ऑल इंडिया मोटार ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या वतीने विविध मागण्यासाठी पुकारण्यात आलेल्या बंदला नाशिक जिल्ह्यात उत्तम प्रतिसाद लाभला जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक वगळता इतर वाहतूक बंद ठेवण्यात आली. याचा फटका औद्योगिक क्षेत्राला बसला.
मालवाहतुकीला जीएसटीमध्ये जास्त कर लावल्याने व डिझेलच्या सातत्याने वाढत असलेल्या किमतीमुळे देशभरातील मालवाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी सोमवार व मंगळवार असे दोन दिवस देशव्यापी संपाची हाक दिली. त्याला नाशिक जिल्ह्यातील वाहतूकदारांनी चांगला प्रतिसाद दिला. जिल्ह्यातील सुमारे ८० टक्के मालवाहतूकदार संपात सहभागी झाले. जिल्ह्यातील सुमारे ५ हजार गाड्या उभ्या होत्या. सोमवारी व मंगळवारी प्रवासात असलेली वाहने वगळता इतर सर्व वाहने संपात सहभागी झाली. माल वाहतूकदारांच्या संपामुळे मुंबई-आग्रारोडवरील वाहतूक तुरळक होती. सरकारने या संपाची गांभीर्याने दखल घेतली नाही तर देशव्यापी बेमुदत संपावर जाण्याचा संघटनेचा विचार असल्याचा इशारा वाहतुकदारांनी दिला आहे. संपामुळे मालवाहतूक ठप्प झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा संघटनेने केला आहे.
सरकारने जीएसटीची अन्यायकारक आकारणी करू नये, डिझेलचे दर कमी करावेत, मालवाहतूकदारांना वाहतूक पोलिस, आरटीओ यांच्यामार्फत होणारा त्रास कमी होण्यासाठी उपाययोजना कराव्यात, टोल संदर्भातील व्यावहारिक धोरण आखावे आदी विविध मागण्यांसाठी हा देशव्यापी संप पुकारण्यात आला आहे. रविवारी मध्यरात्रीपासून हा संप सुरू झाल्याने ऐन दिवाळीच्या तोंडावर देशभरातील मालवाहतुकीचे बुकिंग व डिलिव्हरीत अडचणी निर्माण झाल्या आहेत.
जिल्ह्यात अत्यावश्यक सेवा वगळत सर्व मालवाहतूक ठप्प होती. त्याचा परिणाम औद्योगिक क्षेत्राला झाला. अनेक कारखान्यांना कच्च्या मालाचा पुरवठा न झाल्याने उत्पादन प्रक्रिया थांबवावी लागली. सरकारने आमच्या मागण्यांची दखल न घेतल्यास दिवाळीनंतर बेमुदत संप केला जाणार आहे. होणाऱ्या परिणामांना सरकार जबाबदार असेल.
- अंजू भगवानदास सिंघल, व्यावसायिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट