Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पाणीवाटपावरून राजकारण

$
0
0

म. टा वृत्तसेवा, मालेगाव

तळवाडे साठवण तलावातील पाण्यावर शहराचा हक्क अबाधित आहे. अतिरिक्त ५० दलघफू पाण्याचे आरक्षण दाभाडीसाठी करण्यात येणार आहे. दाभाडीला पाणी देण्याचा ठराव महासभेत बहुमताने मंजूर झाला आहे. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस व महागठबंधन आघाडी जाणीवपूर्वक याबाबत नागरिकांची दिशाभूल करीत आहेत, असा आरोप महापौर रशीद शेख यांनी केला.

पालिकेच्या २० जुलै रोजी झालेल्या महासभेत तळवाडे साठवण तलावातून दाभाडीसाठी पाणी देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. याबाबत राष्ट्रवादी तसेच महागठबंधन आघाडीने मात्र विरोध कायम ठेवत माजी आमदार मौलाना मुफ्ती व महागठबंधन आघाडीचे गटनेते बुलंद इक्बाल यांनी शहराच्या हक्काचे पाणी दाभाडीला दिले जात असल्याचा आरोप केला होता. यावर महापौर दालनात आयोजित पत्रकार परिषदेत शेख बोलत होते. यावेळी एमआयएमचे गटनेते डॉ. खालिद परवेज, स्थायी समिती सभापती सलीम अन्वर उपस्थित होते.

महापौर शेख यांनी तत्कालीन राष्ट्रवादीचे महापौर हाजी मोह. इब्राहीम यांच्या कार्यकाळात दाभाडीला पाणी देण्याबाबत करण्यात आलेल्या ठरावाची प्रत सादर केली. तसेच या पाणावाटपाबाबत होत असलेले राजकारण शहराला घातक असल्याचे शेख म्हणाले. तळवाडे साठवण तलावातील ८७ दलघफू पाण्याचे आरक्षण शहरासाठी कायम असून, त्या व्यतिरिक्त शासनाकडून ५० दलघफू पाणी चणकापूर धरणातून आरक्षित केले जाणार आहे.

ठरावावर आक्षेप

२० जुलैच्या महासभेत दाभाडी गावाला पाणी देण्याचा ठराव विखंड‌ित करून शासनाकडे पाठवा, यासाठी मौलाना मुफ्ती व गटनेते बुलंद इक्बाल बुधवारी आयुक्तांची भेट घेणार आहेत.


विरोधाचा अधिकार नाही

तत्कालीन महापौर हाजी इब्राहीम यांच्या कार्यकाळातच महासभेत याबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे दाभाडीला पाणी देण्याबाबत आता त्यांना विरोध करण्याचा अधिकार नसल्याचे शेख यांनी सांगितले. पाणी देण्याच्या मुद्द्यावर विरोधक शहरवासीयांची दिशाभूल करीत असून त्यास धार्मिक, जातीय रंग देण्याचा प्रयत्न शहराच्या हिताचे नाही, याचे तरी भान मुफ्ती व बुलंद इक्बाल यांना आहे का, असा सवाल त्यांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पीडित महिलांसाठी ‘सखी’ची धाव

$
0
0

नाशिक : अत्याचारग्रस्त महिलांना एकाच छताखाली वैद्यकीय, कायदेशीर, समुपदेशक व गरज असल्यास आश्रयाची सुविधा उपलब्ध असावी, या हेतूने केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाकडून ‘सखी’ वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात येत आहे. राज्यातील अकरा जिल्ह्यांमध्ये अशा प्रकारचे सेंटर सुरू करण्यात येत असून, नाशिककडे पायलट प्रोजेक्ट म्हणून पाहिले जात आहे. वात्सल्य महिला वसतिगृहात तात्पुरत्या स्वरूपात वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले असून, हे सेंटर कायमस्वरूपी उभे करण्याच्या प्रयत्नात जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाकडून प्रक्रिया सुरू आहे.

शारीरिक, मानसिक, लैंगिक छळ, कौटुंबिक छळ, अॅसिड अॅटॅक किंवा सायबर क्राइममधील पीडित अशा कोणत्याही अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांना पोलिस, वकील, समुपदेशक अशा अनेकांची मदत घ्यावी लागते. मात्र, अत्याचाराचा सामना करावा लागल्यानंतर अशा व्यक्तींकडे जाऊन कोणत्याही प्रकारची मदत घेण्याची मानसिकता तिची उरलेली नसते. अशा महिलांना या योजनेंतर्गत एकाच छताखाली मोफत वैद्यकीय सुविधा, पोलिस मदतकेंद्र, समुपदेशन केंद्र, कायदेशीर मदत अशा सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याबरोबरच पीडितेच्या गरजेनुसार तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधादेखील या सेंटरमध्ये ती उपलब्ध करून दिली जाणार आहे. २०१५ पासून देशभरात विविध ठिकाणी या सेंटर्सची सुरुवात करण्यात आली असून, राज्यातील विविध ११ जिल्ह्यांमध्ये नाशिकमध्ये ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. नाशिकबरोबरच पुणे, औरंगाबाद, नांदेड, मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, नागपूर, अमरावती, बीड, अकोला येथे हे सेंटर्स सुरू करण्यात येणार आहे.

चोवीस तास सेवा

वन स्टॉप सेंटरमध्ये चोवीस तास सेवा पुरवली जाणार आहे. दहा कर्मचाऱ्यांची टीम यासाठी बाह्ययंत्रणेद्वारे निश्चित केली जाणार आहे.

अशी असणार रचना

वन स्टॉप सेंटरची रचना कशा प्रकारची असावी, याचा आराखडा केंद्राच्या महिला व बालविकास मंत्रालयाने निश्चित करून दिला आहे. दोन मजल्यांमध्ये हे सेंटर उभारले जाणार आहे. त्यातील पहिल्या मजल्यामध्ये कार्यालयीन प्रशासक, व्हीडिओ कॉन्फरन्सिंग, समुपदेशक, वैद्यकीय सल्लागार या प्रत्येकांसाठी एक विशेष खोली, शिवाय पाच बेड असलेली वेगळी खोली, पँट्री रूम, दोन शौचालये यांची बांधणी केली जाणार आहे, तर दुसऱ्या मजल्यावरदेखील राहण्याची सुविधा, शौचालये, पँट्री रूम असणार आहे.

जागेचा प्रश्न सुटेपर्यंत ‘वात्सल्य’च सेंटर

वन स्टॉप सेंटरसाठी संपूर्ण निधी केंद्राच्या निर्भया फंडमधून दिला जाणार आहे. या सेंटरसाठी सुमारे चौदाशे स्क्वेअर फूट इतकी जागा अपेक्षित आहे. ही जागा सिव्हिल हॉस्पिटलपासून जवळ असावी, हा निकषदेखील या सेंटरसाठी ठेवण्यात आला आहे. यानुसार नासर्डी पुलाजवळील शासकीय अनुरक्षणगृहाच्या मोकळ्या जागेचा प्रस्ताव केंद्र सरकारला जुलैमध्ये सादर करण्यात आला असून, या आठवड्यात त्यावर निर्णय होण्याची शक्यता जिल्हा महिला व वालविकास येथील अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. ही जागा निश्चित झाल्यास कायमस्वरूपी वन स्टॉप सेंटर येथे उभारले जाईल. मात्र, हे बांधकाम व सर्व सोयीसुविधा पूर्ण होण्यापर्यंत एक ते दीड वर्षांचा कालावधी लोटणार असून, तोपर्यंत ‘वात्सल्य महिला वसतिगृह’ हेच सेंटर असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवमंदिरांत भाविकांची गर्दी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

‘हर हर भोले’, ‘ओम नमः शिवाय’ अशा मंत्रघोषात भाविकांनी दुसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्त पंचवटी परिसरातील शिवमंदिरांत दर्शनासाठी गर्दी केली होती. कपालेश्वर महादेव मंदिरासह सर्वच मंदिरांत भाविकांनी पूजा, जलाभिषेक, दुग्धाभिषेक केला. मंदिर परिसरात विविध पूजा आणि धार्मिक विधी करण्यात येत होते.

तपोवनातील जनार्दन स्वामी आश्रमात श्रावण महिन्यात जपानुष्ठान यंदाही सालाबादाप्रमाणे सुरू झाले आहे. येथील शर्वायेश्वर महादेव मंदिरात माधवगिरी महाराज, संतोषगिरी महाराज यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. दिवसभर भाविकांची पूजा आणि दर्शनासाठी गर्दी होती. पेठनाका येथील कैलासमठात नर्मदेश्वर उत्सव सुरू आहे. तो बघण्यासाठी आणि तेथे दर्शन घेण्यासाठी भाविक आले होते. नांदूरपूल येथील नीलकंठेश्वर, तपोवनातील महामृत्यूंजय महादेव मंदिर आदी मंदिरांतही भाविकांची गर्दी होती. मंदिर परिसराच्या आवारात बेल, फूल, पूजा साहित्य, तीळ, दूध आदींची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनी दुकाने थाटली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजी विक्रेत्यांचे अतिक्रमण काढले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडकोतील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असतानाच याकडे महापालिका लक्ष देत नसल्याचा आरोप नगरसेवकांसह स्थानिक नागरिक करीत होते. सोमवारी (दि. ३१) महापालिकेच्या नवीन नाशिक विभागीय कार्यालयाच्यावतीने त्रिमूर्ती चौक परिसरात रस्त्यांवर भाजी विक्री करणाऱ्यांचे अतिक्रमण काढण्यात आले.

सिडकोत अतिक्रमणाचा मुद्दा हा दिवसेंदिवस वाढतच असल्याने परिसरातील नागरिकांनी अतिक्रमणाबरोबरच रस्त्यांच्या कडेला भाजी किंवा अन्य विक्रीसाठी बसणाऱ्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी केल्या होत्या. याचबरोबर लोकप्रतिनिधींनी अतिक्रमणाच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या. यानंतर विभागीय अधिकारी डॉ. सुनीता कुमावत यांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमूर्ती चौक भागात अतिक्रमण हटविण्याची मोहीम हाती घेण्यात आली.

लवकरच जुन्या सिडकोतील शिवाजी चौकातदेखील अतिक्रमण मोहीम राबवण्यात येणार आहे. सिडकोतील अतिक्रमित भाजी विक्रेत्यांवर पालिकेने कारवाई केली असली तरी भाजी विक्रेत्यांचा प्रश्न सोडविण्याकडे मनपाचे लक्ष नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्रिमूर्ती चौकात राबविण्यात आलेल्या अतिक्रमण मोहिमेप्रमाणे सिडकोतील सर्वच भाजी बाजारांलगत ही मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मनपा सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक गजबजले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे दुसरा श्रावण सोमवार पर्वकाल साधण्यासाठी शिवभक्तांनी गर्दी केली होती. पावसाने उसंत दिल्याने भाविकांचा उत्साह दुणावलेला दिसून आला. रविवारी रात्रीपासूनच ब्रह्मगिरी प्रदक्षिणेसाठी भाविकांनी कुशावर्तावर गर्दी केली. पहाटे स्नान करून प्रदक्षिणेस सुरुवात केली. निवांत पहुडलेल्या ब्रह्मगिरीभोवती भाविकांनी ‘जय भोले’चा गजर करताच परिसरातील एक निराळेच चैतन्य पसरले होते.

भगवान त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी पूर्वदरवाजा दर्शनबारीत सोमवारी गर्दी उसळली होती. देणगी दर्शन रांगेतही भाविकांना तासभर प्रतिक्षा करावी लागली. त्र्यंबक नगरीतील इतर शिवमंदिरांमध्येही दर्शनासाठी स्थानिकांसह बाहेरगावचे भाविक दिसून येत होते. दुपारी सोमवारच्या पालखीस भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. गत काही दिवसांत होत असलेला पाऊस आणि त्यामुळे पूर परिस्थिती निर्माण होते की काय, अशी सोशल मीडियावर झालेल्या चर्चेमुळ गर्दीवर काहीसा परिणाम दिसून आला. त्र्यंबकेश्वर परिसरात उत्साहपूर्ण वातावरण आहे.

भाविक अंधारात

जिल्हाधिकारी कार्यालयासह स्थानिक प्रशासन श्रावण सोमवार निम‌ित्त नियोजनाचे ढोलताशे वाजव‌ित असतांना सोमवारच्या पूर्वसंधेला निम्मे शहर अंधारात होते. त्यामुळे प्र‌दक्षिणेसाठी आलेल्या भाविकांसह स्थानिकांची खूप हाल झाले. श्रावण महिन्यात त्र्यंबमध्ये दरवर्षी लाखो भाविक दर्शनासाठी, ब्रह्मगिरी फेरीसाठी येतात. यावर्षी परिसर पालसामुळे खुलला असल्याने गर्दीत वाढ झालेली आहे. रविवारीदेखील प्रदक्षिणार्थींनी शहरात हजेरी लावली. शहरात भाविक आलेले असताना नगरपालिका याबाबत बेदखल असल्याचेच रविवारी दिसून आले. वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत असूनही पथदिव्यांची दुरस्तीबाबत अंधारच राहीला आहे. शहरातील पथदीप आणि हायमास्ट आदी इलेक्ट्रीक यंत्रणा देखभाल दुरुस्ती ठेकेदारीने दिलेली आहे. त्यासाठी महिन्याला अडीच लाख रुपये खर्च करण्यात येतो. मात्र शहरातील अंधाराचे साम्राज्य दूर झालेले नाही. शहरात पथदीप यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. शहरात ठिकठिकाणी विद्युतप्रवाह उतरत असल्यामुळे सायंकाळी दुरुस्तीसाठी कोणीही पुढे येत नाही.

मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे यांना त्र्यंबक नगरपालिकेच्या व्यतिरिक्त कार्यभार देण्यात आलेले आहेत. त्र्यंबकेश्वर देवस्थान ट्रस्ट, संत निवृत्त‌िनाथ देवस्थान ट्रस्ट, महिन्याभरापासून पेठ नगर पालिका अतिरिक्त कार्यभार त्याच बरोबर नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठका आणि मुंबई येथे असलेले कार्यलयीन कामकाज यामुळे त्या व्यस्त असतात. परिणामी त्र्यंबक नगरपरिषदेच्या कामकाजात दिरंगाई होते. त्यामुळे केरूरे यांच्यावर टाकलेली अतिरिक्त जबाबदारी कमी करावी, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एमईएस ठेकेदारांचे काम बंद

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळालीच्या एमईएसमार्फत (मिलिटरी इंजिनीअरिंग सर्व्हिसेस) लष्करी विभागात ठेकेदारी पद्धतीने कामे करणाऱ्या एमईएस बिल्डर्स असोसिएशनच्या कंत्राटदारांनी आपल्यासह कामगारांना प्रवेशपत्र देण्यात येत नसल्याने काम बंद आंदोलन पुकारले आहे.

येथील एमईएस कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर असोसिएशनचे दक्षिण सदर्न कमांडचे केंद्रीय उपाध्यक्ष दीपक बलकवडे यांच्यासह योगेश चांदवडकर, अनिल बालाणी, चेतन देव, जी. डी. बजाज, प्रमोद अहिरे, समीर पटणी, मिलिंद उपासनी, सोनू सचदेव, राहुल सचदेव, राहुल चौधरी, विनोद सिंग, संजय पोरजे, मंगेश निसाळ, संजय बलकवडे आदी ठेकेदारांनी काम बंद आंदोलनात सहभाग नोंदविला. या प्रसंगी काम बंद आंदोलनाची माहिती देताना बलकवडे यांनी सांगितले की, प्रत्येक ठेकेदाराकडे सुपरवायझर्ससह अनेक कामगार असतात. अशा ठेकेदारांना तीन महिने, सहा महिने व वर्षाची कामे असतात. स्टेशन मुख्यालयाने आता लष्करी विभागात प्रवेशपत्र देण्याचे धोरण अतिशय कडक केले आहे. त्यास असोसिएशनचा विरोध नाही. मात्र, आमच्या कामगारांना विविध विभागात कामावर जाण्यासाठी आम्हास देण्यात येणारे प्रवेशपत्र त्वरित मिळत नाही.

व्हेरिफिकेशनमध्ये जातो वेळ

प्रत्येक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशन आणणे व लष्करी प्रवेशपत्र घेणे यातच अधिक वेळ जातो,परिणामी कामे निर्धारीत वेळेत होत नाही. त्यामुळे विलंब नोटीस दिली जाते. लष्करी अधिकारी प्रवेशपत्र दाखवूनही अरेरावी करून वेळ वाया घालवतात. याबाबत एमईएसचे प्रमुख जरासंध इंजिनीअर यांना १२ व २१ जुलै रोजी निवेदन दिले होते. तरी ठोस कारवाई झाली नाही. सुरक्षेच्या कारणाने प्रवेशपत्र न दिल्याने नुकसान होत आहे. याबाबत लष्करी प्रशासनाने त्वरित प्रवेशपत्राबाबत योग्य तो निर्णय घेत रखडलेल्या कामांना चालना द्यावी, अशी मागणी असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकला एक सुवर्ण, दोन रौप्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मलकापूर, बुलढाणा येथे पार पडलेल्या १९ व्या सबज्यनिअर राज्य तलवारबाजी अजिंक्यपद स्पर्धेत नाशिकच्या मुलींचा संघ उपविजयी ठरला, तर मुलांचा संघ तृतीय आला.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील ३० जिल्ह्यांचे संघ सहभागी झाले होते. नाशिकच्या तलवारबाजांनी घवघवीत यश संपादन केले.
इपी वैयक्तिकमध्ये कार्तिक शर्मा याने सुवर्णपदक पटकावले. फॉइल वैयक्तिक प्रकारात स्वरूप निकम याने कांस्य पदक मिळवले तर सॅबर वैयक्तिकमध्ये श्राव्या आहेर, हेझल संघवी यांनी कांस्यपदक पटकावले.
फॉईल सांघ‌िक प्रकारात श्राव्या आहेर, अर्शिती घुगे, दर्शना निकम या मुलींनी रौप्य पदक घेतले. सॅबर सांघिक प्रकारात हेझल संघवी, सन्वी सुवर्णा, दर्शना निकम या मुलींनीही रौप्य पदकाची कमाई केली. इपी सांघिक प्रकारात हेझल संघवी, सन्वी सुवर्णा, श्राव्या
आहेर यांनी कांस्य पदक पटकावले.
स्पर्धेचा अंतिम निकाल
मुले : प्रथम औरंगाबाद, द्वितीय नागपूर, तृतीय नाशिक
मुली : प्रथम मुंबई, द्वितीय नाशिक, तृतीय लातूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरीवाल्यांची वज्रमूठ

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातील रस्ते व बाजारपेठांतील हॉकर्सची संख्या कमी करण्यासह ‘नो हॉकर्स झोन’ तयार करण्याची प्रक्रिया पालिकेने सुरू केली आहे. हॉकर्स झोनमध्ये विक्रेत्यांना स्थलांतरीत करण्याची कारवाई एकतर्फी सुरू केल्याच्या निषेधार्थ हॉकर्स, टपरीधारकांच्या कृती समितीच्या वतीने मंगळवारी भव्य मोर्चा काढून अंमलबजावणीला विरोध करण्यात आला.
केंद्र सरकारच्या मार्गदर्शक धोरणांनुसार महापालिकेने राष्ट्रीय फेरीवाला धोरणाअंतर्गत हॉकर्स व ‘नो हॉकर्स’ धोरणांची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यासाठी जवळपास साडेनऊ हजार हॉकर्सची नोंद करण्यात आली आहे. परंतु, मुख्य बाजारपेठ आणि प्रमुख रस्त्यांवरून हटण्यास हॉकर्सचा तीव्र विरोध आहे. मनपाने तयार केलेले हॉकर्स झोन हे वर्दळीच्या ठिकाणी नसल्याचे सांगत, त्याला हॉकर्स व टपरीधारकांच्या कृती समितीने विरोध केला आहे. गेल्या पंधरवाड्यात लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत काही पर्याय सुचविण्यात आले होते. आयुक्तांनी त्याकडे दुर्लक्ष करत, हॉकर्स झोनची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्याला हॉकर्सनी तीव्र आक्षेप घेत, अंमलबजावणी थांबवण्याची मागणी केली आहे.
मनपाने हॉकर्स झोनबाबत एकतर्फी भूमिका घेतल्याचा आरोप शांताराम चव्हाण, भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागूल, शिवाजी भोर या कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कोणत्याही हॉकर्सला बळजबरी हटवू नये, अशी मागणी केली. उर्वरित नोंदणीवर तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली. यावेळी जवळपास दोन तास कृती समितीच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘एनए’ची प्रक्रिया गतिमान करणार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जम‌िनीकरीता एन.ए.ची (नॉन अॅग्रिकल्चर) परवानगी घेण्यासाठी नागरिकांना आता सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजव‌िण्याची गरज नाही. एन.ए.साठी अर्ज प्राप्त होताच संबंधितांना सात दिवसांतच परवानगी देण्याचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहेत. त्यासाठी ३१ मार्च २०१८ पर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे.

शेतजमीन अधिनियम कायद्यात राज्य सरकारने बदल केले असून, त्यांतर्गत एन.ए.साठी लागणाऱ्या परवानग्यांची प्रणाली अधिक सोपी करण्यात आली आहे. त्यानुसार विशिष्ट मर्यादा घालण्यात आली असून, नागरिकांना निवासी, औद्योगिक, तसेच इतर कोणत्याही वापरासाठी अकृषक परवानगी घेता येणार आहे. त्यासाठी संबंधित नागरिकांना जमीन आकाराच्या कमीत कमी वीस ते जास्तीत जास्त चाळीस पट नजराणा रक्कम भरावी लागणार आहे. महापालिका क्षेत्रात जिल्हाधिकारी, तर ग्रामीण भागात प्रांताधिकाऱ्यांकडे एन.ए. परवानगीसाठी अर्ज करावा लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जिल्हा प्रशासनाने यापूर्वीच सुमोटो पद्धतीने अकृषक जमीन करण्यासाठी २७० नागरिकांना नोटिसा पाठविल्या आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत कुळाने जमीन खरेदी करून दहा वर्षे पूर्ण झालेल्या २८ हजार ३९ गटांसाठी चाळीस पट नजराणा रक्कम भरून घेऊन सातबारा अकृषकचे शेरे देण्यात आले आहेत. शेतजमिनीवर घरे अथवा अन्य बांधकाम केले असल्यास व त्यासाठी महापालिका अथवा सिटी सर्व्हे यापैकी एका विभागाची परवानगी घेतली असल्यास त्यांना जमीन आकाराच्या वीस पट नजराणा रक्कम भरावी लागणार आहे. ज्यांनी एकही परवानगी घेतली नसेल त्यांना तलाठ्यांकडे ४० पट रक्कम भरून जमीन अकृषक परवानगी घेता येणार आहे. अर्ज केल्यानंतर नियमानुसार ३० दिवसांच्या आत ही अकृषक परवानगी मिळू शकेल. मात्र, ती लवकरात लवकर दिली जावी, असा जिल्हा प्रशासनाचा प्रयत्न आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डाळिंब @ ७० रुपये

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसंवत

बाजारभाव तेजीत असल्याने येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत डाळिंबाची आवक वाढत आहे. बाजार आवारात दररोज सात ते आठ हजार क्रेट डाळिंबाची आवक होत आहे. वीस किलोच्या क्रेटसाठी साधारण १४०० रुपयांचा भाव मिळत आहे.

फळ बाजारात आंब्याचा हंगाम जवळजवळ आटोपल्याने डाळिंबाला चांगलीच मागणी वाढत आहे. येथील बाजार सम‌ितीतून उत्तर प्रदेश, दिल्ली, मध्य प्रदेश, बिहार, हरियाणा, मुंबर्इ आदी ठिकाणी डाळिंब विक्रीसाठी रवाना होत आहेत. गत काही वर्षांत नाशिक जिल्ह्यात डाळिंब लागवडीत प्रंचड वाढ झाली आहे. विशेषत: निफाड तालुक्यातील शेतकऱ्यांनी डाळिंब पीकावर आपल लक्ष केंद्रीत केले आहे. मुबलक पाणी, स्वच्छ हवामान, सुपिक जमीन, उत्पादन खर्च कमी आणि द्राक्ष बागेच्या तुलनेत कमी त्रास व कमी परिश्रम असल्या कारणाने डाळिंबाच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. पिंपळगाव बाजार सम‌ितीत निफाड सह येवला, मनमाड, दिंडोरी, संगमनेर आदी परिसरातून डाळिंब विक्रीसाठी येत आहे.
पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार सम‌ितीत डाळिंब खरेदी विक्रीसाठी सेल हॉल सह सर्व सोयी उपलब्ध करून दिल्या आहेत. शिवाय बाजार आवारावर डाळिंब खरेदीसाठी व्यापाऱ्यांची मोठी संख्या असल्याने खरेदीसाठी स्पर्धा निर्माण होऊन शेतकऱ्यांना चांगला भाव मिळत आहे.

- दिलीप बनकर, सभापती, पिंपळगाव बाजार सम‌िती

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औषध खरेदीत पळवाट

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वैद्यकीय विभागाने ठेकेदाराच्या भल्यासाठी सुरू केलेल्या सव्वाकोटी रुपयांच्या औषध खरेदीवर स्थायी समितीने गोलमोल धोरण अवलंबून आयुक्तांंच्या अधिकारात औषध खरेदी करण्याचे आदेश देऊन पळवाट शोधली आहे. अत्यावश्यक औषधे आयुक्तांच्या अधिकारात खरेदी करावीत आणि उर्वरित औषधांच्या खरेदीसाठी निविदा काढावी, असे फर्मान सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी काढले आहे.

ही औषधे जुन्याच ठेकेदाराकडून तातडीची बाब म्हणून खरेदी केली जाणार असल्याचे माहिती असतानाही समितीने खरेदीचा चेंडू प्रशासनाकडे ढकलला आहे. सदस्यांनी ठेकेदार आणि अधिकारी मिलिभगत करून महापालिकेला चुना लावत असल्याचा आरोपही केला आहे. वैद्यकीय विभागाच्या वतीने स्थायी समितीवर एक कोटी २५ लाखांच्या औषध खरेदीचे पाच प्रस्ताव सादर केले होते. अत्यावश्यक बाब म्हणून जुन्या ठेकेदाराकडून जुन्याच दराने ही खरेदी केली जाणार आहे. त्यासाठी आचारसंहितेचे कारण देण्यात आले आहे. परंतु, या खरेदीवर सदस्यांनी तीव्र आक्षेप घेतला. सूर्यकांत लवटे यांनी सर्व विषय एकत्र का केले नाहीत, असा जाब विचारत ही खरेदी शासनमान्य कंपन्यांकडून का केली जात नाही, असा सवाल केला. जगदीश पाटील यांनी औषधांसाठी सहा महिने अगोदर खरेदी करावी, असे आयुक्तांचे आदेश असतानाही त्यांचा आदेश धाब्यावर का बसविला, असा सवाल केला. आचारसंहितेच्या नावाखाली ठेकेदार आणि अधिकारी महापालिकेची दिशाभूल करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. विजय डेकाटे यांनी स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न केला. परंतु, सदस्यांनी त्यांचे स्पष्टीकरण फेटाळून लावले.

औषध खरेदीबाबत व खरेदी प्रक्रियेबाबत सदस्यांचे तीव्र आक्षेप असतानाही स्थायी समिती सभापतींनी केवळ अर्जंट औषधे ही आयुक्तांच्या अधिकारात खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत. उर्वरित औषधे निविदा मागवून खरेदीचे आदेश दिले. परंतु, सर्वच औषधांच्या खरेदीचे प्रस्ताव हे २५ लाखांच्या आत असून, अत्यावश्यक आहेत. त्यामुळे त्यांची खरेदी आवश्यक असतानाही सभापतींनी गोलमाेल भूमिका घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. स्थायीकडून या सर्व प्रक्रियेवरच आक्षेप घेणे आवश्यक असताना पळवाट शोधण्यात आल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

--

तारांगणला हिरवा कंदील

यशवंतराव चव्हाण तारांगण हे पीपीपी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. परंतु, अद्याप त्याची कार्यवाही सुरू न झाल्याने सद्यःस्थितीत मुंबईस्थित मे. इन्फोव्हिजन टेक्नोलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीला वर्षभरासाठी ते काम दिले जाणार आहे. त्यासाठी १९ लाख ४० हजारांच्या खर्चाला मंजुरी देण्यासाठीचा प्रस्ताव स्थायी समितीवर ठेवण्यात आला आहे. त्याला स्थायी समितीने मंजुरी दिली असून, पीपीपीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले आहेत. त्यामुळे तारांगण प्रकल्प आता खासगी ठेकेदाराकडे जाणार आहे.

--

पेस्ट कंट्रोलचा अहवाल द्या

स्थायी समितीच्या बैठकीत मलेरिया विभागाच्या कारभारावर आक्षेप घेण्यात आले आहेत. पेस्ट कंट्रोल ठेकेदाराकडून शहरात फवारणी केली जात नसल्याने डासांचे साम्राज्य वाढले आहे. साथींचे विकार आणि डेंग्यूचे डास वाढल्याचा आरोप सदस्यांनी केला. धूरफवारणी केली जात नसल्यानेच डास वाढून साथींचे विकार वाढत असल्याचा आरोप मुशीर सय्यद यांनी केला. ठेकेदार आणि अधिकारी एकत्र येऊन महापालिकेची लूट करीत असल्याचा आरोप सूर्यकांत लवटे यांनी केला. पेस्ट कंट्रोलबाबत नागरिकांच्या जिवाशी खेळ खळला जात असल्याचा आरोपही त्यांनी केली. त्यावर सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी स्थायीच्या पुढील बैठकीत पेस्ट कंट्रोलबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अकरावीचे साडेबारा हजार प्रवेश पूर्ण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मंगळवारी तिसऱ्या फेरीअखेर १२ हजार ३११ विद्यार्थ्यांनी अकरावीच्या वर्गासाठी प्रवेश निश्चित केले. आता उर्वरित विद्यार्थ्यांसाठी चौथी गुणवत्ता यादी ६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार आहे. या यादीतील विद्यार्थ्यांना ७ आणि ८ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे.
आतापर्यंत अकरावीसाठी पार पडलेल्या तीनही फेऱ्यांमध्ये १५ हजार ११८ विद्यार्थ्यांना प्रवेशाची संधी देण्यात आली. यामध्ये १२ हजार ३११ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. यात तांत्रिक चुकांमुळे ७३ प्रवेश नाकारण्यात आले, तर कोट्यांच्या सवलतीत उपलब्ध एकूण ७ हजार ५९० जागांवर २७७० विद्यार्थ्यांनी
प्रवेश घेतला आहे. तीनही फेऱ्यांमध्ये २७१२ विद्यार्थ्यांना कला शाखेसाठी संधी देण्यात आली. पैकी २३६४ विद्यार्थ्यांनी यात प्रवेश घेतला. कॉमर्स शाखेत ५३७१ पैकी ४३५७ विद्यार्थ्यांनी, सायन्स शाखेसाठी ६५९६ पैकी ५१७२ विद्यार्थ्यांनी, तर एमसीव्हीसी शाखेत ४३९ पैकी ४१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला.
विविध कोट्यांतून ७५९० जागा उपलब्ध होत्या. यापैकी कोट्यातील जागांवर आतापर्यंत २७७० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. मॅनेजमेंट कोट्यातून ४०५, इनहाऊस १९७६, मायनॉरिटीतून ३७९, टेक्न‌िकल बायफोकल किंवा एमसीव्हीसी कोट्यातून १० असे २७७० प्रवेश झाले.

प्रवेशाची संधी

ज्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन प्रवेश प्रक्र‌ियेचा भाग १ आणि २ अद्याप भरलेला नाही, त्यांना ३ आणि ४ ऑगस्ट रोजी प्रवेशाची माहितीपुस्तिका कॉलेज रोडवरील बीवायके कॉलेज, नाशिकरोडचे बिटको कॉलेज आणि औरंगाबाद रोड परिसरातील पंचवटी कॉलेज येथे उपलब्ध होईल. दरम्यान, चौथी मेरीट लिस्ट ६ ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होणार असून, या यादीतील विद्यार्थ्यांना ७ आणि ८ ऑगस्ट रोजी प्रवेश घेता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकमध्ये लवकरच गाडगीळ करंडक एकांकिका स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्रतिभावंत व होतकरू नाट्यकलावंतांना आपली कला दाखवण्यासाठी हक्काचा प्लॅटफॉर्म मिळावा व मुख्य प्रवाहाशी त्यांना जोडण्यास मदत व्हावी या हेतूने दाजीकाका गाडगीळ करंडक राज्यस्तरीय खुली एकांकिका स्पर्धा होणार आहे. करंडकाचे हे दुसरे वर्ष असून, गेल्या वर्षी औरंगाबादच्या नाट्यवाडाच्या ‘पाझर’ या एकांकिकेने विजेतेपद पटकावले होते.

यंदाची स्पर्धा अधिक भव्य व रंगतदार असणार आहे. कारण स्पर्धेत मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील एकांकिकांना सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. प्रथम पारितोषिक रोख १ लाख रुपये व सोन्याचा मुलामा असलेला रत्नजडित मानाचा फिरता रजत करंडक, द्वितीय पारितोषिक रोख ७५,००० हजार रुपये, तसेच तृतीय पारितोषिक रोख ५१००० हजार रुपये असे आहे. स्पर्धेसंबंधी अधिक माहितीसाठी शार्दूल मोहिते (मोबाइल ः ९०९६३९६१९६) व स्वप्नील कोरे (मोबाइल ः ९८२२३७३४६६) यांच्याशी संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कालिदास कलामंदिरही आता पीपीपी तत्त्वावर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने उभारलेल्या बड्या प्रकल्पांबाबत आता बीओटी आणि पीपीपी तत्त्वाचे धोरण स्वीकारले असून, त्याबाबतची पावले उचलली आहेत. गेल्याच महासभेत मोठ्या प्रकल्पाबाबत सल्लागार नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे. आता त्यापुढचे पाऊल उचलले असून, महाकवी कालिदास कलामंदिर ही पीपीपी (पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप) तत्त्वावर चालविण्यास देण्याची तयारी सुरू केली आहे. दादासाहेब फाळके स्मारक आणि तारांगणही बीओटी तत्त्वावर दिले जाणार असून, डिसेंबरअखेरपर्यंत ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे पालिकेवर आर्थिक बोजा काही प्रमाणात हलका होणार असल्याचा दावा प्रशासनाने केला आहे.

महापालिकेच्या मालकीचे असलेले दादासाहेब फाळके स्मारक, यशवंतराव चव्हाण तारांगण, यशवंत मंडई, वसंत कानिटकर उद्यानासारखे प्रकल्प पालिकेला डोईजड झाले आहेत. या प्रकल्पांमधून उत्पन्न मिळण्याऐवजी त्यांच्यावर खर्च अधिक होत आहे. त्यामुळे हे प्रकल्प बीओटी व पीपीपी तत्त्वावर देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सल्लागार नियुक्त केले जाणार असून, गेल्या महासभेत त्याचा निर्णयही झाला आहे. त्याची कार्यवाही सुरू आहे. दादासाहेब फाळके आणि तारांगणची कारवाई अंतिम टप्प्यात आहे. सल्लागार नियुक्तीची प्रक्रियाही अंतिम टप्प्यात असून, सल्लागाराच्या अहवालावर या दोन प्रकल्पांचे भविष्य अवलंबून आहे. यासोबतच आता महाकवी कालिदास कलामंदिरही पीपीपी तत्त्वावर चालविण्यास देण्याचा विचार सुरू केला आहे.

खर्चाचा भार कमी करण्याचा प्रयत्न

सध्या कालिदास नाट्यगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू असून, वर्षभरानंतर ते कार्यान्वित होणार आहे. कालिदास कलामंदिरातून पालिकेला अधिकचे उत्पन्न अपेक्षित आहे. त्यामुळे एखाद्या कंपनीवर त्याची जबाबदारी सोपवून पालिका स्वतःची सुटका करून घेण्याच्या तयारीत आहे. सध्या पालिकेला विविध प्रकल्पांच्या देखभाल दुरुस्तीवरच कोट्यवधीचा खर्च करावा लागत आहे. त्यामुळे भांडवली आणि विकासकामांसाठी निधी उपलब्ध होत नसल्याचे चित्र असल्याने या प्रकल्पांचा पालिकेवरील भार कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिक्षक शिक्षकेतर संघटनाध्यक्षपदी शिंदे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य शिक्षक शिक्षकेतर विकास संघटनेच्या नाशिक जिल्हाध्यक्षपदी गंगापूर येथील दे. ना. नाटील विद्यालयाचे हिरामण शिंदे यांची निवड करण्यात आली.

सरचिटणीसपदी तळेगाव अंजनेरीच्या विद्या प्रशालाचे सखाराम जाधव, तर कार्याध्यक्षपदी सामुंडी आदर्श विद्यालयाचे अनिल रौंदळ यांची निवड झाली आहे. संघटनेची सहविचार सभा राज्य अध्यक्ष प्रा. पुरुषोत्तम रकिबे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच झाली. यावेळी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. उपाध्यक्षपदी उदय देवनपल्ली, प्रकाश चव्हाण, के. पी. शिंदे, दत्तू भोये, अरुण बोडके, एस. एन. पाटील यांची निवड करण्यात आली. महानगरप्रमुखपदी एकनाथ पाटील, उपाध्यक्षपदी विठोबा लभडे, अतुल वाडेकर, सरचिटणीसपदी अविनाश हिरे, खजिनदारपदी केशव सूर्यवंशी, कार्यालय प्रमुखपदी बी. के. देसाई, संघटन प्रमुखपदी विजय बडे आदींची निवड करण्यात आली. या वेळी राज्य सरचिटणीस दशरथ जारस यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


विभागीय आयुक्तालयात नाडगौडांचे उपोषण

$
0
0

म. टा. वृत्तेसवा, सिन्नर फाटा

महाराष्ट्र राज्य खाजगी शाळा शिक्षकेत्तर संघटनेच्या वतीने प्रलंब‌ित मागण्यांसाठी मंगळवारपासून नाशिक विभागीय आयुक्तालय येथे संघटनेचे राज्य अध्यक्ष सतीष नाडगौडा यांनी उपोषणास सुरुवात केली आहे. याप्रसंगी संघटनेने आपल्या मागण्याचे निवेदन विभागीय आयुक्त महेश झगडे यांना दिले.

विना अनुदानित शाळांतील सेवा वरिष्ठ वेतन श्रेणीसाठी ग्राह्य धरणे, सुधारित आकृतीबंध रद्द करून माध्यमिक शाळा संहिता नियमावली लागू करण्यात यावी, बालकांना मोफत व हक्काचे शिक्षण अधिनियम २००९ नुसार तसेच संगणकिय प्रणालीमुळे, ऑनलाइन कार्यपद्धतीच्या वापराने शिक्षकेत्तरांच्या कामाचे प्रत्यक्ष शास्त्रीय मुल्यमापन करण्याकरिता त्या क्षेत्रातील तज्ज्ञांची समिती नियुक्त करण्यात यावी, केंद्र व राज्य सरकारी कर्मचाऱ्याना मिळत असलेल्या त्रिस्तरीय वेतन श्रेणीनुसार शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना २४ वर्षांच्या सेवेनंतर कालबद्ध पदोन्नती देण्यात यावी आदी मागण्यांसाठी हे उपोषण सुरू करण्यात आले आहे. मंगळवारी दुपारी विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी उपोषणकर्ते सतीष नाडगौडा यांची भेट घेतली. प्रलंबित मागण्यासाठी राज्यभर जिल्हाधिकारी व शिक्षणाधिकारी कार्यालयांपुढे एक दिवसाचे उपोषणही करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेनकोट खरेदीचे वरातीमागून घोडे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
अर्धा पावसाळा संपल्यानंतर महापालिकेच्या चार हजार कर्मचाऱ्यांना रेनकोट खरेदीच्या प्रस्तावाला स्थायी समितीने डोळेझाक करत मंजुरी दिली आहे. स्थायीचा ठराव आणि प्रशासकीय कार्यवाहीला अजून मह‌िना लागणार असल्याने पावसाळा संपल्यानंतरच आता कर्मचाऱ्यांच्या हातात रेनकोट मिळणार आहे. त्यामुळे केवळ ठेकेदाराला पोसण्यासाठीच ही रेनकोट खरेदी केली जाते की काय, असा संशय निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे आदिवासी विभागात वादग्रस्त ठरलेल्या ठेकेदाराकडूनच ही खरेदी केली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
सभापती शिवाजी गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक झाली. या बैठकीत निम्मा पावसाळा संपल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून सुमारे चार हजार स्त्री व पुरुष कर्मचाऱ्यांना रेनकोट खरेदीचा प्रस्ताव मंगळवारी स्थायीत सादर करण्यात आला. महापालिकेने ८३२ महिला तर ३४०७ पुरुष कर्मचाऱ्यांसाठी रेनकोट खरेदीसाठी निविदाप्रक्रिया राबविली होती. हा प्रस्ताव अर्धा पावसाळा संपल्यानंतर मंजुरीसाठी स्थायीवर ठेवण्यात आला. त्यासाठी तब्बल ४० लाख रुपये ठेकेदाराला मोजले जाणार आहेत. मंगळवारच्या स्थायीच्या बैठकीत सदस्य आणि सभापती उश‌िराच्या खरेदीबाबत जाब विचारतील अशी अपेक्षा होती. परंतु, दोन मिन‌िटांत व लवकर खरेदी करण्याचे आदेश देत, सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी प्रस्तावाला मंजुरी दिली. विशेष म्हणजे किरकोळ विषयांवरही भाषण ठोकणाऱ्या सदस्यांनी या प्रस्तावाला मूक संमती दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जून, जुलै, ऑगस्ट या तीन मह‌िन्यांतच पावसाची तीव्रता असते. त्यामुळे या तीन मह‌िन्यांतच कर्मचाऱ्यांना रेनकोटची आवश्यकता असते. परंतु, आता जून, जुलै हे दोन मह‌िने उलटले आहेत. तर मंजुरीनंतर खरेदी प्रक्रियेला जवळपास एक मह‌िना लागणार आहे. त्यामुळे हे रेनकोट आता सप्टेंबरमध्येच कर्मचाऱ्यांच्या हातात पडणार आहेत. चालू पावसाळ्यात या रेनकोट खरेदीचा कोणताही फायदा होणार नसतानाही, स्थायी समितीने खरेदीला हिरवा कंदील दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. पालिकेच्या तिजोरीत चाळीस लाख जाणार असले तरी, त्याचा तूर्तास फायदा ठेकेदारालाच होणार आहे. त्यामुळे स्थायी समिती पालिकेच्या भल्यासाठी की, ठेकेदाराच्या भल्यासाठी असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मर्याद‌ित कांदा वाहनांचाच लिलाव

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील नामपूर बाजार समितीत कांद्याची भरमसाठ आवक होत आहे. दररोज सुमारे ५०० हून अधिक वाहने लिलांवासाठी येत असल्यामुळे कांदा व्यापाऱ्यांना उत्पादकानां त्याच दिवशी पैसे देणे अवघड होत आहे. त्यामुळे नामपूर बाजार समिती आवारात २५० ट्रॅक्टर व ५० पीकअप इतक्या वाहनचांच लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. हा लिलाव मंगळवारपासून अंमलात आणला आहे. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी व बाजार समिती प्रशासात संघर्ष होण्याची शक्यता बळावली आहे.

गत दोन ते तीन वर्षांनंतर प्रथमच कांद्याने दीड हजाराचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कांदा आवक वाढली आहे. कळवण, देवळा, बागलाण व मालेगाव हे कांदा उत्पादकांचे आगार म्हणून परिचित आहे. सटाणा व नामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती आवारात कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने या पाचही तालुक्यातून कांदा उत्पादक कांदा विक्रीस आणतात. त्यात नामपूर बाजार समितीत कांदा व्यापारी कांदा खरेदीनंतर तत्काळ कांदा उत्पादकांना शासनाच्या धोरणानुसार सेम डे चेकद्वारे पेमेंट करतात. यामुळे कांदा उत्पादकांना सोयीचे ठरत आहे. त्यात गत आठवड्यापासून कांद्याला चांगला भाव असल्याने कांदा आवक वाढली आहे.

