महापालिकेतील विविध विभागामार्फत होणारी काम, कामातील अडचणी आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सर्वच विभागांच्या बैठकांचे सत्र सुरू आहेत. त्यात आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या उपस्थितीत आस्थापना विभागाची सोमवारी प्रथम बैठक घेण्यात आली. यावेळी आस्थापनाशी संबंधित प्रस्ताव मार्गी लावण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांच्या मालमत्ता संबंधित माहिती घेण्याचे निर्देश दिले.
दरवर्षी ही माहिती गोपनीयरित्या घेणे आवश्यक असून, विवरण पत्र प्रत्येक कर्मचाऱ्याने द्यायला हवे. याची जबाबदारी प्रत्येक विभाग प्रमुखाची आहे. परंतु, याबाबत कोणतीही कार्यवाही झाल्याचे समोर आले. त्यामुळे ही माहिती सादर न करणाऱ्या कर्मचाऱ्याची एक वेतनवाढ रोखण्यात यावी, असे निर्देश आयुक्त देशमुख यांनी बैठकीत दिले.
मनपातर्फे सन २०१६ मध्ये १२१० कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता यादी सादर केली असून, त्यावर हरकती व सूचनाही मागविण्यात आल्या आहेत. मात्र दुरुस्ती नंतरची यादी अद्याप सादर झालेली नाही. ही यादी त्वरित प्रसिद्ध करण्याचे निर्देशही आयुक्तांनी दिले आहेत. बारा वर्षे पदोन्नतीचे प्रस्ताव मार्गी लावण्याचेही त्यांनी सांगितले. बांधकाम व पाणीपुरवठा विभागाचा आढावा घेताना या विभागातील रिक्त पदे आणि अपूर्ण कर्मचाऱ्यांमुळे येणाऱ्या अडचणींवर चर्चा करण्यात आली.
आयुक्त देशमुख यांनी मनपातील विविध विभागाचा आढावा घेताना तीन वर्षे व त्यापेक्षा अधिक काळापासून एकाच टेबलवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांबद्दल माहिती घेतली. अधिक काळापासून त्याच विभागात राहिल्यामुळे काही कर्मचाऱ्यांची मक्तेदारी निर्माण झाली असल्याने ती मोडीस काढण्यासाठी त्यांच्या बदल्या करण्याचे संकेत देशमुखांनी या बैठकीतून दिले आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट