म. टा. वृत्तसेवा, सातपूर
येथील एमआयडीसीला लागून असलेल्या कामगार वस्तीत टवाळखोरांकडून बुधवारी मध्यरात्री आठ चारचाकी वाहनांची तोडफोड करण्यात आल्यानंतर या परिसरात दहशत पसरली आहे. येथील टवाळखोरांच्या उपद्रवाचा पाढाच नागरिकांनी पोलिसांसमोर वाचल्यानंतर चार संशयितांना ताब्यात घेण्यात आले खरे. मात्र, या परिसरातील मोकाट टवाळखोरांना जरब बसावी, अशी कडक कारवाई करण्याची मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
सातपूरच्या अनेक भागातही टवाळखोरांच्या जाचाला सर्वसामान्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यांच्यावरदेखील पोलिसांनी कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. टवाळखोर बसत असलेल्या चौकांत नियमित पेट्रोलिंग केल्यास त्यांना नक्कीच आळा बसू शकेल, अशी भावना अनेकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनीच याप्रश्नी लक्ष घालावे, अशी मागणी होत आहे.
कामगारनगर भागात वाहने तोडफोडीची घटना झाल्यानंतर पोलिस उपायुक्त कोकाटे आपल्या सहकाऱ्यांसह तेथे दाखल झाले. त्यांनी कामगारनगरमधील महिलांशी संवाद साधत माहिती जाणून घेतली. मिळालेल्या माहितीच्या आधारे त्यांनी तपासाची चक्रे फिरवून चार टवाळखोरांना ताब्यात घेतले. चारही टवाळखोर कामगारनगर भागातच वास्तव्यास असल्याचे तपास अधिकारी रवींद्र कऱ्हे यांनी ‘मटा’ला सांगितले. पोलिसांनी संबंधितांना न्यायालयात उभे केले असता त्यांना जामीनदेखील मिळाला आहे. त्यामुळे आता पुढे काय, असा प्रश्नदेखील उपस्थित होत असून, अशा टवाळखोरांविरोधात पोलिसांनी अधिक कडक कारवाई करावी, अशी मागणी कामगारनगरवासीयांकडून करण्यात येत आहे.
---
‘भाईं’च्या साथीने गँग
स्लम भागातील अनेक टवाळखोर रहिवासी भागात दहशत पसरविण्याचे काम करतात. यात काही बड्या भाईंची साथही त्यांना मिळत असल्याने प्रसंगी गँग तयार केली जाते. त्यानंतर दोन गटांत जोरदार हाणामाऱ्या झाल्यावर वाहने तोडफोडीसारख्या घटना घडत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. कामगारनगर भागात वाहन तोडफोडीच्या झालेल्या घटनेतही टवाळखोरांमध्ये वाद झाला आणि मद्यच्या नशेत त्यांनी दिसेल त्या वाहनांची तोडफोड केल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. त्यामुळे सातपूर भागात अनेक ठिकाणी चौकात उभे राहणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासह गँग तयार करणाऱ्यांनाच ताब्यात घेतले पाहिजे, असे सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे.
--
येथे आहे वाढता वावर
सातपूर भागात बारदान फाटा, मोतीवाला कॉलेज, धुव्रनगरच्या वळणावर, शिवाजीनगर, कार्बन नाका, जलनगरीरोड, श्रमिकनगर, हिंदी माध्यमिक विद्यालय, राधाकृष्णनगर, अशोकनगर बसथांबा, जाधव संकुल, आनंद छाया, स्वामी समर्थ केंद्रासमोर, सातपूर कॉलनी श्रीराम सर्कल, एमआयडीसीतील अनधिकृत हॉटेल्स आदी ठिकाणी रोजच मोकाट टवाळखोरांचा वावर असतो. त्यातील अनेक जण स्लम भागात राहणारे असतात. परंतु, भाईंच्या भाईगिरीसाठी रहिवासी भागात रोजच त्यांचा वावर असतो. विशेष म्हणजे कुठला उद्योग, व्यवसाय किंवा नोकरी न करता केवळ दहशत पसरविण्याचे काम या टवाळखोरांकडून केले जाते. आयुक्त डॉ. सिंगल यांनी टवाळखोरांच्या अशा अड्ड्यांवर कारवाई करून त्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट