गेल्या काही दिवसांपासून गोदावरीच्या डाव्या कालव्यालगत बिबट्याचा वावर आढळून येत आहे. दबा धरून असलेल्या या बिबट्याने परिसरात भीतीचे वातवरण निर्माण केले आहे. बिबट्या मानवी वस्ती किंवा शहरात शिरल्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. किंबहुना त्या वाढतच आहेत. त्यामुळेच बिबट्याची मानवी वस्तीकडील धाव रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेसह नागरिकांनीदेखील पुरेशी सजगता दाखविण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विविध उपाययोजना केलेल्या असल्या, तरी पुरेशी दक्षता घेणेदेखील अनिवार्य बनले आहे.
--
अनोख्या फिल्मद्वारे प्रबोधन
बिबट्या मानवी वस्तीकडे येणे, शेतात लपून बसणे, गावातील शेळ्या, तसेच मेंढ्याची शिकार करणे, लहान मुलांना उचलून नेणे, धुमाकूळ घालणे असे अनेक प्रकार अलीकडे सातत्याने होत आहेत. जंगलांचा परिसर विरळ होणे, तसेच बिबट्यांचा अधिवास नष्ट होणे यांसारख्या प्रकारांमुळे बिबट्यांमध्ये असुरक्षिततेची भावना आहे. यामुळेच बिबटे सैरभैर होताना दिसतात. याचा फटका मानवी वसाहतींना बसत आहे. ही बाब ओळखून ग्रामस्थांमध्ये जनजागृती करण्यासाठी वन विभागाने अनोखी मोहीम सुरू केली आहे. बिबट्यांच्या अभ्यासक विद्या अत्रेय यांनी तयार केलेली फिल्म शाळांमध्ये, तसेच ग्रामसभेत दाखविण्यात येत आहे. ही फिल्म पुढील काळात शाळांसह विविध गावांच्या ग्रामपंचायतींमध्ये, ग्रामसभांमध्ये, चावडीवर, तसेच अनेक शेतकऱ्यांच्या गटांना दाखविण्यात येणार आहे. त्यासाठी वन विभागाने या फिल्मची उपलब्धता तालुका स्तरावर केली आहे. टीव्ही, एलसीडी प्रोजेक्टर, लॅपटॉप याद्वारे ही फिल्म दाखविण्यात येत असून, त्याला चांगला प्रतिसादही लाभत आहे. बिबट्यांचा वावर असलेल्या आणि बिबट्या-मानव संघर्ष निर्माण होणाऱ्या भागात जनजागृतीची ही मोहीम राबविली जात आहे.
--
रेस्क्यू टीमची स्थापना
वन विभागाने बिबट्याला पकडण्यासाठी लेपर्ड रेस्क्यू टीम स्थापन करण्यात आलेली आहे. त्यात पाच जणांचा समावेश आहे. नाशिक पश्चिम, नाशिक पूर्व, मालेगाव, संगमनेर आणि अहमदनगर अशा पाच विभागांसाठी प्रत्येकी एक टीम देण्यात आली आहे. म्हणजेच पाच टीममध्ये एकूण २५ जणांचा समावेश आहे. या टीमला विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. खासकरून बिबट्याच्या सवयी, त्याचा संचार आदींबाबत माहिती देण्यात आली आहे. बिबट्याला कसे पकडावे, गर्दीवर नियंत्रण कसे मिळवावे, याचे प्रशिक्षण या टीमच्या सदस्यांना मिळाले आहे. एक टीम लीडर आणि चार सदस्य अशा या टीममुळे त्या-त्या विभागातील बिबट्याला जेरबंद करण्यासाठी पाचारण करण्यात येते.
--
रेस्क्यू व्हॅनची सज्जता
रेस्क्यू टीमसाठी अत्यंत सुसज्ज अशी एक रेस्क्यू व्हॅन उपलब्ध असते. सर्चलाइट, पिंजरा ठेवण्यासाठी प्रशस्त जागा, आवश्यक औषधे, अनाउन्सिंगसाठीची यंत्रणा अशी सुसज्ज अॅनिमल रेस्क्यू व्हॅन आहे. या व्हॅनमुळे एखादा कॉल आल्यानंतर त्या ठिकाणी तातडीने पोहोचता येते. या रेस्क्यू व्हॅनमध्ये एखाद्या घटनेप्रसंगी आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यात संपूर्ण पिंजरा सामावू शकेल एवढी जागा आहे, तसेच वन विभागाच्या रेस्क्यू टीमला बसण्यासाठीही व्यवस्था आहे. रात्रीच्या वेळी शोधमोहीम सुकर होण्याच्या दृष्टीने गाडीच्या बॅटरीवरच चालू शकेल असा सर्चलाइट देण्यात आला आहे. या व्हॅनमुळे रेस्क्यू टीमची कार्यक्षमता अधिक वाढणार असून. वन्य प्राण्यांच्या दृष्टीने ही व्हॅन उपयुक्त आहे.
--
रेस्क्यू साहित्याची उपलब्धता
प्रत्येक रेस्क्यू टीमला आधुनिक साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्यात अत्याधुनिक पिंजरा, टॉर्च, मेगाफोन, फ्लुरोसेण्ट जॅकेट, हेल्मेट, सर्चलाइट, दोर, जाळी, स्ट्रेचर, बॅफल बोर्ड, फायबर स्टिक, ट्रँक्विलायझर गन आदींचा समावेश आहे.
--
आधुनिक पिंजऱ्याची निर्मिती
पूर्वीचे पिंजरे हे लोखंडी गजांचे होते. जेरबंद झाल्यामुळे संतप्त झालेला बिबट्या या गजांना धडक द्यायचा. त्यामुळे तो जखमी व्हायचा. बहुतांशवेळा रक्तही यायचे. त्यामुळे आता आधुनिक पिंजरा बनविण्यात आला आहे. त्यात बिबट्या जखमी होऊ नये याची विशेष काळजी घेतली गेली आहे. ट्रँक्विलायझर गनमुळे बिबट्याला त्वरित पकडणे शक्य होते. कारण, या गनमुळे साधारण एक किलोमीटर अंतरावरून बिबट्याला बेशुद्ध करता येणे शक्य आहे. प्रत्येक टीमला एक गन देण्यात आलेली आहे.
--
अधिवासात सोडणे हाच पर्याय
बिबटे दिवसा न फिरता रात्रीच्या सुमारास फिरतात. आपल्या घराजवळ राहून बिबटे आपल्या पिलांचे संरक्षण करण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यांना काही इजा होत असेल किंवा त्यांच्या अधिवासात हस्तक्षेप होत असेल, तर बिबट्या स्वसंरक्षणासाठी हल्ला करतो. त्यामुळे बिबट्या अत्यंत क्रूर असून, तो मानवावर सतत हल्ला करतो असे म्हणणे चुकीचे आहे. बिबट्याला पकडून दूर कुठेतरी सोडणे अत्यंत चुकीचे आहे. त्याला कितीही दूरवर सोडले, तरी तो पुन्हा आपल्या घराकडे, अधिवासाकडे येतो हे अनेकदा दिसून आले आहे. त्यामुळे बिबट्याला शक्यतो त्यांच्या अधिवासातच सोडायला हवे.
--
गणनेबाबत संभ्रमाची स्थिती
राज्यात किती बिबटे आहेत याची कुठलीही माहिती या घडीला वन विभागच काय, पण राज्य सरकारकडेही नाही. खरं तर ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. राज्यात बिबट्यांची गणना न झाल्यामुळेच ही अनभिज्ञता आहे. पण, १०० स्क्वेअर किलोमीटरमध्ये पाच बिबटे आणि पाच तरस राहत असल्याचे एका संशोधनातून सांगितले जाते. १८८३ चे नाशिकचे गॅझेटिअर पाहिल्यावर लक्षात येते, की त्यावेळीही बिबट्यांची संख्या नाशिकमध्ये मोठी होती. तसेच, गावपरिसरात ये-जा करणाऱ्या बिबट्यांची संख्या पूर्वीपासूनच आहे. गणना करून काही उपयोग होणार नाही. संख्या कळाली, तरी त्यावर फार काही होऊ शकत नाही. पण, कुठल्या परिसरात बिबटे आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यासाठी ही गणना महत्त्वाची आहे.
--
असमन्वय आणि विभागांमधील विसंवाद
बिबट्या हा पूर्वीपासूनच मानवी वस्तीच्या परिसरातच राहत आहे. त्याला असुरक्षित वाटल्यास किंवा स्वसंरक्षणासाठी तो हल्ला करतो. त्यामुळे बिबट्या मानवी वस्तीत आला, तर त्याला बंदिस्त कसे करता येईल, याचा विचार केला पाहिजे. गोंधळ, गर्दी किंवा त्याच्यावर हल्ला करून फायदा नाही. एखाद्या खोलीत किंवा घरात बिबट्या बंदिस्त करता आला, तर त्याला पकडणे शक्य होते. बिबट्याला पाहण्यासाठी नागरिकांची मोठी झुंबड उडते. अशा प्रसंगी नागरिकांनी वन विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. वन विभाग आणि नागरिकांमध्येही संवाद असणे आवश्यक आहे. तो फारच अल्प आहे, ही तशी चिंतेचीच बाब आहे. बिबट्या आल्याची माहिती देण्यासाठी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन केला, तर हे आमच्या हद्दीत नाही तुम्ही त्या तालुक्याच्या अधिकाऱ्यांना फोन करा, असे सांगणारे बहाद्दरही वन विभागात आहेत. या समस्येप्रश्नी ‘जगा आणि जगू द्या’ या नैसर्गिक सूत्राचा अवलंब करण्याची आवश्यकता आहे. परदेशात वन्यप्राणी मानवी वस्तीत आले की त्यांना मारले जाते. आपल्याकडे मात्र पूर्वीपासून अनेक प्राण्यांना देवाचा दर्जा दिलेला आहे. गाव स्वच्छ ठेवले, की बिबट्याचे गावात येण्याचे प्रमाण कमी होईल. वन विभागाच्या आर्थिक मदतीने शेतकऱ्यांनी प्राण्यांसाठीचे निवारा शेड उभारले पाहिजे. बिबट्याविषयी भीती असण्याची काहीच गरज नाही. तो आपल्यातीलच एक आहे. बिबट्या मानवी वस्तीत किंवा शहरात येतो, तेव्हा अापत्तिसदृश परिस्थिती निर्माण होते. बिबट्या आल्याचे कळाले, तरी त्याला प्रत्यक्ष पकडण्यात आणि सर्व कारवाई होण्यात चार ते पाच तासांचा वेळ जातो. वन विभाग, अग्निशमन विभाग, पोलिस कर्मचारी असे तीन विभागांचे कर्मचारी घटनास्थळी असले, तरी कुणी पुढाकार घ्यायचा आणि परिस्थिती हाताळायची याबाबत मोठ्या प्रमाणात संभ्रम राहतो. त्यामुळे बिबट्याला पकडण्यात विलंब होतो. मात्र, याचवेळी काही दुर्घटना घडण्याचीही शक्यता असते. त्यामुळे या तिन्ही विभागांतील अधिकाऱ्यांमधील विसंवाद दूर होणे गरजेचे आहे.
--
पुरेशी स्वच्छता राखणे गरजेचे
वास्तविक बिबट्या हा अत्यंत लाजाळू आणि घाबरट प्राणी मानला जातो आहे. जिल्ह्यातील दाट असलेले वनक्षेत्र दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यातच प्रत्येक बिबट्याला त्याचा स्वतंत्र अधिवास आवश्यक असतो. हा अधिवास मिळत नसल्यानेच बिबट्या मानवी वस्तीकडे येतो. त्यातच गावपरिसरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता असते. या अस्वच्छतेवरच कुत्रे, मांजरी, डुकरे आदी प्राणी आपली गुजराण करीत असतात. परिणामी गावाकडे आलेल्या बिबट्याला कुत्रे आणि डुकरांसारखे प्राणी भक्ष्य म्हणून मिळतात. त्यामुळे बिबट्यांचे गावाकडे येण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ज्या पद्धतीने शेतकरी आपले शेत अत्यंत स्वच्छ आणि हिरवेगार ठेवतात, तसाच गावाचा परिसरही स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. असे झाल्यास बिबट्यांचा त्रास नक्की कमी होऊ शकेल. त्यासाठी ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यासाठी वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पुढाकार घ्यायला हवा.
--
जिल्ह्यातील वनक्षेत्र
एका सरकारी आकडेवारीनुसार जिल्ह्याचे भौगोलिक क्षेत्र १५ हजार ५३० चौरस किलोमीटर आहे. त्यात वनांचा वाटा ३ हजार ४३० चौरस किलोमीटर म्हणजेच ३ लाख २० हजार ६६८ हेक्टर आहे. भौगोलिकदृष्ट्या ही टक्केवारी २०.५ टक्के आहे. वन विभागाच्या अखत्यारीत ३ हजार १९२ चौरस किलोमीटर क्षेत्र, तर महसूल विभागाच्या अखत्यारित ४५ चौरस किलोमीटर वनक्षेत्र आहे. ३२ चौरस किलोमीटर खासगी वनक्षेत्र आहे. वन विकास महामंडळाचे क्षेत्र १६१ चौरस किलोमीटर आहे. जिल्ह्यात केवळ नांदूरमध्यमेश्वर हे संरक्षित क्षेत्र आहे. प्रामुख्याने सुरगाणा, पेठ, कळवण, दिंडोरी, नाशिक, इगतपुरी, त्र्यंबकेश्वर या तालुक्यांमध्ये वनांचे क्षेत्र जास्त आहे. साग, शिसव, बांबू यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
--
नाशिकचे वनक्षेत्र
--
वनपरिक्षेत्रांची संख्या- २०
परिमंडळांची संख्या- ७९
नियत क्षेत्रांची संख्या- २७८
साधारण क्षेत्रे- १५७
संवेदनशील क्षेत्रे- ६०
अतिसंवेदनशील क्षेत्रे- ६१
एकूण वनक्षेत्र- ३,१०,०५९ हेक्टर
--
पूर्व नाशिक
वनपरिक्षेत्रांची संख्या- ९ (सुरगाणा, उंबरठाण, कनाशी, कळवण, देवळा, चांदवड, नांदगाव, येवला, दिंडोरी)
परिमंडळांची संख्या- ३०
नियत क्षेत्रांची संख्या- ११५
साधारण क्षेत्रे- ४९
संवेदनशील क्षेत्रे- २७
अतिसंवेदनशील क्षेत्रे- ३९
एकूण वनक्षेत्र- १,३५,६०१ हेक्टर
--
पश्चिम नाशिक
वनपरिक्षेत्रांची संख्या- ८ (हरसूल, पेठ, बाऱ्हे, ननाशी, त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, नाशिक)
परिमंडळांची संख्या- ३६
नियत क्षेत्रांची संख्या- १२६
साधारण क्षेत्रे- ८७
संवेदनशील क्षेत्रे- १९
अतिसंवेदनशील क्षेत्रे २०
एकूण वनक्षेत्र- ८९,७२३ हेक्टर
--
मालेगाव उपविभाग
वनपरिक्षेत्रांची संख्या- ३ (मालेगाव, सटाणा, ताहाराबाद)
परिमंडळांची संख्या- १३
नियत क्षेत्रांची संख्या- ३७
साधारण क्षेत्रे- २१
संवेदनशील क्षेत्रे- १४
अतिसंवेदनशील क्षेत्रे- २
एकूण वनक्षेत्र- ८४,७३३ हेक्टर
--
हॅलो फॉरेस्ट...
वन विभागाची हॅलो फॉरेस्ट ही हेल्पलाइन आहे. १९२६ हा वन हेल्पलाइनचा टोल फ्री क्रमांक आहे. २४ तास सेवा असलेल्या या हेल्पलाइनचा नियंत्रण कक्ष मुंबईत आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून आलेली माहिती ही उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षक, प्रधान मुख्य वनसंरक्षक, वनसचिव ते वनमंत्री अशी सर्वांपर्यंत पोहोचते. ज्या वन परिसरातून ही माहिती मिळाली त्या भागातील उपवनसंरक्षक, मुख्य वनसंरक्षकांच्या मोबाइलवर मेसेजद्वारे ती पोहोचावी, या पद्धतीने ही यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे.
--
हेल्पलाइनद्वारे अशी देता येईल तक्रार
-० क्रमांक- आपत्कालीन व्यवस्था, शिकार, वृक्षतोड, अतिक्रमण
-१ क्रमांक- ग्रीन महाराष्ट्र, ग्रीन आर्मी, तीन कोटी वृक्ष लागवड
-२ क्रमांक- वन विभागातील इको टुरिझम, जंगल सफारी आदी
-३ क्रमांक- वन विभागात व्यापार, गौण वनउपज, तेंदुपत्ता, सागवान
-४ क्रमांक- जंगलाबाबत माहिती, शेती नुकसान, वन्यप्राण्यांवर हल्ला आदी
-५ क्रमांक- वने, वन्यजीवांबाबत तक्रारी देण्याची सुविधा
--
--
नाशिक वन विभागाचे संपर्क क्रमांक
--
-मुख्य वनसंरक्षक – २५९७८४५, २५९८५४५
ई मेल - ccftnashik@mahaforest.gov.in
-उपवनसंरक्षक, पश्चिम - २५७२७३०
ई मेल - dycfwnsk_nsk@sancharnet.in
-उपवनसंरक्षक, पूर्व - २५७२७७५
ई मेल - dycfensk_nsk@sancharnet.in
-उपवनसंरक्षक, मालेगाव - ०२५५४-२५४७५३
ई मेल - subdfomalegaon@rediffmail.com
--
बिबट्यांचा प्रश्न अस्वच्छतेमुळेही वाढतो आहे. अस्वच्छतेवरच कुत्री आणि भटकी जनावरे जगतात. यांनाच बिबट्या लक्ष्य करतो. त्यामुळे बिबट्यांचा प्रश्न सोडवायचा असेल, तर स्वच्छतेला प्राधान्य द्यायला हवे.
-विद्या अत्रेय, बिबट्यांच्या अभ्यासक
--
बिबट्या आढळला, तर तातडीने वन विभागाला कळविणे आवश्यक आहे. विभागाकडे सुसज्ज अशी रेस्क्यू टीम आहे. नागरिकांनी घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. आजवर आपण असंख्य बिबटे जिल्ह्यात पकडले आहेत.
-सुनील वाडेकर, रेस्क्यू टीम सदस्य
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट