नालेसफाईअभावी पहिल्याच पावसात शहराच्या उडालेली दैनेकडे प्रशासनाने व सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी पुन्हा नाशिककरांना त्याच परिस्थितीचा सामना करावा लागला. पहिल्या पावसात केवळ काही भागापुरते मर्यादीत असलेले संकट शुक्रवारी संपूर्ण शहरभर दिसले. पावसामुळे सर्व रस्ते जलमय होऊन जागोजागी तलाव तयार झाले होते. भुयारी गटार आणि नालेही तुंबल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. परंतु, महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांच्यासह सर्व अधिकारी शुक्रवारी रस्त्यावर होते, तर दुसरीकडे नालेसफाईचा ठेका दिलेले ठेकेदार गायब असल्याचे चित्र होते.
शहरात नालेसफाईचा घोळ सुरू असतानाच, शुक्रवारी पुन्हा पावसाने झोडपून काढले. रात्रीपासून संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग न होताही गोदावरी दुधडी भरून वाहिली. शहरातील पाणी भुयारी गटारीऐवजी थेट नदीतच मिसळल्याने नदीला पूर आला होता. दिवसभर चालणाऱ्या पावसामुळे पाणी गटार-नाल्यांऐवजी रस्त्यानेच नदीला मिळत असल्याचे चित्र होते. सर्व नाले व गटारीही तुंबल्याने रस्तेच प्रवाहीत झाले होते. या पावासमुळे रस्त्याची धूळधाण उडाली असून शहराचा तलाव झाला होता. या बिकट परिस्थितीत नालेसफाईचे काम दिलेले ३१ ठेकेदार मात्र गायब होते. आयुक्त अभिषेक कृष्णा आणि सहा विभागीय अधिकाऱ्यांनी दिवसभर शहरात फिरून पावसाचा आढावा घेतला. तसेच शक्य त्या ठिकाणी पालिकेची यंत्रणा लावून रस्ते, नाले मोकळे केलेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला. परंतु, ज्या ठेकेदारांना नालेसफाईचे काम दिले होते, ते ठेकेदार मात्र रस्त्यावर काम करतांना कुठेही दिसले नाही.
महापौरांचे सोपस्कार
शहरातील पावसाचा अंदाज घेतल्यानंतर महापौर रंजना भानसी यांनी सकाळी पालिकेत तातडीने अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सतर्कतेच्या व आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना यंत्रणेला दिल्या. तसेच आपत्कालीन कक्ष सज्ज करण्याचे आदेश दिले. परंतु, एवढीच तत्परता ही नालेसफाईच्या चौकशीत दाखवली असती तर आज नागरिकांना काहिसा दिलासा मिळाला असता.
नालेसफाईच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने शहराची आज ही अवस्था झाली आहे. सत्ताधाऱ्यांनी आपसात भांडत बसण्यापेक्षा नागरिकांना त्रास होईल असा कारभार करू नये. या परिस्थितीवर लवकर तोडगा काढला नाही तर शिवसेना स्टाईल आंदोलन केले जाईल.
- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट