म. टा. वृत्तसेवा, कळवण
गेल्यावर्षी नवरात्रोत्सव नंतर दसऱ्याच्या दिवशी बोकडबळी देतांना मानवंदनेप्रसंगी (हवेत गोळीबार) १२ जण जखमी झाले होते. यामुळे भाविकांची सुरक्षा लक्षात घेत यंदापासून बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. वर्षानुवर्षाची ही परंपरा बंद करण्याचा हा ऐतिहासिक निर्णय असून याबाबत सर्वत्र प्रशासनाचे कौतुक होत आहे. मात्र श्रध्दा म्हणून पाहणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने हा धक्कादायक निर्णय असल्याचे बोलले जात आहे.
साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धे शक्तीपीठ असलेल्या श्री सप्तश्रुंग देवी गडावर २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याबाबतची नियोजन बैठक कळवणचे प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीला सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, गड व नांदुरी ग्रामपंचायतीचे पदाधिकारी उपस्थित होते.
गेल्या वर्षी मोठ्या बाका प्रसंगाचा सामना करावा लागला होता. ज्या देशात काळानुरूप सती व अन्य प्रथा बंद होऊ शकतात. तेव्हा चेंगराचेंगरी आणि कायदा व सुव्यवस्था बाधित होऊ शकणारी तसंच भाविकांच्या जीवाला धोका असणारी ही प्रथा बंद करण्यात यावी, असं अवाहन करण्यात आलं होतं, असं तहसीलदार कैलास चावडे यांनी सांगितलं. देवस्थान ट्रस्ट तर्फे बोकडबळीची ही प्रथा सुरू असून गेल्या वर्षी १२ जण जखमी झाले होते. यंदापासून ही प्रथा बंद करून यासाठी पुढाकार घेणाऱ्यांवर कारवाई करण्याचे संकेतही त्यांनी दिले. बोकडबळी प्रथेबाबत कोणीही अफवा पसरवत भाविकांच्या भावना भडकवण्याचा प्रयत्न करू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा त्यांनी दिला. गड व परिसरात अवैध दारू विक्री होऊ नये म्हणून उत्पादन शुल्क विभागाने सतर्क राहावे. आरोग्य, आग प्रतिबंधक यंत्रणेचा आढावा यावेळी घेण्यात आला.
सप्तश्रुंग मंदिर परिसरात दिल्या जाणाऱ्या बोकडबळीवर बंदी घालण्यात आली असली तरी भाविकांमार्फत वैयक्तिक रित्या होणाऱ्या कार्यक्रमांवर बंदी नाही. मंदिर परिसरात बंदी कायम राहील. स्थानिक पातळीवर प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे स्वागत होत असले तरी जिल्हाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या बैठकीत काय घडते याकडे आता लक्ष लागून आहे.
पोलीस यंत्रणा सज्ज १ अतिरिक्त अधीक्षक, २ डीवायएसपी, १० निरीक्षक, १५ उपनिरीक्षक, २०० पोलीस कर्मचारी, ५० महिला कर्मचारी, २५० होमगार्ड, एसआरपीएफची एक टीम व घातपात विरोधी एक पथक, नागरी सुरक्षा व सेवाभावी यंत्रणेची ५० अशी यंत्रणा यात्राकाळात सज्ज राहील, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुजय घाटगे यांनी दिली.
स्वछता अभियान राबविण्यात येणार असल्याने सेवाभावी संस्थांनी या कार्यात पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले. अंतिम चाचणी न झाल्याने नवरात्रोत्सव काळात रोप वे सेवा मिळणार नाही. उत्सव काळात मंदिर २४ तास दर्शनासाठी खुले राहील. प्रदक्षिणा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात येईल. भाविकांना मंदिरात सोडण्यासाठी १५ ठिकाणी बाऱ्या धरण्यासाठी दिवस रात्रसाठी एकूण ९० कर्मचारी नेमण्यात येणार आहेत. २० सुरक्षा रक्षक, ३ बंदूकधारी सुरक्षारक्षक, वीज पुरवठा खंड पडू नये म्हणून २ जनरेटर, भाविकांसाठी मोफत अन्नदान सेवा संपूर्ण यात्रा काळात ठेवण्यात आली आहे. पिण्याच्या पाण्याची सोय, आरोग्यासाठी आवश्यक यंत्रणा, गड व परिसरात ६७ सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत, अशी माहिती देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे यांनी दिली.
सप्तश्रृंग गडावर वर्षभरात लाखोंच्या संख्येने भाविक येत असतात. यामुळे पर्यावरण बचाव मोहिमेतून प्लॅस्टिक बंदीचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत संबंधितांवर दंडात्मक व व्यावसायिक परवाने रद्द करण्याची कारवाई करण्याच्या सूचना ग्रामपंचायत प्रशासनाला देण्यात आल्या.
गड ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांकडे प्रामुख्याने लक्ष द्यावे व यात्रेपूर्वी ते दुरुस्त करावेत. गड व नांदुरी भागात बीएसएनएल सेवेचा सतत बोजवारा उडालेला असतो त्याबाबत संबंधित विभागाने लक्ष द्यावे. गडावर यात्राकाळात व्यावसायिकांनी अतिक्रमणे करू नये. प्लॅस्टिक बंदी कायम ठेवून कापडी पिशव्यांना प्राधान्य द्यावे. गडावरील सांडपाणी, स्वछतागृह हागणदारी मुक्ती यावर संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या. यात्रा काळात अखंडपणे वीजपुरवठा होईल याबाबतची माहिती वीज वितरण कंपनीचे अधिकारी खैरनार यांनी दिली. खासगी रित्या होणाऱ्या अन्नदान यंत्रणेवरही या बैठकीत चर्चा झाली. रोख किंवा शिधा स्वरूपात आपली देणगी देवस्थानकडे देत अन्नदान करावे जेणेकरून अन्नाची नासाडी व पर्यावरण समतोल बिघडणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे.
बीडीओ बहिरम, देवस्थान विश्वस्थ डॉ. रावसाहेब शिंदे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर, गडाचे सरपंच श्रीमती सुमन सूर्यवंशी, ग्रामपंचायत सदस्य गिरीश गवळी, नांदुरीचे भाऊ कानडे, अभोण्याचे निरीक्षक राहुल फुला, वन अधिकारी बशीर शेख, ग्रामसेवक आर. बी. जाधव, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता किशोर केदार, परदेशी हे या बैठकीत उपस्थित होते.