महसूल विभागातर्फे दिल्या जाणाऱ्या दाखले वितरणात सुसूत्रता आणावी यासह विविध मागण्यांसाठी राज्यभरातील तलाठ्यांनी मंगळवारपासून (दि. ३) बेमुदत संपाला सुरुवात केली. त्यामध्ये जिल्ह्यातील ५५० तलाठ्यांचा समावेश आहे. त्यामुळे ग्रामपातळीवर दाखले वितरणाचे काम खोळंबणार आहे.
महसूल विभागाचा गावपातळीवरील प्रतिनिधी असलेल्या तलाठ्याला १ ते २१ गाव नुमन्यांतर्गत विविध दाखले वितरित करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. त्यामध्ये विविध प्रकारच्या २४ दाखल्यांचा समावेश आहे. बहुतांश दाखले तलाठीच देत असल्याने पोलिस, कृषी, शिक्षण विभागाकडून सर्वसामान्य नागरिकांमार्फत अथवा मार्गदर्शन नसलेल्या दाखल्यांची मागणी केली जाते. चाळीसगावचे दिवाणी न्यायाधीश तसेच वाशी येथील पोलीस उपनिरीक्षकांनी कोणत्या आधारावर तुम्ही उत्पन्नाचे दाखले देतात, अशी विचारणा करीत कारणे दाखवा नोटीस दिली होती. त्यामुळेच तलाठी संतापले असून सरकार दाखल्यांबाबत मार्गदर्शन सूचना काढत नाही तोपर्यंत दाखले वितरित न करण्याचा निर्णय घेतला आहे.
तलाठ्यांमार्फत जिल्ह्यातील सातबारा तसेच इतर कागदपत्रांचे तसेच ई-फेरफारचे कामकाज सुरू आहे. परंतु, त्यातही सर्व्हर डाउनचा अडथळा येत असून त्रस्त झालेल्या तलाठ्यांनी सर्व्हरचा स्पीड न वाढल्यास बुधवारपासून (दि. ११) सातबारा संगणीकरणाच्या कामावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. तलाठ्यांनी पुकारलेल्या संपामुळे जिल्ह्यात दररोज वितरित होणाऱ्या आठ हजार दाखल्यांचे काम थंडावणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा तलाठी संघाचे अध्यक्ष एन. वाय. उगले, कार्याध्यक्ष एम. एल. पवार व सरचिटणीस बी. व्ही. खेडकर यांनी दिली.
दाखले वितरण ठप्प
जिल्हाभरातील ५५० तलाठी असून या संपात सहभागी झाले आहेत. एक तलाठी प्रतिदिन सरासरी १५ दाखले वितरित करतो. परंतु, हे काम आता ठप्प झाले आहे. सरकारने तातडीने तोडगा न काढल्यास या संपाचा फटका सर्वसामान्य
नागरिकांना बसणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट