Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

बाप्पांनी टाळले बाजाराचे विघ्न

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

गेल्या काही दिवसांपासून मंदीत असलेल्या बाजारपेठेला बाप्पांच्या आगमनामुळे झळाळी मिळताना दिसून येत आहे. नोटाबंदी, जीएसटीमुळे बाजारपेठेत चांगलीच मंदी आली. पण, आता गणपती बाप्पांच्या आगमनानंतर गणेशोत्सवापासून दिवाळीपर्यंत बाजारपेठेत मोठ्या उलाढालीची चिन्हे आहेत.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनेक व्यावसायिकांनी विविध आॅफर दिल्या असून, त्यामुळे बाजारपेठेला बूस्टर डोस मिळण्याची शक्यता वाढली आहे. गणेशोत्सवानंतर दिवाळीपर्यंत फेस्टिवल मूड राहणार असल्यामुळे माॅलसह विविध दुकानांनी त्यासाठी तयारी केली आहे. मोठमोठ्या कंपन्यासुद्धा या फेस्टिवलमध्ये चांगली विक्री होण्याची अपेक्षा ठेवून आहेत. त्यासाठी त्यांनी विशेष नियोजनदेखील केल्याचे दिसून येत आहे. नोटाबंदीनंतर बाजारात काहीशी मंदी आली. त्यापाठोपाठ जीएसटीने व्यापाऱ्यांना घेरल्यामुळे अजूनही गोंधळ कायम आहे. मात्र, सध्याच्या फेस्टिव्हल मूडचा बांधकाम, इलेक्‍ट्रॉनिक्‍स, हॉटेलिंग, ऑटोमोबाइल, किराणा, कापड आदी क्षेत्रांतील व्यवसायाला चांगलाच फायदा होणार आहे. विशेष म्हणजे नाशिकमध्ये पावसाने जोरदार मुसंडी मारल्यामुळे खरिपाची पेरणी शंभर टक्के झाली आहे. त्यामुळे बाजारपेठेस त्यामुळेही दिलासा मिळाला आहे.

उलाढाल वाढणार

‘गणेशोत्सवात बाप्पांसोबत घरी न्या’ अशी टॅगलाइन वापरून मोठमोठ्या जाहिराती इलेक्ट्रॉनिक्स उत्पादने, अॉटोमोबाइल्स कंपन्यांसह अनेक उत्पादक कंपन्यांनी दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे छोट-मोठ्या व्यावसायिकांनीसुद्धा त्यात उडी घेतली असून, त्यामुळे गणेशोत्सवाच्या १२ दिवसांत मोठी उलाढाल होणार आहे.


बांधकाम व्यावसायिकांना आशा

गणपती बाप्पांचे आगमन व त्यात घराचे बुकिंग करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखल्या अाहेत. अनेकांकडून वैविध्यपूर्ण ऑफर्स दिल्या जात असल्याने गणेशाेत्सवाच्या काळात घरांचे बुकिंग वाढण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मनपाचे बारा कोटी बुडाले

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या वतीने श्रीराम को-ऑप सहकारी बँक आणि बालाजी सहकारी को-ऑप बँकेमध्ये ठेवण्यात आलेल्या तब्बल ११ कोटी ७४ लाखांच्या ठेवी आता बुडीत खात्यात जमा झाल्याचा ठपका लेखा परीक्षकांनी ठेवला आहे.

महापालिकेच्या २०१४-१५ या आर्थिक लेखापरीक्षण अहवालात याबाबत गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. वारंवार मागणी करून ही रक्कम परत मिळत नाही. त्यामुळे या बँकामध्ये रकमेची ठेव ठेवणाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, असा शेरा मारण्यात आला आहे. त्यामुळे तत्कालीन पदाधिकाऱ्यांसह काही बडे अधिकारी चौकशीच्या टप्प्यात येण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या वतीने शहरातील विविध बँकामध्ये ठेवी ठेवण्यात आल्या आहेत. त्यात श्रीराम को-ऑप सहकारी बँक आणि बालाजी सहकारी को-ऑप बँकेचा समावेश आहेत. यात श्रीराम बँकेत २००१ मध्ये ठेवी व मुदत खात्यात रक्कम गुंतवण्यात आली. महापालिकेचा निर्वाह निधी, कर्ज निवारण निधी, घसारा निधी आणि अनामत रकमा या दोन्ही बँकेत गुंतविण्यात आल्या. परंतु, २००२ मध्ये लगेच या दोन्ही बँकांची आर्थिक स्थिती डबघाईस आली. २०१४-१५ पर्यंत श्रीराम बँकेकडे असलेल्या ठेवींची रक्कम आणि व्याज मिळून एकूण ८ कोटी ६५ लाख ३५ हजार रुपयांची थकबाकी आहे. तर २ कोटी ६५ लाख रुपये मुदत खात्यात जमा आहेत. तसेच बालाजी बँकेत १९९६-९७ मध्ये चालू खात्यात ४० लाख रुपये जमा आहेत. या दोन्ही बँकेकडे मिळून ११ कोटी ७४ लाख रुपये महापालिकेची थकबाकी आहे.
या दोन्ही सहकारी बँकेतील ठेवी व चालू रकमा परत मिळवण्यासाठी महापालिकेकडून दहा वर्षांपासून प्रयत्न सुरू आहेत. या दोन्ही बँकांवर प्रशासक असले तरी कर्जदारांकडील वसुली झालेली नाही. त्यामुळे महापालिकेला ही रक्कम परत मिळालेली नाही. याबाबत २०१४-१५ च्या स्थानिक आर्थिक लेखापरीक्षण अहवालात गंभीर ताशेरे ओढण्यात आले आहेत. संबंधित बँकांकडे वारंवार मागणी करूनही कागदोपत्री हा निधी मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या रकमा आता जवळपास बुडीत असल्याचे स्पष्ट संकेत या अहवालात दिले आहेत. त्यामुळे या ठेवी ठेवण्यांवर जबाबादारी निश्चित करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

पदाधिकारी-अधिकारी रडारवर
श्रीराम बँकेचे अध्यक्ष विजय पाटील हे महापालिकेच्या स्थायी समितीचे सभापतीही होते. त्यामुळे या ठेवी बँकेकडे वळते करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. तसेच महापालिकेचे तत्कालीन लेखा विभागाचे अधिकारीही यात सहभागी होते. त्यामुळे या प्रकरणी जबाबादी निश्चित झाल्यास बडे पदाधिकारी व अधिकारी हे चौकशीच्या रडावर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांसह पदाधिकाऱ्यांची अडचण वाढण्याची शक्यता आहे. लेखा परीक्षण अहवालावर आता प्रशासन काय कारवाई करते, याकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

४७३ महा ई-सेवा केंद्रे गेली कुठे?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारकडून शेतकरी कर्जमाफीसंदर्भात दररोज केल्या जाणाऱ्या दाव्यांची पोलखोल शिवसेनेकडून केली जाणार आहे. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गुरूवारी जिल्हा उपनिबंधकांची भेट घेत शेतकऱ्यांचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या महाईसेवा केंद्रांची यादी देण्याची मागणी केली आहे.
जिल्ह्यात १ हजार ८४५ पैकी अवघे १ हजार ७२ महा ई-सेवा केंद्र सुरू असून ४४३ केंद्रे गेली कुठे असा प्रश्न शिवेसनेने केला. सहकार विभागाची आकडेवारी फसवी असून, कर्जमाफी भूलभुलैया ठरल्याचा आरोपही केला आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफीची आकडेवारी व सत्यता तपासण्याचे आदेश शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय करंजकर, महानगरप्रमुख अजय बोरस्ते, गटनेते विलास शिंदे, नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी, संतोष गायकवाड, रमेश धोंगडे, चंद्रकांत खाडे, प्रशांत दिवे, शामकुमार साबळे यांनी जिल्हा उपनिबंधक नीलकंठ करे यांच्याकडून आकडेवारीची माहिती घेतली. यावेळी शिवसेनेकडून जिल्ह्यातील विविध बँकाकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज, कर्जमुक्तीचा शेतकऱ्यांना किती लाभ, शेतकरी अपात्रतेची कारणे काय, महाईसेवा केंद्रांची माहिती मागितली. यावेळी जिल्हा उपनिबंधकांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना माहिती उपलब्ध करून दिली. त्यात दीड लाखांपर्यत एक लाख १५ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे, तर दीड लाखाच्या पुढे ५९ हजार १४२ शेतकऱ्यांना फायदा होणार असल्याचा दावा केला. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या २८ हजार ९५५ असल्याचे करे यांनी सांगितले. शेतकरी कर्जमाफीचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी जिल्ह्यात १ हजार ८४५ महा ई-सेवा केंद्र सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, प्रत्यक्षात सध्या १ हजार ७२ केंद्र सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी या केंद्राची यादी मागीतली. जिल्हा उपनिबंधकांकडून सोमवारी (दि. २८) ही यादी दिली जाणार शिवसेना या केंद्राची आपल्या पदाधिकाऱ्यांमार्फत सत्यता पडताळणी करणार आहे.

कर्जमाफीचा भूलभुलैया
जिल्ह्यातील अनेक सेवाकेंद्र बंद असल्याचा आरोप करत आकडेवारीही फसवीची असल्याचा आरोप अजय बोरस्ते यांनी केला. अनेक ठिकाणी इंटरनेट सेवा बंद आहे. तर काही ठिकाणी विजेचा पत्ता नाही. त्यामुळे राज्य सरकारची शेतकरी कर्जमाफी भुलभुलैया असल्याचा आरोपही त्यांनी केला. जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या नावाची पडताळणी केली जाणार असून तसा अहवाल पक्षश्रेष्ठींना सादर केला जाणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रपटातून ‘टॉयलेट’प्रबोधन

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता कक्षाच्या वतीने जिल्हा परिषद पदाधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचे उंटवाडी येथील मल्टीप्लेक्समध्ये आयोजन करण्यात आले.
चित्रपटासाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे, उपाध्यक्षा नयना गावित, विषय समिती सभापती सुनीता चारोस्कर व यतीन पगार यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिभा संगमनेरे, राजेंद्र पाटील, प्रदीप चौधरी व सर्व खातेप्रमुख यांच्यासह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व सदस्य, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
‘टॉयलेट : एक प्रेमकथा’ हा चित्रपट स्वच्छ भारत अभियानांतर्गत महिलांसाठी शौचालयाचे महत्त्व अधोरेखित करणारा असून ग्रामीण भागात शौचालयाबाबत वास्तविकता दाखवणारा चित्रपट आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत सर्व जिल्ह्यांमध्ये सदरचा चित्रपट दाखवण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जलयुक्त शिवार’बाबत बुधवारी कार्यशाळा

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जलयुक्त शिवार अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातमध्ये बुधवारी (दि. ३०) विभागीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यशाळेत मृदा व जलसंधारण सचिव एकनाथ डवले जलयुक्त शिवार अभियान कार्यपध्दतीबाबत तर विभागीय आयुक्त महेश झगडे २०१७-१८ मधील नियोजनाच्या रुपरेषेबाबत मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय विभागातील भूगर्भरचना व त्यानुसार पाणलोट उपचार, मृद व जलसंधारणाचे विविध उपचार, पाणीसाठा व आर्थिक मापदंड, पाण्याचा ताळेबंद व गाव आराखडा, एमआरएसएसी प्रणालीद्वारे विकस‌ित संनियंत्रण प्रणाली, जलसंधारण उपचार दुरुस्ती व आर्थिक मापदंड, अप्रत्यक्ष सिंचनामध्ये पाणीवाटप व्यवस्था, जलयुक्त शिवार व रोजगार हमी योजना आणि मागेल त्याला शेततळे आदी विषयांवर तज्ज्ञ मार्गदर्शन केले जाणार आहे.
उपसंचालक भूजल सर्वेक्षण यंत्रणा, मृदसंधारण संचालक कैलास मोते, ‘आयआयटी’ मुंबईचे संजय बेलसरे, ‘एमआरएसएसी’चे मुकुंद घारे, कार्यकारी अभियंता सागर शिंदे, ‘वाल्मी’चे संचालक हरिभाऊ गोसावी, उपसचिव नारायण कराड, नरेगा आयुक्त संजय कोलते आणि उपसचिव प्रमोद शिंदे हेही यावेळी यंत्रणेला विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यशाळेला विभागातील जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच कृषी, जलसंपदा, लघु पाटबंधारे विभाग आदी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित राहणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आता लक्ष जिल्हा बँकेकडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
सहकार मंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे नाशिक सहकारी साखर कारखान्याचा (नासाका) बॉयलर पुन्हा पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सहकारमंत्र्यांच्या आदेशांमुळे आता ‘नासाका’च्या लिलावासाठी सरसावलेल्या जिल्हा बँकेच्या भूमिकेकडे ‘नासाका’ क्षेत्रातील ऊस उत्पादक व सभासदांचे लक्ष लागले आहे.

गत चार गळीत हंगामांपासून आर्थिक अडचणींमुळे बंद असलेला ‘नासाका’ यंदाच्या हंगामात सुरू करण्याचे आदेश सहकार मंत्र्यांनी साखर आयुक्तांना नुकतेच दिले. पुढील आठवड्यात याबाबतची प्रक्रिया पूर्ण होणार आहे. ‘नासाका’ सुरू करण्यासाठी आमदार बाळासाहेब सानप यांनी वर्षभरापासून प्रयत्न सुरू केले.
जिल्हा बँकेचे ८४.२३ कोटी रुपये थकीत झाल्याने शंभर टक्के ‘एनपीए’मध्ये असलेल्या ‘नासाका’स अर्थपुरवठा करण्यास असमर्थता दाखविली. कारखान्याच्या प्रशासकीय संचालक मंडळाने पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीने कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. संचालक मंडळाने केलेल्या पाठपुराव्यास मुख्यमंत्र्यांनी दाखवलेला सकारात्मक दृष्टीकोन ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सुखावणार ठरणार आहे.
सहकार मंत्र्यांच्या आदेशान्वये साखर आयुक्तांनी मागील आठवड्यात कारखाना संचालक मंडळाकडून कारखान्यावरील आर्थिक बोजा कमी करण्याबाबत प्रस्ताव मागितला. कामगारांनी त्यास प्रतिसाद देत सुमारे ११ कोटीची देणी मागणार नसल्याचा लेखी करार दिला. यामुळे कारखान्याच्या हंगामी कर्जासाठी साखर आयुक्त कार्यालयाने वेगवान हालचाली सुरू केल्या. राज्य बँकेला ‘नासाका’ला संचालकांच्या हमीवर पूर्व हंगामी कर्ज उपलब्ध करून देण्याबाबत आदेश दिले आहे. याशिवाय पालकमंत्र्यांनी सहकारमंत्र्यांना १९ ऑगस्ट रोजी पत्र दिले. त्यानुसार सहकारमंत्र्यांनी साखर आयुक्तांना ‘नासाका’ सुरू करण्याचे आदेश २३ ऑगस्ट रोजी दिले आहेत. आता सोमवारी (दि. २८) आमदार बाळासाहेब सानप, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकारमंत्री सुभाष देशमुख, संचालक मंडळासह मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहेत.

प्रति पोते टॅगिंग होणार
नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे थकीत कर्ज फेडण्यासाठी ‘वसाका’च्या धर्तीवर ‘नासाका’, राज्य बँक व जिल्हा बँक यांच्यात त्रिपक्षीय करार करणार असून प्रती पोते टॅगिंग केले जाणार आहे. राज्य बँकेने कर्ज उपलब्ध करून दिल्यानंतर ते फेडण्याची जबाबदारी संचालक मंडळाने स्वत:ची मालमत्ता तारण ठेवून घेतली आहे. राज्यातील हा पहिलाच प्रयोग ठरण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बीअर विक्रीत ३० टक्के घट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सुप्रीम कोर्टाने राज्य मार्ग, राष्ट्रीय महामार्ग आणि प्रमुख मार्गांपासून ५०० मीटर परिसरात कोणत्याही प्रकारे दारू विक्री सुरू करण्यास बंदी घातल्यानंतर जिल्ह्यात देशी, विदेशी व बीअर व वाइन विक्रीत घट झाली आहे. गेल्या चार महिन्यात बीअर विक्रीत तब्बल ३० टक्के घट झाली. तर विदेशी दारुलाही फटका बसला असून त्यातही २०.६९ टक्के घट झाली आहे. पण या बंदीनंतर देशी दारुच्या विक्रीत १२ तर वाइन विक्रीमध्ये अवघी ७ टक्के वाढ झाली.
जिल्ह्यातील १ हजार ११६ पैकी तब्बल ७६३ मद्यविक्री दुकाने बंद करण्यात आली. नाशिकमधील त्र्यंबक रोडवरील ४३ दुकाने सुरू झाली तर ३७ दुकानांनी स्थलांतर केल्याने सुरू असलेल्या दुकानांची संख्या ३५३ वरून ४३३ इतकी झाली. या सर्व दुकानांमधील मद्यविक्रीमध्ये चार महिन्यात घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये देशी दारुची विक्री ६३ लाख २७ हजार ९२७ लिटर झाली होती. हीच विक्री गेल्या चार महिन्यांमध्ये ५५ लाख २५ हजार ७९१ लिटर झाली आहे. या विक्रीत ८ लाख २ हजार १३६ लिटरची घट झाली आहे. विदेशी दारुतही २०.६९ टक्के घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये विदेशी दारुची विक्री २९ लाख ८४ हजार ९०३ लिटर झाली होती. हीच विक्री आता २३ लाख ६७ हजार ४१६ लिटर झाली आहे. त्यामुळे चार महिन्यात या विक्रीत ६ लाख १७ हजार ४८७ लिटर घट झाली आहे. देशी-विदेशी बीअर विक्रीत तब्बल ३०.०५ टक्के घट झाली आहे. २०१६-१७ मध्ये बीअर विक्री ५१ लाख २ हजार २९२ लिटर झाली होती. हीच विक्री २०१७-१८ मध्ये ३५ लाख ६९ हजार २४१ लिटर झाली. चार महिन्यात या विक्रीत १५ लाख ३३ हजार ५१ लिटर घट झाली आहे. वाइन विक्रीला मात्र या सर्वांमध्ये तुलनेने कमी फटका बसला. केवळ ६.८९ टक्के घट या चार महिन्यात झाली. २०१६-१७ मध्ये १ लाख ६७ हजार ६०४ लिटर विक्री होती; तीच विक्री आता १ लाख ५६ हजार ५६ लिटर झाली आहे. चार महिन्यात या विक्रीत ११ हजार ५४८ लिटर घट झाली आहे.

राज्यात सरकारचा वर्षाला किमान १० हजार कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याचे बोलले जात असून जिल्ह्यातही त्यात घट होणार आहे. या दारू विक्रीत विदेशी मद्यविक्री ३०.४६ टक्के कमी झाली. तर बीअर विक्रीत ३८.७५ टक्के घट झाली. देशी दारूचा आकडाही १७.११६ ने घटला असून वाइन विक्रीत मात्र १२.४५ टक्के वाढ आहे. त्यामुळे या आकड्यातून काय निष्कर्ष काढायचा याबाबत संभ्रम आहे.

मद्यदुकाने घटली कागदावर
२०१६-१७ मध्ये जिल्ह्यातील १ हजार ११६ दुकाने सुरू हाती. सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर ७६३ मद्यविक्री दुकाने बंद करण्यात आली. त्यानंतर नाशिकमधील त्र्यंबकरोड महापालिकेत वर्ग करण्यात आल्याने ४३ दुकाने सुरू झाली. तसेच ३७ दुकानांनी स्थलांतर केल्यामुळे ती चालू झाली आहे. त्यामुळे अगोदर सुरू असलेल्या १ हजार ११६ दुकानाची विक्री व आता सुरू असलेल्या ४३३ विक्रीची तुलना केल्यास दारू विक्री मोठी घट नसल्याचे समोर येते.

अजून दुकाने सुरू होणार?
सुप्रीम कोर्टाने महापालिका क्षेत्रात हा निर्णय लागू नसल्याचे स्पष्ट केल्याने नाशिक व मालेगाव येथील सर्वच दुकान सुरू होणार आहे. त्यामुळे त्यानंतर विक्रीत मोठी वाढ होईल. या निर्णयामुळे नाशिकमध्ये १४१ तर मालेगावमध्ये ३६ जादा दुकाने सुरू होण्याचे समजते.

अवैध मद्यविक्री वाढली
सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर अनेक दुकाने बंद झाली असली तरी अवैध दारू विक्रीत मोठी वाढ झाली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई केली असली तरी त्यात अद्याप घट झालेली नाही. काही ठिकाणी हा धंदा जोरात सुरु असून त्यामुळे जिल्ह्यात वैध व अवैध दारु विक्रीतून दारू पिण्यामध्ये मात्र कोणतीही घट झालेली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकच्या फुलांनी गुजरात ‘गुलशन’!

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
किमान नफा पदरी पडेल या अपेक्षेने वर्षानुवर्षे मुंबईला फुले पुरविणाऱ्या शेतकऱ्यांना गुजरातच्या रूपाने नवे मार्केट उपलब्ध झाले आहे. त्यामुळे गणेशोत्सवासारख्या मुख्य व्यावसायिक मोसमात फुले पाठविण्यासाठी शेतकरी मुंबईपेक्षा गुजरातला प्राधान्य देत आहे. तेथे फुलांना मिळणारा अधिक भाव हे शेतकऱ्यांसाठी एकमेव आकर्षण ठरत आहे.

गणेशोत्सवात फुलांना वर्षभरातील सर्वाधिक भाव मिळतो; ‌त्यामुळे या काळात स्थानिक बाजारपेठाही गुलाबासह सर्वच फुलांनी डवरलेल्या असतात. या काळात फुलांच्या जीवावर मुंबई करून घेण्यासाठी शेतकरी गुलाबासह झेंडू, जास्वंद, गुलाब, चाफा, मोगरा, लीली, शेवंती ही फुले मुंबापुरीला पुरवतात. पूर्वी मुंबईमध्ये फुलांना सोन्याचा भाव मिळत असल्याने या भागाची निवड करणारे शेतकरी वर्षापासून आपला मोर्चा गुजरातकडे वळवत आहेत. मुंबईपेक्षाही अधिक भाव मिळत असल्याने सुरत, अहमदाबाद, राजकोट येथे फुले पाठविण्यात येतात.
मुंबईत जाणारा ८० टक्के गुलाब नाशकातून तर २० टक्के तासगाव-सांगलीहून येतो. त्याचे भाव दररोज बदलते असल्याने त्याबाबत दहा-बारा रुपयांचा फरक पडत असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. मुंबईला गुलाब ४० रुपये डझन असेल तर त्याच गुलाबाला गुजरातेत ५० रुपये भाव मिळत असल्याने शेतकरी तेथे फुले विकण्याला प्राधान्य देत आहेत. विशेषत: सफेद रंगाच्या फुलांना अधिक मागणी आहे.

सजावटीसाठी अधिक मागणी
गणेशोत्सवात पूजेव्यतिरिक्त सजावटीसाठीही फुले लागतात. गुलाब, जरबेरा, कार्निशन, अन्थोरियम, ग्लॅडिओलस, ऑर्किड, ट्यूबरोझ या फुलांना सजावटीसाठी मोठी मागणी आहे. नाशिकमध्येही काही फुले बंगळूरुहून येतात. सुटा गुलाब, गुलछडी, रजनीगंधा ही फुले पुण्याहून तर पिवळा-लाल गोंडा तासगावहून, पांढरी शेवंतीही बंगळूरुहून आणली जाते. सध्या गणेशोत्सवामुळे फुलांचे मार्केट तेज असून मुंबई तसेच गुजरातला फुले रवाना होत आहेत.

गेल्या वर्षापर्यंत मुंबईला फुलांना चांगला भाव मिळत होता; परंतु यंदा खूपच कमी किमतीत फुले मागत आहेत. त्यामुळे आम्ही मुंबईपेक्षा गुजरातला फुले पाठविण्याचा निर्णय घेतला. यात मुंबईच्या तुलनेत गुजरातला गुलाबाच्या फुलाच्या गड्डीमागे किमान पंधरा रुपये सुटतात.
- मधुकर गायकवाड, फुल उत्पादक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रायपूरला टोमॅटो खरेदी केंद्र सुरू

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

चांदवड बाजार समितीच्या रायपूर शेतीमाल खरेदी-विक्री केंद्रावर टोमॅटो लिलावास सुरुवात झाली. चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार व व्यापाऱ्यांशी झालेल्या संयुक्त बैठकीनुसार रायपूर येथे शुक्रवारी (दि. २५) समितीचे सभापती डॉ. श्री. आत्माराम कुंभार्डे यांच्या उपस्थितीत बाजार समितीचे उपसभापती नितीन आहेर यांचे शुभहस्ते टोमॅटो लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना टोमॅटो विक्रीसाठी जवळची बाजारपेठ उपलब्ध झाली असून, लिलावासही चांगला प्रतिसाद मिळाला.

दरम्यान, लिलावाच्या पहिल्याच दिवशी एक हजार क्रेट्स टोमॅटोची आवक झाली. प्रति क्रेट्सला सरासरी ७०० रुपये बाजारभाव मिळाले, अशी माहिती सभापती डॉ. आत्माराम कुंभार्डे यांनी द‌लिी. बाजार समितीचे संचालक निवृत्ती घुले, विलास ढोमसे, आण्णासाहेब आहेर, टोमॅटो खरेदीदार व्यापारी नितीन गुंजाळ, विलास चव्हाण, देवीदास आहेर आदींसह शेतकरी यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुक्त’ची अभ्यास केंद्रे सक्षम करण्यावर भर

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सर्वांसाठी शिक्षण खुले असणे, तसेच वेळ, ठिकाण आणि अंतर यांच्या मर्यादा ओलांडून शिक्षणाच्या संधी सर्वांसाठी निर्माण करणे ही दूरस्थ शिक्षण प्रणालीची खरी संकल्पना अाहे. भविष्यात ही शिक्षण प्रणाली अधिक मजबूत करण्यासाठी विद्यापीठाची राज्यातील सर्व अभ्यास केंद्रे सक्षम करण्यावर भर देणार असल्याचे प्रतिपादन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. ई. वायुनंदन यांनी केले.

मुक्त विद्यापीठाच्या राज्यातील विभागीय केंद्र संचालकांची विशेष बैठक विद्यापीठ मुख्यालयात झाली होती. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठाच्या दिल्ली झोनचे संचालक डॉ. के. डी. प्रसाद, पुणे विभागीय केंद्राचे संचालक डॉ. मसूद परवेज, विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे उपस्थित होते.

कुलगुरू म्हणाले, की दूरस्थ शिक्षण प्रणाली हे एक सांघिक काम असून, ही जबाबदारी पूर्ण करताना सर्वांना सोबत घेऊन विविध योजनांची अंमलबजावणी करण्यावर लक्ष केंद्रित केले जाईल. अभ्यास केंद्रांचे सक्षमीकरण अतिशय महत्त्वाचे असून, त्यासाठी अभ्यास केंद्रे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करण्याचे नियोजन आहे. अभ्यास केंद्रांना विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार पुरेशा शैक्षणिक साधनांचा पुरवठा केला जाईल. याव्यतिरिक्त गरजाभिमुख नवनवीन अभ्यासक्रम विकसित करणे, सध्या सुरू असलेले अभ्यासक्रम कायम ठेवून त्यांचे बळकटीकरण करणे, नियामक संस्थांच्या निकषानुसार अभ्यासक्रम सुरू करण्यावरही भर देण्यात येईल.

यावेळी डॉ. के. डी. प्रसाद आणि डॉ. मसूद परवेज यांनी विद्यापीठ आणि विभागीय केंद्र स्तरावर काम करताना एकसूत्रीपणा आणण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. विद्यापीठाच्या विद्यार्थी सेवा विभागाचे संचालक डॉ. प्रकाश अतकरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. प्रा. प्रवीण घोडेस्वार यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रकाश देशमुख यांनी आभार मानले.

--

तक्रारींसाठी ई व्यासपीठ

विद्यार्थ्यांच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, त्यासाठी स्वतंत्र ई व्यासपीठ विद्यार्थ्यांसाठी तयार करण्याचा मानस आहे. या व्यासपीठाद्वारे विद्यार्थी आपल्या तक्रारी नोंदवू शकतील. विशेष म्हणजे या तक्रारींचे त्वरित निराकरण केले जाईल. त्यामुळे विद्यापीठ आणि विद्यार्थ्यांदरम्यान विश्वासाचे नाते निर्माण होण्यास मदत होईल, असा विश्वास कुलगुरूंनी यावेळी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डेंग्यूचा प्रभाव थांबणार कधी?

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

गेल्या काही वर्षांपासून सातपूरला डेंग्यू सदृश आजाराने हैराण केले आहे. महापालिकेकडून वेळोवेळी मलेरिया विभागाकडून फवारणी मारली जात असताना डेंग्यूचे रुग्ण मात्र कमी होण्यास तयार नाहीत.

यामुळे सातपूर भागात डेंग्यूची लागण कधी थांबणार, असा सवाल सातपूरकरांनी उपस्थित केला आहे. त्यातच डेंग्यू सदृश आजाराने सर्वसामान्य कामगारांच्या खिशाला आर्थिक झळ पोहचत असल्याने परेशान झाले आहेत. महापालिकेने गल्लोगल्ली साजत असलेल्या पावसाचे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था करावी, अशी मागणीही कामगारांनी केली आहे.सातपूर विभागातील धृव नगर, शिवाजी नगर, श्रमिक नगर, अशोक नगर, राधाकृष्ण नगर, सावरकर नगर, जाधव संकुल व सातपूर कॉलनी या भागात डेंग्यू सदृश आजाराने शेकडोहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यावर उपचार कोण काढणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

धूर फवारणीही नावालाच

दरम्यान, मलेरिया विभागाकडून रोजच फवारणी केली जात असताना डेंग्यूचे रुग्ण मात्र रोजच खासगी रुग्णालयात उपचार घेताना दिसत आहेत. डेंग्यू सदृश आजार होण्याचे कारण काँक्रिटीकरणच्या रस्त्यांवर साजत असलेले पावसाचे पाणी हेच असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. महापालिकेने साचत असलेल्या पाण्याला वाहते करावे, अशीही मागणी कामगारांनी केली आहे. महापालिकेकडून केली जात असलेली धूर फवारणीही नावालाच असल्याचा आरोप सातपूरच्या प्रभाग बैठकीत नगरसेविका डॉ. वर्षा भालेराव यांनी केला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिनेट निवडणुकीला ऑक्टोबरचा मुहूर्त

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेटवर पदवीधरांमधून निवडून येणाऱ्या १० आणि कॉलेज, शैक्षणिक संस्थांच्या प्रतिनिधींमधून ६ अशा एकूण १६ जागांसाठी ऑक्टोबर महिन्यात निवडणूक होणार आहे. ८ ऑक्टोबर रोजी मतदान होऊन १० ऑक्टोबरला निकाल लागणार आहे. या निवडणुकीसाठी इच्छुकांना २१ सप्टेंबरला अर्ज भरता येईल.

नवीन विद्यापीठ कायद्यानुसार विद्यार्थी प्रतिनिधी आणि अधिसभा निवडणुका होणार आहे. संबंधित अर्ज छापील स्वरुपात विद्यापीठातील निवडणूक कार्यालयात जमा करण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत मुदत आहे.

२६ हजार नोंदणी अपात्र

२६ हजार पदवीधर मतदार नोंदणी अर्जामध्ये त्रुटी आहेत. यामुळे सुमारे २६ हजार पदवीधर अपात्र ठरले आहेत. एकूण ६० हजार पदवीधरांनी या निवडणुकीसाठी नोंदणी केली होती. महिलांनी विवाह नोंदणीचे प्रमाणपत्र जमा न केल्याने त्यांचे अर्ज अपात्र ठरविण्यात आले आहेत.


निवडणूक कार्यक्रम

अंतिम मतदार यादी - ७ सप्टेंबर, निवडणुकीची सूचना - १२ सप्टेंबर, अर्ज भरण्याची तारीख - २१ सप्टेंबर, अर्जांची छाननी - २२ सप्टेंबर, अर्ज माघार - २५ सप्टेंबरला, मतदान - ८ ऑक्टोबर, निकाल - १० ऑक्टोबर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यावरण संवर्धनाचा जागर

0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर

गणेशोत्सवासाठी सर्वच स्तरांवर आकर्षक पद्धतीच्या सजावटीला प्राधान्य दिले जाते. अलीकडे इको फ्रेंडली पद्धतीने अशी सजावट करण्याकडे मंडळांसह नागरिकांचाही कल दिसून येत आहे. यंदा अनेकांनी टाकाऊ वस्तूंपासून आकर्षक सजावट साकारली असून, सोशल मीडियावरील पोस्टद्वारे अशा सजावटींचा बोलबाला दिसून येत आहे.

शहरात बहुतांश ठिकाणी नागरिकांनी पर्यावरणपूरक सजावटीवर भर दिलेला आहे. अनेकांनी टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू आरास साकारली आहे. घरातील न लागणाऱ्या वस्तूंचा वापर करून घरगुती देखावे साकारण्यात आले आहेत. साध्या पद्धतीने, परंतु आकर्षक स्वरूप दिलेले असे देखावे सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

घरात वापरात नसलेल्या काठ्या, तसेच बांबू यापासून देखावे साकारण्यात आले आहेत. काही ठिकाणी केवळ दगडांचा आणि कापडाचा वापर करून देखावे साकारण्यात आले आहेत. दगड आणि कापडाचा उपयोग करून आकर्षक डोंगरांचा देखावा साकारण्यात आला आहे.

निसर्गाचा समतोल ढासळणार नाही ही भावना मनात ठेेवून घरगुती देखावे साकारण्यात आले आहेत. काही ठिकाणी घरातील ताट, वाटी आणि अन्य भांडी वापरून प्रत्यक्ष बाप्पा साकारण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक देखावे साकारण्यावर अनेकांचा भर असल्याचे यावरून दिसून येत आहे.

--

घरातील न लागणाऱ्या लाकडी वस्तू, तसेच बांबू आदींचा वापर करून मी देखावा साकारला आहे. पर्यावरणाचा समतोल ढासळूू न देता केवळ घरातील न लागणाऱ्या वस्तूंपासून बाप्पांसाठी देखावा साकारला आहे.

-प्रतीक पंडित

---

माती, वाळूू आणि इतर वस्तूंपासून मी देखावा साकारला आहे. कापडाचा उपयोग करून दगडांना आकर्षक असे डोंगराचे स्वरूप दिले आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन होण्यासदेखील हातभार लागला आहे.

-निखिल गायकवाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सात विद्यार्थ्यांचे ‘सीएस’मध्ये यश

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दि इन्स्टिट्यूट ऑफ कंपनी सेक्रेटरीज ऑफ इंडियाच्या वतीने १ ते १० जून या कालावधीत पार पडलेल्या कंपनी सेक्रेटरीज प्रोफेशनल आणि एक्झिक्युटिव्ह परीक्षेच्या निकालात नाशिकच्या सात विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

या परीक्षेत सीएस प्रोफेशनल अंतिम परीक्षेत सात तर एक्झिक्युटिव्ह परीक्षेत पाच विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कंपनी सेक्रेटरी शाखेचा अभ्यासक्रम आणि परीक्षांचे आयोजन केंद्र सरकारच्या आयसीएसआय संस्थेच्या वतीने केले जाते.

यशस्वी विद्यार्थ्यांमध्ये नाशिकमधून केतकी भडकमकर, निधी शाह, मिहीर तपस्वी, सोनम जेठवा, अभिषेक देशपांडे, करण सोमवंशी, जयेश कटारिया यांनी यश मिळविले. सीएस एक्झिक्युटिव्ह परीक्षेत हितेश सारडा, निशांत बाफना, अक्षदा भासे, सायली कुलकर्णी, सचिन कुलकर्णी हे विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कामगारांसाठी शंभर विमा रुग्णालये

0
0

राज्यभरात लवकरच होणार उभारणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

कामगारांसाठी नेहमीच पुढाकार घेत असलेल्या सिटू संघटनेने कामगारांसाठी विविध ठिकाणी रुग्णालयांची मागणी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांच्याकडे केली होती. सिटू संघटनेची मागणी मान्य झाली असल्याने महाराष्ट्रात कामगार विमा रुग्णालयाची शंभर रुग्णालये लवकरच उभारण्यात येणार असल्याचे कामगार नेते डॉ. डी. एल. कराड यांनी 'मटा'शी बोलताना सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून कामगार विमा रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी याची मागणी सिटू संघटनेने केली होती. अखेर सिटूच्या मागणीला यश आल्याने कामगारांनीही आनंद व्यक्त केला आहे.


महाराष्ट्रात विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांची संख्या कोटींच्या घरात आहे. यात प्रत्यक्ष कामावर असताना किंवा रस्त्यांवर अपघात झाल्यास शासनाने कामगारांसाठी कामगार विमा रुग्णालयाची व्यवस्था केली होती. परंतु, अनेक ठिकाणी कामगारांना कामावर असताना अपघात झाल्यास वेळेवर योग्य औषध, उपचार केला जात नसल्याने प्रसंगी जीव जाण्याचीही वेळ येत असते. याकरीता सिटू कामगार संघटनेने आरोग्य मंत्री डॉ. सावंत यांच्याकडे कामगार विमा रुग्णालयांची संख्या वाढविण्यात यावी याची मागणी केली होती. याबाबत महाराष्ट्र शासनानेही योग्य प्रतिसाद दिल्याने लवकरच शंभर कामगार विमा रुग्णालये उभारण्यात येणार असल्याचे कामगार नेते डॉ. कराड यांनी सांगितले. आरोग्य मंत्री डाँ. सावंत यांच्याकडे सिटू संघटनेने पाठपुरावा केला होता. तसेच आरोग्य सचिव यांना देखील वाढलेल्या कामगारांची संख्या व कमी असलेले कामगार रुग्णालये याबाबत माहिती सिटू संघटनेने दिली होती.


सातपूरला रुग्णालयात सुविधा द्याव्या

सातपूरला असलेल्या कामगार रुग्णालयात सुविधा वाढवण्याबाबत सिटू संघटनेने मागणी केली आहे. यात अत्याधुनिक यंत्रणा उभारण्यात याव्या. तसेच कमी असलेली डॉक्टर, नर्स व कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणीही सिटूने शासनाकडे केली आहे. त्यामुळे आता या मागणीकडे सरकारने लक्ष देऊन त्या सुविधा सातपूरच्या रुग्णालयांमध्ये पुरवाव्यात. कामगारांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी या सुविधा आवश्यक असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

महाराष्ट्रात विविध आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कामगारांसाठी कामगार विमा रुग्णालये आहेत. परंतु, वाढलेली कामगारांची संख्या पाहता विमा रुग्णालये कमी पडत आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभागाकडे कामगार विमा रुग्णालयांची संख्या वाढवण्याबाबत मागणी केली होती. लवकरच शंभर कामगार विमा रुग्णालये उभारण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्री डॉ. सांवत यांनी सांगितले.

डॉ. डी. एल. कराड, सिटू संघटना

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘पालवी’ रोखणार गोदाप्रदूषण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती विसर्जनानंतर होणारे जलप्रदूषण टाळण्यासाठी पालवी फाउंडेशनकडून ‘विघ्नहर्ता’ उपक्रम राबविण्यात येत आहे. अमोनिअम बायकार्बोनेट पावडरच्या साहाय्याने घरच्या घरी या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार असून, नाशिककरांमध्ये त्याविषयी प्रबोधन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून पालवी फाउंडेशनकडून सिरिन मेडोज येथे शनिवारी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले.

पर्यावरणपूरक शाडू मातीच्या गणेशमूर्तींविषयी मोठ्या प्रमाणात प्रबोधन केले जात असले, तरी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे खरेदीचे प्रमाण आजही मोठे आहे. या प्रकारातील गणेशमूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने पर्यावरणाला हानी पोहोचते, शिवाय मानवी जीवनावरही त्याचा परिणाम होतो. हे नुकसान टाळण्यासाठी पालवी फाउंडेशनकडून ‘विघ्नहर्ता- पर्यावरणपूरक गणेश उत्सव’ हा उपक्रम राबविण्यात येत आहे. याअंतर्गत अमोनिअम बायकार्बोनेट पावडर व पाणी यांच्या मिश्रणातून घरच्या घरी विसर्जन करावे, याविषयी त्यांच्याकडून प्रबोधन करण्यात येत असून, शनिवारी दीड दिवसाच्या गणपतीचे विसर्जनाचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. घरच्या घरी गणेशमूर्तीचे विसर्जन करून नदीपात्र स्वच्छ ठेवण्यास सहकार्य करावे, असे आवाहन पालवी फाउंडेशनकडून करण्यात आले आहे. यावेळी सुवर्णा पवार, दीपाली खेडकर, मोना गुलाटी आदी उपस्थित होते.

--

अशी आहे प्रक्रिया

एका बादलीमध्ये मूर्तीच्या उंचीनुसार मूर्ती बुडेल इतके पाणी व मूर्तीच्या वजनाइतकी अमोनिअम बायकार्बोनेट पावडर घ्यावी. एका काठीने ते मिश्रण ढवळून घ्यावे. गणेशमूर्तीवरील निर्माल्य व सजावटीच्या वस्तू काढून ती मूर्ती मिश्रणामध्ये विसर्जित करावी. काही तासांनंतर मूर्ती पाण्याच्या तळाशी जाईल. दिवसातून सहा-सात वेळा काठीने हे मिश्रण ढवळावे. पावडरच्या प्रमाणानुसार प्लास्टर ऑफ पॅरिसची मूर्ती पाण्यात काही तासांत, दिवसांत पूर्णपणे विरघळून जाते. मूर्ती विरघळलेल्या पाण्यात अमोनियम सल्फेटचा थर उत्तम खत म्हणून वापरता येत असून, ते घरातील झाडांना टाकावे, तर खालचा मातीचा थर ही माती बागेतील मातीत एकत्र करता येईल, असे पालवी फाउंडेशनकडून सांगण्यात आले.

--

येथे मिळेल अमोनिअम बायकार्बोनेट

मनपा सिडको विभाग- अंबड पोलिस स्टेशनसमोर, पंचवटी विभाग- विभागीय कार्यालय, मालेगाव स्टँड, सातपूर विभाग- सातपूररोड, नाशिक पूर्व- मेनरोड, नाशिक पश्चिम- पंडित कॉलनी, नाशिकरोड- दुर्गा मंदिराशेजारील कार्यालय.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर उत्पन्नावर आधारित असावा

0
0

अतिरिक्त आयकर आयुक्तांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्राचे उत्पन्न वाढविण्याकरिता वस्तू व सेवांकरिता समान कर दर असणे गरजेचे आहे. अगदी प्राचीन काळापासूनच सुशासन व कर यांचा संबंध आहे. श्रीमंत व्यक्ती व सर्वसाधारण व्यक्ती यांच्यात आयकर आकारणीमध्ये विभिन्नता असायला हवी. जेणेकरून श्रीमंत व्यक्ती व सर्वसाधारण व्यक्ती यांच्यावर पडणारा कराचा बोजा हा समान न राहता त्यांच्या उत्पन्नावर आधारीत असेल. म्हणजे अधिक श्रीमंत व्यक्तींना जास्तीत जास्त कर व सर्वसाधारण व्यक्तीला कमी कर असावा जेणेकरून सामाजिक विषमता दूर होईल, असे प्रतिपादन अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स यांनी केले.

दि इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटन्ट्स ऑफ इंडिया (पश्चिम विभाग), नाशिक सीए शाखेच्या वतीने नाशिकमधील अशोका मार्ग येथील आयसीएआय भवन येथे दोन दिवसीय प्रादेशिक कर परिषदेस शनिवारी सुरुवात झाली. या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे अतिरिक्त आयकर आयुक्त लाला फिलिप्स व उपाध्यक्ष चार्टर्ड अकाउंटन्‍ट्सचे पश्चिम विभागाचे सीए सर्वेश जोशी, केंद्रीय परिषद सदस्य सीए जय छयेरा, प्रादेशिक परिषदेचे सदस्य आणि शाखा नामनिर्देशित सीए विक्रांत कुलकर्णी यांच्या हस्ते सरस्वती पूजन व दीप्रज्वलनाने करण्यात आले.

फिलिप्स पुढे म्हणाले, की सद्यस्थितीतील भारताचा जो कर भरणा होत आहे, त्याचा दर कमी असला तरी तो भविष्यात वाढून अर्थव्यवस्था बळकट होण्याकामी मदत होईल. सीए सर्वेश जोशी म्हणाले, की राष्ट्राच्या प्रगतीसाठी कमीतकमी कर म्हणजेच करात सूट व वजावट यावर भर देण्याची गरज आहे. सध्याचा आयकर कायदा हा अधिकाधिक क्लिष्ट होत असून, त्यात सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. सदरच्या प्रादेशिक परिषदेच्या पहिल्या दिवशी सुरत येथील तज्‍ज्ञ सीए जय छयेरा (केंद्रीय परिषद सदस्य), नाशिक येथील उदयराज पटवर्धन, मुंबई येथील जगदीश पंजाबी आणि आशिष केडिया यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.

या प्रादेशिक परिषदेत नाशिक व नाशिक बाहेरील असे ३०० हून अधिक सीएंनी सहभाग नोंदवला आहे. या परिषदेचे यशस्वी आयोजन करण्याकरिता नाशिक शाखेचे अध्यक्ष सीए विकास हासे, उपाध्यक्ष मिलन लुनावात, सचिव रोहन आंधळे, खजिनदार हर्षल सुराणा, रेखा पटवर्धन, रणधीर गुजराथी, राजेंद्र शेटे, पश्चिम विभागीय कार्यकारणीचे सदस्य विक्रांत कुलकर्णी आदींनी परिश्रम घेतले.

आज जीएसटीवर चर्चा

परिषदेच्या दुसऱ्या व शेवटच्या दिवशी प्रथम सत्रात सीए व्ही. रघुरामान, भूपेंद्र शाह, गिरीश अहुजा हे जीएसटी कायद्यातील तरतुदी, सर्विस टॅक्स याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अवैध धंदे जोरात

0
0

त्र्यंबकरोडवर बुकींकडून हॉटेल्समध्ये खास व्यवस्था

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी अवैध व्यवसाय बंद करण्याची मोहीम हाती घेतली होती. यानंतर नव्यानेच परिमंडल दोनमध्ये दाखल झालेले पोलिस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक नखाते यांनी संपूर्ण अवैध व्यवसायच बंद केले आहेत. यात जुगारींसाठी अड्डे चालविणाऱ्यांनी नवीन शक्कल लढवत त्र्यंबक रोडवर दररोज नवीन ठिकाणी जुगार खेळण्याची व्यवस्था केल्याचे समोर आले आहे. महादेवाचे श्रद्धास्थान असलेला त्र्यंबक रोडवरील लॉजिंग असलेल्या हॉटेल्स जुगारींचे अड्डे बनले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील जुगारींना जुगार खेळण्यासाठी बुकींकडून खास व्यवस्था केली जात असून, चारचाकी वाहनेही ठेवण्यात आली आहेत.

एकीकडे शहर पोलिसांनी अवैध व्यवसायांवर कारवाईचा बडगा उगारला असताना ग्रामीण पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनीदेखील जुगार अड्ड्यांसह अवैध व्यवसाय बंद करावेत, अशी मागणी सुज्ञ नागरिकांकडून केली जात आहे. देश-विदेशातील भाविक विविध धार्मिक कामासाठी त्र्यंबकेश्वरला येत असतात. यामुळे रोजच हजारो वाहनांची वर्दळ त्र्यंबकेश्वर रोडवर असते. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून त्र्यंबकेश्वर रोडवर असलेल्या लॉजिंग हॉटेल्समध्ये जुगार खेळणाऱ्यांची खास व्यवस्था करण्यात येत असल्याने भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी शहरातील सर्वच अवैध व्यवसाय बंद केले असताना ग्रामीण पोलिस अधीक्षक दराडे कधी बंद करणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वीजतार पडल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

वीज वितरण कंपनीच्या ११ केव्ही मुख्य उच्चदाब वीजवाहिनीची तार अचानक तुटून अंगावर पडल्याने शेतात कांदा रोपाची लागवड करीत असलेल्या शेतकऱ्याला आपला जीव गमवावा लागला. येवला तालुक्यातील गवंडगाव शिवारात शनिवारी (दि.२६) सकाळी आठ वाजेच्या सुमारास ही दुर्दैवी दुर्घटना घडली.

गवंडगाव येथील शेतकरी बाजीराव विश्वनाथ भागवत (वय ७५) हे रास्ते सुरेगाव शिवारातील आपल्या शेतात शनिवारी सकाळी कांदा रोपे लागवडीचे काम करीत होते. यावेळी वीज वितरण कंपनीच्या गवंडगाव येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्रातून तालुक्यातील खामगाव येथे जाणारी ११ केव्ही मुख्य उच्चदाब वीज वाहिनीची तार अचानक तुटून खाली पडली.

ही तुटलेली तार थेट भागवत यांच्या अंगावर पडल्याने विजेचा मोठा झटका बसल्याने त्यांचे पाय जळाले. मोठी गंभीर दुखापत असल्याने त्यांना तातडीने येवला ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयातील उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी येवला तालुका पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरच्या ‘त्या’ खुनाला फुटली वाचा!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अनोळखी मृतदेहाच्या शर्टवरील टेलरच्या नावाचा तपास करीत ग्रामीण पोलिसांनी अखेर एका खुनाच्या घटनेला वाचा फोडली. अनैतिक संबंधातून सदर खून झाल्याचे पुरावे पोलिसांनी शोधून काढले असून, या प्रकरणी महिलेसह तिच्या प्रियकराला पोलिसांनी अटक केली आहे.

बालाजी पंढरी बनसोडे (रा. मंगरूळ, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बनसोडेचे मृतदेह २४ फेब्रुवारी २०१७ रोजी सिन्नर एमआयडीसी पोलिस स्टेशन हद्दीतील दातली शिवारातील एका शेतातील तळ्यात आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटत नसल्याने पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला. पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी काही दिवसांपूर्वी या गुन्ह्याचा तपास नव्याने सुरू करण्याचे आदेश दिले. ग्रामीण पोलिस दलाच्या विशेष तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक ए. ए. गडाख, सहायक पोलिस उपनिरीक्षक बाजरे, हवालदार इंगळे, पोलिस नाईक केदारे, कॉन्स्टेबल गावले तसेच स्थानिक गुन्हे शाखेने तपास सुरू केला. मृतदेहाच्या शर्टच्या कॉलरवर कळंब येथील दीपक टेलर असा लिहिलेला मार्क एवढाच एक पुरावा पोलिसांकडे होता. याच टेलरकडे पोलिसांनी सुरुवातीस चौकशी केली होती. मात्र, त्यात काही निष्पन्न झाले नव्हते. यावेळी पोलिसांनी दोन ते तीन दिवस मुक्काम करून टेलरकडील सर्व नोंदीची तपासणी केली. त्यात, बालाजी बनसोडे नावाच्या दोन नोंदी पोलिसांना मिळाल्या. यातील एक बालाजी गावातच होता. तर, दुसरा व्यक्ती सहा महिन्यांपासून गावात नसल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार, पोलिसांनी गुप्त तपास सुरूच ठेवला. बालाजीची पत्नी मंदाकिनी हिचे गावातील व्यापारी भागचंद भागरेचा याच्याशी अनैतिक संबंध असल्याचे पोलिसांना समजले. तसेच बालाजी बेपत्ता झाल्यानंतर तिने पोलिसांकडे कुठलीही तक्रार दिलेली नव्हती. त्यानुसार पोलिसांनी संशयितांचे मोबाइल रेकॉर्ड तपासले असता २४ फेब्रुवारीच्या घटनेचा एक एक पदर उलगडत गेला. पोलिसांनी मंदाकिनीसह भागचंदला अटक केली. पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधामुळे बालाजी भागचंदला ब्लॅकमेल करीत असे. तसेच गावात झालेल्या भांडणामुळे तो जानेवारी महिन्यातच नाशिकला आला होता. २२ फेब्रुवारी रोजी बालाजीने भागचंदला घेण्यासाठी बोलावले. त्यानुसार, तो एका चालकासह इंडिका कारने आला. परत जाताना सिन्नरच्या पुढे आल्यानंतर भागचंदने वाद उकरून काढला. तसेच बालाजीच्या डोक्यात दगड टाकून हत्या करून निघून गेला. विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर भागचंदने ही घटना मंदाकिनीला फोनकरून कळवली होती. सध्या पोलिस घटनास्थळी असलेल्या त्या इंडिका चालकाचा शोध घेत आहेत.

अत्यंत क्लिष्ट असा खुनाचा प्रकार शोधून काढण्यात यश मिळाले. तपासाचे काम अत्यंत चांगले झाल्याने या पथकातील कर्मचाऱ्यांना १० हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. अनोळखी मृतदेहांचा तपास करण्यासाठी हे पथक महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

- संजय दराडे, पोलिस अधीक्षक, नाशिक ग्रामीण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images