Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

विश्वस्तांचीच अनास्था

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतुकीसह पार्किंगच्या समस्येवर नेहमीच ओरड करणाऱ्या शहरातील लोकप्रतिनिधींना वाहतूक व पार्किंगसंदर्भात गांभीर्य नसल्याचे मंगळवारी दिसून आले. शहराचा वीस वर्षांच्या सर्वंकष वाहतूक आराखड्याचे सादरीकरणासाठी महापालिकेतील ११२ नगरसेवकांनी दुर्लक्ष केले. आराखड्याच्या सादरीकरणासाठी पदाधिकाऱ्यांसह सर्व नगरसेवकांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र, शहर विकासाची जबाबदारी असलेल्या विश्वस्तांनीच या सादरीकरणाकडे पाठ फिरवल्याने केवळ राजकारणातच रस असल्याचे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे या आराखड्याच्या अंमलबजावणीची जबाबदारी असलेल्या महापालिका आयुक्तांसह पोलिस आयुक्त व महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनीही बेफिकिरी दाखवल्याने या आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत शंका उपस्थित केली आहे.

दिल्लीस्थित अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने (यूएमटीसी) मंगळवारी सर्वंकष वाहतूक आराखड्याचे महापालिकेत सादरीकरण केले. त्यासाठी शहरातील विविध संस्था, महापालिकेतील पदाधिकारी, नगरसेवक, पोलिस आयुक्त, एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रकांना आमंत्रित करण्यात आले होते. भाजपचे गटनेते संभाजी मोरुस्कर, राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा, पश्चिम प्रभाग समितीच्या सभापती डॉ. हेमलता पाटील, नगरसेविका दीक्षा लोंढे, अर्चना थोरात, नगरसेवक जगदीश पाटील, शहर अभियंता यू. बी. पवार या वेळी उपस्थित होते. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समितीचे सभापती शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, मनसे गटनेते सलीम शेख, काँग्रेसचे गटनेते शाहू खैरे आदी गैरहजर होते.

शहराचे व्हिजन ठरवणारी बैठक बारा वाजेला आयोजित करण्यात आली होती. मात्र, प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीसाठी ही बैठक तब्बल तासाभरानंतर सुरू करण्यात आली. तरीही या महानुभावांनी बैठकीकडे पाठ फिरवली. विशेष म्हणजे नाशिक दत्तक घेतलेल्या भाजपच्या ६६ पैकी केवळ तीनच नगरसेवकांनी बैठकीला हजेरी लावून शहराप्रती असलेले आपले प्रेम दाखवून दिले.

पदाधिकाऱ्यांची शेवटी हजेरी

महापौर, उपमहापौरांसह आयुक्तांची वाट पाहत सादरीकरण तब्बल एक तास उशिराने सुरू करण्यात आले. बैठकीला उपस्थित काही पदाधिकाऱ्यांनी आरडाओरड सुरू केल्याने कार्यक्रम सुरू केला. मात्र, शेवटपर्यंत महापौर, उपमहापौर व आयुक्तांची वाट पाहण्यात आली. कार्यक्रम संपत आल्याचा संदेश गेल्यानंतर महापौरांनी शेवटी या कार्यक्रमाला हजेरी लावली. आयुक्तांनीही अखेरच्या क्षणी हजेरी लावली. तोपर्यंत सर्व उपस्थित नागरिक बैठकीतून निघून गेले होते.

म्हणे रिंगरोड नाही!

शहर वाहतूक आराखडा सादर करणाऱ्या दिल्लीस्थित यूएमटीसीने आराखडा सादर करताना नवा जावईशोध लावला. शहरात रिंग रोड अस्तित्वात असतानाही, रिंगरोड नसल्याचा दावा अहवालात करण्यात आला आहे. त्यामुळे हा अहवाल एकाच ठिकाणी बसून तयार केला की काय, अशी चर्चा बैठकीतील उपस्थितांमध्येच सुरू झाली. सिंहस्थात तयार केलेल्या रिंगरोडचा विसर यूएमटीसी कंपनीला पडल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मालेगावात अखेर रस्ताकामाला सुरुवात

$
0
0

मोतीबाग नाका ते अल्लमा पुलाचे डांबरीकरण

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील मोतीबाग नाका ते अल्लमा पुलादरम्यान असलेल्या रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य पसरल्याने याबाबत वांरवार नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या. तसेच, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हा रस्ता दुरुस्त करण्याची मागणी मंडळांनी केली होती. याबाबत महाराष्ट्र टाइम्सने २६ जुलै रोजी वृत्तही प्रसिद्ध केले होते. अखेर प्रशासनाने या वृत्ताची दखल घेत या रस्त्याचे काम सुरू केले आहे.

येथील अलम्मा पूल-मोतीबाग नाका ते नवी वस्ती दरम्यानच्या रस्त्यावर चिखलाचे व खड्ड्यांचे साम्राज्य पसरले होते. पालिकेकडून अमृत योजनेंतर्गत शहरात जलवाहिनी टाकण्याचे काम गेल्या वर्षी सुरू करण्यात आले होते. त्यावेळी या रस्त्याचे खोदकाम करण्यात आले होते. मात्र, यामुळे रस्ता रहदारीसाठी धोकादायक झाला होता. याबाबत पालिकेचे शहर अभियंता कैलास बच्छाव यांना विचारणा केली असता, रस्ता मनपा हद्दीत असला तरी काम सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे असे तोकडे उत्तर मिळाले होते. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे या परिसरातील नागरिकांचे हाल होत होते. शाळकरी मुले, पालक, स्कूल बसचालक यांनादेखील मनस्ताप सहन करावा लागत होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अखेर या रस्त्याचे काम सुरू करण्यात आले असून, पावसामुळे रस्त्यावर साचलेले चिखल, माती हटवण्यात आली आहे. लवकरच डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे उपाभियंता राहुल पाटील यांनी सांगितले.

शहरात १८.५० कोटींची कामे

मोतीबाग नाका ते अल्लमा पुलादरम्यान २० फूट रुंद व ५०० मीटर लाब असा हा रस्ता होणार आहे. तसेच, मोतीबाग नाका ते नवी वस्ती दरम्यानच्या रस्ताकामाला देखील सुरुवात होणार असल्याचे पाटील यांनी मटाशी बोलताना सांगितले. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुमारे १८.५० कोटी रुपयांची रस्त्याची कामे शहरात होणार असून, त्या अंतर्गत या रस्त्याचे देखील काम होते आहे.

सांडपाणी व्यवस्था

शहरातील बहुतांशी प्रमुख रस्त्यालगत सांडपाणी व्यवस्थेचा अभाव आहे. ज्या रस्त्यालगत सांडपाण्याच्या गटारी आहेत, त्यादेखील कचऱ्याने तुंबलेल्या असतात. त्यामुळे रस्त्यांवर हे सांडपाणी साचते. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते झाले तरी त्याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी पालिका प्रशासनाने पार पाडावी, अन्यथा रस्त्यांवरील खड्ड्यांचे साम्राज्य कायमच राहील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात पावसाच्या हलक्या सरी

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

गेल्या तीन दिवसांपासून जिल्ह्याच्या ग्रामीण भागात असलेला पावसाचा जोर ओसरला आहे. शहरात मंगळवारी पावसाने पूर्णत: विश्रांती घेतली. त्यामुळे शहरवासीयांना काहीसा दिलासा मिळाला. धरणांमधून मात्र पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्यात आला आहे.

गणेशाचे आगमन झाल्यापासून शहरात आणि जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला होता. ‌त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, सुरगाणा, पेठ, दिंडोरी या तालुक्यांमध्ये पावसाच्या जोरदार सरी बरसल्या. त्यामुळे गोदावरी व तिच्या उपनद्यांमधील पाणी पातळी वाढली. धरणांमधील पाणी पातळीदेखील वाढल्याने पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग करण्यात आला. जिल्ह्यात २६ ऑगस्टला ३०७, २७ ऑगस्टला ११६, २८ ऑगस्टला २०५, तर २९ ऑगस्टला ३७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मंगळवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत अवघा ३४.८ मिमी पाऊस झाला. सुरगाण्यात सर्वाधिक १४.३, बागलाणमध्ये १०, इगतपुरीत पाच, चांदवडमध्ये २.३, मालेगावात दोन, तर निफाडमध्ये १.२ मिमी पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर, नाशिकसह अन्य सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने विश्रांती घेतली. शहरातही २७ ऑगस्टला १८.४ मिलिमीटर पाऊस झाला होता. २८ ऑगस्टला सहा मिमी, तर २९ ला शून्य मिमी पावसाची नोंद झाली.

विसर्ग सुरूच

धरणांमधील पाणीसाठा मर्यादित ठेवता यावा यासाठी पाण्याचा विसर्ग सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दारणातून २७००, गंगापूरमधून २६८५, कडवातून १४८४, वालदेवीतून २४१, आळंदीतून ४४६, कश्यपीतून २७५, गौतमीतून २०० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पालखेडमधून ३,८०३ क्युसेकने, तर नांदूरमध्यमेश्वरमधून १८,९३० क्युसेकने विसर्ग सुरू असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कांदादर स्थैर्यासाठी निर्यात चालूच ठेवा’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कांदा पिकावर निर्यातमूल्य लावण्याच्या केंद्र शासनाकडून हालचाली सुरू असल्याचे दिसत आहे. निर्यातमूल्याबबात शासनाने निर्णय घेतल्यास एक-दीड महिन्यात येणाऱ्या खरीप कांद्याला भाव मिळणार नाही. यामुळे शेतकऱ्यांना रास्त बाजारभाव मिळण्यासाठी निर्यात चालू ठेवण्याची मागणी शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने केली आहे. केंद्र सरकारने निर्यातबंदी अथवा निर्यातमूल्य वाढविण्याचा निर्णय घेतल्यास तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.

संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येवला प्रांताधिकारी भीमराज दराडे व तहसीलदार नरेशकुमार बहिरम यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले. महाराष्ट्रातील शेतकरी गेल्या तीन वर्षांपासून दुष्काळ, नापिकीने संकटात सापडला होता. मागील वर्षी चांगला पाऊस होताना भरपूर उत्पादन निघूनही सातत्याने पडलेल्या भावामुळे शेतकरी हैराण झाला आहे. अद्याप शेतकऱ्याला या कर्जमाफी घोषणेतील एक दमडीचा लाभदेखील मिळाला नाही, याकडेे निवेदनाद्वारे लक्ष वेधलं आहे.

शेतकरी संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख संतू पा. झांबरे, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संध्या पगारे, बापूसाहेब पगारे आदींच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.

आयातमुळे घसरण

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांनी उधार उसनवार करीत व कर्ज काढून तूर, कापूस, सोयाबिन, कांदा, गहू यासारखी पीक घेऊन भरपूर उत्पादन घेतले. मात्र, शेतमालाला भाव नाही. अशातच सरकारने आपल्या देशात भरपूर गहू, तूर पीक आले असतानाही बाहेरील देशातून आयात करून शेतीमालाचे भाव पाडले. शासनाच्या या धोरणामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे, असे संघटनेने निवेदनात म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चित्रकला, मोदक मेकिंगची पर्वणी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशोत्सव आबालवृद्धांचा आवडीचा सण. या उत्सवाचा आनंद आणखी द्विगुणित करण्यासाठी ‘मटा कल्चर क्लब’तर्फे विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, तसेच खास महिलांसाठी मोदक मेकिंग कॉम्पिटिशनचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या रविवारी (दि. ३ सप्टेंबर) पार्कसाइड होम, बळीराजा मंदिराजवळ, आडगाव नाका या ठिकाणी या दोन्ही स्पर्धा होणार आहेत. सणासुदीच्या काळात झटपट तयार होतील अशा विविध पाककृती कशा तयार करायच्या याविषयी डेमो वर्कशॉपसुद्धा दुपारी ३ वाजता पार्कसाइड होम या ठिकाणी होणार आहे. कोमल सूर्यवंशी या व्हेजी नगेट, इन्स्टंट चोको लावा केक, इन्स्टंट ब्रेड, दहीवडा या आणि अशा झटपट तयार होणाऱ्या रेसिपी करून दाखविणार आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही स्पर्धा आणि वर्कशॉपसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क नाही.

--

स्पर्धेसाठीचे नियम...

पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटांत ही स्पर्धा होणार आहे. स्पर्धेचा विषय गणेशोत्सव हा आहे. रविवारी दुपारी २ वाजता ही स्पर्धा सुरू होईल. स्पर्धेचा कालावधी २ तास असेल. परीक्षकांचा निकाल अंतिम राहील.

--

मोदक मेकिंगसाठी...

स्पर्धेला येताना स्पर्धकांनी मोदक बनवून आणावेत. मोदक स्पर्धकांनी स्वतः बनविलेले असावेत. स्पर्धेच्या ठिकाणी सजावटीसाठी कुठल्याही प्रकारचे साहित्य उपलब्ध होणार नाही. स्पर्धेसाठी मोदक तिखट किंवा गोड कुठल्याही प्रकारचे चालतील. ही स्पर्धा दुपारी २ वाजता सुरू होईल. स्पर्धेत भाग घेण्यासाठी रजिस्ट्रेशन अनिवार्य असून, परीक्षकांचा निकाल अंतिम राहील. सायंकाळी ५ वाजता चित्रकला स्पर्धा आणि मोदक मेकिंग कॉम्पिटिशनमधील विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जातील. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क ः ०२५३-६६९७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे रद्दमुळे प्रवाशांची दैना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नागपूरहून मुंबईला जाणाऱ्या दुरांतो एक्स्प्रेसच्या इंजिनासह सहा डबे आसनगाव-वासिंद रेल्वे स्थानकादरम्यान मंगळवारी पहाटे घसरले. त्यामुळे मध्य रेल्वे मार्गावरील वाहतूक दुपारपर्यंत ठप्प झाली होती. नाशिकरोडमार्गावरील प्रवाशांचे मोठे हाल झाले. पंचवटी, मंगला, गोदावरीसह प्रमुख गाड्या रद्द करण्यात आल्या. भुसावळ-पुणेसह अन्य गाड्या दौंडमार्गे वळविण्यात आल्या. याशिवाय, मुंबईत पावसाचे थैमान सुरू असल्याने सर्व रेल्वेमार्गांवर पाणी साचल्याचा परिणामही रेल्वे वाहतुकीवर झाला

गेल्या रविवारी मेगा ब्लाकमुळे पंचवटी व गोदावरी रद्द करण्यात आली होती. त्यानंतर चार दिवसांनी पंचवटीला पुन्हा विलंब झाल्याने प्रवाशांनी आंदोलन केले होते. आता पुन्हा अपघातामुळे गाड्या रद्द कराव्या लागल्या.

मंगळवारी मुंबईला जाण्यासाठी प्रवासी पहाटेपासूनच मनमाड, नाशिक, इगतपुरी आदी स्थानकांवर आले होते. मात्र, आसनगावजवळ दुरांतोला अपघात झाल्याचे वृत्त येताच मुंबईला जाणाऱ्या व येणाऱ्या गाड्या रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांचे हाल झाले. व्यावसायिक, नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण यांना हिरमुसले होऊन घरी परतावे लागले. तिक‌िटाचे पैसे घेण्यासाठी सकाळी रांगा लागल्या होत्या. दहानंतर स्थानक निर्मनुष्य झाले होते. दैनंदिन प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी व्हाट्सअॅप, मोबाइलवर अपघाताचे वृत्त कळविल्याने मुंबईला जाणाऱ्या अनेक प्रवाशांनी घरीच राहणे पसंत केले.

या गाड्या रद्द

राज्यराणी, पंचवटी इगतपुरीपासून परत आल्या. मुंबईला जाणारी भुसावळ, गरिबरथ, गोदावरी, सेवाग्राम, जनशताब्दी, नंदीग्राम आदी गाड्या रद्द करण्यात आल्या. मनमाडपासून इगतपुरीपर्यंत पोहोचलेल्या गाड्या या स्थानकातच थांबवण्यात आल्या. भुसावळ-पुणे गाडी कल्याणएवजी दौंडमार्गे वळविण्यात आली. निजामुद्दीन मंगला, दुरान्तो, हावडा, महानगरी, गोरखपूर, पुष्पक, तपोवन, तुलसी एक्सप्रेस या गाड्या मनमाड-दौंड मार्गे पुढे नेण्यात आल्या. सेवाग्राम आणि गरिबरथ गाड्या नागपूरला परत पाठवण्यात आल्या. काही प्रवाशांनी इगतपुरीपासून बस, टॅक्सी आणि खासगी वाहनाने कल्याण, ठाणे पर्यंत प्रवास केला. एसटी महामंडळानेही जादा बसची व्यवस्था केली होती.

स्टेशनमध्ये शुकशुकाट

नाशिकरोड स्थानक पहाटेपासून मध्यरात्रीपर्यंत गजबजलेले असते. धावतपळत गाडी पकडणारे प्रवासी हे चित्र नित्याचेच असते. नाशिकरोड स्थानकावर शेकडो फेरीवाले, व्यावसायिक, शंभरावर रिक्षा व टॅक्सीचालक तसेच कुली अवलंबून आहेत. शहर वाहतूक बसही रेल्वेच्या वेळेनुसार अडजस्ट केलेल्या आहेत. रेल्वेगाड्या रद्द झाल्यामुळे वरील सर्व घटकांना मोठा आर्थिक फटका बसला. स्थानकातील अधिकृत खाद्यपदार्थांचे स्टॉल्स, चहा विक्रेते, पेपरविक्रेते, रेल्वेस्थानकातील कँटिन या सर्वांचे नुकसान झाले. कायम गर्दी असलेल्या या रेल्वेस्थानकात शुकशुकाट होता. मनमाड, इगतपुरी स्थानकातही हेच चित्र होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेता शहर पोलिसांनी २९, ३१ ऑगस्ट आणि ३ सप्टेंबर या तीन दिवशी पंचवटीतील वाहतूक मार्गात बदल केला आहे. पाचव्या, सातव्या आणि दहाव्या दिवशी सार्वजन‌िक व घरगुती गणपती मूर्तींचे विसर्जन होत असल्याने या दिवशी मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असते.

पंचवटी कारंजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा, अशोक स्तंभ या मार्गावर मिरवणुका तसेच भाविकांच्या मोठ्या संख्येमुळे वाहतूक कोंडी होते. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी वरील तीन दिवस वाहतूक मार्गात बदल केला आहे.

निमाणी बस स्थानकावरून पंचवटी कांरजा, मालेगाव स्टॅण्ड, रविवार कारंजा मार्गावरून जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसेस व जड वाहनांना हे तीन दिवस दुपारी २ ते रात्री १२ वाजेपर्यंत प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे. याव्यतिरिक्त सीबीएसकडून पंचवटीकडे जाणाऱ्या राज्य परिवहन मंडळाच्या सर्व बसेस व इतर प्रकारच्या जड वाहनांना अशोक स्तंभ ते रविवार कारंजामार्गे पंचवटी कारंजापर्यंताचा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

हा असेल पर्यायी मार्ग

निमाणी बसस्थानक मार्गावरील वाहन चालकांना पंचवटी कारंजा, काट्या मारूती चौक, संतोष टी पॉइंट, कन्नमवार पूल, द्वारका सर्कल या मार्गाचा वापर करावा लागेल. सीबीएसकडून अशोक स्तंभाकडे जाणाऱ्या वाहनचालकांना अशोक स्तंभ, रामवाडी ब्रिज, मखमलाबाद नाका, पेठनाका सिग्नल, दिंडोरी नाका या मार्गावरून निमाणी बस स्टॅण्डकडे जाता येईल. वरील निर्बंध ३१ ऑगस्ट व ३ सप्टेंबर या दिवशी लागू असतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खोळंब्याने वाहन‘कोंडी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिक-पुणे महामार्गाच्या रुंदीकरणासह नूतनीकरणाच्या सुरू असलेल्या कामादरम्यान वाहतुकीचे योग्य नियोजन केले जात नसल्याने प्रवाशांना दररोजच वाहतुकीच्या खोळंब्याचा सामना करावा लागत आहे. बऱ्याचदा अनेक तास वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने प्रवासी वाहनांतच अडकून पडत असल्याने अशा सक्तीच्या वाहन‘कोंडी’बाबत प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

या महामार्गाचे काम करणाऱ्या चेतक एंटरप्रायजेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडून सुरळीत वाहतुकीसाठी पुरेशा उपाययोजना करण्याकडे डोळेझाक होत असल्यानेच शिंदे गावाजवळ दररोज वाहतूक ठप्प पडण्याचे प्रकार घडत असल्याच्या तक्रारी असून, खोळंब्याचा या प्रकाराने प्रवाशांसह स्थानिक नागरिकही अक्षरशः वैतागले आहेत. येथील वाहतूक कोंडीसंदर्भात ठोस उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.

नाशिक-पुणे महामार्गावर शिंदे गाव व बंगालीबाबा थांब्याजवळ फ्लायओव्हरचे काम सुरू आहे. या कामामुळे येथे सिन्नर व नाशिकच्या दिशेने येणारी वाहतूक दररोज ठप्प होण्याचे प्रकार घडत आहेत. या ठिकाणी रहदारीसाठी तयार करण्यात आलेले रस्ते अतिशय सुमार दर्जाचे असल्याने या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. शिवाय रस्ताही एकेरी आहे. परिणामी येथे सायंकाळच्या सुमारास दररोज वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. या प्रकाराने प्रवाशांचा वेळ दररोज वाया जात असल्याने प्रवासीवर्ग प्रचंड वैतागला आहे. तासन् तास वाहतूक ठप्प पडत असल्याने प्रवाशांना महामार्गावरच थांबावे लागत आहे.

खड्डे दुरुस्तीकडे दुर्लक्ष

बंगालीबाबा थांब्याजवळ महामार्ग पूर्णपणे उखडला आहे. त्यामुळे येथून वाहतूक अत्यंत संथ गतीने सुरू असते. त्यातच अवजड वाहने आल्यास अशा वाहनांना येथून पुढे जाण्यास जास्त वेळ लागतो. परिणामी इतर लहान वाहनांची गर्दी वाढते. त्यामुळे अनेक वाहनचालक ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न करतात. परंतु, खड्ड्यांमुळे त्यांचा प्रयत्न फसतो. वास्तविक पाहता येथे रस्त्यावर खड्डे पडणार नाहीत याची काळजी महामार्ग प्राधिकरणाच्या प्रशासनाने घेणे आवश्यक असतानाही या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जात आहे.

--

पोलिसांचे वरातीमागून घोडे

शिंदे येथे शहर वाहतूक शाखेचे दोन पोलिस कर्मचारी वाहतूक नियंत्रित करण्यासाठी नेमलेले आहेत. परंतु, तेदेखील बऱ्याचदा जागेवर नसतात. बंगालीबाबा थांब्याजवळ तर पोलिस कर्मचारी नेमलेलेच नाहीत. त्यामुळे वाहतूक कोंडी झाल्याशिवाय शहर वाहतूक पोलिस कर्मचारी या ठिकाणी फिरकतच नसल्याचा आरोप केला जात आहे.

--

शिंदे गाव व बंगालीबाबा थांबा येथे दररोज वाहतूक ठप्प होते. येथील उपाययोजनांअभावी प्रवाशांचा वेळ वाया जात असून, दूरवरून आलेल्या वाहनांमधील प्रवाशांनाही रात्रीच्या वेळी येथे वाहनांतच अडकून पडावे लागत आहे.

-रोहित देसले, प्रवासी

--

शिंदे येथील वाहतूक पोलिस बऱ्याचदा गैरहजर असतात. याशिवाय काही वाहनचालकांचा बेशिस्तपणाही वाहतूक ठप्प होण्यास कारणीभूत ठरतो. आम्ही दररोज ठप्प होणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करतो.

-राहुल तुंगार, स्थानिक रहिवासी

--

बंगालीबाबा थांब्याजवळ रस्ता उखडल्याने रहदारीला अडथळा निर्माण होतो. ठेकेदारास दुरुस्तीच्या सूचना दिल्या आहेत. पोलिस कर्मचारी उशिरापर्यंत थांबून वाहतूक सुरळीत करतात. दोन-चार दिवसांत ही समस्या सुटेल.

-कैलास पाटील, पोलिस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा

--

मटा भूमिका

नाशिक-पुणे रस्त्याचे रुंदीकरण हा विषय आता दंतकथा बनत चालला आहे. गेली कित्येक वर्षे या रस्त्याच्या यातनांना व त्यामुळे हजारो प्रवाशांना होत असलेल्या त्रासाला तर अंतच नाही. आता रुंदीकरण चालू आहे, पण त्याची गती संथ आहे. पर्यायी रस्त्याचा दर्जा सुमार आहे. त्यात पावसामुळे खड्ड्यांची भर पडली आहे. वाहतूक नियमनाची जबाबदारी नेमकी कोणाची हा प्रश्नच आहे. महामार्ग प्राधिकरण व ठेकेदार यांना या समस्येशी जणू काहीच देणेघेणे नाही. त्यामुळे दररोज तासन् तास वाहतूक कोंडीत सापडून जनतेच्या हालअपेष्टांत भरच पडते आहे. लोकप्रतिनिधींनाही या प्रश्नात लक्ष द्यायला वेळ नाही हे नाशिककरांचे दुर्दैव म्हणावे लागेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘निमा’त समित्यांची स्थापना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक इंडस्ट्रिज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा)च्या कार्यकारिणीची पहिली बैठक निमा हाउसमध्ये झाली. यावेळी विविध समित्यांची स्थापना करण्याचा निर्णय होऊन या समित्यांसाठी सदस्यांचीही नियुक्ती करण्यात आली.

निमाचे अध्यक्ष मंगेश पाटणकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत विविध समित्यांची स्थापना करून पदाधिकारीही जाहीर करण्यात आले, ते असे ः जनसंपर्क व प्रसिद्धी समिती- मंगेश पाटणकर, अॅग्रो बिझनेस समिती- मनीषा धात्रक, निमा बुलेटिन- प्रवीण आहेर, घटना व कायदेशीर बाबींविषयक समिती- मनीष कोठारी, इतर औद्योगिक संस्थांशी समन्वय समिती- संदीप सोनार, मनुष्यबळ व औद्योगिक संबंध समिती- मुकुंद भट, ‘मेक इन नाशिक’ समिती- हरिशंकर बॅनर्जी, माहिती अद्ययावतीकरण समिती- अखिल राठी, आंतरराष्ट्रीय उद्योग प्रोत्साहन समिती- अमरजितसिंग छाबरा, निमा हाउस व तक्रार निवारण समिती- गजकुमार गांधी, कौशल्य विकास व गुणवत्ता व्यवस्थापन समिती- मितेश पाटील व नीरज बदलानी, पायाभूत सुविधा समिती- मनीष रावल, ऊर्जा समिती- मनीष रावल, पर्यावरण, आरोग्य व सुरक्षा समिती- सुधीर आवळगावकर, औद्योगिक विकास समिती- संजय सोनवणे, वित्त, कर व सवलती समिती- बी. ए. गव्हाणे, माहिती व तंत्रज्ञान, तसेच सेमिनार समिती- गौरव धारकर, मेंबरशिप डेव्हलपमेंट समिती- वरुण तलवार, स्वच्छता व पर्यावरण समिती- उदय रकिबे, पायाभूत सुविधा समिती (सिन्नर)- संदीप भदाणे, तक्रार निवाण समिती (सिन्नर)- किरण जैन, ऊर्जा समिती (सिन्नर)- एस. के. नायर, सिन्नर रिक्रिएशन सेंटर समिती- आशिष नहार, सिन्नर निमा हाउस बिल्डिंग समिती- शिवाजी आव्हाड. मानद सरचिटणीस श्रीकांत बच्छाव यांनी ही निवड जाहीर केली.

सभेस उपाध्यक्ष उदय खरोटे, माजी अध्यक्ष हरिशंकर बॅनर्जी, सचिव नितीन वागस्कर, ज्ञानेश्वर गोपाळे, खजिनदार हर्षद ब्राह्मणकर, अतिरिक्त उपाध्यक्ष (सिन्नर) आशिष नहार, अतिरिक्त सचिव सुधीर बडगुजर, तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

--

यांची झाली निवड

या बैठकीत स्वीकृत सदस्य म्हणून वरुण तलवार, सुरेश माळी, मंगेश काठे, बबनराव चौरे, तर सिन्नर विभागातून शिवाजी आव्हाड (शिवम नर्सरी) यांची निवड करण्यात आली. निमाच्या तज्ज्ञ मंडळावर मुकुंद भट (बॉश लिमिटेड), ज्येष्ठ वित्त व कर सल्लागार बी. ए. गव्हाणे, किरण चव्हाण (ग्रीन स्पेसेस रिअॅल्टर्स), मनोज पिंगळे (चिंतामणी सोल्युशन्स) यांची, तसेच विशेष निमंत्रित सदस्य म्हणून देवयानी महाजन (इंदिरा इंडस्ट्रिज), कैलास अहिरे (एन. व्ही. आॅटो स्पेअर्स प्रायव्हेट लिमिटेड), नानासाहेब देवरे (मोना इंजिनीअरिंग वर्क्स), सुनील जाधव (पूनम एंटरप्रायजेस), सुनील बागुल (ऋतिका इंडस्ट्रिज), सुधीर आवळगावकर (सीजी पॉवर अॅण्ड इंडस्ट्रिअल सोल्युशन्स् लिमिटेड), अनिल जाधव (यशराज इथेनॉल प्रोसेसिंग प्रायव्हेट लिमिटेड) यांची निवड करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

निरीक्षणगृहांचा प्रादेशिक असमतोल करणार दूर

$
0
0

निरीक्षणगृहांतील समस्यांसह महिला व बालकल्याण विभागाच्या अखत्यारित येणाऱ्या अनाथ बालआश्रम आणि स्पेशल होम्सचे काही प्रश्न गंभीर आणि प्रलंबित आहेत. आर्थिक, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून या संस्था मजबूत होणे आवश्यक असून, त्यावर राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या प्रधान सचिव विनिता सिंगल यांनी मत व्यक्त करीत, आगामी काळात परिस्थिती बदलण्याचे सूतोवाच केले. सिंगल यांच्या केलेली बातचीत...

--

-उत्तर महाराष्ट्रात बालनिरीक्षणगृहांची संख्या खूप कमी असून, त्यांच्यावर अतिरिक्त ताण पडत आहे?

-महाराष्ट्रात बालनिरीक्षणगृहांच्या संख्येत असमतोल दिसून येतो. विशेषतः कोकण आणि उत्तर महाराष्ट्रात बालनिरीक्षणगृहांची संख्या फारच कमी आहे. या प्रादेशिक असमतोलाची कारणे, त्याचे परिणाम सध्या तपासले जात असून, भविष्यात हा असमतोल नक्कीच दूर केला जाईल. लोकसंख्येच्या अथवा मुलांच्या संख्येनुसार बालनिरीक्षणगृहांची संख्या असणे अधिक चांगले ठरू शकते. उत्तर महाराष्ट्राचे केंद्र असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये एखाद्-दुसरे बालनिरीक्षणगृह असून, त्यांची संख्या वाढविण्यासाठी काय करता येईल, याची चाचपणी सुरू आहे. राज्यात मराठवाड्यात सर्वाधिक बालनिरीक्षणगृहे आहेत.

--

-खासगी, तसेच सरकारी संस्थांमधील सुरक्षेसाठी काय उपाययोजना राबविल्या जात आहेत?

-राज्यातील सरकारी बालनिरीक्षणगृहांच्या सुरक्षेचा आढावा घेण्याचे काम सुरूच असते. त्यात अनेक ठिकाणी सुरक्षारक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दिसते. याबाबत सरकारने धोरणात्मक निर्णय घेतला असून, कंत्राटी सुरक्षारक्षक नियुक्त करण्याबाबत सूचित करण्यात आले आहे. विशेषतः निवृत्त लष्करी अधिकारी अथवा पोलिसांनी ट्रेन केलेले सुरक्षारक्षक वापरले गेल्यास त्याचा निश्चित फायदा होऊ शकतो. हाच नियम सरकारी अनुदान घेणाऱ्या संस्थांसाठीसुद्धा लागू आहे. सरकारच्या बालनिरीक्षणगृहांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यासह इतर सुरक्षात्मक बाबींमध्ये वाढ करण्यात येत आहे. सीसीटीव्ही बसविताना ते कोठे, कसे व किती बसवावेत यालाही मर्यादा असते. त्यासाठी सरकारच्या धोरणात्मक बाबींचा नक्कीच विचार केला जातो.

--

-मानधनच खूप कमी असल्याने संस्थांमधील जागा भरल्या जात नाहीत का?

-मानधन किती द्यायचे याबाबतचे दिशानिर्देश सरकारने दिले आहेत. त्यात काही अडचणी असल्याचे सांगितले जाते. त्यानुसार वेळोवेळी बैठकी होत असून, सकारात्मक मार्ग निघू शकतो.

--

-उत्तर महाराष्ट्रात विशेष मुलांसाठी संस्थाच नसल्याने अनेक अडचणी येतात...

-विशेष मुलांसाठी मुंबईसह पुणे येथे सरकारी संस्था आहेत. नाशिकमध्ये अशी संस्था नाही, हे खरे आहे. यामुळे काही अडचणी निर्माण होतात. भविष्यात उत्तर महाराष्ट्रासाठी एखादे स्पेशल होम असावे यासाठी प्रयत्न केले जातील.

--

-या मुलांसाठी केअर टेकरदेखील उपलब्ध होत नाहीत...

-स्पेशल होम्स असतील, तरच तसे केअर टेकर ठेवता येऊ शकतात. आजमितीस स्पेशल होम्सच नसल्याने ही अडचण येते. इतर संस्थांमध्ये किती विशेष मुले आहेत, हे तपासून त्यानुसार केअर टेकर देता येतील का, याचा विचार होऊ शकतो.

--

-महिला सुरक्षितता व जन्मदराबाबत काय सांगाल?

-महिला सुरक्षिततेसाठी राज्य सरकार अनेक योजना राबवीत आहे. बेटी बचाओ, बेटी पढाओ ही महत्त्वाकांक्षी योजना वैशिष्ट्यपूर्ण आहे. बारावी पास झालेली एक मुलगी पोलिस खात्यात भरती झाल्यास रात्री-अपरात्री, एकटी बंदोबस्तासाठी हजर राहते. तिला याची जाणीव असते, की आपल्यामागे कायदा आहे. प्रशिक्षणादरम्यान याची जाणीव तिला होते. तेच सर्वसाधारण मुलगी एकटी काही करण्यास तयार होणार नाही. एकाच वयातील मुलींमधील ही मानसिकता वेगवेगळी असते. त्यामुळे शासन प्रत्येक महिलेच्या मागे आहे, ही जाणीव सर्वच मुलींमध्ये, तसेच मुलांमध्येही करवून दिली जात आहे.

--

-ढासळणारा जन्मदर काय सांगतो?

-गर्भलिंग निदान रोखण्यासाठी सरकारने अनेक कायदे बनविले आहेत. माझी कन्या भाग्यश्री ही योजना सध्या सरकारने सुरू केली आहे. मुलगा आणि मुलगी असा फरक ज्यामुळे केला जातो, ती धारणा कमी करण्यासाठी वेगवेगळे उपक्रम राबविले जात आहेत. शाळ असो की कॉलेज, सरकारी संस्था या माध्यमातून ही चळवळ आणखी व्यापक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मनमाड-इंदूर’ला ग्रहण

$
0
0

चौथ्या सर्वेक्षण अहवालातील त्रुटींबाबत आमदार अनिल गोटेंचा आरोप

म. टा. वृत्तसेवा, धुळे

मनमाड-धुळे-इंदूर या रेल्वेमार्गाच्या चौथ्या सर्वेक्षण अहवालात सदर रेल्वे मार्गार्चा रेट ऑफ रिटर्न अर्थात गुंतविलेल्या पैशांचा परतावा फक्त अडीच टक्के दाखविण्यात आला आहे. त्यामुळे हा रेल्वेमार्ग निर्माण होणार नाही याचीच ही व्यवस्था करण्यासारखे आहे, असा आरोप आमदार अनिल गोटे यांनी सोमवारी (दि. २८) पत्रकार परिषदेत केला.

या रेल्वेमार्गासाठी मध्य प्रदेश सरकारने विरोध दर्शविल्याचे त्यांनी सांगितले. मध्यप्रदेशात खंडवा ते इंदूर रेल्वेमार्ग सुरू झाल्याने मनमाड-धुळे-इंदूर रेल्वे मार्गाची आवश्यकता नाही, असे मध्यप्रदेश सरकारचे म्हणणे असल्याचेही गोटे यांनी यावेळी सांगितले.

रेल्वे मंत्रालयाच्या अहवालानंतर तीव्र नाराजी व्यक्त करीत आपण या रेल्वेच्या आर. ओंना यापूर्वीच विरोध दर्शविला असून, केंद्रीय परिवहन दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्याकडेदेखील यातील त्रूटी सविस्तरपणे मांडल्या असल्याचेही गोटे म्हणाले. नुकताच दिल्ली दौरा करून आमदार गोटे यांनी पत्रकार परिषद घेतली.

रेल्वे मंत्रालयाने तयार केलेल्या नव्या डीपीआरमधील खर्चिक आणि अनावश्यक गोष्टी आपण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन लक्षात आणून दिल्या आहेत. यामध्ये प्रामुख्याने रेल्वे विभागाने तयार केलेल्या या अहवालात जेएनपीटी बंदरावरून होणाऱ्या ७० हजार कंटेनरच्या वाहतुकीचे उत्पन्न धरले गेलेले नाही. नवीन सर्वेक्षणात माल वाहतुकीतून मिळणाऱ्या परताव्याचाही अंतर्भाव करण्यात आलेला नाही. सोबतच रेल्वेमार्गाची उंची चक्क २४ फुट धरली गेली असून, नव्याने रेल्वे मार्गाचे अतिरिक्त किलोमीटर हिशोबात धरण्यात आलेले नाही, असेही आमदार गोटेंनी सांगितले.

लोकप्रतिनिधींचे सोयीनुसार वक्तव्य

मनमाड-इंदूर रेल्वेमार्गावरील विकासाचे अधिकार मंत्रालयाने रेल्वे कार्पोरेशनला देण्यासंबंधी कबूल करून आजापर्यंत ते दिलेले नाहीत. सर्व जमेच्या बाजू हिशोबात धरल्या असल्या तरी आरओआर बावीस ते पंचवीस टक्क्यांपर्यंत यायला पाहिजे होता. पण तो फक्त अडीच टक्के इतका खाली आला आहे. तो इतका कमी धरणे म्हणजे मनमाड-इंदूर पर्यतचे सर्व आदिवासी, दलित व करोडो शेतकऱ्यांना न्याय नाकारण्यासारखे आहे.

तसेच हा रेल्वेमार्ग होवूच नये, अशी कायमची तरतूद करून ठेवणे असे प्रकार चालले आहेत, असा आरोप आमदार गोटेंनी पत्रकार परिषदेत केला. तर मनमाड रेल्वेमार्गाबाबत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आपल्या सोयीनुसार वेगवेगळे वक्तव्य करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फेरपरीक्षा निकाल २२.९६ टक्के

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने १८ जुलै ते २ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या दहावी फेरपरीक्षेचा निकाल २२.९६ टक्के लागला आहे. या परीक्षेसाठी जिल्ह्यातून ७ हजार ३३८ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. पैकी १ हजार ६८५ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यंदा दोन टक्क्याने हा निकाल वाढला आहे. तर, राज्याचा निकाल २४.४४ टक्के लागला आहे.

यंदा नाशिक विभागीय मंडळाच्या वतीने नाशिकसह धुळे, नंदूरबार, जळगाव या चार जिल्ह्यांमध्ये ३७ केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. विभागात नंदूरबार जिल्ह्याचा सर्वाधिक ५४.६७ टक्के निकाल लागला. या जिल्ह्यातून १२२० पैकी ६६७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. धुळे जिल्ह्याचा निकाल ३४.५२ टक्के लागला. या जिल्ह्यातून १००८ पैकी ३४८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जळगाव जिल्ह्याचा निकाल ३३.४५ टक्के लागला. या जिल्ह्यातून २९५७ पैकी ९८९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. नाशिक विभागात १२ हजार ५२३ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली होती. यापैकी ३६८९ विद्यार्थ्यांनी यश मिळविले. दहावी फेरपरीक्षेचा नाशिक विभागाचा निकाल २९.४६ टक्के लागला. तर राज्यामध्ये १ लाख २४ हजार ७२३ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी ३० हजार ४८८ विद्यार्थ्यांनी यश मिळविले.

फोटोकॉपीसाठी १८ सप्टेंबरपर्यंत मुदत

उत्तरपत्रिकांची फोटोकॉपी मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांनी आजपासून (३० ऑगस्ट) १८ सप्टेंबर पर्यंत मंडळाकडे अर्ज करायचे आहेत. अर्जासोबत ऑनलाइन निकालाची गुणपत्रिकेची प्रत जोडावी. बोर्डाच्या वेबसाइटवर अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात आला आहे.


११ वी प्रक्र‌ियेत व्हावे सहभागी

या परीक्षेव्दारे उत्तीर्ण होऊन ११ वी साठी पात्र ठरलेल्या विद्यार्थ्यांनर मंडळाच्या ऑनलाइन मार्कशीटची झेरॉक्स प्रत सेल्फ अटेस्टेड करून ऑनलाइन प्रक्र‌ियेत सहभागी व्हावे. अशा विद्यार्थ्यांनी ज्युनिअर कॉलेजशी संपर्क साधावा, असे आवाहन एसएससी बोर्डाच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वे ठप्पमुळे प्रवाशांचे हाल

$
0
0

दुरांतोला अपघात; इगतपुरी, घोटीत प्रवाशांची गर्दी अन् हिरमोड

म. टा. वृत्तसेवा, घोटी

आसनगाव शिवारात दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने रेल्वे प्रशासनाचे वेळापत्रक विस्कळीत झाले. याचा सर्वाधिक फटका मनमाडहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना बसला. पंचवटी एक्स्प्रेस, गोदावरी एक्स्प्रेस या घोटीपर्यंतच धावल्या. अखेर सकाळी पंचवटी, गोदावरीच्या प्रवाशांना घोटी इथेच सोडून या रेल्वे मनमाडला परत गेल्या. मुंबईहून नाशिकला जाणारी पॅसेंजर एक्स्प्रेसही रद्द झाल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली. यामुळे प्रवाशांचे हाल झाले.

मुंबई येथे गणेश दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या जास्त आहे. तसेच नोकरदार व कामानिमित्त मुंबईला जाणाऱ्यांना इगतपुरीहून पुढे जाता आले नाही. रेल्वेगाड्या रद्द झाल्याने गणेशभक्तांचाही हिरमोड झाला. काही प्रवाशांनी नाशिककडे परत जाणे पसंत केले, तर पंचवटीचे बहुतेक प्रवासी खासगी वाहनांनी मुंबईला गेले. घोटी महामार्गावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. इगतपुरी स्थानकातून गाड्या रद्द झाल्याची माहिती मिळताच प्रवाशी हतबल झाले. तर काही रेल्वेगाड्या इगतपुरीपर्यंत आल्याने या स्थानकावरही प्रवाशांची गर्दी झाली होती.

मंगला एक्स्प्रेसची आठवण

गेल्या चार वर्षांपूर्वी अर्थात १५ नोव्हेंबर २०१३ रोजी सकाळी मंगला एक्सप्रेसला घोटी शहराजवळ अपघात होऊन तीन प्रवासी ठार, तर दहा प्रवासी जखमी झाले होते. त्यावेळीही अशाच पद्धतीने नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या व मुंबईहून नाशिकला येणाऱ्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यावेळीही प्रवाशांची अशीच गैरसोय झाली होती. असाच हा घोटीपासून ५० ते ५५ किमी अंतरावर दुरांतो एक्स्प्रेसला अपघात झाल्याची बातमी समजताच घोटीच्या मंगला एक्स्प्रेसच्या अपघाताची आठवण झाली. त्यावेळीही प्रवाशांना वाहनांची प्रतीक्षा करावी लागली होती.

प्रवाशांसाठी बसेसची व्यवस्था

रेल्वे वाहतूक विस्कळीत झाल्याने राज्य परिवहन महामंडळने इगतपुरी आगाराच्या माध्यमातून १४ बसेस प्रवाशांच्या मदतीला पाठविण्यात आल्या. त्यात १२ बसेस प्रवाशी घेऊन कल्याणपर्यंत पोहचविण्यात आले, तर दोन बसेस प्रवाशी घेऊन नाशिकला रवाना करण्यात आल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

परदेशी खून प्रकरणी संशयितांना कोठडी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर
सिडकोतील धनराज उर्फ कुणाल राजू परदेशी या अंडारोल विक्रेत्याची हत्या करणा ऱ्या चारही संशयित आरोपींना कोर्टाने मंगळवारी सहा दिवसांची पोलिस कोठडी दिली. चारही आरोपींना पिंपळगाव बसवंत येथून सोमवारी ताब्यात घेण्यात आले होते.
कुणालचा त्याच्याच मित्रांनी धारदार शस्त्राने भोसकून रविवारी (दि. २७) रात्री खून केल्याची घटना उघडकीस आली होती. विशेष म्हणजे चारही संशयित आणि घटनेत मृत्यू झालेला तरुण यांचे खुटवडनगर परिसरात वास्तव्य आहे. मात्र, ते जगतापवाडी कसे आले? याचा पोलिस शोध घेत आहेत. आपापसातील वाद मिटविण्यासाठी ते नेमके कुणाकडे गेले होते याचाही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. परंतु, एका राजकीय नेत्याचा वरदहस्त असलेल्या भागात कुणालचा खून झाल्याने शहरात पुन्हा उलटसुलट चर्चा रंगण्यास सुरूवात झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहर मनसे टाकणार कात

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिका निवडणुकीत मनसेचे पानीपत झाल्यानंतर सहा महिने शांत असलेल्या मनसेने पुन्हा कात टाकण्याची तयारी सुरू केली आहे. भाजपचा गेल्या सहा महिन्यातील कारभार समाधानकारक नसल्याने मनसे आता थेट विधानसभेसाठीच शड्डू ठोकले आहेत. मनसेच्या वतीने सोमवारपासून प्रभाग व गटनिहाय पक्षाची बांधणी सुरू केली आहे. पक्षाचे सर्वेसर्वा राज ठाकरे हे सप्टेंबरअखेर नाशिकमध्ये येऊन पक्षाला संजीवनी देणार आहेत.
गेल्या पंचवार्षिकमध्ये महापालिकेत सत्ता असलेल्या मनसेचे महापालिका निवडणुकीत पानीपत झाले होते. तीन आमदार व महापालिकेची सत्ता दिल्यानंतर मनसे नाशिकमध्ये विकास करेल असे अपेक्षित होते. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी उद्योजकांच्या मदतीने काही प्रमाणात नाशिकचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न केला. परंतु महापालिकेच्या निवडणुकीपूर्वीच मनसेच्या शिलेदारांनी पक्ष सोडून भाजप आणि शिवसेनेसह अन्य पक्षांचा हात धरला. त्यामुळे नाशिकमध्ये चांगले काम करूनही महापालिका निवडणुकीत मनसेचा दारुण पराभव झाला. मनसेचे ४० वरून पाच नगरसेवक निवडून आले. तसेच पक्षाचा ढाचाही कोसळला होता.
मुख्यमंत्र्यानी दत्तक घेतलेल्या नाशिकचा कारभार सहा महिन्यातच ढासळला आहे. भाजपची कामगिरी समाधानकारक नसल्याने मनसेने पुन्हा कात टाकण्याची तयारी सुरू केली आहे. सहा महिन्यांच्या चिंतनानंतर मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या पूनर्बांधणीला सुरुवात केली आहे. शहराध्यक्ष अॅड. राहुल ढिकले, गटनेता सलिम शेख यांनी पक्षाची बांधणी नव्याने सुरू केली आहे. त्यासाठी मनसेने शहराची गटात विभागणी केली असून गटनिहाय पक्षकार्यकर्त्यांची नवी फळी तयार केली जात आहे. गट आणि प्रभाग निहाय पक्षाची पुनर्रचना करून नव्याने कार्यकर्ते व पदाधिकारी जोडले जात आहे. मनसेने विधानसभा निवडणुकीचे लक्ष केंद्रीत केले असून तीन विधानसभा मतदारसंघात जोरदार बैठका घेतल्या जात आहेत. त्याला कार्यकर्त्यांचाही प्रतिसाद मिळत असल्याने पदाधिकाऱ्यांचाही जोश वाढल्याचा दावा केला जात आहे.

राज ठाकरेंचा सप्टेंबरमध्ये दौरा
पदाधिकाऱ्यांकडून गट व प्रभागनिहाय कार्यकर्त्यांची निवड केल्यानंतर या नव्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी सप्टेंबरमध्ये राज ठाकरे स्वतः येणार आहेत. पक्षातील पदाधिकाऱ्यांसोबतच नव्याने जुडलेल्या कार्यकर्त्यांशी ठाकरे वन टू वन चर्चा करणार आहेत. तसेच विधानसभानिहाय पक्षाचा आढावा घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सिव्हिलच्या आवारात बालकाचा मृतदेह

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात एक ते दीड वर्षीय मुलाचा अर्धवट अवस्थेत बुजवलेला मृतदेह आढळून आला. मंगळवारी सांयकाळच्या सुमारास कर्मचारी साफसफाई करण्याकरीता गेले असता हा प्रकार उघडकीस आला. यामुळे सिव्हिलमध्ये खळबळ उडाली असून, सरकारवाडा पोलिस रात्री उशिरापर्यंत घटनेची नोंद करीत होते.
सिव्हिलच्या आवारातील क्षयरोग विभागाच्या पाठीमागील बाजुस असलेल्या वॉल कम्पांउडनजीक हा मृतदेह अधर्वट अवस्थेत पुरण्यात आल्याचे दिसून आले. हा भाग फारसा वर्दळीचा नसून, झाडांनी वेढलेला आहे. या ठिकाणी सायंकाळच्या सुमारास सिव्हिलचे कर्मचारी साफसफाई करण्यासाठी गेले. त्यावेळी हा मृतदेह दिसून आला. साधारणतः एक ते दीड वर्षाचा पुरूष जातीचा मृतदेह असून, एक ते दोन दिवसांपूर्वी तो बुजवण्यात आला असावा, असा संशय व्यक्त केला जात आहे. प्रथम दशर्नी आजारपणामुळे दगावलेल्या बालकाच्या मृतदेहाची परस्पर विल्हेवाट लावली गेली असावी, अशी शक्यता व्यक्त होते. बालके दगवण्याचे प्रकार सिव्हिलमध्ये नवे नाहीत. मात्र, काहीही असले तरी पालक मृतदेह सोबतच घेऊन जातात. असा प्रकार पहिल्यांदाच घडला असून, सिव्हिल प्रशासनानेही याची गंभीर दखल घेतली आहे. दोन ते तीन दिवसात झालेल्या मृत्यू नोंदीमध्ये याबाबत काही सुगावा लागतो काय याचीही चाचपणी घेतली जाते आहे. दरम्यान, या प्रकरणी सरकारवाडा पोलिस अधिक तपास करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिष्यवृत्तीसाठी करा ‘महाडीबीट’वर अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेतील पात्र विद्यार्थ्यांना २०१७-१८ वर्षापासून थेट त्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा केली जाणार आहे. योजनेच्या लाभासाठी mahadbt.gov.in या वेबसाइटवर अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
थेट रक्कम जमा करण्यात येणाऱ्या योजनांमध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांना भारत सरकार मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना, राज्य सरकारची मॅट्रिकोत्तर शिक्षण फी, परीक्षा फी-प्रतिपूर्ती योजना, राजश्री शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती योजना इयत्ता अकरावी व बारावी व सैनिकी शाळेतील विदयार्थ्यांना निर्वाह भत्ता या शिष्यवृत्ती योजनांचा समावेश आहे. अर्ज करताना अपलोड करण्यात येणाऱ्या कागदपत्रांचा आकार २५६ केबीपर्यंत असायला हवा. लाभार्थ्यांचे आधारकार्ड गरजेचे आहे. ते बँक खाते व मोबाइल क्रमांकाशी संलग्न असावे. विद्यार्थ्यांनी आधारकार्ड काढून ते बँक खाते तसेच मोबाइल क्रमांकाशी संलग्न करून घ्यावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त देविदास नांदगांवकर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खूनातील संशयित अडीच महिन्यानंतर जेरबंद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गॉगल विक्रेता ऐतेशाम इरशाद अन्सारी याच्या हत्येप्रकरणी मागील अडीच महिन्यांपासून फरार असलेल्या संशयितास क्राइम ब्रँचच्या पथकाने अखेर जेरबंद केले. या गुन्ह्यातील इतर सात संशयितांना घटनेच्या काही दिवसातच वेगवेगळ्या ठिकाणावरून अटक करण्यात आली होती.
संदीप सुरेश त्रिभुवन (२५, रा. राजवाडा, म्हसरूळ, पंचवटी) असे पोलिसांनी अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे. हत्येच्या प्रकरणी अटक झालेला हा आठवा संशयित ठरला आहे. गॉगल विक्रेता ऐतेशाम इरशाद अन्सारी याची १० जून २०१७ रोजी दुपारच्या सुमारास त्र्यंबकरोडवरील वेद मंदिराजवळ हत्या झाली होती. अन्सारी रस्त्यालगत स्टॉल उभारून गॉगल विक्री करीत असताना तिथे आलेल्या संशयितांसमवेत किमतीवरून वाद झाला. त्यानंतर सहा ते सात जणांच्या टोळक्याने अन्सारीवर जीवघेणा हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या अन्सारीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला. तपासानुसार पोलिसांनी जितेंद्र भगवान काळे (रा. घनकर लेन), मुकेश चंद्रकांत साळवे (रा. मल्हारखान झोपडपट्टी), मनीष रेवर (रा. रामवाडी), चेतन यशवंत इंगळे आणि अजिंक्य प्रकाश धुळे यांना अटक केली. चेतन आणि अजिंक्यला आश्रय देणाऱ्या विशाल अशोक निकम (रा. दहावा मैल) आणि योगेश चंद्रकांत धांडे यांनाही पोलिसांनी सहआरोपी केले. या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार असलेला त्रिभुवन मात्र फरारच होता. तो शहरात असल्याची माहिती क्राइम ब्रँचच्या युनिट एकचे पोलिस हवालदार वसंत पांडव यांना मिळाली. त्यानुसार सोमवारी त्यास अटक करण्यात आली. संशयितास मुंबई नाका पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले असून, अधिक तपास सुरू आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुंबईसाठी धावली ‘लालपरी’

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक
मुसळधार पावसामुळे अवघी मुंबई थांबली असून रेल्वेसेवाही ठप्प झाली आहे. त्यामुळे नाशिक-मुंबई रेल्वेसेवाही प्रभावित झाली असून प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी राज्य मार्ग परिवहन महामंडळ सरसावले आहे. महामार्ग बसस्थानकासह मनमाड, लासलगाव, इगतपुरीहूनही कल्याण आणि ठाण्यापर्यंत तब्बल ८९ जादा बसेस सोडण्यात आल्या.

पावसाने मुंबईकरांना मंगळवारी दिवसभर झोडपून काढले. तेथील रस्त्यांच्या अक्षरश: नद्या झाल्या. रेल्वेमार्गावरही गुडघाभर पाणी साचल्याने तेथील उपनगरीय रेल्वे सेवेसह लांब पल्ल्याची रेल्वे प्रवासी वाहतूकही विस्कळीत झाली आहे. पावसाने मुंबईच्या दळणवळणाचे तीनतेरा वाजविले असून नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या पंचवटीसह अनेक गाड्याही त्यामुळे रद्द कराव्या लागल्या. नाशिकहून मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांची त्यामुळे प्रचंड गैरसोय झाली. नियमित धावणाऱ्या रेल्वे रद्द झाल्याने प‍्रवाशांनी बसस्थानकांकडे धाव घेतली. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस प्रवाशांना मदत करण्यासाठी रस्त्यांवर उतरविण्यात आल्या. नाशिकमार्गे मुंबईकडे दररोज ७३ बसेस जातात. कल्याण, ठाणे, दादर, पनवेल, बोरीवली या मार्गांवर या बसेस धावतात. नाशिकरोड, तसेच महामार्ग बसस्थानकांवर प्रवाशांची गर्दी वाढू लागल्याने मुंबईकडे जादा बसेस सोडण्याचा निर्णय महामंडळाने घेतला. महामार्ग बसस्थानकावरून सायंकाळी पाच वाजेपर्यंत ४६ तर नाशिककरोड बसस्थानकावरून सहा जादा बसेस कल्याणपर्यंत सोडण्यात आल्या. काही रेल्वे इगतपुरीत थांबविण्यात आल्याने त्यांमधील प्रवाशांनी इगतपुरी बसस्थानकाकडे धाव घेतली. त्यामुळे या बसस्थानकातूनही १० जादा बसेस कल्याणपर्यंत सोडण्यात आल्या. रेल्वेसेवा ठप्प झाल्याने मनमाड आणि लासलगाव येथेही प्रवासी अडकून पडले. त्यामुळे तेथूनही अनुक्रमे १७ आणि १० जादा बसेस सोडण्याची व्यवस्था एसटी महामंडळाकडून करण्यात आली. या बसेसने नाशिक आणि पुढे कल्याणपर्यंत प्रवासी सोडले.

कल्याण, ठाण्यापर्यंत सेवा
नाशिकहून नियमितपणे मुबंईकडे जाणाऱ्या बसेस ठाण्यापर्यंतच सोडण्यात आल्या. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पा‌णी साचल्याने बसेस पुढे नेणेच शक्य नव्हते. त्यामुळे प्रवाशांना ठाण्यापर्यंत सोडण्यात आले. जादा बसेसने कल्याणपर्यंतच प्रवाशांची वाहतूक झाली. रेल्वेसेवा बुधवारीदेखील (दि. ३०) बंद राहण्याची शक्यता असून एसटी महामंडळाने जादा बसेस सोडण्याची तयारी ठेवली आहे. नाशिकसह जिल्ह्यातील सर्वच आगारांमधून बसेस मागवून त्याद्वारे कल्याणपर्यंत प्रवासी वाहतूक करण्यात आली.

प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर जादा बसेस सोडत आहोत. कल्याणपर्यंत या बसेस सोडण्यात येत आहेत. त्यासाठी आम्ही जिल्ह्यातील अन्य आगारांमधून बसेस मागविल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत या बसेस सुरू राहतील.
- आर. डी. जगताप, विभागीय वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जेलरोडला चेन स्नॅचिंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
सोसायटीच्या प्रवेशद्वारावर उभ्या असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची पोत दुचाकीवरील चोरट्यांनी तोडून नेली. ही घटना नाशिकरोड परिसरातील आनंदनगर भागात घडली. या प्रकरणी उपनगर पोलिस स्टेशनमध्ये जबरी चोरीच्या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
सुलोचना मधुकर सूर्यवंशी (रा.मधुआशा अपार्ट. सातभाईनगर, जेलरोड) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रविवारी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. जगतापमळा येथील देवस्मृती सोसायटीच्या प्रवेशद्वारावर सूर्यवंशी उभ्या असताना दुचाकीवर आलेल्या एका भामट्याने पत्ता विचारण्याचा बहाणा करीत त्यांच्या गळ्यातील सुमारे ५० हजार रुपयांची सोन्याची पोत ओरबाडून नेली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक निरीक्षक भेंडेकर करीत आहेत.

कारच्या धडकेने सायकलस्वार जखमी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
भरधाव कारने दिलेल्या धडकेत सायकलस्वार तरूण जखमी झाल्याची घटना सातपूर एमआयडीसीतील श्रमिकनगर येथे घडली. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
प्रकाश साहेबराव जाधव (१९, रा. सातमाऊली चौक, सातपूर) असे जखमी तरुणाचे नाव आहे. सोमवारी (दि. २८) सकाळी साडे नऊ वाजेच्या सुमारास प्रकाश श्रमिकनगर येथील महिद्रा कंपनीच्या प्रवेशद्वारासमोर आपल्या सायकलवर प्रवास करीत असताना हा अपघात झाला. पाठीमागून भरधाव आलेल्या अज्ञात कारने त्यास धडक दिली. अपघातात प्रकाश जखमी झाला असून, अधिक तपास हवालदार देवरे करीत आहेत.

पंचवटीत दुचाकी चोरी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
गंगाघाटावरील यशवंत महाराज मंदिराजवळ पार्क केलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
संजय दामू गायकवाड (रा. उद्यनगर कॉलनी, मखमलाबादरोड) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे. गायकवाड बुधवारी १६ ऑगस्ट रोजी सकाळी गंगाघाटावर गेले होते. यशवंतराव महाराज मंदिर परिसरात पार्क केलेली त्यांची स्प्लेंडर (एमएच १५ बीई ६४७२) चोरट्यांनी पळवून नेली. घटनेचा अधिक तपास हवालदार शेख करीत आहेत.

भद्रकालीत आठ जुगारी गजाआड

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
वर्दळीच्या मेनरोड परिसरात उघड्यावर जुगार खेळणाऱ्या आठ जुगारींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. संशयितांच्या ताब्यातून आठ हजाराची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले असून, या प्रकरणी भद्रकाली पोलिस स्टेशनमध्ये मुंबई जुगार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुणाल विनायक मेहेर (रा. चित्रमंदिर चौक, शिवाजीरोड), प्रकाश सुरेश शहा उर्फ गुजर (रा. त्रिकोणी गार्डन, काठेगल्ली), महेंद्र मोतीराम गडपे (रा. बुधवारपेठ), राम भीमराव आढाव (रा. टाकसाळ लेन), निनाद पांडुरंग कर्पे (रा. तपोवन रोड), राहुल मिलिंद कदम (रा. म्हसरूळ टेक), लक्ष्मण साहेबराव घरपाळ (रा. बोधलेनगर, नाशिकरोड) आणि बाळासाहेब यशवंत सोनवणे (रा. द्वारका) अशी अटक केलेल्या जुगारींची नावे आहेत. सोमवारी (दि. २८) रात्रभर संशयित जुगार खेळत होते. सकाळी उपनिरीक्षक अनमोल केदारे यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. मंगळवारी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पोलिसांनी पंचासमक्ष टाकलेल्या छाप्यात संशयित पैसे लावून पत्यांवर अंदर बाहर नावाचा जुगार खेळतांना मिळून आले. संशयितांच्या अंगझडतीत आठ हजार १०० रुपयांची रोकड आढळून आली. पोलिसांनी रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत केले आहे. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ निरीक्षक मंगलसिंग सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक केदारे करीत आहेत.

युवतीचा विनयभंग
इंदिरानगर : इंदिरानगर येथील रंगरेज मळ्यात युवतीच्या घरात प्रवेश करून तिला मारहाण आणि विनयभंग केल्याची घटना घडली. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. रंगरेज मळा, कलानगर येथे फिर्यादी त्यांच्या दोन मुली व एका मुलासह राहतात. दुपारी संशयित आरोपी संकेत चंद्रात्रे व त्याचे मित्रांनी घरात बळजबरीने प्रवेश केला. ‘तू माझ्याशी का बोलत नाहीस?’ असे संकेतने युवतीला विचारले. तिने उत्तर न दिल्याने संतापलेल्या संकेतने तिला लाथाबुक्क्यांनी मारहाण सुरू केली. युवतीच्या आईने विचारणा केली असतात त्यांनाही मारहाण करून चावा घेतला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live


Latest Images