Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सटाण्यातील तिघांचा अपघाती मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

त्र्यंबकेश्वर-पुणे या बसला रविवारी (दि. २७) मध्यरात्री झालेल्या अपघातात सटाणा येथील तिघेही प्रवाशी ठार झाले आहेत. सटाणा तालुक्यातील उत्राणे येथील दोन महिला तर विनय भास्कर खैरनार हा युवकदेखील या अपघातात मृत पावला आहे. त्याच्या वडीलांचे २ ऑगस्टला निधन झाले होते. या अपघातात येथील शोभा नंदू पगार (४५) या आपल्या मुलाने पुण्यात नव्यानेच बंगला बांधला असल्याने त्या बंगल्याच्या वास्तुशांती निमित्ताने पुण्‍याला आपल्या देराणी यमुना भिला पगार (५५) यांच्यासह निघाल्या होत्या. वास्तुशांती बरोबरच पुण्यात दोन ते चार दिवस मुक्काम करून पुण्याचे गणपती बघण्याची त्याची गेल्या कित्येक दिवसांपासूनची इच्छा होती. तीदेखील या निमित्ताने पूर्ण करण्याची त्यांची मानसिकता होती. मात्र त्र्यंबकेश्वर-पुणे या बसला झालेल्या अपघातात त्या मृत झाल्या. सोमवारी सायंकाळी उशिरापर्यंत त्यांच्या घरी अपघाताचे वृत्त देण्यात आलेले नव्हते. रात्री उशिरापर्यंत मृतदेह उत्राणे येथे आणण्यात आले नसल्याने परिसरात शोकाकुल वातावरण आहे. या अपघातात सटाण्यातील विनय भास्कर खैरनार हा युवकदेखील मृत पावला आहे. तो सटाणा येथील सेवानिवृत्त तहसीलदार छोटू खैरनार यांचा पुतण्या असून, सासवडला नोकरीस आहे. सटाण्याहून जाताना तो नेहमीच याच बसने जाण्यासाठी सटाणा येथून निघत असे. मात्र रविवारचा दिवस त्याचा वैरी होऊन आला. याच महिन्यातील २ ऑगस्टला त्यांच्या वडीलांचे निधन झाले होते. विनयची पत्नीदेखील गर्भवती असून, खैरनार परिवारावर दु:खद प्रसंग ओढवला आहे. विनयचा मोठा भाऊ शिंपी काम करतो तर बहिणीचा विवाह झाला आहे.

त्र्यंबकचे प्रवाशी जखमी

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर येथून रविवारी (दि. २७) रात्री नऊच्या सुमारास सुटलेल्या पुणे बसला मध्यरात्रीनंतर एक ते दीड वाजेच्या सुमारास नारायणगावजवळ अपघात झाला. या अपघातात सटाण्यातील दोन महिलांसह एका तरुणाचा मृत्यू झाला असून, त्र्यंबकेश्वरचे काही प्रवासी जखमी झाले आहेत. सोमवारी (दि. २८) सकाळी या अपघाताची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासन यंत्रणा कामाला लागली. अपघातात अंजनेरी येथील शाळेत शिक्षक नंदू पगार यांच्या पत्नी, काकू या मृत पावल्या आहेत. ही बस दररोज दुपारी १ वाजता त्र्यंबकला येते त्यानंतर रात्री नऊ वाजता ती त्र्यंबक स्थानकावरून रवाना होत असते.

पुणे येथील शिवाजी नगर आगाराची ही बस आहे. याव्यतिरिक्त पुणे येथून ये-जा करणाऱ्या आणखी दोन बस आहेत. कारवाई होणार का? : हा बस अपघात रस्त्यात टायर बदलत असलेल्या टेम्पोला धडक देऊन झाला. यामध्ये सात बस प्रवासी आणि टेम्पो चालक व क्लिनर यांचा मृत्यू झाला आहे. बसचालक बेदरकारपणे वेगाने वाहने चालवतात. तशात पुणे-मुंबई अशा लांब पल्ल्याचे चालक वेगाने वाहन चालवताना अपघातास कारण ठरत असतात. नाशिक-त्र्यंबक रस्त्यावर अनेकवेळा बस चालकांनी वाहने पुढे काढत असताना आजूबाजूचा विचार करत नाही. त्यामुळे असे अपघात घडतात. याबाबत नागरिकांनी अनेकदा तक्रार करूनही बस चालकांवर कारवाई होत नाही. तसेच त्यांच्यावर कारवाई केव्हा होणार, असा प्रश्न प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


न्यायबुद्धीने पाणीवाटपाचा प्रश्न सुटावा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

पश्चिम महाराष्ट्राच्या नद्यांच्या पाण्यावर गुजरातसह महाराष्ट्राचाही अधिकार आहे. ग‌िरणा आण‌ि गोदा ही तुटीची खोरी असून, हे पाणी गुजरातने नेले तर या खोऱ्यांमध्ये पाणीच राहणार नाही. या पाण्यात महाराष्ट्राला मुबलक वाटा मिळावा यासाठी जनरेटा सुरू झाला आहे. राज्य सरकारनेही गुजरातला पाणी देण्याचा निर्णय परस्पर न घेता जनमत व‌िचारात घ्यावे, असे प्रतिपादन ‘मेरी’चे माजी महासंचालक डॉ. दि. मा. मोरे यांनी सोमवारी नाशिकमध्ये केले. अपव्यय होणाऱ्या पाण्याच्या योग्य वापरासाठीदेखील सरकारचा पुढाकार गरजेचा आहे. न्यायबुद्धीने पाणीवाटपाचा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

भारतीय जलसंस्कृती मंडळातर्फे पी अँड टी कॉलनीतील अखिल भारतीय ब्राह्मण कार्यालयात विशेष सहविचार सभा झाली. सभेचे उद््घाटन मेरीचे महासंचालक डॉ. मोरे यांच्या हस्ते झाले. या वेळी भारतीय जलसंस्कृती मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत रहाळकर, माजी आमदार नितीन भोसले, ज्येष्ठ पत्रकार विश्वास देवकर, सरोजिनी तारापूरकर आदी उपस्थित होते.

महाराष्ट्र सरकारने जल व सिंचन आयोगाचा अहवाल ३० सप्टेंबर १९९९ रोजी स्वीकारला आहे. जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे यांनी या अहवालात गोदावरी खोऱ्यात ६६ टीएमसी, गिरणा खोऱ्यात १० टीएमसी पाणी वळविण्याचे सुचविले होते. मुंबई शहरासाठीदेखील ४२ टीएमसी पाणी उपलब्ध होऊ शकते, तर नर्मदा प्रकल्पाकडेही ३८ टीएमसी पाणी वळविता येईल, असा दावाही त्यामध्ये करण्यात आला. डॉ. चितळे यांच्या अहवालाची गेल्या १८ वर्षांत प्रभावीपणे अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पाण्याची आवश्यकता असताना शेजारील राज्यांकडे मोठ्या प्रमाणावर पाणी वळविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. पाण्यामुळे भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या वादांवर आताच तोडगा काढायला हवा, असा सूर या सभेतून निघाला. महाराष्ट्राचे राज्यकर्ते जाणीवपूर्वक पाण्यावरील हक्क सोडत आहेत. पश्चिम खोऱ्यातील पाणी लिफ्ट करून गोदावरी खोऱ्यात आणण्याची गरज आहे. मात्र, केंद्रात, राज्यात आणि गुजरातमध्येही भाजपची सत्ता असून, गुजरातच्या हिताचे निर्णय घेतले जात असल्याचा आरोप माजी आमदार भोसले यांनी केला.

पाण्याच्या समन्यायी वाटपाबाबत चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात किती टीएमसी पाणी उपलब्ध होते व तूट किती आहे यावरदेखील चर्चा व्हायला हवी, अशी अपेक्षा जयप्रकाश संचेती यांनी व्यक्त केली. वेगवेगळ्या अहवालातील आकडेवारी दिशाभूल करणारी असून, त्यामुळेच या प्रश्नातून मार्ग निघणे कठीण असल्याचा दावा संचेती यांनी केला. मराठवाड्याचे क्षेत्रफळ राज्याच्या एकूण क्षेत्रफळाच्या २६ टक्के आहे. मात्र, इतर विभागांच्या तुलनेत मराठवाड्याला केवळ सहा टक्के पाणी मिळते. मराठवाड्याला १५० टीएमसी पाण्याची गरज असल्याची भूमिका एस. ए. नागरे यांनी या वेळी मांडली. मुंबईकडे मुबलक पाणीसाठा असून, मुंबईचेच लाड का पुरवायचे, असा सवाल त्यांनी उपस्थ‌ित केला. मराठवाड्याला ज‌िवंत ठेवायचे असेल तर १५० टीएमसी पाणी मिळायलाच हवे, अशी आग्रही भूम‌िका त्यांनी या वेळी मांडली. पश्चिम घाटाचे पाणी वाचविण्याबरोबरच मराठवाड्याच्या सिंचनासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न समन्यायी वाटपातून सोडविणे गरजेचे असल्याचा सूर या विशेष सभेतून उमटला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिटी बसबाबत आस्तेकदम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाकडून चालविण्यात येणाऱ्या सिटी बससंदर्भात महामंडळाने जबाबदारी झटकण्याची तयारी सुरू केली असतानाच आता महापालिकेनेही सिटी बससेवेबाबत आस्तेकदम धोरण स्वीकारले आहे. महापालिकेने सिटी बससेवेबाबत कन्सल्टंट नियुक्त केला असून, कन्सल्टंटच्या अहवालानंतरच अभ्यासाअंती महापालिका निर्णय घेणार असल्याचे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी स्पष्ट केेेले आहे.

सिटी बससेवा चालविणे ही महापालिकेची ऐच्छिक जबाबदारी असून, महापालिकेसमोर याबाबत विविध पर्यायही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे महामंडळाने कितीही प्रयत्न केले, तरी महापालिका सिटी बससेवेची व्यवहार्यता तपासूनच निर्णय घेणार आहे. त्यामुळे महामंडळाच्या दबावतंत्राचा कोणताही उपयोग होणार नसल्याची चिन्हे आहेत.

शहरांतर्गत बससेवा सध्या राज्य महामंडळाकडून चालविली जात आहे. परंतु, ही सेवा तोट्यात असल्याचे सांगत महामंडळाने महापालिकेने बससेवा चालवावी किंवा तोटा भरून देण्याची मागणी केली आहे. परंतु, महापालिकेने याबाबत अद्याप आपले धोरण स्पष्ट केलेले नाही. महापालिकेची आर्थिक स्थिती सध्या बससेवा चालविण्याबबत सक्षम नाही. त्यामुळे महामंडळाने बससेवेबाबत महापालिकेवर दबावतंत्र सुरू केले आहे. महामंडळाकडून काही बसफेऱ्या बंद करण्यात आल्या असून, अचानक संप पुकारून नागरिकांना वेठीस धरले गेले.

एकीकडे महामंडळाने असे दबावतंत्र सुरू केले असतानाच महापालिकेने मात्र सिटी बससेवेबाबत आस्तेकदम चालण्याची भूमिका स्वीकारली आहे. सिटी बससेवा महापालिका चालवू शकते का, याची व्यवहार्यता तपासण्यासाठी महापालिकेने कन्सल्टंट नेमण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महासभेने ठरावही मंजूर केला असून, त्याबाबतची कार्यवाही सुरू केली आहे. महामंडळाने हस्तांतरणासाठी दबाव वाढविला असला, तरी सिटी बससेवा चालविणे ही महापालिकेची ऐच्छिक जबाबदारी असल्याचे स्पष्टीकरण आयुक्तांनी दिले आहे. सिटी बससेवेबाबत पूर्णतः अभ्यास करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका महापालिकेने घेतली आहे. त्यामुळे महामंडळाकडून सुरू असलेल्या दबावतंत्रापुढे महापालिका झुकणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.


महापालिकेसमोर चार पर्याय

महापालिकेसमोर सिटी बससेवेबाबत चार पर्याय समोर असून, पहिल्या पर्यायात सिटी बससेवा महापालिकेने चालवावी, दुसऱ्या पर्यायात महापालिका ५० टक्के व महामंडळाने ५० टक्के खर्च करावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. तिसऱ्या पर्यायात बससेवेचे खासगीकरण करून केवळ त्या बसवरील कंडक्टर महापालिकेचा असावा, असा प्रस्ताव विचाराधीन आहे. चौथ्या पर्यायात ‘एएसआरटी’अंतर्गत बससेवेचे आधुनिकीकरण करून बससेवा चालवावी, असा प्रस्ताव आहे. परंतु, अंतिम निर्णय व्यवहार्यता तपासून व अभ्यास करूनच घेतला जाईल, असे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

--

थेट मुख्यमंत्र्यांना साकडे

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. त्यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत करण्याची मागणी आमदार जयवंत जाधव यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

आमदार जाधव यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे, की राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक शहर बससेवेच्या फेऱ्यांमध्ये कपात करण्यात आल्यामुळे प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. शहर बससेवा महापालिकेकडे वर्ग करण्याच्या मुद्यावर महापालिका आयुक्त आणि राज्य परिवहन महामंडळातील अधिकाऱ्यांतील सुप्त संघर्षामुळे लाखो प्रवासी वेठीस धरले जात आहेत. प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, नाईलाजास्तव रिक्षा किंवा टॅक्सीचा वापर करावा लागत असल्याने मोठी गैरसोय होत असल्याच्या तक्रारी आहेत.


केवळ नफ्याचा विचार नको

एसटी महामंडळाने शहरातील बस फेऱ्या कमी केल्यामुळे नादुरुस्त काम नसलेल्या ५० चालक व ५० वाहकांकडून सक्तीने रजेचे अर्ज भरून घेतल्याने दि. २२ ऑगस्ट रोजी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानकपणे आंदोलन करून शहर बससेवा बंद ठेवली. त्यामुळे शहरवासीयांची प्रचंड गैरसोय झाली. या पार्श्वभूमीवर केवळ नफ्याबाबत विचार न करता प्रवाशांच्या सेवेला अग्रक्रम देऊन शहर बससेवेच्या फेऱ्या पूर्ववत सुरू करण्याकडे किंवा सदर सेवा महापालिकेकडे वर्ग करण्याबाबत आपण स्वतः लक्ष घालावे, असेही जाधव यांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससाठी ‘रास्ता रोको’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

गेल्या काही महिन्यांपासून पळसे थांब्यावर थांबण्यास टाळाटाळ करणाऱ्या एसटीच्या चालक-वाहकांना पळसे येथील विद्यार्थिनींनी सोमवारी चक्क रास्ता रोको करून चांगलाच हिसका दाखवला.

येथे बसेस थांबत नसल्याने पळसे येथील विद्यार्थ्यांना शाळा-कॉलेजमध्ये जाणे अवघड झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही उपाययोजना होत नसल्याने अखेरीस सोमवारी येथील विद्यार्थिनींचा संयम सुटला आणि त्यांनी चक्क पळसे येथे महामार्गावर एसटी बसेस रोखल्या. या आंदोलनाची दखल आमदार योगेश घोलप यांनी घेत लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी न लागल्यास परिवहन महामंडळाच्या मनमानी कारभाराविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला.

पळसे येथून नाशिकरोड येथे विविध शाळा व कॉलेजांत शिक्षण घेण्यासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मात्र, पळसे येथे काही दिवसांपासून एसटी बसेस थांबत नाहीत. परिणामी पळसे येथील विद्यार्थिनींची नाशिकरोड येथे येण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. कित्येक विद्यार्थिनींचे शैक्षणिक नुकसान होत आहे. या प्रकाराने त्रस्त झालेल्या विद्यार्थिनींच्या संयमाचा बांध अखेरीस सोमवारी दुपारी फुटल्याने त्यांनी थेट महामार्गावर उतरून एसटी बसेस रोखल्या. या प्रकाराने महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. परंतु, या विद्यार्थिनींनी केवळ एसटी बसेस अडवून परिवहन महामंडळाच्या चालक-वाहकांच्या मनमानीचा निषेध नोंदवला.

या आंदोलनाची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी आंदोलनस्थळी धाव घेऊन विद्यार्थिची समजूत घातली व एसटीच्या अधिकाऱ्यांशी या प्रश्नावर चर्चा करून उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले. आमदार योगेश घोलप यांना या आंदोलनाची माहिती मिळताच त्यांनीही या विद्यार्थिनींसह नाशिकरोड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे यांच्याशी या प्रश्नावर चर्चा केली. पळसे येथे पोलिस कर्मचारी नेमण्याचे आश्वासनही नाशिकरोड पोलिसांनी दिले.

--

नियंत्रक आउट ऑफ स्टेशन

एसटीच्या विभागीय नियंत्रक यामिनी जोशी यांच्याशी आमदार योगेश घोलप यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता त्या बाहेरगावी असल्याचे नेहमीचे उत्तर मिळाले. ज्या ज्या वेळी एसटीसंबंधित काही घटना घडतात त्या त्या वेळी विभागीय नियंत्रक कायमच बाहेरगावी कशा असतात, असा प्रश्न यावेळी उपस्थितांना पडला. त्यामुळे आमदार योगेश घोलप यांचा संताप अनावर झाला. येत्या आठवडाभरात शिंदे व पळसे येथील विद्यार्थ्यांच्या बससेवेचा प्रश्न न सुटल्यास जनआंदोलन करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला.

--

काही महिन्यांपासून पळसे बसस्थांब्यावर एसटी बसेस थांबत नाहीत. पंचवटी डेपोची विद्यार्थ्यांसाठीची बससेवाही चार महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे नाशिकरोड येथील कॉलेजला जाण्यासाठी कित्येक तास महामार्गावर उभे राहावे लागते. महामंडळ आम्हाला पास देते, पण बसेस थांबत नाही.

-सविता गायधनी, विद्यार्थिनी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गणेशोत्सवात इच्छुकांनी केला ‘श्रीगणेशा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपलेल्या त्र्यंबक नगरपालिकेच्या निवडणुकांतील इच्छुकांसाठी गणेशोत्सवामुळे ‘श्रीगणेशा’ करण्याची चांगली संधी मिळाली आहे. चौकाचौकात गाठीभेटी, आरती, प्रसाद या निमित्ताने अनेक इच्छुकांनी जनमताचा अंदाज घेत आहेत. यंदा नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडले जाणार असल्यामुळे या जनमानसातून काही इच्छुक कोणत्या पदासाठी निवडणूक लढवावी, याचाही अंदाज बांधतांना दिसत आहेत.

नगरपालिका निवडणुकीतील इच्छुकांसह विद्यमान पदाधिकाऱ्यांनी गणपती बाप्पाचे जल्लोषात स्वागत करून गाठीभेटीचा श्रीगणेशा केला आहे. लोकांची मत जाणून घेत असताना अनेकांना मतदारयाद्यांची प्रतीक्षा लागली आहे. २० जुलै २०१७ रोजी प्रभाग आरक्षण सोडत आणि २७ जुलै २०१७ ला प्रभागरचना जाहीर झाल्यानंतर मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

तथापि प्रभाग रचना निश्चित लक्षात येत नसल्याने मतदारयाद्या येतील तेव्हाच काय ते खरे, असे म्हणून अनेकांनी नगरपालिका व तहसील कार्यालयात चौकशीचा सपाटा लावला आहे.

इच्छुकांकडून बाप्पांना साकडे

साधारणतः महिन्याभरापासून वाढदिवस उत्साहाने साजरे होत आहेत. आता गणरायाच्या उत्सवाचे निमित्त मिळाले आहे. केंद्रात आणि राज्यात विजयाचे विक्रम करत असलेल्या भाजपकडे उमेदवारीसाठी सर्वांचाच ओढा आहे. त्याकरिता पक्षप्रवेश देखील घडत आहेत. यावेळी त्र्यंबक शहर विकास आघाडी स्थापन होत असल्याने त्याचा मोठा फटका भाजपला बसेल, अशी चर्चा सुरू आहे. वास्तविक शहरात भाजपच्या खालोखाल राष्ट्रवादीचे नगरसेवक निवडून येत असतात आणि काँग्रेसचे मतदारही आहेत. ठोस मतदार असलेली शिवसेना स्वबळावर निवडणूक लढविणार आहे. या सगळ्या बाबींचा एकत्रित विचार करता भाजपला ही निवडणूक वाटते तितकी सोपी राहिलेली नाही. तरी या गणेशोत्सवात सर्वच पक्ष कार्यात इच्छुक तिकिटाच्या ‘प्रसादा’साठी सकाळ-संध्याकाळ ‘आरती’ करीत बाप्पांना साकडे घालताना दिसून येत आहेत.

मतदारयाद्यांबाबत अफवा

काही दिवसांपूर्वी १६ ऑगस्टला मतदारयाद्या प्रसिद्ध होणार अशी अफवा पसरली होती. मात्र याद्या आणि निवडणूक कार्यक्रम सोबतच जाहीर होणार असल्याने त्यास अद्याप अवकाश आहे. नगराध्यक्षपद थेट मतदारांकडून निवड होणार असल्याने नगरसेवक की नगराध्यक्ष अशा द्विधा मनःस्थितीत अनेक उमेदवार सापडले आहेत. तर काही जनमताचा कौल आजमावून घेत आहेत. एकंदरीतच गणेशोत्सव हा निवडणूक इच्छुकांसाठी पर्वकाल ठरत असल्याची परिस्थिती आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, करूया ‘उत्सवमूर्ती सन्मान’साठी नोंदणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विघ्नांचे सावट दूर करून मांगल्याचे वातावरण निर्माण करणाऱ्या विघ्नहर्ता गणरायाच्या स्वागतासाठी अवघी नाशिकनगरी सज्ज झाली आहे. गणेशाच्या या उत्सवाचा जल्लोष आणखी रंगतदार करण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ यंदाही ‘उत्सवमूर्ती सन्मान’ हा अनोखा उपक्रम घेऊन आला आहे.

सार्वजनिक गणेशोत्सवात नाशिक ढोलने आपला दबदबा कायम राखला आहे. सर्वांगसुंदर गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करून मांगल्यपूर्ण वातावरणात बाप्पाची पूजा, रंजक आणि प्रबोधन करणारे देखावे करून सार्वजनिक मंडळे या उत्सवाची शान वाढवितात. त्यामुळे आपले वैशिष्ट्य जपण्यासाठी मंडळांचाही खास प्रयत्न असतो. मंडळांना व्यापक व्यासपीठ देण्यासह त्यांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘महाराष्ट्र टाइम्स’ने खास मंडळांसाठी उत्सवमूर्ती सन्मान आयोजित केला आहे. यंदा या उपक्रमाचे दुसरे वर्ष आहे. गेल्या वर्षी झालेल्या स्पर्धेलाही मंडळांनी भरभरून प्रतिसाद दिला होता.

‘उत्सवमूर्ती सन्मान’मध्ये सर्वोत्तम गणेशमूर्ती, इको फ्रेंडली गणेशमूर्ती, सर्वोत्तम मंडळ आणि सर्वाधिक भेट दिले जाणारे मंडळ अशा गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’तर्फे आयोजित या उपक्रमासाठी सोमवारपासून नावनोंदणी सुरू झाली आहे. इच्छुकांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ‘मटा’च्या कार्यालयात येऊन, प्रवेश अर्ज भरून आपल्या मंडळाची नावनोंदणी करावी.

येथे साधावा संपर्क

मोबाइल ः ९५५२५६६८४२

वेबसाइट ः

www.mtganeshutsav.com

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

प्रभाग सभेत कंदील आख्यान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शहरातील विविध नागरी प्रश्नांवर महापालिका प्रशासनाला धारेवर धरत शहराला अंधाराच्या साम्राज्यात ढकलणाऱ्या विद्युत विभागाच्या कामकाजाचा निषेध करण्यासाठी सोमवारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी विभागीय अधिकाऱ्यांना थेट कंदीलच भेट दिला.

शिवसेनेच्या या अनोख्या कंदील आख्यानामुळे नाशिकरोड प्रभाग सभेमध्ये महापालिका अधिकारी व शिवसेना नगरसेवक यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली. पथदीपांच्या प्रश्नावर शिवसेना नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधारी भाजपच्या नगरसेवकांचे चेहेरे मात्र उतरल्यासारखे दिसून आले.

नाशिकरोड येथील महापालिकेच्या विभागीय कार्यालयात प्रभाग समितीची सभा सभापती सुमन सातभाई यांच्या अध्यक्षतेखाली व विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या उपस्थितीत झाली. यावेळी विद्युत, आरोग्य, स्वच्छता, उद्यान, बांधकाम, भुयारी गटार योजना अशा विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. ही सभा शिवसेनेच्या नगरसेवकांच्या आक्रमक भूमिकेमुळे गाजली.

प्रभाग क्रमांक १७ व १८ मधील बंद पथदीप दुरुस्त करण्याकडे महापालिकेचा विद्युत विभाग डोळेझाक करीत असल्याचा आरोप करून विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना नगरसेवक प्रशांत दिवे यांनी चांगलेच धारेवर धरले. बंद पथदीपांची लेखी तक्रार करा, अशी सूचना विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांनी नगरसेवकांना केल्याने नगरसेवक भडकले. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या कामकाजाचा निषेध व्यक्त करण्यासाठी शिवसेना नगरसेवक प्रशांत दिवे, सूर्यकांत लवटे, संतोष साळवे, सुनीता कोठुळे, रंजना बोराडे, जयश्री खर्जुल यांनी सभागृहातच विभागीय अधिकाऱ्यांना कंदील भेट दिला. जयश्री खर्जुल, सूर्यकांत लवटे, सीमा ताजणे यांनी आपल्या प्रभागातील समस्या मांडल्या.

--

भाजप नगरसेवकांचे मौन

या प्रभाग समिती सभेस उपस्थित असलेल्या भाजपच्या प्रा. शरद मोरे, अंबादास पगारे, सरोज अहिरे, पंडित आवारे, मीरा हांडगे, कोमल मेहरोलिया या नगरसेवकांनी या खडाजंगीवेळी मौन बाळगले. त्यामुळे या प्रभाग सभेत भाजपचे नगरसेवक पूर्णपणे बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले.

--

‘त्या’ विषयांवर चर्चाच नाही

या सभेसाठी नगरसेवकांना देण्यात आलेल्या विषयपत्रिकेवर सभेत कोणी चकार शब्दही काढला नाही. लाखो रुपयांच्या निधीची विकासकामे मंजुरीसाठी या विषयपत्रिकेत ठेवण्यात आली होती. परंतु, त्यातील एकाही विषयावर या सभेत नेहमीप्रमाणे चर्चा झाली नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मन्सुरी कुटुंबीय देतात सलोख्याचा संदेश

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

वर्षभरात साजरा होणाऱ्या प्रत्येक सण-उत्सवात हिंदू-मुस्लिम एकतेचा संदेश देवून जातीय सलोखा निर्माण करण्यात येतो. तसेच पोलिस व जिल्हा प्रशासनाच्या पातळीवर सण-उत्सवापूर्वी शांतता कमिटीची बैठक घेण्यात येते. आणि एकात्मतेसाठी प्रयत्न केले जातात. मात्र जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील विटाई गावात लतीफ बशीर मन्सुरी या मुस्लिम कुटुंबाने हिंदू-मुस्लिम एकतेचे दर्शन प्रत्यक्षात गणेशाची स्थापना करून घडविले आहे.

गेल्या ३५ वर्षांपासून विटाई गावातील मन्सुरी कुटुंबात गणेशोत्सव विधीवत पद्धतीने साजरा केला जात आहे. गणपतीच्या आगमनापासून ते विसर्जनापर्यंत दररोज धुप-आरती करून परिसरातील नागरिकांना प्रसादाचे वाटप केले जाते. 'वडील जे-जे करिती, त्यालाच नाम धर्म ठेवीती' या शब्दात गणेशोत्सवाचे वर्णन मन्सुरी यांनी केले. वडिलांच्या परंपरेनुसार हा वारसा जपत असल्याचेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दिनकर पाटलांचे प्रशासनाला डोस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेत भाजपला वारंवार अडचणीत आणण्याचा पत्रप्रपंच सभागृहनेते दिनकर पाटिल यांनी सुरू ठेवला आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांवर सोमवारी लेटरबॉम्ब टाकून त्यांनी शिस्तीचे धडे दिले. यासाठी त्यांनी प्रशासनप्रमुख असलेल्या आयुक्तांनाही मागे टाकत अधिकाऱ्यांसाठी ११ संतवचने लिहून दिली. यात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वर्तन कसे असावे, याचे दाखले दिले असून ‘मरावे परी कीर्ती रुपी उरावे’ अशी वचने नमूद करण्यात आली आहेत.
दिनकर पाटील आणि वाद हे समिकरण जुळलेले आहे. महापालिकेत भाजपची सत्ता असतांनाही, प्रशासनाला वेळोवेळी आरसा दाखवण्यास ते मागे पुढे हटत नाहीत. विशेष म्हणजे पावसाळी गटार योजनेच्या चौकशीवरून त्यांनी सत्ताधाऱ्यांना अडचणीत आणले होते. स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या पाटलांनी सोमवारी महापालिका उपायुक्तांसह विभाग प्रमुखांना पत्र पाठविले. यात अधिकाऱ्यांनी कसे वागावे, कसे कामकाज करावे, काय करू नये, जेवणाच्या वेळा कशा असाव्यात, अधिकाऱ्यांचे कर्तव्य काय, जनतेची सेवा कशी केली पाहिजे अशा प्रश्नांची सरबत्ती केली. आपण जनतेचे नोकर असल्याची जाणीवही अधिकाऱ्यांना करून दिली आहे. मनुष्य मेल्यावर सोबत काही घेऊन जात नाही असा दाखला देत अधिकाऱ्यांना भ्रष्टाचार न करण्याचा सल्ला दिला आहे. जीवन जगायला काहीच लागत नाही. स्वतःमधील नकारात्मक विचार झटकण्याचा त्यांनी सल्ला दिला आहे. पाटील यांच्या पत्रामुळे अधिकारी व कर्मचारी हे कामच करत नसल्याचे दिसून येत असून त्यांनी आपल्याच पक्षाच्या महापौरांना आरसा दाखवला आहे. त्यामुळे पाटील यांच्या पत्राची महापालिका वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

अधिकारावर अतिक्रमण
गेल्या स्थायी समितीत आयुक्तांसह शहर अभियंत्यानी अधिकाऱ्यांचा वेळ हा कामांऐवजी पदाधिकाऱ्यांकडे हेलपाटा मारण्यातच जात असल्याचे सांगितले होते. त्यांचा अप्रत्यक्ष रोख हा पाटील यांच्याकडे होता. सभापतींनी याबाबत अधिकाऱ्यांना गरज असेल तरच जाण्याची सूचना केली होती. त्यामुळे पाटील हे नाराज झाले असून त्यांनी दोन पावले पुढे जात थेट प्रशासनातील अधिकाऱ्यांना आपल्या भाषेतून कर्तव्याची आठवण करून दिली आहे. आपण भ्रष्टाचार करणार नाही आणि करू देणार नाही अशी क्लिनचीट स्वतःलाच मिळवून घेतली आहे. तसेच अधिकाऱ्यांना उपदेशाचे डोसे पाजून आयुक्तांच्या अधिकारावरच अतिक्रमण केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डॉक्टर भरतीच्या अटी शिथिल करण्यास नकार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या वैद्यकीय विभागातील ३२ डॉक्टरांच्या भरतीसाठी असलेल्या नियमावलीत बदल करण्याचा महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने फेटाळला आहे. त्यामुळे वैद्यकीय विभागातील डॉक्टरांच्या पदासाठी शासकीय सेवेत तीन वर्षाच्या सेवेची अट कायम राहणार आहे. त्यामुळे प्रशासनाला आता नियमानुसारच वैद्यकीयची पदे भरावी लागणार आहेत.
राज्य सरकारने वैद्यकीय विभागात ३२ डॉक्टरांच्या भरतीला मंजुरी दिली आहे. त्यामुळे महापालिकेने डॉक्टरांच्या भरतीसाठी जाहीरातही काढली. परंतु, या पदांसाठी यापूर्वी शासकीय सेवेत तीन वर्षांचा कामाचा अनुभव असल्याची अट आहे. त्यामुळे या पदांसाठी प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे महापालिकेने तीन वर्षांची अट शिथिल करावी, असा प्रस्ताव सादर केला होता. डॉक्टरची पदवी मिळविलेल्यांना या पदावर भरती करण्यास परवानगी मागितली होती. या प्रस्तावाबाबत राज्य सरकारचे मार्गदर्शन अखेर प्राप्त झाले आहे. सरकारने नियमावलीत सूट देण्याची मागणी फेटाळून लावली आहे. वैद्यकीय विभागाच्या भरती नियमावलीत बदल करता येणार नसल्याचे स्पष्टीकरण सरकारने दिले आहे. त्यामुळे महापालिकेला आता नियमावलीनुसारच ३२ डॉक्टरांची भरती करावी लागणार आहे. त्यामुळे अनुभवी डॉक्टरांचा शोध महापालिकेला घ्यावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांना मुदतवाढ

$
0
0

अक्षय सराफ, कॉलेज क्लब रिपोर्टर
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे परीक्षा विभागाचे सर्व्हर डाउन व तांत्रिक अडचणींचा विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरताना मनस्ताप सहन करावा लागला. अनेक विद्यार्थ्यांचे सोमवारपर्यंत परीक्षा अर्ज भरले न गेल्याने विद्यापीठाने तीन दिवस मुदतवाढ दिली आहे.
पुणे विद्यापीठाच्या वेबसाइटवर तांत्रिक अडचणी व सर्व्हर डाउनची समस्या मंगळवार व बुधवारीही येत असल्याने इंजिनीअरिंगच्या द्वितीय व तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांना या समस्येचा सामना करावा लागला. दरम्यान, या प्रकरणी परीक्षा विभागाचे बी. डी. देशमुख यांनी सांगितले, की आमच्याकडे विद्यार्थ्यांकडून अर्ज भरतानाच्या अशा अनेक प्रकारच्या तक्रारी आल्या होत्या. विद्यापीठाची वेबसाइट अजून पूर्णपणे अपडेट झाले नसल्याने ही समस्या उद्भवत होती. वेबसाइट सुरळीत चालू झाले आहे. अनेक विद्यार्थ्यांचे अर्ज भरले न गेल्याने मुदतवाढ दिली गेल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सबलीकरण ही जबाबदारी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
स्त्री सबलीकरण ही क्रांती नाही तर जबाबदारी आहे. महिलांनी आत्मविश्वास वाढवला, आपली तर्क बुध्दीचा वापर केला आणि समयसूचकता दाखवली तर महिलांकडे उठणारी बोटं आपोआप खाली होतील. समाजातच नाही तर कुटुंबातही यामुळे महिलेला सन्मान मिळू शकतो, असे मत मंजुषा चौघुले यांनी व्यक्त केले. अभिनेत्री आणि स्वरंक्षण तज्ज्ञ म्हणून चौघुले काम करतात.
शहर पोलिस दल आणि महिला व बालकल्याण विभागातर्फे आयोजित महिला स्वसंरक्षण या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. महिलांनी आपले बदल घडवताना कुटुंबाकडे दुर्लक्ष होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी, असा सल्ला चौघुले यांनी दिला. आत्मविश्वास, समयसूचकता, देहबोली अशा साध्या बाबीत सुधारणा करून आपले ध्येय साधता करता येते, हे त्यांनी उदाहरणासह पटवून दिले. मुलांच्या संगोपनासाठी महिला करियरला मुठमाती देतात. त्यावेळी त्यांच्या मनात खदखद असते. कुटुंबासाठी आपण काहीच करीत नाही, याची जाणीव त्यांना टोचत असते. मात्र, मुलांचे योग्य संगोपन करणे हेही एक कामच असून, ते विनामोबादला करीत आपण करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दुसऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याची सवय कमी केल्यास आत्मनिर्भरता वाढते. आपल्या जीवनात पाच व्यक्ती अशा असाव्यात की त्यांनी कोणत्याही परिस्थितीत आपली साथ दिली पाहिजे. व्हर्चुअल मैत्री कामी येत नाही, याची मनाशी गुणगाठ ठेवा, असे चौघुले यांनी उदाहरणासह त्यांनी पटवून दिले. स्वसंरक्षणात महिलांकडून होणारा विरोध महत्त्वाचा असतो. मात्र, महिला याकडे दुर्लक्ष करतात. यावेळी स्वरक्षणासाठी वापरल्या कराटे, मार्शल आर्टसच्या बेसिक टिप्स महिलांना सप्रमाण दाखवून दिल्यात. कार्यक्रमास महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनीता सिंगल, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, आमदार देवयानी फरांदे, सिमा हिरे, महापौर रंजना भानसी, प्रज्ञा पाटील, नमिता कोहक, आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊत, मोनिका अथरे यांच्यासह आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिला उपस्थित होत्या. पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी प्रस्ताविक केले. महिला व बालकल्याण विभागाचे अधिकारी दत्तात्रय मुंडे यांनी मनोगत व्यक्त केले.

व्हुर्च्युअल सिक्युरिटी समजून घ्या
फेसबुक, व्हॉट्सअॅप अथवा सोशल मीडियावरील मैत्रीचे बंध महिलांसाठी जीवघेणे ठरत आहे. सहज पाठवलेल्या फोटोंचा गैरवापर होतो. कोणत्याही परिस्थितीत महिलांनी आपले कोणतेही फोटो काढून देण्यास विरोध केला पाहिजे. किंबहुना आपणही तसे फोटो दुसऱ्यास पाठवयलाच नको. अगदी आपला मित्र, नवरा, प्रियकर कोणीही असो त्यास त्यावेळी विरोधच करायला हवा. यामुळे अगदी शाळकरी मुलींपासून तरुण मुलींनी आत्महत्या केल्या. बाथरुम सेल्फी, बेडरुम सेल्फी असे प्रकार महिलांची सुरक्षितता धोक्यात आणतात. त्यास महिलाच थांबवू शकतात, असे चौघुले यांनी काही ताज्या घटनांसह पटवून दिले.

पालक-पाल्य संवाद दृढ व्हावा
पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सायबर सिक्युरीटी तसेच अल्पवयीन मुलींची मानसिकता यावर प्रकाश टाकला. शहरातून २०१६ मध्ये १३६ अल्पवयीन मुली घर सोडून पळून गेल्या. यातील १३१ मुलींना परत आणण्यात पोलिसांना यश आले. यंदाही सुमारे १०० मुली पळाल्या असून, त्यातील ८२ मुलींचा शोध लागला आहे. अल्पवयात कोणतीही समज नसताना मुलीच नाही तर मुलेही घर सोडतात. यासाठी पालकांचा आणि मुलांचा संवाद अधिक दृढ व्हायला हवा. तसेच आपला मुलगा किंवा मुलगी स्मार्टफोनमध्ये नक्की काय करते, याचा आढावा घ्यायलाच हवा, असे सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंगणवाडी सेविकांचे वेतन रखडले

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील अंगणवाडी, मिनी अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन फक्त आधार लिंक नसल्याने तसेच हजेरी अपटेड होत नाहीत म्हणून रखडले आहेत. सुमारे एक लाख अंगणवाडी सेविकांचे वेतन थेट बँकेत जमा होत असून, लवकरच सर्वांच्या वेतनात वाढ होणार असल्याचे महिला व बालकल्याण विभागाच्या सचिव विनिता सिंगल यांनी सांगितले.
शहर पोलिस दल आणि महिला व बाल कल्याण विभागामार्फत आयोजित कार्यक्रमासाठी सिंगल उपस्थित होत्या. राज्यात दोन लाख सहा हजाराच्या पुढे अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. काही महिन्यांपासून अंगणवाडी सेविकांना वेळेत आणि पारदर्शक पध्दतीने वेतन मिळावे केंद्र सरकारच्या पब्लिक फायनान्सल मॅनेजमेन्ट सिस्टिम (पीएफएमएस) या प्रणालीचा वापर केला जातो. या प्रणालीद्वारे हे मानधन अंगणवाडी कर्मचाऱ्याच्या बँक खात्यात थेट जमा केले जाते. यासाठी आधारकार्ड लिंक करणे तसेच हजेरी अपटेड असणे गरजेचे आहे. नाशिकमध्ये हे काम रखडल्याने सुमारे १० अंगणवाडी सेविकांना दोन महिन्यांपासून पैसे मिळालेले नाहीत. वास्तविक ही तांत्रिक चूक असून, येत्या दोन दिवसात दोन्ही कामे पूर्ण झाल्यास ऑगस्ट महिन्याचे वेतनही खात्यात जमा होईल, असा विश्वास सिंगल यांनी व्यक्त केला. या खात्याकडे पुरेसा निधी असून, सरकार सकारत्मक पध्दतीने महिला सुरक्षेचा मुद्दा हाताळत असल्याचे त्यांनी सांगितले.

वेतनवाढीसह इतर लाभ
राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याची मागणी आहे. या पार्श्वभूमीवर सरकारने एक समिती नियुक्त केली असून, मानधनवाढ समितीच्या बैठकीत यावर सकारत्मक चर्चा झाली आहे. यास मंजुरी मिळाल्यानंतर मानधन वाढ होईलच पण निवृत्तीवेतन, विमा, इतर भत्तेही लागू होतील. अंगणवाडी सेविकांवर ग्रामीण भागाची मोठी जबाबदारी आहे. लहान मुलांबरोबर स्तनपान करणाऱ्या माता, गर्भवती महिला यांच्या आरोग्याची काळजी अंगणवाडी सेविका घेतात. सरकार तुमच्या प्रश्नांबाबत सकारत्मक असताना बहिष्कारासारखे आयुध वापरले गेल्यास त्याचा फटका ग्र्रामीण भागाला बसत असल्याची खंत सिंगल यांनी व्यक्त केली.

माझी कन्या भाग्यश्री
सरकारमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवर यांनाही कन्याच आहे. दुसरीकडे गोपीनाथ मुंडे यांचा वारसाही त्याच्या मुलीच पुढे नेत आहेत. मुली मुलांपेक्षा कमी नाही. तरीही मुलांच्या जन्मांना प्राधन्य दिले जात असल्याने सरकारने माझी कन्या भाग्यश्री ही महत्त्वकांक्षी योजना आणली आहे. एकच मुलगी असलेल्यांना ५० हजार तर दोन मुली असलेल्या प्रत्येकी २५ हजार असे ५० हजार रुपये सरकार देते. हे पैसे थेट मुलींच्या नावे बँकेत जमा होत असल्याने त्याची शाश्वती कायम राहते. या योजनेचा सर्वांनी लाभ घ्यावा आणि प्रसार तसेच प्रचार करावा, असे आवाहन सिंगल यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एसबीआय’कडून ज्येष्ठांची पिळवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भारतीय स्टेट बँकेकडून (एसबीआय) ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन खात्यात किमान पाच हजार रुपये ठेवण्याचा तगादा लावला जात आहे. ज्यांच्या खात्यात अशी रक्कम नसेल त्यांच्या खात्यातून परस्पर ११५ रुपये वजा करून घेतले जात आहेत. याबाबत तक्रार केल्यानंतरही बँक अधिकाऱ्यांकडून कोणतीही दखल घेण्यात आलेली नाही.

‘एसबीआय’चे ग्राहक असलेले पी. टी. गवळी हे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंडचे पेन्शनर आहेत. या फंडाच्या पेन्शनसाठी ‘एसबीआय’च्या नाशिक शाखेत २०१६ मध्ये ५०० रुपये भरून त्यांनी पेन्शन खाते सुरू केले. त्यावेळी किमान ५०० रुपये किमान भरुन पेन्शने खाते उघडता येत होते. किमान बॅलन्स २५० ते ५०० रुपये खात्यात ठेवण्याचा नियम होता. तसेच त्यांचे खाते सुरू होते. बँकेने एप्रिल २०१७ पासून पेन्शनच्या बचत खात्यात पाच हजार रुपये ठेवण्याची सक्ती केली आहे. तसेच किमान बॅलन्स पाच हजार रुपये न ठेवल्यास ११५ रुपये पेन्शन खात्यातून परस्पर रक्कम काढून घेतली जाते. गडकरी यांनी नोव्हेंबर २०१६ मध्ये हयातीचा दाखला दिला. तरीही त्यांची एप्रिल २०१७ पासून आजपर्यंत पेन्शन जमा झालेली नाही. याबाबत बँकेने काही कळवण्याची तसदीही घेतलेली नाही. मात्र, बॅँकेने एप्रिल २०१७ पासून पेन्शन जमा न करता बॅलन्स कमी असल्याने दरमहा ११५ प्रमाणे तीन ते चार महिन्याचे चार्जेस आकारून त्यांचा बचत खात्याचा बॅलन्स झिरो केला. याबाबत त्यांनी चौकशी केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही.

गडकरी यांना दरमहा मिळणारी पेन्शन एक हजार रुपयाच्या आता आहे. ‘एसबीआय’च्या नियमानुसार पेन्शन न काढायची म्हटल्यास पाच हजार बॅलन्स ठेवण्याची पाच ते सहा महिने पेन्शन काढता येणार नाही. पेन्शनधारकाची आर्थिक परिस्थिती व जमा होणारी पेन्शन विचारात घेऊनच बॅलन्स आकरणे संयुक्तिक ठरेल. कमकुवत घटकांना व ज्येष्ठ नागरिकांना ‘एसबीआय’ने त्रास देऊ नये. पंतप्रधानांच्या जनधन खात्याप्रमाणेच ज्येष्ठांचे खाते झिरो बॅलन्स करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

बँक अधिकारी हतबल
याबाबत बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा निर्णय धोरणात्मक आहे. या प्रश्नी आम्ही काहीही करू शकत नाही, अशी प्रतिक्रिया दिली. बँक अधिकाऱ्यांच्या या हतबलतेमुळे ज्येष्ठांना न्याय कोण देणार? असा सवाल उपस्थित होत आहे.

गेल्या काही दिवसांपासून बँकेकडून असमाधानकारक वागणुक मिळत आहे. बँक मनमानी कारभाराने अन्याय करीत आहे. ‘एसबीआय’ने ज्येष्ठांना झिरो बॅलन्सची खाती उघडून द्यावीत.
- पी. टी. गडकरी, ज्येष्ठ नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संगीत मेळ्याची मेजवानी रंगतदार!

$
0
0

१९५३ सालाची गोष्ट. मी नुकताच नाशिकमध्ये आलो होतो. स्वातंत्र्य मिळाल्याने सर्वत्र देशभक्तीचे वातावरण होते. त्याचा परिणाम गणेशोत्सवावरही दिसून यायचा. प्रचंड उल्हासमय वातावण असायचे.
- विनायकदादा पाटील
१९५३ सालाची गोष्ट. मी नुकताच नाशिकमध्ये आलो होतो. स्वातंत्र्य मिळाल्याने सर्वत्र देशभक्तीचे वातावरण होते. त्याचा परिणाम गणेशोत्सवावरही दिसून यायचा. प्रचंड उल्हासमय वातावण असायचे. गणेशोत्सव सुरू होण्याच्या एक महिना अगोदर चर्चांना उधाण यायचे. कोणत्या मंडळात कुठला देखावा सादर होणार याची सर्वांना उत्सुकता असायची. ही चर्चा गणेशोत्सव संपून गेल्यानंतरही होत असे; मात्र त्याचे स्वरुप वेगळे होते. कोणत्या मंडळाने चांगला देखावा केला हा त्यावेळचा विषय असे. त्याकाळी चित्रपट मोठ्यांच्या करमणुकीचा विषय होता. सर्वसामान्यांसाठी गणेशोत्सवाच्या काळात संगीत मेळे सादर व्हायचे. त्याकाळात नावाजलेली नट मंडळी या मेळ्यांमध्ये काम करीत होती. त्याचा अभिनय पाहणे ही मेजवानी असे. मेळ्यांमधून विविध विषयांवर प्रबोधन होत असे. पुढे-पुढे प्रबोधनाची जागा करमणुकीने घेतली आणि मेळे बंद झाले. नुकतेच स्वतंत्र्य मिळाले असल्याकारणाने देखाव्यावर देखील त्याचा प्रभाव होता. गांधी, नेहरू हे प्रत्येक देखाव्यात असणार असा जणू नियम होता. कधी-कधी गांधी आणि नेहरूंच्या मुखवट्यांऐवजी गणपतीचे मुखवटे लावले जात असे. यावेळी पीक, धान्य, पाणी अशा विषयांवरच्या देखाव्यांची चलती होती. कालांतराने देखाव्यांमध्ये तांत्रिक बाबींचा समावेश होऊ लागला. पुतळ्यांऐवजी हलते-चालते पुतळे आकाराला येऊ लागले. लहानपणी ते पहाताना मोठा औत्सुकतेचा विषय असायचा. यावेळी हत्ती सोंड फरवतो, कालिया मर्दन, राम-भरत भेट असे पौराणिक देखावे मोठ्या प्रमाणात तयार होत. यावेळी गणपती पाहणे हीदेखील पर्वणी असायची. मी खेड्यातून आलेलो होते. गणपती पाहण्यासाठी गावाकडून आलेला मंडळीचा डेरा माझ्याकडे असायचा. ग्रामीण भागात वीज नसल्याने त्यांना शहरातील गणपती मंडळांचे मोठे अप्रुप वाटायचे. घरात जणू महोत्सव भरायचा, मजा यायची. नंतर त्याला थोडे उत्सवी स्वरुप यायला लागले. त्यावेळी तांबट, भोईर, लोंढे यांच्या मूर्ती पाहणे हे भाग्याचे लक्षण होते. यावेळच्या मिरवणुका आठ ते दहा तास चालत. लेझीम, डंबेल्स असे विविध प्रकार त्यात समाविष्ट असायचे. त्यावेळी लोक एकत्र यावी हाच टिळकांचा उद्देश होता. आता संवादाची माध्यमे वाढली, बदलली. त्यामुळे संवादाची जागा अपप्रवृत्तींनी घेतली. आज मिरवणूक पहायला जाण होत नाही; परंतु ते डिजेचे रुप पाहून नकोसे वाटते. कुठेतरी या गोष्टीला आळा बसला पाहिजे, असे मला आवर्जून वाटते. त्याकाळी गणेशोत्सवाचा त्रास नव्हता. तर ते दहा दिवस संपू नये, असे सगळ्यांना वाटायचे. आजची परिस्थिती उलट आहे असे मला वाटते. कोणताही सार्वजनिक उत्सव हा सगळ्यांच्या आनंदाकरता असतो. काहींचा आनंद बहुतेकांना त्रास अशी अवस्था असेल तर प्रथेमध्ये कालसंगत बदल करणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साधेपणातच उत्सवाची मजा

$
0
0

- पुष्पाताई हिरे, माजी मंत्री

माझे माहेर कोकणातले. कोकणापासून मुंबईपर्यंत गणेशोत्सवाची मजा काही वेगळीच असते. आमच्या घरात या उत्सवात धम्माल असायची. नातलग, पाहुणे यांचा राबता असायचा. सर्वांसाठी उकडीचे मोदक केले जात. कांदा आणि लसून न वापरता स्वयंपाक केला जात असे. गणेशोत्सवकाळात मांसाहार वर्ज्य असे. अत्यंत सात्विकपणे हा उत्सव साजरा होत असे. त्यामुळे या उत्सवाच्या बाबतीत मी पूर्वीपासूनच अधिक हळवी आहे. माझे आजोबा तसेच वडील नोकरीनिमित्त नाशिकमध्ये आले. तेव्हापासून नाशिकमधील गणेशोत्सवाशी माझा संबंध आला. नाशिकमध्येही अत्यंत शांततेने, साधेपणाने आणि भक्तीपूर्ण वातावरणात गणेशोत्सव साजरा होत असे. आताही होतो. नाही असे नाही. परंतु, काळानुरूप या उत्सवाचे स्वरुप आणि तो साजरा करण्याची पद्धती बदलली आहे. उत्सव संस्कृतीचे वाहक असतात. ते साजरे केलेच पाहिजेत. परंतु, त्याचे महत्त्व जपण्याची जबाबदारीही सर्वांचीच आहे. असे उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही, याची काळजी प्राधान्याने घ्यायलाच हवी.
आमच्यावेळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या मर्यादित होती. उत्सवात साधेपणा अधिक होता. त्यावेळी फारसा भपकेबाजपणा आणि धांगडधिंगाणा नव्हता. तो हल्ली अधिक असतो, असे वाटते. गणेशोत्सवाशी भाविकांच्या श्रद्धा जोडलेल्या असतात. श्रद्धेने वाहिलेले फुलही ईश्वराला प्र‌िय असते, असे मला वाटते. त्यामुळे इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घेऊनच हा उत्सव साजरा करायला हवा. भपकेबाजपणा. धांगडधिंग्यासाठी अन्य अनेक उत्सव आणि सण असतात. बाप्पाच्या उत्सवात तो टाळायला हवा, असे मला वाटते. उत्सव काळात गणेश विसर्जनाच्या मिरवणुका निघतात. त्यांमध्ये कर्णकर्कश आवाजात लाउड स्पिकर वाजविले जातात. त्याचा त्रास वयोवृद्ध व्यक्ती, रुग्णांना अधिक होतो. आमच्यावेळी ही काळजी अधिक घेतली जात असे. आताही ती प्राधान्याने घ्यायला हवी. यंदा कोर्टाने डीजेच्या आवाजाबाबत अनेक मर्यादा घालून दिल्या ही स्वागतार्ह बाब आहे. गणेशोत्सव भक्तीपूर्वक साजरा करण्यास त्यामुळे नक्कीच हातभार लागेल.

(संकलन : प्रवीण बिडवे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाच दिवसांचे बाप्पा निघाले

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

घराघरात प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या गणेशाला मंगळवारी, पाचव्या दिवशी वाजतगाजत निरोप देण्यात आला. गणेशविसर्जनासाठी सायंकाळनंतर भक्तांनी गर्दी केली होती. गणेशाची स्थापना झाल्यानंतर दीड दिवस, पाचव्या तसेच सातव्या दिवशी गणेशाचे विसर्जन केले जाते. पाचव्या दिवशी सायंकाळी विधिवत पूजा केल्यानंतर लहानथोरांनी गणरायाला निरोप दिला. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ अशा घोषणा देत तरुण मंडळी गटागटाने जात होती.

पाच दिवसांच्या गणरायाला निरोप देण्यासाठी दुतोंड्या मारुतीपासून ते गोदावरी-कपिला त्रिवेणी संगमापर्यंत गोदाघाट परिसरात भाविकांची संध्याकाळी गर्दी झाली होती. गणेशभक्त आपल्या कुटुंब‌ियांसमवेत मोठ्या भक्तिभावाने गोदाघाटावर येऊन आरती करत गणेशमूर्तींचे विसर्जन करत होते. ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या...’, ‘अर्धा लाडू फुटला गणपती बाप्पा उठला’, ‘एक दोन तीन चार गणपतीचा जयजयकार...’ असा जयघोष करत नदीपात्रात तरुणांनी उतरून बाप्पाला निरोप दिला. काही कुटुंब‌ियांनी गोदाघाटावर वाजत-गाजत जल्लोषात गणरायाची छोटेखानी मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला.

गौरी पटांगण, रोकडोबा घाट, टाळकुटेश्वर घाट, लक्ष्मीनारायण घाट, गोदावरी-कपिला संगम आदि ठिकाणी भाविकांनी पाच दिवसांच्या गणरायांचे विसर्जन करण्यासाठी गर्दी केल्याचे दिसून आले. सायंकाळनंतर गोदाघाटाकडे येण्यासाठी गर्दी उसळली होती. त्यामुळे नदीकडे येणारे रस्ते गर्दीने फुलून गेले होते. शहरातील नदीकाठी गणेशविसर्जनाची खास सोय करण्यात आली होती. विसर्जनासाठी हौद उभारण्यात आले आहेत. नदीचे प्रदूषण होऊ नये म्हणून अनेकांनी या हौदात गणेशाचे विसर्जन केले. तर, काहींनी नदीतील वाहत्या पाण्यात विसर्जन केले. तत्पूर्वी, येथेही विधिवत गणेशाची पूजा करण्यात येत होती. घरातही बादलीत गणेशाचे विसर्जन करण्यात आले. सोसायट्यांमध्ये बसविण्यात आलेल्या गणरायाला निरोप देण्यात आला. काही सोसायट्यांनी ढोलपथकाच्या साह्याने वाजतगाजत मिरवणूक काढली.

सुरक्षेची काळजी

गणेशविसर्जनावेळी भाविकांना सहकार्य करण्यासाठी अग्निशामक विभागातर्फे कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही स्वयंसेवक गर्दी टाळण्यासाठी नागरिकांना सूचना देताना दिसत होते. नदीपात्रात कुणी उतरू नये, यासाठी ठिकठिकाणी अडथळे उभारण्यात आले होते. निर्माल्य नदीपात्रात टाकले जाऊ नये म्हणून महापालिका कर्मचाऱ्यांतर्फे निर्माल्य संकलित करण्यात येत होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाहतूक आराखडा चार हजार कोटींचा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीकडे झेपावणाऱ्या नाशिक शहरातील संभाव्य वीस वर्षातील सार्वजनिक वाहतूक व दळणवळण आराखड्याचे दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने (यूएमटीसी) मंगळवारी सादरीकरण केले. सर्वंकष वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी वीस वर्षांत ४,१३५ कोटी रुपये खर्चाची शिफारस करण्यात आली आहे. त्यात रस्ते विकासासाठी ७६०, तर बस व्यवस्थेसाठी तीन हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित धरण्यात आला आहे.

लोकसंख्यावाढीच्या दृष्टीने शहरात हाय कपॅसिटी मास ट्रान्स्पोर्टवर भर देण्यासोबतच बसेसची संख्या वाढवणे, ट्रामची व्यवस्था, रिंग रोड पूर्ण करणे, फूटपाथ, सायकल ट्रॅकला प्राधान्य आदी सूचना करण्यात आल्या आहेत. शहरातील रस्त्यांची रुंदी वाढवण्यासह मिसिंग पॉइंट जोडण्यावर भर दिला आहे. बससेवा पीपीपी तत्त्वावर चालवण्याची शिफारस करण्यात आली आहे.

शहराचे नागरीकरण झपाट्याने होत असून, लोकसंख्याही वाढत आहे. त्यामुळे शहरासमोर सध्या वाहतूक व पार्किंगचा सर्वांत मोठा प्रश्न असून, त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी गेल्या वर्षी एप्र‌िलमध्ये संबंधित कंपनीला शहरातील रस्त्यांचे सर्वेक्षण करून पुढील वीस वर्षांसाठी शहराचा वाहतूक आराखडा तयार करण्याचे काम देण्यात आले होते. त्यात बीआरटीएसच्या चाचपणीसह मोनोरेलसंदर्भातही अहवाल देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार कंपनीने गेले वर्षभर शहरातील सर्व रस्त्यांचा व पार्किंगच्या स्थितीचा अभ्यास केल्यानंतर आपला अहवाल तयार केला आहे. पालिकेत मंगळवारी शहरातील विविध घटकांसमोर कंपनीचे अधिकारी एस. रामकृष्ण यांनी सादरीकरण केले. त्यात शहराची वीस वर्षांची वाहतूक समस्या सोडविण्यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करून बसेसची संख्या वाढवण्यावर भर देण्याची शिफारस करण्यात आली आहे.

शहराची सध्याची लोकसंख्या १७ लाख ४५ हजारांच्या आसपास असून, २०३६ मध्ये ती ३३.२२ लाख होईल, असा अंदाज अहवालात वर्तविण्यात आला आहे. सद्यःस्थितीत शहरातील सर्वाधिक समस्या ही वाहतूक आणि पार्किंगची आहे. त्र्यंबकरोड, गंगापूररोड, नाशिकरोड ते शालिमार हे तीन रस्ते सोडले तर इतर रस्त्यांवर वाहतुकीचा कोंडमारा होत आहे. त्यामुळे कंपनीच्या वतीने आगामी वीस वर्षांचा सर्वंकष वाहतूक आराखडा तयार केला आहे. त्यात सार्वजनिक वाहतूकव्यवस्था अधिक मजबूत करण्याची शिफारस कंपनी केली आहे. बससाठी मार्ग निश्चित करण्यासह बसेसची संख्या वाढविण्याची सूचना केली आहे. कंपनीने तयार केलेल्या आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी आर्थिक आराखडाही तयार करून दिला आहे. खर्चासाठी चार फेज तयार केले आहेत. वीस वर्षांत शहर वाहतूक आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी ४,१३५ कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यानुसार रस्ते विकासावर ७६० कोटी, पादचारी प्रकल्पांसाठी १८४ कोटी, बसव्यवस्थेसाठी २,९६१ कोटी, मालवाहतूक ९५ कोटी, इंटेलिजन्ट ट्रान्स्पोर्ट १३० कोटी आणि पार्किंगसाठी आगामी वीस वर्षांत साडेचार कोटी खर्च करण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. ही रक्कम ही राज्य व केंद्र सरकारच्या निधीमधून करता येईल, अशी शिफारस केली आहे. सरकारच्या अमृत योजनेतूनही निधी मिळवण्याच्या सूचना केल्या आहेत. सोबतच या आराखड्यात बीआरटीएस, मोनोरेलसंदर्भातही सूचना करण्यात आली आहे. प्रशासनाने त्यांच्या वाहतूक आराखड्याची अंमलबजावणी केली तर वाहतूक कोंडीतून सर्वसामान्यांची सुटका होण्यास मदत होणार आहे.

सीटी बससेवा पीपीपीवर

यूएमटीपीच्या अहवालात शहरातील सार्वजनिक बससेवा ही पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर चालवण्याची शिफारस करण्यात आली आहे. शहरात सध्या महामंडळाकडून ५०८ मार्गांवर २४३ बसेस धावतात. यातील ५० टक्के मार्गांवर तर दिवसातून एकच बस धावते. त्यामुळे शहरात बसेसची संख्या वाढवणे आवश्यक आहे. सध्या शहराला ६९८ बसेसची गरज आहे. २०३६ पर्यंत १३२९ बसेसची गरज पडणार आहे. पाच महत्त्वाच्या मार्गांवर बसेस चालवून खासगी प्रवासी वाहतूक ही तीनपर्यंत मर्यादित ठेवण्याची शिफारस करण्यात आली आहे. सोबतच लहान बसेसचाही पर्याय ठेवण्यात आला आहे.

वाहने ७.३२ लाख

शहरात वाहनसंख्या वेगाने वाढत असल्याचे सर्वेक्षणात समोर आले आहे. सध्या शहरात ७ लाख ३२ हजार वाहने असून, त्यात ७४.६ टक्के वाहने ही दुचाकी आहेत, तर १२.३ टक्के वाहने चारचाकी आहेत. बससेवा कमकुवत असल्याने खासगी वाहने वाढत असल्याचा दावा करण्यात आला आहे. शहर बससेवेकडून रोज केवळ १.२३ लाख प्रवाशांचीच वाहतूक होते. खासगी प्रवासी वाहतुकीमुळे बससेवा वापरणाऱ्यांमध्ये घट होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाढत्या खासगी वाहनांमुळे सध्या वाहतुकीची कोंडी, पार्किंगची अडचण, वाहतुकीचा वेग मंदावणे, चौकांची कोंडी, पादचाऱ्यांची अडचण, अवैध प्रवासी वाहतुकीला तोंड द्यावे लागत आहे.

शिफारशी

शहर बसेसची संख्या वाढवणे, हजार लोकसंख्येमागे चार बसेस, बसेस,ऑटोसाठी स्वतंत्र रुट हवेत, २५ वाढीव चौकांसाठी सिग्नल बसवणे, पादचाऱ्यांसाठी १५० किमी पदपथ, किमान ९३ किमीचा सायकल ट्रॅक, शहराच्या सीमेवर ट्रक टर्मिनस तयार करणे, रिंगरोडची पूर्तता करणे, रस्त्यांची रुंदी वाढवणे, सिग्नलची संख्या वाढवणे, ४० ठिकाणी पे अँड पार्किंग, रस्त्यांमधील त्रुटी कमी करा, याबाबत धोरणे ठरवा, जमीन वर्गीकरण आणि वाहतूक, सार्वजनिक वाहने, पादचारी व सायकल, रस्ते विकास, मालवाहतूक, रहदारी अभियांत्रिकी, तंत्रज्ञान

या आहेत शिफारशी

रस्ते सुधारणा आवश्यक

शहरातील महत्त्वाचे ६० व अन्य ५९ किलोमीटर रस्त्यांचे रुंदीकरण या आराखड्यात सुचविण्यात आले आहे. सोबतच ५८ किलोमीटर लांबीचा रिंगरोड प्रस्तावित करण्यात आला आहे. रिंग रोड प्रकल्पात २ ब्रिजेसचाही समावेश केला आहे. त्यामुळे रहदारीच्या मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल.

दिवसा मालवाहतूक बंद

शहरात येणाऱ्या मालवाहतुकीला सकाळी ८ ते सायंकाळी ८ पर्यंत बंदी करण्याची शिफारस करण्यात आली आहे. सोबतच शहराबाहेर ट्रक टर्मिनल्स उभारण्यात यावे. या मालाची चढ उतरण, गॅरेज, ड्रायव्हरसाठी थांबा, बुकिंग काऊंटरची व्यवस्था करावी अशा सूचना केल्या आहेत. सध्या आडगाव येथेच ट्रक टर्मिनल्स असून, चेहेडी व मानूर परिसरात ट्रक टर्मिनल्स करण्याची शिफारस केली आहे.

पार्किंगही पीपीपीवर

शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी शहरात विविध ठिकाणी पे अँड पार्कची व्यवस्था करण्याची शिफारस करण्यात आली आहे. यामध्ये इलेक्ट्रॉनिक पेमेंट, तसेच स्मार्ट कार्डद्वारे शुल्क आकारणी करण्याची सूचना करण्यात आली आहे. सोबतच महत्त्वाच्या स्ट्रीट पार्किंग व्यवस्था करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तृतीयपंथीयांवर धर्मांतराचा दबाव

$
0
0

धुळ्य ात पोलिस अधीक्षकांना निवेदन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरात दोन धर्मातील तृतीयपंथीयांमध्ये गेल्या तीन-चार महिन्यांपासून वाद सुरू आहेत. या वादाचे रुपांतर गणेश चतुर्थीच्या दिवशी हाणामारीत झाले. याप्रकरणी हिंदू धर्मातील तृतीयपंथीयांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. याबाबत सोमवारी (दि. २८) त्यांनी जिल्हा पोलिसप्रमुख एम. रामकुमार व जिल्हाधिकारी दिलीप पांढरपट्टे यांना निवेदन दिले आहे. तसेच त्यांच्याकडून धुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शनदेखील करण्यात आली.

यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात धर्मांतरासाठी आमच्यावर दबाव टाकण्यात येत असून, धर्मांतर केले नाही तर जीवे ठार मारण्याची धमकीही देण्यात आली आहे, असे नमूद केले आहे. याप्रकरणी पोलिस प्रशासनाने वेळीच घटनेची चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी हिंदू तृतीयपंथीयांनी केली आहे. अन्यथा शहरात दोन गटांत वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही निवेदनाद्वारे मांडण्यात आले आहे.

शहरातील मालेगावरोडलगत यल्लमादेवी मंदिरात हिंदू तृतीयपंथी पार्वती परशूराम जोगी यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. यात उज्जैन, इंदूर येथील पिठाधीश्वर किन्नर आखाडाचे आम्ही सदस्य असून, हिंदू तृतीयपंथी म्हणून धुळे शहरातील मालेगाव रोडलगत यल्लमादेवी मंदिरात वास्तव्याला आहेत, असे म्हटले आहे. यल्लमादेवीचे पुजारी म्हणून आमचा पूर्वापार मान असून, आजच्या स्थितीत सातवी पिढी कार्यरत आहे. हिंदू धर्मातील असल्याने सण उत्सवाच्या काळात जोगवा मागून पोट भरत असतो. आमचा पंधरा जणांचा गट असून, कोणालाही त्रास न देता अनेक वर्षांपासून आम्ही जीवन जगत आहोत, असेही शेवटी या निवेदनात नमूद केले आहे.

दोषींवर कारवाई करावी

शहरातील देवूपर भागातील भांडपुरा भागात दुसऱ्या धर्मातील तृतीयपंथी राहतात. त्यांचा वीस जणांचा गट असून, हे तृतीयपंथी गेल्या तीन-चार वर्षांपासून हिंदू तृतीयपंथीयांना त्रास देत असून, दुसरा धर्म स्वीकारण्यास दबाव टाकत आहेत. विशेष म्हणजे गेल्या आठवड्यापासून धर्मांतरासाठी अधिक दबाव वाढला आहे. तसेच कपाळावर कुंकू लावण्यासही हरकत या तृतीपंथींयांनी घेतली आहे. शिवाय हिंदू धर्मातील कोणत्याही कार्यक्रमात हे तृतीयपंथी जबरदस्तीने पैसे उकरण्याचा प्रयत्न करतात. तसेच लग्नसमारंभासह इतर कार्यक्रमांच्या ठिकाणी अवाजवी पैसे मागतात. तरी याप्रकरणाचा तपासाची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मखमलाबादला बिबट्याचे ठसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

दहा दिवसांपूर्वी मेरी परिसरात बिबट्या दिसल्याने पंचवटी परिसरात भीतीचे वातावरण झाले होते. बिबट्याने कुत्र्याची शिकार केल्याचे लक्षात आल्याने मेरीत वन विभागाने पिंजरा लावला. बिबट्याची ही भीती दूर होते न होते तोच मखमलाबाद परिसरातील रहिवाश्यांना सोमवारी (दि. २८) रात्री दोन बिबटे दिसल्याची चर्चा सर्वत्र पसरली. मंगळवारी या परिसरात पायाचे ठसे आढळल्याने बिबट्या असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली आहे. येथे पिंजरा लावण्याची मागणी केली जात आहे.

मखमलाबाद येथील गंगावाडी परिसरातील किरण पिंगळे यांच्या घराजवळील जक्कीशेठ कोकणी यांच्या शेतात दोन बिबटे जात असल्याचे नागरिकांना दिसले. ही माहिती संजय फडोळ यांनी वन विभागाला दिली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी जाऊन पाहणी केली, मात्र तोपर्यंत बिबटे पसार झाले होते. ज्या भागात बिबटे दिसले त्या भागात मंगळवारी पाहणी केली असता बिबट्यांच्या पायाचे ठसे दिसले. बिबट्या दिसल्याने या भागात मंगळवारी दिवसभर बिबट्याच्या पायांची ठसे दिसत असलेल्या भागात नागरिकांची गर्दी झाली होती. पायांच्या ठशामुळे या भागात बिबट्यांचा वावर असल्याचे निश्चित झाले आहे. मेरी परिसरापाठोपाठ याही भागात बिबट्यांचा वावर असल्याने येथील रहिवाशांच्या मनात भीतीचे वातावरण पसरले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images