म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड
देशातल्या ज्येष्ठ नागरिकांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. त्यातच पेन्शन व सरकारी कारणांसाठी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये खाते असणे अनिवार्य आहे. परंतु, राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जाताना ज्येष्ठांची होणारी परवड कोण रोखणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे. निवृत्त झालेल्या ज्येष्ठांनी राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये स्वतंत्र कक्ष देण्यात यावा, अशीही मागणी केली आहे. अनेकदा वयोवृद्ध झालेल्यांना बँकेत येताना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागतात. त्यातच आजाराने पीडित असलेल्यांना सर्वाधिक त्रास राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये येताना होत असल्याचे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे.
सेवानिवृत्त झालेल्यांची संख्या गेल्या काही वर्षांत झपाट्याने वाढली आहे. गेल्याच महिन्यात पेन्शनधारकांचा मोर्चा भविष्य निर्वाह निधी कार्यालय आयटीआय पुलाच्या बाजूला पार पडला. यावेळी शेकडोंच्या संख्येने सेवानिवृत्तांची एकच गर्दी झाल्याने वाहतुकीची मोठी कोंडीही झाली होती. यानंतर सेवानिवृत्त झालेल्या शिष्टमंडळाने पीएफ आयुक्तांकडे पेन्शनबाबत व बँकांमध्ये होणाऱ्या त्रासाची व्यथा मांडली होती. परंतु, आजही ज्येष्ठांना राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये जातांना परवड होत असल्याचे समोर आले आहे.
शहरातील राजीव गांधी भवनाच्या परिसरात अनेक बँका असून त्याठिकाणी अनेकवेळा ज्येष्ठांना बँकेत जाण्यासाठी तसेच उतरण्यासाठी एकमेकांचा सहारा घ्यावा लागतो. ते बँकेत गेल्यावर पैसे काढण्याची स्लिप भरून रांगेत उभे राहतात. परंतु, दोन काऊंटरपैकी केवळ एकच काऊंटर सुरू असल्यास एकाच लाइनीत उभे राहण्याची वेळही ज्येष्ठांवर येत आहे. याबाबत राष्ट्रीयीकृत बँकांनाही योग्य समाधानकारक उत्तर देता आलेले नाही. काही ठिकाणी तर कर्मचारी नसल्याचेही निदर्शनास आल्याचे ज्येष्ठांनी सांगितले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट