Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

पालिकेवर सल्लागारांचे राज्य

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गळतीमुळे आता पालिकेवर खासगी सल्लागारांचे राज्य येताना दिसत आहे. प्रशासनाने सध्या शहर विकासाच्या नावाखाली विविध खासगी संस्थांना पालिकेत आवतन देत, सल्लागार नियुक्तीची परंपरा सुरू केली आहे. शहरातील मोकळ्या भूखंडांच्या विकासासाठी आता ठाणे महापालिकेच्या धर्तीवर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर भूखंड विकासाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. भूखंडांच्या निवडीसाठी सल्लागार संस्थांच्या नियुक्तीचा प्रस्ताव प्रशासनाकडून स्थायीवर ठेवण्यात आला आहे. परंतु, वारंवार येणाऱ्या सल्लागार संस्थांबाबत स्थायीकडून ब्रेक लावला जाण्याची शक्यता आहे.

जकातीपाठोपाठ एलबीटी रद्द होऊन थेट अनुदान देण्याची पद्धत सुरू झाल्याने महापालिकेच्या उत्पन्नावर मर्यादा आल्या आहेत. त्यामुळे उत्पन्न वाढीसाठी बजेटमध्येच पालिकेच्या मोकळ्या भूखंडांचा विकास पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप व ‘बांधा, वापरा व हस्तांतरीत करा’ या तत्वावर करण्याचा समावेश आहे. पालिकेला या जागांचा विकास करणे आर्थिक दृष्ट्या परवडणारे नाही. त्यामुळे आता पीपीपी तत्वावर या भूखंडांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या कामासाठी सल्लागार कंपनी नियुक्त केली जाणार आहे. बांधकाम विभागाने त्यासाठी निविदा प्रक्रिया राबिविली होती. त्यात पाच निविदा धारकांना निवडण्यात आले आहे.

बहु झाले सल्लागार

महापालिकेकडे सक्षम अधिकारी व अभियंत्याची फौज असतानाही, सध्या पालिकेचा भरवसा मात्र सल्लागार संस्थांवर वाढला आहे. यापूर्वी स्मार्ट सिटी कंपनीसाठी प्रोजेक्‍ट मॅनेजमेंट कन्सल्टटंट, स्वच्छता अभियानासाठी सर्व्हेअर, पाणी गळती थांबविण्यासाठी नियुक्त केलेली स्काडा कंपनी, घरकुल योजना, मालमत्ता सर्व्हेक्षण, वाहतूक आराखडा, पार्किंग, एसटीपी सर्व्हेक्षण व स्ट्रीट डिझाइनसाठी सल्लागार संस्था नियुक्त केली आहे. आता भूखंड विकास कार्यक्रमासाठी पुन्हा सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

असा देणार मोबदला

२५ कोटी रुपयांपर्यंत प्रकल्पाची किंमत असेल तर सल्लागार कंपनीला ०.७५ टक्के मोबदला दिला जाणार आहे. २५ ते ५० कोटी रुपयांच्या कामासाठी ०.६० टक्के, ५० ते ७५ कोटी रुपयांसाठी ०.५० टक्के, ७५ ते १०० कोटी रुपयांचा प्रकल्प असेल तर ०.४० टक्के व शंभर कोटी रुपयांच्या वर प्रकल्पाची किंमत असेल तर ०.२५ टक्के मोबदला सल्लागार संस्थेला दिला जाणार आहे.

या भूखंडांचा समावेश

फाळके स्मारक, ट्रक टर्मिनस, जुने पंचवटी विभागीय कार्यालय, निलगिरी बाग, यशवंत मंडई, महात्मा फुले मार्केट, शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन, नाशिकरोड येथील टाऊन हॉल व सुभाष मार्केट, सिडको, मोरवाडी येथील मलजल शुध्द‌िकरण प्रकल्पाच्या जागेचा यात समावेश आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पेन्शनरांची आर्थ‌िक कोंडी थांबवा

$
0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

बँक खात्यामध्ये किमान पाच हजार रुपये शिल्लक ठेवणे एसबीआयने बंधनकारक केल्यामुळे पेन्शनरांची आर्थिक कोंडी होते आहे. अनेक पेन्शनरांना अवघी तीन हजार रुपये पेन्शन मिळत असताना पाच हजार शिल्लक कशी ठेवणार, असा सवाल पेन्शनरांनी शुक्रवारी उपस्थित केला. बँकेने जाचक अटी शिथिल कराव्यात, अशी मागणीही करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात शुक्रवारी जिल्हा निवृत्तिवेतनधारक संघटनेचा मेळावा झाला. जिल्हा लेखाधिकारी विलास गांगुर्डे, सहाय्यक लेखा अधिकारी शीतल महाले, संघटनेचे अध्यक्ष माधवराव भणगे यांच्यासह पेन्शनर्स उपस्थ‌ित होते. भणगे यांनी पेन्शनर्सची कैफियत मांडली. ते म्हणाले, की स्टेट बँकेने सक्ती केलेल्या शिल्लक रकमेचा मुद्दा गंभीर आहे. पीएफ पेन्शनरधारकांना २६०० ते ३१०० रुपये पेन्शन मिळते. स्टेट बँकेत पेन्शन जमा होणाऱ्या पेन्शनरांनी किमान पाच हजार रुपये शिल्लक नसेल तर दंड भरावा लागतो. हा पेन्शनरांवर अन्याय आहे. लेखा कोशागार विभागाने या विषयात लक्ष घालून स्टेट बँकेकडे भावना मांडाव्यात, तसेच जिल्हा परिषदेच्या निवृत्तिवेतन धारकांना वेळेवर पेन्शन मिळण्यात अडचणी येतात. त्या दूर कराव्यात, अशी मागणी करण्यात आली. महागाई भत्त्यात वाढ केल्यामुळे पेन्शनरांचीही पेन्शन वाढणार आहे, अशी माहिती गांगुर्डे यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

पिंपळगाव बसवंत ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रगती आणि परिवर्तन या दोन्ही पॅनलकडून रणशिंग फुंकले गेले आहेत. भास्कर बनकर यांच्या नेतृत्वाखालील प्रगती पॅनल तर दिलीप बनकर यांच्या परिवर्तन पॅनलचा प्रचाराला सुरुवात झाली आहे. दोन्ही पॅनलने येथील बाजार पेठेतील सिद्धिविनायकास विजयासाठी साकडे घातले. दोन्ही पॅनलने एकाच दिवशी प्रचाराचा धमाका उडविल्याने पहिल्याच दिवशी प्रचारात रंगत आली.

हुकूमशाही, दडपशाहीला लोक वैतागले

गत पंधरा वीस वर्षात पिंपळगाव बसवंत शहराच्या नावलौकीकास साजेसा विकास झालेला नाही. शहरातील रस्त्याची स्थिती अत्यंत वार्इट असून, मूलभूत सुविधा आजही सामान्य नागरिकांपर्यत पोहचलेल्या नाहीत. शहरात केवळ हुकूमशाही, दडपशाहीचे राजकारण झाले असल्याचे आपण सर्वजण साक्षिदार आहात. त्यामुळे हुकूमशाही राजवट हटवून पिंपळगाव शहराला भयमुक्त, स्वच्छ बनविण्यासाठी परिवर्तन पॅनलला पाठबळ द्या, असे आवहन परिवर्तन पॅनलचे प्रमुख दिलीप बनकर यांनी केले.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूम‌विर परिवर्तन पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी दिलीप बनकर बोलत होते. ज्येष्ठ नेते प्रतापराव मोरे, अशोक शहा, तानाजी बनकर, विश्वास मोरे, सुरेश खोडे उपस्थित होते.

दिलीप बनकर म्हणाले, पाच वर्ष आपण आमदार असताना शहरातील विस्तारीत १५ कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर करून आणली. विविध योजना शहरासाठी मंजूर करून घेतल्या. मात्र केवळ याचे श्रेय मला मिळेल म्हणून सत्ताधारी गटाने ग्रामपंचायतमार्फत प्रस्तावच पाठविले नाहीत.

सुरक्ष‌ति अन् स्वच्छ शहरासाठी कट‌बिद्ध

विकासाच्या मुद्द्यांवर ही निवडणूक मुद्द्यावर होत आहे. गत पंचवीस वर्षातील आपल्या कार्यकाळात विविध विकास कामांच्या माध्यमातून पिंपळगाव शहराला नवीन रंग रुप देण्याचा आपण प्रयत्न केला आहे. पुढील काळातही स्वच्छ, सुंदर पिंपळगाव शहर विकस‌ति करण्याचा आपला संकल्प असल्याचे भास्कर बनकर यांनी आश्वासन दिले.

प्रगती पॅनलच्या प्रचाराचा शुभारंभ येथील सिद्धिविनायक मंदिरात मविप्रचे माजी संचालक दिलीप मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. ज्येष्ठ नेते अॅड. शांताराम बनकर, पंढरीनाथ देशमाने, रावसाहेब मोरे, नुरचाचा शेख, नाना खडके, रामराव डेरे आदी मान्यवर उपस्थित होते. भास्कर बनकर म्हणाले, पालखेड धरणातून पाणीपुरवठा कार्यान्व‌ति करून शहराची पिण्याच्या गरज पूर्ण केली आहे. त्यामुळे दुष्काळातही शहराला नियमित पाणीपुरवठा करण्यात आला. याशिवाय शहरातील उपनगरे व आदिवासी झोपडपट्टी वस्तीत रस्ते, गटारी, पथदीप, उदयाने, अंगणवाडी आदी सुविधा दिल्या. पुढील काळातही स्वच्छ, सुंदर पिंपळगाव शहर विकस‌ति करण्याचा आपला संकल्प असल्याचे भास्कर बनकर म्हणाले. यावेळी दिलीप मोरे, चंद्रक्रांत खोडे, वैशाली बनकर, किरण लभडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अहो आश्चर्यम्! एनडीसीसी सभा शांततेत

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नोटाबंदी व कर्जमाफीमुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेची वार्षिक सर्वसाधारण सभा अवघ्या ४५ मिनिटांतच गुंडाळण्यात आली. अध्यक्षांच्या भाषणाविना झालेल्या या सभेत विद्यमान संचालकांपैकी अवघे सात संचालक, तर ९,६०० पैकी ३५० च्या आसपासच सभासद उपस्थित होते. सभासदांमध्ये खदखदणाऱ्या संतापामुळे ही सभा वादळी ठरेल, अशी चर्चा असताना ही सभा शांततेत पार पडल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

जुन्या सीबीएसजवळ बँकेच्या जुने केंद्र कार्यालयात सकाळी ११ वाजता झालेल्या सभेत सुरुवातीला मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी र. वा. बकाल यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रास्ताविक व कार्यक्रमपत्रिकेतील विषय वाचले. त्यानंतर एक-एक विषयांना सभासदांकडून संमती घेत सर्व विषयांना मंजुरी घेतली. सभेच्या सुरुवातीलाच विषयपत्रिकेच्या दहा विषयांना मंजुरी दिल्यामुळे सभेतील वादाचे विषय संपले. त्यानंतर कोणीही विरोध प्रकट न केल्यामुळे या सभेने इतिहासही घडवला. यानंतर बँकेचे सभासद बाबा करंजकर, पंडितराव काकड व बँकेचे संचालक शिरीष कोतवाल यांनी मनोगत व्यक्त केले. सभासदांना काही कळायच्या आतच या सभेचा समारोप कोतवाल यांनी केला.

संचालकांनी सोडला सुस्कारा

नेहमीच वादळी ठरणाऱ्या सभेत यंदा कोणताही वाद न झाल्यामुळे संचालकांनीही सुस्कारा सोडला. या वेळी आयत्या वेळचे कोणतेही विषय मांडण्यात आले नाहीत. बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेत गणपतराव पाटील, माजी आमदार शिरीष कोतवाल, किशोर दराडे, माणिकराव कोकाटे, परवेझ कोकणी, डॉ. शोभा बच्छाव या संचालकांसह माजी खासदार माधवराव पाटील उपस्थित होते.

बँकेच्या कारभारावरही चर्चा नाही

सीसीटीव्ही खरेदी, लोखंडी तिजोरी खरेदी, नोकरभरती यांसारख्या विषयांची चौकशी सुरू असताना बँकेच्या वार्षिक सभेत मात्र याबाबत कोणतीही चर्चा झाली नाही. त्याचप्रमाणे नोटाबंदी, नवीन कर्जवाटप न करणे, बँकेतून पैसे काढण्यासाठी होणाऱ्या त्रासाबद्दलही कोणी संताप व्यक्त केला नाही. बँकेविरुद्ध झालेले आंदोलनही या सभेत चर्चेत आले नाही.

वादळ न उठण्यामागे अनेक कारणे

नेहमीच वादळी होणाऱ्या सभेत बहुतांश सभासद आपले प्रश्न मांडत; पण कर्जमाफी मिळणार म्हणून ७५ टक्क्यांहून अधिक सभासद थकबाकीदार आहेत. त्याचप्रमाणे कर्जमाफीमुळे आता पैसे मिळणार असून, त्यात बँकेने अडचणी टाकू नयेत अशी अपेक्षाही आहे. याबरोबरच ३० सप्टेंबरपर्यंत सर्व संस्थांना वार्षिक सभा घेण्याचे निर्देश आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी शुक्रवारी सभा असल्यामुळे सभासदांची उपस्थिती घटली. मात्र, या शेतकरी सदस्यांबरोबरच नागरी बँका व विविध संस्थाही बँकेच्या सभासद आहेत. त्यांनीही आपले प्रश्न मांडले नाहीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्थचक्राला गती देणारी श्री सप्तशृंगनिवासिनी

$
0
0

विजय गोळेसर

--

श्री सप्तशृंगनिवासिनीदेवी म्हणजे उत्तर महाराष्ट्राला पडलेले एक गोड स्वप्न आहे. महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे प्रसिद्ध आहेत. कोल्हापूरची अंबाबाई, माहूरची रेणुकामाता, तुळजापूरची तुळजाभवानी आणि सप्तशृंगगडावर विसावलेली आई जगदंबा. श्री सप्तशृंगनिवासिनीची नाशिक जिल्ह्यावर विशेष कृपादृष्टी आहे. सर्व क्षेत्रांत नाशिक पुढे आहे, त्याचेही अधिष्ठान जगदंबा आहे...

--

महाराष्ट्रात देवीची साडेतीन पीठे प्रसिद्ध आहेत. देवी भागवतात या साडेतीन पीठांचा उल्लेख आहे तो असा-

कोल्हापूरं महास्थानं, यत्र लक्ष्मी सदास्थिता।

मातृ:पुरं द्वितीयंच, रेणुकाधिष्ठितं।

तुळजापूर तृतीयं स्थान, सप्तशृंग तथैवच।।

यातील सप्तशृंगनिवासिनी म्हणजे उत्तर महाराष्ट्रातील भाविकांची आवडती भगवती. नाशिकपासून ६५ किलोमीटरवर सप्तशृंगदेवीचे हे पवित्र स्थान आहे. गडाच्या पायथ्याशी नांदुरी हे गाव आहे. नांदुरी ते सप्तशृंगगड हा पक्का रस्ता अनेक वर्षांपासून तयार झालेला आहे. त्यामार्गे एसटी बसेस, तसेच खासगी वाहनांतून वर्षभर गडावर वाहतूक सुरू असते. नांदुरी येथून गडावर जाण्यासाठी जी पायवाट आहे तीदेखील सुस्थितीत आहे. धुळे, जळगाव, नाशिक, तसेच गुजरात राज्यातून येणारी वाहने नांदुरीला थांबतात. यात्रा काळात या सर्व गाड्यांसाठी मोठ्या वाहनतळाची व्यवस्था केली जाते. नांदुरीहून पायी, खासगी वाहनाने अथवा एसटीच्या मिनी बसने गडावर जाता येते.

गडाचा चढ चढून मध्यसपाटीवर आले, की सप्तशृंग हे टुमदार गाव लागते. गडावर पाणी भरपूर आहे. स्वच्छ पाण्याने भरलेली आणि काळ्या दगडांनी बांधलेली सरस्वती, लक्ष्मी, तांबुल, अंबाल्य, शीतल, कालिका, सूर्यकुंड व दत्तात्रेय कुंड अशी १०८ कुंडे गडावर आहेत. गावापासून शंभर मीटर अंतरावर सिद्धेश्वर महादेवाचे हेमाडपंती बांधणीचे मंदिर आहे. या मंदिराजवळ शिवालय नावाचे कुंड असून, त्याचा काही वर्षांपूर्वी जीर्णोद्धार करण्यात आला आहे.

गडापासून देवीपर्यंत जाण्यासाठी ४७२ पायऱ्यांचा दुसरा टप्पा चढून वर जावे लागते. पहिल्या पायरीजवळ नगारखाना व विश्वस्तांचे उपकार्यालय आहे. यंदा दीपमालेसाठी पहिल्या पायरीला तेल अर्पण करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

--

अशी आहे आख्यायिका

स्वयंभू शक्तिपीठ सप्तशृंगीच्या उत्पत्तीसंदर्भात श्रीसप्तशतीमध्ये उल्लेख आढळतो. त्यानुसार महिषासुराच्या जाचाला कंटाळून देव-देवतांनी होम केला. देवीला प्रसन्न केले. देवांच्या विनंतीनुसार देवीने महिषासुराबरोबर झालेल्या घनघोर युद्धात त्याला ठार केले. मरतेसमयी महिषासुराने देवीकडून एक वर मागितला, की तुझे दर्शन घेण्यापूर्वी भक्तांनी माझे दर्शन घ्यावे. यामुळे मंदिरात जाताना पहिल्या पायरीजवळ डाव्या बाजूला महिषासुराच्या मस्तकाची स्थापना केली असून, नंतर श्रीगणेशाचे मंदिर, निम्म्या पायऱ्या चढून गेल्यावर श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांचे मंदिर लागते.

येथील ४७२ पायऱ्या पेशव्यांचे एक सरदार खंडेराव दाभाडे यांच्या पत्नी उमाबाई यांनी बांधल्या आहेत. या पायऱ्यांवर विसाव्यासाठी व सावलीसाठी ट्रस्टने अकरा शेड बांधले आहेत. कासव टप्प्याच्या थोडे पुढे औदुंबराचे झाड आहे. या झाडाच्या पूर्वेस ३० फुटांवर मच्छिंद्रनाथांची समाधी आहे. ज्ञानेश्वरीत याचा उल्लेख आहे तो असा,

तो मच्छिंद्र सप्तशृंगी।

भग्नावयव चौरंगी।

भेटला की तो सर्वांगी।

संपूर्ण झाला।।

त्रिभुवनी भुवनी पाहता तुजऐसी नाही...

पर्वतशिखराच्या मधोमध कड्यामध्ये गुहाकृती अशी अठरा-वीस फूट उंचीची कपार आहे. त्या कपारीत खोलवर महिरप कोरलेली आहे. त्या महिरपीतच श्री सप्तशृंगदेवीची आठ फूट उंच मूर्ती कोरलेली आहे. देवीची मूर्ती अतिशय भव्य, शेंदूर लावलेली रक्तवर्णी आहे. देवीची पूजा शिडीवर उभे राहूनच करतात. देवीला अठरा हात आहेत. तिच्या उजव्या हातांमध्ये मणिमाळ, कमळ, बाजा, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल आणि कुऱ्हाड ही आयुधं, तर डाव्या बाजूच्या हातांमध्ये शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र, कमंडलू आहेत. सप्तशृंगनिवसिनीला अष्टादशभुजा महालक्ष्मीच म्हणतात. देवी पूर्वाभिमुख आहे.

--

त्रिकाल पूजेची व्यवस्था

देवीला रोज वेदमंत्रांच्या घोषात अभिषेक केल्यावर तिच्या सर्वांगाला शेंदूर लावतात. पापण्या व भुवया रंगाने कोरून कपाळावर ठसठशीत कुंकू लावतात. हे कुंकू दररोज निरनिराळ्या रंगाचे व आकाराचे असते. रविवारी सूर्यफूल, सोमवारी शैवपंथी, मंगळवारी गोल, बुधवारी फुलाकृती, गुरुवारी स्वस्तिक, शुक्रवारी पिंपळपान, शनिवारी शंखाकृती कुंकू लावतात. याचप्रमाणे अष्टमी, नवमी आणि पौर्णिमेच्या दिवशीसुद्धा कुंकवाचा आकार बदलण्यात येतो. नंतर देवीच्या अंगात तीन खणांची चोळी. कटीला वस्त्र व डोक्यावर मुकुट चढवितात. संस्थानाने देवीच्या त्रिकाल पूजेची व्यवस्था केली आहे. देवीला दर वाराच्या वेगवेगळ्या पैठण्या आहेत. पैठणी नेसवून झाली म्हणजे नित्याचे अलंकार घालतात. अंबाबाईसाठी सोन्याचा कंठहार, गाठले, बिंदी, मंगळसूत्र, नथ, पुतळीहार, चांदीचा मुकुट, कमरपट्टा, चांदीचे पाय, पादुका आदी लाखो रुपये किमतीचे दागिने, तसेच अभिषेकपात्र, समया, घागरी, मोरमुकुट, घंटा, ताटवाटी, राजदंड आदी पूजेची उपकरणे आहेत.

पहाटेपासून विधींचा प्रारंभ

पहाटे पाच वाजता सप्तशृंगीदेवीचं मंदिर उघडतात. सहा वाजता काकड आरती होते. त्यानंतर आठ वाजता आईच्या महापुजेला सुरुवात होते. यामध्ये भगवतीच्या मूर्तीला पंचामृत स्नान घालण्यापासून ते नवी पैठणी किंवा शालू नेसवून तिचा साजशृंगार केला जातो. मातेच्या मुखात पानाचा नवीन विडा दिला जातो. नंतर वेगवेगळ्या फळांचा नैवेद्य दाखविला जातो. दुपारी बारा वाजता महानैवेद्य आरती होते. देवीची सायंकाळी साडेसात वाजता आरती करतात.

देवीला प्रदक्षिणा घालायची झाल्यास सप्तशृंग पर्वताच्या मध्यावरून आखलेल्या पायवाटेने घालावी लागते. मात्र, नवरात्राच्या काळात प्रदक्षिणा मार्ग बंद ठेवण्यात आला आहे. गडावर चैत्र पौर्णिमा व नवरात्रोत्सव हे दोन्ही उत्सव अत्यंत धार्मिक व मंगलमय वातावरणात पार पाडले जातात. वरील दोन्ही उत्सवांच्या वेळी श्रीजगदंबेचे मूळ स्थान असलेल्या सर्वोच्च शिखरावर दरेगावचे पाटील पारंपरिक पद्धतीने ध्वज लावतात. ध्वज लावणारा परत येताना विशिष्ट प्रकारचे गवत प्रसाद म्हणून घेऊन येतो व ते गवत प्रसाद म्हणून वाटतो. हा समारंभ झाला की यात्रा परतू लागते.

--

ही आहेत ठळक वैशिष्ट्ये

भगवतीला श्री सप्तशृंगनिवासिनी म्हणतात, कारण ज्या गडावर भगवतीचा निवास आहे त्या गडाला सात शिखरे आहेत. सप्तशृंगगडावर अनेक औषधी वनस्पती व पाण्याची १०८ पवित्र कुंडे आहेत. देवीच्या समोर मार्कंडेय ऋषींचा डोंगर आहे. गडावर शीतकडा नावाची सुमारे १५०० फूट खोल दरी आहे. एका सवाष्णीने देवीला नवस केल्यानुसार आपल्या पुत्रासह बैलगाडीत बसून शीतकड्यावरून खोल दरीत उडी घेतली. या बैलगाडीच्या चाकाच्या खुणा अजूनही शीतकड्यावर पाहता येतात. सप्तशृंगनिवासिनीच्या मंदिरात जाण्यासाठी ४७२ पायऱ्या चढून जाव्या लागतात. या पायऱ्या टाळून देवीच्या दर्शलाना जाण्यासाठी गडावर फ्युनिक्युलर ट्रॉली तयार झाली आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्याचे लोकार्पण करण्याचे ट्रस्टचे नियोजन आहे. गडावर दसऱ्याच्या दिवशी होणारी बोकडबळीची प्रथा व मानवंदना म्हणून हवेत गोळीबार करण्याची प्रथा बंद करण्याचा ठाम निर्णय प्रशासनाने यावर्षी घेतला आहे. यात्रा कालावधीत गडावर प्लास्टिकच्या वापरावर बंदी घालण्यात आली असून, या नियमाचे काटेकोर पालन करण्यात येत आहे. येत्या ६ ऑक्टोबरपर्यंत गडावर खासगी वाहतुकीस बंदी आहे. भाविकांसाठी एसटी महामंडळाने २५० बसेसची व्यवस्था केली आहे. दि. ६ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेसात वाजता शांतिपाठ, अकरा वाजता कोजागरी उत्सवाची सांगता होणार आहे.

--

खऱ्या अर्थाने महालक्ष्मी...

‘उपासना शक्ती सामर्थ्याची’ या लेखमालेच्या निमित्ताने जिल्ह्यातील देवी मंदिरांत, यात्रांत फिरताना या यात्रांच्या माध्यमातूनच जीवन जगणाऱ्या अनेक माणसांशी भेट झाली. मोठे रहाट पाळणे किवा जायंट व्हील चालविणारी अनेक कुटुंबे यात्रांवरच उदरनिर्वाह करतात. यात्रेत फुगे, पिपाण्या, लहान मुलांची छोटी खेळणी विकून अनेक निराधार महिला जीवन जगतात. या सगळ्यांना जगण्यासाठी पैसे मिळवून देणारी देवी खऱ्या अर्थाने महालक्ष्मी आहे, असेच म्हणावे लागेल. अनेकांच्या अर्थचक्राला गती देण्याचे काम देवी तिच्या यात्रांमधून वर्षानुवर्षे करीत आली आहे.

एक साधे उदाहरण घेता येईल, नाशिक जिल्ह्यात सप्तशृंगनिवासिनीच्या अस्तित्वामुळे नाशिक जिल्ह्यातील जवळ जवळ प्रत्येक गावात एकतरी देवी मंदिर आहे. काही गावांत एकापेक्षा अधिक देवी मंदिरे आहेत. नवरात्रीत या प्रत्येक देवी मंदिराभोवती लहान-मोठ्या प्रमाणांत यात्रा भरते. ९-१० दिवस ही यात्रा चालते. यात्रेत प्रत्येक देवीच्या दर्शनच्या निमित्ताने हजार ते लाख भाविक येतात. सप्तशृंग, चांदवड, कोटमगाव, नाशिकची कालिका, घाटनदेवी यांसारख्या प्रत्येक मंदिरांत तर या दहा दिवसांत ७-८ लाखांपेक्षा अधिक भाविक येतात. या यात्रांमध्ये लहान मुलांसाठी प्रसाद, खेळणी व खाऊची हजारो दुकाने लागत. लहान-मोठे रहाट पाळणे, जायंट व्हील्स तर प्रत्येक यात्रेचे आकर्षण असते. गृहिणींसाठी सौंदर्य प्रसाधानांसोबतच गृहोपयोगी वस्तू, खाण्याच्या पदार्थांचे हजारो स्टॉल्स लागतात. देवीदर्शनाला जाण्यासाठी एसटी, रिक्षा, तसेच खासगी वाहनांचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. जत्रेतल्या फुले, नारळ विक्रेत्यांसह लहान मुलांसाठी फुगे, पिपाण्या विकणाऱ्यांपासून टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशिन, घरे, सोने-चांदीचे दागिने विकणाऱ्या सर्व व्यावसायिकांना यात्रा काळात आपापल्या क्षमतेनुसार आर्थिक लाभ होतो. यादृष्टीने पाहिले तर देवीमुळे आपल्या जिल्ह्यातील अर्थचक्राला चांगलीच गती मिळते. अशा या भवानी, जगदंबामाता, सप्तशृंगीमातेच्या या कर्तृत्वाचा विचार केल्यावर मनात विचार येतो खरच माते, त्रिभुवनी भुवनी पाहता तुजऐसी कुणीही नाही!!

----

सिन्नरची निमजग्याची देवी


नवरात्रीच्या बाबतीत नाशिक जिल्ह्यातील सिन्नर वैशिष्ट्यपूर्ण आहे. सिन्नर गावात देवीची जितकी मंदिरे आहेत तेवढी ती कुठेही नाहीत. सिन्नरला देवीची मोठी बारा मंदिरे आहेत. प्रत्येक मंदिर स्वतंत्र, तिथल्या देवी मूर्ती भव्य, सुबक व देखण्या आहेत. प्रत्येक मंदिराला इतिहास आहे. सिन्नरचे प्रमुख देवी मंदिर गावाबाहेर आहे. त्यामुळे सगळे सिन्नरकर तिला ‘गावाबाहेरची देवी’ म्हणतात. गावाबाहेरच्या देवीचे खरे नाव ‘निमजग्याची देवी’ असे आहे.


मार्कंडेय पुराणांतर्गत देवी माहात्म्यात असे सांगितले आहे, की ‘जगात जेव्हा तामसी व क्रूर वृत्तीचे लोक प्रबळ होऊन सात्विक जनांस त्रास देऊ लागतात, तेव्हा त्यांच्या हातून सज्जनांची सुटका करून त्यांना सुख मिळवून देण्यासाठी पुन:पुन्हा शक्तिदेवी अवतीर्ण होते.’ देवीचे अनेक अवतार झाले. तिने केलेल्या महत्कृत्यांची स्तुती करून भक्तजनांनी जेव्हा आपल्या अंत:करणातील प्रेम व आदर प्रशंसापर शब्दांत व्यक्त केला, तेव्हा देवीने असे अभय वचन दिले, ‘ोमी भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर राहीन, त्यांना दु:खमुक्त करीन. प्रत्येक अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून नऊ दिवस घटपूजा, होमहवन करून माझे पूजन करा.” तेव्हापासून नवरात्री पाळण्याची प्रथा सुरू झाली.

सिन्नरपासून दूर गावाच्या पश्चिमेला गावाबाहेर देवीचे मंदिर आहे. नाशिक वेशीतून किंवा भैरवनाथाच्या मंदिरासमोरून जाणारा रस्ता देवीच्या मंदिरापर्यंत जातो. आडव्या फाट्यावरूनही थेट देवी मंदिरापर्यंत जाता येते. मंदिर सरस्वती नदीच्या काठावर आहे. नदीपासून उंचावर, छोट्या टेकडीवरच गाबाहेरच्या देवीचे मंदिर आहे. सिन्नरचे देवी मंदिर पूर्वाभिमुख आहे. पूर्वी ते दगड-विटांनी बांधलेले दोन घुमटी लहानसे मंदिर होते. पण, आता या मंदिराने कात टाकली असून, ते नव्या आकर्षक रूपात उभे राहिले आहे. सिन्नरमधील दानशूर मंडळी आणि भाविक यांनी लोकवर्गणीतून या मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे. हल्लीचे मंदिर चांगलेच प्रशस्त असून, आधुनिक पद्धतीने बांधण्यात आले आहे.

येथील देवीची मूर्ती अतिशय प्रसन्न आहे. गडावरच्या सप्तशृंगनिवासिनी देवीप्रमाणेच गावाबाहेची ही देवी अठराभुजांची असून, तिची मूर्ती सात फूट उंच आहे. देवीच्या या अठरा हातांत मणिमाळ, कमळ, बाण, तलवार, वज्र, गदा, चक्र, त्रिशूल, कुऱ्हाड, शंख, घंटा, पाश, शक्ती, दंड, ढाल, धनुष्य, पानपात्र आणि कमंडलू या वस्तू आहेत. ती वाघावर स्वर झालेली आहे आणि हातातील त्रिशुळाने तिने महिषासुराचा वध केला आहे. मंदिरातील वातावरण शांत आणि आल्हाददायक असल्यामुळे भाविकांना येथे आल्यावर निश्चितच मन:शांती मिळते. कै. दशरथ किसन बलक या मंदिराचे वारस आणि पुजारी होते. आता वसंत विश्वनाथ तनपुरे हे मंदिराचे पुजारी आहेत. हल्ली देवीचे मंदिर एका लहानशा टेकडीवर आहे. परंतु, फार पूर्वी या जागेवर तळे होते. काळाच्या ओघात ते नष्ट झाले. त्या ठिकाणी टेकडी निर्माण झाली. गावाबाहेच्या देवीच्या गाभाऱ्यापुढे सभामंडपात डाव्या बाजूला पार्वतीची एक मूर्ती पाहायला मिळते. ती मूर्तीही देवीच्या मूर्ती इतकीच प्राचीन आहे.

देवीला चांदीचा मुकुट, सोन्याची नथ, सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णफुले, चांदीचा कमरपट्टा वगैरे अलंकार भाविकांनी अर्पण केलेले आहेत. चैत्र पौर्णिमेला, तसेच नवरात्रीत हे सर्व दागिने देवीला घालतात. गावाबाहेरची देवी हे स्थान जागृत असल्याचा अनेक भाविकांना अनुभव आलेला आहे.

सालाबादप्रमाणे यंदाही घटस्थापनेने नवरात्रोत्सवाची सुरुवात झाली आहे. नवरात्रीत नऊ दिवस येथे मोठा उत्सव होतो. पहाटे तीन वाजेपासूनच सिन्नरचे भाविक स्त्री-पुरुष, मुले, मुली मोठ्या संख्येने देवीच्या दर्शनासाठी येतात. पहाटेची शांतता, गाबहेरचा अंधारलेला रस्ता आणि देवीच्या मंदिरावर लावलेल्या लाउडस्पीकरवर वाजणारी भक्तिरसपूर्ण गाणी एक वेगळेच वातावरण निर्माण करते. आजही अनेक सिन्नरकरांच्या मनात प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील ‘पाऊले चालती पंढरीची वाट’ किंवा ‘चल गं सखे, चल गं सखे पंढरीला’ ही गाणी नवरात्रीतील काळात गावाबाहेरच्या देवीची आठवण जागवतात. गावाबाहेरील देवी मंदिर परिसरात सध्या मोठी यात्रा भरली आहे. मंदिरात दररोज सकाळ सायंकाळ आरती, देवीच्या गीतांचा कार्यक्रम होतो. मंदिराशेजारच्या पत्र्याच्या शेडमध्ये सिन्नर शहरातील व आसपासच्या गावांतील ६० महिला व २० पुरुष घटी बसले आहेत. १९७६ पासून घटी बसण्याची प्रथा येथे सुरु झाली आहे.मंदिरासमोरच्या मोकळ्या जागेत सालाबादप्रमाणेच यंदाही बालगोपालांचे मनोरंजन करण्यासाठी आनंदमेळा भरला आहे.विविध प्रकारचे रहाट पाळणे,जायंटव्हील,टोराटोरा,छोटी-मोठी खेळणी,विविध प्रकारच्या खाउची दुकानं, महिलावर्गासाठी सौंदर्यप्रसाधने,तरुणांसाठी विविध खेळांचे स्टॉल्सही आनंदमेळ्यात आलेले आहेत.ग्रामीण भागातील अर्थचक्राला गती देणारा आनंदमेळा हजारो भाविकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे.पूर्वी केवळ देवीदर्शनासाठी केली जायची यात्रा आज शेकडो हातांना काम मिळवून देत आहे. गावाबाहेरच्या देवीचे खरे नाव ‘निमजग्याची देवी’ असे आहे. पूर्वी देवीच्या मंदिराभोवती निंबाची खूप झाडे होती. निंबाच्या झाडीत राहणारी ती ‘निंबाची देवी’ म्हणजेच ‘निमजग्याची देवी’ असे सांगतात. या देवीला निमजग्याचीदेवी हे नाव कसे पडले त्याची कथा अशी, ब्रिटिशांच्या राजवटीत देशभर प्लेगची साथ आली होती. सिन्नर गावातही ही साथ पसरल्याने गावातील प्लेगग्रस्त रुग्ण गावाबाहेर असलेल्या निंबाच्या झाडांच्या आश्रयाला जाऊन राहू लागले. औषधी गुणधर्म असलेल्या कडुनिंबाच्या झाडांमुळे कदाचित अनेक रुग्ण बरे झाले असतील. तेव्हापासून या जागेला ‘निमजगा’ असे म्हणू लागले. त्यामुळे येथील देवीला ‘निमजग्याची देवी’ असे नाव पडले. सप्तशृंगी देवी मंदिर ट्रस्ट, सिन्नरची स्थापना डिसेंबर १९९४ मध्ये झाली असून, द्वारकानाथ नरसिंगदास चांडक अध्यक्ष आहेत.


सिन्नरमधील देवी मंदिरे...

गावाबाहेरच्या देवीप्रमाणेच सिन्नरला शिवनदीच्या काठावरची ‘काशीआई’, लोंढे गल्लीतील जीर्णोद्धार झालेली ‘भद्रकाली’, वावी वेशीजवळ ‘तेली समाजाची देवी’, नाशिक वेशीजवळची ‘सरस्वतीदेवी’, गंगावेशीजवळची ‘इंगळादेवी’, त्याच्या जवळची ‘लाड सुवर्णकार समाजाची देवी’, लाल चौकातील ‘महालक्ष्मी’, पुढे ‘नामदेव शिंपी समाजाची देवी’, प्रताप टॉकीजजवळची ‘वाघाई देवी’, शिंपी गल्लीतील ‘रेणुकामाता’, गणेश पेठेतील ‘कालिका देवी’, कुंदेवाडी रस्त्यालाच जरा पुढे संगमाजवळील ‘काळूआई’, नारायणबाबा मंदिराजवळची ‘संतोषीमाता’, तसेच पंचायत समितीजवळील ‘शीतलादेवी’ आदी देवी मंदिरे सिन्नर येथे आहेत. नवरात्रोत्सवाच्या काळात हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठा उत्सव या सर्व मंदिरांत साजरा केला जातो.

----

तांबट आळीतील श्री कालिकादेवी!


नाशिक शहराच्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी नवीन तांबट आळीत श्री कालिका देवीचे प्राचीन मंदिर आहे. मंदिरात कालिकेची अतिशय सुंदर मूर्ती आहे. मंदिरही अतिशय सुबक, स्वच्छ व शांत आहे. देवीच्या गाभाऱ्याला समोर काचेची केबिन केलेली आहे. देवीची नित्यनेमाने पूजा केली जाते. उपेंद्रभाई तळाजिया देवीचे पुजारी आहेत.

चैत्र पौर्णिमा आणि नवरात्री हे देवीचे प्रमुख उत्सव कालिका मंदिरात साजरे केले जातात.

नवरात्रीत सकाळी ६ वाजता काकड आरती, रात्री ७ वाजता देवीची आरती केली जाते. नवरात्रीत रोज सायंकाळी ७.३० वाजता मंदिरामागच्या मोठ्या हॉलमध्ये गरबा नृत्य केले जाते. रात्री ८ वाजता रत्नदीपपूजा केली जाते. या पूजेसाठी ७१ कुटुंबप्रमुख मानकरी असतात. रत्नदीपपूजा म्हणजे कणकेची देवी करून तिची पूजा केली जाते. नऊ दिवसांत कोण मानकरी होईल ते चिठ्ठ्या काढून ठरविले जाते. पूजेनंतर खाऱ्या शेगदाण्यांचा प्रसाद वाटतात. नवरात्रीत नऊ दिवस उपवास करणारे भाविक अष्टमीला उपवासाचे पारणे फेडतात. दसऱ्याला ‘खण’, ‘कडकण्या’ने चौसष्ट योगिनींची पूजा करतात.


मानाची महारत्नदीपपूजा

आश्विन शु. प्रतिपदेला येथे घटस्थापना केली जाते. या काळात कालिकाष्टक व श्रीसूक्त वाचन करतात. सप्तमीला होमहवन व पूर्णाहुती होते. अष्टमीला महाअष्टमी उपवास व सायंकाळी कालिकाष्टक, नवमीला गोत्रज पूजन करतात. दसऱ्याला महारत्नदीपपूजा होमहवन व पूर्णाहुती. सायंकाळी महारत्नदीप शोभायात्रा काढली जाते. महारत्नदीप पूजा अतिशय मानाची समजली जाते. पूर्वी ही पूजा आपल्या घरी व्हावी यासाठी बोली लावली जात असे. हल्ली गुरुजी चिठ्ठी काढतात, ज्याची चिठ्ठी निघेल त्याला हा मान दिला जातो. त्याच्या घरी वाजत-गाजत महारत्नदीप पोहोचविला जातो. देवी घरी आणल्यावर तिची यथासांग पूजा करतात व देवीच्या लाडूचा प्रसाद सर्व समाजातील घरी वाटतात. कोजागरीला रात्री ९ वाजता देवीचा गोंधळ व मध्यरात्री १२ वाजता दुग्धपान केले जाते. आश्विन कृ. द्वितीयेला ब्राह्मण भोजन व महाप्रसादाने नवरात्रोत्सवाची सांगता होते.

दक्षिणमुखी श्री कालिका देवी मंदिर समस्त कन्सारा मंडळी, नवी तांबट लेन, नाशिक, चॅरिटी ट्रस्ट रजि. नंबर ए-३८ विश्वस्त मंडळ सन २०१७-१८ या नावाने येथील ट्रस्ट ओळखला जातो. सागर रमणभाई तांबट (अध्यक्ष), रोहित कन्सारा (उपाध्यक्ष), राकेश कन्सारा (सचिव), सदस्य- जीवन तांबट, अभिजित तांबट, निखिल तांबट, अमित तांबट, शीतल कन्सारा, नीलेश तांबट, सुयोग कन्सारा, दीपेश तांबट व अनिल तांबट (सभापती) याप्रमाणे पदाधिकारी आहेत.


पावागडची कालिका नाशिकला

श्री कालिका देवीचे हे मंदिर कन्सारा किंवा कासार समाजाचे आहे. मंदिरातील घंटेवरील तारखेनुसार मंदिराला १७७ वर्षे झाली आहेत. सहस्रार्जुनाचे वंशज असलेला हा समाज मूळ गुजरातमधील चंपानेर किंवा पावागड भागात राहणारा. पावागडची कालिकादेवी ही त्यांची कुलदेवता. पावगडवर महंमद बेगडा या मुस्लिम राजाने हल्ला केला, तेव्हा आपले गाव व परिसर सोडून कासार मंडळी गुजरात व महाराष्ट्रात स्थलांतरित झाली. यापैकी काही लोक नाशिकजवळच्या ओझर येथे स्थायिक झाले. त्यामुळे ओझरला तांबटाचे नाव पडले. कालांतराने ही मंडळी नाशिकला आली. नाशिकमध्येही या मंडळींनी आपला तांब्यापितळेची भांडी बनविण्याचा व्यवसाय भरभराटीस आणला. येथे आल्यावर तांबट मंडळींनी आपली कुलदेवता पावगडावरची कालिकादेवीही नाशिकला स्थापन केली. या देवीची नाशिकच्या नवीन व जुन्या तांबट आळीत, तसेच ओझर व मुंबई येथेही मंदिरे आहेत, अशी माहिती ईश्वरलाल तांबट यांनी दिली.

------

मालेगावातील देवीदर्शन...

देवीच्या विविध रुपांतील वास्तव्याने नाशिक जिल्ह्यातील मालेगाव पावन झाले आहे. नवरात्रीत तर या गावांतील मंदिरांना जत्रेचे रूप लाभते. लहान-मोठी, नवी-जुनी सारी मंदिरे भाविकांनी गजबजून जातात.

येथील अंबिकामातेची मूर्ती अठरा भुजांची असून, तिची उंची आठ ते नऊ फूट आहे. देवीचे मुख भव्य व प्रसन्न असून, तिच्या अठरा हातांत विविध शस्त्रे आहेत. ही देवी सिंहावर आरुढ झालेली असून, हातातील त्रिशुळाने तिने महिषासुराचा वध केलेला आहे. मालेगावातील संगमेश्वरात रामसेतूसमोरच अंबिकेचे मोठे मंदिर आहे. नवरात्रांत घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत विविधप्रकारच्या धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन येथे करण्यात येते. मंदिरासमोरील दगडी दीपमाळ त्रिपुरारी पौर्णिमेला शेकडो दिवे-पणत्यांनी प्रज्वलित करतात. देवीदासगिरी महेश्वरगिरी गोसावी हे या मंदिराचे मालक व वंशपरंपरागत पुजारी आहेत.

येथील राजेबहाद्दर यांची महालक्ष्मी देवीही प्रसिद्ध आहे. तिला कोंडवाड्यातील देवी म्हणतात. महालक्ष्मीचे मंदिर पूर्वी नदीकाठी होते. त्यावेळी गावातील मोकाट सोडलेली जनावरे येथील आवारात आणून बंद करीत म्हणून या देवीला कोंडवाड्यातील देवी असे नाव पडले असावे. दीड हात उंचीच्या पेढीवर देवी पश्चिमाभिमुख असून, सिंहावर बसलेली आहे. महालक्ष्मीची मूर्ती संगमरवरी पाषाणाची असून, अष्टभुजा आहे. देवीच्या बाजूला गणपती, सूर्यनारायण, विष्णू, शंकर व पार्वती यांचे पंचायतन आहे. दर वर्षी आश्विन महिन्यात मंदिरात नवरात्रोत्सव साजरा केला जातो. मालेगावात वरील दोन मंदिरांशिवाय सुवर्णकारांची भद्रकाली, कॅम्पमधील श्रीसप्तशृंगीमाता, कासारांची कालिका आदी देवी मंदिरे प्रसिद्ध आहेत.


तळवाड्याची मनसादेवी

मालेगाव तालुक्यातील तळवाडे येथे मनसापुरी नावाची देवी असून, दर वर्षी मार्गशीर्ष शुद्ध सप्तमी ते नवमी अशी तीन दिवस या देवीची यात्रा भरते. येथे गाव वेशीजवळच उंच ओट्यावर अष्टादशभुजा महिषासुरमर्दिनी मनसापुरी देवीचे मंदिर आहे. ही देवी मनातील इच्छा (मनसा) पूर्ण करणारी आहे म्हणून तिला मनसापुरी नाव पडले आहे. देवीचे पुजारी उपासनी आहेत. देवीची प्राणप्रतिष्ठा ना. दा. व लक्ष्मीताई उपासनी यांनी केलेली आहे. नवरात्रोत्सवात अष्टमीला दुपारी बारा वाजता नवीन ध्वज चढवितात. दुपारी पिलकी नदीच्या पात्रात कुस्त्यांची दंगल होते. विजयी पहिलवानास वाजतगाजत देवी मंदिराजवळ आणून देवीस वंदन करून हा कार्यक्रम समाप्त होतो. अष्टमीच्या दिवशी देवीपुढे होमहवन करतात. मार्गशीर्ष महिन्यातील यात्राकाळात सप्तमीच्या सायंकाळी गावभर तगदरावांची मिरवणूक काढली जाते, हे येथील वैशिष्ट्य समजले जाते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नोकरभरतीप्रकरणी बारा जणांना नोटिसा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विभागातील तीनशे कोटींच्या वादग्रस्त नोकरभरती घोटाळ्याच्या चौकशी अहवालात बड्या अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला असून, या सर्वांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरा यांनी दिली.

विभागीय आयुक्तांच्या चौकशी अहवालानंतर तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळेंसह १२ जणांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यापैकी जाधव यांचा खुलासा प्राप्त झालेला नाही. तो प्राप्त होताच दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे आश्वासन सावरा यांनी दिले आहे. सोबतच ही नोकरभरती रद्द करण्यासंदर्भात विधी विभागाचा सल्ला मागवला असल्याची माहिती सावरा यांनी दिली आहे.

आदिवासी विकास महामंडळातील वादग्रस्त नोकरभरतीसंदर्भात भाजपचेच खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. तीनशे पदांसाठी झालेल्या या भरतीत जवळपास तीनशे कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला होता. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीच या चौकशीचे आदेश दिले होते. विभागीय आयुक्त एकनाथ डवले यांनी या संदर्भात चौकशी करून राज्य सरकारला अहवाल सादर केला आहे. या चौकशी अहवालावरून गुरुवारच्या संचालक मंडळाच्या बैठकीत वादळी चर्चा झाली होती, तर शुक्रवारच्या महामंडळाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भरती रद्द करण्याचा ठराव मांडला होता. त्यावर बोलताना सावरा यांनी डवले यांच्या चौकशी अहवालात या भरतीप्रक्रियेत काही अधिकाऱ्यांवर ठपका ठेवण्यात आला आहे. भरतीप्रक्रियेत अनियमितता आढळून आली आहे. त्यानुसार महामंडळाच्या वतीने तत्कालीन एमडी बाजीराव जाधव, महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे यांच्यासह बारा अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावण्यात आल्याचे सावरा यांनी सांगितले. या बारापैकी ११ जणांनी खुलासा सादर केला असून, जाधव यांचा खुलासा येणे बाकी आहे. त्यांचा खुलासा प्राप्त झाल्यानंतर संबंधित दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. कोणत्याही दोषीला माफी दिली जाणार नाही. निकषानुसार कारवाई केली जाईल, असे सावरा यांनी स्पष्ट केले. लवकरच त्या संदर्भातील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे नोकरभरती चांगलीच अडचणीत आली असून, भरती झालेल्यांचे आता काय होणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

रद्दसाठी विधीचा सल्ला

महामंडळाच्या सर्वसाधारण सभेत आदिवासी महामंडळात झालेली भरती रद्द करण्याची मागणी करणारा ठराव पारित करण्यात आला आहे. त्यावर बोलताना सावरा यांनी नोकरभरती चौकशीचा अहवाल हा विधी व न्याय विभागाकडे असून, त्यांच्याकडे नोकरभरती रद्द करता येईल काय, याबाबतही सल्ला मागितला असल्याचे सावरा यांनी या वेळी सांगितले. कोणतीही कारवाई करण्यापूर्वी कायदेशीर सल्ला घेणे आवश्यक आहे. त्यामुळे सल्ला आल्यानंतर निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

राजकीय नेता रडारवर

भरती प्रकरणात महामंडळाचे तत्कालीन एमडी बाजीराव जाधव, नरेंद्र मांदळेंसोबतच एका राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्याचाही समावेश आहे. या संदर्भातील चौकशी एसीबीकडून केली जात असून, आता हा नेताही रडारवर आला आहे. चौकशी समितीला दिलेल्या जबाबात या नेत्याचेही नाव पुढे आले असून, विधी विभागाच्या सल्ल्यानंतर अधिकाऱ्यांसह काही पदाधिकाऱ्यांवरही फौजदारी गुन्हा दाखल होणार आहे. त्यामुळे या पदाधिकाऱ्यासह त्याच्या पक्षाच्याही अडचणी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

राष्ट्रीय स्पर्धेत २४ पदके!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राष्ट्रीय पातळीवर झालेल्या चित्रकला स्पर्धेत शहरातील व्हीनस आर्ट अॅकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी तब्बल २४ पदके मिळविली आहेत. त्यात १७ सुवर्ण आणि ७ रौप्यपदकांचा समावेश आहे. गुजरातमधील भावनगरच्या मारुती आर्ट अॅकॅडमीतर्फे ही स्पर्धा झाली.

शहरात गेल्या ३५ वर्षांपासून व्हीनस आर्ट अॅकॅडमी सुरू असून, विद्यार्थ्यांना कला सादर करण्यासाठी उत्तम संधी मिळावी यासाठी अॅकॅडमीचे विद्यार्थी वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेत असतात. मारुती आर्ट अॅकॅडमीकडून घेण्यात आलेली स्पर्धा तीन गटांमध्ये झाली. पहिल्या गटात चित्र काढण्यासाठी कुठल्याही विषयाचे बंधन नव्हते. दुसऱ्या गटातील स्पर्धा कार्टून या विषयावर आधारित होती, तर तिसऱ्या गटासाठी ग्रीटिंग कार्ड हा विषय होता. व्हीनस अॅकॅडमीकडून या तीनही गटांसाठी चित्रे पाठविण्यात आली होती. एकूण १४३ चित्रे पाठविण्यात आली. यात पेंटिंग स्पर्धेत ७ सुवर्णपदके, २ रौप्यपदके, कार्टून स्पर्धेत ५ सुवर्णपदके, २ रौप्यपदके, ग्रीटिंग कार्ड स्पर्धेत ४ सुवर्णपदके व ३ रौप्यपदके, याशिवाय एका छायाचित्राला सुवर्णपदक अशी एकूण २४ बक्षिसे मिळाली आहेत.

--

चित्रांद्वारे विविध संदेश

विद्यार्थ्यांनी रेखाटलेल्या या चित्रांद्वारे विविध संदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे ही चित्रे विशेष आकर्षक ठरली. ही सर्व चित्रे अभ्यासपूर्ण असून, प्रत्येक चित्रामध्ये विद्यार्थ्यांचा स्वतंत्र विचार दिसतो, असे व्हीनस अॅकॅडमीचे सुहास जोशी यांनी सांगितले. या सर्वच चित्रांमधील सुबकता, रंगसंगती, रेखीवपण याची दखल परीक्षकांकडून घेण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोड रेल्वे स्थानकातही वाढता धोका!

$
0
0

प्रशासनाकडून उपाय योजने गरजेचे

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

मुंबईतील दुर्घटनेनंतर नाशिकरोडच्या सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न उभा राहिला आहे. प्लॅटफार्म क्रमांक एक व दोनवरील पायऱ्या अरुंद व उंच असल्याने येथे गर्दीच्यावेळी दुर्घटना घडू शकते. यामुळे रेल्वे प्रशासनकडून उपाय योजने गरजेचे आहे.

नाशिकरोड स्थानकातून दररोज दहा ते पंधरा हजार प्रवासी प्रवास करतात. दररोज सुमारे शंभर रेल्वेगाड्या धावतात. सकाळी पाचपासून ते दहापर्यंत तर सायंकाली पाच ते दहापर्यंत गर्दी असते. प्रवाशांना गाडी पकडण्यासाठी प्लॅटफार्म एक व दोनवर धावपळ करावी लागते. यासाठी दोन प्लॅटफार्मवरील जिन्यांचा उपयोग करावा लागतो. त्यांच्या पायऱ्या अरुंद व उंचही आहेत. ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना सावध पावले टाकावी लागतात. गर्दीच्यावेळी धक्का लागून एखादा प्रवासी पडल्यास मुंबईसारखी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाशिकरोड स्थानकातील पादचारी पुलावरही भिकारी व चरसी असतात. त्यांच्यामुळे प्रवाशांना अडथळा येतो.

पूल जोडणार कधी?

कुंभमेळ्यात प्लॅटफार्म क्रमांक चार तयार करण्यात आला. त्यावर जाण्यासाठी नवीन व प्रशस्त जिने तसेच, पादचारी पूल उभारण्यात आला. मात्र, त्याचा वापर फार कमी वेळा होतो. सायन्स ट्रेन आली तेव्हा चौथ्या फ्लॅटफार्म व या जिन्यांचा वापर झाला होता. हा व जुना पादचारी पूल जोडण्याचे नियोजन दोन वर्षांपासून झाले आहे. मात्र, कृतीच होत नाही. हे पूल जोडल्यास गर्दी व धोकाही कमी होईल.

सरकत्या जिन्यांची गरज

अनेक दिवसांच्या मागणीनंतर नाशिकरोड स्थानकात प्लॅटफार्म एक व दोनवर लिफ्ट उभारण्यात आली. स्थानकात मोठ्या व्यापारी संकुलात असतात तसे स्वयंचलित सरकते जिने उभारण्याचा निर्णय झाला आहे. गेल्या दिवाळीत लिफ्टबरोबरच सरकत्या जिन्यांचे काम सुरू होणे अपेक्षित होते. परंतु, अद्याप ते सुरू झालेले नाही. सूत्रांनी सांगितले की, या जिन्यांची प्राथमिक प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच काम सुरू होईल.

प्रवाशांचे साहस

एका पादचारी पुलावरून दुसऱ्यावर जाताना पायऱ्या चढाव्या लागतात. त्या चढणे कष्टप्रद असल्याने अनेक प्रवासी बिनधास्त रूळ ओलांडतात. आरपीएफ जवान मोहीम राबवून त्यांच्यावर कारवाईही करते. परंतु, तरीही प्रवासी बोध घेत नाहीत. त्यामुळे दोन रुळांच्यामध्ये कायमचे बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. ते ओलांडून प्रवासी जातात. दोन्ही प्लॅटफार्मवरील पादचारी पुलाची रुंदी वाढवली आणि जिन्यांच्या पायऱ्या प्रशस्त केल्यास प्रवासी त्यांचा नक्कीच उपयोग करतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आदिवासी मंत्र्यांचा आश्वासनांचा पाऊस

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

आदिवासी विकास महामंडळाची सर्वसाधारण सभा ही ज्या वार्षिक अहवालावरून होणार होती, तोच अहवाल सभासदांपर्यंत पोहोचू नये अशी व्यवस्था अधिकाऱ्यांनी केल्याने सभेत गोंधळ झाला. संतप्त सभासदांनी अहवालच फेटाळण्याची तयारी केल्यानंतर आदिवासी विकासमंत्री विष्णू सावरांनी बाजू सावरत, पुढे असे होणार नाही, असे आश्वासन दिले. दरम्यान, सभासदांनी मांडलेल्या अडचणींवर सावरा यांनी आश्वासनांची खैरात केली. आदिवासी विकास सेवा सोसायट्यांना वाढीव कमिशन, खावटी कर्ज संपूर्ण माफीसाठी प्रयत्न, ओटे बांधण्यासाठी दोन लाखांपर्यंत कर्ज, रोजंदारी वाहनचालकांचा प्रश्‍न, गोदाम उभारणीसाठी पुढाकार असा आश्वासनांचा पाऊस पाडला आहे.

महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात झाली. खासदार हरिश्चंद्र चव्हाण, व्यवस्थापकीय संचालक दिनकर जगदाळे, आदिवासी आयुक्त रामचंद्र कुलकर्णी, धनराज महाले यांच्यासह संचालक मंडळ उपस्थित होते. आदिवासी विकास महामंडळाच्या सदस्यांना वार्षिक अहवालाची प्रत आठ दिवस अगोदर पाठविणे बंधनकारक असताना राज्यातील अनेक सदस्यांना ती मिळाली नाही, तर काहींना एक-दोन दिवस अगोदर प्रती मिळाल्या. यात अनेक चुका असल्याचे सदस्यांनी सांगत, अहवालाची चिरफाड केली. अहवाल फेटाळण्याची घोषणाही सभापतींनी केली. मात्र, मंत्र्यांनी वेळ मारून नेल्यानंतर सभासदांनी तक्रारींचा पाढा मंत्र्यांसमोर वाचला.

संचालकांनी उपस्थित केलेल्या समस्यांना उत्तर देताना सावरा म्हणाले, की खावटी कर्ज योजना ही बंदच करण्यात आली आहे. मात्र, आदिवासी विकास महामंडळातर्फे वितरित करण्यात आलेले २४४ कोटी रुपयांचे कर्ज माफ करण्यासंदर्भात शासनदरबारी आमचा पाठपुरावा सुरू असून, ते कर्जमाफीसाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. धान खरेदीसंदर्भात संस्थांच्या कमिशनचा प्रश्‍नदेखील गंभीर असून, कमिशनच्या रूपात दोन टक्के रक्कम मिळत असून, त्यात वाढ करून आम्ही ती १० टक्के करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. धान साठवणुकीसाठी पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप तत्त्वावर राज्यात गोदामे उभारली जाणार असल्याचे सांगत शक्‍य झाल्यास इतर कुठल्या स्रोताद्वारे धान साठवणुकीसाठी गोदामे उभारता येईल, याचेही आश्‍वासन देण्यात आले. राज्यातील ९६८ सोसायट्यांची आर्थिक स्थिती ढासळलेली आहे. त्यामुळे या संस्थांना बळकट व सक्षमीकरणासाठी सर्व सोसायट्यांच्या सदस्यांची बैठक आयोजित करून समस्यांवर लवकरच तोडगा काढण्यात येईल. सोसायटी व महामंडळाचा अनुदान, कमिशन व वित्त मदतीचा प्रश्‍न मार्गी लावण्यात येईल, तसेच महामंडळ व संस्था सक्षमीकरणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले.

तक्रारींचा वाचला पाढा

आम्ही इथे फक्त हात वर करायला आलो असे सांगत, सभासदांनी मंत्र्यांसमोरच महामंडळाच्या कारभाराची पोलखोल केली. नोकरभरती, धान खरेदीतील रखडलेले कमिशन, गोदामाची स्थिती, कर्मचाऱ्यांचा समस्या, खावटी व शबरी कर्जमाफी, महामंडळाच्या नफ्यातून संस्थांचा विकास का नाही?, रोजंदारी वाहनचालक, एकाधिकारी धान खरेदी योजनेतील अडचणी, वर्षानुवर्षे वापरत असलेले बारदाणे, संस्था चालविताना येणाऱ्या अडचणी, महामंडळाच्या पडून असलेल्या जमिनीचा रखडलेला विकास आदी प्रश्‍नांवर मंत्र्यांचे लक्ष्य वेधत सभासदांनी तक्रारीचा पाढा वाचला.

उपाध्यक्ष संचालकाला करा

खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी सभेची वेळ चुकीची निवडल्याचे सांगत, अधिकाऱ्यांच्या कारभारावर टीका केली. महामंडळाचा उपाध्यक्ष हा संचालक मंडळातून निवडून करा, अशी मागणी केली. राज्यमंत्र्याला उपाध्यक्षपद देण्याऐवजी लोकांमधून निवडून आलेल्या संचालकाला उपाध्यक्षपद देण्याची मागणी करत, सभेत ठरावच करावा, असे त्यांनी सांगितले.

दोन लाख बोगस आदिवासी

आदिवासींच्या नोकऱ्यांवर बोगस आदिवासींनी कब्जा केला आहे. जवळपास दोन लाखांवर बोगस आदिवासींची संख्या असून, त्यांच्यावर ६ जुलैच्या सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत असल्याचे सावरा यांनी सांगितले. या बोगस आदिवासींना त्यांच्या जातप्रवर्गात नोकऱ्या द्या अन् आमच्या आदिवासींच्या नोकऱ्या मुक्त करा, अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे सावरा यांनी सांगितले. लवकरच या जागा मोकळ्या करून आदिवासींना नोकरी देणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चोरडिया समितीच्या अहवालानंतर कारवाई

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालयाचे सदस्य रमेश विश्वनाथ जुन्नरे यांचे एकरकमी सभासद यादीतून नाव कमी करण्याच्या कार्यकारी मंडळाच्या प्रस्तावावर विचारविनिमय करण्यासाठी बोलवण्यात आलेली सभा रात्री उशिरापर्यंत सुरू राहिली. या वेळी सावानात आर्थिक गैरव्यवहार केलेल्या दोषींवर चोरडिया समितीचा अहवाल प्राप्त होताच कारवाई करण्यात येईल, अशी माहिती अध्यक्ष विलास औरंगाबादकर यांनी दिली.

सभेची सुरुवात वाचनालयाचे अध्यक्ष औरंगाबादकर यांच्या प्रास्ताविकाने झाली. या वेळी ते म्हणाले, की हे सांस्कतिक सभागृह आहे. हा राजकीय आखाडा नाही. त्यामुळे सभासदांनी संयमाने सभेचे कामकाज चालू द्यावे. सभासदांनी त्यांच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून दिल्याबद्दल त्यांनी आभार मानले. ते म्हणाले, की सहा महिन्यांपासून लोकशाही पद्धतीने कामकाज सुरू आहे. त्यात वेळोवेळी सुधारणा करण्याचा आमचा प्रयत्न राहील. सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आम्ही आमच्या कामकाजाचा लेखाजोखा सभासदांपुढे ठेवणार आहोत. नव्याने सुरू करण्यात आलेसे कवितांचे दालन या उपक्रमाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असल्याचेदेखील त्यांनी सांगितले. संपूर्ण वर्षात दिवंगत झालेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. २९ जानेवारी व ५ मार्च २०१७ रोजी झालेल्या सभांच्या इतिवृताचे वाचन अॅड. भानुदास शौचे यांनी केले. या काळात पदच्युत पदाधिकाऱ्यांनी केलेल्या गैरव्यवहाराची चौकशी कशी सुरू आहे, याची विचारणा काही पदाधिकाऱ्यांनी केली. यावर चोरडिया समितीचा अहवाल प्राप्त होताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे वाचनालयाचे सचिव श्रीकांत बेणी यांनी सांगितले. या वेळी शिरोडे म्हणाले, की दोषींवर कारवाई करण्याचा कालावधी सांगण्यात यावा. त्यावर पदाधिकाऱ्यांनी कालावधी न सांगता लवकरात लवकर करू, असे आश्वासन दिले. गिरीश नातू यांनी आर्थिक ताळेबंद सादर केला. रात्री उशिरापर्यंत सभेचे कामकाज सुरू होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौरांचा प्रभाग कचरामय

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्वप्नातील स्वच्छ भारताची संकल्पना साकार करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशानुसार दि. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान ‘स्वच्छता ही सेवा’ हा उपक्रम देशभर राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शहरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. मात्र, या मोहिमेनंतरही खुद्द महापौरांचा प्रभागच ‘कचरामय’ असल्याची स्थिती दिसून येत आहे.

शहराच्या महापौरांचा प्रभाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रभाग १ मधील म्हसरूळ येथील कॉलनी परिसरातील रस्त्याच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचलेले असून, बऱ्याच ठिकाणचा कचरा अनेक दिवसांपासून उचललाच जात नसल्याने तो कुजून दुर्गंधी पसरून परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

म्हसरूळ येथील कॉलनी परिसरातील नागरिक अनियमितपणे येणाऱ्या घंटागाडीमुळे नागरिक त्रस्त आहेत. त्यामुळे जमा झालेल्या कचऱ्याची आजूबाजूच्या ठिकाणी विल्हेवाट लावली जाते. परिणामी परिसरात अस्वच्छता, घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शिवाय ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. कचरा उचललाच जात नसल्याने कुजून दुर्गंधी पसरली आहे. डासांचे प्रमाण व रोगराईदेखील वाढत आहे. महापौरांच्या निवासस्थानाच्या फलकापासूनच्या मुख्य रस्त्यावरदेखील ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसून येतात. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी विशेष लक्ष देण्याची मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

--

जनावरांचा वाढता वावर

महापौरांच्या प्रभागात मोकाट जनावरांचे प्रमाणदेखील वाढले आहे. कॉलनी रस्त्यावर ठिकठिकाणी जनावरांचा कळप बघायला मिळतो. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. परिसरातील मोकळ्या भूखंडांवर नागरिक सर्रासपणे कचऱ्याची विल्हेवाट लावतात. मोकळ्या भूखंडाशेजारीच रहिवासी इमारती, उद्याने आहेत. त्यामुळे या परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे भूखंडमालकांना, तसेच कचरा टाकणाऱ्यांना नोटीस देण्याची मागणी होत आहे.

--

पंचवटीतही कचऱ्याचे ढीग

स्वच्छता ही सेवा अभियान होऊनदेखील पंचवटीतील फुलेनगर, दिंडोरीरोड, हिरावाडीरोड, हनुमाननगर, विडी कामगारनगर, तपोवन परिसर, कपिला संगम येथील नदीकाठ आदी ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचल्याचे चित्र आहे. त्यामुळे स्वच्छता अभियान लोकप्रतिनिधींनी फोटोसेशनसाठी राबविले का, असा संतप्त सवाल परिसरातील नागरिक विचारत आहेत.

--

या भागात भेडसावतेय समस्या

म्हसरूळ परिसरातील सावरकरनगर, गीतानगर, स्नेहनगर, गुलमोहर कॉलनी, हरिहरनगर, वृंदावननगर, स्वामी समर्थ केंद्र, गणेशनगर, कलानगर, म्हाडा कॉलनी येथील कॉलनी रस्त्यांच्या कडेला ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. अनियमितपणे येणाऱ्या घंटागाड्यांमुळे ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले असल्याचे परिसरातील नागरिक सांगतात. शहरात नुकतेच स्वच्छता अभियान राबविण्यात आले असले, तरी महापौरांना त्यांच्या स्वतःच्या प्रभागाच्या स्वच्छतेचा विसर पडला की काय, असा प्रश्न प्रभागातील नागरिकांना पडला आहे.

--

आमच्या परिसरात मोठ्या प्रमाणात मोकळे भूखंड आहेत. काही तेथे नागरिक कचऱ्याची विल्हेवाट लावतात. त्यामुळे परिसरात अस्वच्छता व दुर्गंधी पसरते. डासांचे प्रमाणदेखील वाढले आहे. या समस्येकडे गांभीर्याने बघणे गरजेचे आहे.

-विशाल भोसले, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चेन स्नॅचर्सकडून १६ लाखांचा माल जप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात चेन स्नॅचिंग करणाऱ्या चौघा जणांच्या टोळक्यास शहर पोलिसांनी जेरबंद केले आहे. आणखी दोघे फरार असून, या टोळीकडून पोलिसांनी तब्बल १६ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित गुन्हेगारांपैकी तिघांना मध्य प्रदेशातील सैंदवा येथून तर उर्वरित संशयितांना अंबिवली व भिवंडी येथून ताब्यात घेण्यात आले आहे.

अतुल राजेश बामनका (१८, पिपलधार, सेंधवा मध्य प्रदेश), अशोक अर्जुननाथ जोगी (२६, निवाली रोड, सेंधवा) अशी दोन दिवसांपूर्वी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. तर वासिम शमिम पटेल (१९, सेंधवा), समीर मुशिर सैय्यद (४०, अंबिवलर, ता. श्रीरामपूर, जि. नगर) या त्यांच्या साथीदारांना यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. शहरात गुरूवारी (दि. १४) सकाळी सहा ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. या घटनेची दखल घेत पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी चेन स्नॅचिंग करणाऱ्या गँगला रडारवर घेण्याचे आदेश दिला. सहाही घटनांमध्ये गुन्हे करण्याची पद्धत एकसारखी असल्याची बाब घटनास्थळी भेट देणाऱ्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आली. त्या अनुषंगाने तपास करण्यात आला. सदर घटनांमध्ये इराणी टोळ्यांचा सहभाग असल्याचा अंदाज असल्याने पोलिसांनी शोध घेतला. सरकारवाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक डॉ. सिताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली निरिक्षक सारिका अहिरराव, शिवाजी भालेराव, पंकज पळशीकर, सुरेश शेळके, प्रवीण वाघमारे, प्रशांत मरकड, संतोष संगम, रवींद्र ठाकूर, सुनल जगदाळे , अरुण भोये, दीपक खरपडे आदींनी ठाणे जिल्ह्यातील अंबविली येथे छापा मारून समीर सैय्यद या संशयितास ताब्यात घेतले. यानंतर टोळीचा उलगडा झाला. त्याच्या ताब्यातील सुमारे १७ ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त केले. पोलिसांनी मध्यप्रदेश येथील सेंधवा या दुर्गम भागात पोहचून वसिम शमिम पटेल यास सर्वप्रथम अटक केली. तसेच त्याचे साथीदार अतुल बामनका व अशोक जोगी यांनाही अटक केली. या टोळीकडून एक कार, दोन महागड्या दुचाकी आणि १५ तोळे सोने तर अन्य गुन्ह्यातील सुमारे साडेआठ तोळे सोने असा सुमारे १६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांनी शहरात १४ चेन स्नॅचिंग व एक तोतया पोलिस असे १५ गुन्हे केल्याची कबुली दिली.

गुन्ह्यासाठी कारचा वापर

इराणी टोळीतील सर्व संशयित वेगवेगळ्या ठिकाणी राहत असले तरी त्यांच्यात समन्वय होता. या टोळीने चेनस्नॅचिंगसाठी नवीन मोडस ऑपरेंडी शोधून काढली. त्यानुसार, ही टोळी कार तसेच दुचाकीने शहरात दाखल होत असे. दुचाकीवरील चोरट्यांनी चेन स्नॅचिंग केली की ते थोड्याशा अंतरावर कारमध्ये बसून घेत. तर, कारमधील संशयित दुचाकी घेऊन पसार होत असे. चेन स्नॅचिंगनंतर नाकाबंदी लावणाऱ्या पोलिसांना सदर वर्णनाचा व्यक्ती दुचाकीवर दिसत नव्हता.

चेन स्नॅचिंग करणाऱ्या टोळीचा शोध लागला असून, तपासात आणखी काही महत्त्वपूर्ण बाबी समोर येतील. संशयित वेगवेगळ्या ठिकाणी राहणारे असून, त्यांनी संघटित गुन्हे केल्याचे पुरावे समोर येत आहे. त्यानुसार, संशयितावर मोक्क्का कलमानुसार कारवाई करण्याचा प्रयत्न आहे.
- डॉ. रवींद्रकुमार सिंगल, पोलिस आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

देवस्थान हद्दीबाहेर आज बोकडबळी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

सप्तशृंग गडावर दसऱ्याच्या दिवशी देवस्थानमार्फत दिला जाणारा बोकडबळी महसूल प्रशासनाने बंद केला असला, तरी देवस्थान हद्दीबाहेरील सुरक्षित जागेवर सालाबादाप्रमाणे होणारे सर्व विधी व बोकडबळी परंपरेनुसार करण्याची तयारी गड ग्रामपंचायत पदाधिकारी तसेच ग्रामस्थांनी केली आहे.

गेल्यावर्षी या विधिदरम्यान केलेल्या फायरिंगमुळे बंदुकीच्या बुलेटचे छर्रे उडून १२ भाविक जखमी झाले होते. त्यामुळे यावर्षापासून प्रशासनाने बोकडबळीची प्रथा बंद करण्याचा निर्णय घेतला. यामुळे देवस्थान हद्दीबाहेर असलेल्या व्यायामशाळेजवळ हा विधी करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. दसऱ्याला बोकडाची शिवालय तलाव ते शाळा अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. कुठलीही मानवंदना यंदा दिली जाणार नसल्याचे राजेश गवळी यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सेंट्रल गोदावरीच्या सभेत आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

गंगापूर पंचक्रोशीतील शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करण्यात मोलाची भूमिका बजावणाऱ्या गोदावरी सेंट्रल कृषक सेवा सहकारी बँकेची सभा आरोप-प्रत्यारोपांनी गाजली. कर्जवसुली व गरजू शेतकऱ्यांना कर्जवाटप याबाबत ठोस चर्चा झाली नसल्याने अनेक सदस्यांनी नाराजी व्यक्त केली.

बँकेचे अध्यक्ष मधुकर खांडबहाले यांच्या उपस्थित ४२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा बँकेच्या प्रागंणात पार पडली. अध्यक्ष खांडबहाले यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सर्वोतोपरी प्रयन्त केला जात असल्याचे सांगितले. तसेच शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाच्या व्याज दरात कपात करण्याबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलणी सुरू असल्याचे सांगितले. यावेळी मंचावर उपाध्यक्ष अरुण पाटील, संचालक दिनकर पाटील, तानाजी पिंगळे, दौलत पाटील, रामदास पिंगळे यांसह संचालक मंडळ व सभासद उपस्थित होते.

वार्षिक सभेत सभासदांनी कर्जवसुली व शेतकऱ्यांसाठी वेळेवर होणारा आर्थिक सहाय्य यावर ठोस चर्चा झाली नसल्याने सभासदांनी नाराजी व्यक्त केली होती. बँकेचे माजी अध्यक्ष व संचालक दिनकर पाटील बोलण्यासाठी उभे राहिल्यावर माजी महापौर दशरथ पाटील यांनी हस्तक्षेप केला. दिनकर पाटील यांचा बोलणे मधेच तोडत बोलू देण्यास टाळले. दिनकर पाटील यांनी विविध बाबी यावेळी उपस्थित केल्या. परंतु, अन्य काही संचालकांकडून केवळ आवाज करत सभेच्या कामकाजात गोंधळ निर्माण करण्यात आला. दरम्यान, दिनकर पाटील यांनी आपली बदनामी केल्याप्रकरणी संस्थेच्या १२ संचालकांविरोधात पाच कोटी रुपयांचा नुकसान भरपाईचा दावा दाखल केला असल्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आयशरची धडक; वीज कंपनीचे नुकसान

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भरधाव आयशर मालट्रकने धडक दिल्याने विजेच्या दोन खांबांचे नुकसान झाले. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये वाहनचालकाविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला. सोमवारी (दि. २५) सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती.

गंगापूररोडवरील सप्तशृंगी देवी मंदिर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ हा प्रकार झाला. भरधाव येणाऱ्या आयशरने (एमएच ४३ बीजी २८१०) वीज कंपनीच्या दोन सिमेंट पोलला धडक दिली. यात पोल व त्यावरील वायरिंगचे नुकसान झाले. ही घटना चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने घडली होती. घटनेचा अधिक तपास हवालदार पाटील करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


डीजे ध्वनीप्रदूषण; दोघांविरूद्ध गुन्हा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रास-दांडियात डीजेचा आवाज वाढवून ध्वनी प्रदूषण कायद्याचे उलंघन केल्याप्रकरणी दोघांविरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भूषण विजय कापडणे (रा. महाराष्ट्र कॉलनी, सातपूर) आणि सचिन रंगनाथ तिडके (रा. रथचक्र चौक, इंदिरानगर) अशी संशयितांची नावे आहेत. संशयितांनी विनापरवाना सिटीसेंटर मॉल परिसरातील ठक्कर डोम भागात रास-दांडियाचे आयोजन करून डीजे साउंड सिस्टीमचा मर्यादापेक्षा जास्त आवाज ठेवून न्यायालयीन आदेशाचे उलंघन केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक वाघ करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारमधून लॅपटॉप लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी लॅपटॉप व महत्त्वाची कागदपत्रे चोरून नेली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. मनीष रमेश पटेल (रा. सत्यम पार्क, नाशिक-पुणे महामार्ग) यांनी फिर्याद दिली. पटेल हे सोमवारी (दि. २५) रात्री कामानिमित्त मुंबईनाका भागात गेले होते. महामार्ग बसस्थानकाकडून चांडक सर्कलच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर त्यांनी आपली कार (एमएच १५ सीटी ६८४७) पार्क केली. चोरट्यांनी कारची काच फोडून लॅपटॉप व शैक्षणिक आणि महत्त्वाची कागदपत्रे असलेली बॅग चोरून नेली. घटनेचा अधिक तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक बोडके करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिलेशी अश्लील संभाषण

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मोबाइलद्वारे कॉल करून एकाने ३२ वर्षीय महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी महेश पाटील नावाच्या अज्ञात मोबाइलधारकाविरुद्ध सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मूळ जळगाव जिल्ह्यातील आणि सध्या अशोकस्तंभ भागात राहणाऱ्या महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. गुरूवारी सकाळी ही घटना घडली. पीडित महिला घरात एकटी असतांना त्यांच्या मोबाइलवर कॉल आला. महेश पाटील बोलत असल्याचे सांगून त्याने महिलेच्या पतीबाबत विचारपूस केली. तसेच काही खासगी विचारणा करण्यास सुरुवात केली. यावेळी संतप्त महिलेने त्यास जाब विचारीत पुन्हा फोन करू नको, असा दम दिला. त्यावेळी संशयित आरोपीने थेट शरीरसुखाची मागणी करीत महिलेस अश्लिल भाषा वापरून विनयभंग केला. घटनेचा अधिक तपास उपनिरीक्षक राठोड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चंगळवाद्याविरोधात आणखी एक गुन्हा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

गुन्हे शाखेने पकडलेल्या चंगळ करणाऱ्या संशयिताविरोधात उपनगर पोलिस ठाण्यात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधव बापू आहेर (२४, रा. कसबे-सुकेणे, ता. निफाड) या संशयितास आठ दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्या चौकशीत पाचहून अधिक गुन्हे उघडकीस आणण्यात यश आले आहे. त्यानंतर शिवाजीनगर येथील रहिवासी नारायण मारूती चौधरी (५५) यांनी उपनगर पोलिस ठाण्यात माधव आहेर विरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली आहे.

पाच सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास शिवाजी नगर येथील स्टेट बँकेच्या एटीएममध्ये चौधरी गेले होते. त्यावेळी माधवने त्यांना धक्का देत त्यांच्या हातातील एटीएम कार्ड खाली पाडले. त्यावेळी माधवने चौधरी यांच्याकडील एटीएम स्वत:कडे ठेवत त्यांना दुसऱ्याचे एटीएम कार्ड दिले. त्यानंतर चौधरी यांचे एटीएम कार्ड वापरून माधवने ६३ हजार २०० रुपये काढून घेत चौधरींची फसवणूक केली. दरम्यान, पोलिस तपासात माधवने अनेकांना याचप्रमाणे गंडा घालून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. त्याने हे पैसे जुगार आणि मुंबई, ठाणे येथील चंगळवादात उडवल्याचीही कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कोटमगाव यात्रेत चोरट्यांचा सुळसुळाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

कुठलीही यात्रा असो की गर्दीचे ठिकाण, चोरट्यांकडून हमखास डल्ला मारला जातो. नवरात्रीनिमित्त कोटमगावच्या यात्रेत अनेक स्टॉल्समधून वस्तूंवर चोरट्यांनी हात साफ केला. या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांसह विक्रेत्यांनी केली आहे.

कोटमगाव यात्रेत यंदाही अनेकांनी आपली छोटी मोठी दुकाने (स्टॉल्स) थाटले आहेत. या स्टॉल्सच्या मंडपाचे कापड फाडून रात्री चोरट्यांनी हात साफ केल्याने दुकानदार चिंतेत आहेत. बाळकृष्ण दौंडे (तालुका कोपरगाव) यांनी यात्रेत लावलेल्या ज्वेलरी, बांगडीच्या दुकानातील हिरो होंडा कंपनीचे तीस हजार रुपये किमतीचे जनरेटर चोरट्यांनी चोरुन नेले. तर विशाल सोनार (येवला) यांच्या इमिटेशन ज्वेलरी दुकानातील ज्वेलरी बॉक्सवर चोरट्यांनी हात साफ केला. यात त्यांना १५ हजार रुपयांचा फटका बसला. भगवान धनगे (तालुका श्रीरामपूर) यांच्या दुकानातून चोरट्यांनी गॅस सिलिंडर गायब केले. संस्थान तसेच ग्रामपंचायतीच्या वतीने यात्रा परिसरात अनेक सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मोठा पोलिस फौजफाटाही तैनात आहे. तरीही चोरट्यांनी केलेल्या या धाडसी चोऱ्यांबद्दल आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ‘सीसीटीव्ही’ फुटेज तपासले असता त्यात काहीच आढळून आले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, याप्रकरणी येवला शहर पोलिसात अदयापपर्यंत कुठलाही गुन्हा दाखल झाला नसल्याचे समजते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images