Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

निर्णयांच्या माऱ्याने गुरुजी बेजार

$
0
0

मटा फोकस

संकलन ः अश्विनी कावळे

--

निर्णयांच्या माऱ्याने गुरुजी बेजार

--

पहिली ते दहावीच्या वर्गांच्या कला व शारीरिक शिक्षण विषयाच्या तासिका ४८ वरून ४५ करण्यात आल्यानंतर शिक्षकांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. एप्रिल महिन्यात हा निर्णय झाल्यानंतर शिक्षकांमध्ये कमालीचा असंतोष निर्माण झाला होता. तासिका कमी करण्यातून होणारे तोटेही प्रकाशझोतात आणण्यात आले होते. हा निर्णय मागे घेण्यासाठी शिक्षकांनी आंदोलनाचे हत्यारही उपसले. या सर्वांनंतर आता पुन्हा सुधारित निर्णय झाला असून, कमी केलेल्या तासिका ४५ वरून पूर्वीप्रमाणे ४८ करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये समाधानाची भावना असली, तरी सातत्याने विविध निर्णयांचा होणारा मारा शिक्षक, शिक्षकेतरांना कमालीचा अस्वस्थ करणारा ठरत आहे.

--

कला-क्रीडा शिक्षकांत नाराजी

कला व क्रीडा शिक्षकांच्या तासिका कपात करण्याचा निर्णय शिक्षण विभागाकडून एप्रिल २०१७ मध्ये घेण्यात आला होता. हा निर्णय शैक्षणिक वर्ष २०१७-१८ पासूनच लागू करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. त्यामुळे कला, क्रीडा, कार्यानुभव, संगीत यांच्या तासिका कमी झाल्याने हे विषय शिकविणाऱ्या शिक्षकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला होता. कला, क्रीडा शिक्षकांची पदे अनेक शाळांमध्ये रिक्त असताना या निर्णयामुळे शिक्षकांना अतिरिक्त ठरवू शकण्याच्या भीतीनेही ग्रासले होते.

--

बदलत्या निर्णयांचा मारा

वेळोवेळी नवनवे निर्णय शिक्षकांसमोर धडकत असल्याचे अलीकडे दिसून येत आहे. आज तासिका कमी, उद्या पूर्ववत, सातत्याने नवनवीन येणारी पोर्टल्स, ऑनलाइन माहिती भरण्यासाठीच्या डेडलाइन्स, विविध दिवस साजरे करण्याच्या सूचना अशा कित्येक निर्णयांचा मारा शिक्षक, शिक्षकेतरांवर होत आहे. एकीकडे अभ्यासक्रम वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी, तर दुसरीकडे निर्णयांची अंमलबजावणी, अन्यायाची भावना यातच शिक्षकवर्ग अडकून पडत आहे. निर्णयांचा हा मारा असह्य होत असल्याने वर्षभरात कितीतरी आंदोलने झाली. तासिका कमी करण्याच्या निर्णयानेदेखील कला, क्रीडा विषयाच्या शिक्षकांमध्ये असंतोष निर्माण केला.

--

शिक्षण खात्यावर रोष

सातत्याने निर्माण होणाऱ्या बदलत्या निर्णयांच्या परिस्थितीमुळे शिक्षण खात्याच्या कार्यपद्धतीवर शिक्षक, शिक्षकेतरांचा मोठा रोष निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरील मेसेजेसद्वारे शिक्षणमंत्र्यांच्या कार्यपद्धतीचा नाराज शिक्षकांकडून समाचार घेतला जात आहे. तासिका कमी करण्याच्या निर्णयाबाबत कला, क्रीडा संघटनांशी, तज्ज्ञ अभ्यासकांशी कोणतीही चर्चा केली गेली नसल्याचा आरोप त्यांच्याकडून करण्यात येत होता. शिक्षण विभागाकडून शाळांसाठी घेण्यात येणारे निर्णय अनेकदा असफल ठरत असतानाही तासिका कमी करण्याचा निर्णय का घेण्यात आला, असा प्रश्न राज्यभरात उपस्थित करण्यात आला, तसेच या निर्णयाने विद्यार्थ्यांना तणावमुक्त करण्यासाठी व हसत-खेळत शिक्षणासाठी आवश्यक असलेले विषय संपवून शिक्षण विभागाला काय मिळत आहे, असा जाबही आंदोलनांद्वारे शिक्षकांकडून विचारण्यात आला.

--

द्वितीय सत्रापासून तासिका पूर्ववत

या शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीला तासिका कमी करण्याचा निर्णय दिल्यानंतर शिक्षकवर्गातून ओढावलेला रोष पाहता निर्णय बदलण्यात आला. द्वितीय सत्रापासून म्हणजे दिवाळीच्या सुटीनंतर पुन्हा जुन्या निर्णयानुसार तासिकांचे वेळापत्रक करण्यात आला आहे. त्यानुसार शुक्रवार, शनिवारच्या तासिका कला, आरोग्य व शारीरिक शिक्षणासाठी देण्यात आल्या आहेत. दर शुक्रवारी आठ तासिकांऐवजी नऊ तासिका घेण्यात येणार असून, पहिली तासिका ३५ मिनिटांची व पुढील प्रत्येक तासिका तीस मिनिटांच्या असणार आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक परिस्थितीनुसार आवश्यक असल्यास मुख्याध्यापकांना तासिका विभागणीत लवचिकता ठेवण्याची मुभा महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. नव्या निर्णयात कला विषयासाठी तीन व क्रीडा विषयासाठी तीन तासिका मिळणार आहेत.

--

दुटप्पी भूमिकेने होरपळ

शिक्षण विभागाने गेल्या वर्षीच परिपत्रक काढून क्रीडा क्षेत्राप्रमाणेच कला क्षेत्रातील विद्यार्थ्यांना दहावीच्या परीक्षेत वाढीव गुण देण्याबाबत निर्णय जाहीर केले होते. शास्त्रीय कला क्षेत्र यामध्ये गायन, वादन, नृत्य, लोककला प्रकारात लावणी, शाहिरी, भारुड, गोंधळ, नारदीय कीर्तन आदी, तसेच चित्रकला परीक्षेमध्ये ठराविक नैपुण्यप्राप्त विद्यार्थ्यांना या गुणांचा लाभ मिळणार होता. नियमित विद्यार्थ्यांसाठी ही योजना आखण्यात आली. एकीकडे विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला, तर दुसरीकडे काही महिन्यांतच कलेच्या, क्रीडेच्या तासिका कमी करण्याचा निर्णय देण्यात आला. या निर्णयांमध्ये कोणतेही तारतम्य नसल्याने शिक्षण विभाग टीकेचा धनी झाला.

--

आंदोलनाचा परिणाम

तासिका कपातीविरोधात राज्यातील शिक्षकांनी आंदोलन करून तीव्र निषेध नोंदवला. शिवाय, उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. या विषयातील विद्यार्थ्यांमधील कौशल्य-क्षमता खुंटली जात असल्याचे सांगण्यासाठी पारंपरिक वेशभूषेत लोककलेच्या माध्यमातून शिक्षकांनी आंदोलनाद्वारे मागण्या मांडल्या. अशी वेगवेगळ्या प्रकारची आंदोलने राज्यभर शिक्षकांनी एकजुटीने केल्यानंतर हा निर्णय बदलण्यासाठी शिक्षण विभागाला भाग पडल्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येते.

--

तासिका पूर्ववत केल्याने शिक्षकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. परंतु, तासिका कमी केल्यानंतर झालेली आंदोलने, मानसिक त्रास यात नाहक वेळ खर्ची झाला. त्याऐवजी सुरुवातीलाच अभ्यासपूर्वक असे निर्णय घेतले गेल्यास शिक्षकांनाही विद्यार्थी विकासावर लक्ष देता येईल.

-योगेश रोकडे, कलाशिक्षक

--

शिक्षण विभागाने निर्णय देतानाच तो विचारपूर्वक देणे अपेक्षित आहे. कोणत्याही संघटना, तज्ज्ञ यांच्याशी संवाद न साधता थेट निर्णय जाहीर केले जात असल्याने असंतोष वाढतो. त्यामुळे हे सरकार शिक्षक, विद्यार्थीहिताचे निर्णय घेणार की नाही, अशी शंका उपस्थित होते.

-दत्तात्रय सांगळे, अध्यक्ष, व्हीजन नाशिक विभागीय कलाशिक्षक संघटना

--

हल्ली नवनवीन निर्णय शिक्षण विभागाकडून दिले जातात आणि आंदोलनांनंतर ते मागेही घेतले जातात. यामध्ये शिक्षकांचा वेळ शिकवण्यापेक्षा इतर गोष्टींवर खर्च होत आहे. बदल करण्याच्या नावाखाली शिक्षण क्लिष्ट करू नये, असे वाटते.

-नितीन पाटील, मुख्याध्यापक, सुखदेव प्राथमिक विद्यामंदिर

--

शिक्षण क्षेत्रातील प्रयोग थांबविणे आवश्यक आहे. आज तासिका कमी, उद्या पूर्ववत यामुळे शिक्षक, विद्यार्थ्यांचा गोंधळ उडतो. कला, क्रीडा हे विषय विद्यार्थ्यांच्या आवडीचे विषय आहेत. शिवाय, स्वतंत्र व्यवसायाच्या दृष्टीनेदेखील हे विषय अतिशय महत्त्वाचे आहेत. चुकीच्या निर्णयांमुळे वेळ जाण्याशिवाय हाती काही पडत नाही.

-सतीश नाडगौडा, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य खासगी शाळा शिक्षकेतर संघटना

--

या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांचे वेळापत्रक तासिकांमुळे दोन वेळा बदलले. विद्यार्थी याविषयी घरी चर्चा करतात, तेव्हा त्यांच्यातही संभ्रम दिसतो. त्याचा अभ्यासावर परिणाम होत आहे. शिवाय, आमचाही गोंधळ उडतो. माध्यमिकच्या विद्यार्थ्यांना तरी हा बदल लक्षात येतो. परंतु, लहान मुलांना बदल स्वीकारण्यास वेळ जातो. त्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होतो.

-विकास जाधव, पालक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


शेततळ्यांमुळे हजारो हेक्टर सिंचनाखाली

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

राज्य सरकारच्या ‘मागेल त्याला शेततळे’ योजना नाशिक जिल्ह्यात २० हजार हेक्टर शेती क्षेत्रासाठी वरदान ठरू लागली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत साडेचार हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी या योजनेचे लाभ घेतला. सर्वाधिक शेततळी चांदवड आणि सिन्नर या दुष्काळी तालुक्यांमध्ये झाली आहेत. पाण्याच्या उपलब्धतेमुळे पीक पद्धतीत वेगाने बदल घडत असून, शेततळ्यांमुळे यंदारब्बी हंगाम आणि उन्हाळी पिके घेणे शेतकऱ्यांना शक्य होणार आहे.

फेब्रुवारी २०१६ मध्ये ही योजना सुरू झाली. गेल्या दीड-पावणे दोन वर्षांत साडेचार हजार शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ घेतला आहे. त्यासाठी लाभार्थ्यांना २२ कोटींचे अनुदान देण्यात आले आहे. ५६७ शेततळीदेखील पूर्ण झाली असून, त्याचे अनुदानही लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे.

चांदवड आणि स‌िन्नर तालुक्यात एक हजाराहून अधिक शेततळे तयार करण्यात आले आहेत. त्याखालोखाल येवला तालुक्यात ९८९, सटाण्यात ४८७, दिंडोरीत ४२१ शेततळी तयार झाली आहेत. विशेषत: टंचाईग्रस्त भागात शेततळ्याच्या माध्यमातून ‍सिंचनाची सुविधा झाल्याने शेतकरी बागायतीकडे वळू लागले आहेत.

ऑनलाइन अर्जानुसार १८,३४२ शेततळ्यांसाठी कार्यारंभ आदेश देण्यात आले आहेत. कृषी विभाग ग्रामसभांमधून आणि प्रत्यक्ष भेटीद्वारे शेतकऱ्यांना शेततळ्याबाबत माहिती देत असून, सोबत सूक्ष्म सिंचनाबाबत मार्गदर्शनही केले जात आहे. त्यामुळे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पीक घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. शाश्वत पाणीसाठ्यामुळे शेतकऱ्यांसमोर पिकांचे पर्याय उपलब्ध झाले आहेत. सामूहिक शेततळ्यांच्या माध्यमातूनदेखील काही शेतकरी बागायती शेती किंवा पॉलिहाऊसकडे वळले आहेत.

असे आहेत योजनेचे निकष

- शेतकऱ्याच्या नावावर किमान ०.६० हेक्टर असावे

- गावात मागील पाच वर्षांत एक वर्ष तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली असावी

- दारिद्र्यरेषेखालील किंवा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना प्राधान्य

- शेततळ्यासाठी अर्ज http://aaplesarkar.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर करावा

- शेततळ्यांच्या आकारानुसार २२ ते ५० हजार रुपयापर्यंत अनुदान; शेतकऱ्याच्या बँक खात्यात केले जाते जमा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिगर आद‌विासींचा कळवणमध्ये हिरमोड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

कळवण नगरपंचायतीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळासाठी आरक्षण सोडत निघाली असून, नगराध्यक्ष पद आदिवासी राखीव झाले असल्याने बिगर आदिवासी समाजाच्या नगरसेवकांचा हिरमोड झाला आहे.

कळवण ग्रामपालिकेची नगरपंचायत झाल्यानंतर त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता आली. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना तसेच अपक्ष असा समन्वय साधत भाजपला सत्तेबाहेर ठेवत राष्ट्रवादीचे गटनेते कौतिक पगार यांनी आपल्या पत्नी सुनिता पगार यांना पहिल्या नगराध्यक्ष पदाचा मान मिळवून दिला. राज्य व केंद्रात भाजपची एकहाती सत्ता असतांना कळवण नगरपंचायत राष्ट्रवादीच्या अधिपत्याखाली आणण्यात जिल्हा परिषद सदस्य नितीन पवार, रवींद्र देवरे यांना यश आले.

उपनगराध्यक्षपदी रोटेशननुसार सहयोगी नगरसेवकांना संधी देण्यात आली. नगराध्यक्ष पद आरक्षणाने खुले मिळालेच तर स्वतःचा नंबर लावण्यासाठी कौतिक पगार तयारीत असतांना आरक्षण राखीव निघाल्याने त्यांच्या समर्थकांमध्ये नाराजी आहे. मात्र नूतन नगराध्यक्ष निवडीसाठी त्यांनाच महत्त्व असल्याने ते कोणाची वर्णी लावतात याकडे लक्ष लागले आहे.

विकासकामांसाठी शेजारील मतदारसंघाचे अर्थात देवळ्याचे आमदार डॉ. राहुल आहेर यांची मदत घेण्याची किमया राष्ट्रवादीचे नेते करत आहेत. सत्ते शिवाय शहाणपण नसते याचा अनुभव नगरपंचायत घेत आहे. डॉ आहेर पालकमंत्र्यांच्या माध्यमातून निधी कळवण नगरपंचायतला मिळवून देत आहेत. त्यामुळे पुढचा नगराध्यक्ष कोण होईल? या प्रश्नाचे उत्तर आज तरी कुणाकडे नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सतारवादनाने नाशिककर तृप्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘वैष्णव जन तो..’, ‘रघुपती राघव राजाराम..’ यांसारखी भजने, सतारवादनाने रसिक तृप्त झाले. निमित्त होते तीळभांडेश्वर लेनमधील दुर्गा मंगल कार्यालयाच्या प्रांगणात आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे. हरिहर भेट महोत्सवांतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले होते. प्रसाद रहाणे यांनी सतारवादन सादर केले.

रहाणे यांनी राग किरवाणीमध्ये आलाप, जोड, झाला, विलंबित तीनताल, मध्य लयीत झपताल, दृतलयीत बंदीश, राग हेमंत, लोकधून याचे सादरीकरण सतारवादनातून केले. त्यांनी स्वतः रचलेला विशालाक्षी रागही सादर केला. त्यानंतर सादर झालेल्या भजनांतून वातावरणात चैतन्य निर्माण झाले. गौरव तांबे यांनी तबल्याची साथ दिली. कार्यक्रमाचे निवेदन प्रियंका हातवळणे– दातार यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कारागृहातील शेतकऱ्यांनाही कर्जमाफी!

$
0
0

अभिमन बिरारी या कैद्यामुळे जेलमधील ५४ प्रकरणे मंजूर

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील ५४ शेतकरी कैद्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. या कैद्यांची प्रकरणे मंजूर झाली आहेत. उर्वरित ४६ कैद्यांचे नातेवाईक त्यांच्या पातळीवर तांत्रिक पूर्तता करणार आहेत. ज्याच्यामुळे हे घडले तो अर्धशिक्षित कैदी आहे, अभिमन जिभाऊ बिरारी. अधीक्षकांना तोडक्यामोडक्या भाषेत पत्र लिहिल्याने कारागृहातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफी प्रकरणांना चालना मिळाली.

अभिमनच्या चिठ्ठीमुळे त्याला एक लाख तीस हजार रुपयांची कर्जमाफी मंजूर झाली आहे. विशेष म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्याच्या बँक खात्यात कांदा चाळीचे एक लाख पाच हजारांचे अनुदानही जमा झाले. त्यामुळेच त्याने सरकार, जिल्हा प्रशासन व जेल प्रशासनाचे मनःपूर्वक आभार मानले. कारागृह अधीक्षक राजकुमार साळी यांना त्याने पत्र लिहिले असून, त्यात तो म्हणतो, ‘‘साहेब, आपण संकटकाळात केलेले उपकार मी व माझे कुटुंब या जन्मात विसरणार नाही. शेतकरी कर्जमुक्तीसाठी आपण कलेक्टरसाहेबांची अर्जंट परवानगी घेतल्याने शेतकरी कैद्यांचे आनलाइन फार्म भरता आले. जुने लोक जेल म्हणजे रावणाची बंदिशाळा समजतात. कारण रावणाच्या लंकेत रावणराजच चालायचे; पण नाशिकरोड जेलमधील रावणराज संपले आहे. लालगेट आफिस वैकुंठनगरी व टावर आफिस तर इंद्रनगरी झाली आहे.’’

शंभर कैद्यांची हजेरी!

राज्यातील शेतकऱ्यांना सरकारने कर्जमाफी जाहीर केली आहे. राज्यातील अनेक कारागृहांमध्ये मोठ्या संख्येने शेतकरी कैदी आहेत. नाशिकरोड कारागृहातील अभिमनने धीर करून कारागृह प्रशासनाला कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्याची विनंती केली. अधीक्षक साळी यांनी नोटीस बोर्डावर नोटीस लावून कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्यांची जेल सर्कलमध्ये बैठक बोलावली. त्याला शंभर शेतकरी बंदी हजर होते.

अशी केली पूर्तता!

नाशिकरोड कारागृहात तीन हजारांवर कैदी आहेत. शिक्षा झालेल्या (पक्के) आणि सुनावणी बाकी असलेल्या (कच्चे) अशा शेतकरी कैद्यांनी कर्जमाफीसाठी अर्ज भरले. काही कैद्यांकडे आधारकार्ड व अन्य कागदपत्रे होती. काहींकडे नव्हती. जेल प्रशासनाने टाटा सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या कैद्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून पूर्तता केली. यामुळे ५४ कैद्यांची कर्जमाफी मंजूर झाली. ४६ कैद्यांनी आपण नातेवाइकांमार्फत तांत्रिक पूर्तता करू, असे सांगितले. जेल प्रशासनाचीही कसरत झाली. कारागृहात निम्मा, तर संबंधित गावातील केंद्रांवर उर्वरित अर्ज भरून घेण्यात आला. कैद्यांच्या बोटांचे ठसे कारागृहात घेण्यात आले, तर कागदपत्रे टाटा संस्थेच्या मदतीने कैद्यांच्या घरून मिळवण्यात आली. प्रकरण मंजूर झाल्यानंतर अधीक्षकांनी जिल्हाधिकाऱ्यांना आवर्जून आभाराचे पत्र लिहिले.

जिल्हाधिकाऱ्यांची मदत

शेतकरी कैद्यांच्या वतीने साळी यांनी २५ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिले. त्यामध्ये त्यांनी शेतकरी कैद्यांच्या भावना व अडचणी नमूद केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी कमी वेळ असतानाही आपले दोन अधिकारी जेलमध्ये पाठवले. त्यांनी शेतकरी कैद्यांची नुकतीच बैठक घेऊन त्यांना योजना समजावून सांगत कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रथोत्सवाचा झगमगाट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

‘राजाधीराज त्र्यंबकराज भगवान की जय’, अशा जयघोषात श्री क्षेत्र त्र्यंबकेवर येथील शतकोत्तरी रथोत्सव शुक्रवारी आनंदात साजरा झाला. शतकांची परंपरा असलेल्या उत्सवात शहरातील नागरिक सहभागी झाले होते. विंचुरकर संस्थान‌ीक यांच्या वतीने मंदिर संस्थान हा रथोत्सव साजरा करीत असते. या

उत्सवासाठी विंचुरकर संस्थान यांचे वंशज उपस्थित होते. पौरोहित्य पंड‌ति रवींद्र अग्न‌हिोत्री यांनी केले. दिपमाळ प्रज्वलीत करतांना रूईकर यांच्या हस्ते पूजन झाले.

दरवर्षी कार्तिक पौर्णिमेच्या निम‌त्तिाने साजरा होत असलेल्या रथोत्सवात भगवान त्र्यंबकराजाचा सुवर्णमुकुट सुमारे १५५ वर्षांपूर्वीच्या ३१ फूट उंच शिसवी लाकडापासून बांधलेल्या रथातून तीर्थराज कुशावर्ताकडे दुपारी चार वाजेच्या सुमारास निघाला. यावेळी भाविकांनी एकच जयघोष केला.

मिरवणूक मार्गावर

फुलांचे गालीचे

मंगलवाद्यांच्या गजरात शंख तुतारीच्या निनादात अग्रभागी श्री त्र्यंबकराजाची पालखी होती. पालखीत चांदीचा मुखवटा ठेवलेला होता. पाच बैलजोड्या जुंपण्यात आल्या होत्या. रथ मार्गावर नागरिकांनी फुलांचे गालीचे तयार केले होते. रथावर इमारतींच्या सज्जातून पुष्पवृष्टी केली जात होती. कुशावर्तावर विधीवत पूजा झाली. तेथे हजारो पणत्यांनी कुशावर्त उजळले होते. हा सोहळा शेकडो भाविकांनी डोळ्यात साठवला.

पूर्व दरवाजाजवळ दीपमाळ प्रज्वलीत

सायंकाळी सहावाजेच्या सुमारास रथ पुन्हा मंदिराकडे प्रस्थान झाला. तेव्हा विद्युत रोषणाईने झगमगणारा रथ विलोभनीय दिसत होता. पालखी आणि रथासोबत मंदिराचे विश्वस्त, प्रशासकीय अधिकारी, पोल‌सि अधिकारी आदींसह विविध राजकीय पक्ष, सामाज‌कि संस्था यांचे पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते. रथ मंदिरात परतल्या नंतर पूर्व दरवाजाची दीपमाळ प्रज्वलीत करण्यात आली तसेच मंदिर परिसरात त्रिपूर वाती लावण्यासाठी महिलांनी गर्दी केली होती. संपूर्ण शहरात मंगलमय वातावरण होते. त्र्यंबकेश्वर मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. पूर्व परंपरेने साजरा होणारा हा सण अतिशय आनंदात साजरा झाला. कुशार्वत चौकात तसेच मंदिरात पेढे आणि लाडू वाटून नागरिकांनी आनंद साजरा केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अशोका बिल्डकॉनला पुरस्कार

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

भारतात पायाभूत सुविधा क्षेत्रात अग्रेसर असलेल्या अशोका बिल्डकॉनला डून अँड ब्रँडस्ट्रीट इन्फ्रा अॅवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे. रस्ते आणि महामार्ग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कंपनीला हा पुरस्कार देण्यात आला आहे.

मुंबर्इत २ नोव्हेंबर रोजी हयात रिजेन्सी या हॉटेलमध्ये झालेल्या शानदार समारंभात केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अशोकाचे चेअरमन अशोक कटारिया यांनी हा पुरस्कार स्वीकारला. कंपनीचे संचालक मिलाप भन्साळी आणि दिलीप कोठारी या वेळी उपस्थित होते. अशोका बिल्डकॉनचे सध्या १३ राज्यांत काम सुरू आहे. आतापर्यंत सहा हजार किलोमीटरचे रस्ते व महामार्ग कंपनीने निर्माण केले आहेत. देशातील ३० हजार गावांमध्ये वीज वितरण करून कंपनी देशाच्या विकासात योगदान देत आहे. मालदीव येथेही कंपनीच्या वतीने विकासकामे करण्यात येत आहेत. या पुरस्कारामुळे आमची जबाबदारी वाढली असून, देशाच्या विकासात आणखी वेगाने काम करण्याचा निर्धार कटारिया यांनी व्यक्त केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण?

$
0
0

कॉलेज क्लब रिपोर्टर, नाशिक

शैक्षणिक वर्ष २०१६-१७ च्या एलएलएमच्या विद्यार्थ्यांची अंतर्गत तोंडी परीक्षा न घेता परस्पर गुण देण्याचा गोंधळ एनबीटी लॉ कॉलेजमध्ये घडला होता. यामुळे अनेकांना कमी गुण देण्यात आले होते. परीक्षा न घेता गुणांकन केल्याच्या प्रकरणावर विद्यार्थी कृती समितीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात न्यायासाठी धाव घेतली होती. यानंतर संबंधित प्रकरणात दोषी असणाऱ्यांवर कारवाई करू, असे आश्वासन विद्यापीठाने विद्यार्थ्यांना दिले होते. मात्र, पुनर्मूल्यांकनाच्या नव्या गुणपत्रिका येऊनही अद्याप प्रशासनावर कारवाई झाली नसल्याने विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण, असा सवाल विद्यार्थ्यांनी आता उपस्थित केला आहे.

गोखले एज्युकेशन सोसायटीच्या एनबीटी लॉ कॉलेजच्या विद्यार्थ्यांना पदवीच्या परीक्षेत देण्यात येणाऱ्या अंतर्गत गुणांमध्ये अन्याय झाल्याची दावा विद्यार्थ्यांनी विद्यापीठात केला होता. विद्यार्थ्यांना कॉलेजने अंतर्गत गुणदानात चेहरा पाहून गुणदान केल्याचे दाव्यात म्हंटले होते, तसेच गेली तीन ते चार वर्षे एलएलएमच्या विद्यार्थ्यांच्या गुणदानाचा एनबीटी कॉलेज दरवर्षी गोंधळ करत असल्याचा आरोपही विद्यार्थ्यांनी केला होता. यानंतर विद्यार्थ्यांना संबंधित प्राचार्य व प्रशासनावर कारवाई करू, असे विद्यापीठाने सांगितले होते. आता विद्यार्थ्यांचे पुनर्मूल्यांकनाचे निकाल लागले आहेत. मात्र, अद्याप कॉलेजवर कारवाई झालेली नाही. या प्रकरणात राजकीय दबाव आणला जात असून, कॉलेजला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. असे असेल तर विद्यार्थ्यांच्या समस्या कोण सोडवणार? तसेच कॉलेजच्या चुकांना जबाबदार कोण, असा संतापजनक सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे. आमच्यावर अन्याय करणाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी पुन्हा विद्यार्थ्यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांना लिहिणार पत्र!

एनबीटी लॉ कॉलेजच्या संबंधित प्रकरणात लक्ष घालावे, तसेच विद्यार्थ्यांवर मुद्दाम अन्याय केला जात आहे. विद्यार्थ्यांना योग्य न्याय द्यावा. संबंधित कॉलेज प्रशासनावर कायदेशीर कारवाई करावी. दंड नको तर ठोस कारवाई असावी, अशी मागणी करणारे पत्र एनबीटी कॉलेजचे विद्यार्थी मुख्यमंत्र्यांना लिहिणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कार अपघातात अधिकारी जखमी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

गोविंदनगर रस्त्यावरील तिडकेनगरमध्ये दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चारचाकीला झालेल्या अपघातात महापालिकेच्या शहर नियोजन विभागाचे अधिकारी प्रशांत पगार यांच्यासह एक जण जखमी झाला. ही घटना आज दुपारी घडली.

सिटी सेंटर मॉल सिग्नलकडून इंदिरानगरकडे जाणारे पगार यांच्या फोर्ड इको स्पोर्ट (एमएच १५/ एफएफ ६७८७) कारसमोर विरुद्ध दिशेने दुचाकीस्वार आल्यामुळे त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात पगार यांचा कावरील ताबा सुटला. रस्त्याच्या मध्यभागी दुभाजकावर कार आदळून कार रस्त्याच्या विरुद्ध दिशेला फूटपाथवर जाऊन उभी राहिली. अपघातात पगार व त्यांचा सहकारी जखमी झाला असून, जीवित हानी झालेली नाही. दोघांनाही सुयश हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

ज्येष्ठ नागरिकाचा खून

इंदिरानगर : वडाळा गावातून पायी जाणारे ज्येष्ठ नागरिक नामदेव कडाजी लाखे (वय ७०) यांना काठीने मारहाण करून गंभीर जखमी करण्यात आले होते. रुग्णालयात उपचार सुरू असताना लाखे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात संशयित गोरख पाराजी गायकवाड याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडाळा गावातून नामदेव लाखे काठी घेऊन चालत होते. या वेळी गोरख गायकवाड याने लाखे यांना धक्‍का देऊन खाली पाडले. त्याच वेळी त्यांच्याजवळील काठीने डोक्यास मारहाण करण्यास सुरुवात केली. यानंतर जखमी झालेले लाखे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी गोरख गायकवाड यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सहस्रदीपांनी झगमगले इंद्रकुंड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शुक्रवारी इंद्रकुंड देवस्थानात सहस्रदीप प्रज्वलित करण्यात आले होते. त्यामुळे हा परिसर झगमगला होता. सनईचे मंजुळ स्वर, दिव्यांचे तेज, विलोभनीय रांगोळी, दरवळणारा अगरबत्तीचा सुवास यामुळे वातावरण भक्तिपूर्ण झाले होते.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त शिव मंदिरात त्रिपूर वाती लावण्याची परंपरा असून, यादिवशी शंकराने तीन असुरांचा वध केला, अशीही आख्यायिका आहे. त्यामुळे यादिवशी शिव मंदिरात त्रिपूर वाती लावल्या जातात. मंदिरावर दिव्यांची रोषणाई करण्याचीही परंपरा आहे. यावेळी मंदिरासमोर असलेल्या दीपमालेच्या प्रकाशात मंदिर उजळून निघते.

नाशिक शहरात शुक्रवारी विविध ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला. मालेगाव स्टॅँड येथे असेल्या इंद्रकुंड परिसरात सकाळपासून दीपोत्सवाची तयारी करण्यात आली होती. परिसर स्वच्छ करण्यात आला. परिसरातील महिलांनी संपूर्ण मंदिराच्या आवारात रांगोळी रेखाटली होती. सायंकाळी सहानंतर दीपोत्सवाला सुरुवात झाली. येथील कार्यक्रमाची सुरुवात पंचवटी पोलिस स्टेशनचे निरीक्षक दिनेश बर्डेकर, बीएपीएल स्वामी नारायण संस्थांनचे संत श्रुती वल्लभ स्वामी व गुरू मंगल स्वामी यांच्या हस्ते आरतीने करण्यात आली. संपूर्ण परिसरात दिवे लावण्यात आले होते. गुरुमित बग्गा, रवी कुलकर्णी, सागर जाधव, देवेंद्र पटेल, सुधाकर नेवे आदींनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.

दरम्यान, मुरलीधर गल्लीत सिद्धेश्वर महादेव मंदिरात शंकराला अर्धनारी नटेश्वराचा मुखवटा लावून विविध फळे व फुलांची आरास करण्यात आली. धार्मिक विधी व दूध वाटपाचा कार्यक्रम झाला. येथेही पणत्यांची रोषणाई करण्यात आली होती. नाशिककर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

तुळशीविवाह थाटात

पंचवटी ः नवीन आडगाव नाका येथील युवक मित्रमंडळातर्फे स्वामिनारायणनगरमध्ये शुक्रवारी तुळशीविवाह सोहळा थाटात झाला. तुळशीविवाहाविषयी संत जनार्दन स्वामी आश्रमाचे विश्वस्त भाऊ पाटील यांचे प्रवचन झाले. या सोहळ्यास ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या राजयोगिनी ब्रह्माकुमारी वासंतीदीदी, जनार्दन स्वामी आश्रमाचे संतोषगिरी महाराज, पंचमुखी हनुमान मंदिराचे भक्तीचरणदास महाराज, लक्ष्मीनारायण मंदिराचे उमेश महाराज आदी उपस्थित होते. कपालेश्वर मंदिरात विष्णुयागाची सांगता झाली. आज, शनिवारी शंकर-पार्वतीच्या रुपात कपालेश्वराची पूजा करण्यात येणार आहे. सायंकाळी शौनकाश्रमात महाप्रसादाचा कार्यक्रम होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

झगमगले बालाजी मंदिर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

त्रिपुरारी पौर्णिमा अर्थात पणती पौर्णिमा ही पौर्णिमा नाशिकमध्ये आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी केली जाते. या दिवशी नाशिकच्या गंगापूर गावात शंकराचार्य न्यास संचलित श्री बालाजी मंदिरात हजारो पणत्या प्रज्वलित करून हा दीपोत्सव साजरा केला जातो. या निमित्त मंदिरातील बालाजीच्या मूर्तीभोवती आकर्षक पणत्यांची आरास करण्यात आली होती. सोमेश्वरनजीकचे श्री व्यंकटेश बालाजी मंदिर शुक्रवारी हजारो दिव्यांनी उजळले होते.

उद्योजक लक्ष्मीदीदी गलाणी, तसेच हेमंत बक्षी यांच्या हस्ते प्रथम पणती उजळवण्यात आली. बालाजी मंदिराच्या स्थापनेपासून येथे अखंड समई तेवत आहे. या समईतून ज्योतीने ज्योत लावत पणत्या उजळवल्या जातात. लक्ष लक्ष पणत्यांनी हा परिसर उजळून निघतो. शिस्तबद्ध व्यवस्थेत प्रत्येकाने बालाजीचे दर्शन घेतले. बालाजी मंदिराच्या आवारात शहरातील प्रत्येक नागरिकाने किमान दहा पणत्या या ठिकाणी लावाव्यात, असे आवाहन शंकराचार्य न्यासतर्फे करण्यात आले होते. मंदिराबाहेरील गोशाळेपासून धबधब्याजवळील काही भागाभोवतीही पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या.

रोषणाई आणि लाखो पणत्यांच्या प्रकाशाने मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. मंदिरात बालाजीच्या दर्शनासाठी आणि पणत्या प्रज्वलित करण्यासाठी नाशिककरांनी गर्दी केली होती. दहा वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा होत असून, पहिल्या वर्षी फक्त ११०० पणत्या लावण्यात आल्या होत्या. मात्र, दहा वर्षांनंतर ही संख्या आता हजारोंच्या वर गेली आहे. त्यामुळे बालगोपालांसह अबालवृद्धांनी या दीपोत्सवात सहभाग घेतला. गंगापूर रस्त्याकडून मंदिर रस्त्याकडे वळल्यानंतर डाव्या बाजूला मैदानात कार पार्किंग व्यवस्था करण्यात आली होती. दुचाकीस्वारांसाठी मंदिर परिसरात कुठेही वाहन उभे करण्याची व्यवस्था असल्याने अनेक भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतला. भाविकांच्या सोयीसाठी यंदाही आयुर्विमा महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या सेतू या संस्थेतर्फे पादत्राणे सेवा केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुलसी विवाहातच झाले शुभमंगल

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

वेळ सायंकाळची... रस्ते सडा व फुलांनी सजलेले... ग्रामीण वाद्याचा आवाज...भाविकांची गर्दी...अनेकजण बेभान होऊन नाचताहेत... बैलगाड्यांतून तुलसी व भगवान विष्णूची मिरवणूक निघालेली.. मिरवणूक आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ थांबते...ब्राह्मवृंदाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या मंगलाष्टकाने आणि जनसमुदायाच्या हातातून अलगद बरसणाऱ्या फुलांच्या वर्षावात तुलसी विवाहसोहळा रंगतो... आणि...त्यानंतर लगेच एका तरुणाचा आणि तरुणीचा खरोखरचा विवाह पार पडतो. तुलसी विवाहातच सात जन्माची शपथ घेणाऱ्या जोडप्याचा विवाहसोळा पाहून अनेकांना सुखद धक्का बसतो... चित्रपटात शोभेल असा प्रसंग रुई (ता. निफाड) येथील रामकृष्ण साधना आश्रमात गुरुवारी सांयकाळी उभा राहिला.

विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड घालून वैचारिक क्रांती घडावी या उद्देशाने दरवर्षी रुई येथे तुलसी विवाह सोहहा होतो. यावर्षीही हा सोहळा धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मात्र यंदा त्यात एकलहरे येथील चि. दत्तू तुकाराम घुले व रुई येथील चि. सौ. कां. प्रियंका गोरख रोटे यांचा विवाह लावून ह. भ. प. ज्ञानेश्वर माऊली शिंदे यांनी एक नवीन आदर्श समाजापुढे ठेवला.

सनई, चौघडा, संबळ आदी पारंपरिक वाद्यांसह सायंकाळी साडेपाच वाजता आश्रमातून सजवलेल्या बैलगाड्यांतून राधा-कृष्ण, शिवशंकर, राम-लक्ष्मण- सीता- हनुमान अशी वेगवेगळी वेशभूषा धारण केलेली बालके व विविध संत महात्म्यांची भव्य मिरवणुक काढण्यात आली. सुदाम महाराज ब्रह्मचारी बंगालीबाबा, नेमावर, मध्यप्रदेश, भास्करगिरी महाराज, मधूकर महाराज जोपुळकर, निवृत्ती महाराज चव्हाण, योगेश महाराज कुदळ, नामदेव शास्त्री अनारसे, सोपान महाराज पगार, दत्तूकाका राऊत, गजानन महाराज कवाडकर, उत्तम महाराज आरसोडे, पोपट महाराज जाधव, बाळकृष्ण महाराज नवले यांच्या उपस्थितीत भगवान विष्णूचे रूप घेतलेली खुशी रुकारी व तुळशीचे रूप घेतलेली स्वरा जोशी या बालिकांचा प्रतिकात्मक विवाहसोहळा जुन्या वैदिक पद्धतीने तुलसीविवाह झाला. त्यानंतर तेथेच दत्तू घुले व प्रियंका रोटे या उभयतांचा विवाह झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात फक्त २४७४ शिक्षक मतदार

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

विधान परिषदेच्या नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदार नोंदणी करणे आवश्यक असतानाही जिल्ह्यात ५३ हजार शिक्षकांपैकी केवळ २,४७४ शिक्षकांनीच मतदार नोंदणी केली आहे. नोंदणीसाठी ६ नोव्हेंबर ही अंतिम मुदत असून, मतदार नोंदणी वाढली नाही तर निवडणूकप्रक्रिया कशी राबवायची, याची चिंता प्रशासनाला सतावू लागली आहे.

नाशिक विभाग शिक्षक मतदारसंघाच्या विद्यमान सदस्याची मुदत संपुष्टात येत असल्यामुळे विधान परिषदेच्या या जागेसाठी निवडणूक आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करावा लागणार आहे. दर सहा वर्षांनी होणाऱ्या या निवडणुकीसाठी प्रत्येक वेळी नवीन मतदारयादी तयार करावी लागते. गेल्या निवडणुकीत वापरलेली मतदारयादी सहा वर्षांनंतर रद्द ठरविण्यात येत असल्याने शिक्षकांनी पुन्हा नव्याने मतदार नोंदणी करणे अनिवार्य आहे. याकरिता जिल्ह्यात ६ ऑक्टोबरपासून शिक्षक मतदार नोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये सुमारे दोन लाख अर्ज वितरित केले असताना अवघे १५,३९२ मतदारांचेच अर्ज निवडणूक शाखेला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी १२ हजार १२१ अर्ज पुरुष शिक्षकांचे तर ३,२६८ अर्ज महिला शिक्षिकांचे आहेत. त्यामुळे मतदार नोंदणीच्या मोहिमेकडे शिक्षकांनीच पाठ फिरव‌िल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. जिल्ह्यातून अवघ्या २,७७४ शिक्षक मतदारांचीच नोंदणी झाल्याची माहिती पुढे आली आहे. यामध्ये १,८०८ पुरुष व ६६६ महिला शिक्षक मतदारांचा समावेश आहे. मतदार नोंदणीसाठी ६ नोव्हेंबरपर्यंत मुदत असून, २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर या कालावधीत दावे आणि हरकती स्वीकारण्यात येणार आहेत. मतदार नोंदणीच्या पहिल्या टप्प्यात शिक्षकांमध्ये नावनोंदणीबाबत अनास्था पाहावयास मिळते आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीसाठी पूर्वतयारी

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

नागपूर- मुंबई समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १६ नोव्हेंबर रोजी घेणार आहेत. मुंबईत याबाबतची बैठक होणार असून, तत्पूर्वी जिल्ह्यात अधिकाधिक जमीन संपादनाचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. जमीन संपादनास शेतकऱ्यांची संमती मिळावी, यासाठी अधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. बैठकींद्वारे शेतकऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे.

सिन्नर आणि इगतपुरी तालुक्यातून जाणाऱ्या या महामार्गासाठी जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे १५० हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यापोटी शेतकऱ्यांना सुमारे २०० कोटींचा मोबदलाही देण्यात आला आहे. या महामार्गाला जिल्ह्यात अद्याप विरोध होत असून, काही शेतकऱ्यांनी हायकोर्टात याचिकाही दाखल केली आहे. मात्र, हा लोकहिताचा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीत न थांबव‌िण्याच्या निर्णयावर राज्य सरकार ठाम आहे. राज्यातील ३० तालुके आणि ३५५ गावांतून जाणाऱ्या या महामार्गामुळे राज्यातील २४ जिल्ह्यांचे अर्थकारण बदलणार आहे. त्यामुळे विकासाचा दर वाढण्यास मदत होणार असून, २५ लाख लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतीलस, असा सरकारचा दावा आहे. या महामार्गाला पहिल्या दिवसापासून विरोध दर्शविणाऱ्या शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.

अलीकडेच समृद्धीबाधितांनी काळी दिवाळी साजरी करत सरकारचा निषेध नोंदवला. या सर्व पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी मुंबईत बैठक बोलावली आहे. बैठकीला जाण्यापूर्वी अधिकाधिक भूसंपादन करण्याचा प्रशासनाचा प्रयत्न आहे. त्यासाठी गावोगावी बैठकी घेण्यात येत असून, त्याद्वारे शेतकऱ्यांचे मन वळविण्याचा प्रयत्न प्रशासनाने सुरू केला आहे. नागपूर, वाशिम, बुलडाणा, जालना, अहमदनगर आणि ठाणे या जिल्ह्यांमध्ये १०० टक्के संयुक्त मोजणीची कार्यवाही पूर्ण झाली आहे. उर्वरित जिल्ह्यांमध्ये वर्धा (९७ टक्के), अमरावती (८५ टक्के), औरंगाबाद (९७ टक्के) व नाशिक (८७ टक्के) या प्रमाणे संयुक्त मोजणीची कार्यवाही झाली आहे. उर्वरित ठिकाणी येणाऱ्या अडचणी आणि त्यावरील उपाययोजना याचाही आढावा या वेळी मुख्यमंत्री घेणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

...अन् गवसले ‘फेकलेले’ चौदा तोळे सोने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

दिवाळीत घरात आवरसावर करून कचरा फेकताना चक्क चौदा तोळे सोने अन् ३४७ ग्रॅम दागिने असलेली पिशवीच फेकून दिल्याचा प्रकार सिडकोत घडला अन् संबंधित कुटुंबीयांची एकच धावपळ उडाली...

अनेक दिवसांच्या घालमेलीनंतर कचरा वेचणाऱ्या महिलेचा प्रामाणिकपणा अन् इंदिरानगर पोलिसांच्या तत्परतेमुळे हा एेवज संबंधितांना परत मिळाल्याने सर्वांचाच जीव भांड्यात पडल्याचे चित्र शुक्रवारी दिसून आले.

शरद त्र्यंबक दळवी व त्यांच्या पत्नी सरिता यांनी दिवाळीत घराची साफसफाई केली. त्यावेळी लक्ष्मीपूजनासाठी सोन्या-चांदीचे दागिने लागतील म्हणून सरिता यांनी घरातील सर्व दागिने प्लास्टिकच्या पिशवीत भरून ठेवले. साफसफाई झाल्यावर सर्व केरकचरा फेकून देऊ या उद्देशाने शरद दळवी यांनी दागिने असलेली पिशवीदेखील कचऱ्यात टाकली व कचऱ्याची गोणी खत प्रकल्पाजवळील ढिगाऱ्यावर टाकून दिली.

--

दोघांनाही बसला धक्का

दळवी यांच्या मुलाने फटाके उडविण्यासाठी पणती मागितल्यावर पणती शोधण्याच्या नादात सोन्याचे दागिने असलेली पिशवी नसल्याचे लक्षात आले. त्यावेळी सरिता यांनी या पिशवीबाबत विचारणा केली असता ती पिशवी कचऱ्याच्या गोणीत टाकल्याचा उलगडा झाला. त्यामुळे दोघांनाही धक्का बसला. गोणी ज्या ठिकाणी फेकली तेथे जाऊन पाहणी त्यांनी केली असता गोणी गायब झाल्याचे दिसून आले. त्यानंतर या दोघांनीही अंबड पोलिस ठाण्यात अर्ज दाखल केला.

--

इंदिरानगर पोलिसांची तत्परता

ऐन दिवाळीत सोने कचऱ्यात फेकले गेल्याचा प्रकार घडल्यानंतर या सोन्याचा शोध कसा घ्यावा, हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यानच्या काळात खत प्रकल्प परिसरात गंगूबाई आसरुबा घोडे आणि त्यांच्या मुली सुनीता व मुक्ता या कचरा गोळा करीत असताना त्यांना ही सोने असलेली पिशवी आढळली. ऐन दिवाळीचे दिवस असल्याने त्यांनीही हे सोने घरीच ठेवले. याची माहिती इंदिरानगर पोलिस ठाण्याच्या गुन्हे पथकाला मिळाली. पोलिसांनी गंगूबाईकडे विचारणा केली असता तिने हे सोने सापडल्याची कबुली दिली. सदरचे सोने पोलिसांनी हस्तगत केले.

--

अन् दागिने मिळाले परत

दरम्यान, गंगूबाईच्या मुलाने सोन्याच्या पिशवीतील बिलावरून दळवी यांना फोन लावून सोने सापडल्याचे सांगितले. दळवी यांनीही इंदिरानगर पोलिस ठाण्यात येऊन चौकशी केली. त्यावेळी या सोन्याची खातरजमा केली असता हे सोने दळवी यांचेच असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर शुक्रवारी सहाय्यक पोलिस आयुक्त सचिन गोरे व निरीक्षक के. बी. चौधरी यांच्या हस्ते दळवी यांना दागिने परत करण्यात आले. यावेळी दळवी यांनी गंगूबाईस दहा हजार रुपयांचे रोख बक्षीस दिले, तर पोलिसांनीही गंगूबाई व तिच्या मुलीचा सत्कार केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अस्वच्छ भूखंडधारकांवर बडगा

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता होऊन हे भूखंड रोगराईला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे अशा मोकळ्या अस्वच्छ भूखंडधारकांवर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, स्थायी समितीने यासंदर्भात कारवाईचे आदेश दिले आहेत.

शहरातील अशा मोकळ्या भूखंडाची स्वच्छता करून त्या स्वच्छतेचा खर्च व अस्वच्छतेबद्दलचा अतिरिक्त दंड हा भूखंडधारकांच्या घरपट्टीतून वसूल करण्याचे आदेश सभापती शिवाजी गांगुर्डे यांनी दिले. यासंदर्भातील ठराव महापालिकेने अगोदरच पारित केला असून, त्यावर तातडीने कारवाई करण्याच्या सूचना सभापतींनी दिल्या आहेत. त्यामुळे मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाई होऊन महापालिकेला दंडातून अतिरिक्त महसूलही मिळणार आहे.

सभापती गांगुर्डे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर आला. महापालिका हद्दीत सध्या मोठ्या प्रमाणावर रिकामे भूखंड आहेत. बिल्डरांनी, तसेच जागामालकांनी अनेक वर्षांपासून या भूखंडांवर कोणतेही बांधकाम न करता निव्वळ त्यांचे दर वाढविण्यासाठी ते रिकामेच ठेवले आहेत. परंतु, या मोकळ्या भूखंडांवर गवत, तसेच आजूबाजूच्या नागरिकांकडून कचरा टाकला जात असल्याने हे भूखंड कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट बनत चालले आहेत. या भूखंडांवर अस्वच्छता निर्माण होऊन परिसरात रोगराई वाढीस लागत आहे. शहरात सध्या डेंग्यू आणि स्वाइन फ्ल्यूसह साथीच्या आजारांनी थैमान घातले आहे. डेंग्यूने तर रेकॉर्ड तोडले असून, स्वाइन फ्ल्यूचे राज्यात सर्वाधिक बळी नाशिकमध्ये गेले आहेत. सदरील रिकामे प्लॉट हे खासगी मालकीचे असल्याने त्यांची नियमित साफसफाई होत नसल्याची स्थिती आहे. खासगी जागामालकही नियमितपणे ही साफसफाई करीत नाही. त्यामुळे महापालिकेने आता या भूखंडधारकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

भाजपचे सदस्य विशाल संगमनेरे यांनी प्रभागातील खासगी मालकीच्या मोकळ्या भूखंडांवरील अस्वच्छतेचा प्रश्न मांडला. मोकळ्या भूखंडांवर मोठ्या प्रमाणावर कचरा साचला असून, संबंधित जागामालकांकडून स्वच्छता केली जात नसल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याची तक्रार संगमनेरे यांनी केली. यावर मोकळ्या भूखंडधारकांकडून वार्षिक दंडात्मक कर आकारणी करून महापालिकेच्या माध्यमातून सदर भूखंडांची स्वच्छता केली जावी. ही दंडवसुली घरपट्टीच्या माध्यमातून केली जावी, असे आदेशच सभापती गांगुर्डे यांनी दिले. त्या संदर्भातील ठराव या अगोदरच झाला असून, त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे मोकळ्या भूखंडधारकांवर कारवाई होणार आहे.

---

‘पेस्ट कंट्रोल रद्द करा’

स्थायीच्या सभेत घंटागाडी आणि पेस्ट कंट्रोल ठेकेदाराच्या कार्यपद्धतीवर सदस्यांनी पुन्हा आक्षेप घेतला. स्थायीने आदेश देऊनही पेस्ट कंट्रोल ठेकेदाराला नोटीस दिली नसल्याचा आरोप सदस्यांनी केला. त्यावर आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बुकाने यांनी संबंधित ठेकेदारास आतापर्यंत दोन वेळा नोटिसा दिल्या असून, गुरुवारी पुन्हा नोटीस दिल्याचा दावा केला. त्यामुळे संतप्त झालेल्या सभापतींनीही पेस्ट कंट्रोलचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्याचे आदेश आरोग्याधिकाऱ्यांना दिले. यासंदर्भात आयुक्तांशी चर्चा झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

---

निधीबाबत भेदभाव

नवीन नाशिक विभागातील प्रभाग क्रमांक २५ मधील नागेश्वर क्रीडा संकुलातील महिला व पुरुष व्यायामशाळेसाठी क्रीडा साहित्य पुरविण्याच्या प्रस्तावावरून समिती सदस्य मुकेश शहाणे, भागवत आरोटे यांनी आक्षेप नोंदविला. निधीचे समान वाटप केले जात नाही, तसेच विशिष्ट प्रभागावरच क्रीडा, तसेच दलित वस्ती सुधार योजनेचा निधी खर्च केला जात असून, निधी वाटपाबाबत भेदभाव केला जात असल्याचा आरोप या सदस्यांनी केला. सदर प्रस्ताव तहकूब ठेवत अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती गांगुर्डे यांनी दिले. निधीचे समान वाटप करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

---

पवार, हिरे यांना नोटिसा

नाशिक पश्चिम विभागातील प्रभाग ७ व १२ मधील रस्त्यांच्या डांबरीकरणाच्या प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सभापती गांगुर्डे यांनी बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांना धारेवर धरले. काम मिळण्यासाठी ठेकेदारांकडून कमी दराच्या निविदा भरल्या जातात. परंतु, त्यामुळे कामाचा दर्जा राखला जात नाही. रस्त्यांची कामे नित्कृष्ट झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, अशी तंबी सभापती गांगुर्डे यांनी दिली. सभेत उशिरा हजर झाल्याबद्दल शहर अभियंता यू. बी. पवार यांच्यासह अभियंता हिरे यांना नोटिसा बजावण्याचे निर्देशही सभापतींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नाशिकरोडचा पाणीप्रश्न मिटणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाकडून दारणा धरणातून उपलब्ध होणारे आरक्षित पाणी पूर्ण क्षमतेने उचलण्यासाठी मनपाने चेहेडी पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. या पंपिंग स्टेशनची क्षमता ५० वरून शंभर एमएलडी करण्यात येणार आहे. त्यासाठी अमृत योजनेंतर्गत ५० कोटींचा प्रस्ताव महापालिकेच्या वतीने केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला आहे. केंद्र सरकारने हिरवा कंदील दिल्यास मनपाला दारणातून पूर्णपणे आरक्षित पाणी उचलता येणार असून, नाशिकरोडचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

महापालिकेच्या वतीने शहराला गंगापूर धरण व दारणा नदीपात्रातून पाणीपुरवठा केला जातो. आरक्षित पाणी उचलण्यासाठी महापालिकेच्या वतीने गंगापूर धरण व चेहेडी येथे दारणा नदीकाठी पंपिंग स्टेशनची उभारणी करण्यात आली आहे. चेहेडी पंपिंग स्टेशनची रोज पाणी उचलण्याची क्षमता ५० एमएलडी आहे. पाटबंधारेकडून मनपाला दारणामधून दरवर्षी चारशे दशलक्ष घनफूट पाणी उपलब्ध करून दिले जाते. मात्र, सध्याच्या पंपिंग स्टेशनची क्षमता पूर्ण पाणी उचलण्याची नाही. त्यामुळे नाशिकरोड येथे पाणीटंचाई जाणवते. महापालिकेच्या चेहेडी पंपिंग स्टेशनची पाणी उचलण्याची क्षमता कमी असल्यामुळे जेमतेम ३०० दक्षलक्ष घनफूट पाणी उचलता आले. क्षमता नसल्याने शंभर दशलक्ष घनफूट पाण्याचे आरक्षण वाया गेले. त्यामुळे भविष्यातील वाढती लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता चेहेडी पंपिंग स्टेशनची क्षमता दुपटीने वाढविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. सद्यःस्थितीतील पंपिंग स्टेशनची ५० एमएलडीवरून १०० एमएलडीपर्यंत क्षमतावाढ केली जाणार आहे. या संदर्भातील ५० कोटी रुपये खर्चाचा प्रस्ताव अमृत योजनेंतर्गत मान्यतेसाठी सरकारकडे पाठविण्यात आला आहे. त्याला मंजुरी मिळाल्यास नाशिकरोडचा पाणीप्रश्न मिटणार आहे.

मनपा आरक्षणावर ठाम

महापालिकेने यंदा गंगापूरमधून ४३०० आणि दारणातून तीनशे दशलक्ष घनफूट पाणी आरक्षणाची मागणी केली आहे. मात्र, गेल्या वर्षीप्रमाणेच ४३०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण कायम ठेवण्याचे सूतोवाच जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी नव्याने पाणी आरक्षणाची मागणी करण्याचे फर्मान काढले आहे. मात्र, मनपा वाढीव पाणी आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहे. सद्यःस्थितीत दारणा धरणातून उपलब्ध पाणी आरक्षण उचलण्याची मनपाची क्षमता नाही. त्यामुळे दारणातून ४०० ऐवजी ३०० दशलक्ष घनफूट पाणी मनपासाठी आरक्षित केले जावे व येथील १०० दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण गंगापूर धरणातून दिले जावे. शहराची वाढती लोकसंख्या लक्षात घेता पाच टक्के वाढीव पाणी आरक्षणाची मनपाची मागणी रास्त असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘गच्चीवरील बाग’ फुलविण्याची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आपले घर, आजूबाजूचा परिसर सुंदर, रंगीबेरंगी फुलांनी सजलेला असावा, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, जागेअभावी व माहितीअभावी ही इच्छा अनेकदा पूर्ण होतच नाही. याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ‘गच्चीवरील बाग’ या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (दि. ५) एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० वाजता हे वर्कशॉप होणार आहे.

गावाकडील घर आणि घरासमोर असलेले मोठे अंगण आपल्याकडेही असावे असे शहरात राहणाऱ्यांना नेहमीच वाटते. किंबहुना अनेकांचे ते स्वप्नच असते. पण, शहरातल्या गर्दीमुळे किंवा जागेच्या वाढत्या किमतींमुळे ते स्वप्न साकार होणे दुरापास्त होते. मग गॅलरीत दोन-चार कुंड्या ठेवून किंवा अपार्टमेंटच्या गच्चीवर कुंड्या ठेवून बागेची हौस भागविली जाते. या हौसेला शास्त्रशुद्ध पद्धतीची जोड देण्यासाठी आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत उपलब्ध असलेल्या साधनात बाग कशी फुलवायची, या संदर्भातले प्रशिक्षण गच्चीवरील बाग या वर्कशॉपमधून देण्यात येणार आहे. संदीप चव्हाण हे डेमो वर्कशॉपद्वारे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. गच्चीत किंवा गॅलरीत बाग तयार करताना येणाऱ्या अडचणींसंदर्भातही या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे. या डेमो वर्कशॉपसाठी नोंदणी करणे अनिवार्य असून, कल्चर क्लब सदस्यांना १०० रुपये, तर इतरांसाठी २०० रुपये नोंदणी फी आहे. नोंदणीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड (फोन ः (०२५३) ६६३७९८७, मोबाइल ः ७०४०७६२२५४) येथे संपर्क साधावा.

--

प्रश्नांना मिळणार उत्तरे

झाडे लावणे, त्यासाठी आवश्यक खते, त्यातच गॅलरीत, कुंडीत झाडे लावणे, ती फुलविणे याविषयी अनेकांच्या मनात प्रश्न असतात. परंतु, याविषयी उत्तरे मिळविण्याचा मार्ग सापडत नसल्याने अनेकांना गच्चीत बाग फुलविण्याचे आपले स्वप्न पूर्ण करता येत नाही. आता या वर्कशॉपद्वारे सर्व प्रश्नांची, शंकांची उत्तरे मिळू शकणार आहेत.

--


कल्चर क्लब सदस्य होण्यासाठी

फेसबुक लिंक - https://www.facebook.com/MTCultureClub टि्वटर लिंक - https://twitter.com/MTCultureClub टीप - कल्चर क्लबच्या वेबसाइटवर जाण्यासाठी हा कोड तुमच्या मोबाइलवर स्कॅन करा. पत्ता : महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर बिल्डिंग, डिसूझा कॉलनी, कॉलेजरोड संपर्क ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोटारसायकल अपघातात शिक्षिकेचा मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

विद्यालयातून घरी परतताना दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाल्याने अपघातात एक शिक्ष‌किेचा मृत्यू झाला. तर दुसरी शिक्षिका गंभीर जखमी आहे. गुरुवारी सायंकाळी खिरमाणी-सटाणा दरम्यान हा अपघात झाला. सरोज सोनवणे असे मयत शिक्ष‌किेचे नाव आहे.

गुरुवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा विधायक कार्य समिती संचलित इंदिरा माध्यमिक विद्यालय खिरमाणी येथील शिक्षिका सरोज सोनवणे (वय ५०), व वाय. जी. अहिरे (वय ४८) या दोघी सटाणा येथे घरी परतत होत्या. कुपखेडा गावाजवळ समोरून येणाऱ्या मोटारसायकल चालकाने शिक्षिका सरोज सोनवणे यांच्या अ‍ॅक्टिवाला धडक दिली. यामुळे सोनवणे व त्याच्या सोबत असलेल्या वाय. जी. अहिरे या दोघेही जम‌निीवर आदळल्या. सरोज सोनवणे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना अधिक उपचारासाठी नाशिक येथे नेत असताना गुरुवारी रात्री उशिरा त्यांचा मृत्यू झाला. शुक्रवारी सकाळी त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अत्यंसंस्कार करण्यात आले.

अपघातातील जखमी शिक्षिका वाय. जी. अहिरे यांच्यावर मालेगाव येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातातील मृत शिक्षिका सरोज सोनवणे यांच्या पती अनाजी सोनवणे यांचे देखील काही वर्षापूर्वीच अपघातात निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. याप्रकरणी जायखेडा पोलिसात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गुरू नानक जयंतीनिमित्त आज विविध कार्यक्रम

$
0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

शहरातील गुरुद्वारांमध्ये शनिवारी (दि. ४) गुरू नानक जयंती उत्सव हर्षोल्हासात साजरा करण्यात येणार आहे. शिंगाडा तलाव येथील गुरुद्वारामध्ये जयंती उत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

गुरुनानक जयंतीचे औचित्य साधून शिंगाडा तलाव परिसरातील गुरुद्वारामध्ये गुरूवार २ नोव्हेंबरपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत. दोन दिवसांपासून विशेष कीर्तन दिवाणचा लाभ भाविक भक्तांना मिळतो आहे. गुरुनानक जयंतीनिमित्त शनिवारी (दि. ४) सकाळी साडेसात ते रात्री सव्वा अकरा या कालावधीत भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी साडेसात, सकाळी साडे अकरा आणि रात्री साडेदहा वाजता हरदीपसिंहजी यांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांन मिळणार आहे. सकाळी पावणेनऊ, दुपारी दीड आणि रात्री सव्वानऊ वाजता लुधियाना येथील गुरूचरण सिंगजी रसिया यांचे कीर्तन होणार आहे. दुपारी १२.२० आणि रात्री आठ वाजता फरीदकोट येथील गुरुमत विचार ग्यानी लखवीर सिंहजी यांच्या कीर्तनाचा आनंद भाविकांना मिळणार आहे. सायंकाळी साडेसहाला प्रार्थना होईल. त्यानंतर चिमुकल्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. भाविकांसाठी लंगरची व्यवस्थाही करण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.

नाशिकरोडला उत्सव
नाशिकरोड : येथील गुरुद्वारामध्ये शनिवारी (दि.४) पहाटे साडेपाचपासून मुख्य कार्यक्रम होईल. यादिवशी धार्मिक कार्यक्रम मोठ्या प्रमाणावर होतील. दुपारी लंगर अर्थात महाप्रसाद होईल. ३० ऑक्टोबरपासून रोज सकाळी नगर कीर्तन होत आहे. शीख बांधव भजन कीर्तन गात नाशिकरोडला प्रभातफेरी काढत आहे. शुक्रवारी गुरुद्वारापासून सुरू झालेली ही फेरी दत्तमंदिर, मोटवानीरोड, कोठारी कन्या शाळा मार्गे तेथील झुलेलाल मंदिरात गेली. तेथे ग्रंथसाहेबांची पूजा करून पुन्हा ही फेरी गुरुद्वारात आली. गुरुद्वारात भाविकांची गर्दी होणार असून त्या दृष्टीने नियोजन करण्यात आले आहे. धन धन बाबा दीपसिंग सोशिल ग्रुपतर्फे जेलरोडच्या सिंधी कालनीतील गुरुव्दारात शनिवारी व रविवारी सकाळी साडेदहा व रात्री साडेसातला बीबी परमजीत कौर यांचे कीर्तन होईल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images