उत्पादकांकडे लक्ष

कांदा विक्रीकरिता येणाऱ्या वाहन चालकांना टोकन देण्यात येवून प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाची आजपासून अंमलबजावणी करण्यात येणार असली तरीही या निर्णयाची कांदा उत्पादकांना पूर्व सूचना दिलेली नाही. यामुळे कांदा उत्पादक या निर्णयावर काय प्रतिक्रिया देतात याकडे लक्ष लागले आहे.


बैठकीत निर्णय

कांद्याचा भाव आणि आवक वाढल्यामुळे शेतकऱ्यांचाही फायदा होत आहे. मात्र त्यांना त्याच दिवशी पैसे देणे व्यापाऱ्यांना अवघड होत आहे. त्यामुळे कांदा विकल्यानंतर पैशांसाठी शेतकऱ्यांना वाट पहायला लागू नये, तसेच त्यांना पुरेसे पैसे मिळावेत यासाठी कांदा व्यापारी व बाजार समिती प्रशासनाची बैठक झाली. नामपूर बाजार समिती आवारात मंगळवार, एक ऑगस्टपासून २५० टॅक्टर व ५० पीकअप वाहने अशा ३०० मर्यादीत वाहनांचा लिलाव करण्याचा धोरणात्मक निर्णय घेण्यात आला आहे.


कांदा उत्पादकांना वेळेवर कांद्याचे पैसे मिळावेत, यासाठी बाजार समिती प्रशासनाने धोरणात्मक निर्णय घेतला आहे. कांदा उत्पादकांच्या हितासाठी हा निर्णय घेतला आहे.

- संतोष गायकवाड,

सचिव, बाजार समिती नामपूर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निसाका’ विक्री होऊ देणार नाही

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

नाशिक जिल्हा बँकेचे १०५ कोटींचे कर्ज व त्यावरील व्याज यामुळे जिल्हा बँकेने जप्त केलेल्या निफाड सहकारी साखर कारखान्याच्या विक्रीच्या प्रस्तावास संचालक मंडळाने मंजुरी दिली आहे. या पार्श्वभूमीवर निफाड सहकारी साखर कारखान्याचे कामगार व सभासद यांनी निफाड बैठक घेऊन या विक्री प्रक्रियेला विरोध करणार असल्याचे जाहीर केले.

ग्रामसमृद्धी फाऊंडेशनच्या पुढाकारातून निफाड येथे निफाड नागरी पतसंस्थेच्या सभागृहात बैठक बोलावण्यात आली होती. कारखाना सुरू करण्यासंदर्भात १३ एप्रिल रोजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीनंतर करण्यात केलेल्या प्रयत्नांची माहिती योगेश पाटील यांनी दिली. देशमुख यांनी निसाका भाडेतत्वावर चालव‌िण्यासाठी देण्याचे सूतोवाच केले होते. त्यासाठी निफाड येथे ग्रामसमृद्धीच्या माध्यमातून कमिटी तयार केली होती. या काम‌िटीने वेळोवेळी सहकार मंत्र्यांची भेट घेऊन मार्गदर्शन घेतले होते. त्यानुसार सहकार मंत्र्यांच्या आदेशाने जिल्हा बँकेने मिटकॉन कन्सल्टंसीकडून कारखान्याच्या जंगम मालमत्तेविषयी अहवाल मागितला होता. त्या अहवालाचा आधार घेत जिल्हा बँकेने न‌िसाका विक्री करण्यासाठी प्रस्तावास मान्यता दिली आहे. या निर्णयामुळे सभासद व कामगार संतापले आहेत.

यावेळी निसाका विक्री होऊ नये या बाबतच्या सूचना निसाका कामगार युनियनचे संपतराव कडलग, बी. जी. पाटील, रतन वडघुले, बबनराव सानप, शिवाजी ढेपले, प्रमोद गडाख, भाऊसाहेब बनकर, माधव तासकर,चिंतामण सोनवणे, सुनील कुटे, जगन कुटे आदींनी मांडल्या. प्रमोद गडाख यांनी राज्यातील काही थकबाकीदार व अवसायनातील असलेल्या साखर कारखाने व त्यांना सुरू करण्यासाठी सहकार खात्याने केलेली मदत याची माहिती देऊन हे आपल्याकडेही शक्य आहे असे सांगितले.

जिल्हा बँकेने घेतलेल्या निसाका विक्री निर्णयाविरोधात जिल्हा बँकेचे निफाड तालुक्यातील संचालक यांची भेट घेणे, १५ ऑगस्ट रोजी तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या ग्रामसभेत विक्री व्यवस्थेला विरोध करणारे ठराव करणे, सहकार मंत्र्यांकडे या निर्णयाविरोधात अपील दाखल करणे, कायदेशीर लढाई लढण्यास तयार राहणे आणि या प्रयत्नांना प्रतिसाद न मिळाल्यास मोर्चाचे आयोजन करणे असे ठराव या बैठकीत करण्यात आले.

तालुक्यातील कोणीही कारखाना चालवावा...

कोणत्याही परिस्थितीत कारखाना विक्री होऊ देणार नाही, असा निर्धार बैठकीत करण्यात आला. तसेच यापुढे तालुक्यातील नेते, आजी-माजी पदाधिकारी, सभासद, कामगार यांना सोबत घेऊन निसाकाची विक्रीची प्रक्रिया हाणून पाडण्याचे ठरविण्यात आले. कारखाना भाडेतत्वावर चालवायला देण्यासाठी सहकार मंत्रालायमार्फत जिल्हा बँकेला भाग पाडण्यासाठी सर्वप्रकारचे उपाय व प्रसंगी आंदोलन करण्याचा एकमुखी निर्णय घेण्यात आला. हा कारखाना भाडे तत्त्वावर तालुक्यातील कोणीही चालवण्यास घेतल्यास त्यास मंजुरी आहे, असेही एकमताने ठरवण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लोकमान्य, लोकशाहिरांचे स्फूर्तिदायी स्मरण

$
0
0

टीम मटा, नाशिक

देशाचा स्वातंत्र्यलढ्यात क्रांतीचे स्फुल्लिंग चेतविणारे लोकमान्य टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त, तसेच संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात लोककलेच्या माध्यमातून जान फुंकणारे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांना जयंतीनिमित्त मंगळवारी शहर परिसरात विविध शैक्षणिक, सामाजिक संघटना, राजकीय पक्ष आदींतर्फे अभिवादन करण्यात आले. यावेळी अनेक सामाजिक उपक्रमदेखील राबविण्यात आले.

(संकलन ः डॉ. बाळकृष्ण शेलार, प्रशांत धिवंदे, अभिजित राऊत)

---
सार्वजनिक वाचनालय

नाशिक ः सार्वजनिक वाचनालयातर्फे ज्येष्ठ पत्रकार किरण अग्रवाल आणि शाहीर दत्ताजी वाघ यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. यावेळी अग्रवाल म्हणाले, की राष्ट्रपुरुषांना काही स्वार्थी लोकांनी विशिष्ट जातींमध्ये बंदिस्त केले आहे. सावानाने या राष्ट्रपुरुषांचे काम समाजापुढे प्रभावीपणाने मांडावे आणि त्यांना बंदिस्त जातींमधून मुक्त करावे. वाघ यांनी नाशिकमधील शाहिरांच्या परंपरेचा उल्लेख करून अण्णा भाऊंचे स्मरण केले. प्रा. विलास औरंगाबादकर व किशोर पाठक यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार झाला. सांस्कृतिक कार्य सचिव जयप्रकाश जातेगावकर यांनी सूत्रसंचालन केले. वसंतराव खैरनार यांनी आभार मानले. मधुकर झेंडे, धनंजय धुमाळ, श्रीकांत बेणी, डॉ. धर्माजी बोडके यांची उपस्थिती होती.

--

सावित्रीबाई फुले विद्यामंदिर

नाशिक ः पखालरोडवरील मातोश्री सावित्रीबाई फुले प्राथमिक विद्यामंदिरात प्रतिमापूजन झाले. संस्थेचे खजिनदार दिनेश बच्छाव अध्यक्षस्थानी होते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यासाठी जहाल मतवादाचा पुरस्कार केला, तर साहित्यात लोककला शैलीचे स्वतंत्र भांडार निर्माण करण्याचे काम लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी केल्याचे प्रतिपादन संचालक वसंतराव अहिरे यांनी केले. मोहन माळी यांनी प्रास्ताविक केले. प्रकाश खैरनार यांनी सूत्रसंचालन केले. संगीता महाजन यांनी आभार मानले. विद्या महाजन, वैशाली राजभोज, ज्योती महाले, प्रशांत गवळी, लक्ष्मण काशीद आदींनी संयोजन केले.

--
‘लोकशाहिरांचे साहित्य अभ्यासावे’

--

देवळाली कॅम्प ः लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोककलेच्या माध्यमातून प्रबोधन करीत स्वानुभवातून निर्मिलेले साहित्य आज प्रत्येकाने अभ्यासणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शिवसेनेचे उपनेते तथा माजी मंत्री बबनराव घोलप यांनी केले. लामरोडवरील दस्तगीर बाबा येथील कार्यक्रमात ते बोलत होते. राजू वैरागर, अण्णा भाऊ साठे फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. पी. जी. जाधव, चंद्रकांत गोडसे, विलास धुर्जड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले, अरुण जाधव, पोपटराव जाधव, सुभाष बोराडे, गोकुळ जाधव, किलेश बोराडे, वैभव पाळदे, रवींद्र भदाणे, अशोक गायकवाड आदी उपस्थित होते.

--

अण्णा भाऊ साठे फाउंडेशन

देवळाली कॅम्पमधील जुने बसस्थानक येथे अण्णा भाऊ साठे फाउंडेशनतर्फे रिपाइं नेते विश्वनाथ काळे व राजू वैरागर यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. फाउंडेशनचे राज्य उपाध्यक्ष डॉ. पी. जी. जाधव, सिद्धार्थ पगारे, आर. डी. जाधव, पंडित साळवे आदींसह देवळालीतील सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते. रवींद्र बोराडे, विलास भालेकर, वासुदेव कनगारे, सुनील वैरागर, रवी अडांगळे आदींनी संयोजन केले.

--

रिपाइं, देवळाली कॅम्प

रिपाइंतर्फे मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विश्वनाथ काळे, सिद्धार्थ पगारे, गौतम पगारे, राजाभाऊ वैरागर व शहराध्यक्ष पंडित साळवे यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. यावेळी शहर रिपाइंच्या वतीने मिठाईवाटप करण्यात आले. कार्यक्रमास सर्वपक्षीय नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.

--

शिंगवे बहुला परिसर

येथील ग्रामस्थांतर्फे आयोजित कार्यक्रमात बोर्डाचे नगरसेवक बाबुराव मोजाड यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. साठे फाउंडेशनचे जिल्हाध्यक्ष शांताराम पगारे, विजय गायकवाड, कैलास गायकवाड, संतोष मेढे आदी उपस्थित होते. अक्षय भालेराव, सुमित लांडगे, कैलास बकुरे, अनिकेत आल्हाट, नवनाथ साळवे, निवृत्ती लांडगे, खंडेराव लांडगे, नितीन साळवे आदींनी संयोजन केले.

--

अभिनव बालविकास मंदिर

नाशिकरोड ः जेलरोड येथील अभिनव बालविकास मंदिर व विद्यालयात अभिवादनपर कार्यक्रम झाला. सुजाता जाधव यांनी लोकमान्य टिळक आणि लोकशाहीर साठे यांच्या जीवनकार्याबाबत माहिती दिली. शाळेतील विद्यार्थी मंडळ, तसेच प्राथमिक विभागप्रमुख जयश्री सरोदे, शिक्षिका नलिनी गांगुर्डे, शुभांगी खैरनार, किरण बागडे, माधवी जाधव, सुवर्णा ठाकरे आदी उपस्थित होते.

----

न्यू इंग्लिश स्कूल

आडगाव : रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल आडगाव विद्यालयात अभिवादनपर कार्यक्रम झाला. स्नेहा एडके, दीपक मोरे, समर्थ देशमुख, श्रुती धोंडगे, तृप्ती शिंदे, श्रावणी शिंदे, मानसी डौरे, ऐश्वर्या गोसावी आदींसह विद्यालयाचे उपशिक्षक एस. फुलमाळी यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर साठे यांच्या जीवनातील विविध पैलू विशद केले. उपशिक्षिका जे. एस. जाधव, पर्यवेक्षक व्ही. व्ही. काकळीज, एस. डी. लभडे, जे. एस. जाधव, ए. एस. चौधरी आदी उपस्थित होते. के. डी. गायकवाड यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

--

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

मनसेतर्फे जीपीओरोड परिसरातील अण्णा भाऊ साठे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. अंकुश पवार, कौशल पाटील, विजय आगळे, दीपक चव्हाण, संजय देवरे, मिलिंद काळे, अमित गांगुर्डे, मनोज कोकरे, अमोल भालेराव, गणेश मंडलिक, रोहन कोकरे आदी उपस्थित होते .

--

शक्तिविकास अॅकॅडमी

या बहुउद्देशीय संस्थेतर्फे संस्थेचे अध्यक्ष मनोहर जगताप व नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक भगवान गवई यांच्या हस्ते लोकशाहीर प्रतिमापूजन झाले. मनोहर जगताप यांनी विद्यार्थांना अण्णा भाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या कार्याची माहिती दिली. भगवान गवई, निवृत्त प्रादेशिक परिवहन अधिकारी जगदीश सोनार, निवृत्त हवाई दल अभियंता हाजी इसा रज्जब शेख, संस्थेचे खजिनदार अशोक जगताप, नेहरू युवा केंद्राचे नितीन निकम, रवी सरकटे, मनीषा जगताप, शंकर देशमाने आदी उपस्थित होते.

---

सीडीओ मेरी हायस्कूल

नाशिक एज्युकेशन सोसायटी संचालित सीडीओ मेरी शाळेत मुख्याध्यापिका आशा डावरे, उपमुख्याध्यापिका राजश्री वैशंपायन, संस्था सहकार्यवाह व शिक्षक प्रतिनिधी यांच्या हस्ते प्रतिमापूजन झाले. पर्यवेक्षिका कृष्णा राऊत, मुग्धा काळकर, मधुकर पगारे, शोभा भदाणे, सुनंदा गावित, दीपमाला चौरे, प्रा. अरविंद जिंजर आदी उपस्थित होते.

--

शाळा क्रमांक ४५

विडी कामगार वसाहतीतील महापालिका शाळा क्रमांक ४५ मध्ये प्रभारी मुख्याध्यापक सुनील खेळूकर यांच्या हस्ते प्रतिमापूजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी टिळक व साठे यांच्या जीवनावर मनोगत व्यक्त करून गीत सादर केले. सुशीला पवार, विनोद बडवे, सुनीता सावंत, जयश्री ढेपले, विद्या खांबोरे, जाकिया मुलानी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images