Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

हेल्मेटजागृतीसाठी अवतरले गणराय

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हेल्मेट घालण्याबाबत आणि वाहतूक नियमांच्या पालनाबाबत जनजागृती करण्यासाठी नेहमीच वेगवेगळे प्रयोग राबवणाऱ्या शहर पोलिसांसोबत शुक्रवारी चक्क गणराय अवतरले. हेल्मेटचा वापर न करणाऱ्या वाहनचालकांनी गणरायाची एक विशेष आरती केल्यानंतरच वाहनचालकाची सुटका करण्यात आली. शहरात वेगवेगळ्या ठिकाणी राबवण्यात आलेल्या जनजागृती मोहिमेत जवळपास ६०० जणांना सहभाग घ्यावा लागला. या मोहिमेची चांगली चर्चा शहरात रंगली.

बेशिस्त वाहनचालकांना आवर घालण्यासाठी वाहतूक पोलिस सातत्याने दंडात्मक कारवाई करतात. वर्षाकाठी दोन ते तीन कोटी रुपयांचा दंड होतो. हजारो वाहनचालकांकडून दंड वसूल होत असताना बेशिस्त वाहतुकीला फरक मात्र पडत नाही. या पार्श्वभूमीवर शहर पोलिस वेगवेगळे उपक्रम राबवून वाहनचालकांचे प्रबोधन करतात. शुक्रवारी सकाळी वाहतूक पोलिस गणरायाची वेशभूषा केलेल्यांना सोबत घेऊन गंगापूररोडवरील पोलिस आयुक्तालय, शरणपूर पोलिस चौकी सिग्नलजवळ, त्र्यंबक नाका सिग्नल तसेच अन्य काही ठिकाणी येऊन थांबले. हेल्मेट परिधान न केलेल्या वाहनचालकांना थांबवण्यात आले. झेब्रा क्रॉस‌िंगचा नियम मोडणारे, सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहनचालकांना गणरायाच्या आरतीसाठी थांबवण्यात आले. यात महिला चालकांचादेखील समावेश होता. नियमाचे पालन न करणाऱ्या चालकांकडून पोलिसांनी दंडाची रक्कम वसूल करण्याऐवजी चक्क रस्ते वाहतूक नियमांची माहिती देण्यात आली. वाहनचालकांनी हेल्मेट घालण्याची विनंती करीत पोलिसांनी त्याचे महत्त्व उदाहरणासह पटवून दिले. त्यानंतर वाहनचालकाच्या हाती तयार करण्यात आलेल्या खास आरतीचा कागद देण्यात आला. ज्या वाहनचालकांनी आरती म्हटली, त्यांना पोलिसांनी त्वरीत सोडून दिले.

वाहनचालकांनी म्हटली ही आरती

जय देव जय गणपती देवा, स्वतःच्या सुरक्षतेसाठी मला हेल्मेट वापरण्याची सद्बुध्दी दे, जय देव जय गणपती देवा, हेल्मेट मी घालीन, सिग्नल मी पाळीन, झेब्राला थांबेन, शिस्त मी पाळीन. जय देवा जय गणपती देवा, पी पी पों पों बंद मी ठेवीन, सीट बेल्ट लावीन, सुखरूप राहीन. जय देवा, जय देवा गणपती देवा..


गणराया, सद््बुद्धी द्या

या मोहिमेबाबत बोलताना सहायक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले की, गणपती ही बुद्धिची देवता आहे. गणरायाच्या आगमनाचा एक चांगला परिणाम समाजावर होतो. या पार्श्वभूमीवर शहरातील वेगवेगळ्या भागात आम्ही मोहीम राबवली. हेल्मेट वापरणे, झेब्रा क्रॉसिंगचे नियम पाळणे, सीट बेल्ट लावणे असे अगदी साधे नियम वाहनचालकांनी पाळण्याची बुद्धी गणरायाने द्यावी, असा या मागे उद्देश असल्याचे देवरे यांनी स्पष्ट केले. अनेक चालक आरशाला हेल्मेट लावून वाहन चालवतात. अशा वाहनचालकांच्या मानसिकतेत सुधारणा तरी कशी होणार, असा उद्विग्न सवाल देवरे यांनी उपस्थित केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सातपूर येथील पालिकेचे क्लब हाउस चकाकणार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

येथील धूळ खात पडलेल्या क्लब हाउसला रंगरंगोटी करण्यात येणार असून, पडून असलेली इमारतही खेळांडूसाठी खुली करण्यात येणार आहे. सभापती माधुरी बोलकर व महापालिकेचे बांधकाम उपअभियंता संजय पाटील यांनी ‘मटा’ला ही माहिती दिली.

महापालिकेने एमआयडीसीत क्लब हाउसची उभारणी केली आहे. परंतु, तेथील दोन इमारतींपैकी एका इमारतीचा वापरच होत नसल्याने ती धूळ खात पडून असल्याचे वृत्त ‘मटा’मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यानंतर सभापती माधुरी बोलकर व नगरसेविका पल्लवी पाटील यांनी महापालिकेच्या बांधकाम अधिकाऱ्यांना बरोबर घेत क्लब हाउसची पाहणी केल्यावर हा निर्णय घेण्यात आला.

सातपूर एमआयडीसीतील क्लब हाउसच्या दोन इमारतींपैकी एका इमारतीत बॅडमिंटन, टेबल टेनिस व शूटिंग क्लब सुरू आहे. परंतु, दुसरी इमारत धूळ खात पडून असल्याने तिचा योग्य वापर व्हावा, अशी मागणी खेळाडूंनी केली होती. त्यानंतर ‘मटा’ने क्लब हाउसबाबत वृत्त प्रसिद्ध केल्यावर सभापतींनी पाहणी केली. आगामी काही दिवसांत पडून असलेल्या इमारतीचा हॉल खेळाडूंसाठी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे सभापती बोलकर यांनी ‘मटा’ला सांगितले. परिसरात स्वच्छता करण्याचे आदेशही सभापतींनी दिले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षा पसार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बेशिस्त वाहनचालकांना चाप लावण्यासाठी चौकाचौकांत पोलिसांचा ताफा तैनात असला तरीही त्यांना वाहनचालक जुमानत नसल्याचे चित्र शुक्रवारी त्र्यंबक नाका सिग्नलवर पाहायला मिळाले. तब्बल वीसपेक्षा अधिक पोलिसांच्या नाकावर टिच्चून एका रिक्षेने पोबारा केला. पोलिस मात्र हतबलपणे पसार होणारी रिक्षा पाहत होते.

हेल्मेट परिधान करण्यासह वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी शहर पोलिसांनी शुक्रवारी उपक्रम हाती घेतला होता. त्यासाठी जवळपास ५० वाहतूक पोलिसांचा फौजफाटा त्र्यंबक नाका सिग्नल येथे जमला होता. एकीकडे प्रबोधन सुरू असताना दुसरीकडे बेशिस्त वाहनचालकांचा शोध सुरू होता. याच दरम्यान, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी वाहतूक करणारी एक रिक्षा जाताना वाहतूक पोलिसांना दिसली. त्यांनी चालकाला रिक्षा थांबवण्याचा इशारा केला. मात्र, एवढ्या मोठ्या पोलिसांचा फौजफाटा असला तरी रिक्षाचालकाने या पोलिसांना जुमानले नाही. त्यांच्या नाकावर टिच्चून रिक्षाचालकाने आणखी अॅक्सिलेटर पिळले. पोलिस आडवे झाले तरी या मुजोर रिक्षाचालकाने पलायन केले. विशेष म्हणजे पुढे बसलेला पाचवा प्रवासी असताना रिक्षाचालकाने ही किमया साधली. पसार झालेली रिक्षा पोलिस मात्र निमूटपणे पाहत राहिले. या रिक्षाचा क्रमांक पोलिसांनी नोंद केला असून, त्याच्यावर काय कारवाई होते, हा आता औत्सुक्याचा विषय असेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७३ गावांत थेट सरपंच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्यात नोव्हेंबर व डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाऱ्या ७,५७६ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी दोन टप्प्यांत ७ आणि १४ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. यात जिल्ह्यातील १७३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यात सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकांचाही समावेश असल्यामुळे या निवडणुका लक्षवेधी ठरतील. यासाठी शुक्रवारपासून आचारसंहिता लागू झाली आहे.

थेट सरपंचपदासाठी पहिल्यांदाच मतदान होत असल्याने आचारसंहितेबाबत विशेष दक्षता घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहे. या निवडणुकीत एका मतदाराला कमीत कमी तीन व जास्तीत जास्त चार मते द्यावी लागतील. एक मत थेट सरपंचपदासाठी असेल, तर अन्य मते आपल्या प्रभागातील सदस्यपदांसाठी द्यावी लागतील. पूर्वीप्रमाणेच सदस्यांसह थेट सरपंचपदाच्या निवडणुकीसाठीदेखील निवडणूक चिन्ह म्हणून मुक्त चिन्हांचा वापर केला जाईल. पक्षांसाठी आरक्षित असलेल्या चिन्हांचा या निवडणुकीत वापर होणार नाही.

फिकट निळी मतपत्रिका

पहिली मतपत्रिका सरपंचपदाच्या जागेसाठी असेल. सरपंचपदासाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिकट निळा असेल. सदस्यपदाच्या मतपत्रिकांचे रंग पूर्वीप्रमाणेच असतील. अनुसूचित जातीच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिकट गुलाबी, अनुसूचित जमातीच्या राखीव जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिकट हिरवा, तर नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग फिकट पिवळा असेल. सर्वसाधारण जागेसाठीच्या मतपत्रिकेचा रंग पांढरा असेल.

सातवी उत्तीर्ण आवश्यक

सरपंचपदाची उमेदवार असलेली व्यक्ती १ जानेवारी १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेली असल्यास किमान सातवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अशा उमेदवारांना सातवी उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तसे प्रमाणित करणे आवश्यक राहील.

आचारसंहिता लागू

या सर्व ठिकाणी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यापासून आचारसंहिता लागू झाली आहे. ज्या जिल्ह्यात एकूण ग्रामपंचायतींपैकी ५० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा जिल्ह्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू असेल. त्याचप्रमाणे ज्या तालुक्यात ५० टक्के किंवा त्यापेक्षा अधिक ग्रामपंचायतींच्या निवडणुका असल्यास अशा तालुक्याच्या संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात आचारसंहिता लागू राहील. निवडणूक असलेल्या ग्रामपंचायतींच्या लगतच्या गावांमध्येसुद्धा आचारसंहिता लागू राहील. मात्र, निवडणूक नसलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विकासकामांवर कोणतेही निर्बंध राहणार नाहीत. त्यांना फक्त निवडणूक होत असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रातील मतदारांवर प्रभाव पडेल, अशी कोणतीही कृती करता येणार नाही. निकाल लागल्यानंतर आचारसंहिता संपुष्टात येईल. मतदानाच्या दिवशी संबंधित ठिकाणी जिल्हाधिकारी स्थानिक सुटी जाहीर करतील.

पहिला टप्पा

नाशिक जिल्ह्यातल निवडणूक पहिल्या टप्प्यात होणार आहे. त्यासाठी नामनिर्देशनपत्रे १५ सप्टेंबर ते २२ सप्टेंबर २०१७ या कालावधीत दाखल करता येतील. ते २७ सप्टेंबर २०१७ पर्यंत मागे घेता येतील. त्याच दिवशी निवडणूक चिन्हांचे वाटप होईल. ७ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होईल. नऊ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांना लसूण, कांद्यावर मार्गदर्शन

$
0
0

राजस्थानच्या शेतकऱ्यांनी जाणून घेतले व्यवस्थापन

म. टा. वृत्तसेवा, निफाड

राष्ट्रीय बागवानी अनुसंधान आणि प्रतिष्ठान नाशिक यांच्या वतीने चितेगाव (ता. निफाड) येथील संस्थेच्या वतीने राजस्थान येथील शेतकऱ्यांसाठी कांदा आणि लसूण या पिकाच्या उत्पादनासाठी पाच दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज (दि.२) या शिबिराचा समारोप होत आहे.

या पाच दिवसीय शिबिरासाठी राजस्थानातून कोटा, भिलवाडा, बुंदी या जिल्ह्यातील प्रत्येकी ३० प्रमाणे एकूण ९० शेतकऱ्यांनी सहभाग घेतला आहे. केंद्रीय कृषी विकास विभागाच्या आत्मा या योजनेंतर्गत यात सहभाग घेतला आहे. या प्रशिक्षण शिबिरात लसूण आणि कांदा या पिकांच्या अधिक उत्पादक क्षमतेसाठी मार्गदर्शन केले जाणार आहे. लसूण व कांद्याच्या जाती, लागवड, सिंचन पद्धत, व्यवस्थापन, ठिबक सिंचनाची पद्धत, रोग व कीटकांचे व्यवस्थापन, बीज उत्पादन अशा विविध बाबतीत सविस्तर मार्गदर्शन केले जात आहे.

या शिबिरात सहभागी शेतकऱ्यांना ही माहिती देतानाच त्यांच्या समस्या व अडचणी यावरही मार्गदर्शन केले जात आहे. या शिबिरात चितेगाव केंद्राचे सहाय्यक निदेशक डॉ. आर. पी. सिंग यांनी लसूण व कांद्याच्या व्हरायटी व त्यांची पीक घेण्याची पद्धत याबाबत शेतकऱ्यांना माहिती दिली. शेतक-यांच्या शंकांचे यावेळी समाधान करणत आले. आतापर्यंत चितेगाव या केंद्रातून कांद्याच्या नऊ, तर लसूणच्या सहा जातींची निर्मिती केली आहे. या सर्व जाती निर्यातक्षम व गुणवत्ताधारक आहेत. या वाणांविषयी शेतक-यांना माहिती दिली. यावेळी एनएचआरडीएफचे अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवेबाबत तूर्तास वेटिंगच

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहर बससेवेच्या फेऱ्या कमी करून एकीकडे परिवहन महामंडळाने महापालिकेवर दबाव वाढवला असतानाच, महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी मात्र आर्थिक स्थिती सध्या चांगली नसल्याचे सांगत, बससेवेबाबत हात झटकले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप यांनी महापालिकेची आर्थिक स्थिती व व्यवहार्यता तपासूनच बससेवेबाबत निर्णय घेतला जाईल, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे तूर्तास वर्षभर तरी बससेवेचा प्रश्न सुटणार नाही. महामंडळाने नागरिकांना वेठीस धरू नये, असेही त्यांनी म्हटले आहे.

राज्य परिवहन महामंडळ आणि महापालिकेत सध्या शहर बससेवेचा वाद सुरू आहे. महामंडळाने बससेवा बंद करण्याची धमकी दिली आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक स्थिती योग्य नसल्याने महापालिकेने सध्या तरी बससेवा चालविण्यास नकार दिला आहे. याची चाचपणी करण्यासाठी महापालिकेने सल्लागार नेमला आहे. महापालिकेत सत्ताधारी भाजपनेही याबाबत आस्तेकदमची भूमिका घेतली आहे. भाजपचे अध्यक्ष आमदार सानप यांनीही आर्थिक स्थिती चांगली नसल्याने बससेवा तूर्तास महापालिकेला चालवणे शक्य होणार नाही, असे म्हटले आहे. आर्थिक स्थिती व व्यवहार्यता तपासूनच याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

‘एसटीने नागरिकांना वेठीस धरू नये’

इंदूर, तसेच अन्य महापालिकांच्या बससेवेचा अभ्यास करून खासगीकरणातून बससेवा चालविण्याबाबतचीही चाचपणी भाजपकडून केली जात आहे. त्यासाठी मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. तूर्तास तरी बससेवा महापालिका चालविणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. नाशिककरांवर कराचा बोजा पडणार नाही, याची दक्षता घेतली जाईल, असे सांगत पर्यायांची चाचपणी केली जाईल. सोबतच महामंडळाकडून नागरिकांना छळण्याचे काम सुरू असून, महामंडळाने नागरिकांना वेठीस धरू नये, असे आवाहन सानप यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पार-तापी जोड’चा आराखडा तयार

$
0
0

नदीजोड प्रकल्पाला हिरवा कंदील

नवी दिल्‍ली : नदीजोड प्रकल्पाला १५ वर्षांनंतर अखेर हिरवा कंदील मिळाला असून, काही महिन्यांतच देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा प्रकल्प सुरू होणार आहे. याचा पहिला टप्पा केन (कर्णावती)- बेतवा नदी जोड प्रकल्पाने प्रारंभ होणार असून, या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. पार-तापी नदी जोड प्रकल्पाचाही यामध्ये समावेश आहे. पार-तापी नर्मदेला जोडण्याचा आणि दमणगंगा पिंजाळला जोडण्यासाठी आराखडा सरकारकडून तयार करण्यात आला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नदी जोड प्रकल्पांसाठी आग्रही आहेत. या प्रकल्पात सुरुवातीच्या टप्प्यात ६० नद्यांना एकमेकांना जोडले जाणार असूप, यात गंगा नदीचाही समावेश आहे. या प्रकल्पाचा खर्च ८७ अब्ज डॉलर इतका असणार आहे. येत्या काही आठवड्यांत केंद्रीय मंत्रिमंडळात या प्रकल्पाला मंजुरी मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाजपशासित राज्यांमध्ये या प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रकल्पात गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश आहे. दमणगंगा पिंजाळ प्रकल्पाचाही या नदीजोड प्रकल्पात समावेश आहे. यामुळे पाणीप्रश्न सुटण्याबरोबरच हजारो हेक्टर जमीन सिंचनाखाली येण्यास मदत होणार आहे.

केन-बेतवा नदीजोड लवकरच

नवी दिल्ली- बुंदेलखंड आणि मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यांना वरदान ठरू शकणाऱ्या केन (कर्णावती) - बेतवा नदीजोड प्रकल्पाला लवकरच प्रारंभ होणार असून, येत्या एक-दोन आठवड्यात केंद्रीय मंत्रिमंडळात यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. सुमारे १० हजार कोटी रुपयांचा हा प्रकल्प असून, त्यामुळे कायमस्वरूपी दुष्काळी असलेल्या बुंदेलखंड भागातील लोकांच्या पाण्याची सोय भागविली जाणार आहे. मध्य प्रदेशातील सुमारे साडेतीन लाख हेक्टर जमीन या प्रकल्पाने ओलिताखाली येणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कलाकौशल्यांनी नटलेला उत्सव

$
0
0

रघुनाथ महाबळ, बलोपासक

नाशिकने गणेशोत्सवात धार्मिक क्षेत्र म्हणून आपली ओळख जपली आहे. नाशिकला गणेशोत्सवाच्या सुरुवातीपासूनच विशेष वारसा लाभला आहे. रविवार कारंजा, अशोकस्तंभ, भद्रकाली, सीबीएस, जुने नाशिकइतकेच तेव्हाचे मूळ नाशिक होते. तेव्हा गणेशोत्सवात ऐतिहासिक, पौराणिक, देखावे साकारले जायचे. सामाजिक विषयांवर देखावे साकारताना जिवंत देखाव्यांचा वापर केला जायचा. शहरातील अनेक कलाकार आपली कला या जिवंत देखाव्यातून सादर करायचे.

मोहन मास्तर तालीम संघ आणि विजयानंदचा गणपती त्या काळी कमालीचा लोकप्रिय होता. फळे, नारळं, भांडी, भाज्या यांपासून गुलालवाडीचा गणपती साकारला जायचा. दहा दिवसांच्या या उत्सवात गणेश मंडळांच्या बाजूला आपली कला सादर करण्यासाठी अनेक कलाकार गर्दी करायचे. सोनवणे भाऊसाहेब मिमिक्रीच्या कलेतून वेगवेगळ्या जाहिराती सादर करायचे. पर्यावरणाला हानी पोहोचेल असा उत्सव त्या काळी नसायचा. गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीलादेखील खास शैली होती. नाशिक नगरपालिका आणि पोलिस ट्रेनिंग सेंटरचा गणपती मिरवणुकीच्या सुरुवातीला असायचा. यापाठोपाठ शहरातील ७०हून अधिक गणेश मंडळांचा या मिरवणुकीत सहभाग असायचा. ट्रम्पेटवर सादर होणारी आरती, सांस्कृतिक सादरीकरण, संगीत मैफली ही मिरवणुकीची खासियत होती. यशवंतराव व्यायामशाळेच्या गणेशोत्सवात १९६१मध्ये साठ्ये सरांनी घाटी लेझीम सुरू केली. तेव्हापासून नाशिकच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत लेझीम संस्कृती सुरू झाली. मोर चाल, स्वस्तिक चाल, बडंग चाल खेळत मिरवणूक पुढे सरकायची. आबा घाडगे या मिरवणुकीत मल्लखांबाचे प्रात्यक्षिक दाखवायचे. सोबतच जिन्मॅस्टिक आणि इतर मैदानी खेळांची प्रात्यक्षिके मिरवणुकीत सर्वांचे लक्ष वेधून घ्यायची. फेटा, नेहरू शर्ट आणि धोतर असा पारंपरिक पोशाख मिरवणुकीत केला जायचा. गुलालाऐवजी फुलांची उधळण केली जायची. शास्त्रीय सुगम संगीताने मिरवणुकीतचा उत्साह वाढायचा. आता हे चित्र पालटले आहे. काळ बदलला तसा उत्सव बदलत गेलाय. सध्या चांदी, सोने, पैसे यांवर गणेशोत्सव आधारित झालाय. कोणाचे गणेश मंडळ सर्वाधिक श्रीमंत ही स्पर्धा सध्या सुरू झाली आहे. विसर्जन मिरवणुकीत धांगडधिंगा करत विचित्रपणा वाढत आहे. हे प्रकार परंपरेला साजेसे नाहीत. तरुण ताकद याला नक्कीच बदलू शकते. कर्णमधुर संगीतच गणेशोत्सवात असावे. विद्या विनयेन शोभते हे लक्षात घेत विद्येच्या देवतेचा उत्सव त्याच परंपरेने आणि आपुलकीने साजरा व्हायला हवा.

(शब्दांकन : सौरभ बेंडाळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दुपारी १२ पासूनच मिरवणुकीचा श्रीगणेशा

$
0
0

नाशिकमधील गणेशोत्सव विसर्जन मिरवणूक सर्वसाधारणपणे दुपारी ३ वाजेनंतर सुरू केली जाते. मात्र, सुरक्षा आणि विविध कारणांमुळे ती सकाळीच सुरू करण्याची मागणी होत होती. त्यानुसार ही मिरवणूक यंदापासून दुपारी १२ वाजताच सुरू करण्याचा निर्णय मटा राउंड टेबल कॉन्फरन्समध्ये घेण्यात आला. महिला वादकांना सुरक्षेचा प्रश्न भेडसावत असून, त्यांना मिरवणुकीत पुढच्या भागात स्थान देण्यासाठी प्रयत्न करण्याची ग्वाहीही यावेळी देण्यात आली. महापालिका व पोलिस दलाचे अधिकारी, गणेश मंडळांचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी आदींनी या राउंड टेबलमध्ये सहभाग घेतला.

--

मिरवणुकीच्या खर्चात बसविणार सीसीटीव्ही

आतापर्यंत दर वर्षी वेगवेगळी वाद्ये आम्ही विसर्जन मिरवणुकीत वापरली. त्यावर मोठा खर्चही केला. पण, आता या मिरवणुकीच्या खर्चातून समाजाला उपयोगी काम व्हावे यासाठी आम्ही नवीन काही तरी करण्याचा निर्णय घेतला. त्यातून दोन सीसीटीव्ही लावण्याची कल्पना आली. ती आम्ही प्रत्यक्षात आणणार आहोत. त्यामुळे खर्च सत्कारणी लागेल. पण, जी मंडळे विसर्जन मिरवणूक काढणार आहेत, त्यांनी मात्र काळजी घेणे अावश्यक आहे. विसर्जन मिरवणुकीत मंडळाचे फक्त ५० ते ६० कार्यकर्ते असतात. पण, ज्या वेळी गाणे सुरू होते, त्यावेळी त्यांची संख्या दहापट वाढते. त्यामुळे मंडळाच्या बाहेरील व्यक्तींना काढणे जिकिरीचे असते. पोलिस मंडळ व साउंड सिस्टिमवाल्यांना सांगू शकतात. मात्र, अशा मंडळींना सांगणे त्यांनाही अवघड जाते. त्यामुळे मिरवणुकीलाही उशीर होतो. त्याचप्रमाणे ढोल पथकातील संख्या मोठी, तर डीजेच्या गाड्याही दोन-तीन असतात. त्यामुळे मिरवणुकीची रांगही वाढते. मिरवणुकीतील टवाळखोरांचाही मंडळांना त्रास होतो. उत्सवकाळात अनेक ठिकाणचे स्ट्रीट लाइट बंद असल्याने गैरसोय सहन करावी लागते. तक्रार केल्यानंतरही त्याची दखल घेतली जात नाही. महापालिकेने प्रत्येक मंडळाकडून २५० रुपयांएेवजी आता ७५० रुपये घेतले. पण, त्या तुलनेत एकही सुविधा दिलेली नाही. काही मंडळांना निर्माल्य कलश दिले असले, तरी खड्डे कायम आहेत. त्यामुळे आमच्या मंडळाचा कलश आम्ही खड्ड्यावर उभा केला आहे. महापालिकेने याकडे गांभीर्याने बघणे आवश्यक आहे.

-रवी गायकवाड, गणेश मंडळ पदाधिकारी

-

केस अंगावर कोण घेणार?

गणेश विसर्जन मिरवणुकीत आवाजाच्या मर्यादेवर लावण्यात आलेल्या निर्बंधांमुळे अंगावर केस घेणार कोण, असा प्रश्न आहे. डीजे लावला, तर पोलिसांची नोटीस व पारंपरिक वाद्ये लावणे परवडत नाही. त्यामुळे पुढच्या वर्षी त्यावर परिणाम होईल. या कडक निर्बंधामुळे गणेश मंडळांची कुचंबणा होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी मध्यरात्री १२ वाजेपर्यंत मिरवणुकीसाठी वेळ दिला असला, तरी वाद्यांबाबत काय, असा प्रश्न कायम आहे. त्यामुळे कोणते वाद्य लावावे हा प्रश्न आहेच. महापालिकाही पैसे घेऊन काहीच सुविधा देत नाही. बऱ्याच भागात अंधाराचे साम्राज्य आहे. त्याबाबतच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. भटक्या कुत्र्यांचा प्रश्नही कायम आहे. त्यातून अनेकांच्या मनात भीती आहे. त्याचप्रमाणे साथींचे विकारही मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. याबाबत महापालिकेने लक्ष द्यावे. ठिकठिकाणी खड्डेही पडले आहेत, ते बुजवावेत. उत्सवकाळात अधिक सजग राहणे गरजेचे आहे. गर्दीच्या ठिकाणी तर त्यात मोठी वाढ होते. विसर्जनाच्या मिरवणुकीत बऱ्याच वेळा मंडळाचा नंबर लांबचा असल्यामुळे त्यातूनही कार्यकर्त्यांचा हिरमोड होतो व मिरवणुकीला उशीरही होतो. पंचवटी विभागाची स्वतंत्र विसर्जन मिरवणूक करावी. त्याचप्रमाणे विभागवार कृत्रिम तलाव करून त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवावी. अमोनियम बायकार्बोनेट पावडर सर्वत्र मिळण्याची व्यवस्था महापालिकेने करावी.

