर अंदाजे दीड ते दोन एकरवर एक हजार खड्डे खोदले. या डोंगरावर जाण्यासाठी जेसीबीच्या साह्याने रस्ता देखील केला. तसेच ५००० लीटर क्षमतेची पाण्याची टाकी ठेवली. त्यामुळे वर्षभर झाडांना पाणी देता येईल. यासाठी डॉ. एस. बी. सोनवणे, विलास शिरोरे, प्रकाश कालावडिया, डॉ. भावसार, जिभाऊ निकम, राजू गोरखा, संजय महाले, डॉ. रवींद्र भामरे, गणेश ततार, प्रशांत नेरकर, अविनाश पगार, निंबा पगार आदींसह ग्रीन रिव्हॅल्यूशन टीमचे सदस्य उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोंबकळत्या वीजतारांचा जिवाला घोर

0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

येथील शेतकऱ्यांच्या शेतातून जाणारी थ्री फेज व‌िद्युत तार खाली लोंबकळत असल्यामुळे अनेकांच्या जिवाला धोका निमार्ण झाला आहे. याबाबत तोंडी आणि लेखी मागणी करून सहा महिने उलटले तरीही वीज वितरण कंपनीने याकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. एखाद्याचा बळी गेल्यावर तारा ओढणार का? असा सवाल आता शेतकरी कंपनीला विचारत आहेत.

निफाड-पिंपळगाव राज्य मार्गालागत शरद शंकर उबाळे (वय ३२) यांची गट नं १०५ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातून वीज वितरण कंपनीच्या थ्री फेज वायर गेल्या आहेत. या वायर हाताला लागतील अशा पाच फुटापर्यंत खाली आल्या आहेत. याबाबत उबाळे यांनी वीज वितरण कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना माहिती दिली देवूनही त्यांनी दुर्लक्ष केले. उबाळे यांनी २२ डिसेंबर २०१६ रोली लेखी पत्राद्वारेही विनंती केली. तरीही कंपनीने शेतकऱ्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले आहे.

याबाबत निफाड वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता ठेकेदाराला सांगितले आहे. वरच्या ऑफिसलाही कळव‌िले आहे, अशी उडावाउडवीची उत्तरे देण्यात आली. उबाळे यांनी कंपनीच्या कारभाराला कंटाळून तारांना स्पर्श होऊन म्हणून पेरणीही थांबव‌िली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॅटट्रिक होणार की परिवर्तन?

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड देवळाली व्यापारी बँकेसाठी रविवारी झालेल्या चुरशीच्या निवडणुकीत ३४.६४ टक्के मतदान झाले.जेलरोडच्या के. एन. केला केंद्रावर सायंकाळी माजी नगरसेवक अशोक सातभाई (सहकार पॅनल) आणि सुनील बोराडे (श्री व्यापारी पॅनल) यांच्यात झालेला वाद वगळता सर्व अकरा केंद्रांवर शांततेत मतदान झाले. दोन्ही पॅनलच्या नेत्यांनी ‘मटा’शी बोलताना विजयाचा दावा केला आहे.

गतवेळी सहकार पॅनलने २२ पैकी १६ जागा जिंकत सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवली होती. यंदा तिसऱ्यांदा सत्ता मिळविण्यासाठी शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख व बँकेचे अध्यक्ष दत्ता गायकवाड यांनी रात्रीचा दिवस केला. तर परिवर्तनाच्या जिद्दीने विरोधी श्री व्यापारी पॅनलचे नेते व शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी सर्व शक्ती पणाला लावली. गेल्यावेळी या पॅनलला सहा जागा मिळाल्या होत्या. प्रतिष्ठेच्या निवडणुकीत कोणची सत्ता येणार हे सोमवारी (दि. २५) रात्री आठपर्यंत स्पष्ट होणार आहे. मतदान केंद्रावर कुठलाही अनुचित प्रकार झाला नाही, असे निवडणूक निर्णय अधिकारी नीलकंठ कऱ्हे यांनी सांगितले.

संचालकांच्या २१ जागांसाठी ४९ उमेदवार रिंगणात आहेत. सहकार पॅनलचे गॅस सिलिंडर, तर व्यापारी पॅनलचे रोडरोलर हे चिन्ह होते. शनिवारी दिवसभर कोसळणाऱ्या पावसाने रविवारी विश्रांती घेतल्याने उमेदवारांमध्ये उत्साह होता. बँकेचे ६१ हजार मतदार आहेत. पैकी २१, २६२ (३४.६३ टक्के) जणांनी मतदान केले. के. एन. केला कंद्रावर सर्वात जास्त (११, ४१९ पैकी ४४७७) मतदान झाले. मुक्तीधाम जवळील मनपा शाळा, आनंद ऋषीजी शाळा, चेहेडी व नेहरुनगर येथील केंद्रासह सिन्नर, देवळाली कॅम्प, नाशिक, सिडको येथेही उत्साह होता. भगूरला २०८९, देवळालीत १८०५ मतदान झाले.


वाघांची प्रतिष्ठा पणास

सहकारी पॅनलने केलेली बँकेची प्रगती, पारदर्शी कारभार यामुळे ही निवडणूक एकतर्फी होईल, असे सुरुवातीला वाटले होते. मात्र, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर यांनी आपल्या पत्नी व भूगरच्या नगराध्यक्षा अनिता करंजकर यांना व्यापारी पॅनलतर्फे उमेदवारी दिली. विरोधकांची मोट बांधत सर्व ताकद पॅनलमागे उभी केली. हायटेक व नियोजनबद्ध प्रचार केला. त्यामुळेच निवडणूक चुरशीची झाली. शिवसेनेचे दोन वाघ एकमेकांविरुद्ध उभे ठाकल्याने शिवसैनिक गोंधळात पडले. आमदार योगेश घोलप तटस्थ राहिले तर माजी मंत्री बबनराव घोलप यांनी ‘सहकार’ला साथ दिली.

क्षणचित्रे

जेलरोडच्या के. एन. केला केंद्रावर सायंकाळी सहकारचे नेते अशोक सातभाई आणि व्यापारी पॅनलचे सुनील बोराडे यांच्यात किरकोळ वाद.

मुक्तीधाम शेजारील मनपा शाळेत रुग्णवाहिकेत येऊन रुग्णाने केले मतदान

जेलरोड व चेहडीच्या केंद्रावर उमेदवार व समर्थकांमुळे वाहतुकीला अडथळा

जास्त मतदारांमुळे नाशिकरोडवरच उमेदवारांचे लक्ष केंद्रीत

वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे व सहकाऱ्यांकडून चोख बंदोबस्त

दत्ता गायकवाड व निवृत्ती अरिंगळे मनपा शाळा क्र. १२५ तर विजय करंजकर, सूर्यंकांत लवटे सकाळी आनंद ऋषीजी शाळेत तळ ठोकून.


निकालास विलंब

सोमवारी सकाळी आठला के. एन. केला शाळेत ४० टेबलांवर एकाचवेळी मतमोजणी सुरू होईल. मतदान पारंपारिक पद्धतीने झाले. मतदानासाठी ५ मतपत्रिका होत्या. त्या कॅटेगरीनुसार स्वतंत्र करून गठ्ठे करणे, मोजणे याला वेळ लागणार आहे. यामुळे संपूर्ण निकाल लागण्यास रात्रीचे आठ वाजतील अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबकमधील फुलबंदी उठविली

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

येथील त्र्यंबकराजाच्या मंदिरात भाविकांना फुले वाहण्यास परवानगी देण्यात आली आहे. गेल्या तीन वर्षांपासून यावर बंदी होती. शनिवारी ट्रस्टच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबत चेअरमन न्या. चिटणीस यांनी भाविकांना देवास श्रद्धानुसार फुले वाहण्याचा अधिकार आहे, असे म्हटले आहे.

दरम्यान, मंदिरात फुले नेऊ देण्यात येत असायची मात्र दरवाजाच्या बाहेरच ती भाविकाकडून काढून घेण्यात येत होती. याकरिता सुरक्षेचे कारण दिले जात होते. पाचपन्नास रुपयांची फुले देवाला न वाहता शिपायांनी हातातून काढून घेतल्याने भाविक संतप्त होत असत आणि वाद घडायचे. फुलबंदी उठविल्याबाबत भाविक तसेच फुलविक्रेते यांनी आनंद व्यक्त केला आहे.

सलग शासकीय सुटीमुळे त्र्यंबकेश्वर येथे गर्दीत वाढ झाली आहे. शुक्रवारी सायंकाळपासून भाविकांचा ओघ सुरू झाला असून, रविवार सायंकाळपर्यंत तसाच होता. वाहनतळावरही वाहनांसाठी जागा शिल्लक नव्हती. नवीन बस स्थानक, जव्हार फाटा येथे देखील वाहने उभी करण्यात आली होती. त्र्यंबक नगर पालिकेस तीन दिवसात वाहन प्रवेश फीचे विक्रमी उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे. दरम्यान त्र्यंबकनगरीत पर्यटनावर अवलंबून असलेल्या व्यवसायाला सुगीचे दिवस आले आहेत. अर्थात भाविकांच्या सुविधांच्या नावाने असलेली बोंब मात्र कायम आहे. दर्शनबारी पासून ते स्वच्छतागृहापर्यंत सर्वच बाबतीत गैरसोय आहे. नगरपालिका प्रशासन आणि मंदिर व्यवस्थापन दोन्ही यंत्रणा उदासीन असल्याचे चित्र कायम आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ठाकरेंच्या दौऱ्यामुळे शेतकऱ्यांना बळ

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य सरकारने शनिवारी सरसकट दीड लाख कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये असंतोष असतानाच शिवसेना पक्षप्रमुख उद्ध्व ठाकरे यांच्या जिल्हा दौऱ्यामुळे त्यांना बळ मिळाले आहे. या दौऱ्यात उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्याशी संवाद साधून त्यांच्या भावना समजून घेतल्या. सरकारने २०१६ ऐवजी २०१७ पर्यंतच्या थकबाकीदारांना दिलासा द्यावा, कांद्याला हमीभाव द्यावा, यासाठी शिवसेना पाठपुरावा करेल, असे आश्वासन दिले. त्याचप्रमाणे त्यांनी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय ऐतिहासिक आहे. मात्र समाधानकारक नाही असे सांगत त्यांच्या शेतकऱ्याच्या भावनाही व्यक्त केल्या. त्यानंतर शेतकरी संपकाळात शेतकऱ्यांवरचे गुन्हे दिसले, तर सरकारचे काय करायचं ते मी बघतो, असा सज्जड दमही भरला. त्यामुळे शेतकऱ्यांना या दौऱ्यातून समाधान मिळाले आहे.

एकेकाळी शहरी पक्ष म्हणून संबोधल्या जाणाऱ्या शिवसेनेने ग्रामीण भागात शाखा सुरू करत आपले बळ निर्माण केले. लढाऊबाणा असल्यामुळे सर्वसामान्य शेतकरी व कार्यकर्ते शिवसेनेत दाखल झाले व शिवसेनेची ताकद नंतरच्या काळात वाढत गेली. पण, नंतरच्या काळात ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष होवू लागताच शिवसेनेने पुन्हा शेतकऱ्याचे प्रश्न प्रखरपणे मांडायला सुरुवात केली. कर्जमाफीची मागणी सुद्धा शिवसेनेने सत्तेत असतांना लावून धरली. त्यामुळे शेतकऱ्यांची बाजू सरकारपर्यंत पोहचू लागली. या दौऱ्यात त्यांनी सरकारने स्वामीनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी व नियमित कर्जफेड करणाऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असेही सांगितले. त्याचप्रमाणे समृद्धी मार्गाच्या बाधीत शेतकऱ्यांच्याही पाठीशी शिवसेना असल्याचे सांगितले.

नाशिक जिल्हा कांदा, द्राक्ष, डाळिंबसह फळ भाज्यासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे येथे शेतकऱ्यांचे आंदोलन असो की छोटे प्रश्न ते नेहमीच चर्चेत असतात. शेतकरी संघटनेची पाळेमुळेही याच जिल्ह्यात जास्त रुजली व नंतर त्याने मोठे स्वरुप घेतले. त्यामुळेच संवाद यात्रेसाठी उद्धव ठाकरे यांनी नाशिक जिल्ह्यचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी अगोदरच सर्व तयारी केली. पण शनिवारी कर्जमाफीची घोषणा झाली व दुसऱ्या दिवशीच ठाकरे नाशिकला आले. त्यामुळे संभ्रमात व अस्वस्थ असलेल्या शेतकऱ्यांना समाधान वाटले. सरकारने कर्जमाफीचे पहिले पाऊल उचलले आहे. आता त्यात सर्वांना समाधान कसे मिळेल यासाठी पुन्हा संघर्ष करावा लागणार आहे. त्यासाठी शिवसेनेची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.

शिवसैनिकही उत्साहात

शेतकरी संवाद यात्रेत उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यामुळे शिवसैनिकांचाही उत्साह वाढला आहे. महानगरपालिकेत अपेक्षित यश शिवसेनेला मिळाले नसले तरी ग्रामीण भागातून शिवसेनेला सर्वांनी पसंती दिली. त्यामुळे जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना सर्वात मोठा पक्ष ठरला. ठाकरे यांचा हा दौरा शिवसैनिकांना बळ देणारा ठरला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

टचपॅड रिप्लेस न करणे पडले महाग

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वाॅरंटीत पीरिअडमध्ये मोबाइल असताना टचपॅड खराब झाल्यानंतर विनामूल्य तो रिप्लेस न करून देणे लिनोवाे कंपनीला महागात पडले आहे. डॅमेजचे कारण पुढे करीत ग्राहकाची ही सेवा नाकारल्यामुळे लिनोवो कंपनीला ग्राहक न्यायमंचाने पाच हजारांचा दंड ठोठावला आहे. या दंडाबरोबरच मोबाइलची किंमत १३ हजार ४९९ रुपये परत देण्याचे आदेशही दिले आहेत. या निकालामुळे वाॅरंटी देऊनही सेवा नाकारणाऱ्या कंपन्याला चाप बसणार आहे.

पाथर्डी फाटा येथील वासननगर येथे राहणाऱ्या कनिका पंकज शर्मा यांनी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्यायमंचात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या पाच महिन्यांत हा निकाल देण्यात आला आहे.

या तक्रारीत शर्मा यांनी म्हटले आहे, की एसयूके-२१ हा लिनोवो कंपनीचा मोबाइल आॅनलाइन विकत घेतला. दोन-तीन महिन्यांनंतर सदर मोबाइल हँग होणे, अॅप व टचपॅड प्राॅपर वर्क न करणे, असे प्राॅब्लेम सुरू झाले. त्यामुळे होलाराम काॅलनीत असलेल्या शुभम टेलिकाॅम सर्व्हिसेसकडे तो दुरुस्तीसाठी दिला. त्यांनी तो चेक केल्यानंतर टचपॅड वाॅरंटी कालावधीत असल्याने १५ दिवसांत विनामूल्य बदलवून मिळेल, असे सांगितले. दुरुस्तीसाठी देताना त्यावर कोणत्याही प्रकारचे स्क्रॅचेस अगर पॅचेस नव्हते. त्यानंतर लिनोवो कंपनीने मोबाइल डॅमेज झाल्याचे सांगत टचपॅड रिप्लेस करून देणे नाकारले.

--

कंपनीने दिले स्पष्टीकरण

या तक्रारीनंतर लिनोवो कंपनीने आपली बाजू मांडताना सांगितले, की मोबाइल हँग होण्याची तक्रार केल्यानंतर मोबाइल तपासला असता मोबाइलच्या डिस्प्लेवर डाव्या बाजूस स्पाॅट आढळून आले. त्यामुळे वाॅरंटीच्या अटी व शर्तींनुसार मोबाइल विनामूल्य दुरुस्त करता येणार नाही, असे तक्रारदाराला सांगितले. त्यांनी चार्जेस देण्याचे नाकारल्यानंतर त्यांना मोबाइल दुरुस्त न करता परत दिला.

--

...असा दिला निकाल

या दोन्ही बाजू एेकल्यानंतर न्यायमंचाने वाॅरंटी काळातही मोबाइल विनामूल्य दुरुस्त करून देण्याचे लिनोवो कंपनीने नाकारून सेवा देण्यात कमतरता केली आहे. मोबाइल दुरुस्तीसाठी देतानाच त्यांचे फिजिकल डॅमेज झालेले होते, हे सिद्ध करण्यासाठी कंपनीने तत्सम पुरावा दाखल केला नाही. अगर इंजिनीअर्सचे प्रतिज्ञापत्र महत्त्वपूर्ण असतानाही सादर केले नाही. त्यामुळे त्यांनी मोबाइल परत घेऊन त्याची किंमत १३ हजार ४९९ तक्रारदारांना द्यावी. त्याचप्रमाणे मानसिक त्रासापोटी ३ हजार व अर्जाचा खर्च दोन हजार रुपयेसुद्धा द्यावा. हा निकाल ग्राहक न्यायमंचाचे अध्यक्ष मिलिंद सोनवणे, सदस्या प्रेरणा काळुंखे-कुलकर्णी यांनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सांडपाणी रहिवाशांच्या दारात

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

महापालिकेला सातपूर भागातून सर्वाधिक आर्थिक उत्पन्न मिळूनदेखील परिसरातील असंख्य रहिवासांना नागरी सुविधांपासूनदेखील आजही वंचित राहावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून सातपूर कॉलनीतील म्हाडा वसाहतीला ड्रेनेजच्या सांडपाण्याचा त्रास सहन करावा लागत आहे. जुन्या कॉलनीतील इमारतींच्या ड्रेनेजचे सांडपाणी थेट रहिवाशांच्या दारात साचत आहे. घरासमोरच साचलेल्या सांडपाण्यामुळे येथील रहिवाशांचे आरोग्यच धोक्यात आले असून, महापालिकेकडे तक्रारी करूनदेखील ड्रेनेजची समस्या मार्गी लागत नसल्याने परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कामगार वस्ती असलेल्या सातपूर कॉलनीत म्हाडाने तीन हजारांहून अधिक घरकुले उभारलेली आहेत. कामानिमित्त नाशिकला आलेल्या कामगारांना स्वस्तात घरकुले उपलब्ध करून दिल्याने अनेकांचे घराचे स्वप्नही पूर्ण झाले. परंतु, वाढत्या लोकवस्तीत लहान असलेल्या घरकुलांचे रुपांतर इमारतींमध्ये झाले आहे. वाढलेल्या लोकसंख्येमुळे गेल्या पंचवार्षिकमध्ये लाखो रुपये ड्रेनेज लाइनकरिता मंजूर करण्यात आले होते. परंतु, मंजूर करण्यात आलेला निधी केवळ आठ व वीस हजारांच्या वस्तीत नवीन ड्रेनेज लाइन टाकण्यातच खर्च झाला. उर्वरित जुन्या कॉलनीतील ड्रेनेजच्या नवीन लाइन टाकण्यात आल्या नसल्याने सांडपाण्याच्या लाइन वारंवार चोकअप होत असल्याने सांडपाणी थेट रहिवाशांच्या दारात साचत आहे. या चोकअपच्या समस्येमुळे परिसरातील मुलांना खेळणेही अवघड झाले असून, अस्वच्छतेमुळे त्यांच्या आरोग्यालाच धोका निर्माण झालेला आहे. याबाबत महापालिकेकडे रहिवाशांनी वेळोवेळी तक्रारीदेखील केल्या. परंतु, रहिवाशांच्या समस्येकडे कुणीही लक्ष देत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. स्थानिक नगरसेवकांनीही रहिवाशांना वाऱ्यावर सोडल्याने ड्रेनेज समस्येवर तोडगा काढणार कोण, असा सवाल महिला उपस्थित करीत आहेत.

--

...तर छेडणार आंदोलन

दरम्यान, महापालिका व स्थानिक नगरसेवक लक्ष देत नसल्याने ड्रेनेजच्या समस्येसाठी आंदोलन करणार असल्याचे सामाजिक कार्यकर्ते नितीन निगळ यांनी सांगितले. गेल्या महिन्यापासून रहिवासी सातत्याने महापालिका व स्थानिक नगरसेवकांकडे ड्रेनेजची समस्या मांडत आहेत. परंतु, रहिवाशांच्या समस्येबाबत कुणालाही घेणे-देणे नसल्याने सांडपाणी आरोग्य विभागात टाकण्यात येणार असल्याचे निगळ ‘मटा’शी बोलताना म्हणाले.

--

जुन्या कॉलनीत म्हाडा घरकुले उभारल्यापासून असलेल्या ड्रेनेजच्या लाइन अजूनही वापरात आहेत. मात्र, लोकसंख्या दहा पटींनी वाढल्याने जुन्या ड्रेनेज लाइन कमी पडू लागल्या असून, नेहमची चोकअप होऊन सांडपाणी थेट दाराशी सात आहे. त्यामुळे ज्येष्ठांसह लहानग्यांचेही आरोग्य धोक्यात आले आहे.

-दीपक कदम, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुरगाण्यातील ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा वाढविणार

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी भागातील रुग्णांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा दिला जाईल, तसेच तेथे तज्ज्ञ डॉक्टर्सची नेमणूक केली जाईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सोमवारी नाशिककरांना दिली. आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टर्स काम करण्यास तयार व्हावेत यासाठी दीड ते दोन लाखांपर्यंत पगार वाढवून त्यांना सरकारतर्फे विशेष प्रोत्साहन देण्याचे सरकारच्या विचाराधीन असल्याचे या वेळी सावंत यांनी सांगितले.

सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालय आणि बुबळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला डॉ. सावंत यांनी भेट दिली. या वेळी आमदार जिवा पांडू गावित, आरोग्य उपसंचालक डॉ. लोचना घोडके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सुशील वाकचौरे आदी उपस्थित होते.

या वेळी डॉ. सावंत म्हणाले, की आदिवासी भागातील बांधवांसाठी आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रुग्णांच्या समस्या दूर करण्यासाठी सुरगाणा येथे ५० खाटांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल. त्यासाठी स्वतंत्र सुसज्ज इमारतदेखील उभी करण्यात येईल. हॉस्प‌िटलमध्ये फिजिशिअन, सर्जन, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ज्ञ, भूलतज्ज्ञाची नियुक्ती केली जाईल. रुग्णालयात एक्स-रे यंत्र कार्यरत करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी डॉ. सावंत यांनी ग्रामस्थ आणि रुग्णांशी चर्चा करून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. पावसाळ्यात साथीचे रोग पसरू नयेत, यासाठी आरोग्य यंत्रणेस दक्ष राहण्याचे निर्देश डॉ. सावंत यांनी दिले. आदिवासी भागात सॅम आणि मॅमचे प्रमाण कमी करण्याबाबतही त्यांनी सूचना दिल्या.

आदिवासी भागासाठी डॉक्टरांना पगारवाढ?

आदिवासी भागात तज्ज्ञ डॉक्टर्स काम करण्यास इच्छुक नसतात ही वस्तुस्थ‌िती आहे. परिणामी, रुग्णांना वेळेत आरोग्याच्या सेवा मिळण्यात अडचणी येतात. डॉक्टरांनी आदिवासी भागात थांबून तेथे सेवा देणे अपेक्षित आहे. मात्र, तसे होत नाही. म्हणूनच डॉक्टरांनी तेथे काम करण्यास तयार व्हावेत यासाठी दीड ते दोन लाखापर्यंत पगार वाढवून त्यांना सरकारतर्फे विशेष प्रोत्साहन देण्यात येईल, असे डॉ. सावंत यावेळी म्हणाले. आदिवासी भागातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची रिक्त पदे भरण्याबाबत शुक्रवारी स्थानिक स्तरावर बैठक घेऊन त्याचा अहवाल त्वरित सरकारला पाठवावा, असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तोतया विमा व्यवस्थापकाकडून ३२ लाखांची फसवणूक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खासगी विमा कंपनीचा व्यवस्थापक बोलत असल्याची बतावणी करून एका भामट्याने सातपूरमधील एकाची ऑनलाइन पद्धतीने तब्बल ३२ लाख २२ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. ऑनलाइन फसवणुकीबाबत अंबड पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

विजय तुकाराम पाटील (रा. सातपूर कॉलनी, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार अंबड पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाटील यांच्या फिर्यादीनुसार, १९ जून रोजी पाटील यांच्या मोबाइल क्रमांकावर संशयित आरोपी दीपक याने फोन केला होता. आपण मॅक्‍स लाइफ कंपनीचा कार्यकारी व्यवस्थापक बोलत असल्याचे भासवत आरोपीने पाटील यांचा विश्वास संपादन केला. तुमचा पॉलिसी ईसीएस परत गेला आहे. तुम्हाला आम्ही डिस्काऊंट देतो. मात्र, त्यासाठी दिल्लीच्या सेंट्रल बँक आफ इंडियाच्या शाखेत ऑनलाइन रक्कम टाकावी लागेल, असे आरोपीने सांगितले. त्याप्रमाणे पाटील यांनी तब्बल ३२ लाख २२ हजार ४७५ रुपये ऑनलाइन पद्धतीने ट्रान्स्फर केले. मात्र, पैसे भरल्यानंतर काही हालचाल झाली नाही. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे पाटील यांच्या लक्षात आले. या प्रकरणी अंबड पोलिसांनी सायबर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

दुचाकीवरून पडून एकाचा मृत्यू

दुचाकीवरून पडून डोक्‍याला गंभीर मार लागल्याने राजेंद्र मारुतीराव पोद्दार (वय ५०, रा. आदित्यकोन सोसायटी, महालक्ष्मी टॉकीजच्या मागे, दिंडोरी रोड, पंचवटी) यांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी दुपारी तेली गल्लीच्या कॉर्नरवर घडली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोद्दार रविवारी दुपारच्या सुमारास दुचाकीवरून घराकडे परतत असताना ही घटना घडली. तेल्ली गलीच्या चौकात ते दुचाकीवरून पडले. त्यामुळे त्यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागला होता. त्यांना तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

सोलर मेटलसह रक्कम लंपास

सातपूर औद्योगिक वसाहतीतील कंपनीतील बायोमेट्रिक मशिन तोडून चोरट्यांनी नुकसान करीत कंपनीतील सोलर मेटलसह रोकड लंपास केली.

शेखर साईनाथ शिंदे (रा. म्हाडा कॉलनी, सातपूर) यांच्या फिर्यादीनुसार, सातपूर पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये डेराडेकस पॉवर स्विचेस ही कंपनी असून, गेल्या शुक्रवार ते रविवारी ही घटना घडली. वरील कालावधीत चोरट्याने कंपनीत प्रवेश करून बायोमेट्रिक मशिन तोडून नुकसान केले आणि अडीच किलोचे सोलर मेटल, ८,९२० रुपयांची रोकड लंपास केली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किरणा दुकान फोडले

सातपूरच्या शिवाजीनगरमधील किराणा दुकानाचे शटर उचकटून चोरट्याने २० हजार रुपये लंपास केले. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी भाऊसाहेब बाजीराव गाडेकर (रा. दत्त मंदिर रोड, शिवाजीनगर, सातपूर) यांनी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. गाडेकर यांचे शिवाजीनगरमधील दत्तमंदिर रोडवर गुरुदत्त किराणा स्टोअर्स आहे. गेल्या शनिवारी रात्री दुकान बंद केल्यानंतर चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास दुकानाचे शटर उचकटले आणि दुकानातील २० हजार रुपयांची रोकड लंपास केली. हा प्रकार पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुचाकी चोरीस

हनुमानवाडीतील अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी चोरीला गेली. अक्षय सतीश रामराजे (रा. सोनाली रिव्हर, हनुमानवाडी, पंचवटी) याने दिलेल्या फिर्यादीनुसार, राहत्या अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली २० हजार रुपयांची दुचाकी (एमएच १५/ बीयू ६९२८) चोरट्याने गेल्या १४ जून रोजी सायंकाळी ७ ते ९ वाजेच्या दरम्यान चोरी केली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नालेसफाईची चौकशी कधी?

0
0

महापौरांच्या घोषणेला आठ दिवस उलटले; शिवसेना विचारणार जाब

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

यंदाच्या पहिल्या आणि काल परवा झालेल्या दुसऱ्या पावसांत नाशिक शहराची झालेल्या दैनाला पावसाळापूर्व कामांमधील भ्रष्टाचार जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी नालेसफाईच्या कामांच्या चौकशीची घोषणा केली होती. परंतु ही घोषणा होऊन आठ दिवस उलटले तरी चौकशीचा कागद हललेला नाही. महापौरांनी नालेसफाई कामांच्या चौकशीची रुपरेषा अद्यापही स्षष्ट न केल्याने या चौकशीबाबत संशय बळावला आहे. त्यामुळे विरोधकांना शांत करण्यासाठीच महापौरांनी घोषणा तर केली नाही ना, असा प्रश्न शिवसेनेने उपस्थित केला आहे.

१४ जून रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे शहराची दैना झाली होती. नदीत पाणी नसतांनाही शहरातील गल्लीबोळात मात्र पुराचे लोट आले होते. या पावसामुळे नाशिककरांचे मोठे नुकसान झाले होते. महापालिकेकडून नालेसफाईचे काम झाले नसल्यामुळेच ही परिस्थिती ओढावल्याचा आरोप नागरिकांसह नगरसेवकांनी केला होता. पालिकेच्या ढिलाईमुळेच ही अवस्था निर्माण झाल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांवर झाला. या पावसाने शहराचे नुकसान झाल्याचा आरोप करत गेल्या महासभेत विरोधकांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. या लक्षवेधीवर वादळ निर्माण झाल्यामुळे महापौरांनी सभाच गुंडाळली होती. त्यामुळे महापौरांवर प्रशासनाला पाठीशी घातल्याचा आरोप झाला होता.

महापौरांनी सत्ताधारी नगरसेवकांसह विरोधकांच्या आरोपाची दखल घेत, गेल्या मंगळवारी पावसाळी पूर्व कामांमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराच्या चौकशीची घोषणा केली होती. त्यासाठी एक समिती स्थापन करून तज्ज्ञांच्या मदतीने चौकशी केली जाईल, अशी घोषणा महापौरांनी केली होती. परंतु या घोषणेला आता आठ दिवस उलटले असून, अजूनही चौकशीची रुपरेषा जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळे या घोषणेबाबत संशय बळावला आहे. सध्या प्रशासनाकडून शहरातील नदी नाल्यांचे सफाईचे काम जोरात सुरू आहे. त्यामुळे प्रशासनाला अभय देण्यासाठी या चौकशीला उशीर केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. यासंदर्भात शिवसेना जाब विचारणार असून, महापौरांनी घोषणेची आठवण करून देणार असल्याचे बोरस्ते यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘असा कलादिग्दर्शक पुन्हा होणे नाही’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

चित्रपट महामंडळाचे ऑफिस नाशिकला सुरू व्हावे, यासाठी दिवसरात्र मेहनत घेणारा अत्यंत मितभाषी कलाकार आपल्यातून निघून गेला आहे. असा कलादिग्दर्शक पुन्हा होणे नाही, असे भावनाविवश प्रतिपादन मुंबई चित्रपट महामंडळाचे संजय ठुबे यांनी केले.

नाशिक शहरामधून सुरुवात करून मुंबई, पुणे, कोल्हापूरपर्यंत कला दिग्दर्शक म्हणून ज्यांचे नाव होते असे नेपथ्यकार व ज्येष्ठ कलादिग्दर्शक अरुण रहाणे यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या आठवणी एकत्रित चर्चिल्या जाव्या यासाठी आयोजित शोकसभेत ते बोलत होते. ही शोकसभा अखिल भारतीय चित्रपट महामंडळ नाशिक शाखा, अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद नाशिक शाखा, सार्वजनिक वाचनालय नाशिक आणि नाशिकमधील सर्व नाट्य संस्थांनी मिळून आयोजित केली होती. वा. गो. कुलकर्णी कलादालन, परशुराम साईखेडकर नाट्यमंदिर येथे ही सभा झाली.

ठुबे पुढे म्हणाले की, चित्रपट महामंडळाच्या काही योजना निम्नस्तरातील कलावंतांपर्यंत जाण्यासाठी त्यांनी शेवटपर्यंत प्रयत्न केले. कलादिग्दर्शक हा प्रतिसृष्टी निर्माण करणारा असतो. दृश्य स्वरूपात चित्रपटाला पुढे आणण्याचे काम तो करतो. अरुणजींच्या जाण्याने नाशिकच्या कलाक्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे असेही ठुबे म्हणाले.

यावेळी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम म्हणाले, की अरुणच्या जाण्याची बातमी कानावर आली आणि त्यांनी नाट्यक्षेत्रात केलेल्या कामाची चित्रफितच नजरेसमोरून गेली. त्यांचे आयुष्य मी माझ्यासमोर घडताना पाहिले आहे. मी एकांकिका बसवायचो तेथे चर्चेसाठी अरुण हजर असायचा. त्याचा कामात प्रत्यक्ष सहभाग नसेलही परंतु, त्याला नेहमी वाटायचे की काहीतरी जबाबदारी माझ्यावर असावी. खंडोबाचं लगीन नाटकाचे अनेक प्रयोग झाल्यावर पडदे जीर्ण झाले आणि नेताजी भोईरांसारखेच पडदे रंगविण्याची जबाबदारी मी त्याला दिली तेव्हा तो खूप आनंदी झाला होता. दादांनी काम केलेल्या पडद्यावर काम करायला मिळणार म्हटल्यावर त्याने एक रुपयादेखील मोबदला न घेता काम करून दिले.

जयप्रकाश जातेगावकर यांनी कलाकारांच्या आरोग्याची नियमित तपासणी केली पाहिजे, अशी सूचना यावेळी केली. श्याम लोंढे यांनी अरुण रहाणे यांच्या आठवणी जागवल्या. मनोज नागपुरे, वासू पाटील, हरिभाऊ जाधव, प्रदीप कोथमिरे, मुलचंद पटेल यांसह काही कलावंतांनी रहाणे यांच्या आठवणी ताज्या केल्या. सूत्र राजेश जाधव यांनी सांभाळले.

...अन् जोगवा टायटल मिळाले

शोकसभेत आठवणींना उजाळा देताना प्रा. रवींद्र कदम यांनी सांगितले, की जोगवा नावाची एकांकिका आम्ही केली होती. त्याचे पुढे काहीतरी भव्य करण्याच्या हेतूने हे टायटल शाहू खैरे व मी रजिस्ट्रेशन केले. त्याला बराच काळ उलटून गेल्यावर एकदिवस अरुणचा फोन आला, त्याला जोगवा हे टायटल एका चित्रपटासाठी हवे होते. तो चित्रपट राजीव पाटीलचा होता. अरुणने मध्यस्थी करून हे टायटल त्यांना मिळवून दिले. अरुण असा प्रत्येकासाठी धडपड करणारा होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निविदेच्या फेऱ्यात कोमेजणार वृक्षलागवड

0
0

संरक्षक जाळ्या खरेदीसाठी लागणार दीड महिना

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात महापालिकेच्यावतीने मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला जाणार आहे. यासाठी गेल्या महासभेत संरक्षक जाळ्या खरेदीकरिता ४० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. प्रशासनाकडून जाळ्या खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. विशेष म्हणजे जाळ्या खरेदी निविदा पद्धतीने केली जाणार असल्याने त्याला दीड ते दोन महिने लागणार आहेत. त्यामुळे वृक्षलागवड कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

महापालिकेच्या प्रशासनाकडून घोडा खरेदी करण्याअगोदर नाल खरेदी करण्याचे प्रकार अनेकदा होतात. त्याचाच प्रत्यय नुकत्याच महासभेने मंजूर केलेल्या वृक्षरोपणाच्या विषयावरून येत आहे.

यंदाच्या पावसाळा हंगामात सहा विभागात वृक्षारोपण करण्याचे नियोजन आहे. त्यासाठी दोन हजार ६२१ संरक्षक जाळ्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्यासाठी ३९ लाख ९९ हजार रुपये खर्चाला महासभेने मान्यता दिली आहे. सिडको, नाशिक पूर्व, नाशिक पश्‍चिम, नाशिकरोड व पंचवटी विभागामध्ये प्रत्येकी ४३७ तर सातपूर विभागात ४३६ संरक्षक जाळ्या उभारल्या जाणार आहेत. एका संरक्षक जाळीची किंमत एक हजार ५२५ निश्‍चित करण्यात आली आहे. वृक्ष निधी या लेखा शिर्षकातून हा निधी खर्च केला जाणार आहे. परंतु वृक्ष लागवड कधी होणार आणि जाळ्यांची खरेदी कधी केली जाणार याबाबत संभ्रम आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने तातडीने वृक्षलागवड होवून त्यांना जाळ्या लावल्या तरच वृक्ष जगू शकतील. परंतु या जाळ्यांच्या खरेदीला किमान दीड ते दोन महिने लागणार आहे. त्यामुळे वृक्षलागवड कधी होणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे ही वृक्षलागवड कागदावरच होण्याची शक्यता पर्यावरण प्रेमींकडून केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images