Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

क्रिकेटमध्ये नाशिक राज्यात तिसरे

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

विविध क्षेत्रांमध्ये आघाडीवर असलेले नाशिक हे क्रिकेट क्षेत्रातही अग्रेसर असल्याचे दिसून येत आहे. राज्याच्या क्रीडा कामगिरीत नाशिक हे तिसऱ्या क्रमांकावर असून, आजवर नाशिकने महाराष्ट्राच्या रणजी संघाला तब्बल १७ खेळाडू दिले आहेत. गेल्या काही वर्षांपासून नाशिक शहरातून रणजी सामन्यांमध्ये सहभागी होणाऱ्या खेळाडूंमध्ये झपाट्याने वाढ होत आहे.

क्रिकेटने मुंबईमध्ये चांगलेच बस्तान जमवले पुणे, कोल्हापूर त्यानंतर नाशिक असा क्रम लागण्यास सुरुवात झाली. महाराष्ट्राच्या संघात सर्वात जास्त खेळाडू पुणे शहराने दिले खालोखाल कोल्हापूर जिल्हाने त्यानंतर नाशिक जिल्ह्याने तब्बत १७ खेळाडू दिले आहेत. नाशिकच्या जयंतीलाल यांनी सर्वप्रथम रणजी मध्ये पाऊल टाकले त्यानंतर जीभाऊ जाधव, प्रकाश माळवे यांच्या रुपाने शहरात चांगल्या प्रकारे क्रिकेट बहरत गेला. क्रिकेटमध्ये करिअर होत असल्याचे पाहून अनेक खेळाडू या खेळाकडे वळाले. ज्यांनी हा खेळ करिअर म्हणून पाहिला त्यांचे भविष्य उज्ज्वल झाले. अनेक खेळाडू अधिकारी पदावर कार्यरत आहे. शहरात सध्या क्रिकेटला चांगले दिवस असून नाशिक जिल्हा क्रिकेट अॅकेडमीच्या गोल्फ क्लब ग्राऊंडवर सध्या शेकडोच्या संख्येने खेळाडू खेळत आहेत.

नाशिकने आजवर दिलेले रणजी खेळाडू

जयंतीलाल, जीभाऊ जाधव, प्रकाश माळवे, राजू लेले, प्रशांत राय, भगवान काकड, शेखर गवळी, शेखर घोष, अमित पाटील, अविनाश आवारे, सुयश बुरकुल, अभिजीत राऊत, अशिष टिबरेवाल, साजीद सुरेशनाथ, मुर्तूजा ट्रंकवाला सलील आगारकर, सत्यजीत बच्छाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


‘डेक्कन’साठी सायकलिस्ट्स रवाना

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

रेस अक्रॉस अमेरिका अर्थात रॅम या अत्यंत प्रतिष्ठेच्या सायकलिंग स्पर्धेत पात्र ठरवण्यासाठी घेण्यात येणाऱ्या डेक्कन क्लिफहँगर स्पर्धेसाठी नाशिक सायकलीस्टसचे सोलो गटात ६ सायकलीस्टस तर टीम ऑफ टू गटात दोन संघ शुक्रवारी (दि. ३) सकाळी रवाना झाले.

यात सोलो (वय ५० व अधिक) गटात नाशिकचे पोल‌सि आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल, ६२ वर्षीय ज्येष्ठ सायकलीस्ट मोहिंदर सिंग भराज तर खुल्या गटात (वय १८ ते ५०) किशोर काळे, शुभम देवरे, संजय मोकल, संगमनेरचे विजय काळे यांचा सहभाग आहेत. तर टीम ऑफ टूमध्ये संगमनेरचे नीलेश वाकचौरे, संजय विखे आणि पिंपळगाव बसवंतचे अविनाश व विकास दवांगे यांचा सहभाग असणार आहे. स्पर्धा पुणे येथून शनिवार, ४ नोव्हेंबर रोजी पहाटे ५ वाजता सुरू होऊन गोवा येथील बोग्मालो किनाऱ्यावर संपेल.

या सर्व स्पर्धकांचा हुरूप वाढविण्यासाठी नाशिक सायकलीस्टसकडून सकाळी ६.३० वाजता सर्व सायकलीस्टसने मुंबई नाका येथे डेक्कन क्लिफहँगर स्पर्धकांना स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी नाशिक सायकलीस्टसचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया, सचिव नितीन भोसले, अॅड. वैभव शेटे, योगेश शिंदे, डॉ. मनीषा रौंदळ, राजेंद्र वानखेडे, तुकाराम नवले, मोहन देसाई, नाशिक जिल्हा सायकलिंग असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र निंबाळते, सचिव नितीन नागरे आदी उपस्थित होते.

पुणे ते गोवा अशी ४०० मैल म्हणजेच ६४३ कि.मी.च्या स्पर्धेसाठी नाशिकहून अनेक सायकलीस्टस सहभागी होत असतात. संपूर्ण भारतात विविध गटात रॅम स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केलेल्या सायकलीस्टसची संख्या सर्वात जास्त आहे. या आधी डॉ. हितेंद्र महाजन, डॉ. महेंद्र महाजन, अॅड. दत्तात्रेय चकोर, अमर मियाजी,अनिल कहार, आनंदा गांगुर्डे, चेतन अग्निहोत्री यांनी सोलो गटात ही स्पर्धा पूर्ण केली आहे.

यापैकी डॉ. महेंद्र महाजन, अॅड. दत्तात्रेय चकोर, तसेच डॉ. राजेंद्र नेहेते, डॉ. नितीन रौदळ, विलास इंगळे, शंकर दवांगे, राहुल ओढेकर, मिलिंद वाळेकर, डॉ. कुणाल गुप्ते, मिलिंद धोपावकर, ताहेर कांचवाला हे यावर्षीच्या स्पर्धकांसाठी क्र्यू मेंबर्स म्हणून जात असून यामुळे स्पर्धकांची ताकद व आत्मविश्वास वाढला आहे. स्पर्धा पूर्ण करणाऱ्यांची नाशिकमधून सर्वाधिक असेल असा विश्वास
वाढला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाभानगरच योग्य!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भाभानगर येथे प्रस्तावित करण्यात आलेल्या शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या जागेवरून गिते पिता-पुत्रांनी बंडाचे निशाण फडकवले असताना आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी आता रुग्णालय भाभानगरलाच होणार असल्याचा दावा केला आहे. रुग्णालयाला आठ हजार स्केअरमीटर जागेची आवश्यकता असताना, टाकळी रोडवर केवळ दोन हजार स्वेअर मीटर जागा उपलब्ध आहे. त्यामुळे तांत्रिक दृष्‍्ट्या टाकळीरोडची जागा योग्य नसल्याचा खुलासा करत फरांदे यांनी रुग्णालय भाभानगरलाच होणार असे स्पष्टीकरण दिले. रुग्णालयाच्या कामात कुणीही राजकारण आणू नये, तरीही काहींनी विरोध झाल्यास महिला शक्ती दाखवून देवू, असा इशाराच फरांदे यांनी गितेंना दिला आहे.

भाभानगर येथे प्रस्तावित शंभर खाटांच्या महिला रुग्णालयाच्या जागेवरून सध्या आमदार फरांदे आणि भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार वसंत गिते यांच्यात संघर्ष पेटला आहे. गिते यांनी या रुग्णालयाच्या जागेला प्रखर विरोध करत थेट बंडाचा पवित्रा घेतला आहे. मुख्यमंत्री व पालकमंत्र्याच्या आदेशानंतरही वसंत गिते आणि त्यांचे पुत्र उपमहापौर प्रथमेश गिते यांनी थेट पक्षालाच आव्हान दिले आहे. परंतु या प्रश्नावरून फरांदे यांनी मौन धारण केले होते. शनिवारी त्यांनी आपले मौन सोडत कोणत्याही परिस्थितीत रुग्णालय भाभानगरलाच होणार, अशी भूमिका मांडली. गेल्या चार वर्षांपासून रुग्णालय मंजूर असून, निविदा प्रक्रिया व वर्क ऑर्डर देवूनही काम सुरू होत नाही. राजकीय इच्छाशक्तीअभावी हे रुग्णालय प्रलंबित राहील्याचे त्यांनी सांगितले.

टाकळीची जागा अयोग्य

टाकळीची जागा तांत्रिकदृष्टया अयोग्य असल्याचे फरांदे यांनी सांगितले. रुग्णालयासाठी ८ हजार चौरस मीटर जागेची आवश्यकता आहे. टाकळी येथे मात्र १९ हजार ७२० चौ. मी. जागेपैकी १९२० चौ. म‌ी. जागा ही बांधकामासाठी उपलब्ध होत असून, ही जागा तीन ठिकाणी विखुरलेल्या स्वरूपात आहे. रस्त्यासाठीही पुरेशी जागा नाही. भाभानगर येथे सुमारे ९ हजार ६०० चौ.मी. आणि पार्किंगची अतिरिक्त ५०० चौ. मी. जागा उपलब्ध आहे. त्यामुळे शासनाचा भूसंपादनाचा खर्चही वाचणार आहे. शिवाय हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने दळणवळणाच्या दृष्टीने सर्वांनाच ते सोयीचे ठरणार असल्याचे सांगून रुग्णालय या जागेवरच होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

…तर महिलाशक्ती दाखवू

रूग्णालयाच्या जागेला विरोध करणाऱ्यांना मीही उत्तर देउ शकते असा इशारा देत, पक्षशिस्त आणि हा महिलांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने मी गप्प आहे. रुग्णालयावरून मला राजकारण करायचे नाही. भाभानगरची जागाच योग्य असल्याचा खुलासा मुख्यमंत्रयांनाही केला आहे. परंतु काही लोक हेतुतः नागरीकांमध्ये गैरसमज पसरवत आहे. मात्र यापुढे विरोध केल्यास महिला शक्ती एकवटून रस्त्यावर उतरेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शॉर्टसर्किटमुळे ४० एकर ऊस खाक

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

चाटोरी येथे शेतात आग लागल्याने तब्बल ४० एकरावर उभा असलेला ऊस जळून खाक झाल्याची दुर्दैवी घटना घडली. विजेचे स्पार्किंग होऊन पडलेल्या ठिणग्यांमुळे ही आग लागल्याची शक्यता आहे. शनिवारी दुपारी साडे बारा वाजेच्या सुमारास ही घटना घडली.

चाटोरीच्या पश्चिमेला असलेल्या जुनी गंगावाडी भागात स्मिता पंकज पवार यांचा अडीच एकर, पंकज पवार यांचा नऊ एकर, अशोक काकडे यांचा अडीच एकर, युवराज अशोक काकडे, वृषाली युवराज काकडे यांचा अकरा एकर, शशिकला काकडे यांचा अकरा एकर, नजमाबी बाबू पटेल यांचा दीड एकर तर प्रभाकर शिंदे यांचा चार एकर असा एकूण चाळीस एकरच्या आसपास ऊस जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.

दोन महिन्यांत अनेक घटना

गत दोन महिन्यांत बेरवाडी येथील दत्तू बोराडे यांचा दीड एकर ऊस, चितेगाव येथील तानाजी लवांड, किसन गाडे यांचा सुमारे दोन एकर ऊस, खानगाव थडी येथील खंडू चकोर यांचा तीन एकर ऊस, चाटोरी येथील नारायण वरखेडे यांचे एक एकर ऊस क्षेत्र तर सोमनाथ खिंडे यांची द्राक्ष बाग होरपाळली होती. नागापूर येथे साहेबराव खालकर यांचा तीन एकर ऊस, तर पाच दिवसांपूर्वी तळवाडे येथे बाळासाहेब सांगळे यांचा एक एकर ऊस, तळवाडे येथील पोपट सांगळे तसेच सुकदेव सांगळे यांचा एकूण दीड एकर ऊस, शिंगवे येथे खंडेराव डेर्ले यांचा दोन एकर तर शुक्रवारी सरुबाई आव्हाड यांच्या अडीच एकर ऊस जळून खाक झाल्याची घटना असतांना पुन्हा चाटोरीत शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाक झाल्याने आर्थिक नुकसानीसह मोठा मनस्ताप शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज ‘गच्चीवरील बाग’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

किमान आपल्या कुटुंबासाठी नैसर्गिक पद्धतीने पिकविलेली रसायनमुक्त फळे, भाज्या उपलब्ध व्हाव्यात, अशी हल्ली प्रत्येकाची इच्छा असते. यावर उपाय म्हणून तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत, उपलब्ध नैसर्गिक संसाधनात सहजसोपी बाग फुलविणे आता सहजशक्य होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे आज, रविवारी (दि. ५) ‘गच्चीवरील बाग’ या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे.

एचपीटी कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये सकाळी १० वाजता हे वर्कशॉप होणार आहे. आपले घर, आजूबाजूचा परिसर सुंदर, रंगीबेरंगी फुलांनी सजलेला असावा, अशी अनेकांची इच्छा असते. परंतु, जागेअभावी व माहितीअभावी ही इच्छा अनेकदा पूर्ण होतच नाही. याविषयी योग्य मार्गदर्शन मिळावे, यासाठी महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ‘गच्चीवरील बाग’ या वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. गावाकडील घर आणि घरासमोर असलेले मोठे अंगण आपल्याकडेही असावे असे शहरात राहणाऱ्यांना नेहमीच वाटते. किंबहुना अनेकांचे ते स्वप्नच असते. पण, शहरातल्या गर्दीमुळे किंवा जागेच्या वाढत्या किमतींमुळे ते स्वप्न साकार होणे दुरापास्त होते. मग गॅलरीत दोन-चार कुंड्या ठेवून किंवा अपार्टमेंटच्या गच्चीवर कुंड्या ठेवून बागेची हौस भागविली जाते. मात्र, आपल्याकडे उपलब्ध असलेल्या जागेत उपलब्ध असलेल्या साधनांत बाग कशी फुलवायची यासंदर्भातले प्रशिक्षण गच्चीवरील बाग या वर्कशॉपमधून देण्यात येणार आहे. संदीप चव्हाण हे डेमो वर्कशॉपद्वारे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत.

--

अडचणींसंदर्भातही मार्गदर्शन

गच्चीत किंवा गॅलरीत बाग तयार करताना तुम्हाला येणाऱ्या अडचणींसंदर्भातही या कार्यक्रमात मार्गदर्शन केले जाणार आहे. या डेमो वर्कशॉपसाठी नोंदणी करणे अनिवार्य असून, कल्चर क्लब सदस्यांना १०० रुपये, तर इतरांसाठी २०० रुपये नोंदणी फी आहे. नोंदणीसाठी महाराष्ट्र टाइम्स, दुसरा मजला, अल्फा स्क्वेअर, डिसुझा कॉलनी, कॉलेजरोड येथे अथवा (०२५३) ६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सावधान! विनोदी लेखक होतोय हद्दपार...

$
0
0

मटा विशेष

--

लोगो : मराठी रंगभूमी दिन विशेष

--

सावधान! विनोदी लेखक होतोय हद्दपार...

--

नाशिक ः नाटकात समाजाचे प्रतिबिंब पडते असे म्हणतात आणि विनोद हा समाजाच्या स्वास्थ्याचा अविभाज्य घटक असताना नाटकातून मात्र विनोद हद्दपार होतोय. गेल्या अनेक वर्षांपासून नाशिकच्या हौशी, व्यावसायिक रंगभूमीवर दर्जेदार विनोदी नाटकच सादर झाले नसल्याचे समोर आले आहे. त्यासाठी विनोदी लेखकांचा तुटवडा हे प्रमुख कारण असून, लेखक मंडळी गंभीर नाटक करण्यातच धन्यता मानत आहे.

विनोद हा सर्वसामान्य माणसांच्या जगण्यात मोठी भूमिका बजावतो. मनोरंजनाचे साधन म्हणून विनोदाकडे बघितले जाते. मात्र, असे असतानाही नाटक सादर करण्यासाठी विनोदी संहिताच मिळत नसल्याची ओरड सध्या होत आहे. हौशी कलाकारांच्या हक्काच्या राज्य नाट्य स्पर्धेत तर विनोदी संहिता औषधालाही सापडत नसल्याचे अनेक वर्षांचे निदान आहे. त्यामुळे नाटकातून विनोद हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.

राज्य नाट्य स्पर्धेचा इतिहास असा आहे, की येथे सर्व रसांचा आविष्कार करणारी नाटक सादर होतात. पुणे, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, नागपूर या ठिकाणच्या संहितांचा अभ्यास केला असता तेथे किमान चार ते पाच नाटके विनोदी असतात आणि ती दमदारपणे सादरही होतात. परंतु, नाशिक केंद्रावर मात्र विनोदी नाटक औषधालाही मिळत नाही, अशी परिस्थिती आहे.

---

गतवर्षी एकच नाटक

गेल्या वर्षी राज्य नाट्य स्पर्धेत ‘लग्न नको पण पप्पा आवर’ हे एकमेव विनोदी नाटक सादर झाले होते. गेल्या वर्षीदेखील विनोदी नाटकांची वानवाच होती. विनोदी नाटक सादर केले तर गुणांवर परिणाम होतो, असा समज रंगकर्मींनी करून घेतल्याने या नाटकांकडे कुणी वळतच नाही. परंतु, त्यामुळे रसभंग होत असल्याचे रसिकवर्गाचे म्हणणे आहे. त्यांना सर्व गंभीर नाटकेच पाहावी लागतात, विनोदी नाटकेच सादर होत नाहीत, अशी ओरडही होत आहे.

--

विनोदी संहिता लिहिणारे नवे लेखकच नाहीत. त्यामुळे जुन्याच संहितांवर नाटक बसवावे लागते. यंदाही ‘विच्छा माझी पुरी करा’ हे वसंत सबनीस यांचे नाटक बसविले आहे. नवे विनोदवीर तयार होणे काळाची गरज आहे.

-प्रदीप देवरे, दिग्दर्शक

--

विनोदी नाटकालादेखील गुण असतात. परंतु, ते सादर केले, तर आपल्याला परीक्षक गंभीरतेने घेणार नाहीत, असा समज झालेल्यांची संख्या वाढली आहे. त्यामानाने इतर केंद्रांवर सादर होणाऱ्या विनोदी नाटकांची संख्या जास्त आहे.

-राजेश जाधव, समन्वयक, नाट्य स्पर्धा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्टेशनची सुरक्षा रामभरोसे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मध्य रेल्वेच्या मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे रेल्वेस्थानक अशी ओळख असलेल्या नाशिकरोड रेल्वे स्थानकांवर सिंहस्थादरम्यान उभारण्यात आलेल्या चौथ्या प्लॅटफॉर्मच्या बाजूच्या सुरक्षेकडे रेल्वे प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बलाचे सपशेल दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नाशिकरोड रेल्वे स्थानकाची पूर्वेकडील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे झाली आहे.

दिवसभरात सुमारे ८० रेल्वे गाड्यांची रेलचेल नाशिकरोड रेल्वे स्थानकावर होत असते. या रेल्वे स्थानकावर दररोज हजारो प्रवाशांची चढउतार होत असते. दररोज लाखो रुपयांचा महसूल या रेल्वे स्थानकातून रेल्वे प्रशासनाला प्राप्त होतो. या सर्व गोष्टी असूनही रेल्वेस्थानक प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाचे या रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील चौथ्या प्लॅटफॉर्मच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष होताना दिसून येत आहे. दिवसभरात या प्लॅटफॉर्मवर एकही सुरक्षा जवान फिरकताना दिसत नाही. रेल्वे स्थानक प्रशासन व रेल्वे सुरक्षा बलाची नजर संपूर्ण वेळ केवळ प्लॅटफॉर्म एक-दोनसह रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूकडे असते.

नाशिकरोड रेल्वे स्थानकांच्या पूर्व बाजूकडील प्रवेशद्वाराची सुरक्षा गेल्या दोन वर्षांपासून पूर्णतः रामभरोसे आहे. रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलिसांनी चौथ्या प्लॅटफॉर्मवर नियमित गस्त ठेवायला पाहिजे.

-सचिन चव्हाण

उपाययोजनांची वानवा

सिंहस्थ विकासकामात नाशिकरोड रेल्वे स्थानकाच्या पूर्वेकडील बाजूचा विकास झाला. त्याठिकाणी नवीन प्लॅटफॉर्मसह, नवीन तिकिट बुकिंग ऑफिस, प्रवेशद्वार, रेल्वे स्थानक ते सिन्नर फाटा दुपदरी रस्ता, पार्किंग अशी भव्य सोय करण्यात आली. मात्र आता या प्लॅटफॉर्मचा व तिकिटघराचा वापर पूर्ण क्षमतेने होतच नाही. असे असले तरी या बाजूकडून सुरक्षा विषयक उपाययोजना करणेही तितकेच आवश्यक आहे. मात्र अद्याप या बाजुस सुरक्षा भिंत नाही. प्रवेशद्वार सताड उघडे असते. विघातक प्रवृत्तींना आपली वाहने थेट प्लॅटफॉर्मजवळ आणणे यामुळे अत्यंत सोपे झाले आहे. त्यामुळे प्रवाशांसह, रेल्वेच्या मालमत्तेची सुरक्षा ऐरणीवर आली आहे.


चोरवाटा कधी बंद करणार?

रेल्वे स्थानकाच्या चौथ्या प्लॅटफॉर्मच्या दिशेने येणाऱ्या अनेक चोरवाटा आहेत. जुना रेल्वे पूल, सिन्नर फाटा, रेल्वे कॉलनी, दहा चाळ अशा अनेक बाजूंनी चोरवाटा या प्लॅटफॉर्मच्या दिशेने येतात. आजही या वाटांचा वापर अनधिकृत फेरीवाले, खाद्यपदार्थ विक्रेते, फुकटे प्रवाशी करताना दिसून येते. या वाटांवरच मटका व जुगाराचे अड्डे दिवसाढवळ्या सुरू असतात. मात्र तरीही यांच्यावर रेल्वे पोलिसांचे कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे चित्र सध्या दिसत आहे. या रेल्वे स्थानकाच्या चौथ्या प्लॅटफॉर्मच्या जागेवर संरक्षण म्हणून साधा सुरक्षा भिंतही उभारली गेली नसल्याने थेट प्लॅटफॉर्मपर्यंत गुन्हेगारी प्रवृत्तींचा वावर याठिकाणा वाढला असल्याचे चित्र आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदावरी उद्यान धूळ खात

$
0
0

कोट्यवधींच्या वस्तू चोरीला; अस्वच्छतेकडे प्रशासनाचे दूर्लक्ष

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

नाशिक महापालिकेने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेत गोदावरी नदीचा परिचय पर्यटकांना व्हावा याकरीता कोट्यवधी रुपये खर्चून गोदावरी परिचय उद्यानाची उभारणी केली होती. परंतु, आजही गोदावरी उद्यान परिचयाविनाच धूळ खात पडून असल्याची स्थिती आहे. त्यातच कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या गोदावरी परिचय उद्यानातील अनेक वस्तू चोरीला गेले असल्याने त्यास जबाबदार कोण, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दिवसभर उद्यानात प्रेमीयुगल व जुगार खेळणाऱ्यांचा वावर असतो. तर रात्री मद्यपींच्या मैफली रंगत असल्याने महापालिकेने कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या उद्यानाला अवकळा आली आहे. विशेष म्हणजे सोमेश्वर धबधब्यावर पाणी असो अथवा नसो पर्यटकांची नेहमीच गर्दी होत असते. फेरफटका मारण्यासाठी आलेल्या पर्यटकांना उद्यानात जाण्यासाठी अनेक वर्षे रस्ताच नसल्याने बाहेरूनच पाहून निघून जावे लागत होते.

माजी नगरसेवक अरूण काळे यांच्या कार्यकाळात महापालिकेने गंगापूर गावाला लागून गोदावरी परिचय उद्यान व सोमेश्वर धबधब्याचे सुशोभीकरणाचे काम हाती घेतले होते. केंद्र सरकारच्या जवाहरलाल नेहरू पुनरुत्थान योजनेत गोदावरी परिचय उद्यानाचे काम महापालिकेने हाती घेत एका वर्षांत पूर्णही केले. परंतु, सोमेश्वर धबधब्याचे सुशोभीकरण मात्र महापालिकेकडून होऊ शकले नाही. गोदावरी परिचय उद्यान उभारल्यावर ते पर्यटकांसाठी खुले करण्याबाबत अनेकदा मागणी करण्यात आली. विशेष म्हणजे पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांना गोदावरी नदीचा उगमापासून तर दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास कसा आहे, याबाबत सविस्तर माहिती चित्रांद्वारे दिली जाणार होती. यात गोदावरी नदीचा उगम तर सोडा कुठल्याही प्रकारची माहिती प्रसिद्ध करण्यात आली नाही. सहाजिकच महापालिकेची कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आजही धूळ खात पडून असल्याचे चित्र आहे.

अतिशय सुंदर संकल्पना घेऊन महापालिकेने उद्यान उभारले खरे, परंतु, उद्यान आजही पडून आहे. महापालिका प्रशासनाने उद्यानाची दुरूस्ती करत सर्वसामान्यांसाठी खुले करण्याची गरज आहे.

-दीपक आरोटे, रहिवाशी

सोमेश्वर धबधब्याकडे जाताना सुंदर असे गोदावरी परिचय उद्यान महापालिकेने उभारले होते. परंतु, उद्यान खुलेच करण्यात आले नसल्याने नागरिक नाराज आहेत.

-ज्ञानेश्वर गांगुर्डे, पर्यटक

उद्यानाचा परिचय कधी?

अनेकदा पर्यटकांकडून उद्यान खुले करण्याबाबत महापालिकेकडे मागणीही करण्यात आली होती. याकडे महापालिकेने लक्ष न दिल्याने कोट्यवधींचे उद्यान टवाळखोरांचा अड्डा बनला आहे. दिवसा प्रेमीयुगल व जुगारी तर रात्री मद्यपींचा अड्डा गोदावरी परिचय उद्यानात भरताना दिसतो. सद्यस्थिती केवळ वृक्षांची सावलीच उद्यानात राहिली असून, तयार करण्यात आलेल्या खोल्या घाण, कचऱ्याने भरल्या आहेत. महापालिकेचे प्रशासन गोदावरी उद्यानाचा परिचय पर्यटकांना कधी करणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

जुगारी, मद्यपींचा अड्डा

कोट्यवधी रुपये खर्च करून उभारलेल्या गोदावरी परिचय उद्यानाला सुरक्षारक्षक नसल्याचे कारण सांगत खुले करण्यात आले नाही. परंतु, आजच्या स्थितीत जुगारी व मद्यपींनी उद्यानाचा ताबा घेतला आहे. महापालिकेच्या उद्यान विभागाने गोदावरी उद्यानाची दुरूस्ती करत सर्वसामान्यांसाठी खुले करावे, अशी मागणी पर्यटकांनी केली आहे. गोदावरी परिचय उद्यानाला झाडा, झुडपांनी वेढले आहे. उद्यानाचे प्रवेशद्वारावरील लोखंडी गजही चोरट्यांनी चोरून नेले आहेत. अनेक वर्षांपासून उद्यानात गाजर गवत मोठ्या प्रमाणात पहायला मिळते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


पंपांवरची शौचालये खुली

$
0
0

मनपाने काढली अधिसूचना; पंपचालक करणार विरोध

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत महापालिका हद्दीत असलेल्या शहरातील सर्व पेट्रोलपंपांवरील शौचालये सार्वजनिक वापरासाठी खुली करण्याचा अध्यादेश महापालिकेने काढला आहे. परंतु, या अध्यादेशावरून नवा वाद सुरू झाला असून, नाशिक जिल्हा पेट्रोल व डिलर्स असोसिएशनने हा निर्णय तुघलकी असल्याचा आरोप केला आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत ग्राहक नसलेल्या नागरिकांना शौचालयाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी महापालिका क्षेत्रातील सर्व पेट्रोलपंपांच्या ठिकाणी असलेली शौचालये सार्वजनिक शौचालय म्हणून पालिकेने घोषित केली आहेत. त्यामुळे पेट्रोलपंपावर ग्राहक नसलेल्या ग्राहकांना पेट्रोलपंपावर असलेली शौचालये वापरता येणार आहेत. शहरात जवळपास ६० पेट्रोलपंप असून ती नागरिकांसाठी खुली झाली आहेत. त्यामुळे या निर्णयाचा सर्वसामान्य नागरिकांना फायदा होवून रस्त्यावर होणारी अस्वच्छता दूर होणार आहे.

महापालिकेच्या निर्णयाचे सर्वसामान्यांकडून स्वागत केले जात आहे. राज्यातील

अन्य नगरपालिकांनाही यासंदर्भात असा निर्णय यापूर्वीच घेतला आहे. महापालिकेने हे चांगले पाऊल उचलले असले तरी पेट्रोलपंप चालकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. पेट्रोलपंपावर असलेली स्वच्छतागृह व शौचालयांची क्षमता जास्त नसते. कर्मचारी व ग्राहकांपुरतीच त्यांची क्षमता असून, सिवेज टॅंकही त्याच क्षमतेचा असतो. त्यामुळे पायाभूत सुविधांचा विचार न करता घेतलेला हा तुघलकी निर्णय असल्याची टीका पेट्रोल डिलर्स असो.चे अध्यक्ष नितीन धात्रक यांनी केली आहे. पेट्रोलपंप झोपडपट्टीच्या जवळ असेल तर तेथील नागरिक पेट्रोलपंपावरच शौचास येतील. त्यामुळे पेट्रोपंपही चालवणे अवघड होईल असे सांगत, मनपाने सुविधा दिल्यास याबाबत विचार केला जावू शकतो. परंतु, विश्वासात न घेताच परस्पर जाहीर केलेल्या निर्णयाला पेट्रोलपंप चालकांना विरोध असल्याचा दावा त्यांनी केला आहे. खासगी मालमत्तेमध्ये महापालिका सक्ती करू शकत नाही, असे सांगतानाच या निर्णयाला आम्ही तीव्र विरोध करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे पेट्रोलपंपावरील शौचालचे जनतेस खुली करण्याचा विषय वादाचा ठरणार आहे.

पेट्रोलपंपांवरील शौचालयांच्या क्षमतेचा विचार न करता हा तुघलकी निर्णय घेण्यात आला आहे. अधिकारी सरकारला खूश करण्यासाठी खासगी मालमत्तांवर अतिक्रमण करीत असून, या निर्णयाला पेट्रोलपंप चालक संघटनेचा विरोध आहे.

- नितीन धात्रक, अध्यक्ष, नाशिक जिल्हा पेट्रोल डिझेल असो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘सतगुरू नानक प्रगटिया…’

$
0
0

नाशिक ः शीख धर्माचे संस्थापक गुरू नानक देवजी यांच्या जयंतीनिमित्त ‘सतगुरू नानक प्रगटिया, मिटी धुन्ध जग चानण होया…’ या व अन्य भजनांचे स्वर शनिवारी शहर परिसरात गुंजले. शीख समाजबांधवांकडून त्यांचे तन्मयतेने श्रवण केले गेले. शहरासह पंचवटी, नाशिकरोड, देवळाली कॅम्प आदी उपनगरांतील श्री गुरुद्वारांमध्ये गुरू नानक यांच्या ५४८ व्या जयंतीनिमित्त गुरू ग्रंथ साहिबचे पारायण करण्यात आले. विविध धार्मिक, सामाजिक उपक्रमांसह पंजाबी बांधवांच्या वतीने ठिकठिकाणी लंगर (भोजन)चेदेखील आयोजन करण्यात आले होते.

---

देवळाली कॅम्पमध्ये विशेष अरदास


म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

सर्वधर्मीय एकोप्याने नांदणाऱ्या देवळाली कॅम्पमधील वडनेररोडवर असणाऱ्या श्री गुरुद्वारामध्ये गुरू ग्रंथ साहिबचे अखंड पारायण करण्यासह विविध उपक्रम झाले. येथे भव्य लंगर (भोजन)चेदेखील आयोजन करण्यात आले होते. दिल्लीचे गायक भाई बलजितसिंग यांनी विशेष अरदास सादर करीत भाविकांना मंत्रमुग्ध केले.

कार्तिक पौर्णिमेला श्री गुरू नानक देवजी यांचा जन्मदिन प्रकाश पूरब दिन म्हणून साजरा केला जातो. येथील गुरुद्वारात पहाटेपासून विविध धार्मिक कार्यक्रम सुरू होते. पोथी पूजन, आसा की वार कीर्तन, अखंड पाठ का भोग, लहान मुलांसाठी विशेष कीर्तन आदींबरोबरच मुख्य असलेले ग्रंथी ग्यानी सुरेंद्रसिंग यांनी ग्रंथ साहिबचे पाठ केले. गुरुद्वारा कमिटीचे अध्यक्ष कर्नल जसवंतसिंग लबाना, सुरेंद्रसिंग अहलुवालिया, पी. एस. चढ्ढा, परमजितसिंग कोचर, प्रदीप गुरव आदी उपस्थित होते. गुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी व सर्व सदस्य कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील होते. दुपारपासून सुरू असलेल्या लंगरचा सुमारे तीन हजारांहून अधिक सर्वधर्मीयांनी लाभ घेतला.

--

बाबा जोधासिंग दरबार

येथील प्रसिद्ध बाबा जोधासिंग दरबार (सिंधी गुरुद्वारा) येथे मंडळाने विशषे कार्यक्रमांचे आयोजन केले होते. सिंधी बांधवांच्या वतीने या गुरुद्वारामध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यात महिलांचा मोठा सहभाग असतो. अंकिता कटारिया यांच्या मार्गदर्शनाखाली मोनिका कटारिया, साक्षी नागदेव, लता चावला, आरती निहलानी, वर्षा चावला, सोनिया भागचंदानी,रचना कारडा, हर्षा चावला, रोशनी नागपाल आदींनी संयोजन केले. या कार्यक्रमास नगरसेवक भगवान कटारिया यांनी भेट दिली.

---

नाशिकरोडला सर्वधर्मीयांचा सहभाग

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड येथील गुरुद्वारात गुरू ग्रंथ साहिबच्या पठणासह विविध धार्मिक, सामाजिक कार्यक्रम झाले. दुपारनंतर लंगरचे आयोजन करण्यात आले होते. त्याचा सर्वधर्मीयांनी लाभ घेतला.

येथील गुरुद्वारात शीखबांधवांची सकाळपासूनच गर्दी झाली होती. गुरू नानक जयंतीच्या पार्श्वभूमीवर दि. ३० ऑक्टोबरपासून परिसरात रोज सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. शीखबांधव भजन, कीर्तन सादर करीत त्यात सहभागी झाले. ही फेरी दत्त मंदिर, मोटवानीरोड, कोठारी कन्या शाळामार्गे तेथील झुलेलाल मंदिरात गेली. धन धन बाबा दीपसिंग सोशल ग्रुपतर्फे जेलरोडच्या सिंधी कॉलनीतील गुरुद्वारात शनिवारपासून सकाळी साडेदहा व सायंकाळी साडेसात वाजता बीबी परमजित कौर यांचे कीर्तन सुरू झाले आहे.

--

कारागृहात प्रतिमापूजन

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातदेखील विविध कार्यक्रम झाले. कारागृहातील सांस्कृतिक सभागृहात झालेल्या कार्यक्रमास अधीक्षक राजकुमार साळी, वरिष्ठ तुरुंगाधिकारी एस. बी. कोकणे, एस. पी. सरपाते, बी. एन. मुलानी, पी. आर. पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. अधीक्षक साळी यांनी प्रतिमापूजन करून मार्गदर्शन केले. यावेळी बंदिवानदेखील उपस्थित होते.

---

पंचवटीत विविध कार्यक्रम

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील गुरुद्वारात विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. कीर्तन, भजन, प्रवचन आणि लंगर आदी कार्यक्रमांत शीख बांधवांनी सहभाग घेतला. या जयंती उत्सवासाठी गुरुद्वाराची सजावट करण्यासह रोषणाईदेखील करण्यात आली होती. विविध सामाजिक उपक्रमांसह रक्तदान शिबिरदेखील घेण्यात आले. त्यात सर्वधर्मीयांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

---

भक्ती अन् मानवतेचा मार्ग अनुसरण्याचा संदेश


म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

शहरातील शिंगाडा तलाव परिसरातील गुरुद्वारामध्ये शनिवारी गुरू नानक जयंतीनिमित्त झालेल्या कीर्तनाद्वारे गुरू नानक देवांनी सांगितलेल्या भक्तीच्या आणि मानवतेच्या मार्गावर चालण्याचे आवाहन समाजबांधवांना करण्यात आले. येथे दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले होते.

गुरुवारपासून सुरू असलेल्या गुरू ग्रंथ साहिब अखंड पाठाची शनिवारी सकाळी नऊ वाजता समाप्ती झाली. त्यानंतर दिवसभरात देशाच्या विविध भागांतून आलेल्या मान्यवरांच्या कीर्तनाचा लाभ भाविकांना मिळाला. हरदीपसिंगजी, तसेच लुधियाना येथील गुरुचरणसिंगजी रसिया, फरिदकोट येथील गुरुमत विचार ग्यानी लखवीरसिंगजी यांच्या कीर्तनात भाविक तल्लीन झाले होते. दुपारी, ‌तसेच रात्री गुरुका लंगरचा लाभ भाविकांनी घेतला. दि. ३१ ऑक्टोबर आणि त्याआधी चिमुकल्यांसाठी गुरुबानी पाठांतर स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांना पारितोषिके देऊन गौरविण्यात आल्याची माहिती कुलवंतसिंग बग्गा यांनी दिली. या कार्यक्रमाच्या न‌िमित्ताने समाजातील सर्व स्तरांतील बांधव एकत्र येतात. भजन-कीर्तनात दंग होतात, तसेच लंगरचा आस्वाद घेतात, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. मध्यरात्री बाराच्या सुमारास येथील कार्यक्रमांची सांगता झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जमिन विक्री प्रकरणातील मुख्य आरोपी गजाआड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इगतपुरी

मुंबई येथील वकील विमलभूषण भटनागर यांची इगतपुरी शहराजवळील शेत जमीन अडीच वर्षांपूर्वी परस्पर विक्री करणाऱ्या ९ संशयित आरोपींपैकी एका मुख्य आरोपीला तब्बल अडीच वर्षानंतर मुंबई येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, आरोपीला अटक केल्यानंतर धक्कादायक माहिती उघडकीस आल्याने इगतपुरी शहरात खळबळ उडाली आहे.

भटनागर यांना त्यांच्या मालकीची इगतपुरी शहराजवळ बोरटेंभे येथे गट क्रमांक ३६ ची ६१ गुंठे शेतजमीन विक्री झाल्याचा सातबारा मिळून आला. याबाबत त्यांना जमिनीची ३३ लाख ६५ हजारात परस्पर विक्री झाल्याचे लक्षात आले. त्यांनी याप्रकरणी ३० मे २०१५ मध्ये इगतपुरी पोल‌िस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार ८ संशयितांना पोलिसांनी अटक केली होती. मात्र यातील मुख्य संशयीत आरोपी परवेज गुलाम रसूल खान (रा. जोगेश्वरी) हा फरार होता. परवेजला एक नोव्हेंबरला अटक करण्यात आली.

दोनदा विक्री

अटक केल्यानंतर त्याने जो नवीन प्रताप घडवला ते ऐकून पोल‌िस देखील आश्चर्यचकीत झाले. फरार असताना परवेज खान याने पुन्हा एकदा आपल्या ५ साथीदारांना हाताशी घेतले. ज्या बोरटेंभे जमीन बनावट खरेदीच्या प्रकरणात तो संशयित होता ती जमीन पुन्हा एकदा ३० मार्च २०१७ रोजी ५ इसमांना विकली. त्याने ही जमीन अलोक महेंद्रकुमार पटेल (भिवंडी), दिनानाथ मिश्रा, प्रेम पांडे, सुरेंद्र पांडे, किरण मिश्रा (सर्व रा. ठाणे) यांना ३० लाख रुपयांना विकली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिपंपांच्या विजेबाबत महावितरणला निवेदन

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

शेतकऱ्यांच्या कृषिपंपांचा वीजपुरवठा वीजबिले थकल्याच्या कारणाखाली महावितरणकडून कोणतीही पूर्वसूचना न देता खंडित करण्यात येत आहेत. त्याबाबत छावा क्रांतिवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. अशाप्रकारे कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करणे बेकायदेशीर असून, ही मोहीम न थांबल्यास छावा क्रांतिवीर संघटनेतर्फे महावितरणविरोधात आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे.

महावितरणकडून सध्या वीजबिले थकल्याच्या कारणाखाली शेतकऱ्यांच्या कृषीपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके धोक्यात आली असून, याबाबत छावा क्रांतिवीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची भेट घेतली. यावेळी महावितरणने या अनुदानातून शेतकऱ्यांकडील थकित वीज बिलांची वसुली करावी व यापुढे शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करावा, अशी मागणी करण्यात आली. याप्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे अध्यक्ष करण गायकर, सह्याद्री फाउंडेशनचे अध्यक्ष रोशन घाटे, बापू आढाव, भाऊसाहेब लगरे, विनायक वाघमारे, बबलु शेख, महेंद्र भालेराव उपस्थित होते. शेतीमालाला सरकारने हमीभाव ठरवून दिला असून, प्रत्यक्षात बाजारात हमीभावापेक्षाही कमी भाव मिळत आहे. हमीभाव व प्रत्यक्ष भाव यातील फरकाची रक्कम सरकारकडून शेतकऱ्यांना मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झालेले आहे. त्यामुळे महावितरणने शेतकऱ्यांना मोफत वीजपुरवठा करावा, अशी मागणी केली. काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेने शेतकऱ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यातून त्यांची सुटका करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दारू दुकानप्रश्नी ठिय्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

गेल्या अनेक दिवसांपासून नागरिकांचा विरोध असलेल्या दत्तनगर येथील देशी दारूचे दुकान आता कायमचेच बंद करावे, यासाठी परिसरातील महिलांसह स्थानिक रहिवाशांनी शनिवारी अंबड पोलिस ठाण्यावर मोर्चा काढून ठिय्या आंदोलन केले. याप्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान घेण्यात यावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

चुंचाळे शिवारातील दत्तनगर भागात काही दिवसांपासून देशी दारूचे सुरू झाले आहे. या दुकानामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य व सुरक्षा धोक्यात आली असल्याने परिसरातील नागरिक व महिलांनी शनिवारी एकत्र येऊन अंबड पोलिस ठाण्यात ठिय्या आंदोलन करीत पोलिसांना निवेदन दिले. या दारू दुकानामुळे येथील महिलांना रस्त्याने जाणे-येणे अवघड झाले असून, मद्यपींमुळे महिलांना या एकमेव रस्त्याचा वापर करणेदेखील अवघड बनले आहे. अनेक वेळा मद्यपी मोठ्या आवाजात शिवीगाळ करून भांडणे करतात, परिसरात अस्वच्छता पसरवितात, त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. येथे दुसरा रस्ता नसल्याने नागरिकांना या दुकानाजवळील रस्त्याचाच वापर करावा लागत असतो.

अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांना हे दुकान बंद करण्यासाठी व येथील समस्या सोडवण्यासाठी निवेदन दिले. यावेळी पोलिसांनी हे दुकान बंद करण्यासाठी परिसरातील नागरिकांचे मतदान घेण्याचे आवाहन महिलांनी केले. हे दुकान रीतसर परवानगीने सुरू असल्याचे पोलिसांनी यावेळी सांगितले असून, या दुकानाच्या परिसरातील नागरिकांना त्रास होणार नाही यासाठी खबरदारी घेण्याबरोबरच नागरिकांच्या या विरोधाचा अहवाल तयार करण्यात येईल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.

---

दोन दिवसांपूर्वीच चाकूहल्ल्याची घटना

या दारू दुकानापासून काही अंतरावर दोन दिवसांपूर्वीच हाणामारी होऊन एकावर चाकूहल्ला झाला होता. सदर व्यक्ती जिल्हा रुग्णालयात उपचार घेत असल्याचेही नागरिकांनी सांगितले. त्यामुळे शनिवारी परिसरातील महिला व रहिवाशांनी दुकानाच्या दिशेने धाव घेत दुकान कायमचे बंदच करायचे, असा पवित्र घेतला. महिलांनी घोषणाबाजी करीत हे दुकान बंद करण्याची मागणी केली. दरम्यान, अंबड पोलिसांनी मध्यस्थी करीत येथे मोर्चा काढून काहीही उपयोग होणार नसल्याचे सांगत दुकानदाराने रीतसर परवानगी घेत हे दुकान सुरू केले आहे, असे सांगितल्यानंतर महिला व नागरिकांनी थेट अंबड पोलिस ठाण्याकडे मोर्चा वळविला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मोरपिसांनी खुलली पंचवटी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पंचवटीतील कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हाती मोरपिसे दिसत असल्याने अन् या मंदिराबरोबरच कपालेश्वर, काळाराम मंदिर, सीतागुंफा येथेही भाविक दर्शनासाठी जात असल्यामुळे पंचवटी परिसर शनिवारी मोरपिसांनी खुलल्याचे चित्र दिसून आले.

कार्तिक पौर्णिमेला कार्तिक स्वामी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांकडून मोरपिसे अर्पण करण्याची परंपरा असल्याने मोरपिसांना दोन दिवसांपासून प्रचंड मागणी आली होती. श्री काशी नाट्टकोटीईनगर छत्रम मॅनेजमेंट सोसायटीच्या पंचवटीतील कार्तिक स्वामी मंदिरात शुक्रवार (दि. ३)पासून भाविकांची दर्शनासाठी गर्दी होऊ लागली होती. कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मी आणि कुबेर कार्तिक स्वामींच्या भेटीला येतात, अशी आख्यायिका आहे. या दिवशी दर्शन घेण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जात असल्यामुळे भाविक मोठ्या श्रद्धेने दर्शनसाठी आणि पूजेसाठी येत असतात. यावर्षीही भाविकांनी कार्तिक स्वामींच्या दर्शनसाठी रांगा लावल्या होत्या.

कार्तिक पौर्णिमा शनिवारी सकाळी १० वाजून ५३ मिनिटांनी संपणार होती. त्यामुळे थंडीतही भल्या पहाटे मंदिरात दर्शनासाठी भाविकांची गर्दी दिसून आली. कृतिका नक्षत्र रविवारी (दि. ५) रोजी मध्यरात्री १ वाजून ६ मिनिटांनी सुरू होते आणि रात्री १० वाजून ३१ मिनिटांनी संपते. या काळात भाविकांना या मंदिरात दर्शन घेता येणार आहे. हा दिवस रविवारच्या सुटीचा दिवस असल्यामुळे अजून एक दिवस पंचवटी परिसर मोरपिसांनी फुलल्याचे दिसून येण्याची चिन्हे आहेत.

---


नाशिकरोड परिसरात दीपोत्सव

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड येथील मुक्तिधाम मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त विविध कार्यक्रम झाले. भाविकांची सकाळपासून दर्शनासाठी गर्दी झाली होती. महिला भाविकांचे प्रमाण लक्षणीय होते.

येथे सायंकाळी झालेला दीपोत्सव पाहण्यासाठीही भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुक्तिधाममध्ये अनेक देवी-देवतांच्या मूर्ती आहेत. त्यात कार्तिक स्वामींची मूर्तीही आहे. मात्र, महिलांना कार्तिक स्वामींचे दर्शन फक्त कार्तिक पौर्णिमेलाच करता येते. त्यामुळे शनिवारी सकाळपासूनच महिला भाविकांनी येथे रांगा लावल्या होत्या. भाविकांकडून कार्तिक स्वामींना प्रिय असलेले मोरपीस अर्पण करण्यात आले. मुक्तिधाम मंदिर परिसर रोषणाईने उजळून गेला होता. मुक्तिधामच्या प्रवेशद्वारावर २५ बाय ५० फुटांची महारांगोळीदेखील काढण्यात आली होती. सायंकाळी या रांगोळीत चार हजार पणत्या प्रज्वलित करण्यात आल्या. हे दृश्य नजरेत साठविण्यासाठी भाविकांची गर्दी झाली होती.

--

नवग्रह मंदिरात कार्यक्रम

देवळालीगावाशेजारील श्री अण्णा नवग्रह गणपती मंदिरात कार्तिक पौर्णिमेनिमित्त अण्णा गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली विविध कार्यक्रम झाले. सायंकाळी साडेसातला दीपोत्सव झाला. तो दोन दिवस चालेल. आज, रविवारी (दि. ५) पहाटे पाचला महाभिषेक होईल. खासदार हेमंत गोडसे, माजी मंत्री बबनराव घोलप, आमदार योगेश घोलप, सुप्रीम कोर्टातील वकील शेखर नाफडे, शिक्षणाधिकारी गोविंद, सुधीर अंबवणे, पंकज कवळी, वास्तुविशारद नितीन भोजने, प्रसाद पवार प्रमुख पाहुणे राहतील. साडेअकराला भजन व त्यानंतर कार्तिक स्वामी याग होऊन महाप्रसाद वाटपाने सांगता होईल. भाविकांनी लाभ घेण्याचे आवाहन मंदिराच्या प्रशासनाने केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

फाइल अपलोडबाबत जिल्हा बँक अव्वल

$
0
0

धुळे जिल्हा बँक अध्यक्ष कदमबांडे यांची माहिती

म. टा. वृत्तसेवा, धुळे

बँकेत कर्ज घ्यायला गेलेल्या शेतकऱ्याला बहुतेक वेळा वाईट अनुभव येतो, कर्जासाठी वारंवार फेऱ्या माराव्या लागतात. मात्र धुळे-नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक याला अपवाद ठरली आहे. शेतकऱ्यांच्या सन्मानासाठी जिल्हा बँकेच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तत्काळ कर्ज मिळावे यासाठी परिश्रम घेतले.

या अथक परिश्रमामुळेच धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक १०० टक्के यशस्वी फाइल अपलोड करणारी राज्यातील पहिली बँक ठरली आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

कर्जात गुंतलेल्या शेतकऱ्यांची सुटका व्हावी यासाठी सरकारने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना लागू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून बँकेने थकबाकीदार, नियमित फेड करणारे सभासद, पुनर्गठण केलेले सभासद आदींना कर्जमाफीचा लाभ मिळवून देण्यासाठी युद्ध पातळीवर परिश्रम घेतले.

बँकेने पीक कर्जासाठी सर्वाधिक कर्जपुरवठा करीत बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व सहकार खात्याच्या मार्गदर्शनाखाली सतत चार महिने नियमित कामकाज केले. त्यामुळे राज्याच्या सर्व जिल्हा बँकांमध्ये कर्जमाफीचा डाटा यशस्वीपणे अपलोड करण्यात बँकेचा प्रथम क्रमांक आला आहे. राज्य सरकारचा निर्णय जिल्हा बँकेला प्राप्त झाल्यानंतर बँकेने जिल्ह्यातील सर्व शेतकरी सभासदांची अचूक माहिती मागवून घेत तज्ज्ञ एजन्सीला कर्जमाफी यादीचे काम देऊन बँकेच्या मुख्यालयात ४५ कर्मचाऱ्यांकडून कामकाज

करवून घेतले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


फसवणुकीतील पैसे ७८ खात्यांत वर्ग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

दुबईमध्ये महिना ५० लाख रुपये वेतनाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवत तब्बल पावणेतीन कोटी रुपये उकळणाऱ्या भामट्यांनी हे पैसे देशभरातील १९ बँकांमधील ७८ खात्यांत वर्ग केल्याची बाब सायबर पोलिसांनी शोधून काढली आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, संशयित देशातील कोपऱ्यातून फसवणुकीचा उद्योग करीत असल्याचा पोलिसांचा कयास आहे.

ऑनलाइन फसवणूक करणाऱ्या भामट्यांनी दीपक दिगंबर पाठक (रा. पिंपरीकर हॉस्पिटलजवळ, गोविंदनगर) यांची फसवणूक केल्याचा प्रकार ऑक्टोबरच्या शेवटी उघड झाला होता. गुजरातमधील एका मल्टिनॅशनल कंपनीत पाठक कार्यरत असलेल्या आणि नाशिकशी संबंधित असलेल्या पाठक यांना दुबईमध्ये चांगल्या कंपनीत काम करण्याची संधी देत असल्याची बतावणी करून भामट्यांनी इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क साधला होता. १६ मे ते ५ जुलै या काळात संबंधितांनी विदेशात मोठ्या पगाराची नोकरी मिळवून देण्याची ग्वाही देत पाठक यांच्याकडून वेळोवेळी तब्बल पावणेतीन कोटी रुपये उकळले. पैसे भरूनही नोकरी मिळण्याच्या हालचाली होत नसल्याने अखेर पाठक यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास सायबर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र कुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. याबाबत बोलताना कुटे यांनी सांगितले, की संशयिताने देशातूनच हा उद्योग केला असून, पाठक यांनी दिलेले पैसे त्याने देशभरातील १९ बँकांमधील ७८ खात्यांत वर्ग केले आहेत. दिलेले पैसे, वर्ग झालेले पैसे यांचा हिशेब जुळवणे हेदेखील मोठे काम असून, त्या दृष्टीने तपास सुरू असल्याचे कुटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पाठक यांनी एवढी मोठी रक्कम कशी दिली, यावरही कुटे यांनी प्रकाश टाकला. फिर्यादी पाठक यांनी भरलेल्या सर्व रकमेचा तपशील दिला असून, रिटर्न्स भरल्याचे पुरावे सादर केले आहेत. यातील काही रक्कम त्यांनी नातेवाइकांकडून घेतल्याचे सांगितले. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असून, आरोपींचा माग काढण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे कुटे यांनी स्पष्ट केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाभानगरमध्ये भरदिवसा घरफोडी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बंद घराचा कडीकोयंडा तोडून चोरट्यांनी भरदिवसा रोकड आणि दागिने असा तब्बल सव्वा दोन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. ही घटना भाभानगर परिसरात गुरूवारी घडली. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. अनुराग प्रमोद पटवर्धन (रा. सारसबाग सोसा. नवशक्ती चौक) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पटवर्धन कुटुंबीय गुरूवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर गेले होते. घरात कोणी नसल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी बंद घराचा कडीकोयंडा तोडून आत प्रवेश केला.

वृद्धाला फसविले

एटीएम कार्डला आधारलिंक करायचे असल्याचे सांगत चोरट्यांनी वृद्धाच्या बँक खात्यातील साडेबारा हजाराची रोकड परस्पर चोरी केल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जगन्नाथ वामन बोरसे (६२ रा. समता कॉलनी, सातपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. बोरसे २९ सप्टेंबर रोजी दुपारी आपल्या घरात असतांना त्यांना एका महिलेचा फोन आला. सदर महिलेने बँकेतून बोलत असल्याचे सांगून एटीएम कार्ड लिंक करायचे आहे. त्यासाठी बँक खात्याची माहिती घेत ओटीपी नंबर मिळवित ही फसवणूक केली. खात्यातील १२ हजार ५८७ रुपयांची रोकड काढून घेतल्याचे तक्रारीत

म्हटले आहे.

सोनसाखळी खेचली

शतपावलीसाठी घराबाहेर पडलेल्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोनसाळखी दुचाकीस्वारांनी तोडून नेल्याची घटना नरसिंहनगर भागात घडली. घटनेची गंगापूर पोलिसांनी नोंद केली आहे. विजया प्रभाकर ओतुरकर (७५ रा.सुखशांती अपार्ट. आनंदनगर, गंगापूररोड) यांनी तक्रार दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतिम प्रवास बंदोबस्तात...

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, सिडको

उंटवाडी येथील स्मशानभूमीचा वाद चांगलाच चिघळला असून, शनिवारी येथे अंत्यविधी करण्यास स्थानिकांनी विरोध केल्याने पोलिस बंदोबस्तात येथे अंत्यसंस्कार करण्याचा प्रसंग उद्भवला. येथील स्मशानभूमीच्या वादामुळे काहींचा अंतिम प्रवासदेखील खडतर बनल्याचे या प्रकारावरून दिसून आले. त्यामुळे याप्रश्नी त्वरित तोडगा काढून मृतदेहांची हेळसांड थांबवावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली.

शनिवारी लिंगायत समाजाचे काही नागरिक अंत्यविधीसाठी या ठिकाणी मृतदेह घेऊन आल्यावर स्थानिकांनी अंत्यविधीस विरोध केल्याने अखेरीस या नागरिकांनी पोलिस ठाण्यात धाव घेऊन पोलिस बंदोबस्तात हा अंत्यविधी पूर्ण केला. गेल्या तीस वर्षांपासून या ठिकाणी स्मशानभूमीचे आरक्षण असून, या स्मशानभूमीचा विकास केला पाहिजे, अशी मागणीही यावेळी लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली.

उंटवाडी येथील स्मशानभूमीचा वाद अनेक दिवसांपासून सुरू आहे. शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर यांनी या स्मशानभूमीचा विकास करण्यासाठी प्रस्ताव देऊन हे काम मंजूर करून घेतले आहे. मात्र, भाजपच्या नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांच्यासह काही स्थानिक नागरिकांनी या कामाला विरोध दर्शविला आहे. ही स्मशानभूमी तीस वर्षांपासून या ठिकाणी असून, केवळ सोयी नसल्यानेच तिचा वापर बंद झाला होता. त्यामुळे या ठिकाणी सुधारणा करण्याच्या निर्णयाचे संबंधितांनी स्वागत केले होते. मात्र, पुन्हा वाद निर्माण होऊन तो थेट पोलिस ठाण्यापर्यंत गेला होता.

या पार्श्वभूमीवर शनिवारी एका लिंगायत समाजबांधवाचे निधन झाल्यानंतर या समाजबांधवांनी येथे मृतदेह अंत्यविधीसाठी आणला. मात्र, काही स्थानिक नागरिकांनी एकत्र येऊन ही स्मशानभूमी बंद झाली असून, तिचा वापर करायचा नाही, असे सांगून अंत्यविधीस विरोध दर्शविला. त्यामुळे लिंगायत समाजबांधवांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेतली. यावेळी उंटवाडीतील स्मशानभूमीचे मागील तीस वर्षांपासून आरक्षण असून, केवळ सुविधा नसल्याने तिचा वापर बंद झाला होता, असे सांगून काही कागदपत्रे पोलिसांना सादर केली. त्यानुसार पोलिसांनीही बंदोबस्त देऊन येथील अंत्यविधी पूर्ण करविला.

--

सोक्षमोक्ष होणार केव्हा?

एकच प्रभागातील दोन नगरसेवकांची भिन्न मते निर्माण झाल्याने आता नागरिकांचीच नव्हे, तर मृतदेहाचीसुद्धा हेळसांड होत असल्याचे यावरून दिसून आले. त्यामुळे आता तरी या स्मशानभूमीचा विकास करून ती नागरिकांसाठी खुली करावी, अशी मागणी लिंगायत समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या प्रकारामुळे स्मशानभूमीचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला असून, या वादाचा सोक्षमोक्ष नेमका केव्हा अन् कसा लागणार याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

--

विरोधाभासी भूमिका

उंटवाडी स्‍मशानभूमीचा वाद हा ऑक्‍टोबर महिन्याच्या प्रारंभापासून सुरू झाला आहे. नगरसेवक सुधाकर बडगुजर व नगरसेविका हर्षा बडगुजर यांनी या स्मशानभूमीच्या विकासाचा प्रस्ताव सादर केला आहे. स्मशानभूमीच्या विकासासाठी एक कोटी ६१ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. मात्र, नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी या स्मशानभूमीच्या विकासाला विरोध दर्शविला. त्यानंतर माजी नगरसेविका कांचन पाटील यांच्यासह उंटवाडी ग्रामस्थ, लिंगायत समाजबांधव यांनीसुद्धा या स्मशानभूमीचा विकास व्हावा यासाठी पत्र दिले आहे. या वादात थेट आर्थिक उलाढाल झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. नगरसेवक बडगुजर यांच्याकडून जीवितास धोका असल्याची तक्रारही अंबड पोलिस ठाण्यात करण्यात आली होती. त्यामुळे हा वाद मागील महिन्यांत चांगलाच गाजला होता.

या स्मशानभूमीसाठी उंटवाडीच्या असंख्य ग्रामस्थांनी पाठिंबा दर्शविला असून, या ठिकाणी यापूर्वी अनेक विधी झाले असून, केवळ दुरवस्थेमुळे ही स्मशानभूमी बंद होती. आता तिचा विकास करावा, अशी मागणी अनेकांनी केली आहे.

--

लिंगायत समाजातर्फे शनिवारी पोलिस बंदोबस्तात उंटवाडी स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यात आल्याचे समजले. मात्र, आपण बाहेरगावी असल्याने नक्‍की काय प्रकार झाला याची माहिती मिळालेली नाही.

-सुधाकर बडगुजर, नगरसेवक, प्रभाग २५

--

आम्ही विकासाच्या विरोधात नाही, नागरिकांसोबत आहोत. शनिवारी आम्ही प्रभागात नव्हतो. या आंदोलनाची माहिती उशिराने मिळाली असून, नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने हे आंदोलन केले आहे.

-भाग्यश्री ढोमसे, नगरसेविका, प्रभाग २५

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सारंगखेडा यात्रेचे पुष्करप्रमाणे ब्रँडिंग

$
0
0

पर्यटन विभागाकडून साडेचार कोटी रुपयांचा निधी

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नंदुरबार जिल्ह्यात भरणाऱ्या सारंगखेडा येथील यात्रेचे ब्रॅण्डिंग राजस्थानातील पुष्करच्या धर्तीवर करण्याचा निर्णय राज्याच्या पर्यटन विभागाने घेतला आहे. त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या यात्रेतील घोडेबाजर देशभर प्रसिद्ध आहे. या यात्रेत महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात, पंजाब, आंध्र प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान या राज्यांतील घोडे विक्रीसाठी येतात.

यात्रेची महती आंतरराष्ट्रीय स्तरावर जावी यासाठी त्याचे ब्रॅण्डिंग केले जाणार आहे. सारंगखेडा येथील पुरातन दत्त स्वामी मंदिराच्या यात्रोत्सवात हा घोडेबाजार भरतो. याठिकाणी यात्रेत हिंदी, मराठी चित्रपट कलाकारांचीही आवर्जून उपस्थिती असते. गेल्यावर्षी या यात्रेत तीन हजाराहून अधिक घोडे विक्रीसाठी आले होते. पंधरा दिवसाच्या कालावधीत घोडेबाजारात सुमारे २५ ते ३० कोटींची उलाढाल होत असते. या घोड्यांच्या किमती ४० हजारांपासून सुरू होऊन थेट ४० लाखांपर्यंत असतात. तीन वर्षांपूर्वी यात्रेतील सर्वात जास्त किमतीचा घोडा अहमदनगर जिल्ह्यातील एका डॉक्टरांनी चक्क ५१ लाखांना खरेदी केला होता.

दत्त मंदिरापासून काही अंतरावरच मोकळ्या जागेत दरवर्षी हा घोड्यांचा बाजार भरत असतो. त्यात देशभरातून आलेल्या घोड्यांमध्ये सर्वात जास्त मागणी पंजाब येथील नुकरा आणि पाच कल्याणी जातीच्या घोड्यांना असते. देवमान, कंठळ, जयमंगल, पद्म, शामकर्ण, काळा पाच कल्याणी हे गुणवान घोडे सर्वांत मोठ्या प्रमाणावर नागरिक खरेदी करतात. तसेच त्यांच्या नाकावर पाढंरे चट्टे, दोन भवरी असलेले, पोटाखाली भवरा असलेले, गळ्यावर भोवरा असलेल्या घोड्यांनाही मागणी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नववसाहतींत सुविधांची वानवा

$
0
0

नाशिकरोड परिसरातील नागरिक मुलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

नाशिकरोड शहराला लागून नव्या वसाहतींचा उदय झपाट्याने झाला असला तरी या नववसाहती अद्यापही मुलभूत नागरी सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या काही सुविधा आहेत. त्या अत्यंत सुमार दर्जाच्या असल्याने या नववसाहतींतील नागरिकांचे सध्या हाल सुरू आहेत. नाशिकरोडच्या पूर्व बाजूस सामनगाव रोड, नाशिक-पुणे महामार्ग, चेहेडी पंपिंग स्टेशन, खर्जुल मळा, जुना ओढा रोड, एकलहरे रोड याशिवाय देवळालीगाव, विहितगाव, वडनेर व पिंपळगाव खांब या भागातही नववसाहतींचे इमले उभे राहिलेले आहेत.

रेल्वेस्थानक जवळ असलेल्या भागात सिंहस्थानंतर रेल्वे स्थानकाच्या पूर्वेला मोठ्या प्रमाणात नववसाहतींचे जाळे विस्तारले आहे. या काळात येथे टोलेजंग इमारती उभ्या राहिल्याने या भागातील लोकसंख्याही झपाट्याने वाढली आहे. मात्र या नववसाहतींना असुविधांचे ग्रहण लागलेले आहे. मुलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने या नववसाहतींतील रहिवाशांची गैरसोय होत आहे.

पथदीप वर्षानुवर्षे बंद अवस्थेत

या कॉलनी भागात पालिकेच्या अभ्यासिका, वाचनालये, व्यायामशाळा या उद्देशाने उभारलेल्या वास्तू गेल्या काही वर्षांपासून वापराविना पडून आहेत. या वास्तूंचा वापर टवाळखोरांकडून सर्रासपणे केला जात असल्याने स्थानिक रहिवाशी या टवाळखोरांच्या उपद्रवाने त्रस्त झालेले आहेत. पालिका प्रशासनालाही याचा विसरच पडलेला आहे. शहरातील विविध कॉलनीतील बहुतेक पथदीप वर्षानुवर्षे बंद आहेत. या समस्येकडे स्थानिक नगरसेवक दुर्लक्ष करीत आहेत. तर पालिकेचा विद्युत विभाग साहित्य नसल्याचे कारण पुढे करून नागरिकांना झुलवत आहे. परिसरातील अंधाराचा फायदा घेत चोरांकडून घरफोडीचे सत्र या भागात सुरू आहे.

उघड्या नाल्यांची दुर्गंधी

वरील नववसाहतींत कचऱ्याची मोठी समस्या दिसून येत असून, मराठा कॉलनी, प्रेस्टिज प्राइड, प्रसादधुनी, चेहेडी पंपिंग स्टेशन, सामनगाव रोड, अश्विन कॉलनी, जुना सायखेडा रोड, खर्जुल मळा या भागातील नववसाहतींना कचऱ्याच्या दुर्गंधीचा विळखा पडला आहे. पालिकेच्या स्वच्छता विभागाकडून कचऱ्याचे संकलन होत असले तरी चौकाचौकात उघड्यावर पडून असलेल्या कचऱ्याची दुर्गंधी या नववसाहतींसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. याच परिसरात काही उघडे नाले उघडे असल्याने त्यामधून दुर्गंधीयुक्त पाणी वर्षभर वाहत असते.

रस्त्यांची कमतरता

मळे विभागातील कॉलनीत नागरिकांना खराब रस्त्यांचाच वापर करावा लागतो. काही रस्त्यांना रुंदीकरण व डांबरीकरणाची गरज आहे. मात्र स्थानिक नगरसेवक रस्त्यांच्या समस्येकडे साफ दुर्लक्ष करीत आहेत. गेल्या दशकभरात उदयास आलेल्या विविध कॉलनीतील जनावरांचे गोठे स्थानिक नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. या गोठ्यांच्या दुर्गंधीचा सामना रहिवाशांना करावा लागत असून, या गोठे मालकांकडून स्वच्छता राखली जात नसल्याने रहिवाशी त्रस्त झालेले आहेत.
कॉलनीतील नागरी सुविधांविषयी पालिका प्रशासन दखल घेत नसून, नगरसेवकही असंवेदनशील झालेले आहेत. कचरा, रस्ते, पथदीप आणि उघडे नाले या प्रमुख समस्यांनी रेल्वे स्टेशनच्या पूर्व भागातील सर्वच कॉलनीतील रहिवाशी त्रस्त आहेत.

-गजानन चव्हाण, रहिवाशी,

कॉलनी परिसरातील रस्त्यांचे डिमार्केशन करीत अतिक्रमण काढणे, रस्ते रुंदीकरण, वीजवाहक तारा भूमिगत करणे, पथदीप दुरुस्ती ही कामे लवकरच मार्गी लागतील. पडून असलेल्या इमारतीही लवकरच सेवाभावी संस्थांना देण्यात येणार आहेत.

-पंडित आवारे, नगरसेवक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images