म. टा. वृत्तसेवा, मनमाड
आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक सामाजिक, राजकीय, क्रीडा साहित्य व इतर अनेक गोष्टींबाबत तसेच जन्मदिनानिमित्त अनेक प्रसंगी सत्कार व सन्मानाचे कार्यक्रम होत असतात. परंतु, सन १९९९ पासून दरमहा प्रत्येक एकादशीस श्रद्धा आणि भक्तीने मनमाड येथून पंढरपूरला जाऊन श्रीविठ्ठलाच्या चरणी लीन होऊन आजपर्यंत २१६ वारींचा विक्रम करणाऱ्या सीताराम पांडुरंग शेळके आणि कलावती सीताराम शेळके या दाम्पत्याचा सत्कार त्याहूनही अनोखा ठरला आहे.
श्री निलमणी गणेश मंदीर सार्वजनिक ट्रस्टच्या वतीने सन्मान करण्यात आलेल्या या सत्काराने नव्या पिढीला श्रद्धा आणि भक्तीचा एक आदर्श दिला. वाचनालयाचे अध्यक्ष नितीन पांडे, सचिव कल्पेश बेदमुथा, नरेश गुजराथी यांच्या कल्पकतेतून झालेला हा अनोखा सत्कार चर्चेचा विषय ठरला.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक व धार्मिक परंपरेच्या या वारीमध्ये दरवर्षी लाखोंच्या संख्येने पंढरपूर वारीत भाविक सहभागी होतात. परंतु, प्रत्येक महिन्याला वादळवारा, पाऊस, सांसारिक अडचणी यांची तमा न बाळगता नेमाने वारी करणारे मनमाड शहरातील शेळके दाम्पत्य अनोखे वारकरी होय. संतोष बळीद, किशोर पाटोदकर, प्रज्ञेश खांदाट, नीलकंठ त्रिभुवन यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सत्कार पार पडला.
१९९९ साली सीताराम शेळके यांचा नांदगाव-मनमाड रस्त्यावर अपघात झाला आणि या अपघातात ते जबर जखमी झाले. या दुखापतीत ते सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ बेशुद्धावस्थेत होते. अशा कठीण संकटप्रसंगी त्यांची पत्नी कलावती यांनी त्यांच्या उशाशी पांडुरंगाची मूर्ती ठेवून सतत धावा केला. आणि अत्यंत दुर्धर दुखापतीतून सीताराम शेळके हे बरे झाले. यानंतर शेळके दाम्पत्याने पंढरीच्या वारीला दर महिन्यास जाण्याचा नेम केला. यानंतर ते बरे झाल्यावर गेल्या अनेक वर्षांपासून हे दाम्पत्य तो नेम पाळत आहेत. आतापर्यंत त्यांनी २१६ वारी केल्या आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट