म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वाहतूक विभागाच्या नुकत्याच सुरू झालेल्या चार कार्यालयांनी कामकाजास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम दिसून येत असून, रोजच्या कारवाईचा आकडा पावणेसहाशेच्या घरात पोहचला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कारवाईचा आकडा खूपच कमी असून, दंडाचा आकडा मात्र तुलनेने जास्त आहे.
पोलिस स्टेशनच्या धर्तीवर वाहतूक शाखेचा विस्तार करण्यात आला असून, शहरात चार वाहतूक कार्यालये सुरू झाली आहेत. यामुळे वाहतूक पोलिसांची संख्या दुप्पट झाली असून, कारवाईचे प्रमाणदेखील वाढले आहे. गुरुवारी (दि. ६ जुलै) वाहतूक शाखेने ५७० बेशिस्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली. यापूर्वी दिवसभरात फारतर ३०० केसेस होत होत्या. मात्र, गतवर्षीचा विचार करता यंदा कारवाईत मोठी घट झाल्याचे दिसते. गतवर्षी वाहतूक शाखेने एक लाख १२ हजार ३८ केसेस करून एक कोटी १८ लाख ८४ हजार ७०० रुपयांचा दंड वसूल केला. तेच यंदा मात्र ६१ हजार १०६ केसेस झाल्या आहेत. दंडाचा आकडा मात्र एक कोटी ४९ लाख ३६ हजार ८०० रुपयांपर्यंत पोहचला. दंडाच्या रकमेत झालेल्या वाढीचा हा परिणाम असल्याचे पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले. वाहतूक शाखेच्या एकूण कामगिरीबाबत बोलताना पाटील यांनी स्पष्ट केले की, पूर्वी केंद्रीय पध्दतीने काम होत होते. आता चार विभागीय कार्यालये सुरू झाली असून, वाहतूक पोलिसांची संख्या वाढवण्यात आली आहे. ही विभागीय कार्यालये पोलिस स्टेशन धर्तीवर सुरू झाली असून, संबंधित पोलिस निरीक्षकांना हद्द तसेच कारवाईची जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे. कॉलेजरोड, गंगापूररोड, द्वारका, त्र्यंबकरोड किंवा फारतर रविवार कारंजा परिसरात कारवाई करणारे वाहतूक पोलिस या भागातून बाहेर पडले आहेत. ठराविक भागात वर्षानुवर्षे नियमबाह्य वाहतूक करणारे वाहनचालक यामुळे कारवाईच्या टप्प्यात पोहचल्याचा दावा पाटील यांनी केला. इंदिरानगर अंडरपासचा प्रश्न जवळपास मार्गी लागला आहे. द्वारकेचा प्रश्न सोडवण्यासाठी काम सुरू असून, जेहान सर्कल तसेच एबीबी सर्कल काढून तिथे सिग्नल्स बसवण्यात आले. वाहतूक विभागाच्या आणखी काही योजना प्रस्तावीत असून, यामुळे बेशिस्त वाहनचालकांवर संक्रात येणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
..तर करा तक्रार
वाहतूक विभागातच ठिय्या मांडून आर्थिक देवाण-घेवाण करण्याचा आरोप असलेल्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. आता सर्वच कर्मचारी नवीन असून, सर्वांना सूचना करण्यात आल्या आहेत. तरीही वाहतूक पोलिसांकडून अनधिकृत पैसे घेतले जात असल्याच्या तक्रारी असतील तर नागरिकांनी लागलीच त्याची तक्रार करावी. वरिष्ठ पोलिस अधिकारी त्याविषयी कारवाई करतील, असे पोलिस उपायुक्त पाटील यांनी स्पष्ट केले.
गतवर्षीच्या केसेस- १,१२,०३८
चालू वर्षीच्या केसेस- ६१,१०६
गतवर्षीचा वसूल दंड - १,१८,८४,७००
चालू वर्षीचा दंड- १,४९,३६,८००
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट