October 17, 2017, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
शहरातील सायाने बुद्रुक परिसरातील घोडेपीर दर्गाजवळील एका तलावात येथील दोघ मुलांचा बुडून मृत्यू झाला. यसुद अमीर खालिद अहमद (वय १२, रा. पवारवाडी) व अरबाज युनुस खान (वय १२, रा. पवारवाडी) असे या दोघ मृतांची नावे आहेत.
पवारवाडी भागातील चष्मे गुलाब या मदरशात हे दोघे शिकत होते. सोमवारी त्यांनी सकाळची नमाज पठण केल्यानंतर मदरसातून बाहेर पडले असता थेट घरी न जात घोडेपीर दर्ग्याजवळ असलेल्या २० ते २५ फूट खोल तलावानजीक केले. याठिकाणी अरबाज तलावातील पाण्यात बुडाल्याने त्यास वाचवण्यासाठी यसूदने पाण्यात उडी घेतली. मात्र खोल पाणी व गाळ असल्याने ते दोघे त्यात फसले व त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान परिसरातील नागरिकांनी घटनेची माहिती अग्निशामक दलास दिल्यानंतर त्या दोघांचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. या प्रकरणी पवारवाडी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
माहिती अधिकारात वैयक्तिक माहितीची मागणी करून त्याद्वारे तब्बल एक लाख रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कथित तिघा पत्रकारांना मुंबई नाका पोलिसांनी सोमवारी रात्री अटक केली. या तिघांना कोर्टाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली असून, त्यांनी अशा प्रकारे किती जणांची लूट केली आहे हे पोलिस तपासात समोर येऊ शकते.
स्टिफन अँथोनी आढाव (वय ३७, रा. स्वारबाबानगर, सातपूर), मायकल जॉन खरात (३०, इंगळेनगर, जेलरोड) व त्यांचा मित्र सचिन रघुनाथ तुपे (स्वारबाबानगर, सातपूर) अशी खंडणी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या कथित पत्रकारांची नावे आहेत. प्रहार या स्थानिक वृत्तवाहिनीचे पत्रकार, कॅमेरामन म्हणून काम करणाऱ्या दोघांसमवेत त्यांच्या एका मित्राचा यात समावेश आहे.
या प्रकरणी सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक हरिश्चंद्र पगार यांच्या तक्रारीनुसार, कथित पत्रकार मायकल खरात याने माहितीच्या अधिकारात काही वैयक्तिक स्वरूपाची माहिती मागविली होती. माहिती समोर येऊ द्यायची नसल्यास पगार यांनी एक लाख रुपयांची खंडणी द्यावी, अशी धमकी मायकलने दिली. याबाबत तडजोड होऊन ही रक्कम २० हजार रुपये इतकी निश्चित झाले. मात्र, संशयित आरोपींच्या मागणीबाबत अधीक्षक पगार यांनी मुंबई नाका पोलिस स्टेशनकडे तक्रार दिली. त्यानुसार सोमवारी रात्री १० वाजेच्या सुमारास सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात सापळा रचण्यात आला. लाचखोर मायकल खरात यासह इतर दोघे खंडणीची रक्कम स्वीकारण्यासाठी पोहोचले. ते रक्कम स्वीकारत असताना दबा धरून बसलेल्या पथकाने त्यांना अटक केली. रात्री उशिरापर्यंत पंचनामा करून त्यांच्या विरोधात मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, मंगळवारी संशयितांना कोर्टात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शहरात असे प्रकार वाढल्याची चर्चा असून, गैरमार्गाने पैशांची मागणी होत असल्यास नागरिकांनी पोलिसांशी संपर्क साधवा, असे आवाहन करण्यात आले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2017, 3:30 pm
बागेश्री पारनेरकर, कॉलेज क्लब रिपोर्टर
दिवाळीच्या प्रारंभी धनत्रयोदशीच्या दिवशी इंदिरानगर येथे कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांच्या नृत्यांगण कथक नृत्य संस्थेने ‘नृत्यदीपसंध्या’ हा कार्यक्रम सादर केला. त्यामुळे परिसरातील नागरिकांची धनत्रयोदशीची संध्या अविस्मरणीय ठरली.
कृतार्थ ज्येष्ठ नागरिक संघ येथे दिवाळीनिमित्त कार्यक्रम सादर करण्याचे नृत्यांगण कथक संस्थेचे हे सलग सातवे वर्ष आहे. दर वर्षीप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांनी आणि प्रेक्षकांनी या कार्यक्रमाला उस्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष विनायक पुरोहित, उपाध्यक्षा मनीषा कुलकर्णी, कार्यवाह वसंत चिकोडे आणि नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांनी दीप प्रज्वलन केले. कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिक संघाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रकाशयोजना आणि ध्वनिसंयोजन अरविंद भवाळकर यांनी केले. क्षमा देशपांडे हिने सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात निहारिका देशपांडे, प्रचीती भावे, विशाखा अस्वले, विश्वा देशपांडे, बागेश्री पारनेरकर, तन्वी खर्डे, देवयानी अवसरकर, तन्वी कुलकर्णी, गायत्री पाटील यांनी नृत्य प्रस्तुत केले.
--
लयबद्ध अदाकारी
कार्यक्रमाची सुरुवात नृत्यांगना कीर्ती भवाळकर यांच्या शिववंदनेने झाली. संस्थेच्या ज्येष्ठ विद्यार्थिनींनी लयबद्ध पदन्यास आणि नजरेच्या अदाकारी दाखवत दादरा तालातील ‘कौन अलबेली के नैना रसिले ही ठुमरी सादर केली. त्यानंतर कौशिकी चक्रवर्ती यांनी गायलेल्या ‘ए रे मना तू श्याम की कर वंदना’ ही कृष्णवंदना प्रस्तुत केली. केहेरवा तालातील ‘सजन बिना ना लागे जिया मोरा’, ‘सावन की ऋत आयी रे सजनीया’ आणि झपतालातील कृष्णाचे वर्णन असलेली बिंदादीन महाराजांनी रचलेली ‘श्याम छबी अती बनी’ या पारंपरिक बंदिशी सादर केल्या. पं. भीमसेन जोशी यांनी स्वरबद्ध केलेल्या एकतालातील ‘जय दुर्गे’ या दुर्गास्तुतीच्या सादरीकरणाला रसिकांची विशेष दाद मिळाली. कार्यक्रमाचा शेवट ‘शिव के मन शरण हो’ या त्रितालातील भैरवीने झाला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
कविवर्य नारायण सुर्वे सार्वजनिक वाचनालयातर्फे सुर्वे साहित्य पुरस्कार आणि कैलास पगारे विशेष काव्य पुरस्कार वितरण सोहळा नुकताच झाला. प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे तसेच शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांची उपस्थिती होती.
यंदाचा नारायण सुर्वे साहित्य पुरस्कार सुशीलकुमार शिंदे यांच्या ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ या कवितासंग्रहाला तसेच प्रसाद कुमठेकर यांच्या ‘बगळा’ कादंबरीला व प्रा. सुनील विभूते यांच्या विस्मयकारी या ज्ञानकथेला प्राप्त झाला. कैलास पगारे काव्य पुरस्कार सारिका उबाळे यांच्या ‘शिरस्नाता’ या काव्यसंग्रहाला देण्यात आला. पाच हजार रुपये रोख, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे पुरस्कारांचे स्वरूप होते.
यावेळी कांबळे म्हणाले की, साहित्य आणि जीवनाचे नाते जोडणाऱ्या सुर्वे यांच्या साहित्याने कष्टकरी, कामगारांना मूल्य आणि लढाईचे बळ दिले. मराठी साहित्य कला-सौंदर्यात अडकले होते. नारायण सुर्वे आणि अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याने क्रांती करत सातासमुद्रापार झेंडा फडकवला. तसेच रामचंद्र जाधव यांनी मराठी साहित्यात बंडाचे निशाण फडकावत नारायण सुर्वे यांनी कष्टकऱ्यांना लढण्याचे बळ दिले. त्यांनी कवितेतून शेतकरी, कामगार, शोषित वर्गावरील अन्यायाला वाचा फोडली, असे मत व्यक्त केले.
परशुराम साईखेडकर नाट्यगृहात हा सोहळा झाला. यावेळी व्यासपीठावर यशोधरा पगारे, राजू नाईक उपस्थित होते. डॉ. हेमलता पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. प्रशांत देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कारार्थी कलाकृतींचा परिचय प्रा. डॉ. विवेक खरे यांनी करून दिला.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
धनत्रयोदशीनिमित्ताने घरातील पारंपरिक दागिन्यांचे पूजन केले जाते. परंतु, संचित धनात वृद्धी व्हावी, यासाठी बाजारातून सोने-खरेदी करण्यावरही अनेकांचा भर असतो. सोने खरेदीसाठी प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या सुवर्णबाजारात धनत्रयोदशीला मोठी उलाढाल झाली. चोख सोन्यासाठी मंगळवारी ३०,८०० तर हॉलमार्कसाठी ३०,००० रुपये भाव होता. तसेच चांदी ४२,००० रुपये असल्याने बाजारात चांगली उलाढाल झाली.
धनत्रयोदशी व लक्ष्मीपूजनाला आपल्याला हव्या त्या शैलीतील, वजनाचे दागिने, तुकडे मिळावेत यासाठी अनेकांनी प्रसिद्ध सोन्याच्या पेढ्यांवर आगाऊ नोंदणी करून ठेवल्याची माहितीही यावेळी विक्रेत्यांनी दिली. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या धनत्रयोदशीला खरेदी करणे शुभ मानले जाते. दिवाळीच्या सणाची सुरुवातही धनत्रयोदशीला सोने घेऊन केली जाते अशी प्रथा आहे. धनत्रयोदशीला सोने घेऊन लक्ष्मी पूजनाच्यावेळी सोन्याची पूजा केली जाते. सोने खरेदीचे माहेरघर म्हणून प्रसिद्ध असलेल्या नाशिकच्या सुवर्ण बाजारात सोने-चांदीचे शिक्के, लक्ष्मी, सरस्वती तसेच गणेशाच्या सोन्याच्या शिक्क्यांना मोठी मागणी होती.
महिलावर्गासाठी पसंतीचे दागिन्यांचे विविध डिझाइन उपलब्ध असल्याने सराफगल्लीत सकाळपासूनच गर्दी झाली होती. त्याप्रमाणे बाजारात गर्दी झाली. गेल्यावेळपेक्षा यावर्षी सोन्याचा भाव जास्त असला तरी आणखी दोन तीन दिवस सोने खरेदी चांगली होईल, अशी आशा विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे. आजचा बाजार हा अगदी अनपेक्षित होता. धनत्रयोदशीला सोने खरेदी होते ही पूर्वपरंपरा आहे. परंतु, इतका चांगला बाजार मिळेल असे वाटत नव्हते. आज सोन्या-चांदीची चांगलीच उलाढाल झाली.
- अक्षय देवळालकर, सोन्याचे व्यापारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सुखमय जीवनाची मंगलकामना घेऊन आलेल्या दीपावलीने सध्या सर्वत्र चैतन्य संचारले असून, शहरात मंगळवारी धनत्रयोदशी उत्साहात साजरी करण्यात आली. धन्वंतरी देवतेचे पूजनही करण्यात आले.
धनत्रयोदशीला सोने खरेदी केल्यास धनसमृद्ध होते, असे मानले जात असल्याने सोने-चांदी खरेदीलाही अनेकांकडून पसंती देण्यात आली. अश्विन वद्य त्रयोदशी अर्थात, धनत्रयोदशीनिमित्त वस्त्रालंकाराची खरेदी, तसेच उपवास करण्यात आला. घरातले द्रव्य व अलंकार पेटीतून काढून पूजन करण्याकडे अनेकांचा कल दिसून आला. सायंकाळी तिळाच्या तेलाचे दिवे लावत त्याच्या वातीचे टोक दक्षिणेला ठेवून यमदीपदान करण्यात आले. घराघरांत धने व पत्री खडीसाखर देवासमोर ठेवण्यात आली. हिशेबाच्या नव्या वह्यांचा वापर या दिवसापासून सुरू करण्याची परंपरा यंदाही व्यापारी बांधवांनी जोपासली.
घरोघरी कुबेर, विष्णू, लक्ष्मी, योगिनी, गणेश, नाग आणि द्रव्यनिधी यांची पूजा करून नैवेद्य दाखविण्यात आला. नागरिकांकडून यथाशक्ती दानही करण्यात आले. धनत्रयोदशीला अनेकांनी सायंकाळी दिवा तेलाने भरून त्याची पूजा केली आणि तो दाराजवळ, धान्याच्या राशीजवळ ठेवला.
भागवत पुराणात विष्णू भगवानांच्या चोवीस अवतारांत धन्वंन्तरी भगवानाचा समावेश करण्यात आला आहे. मंगळवारी धन्वंतरी देवतेचे पूजनही करण्यात आले. धन्वंतरीपूजनप्रसंगी सर्वांना दीर्घायुष्य आणि आरोग्य लाभावे, अशी कामना करण्यात आली. साळीच्या लाह्या, बत्तासे, धने, गुळ असा प्रसाद वाटण्यात आला. काहींनी कडुनिंबाच्या पानांचे बारीक तुकडे आणि साखर प्रसाद म्हणून वाटली.
--
आज नरक चतुर्दशी
आज, बुधवारी (दि. १८) नरक चतुर्दशी साजरी होत आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून उटणे लावून स्नान करण्याला प्राधान्य देण्यात येते. हजारो स्त्रियांना डाबून ठेवणारा नरकासूर प्रजेचाही खूप छळ करीत असे. भगवान श्रीकृष्णांनी त्याचा अश्विन कृष्ण चतुर्दशीला वध करून स्त्रियांची मुक्तता केली. नरकासुराने श्रीकृष्णाकडे वर मागितला, की आजच्या तिथीला जो मंगलस्नान करेल त्याला नरकाची पीडा होऊ नये. म्हणून नरक चतुर्दशीला पहाटे अभ्यंगस्नान करणे महत्त्वाचे मानले आहे. नरक चतुर्दशीच्या दिवशी यमतर्पण करावयास सांगितले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प
ऐन दिवाळीच्या दिवसांत देवळाली कॅम्पमध्ये घरगुती गॅस सिलिंडरचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली असून, सिलिंडर मिळविण्यासाठी येथील वितरकांकडे चकरा माराव्या लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे.
गेले काही दिवस ही समस्या भेडसावत असली, तरी पुरवठा सुरळीत करण्यासाठी भारत गॅस कंपनीने ठोस पावले उचललेली नाहीत. हा पुरवठा सुरळीत होण्यासाठी किमान आठवडा लागण्याची शक्यता लागणार असल्याचे येथील वितरकांनी सांगितले आहे. देवळालीच्या विविध भागातील गॅस ग्राहकांना भारत पेट्रोलियमच्या एम्पायर गॅस स्टोअर्स या गॅस एजन्सीकडून सिलिंडरचा पुरवठा केला जातो. मात्र, गेल्या १५-२० दिवसांपासून ऑनलाइन नोंदणी करूनदेखील या एजन्सीकडून वेळेवर सिलिंडर मिळत नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे घरोघरी दिवाळीचा फराळ बनविण्याची पंचाईत झाली आहे. सिलिंडरची नोंदणी केल्यावर त्याचा पुरवठा होण्यासाठी किमान एक महिन्याचा कालावधी लागत असल्याचा आरोप करत तातडीने हा पुरवठा सुरळीत करण्याची नागरिकांनी केली आहे.
यासंदर्भात भारत कंपनीचे जिल्हा वितरण अधिकारी विशाल काबरा यांच्याशी फोनवर विचारणा करण्यासाठी संपर्क
केला असता संपर्क होऊ शकला नाही. याबाबत येथील व्यवस्थापक अरुण कासार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी असा तुटवडा असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. येत्या ५ ते ६ दिवसांत गॅस सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होईल,असे त्यांनी ‘मटा’शी बोलताना सांगितले. मात्र, तोपर्यंत नागरिकांना ऐन सणाच्या दिवसात दुसरीकडे सिलिंडर मागण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
---
आम्ही आठ दिवसांपासून गॅस सिलिंडर मिळण्याकामी नोंदणी केली असूनदेखील सिलिंडर मिळत नसल्याने सणाच्या दिवसांत लोकांकडून उसनवार सिलिंडर मागण्याची वेळ आली आहे.
-पोपट जाधव, ग्राहक
--
नोंदणी करून दहा दिवस उलटल्याने संबंधित वितरकाकडे सिलिंडरची मागणी करण्यासाठी गेलो असता सिलिंडरच उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले.
-रमेश धिवंदे, ग्राहक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
मुंबई येथे पार पडलेल्या ३४ व्या राज्य नेमबाजी स्पर्धेत नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे पोलिस नाईक प्रभाकर मधुकर आंबेकर यांनी ५० मीटर फ्री पिस्टल या प्रकारात सुवर्णपदक मिळवले. ही स्पर्धा ८ ते १५ ऑक्टोबर या दरम्यान पार पडली. स्पर्धेत राष्ट्रीय तसेच राज्यपातळीवरील खेळाडूंनी सहभाग नोंदवला.
आंबेकर हे राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू असून, त्यांनी यापूर्वी राज्यस्तरीय व अखिल भारतीय पोलिस नेमबाजी स्पर्धेमध्ये यश मिळवलेले आहे. आंबेकर हे क्रीडा मानसतज्ज्ञ स्वर्गीय भिष्मराज बाम यांचे शिष्य आहेत. आंबेकर यांची केरळ येथील त्रिवेंद्रम येथे होणाऱ्या ६१ व्या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेने प्रीमियम वाढीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविल्यामुळे नाराज झालेल्या बांधकाम व्यावसायिकांनी मंगळवारी क्रेडाईच्या नेतृत्वाखाली पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेऊन त्यांच्याकडे प्रीमियम वाढीला विरोध दर्शवला. क्रेडाईचे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी पालकमंत्र्यांना प्रीमियमचा विषय समजून सांगत शहरातील घरांच्या किमती वाढतील असा दावा केला. त्यावर पालकमंत्री गिरिश महाजन यांनी क्रेडाई तसेच बांधकाम व्यावसायिकांना विश्वासात घेतल्यानंतरच प्रीमियम दरवाढीचा निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिल्याचे कोतवाल यांनी सांगितले.
महापालिकेने शहरातील प्रीमियमच्या दरात ४० टक्क्यांवरून ८० टक्के वाढ केली आहे. या प्रस्तावाला बांधकाम व्यावसायिकांचा विरोध असून, टीडीआर लॉबीच्या दबावाखाली हा निर्णय घेतला जात असल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे २३ गावांतील शेतकरी प्रीमियम वाढीसाठी आग्रही असून, त्यांनी एकतर प्रीमियम वाढून द्या, अन्यथा जमिनी परत करा, अशी मागणी केली आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
अभिनेत्यासाठी सराव आवश्यक असतो. गायकाला रियाज सोडून जमणार नाही. अगदी तसेच प्रत्येक व्यक्तीच्या सदृढ आरोग्यासाठी व्यायाम आवश्यक असून, याचा संदेश देण्यासाठी पोलिस पुढाकार घेत असल्याने आनंद होत असल्याची भावना अभिनेता सचिन खेडेकर यांनी व्यक्त केली.
नाशिक शहर पोलिसांकडून आयोजति करण्यात आलेल्या ‘रन फॉर ट्रॉफिक सेफ्टी आणि कम्युनल हार्मनी’ स्पर्धेसाठी www.nashikmarathon.in ही वेबसाइट तयार करण्यात आलेली आहे. या वेबसाइटचे उद््घाटन खेडेकर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. हा कार्यक्रम सोमवारी सकाळी त्र्यंबकरोडवरील फ्रवशी अॅकॅडमीच्या हॉलमध्ये पार पडला. यावेळी आहारतज्ज्ञ मिकी मेहता, फ्रवशी अॅकॅडमीचे संचालक रतन लथ, पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, उपायुक्त विजयकुमार मगर, श्रीकृष्ण कोकाटे, लक्ष्मीकांत पाटील, माधुरी कांगणे यांच्यासह सर्व पोलिस अधिकारी व शहरातील धावपटू हजर होते.
मेहता यांच्यासह पोलिस आयुक्तांचा फिटनेस पाहून मला आज माझीच लाज वाटत असल्याची कबुली खेडेकर यांनी दिली. गतवर्षी पोलिसांनी आयोजति केलेल्या स्पर्धेसाठी १२ हजार स्पर्धकांनी हजेरी लावली होती. यंदा हा आकडा खूपच वाढणार असल्याचे स्पष्ट करीत खेडेकर यांनीही स्पर्धेसाठी नावनोंदणी केली. दरम्यान, प्रसिद्ध आहारतज्ज्ञ मिकी मेहता यांनी व्यायाम आणि आहाराचे महत्त्व पटवून दिले. काय खावे यापेक्षा आहाराच्या वेळा व उठण्याच्या तसेच झोपण्याच्या सवयींकडे लक्ष दिल्यास निरोगी आयुष्यासाठी काहीही महत्वाचे नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पोलिस आयुक्तांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, शहराचे माजी आयुक्त एस. जगन्नाथन् यांनी शहराची वैशिष्ट्ये हेरून स्पर्धा सुरू केली. पहिली दोन वर्षे हाफ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले. यंदा मात्र ४२ किलोमीटरची ही स्पर्धा घेण्यात येत असल्याचे सिंगल यांनी स्पष्ट केले. ‘रन फॉर ट्रॉफिक सेफ्टी आणि कम्युनल हार्मनी’ अशी मॅरेथॉनची थमि असून, सामाजिक जबाबदारी म्हणून जास्तीत जास्त नाशिककरांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन सिंगल यांनी केले. यावेळी क्रीडा क्षेत्रातील विजेंद्रसिंग, राजू जोशी, महेंद्र छोरिया आदी उपस्थित होते. प्रास्ताविक उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांनी केले, तर आभार सहायक पोलिस आयुक्त राजू भुजबळ यांनी मानले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
ऐन दिवाळीत एसटी कामगार संघटनांनी संप पुकारल्यामुळे प्रवाशांची हक्काची बससेवा पूर्णपणे ठप्प होती. सर्व बसेस आगारातच असल्यामुळे अपवाद वगळता रस्त्यांवर बसेस दिसल्या नाहीत. शहर बससेवाही पूर्णपणे ठप्प असल्यामुळे बाहेरगावाहून तसेच शहराच्या विविध परिसरातून शहरात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांचे हाल झाले. ही संधी साधून रिक्षा, काळी-पिवळी टॅक्सी चालक, इतर खासगी वाहनांनी हात धुवून घेतले. आरटीओनेही लांबच्या मार्गांसाठी खासगी पर्यायी बस उपलब्ध करुन दिल्यामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. बाहेरगावचे प्रवासी बसस्थानकांमध्ये बसची वाट पाहत बसून होते. त्यामुळे ऐन दिवाळी एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांना दीनवाणे होण्याची वेळ आली.
शहरातील विविध भागात निमाणी बस स्थानकावरून सिटी बस धावतात. निमाणीत मंगळवारी सकाळी काही बसेस आल्या होत्या. मात्र, त्यानंतर बसेस डेपोत नेण्यात आल्यामुळे येथे शुकशुकाट होता. सकाळच्यावेळी बसच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांना संप असल्याचे कळल्यानंतर प्रवाशांनी रिक्षातून प्रवास केला. शहर परिसरात पंचवटी बस डेपो क्रमांक दोनमधून १४० बसेस सोडण्यात येतात. प्रत्येक बस किमान चार ते पाच फेऱ्या करीत असते. या बसेस डेपोत उभ्या करण्यात आल्या होत्या.
एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू व्हावा, म्हणून करण्यात आलेल्या संपाचा फटका शहर परिसरातील नागरिकांना बसला. शाळा-महाविद्यालयांना दिवाळीची सुटी असल्यामुळे त्यांच्यावर या संपाचा परिणाम झाला नसला तरी नोकरदार वर्गाला मनस्ताप झाला. सकाळी नेहमीप्रमाणे निमाणी बस स्थानकावर प्रवासी आले होते. मात्र, एकही बस या स्थानकावर येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी चौकशी केली असता बस कर्मचाऱ्यांनी संप पुकारल्याचे समजले, तेव्हा या प्रवाशांनी रिक्षातून प्रवास केला.
जुना आडगाव नाका येथील डेपोत सर्वच बसेस थांबवून डेपोच्या समोर शहर वाहतूक करणारे चालक, वाहक व इतर एसटीचे कर्मचारी यांनी मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी जोरदार घोषणाबाजी केली. या डेपोच्या प्रवेशद्वाराजवळ ठिय्या मांडला. काँग्रेस प्रणित संघटनेने पुकारलेल्या संपाला शिवसेना प्रणित संघटनेने विरोध दर्शविला होता, त्यामुळे शिवसेनेच्या संघटनेच्या कर्मचाऱ्यांनी या संपात सहभागी व्हायचे नाही असे ठरविले होते. त्यांनी ३६ बसेसच्या फेऱ्याही सुरू केल्या होत्या, सकाळी आठनंतर या फेऱ्या बंद करण्यात आल्या.
एसटीला बसला एक कोटीचा फटका
एसटी चालक आणि वाहकांनी पुकारलेल्या संपामुळे राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या नाशिक विभागाचे तब्बल एक कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. दिवाळीमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी होत असल्याने महामंडळाला जादा बसेसचे नियोजन करावे लागते. परंतु, संपामुळे महामंडळाच्या नियमित फेऱ्याही होऊ शकल्या नाहीत. साधी, निमआराम, शिवशाही आणि शिवनेरी अशी एकही बस आगारांमधून बाहेर न पडल्याने महामंडळाचे अतोनात नुकसान झाले. सोमवारी एकूण बस फेऱ्यांमधून महामंडळाला ९५ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. आज ते एक कोटीवर जाण्याची शक्यता होती. त्यामुळे एक कोटींचे नुकसान झाल्याची माहिती महामंडळातील अधिकाऱ्यांनी दिली आहे.
आरक्षणाचे पैसे मिळणार
अनेक प्रवाशांनी तिकिटे आरक्षित केली आहेत. परंतु, संपामुळे सर्वच नियोजनावर पाणी फेरले. आरक्षित तिकिटांचे पैसे परत केले जाणार असून, त्यासाठी ठक्कर बाजार येथे एक कर्मचारीही बसविण्यात आला होता. त्याने प्रवाशांची तिकिटे तपासली. या प्रवाशांना दोन दिवसांनी त्यांचे पैसे मिळतील असे सांगण्यात आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2017, 3:30 pm
महिला रुग्णालय भाभानगरमध्येच; मुख्यमंत्र्यांचाही फरांदेंना कौल
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
राज्य सरकारने शहरात मंजूर केलेल्या शंभर खाटांच्या स्वतंत्र महिला रुग्णालयाच्या जागेवरून आमदार प्रा. देवयानी फरांदे आणि माजी आमदार वसंत गितेंमधील वादात मुख्यमंत्र्यांनी आमदार फरांदेंच्या बाजूने कौल दिला आहे. त्यामुळे आमदार फरांदेंनी पुन्हा एकदा गितेंवर सरशी केली असून, पालकमंत्र्यांनी मंगळवारी नाशिकमध्ये धाव घेऊन रुग्णालयाच्या जागेचा तिढा सोडवला आहे. मुख्यमंत्र्यांनीच फरांदेंनी सुचवलेल्या भाभानगरमधील जागेच्या बाजूने कौल दिल्याचा निरोप त्यांनी उपमहापौर प्रथमेश गितेंना दिला.
शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या जागेवरून गेल्या दोन वर्षांपासून आमदार फरांदे आणि भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आमदार वसंत गिते यांच्यात वाद सुरू होता. या वादामुळे पक्षाचीच प्रतिमा मलिन होत होती. फरांदे यांच्या प्रयत्नातून राज्य सरकारने नाशिकमध्ये महिलांसाठी स्वतंत्र शंभर खाटांचे रुग्णालय मंजूर केले आहे. यापूर्वी या रुग्णालयासाठी वडाळा येथील जागा निवडण्यात आली होती. मात्र, येथे विरोध झाल्यानंतर आमदार फरांदे यांनी दादासाहेब गायकवाड सभागृहाशेजारील भूमापन क्र.५०२ मधील एक हजार चौरस मीटर रिकाम्या जागेचा प्रस्ताव दिला होता. तसा प्रस्तावही महासभेत सादर करण्यात आला होता. मात्र, वसंत गिते यांच्याकडून या जागेला विरोध असून, उपमहापौरांच्या उपसूचनेनंतर महासभेने परस्पर या जागेचा प्रस्ताव बदलून तो टाकळी रोडला करण्याचा ठराव केला आहे. परंतु, या ठरावावर आक्षेप घेत आमदार फरांदे यांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली असून, रुग्णालय भाभानगरमध्येच व्हावा, असा हट्ट धरला आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनीही या वादावर अखेर पडदा टाकत रुग्णालयाची जागा भाभानगरमध्येच करण्याचा ठराव करण्याचे आदेश दिले आहेत.
तासाभरातच ठराव
दोन दिग्गज नेत्यांमधील संघर्षामुळे पक्षाचीही प्रतिमा मलीन होत होती. त्याच्यावर कायमचा तोडगा काढून मुख्यमंत्र्यांनी फरांदेंच्या बाजूने निर्णय दिला. विशेष म्हणजे या रुग्णालयाचा ठराव हा पालकमंत्र्यांनी दिलेल्या एक तासाच्या डेडलाइनमध्ये झाला आहे. महापौर, सभागृहनेते आणि गटनेत्यांनी रामायणवर धाव घेत तातडीने रुग्णालयाचा ठराव हा फरांदेंकडे पोहचता केल्याने फरांदेंचीही ताकद वाढली आहे.
संघर्ष तीव्र होणार!
पालकमंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी तातडीने नाशिकमध्ये धाव घेत या रुग्णालयाच्या वादावर पडदा टाकण्याचे प्रयत्न करीत मुख्यमंत्र्यांचा निरोप दिला. महाजन यांनी फरांदे व उपमहापौर प्रथम गिते यांच्यात समझोता करण्याचा प्रयत्न केला. परंतु, तो फोल ठरला. मुख्यमंत्र्यांनीच फरांदेंच्या बाजूने कौल दिल्याचे त्यांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले. त्यावर गिते आणि महाजन यांच्यात फोनवर बोलणे झाले. गिते यांनी शेवटपर्यंत विरोध कायम ठेवला. परंतु, महाजन यांनी महापौर रंजना भानसी यांना तातडीने भाभानगरच्या जागेचा ठराव करून तो शासनाला पाठविण्याचे आदेश दिले. त्यामुळे रुग्णालयाच्या जागेच्या वादात फरांदेनी गितेंना चेकमेट दिला असल्याने गिते आणि फरांदेमधील संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 17, 2017, 3:30 pm
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
वर्षानुवर्षे प्रलंबित मागण्यांकडे शासन दुर्लक्ष करीत असल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी एसटी कर्मचारी ऐन दिवाळी सणाच्या कालावधीतच संपावर गेल्याने मंगळवारी नाशिकरोड बस स्थानकात बसेस आल्याच नाहीत. परिणामी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले. या संपामुळे खासगी प्रवासी वाहतूकदारांची मात्र चांगलीच चांदी झाली.
सोमवारी मध्यरात्रीपासून एसटीचे कर्मचारी संपावर गेल्याने मंगळवारी सकाळी नाशिकरोड बस स्थानकावर आलेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. एकही बस उपलब्ध नसल्याने प्रवाशांना नाईलाजाने खासगी प्रवासी वाहतूक सेवेचा वापर करावा लागला. रेल्वेने आलेल्या बहुतांश प्रवाशांना या संपाची माहिती नसल्याने त्यांचे मोठे हाल झाले. ग्रामीण सेवेची तर एकही बस आली नाही. त्यामुळे नाशिकरोडवरून पुणे, नगर, बीड, शिर्डी, सिन्नर, संगमनेर, सांगली, कोल्हापूर या शहरांकडे जाणाऱ्या प्रवाशांचे अतोनात हाल झाले. महिला, लहान मुले यांची प्रचंड गैरसोय झाली.
--
रिक्षाचालकांची दिवाळी
एसटी बस कर्मचाऱ्यांचा संप रिक्षा व टॅक्सीचालकांच्या चांगलाच पथ्यावर पडला. शहरीसह ग्रामीण बससेवा बंद राहिल्याने संपाच्या पहिल्याच दिवशी रिक्षाचालकांची अक्षरशः चांदी झाली. नाशिकरोड ते शालिमार व सीबीएसदरम्यानच्या प्रवासासाठी नागरिकांना तब्बल १०० ते १५० रुपये प्रतिसीट पैसे मोजावे लागले. प्रवाशांच्या हतबलतेचा खासगी प्रवासी वाहतूकदारांनी गैरफायदा उठविल्याने एसटी कर्मचाऱ्यांचा संप प्रवाशांना चांगलाच भोवला. मंगळवारी दिवसभर नाशिकरोड बस स्थानकावर अक्षरशः खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्यांनी कब्जा केल्याचे दिसून आले.
--
कर्मचारी स्थानकात थांबून
नाशिकरोड बस स्थानकात शहरी व ग्रामीण मिळून दररोज ५९० बसफेऱ्या होतात. या बसफेऱ्यांमधून एसटीला दररोज ७ लाख रुपयांचे आर्थिक उत्पन्न मिळते. या संपामुळे एकही बस नाशिकरोड बस स्थानकाकडे न फिरकल्याने एसटीचा एकट्या नाशिकरोड बस स्थानकावर तब्बल ७ लाख रुपयांचा आर्थिक महसूल बुडाला. मंगळवारी दिवसभर एसटीचे कर्मचारी बस स्थानकात थांबून होते.
---
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मोठी गैरसोय झाली. बसेस बंद असल्या, तरी रिझर्व्हेशनची सुविधा मात्र सुरू होती. रिक्षाचालकांनी अव्वाच्या सव्वा प्रवासभाडे आकारल्याने सामान्य प्रवासी अक्षरशः भरडले गेले. ऐन दिवाळीतच संप सुरू झाल्याने सामान्य जनतेच्या या गैरसोयीस सरकारच जबाबदार आहे.
-मनोज जैन, प्रवासी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 18, 2017, 3:03 pm
देवळाली कॅम्प : येथील बार्न्स स्कूल परिसरात सहा वर्षांपासून राहणाऱ्या महिलेचा घरात काम करणाऱ्या कामगाराने विनयभंग केला. योगेश वाघचौरे असे संशयित कामगाराचे नाव आहे. संबंधित महिला सकाळी स्नान करण्यास गेली असता त्यांच्याच घरात सुमारे तीन वर्षांपासून काम करणाऱ्या योगेशने खिडकीतल्या जाळीतून वाईट नजरेने बघितले. हे लक्षात येताच संबंधित महिलेने त्यास हटकले. पीडितेने या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलिस ठाण्यात संशयित योगेश विरुद्ध तक्रार केली. त्याच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सहाय्यक पोलिस निरीक्षक संपत लोंढे अधिक तपास करीत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2017, 3:07 pm
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नाशिक विभागीय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाचा अतिरिक्त कार्यभार विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे राज्याच्या शिक्षण आयुक्तांनी नुकताच सोपवला. बोर्डाला पूर्णवेळ कारभारी कधी मिळणार असा प्रश्न शिक्षण क्षेत्राला पडला आहे.
यापूर्वी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी शिक्षण सहसंचालक आर. व्ही. गोधणे (प्रशासन, अंदाज व नियोजन) यांच्याकडे होती. त्यांच्याकडेही या पदाचा अतिरिक्त कारभार होता. त्यांना या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात आले. त्यामुळे रिक्त पदाची जबाबदारी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. बोर्डाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळण्याची आवश्यकता असल्याची चर्चा विभागातील शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सुरू आहे. पूर्णवेळ अध्यक्षाअभावी आतापर्यंत बोर्डाच्या कामाकाजावर परिणाम होतो.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2017, 3:09 pm
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
विभागीय अप्पर आयुक्तांकडे तब्बल २००६-०७ ते २०१६-१७ अशी दहा वर्षे प्रलंबित असलेले विविध शाखांतील तब्बल ८ हजार ९६९ अपिले अवघ्या वर्षभरात निकाली काढण्यात आली आहेत.
विभागीय अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी दररोज आठ ते दहा तास सुनावणी घेत ही अतिशय जटील कामगिरी साध्य करून दाखविली आहे. त्यांच्या गतिमान व पारदर्शक कामकाजामुळे राज्यातील सहा महसूल विभागांत सर्वांत जास्त अपिले निकाली काढून सरकारच्या ई-डिसनिक प्रणालीवर नोंदविण्यात नाशिक महसूल विभागाने अव्वल स्थान पटकावले आहे.
विभागीय अप्पर आयुक्तांकडे २००६-०७ पासुनची अपिले प्रलंबित होती. त्यामुळे नागरिक प्रचंड त्रस्त झाले होते. दाव्यांचा निपटारा होत नसल्याने कामांचाही खोळंबा होत होता. महसूल शाखेकडे गेल्या दहा वर्षांपासून १ हजार ९२३ अपिले प्रलंबित होती. या सर्व अपिलांचा अप्पर आयुक्तांनी वर्षभरात निपटारा केला. आता केवळ २०१६-१७ नंतर नव्याने दाखल ९८१ पैकी ८०३ अपिले शिल्लक राहिली आहेत. ग्रामपंचायत शाखेतील २ हजार ७८५ पैकी १ हजार ५६९ अपिले तर जिल्हा परिषद कर्मचारी शाखेतील २ हजार ७५९ पैकी १ हजार २९८ अपिले निकाली काढण्यात आले आहेत. या शाखांमधीलही २०१६-१७ नंतर नव्याने दाखल अपिलेच आता शिल्लक राहिली आहेत.
महामार्गांच्याही दाव्यांचा मार्ग मोकळा
राष्ट्रीय महामार्ग लवादांतर्गत दाखल अपिले काही वर्षांपासून प्रलंबित होती. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३ विषयी २००८-०९ पासून २ हजार ९६२ अपिले दाखल होती. त्यापैकी १ हजार ४१५ अपिले अप्पर आयुक्त ज्योतिबा पाटील यांनी वर्षभरात निकाली काढण्यात यश मिळविले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० विषयी २०१४-१५ पासून प्रलंबित ६१४ पैकी ५९ अपिले निकाली निघाली आहेत.
ई-डिसनिकवरही आघाडी
अप्पर आयुक्तांकडील निकाली निघालेल्या अपिलांची नोंद अवघ्या काही मिनिटांतच सरकारच्या ई-डिसनिक या संगणकीय प्रणालीवर केली जाते. दहा वर्षांपासून प्रलंबित सर्व दावे आता निकाली निघाली असून त्यांचे निकाल ई-डिसनिकवर अपिलकर्त्यांसाठी उपलब्धही झाले आहेत.
शासकीय सेवा सामान्य जनतेच्या हितासाठीच असते. सामान्य जनतेला न्याय मिळवून द्यायचा असेल तर एकही अपिल प्रलंबित राहता कामा नये, या सकारात्मक विचारानेच दहा वर्षांतील अपिलांची प्रलंबितता दूर करण्यात यश मिळाले. सरकारचेही गतिमान व पारदर्शी प्रशासनाचे ध्येय साध्य झाले.
- ज्योतिबा पाटील, अप्पर आयुक्त, नाशिक विभाग
निकाली निघालेले प्रलंबित दावे
वर्षे........ग्रामपंचायत अपिले......जि. प. कर्मचारी अपिले........महसूली अपिले
- २००७-०८ ५० ७६ ३२८
- २००८-०९ १३ ६५ ४२५
- २००९-१० १९ २५ ६६५
- २०१०-११ ०७ ६४ ५७२
- २०११-१२ ३३ १०६ ३८९
- २०१२-१३ १३१ ८९ ४०७
- २०१३-१४ ५१ ०३ २८०
- २०१४-१५ ७० ०० ४४६
- २०१५-१६ ९६ ५४ २११
- २०१६-१७ ८३० ६७१ १,३९४
- २०१७-१८ २६९ १४५ ९८५
एकूण १,५६९ १,२९८ ६,१०२
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2017, 3:12 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
त्र्यंबकेश्वरच्या उपजिल्हा रुग्णालयात रुग्णसेवा देणाऱ्या १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांना सरकारने पाच महिन्यांपासून वेतनच दिलेले नाही. त्यामुळे त्यांची दिवाळी अंधारातच जाणार असून आणखी किती दिवस वेतनाची प्रतीक्षा करायची असा उद्विग्न सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
त्र्यंबकचे सरकारी रुग्णालय पूर्वी ग्रामीण रुग्णालय होते. सिंहस्थ काळात त्यास उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा देण्यात आला. तेथे खाटांची संख्या वाढविण्यात आली. वाढलेला दर्जा आणि वाढती रुग्णसंख्या यामुळे रुग्णालयात अधिकारी, कर्मचाऱ्यांची गरज भासू लागली. नव्याने १६ जागा भरण्यास राज्य सरकारने मान्यता दिली. आरोग्य विभागाचे उपसंचालक तसेच जिल्हा शल्य चिकित्सकांच्या स्तरावर शिपाई पदापासून सहायक अधीक्षकांपर्यंतची पदे भरण्यात आली आहेत. त्यामध्ये परिचारिका, फार्मासिस्ट आणि डॉक्टरांच्याही पदांचा समावेश आहे. ही पदे कायम तत्वावर भरण्यात आली असून पाच महिन्यांपासून ते रुग्णालयात कार्यरत आहेत. परंतु, त्यांना अद्याप वेतनच मिळू शकलेले नाही. आरोग्य उपसंचालक, जिल्हा शल्य चिकित्सकांकडे वारंवार पाठपुरावा करूनही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याची कैफियत या कर्मचाऱ्यांकडून मांडली जाऊ लागली आहे. जूनपासून हे कर्मचारी त्र्यंबक रुग्णालयात काम करीत असूनही त्यांना सरकारी अनास्थेचा फटका सहन करावा लागतो आहे. आज ना उद्या पगार मिळेल या आशेवर ते आला दिवस ढकलत आहेत. गणपती, नवरात्री, दसरा यांसारखे सणही या कर्मचाऱ्यांना साजरे करता आले नाही. दिवाळीपर्यंत त्यांचे वेतन होतील असे, त्यांना सांगितले जात होते. परंतु, अजूनही वेतन न झाल्याने दिवाळी सणही अंधारात जाण्याची शक्यता बळावली आहे.
कुर्मगती कारभाराचा फटका
रुग्णालयातील १६ पदे भरण्याचे आदेश राज्य सरकारनेच जारी केले असताना या कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठीची कार्यवाही करण्यास एवढा विलंब का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे. या कर्मचाऱ्यांची कोषागार (ट्रेझरी) विभागात अद्याप नोंदणीच झाली नसल्याचे समजते. त्यामुळे अर्थपुरवठा विभागाकडून ट्रेझरीमध्ये पैसे जमा होण्यासाठीचा डीडीओ कोड प्राप्त होऊ शकलेला नाही. त्यामुळेच त्यांचे वेतन होण्यात अडचणी येत असल्याचे विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे.
अहवाल सादर करा
त्र्यंबक उपरुग्णालयातील १६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पगार होत नसल्याची आरोग्य सेवा उपसंचालक लोचना घोडके यांनी गंभीर दखल घेतली आहे. या रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी पाठविलेल्या खुलाशावर अभिप्रायासह अहवाल तात्काळ सादर करा, असे आदेश घोडके यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांना दिले आहेत. वेतन अदा केले गेले नसल्यास त्याची कारणे व करण्यात आलेली कार्यवाही याची माहिती तात्काळ सादर करावी, असे या आदेशात म्हटले आहे.
१६ अधिकारी, कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास विलंब होतोय ही वस्तुस्थिती आहे. ते लवकर मिळावे, यासाठी आरोग्य मंत्र्यांपासून सचिवांपर्यंत सर्वांकडेच पाठपुरावा सुरू आहे. संबंधित कर्मचाऱ्यांना लवकरच त्यांचे थकीत वेतन मिळेल.
- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
October 18, 2017, 3:30 pm
खुटवडनगरला रस्ता दुरूस्ती नाही
म. टा. वृत्तसेवा, सातपूर
नाशिक महापालिकेने गेल्याच वर्ष कोट्यावधींचे रस्ते नव्याने केले होते. यामध्ये खुटवड नगरच्या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. परंतु, वर्षभरातच खुटवड नगरचा रस्ता खड्डेमय झाला आहे. ठेकेदाराकडून रस्त्याच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने तातडीने करावी, अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.
खड्डेमय झालेल्या रस्त्यावरून रोजच वाहनचालकांना कसरत करून वाहने चालविण्याची वेळ येत आहे. विशेष म्हणजे याच रस्त्याच्या भागात तब्बल आजी, माजी १० नगरसेवक वास्तव्यास असतानादेखील रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष का, असाही सवाल रहिवाशांनी उपस्थित केला आहे. कोट्यवधी रुपये खर्चून नव्याने तयार करण्यात आलेल्या रस्त्याला खड्डे पडल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेने संबधित ठेकेदाराकडून पुन्हा दुरूस्ती काम करून घ्यावे, अशी मागणी वाहनचालकांसह रहिवाशांनी केली आहे. विशेष म्हणजे, खुटवड नगरच्या रस्त्यावर आजी, तब्बल १० माजी नगरसेवकांचे वास्तव्य असताना रस्त्याच्या कामाकडे दुर्लक्ष का, असाही सवाल उपस्थित केला जात आहे.
गेल्यावर्षी मनसेच्या कार्यकाळात धुमधडाक्यात खुटवडे नगरच्या रस्त्याचे काम हाती घेण्यात आले होते. परंतु, वर्षभरातच रस्ता खड्डेमय झाला असून, या रस्त्यावरून दररोज असंख्य वाहनचालकांना मोठी कसरत करून वाहने चालविण्याची वेळ आली आहे. महापालिकेने संबंधित ठेकेदाराकडून पुन्हा दुरुस्ती करण्याची गरज आहे.
-दीपक गहीवाळ, रहिवाशी
वाहनचालकांची कसरत
महापालिकेच्या गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत मनसेचे सर्वेसर्वा राज ठाकरे यांच्या मराठी बाण्याला नाशिककरांनी साथ देत सत्ता दिली होती. महापालिकेची सत्ता हाती मिळाल्यावर ठाकरे यांनी नाशिकची ब्लू प्रिंट तयार असून, लवकरच ती नाशिककरांना विकासाच्या माध्यमातून समोर आणली जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु, प्रत्यक्षात ब्लू प्रिंट मनसेप्रमुख राज ठाकरे यांना दाखवताच न आल्याने नाशिककरांनी नाराजी व्यक्त केली होती. गेल्या पंचवार्षिकमध्ये मनसेने निवडणुका लागण्यापूर्वी कोट्यवधी रुपयांची कामे हाती घेतली होती. यामध्ये खुटवड नगरच्या रस्त्यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले कामही हाती घेण्यात आले होते. आयटीआय सिग्नलपासून, खुटवड नगर, डीजीपी नगर - २ ते प्रणय टॉपिंगपर्यंतच्या रस्त्यांचे नगरसेविका सुवर्णा मटाले व माजी नगरसेवक तानाजी जायभावे यांच्या कार्यकाळात डांबरीकरण करण्यात आले होते. रस्त्याच्या कामाला एक वर्षही झाले नसताना खुटवड नगरचा रस्ता खड्डेमय झाल्याचे चित्र आहे. रस्त्यावरून वाहने चालवतांना चालकांना कसरत करूनच वाहने चालविण्याची वेळ येत असते.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2017, 3:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जीवनात मांगल्य आणि समृद्धीचे पर्व घेऊन येणारा दीपावलीचा लक्ष्मीपूजनाचा मुख्य दिवसाचा सोहळा आज (१९ ऑक्टोबर) घरोघरी साजरा होणार आहे. बुधवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटेपासूनच नागरिकांचा उत्साह ओसंडत होता. आजच्या लक्ष्मीपूजनाच्या सोहळ्याची पूर्वतयारी सर्वत्र झाली आहे. लक्ष्मीच्या सोनपावलांचे स्वागत करण्यासाठी प्रत्येक घराचा उंबरठा सजला आहे.
आजच्या दीपावली अमावस्या तथा लक्ष्मीपूजनाच्या दिवशी श्री महाकाली, श्री महासरस्वती आणि व्यंकटेश, कुबेर या देवतांचे पूजन घरोघरी करण्यात येणार आहे. विविध सामाजिक संस्थांच्या वतीने पहाटेपासून सांस्कृतिक कार्यक्रम आणि गायन, नृत्य मैफली आयोजित करण्यात आल्या आहेत. बुधवारीही नरकचर्तुदशी निमित्त घरोघरी अभ्यंग स्नान पार पडले. सकाळच्या सुमाराला शहरातील विविध मंदिरांमध्येही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली. दिवसभर बाजारपेठेत मोठा उत्साह दिसून येत होता. रिअल इस्टेट मार्केटसह, सराफ बाजार, वाहन बाजार, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसह खाद्यपदार्थ आणि कपडे खरेदीसाठी नागरिकांची मोठी गर्दी दिवसभर होती.
लक्ष्मीपूजनाच्या बाजारात गर्दी
लक्ष्मीपूजना निमित्त पूर्वतयारी करण्यासाठी नागरीकांनी बुधवारी सकाळपासूनच बाजारात गर्दी केली. लक्ष्मीपूजनाच्या साहित्यात नैवेद्यासाठी लाह्या, बत्तासे, फळे यांसह लक्ष्मी (शिरई), पणत्या, झेंडूची फुले आदी वस्तूंची खरेदी केली.
सोन्याला झळाळी
दिवाळीच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदीही अत्यंत शुभ मानली जाते. यामुळे वसुबारसच्या दिवसापासून सराफ बाजारही ग्राहकांच्या गर्दीने फुलला आहे. अनेक जण गुंतवणूक म्हणून चोख सोन्याच्या खरेदीला महत्व देत आहेत. सुवर्ण खरेदीचा हा उत्साह भाऊबीजेनंतरही कायम राहणार असल्याचे चित्र आहे.
लक्ष्मी पूजन मुहूर्त :
सकाळ : ६.२८ ते ७.५५ शुभ
सकाळ : १०.४९ ते १२.१६ अचल
दुपार : १२.१६ ते १.४३ लाभ
दुपार : १.४३ ते ३.१० लाभ
संध्याकाळ : ४.३७ ते ६.०४ शुभ
संध्याकाळ : ६.०४ ते ७.३७
संध्याकाळ : ७.३५ ते ९.३६ वृषभ स्थिर लग्न
रात्री : ७.३७ ते ९.१० चल
श्री महालक्ष्मी, श्री महासरस्वती आणि व्यंकटेश, कुबेर या देवतांचे पूजन करण्यासाठी आज लक्ष्मीपूजनाचा दिवस अत्यंत महत्वाचा आहे. या पूजनाने आपल्या उत्पन्नस्त्रोतात कायम अष्टलक्ष्मी आणि दशविध महालक्ष्मीचा निवास राहतो. या दिवशी मनोभावे श्री महालक्ष्मीची पूजा करून देवतेची कृपा प्राप्त करावी.
- सोमनाथ मुळे, गुरूजी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
October 18, 2017, 3:30 pm
अवकाळी पावसाच्या परिणामामुळे भाजीपाला कडाडणार
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी
नाशिक जिल्हा परिसरात तब्बल नऊ दिवस अवकाळी पावसाने तडाखा दिला. आता दिवाळीत पाऊस थांबल्यानंतर त्याचे परिणाम जाणवू लागले आहेत. पावसानंतर सुरू झालेली ऑक्टोबर हिट हा हवामानातील एकदम झालेला बदल भाजीपाला पिकांच्या उत्पादनात विपरित परिणाम करणार ठरत आहे.
या थांबलेल्या पावसाने भाजीपाल्याची आवक कमी होऊ लागली आहे. मंगळवारी (दि. १७) रोजी दुधी भोपळ्याची आवक कमी झाल्यामुळे त्याचे भाव कडाडले आहेत. ८० ते ९० रुपये प्रति किलो या दरात बाजार समितीच्या लिलावात दुधी भोपळा विकला गेला. अवकाळी पावसाचा परिणाम झाल्यामुळे भाजीपाला पुढेही कडाडणार आहे, असा अंदाज वर्तविला जात आहे.
दुधी भोपळ्याचा वेल हा नाजूक असल्यामुळे जास्त पावसाच्या काळात तो तग धरू शकत नाहीत. पावसामुळे पाने खराब होता, फुल आणि कळी यांची गळती झाल्यामुळे येत्या काही महिन्यात दुधी भोपळ्याची आवक खूपच घटणार असल्याचे दिसते. आवक घटल्यामुळे सोमवारपर्यंत ३० ते ३५ रुपये किलो विकला जाणारा दुधी भोपळा मंगळवारी लिलावात ८० ते ९० रुपये किलोपर्यंत पोहचला होता. किरकोळ बाजारात तर त्याची किंमत शंभरी गाठणार असल्याने येत्या दोन-तीन महिन्यांत सर्वसामान्यांच्या खिशाला दुधी भोपळा परवडणार नाही अशी चिन्ह दिसत आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