Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कचराकुंडीच्या जागेवर वृक्षारोपण

0
0

देवळाली कॅम्प : देवळालीच्या लेव्हिट मार्केटच्या मागील बाजूस असलेली कचराकुंडीमुळे परिसरात दुर्गंधी पसरत असल्याने कचराकुंडी हटविण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली होती. यानंतर त्याजागी प्रशासनाने स्वच्छता केली. येथील व्यावसायिक व दुकानदारांनी एकत्र येत याठिकाणी वृक्षारोपण केले आहे.

कचराकुंडीमुळे रस्त्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांची दुर्गंधीच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. मार्केट परिसर व कचराकुंडीच्या जागी प्रशासनाने स्वच्छता केल्याने परिसरातील व्यावसायिक व नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. मोकळ्या करण्यात आलेल्या जागेवर शिवसेना विधानसभा संघटक हनुमंता देवकर यांच्यासह परिसरातील व्यावसायिकांनी एकत्र येत भिंतीलगत सहा वृक्षांची लागवड केली. यावेळी रामचंद्र डावरे, सुरेश पाटील, शाम जाधव, संजय पाटील आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साहित्यात गट-तट नसावेत

0
0

जिल्हा साहित्यिक मेळाव्यात अभिनेते अनासपुरे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आमची पिढी गोंधळलेली आहे. डिजिटल क्रांतीने आम्ही गोंधळून गेलो आहोत. भारत व इंडियाचा संबंध कसा लावावा हे आम्हाला कळत नाही. हे सांगण्याचे काम साहित्यिकच चांगले करू शकतो. मात्र, त्याने निर्भिडपणे लिहिले पाहिजे. त्यासाठी आधी साहित्यात गट-तट नसावेत, असे प्रतिपादन प्रसिध्द अभिनेते व नाम फाउंडेशनचे संस्थापक मकरंद अनासपुरे यांनी केले.

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे उद्घाटन अनासपुरे यांच्या हस्ते करण्यात आले. परशुराम साईखेडकर नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अनासपुरे पुढे म्हणाले, की साहित्यात जसे गट-तट होऊ नये तसेच शेतकऱ्यांमध्येही प्रादेशिक फुटीची चिन्हे दिसू लागली आहेत. विदर्भातील शेतकऱ्याला वाटते की कोकणातला शेतकरी फार आरामात आहे. कुणाला वाटते उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पॅकजेस घेण्याची सवयच लागली आहे. असे वाद होणे हे भीतीदायक आहे. अखंड शेतकरी एकच आहे. एकच संस्कृती आहे. वाचनाविषयी बोलताना अनासपुरे म्हणाले, की वाचन एकांगी असल्यावर चुकीचा अभिनिवेश येतो. त्यामुळे सर्व बाजूंनी वाचावे. चांगले पुस्तक कोणते, त्याची यादी द्या असे सरांना सांगितल्यावर दहा पाने वाचल्यावर पुढे वाचावेसे वाटेल ते पुस्तक चांगले, दहा पानांच्या आत कंटाळा आला की ते पुस्तक खाली ठेवून द्यावे असे साधे सोपे गणित सरांनी शिकवल्याचे अनासपुरे म्हणाले. साहित्य खूप काही बोलते, वाचन माणसाला गुंतवून ठेवते. हे वाचनपर्व निष्ठेने जोपासले असते तर पुतळ्यांवर झाला एवढा खर्च करावा लागला नसता.

जातीअंत करू या असे पहिलीच्या पुस्तकात म्हणायचे आणि दाखल्यावर मात्र पहिल्यांदा जात विचारून घ्यायची अशी पध्दत आपल्याकडे आहे. आजची माध्यमे तेज होत चालली आहेत. इतकी की आता बोलत असलेले लगेचच कुठेतरी येईल अशीही व्यवस्था आज आहे. दररोज नित्यनूतन साहित्यिक जन्माला येत आहेत. हे देखील धोक्याचे आहे. ही संस्कृती व ही परंपरा टिकवणारी माणसे एकमेकांना जोडली जाणे जास्त महत्त्वाचे आहे आणि ते काम साहित्यिकच करू शकतो.

यावेळी व्यासपीठावर सहायक जिल्हाधिकारी अमोल एडगे, आदिवासी विकास आयुक्त आर. जी. कुलकर्णी, खासदार हेमंत गोडसे, आमदार बाळासाहेब सानप, आमदार देवयानी फरांदे, महापौर रंजना भानसी, सुप्रसिध्द कवी विठ्ठल वाघ, सावानाचे अध्यक्ष प्रा. विलास औरंगाबादकर, कवयित्री रेखा भांडारे, गंगूबाई धामणकर तसेच सावाना जिल्हा साहित्यिक मेळाव्याचे माजी अध्यक्ष, सावानाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी दत्ता पाटील म्हणाले, की तरुण पिढी व रंगकर्मींचा प्रतिनिधी म्हणून मी येथे उभा आहे. अध्यक्ष होण्याची शक्यता प्रत्येक रंगकर्मीत ठासून भरलेली असताना मी जरा जास्तच भाग्यवान आहे. बंडखोरीच्या तत्त्वज्ञानावर वाटचाल झाली आहे. या दीपमाळेतील एक सामान्य माणूस असल्याचेही पाटील यांनी नमूद केले. माजी अध्यक्षांच्या वतीने उत्तम कांबळे यांनी प्रतिनिधीक स्वरूपात सत्काराला उत्तर दिले. ते म्हणाले, की संख्या व गुणवत्तेने दोन दिवस साहित्याचा जागर मेळाव्यात होतो. प्रतिभावंतांना पंख परसवण्याची जागा ही सावाना मेळाव्यात आहे.

प्रारंभी रागिणी कामतीकर यांच्या स्वरात सरस्वती स्तोत्र व गगन सदन तेजोमय, मोगरा फुलले हे गीत झाले. दीपप्रज्ज्वलन आणि कुसुमाग्रज, डॉ. अ. वा. वर्टी, कवी गोविंद आणि सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्याध्यक्ष अॅड. अभिजित बगदे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. प्रमुख सचिव श्रीकांत बेणी यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी तीन महिन्यांत लायब्ररी ऑन व्हिल उपक्रम सुरू करणार तसेच वस्तुसंग्रहालय लवकरच नव्या जागेत स्थलांतरीत करणार व १० हजार पोथ्या नव्या जागेत नेणार, असे सांगितले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक म. सु. पाटील यांचे शुभेच्छापत्र वाचून दाखविण्यात आले. डॉ. वेदश्री थिगळे व किशोर पाठक यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. अॅड. भानुदास शौचे यांनी आभार मानले.

साहित्यात कडवटपणा येत चालला आहे

आताच्या साहित्यात कडवटपणा येत चाललेला आहे. लेखकाने यातना सहन केलेल्या असतात वेदनेशिवाय व यातनेशिवाय लिखाण होत नाही. मात्र हा संक्रमणाचा काळ आहे हेदेखील लक्षात घेतले पाहिजे. आम्ही एक होता कार्व्हरसारखे पुस्तक वाचून घडलो. मात्र त्याकाळी दुखण्याचे भांडवल करण्याची पध्दत नव्हती. आता मात्र ते वाढले आहे. नेमाडेंचा देशीवाद मला भावला तसेच गंगाधर गाडगीळांचे साहित्यही मला आपले वाटत गेले. वाचनात वर्ज्य काही नसावे या मताचा आहे, असे अनासपुरे यांनी नमूद केले.

तरुण पिढी संदिग्ध

ज्यांनी मनातील सांगितले, ज्यांचे अंतरंगात थिजवून घ्यावेसे वाटले. त्यांचे कौतुक झाल्याचे ऐकिवात नाही. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराजांचे कोणी कौतुक केले. आता मात्र असे होता कामा नये. दत्ता पाटील अध्यक्ष झाले तर त्यांचे भाषण छापील प्रती करून वाटावे कारण तरुण पिढीला काय हवेय ते त्यातून कळेल. आजची तरुण पिढी संदिग्ध वातावरणात आहे. रिअल हिरो शोधण्यात त्यांचा वेळ वाया जातोय त्यापेक्षा रिअल हिरो शोधण्याचे तंत्र आपण प्रत्येक पिढीला दिले पाहिजे. जिल्हास्तरीय मेळावे झाले पाहिजे त्यातूनच दडलेले परिस शोधता येतील असेही अनासपुरे म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेन्सॉर बोर्ड रद्द करायला हवे

0
0

अतुल पेठे यांचे परखड मत

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

सेन्सॉर बोर्ड इंग्रजांसारखेच आहे. विशेष म्हणजे ते फक्त महाराष्ट्र आणि गुजरातमध्येच काम करते. उद्याचे मराठी नाटक चांगले चालावे असे वाटत असेल, तर सर्वप्रथम सेन्सॉर बोर्ड रद्द करा, असे परखड मत ज्येष्ठ रंगकर्मी अतुल पेठे यांनी शनिवारी नाशिकमध्ये व्यक्त केले. नाटक संपल्यामुळे लेखक, नाटककार संपतच आहेत. नाट्यक्षेत्राला बळ देण्यासाठी सरकारने प्रभावी योजना राबविल्या नाहीत, तर शेतकऱ्यांप्रमाणेच नाट्यकलावंतांनाही आत्महत्या कराव्या लागतील अशी भीती त्यांन‌ी व्यक्त केली.

सार्वजनिक वाचनालय नाशिकच्या सुवर्णमहोत्सवी जिल्हा साहित्यिक मेळाव्यानिमित्त मु. श. औरंगाबादकर सभागृहात आयोजित ‘नाटक काल आज आणि उद्या’ या विषयावर पेठे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नाटकककार योगेश सोमण, अध्यक्ष दत्ता पाटील आदी मान्यवर उपस्थ‌ति होते. यावेळी पेठे यांनी अत्यंत परखड शैलीमध्ये समाजातील विविध घटकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, की शेतकरी शेतात राबतो तसा मी नाटकात राबणारा माणूस आहे. नाटक करायचे असेल तर नोकरी करायलाच हवी. कारण नाटकातून अर्थार्जन करून प्रपंच चालविणे हल्ली कठीण होऊन बसले आहे. मराठी नाटक कायम पुरोगामी राहिले. विचारप्रवण करणारे नाटक लिहिणे ही मराठी रंगभूमीची खासियत आहे. कोणतीही कलाकृती अशी असावी की ती पाहून, ऐकून हादरा बसला पाहिजे. कलाकृती पाहणाऱ्यात मानसिक, बौध्दिक आणि वैचारिक क्रांती घडायला हवी तीच खरी कलाकृती ठरते. नाटक वाढावे असे वाटत असेल तर धार्मिक उन्मादावर नाट्यक्षेत्रातील मंडळींनी लक्ष ठेवायला हवे. सरकारने नाट्यक्षेत्राला बळ देण्यासाठी योजना आखायला हवी, अशी अपेक्षा पेठे यांनी व्यक्त केली. जागतिक दृष्टिकोनाचे भान असलेले नाटक येत नाही तोपर्यंत नाटक वाढणार नाही असे मत पेठे यांनी यावेळी व्यक्त केले.

प्रेक्षकांना नाट्यगृहात आणणे कठीण

विविध वाहिन्यांमुळे मराठी प्रेक्षक घरात बसून राहिला आहे. त्याला नाट्यगृहापर्यंत आणणे मोठे आव्हान असल्याचे मत योगेश सोमण यांनी यावेळी व्यक्त केले. दरवर्षी ७० ते ८० नाटकं तयार होतात. त्यापैकी सात ते आठ नाटकं जेमतेम व्यवसाय करतात. दोन नाटकं सुपरहिट ठरतात तर अन्य नाटकं बंद पडत असल्याची माहिती त्यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रवादीत खांदेपालट

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खांदेपालटाचे वारे सुरू झाले असून, नाशिकच्या प्रभारी पदावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांना हटविण्यात आले आहे. या पदाची धुरा आता माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आली असून, पाटील नियुक्तीनंतर लगेचच अॅक्टिव्ह झाले आहेत. आज, रविवारी (दि. २४) त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीच्या शहर व ग्रामीण पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

तीन महिन्यांपूर्वीच नाशिकमध्ये माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात पक्षातील बदलाचे संकेत मिळाले होते. नाशिकचे प्रभारीपद आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडे वर्षभरापासून होते. परंतु, त्यांनी ठाण्यातील व्यापामुळे फारसे लक्ष घातले नाही. त्यामुळे पक्षाला जिल्हा परिषदेसह महापालिकेत फटका सहन करावा लागला. त्यामुळे पक्षाने आता प्रभारीपदाची भाकरी फिरवली असून, शहर व जिल्ह्याचे प्रभारीपद आव्हाड यांच्याकडून काढून घेत थेट जयंत पाटील यांच्याकडे सोपवले आहे. पाटील हे शिस्तप्रिय व स्पष्टवक्ते असल्याने जिल्हा पदाधिकाऱ्यांमधील विसंवाद थांबवून शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला त्यांच्याकडून बळकटी मिळण्याची शक्यता आहे. पाटील यांची नाशिकच्या प्रभारीपदाची नियुक्ती होताच, त्यांनी नाशिकच्या कामकाजाला सुरुवात केली आहे. आज ते नाशिकच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या उपस्थितीत दुपारी राष्ट्रवादी भवनात शहर व जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आल्याची माहिती शहराध्यक्ष रंजन ठाकरे यांनी दिली. पाटील यांच्या नियुक्तीने ग्रामीण भागात अपेक्षित असलेला बहुप्रतीक्षित खांदेपालट आता होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ते शहर व ग्रामीण राष्ट्रवादीला किती उभारी देतात, याकडे पदाधिकाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अभिनयकुशल ‘अंजली’

0
0

मुंबईच्या तुलनेत नाशिकसारख्या अत्यंत छोट्या शहरातून एका मराठमोळ्या सामान्य कुटुंबातली मुलगी पारंपरिक वारसा नसताना वयाच्या तिशीतच ‘ऑस्कर’वारीला निघते... याशिवाय सुपरस्टार रजनीकांत या बड्या अभिनेत्यासोबतही ती काम करते... हे अंजली पाटील या तरुण अभिनेत्रीचे यश ज्यांनी ‘सिने इंडस्ट्री’ ठाऊक आहे त्यांना नक्कीच थक्क करणारे ठरते. ‘न्यूटन’ या चित्रपटाच्या माध्यमातून अंजली जणू नाशिकलाच ऑस्करवारी घडविण्याच्या मार्गावर आहे.

नाशिकरोड येथील र. ज. बिटको गर्ल्स हायस्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण घेतल्यानंतर तिने करिअरसाठी अभिनयाचे क्षेत्र निश्चित केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ललित कला केंद्रातून अभ्यासक्रम पूर्ण करीत दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये पुढील शिक्षण तिने पूर्ण केले. अंजलीने २०११ मध्ये जाहिरात क्षेत्रापासून करिअरची सुरुवात केली. सन २०१३ मध्ये ‘ना बंगारू तल्ली’ या तेलुगू चित्रपटातील भूमिकेसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराची ती मानकरी ठरली. अंजलीने साकारलेल्या आजवरच्या भूमिकाही कणखर म्हणून सिने समीक्षकांकडून वाखाणल्या गेल्या. इतकेच नव्हे, तर तिच्या कलेची तुलना दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्याशीही केली जातेय. ‘माझं आयुष्य मी विशिष्ट चौकटीत आखलेलं नाही,’ असं म्हणणारी ही अभिनेत्री मनाला रुचेल अन् व्यक्तिमत्त्वाला पचेल ती संहिता साकारण्यास तत्पर आहे. पुरस्कारांच्याही पलीकडे अभिनयास एका उंचीवर न्यायचे आहे, हा तिचा विचारच तिच्या ध्येयाची उंची सांगून जातो. अंजलीचं व्यक्तिमत्त्व वैयक्तिक आयुष्यात अत्यंत समतोल आहे. तिला बड्या समारंभांमध्ये सहभागी व्हायला आवडत नाही. अंतर्मुख असणाऱ्या या अभिनेत्रीला आकर्षण असेल, तर ग्लॅमरच्या दुनियेपेक्षा जगापासून अलिप्त भासणाऱ्या हिमालयाचे. खरी प्रतिभा आणि खरे कलावंत असणारे दिग्गज अभिनेते जवळून अनुभवताना त्यांच्यातील खरा मोठेपणा या अभिनेत्रीला प्रेरणा देतो. त्यांचं मोठेपण मान्य करण्याची अंजलीची भूमिका लहान वयात मोठ्या यशानंतरही तिची पावले जमिनीवरच असल्याचे सिद्ध करते. अभिनयाच्या क्षेत्रात वावरताना तिने भाषिक चौकटी कधीच तोडल्या आहेत. ती आता थोडी फारसी आणि फ्रेंच भाषाही शिकली असून, सध्या ती तमिळ शिकत आहे. याशिवाय रायडिंग अन् बाइक चालविण्याच्या वेडापायी तिने मनाली ते लडाख असा साहसी बाइक प्रवासही केलेला आहे.

--

अन्य भाषांतही ठसा

सिनेसृष्टीत सांभाळून घेणारा कुणी बापमाणूस पाठीशी असल्याशिवाय निभाव लागणे तसे कठीणच. त्यातच या इंडस्ट्रीत ठसा उमटवू बघणारी ‘ती’ अतिसामान्य पार्श्वभूमीची असली, तर तिने केवळ साइड रोलच करावेत किंवा वाट बदलून दुसरे क्षेत्र निवडावे, असे गृहितक अनेक जण आत्मविश्वासाने मांडतात. पण, नाशिकसारख्या शहरातून सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या अंजली पाटील या अभिनेत्रीने केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी, इंग्रजी, मल्याळी, तेलुगू, तमिळ, सिंहली या दाक्षिणात्य भाषांमधील अभिनयातही ठसा उमटविला आहे.

--

(शब्दांकन : जितेंद्र तरटे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कल्चर क्लब सदस्य बनायचंय?

0
0

फक्त १९९ रुपयांमध्ये विविध कार्यक्रमांची मेजवानी

म टा प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब म्हणजे नाशिककरांना मनोरंजनाच्या जगात नेणारा तुमचा खास सोबती. फक्त चित्रपट, नाटकांपर्यंत मर्यादित न ठेवता त्यांना अवघ्या कला जगताची सफर घडवून आणणारा कल्चर क्लब हा सोबती सदस्यांना मिळाला आहे. ही सोबत आणखी रंगतदार बनविण्यासाठी आजच महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मध्ये सहभागी व्हा.

नवरात्रीनिमित्त कल्चर क्लबचे सदस्य होण्यासाठी खास ऑफर देण्यात येत आहे. फक्त १९९ रुपयांमध्ये कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि वर्षभर आनंद लुटा विविध कलात्मक, सांगीतिक कार्यक्रमांचा.

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नाटक, सांगीतिक कार्यक्रम, हॅप्पी स्ट्रीट, श्रावण क्विन असो किंवा झुंबा डान्स, खाऊचा डब्बा, गेट टुगेदर असे विविध कार्यक्रम याअंतर्गत आयोजित केले जातात. यंदाही कल्चर क्लब सदस्यांसाठी लाईव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किट्टी पार्टी, गानतंत्र स्पर्धा, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निवल, मोदक मेकिंग कॉम्पिटिशन, चित्रकला स्पर्धा, मँगो फेस्टिवल, नवरंग नवरात्रीचे, एज्युकेशनल सेमिनार, क्विझ कॉन्टेस्ट, संगीत मैफिली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद कल्चर क्लब सदस्यांना वर्षभर घेता येणार आहे. तसेच तुमच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मटा कल्चर क्लब व्यासपीठही उपलब्ध करून देणार आहे.

नाटकांसारख्या कार्यक्रमांनाही मटा कल्चर क्लबकडून सदस्यांना विशेष सवलत देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल तर आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि तयार व्हा मनोरंजन जगताची सफर करण्यासाठी.

अधिक माहितीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्केअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर किंवा (०२५३) ६६३७९८७, ९५५२५६६८४२ या क्रमांकावर संपर्क करा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महागाईविरोधात शिवसेना आक्रमक

0
0

टीम मटा

वाढत्या महागाईविरोधात शिवसेनेकडून शनिवारी ठिकठिकाणी आंदोलन छेडण्यात आले.

निफाड ः वाढत्या महागाईचा निषेध करण्यासाठी निफाड तालुका शिवसेनेच्यावतीने आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली निफाड तहसीलवर धडक देण्यात आली. शिवसेनेचे तालुक्यातील सर्व पदाधिकारी व शिवसैनिक निफाड बाजार समिती सभागृहात दुपारी बारा वाजता जमा झाले होते. तेथून आमदार अनिल कदम यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी निफाड तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी निफाडचे प्रभारी तहसीलदार सी. एस. देशमुख यांना शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक रणजीत डेरे उपस्थित होते.

यावेळी धडक आंदोलनास निफाडचे नगराध्यक्ष मुकुंद होळकर, पंचायत समिती सभापती पंडितराव आहेर, जि. प. सदस्य बाळासाहेब क्षीरसागर, दीपक शिरसाठ, पंचायत समिती सदस्य शिवा सुराशे, शहरप्रमुख संजय कुंदे, जावेद शेख, सुधीर कराड, उपतालुकप्रमुख इरफान सय्यद उपस्थित होते.

सटाण्यातही आंदोलन

सटाणा : देशात महागाईचा आगडोंब उसळला असून पेट्रोल, डिझेल, गॅस इंधन, तसेच भाजीपाला, अन्य जिवनावश्यक वस्तूंचे दर ऐन सणासुदीच्या दिवसांमध्ये वाढल्या आहेत. त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार असून लवकरात लवकर दर कमी करण्यात यावे याकरिता सटाणा शहर शिवसेनेच्या वतीने सटाणा बसस्थानकासमोर रस्ता रोको आंदोलन छेडण्यात आले.

येथील विचुर-शहादा-प्रकाशा राज्य महामार्गावर शिवसेना शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली रास्तारोको आंदोलन छेडण्यात आले. चार तास हे आंदोलन सुरू होते. शिवसेना उपजिल्हाप्रमुख लालचंद सोनवणे, शहरप्रमुख जयप्रकाश यांनी सरकारच्या धोरणावर आसूड ओढले. यावेळी तहसीलदार दीपक धिवरे यांना आंदोलनस्थळी निवेदन देण्यात आले. पोलिस निरीक्षक हिरालाल पाटील उपस्थित होते. यारस्ता रोकोप्रसंगी माजी तालुकाप्रमुख अनिल सोनवणे, युवासेनेचे दुर्गेश विश्वभंर यांची भाषणे झाली. आंदोलनात तालुका संघटक मुन्ना सोनवणे, बापू कर्डीवाल आदींसह शिवसैनिक सहभागी झाले होते.

सुरगाण्यात रास्तारोको

कळवण : एकिकडे पेट्रोल, डिझेल व घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात झालेली भरमसाठ वाढ आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतमालाला म‌ळिणारा अल्पदर यामुळे जनता होरपळली आहे. त्यामुळे केंद्र व राज्यातील भाजप सरकारच्या निषेधार्थ शनिवारी सुरगाणा शहर शिवसेनेतर्फे येथील बसस्थानकासमोर आंदोलन छेडण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विवाहितेच्या मृत्यूप्रकरणी कुटुंब‌ियांचे उपोषण

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

तालुक्यातील शेरुळ येथील सासर व म्हालणगाव येथील माहेर असलेल्या सुनंदा दगडू पवार हिचा २० सप्टेंबर रोजी मृत्यू झाला होता. सुनंदाच्या पतीनेच तिचा विष पाजून खून केला असल्याचा आरोप कुटुंब‌ियांनी केला असून, गुन्हा दाखल करूनही तालुका पोलिसांनी आरोपीस अटक न केल्याने कुटुंब‌ियांसह म्हालणगाव ग्रामस्थ तालुका पोल‌िस ठाण्यात उपोषणास बसले होते.

मयत सुनंदाचा पती दगडू पवार हा शारीरिक व मानसिक छळ करीत होता. त्यानेच तिचा खून केला असल्याचा आरोप सुनंदाचा भाऊ समाधान खैरनार व कुटुंब‌ियांनी केला आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात गुन्हा नोंदविला गेला आहे. मात्र तालुका पोल‌िस आरोपीस अटक करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप सुनंदाच्या कुटुंब‌ियांनी केला आहे. आरोपीस तत्काळ अटक करावी या मागणीसाठी मयत सुनंदाच्या कुटुंबियांसह म्हालणगाव ग्रामस्थांनी तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात उपोषण सुरू केले आहे.

आरोपीस अटक करण्याबाबातचे निवेदन पोल‌िस निरीक्षक शिंगटे यांना देण्यात आले. शिंगटे यांनी आरोपीस अटक करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘नीतिमूल्यांचे भान असणारी पिढी घडवावी’

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

संस्कारक्षम व नीतिमूल्ये यांचे भान असणारी उद्याची पिढी घडवणे ही आजच्या शिक्षकांसमोरील मोठी जबाबदारी आहे. आदर्श शिक्षक म्हणून सन्मानीत झालेल्या शिक्षकांनी अशी पिढी घडवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडावी, असे आवाहन मनमाडचे पोल‌िस अधीक्षक डॉ. राहुल खाडे यांनी केले.

लायन्स क्लब मनमाड, लासलगाव व सिन्नर सिटी लायन्स प्राईड

व लायनेस क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने मनमाड येथे आयोजित आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.

लायन्स रिजन चेअरमन सचिन शाह झोन पदाधिकारी नाविद शेख लायन्स अध्यक्ष डॉ. प्रताप गुजराथी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ. खाडे व सचिन शाह यांनी उपक्रमाचे कौतुक केले. आदर्श पुरस्कार मिळवणाऱ्या शिक्षकांची जबाबदारी वाढल्याचे सांगत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या. डॉ. प्रताप गुजराथी यांनी प्रास्ताविकात पुरस्कारामागची लायन्सची भूमिका स्पष्ट केली. अरुण दराडे, डॉ. अजय भन्साळी यांनी स्वागत केले. अॅण्ड शशिकांत व्यवहारे यांनी परिचय करून दिला. यावेळी गौरी गणपती आरास स्पर्धेच्या परीक्षक स्वाती गुजराथी यांचा सत्कार करण्यात आला. डॉ. डी. जी. जाधव, मुकेश मिसर यांनी सत्कारार्थींतर्फे मनोगत व्यक्त केले.

‘आदर्श शिक्षक’चे मानकरी

डॉ. डी. जी. जाधव, प्रवीण व्यवहारे, मुकेश मिसर, संतोष भराडे, एस. व्ही. देशपांडे, माणिक खैरनार, योगिता आहिरे, सुनील ढमाले, ज्ञानेश्वर कुऱ्हाडे, बाळासाहेब सांगळे, रब्बानी शेख, प्रा. जालींदर बगाडे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

१७१ ग्रामपंचायतींसाठी ३८३६ अर्ज

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यातील १७१ ग्रामपंचायतींमधील एक हजार ६४७ जागांसाठी तीन हजार ८३६ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सोमवारी २५ सप्टेंबर रोजी छाननी प्रक्रिया होणार असून, २७ सप्टेंबरपर्यंत माघार घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट

होऊ शकणार आहे.

ग्रामीण भागातील ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी लवकरच सुरू होणार आहे. पहील्या टप्प्यात २२ ग्रामपंचायतींसाठी २६ सप्टेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. तर नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये मुदत संपणाऱ्या निवडणुकांसाठी दुसऱ्या टप्प्यात ७ ऑक्टोबरला मतदान होईल. त्यासाठी अर्ज दाखल करण्याकरीता शुक्रवारी अखेरची मुदत होती. नवरात्रीचा मुर्हूत साधत अनेक उमेदवारांनी अर्ज भरण्यास पसंती दिली. त्यामुळे एकूण तीन हजार ८३६ अर्ज दाखल झाले आहेत. २५ सप्टेंबरला या अर्जांची छाननी होणार आहे. २७ सप्टेंबरपर्यंत माघारीची मुदत आहे. त्यानंतर या निवडणुकीचा आखाडा तापण्यास सुरूवात होणार आहे.

सरपंच पदासाठी

६४२ अर्ज

आता सरपंच पदासाठी थेट निवडणूक होणार असल्याने १७१ ग्रामपंचायतींमध्ये सरपंच पदासाठी एकूण ६४२ अर्ज प्राप्त झाले आहेत. सिन्नरमधून ४, पेठ ६, निफाड १२८, कळवण ५५, बागलाण १५४, येवला ३१, इगतपुरी ९, नाशिक १०, दिंडोरी २२, मालेगाव ४५, त्र्यंबकेश्वर ४, चांदवडमधून सर्वाधिक १७४ अर्ज प्राप्त झाले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दर शनिवारी येणार महिला पोलिसांचे ‘राज्य’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरातील १३ पोलिस स्टेशनमध्ये दर शनिवारी महिलाराज पाहण्यास मिळणार आहे. पोलिसांच्या मुख्य कामापासून दूर असलेल्या महिला पोलिसांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे.

पोलिस दलात ३० टक्के महिलांना आरक्षण असून, त्याची अंमलबजावणी अनेक वर्षांपासून केली जाते. पोलिस दलात महिला भरती होते. ट्रेनिंग झाली, की वायरलेस अथवा एखादे दुय्यम काम स्वीकारून दिवस काढण्यावर भर दिला जातो. महिला पोलिस काही ना काही कारणामुळे मूळ कामात सहभागी होत नाहीत. या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. याबाबत बोलताना पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी सांगितले, की शहर पोलिस दलातील ३० टक्के कर्मचारी मुख्य कामापासून दूर राहिल्याचा फटका बसतो. काही महिला पोलिस कर्मचारी मात्र जबाबदारी देण्याची सतत मागणी करतात. त्यांची इच्छा आहे. मात्र, त्यांनी यापूर्वी असे कामच केले नसल्याने अडचणी निर्माण होतात. पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक अथवा पीएसआय दर्जाच्या अधिकाऱ्यांना कामगिरी सोपवल्या जातात. इतर कर्मचारी मात्र दूर राहतात. या सर्व बाबींचा विचार करून दर शनिवारी शहरातील सर्वच पोलिस स्टेशनमध्ये महिला पोलिसांकडे वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपवण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्तांनी स्पष्ट केले. स्टेशन डायरी लिहिणे, रायटर म्हणून काम पाहणे, तपासात सहभागी होणे अशी वेगवेगळ्या स्वरूपाची कामे महिला पोलिसांकडे देण्यात येणार आहेत. कामाची विभागणी योग्य रीतीने झाल्याचा फायदाही सर्वांना होऊ शकतो, असे सिंगल यांनी सांगितले. ही मोठी प्रक्रिया असून, आपणही मुख्य प्रवाहातील कामे करू शकतो, असा विश्वास महिला कर्मचाऱ्यांमध्ये यानिमित्ताने येऊ शकतो. दर शनिवारी मिळणाऱ्या कामाच्या अनुभवाचा फायदा हळूहळू नवीन महिला कर्मचाऱ्यांमध्येही दिसून येईल. शेवटी सर्वच महिला कर्मचाऱ्यांना फक्त वायरलेस विभागात नियुक्त करणे शक्य नाही, असे सिंगल यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सप्तशृंगगडावर चैतन्यपर्व

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्यदैवत व अर्धे शक्तिपीठ असलेल्या श्री सप्तशृंग देवी गडावर रविवारच्या सुटीची पर्वणी साधत लाखावर भाविक भगवतीच्या चरणी लीन झाले. गडाला जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले असून, पहिल्या पायरीपासून बाऱ्या लागल्या होत्या.

रविवारी मुंबई येथील न्यायाधीश मृदुला भाटकर, सिनेकलाकार रमेश भाटकर, देवस्थानचे विश्वस्त अविनाश भिडे, विश्वस्त डॉ रावसाहेब शिंदे, सुनील बागुल यांनी सपत्निक, तसेच महंत संविदानंद सरस्वती यांनी महापूजा केली. देवस्थानचे व्यवस्थापक सुदर्शन दहातोंडे, कार्यकारी अधिकारी भगवान नेरकर आदींनी मान्यवरांचे स्वागत केले. देवस्थान व ग्रामपंचायतीमार्फत स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे, तसेच प्लास्टिकमुक्त गड करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राजेश गवळी, संदीप बेनके, गिरीश गवळी आदी त्यासाठी प्रयत्नशील आहेत. नांदुरी येथे वाहनतळ असून, या ठिकाणी मोठ्या वाहनांची वर्दळ दिसून आली. गडावर जाण्यासाठी एसटी बसेसची सोय करण्यात आलेली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘निष्ठावान शिक्षकांची समाजाला गरज’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

चांगला नागरिक व व्यावसायिक घडविण्यासाठी त्या ताकदीच्या, मेहनतीच्या व तळमळीच्या शिक्षकांची आज समाजाला गरज आहे, असे प्रतिपादन व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे मुंबई विभागाचे उपसंचालक बी. आर. शिंपले यांनी केले.

नाशिकमधील ई-नॉलेज एज्युकेशन या संस्थेच्या वतीने सीएमसीएस कॉलेज सभागृहात ‘जेईई व नीट परीक्षा’ या विषयावर मोफत मार्गदर्शन कार्यशाळा झाली. त्या वेळी ते बोलत होते. कार्यशाळेचे उद््घाटन शिंपले यांच्या हस्ते झाले.

के. व्ही. एन. नाईक ज्युनिअर कॉलेजचे उपप्राचार्य कैलास गिते, ई- नॉलेज एज्युकेशनचे संचालक नीलेश खर्डे, बंगळुरूचे मोटिव्हेशनल स्पीकर बेंजामिन नाडर, मुंबईचे समुपदेशक उमेश माळेकर, सहसंचालक, लेखा व कोशागार कार्यालयाचे अधीक्षक बी. एन. पगार आदी प्रमुख पाहुणे होते.

शिंपले म्हणाले, की स्पर्धेच्या युगात विद्यार्थ्यांना आव्हान पेलताना जो शिक्षकांचा पाठिंबा लागतो, तो आजच्या घडीला कुठे तरी कमी झाला आहे, असे खेदाने नमूद करावे लागते. तेव्हा शिक्षकांची भूमिका पालकांनी पार पाडावी. पालकांनी पाल्याच्या यशाबरोबर त्यांच्या अपयशातही त्याला खंबीर साथ दिली पाहिजे.

प्रा. कैलास गिते म्हणाले, की शिक्षक हे ऋषीचे रूप आहेत. शिक्षकांनी केवळ पैशांसाठीच काम न करता विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी काम करायला हवे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या काळात सातवा वेतन आयोग नव्हता, तरीही त्यांनी पदरमोड करून शिक्षण प्रसारासारखे पवित्र काम केले.

बेंजामिन नाडर यांनी प्रेरणादायी मार्गदर्शन केले. ‘क्लिअरस’ या फोर्थ जनरेशन एज्युकेशन प्रोग्रामबाबतही विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती दिली. समुपदेशक उमेश माळेकर यांनी या वेळी देशपातळीवर घेण्यात येणाऱ्या विविध प्रवेश परीक्षांविषयी ‘जाणीव-जागृती व परिचय’ या विषयावर मार्गदर्शन केले. ई- नॉलेज एज्युकेशनचे दिनेश भंदुरे, अभय भालेराव व रोशलीन मोसेस यांनी संयोजन केले. निलेश तिवारी यांनी सूत्रसंचालन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णसेवा हाच धर्म

0
0

नाशिकच्या नवदुर्गा - चंद्रकला चव्हाण


रुग्णसेवा हाच धर्म


नोकरी करायची म्हणून वृत्तपत्रातील जाहिरात बघून नर्सिंग क्षेत्राकडे वळलेल्या चंद्रकला चव्हाण यांनी सेवाभावी वृत्तीने रुग्णसेवेलाच आपला धर्म बनवला. चोवीस तास काम, आठ-दहा किलोमीटरचा पायी प्रवास, ऊन-पावसाची आव्हाने झेलत त्यांनी आपली सेवा कोणत्याही तक्रारीविना चोख बजावली. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ या सेवेत स्वतःला वाहून घेतलेल्या चंद्रकला चव्हाण यांच्या कार्याचा सन्मान म्हणून यावर्षी ‘फ्लोरेन्स नाइटिंगल’ या अतिशय प्रतिष्ठेच्या पुरस्काराने त्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते गौरविण्यात आले आहे.

चंद्रकला चव्हाण या मूळच्या नाशिक जिल्ह्यात दिंडोरी तालुक्यात असलेल्या मोहाडी गावातील. गरीब कुटुंबात जन्मलेल्या चंद्रकला यांच्यासह घरात ९ भावंडे. अतिशय हलाखीच्या परिस्थितीत त्यांचे बालपण गेले. दिव्याच्या प्रकाशावर अभ्यास करून त्यांनी स्वतःच्या शिक्षणाला दिशा दिली. दहावीनंतर नोकरीचा शोध सुरू केला. एका हितचिंतकाकडून नर्सिंग प्रशिक्षणाची जाहिरात आल्याचे त्यांना समजले. क्षेत्राबाबत लोकांचा दृष्ट‌िकोन फारसा बरा नसल्याने वडिलांनी या नोकरीला विरोध केला. परंतु, आईच्या पाठिंब्यामुळे त्यांना प्रशिक्षणाला जायची संधी मिळाली आणि पुढे आयुष्यभर त्यांनी या संधीचे प्रामाणिकपणे सोने केले. जुलै १९८३ साली प्रशिक्षणापासून सुरू झालेला नर्सिंगचा हा प्रवास पुढे नोकरीतून आजतागायत सुरू आहे.

दिवसातील मोठा कालावधी या नोकरीसाठी खर्ची होत असल्याने स्वतःच्या पोटच्या मुलीकडे लक्ष देणेही त्यांना कठीण झाले होते. अशावेळी चव्हाण यांनी हृदयावर दगड ठेवून चार महिन्याच्या मुलीला आईकडे ठेवले आणि नोकरीप्रती असलेली श्रद्धा दाखवून दिली. त्यांच्या ३२ वर्षांच्या सेवेत त्यांनी कित्येक बाळंतपणे केली. मातामृत्यू, बालमृत्यू रोखण्यासाठी प्रयत्न, कुटूंबकल्याणासारख्या शस्त्रक्रिया डॉक्टरांसमवेत केल्या आहेत. वेळप्रसंगी स्वतःही योग्य उपचार करुन रुग्णांना त्यांनी दिलासा दिला आहे.

आदिवासी वस्तीत काम करत असताना भाषेचा येणारा अडथळा, आरोग्याविषयीची माहिती त्यांना समजावून सांगण्यासाठी होत असलेली कसरत याचा सामना करत त्यांनी आरोग्यविषयक प्रबोधन केले. अंगणवाडी सेविकांच्या मदतीने भाषेचा अडसर दूर करत त्यांनी ही सेवा सुरू ठेवली आहे. आजही अनेक भागांमध्ये मुलगा-मुलगी भेदभाव मानला जातो. वंशाचा दिवा मुलगाच हवा, असे चित्र बघायला मिळते. हे चित्र बदलण्याची गरज त्या व्यक्त करतात.

पुरस्कारातून कार्याचा सन्मान

१२ मे २०१७ रोजी राष्ट्रपती भवनात राष्ट्रपतींच्या हस्ते चंद्रकला चव्हाण यांचा ‘फ्लोरेन्स नाइटिंगल’ या प्रतिष्ठेच्या पुरस्काराने सन्मान करण्यात आला. अनोळखी फोन नंबर दिसल्याने किती वेळ फोनच उचलला नाही. त्यानंतर घरी फोन करुन राष्ट्रपती पुरस्कारासाठी निवड झाल्याचे सांगण्यात आले. त्यावेळी आनंद गगनात मावेनासा झाल्याची आठवण त्या सांगतात. या पुरस्कारातून कार्याचा सन्मान केल्याची भावना त्या व्यक्त करतात.

(शब्दांकन – अश्विनी कावळे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चला, बनूया कल्चर क्लब सदस्य

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब म्हणजे नाशिककरांना मनोरंजनाच्या जगात नेणारा सर्वांचा खास सोबती. फक्त चित्रपट, नाटकांपर्यंत मर्यादित न ठेवता अनेकांना अवघ्या कलाजगताची सफर घडवून आणणारा कल्चर क्लब हा सोबती सदस्यांना मिळाला असून, ही सोबत आणखी रंगतदार बनविण्यासाठी आजच महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मध्ये सहभागी व्हा, असे आवाहन करण्यात आले आहे.

नवरात्रीनिमित्त कल्चर क्लबचे सदस्य होण्यासाठी खास ऑफर देण्यात येत आहे. फक्त १९९ रुपयांमध्ये कल्चर क्लबचे सदस्य हाेऊन वर्षभर विविध कलात्मक, सांगीतिक कार्यक्रमांचा आनंद लुटता येईल. कल्चर क्लबतर्फे वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नाटक, सांगीतिक कार्यक्रम, हॅप्पी स्ट्रीट्स, श्रावण क्वीन असो किंवा झुम्बा डान्स, खाऊचा डबा, गेट टुगेदर असे विविध कार्यक्रम याअंतर्गत आयोजित केले जातात. यंदाही कल्चर क्लब सदस्यांसाठी लाइव्ह म्युझिकल कॉन्सर्ट, टेन्शन खल्लास कार्यक्रम, किट्टी पार्टी, गानतंत्र स्पर्धा, सिनेतारकांची भेट, किड्स कार्निव्हल, मोदक मेकिंग कॉम्पिटिशन, चित्रकला स्पर्धा, मँगो फेस्टिवल, नवरंग नवरात्रीचे, एज्युकेशनल सेमिनार, क्वीझ कॉन्टेस्ट, संगीत मैफली, ख्रिसमस कार्निव्हल, कलासंगम अशा विविध कार्यक्रमांचा आस्वाद कल्चर क्लब सदस्यांना वर्षभर घेता येणार आहे. तसेच सर्वांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी मटा कल्चर क्लब व्यासपीठही उपलब्ध करून देणार आहे.

नाटकांसारख्या कार्यक्रमांनाही मटा कल्चर क्लबकडून सदस्यांना विशेष सवलत देण्यात येते. अशा विविध कार्यक्रमात सहभागी व्हायचे असेल, तर आजच मटा कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि मनोरंजन जगताची सफर करण्यासाठी तयार व्हा. माहितीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड या पत्त्यावर किंवा (०२५३) ६६३७९८७, ९५५२५६६८४२ या क्रमांकांवर संपर्क करा, असे आवाहन करण्यात आले आहे.

--


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub

टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub

टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वर्षभरात राज्यात एक लाख सायकलिस्ट

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

पुढील वर्षभरात महाराष्ट्राला देशातील सर्वाधिक सायकलिस्ट असलेले राज्य बनविण्याचा निर्धार महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड यांनी रविवारी नाशिकमध्ये व्यक्त केला. राज्यातील सायकलिस्टची संख्या २७ सप्टेंबर २०१८ पर्यंत एक लाखाहून अधिक असेल अशी ग्वाही देखील त्यांनी यावेळी दिली.

एमटीडीसी आणि नाशिक सायकलिस्ट्स फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘इंडियन सायकल डे’ चे औचित्य साधून नाशिक ते मुंबई सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबतच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राठोड नाशिकमध्ये आले होते. यावेळी एमटीडीसीचे वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक नितीनकुमार मुंडावरे, सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांसह अनेकजण उपस्थ‌ित होते. यावेळी ते म्हणाले, पर्यावरण संवधर्नाला हातभार लावणाऱ्या सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी एमटीडीसी कट‌िबद्ध आहे. सायकल‌िंग करणारे राज्यात एक लाख सदस्य तयार करण्याचे आमचे उद्द‌िष्ट आहे. त्यासाठी आम्ही नियोजनबद्ध कार्यक्रम आखला आहे. २७ सप्टेंबर २०१८ पर्यंत आम्हाला हे उद्द‌िष्ट पूर्ण करावयाचे आहे. एक लाख नोंदणीकृत सायकलिस्ट असलेले महाराष्ट्र हे भारतातील एकमेव राज्य असेल असा विश्वास यावेळी राठोड यांनी व्यक्त केला. नाशिक हे सायकल‌िंगच्या बाबतीत देशाची राजधानी व्हायला हवी, अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

भंडारदऱ्यात सर्वाधिक लांबीचा सायकल ट्रॅक

देशातील सर्वाधिक ६४ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक भंडारदार येथे विकसित करण्यात येणार आहे. बायोडायर्व्हसिटी (जैव विविधता) असलेला हा ट्रॅक नोव्हेंबर २०१८ पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती राठोड यांनी दिली. या ट्रॅकवरून भंडारदऱ्याच्या निसर्गरम्य परिसराला फेरी मारता येईल. मुंबईत मुलुंड ते धारावी आणि घाटकोपर ते सायन या मार्गांवर ३९ किलोमीटरचे सायकल ट्रॅक उभारण्यात येणार असल्याची घोषणाही यावेळी करण्यात आली. राज्यात जेवढी महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत, तेथे सायकलिंगसाठी सायकल्स उपलब्ध करून देण्याचा एमटीडीसीचा प्रयत्न असल्याची माहिती राठोड यांनी दिली. पर्यटकांनी पर्यटनस्थळी सायकल चालविली की ते आपापल्या परिसरातही सायकल चालविण्यासाठी प्रेरीत होतात असे ते म्हणाले.

डिसेंबरमध्ये दूर द‌ि सह्याद्री

‘टूर दी‌ फ्रान्स’च्याच धर्तीवर नाशिकमध्ये ‘टूर दी सह्याद्री’ हा उपक्रम राबविण्याचा निर्णय एमटीडीसीने घेतला आहे. इगतपुरीहून या स्पर्धेला सुरुवात होईल. पहिल्या टप्प्यात भंडारदरा, भीमांशकरपर्यंत या स्पर्धेचा पायलट प्रोजेक्ट राबविला जाईल. त्यानंतर कोकणापर्यंत ही स्पर्धा आयोजिली जाणार आहे.


रिंगरोडवर सायकल ट्रॅक करा

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

शहरात अनेक रिंग रोड विकसित करण्यात आले आहेत. सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी या प्रत्येक रस्त्यावर चार फुटांपर्यंतचा सायकल ट्रॅक तयार करावा, अशी मागणी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे सहसंचालक आशुतोष राठोड यांच्याकडे केली आहे.

याबाबतचा सव‌िस्तर प्रस्ताव आपल्याकडे पाठवावा. महापालिका आयुक्तांशी चर्चा करून ही मागणी तडीस नेली जाईल अशी ग्वाही राठोड यांनी दिली आहे. सायकल‌िंगला प्रोत्साहन मिळावे यासाठी नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशन विविध उपक्रमांद्वारे प्रयत्न करीत आहे. सायकलिंग वाढावे यासाठी तशा पायाभूत सुविधा देखील उपलब्ध व्हायला हव्यात अशी फाऊंडेशनची मागणी आहे. शहरात गेल्या काही वर्षांत अनेक रिंगरोड विकसित करण्यात आले आहेत. हे रस्ते खूप चांगल्या प्रतीचे असले तरी त्यांवर अजून तेवढी वर्दळ नसते. या रस्त्यांवरील चार फुटांचा भाग सायकल ट्रॅक म्हणून विकसित करावा, अशी मागणी फाऊंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी राठोड यांच्याकडे केली. सायकलचा वापर करणाऱ्या कामगार वर्गासह सायकलप्रेमींसाठी हा सायकल ट्रॅक उपयुक्त ठरेल अशी माहितीही राठोड यांना देण्यात आली. ही संकल्पना खूप चांगली असून, महापालिका आयुक्तांशी चर्चा करून ही मागणी तडीस नेली जाईल अशी ग्वाही राठोड यांनी दिली. नाशिक-त्र्यंबकेश्वर सायकल ट्रॅकचाही‌ प्रस्ताव सादर करावा. तो देखील पुढील वर्षभरात कार्यान्वित केला जाईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

१ ऑक्टोबरला नाशिक–मुंबई रॅली

महात्मा गांधी जयंतीदिनी इंडियन सायकल डे साजरा केला जातो. यानिमित्त १ ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता गोल्फ क्लब मैदान येथून सायकल रॅलीला हिरवा कंदील दाखविण्यात येणार आहे. २ ऑक्टोबरला सकाळी अकराच्या सुमारास ही रॅली मुबंईत ‘गेट वे ऑफ इंडिया’ला पोहोचेल. घोटी, कसारा, शहापूर, घाटकोपर, दादर, भायखळा असा या रॅलीचा मार्ग असेल. ‘स्वच्छ भारत हरित भारत’ हा संदेश या रॅलीमध्ये सहभागी १०० हून अधिक सायकलिस्ट देतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी १०० खाटांचे स्त्री रुग्णालय

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मालेगाव जुने ग्रामीण रुग्णालय येथे आता १०० खाटांचे स्त्री रुग्णालय होणार असून, त्यासाठी राज्य सरकारने २ कोटी ४७ लाख ९७ हजार ९५१ रुपये दुरुस्ती खर्चाला प्रशासकीय मान्यता दिली आहे. यात मुख्य इमारत व ओपीडी दुरुस्ती, इलेक्ट्रिक कामे, कंपाऊंड वॉल, अंतर्गत रस्ते, यासारख्या विकासकामांचा समावेश आहे.

मालेगाव मध्ये या अगोदर सामान्य रुग्णालय हे २०० खाटांचे बांधण्यात आले. त्यानंतर आता स्त्री रुग्णालयाच्या १०० खाटांची भर पडणार आहे. मालेगावच्या रुग्णांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी शासकीय रुग्णालयांची मोठी गरज असल्यामुळे शासनाने हे पाऊल उचलले आहे. गेल्या कित्येक वर्षापासून या रुग्णालयाची दुरुस्ती व स्त्री रुग्णालय सुरु करण्याची मागणी होती.

मालेगाव शहर व तालुक्यातील महिला व बालकांना तत्काळ व सर्व सुविधायुक्त उपचार मिळण्यासाठी सटाणारोडवरील जुने ग्रामीण रुग्णालयात शंभर खाटांचे महिला रुग्णालय व्हावे. तसेच त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर व्हावा यासाठी अनेकदा लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केले होते. त्यानंतर १०० खाटांचे हे स्त्री रुग्णालय मंजूर झाल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'संतांची शिकवणूक देते जवानांना बळ'‍

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

देशाच्या सीमेवर डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणाऱ्या जवानांना संतांच्या शिकवणुकीतून आशिर्वादासह बळ मिळते, असे प्रतिपादन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. ते श्री स्वामी समर्थ गुरूकुलपीठ येथे झालेल्या दुर्गा सप्तशती पाठ कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

याप्रसंगी व्यासपीठावर अण्णासाहेब मोरे, आमदार सीमा हिरे, नगराध्यक्षा तृप्ती धारणे, डॉ. प्रशांत पाटील, राजाराम पानगव्हाणे उपस्थित होते.

आजाराने कुटुंब अडचणीत येत असतात. ८० टक्के आजार हे अस्वच्छतेने होत असतात, हे आपण एक डॉक्टर म्हणून सांगत असल्याचे डॉ. भामरेंनी बोलताना सांगितले. सर्वांनी आपले घर आणि परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहनही संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरेंनी यावेळी केले. राज्यात स्वच्छतेचा संदेश पोहचत असून, गावोगावी सेवेकरी यात सहभागी होऊन स्वच्छता किती महत्त्वाची आहे, याबाबत जागर करीत आहेत, अशी माहिती अण्णासाहेब मोरेंनी यावेळी ‌दिली.


स्वच्छतेचा जागर

याप्रसंगी संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे आणि अण्णासाहेब मोरे यांच्यासह सेवेकऱ्यांनी हातात झाडू घेत परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. या मोहिमेत त्र्यंबक नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. चेतना केरूरे, आरोग्य अधिकारी हिरामण ठाकरे, शहर अभियंता रमेश कांगणे सहभागी झाले होते. याप्रसंगी स्वच्छता मोहिमेद्वारे नागरिकांना स्वच्छतेचा संदेश देण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेणुकामातेच्या दर्शनाने रविवार सत्कारणी

0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

देवळाली कॅम्प येथील रेस्ट कॅम्परोडवरील भगूरची देवी म्हणून प्रसिद्ध असलेल्या रेणुकामातेच्या मंदिराचे प्रांगण नवरात्रोत्सवानिमित्त भाविकांच्या गर्दीने फुलले आहे. जिल्हाभरातील लाखभर भाविकांनी रविवारच्या सुटीचे औचित्य साधत देवीचे दर्शन घेतले.

पुरातन काळी भृगू ऋषींची तपोभूमी असलेला हा भाग देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत येतो. भगूरपासून अवघ्या अर्ध्या मैलावर असल्यामुळे या जागृत देवी मंदिराला पूर्वीपासून भगूरची देवी म्हणतात. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या नवरात्रोत्सवामुळे भाविकांचा पहाटेच्या व सायंकाळच्या आरतीला ओघ वाढत आहे. रविवारच्या सुटीमुळे जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गर्दी उसळली होती. मंदिर व्यवस्थपनाने भाविकांच्या दर्शनासाठी दर्शनबारी तयार केल्यामुळे भाविकांना दर्शन घेणे सुलभ झाले. मंदिरात घटी बसलेल्या महिला भाविकांना मंदिराच्या मागे असलेल्या एका मोठ्या खोलीमध्ये राहण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे.

--

बारवेवर स्नानासाठी गर्दी

देवी मंदिरासमोर असलेल्या प्राचीन बारवेवर स्नान करण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळत आहे. या बारवेत पाण्याचा जिवंत झरा आहे. त्यामुळे बारवेतील पाणी उपसल्याबरोबर नवीन ताज्या पाण्याने बारव त्वरित भरते. पाणी बऱ्यापैकी स्वच्छ दिसते. येथील पाण्याने विविध प्रकारेच त्वचारोग बरे होतात, अशी भाविकांची श्रद्धा आहे. त्यामुळे राज्यभरातून येथे भाविक येतात. याच ठिकाणी पूजा साहित्य व बारवेवर, तसेच देवीला वाहण्यासाठी हार, नारळ, अगरबत्ती आदी पूजा साहित्याची दुकाने थाटण्यात आलेली आहेत.

--

यात्रोत्सवाने वाढविली रंगत

देवी मंदिराच्या समोर असलेल्या खासगी जागेत व कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ताब्यात असलेल्या जागेवर यात्रा भरली असून, त्यात अनेक प्रकारची खाण्या-पिण्याची, घरगुती वस्तू, महिलांचे विविध साहित्य, लहान मुलांसाठी खेळणी व पावभाजी, तसेच खाऊची दुकाने थाटण्यात आली अाहेत. खरेदी व पेटपूजा करण्यासाठी भाविकांची दिवसभर रीघ लागलेली दिसते. सायंकाळी येथे ब्रेक डान्स, रहाटपाळणा, जॉइंट व्हील, मौतका कुँअा अादींचा आनंद बच्चेकंपनीसह भाविक लुटत आहेत. कॅन्टोन्मेंट प्रशासनाच्या वतीने रेस्ट कॅम्प रोडवर पे अॅण्ड पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

--

१९ सीसीटीव्हींद्वारे नजर

पोलिस प्रशासनाकडून मंदिर व परिसरातील हालचालींवर १९ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवण्यात येत अाहे.परिसरात वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुभाष डौले यांच्यासह पाच पोलिस अधिकारी, १७ कॉन्स्टेबल, ४ महिला कॉन्स्टेबल, ४० होमगार्ड (पुरुष), २० महिला होमगार्ड असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सार्वजनिक वाहतुकीचा कोंडला श्वास

0
0

नाशिक : शहर बससेवा ही सोन्याचे अंडी देणारी कोंबडी समजून पालिकेच्याही शंभर बस गिळंकृत करणाऱ्या एसटी महामंडळाने एप्रिलपासून बससेवा परवडत नसल्याचे सांगत महापालिकेसह नागरिक, विद्यार्थ्यांना वेठीस धरण्याचे काम सुरू केले आहे. शहरातील पाच प्रमुख रस्त्यांवरच बससेवा चालविण्यास रस दाखवणाऱ्या महामंडळाने आता अवजड बससेवेचे घोंगडे आर्थिक दुष्ट्या दुर्बल झालेल्या पालिकेच्या अंगावर झटकण्यास सुरुवात केल्याने स्मार्ट शहराची परवड होतेय.

सध्याच्या लोकसंख्येनुसार शहराला सातशे बससेची आवश्यकता असताना महामंडळाकडून केवळ १२९ बसेस चालविल्या जात असल्याने सार्वजनिक वाहतूक सेवा पूर्णतः मोडकळीस आली आहे. महामंडळांने हळूहळू बससेवा गुंडाळण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या स्थापनेपासूनच शहरातील सार्वजनिक वाहतूक सेवा ही एसटी महामंडळाकडून चालवली जात आहे. बससेवा जणू आपल्यासाठी सोन्याचे अंडी देणारी कोंबडीच समजून महामंडळाने सुरुवातीपासूनच ही बससेवा आपल्याकडे राहील याची पुरेपूर व्यवस्था केली. महामंडळाला नाशिकरोड-शाल‌िमार, नाशिकरोड-पंचवटी, नाशिकरोड-सातपूर, नाशिकरोड- अंबड, नाशिकरोड-पेठरोड या पाच मार्गांवर भरघोस पैसा मिळत असल्याने हळूहळू महामंडळाने शहरात पाय पसरला. परंतु, सन २०१० मध्ये महापालिकेने जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत शंभर बसेस खरेदी केल्यानंतर बससेवा सुरू करण्याकडे पाऊल उचलले. महामंडळ आणि महापालिकेने त्यावेळी सामजंस्य करार करत बससेवा महामंडळाकडे ठेवण्याचा निर्णय घेतला. महापालिकेच्या शंभर बसेसही आपल्या ताब्यात घेतल्या. त्यामुळे महामंडळ नाशिक शहरात चांगली सेवा देईल, अशी महापालिकेला अपेक्षा होती. परंतु, सहा-सात वर्षांतच ही अपेक्षा आता फोल ठरली आहे.

नाशिकचे नागरिकरण झपाट्याने होत असून, शहराने आजूबाजूच्या २५ खेड्यांनाही आता कवेत घेतले आहे. सातपूर, अंबड या दोन मोठ्या एमआयडीसी, शहराच्या आजबाजूला उभ्या राहिलेल्या मोठ-मोठ्या शिक्षणसंस्था आणि दोन विद्यापीठांमुळे शहराने आता अवाढव्य स्वरूप घेतले आहे. नाशिकच्या लोकसंख्येने आता २० लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या शहरात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होण्याची गरज असतानाच महामंडळाने तोटा वाढल्याचे सांगत सहा महिन्यांपासून आपला विस्तार कमी करण्यास सुरुवात केली आहे. महामंडळाकडून शहरात यापूर्वी २४३ बसेस चालविल्या जात होत्या. परंतु, ४ जानेवारी २०१७ रोजी महामंडळाने पालिकेला पत्र देऊन महामंडळाला १०८ कोटींचा तोटा झाल्याचे सांगत एकतर तोटा भरा अन्यथा बससेवा ताब्यात घेण्याचा इशारा दिला. परंतु, निवडणुकांमुळे पालिकेने याकडे फारसे गांभीर्याने बघितले नसल्याने महामंडळाने सहा महिन्यांत तब्बल ११४ बसेस कमी केल्याने शहराच्या वाहतुकीची पुरती कोंडी झाली आहे.


२० लाख लोकांसाठी १२९ बस

शहराची सध्याची लोकसंख्या ही २० लाखांच्या वर गेली असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेंतर्गत सध्या ६९८ सिटी बसेसची गरज आहे. त्यासंदर्भातील अहवालच अर्बन मास ट्रान्झिट कंपनीने दिला आहे. परंतु, महामंडळाकडून बसेस वाढवण्याऐवजी घटवण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचे तीन तेरा वाजले असून मुख्य रस्ते, बाजारपेठा, शैक्षणिक संस्था या खासगी वाहनांनीच अधिक भरत असल्याचे चित्र आहे. .


५० टक्के रस्ते बसविना

शहरातील सध्याच्या दोन हजार किलोमीटर रस्त्याच्या जाळ्यापैकी निम्मे म्हणजे ५० टक्के रस्त्यांवर बसच धावत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. यूएमटीसीच्या अहवालानुसार शहरातील फक्त २ टक्के रस्त्यांवरच सर्वाधिक बसफेऱ्या केल्या जात आहेत. शहरातील २५ टक्के रस्त्यांवर दिवसातून दोन ते तीन वेळाच बस धावत आहेत. त्यामुळे नागरिकांकडून खासगी वाहनांचा वापर सर्वाधिक होत असून, रिक्षाचालकांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे शहर वाहतुकीचा कोंडमारा होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images