-महेश बडवे, गणेश मंडळ पदाधिकारी

---

शहरात यंदा २८ कृत्रिम तलाव

गणेश विसर्जनासाठी शहरात २६ नैसर्गिक तलाव असून, महापालिकेने २८ कृत्रिम तलाव तयार केले आहेत. नाशिक पूर्व विभागात ४ नैसर्गिक तलाव असून, येथे ६ कृत्रिम तलाव केले आहेत. पश्चिम विभागात ५ नैसर्गिक तलाव असून, ७ कृत्रिम तलाव राहणार आहेत. पंचवटी विभागात ६ नैसर्गिक व तीन कृत्रिम तलाव आहेत. नाशिकरोड येथे विसर्जनसाठी पाच नैसर्गिक व चार कृत्रिम तलाव आहेत. नवीन नाशिक (सिडको) येथे ५ नैसर्गिक व ४ कृत्रिम तलाव राहणार आहे. सातपूर येथे एक नैसर्गिक तलाव असून, ४ कृत्रिम तलाव राहणार आहेत. हे तलाव कोठे असतील, याची यादी प्रसिद्ध केली आहे. काही ठिकाणी कृत्रिम तलावांची मागणी असेल, तर त्यावर विचार केला जाऊ शकतो. नैसर्गिक व कृत्रिम तलावांमुळे विसर्जन आपल्या भागात व जवळच्या ठिकाणी सर्वांना करता येणार आहे. मिरवणूक मार्गावरील सर्व खड्डे बुजविण्याचे काम सुरू असून, काही तक्रारी असल्यास त्याची दखलही घेतली जाईल. बंद असलेले स्ट्रीट लाइट सुरू करण्याचे काम सुरू आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी महापालिकेने सर्व व्यवस्था चोख राहावी यासाठी नियोजन केले आहे.

-नितीन वंजारी, कार्यकारी अभियंता, पर्यावरण, महापालिका

---

सर्वत्र मिळणार अमोनियम बायकार्बोनेट

अमोनियम बायकार्बोनेट पावडर सर्वत्र मिळण्याची व्यवस्था महापालिकेने केली आहे. सर्वच विभागीय कार्यालये व कृत्रिम तलावांच्या ठिकाणी ही पावडर मिळणार आहे. घरगुती गणेशांचे विसर्जन नदीमध्ये करून जलप्रदूषणात भर टाकण्याऐवजी अमोनियम बायकार्बोनेटच्या द्रावणात त्या मूर्ती विसर्जित केल्या, तर त्या सहज विरघळणार आहेत. त्यानुसार याचा जास्तीत जास्त वापर भाविकांनी करावा, यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिका यासाठी जनजागृती करीत आहे. यंदाच्या वर्षीही महापालिकेने असे आवाहन केले असून, त्यासाठी अमोनियम बायकार्बोनेटचे वाटप करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे भटक्या कुत्र्यांसाठी एकएेवजी दोन गाड्या आता लावल्या आहेत. त्याचप्रमाणे कचरा होऊ नये यासाठी महापालिकेने नियोजन केले आहे. महिलांसाठी पब्लिक टाॅयलेट अपडेट केले असून, त्यांची स्वच्छता करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व हाॅटेल व्यावसायिकांना याअगोदरच महिलांसाठी टाॅयलेट वापरण्यासाठी देण्याचे आवाहन केले आहे. विसर्जन काळातही महिलांसाठी ते वापरता येणार आहे. उत्सव व विसर्जन मिरवणुकीत प्रतिकारशक्ती कमी असलेल्यांनी शक्यतो बाहेर जाणे टाळावे. लहान मुलांना रुमाल बांधावेत, तर इतरांनी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरले, तर उत्तम राहील. त्याचप्रमाणे महापालिकेतर्फे पेस्ट कंट्रोल, फवारणीसह इतर उपाय केले जात आहेत.

-डाॅ. सुनील बुकाणे, आरोग्याधिकारी, महापालिका

--

--

आवाज मोजण्यासाठी निकषांची गरज

प्रशासनाने डीजे व्यावसायिकांना नाहक बदनाम केले आहे. डेसिबल मीटरने इनडोअर आवाज तपासला, तरी तो ७५ ते ८० डेसिबल इतका होतो. मिरवणुकीत तर तो वाढणारच आहे. अॅम्बियन्सपेक्षा १० डेसिबल जास्त ठेवण्यास मुभा द्यावी. सर्वोच्च न्यायालयाने डीजे वापरासंबंधी कोणत्याही प्रकारचे निर्बंध आणलेले नाहीत, तरी पोलिस प्रशासन मंडळांची दिशाभूल करीत आहे. अनेक व्यावसायिकांनी बॅँकांचे लोन काढून साउंड सिस्टिमची साधने खरेदी केली आहेत. पोलिसांच्या बंदीमुळे व्यवसायावर परिणाम होत असून, अनेकांचे व्यवसाय बंद होण्याच्या मार्गावर आहेत. या प्रकारामुळे अनेक व्यावसायिक बेघर होतील, अशी चिन्हे आहेत. त्याचप्रमाणे पोलिस डेसिबल मीटरने आवाज तपासताना स्पीकरच्या समोर डेसिबल मीटर धरतात, त्यामुळे साहजिकच तो मोठा येतो. त्यासाठी काही तरी निकष असावेत. पोलिसांनी साहित्य जप्त केल्यानंतर त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. याकरिता ते साहित्य हाताळताना खबरदारी घ्यावी.

-राम नवले, साउंड व्यावसायिक

--

गर्दीसाठी आम्हाला दोषी धरणे अयोग्य

घरातील गणपतीचे विसर्जन संपवून मोठ्या प्रमाणावर लोक सायंकाळी मिरवणुकीचा आनंद घेण्यासाठी येत असतात, तसेच अनेक मंडळांनी आपल्या चित्ररथांवर लाखो रुपये खर्च करून विविध प्रकारची विद्युत रोषणाई केलेली असते. दिवसा मिरवणूक सुरू केल्यास या विद्युत रोषणाईचा अानंद घेता येणार नाही त्याकरिता मिरवणूक सकाळी सुरू न करता सायंकाळीच सुरू करावी व लोकांना आनंद घेऊ द्यावा. राहिला प्रश्न मंडळांसमोर असलेल्या गर्दीचा. ज्या ठिकाणी डीजे लावला जातो, तेथे मंडळांचे कमी तर इतर नागरिकच जास्त प्रमाणात नाचत असतात. यावेळी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांचेदेखील काही चालत नाही. याकरिता साउंड सिस्टिम चालकाला दोषी धरणे योग्य होणार नाही.

-चैतन्य काळे, साउंड व्यावसायिक

--

प्रत्येक मंडळास देणार बंदोबस्त

मंडळांच्या बैठकीत ठरल्यानुसार विसर्जन मिरवणूक सुरू करण्यासाठी दुपारी १२ वाजताची वेळ ठरविण्यात आली आहे. त्याअगोदर दोन तास बंदोबस्त लावण्यात येणार आहे. मंडळांनी आपल्या ठरवून दिलेल्या वेळेत सुरुवात केली, तर ठरल्या वेळेत मिरवणूक संपेल. प्रत्येक मंडळासोबत एक अधिकारी, चार पोलिस व महिला पोलिस असा ताफा देण्यात आला आहे. मंडळात कोणत्याही स्वरूपाचे गैरवर्तन खपवून घेतले जाणार नाही. महिला वादकांना काही समस्या असतील, तर त्यांनी लगेच जवळच्या अधिकाऱ्याला सांगितल्यास त्यांचे निराकरण केले जाईल. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ध्वनिक्षेपकांबाबत कारवाई होईल. त्याकरिता दोन गाड्यांमधील अंतर कमी असावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे मार्गाची तपासणी करण्यात आली असून, सर्वत्र लाइट पोहोचेल अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

-राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

--

पारंपरिक वाद्यांच्या मंडळांना द्यावे प्राधान्य

गेल्या काही वर्षांपासून महिला ढोलवादकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र, त्यांना प्रशासनाकडून पुरेशा सुविधा मिळत नसल्याने त्यांचे हाल होतात. शहरातील मिरवणुकीच्या वेळी दुपारी १२ वाजता सर्व वादकांना वाकडी बारव येथे बोलावण्यात येते. लवकर मिरवणूक सुरू होईल, अशी आमची आशा असते. परंतु, मिरवणुकीला रात्री उशिरा सुरुवात होते असल्याने नाहक वेळ वाया जातो. त्यानंतर डीजे सिस्टिम असलेली राजकीय नेत्यांची मंडळे पुढे काढली जातात. याकरिता पारंपरिक वाद्ये वाजविणाऱ्या मंडळांना पुढे जागा करून देण्यात यावी. त्याचप्रमाणे मिरवणूकमार्गावर महिलांसाठी स्वच्छतागृहांची सुविधा नाही, याकरिता चौकांच्या ठिकाणी आडोशाला तात्पुरती स्वच्छतागृहे उभारावीत. महिला वादकांच्या मंडळांसमोर महिला पोलिसांची नियुक्ती करावी, जेणेकरून मद्यपान करून आलेल्या तरुणांचा त्रास होणार नाही. मिरवणूक मार्गावर गाड्यांमध्ये असलेले अंतर कमी करण्यात यावे व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. महिला वादक मिरवणुकीच्या शेवटी असल्याने घरी जाण्यास उशीर होतो, त्याकरिता कॉलन्यांमधील दिवे रात्रभर सुरू ठेवावेत.

-अमी छेडा, ढोलवादक

--

सकाळपासून सुरू करावी मिरवणूक

गणेश विसर्जन मिरवणूक महाराष्ट्रात सर्वत्र सकाळी सुरू करण्याची परंपरा आहे. नाशिकच त्याला अपवाद आहे. नाशिकनेदेखील इतर शहरांचा कित्ता गिरविल्यास सकाळी लवकर मिरवणूक सुरू होईल. गेल्या काही वर्षांत पंचवटीतील भाविकांना शहरात गणपतीची मिरवणूक निघते की नाही याचा पत्ताच लागत नाही. तेथील लोकांना मिरवणूक पाहता यावी यासाठी सकाळी मिरवणूक सुरू करावी. असे केल्यास आमची वर्षभराची मेहनत फळाला येईल. अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे झाले असून, ते बुजविण्यात यावेत, त्याचप्रमाणे महापालिकेने शहराच्या हॉटेलांतील शौचालये महिलांसाठी खुली करून देण्याचे आदेश दिले आहेत, अशा हॉटेलच्या बाहेर बोर्ड लावावेत, जेणेकरून महिलांना त्यांचा वापर करता येईल. दोन मंडळांमधील अंतर मोठ्या प्रमाणात असते. एकाच जागी काही मंडळांचे चित्ररथ तासन् तास उभे राहतात, ते उभे राहू देऊ नयेत. गाडी कुठेही थांबायला नको, अशा सूचना पोलिसांनी ड्रायव्हरला करायला हव्यात. या कालावधीत अनेक मद्यपी तरुण महिलांची छेड काढतात, याकरिता महिलांच्या ढोल पथकाला पुरेशी सुरक्षा देण्यात यावी.

-मीरा वराडे, ढोलवादक

--

(फोटो ः सतीश काळे) (संकलन ः फणिंद्र मंडलिक, गौतम संचेती)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संमेलन अध्यक्षपदी डॉ. तात्याराव लहाने

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मराठी भाषेला आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी शिवसंघ प्रतिष्ठानच्या सहकार्याने पुणे येथील विश्व मराठी परिषद गेली सहा वर्षे वैश्विक स्तरावर मराठी साहित्य संमेलन आयोजित करीत आहे. आजवर अंदमान, श्रीलंका, थायलंड, नेपाळ, मॉरिशस आणि भूतानमध्ये ही संमेलने झाली असून, संमेलनातील हे सातवे पुष्प म्हणून हे संमेलन इंडोनेशियामधील बाली या बेटावर आयोजित करण्यात येत आहे.

यंदाच्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचा विषय हा ‘वैद्यक क्षेत्राशी संबंधित लेखन व लेखनव्यवहार’ हा असून, संमेलनाच्या अध्यक्षपदी वैद्यकीय क्षेत्रातील पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने आहेत. अनेक ठिकाणी जी साहित्य संमेलने होतात, त्यांचा विषय फक्त मराठी साहित्यातील लिखाण असतो. त्यामुळे इतर विषयांवरील लिखाण हे मागे पडते किंबहुना त्याला हवी ती प्रसिद्धी मिळत नाही. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार जर जागतिक पातळीवर करावयाचा असेल, तर तिला कथा, कविता, कादंबरी आणि ललित लेखन एवढे मर्यादित करून चालणार नाही. तिला व्यावहारिक पातळीवर आणणे गरजेचे आहे. हे लक्षात आल्यामुळे आणि मराठी साहित्याला एक वेगळा आयाम मिळावा या दृष्टीने या संमेलनास आम्ही दर वर्षी एक वेगळे सूत्र देत असतो. संमेलनाच्या सूत्राला अनुसरून त्या क्षेत्रातील एक विशेष तज्ज्ञ या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवित असतो.

गेल्या वर्षी या संमेलनाचा केंद्रबिंदू ‘माध्यम’ (पत्रकारिता) असल्याने याच विषयावर परिसंवाद व चर्चासत्रे आयोजित करण्यात आली होती. त्यात विविध माध्यमांशी जोडल्या गेलेल्या अनेक व्यक्तींचा उत्तम प्रतिसाद लाभला. संमेलनात पत्रकारिता या विषयावर ऊहापोह करण्यात आला. पहिल्यांदाच एका विशिष्ट विषयाला वाहिलेल्या साहित्य संमेलनाचा प्रयत्न यशस्वी ठरल्याने या वर्षीच्याही संमेलनाला एक सूत्र असावे, असा प्रयत्न विश्व मराठी परिषद करणार आहे, असे नीलेश गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

यापुढेदेखील मराठी भाषेतून विविध ज्ञानशाखांमध्ये अध्ययन, संशोधन, लेखन केले जाते. वैद्यक, वाणिज्य, व्यापार, संरक्षण, पर्यावरण, युद्धशास्त्र, अभियांत्रिकी, कौशल्ये, कारागिरी अशा किती तरी बाबतीत मराठीतून विपुल लेखन केले गेले आहे. या संमेलनाच्या निमित्ताने त्या सर्व क्षेत्रातील प्रतिभावंत, संशोधक, अभ्यासक, लेखक, कल्पक यांनादेखील या संमेलनाचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार आहे.

वैद्यक, आरोग्य, सार्वजनिक आरोग्य, औषधे, त्या निर्माण करणाऱ्या कंपन्या, त्यांचे व्यवहार, वैद्यकीय व्यवसायातील इष्ट व अपप्रवृत्ती याबाबतचे भ्रम, वास्तव, डॉक्टर व रुग्णांचे संबंध, डॉक्टर व औषध कंपन्यांचे संबंध, संबंधित कायदे, नियम व अधिकार अशा विविध बाबतीत सतत लेखन, विचार, चर्चा होत असते. त्याचीही व्यापक दखल या निमित्ताने घेतली जाणार आहे.

संमेलनाला स्थानिक स्वराज्य संस्थेचे विभागीय संचालक जीवन सोनवणे प्रमुख पाहुणे असतील. त्याचबरोबर संमेलनाचे मावळते अध्यक्ष संजय आवटे, भूमी अभिलेख अधीक्षक शिवाजी भोसले, डॉ. सुमन मुठे आदी उपस्थित राहणार आहेत. त्यांचे वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित विविध विषयांवर परिसंवाद व व्याख्याने होणार आहेत. पत्रकार परिषदेत डॉ. रमेश गोडबोले, डॉ. प्रसाद पिंपळखरे, बापूसाहेब जगताप, रवींद्र पाटील उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पासपोर्ट सेवा होणार गतिमान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

राज्यात पासपोर्टविषयक सेवा देणारी चार कार्यालये विदेश भवनच्या प्रशासकीय अधिकार क्षेत्रात आली आहे. यात नाशिकच्या पासपोर्ट कार्यालयाचाही समावेश आहे. त्यामुळे नाशिककरांना मिळणारी पासपोर्टविषयक सेवा अधिक गतिमान होणार आहे.

रोजगार, शिक्षण, व्यापार व पर्यटनाच्या हेतूने परदेशात जाणाऱ्या भारतीय नागरिकांना पासपोर्टविषयीच्या सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध व्हाव्यात या उद्देशाने मुंबईतील बांद्रा- कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयातर्फे देशातील पहिल्या विदेश भवनाची मुहूर्तमेढ नुकतीच रोवण्यात आली आहे. मुंबईत वरळीमध्ये परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अखत्यारीतील विभागीय पासपोर्ट कार्यालय (आरपीओ) सुरू होते. हे कार्यालय आता नव्याने बांद्रा- कुर्ला कॉप्लेक्समध्ये उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या विदेश भवनात स्थलांतरित करण्यात आले आहे. देशातील या पहिल्यावहिल्या कार्यालयाचे उद्‍घाटन परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नुकतेच झाले. यापुढे राज्यातील ठाणे, ठाणे दोन, मालाड (मुंबई) आणि नाशिक ही चारही पासपोर्ट सेवा केंद्रे त्याच ठिकाणी कार्यरत राहणार असून, नव्याने अस्तित्वात आलेल्या विदेश भवन अर्थात मुंबई ‘आरपीओ’च्या प्रशासकीय नियंत्रणाखाली कामकाज करणार आहेत. नाशिक पासपोर्ट सेवा केंद्रही आता मुंबई ‘आरपीओ’च्या प्रशासकीय ज्युरिडिक्शनखाली आले आहे.

देशातील पहिला पायलट प्रोजेक्ट

विविध सेवा देणाऱ्या कार्यालयांच्या सेवा एकाच छताखाली आणण्यासह स्थानिक राज्य सरकारांच्या सहकार्याने कार्य करणे हे केंद्र सरकारचे धोरण आहे. त्या धोरणाचाच भाग म्हणून मुंबईत परराष्ट्रविषयक सेवा नागरिकांना उपलब्ध होण्यासाठी विदेश भवनाची स्थापना करण्यात आली आहे. या पायलट प्रोजेक्टनुसार विभागीय पासपोर्ट कार्यालये, प्रोटेक्टर ऑफ एमिग्रांट्स ऑफिस (पीओई), ब्रँच सेक्रेटरिएट व रिजनल ऑफिसेस ऑफ आयसीसीआर या महत्त्वाच्या चार कार्यालयांचेही एकत्रीकरण विदेशभवनात करण्यात आले आहे. त्यामुळे या कार्यालयांशी संबंधित असणाऱ्या सर्व सेवा आता भारतीय नागरिकांना विदेश भवन या एकाच कार्यालयाच्या छताखाली उपलब्ध होणार आहेत.

विदेश भवनाची लवकरच निर्मिती

परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या (एमईए) अखत्यारित देशात सध्या ९० पेक्षा अधिक विभागीय पासपोर्ट कार्यालये (आरपीओ) व पीओई भाड्याच्या जागेवर कार्यरत आहेत. खर्चाला कात्री लावणे, नागरिकांना पासपोर्टविषयक गतिमान सेवा देणे व या कार्यालयांची कार्यक्षमता वाढविण्याच्या उद्देशाने मुंबईप्रमाणेच इतर राज्यांच्या राजधानीतही विदेश भवनाची निर्मिती केली जाणार आहे. केंद्र सरकारच्या या महत्त्वाकांक्षी पायलट प्रोजेक्टची सुरुवात मुंबईतून झाली आहे. या पायलट प्रोजेक्टविषयी नाशिक पासपोर्ट सेवा केंद्रास अद्याप काहीही माहिती मिळाली नसल्याचे या कार्यालयातील अधिकाऱ्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सातपूरला देखाव्यांची पर्वणी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

सातपूर परिसरात गणेशोत्सवाने चैतन्य अवतरले असून, पावसाच्या उघडिपीमुळे देखावे पाहण्यासाठी गणेशभक्तांची गर्दी उसळत आहे. परिसरात ७८ मंडळांनी वैविध्यपूर्ण देखावे सादर केलेले आहेत. यंदा पौराणिक देखाव्यांसह प्रबोधनपर देखाव्यांवरही विविध मंडळांनी भर दिल्याचे दिसून येत आहे.

शिवाजीनगर शिवाजी मित्रमंडळाने समाजप्रबोधन करणारा सेल्फीचा मोह टाळा या विषयावरील देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी होत आहे. कॉलनीतील सातपूरचा राजा मित्रमंडळाची आकर्षक मूर्ती भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे. सातपूर गावातील मराठा मित्रमंडळाने पारंपरिक कठपुतलीचे नृत्य साकारले आहे, तर अमरज्योत मित्रमंडळाने भव्य रंगीबेरंगी कारंजाचे डेकोरेशन गणपतीसमोर साकारले आहे.

श्री छत्रपती शिवाजी भाजीमंडईच्या मित्रमंडळाने श्रीकृष्णाच्या रंगपंचमीचा देखावा सादर केला असून, कॉलनीमध्ये ‘रिपाइं’च्या वतीने वणीच्या गडावरील श्री सप्तश्रृंगीमातेच्या शक्तिपीठाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे. या ठिकाणी महिलांची मोठी गर्दी होत आहे. अशोकनगर येथील राज्य कर्मचारी तरुण मित्रमंडळाने गणपतीच्या आकर्षक मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. पिंपळगाव बहुला येथील मित्रमंडळाने गणपती व कार्तिक यांच्यात श्रेष्ठ कोण, याबाबतचा धार्मिक देखावा सादर केला आहे. अन्य मंडळांनीही साकारलेले सामाजिक व धार्मिक देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. सातपूर पोलिसांकडून परिसरात बंदोबस्त ठेवण्यात आलेला असून, कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बकरी ईदसाठी जोरदार तयारी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

मुस्लिम बांधवांमध्ये ईदचे विशेष महत्त्व आहे. प्रत्येक इस्लामी वर्षात दोन ईद (ईद-उल-फित्र व ईद उल-अजहा) उत्साहात होतात. इस्लामिक कालगणनेतील अखेरच्या महिन्याच्या दहाव्या दिवशी बकरी ईद साजरी करण्यात येते. त्यानुसार या दिवशी कुर्बानीचा उत्सव म्हणून या ईदचे महत्त्व आहे. या दिवशी आपल्याला प्रिय असलेल्या कोणत्याही गोष्टीची अल्लाहसाठी कुर्बानी द्यावी लागते. एका इस्लामिक मान्यतेनुसार बकरा कुर्बान करण्याची प्रथा पडली आहे. बकरी ईद निमित्त शनिवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

इस्लामिक मान्यतेनुसार मुस्लिम बांधव बकऱ्याची कुर्बानी देतात. यासाठी आधी बकऱ्याचे पालनपोषण करून त्याची पूर्ण काळजी घेतली जाते. त्यानंतरच तो कुर्बानीसाठी अल्लाहच्या नावे कापण्याची प्रथा आहे. कुर्बान केलेल्या बकऱ्याच्या मांसाचे तीन भागांत विभाजन करून एक हिस्सा स्वतःच्या घरी, दोन हिस्से गरीब मुस्लिम धर्म‌ियाच्या घरात किंवा गरजवंताला देण्याची प्रथा आहे. सकाळच्या विशेष नमाजपठाणानंतर ही कुर्बानी देण्यात येते. बकरी ईदनंतर एक महिन्याने इस्लामिक नववर्ष मोहर्रम साजरा करण्यात येतो.

हजरत मोहम्मद पैगंबर साहेब यांच्या आदेशानुसार प्रत्येक माणसाने आपले घर व देशाच्या रक्षणार्थ सदैव तत्पर राहत अल्लाहच्या जवळ जाण्यासाठी त्यागाची व समर्पणाची भावना मनात ठेवणे गरजेचे आहे. वास्तविक पाहता या ईदच्या निमित्ताने एक संदेश देण्यात आला आहे. तो असा, की प्रत्येकाने स्वार्थ त्यागून मानवाच्या कल्याणासाठी कार्यरत राहिले पाहिजे, तसेच याच महिन्यात जगभरातील मुस्लिम बांधवांचा समूह पवित्र समजली जाणारी हजची यात्रा करीत असतो. त्यामुळे तेदेखील जसे अल्लाहच्या जवळ जाण्यासाठी त्याग करतात, तसा तो आपणही केला पाहिजे, अशी शिकवण या बकरी ईदच्या निमित्ताने इस्लाम धर्माने मानवाला दिली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विसर्जन, ईदसाठी बंदोबस्त

$
0
0

मालेगावात बकरी ईदनिमित्त पालिकेतर्फे कुर्बानीसाठी १५ कत्तलखाने

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

मुस्लिम बांधवांचा बकरी ईद हा सण आज, शनिवारी साजरा होत असून, त्या पार्श्वभूमीवर पालिका, पोलिस व महसूल प्रशासनाने तयारी केली आहे. बकरी ईद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्यांदेखील पाचारण करण्यात आले आहे.

शहरात बकरी ईदच्या कुर्बानीसाठी एक कायमस्वरुपीचा व अन्य १४ तात्पुरते स्वरुपातील कत्तलखाने उभारण्यात आले असल्याची माहिती पालिका उपायुक्त कमरुद्दीन शेख यांनी दिली.

यंदा गणेशोत्सव व बकरी ईद सण सोबतच आल्याने पोलिस, महसूल व पालिका प्रशासनाने कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी खबरदारी घेतली आहे. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरातील तात्पुरते कत्तलखाने, पाणीपुरवठा, स्वच्छता आदी कामांची पाहणी उपायुक्त शेख यांनी केली. पालिकेने निश्चित केलेल्या कत्तलखान्यातच मुस्लिम बांधवांनी कुर्बानी करावी, अन्यत्र कोठेही कुर्बानी करू नये, असे आवाहन पालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले आहे.

शहरात बकरी ईद व गणेशोत्सवासाठी चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. राज्य राखीव दलाच्या तुकड्यांदेखील पाचारण करण्यात आले आहे. पोलिसांनी देखील शहरातून दोन वेळा सशस्त्र संचलन केले असून, पोलिस नियंत्रण कक्षात एक खिडकी योजना सुरू केली आहे. तसेच, तात्पुरते सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दंगा नियंत्रण पथक, वज्रवाहन, वरुण वाहनदेखील तैनात करण्यात आले आहे.

येथे होणार ईदची कुर्बानी

बकरी ईद काळात पालिकने नवा इस्लामपुरात ईस्लाम जिमखाना, हजारखोलीत आयेशानगर पोलिस स्टेशनजवळ, पप्पू मिल्क सेंटर मागे, आयेश मशिदजवळ, नवापुरा कंपाउंमध्ये, राजानगर गार्डनजवळ, ऊर्दू स्कूल नं. १४, अब्बासनगर, स. नं. २१५/२, किल्ला व्हॉलिबॉल ग्राऊंड, शब्बीरनगर नांदेडी स्कूल कंपाउंड, इमाम सॅण्डो जिमखाना, इस्लामपुरा ओपनस्पेस, जुना स्लॉटर हाऊस द्याने, स. नं. १०८/२ नवीन स्लाटर हॉऊस येथे कत्तलखान्याची सोय केली आहे.

घोटीत पोलिसांचे संचलन

घोटी : बकरी ईद व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर परिसरात कोणताही अनूचित प्रकार घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शहरात पोलिस, राज्य राखीव दलाचे जवान यांच्या माध्यमातून घोटी शहरात संचलन करण्यात आले. नाशिक विभागाचे पोलिस उपाधीक्षक अतुल झेंडे, घोटीचे पोलिस निरीक्षक प्रभाकर पाटील, इगतपुरीचे निरीक्षक संजय शुक्ला यांच्या नेतृत्वाखाली कवायतीची रंगीत तालीम करण्यात आली. घोटी शहरातील मेनरोड, भंडारदरा रोड, चौदा नंबर नाका, मशिद, तेली गल्ली, शिवाजी चौक, टॅक्सी स्टँड या मार्गाने हे संचलन करण्यात आले.

रक्तमिश्रित पाणी रोखण्याची मागणी

शहरात बकरी ईद दरम्यान अनेक ठिकाणी बेकायदेशीर कुर्बानी होत असल्याने जनावरांचे रक्तमिश्रित पाणी मोसम नदीपत्रात येते. यंदा बकरी ईदपाठोपाठ गणेश विसर्जन असल्याने मोसम नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त गणेशमूर्तींचे विसर्जन करतात. यावेळी प्रशासनाने ते रक्तमिश्रित पाणी नदीपात्रात येणार नाही यासाठी योग्य ते नियोजन करावे, तसेच कायद्याचे काटेकोर पालन करून प्रशासनाने खबरदारी बाळगावी, अशी मागणी हिरे यांनी आपल्या निवेदनात केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजसमोर धुडगूस

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरातील वाढती गुन्हेगारी चिंतेचा विषय ठरत असतानाच येथील कॉलेजसमोरच पन्नास ते साठ जणांच्या टोळक्याने धुडगूस घालून हातात लाठ्या-काठ्या घेऊन युवकांना मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी घडला. त्यात एकजण गंभीर जखमी झाल्याचे समजते. अगदी भरवस्तीत मुख्य रस्त्यावर झालेल्या या प्रकारामुळे विद्यार्थ्यांसह नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.

कॉलेज परिसरात बंदोबस्त देण्याची मागणी वारंवार केली जात असतानाही पोलिसांनी याकडे लक्ष न दिल्याने असे प्रकार घडत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या प्रकरणी कोणताही गुन्हा दाखल झालेला नसला, तरी पोलिसांनी वीस जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.

सिडको परिसरात गेल्या काही दिवसांपासून लहान-मोठ्या चोऱ्यांचे प्रकार वाढले असून, चौकाचौकांत बसणाऱ्या टवाळखोरांचे प्रमाणही वाढताना दिसत आहे. याबाबत अनेकदा पोलिसांकडे तक्रारी करूनही उपयोग होत नसल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे गुन्हेगारांना बळ मि‍ळत असून, त्यातून उत्तमनगर येथील कॉलेजसमोर हा धक्कादायक प्रकार घडला.

कॉलेजसमोर काही युवक उभे असताना अचानकपणे पन्नास ते साठ जणांच्या टोळक्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या टोळक्याने लाठ्या-काठ्या दगडांनी थेट या युवकांना मारहाण करण्यास सुरुवात केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. एक युवक या टोळक्याच्या ताब्यात सापडल्याने त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या प्रकाराची माहिती पोलिसांना नागरिकांकडून मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी सारे पसार झाले होते. मात्र, चौकशीअंती मारहाण करणाऱ्यांनी कॉलेजचा गणवेश परिधान केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार चौकशी करण्यासाठी पोलिसांनी वीस जणांना ताब्यात घेतले आहे. कॉलेजात बऱ्याचदा बाहेरील विद्यार्थ्यांना प्रवेश मिळत असल्याने अशा प्रकारांना खतपाणी मिळत असल्याची खंत विद्यार्थ्यांनी व्यक्‍त केली.

--

सीसीटीव्ही फुटेजचा शोध

या प्रकारानंतर पोलिसांनी घटनास्थळावरून एखाद्या सीसीटीव्हीचे फुटेज मिळते का, याकडे लक्ष केंद्रित केले अाहे. पुन्हा असे प्रकार होऊ नयेत यासाठी पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबरच कॉलेज परिसरात कायमस्वरूपी पोलिसांची नेमणूक करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान, कॉलेजचा परिसर अत्यंत वर्दळीचा असला, तरी या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी कोणीही पुढे येत नसल्याची खंत व्यक्‍त केली जात आहे.

--

विद्यार्थी, नागरिकांत दहशत

सिडकोतील उत्तमनगर भागात झालेल्या या प्रकारानंतर शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही विद्यार्थी, तसेच या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण दिसून आले. या धक्कादायक प्रकारानंतर पोलिसांनी वीस युवकांना ताब्यात घेतले असले, तरी हा प्रकार नेमका कशामुळे झाला, याचा अद्यापही उलगडा झाला नसल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘स्वयं’ ९ सप्टेंबरला नाशिकला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वतःचा शोध सर्वांत जवळ असून, शोधण्यास खूप कठीण गोष्ट! अख्खा जन्म सरतो; पण स्वतःचा शोध काही लागत नाही. मात्र, काही भाग्यवान स्वतःच्या आत डोकावतात. स्वतःला तपासतात. एकदा का स्वतःमधील कस्तुरीचा शोध लागला, की प्रसंगी जगाशी भांडतात. मग दिवस-रात्र तहान-भूक विसरून एकटेच निघतात त्या प्रवासाला. अशाच काही व्यक्तींना भेटण्याची संधी नाशिककरांना मिळणार आहे अमृतयात्रा प्रस्तुत स्वयं या कार्यक्रमातून. डीएमआय ऑडिटोरियम, रामभूमी, भोंसला मिलिटरी कॉलेज परिसर, सावरकरनगर, गंगापूर रोड येथे ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५.३० ते ८ वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

स्वतःचा शोध घेतलेल्या भन्नाट व्यक्तींचे अनुभव, त्यांचा संघर्ष, त्यांची जिद्द, त्यांचे पॅशन या कार्यक्रमातून त्यांच्यात मुखातून ऐकण्यास मिळणार आहे. मुंबईतील जाहिरात क्षेत्रातील ग्लॅमरस करिअर सोडून लाल मातीच्या ओढीने रत्नागिरी जिल्ह्यात अत्यंत परिश्रमातून आनंदाचे शेत निर्माण करणारे राहुल कुलकर्णी, सह्याद्रीमधील शंभरापेक्षा जास्त सुळके सर करणारी महाराष्ट्रातील पहिली व एकमेव महिला पल्लवी वर्तक, लोकशाही मार्गाने आपले अधिकारी मिळवण्यासाठी जव्हार विक्रमगड भागातील ग्रामीण तरुणांना सक्षम करणाऱ्या वयम् चळवळीचे प्रणेते मिलिंद थत्ते यांचे अविस्मरणीय अनुभव कार्यक्रमातील प्रत्येक उपस्थितांच्या आयुष्याला नवीन दिशा देणारे ठरणार आहेत. झी २४ तासचे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर या वेळी मुख्य मार्गदर्शक वक्ते म्हणून उपस्थित राहणार आहेत.

‘स्वयं’चा प्रवास

२०१४ पासून ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या सहयोगाने स्वयं हा कार्यक्रम राज्यातील पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, जळगाव या पाच शहरांमध्ये सादर करण्यात येत आहे. प्रेरणादायी व्यक्ती आणि त्यांचे विचार महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न यामार्फत करण्यात येत आहे.

तिकिटासाठी संपर्क

या कार्यक्रमासाठी २५० रुपये प्रवेशमूल्य असून, तिकिटांसाठी तुषार यांच्याशी ८४४६५९८७५८ या क्रमांकावर संपर्क साधावा. त्याचप्रमाणे ९८२०११८२९६ या क्रमांकावर पेटीएम करून प्रवेशिका राखून ठेवता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘नदीजोड’चा फायदा नाही!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नदीजोड प्रकल्पाला १५ वर्षांनंतर अखेर हिरवा कंदील मिळाला असून त्यात पार-तापी नर्मदेला जोडण्याचा आणि दमणगंगा पिंजाळला जोडण्यासाठी आराखडा सरकारकडून तयार करण्यात आला आहे. त्यातून महाराष्ट्राला कोणताच फायदा होणार नसून, त्यातून गुजरातला फायदा होणार असल्याचे मत जलतज्ज्ञ राजेंद्र जाधव यांनी व्यक्त केले.

केंद्र सरकार देशातील मोठ्या नद्या जोडण्याचा प्रकल्प लवकरच सुरू करणार आहे. याचा पहिला टप्पा केन (कर्णावती) बेतवा नदी जोड प्रकल्पाने प्रारंभ होणार आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे. पार-तापी नदी जोड प्रकल्पाचाही यात समावेश आहे. त्यामुळे फक्त मुंबईला फायदा होईल. पण त्यांना आता पाण्याची फारशी गरज नाही. राज्यातील गोदावरी खोरे व गिरणा खोरेचा नदीजोड प्रकल्प महत्त्वाचा असून त्याचा डीपीआर करावा, अशी मागणीही त्यांनी केली. गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात केंद्राकडून मदत मिळून जलप्रकल्प केले जात असतांना महाराष्ट्राच्या योजना रखडत असल्याचेही त्यांनी सांगितले. गुजरातची जमीन ४५ टक्के सिंचनाखाली आली असतांना महाराष्ट्राची जमीन २० टक्के आहे. असे असतांनाही राज्य सरकार केवळ गुजरातला मदत व्हावी हाच प्रयत्न करत असून, त्यांच्यावर दबाव आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी नदी जोड प्रकल्पांसाठी आग्रही आहेत. या प्रकल्पात सुरुवातीच्या टप्प्यात ६० नद्यांना एकमेकांना जोडले जाणार असून, त्यासाठी ८७ अब्ज डॉलर इतका खर्च असणार आहे. येत्या काही आठवड्यांत केंद्रीय मंत्रिमंडळात या प्रकल्पाला मंजुरी मिळणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात भाजपशासित राज्यांमध्ये या प्रकल्पांची अंमलबजावणी केली जाणार आहे. या प्रकल्पात गुजरात आणि महाराष्ट्राचा समावेश असला तरी महाराष्ट्राला त्यात कवडीचा फायदा नसल्याचे जाधव म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँकेत संचालकांच्या टोळ्या!

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या सहा-सात वर्षांपासून पोटार्थी संचालकांनी अनिष्ट प्रथा सुरू केली आहे. बँकेतून कोणत्या ना कोणत्या मार्गाने पैसा काढता यावा यासाठी काही संचालकांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत, असे आरोप जिल्हा बँकेचे माजी चेअरमन भाजप नेते डॉ. अद्वय हिरे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केला आहे.

हिरे यांनी पत्रकात म्हटले आहे की, संचालक बैठकीस सातत्याने कोरमपूर्ण होऊ द्यायचा नाही, बँकेच्या अध्यक्षांकडून ‘मोबदला’ घ्यायचा, नंतर प्रोसेडिंगवर सह्या करायच्या, हा पायंडा पडला आहे. ज्या-ज्या वेळी कोरमअभावी बैठका तहकूब होतात, त्यातले विषय पुढच्या बैठकीत मंजूर होतात. गैरहजर संचालकांनी

तहकूब बैठकीतले किती विषय नामंजूर केले याचा खुलासा केला तर सभासद, शेतकरी बांधवांना अधिक माहिती होवू शकेल. बँकेच्या अध्यक्षांना कोंडीत पकडून त्यांच्याकडून उखळ पाढरे करून घेण्याचा प्रघात काही रिकामटेकड्या संचालकांनी पाडला असल्याचेही हिरे यांनी पत्रकात म्हटले आहे. स्वार्थी संचालकांनी शेतकऱ्यांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नये, अन्यथा कडेलोट होईल असा इशाराही डॉ. हिरे यांनी पत्रकात दिला आहे.

बँकेच्या खर्चातून उदरनिर्वाह!

काही संचालकांकडे कोणतेही इतर महत्त्वाचे पद नाही व उदर निर्वाहाचे अन्य साधन नसल्याने ते सकाळपासून रात्रीपर्यंत बँकेत व बँकेच्या विश्रामगृहात तळ टोकून राहतात बँकेच्या खर्चातून नाष्टापाण्यापासून जेवणाची तृप्ती करून घेतात, असा आरोप त्यांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बससेवेसाठी विद्यार्थ्यांचे आमदारांना साकडे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

नाशिक शहरातील शहर बस वाहतूक सेवा सध्या वादात सापडलेली असून, परिवहन महामंडळाच्यावतीने अनेक बसेस रद्द करण्यात आल्या आहेत. तर मागील आठवड्यात अचानकपणे बंद झालेल्या बससेवेमुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत.

याबाबत आमदार, महापालिका व शहर बस वाहतूक सेवा यांनी तातडीने कायमस्वरूपी तोडगा काढून विद्यार्थ्यांचे होणारे हाल थांबवावेत यासाठी आमदार बाळासाहेब सानप यांना विद्यार्थ्यांनी निवेदन दिले. विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनात, रोज सायंकाळी ५ ते ७ वाजेदरम्यान सर्वच ठिकाणाहून केवळ १ किंवा २ बस असतात. या वेळात शहरातील विविध भागात राहणारे विद्यार्थी हे शाळा व कॉलेजातून घरी जात असतात. येणाऱ्या बसेस निमाणीवरून संपूर्ण भरलेली असते तर अनेकदा बसचे चालक व वाहक बसला कोणताही फलक लावत नाही आणि कोणत्याही स्टॉपवर बस थांबत नाही, असे निवेदनात नमूद केले आहे.

अपघाताचा धोका

निवेदन देणाऱ्या विद्यार्थ्यांना गुरु गोविंदसिंग कॉलेजातून ये-जा करताना खूप अडचण होत असल्याचेही या निवेदनात नमूद केले आहे. बस थांब्यावर बस न थांबल्यास विद्यार्थी बसच्या मागे धावतात व अपघातही होण्याचा धोका उद्भवू शकतात. यावेळी आमदार सानप यांना निवेदन देवून याबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर येत्या आठ दिवसांत तोडगा काढण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. यावेळी अमोल पाटील, दिनेश आहिरे, अक्षय जाधव, आकाश देशमुख, सागर आहिरे, सागर वारुंगसे, रोशन चौधरी यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर चाकूहल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या अल्पवयीन युवकावर एकाने धारदार चाकूने हल्ला केला. जिल्हा कोर्टाच्या प्रवेशद्वारावर ही घटना घडल्याने खळबळ उडाली. जखमी युवकावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

रूपेश रूपेरी, असे संशयित आरोपीचे नाव आहे. शुभम अशोक चव्हाण (१७ रा.रामवाडी) असे चाकू हल्ल्यात जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. चव्हाण याने दिलेल्या तक्रारीनुसार, तो व त्याचा मित्र दीपक जाधव जिल्हा कोर्टाच्या प्रवेशद्वाराजवळून पायी जात असताना ही घटना घडली. रूपेश रूपेरी नामक तरुणाचा या ठिकाणी काही युवकांशी वाद सुरू होता. यावेळी चव्हाण याने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता रूपेरीने त्याच्यावर चाकू हल्ला केला.

दागिन्यांवर डल्ला

घरकाम करणाऱ्या मोलकरणीने ४० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली. तिडके कॉलनीत ही घटना घडली. आशाबाई बाळू जाधव (रा. श्रीरामनगर, आडगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. शहाबुद्दीन अहमद शेख यांनी तक्रार दिली आहे.

शोरूम फोडून रोकड चोरी

दुचाकीचे शोरूम फोडून चोरट्यांनी तिजोरीतील सुमारे १६ हजार रुपयांची रोकड चोरून नेल्याची घटना आडगाव नाका भागात घडली. अभिजीत सरोदे (रा. कैलास नगर, इंदिरानगर) यांनी या प्रकरणी आडगाव पोलिसांकडे तक्रार दिली आहे.

दुकान फोडून ३० हजारांची चोरी

बंद दुकान फोडून चोरट्यांनी सुमारे ३० हजार रुपये किमतीच्या किचन हॉब (शेगड्या) चोरून नेल्या. ही घटना तिडके कॉलनीतील श्रीहरी कुटे मार्ग भागात घडली. मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित चंद्रकांत खोत (रा. कालिका सोसा. मुंबईनाका) यांनी दिलेल्या तक्रार ‌दिली आहे. अज्ञात चोरट्यांनी २९ ऑगस्ट रोजी रात्री खोत यांच्या दुकानाचे शटर वाकवून दुकानातील सुमारे २९ हजारांच्या किचन शेगड्या चोरून नेल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images