सटाणा शहर स्वच्छतेच्या गप्पा मोठ्या प्रमाणात होत असल्या तरीही शहरातील आरोग्य यंत्रणा पूर्णतः ढासळली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिग, पाण्याचे डबके साचले आहेत. डास व मच्छरांची उपत्ती वाढून साथींच्या आजारांनी ठाण मांडले आहे. यामुळे शहरात व्हायरल इन्फेक्शन वाढले आहे. शहारातील ग्रामीण रुग्णालयासह खासगी दवाखान्यात रुग्ण मोठ्या प्रमाणात दिसत आहेत.
गेल्या तीन महिन्यांपासून पाठ फिरवलेल्या वरूण राजाने परतताना शहराकडे मोर्चा वळवला आहे. शहरात गेल्या आठ दिवसांपासून पाऊस सुरू आहे. परिणामी शहरात सर्वत्र पाण्याचे डबके, घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. नववसाहतीत दुर्गंधी पसरली आहे. नववसाहतील अद्यापही बहुतांश भागात रस्ते कच्चे आहेत. त्यावर खड्डे पडल्यामुळे पाण्याचे डबके तयार होत आहेत. काही भागात तर गवताचे साम्राज्य वाढल्याने डासांची निर्मिती झाली आहे. परिणामी सांयकाळी शहरासह नववसाहतील डासांचा हल्ला होतो. यामुळे डेंग्यू, मलेरिया, थंडी, ताप असे आजाराचे प्रमाण वाढले आहे.पालिका प्रशासनाने सुरुवातीला शहरातील वसाहतीत वाढलेले गवत काढले. मात्र परतीच्या पावसाने ही समस्या जैसे थे झाली. बहुतांश ठिकाणी तणनाशक मारल्याने स्वच्छता दिसत असली तरी या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जात नसल्याने दुर्गंधी पसरली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट