Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

आयटीआयच्या ७०० विद्यार्थ्यांना शून्य गुण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मॉडेल आयटीआय म्हणून महाराष्ट्रातून एकमेव नाशिकच्या आयटीआयचे नाव यादीत घेण्यास आठवडाही उलटला नसताना याच आयटीआयमध्ये अप्रेंटिसशिप करणाऱ्या सुमारे ७०० विद्यार्थ्यांच्या पदरात प्रॅक्टीकलमध्ये शून्य गुण मिळाल्याचे धक्कादायक वृत्त शनिवारी उघड झाले. एप्रिल २०१७ मध्ये झालेल्या अंतिम परीक्षेचा निकाल शुक्रवारी लागला. तब्बल पाच महिने लागलेल्या या निकालात पारदर्शकता नसल्याचा व ही पेपर तपासणी सदोष असल्याचा आरोप करत शेकडो विद्यार्थ्यांनी सातपूर आयटीआयमध्ये शनिवारी दुपारी निदर्शने केली.

आयटीआयच्या विविध ट्रेड्ससाठी ऑगस्ट २०१६ मध्ये वार्षिक परीक्षा नियोजित होती. परीक्षेच्या स्वरूपातील बदलांमुळे ही परीक्षा तब्बल ७ महिने उशिरा म्हणजे एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आली. यानंतर परीक्षेचा निकाल ४५ दिवसांत लावणे बंधनकारक असताना तब्बल पाच महिने उशिरा म्हणजे सप्टेंबर २०१७ मध्ये हा निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर शनिवारी दुपारी मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी आयटीआय संस्थेच्या आवारात गर्दी करीत प्रशासनाला निकालातील गोंधळाबाबत जाब विचारला. मात्र, रिचेकिंग आणि रीपिटर्स परीक्षेचे अर्ज भरा, अशा अजब सूचना त्यांना संस्थेच्या वतीने देण्यात आल्या. या उत्तराने सदोष निकाल असल्याच्या आरोपाचे समाधान न झाल्याच्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत.

या निकालात ड्राफ्ट्समन अँड मेकॅनिकल या ट्रेंडचेच सर्वाधिक विद्यार्थी भरडले गेले आहेत. २२०० विद्यार्थ्यांनी अप्रेंटिस परीक्षा दिली होती. पैकी तब्बल ११०२ विद्यार्थी यात नापास असल्याची माहिती आहे, तर यातील ७०० विद्यार्थ्यांना प्रॅक्टीकल विषयात थेट शून्य गुण टेकविण्यात आल्याने विद्यार्थ्यांच्या आरोपाला पुष्टी मिळाली आहे. काही विद्यार्थ्यांनी तर थिअरीचे पेपर व्यवस्थित देऊनसुद्धा त्यांना चक्क अॅब्सेंट दाखविण्यात आले आहे.

‍रिचेकिंगचा अर्ज कसा भरू?

या निकालाने अन्यायाची भावना झालेल्या एका विद्यार्थ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भावना मांडल्या. तो म्हणाला, ‘‘गुणांमध्ये तफावतीची शक्यता असल्यास रिचेकिंगचा पर्याय वापरला जातो. जर प्रॅक्टीकल परीक्षेतच शून्य गुण शेकडो विद्यार्थ्यांना टेकविण्यात आले असतील तर रिचेकिंगचा अर्ज भरण्याचा अजब सल्ला संस्था प्रशासन देतेच कसे? असा अर्ज भरून नेमके काय फलित मिळणार आहे.’’

..अन् वाया गेली दोन वर्षे

आयटीआय परीक्षेच्या स्वरूपातील बदलांमुळे ऑगस्ट २०१६ मध्ये नियोजित असणारी ही परीक्षा चक्क एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांचे सात महिने परीक्षेस उशीर झाल्याने वाया गेले. त्यात एप्रिल २०१७ मध्ये परीक्षा झाल्यानंतर जून महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात निकाल लागणे अपेक्षित होते. हा निकाल सप्टेंबरच्या मध्यावर जाहीर झाला आहे. निकालाच्या प्रतीक्षेत तीन महिने वाया गेले. असे विद्यार्थ्यांचे एकूण १० महिने वाया गेले आहेत, तर हाती पडलेला निकाल सदोष असल्याच्या भावनेमुळे नकळत दोन वर्षे वाया गेल्याची प्रतिक्रिया विद्यार्थ्यांमध्ये आहे.

आश्वासनांवर बोळवण

विद्यार्थ्यांनी निकालाच्या मुद्द्यावरून शनिवारी दुपारी गोंधळ घातल्यानंतर प्रशासनास जाग आली. अगोदर विद्यार्थ्यांना न जुमानणाऱ्या संस्थेने या प्रकारावर सोमवारी तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. या प्रकारासंदर्भात नवीन सूचना असल्यास सोमवारी संस्थेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येईल, असेही संस्थेच्या वतीने सांगण्यात आले. संस्थेच्या या आश्वासनामुळे विद्यार्थ्यांचे लक्ष आता सोमवारकडे लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता तयार व्हा, गरबा वर्कशॉपसाठी!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नवरात्रीत मुख्य आकर्षण असते ते गरब्याचे.. पारंपरिक गुजराती गाण्यांबरोबर महाराष्ट्रीयन, रिमिक्स, बॉलिवूड गाण्यांवर गरब्याचा ताल धरण्यासाठी तरुणांबरोबर प्रौढ वयोगटही उत्सुक असतो. पण गरबा खेळायला आवडत असले तरी अनेकांना गरबा, गरब्याच्या स्टेप्स काही जमत नाहीत. अशा सर्वांना गरब्याच्या टेक्निक्सविषयी मार्गदर्शन करण्यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे गरबा वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्कशॉपमध्ये संजय सोनार हे बॉलीवूड स्टाइल गरबा शिकवणार आहेत.

दि. १८, १९ आणि २० सप्टेंबर असे तीन दिवस हे वर्कशॉप होणार आहे. ४५ नीलरत्न बांगला विसे मळा, कॅनडा कॉर्नर या ठिकाणी संध्याकाळी ७ ते ८ या वेळात, विश्वकर्मा गार्डन हॉल, महालक्ष्मी नगर महाराष्ट्र कॉलनी, हिरावाडी रोड पंचवटी या ठिकाणी संध्याकाळी ७ ते ८ या वेळेत, के. एन. केला स्कूल, करन्सी नोट प्रेसच्या समोर, जेलरोड या ठिकाणी दुपारी ३.३० ते ४. ३० वाजता तर आर के लॉन ,पाथर्डी फाटा या ठिकाणी संध्याकाळी ५ ते ६ या वेळेत गरबोली अर्थात बॉलीवूड स्टाईल गरबा शिकवला जाणार आहे. तेव्हा तुमच्या घराजवळ असलेल्या मटा कल्चर क्लब गरबा वर्कशॉपसाठी लगेच नोंदणी करा.

कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

नोंदणी करणे अनिवार्य

या वर्कशॉपसाठी प्रत्येकाला नोंदणी करणे अनिवार्य आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी २०० रुपये तर इतरांसाठी ४०० रुपये नोंदणी फी आहे. महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेज रोड याठिकाणी गरबोली वर्कशॉपचे नोंदणी करता येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रायफलधारींचा पहारा!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या सुरक्षारक्षकांकडून महापालिकेत प्रवेश करणाऱ्या आगंतुकांना आवरणे शक्य होत नसल्याने, तसेच आमदार बच्चू कडूंच्या राड्यानंतर दक्ष झालेल्या प्रशासनाने महापालिकेची संपूर्ण सुरक्षाच खासगी सुरक्षारक्षकांच्या हाती देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी असलेल्या महापालिकेच्या राजीव गांधी भवन या मुख्यालयाला आता रायफलधारी सुरक्षारक्षकांचा वेढा पडणार आहे.

जवळपास ४५ सुरक्षारक्षकांचा वेढा महापालिकेभोवती पडणार असून, त्यात १८ सुरक्षारक्षक शस्त्रधारी राहणार आहेत. प्रायोगिक तत्त्वावर हे सुरक्षारक्षक नेमले जाणार असले, तरी महापालिकेला एवढ्या शस्त्रधारी सुरक्षारक्षकांची गरज आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जाणार आहे. या निर्णयाने असामाजिक तत्त्वांचा महापालिकेतील प्रवेश रोखला जाणार असला, तरी सर्वसामान्य नागरिकांसाठी मात्र ते जाचक ठरणार असल्याची चर्चा आहे.

आपले दैनंदिन प्रश्न सोडविण्यासाठी सर्वसामान्यांचे हक्काचे व्यासपीठ म्हणून राजीव गांधी भवनची ओळख आहे. सर्वसामान्यांशी निगडित असलेले प्रश्न महापालिका मुख्यालयातच सोडविले जातात. प्रश्न सोडविण्यासाठी नगरसेवक निवडले जात असले, तरी प्रश्न सुटतीलच यादी गॅरंटी नसल्याने असंख्य नागरिकही थेट महापालिकेत येतात, तर नगरसेवकांच्या नावाने महापालिकेत काही गुन्हेगारही प्रवेश करीत असतात. महापालिकेतील निवडणुकांवेळी तर सर्रास गुंडांचाच प्रवेश होतो. काही दिवसांपूर्वी तर बंदुकधारी व्यक्तीलाच महापालिकेत पकडण्यात आले होते.

महापालिकेच्या गेटवर सुरक्षारक्षक असले, तरी त्यांना कोणी जुमानत नसल्याचे चित्र आहे. गेल्या महिन्यात आमदार बच्चू कडू आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या राड्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून, या प्रकरणांना आवर घालण्यासाठी महापालिकेची संपूर्ण सुरक्षाच आता खासगी सुरक्षारक्षकांच्या हातात देण्याचा निर्णय घेतला आहे.

महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांच्या सुरक्षेसाठी मुंबईस्थित एका सुरक्षा महामंडळाकडून ४५ खासगी सुरक्षारक्षक प्रायोगिक तत्त्वावर घेतले जाणार आहेत. त्यातील १८ सुरक्षारक्षक रायफलधारी राहणार असून, उर्वरित २७ सुरक्षारक्षक साधे राहणार आहेत. त्यांच्यावर महापालिका मुख्यालयासह संपूर्ण परिसराच्या सुरक्षेची जबाबदारी राहणार आहे. सध्या ही जबाबदारी महापालिकेच्या सुरक्षारक्षकांकडे असून, त्यांना येथून हलवून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित केले जाणार आहे. महापालिकेत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाच्या तपासणीसह प्रवेश देण्याचा हक्क या सुरक्षारक्षकांकडे राहणार आहे. प्रत्येक सुरक्षारक्षकावर महिन्याला २५ ते ३५ हजारांपर्यंत खर्च होणार आहे. त्यामुळे प्रशासनाच्या या निर्णयाने सत्ताधाऱ्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

--

सर्वसामान्यांची अडवणूक

महापालिकेची सुरक्षा व प्रवेश करणाऱ्या असामाजिक तत्त्वांना रोखणे हा प्रशासनाचा उद्देश असला, तरी त्याचा सर्वाधिक फटका हा सर्वसामान्यांना होणार आहे. शस्त्रधारी सुरक्षारक्षकांच्या गराड्यातून प्रवेश करण्यास सर्वसामान्य नागरिक अजूनही घाबरतो. त्यामुळे तो मुख्यालयापासून अंतर राखण्याची शक्यता आहे. दुसरीकडे महापालिकेत प्रवेश करणाऱ्या काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांमध्ये आणि सुरक्षारक्षकांमध्ये हमरीतुमरी होऊन कायदा व सुव्यवस्थेचाही प्रश्न उपस्थित होण्याची शक्यता आहे. काही पदाधिकाऱ्यांच्या आजूबाजूला फिरणाऱ्या गुंडांनाही त्याचा फटका बसून वादविवाद होण्याची शक्यता आहे.

--

महापालिका पोलिसांच्याही पुढे

नाशिककरांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पोलिस आयुक्तालयात जवळपास पाच ते सहा शस्त्रधारी सुरक्षारक्षक आहेत. दहशतवादी हल्ला होण्याचा धोका असल्याने या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त असतो. परंतु, महापालिकेत तब्बल १८ रायफलधारी सुरक्षारक्षक तैनात होणार असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. शहरातील गुन्हेगारी वाढल्याने कदाचित महापालिकेतील पदाधिकारी व अधिकाऱ्यांनाच असुरक्षित वाटत असण्याची शक्यता आहे. त्यामुळे महापालिकेने पोलिस आयुक्तांच्या दोन पावले पुढे जात शस्त्रधारी सुरक्षारक्षक नेमण्याचा निर्णय घेतल्याची चर्चा रंगत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पालक-शिक्षक संघ नावालाच

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिक : शुल्क नियंत्रण कायद्यानुसार प्रत्येक शाळेला पालक-शिक्षक संघाची स्थापना करणे अनिवार्य असले, तरी शाळा मात्र या नियमाकडे जाणूनबुजून दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षिततेबाबत भयावह परिस्थिती असताना व शुल्कवाढीबाबत सातत्याने पालक, शाळा प्रशासन यांच्यात वादंग निर्माण होत असतानाही अद्याप पालक-शिक्षक संघाबाबत गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे.

अनेक शाळांमध्ये हा संघ स्थापन केल्याचे सांगितले जात असले, तरी तो केवळ कागदोपत्रीच मर्यादित राहत असून, या संघाच्या बैठकीही होत नसल्याची वस्तुस्थिती आहे. नव्या शैक्षणिक वर्षाचे सत्र सुरू होण्यापूर्वीच पालक-शिक्षक संघाची स्थापना व शुल्क निश्चित करणे आवश्यक असते. मात्र, २०१७-१८चे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन तीन महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लोटला असला, तरी बहुतांश शाळा या संघाच्या स्थापनेकडे दुर्लक्ष करीत आहेत. शालेय शुल्कासारख्या महत्त्वाच्या निर्णयाचे स्वातंत्र्य या संघामुळे हिरावत असल्याच्या भावनेतून शाळा सोयीस्करपणे या कायद्याच्या अंमलबजावणीलाच तिलांजली देऊ पाहत आहेत. याचा परिणाम शाळा प्रशासन व पालक यांच्यात वादाची ठिणगी पडण्यास कारणीभूत ठरत असून, शाळेचे शुल्क निश्चित करण्यासही मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. यामुळे सामान्य पालकाला रस्त्यावर आंदोलन करण्याची वेळ येत असल्याच्या भावना पालकांनी व्यक्त केल्या आहेत.

--

अशी असते रचना

पालक-शिक्षक संघाची रचना कायदेशीर पद्धतीने ठरवून देण्यात आली आहे. अध्यक्ष म्हणून प्राचार्य, मुख्याध्यापक, उपाध्यक्ष म्हणून पालकांमधून एक, सचिव म्हणून शिक्षकांमधून एक, सहसचिव दोन, पालकांमधून एक व शिक्षकांमधून एक, सदस्य प्रत्येक इयत्तेतील एक शिक्षक, प्रत्येक तुकडीसाठी एक शिक्षक (जेवढ्या तुकड्या तेवढे पालक सदस्य), या समितीत ५० टक्के महिला सदस्य, समितीची मुदत दोन वर्षे, दोन महिन्यांतून किमान एकदा पालक-शिक्षक संघाची बैठक होणे अपेक्षित असते.

--

-शाळांची हलगर्जी चिमुकल्यांच्या जिवावर पान २

--

पालक-शिक्षक संघ न स्थापिलेल्या शाळांबाबत तपासणी करून त्यांना ताबडतोब नोटीस बजावणार आहोत. त्यांना संधी देण्यात येईल. त्यानंतरही या संघाची स्थापना न केल्यास कठोर कारवाईचा प्रस्ताव आम्ही देणार आहोत.

-रामचंद्र जाधव, शिक्षण उपसंचालक

--

पालक-शिक्षक संघाची स्थापना केली, तर शाळेला महत्त्वाच्या निर्णयांमध्ये, तसेच शुल्क निश्चित करण्याबाबत पालकांची संमती घेणे आवश्यक असते. शाळेचा ऑडिट रिपोर्ट दाखविणेही शाळा प्रशासनाला अनिवार्य बनते. त्यामुळे हा संघ स्थापन करण्याबाबत टाळाटाळ होते.

-योगेश पालवे, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रस्ता दुरुस्ती अडचणीत?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पावसाळ्यात रस्त्यांची चाळण झाल्यानंतर जिल्ह्याभरातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाटी सार्वजनिक बांधकाम विभागीने १६२ कामांचे ८७ कोटींचे वार्षिक टेंडर काढले आहे. त्याचबरोबरच नव्या ४२ कामांचे १२० कोटींचे टेंडरही प्रसिद्ध केले आहे. पण, ही कामे करणारे शासकीय ठेकेदार हे टेंडर भरणार नसल्यामुळे बांधकाम विभागाची कोंडी झाली आहे. जीएसटीमुळे शासकीय ठेकेदारांनी बहिष्काराचे हत्यार उपसले असून, त्यामुळेही कामे अडचणीत येणार आहे. बहिष्कार कायम राहिल्यास सार्वजनिक बांधकाम विभाग यातील काही कामे करणार आहे.

जिल्ह्यातील २८०० कि.मी. मार्गावर हे दुरुस्तीचे काम दिले जाणार असून, ८०० कि. मी. अंतरावरील रस्त्याचे नव्याने काम केले जाणार आहे. त्यात रुंदीकरण व मजबुतीकरणाचा समावेश आहे. या दोन्ही कामांत रस्त्यांची पुढील दोन वर्षे दुरुस्ती ठेकेदारांनाच करावी लागणार आहे. जिल्ह्यात पावसाळा व त्यापूर्वी या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे अगोदरच वाहनचालकांमध्ये संताप आहे. त्यामुळे ही कामे जर वेळत झाली नाही, तर त्यातून अपघाताचे प्रमाणही वाढणार आहे. त्यामुळे ही कामे लवकर व्हावी यासाठी प्रयत्न केले जात असले तरी शासकीय ठेकेदारांचा असहकार त्यात अडथळा आहे.

१ जुलैपासून जीएसटी लागू झाल्यानंतर महिन्याभरातच शासकीय ठेकेदारांनी या करपद्धतीवर आक्षेप घेवून त्याविरुद्ध भूमिका घेतली. या नव्या करपद्धतीमुळे शासकीय कामातील बिल्डिंग कामात ६ ते ७, रस्ते कामात १० ते १३ टक्के व धरण बांधकामात १६ ते १७ टक्के वाढ होणार आहे. त्यामुळे हे पैसे सरकारने द्यावे किंवा त्याचा टेंडरमध्ये अंतर्भाव करावा, अशी ठेकेदारांची मागणी आहे. त्याचप्रमाणे अगोदर केलेल्या कामांसाठी लागणार जीएसटी सरकारने भरावा, असेही त्यांचे म्हणणे आहे. १ कोटी रुपयांसाठी १८ लाखांच्या आसपास जीएसटी लागणार असेल तर कामे कशी करायची असा प्रश्नही ते उपस्थित करतात.

बांधकाम विभागाची होणार कोंडी

बिल्डर्स असोशिएन ऑफ इंडिया या संघटनेने या करपद्धतीच्या विरोधात महिनाभरापूर्वी बैठक घेतली. त्यात सरकारने जीएसटीबाबत कोणताही ठोस निर्णय न घेतल्यामुळे सर्वच शासकीय कामांच्या निविदा न भरण्याचा निर्णय घेवून त्यावर बहिष्कार टाकल्याची घोषणा केली. त्यानंतर सरकारने योग्य निर्णय न घेतल्यास १८ ऑगस्टपासून राज्यभर आंदोलनही केले. या शासकीय ठेकेदारांनी हे आंदोलन करतांना त्यांची भूमिकाही स्पष्ट केली. त्यात जीएसटी १ जुलै रोजी लागू झाला, पण तो लागू होण्यापूर्वी झालेल्या निविदेमध्ये जीएसटीचा अंर्तभाव नसल्याने ठेकेदार त्या कामावर जीएसटी भरू शकणार नाही. या कामावर लागणारा जीएसटी सरकारने ठेकेदाराला द्यावा. तसेच १ जुलैनंतर प्रसिद्ध होणाऱ्या निविदेवर वेगळा जीएसटी सरकारने द्यावा, अशी मागणी या असोसिएशनने केली आहे. यासर्व प्रकारात मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुरुस्तीच्या व नवीन कामांची कोंडी होणार असून त्याचा फटका मात्र वाहनचालकांना बसणार आहे.

रस्ता दुरुस्तीचे ८७ कोटी व रुंदीकरण व मजबुतीकरणाचे १२० कोटींच्या कामांचे टेंडर काढले आहे. काही कामांना शासकीय ठेकेदारांनी प्रतिसाद दिला आहे. पण, तो न दिल्यास बांधकाम विभाग ही कामे करेल.
आर. आर. हांडे, अधीक्षक अभियंता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गौतमी तलावातील माशांचा गूढ मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पाठीमागील बाजूस असलेल्या गौतम तलावातील हजारो माशांचा मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. तलावतील मासे रात्रीतून कसे मेले याचे याबाबत शहरात चर्चा सुरू आहे.

मंदिराचे दक्षिण बाजूस विस्तीर्ण असा गौतम तलाव आहे. गत काही वर्षांपासून येथे मासे जोपासले जात आहेत. दर्शनास आलेले भाविक, यात्रेकरू या तलावातील माशांना खाद्यपदार्थ खाऊ घालत असत. पूर्वी येथे बेकरी होती. या बेकरीतून डजनवारी पाव घेऊन भाविक माशांना खायला देत. मध्यंतरी ती बेकरी येथून हलविण्यात आली. त्यानंतर काही महिला येथे पाव विक्री करत. विष्णुच्या दशावतरात मस्य अवतार हा प्रमुख अवतार आहे. माशांना खायला दिल्यास पुण्य मिळते आदी, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे तलावात पाव टाकणाऱ्यांच्या संख्येत दिवसोंदिवस वाढ होत गेली. काही स्थानिक भाविक कणीक मळून तेही टाकत.

मात्र शनिवारी सकाळी नेहमीप्रमाणे स्थानिक भाविक तलावावर गेले असता तेथे पाण्यावर मृत मासे तरंगताना दिसले. त्यामुळे एकच खळबळ उडाली. सकाळी काही तरुण हे मासे गोण्यांमध्ये भरून रिक्षा, टेम्पोद्वारे घेऊन गेले. याबाबत त्यांना हटकणाऱ्यांना त्यांनी हे मासे दुर्गंधी निर्माण करतील म्हणून जाळण्यासाठी अथवा पुरण्यासाठी घेऊन चाललो, असे सांग‌तिले. मासे साधरणत: एक ते ५ किलो वजनाचे होते, असे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘किनो शिक्षा गौरव’ने शिक्षकांचा सन्मान

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील किनो एज्यु. सोसायटीच्या वतीने यंदादेखील जिल्ह्यातील १८ तर राज्यस्तरीय दोन आदर्श शिक्षकांना किनो शिक्षा गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. येथील दरेगाव परिसरातील संस्थेच्या अलकबीर इंग्लिश मीड‌िअम स्कूलमध्ये हा सोहळा झाला. प्रमुख पाहुण्या म्हणून गटशिक्षणाधिकारी शोभा पारधी यांनी केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयशानगर पोल‌सि ठाण्याचे पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे होते. संस्थेचे अध्यक्ष रईस शेख, उपाध्यक्ष सोहेल कुरैशी, विश्वस्त मतीन कुरैशी, शिक्षणविस्तार अधिकारी डी. एस. गायकवाड, आत्माराम अहिरे, नितीन चौधरी, केंद्रप्रमुख सुनंदा पवार, मुख्याध्यापिका अर्चना गरुड आदी उपस्थित होते.

शिक्षकांच्या योगदानातून केवळ विद्यार्थी घडतात असे नाही तर त्यांच्या सामाजिक बांधिलकीतून केलेल्या कार्याने समाजाला दिशा मिळते. अशा कार्याची दखल सामाजिक पातळीवर घेतली जाणे कौतुकास्पद आहे. पुरस्काराने माणसाचा आत्मविश्वास द्विगुणीत होतो व जबाबदारी देखील वाढते, असे शोभा पारधी म्हणाल्या.

शासनाच्या सरल प्रणालीचे राज्य समन्वय पुणे जिल्ह्यातील शिक्षक प्रदीप भोसले व म. फारुक अ. कुद्दुस (अमरावती) यांना राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. जिल्हास्तरीय गुणवंत शाळा म्हणून देवळा तालुक्यातील फगंदर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, तर तालुकास्तरीय गुणवंत शाळा म्हणून मालेगाव तालुक्यातील खडकी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचा सन्मान करण्यात आला. पारधी यांनी शिक्षक समाजाचा दुवा असल्याचे सांगून शिक्षकाने सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले. पोलिस निरीक्षक विठ्ठल ससे यांनी शिक्षकांनी चांगले विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. रईस शेख यांनी प्रास्ताविक केले. पुरस्कारार्थी शिक्षकांच्या वतीने दीपक हिरे व वर्षा चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले.

या शिक्षकांचा झाला सन्मान

जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षकांमध्ये ज्ञानेश्वर नवसरे (पेठ), गोरक्ष सोनवणे(सिन्नर), विलास जमदाडे (दिंडोरी), नीलेश भामरे (कळवण), देवीदास कदम (सटाणा), वर्षा चौधरी (इगतपुरी), प्रकाश चव्हाण (निफाड), हनुमंत काळे (येवला), देवीदास शेवाळे (देवळा), विलास गवळे (नाशिक), प्रदीप देवरे (चांदवड), वैशाली भामरे (मालेगाव), दीपक हिरे (मालेगाव), नीलेश नहिरे (मालेगाव), जिभाऊ जाधव (मालेगाव) या शिक्षकांना स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लेखनगोडीने सापडतो आपल्यातील लेखक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

माणसांच्या दैनंदिन जीवनातील साध्यासुध्या घटनांमध्ये साहित्यलेखनाचे विषय दडलेले असतात. माझ्यातील कांदबरी लेखक अशाच घटनांमधून जन्माला आला. शालेय वयात लिहिण्याची गोडी निर्माण झाल्यास व चांगले शिक्षक, मित्र व संस्कार मिळत गेल्यास आपल्यातील लेखक आपल्याला सापडतो, असे प्रतिपादन साहित्यिक, लेखक डॉ. राजेंद्र मलोसे यांनी केले.

येथील मसगा महाविद्यालयात वाड्मय मंडळाचे उद‌्घाटन मलोसे यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. डॉ. मलोसे यांनी साहित्यनिर्मिती प्रक्रियेविषयी विद्यार्थ्यांशी मुक्तपणे संवाद साधला. आपण कांदबरी लेखनाकडे कसे वळालो याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांसमोर अनुभव कथन केले.

प्राचार्य डॉ. वाय. टी. पवार हे अध्यक्षस्थानी होते. तर उपप्राचार्य डॉ. सी. एम. निकम, पी. ए. आहिरे, डॉ. अनिता नेरे, मंडळाचे अध्यक्षा डॉ. विद्या सुर्वे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी राहुल मोरे व कामेश गायकवाड यांनी स्वागतगीत सादर केले. राज त्रिभुवन यांनी सूत्रसंचलन केले. महाविद्यालयाचे आर. एच. शेलार, जयवंत कट्यारे, जे. वाय. इंगळे उपस्थित होते. प्रा. सादिया परवीन यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आताच घ्या साहित्याचा आनंद

विद्या सुर्वे म्हणल्या, विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन जीवनातच साहित्यातील सर्व प्रकारांचा रसस्वाद घेतला पाहिजे. यासाठी वाड्मयीन मंडळ स्थापन करण्यात आले आहे. तर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य पवार यांनी शाळा महाविद्यालयात लेखन, वाचनाचे छंद जोपासले तर आयुष्य सुंदर होते, असे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपची ‘स्वीकृत’ ओढाताण

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाजपला महपालिकेत सत्तेत येवून सात महीने लोटले तरी, तीन स्वीकृत सदस्यांची निवड करता येत नसल्याचे चित्र आहे. स्वीकृत नगरसेवक पदासाठी पालकमंत्री, आमदार व पदाधिकाऱ्यांमध्येच मोठी रस्सीखेच सुरू झाल्याने शनिवारीही स्वीकृतच्या नावांवर एकमत होवू शकले नाही. त्यामुळे स्वीकृत सदस्यांच्या निवडीचा मुहूर्त आता दुसऱ्यांदा हूकला असून, भाजपच्या अंतर्गत कुरूबुरीने आता प्रशासनही हतबल झाले आहेत.

महापालिकेत सख्याबळानुसार भाजपचे तीन तर शिवसेनेचे दोन स्वीकृत सदस्य निवडले जाणार आहेत. त्यासाठी अर्ज दाखल करण्याचा शनिवार हा शेवटचा दिवस होता. भाजपने तीन सदस्य निवडीसाठी ३८ इच्छुकांची यादी प्रदेश भाजपकडे पाठविली होती. तर शिवसेनेने दोन सदस्यांसाठी १२ जणांची यादी मातोश्रीवर पाठवली होती. यासाठी महापालिकेने यापूर्वी दोनदा मुदतवाढ दिल्याने शनिवारी कोणत्याही परिस्थितीत अर्ज दाखल होतील, अशी अपेक्षा होती. परंतु भाजपमध्ये सुरू असलेल्या रस्सीखेचमुळे शनिवारचा मुहूर्तही हूकला आहे. गटनेते संभाजी मोरुस्कर यांनी आयुक्तांना पत्र लिहून महिनाभराची मुदतवाढ मिळावी अशी मागणी केली आहे.

शिवसेनेची भाजपला मदत?

आपल्याच कार्यकर्त्याची वर्णी लावावी यासाठी पालकमंत्री, भाजप शहराध्यक्ष व आमदारांमध्ये मोठी रस्सीखेच आहे. पदाधिकाऱ्यांमध्येच एकमत होत नसल्याने प्रदेश पातळीवरील नेत्यांनी निर्णयच राखीव ठेवला आहे. सुत्रांनी दिलेल्या माह‌ितीनुसार भाजपने दोन नावांवर शिक्कामोर्तब केले असले तरी, एका नावावर मात्र एकमत होत नसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे भाजपला थेट शिवसेनेलाच साकडे घालावे लागले. भाजपने विनंती केल्याने शिवसेनेने आपल्या इच्छुकांचेही अर्ज दाखल न करता भाजपला मदत केली. त्यामुळे या निर्णयाने आता प्रशासनापुढे पेच पडला आहे.


प्रशासनही झाले हतबल

महापालिका निवडणुकांनंतर पहिल्या महिन्यातच ही प्रक्रिया संपायला हवी होती. परंतु आतापर्यत दोन वेळा अर्ज दाखल करण्यासाठी मुदतवाढ माग‌ितली गेली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत, १६ सप्टेंबर ही शेवटची तारीख देण्यात आली होती. परंतु शनिवारीही अर्ज दाखल झाले नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. संख्याबळानुसार भाजप व सेनेचेच सदस्य द्यावे लागणार असल्याने इतरांना संधी देता येत नाही, या पक्षांची वाट बघण्याशिवाय पर्याय नाही. तरीही आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी मुदतवाढीसंदर्भात कायदेशीर सल्ला घेण्याचा निर्णय घेतला आहे.


पालकमंत्री कोटी अडला

पक्षातील सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नाशिकरोड मंडलमधील एक पदाधिकारी, पक्षाचे कार्यालय सांभाळणारा एक पदाधिकारी अशी दोघांची नावे निश्चित आहेत. परंतु तिसऱ्या नावावरून पक्षात संघर्ष सुरू आहे. पक्षाचेच माजी शहराध्यक्षांच्या मुलाचे नाव चर्चेत आहे. परंतु या नावाला भाजपच्याच एका आमदाराचा तीव्र विरोध आहे. तर दुसरीकडे गिरीश महाजन यांनीही आपल्या एका समर्थकांच्या नावावर आग्रह धरला आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांनाही अखेर निवडीबाबत आस्ते कदम घ्यावे लागले असून, निवडच महिनाभर लांबणीवर टाकावी लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शिवसेनेकडून निष्ठावंतांना संधी

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

भाजपमध्ये स्वीकृतपदासाठी ओढाताण असतांना शिवसेनेने मात्र आपल्या कोट्यातील दोन जागांसाठी निष्ठावंत शिवसैनिकांना संधी देवून वेगळाच संदेश दिला आहे. शिवसेनेने शनिवारी दोन जागांसाठी चार जणांची नावे जाहीर केली असून, अर्ज छाननी नंतर अंतीम दोघांची निवड केली जाणार आहे.

सुनील गोडसे, राजू वकासरे यांच्यासह अलका गायकवाड व महिला आघाडीच्या अध्यक्षा अॅड. शामला दीक्षित यांचा त्यात समावेश आहे. चारही सदस्य हे पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते असून सामान्य कुटूंबातील आहेत. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याची शिवसेनेची परंपरा असल्याचे जिल्हाप्रमुख विजय करंजकर व महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांनी सांग‌तिले आहे.

स्थानिक नेत्यांकडून दोन सदस्यपदासाठी मातोश्रीवर १२ नावे पाठवली होती. त्यापैकी पक्षाचे सचिव व खासदार अनिल देसाई व संपर्क प्रमुख आमदार अजय चौधरी यांनी चार नावांवर शिक्कामोर्तब केले आहे. चौघांनाही अर्ज दाखल करण्यास सांगण्यात आले असून, त्यातून अंतीम दोघांच्या नावावर निर्णय घेतला जाणार आहे. परंतु शिवसेनेने स्वीकृतपदासाठी पाठविलेली नावे ही कोणी मोठे पदाधिकारी व कार्यकर्ते नसून ते निष्ठावान व सामान्य शिवसैनिक आहेत.

न्यायाची परंपरा कायम

सर्वसामान्य शिवसैनिकाला न्याय देण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यापूर्वी शिवसेनेने राजकुमार सूर्यवंशी व दादाजी आहेर, या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना स्वीकृतची संधी दिली होती. तीच परंपरा आताही जपली आहे. शिवसेनेत प्रत्येकाला न्याय मिळतो असा संदेश दिल्याचे विजय करंजकर यांनी सांग‌तिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नमस्कार, बसमध्ये आपले स्वागत आहे…

$
0
0

नाशिक : एसटी प्रवास म्हंटला की वैताग हा ठरलेलाच. सीट मिळलेच याची खात्री नाही, बसमधील अस्वच्छता, दुर्गंधी आणि यावर कडी म्हणजे सतत खेकसणारे आणि प्रवाशांना वैतागलेले कंडक्टर. ही सगळी ओळख पुसून काढत एसटीत बसणाऱ्यांचे मराठीसह हिंदी आणि इंग्रजीत स्वागत करण्यापासून ते त्यांना हवंनको ते पाहण्यापर्यंत एक अवलीया कंडक्टर एका तपापासून ‘प्रवाशांच्या सेवेसाठी’ हे ब्रीद जोपासत आहेत. सोपान जवणे असे त्या वाहकाचे नाव असून, त्यांच्या बसमधील अतिथी देवो भवः मुळे अनेक प्रवासी हसतमुखाने बस प्रवास करीत आहेत.

सोपान जवणे इतर कंडक्टर्सपेक्षा खूपच वेगळे आहेत. २०१२ मध्ये राज्य मार्ग परिवहन महामंडळाने १३ टक्के भाडेवाढ केली. भाडेवाढ गैर नाही पण महामंडळाने चांगली सेवाही द्यायला हवी, अशा आशयाचे वाचकाचे पत्र जवणे यांनी वर्तमानपत्रात वाचले. त्याच दिवसापासून त्यांनी प्रवाशांना चांगली आणि समाधानकारक सेवा देण्याचा निश्चय केला. मुळचे कर्जत तालुक्यातील मिरजगावचे असलेले जवणे परिवहन महामंडळात १९८९ मध्ये रूजू झाले. सध्या ते श्रीगोंदा आगारात कंडक्टर म्हणून कार्यरत आहेत. श्रीगोंदा आगाराच्या जळगाव किंवा नाशिक बसमध्ये ते सेवा देतात.

परिचयापासून बरेच काही…

प्रत्येक स्थानकातून बस मार्गस्थ होताना ते येणाऱ्या नवनवीन प्रवाशांचे स्वागत करतात. सर्वप्रथम स्वत:चा तसेच बसचालकाचा परिचय करून देतात. बस कोणकोणते थांबे घेईल, याची माहिती देतात. बसमध्ये घाण करू नका, थुंकु नका तसेच धुम्रपानही करू नका असे कळकळीचे आवाहन करतात. मळमळणाऱ्या प्रवाशांना ते स्वखर्चाने लवंग, वेलदोडा तसेच प्लास्ट‌कि पिशवीही देतात. सुटे पैसे नाहीत या सबबीखाली प्रवाशाचा रुपया देखील ठेऊन घेतला जाणार नाही, हे अत्यंत नम्रपणे सांगतात. इतके करूनही आमच्याबद्दल काही तक्रार असेल, सूचना असतील तर त्या कोठे करायच्या याची माहितीही जवणे प्रामाणिकपणे देतात. त्यांचा हा उपक्रम प्रवाशांसाठी सुखद धक्का ठरत आहे.

जवणे यांचा ही सेवा यूट्युबहवरही लक्ष वेधत आहे. त्यांच्या या सेवेचे धावत्या बसमध्ये शुटींग करण्यात आले असून, आतापर्यंत ३९ हजार ६१२ जणांनी हा व्ह‌डि‌िओ पाहिला आहे. अनोळखी चेहऱ्यांवर हास्य फुलविणारा हा व्ह‌डि‌िओ ‘एकला चलो रे’ या नावाने जगभरात पोहोचला आहे.

विमानात प्रवाशांना चांगली सेवा मिळते, तर आपण बसमध्येही का देऊ नये हा विचार मी केला. प्रवाशांचे समाधान व्हावे हा उद्देश आहे. काही प्रवासी टिंगल करतात तर काही टाळ्या वाजवून दाद देतात. कामावर आल्यावर व घरी जाताना बस स्वच्छ करतो.

--सोपान जवणे, कंडक्टर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बळीवर ग्रामस्थ ठाम!

$
0
0

दीपक महाजन, कळवण

प्रशासनाने गडावरील बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला असला, तरी वर्षांनुवर्ष सुरू असलेली परंपरा आम्ही खंडित करणार नाहीत, अशी भूमिका ग्रामस्थांसह भाविकांनी घेतली आहे. दसऱ्याच्या दिवशी गडावर बोकडबळी देणारच, असे परखड मत ग्रामस्थांसह ग्रामपंचायत सदस्यांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे बोकडबळीचा प्रश्न आता पेटणार असून, जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मंगळवारी (दि. १९) होणाऱ्या बैठकीत यावर खडाजंगी होण्याचीही चिन्हे आहेत.

गेल्या वर्षी ही प्रथा सुरू असताना हवेत मानवंदना दिल्यानंतर गोंधळ उडाला होता. त्यामुळे १२ जण जखमी झाले होते. भविष्यात या प्रकारची घटना पुन्हा घडू नये म्हणून खबरदारी घेत कळवणचे प्रांत अर्जुन श्रीनिवासन व तहसीलदार कैलास चावडे यांनी बोकडबळीची प्रथा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे भाविकांची निराशा झाली आहे.

अशी होती प्रथा

सप्तशृंग गडावर नवरात्रोत्सवात दसऱ्याच्या दिवशी सहस्रचंडी यज्ञाच्या आहुतीसाठी बोकडाचा बळी दिला जातो. प्राचीन काळापासून रूढी व परंपरेने ही प्रथा सुरू आहे. गडावरील शिवालयापासून वाजत गाजत बोकडाची मिरवणूक काढण्यात येऊन ट्रष्ट कार्यालयात त्याची विधिवत पूजा होत होती. तेथून पहिल्या पायरीजवळ महिषासूर महाराजांच्या दर्शनानंतर उंबराच्या झाडाखाली दसरा टप्पा नावाच्या जागेत शेकडो ग्रामस्थ, भाविक, पर्यटकांच्या समोर बोकडबळी दिला जात असे. यादरम्यान

मानवंदना म्हणून हवेत फायरिंग

केली जायची. यावेळी उपस्थित ग्रामस्थ, भाविक व काही देवस्थानचे कर्मचाऱ्यांमध्ये झुंबड उडायची. बळी दिल्यानंतर बोकडाच्या उडालेल्या रक्तात चलनी नोटा भिजवण्यासाठी भाविकांची खूप गर्दी होत असे.

ग्रामस्थांचा समज

ग्रामस्थ व गड देवस्थान प्रशासन यांच्यात सातत्याने खटके उडत असतात. म्हणून ही प्रथा ट्रस्टने बंद केल्याचा समज ग्रामस्थांचा झाला आहे. त्यामुळे देवस्थान ट्रस्ट प्रशासनाला भाविकांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. मंगळवारच्या बैठकीत याचे पडसाद उमटणार आहेत.


…तर कायदेशीर कारवाई

तुळजापूर, कोल्हापूर या शक्तीपीठांमध्ये अशा प्रथांना बंदी आहे. कुठल्याही पशूंची क्रूरपणे हत्या करणे हा कायद्याने गुन्हा ठरतो. मात्र रूढी व परंपरेचा दाखला देत गडावर आजपर्यंत ही प्रथा सुरू होती. यंदा ही प्रथा अचानकपणे बंद करण्यात आली असल्याने गड ग्रामस्थ व काही भाविकांची नाराजी व्यक्त होत आहे. देवस्थान ट्रस्टने हा प्रयोग बंद न केल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचे संकेत महसूल प्रशासनाने दिले आहेत.

अनेक वर्षांपासूनची परंपरा खंडित करण्याचा अधिकार प्रशासनाला कोणी दिला, असा प्रश्न गडावरील ग्रामस्थांनी विचारला. बैठकीत आपण स्वतः या निर्णयाला विरोध केला. आज पशुहत्येचे नाव पुढे करून ही प्रथा बंद करण्याचा प्रशासनाचा डाव आम्ही हाणून पाडू. दसऱ्याच्या दिवशी बोकडबळीचा विधी होईलच.

- गिरीश गवळी, ग्रा. प. सदस्य, सप्तशृंग गड

आसुरी शक्तींवर विजय मिळवत सुरक्षितता निर्माण होण्यासाठी नवमीच्या दिवशी शतचंडी याग करत आहुती दिली जाते. बोकडाचा बळी दिला जातो. प्राचीन काळापासून ही परंपरा चालू आहे. ती अशी एकाएकी खंडीत करू नये.- श्रीकांत दीक्षित, मंदिराचे पुजारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंग गड प्रशासन दर्शनसेवेसाठी सज्ज

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

नवरात्रोत्सवासाठी गड प्रशासन सज्ज झाले आहे. तालुक्यातील सप्तशृंग देवी गडावर २१ ते ३० सप्टेंबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्याबाबतची नियोजन बैठक प्रांताधिकारी अर्जुन श्रीनिवासन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सर्व शासकीय विभागाचे प्रमुख, देवस्थान ट्रस्टचे पदाधिकारी, गड व नांदुरी ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

रस्त्यावरील खड्ड्यांवर त्वरित तोडगा काढा

बीएसएनएल सेवा अखंडित ठेवण्यावर भर

व्यावसायिकांच्या अतिक्रणावर असणार लक्ष

प्लॅस्टिक बंदी कायम ठेवून कापडी पिशव्यांना प्राधान्य

गडावरील सांडपाणी, स्वछतागृह हागणदारीमुक्तीबाबत सूचना

अखंडपणे वीजपुरवठासाठी वीज वितरण कंपनी सज्ज

अन्नदानासाठी रोख किंवा शिधा स्वरूपात आपली देणगी

बोकडबळी प्रथेबाबत अफवा पसरविणाऱ्यावर कारवाई

अवैध दारू विक्रीवर उत्पादन शुल्क विभागाचे लक्ष

स्वछता अभियान राबविण्यात येणार

नांदुरी ग्रामपंचायत तात्पुरती स्वछतागृह उभारणार

असा असेल फौजफाटा

एक अतिरिक्त अधीक्षक

२ डीवायएसपी

१० निरीक्षक

१५ उपनिरीक्षक

२०० पोलिस कर्मचारी

५० महिला कर्मचारी

२५० होमगार्ड

एसआरपीएफची टीम

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मार्केट बंदमुळे कळवणला रास्तारोको

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कांदा भाव पाडण्याचे धोरण, कांदा व्यापाऱ्यांवर धाडसत्र आणि पर्यायाने मार्केट बंदमुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या सर्व प्रकारामुळे कांदा पीक वाया जाऊ नये म्हणून मार्केट त्वरित सुरू व्हावे या मागणीसाठी कळवणला भाजप सरकारच्या विरोधात सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन करण्यात आले.

शासनाने कांदा निर्यात शुल्कावरील केलेली वाढ व कांद्याच्या भावात घसरण करण्यासाठी होणारे प्रयत्न यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. त्यातच कांदा व्यापाऱ्यांवर धाडसत्र सुरू केल्याने मार्केट बंद करण्याचा व्यापाऱ्यांचा निर्णय हा शेतकऱ्यांच्या जीवावर उठणारा आहे. मार्केट बंद राहिल्याने शेतकऱ्यांचा कांदा पडून आहे. पर्यायाने तो सडत आहे. शेतकऱ्यांचा कांदा विकण्यायोग्य राहू नये म्हणून चालवलेला खटाटोप म्हणजे शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचाच प्रकार आहे, अशा शब्दात शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष देवीदास पवार यांनी शासनाचा समाचार घेतला.

पवार यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. मात्र आंदोलनामुळे कळवण-नाशिक व देवळा रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तासभर चाललेल्या या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भारती पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, रवींद्र देवरे, तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, शांताराम जाधव, शिवसेनेचे कारभारी आहेर, स्वाभिमानी संघटनेचे गोविंद पगार, घनःश्याम पवार, विलास रौंदळ, प्रवीण रौंदळ आदींनी निषेध नोंदवला. यावेळी कौतिक पगार, संजय पवार, चंद्रकांत पवार, पोपट पवार, शिवसेनेचे जितेंद्र वाघ, संभाजी पवार, विनोद मालपुरे, किशोर पवार, नाना देवरे, छावा संघटनेचे प्रदीप पगार आदींसह शेतकरी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

येवला बाजार समितीत दिवसभर शुकशुकाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

येवला बाजार समितीतील कांदा खरेदीदार व्यापाऱ्यावर कांदा खळे, गोदाम तसेच शहरातील राहत्या घरी गुरुवारी प्राप्तीकर विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीनंतर कांदा व्यापाऱ्यांनी गेले दोन दिवस कांदा लिलाव बंद ठेवले.

कांदा लिलाव बंद असल्याने शुक्रवार पाठोपाठ शनिवारीही कोणताही शेतकरी आपला कांदा घेवून येवला बाजार समितीकडे फिरकला नाही. परिणामी एरवी कांदा लिलावाच्या निमित्ताने चांगलेच गजबजणारे येथील बाजार समितीचे आवार अक्षरशः ओस पडताना सलग दुसऱ्या दिवशी आवारात शुकशुकाट होता.

जिल्हाभरात अनेक कांदा व्यापाऱ्यांवरील धाडसत्रामुळे कांदा व्यापाऱ्यांनी दोन दिवस लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय घेतला होता. शुक्रवार व शनिवार दोन दिवस येथील कांदा लिलाव बंद राहिले. रविवारी साप्ताहिक सुटीचा वार असून सोमवारी लिलाव होतात की नाही याकडे लक्ष लगाले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘ते’ जपताहेत दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना!

$
0
0

नाशिक ः वयाची साठी ओलांडल्यानंतर अनेकजण भक्तीमार्गाकडे वळतात. परंतु, सिडको येथे रहाणारे चंद्रकांत जैन वयाच्या ८४ वर्षीही आपल्या आवडत्या छंदाकडे लक्ष देत असून, त्यांच्याकडे १८१८ सालापासूनचा दुर्मिळ हस्तलिखितांचा खजिना आहे. त्याचे संशोधन करणे हा त्यांच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. ‘पोस्ट’ ही संकल्पना सुरू झाल्यानंतरची ब्रिटिशांनी तयार केलेली पोस्टकार्डे व शिक्के नसलेली चांदीची नाणी हेदेखील त्यांच्या संग्रहात आहेत.

चंद्रकांत जैन यांचे बालपण पारोळा येथे गेले. तेथे अकरावीपर्यंतचे शिक्षण झाल्यानंतर त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. या कालावधीत जळगावमधून नाशिक जिल्ह्यात त्यांची बदली झाली. पुढे ते नाशिकमध्येच स्थायिक झाले. नाशिकमध्ये येताना त्यांच्या वड‌िलांनी दिलेली हस्तलिखितांची पिशवी आणायला ते विसरले नाहीत. त्यात मोठ्या प्रमाणात हस्तलिखितांचा खजिनाच होता. त्यांच्याकडे १८१८ सालातील सर्वात दुर्मिळ असे ‘कळसूत्री घोडे’ हे पुस्तक, १८५६ सालातील ‘भाऊंच्या वीरकथा व पानिपत कुरुक्षेत्रवर्णन’ ही हस्तलिखिते आहेत. त्याचप्रमाणे शलापत्रकाचे शेकडो अंक त्यांच्या संग्रही आहेत. ‘टायटॅनिक’ची मूळ कथा व त्याचा कप्तान कॅप्टन स्मिथ याचा फोटोदेखील त्यांच्या संग्रही आहे. १२ एप्रिल १९१३ रोजी अंमळनेर येथील व्यंकटेश नाथो चव्हाण यांनी लिहिलेले ‘तिरुपती व्यंकटेश चरित्र’ही त्यांच्या संग्रहात आहे. या चरित्रात व्यंकटेश बालाजीचा शिष्य असलेला नेलप्पा वैश्य व त्याचा मित्र काशिम यांच्या खटल्यात खुद्द बालाजी यांनी साक्ष दिली होती. त्याचा संपूर्ण वृत्तांत या पुस्तकात देण्यात आला आहे.

संग्रहाला कशी सुरुवात झाली याबद्दल ते म्हणाले की, लहानपणापासून जुन्या वस्तूंचा संग्रह करण्याची आवड होती. पुढे नोकरीनिमित्त अनेक ठिकाणी फिरणे झाले. या भटकंतीतून अनेक दुर्मिळ कागदपत्रे हाती येत गेली व हा संग्रह आयुष्याचाच एक भाग बनून गेला. त्यांचे कलेक्शन पाहून अनेक मित्रांनी व नातेवाईकांनीदेखील त्यांच्या संग्रहाला हातभार लावला. संग्रहात इ. स. १८०० पासूनची हस्तलिखिते, पोस्टाची तिकिटे व नाण्यांचा संग्रह आहे. भारतात अनेकदा खोटी नाणी तयार केली जातात. त्यांच्या संग्रहात सर्व नाणी खरी आहेत. भारतीय नाणी, तिकिटे यांचा संग्रह तर आहेच. परंतु, विदेशी नाणी, तिकिटे यांचादेखील संग्रह त्यांच्याकडे आहे. केवळ संग्रह करून ते थांबले नाहीत, तर पुढच्या पिढीला मार्गदर्शन मिळावे यासाठी ते दुपारच्या सत्रात विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही करीत असतात.

पुढच्या पिढीला याची माहिती व्हावी यासाठी ही तळमळ आहे. जोपर्यंत शरीर साथ देते तोपर्यंत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असतो. अजूनही अनेक लोक संग्रहासाठी वस्तू आणून देत असतात. त्याच्या मेंटनन्समध्ये दिवस जातो. नवीन नाणे संग्रहात आल्यानंतर किंवा नवीन हस्तलिखित सापडल्यानंतर जो आनंद मिळतो त्याची गणना कुणी करूच शकत नाही.

- चंद्रकांत जैन, संग्राहक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

खड्ड्यांचा फेरा चुकेना

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक-पुणे महामार्गावर महत्त्वाच्या ठिकाणीच खड्डे पडल्यामुळे वाहनचालक मेटाकुटीस आले आहेत. अशा खड्ड्यांमध्ये वाहने आदळण्याचे प्रकार नित्याचेच झाले असून, मोठ्या अपघाताची धास्ती चालकांत निर्माण झाली आहे. असे धोकादायक खड्डे बुजविण्यासाठी पावसाळा संपण्याची प्रतीक्षा करणारे प्रशासन एखादा बळी घेतल्यानंतरच हे जीवघेणे खड्डे बुजविणार का, असा संतप्त सवाल वाहनचालकांनी केला आहे.

द्वारका येथून नाशिकरोडकडे येतानाचा मार्ग हा बरा आहे. मात्र, नाशिकरोडहून द्वारकाकडे जातानाच्या रस्त्यावर जागोजागी भलेमोठे खडले पडलेले आहेत. बिटको चौकातील खड्डे अखेर पोलिसांनी रिक्षाचालकांच्या मदतीने स्वतः बुजविले. दत्त मंदिर चौकात दोन दिवसांपूर्वीच पाइपलाइनसाठी रस्ता फोडण्यात आला. त्याचे अद्याप डांबरीकरण झालेले नाही. दत्त मंदिर चौकातील पॅचेस काढून संपूर्ण डांबरीकरणाची गरज आहे.

--

उपनगर परिसर जीवघेणा

उपनगरचा बस स्टॉप हटविल्यानंतर तेथे पडलेला भलामोठा खड्डा तसाच कायम आहे. येथे चार खड्डे आहेत. ते दिवसा टाळून पुढे जाता येते. मात्र, त्यात पाणी साचल्याने रात्री अंदाज येत नाही. या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी होते. त्यामुळे येथील बस स्टॉप हटवूनही वाहतुकीचा खोळंबा कायमच आहे. हिरवा सिग्नल सुरू झाला, तरी या खड्ड्यांमुळे पुढे जाता येत नाही. या चौकातील अपघातांत अनेकांचा बळी गेलेला आहे. त्यामुळे येथील खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे झाले आहे.

--

द्वारका चौक घातक

द्वारका चौकातून तेरा रस्ते जातात. या चौकात प्रचंड वर्दळ, तसेच पुढे जाण्याची जीवघेणी चढाओढ असते. वाहतूक पोलिसांनाही वाहनचालक जुमानत नाहीत. या चौकातील सर्कलभोवती इतके मोठे खड्डे पडलेले आहेत, की चारचाकी मोठी वाहनेही थांबूनच पुढे जाऊ शकतात. मारुती मंदिरासमोरील खड्डा अद्यापही बुजविलेला नाही. काही मोठ्या खड्ड्यांमध्ये पेव्हर ब्लॉक टाकून तात्पुरती सोय केलेली आहे. परंतु, अशा मलमपट्टीएेवजी द्वारका सर्कलभोवती रस्ता तातडीने डांबरीकरण करणे गरजेचे आहे.

--

अन्यत्रही धोके

उपनगर नाका ओलांडून द्वारकाकडे जाताना आंबेडकरनगरसमोर मोठा खड्डा आहे. तो टाळून पुढे गेल्यावर पोलिस उपायुक्तालयासमोर तर अर्धा रस्ताच गायब आहे. येथे वाहनांचा वेग कमीच करावा लागतो. येथून शिवाजीनगरकडे रस्ता जातो. त्यामुळे वाहनचालक तिकडे वळतात. त्यातच आता खड्डे झाले आहेत. त्यामुळे अपघातांचा धोका वाढला आहे. पुढे बोधलेनगरसमोर मोठा खड्डा झालेला आहे. त्याहीपुढे पेट्रोलपंप आणि श्रीकृष्ण लॉन्ससमोर घातक खड्डे आहेत. समाजकल्याण भवनासमोरच जीवघेणा खड्डा आहे. तेथून पुढे खरबंदा पार्कसमोर खड्डे आहेत. द्वारकाजवळील खड्डे आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी दुचाकीचालक शेजारील सर्व्हिसरोडकडे वळतात आणि आगीतून फुफाट्यात पडतात. त्यामुळे या महामार्गावरील खड्डे तातडीने बुजविण्याची मागणी वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सटाण्याचा पाणीप्रश्न लवकरच सुटणार’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

सटाणा शहरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी पुनद प्रकल्पातून थेट पाइपलाइनकरिता राज्य सरकारकडून सुमारे ५५ कोटी रुपयांचा निधी दिवाळीपर्यंत मंजूर होईल. यामुळे माता-भगिनींना सरकारकडून ही दिवाळीभेट असेल, असा आशावाद केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी जाहीर सभेत व्यक्त केला.

आगामी काळात पूर्व बागलाणचा सिंचन अनुशेष भरून काढण्यासाठी उजवा कालवादेखील पूर्णत्वास नेण्याचा आपला संकल्प आहे. त्यासाठी जल आयोगाने हिरवा कंदील दिला असल्याचे स्पष्ट करून चारी क्रमांक आठचा प्रश्न मार्गी लावण्याच्या दृष्टीने चारीचा शुन्य ते बारा किलोमीटरची गळती रोखण्यासाठी निधी उपलब्ध करण्यात आल्याचे डॉ. भामरे यांनी यावेळी नमूद केले. तत्पूर्वी डॉ. भामरे यांनी तालुक्यातील गेल्या वर्षापासून प्रलंबित असलेल्या हरणबारी डावा कालवा, तळवाडे भामेर पोहच कालवा या योजनांसाठी सुमारे ७४ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचा ४६ गावांतील नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात आला. या प्रसंगी भाजपा जिल्हाध्यक्ष दादा जाधव, डॉ. विलास बच्छाव, पुष्पलता पाटील यांची भाषणे झाली.

विविध विकासकामांचे उद््घाटन

सटाणा नगरपरिषदेच्या वतीने प्रस्तावित ६० फुटी रिंग रोडचे, नाना-नानी पार्कचे भूमिपूजन, लोकमान्य टिळक रस्त्यांचे मजबुतीकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर व सिद्धार्थ नगर अंतर्गत जलवाहिनी टाकण्याच्या विकासकामांचा यावेळी शुभारंभ संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर येथील राधाई मंगल कार्यालयात आयोजित नागरी सत्कार समारंभ व आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण करण्यात आले. अध्यक्षस्थानी सटाणा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष सुनील मोरे होते. सटाणा शहरातील बायपासचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी निधीदेखील मंजूर झाला आहे. यामुळे शहरातील राज्य महामार्गाचा समावेश राष्ट्रीय महामार्गात झाल्याने आता शहराचा विकास थांबणार नाही, असे राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

२७ टक्के अपघातात ‘हिट अँड रन’!

$
0
0

नाशिक: शहरात घडणाऱ्या एकूण घटनांपैकी तब्बल २७ टक्के अपघात ह‌िट अॅण्ड रन प्रकरातील असतात. म्हणजेच एका वाहनचालकास अथवा पादचाऱ्यास जखमी करून दुसरा वाहनचालक पळून जातो. अपघातानंतर समोरील वाहनचालक पळून जाण्याने अनेकदा जखमी व्यक्तीच्या जीवावर बेतते. शहरात रस्ते अपघातात दरवर्षी दोनशेंहून अधिक व्यक्तींचा बळी जातो.

अपघात घडल्यानंतर नागरिकांकडून होणारी मारहाण आणि पोलिसांच्या कारवाईच्या भीतीने ‘हिट अॅण्ड रन’ अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे. यंदा जुलै महिन्यापर्यंत शहरात एकूण ४०९ अपघातांची नोंद झाली आहे. त्यातील ११२ अपघातांच्या घटनांमध्ये वाहनचालकांनी पोलिसांना खबर न देता अथवा जखमी व्यक्तीस उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल न करता घटनास्थळावरून पळ काढल्याचे दिसते. विशेष म्हणजे शहरातील हायवे, रिंगरोड, हमरस्ते अथवा कॉलनीरस्ते अशा सर्वच ठिकाणी हे प्रकार घडतात. कमी रहदारी असलेल्या रस्त्यांवर ‘हिट अॅण्ड रन’ अपघातांचे प्रमाण थोडे जास्त असते. याबाबत बोलताना पोलिस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी सांगितले की, अपघाताची घटना घडल्यानंतर पळून जाणाऱ्या व्यक्तीवर अपघातासह पळून जाण्याचा गुन्हा दाखल होतो. जखमी व्यक्तीला सोडून पळून जाण्याची वृत्ती चुकीची आहे. जखमी व्यक्तीला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल केले आणि त्याची पोलिसांना खबर दिली तर अपघातात नक्की चूक कोणाची आहे, हे शोधता येते. किंबहुना जखमी व्यक्तीसह पोलिसांचा संबंधीत वाहनचालकाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलतो. अनेकदा जखमी व्यक्ती अशा वाहनचालकाविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत नाही, असेही प्रकार घडल्याचे वाहतूक शाखेतील एका पोलिसाने सांगितले.

नुकतेच घडलेले हिट अॅण्ड रन

आडगाव मेड‌िकल कॉलेजसमोर ६ सप्टेंबर रोजी विरुद्ध बाजने भरधाव वेगात जाणाऱ्या एसयूव्हीने रुपेश भावसार या दुचाकीचालकास धडक दिली. सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर कारचालक पळून गेला. तर, गंभीर जखमी झालेल्या रूपेशचा मृत्यू झाला. आडगाव पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यापूर्वी २८ ऑगस्ट रोजी सातपूर परिसरात ‘हिट अॅण्ड रन’चा प्रकार घडला होता. भरधाव अज्ञात कारने दिलेल्या धडकेत प्रकाश जाधव या १९ वर्षीय तरुणास डोक्यासह इतर ठिकाणी गंभीर दुखापत झाली होती.

महिना- एकूण अपघात- हिट अॅण्ड रन

जानेवारी-६०-१५

फेब्रुवारी-७६-१६

मार्च-८८-१८

एप्रिल-५६-२३

मे-४५-१७

जून-४२-१२

जुलै-४२-११

एकूण-४०९-११२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेतकऱ्यांसाठी सर्वांनी एकत्र यावे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

नाशिक, मालेगावचा परिसर पर्यटनसमृद्ध आहे. या भागातील शेतकऱ्यांनी, कष्टकऱ्यांनी हिंमत न हारता सकारात्मक दृष्टिकोन बाळगला तर या भागाचा कायापालट होईल. शेतकऱ्यांच्या प्रश्नी राजकारण न करता सगळ्यांनी मतभेद विसरून एकत्र यावे. शेतीसह लघु उद्योग करावेत. नव्या पिढीने शेतीकडे सकारात्मक नजरेने बघावे. राज्याचा शेतकरी हा शिवरायांचा खरा वारसदार- मावळा आहे, असे प्रतिपादन खासदार संभाजीराजे भोसले यांनी केले.

दाभाडी येथे भाजपच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात खासदार भोसले बोलत होते. केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे , माजी मंत्री प्रशांत हिरे, आमदार अपूर्व हिरे, भाजप नेते अद्वय हिरे, पंचायत समितीच्या सभापती प्रतिभा सूर्यवंशी आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांसाठी कोणत्या सरकारने काय केले याबाबत राजकारण करण्यापेक्षा शेतकऱ्यांनीच एकत्र येऊन नेतृत्व करावे, असे आवाहन भोसले यांनी केले. डॉ. भामरे म्हणाले, की गेल्या तीन वर्षांत मतदारसंघातील सिंचनाचे प्रश्न मार्गी लागावेत, यासाठी पाठपुरावा सुरू असून, ९० टक्के प्रश्न मार्गी लागले आहेत. नार-पार, उजवा- डावा कालवा, मांजरपाडा प्रकल्पामुळे शेतीच्या सिंचनाचे प्रश्न मार्गी लागतील, असे आश्वासन त्यांनी दिले.

अद्वय हिरे म्हणाले, की शेतकऱ्यांचे हित लक्षात घेताच सरकारने आजवरची सर्वांत मोठी कर्जमाफी दिली आहे. या कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पवन ठाकरे यांनी प्रास्ताविक केले. अरुण पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

‘उद््घाटन माझ्या हस्ते हा दैव योग!’

पंचायत समितीच्या इमारतीच्या उद््घाटनावरून झालेल्या वादाबाबत भाष्य करताना अद्वय हिरे म्हणाले, की राज्यात काँग्रेस- राष्ट्रवादीचे सरकार असताना नव्या इमारतीचा प्रस्ताव तत्कालीन मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे पाठवून तो मंजूर करण्यात आला होता. मात्र, नंतर सरकार बदलले. शिवसेनेकडून या इमारतीच्या उद््घाटनाचा घाट घातला गेला. मात्र, आचारसंहितेमुळे ते शक्य झाले नाही आणि निवडणुकीत पंचायत समितीत आमची सत्ता आली. त्यामुळे या इमारतीचे उद््घाटन माझ्या हस्ते होणे हा दैव योगच आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images