--
-योगशास्त्र ही नाशिकसारख्या शहरांना करिअरची नवी शाखा वाटते का? याबाबत आपला अनुभव काय?
-योगशास्त्राचे दैनंदिन जीवनातील महत्त्व आजमितीस जागतिक स्तरावर स्वीकारले गेले आहे. देशात बेंगळूरू, बिहार यांसारख्या ठिकाणी जगातील नामांकित योग विद्यापीठे कार्यरत आहेत. त्यामुळे हा विषय करिअरच्या दृष्टीने अगदीच नवखा नाही. तरीही नाशिकसारख्या छोट्या शहरांमध्ये यादृष्टिकोनातून जनजागृतीस मोठा वाव आहे. अनेक निमित्तांनी जागतिक स्तरावर झळकणारे नाशिक योग शिक्षणास अनुकूल असल्याचा प्रत्यय येतो आहे.
--
-आपल्या संस्थेतील अभ्यासक्रमांविषयी...
-योग शिक्षणाच्या प्रसारासाठी आमच्याकडे योगशास्त्र आणि संस्कृत या विषयातील एक वर्ष कालावधीचा स्वतंत्र पदविका (डिप्लोमा) अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रतेचे निकषही अनुक्रमे बारावी आणि दहावी उत्तीर्ण ठेवण्यात आले आहेत. याशिवाय पदव्युत्तर स्तरावर एम. ए. योगशास्त्र हा दोन वर्षे कालावधीचा अभ्यासक्रम पदवी उत्तीर्ण किंवा योग पदविका उत्तीर्णांसाठी आहेत. या सर्व अभ्यासक्रमांना कविकुलगुरू कालिदास विश्वविद्यालय, नागपूर यांची व यूजीसी (विद्यापीठ अनुदान आयोग) यांची मान्यता घेण्यात आली आहे.
--
-आपल्याकडील अभ्यासक्रमांचे वैशिष्ट्य काय सांगता येईल?
-योग शिक्षणात संस्थेची वाटचाल नवी असली, तरीही या क्षेत्रातील सूक्ष्म घडामोडींचा अभ्यास करूनच हे मान्यताप्राप्त शिक्षण दिले जात आहे. यात गृहिणींपासून विविध विद्याशाखांमध्ये शिक्षण घेणारे तरुण विद्यार्थी आणि प्रोफेशनल्सनाही आमच्याकडील अभ्यासक्रमांमध्ये सहभागी होता येईल. त्यासाठी शनिवार आणि रविवार असे दोन दिवस थिअरी शिकण्यासाठी कॉलेजची उपस्थिती बंधनकारक आहे. इतर वेळी स्वयंअध्ययन पद्धतीचा समावेश अभ्यासक्रमात आहे. याशिवाय योग अभ्यासक्रमातील संस्कृत या विषयाचीही विशेष तयारी आमच्याकडे करून घेतली जाते.
--
-आगामी शैक्षणिक वर्षात संस्थेचे नियोजित नवीन प्रकल्प काय आहेत?
-आमची संस्था योग शिक्षणाअगोदरपासून रक्तपेढीच्या क्षेत्रात सामाजिकदृष्ट्या कार्यरत आहे. आमच्या रक्तपेढीत काही थॅलेसेमिया आजाराने ग्रस्त रुग्ण आहेत. या रुग्णांना सातत्याने रक्तबदलास सामोरे जावे लागते. या उपचारांदरम्यान त्यांची रोगप्रतिकारक क्षमता आणि आरोग्यस्तर उंचावण्यासाठी योगाच्या शास्त्रशुद्ध अंमलबजावणीचा उपयोग करण्याचा संशोधनाधारित प्रकल्प आम्ही घेऊ. याशिवाय ‘मधुमेहमुक्त भारत’ यासारख्या समाजोपयोगी संकल्पना आम्ही नाशिकमध्ये राबविणार आहोत.
--
-योग शिक्षणातील आव्हानांसंदर्भात काय वाटते?
-केवळ योगासने करणे म्हणजे योगशास्त्र असा चुकीचा समज समाजात रूढ होत आहे. व्यक्तीचे बाह्य व्यक्तिमत्त्व आणि मनोविकास यांचा समतोल साधणारी योगशास्त्र ही एक स्वतंत्र जीवनशैली आहे, हा शास्त्रसिद्ध संदेश नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आव्हान योग शिक्षणात महत्त्वाचे वाटते. व्हर्च्युअल बनलेल्या नव्या पिढीला योगाच्या माध्यमातून योगशक्तीच्या रिअॅलिटीची अनुभूती देण्यासाठी संस्था प्रयत्नशील आहे.
--
-योग अभ्यासक्रमांनंतर प्लेसमेंट्ससंदर्भात काय चित्र आहे?
-ज्यांना मनापासून योग या विषयात करिअर करण्याची इच्छा आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी या विद्याशाखेत जागतिक स्तरापर्यंत संधी उपलब्ध आहेत. आधुनिक जीवनशैली ही प्रत्येकाच्या जगण्यातील समस्या झाली आहे. ही समस्या मन आणि शरीर या बाबींशी नाते सांगते, तर योगशास्त्र याच मुद्यांवर उपाययोजना देते. परिणामी, विविध गट, संस्था, समूह स्तरावर योगशिक्षकपदापासून या विषयात स्वत: कोच बनणे, वैयक्तिक जीवन सुदृढ ठेवण्यासोबतच संशोधनासही मोठा वाव आहे. भारतात मोठ्या शहरांपासून तर जगातील सर्वच उपखंडांमध्ये योगशिक्षकांना मागणी आहे.
_ _ _
-संस्थेचे नवीन व्हिजन?
-तीर्थक्षेत्र म्हणून नाशिक शहराकडे बघण्याचा जगभरातील अभ्यासू नागरिकांचा दृष्टिकोन आहे. भौगोलिकदृष्ट्याही येथे योगाभ्यासाला अत्यंत अनुकूल वातावरण आहे. त्यामुळे त्र्यंबकेश्वरनजीक अंजनेरी डोंगरांच्या कुशीत देश व विदेशांतील योगाभ्यासू साधकांसाठी आश्रमाच्या धर्तीवर प्रकल्प उभा करण्याचा आमचा मानस आहे. त्यादृष्टीने जलदगतीने तयारी सुरू आहे. सद्यःस्थितीत तेथे आयुर्वेदिक वनस्पतींची लागवड करण्यात आली आहे.
_ _ _
-योगशास्त्राकडे वळू इच्छिणाऱ्यांना काय संदेश द्याल?
-हजारो वर्षांची परंपरा असणाऱ्या योगशास्त्राचे महत्त्व आधुनिक चिकित्सेच्या कसोटीवरही जाणून घ्या. ‘रामकृष्ण मिशन’ला अपेक्षित असा शरीर व मनाने कणखर भारतीय नागरिक घडण्यासाठी तुमच्या जीवनशैलीला योगशिक्षणाची जोड द्या!
--
(शब्दांकन ः जितेंद्र तरटे)
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट