Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

कुतूहलातूनच कलाकार निर्मिती

$
0
0

अभिनेते दीपक करंजीकर यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

प्रत्येक कलावंतातील कुतूहल त्याला कलाकार बनवत असते. एकदा की हे कुतूहल चाळवले की पुढील क्रिया आपोआपच व्हायला लागतात. सतत, निरंतर काम करत राहणे ही ऊर्जा प्रत्येकाच्या मनातल्या कुतूहलाचा निकाल असते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या मध्यवर्ती शाखेचे प्रमुख कार्यवाह व सिनेअभिनेते दीपक करंजीकर यांनी केले.

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेतर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या पुरस्कारांचे वितरण करंजीकर यांच्या हस्ते रंगभूमीदिनानिमित्त करण्यात आले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात करंजीकर बोलत होते. सावानाच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात हा कार्यक्रम झाला. करंजीकर पुढे म्हणाले, की रंगभूमीसाठी १७४ वर्षे एखादा दिन साजरा करणारा भारत हा एकमेव देश आहे. असे काम करणारी शाखा महाराष्ट्रात दुसरी नाही अशी कौतुकाची पावतीही करंजीकर यांनी दिली.

यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या नाशिक शाखेचे अध्यक्ष प्रा. रवींद्र कदम, उपाध्यक्ष शाहू खैरे, प्रमुख कार्यवाह सुनील ढगे, डॉ. अनिरुध्द धर्माधिकारी यांची उपस्थिती होती. नाट्य परिषदेतर्फे काही विशेष योगदान पुरस्कारही देण्यात आले. यात संजीवनी कुलकर्णी, रेखा नाडगौडा, विद्या देशपांडे व मीरा धानू यांचा समावेश होता. संजीवनी कुलकर्णी यांच्या वतीने सुमुखी अथनी यांनी पुरस्कार स्वीकारला. तसेच यावेळी दिवंगत रंगकर्मींच्या वारसांचा सन्मान करण्यात आला. त्यात प्रसाद रहाणे, मयुरी सिन्नरकर, पूजा साळवे, वैष्णवी भडकमकर, अक्षय तिवारी, विकास दातार, शुभदा भडकमकर यांचा समावेश होता. याप्रसंगी ज्येष्ठ रंगकर्मी नेताजी भोईर यांचा राज्य नाट्य स्पर्धेतल्या सुवर्णमहोत्सवी नाटकाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. त्यांचा पुरस्कार त्यांच्या कन्या नंदा रायते यांनी स्वीकारला. तसेच संगीत देवबाभळी या नाटकातील कलावंत रसिका नातू व शुभांगी सदावर्ते, विजय साळवे व महेश डोकफोडे यांचा सत्कारही यावेळी करण्यात आला.

सुनील ढगे यांनी प्रास्ताविक केले. अदिती मोराणकर यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कारमूर्तींच्या वतीने बबनराव घोलप व सदानंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी संगीत देवबाभळी या नाटकातील काही गीतांचे सादरीकरण झाले.

हे आहेत पुरस्कारार्थी

दत्ता भट स्मृती पुरस्कार अभिनय पुरूष ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी, शांता जोग स्मृती पुरस्कार अभिनय स्त्री ज्येष्ठ रंगकर्मी नीता कोठेकर, प्रभाकर पाटणकर स्मृती पुरस्कार दिग्दर्शन अतुल पेठेकर यांच्या वतीने राहुल डबीर यांनी, गिरीधर मोरे स्मृती पुरस्कार प्रकाशयोजनेसाठी ज्येष्ठ रंगकर्मी सतीश सामंत, जयंत वैशंपायन स्मृती पुरस्कार सांस्कृतिक पत्रकारिता नंदकुमार टेणी, रामदास बरकले स्मृती पुरस्कार लोककला बबनराव घोलप यांना, वा. श्री. पुरोहित स्मृती पुरस्कार शीला सामंत यांना तर रावसाहेब अंधारे स्मृती पुरस्कार नेपथ्यासाठी आनंद ढाकिफळे यांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोकोचा इशारा

$
0
0

देवळा- सौंदाणा रस्त्याबाबत निवेदन

म. टा. वृत्तसेवा, कळवण

देवळा ते सौंदाणा रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली असताना सार्वजनिक बांधकाम विभाग बघ्याची भूमिका घेत असल्याचे चित्र आहे. गेल्या काही दिवसांत सदर रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे वाहनचालकांना याचा त्रास होत आहे. त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाने याबाबत तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.

देवळा ते सौंदाणा या रस्त्याच्या खड्ड्यांबाबत येत्या ११ नोव्हेंबर रोजी बेमुदत उपोषणासह रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते तथा मेशीचे माजी सरपंच गंगाधर शिरसाठ यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे.

तालुक्यातील देवळा-सौंदाणा रस्त्याची गेल्या एक वर्षांपूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून डागडुजी करण्यात आली होती. मात्र अल्पावधीतच देवळा-सौंदाणा रस्त्यावर मोठेमोठे खड्डे पडल्याने दररोज अपघात होत आहेत, असे या पत्रकात त्यांनी नमूद केले आहे. वाहनांना या खड्ड्यांमुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे.

या रस्त्याच्या दुतर्फा काटेरी झुडपे वाढली असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनेकवेळा लेखी तक्रारी करून डोळेझाक केली जात आहे. तरी येत्या सदरच्या रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी अन्यथा दि. ११ नोव्हेंबरला बेमुदत उपोषण करून रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा पत्रकात शेवटी देण्यात आला आहे.

पत्रकावर चिंतामण सावकार, वसंत शिरसाठ, काशिनाथ पवार, शांताराम निकम, रामदास निकम, विजय चव्हाण, सचिन राज, दावल बोरसे, विलास भंडारे, बापू गांगुर्डे, विजय कानडे, अनिल आहेर, राजेंद्र गुंजाळ, शाहू शिरसाठ, चिंतामण वाघ आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भक्त सैतानाचे नसतात!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महागाईचे चटके तुम्हाला जाणवतील. मात्र, मोदीभक्तांना जाणवणार नाहीत. मुळात मोदी भक्तांना आपण भक्त मानत नाही. याचे कारण म्हणजे भक्त हे देवाचे असतात. सैतानाची भक्ती केली जाते का, अशी टीका करीत जेएनयू विद्यार्थी संघटनेचा युवा नेता कन्हैया कुमारने पंतप्रधान मोदी यांना सैतान संबोधले.

सर्व पुरोगामी, परिवर्तनवादी, आंबेडकरवादी विद्यार्थी संघटनेतर्फे तूपसाखरे लॉन्समध्ये येथे रविवारी कन्हैया कुमारची सभा झाली. जीएसटी, नोटाबंदी व सरकारच्या धोरणावरही हल्ला करत समानतेच्या अधिकाराचा मुद्दाही त्याने या वेळी उपस्थित केला. तब्बल अडीच तास चाललेल्या या सभेत विविध घोषणांनी परिसर दणाणला होता. पंतप्रधान मोदी भ्रष्टाचार संपवण्याची भाषा करतात व भाजपमध्ये भ्रष्टाचारीच नेत्यांना प्रवेश देतात, असाही प्रश्नही केला. या वेळी त्यांनी गॅसच्या १६ महिन्यांत वाढलेल्या किमतींबरोबरच महागाईचा मुद्दागी उपस्थित केला. ‘भाजप भ्रष्टाचारी है की मालूम नहीं, लेकिन बेइमान है’ असे सांगत निवडणुकीत दिलेले आश्वासन न पाळणे, मते घेऊन काम न करणे यांसारखे उदाहरण देत भाजपने घेतलेल्या निर्णयावर हल्लाबोल केला.

आपल्याला करमणूक जर करायची असेल तर आपण गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाषण ऐका. त्यातील विरोधाभास आपली चांगली करमणूक करेल, असे सांगत मोदींना चिमटाही काढला. पंतप्रधान मोदींवर टीका करतानाच कन्हैया कुमार म्हणाला, की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर वैचारिक मतभेद आहेत. त्यांच्या आईचा व कुटुंबीयाचा मी आदर करतो. मतभेद असावे, पण वैर नाही, ईर्षा नसावी.

कन्हैया यांनी आपल्या भाषणात काळाराम मंदिर आंदोलन, कुंभमेळा व नाशिकच्या शेतकरी आंदोलनाचा उल्लेखही केला. या वेळी त्यांनी काळाराम आंदोलन डॉ. बाबासाहेबांनी का केले, त्यामागची भूमिका सांगून समानतेचा मुद्दा मांडला. देशद्रोहाच्या आरोपानंतर भाजपच्या एका नेत्याने कन्हैया चांगला मुलगा आहे, असे बैठकीत सांगितले. त्यावरून या बैठकीत भाजपमध्येच संघर्ष झाला. त्यामुळे अब हमारी बहस दुसरों की मैफल में है, असे सांगत त्यांनी आरोप करणाऱ्यांवर पलटवार केला.

कार्यकर्त्यांचे लाल टी शर्ट
सभेसाठी ऑल इंडिया स्टुडंट्स फेडरेशन (एआयएसएफ), छात्रभारती, महाराष्ट्र युवा परिषद, डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया (डीवायएफआय), सम्यक विद्यार्थी आंदोलन, ऑल इंडिया यूथ फेडरेशन (एआयवायएफ), शिक्षण बाजारीकरणविरोधी मंच, प्रगतिशील लेखक संघ यांनी संयोजन केले. या वेळी स्वयंसेवकांनी परिधान केलेले लाल टी शर्ट लक्ष वेधून घेत होते.

देशद्रोहाची चार्जशीट का दाखल करीत नाही?
भाजपचे देशात पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती व १८ राज्यांत सरकार असताना माझ्यावर आजपर्यंत देशद्रोहाच्या आरोपाची चार्जशीट का दाखल केली नाही, असा सवाल करत कन्हैया कुमारने भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चौफेर टीका केली. माझ्या देशद्रोहोच्या आरोपाबद्दल मला सगळीकडे ऐकायला मिळते; पण सरकार कारवाई का करीत नाही, असा प्रश्नही त्याने उपस्थित केला.

कन्हैया म्हणाला....
- साडेतीन वर्षे झाली. साडेतीनच ना? बुरे दिन आसानी से कटते नहीं...
- हमारी लढाई सिद्धांतों की है, विचारों की है
- आप डंडा लेते हो, हापपँट पहनेते हो. लेकिन मंत्रिपद नारायण राणे को मिलता है!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रुग्णालयाला खोडा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

शहरातील भाभानगर येथे महिला रुग्णालय उभारण्यावरून सध्या चांगलाच वाद रंगला आहे. मात्र, दुसरीकडे अंबड लिंकरोडवरील महापालिकेच्या आरक्षित जागेवर रुग्णालय उभारणीकडे कानाडोळा होत असल्याची स्थिती आहे. चुंचाळे शिवारातील तब्बल चार एकर जागा महापालिकेने रुग्णालयासाठी आरक्षित केलेली आहे. यासंदर्भात वेळोवेळी पाठपुरावा करूनदेखील प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप परिसरातून केला जात आहे.

चुंचाळे शिवारात असलेल्या गट नंबर १२, १३ व १४ या ठिकाणी रुग्णालयाचे आरक्षण महापालिकेने टाकलेले आहे. त्यात १६ हजार चौरस मीटर जागा आरक्षित करण्यात आलेली आहे. महापालिकेच्या ताब्यात १० हजार चौरस मीटर जागा आली असून, उर्वरित जागा हस्तांतर करण्याचे काम प्रगतिपथावर आहे. महापालिकेचे तत्कालीन आयुक्त संजय खंदारे यांनी जागेची पाहणी केली होती. परंतु, त्यानंतर फारशी कार्यवाहीच न झाल्याने संबंधित जागेवर रुग्णालय उभारले जाणार तरी केव्हा, असा सवाल उपस्थित होत आहे. याबाबत माजी नगरसेवक सचिन भोर यांनी महापालिकेकडे सातत्याने पाठपुराव केला असल्याचे सांगितले. नगरसेवक भागवत आरोटे व नगरसेविका हर्षदा गायकर यांनीही आरक्षित असलेल्या जागेवर रुग्णालयाची उभारणी करावी, अशी मागणी केली आहे.

---

एकीकडे वाद, दुसरीकडे उपेक्षा

शहरात आमदार प्रा. देवयानी फरांदे व माजी आमदार वसंत गिते यांच्यात भाभानगर येथे महिला रुग्णालय उभारण्यावरून वाद रंगला आहे. महापालिकेच्या हद्दीतच मध्यवर्ती भागात महिला रुग्णालयाची उभारणी व्हावी, असे आमदार फरांदे यांचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेनेच आरक्षित केलेल्या अंबड लिंकरोडवर असलेल्या चार एकर जागेवर रुग्णालय उभारण्यात यावे, अशी मागणी माजी नगरसेवक भोर, नगरसेवक आरोटे व नगरसेविका गायकर यांनी केली आहे.

--

अंबड लिंकरोडवरील चुंचाळे शिवारात असलेल्या चार एकर जागेवर रुग्णालयाचे आरक्षण आहे. परंतु, अनेकदा मागणी करूनही रुग्णालय उभारण्यात आले नाही. सत्ताधाऱ्यांनी कामगारांसाठी रुग्णालायची उभारण्याची गरज आहे.

-सचिन भोर, माजी नगरसेवक

--

महापालिकेने आरक्षित केलेल्या जागेवर तात्काळ रुग्णालय उभारण्यात यावे, याबाबत आयुक्तांकडे मागणी करणार आहोत. रुग्णालयाच्या उभारणी झाल्यास त्याचा निश्चितच सर्वसामान्य कामगारांना लाभ मिळणार आहे.

-हर्षदा गायकर, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्याच्या’ हाती १६ वर्षांनंतर बेड्या!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

अपहरण आणि बलात्काराच्या गुन्हा करून १६ वर्षांपूर्वी तो परागंदा झाला. देशभरात फिरून तो मुंबईमार्गे नाशिकमध्ये आला. येथे स्थिरस्थावर होण्याचा त्याचा प्रयत्न मात्र, नाशिक पोलिसांनी हाणून पाडला. पंजाब हायकोर्टाच्या आदेशानुसार स्थापन झालेल्या विशेष तपास पथकाच्या उपस्थितीत आणि शहर पोलिसांच्या प्रयत्नाने मायलेकाची ताटातूट करणारा अखेर गजाआड झाला.

सुखदेव चनान सिंग (वय ४५, रा. ओहरपूर, पोस्ट तांडा. जि. होशियारपूर, पंजाब) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. साधारणतः १६ वर्षांपूर्वी तांडा पोलिस स्टेशनमध्ये सुखदेवविरोधात बलात्कार आणि अपहरणाचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दोन्ही गुन्ह्यानंतर तो फरार झाला. अपहरणाच्या घटनेत सुखदेवने एका १० वर्षांच्या मुलाला सोबत घेतले होते. २९ वर्षांचा सुखदेव त्यानंतर कोठे गेला, त्या मुलाचे काय झाले याची माहिती समोरच आली नाही. पंजाब पोलिसांचा तपास पुढे जात नव्हता. त्यामुळे अपह्त मुलाच्या आईवडिलांनी पंजाब-हरियाणा हायकोर्टात धाव घेतली. हायकोर्टाने तपासात होत असलेल्या दिरंगाईबाबत नाराजी व्यक्त करीत तपासासाठी एक विशेष पथक स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यात वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला. या पथकास सुखदेव नाशिकमध्ये असावा, याची कुणकुण लागली. तपास पथकातील काही अधिकाऱ्यांनी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार यांच्यासह पोलिस उपायुक्त विजयकुमार मगर यांची भेट घेऊन मदतीची विनंती केली. त्यानुसार तपासाची पुढील कामगिरी युनिट दोनचे सहायक पोलिस निरीक्षक गंगाधर देवडे व त्यांच्या सहकाऱ्यांवर सोपविण्यात आली. सुखदेव लहवित परिसरात असल्याचे पुरावे समोर आल्याने देवळाली कॅम्प पोलिस स्टेशनचे पीएसआय राठोड व कर्मचारी तसेच, पोलिस पाटील संजय गायकवाड यांनी संयुक्तपणे माहिती संकलित केली. फरार सुखदेव लहवित गावातील गुरुद्वारा परिसरात सापडला. या पथकाबरोबर पंजाब पोलिसांचे पथकही होते. या गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक नीलेश माईनकर, सुभाष डौले, एपीआय गंगाधर देवडे, पीएसआय विजय राठोड आदींनी केला.

त्या मुलाचे नक्की काय झाले?

सुखदेवच्या अटकेमुळे १६ वर्षांपूर्वी अपहरण झालेल्या त्या १० वर्षांच्या मुलाचे नक्की काय झाले, हे पंजाब पोलिसांच्या तपासात समोर येणार आहे. २९ वर्षांचा असताना सुखदेव फरार झाला होता. मात्र, त्यावेळी त्याचे लग्नही झालेले होते. सहा महिन्यांपूर्वी नाशिकमध्ये आल्यानंतर त्याने त्याच्या पत्नीला बोलावून घेतले. नाशिकमध्ये स्थायिक होण्याचा सुखदेवचा प्रयत्न होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

घोटीत महादीपोत्सव

$
0
0

घोटी : वासुदेव चौकातील गणपती मंदिराच्या परिसरात शनिवारी (दि. ४) त्रिपुरारी पौर्णिमेच्या निमित्ताने ३३३३ पणत्यांचा दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी महाआरती करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. घोटी शहरातील सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या असलेल्या नक्षत्र मित्रमंडळाच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून हा दीपोत्सव साजरा करण्यात येतो. यावेळीही हा उत्सव आनंदात साजरा करण्यात आला. शनिवारी (दि. ४) दुपारपासूनच या दीपोत्सवाची तयारी करण्यात आली होती. पंकज जाधव यांच्या नेतृत्वाखालील नक्षत्र मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेउन एकूण ३३३३ पणत्यांचा दीपोत्सव सादर केला. याप्रसंगी गणपती मंदिरात महाआरती करण्यात आली. तसेच गणपती मंदिर परिसरात १५ फुटी भव्य रांगोळीसह ३३३३ पणत्यांचा दीपोत्सव आयोजित करण्यात आला. या दीपोत्सवकरिता नक्षत्र मित्रमंडळाचे पंकज जाधव, पराग गवळी, प्रमोद सांगळे, विकास भगत, दिलीप पटेल, तुषार उगले, योगेश मुनोत, किरण कडवे, चेतन शहाणे, विक्रम जगताप, स्वप्नील शेलार, गौतम पोखरणा आदींनी विशेष प्रयत्न केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पाणी आरक्षणाची ३४ गावांना प्रतीक्षा

$
0
0

जिल्हा प्रशासनासह पालकमंत्र्यांच्या निर्णयाकडे येवला तालुकावासीयांच्या नजरा

म. टा. वृत्तसेवा, येवला

यंदाच्या पावसाळ्यात वरुणराजाची म्हणावी तशी न झालेली कृपादृष्टी, परतीच्या पावसानेदेखील चांगलीच पाठ फिरवताना सरासरी पर्जन्यमानात पिछाडीवर गेलेला तालुका म्हणजे येवला. सध्या ढासळलेली भूगर्भातील पाणीपातळी बघता येवला तालुक्याच्या ग्रामीण भागातील विशेषतः पालखेड डाव्या कालवा लाभक्षेत्रातील गावोगावच्या जनतेच्या नजरा या जिल्हा प्रशासनामार्फत केल्या जाणाऱ्या जिल्ह्यातील प्रासंगिक पाणी आरक्षणाकडे लागल्या आहेत.

अत्यल्प पावसामुळे येता उन्हाळा तसेच येणाऱ्या काळातील संभाव्य टंचाईची दाहकता कमी व्हावी, पाण्यासाठी वणवण नशिबी येऊ नये यासाठी पाणी आरक्षणावर नजरा ठेवून असलेल्या तालुक्यातील ३४ गावांनी गावातील बंधारे, साठवण तलाव भरून देण्याच्या मागणीचे ठराव ग्रामसभेत केले आहेत. या ३४ गावांकडून येवला पंचायत समितीकडे आलेले ठराव अन् तालुका प्रशासनाने जिल्हा प्रशासनाकडे सादर केलेले प्रस्ताव लक्षात घेता या गावांसाठी यंदा एकूण ५५६.८६ दशलक्ष घनफूट पाणी आरक्षण करण्याची मागणी आहे.

येवला तालुक्याचा उत्तर पूर्व भाग हा तर पाटपाण्याचा कुठलाही स्त्रोत नसलेला टंचाईग्रस्त भाग आहे. तर पालखेडच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या उर्वरित भागाची अवस्था म्हणजे मिळाले तर टंचाईवर काहीशी मात, नाहीतर संकटात अशीच. त्यामुळेच दरवर्षी ऑक्टोबर, नोव्हेंबर महिना लागला की, तालुक्यातील गावोगावच्या जनतेची दरवर्षी नजर असते ती जिल्हा प्रशासन व पालकमंत्र्यांकडून मंजूर केल्या जाणाऱ्या पाणी आरक्षणाकडे. त्यासाठी तालुक्यात सरासरी इतकाही पाऊस न झाल्याने पुढची चिंता लागून राहिलेल्या जनतेचे त्यामुळेच यंदा पाणी आरक्षणाकडे डोळे लागले आहेत. येवला तालुक्यातील पाटोदा, रायते, पारेगाव, चिचोंडी बुद्रुक, चिचोंडी खुर्द, बल्हेगाव/वडगाव बल्हे, पिंप्री, कोटमगाव बुद्रुक, कोटमगाव खुर्द, खामगाव, शेवगेधुळगाव, पुरणगाव, देवळाणे, सातारे, जऊळके, धामणगाव, भाटगाव, अंतरवेली, बोकटे, मातुलठाण, आंबेगाव, बदापूर, दुगलगाव, नागडे, पिंपळगाव लेप, अंदरसूल, पिंपळगाव जलाल, गवंडगाव, आडगाव चोथवा, नांदेसर, मानोरी, सुरेगाव रस्ता व अंगणगाव या ३३ ग्रामपंचायतींनी ग्रामसभेचे ठराव करून यंदा गावासाठी पालखेड धरणातून पाणी आरक्षण ठेवण्याची मागणी केली आहे. तर तालुक्यातील मुखेड गावाने यंदाही नांदूरमध्यमेश्वर (दारणा) मधून गावासाठी पाणी आरक्षण मागितले आहे.

५५७ दशलक्ष घनफूट पाण्याची मागणी

वार्षिक सरासरी पर्जन्यमानापेक्षा यंदा अत्यंत कमी झालेला पाऊस लक्षात घेता येत्या उन्हाळ्यातील एप्रिल व मे महिन्यामध्ये तालुक्याला तीव्र पाणीटंचाईला सामोरे जावे लागण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे गावासाठी प्रत्यक्ष लागणारे पाणी व संभाव्य ५० टक्के तूट लक्षात घेऊन ३४ गावांमधील बहुतांशी गावांनी यंदा अधिक पाण्याची मागणी नोंदवली आहे. पालखेड धरणातून पाणी आरक्षण मागणाऱ्या येवला तालुक्यातील ३३ गावांनी एकूण ४९६.८६ दशलक्ष घनफूट इतके पाणी तर मुखेड गावाने नांदूरमध्यमेश्वरमधून ६० दशलक्ष घनफूट पाणी मागितले आहे. तालुक्यातील ३८ गावे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना, नगरपालिकाचे कायमस्वरूपी पाणी आरक्षण व त्यातून मिळणारे पाणी वेगळे असणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बनावट कागदपत्रांतून २५ लाखांचा गंडा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मशिनरी खरेदीसाठी बनावट कागदपत्रे तयार करून त्याद्वारे २४ लाख ९५ हजार ४२८ रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी गुन्हा दाखल केला. दयानंद व्ही. शिरसाठ (वय ५०, रा. १११, हिरा निवास, डीजीपीनगर, कामटवाडा) आणि भरत मधुकर अत्तरदे (वर ३९, रा. फ्लॅट क्रमांक २७, आनंदघन कॉलनी, बुरकुले हॉलजवळ) अशी संशयित आरोपींची नावे आहेत. महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा फायनान्शिअल सर्व्हिसेस लि. या कंपनीचे मुंबई नाका येथील सुयोजीत सिटी सेंटर शॉप क्रमांक २, ३ आणि ४ येथे कार्यालय आहे. याच ठिकाणी मशिनरी खरेदी करण्यासाठी बनावट कागदपत्रे सादर करून कंपनीची फसवणूक केली. याप्रकरणी हर्षल कमलाकर शिंपी (रा. देवेंद्र हाइटस, हनुमानवाडी, पंचवटी) यांनी तक्रार दिली असून, घटनेचा अधिक तपास पीएसआय महेश हिरे करीत आहेत.

आडगावात घरफोडी

बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी तीन तोळे वजनाची सोन्याची माळ, चांदीचा छल्ला तसेच जोडवे असा सुमारे ३७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी केला. या प्रकरणी वैशाली शशिकांत पाटील (वय २९, रा. फ्लॅट क्रमांक ९, गोविंद प्लाझा, आडगाव शिवार) यांनी तक्रार दिली आहे. शुक्रवारी भरदुपारी १२ वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. चोरट्यांनी पाटील यांच्या बंद घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेला मुद्देमाल लंपास केला. घटनेचा अधिक तपास पीएसआय सदाफुले करीत आहे.

एकाचा मृत्यू

भरधाव वेगात जाणाऱ्या पीकअपमधून पडून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. ३) रात्री नऊ वाजेच्या सुमारास राहुल चौफुली सिग्नल, म्हसरूळ-लिंकरोड येथे झाली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. पीकअप गाडी ही म्हसरूळ गावाकडून मखमलाबाद गावाकडे जाणाऱ्या लिंकरोडवरील राहू चौफुलीच्या सिग्नलजवळून भरधाव वेगात गेली. पीकअपमध्ये पाठीमागे बसलेला व्यक्ती तोल सुटून डांबरी रस्त्यावर पडला. यात त्याच्या डोक्यास गंभीर दुखापत झाली. रक्तस्राव जास्त प्रमाणात झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेचा तपास हवालदार भाऊसाहेब कारभारी शेळके करीत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ताणतणाव मुक्तीसाठी ग्रामीण पोलिसांची सहल

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पोलिस दलातील धावपळीमुळे तेथील ताणतणावाचा थेट परिणाम पोलिसांच्या कुटुंबावरही पडतो. कुटुंबासह कोठे फिरण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक संजय दराडे यांनी एक नवीन उपक्रम राबवला असून, त्या अंतर्गत रविवारी पोलिस कुटुंबीयांना सप्तशृंगगडावर नेण्यात आले.

मोर्चे, आंदोलने, गुन्ह्यांचा तपास यात गुरफटलेल्या पोलिसांना कुटुंबासाठी वेळ देणे जिकरीचे बनते. या पार्श्वभूमीवर ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक संजय दराडे यांनी पोलिस कुटुंबीयांसाठी दर रविवारी फॅमिली ट्रीपचे आयोजन करण्याचे ठरविले आहे. आठ विभागनिहाय दर रविवारी ही सहल आयोजित केली जाईल. रविवारी (दि.५ नोव्हेंबर) नाशिक ग्रामीण उपविभागातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सप्तशृंगी गडावर दर्शनासाठी सहल आयोजित केली होते. उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल झेंडेसह पिंपळगाव बसवंत, ओझर, वाडीवऱ्हे, इगतपुरी, घोटी पोलिस स्टेशनमध्ये नियुक्त असलेल्या ३५ पोलिस कुटुंबिय यावेळी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आवक वाढल्याने सीताफळ झाले स्वस्त

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

आरोग्यवर्धक असलेल्या सीताफळांची आवक वाढली असून, दरात मोठी घसरण झाली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून आवक वाढल्याने बाजारात चाळीस रुपये किलो दराने सीताफळांची विक्री होत आहे.

कमी खर्चात पुरेसे उत्पादन देणारे फळ म्हणून सीताफळ ओळखले जाते. सीताफळाचा हंगाम जून ते जानेवारीदरम्यान तीन बहरांत असतो. जून ते ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर, अंतिम बहार हा जानेवारी आणि फेब्रुवारीचा असतो. जून ते ऑक्टोबरचा बहर बाजारात आला असून, उत्पादन वाढीमुळे दरात घसरण झाली आहे. नाशिकमध्ये अहमदनगरमधील अकोले तालुक्यातील सर्वाधिक सीताफळ विक्रीसाठी येत आहेत. क्वालिटीनुसार सीताफळांची दर मिळत असला तरी किरकोळ बाजारात चाळीस रुपये दराने विक्री होत आहे.

सीताफळ लागवड ही शेतक-यांसाठी फायद्याची ठरते. सीताफळाला औषधे फवारणी आणि खतांसाठी फारसा खर्च नसतो. यामुळे कमी खर्चात जास्त उत्पादन मिळते. याबरोबरच बाजारात सफरचंद, पेरू, केळी, किवी, स्ट्रॉबेरी, चिक्कू यांची आवक कायम असून, दर जैसे थे आहेत. स्ट्रॉबेरी यंदा आवक थोडी कमी झाल्याने दर वाढले आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेपू, वांगे, भेंडी, टोमॅटो खाताहेत ‘भाव’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

परतीच्या पावसामुळे भाजीपाला खराब झाल्याने आवक मंदावली आहे. यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले असून, सर्वसामान्यांचे बजेटही वाढले आहे. नवीन माल बाजारात येईपर्यंत भाजीपाल्याचे दर कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. पालेभाज्यांसह फळभाज्यांचेही दर वाढले आहेत. टोमॅटो, शिमल मिरची, भेंडी, वांगे शेपू या भाज्या भाव खात आहेत.

ऑक्टोबमध्ये परतीचा पाऊस रेंगाळल्याने भाजीपाला मोठ्या प्रमाणात खराब झाला. यामुळे बाजार समितीत आवक मंदावली आहे. याशिवाय मुंबईमध्ये चांगला दर मिळत असल्याने तेथे नाशिकमधून मोठ्या प्रमाणात भाजीपाला पाठवला जात आहे. चांगली मागणी असल्याने गुजरातमध्‍येही भाजीपाला जात आहे. यामुळे स्‍थानिक बाजारातही दरवाढ झाली आहे. भेंडी सर्वाधिक भाव खात असून ६० ते ७० रुपये किलोदराने विक्री होत आहे. शिमला मिरची ५० ते ६०, वांगे ५० ते ६०, टोमॅटो ४० ते ५० किलो दराने विक्री होत आहेत. आणखी पंधरा दिवस तरी ग्राहकांनी चढ्या दरानेच भाजीपाला खरेदी करावा लागणार आहे.

पालेभाज्यांचा दरदिलासा

गेल्या आठवड्यापेक्षा भालेभाज्यांच्या दरात थोडी घसरण झाली आहे. कोथिंबीरच्या जुडीचे दर ८० ते १५० रुपयांपर्यंत गेले होते. त्यात थोडी घसरण होऊन दर ३० ते ६० रुपयांपर्यंत म्हणजे निम्म्याने कमी झाले आहेत. मात्र मेथी, शेपू व कांदापात यांचे दर जैसे थे आहेत. ‌नवीन आवक सुरू झाल्यावर दर कमी होतील. ‌शिमला मिरचीचे दर वाढले आहेत.

बाजार समिती लिलावातील दर

भाजीदर (रुपये किलो) : टोमॅटो - ४० ते ५०, वांगी- ५० ते ६०, फ्लॉवर- ३०,कोबी- ४० ते ५०, शिमला मिरची- ५० ते ६०,दुधी भोपळा- १० रु. नग, कारली-३० ते ३५, दोडका-३० ते ४०, गिलके-४०, भेंडी-६० ते ७०, गवार-५०, काकडी-३०, मिरची-४० ते ५०, कोथिंबीर-३० ते ६०, मेथी-२० ते २५,
शेपू-२० ते ३०, कांदापात-१५ ते २०

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जत्रा लिंकरोडवर कसरत

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, आडगाव

मुंबई-आग्रा महामार्गालगत असलेला जत्रा हॉटेल-नांदूर लिंकरोड हा वाहतुकीचा मुख्य केंद्र ठरत आहे. मात्र, या परिसरातील चौफुलीवर वाहतूक कोंडी नित्याची झाली असून, अपघातांची संख्या वाढत असल्याने वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. त्यामुळे येथील कॉलनीरोड आणि मुख्य वळणांवर गतिरोधक टाकण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

जत्रा लिंकरोड औरंगाबाद महामार्ग व रेल्वे स्टेशनला जोडणारा मुख्य मार्ग आहे. या रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेने एका युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवाय छोटे-मोठे अपघातदेखील रोजच होत असतात. या रस्त्यावर व्यावसायिकांचे झालेले अतिक्रमण आणि रस्त्यावर केली जाणारी बेशिस्त पार्किंग ही गंभीर समस्या आहे. त्यामुळे जाणाऱ्या-येणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावर लॉन्स आणि हॉटेल्सची संख्याही अधिक आहे. लग्नसराईत तर वाहने थेट रस्त्यावर उभी असतात. या गर्दीमुळे अपघातांची संख्या वाढत आहे.

--

या आहेत समस्या

जत्रा चौफुली येथील वाहतूक कोंडी, रस्त्यावर केली जाणारी अनधिकृत पार्किंग, चेंबरचे ढापे आणि रस्त्यांची लेव्हल योग्य नसल्याने चेंबर टाळण्याच्या नादात अपघात होतात. सर्रासपणे भरधाव वेगाने चालणाऱ्या वाहनधारकांवर काेणाचेही नियंत्रण नसल्याने अपघातांत भर पडत आहे.

--

उपाययोजना गरजेच्या

येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी, रस्त्याच्या कडेच्या अनधिकृतपणे उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करावी, कॉलनीरोड व मुख्य रस्त्यावर गरजेच्या ठिकाणी गतिरोधक टाकावेत. रस्त्यावरील चेंबर आणि खड्डे यांची दुरुस्ती करणेही गरजेचे आहे.

---

जत्रा लिंकरोडवर वाहनांचा वेग प्रचंड असतो. या ठिकाणी मोठा रहिवासी भाग आहे. त्यामुळे कॉलनीरोड मोठ्याप्रमाणात जोडले असल्याने स्थानिक नागरिकांच्या व कार्यकर्त्यांच्या मागणीनुसार गतिरोधक टाकण्यात यावेत.

-सतीश माळोदे, नागरिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कार पार्किंगमधून त्र्यंबकेश्वरला चोरी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वरच्या वाहनतळावर गाड्या फोडण्याचे सत्र सुरू असून, नगरपालिका प्रशासन सर्रास दुर्लक्ष करीत आहे. दिवाळी संपताच पर्यटकांचा त्र्यंबकडे ओघ वाढला आहे. मात्र येथील पार्किंगमध्ये चोरीच्या घटना वाढत असल्याने पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांची काच फोडून मोबाइल आणि रोकड लंपास करण्याच्या घटना दररोज घडत आहेत. बहुतांश पर्यटक जाण्याची ओढ असल्याने पोल‌िस तक्रार करीत नाहीत. तरी देखील गत आठवडयात तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत. २३ ऑक्टोबर रोजी गुजरातहून आलेले जसवाल सींग आठवाल यांच्या कारची काच फोडून तीन महागडे मोबाइल व कागदपत्र पळवून नेले आहेत. २८ ऑक्टोबरला नाशिकचे ज्ञानेश्वर नानोटे यांच्या कारमधील मोबाइल चोरीस गेला आहे. ५ नोव्हेंबरला सायंकाळी साडेसातला तवेरा गाडीतून ११ हजार रोख आणि ७० हजारांचे दागिने चोरून नेले आहेत. ग्रामस्थांच्या चर्चेनुसार सुटीच्या कालावधीत १० पेक्षा अधिक वाहनांच्या काचा फोडून मोबाइल पर्स चोरीस गेले आहे. त्र्यंबक पोल‌िसांनी तक्रार येताच धरपकड करत चोरीचा मोबाइल विकणारा आणि घेणारा अशा दोघांना अटक केली आहे. हे दोन्ही संशयीत काळी पिवळी वाहन चालक आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मजूर बनून गेले अन् कैदी घेऊन आले!

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पत्नीच्या हत्येप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठवल्यानंतर सेंट्रल जेलच्या गेटवरच पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झालेल्या आरोपीस ग्रामीण पोलिस दलाच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले. तब्बल वर्षभर पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी मजूरांच्या वेशात बैलगाडीतून जाऊन साक्री तालुक्यातून अटक केली. त्यास नाशिकरोड पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले.

वसंत पुंजाराम सोनवणे (४५ रा. भडाणे ता. सटाणा) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. २००५ मध्ये पत्नीच्या हत्येप्रकरणी त्याच्याविरुध्द सटाणा पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. मालेगाव जिल्हा व सत्र न्यायालयात खटल्याचे कामकाज पार पडले. कोर्टात सबळ पुरावे सादर झाल्याने सोनवणेस दोषी ठरवत कोर्टाने २५ ऑक्टोबर २०१६ रोजी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. कोर्टाच्या आदेशानंतर कैदी पार्टीच्या पोलिसांनी त्यास नाशिकरोड सेंट्रल जेल येथे आणले. मात्र, तुरूंगात प्रवेश करण्याची तांत्रिक प्रक्रिया सुरू असताना पोलिस कर्मचाऱ्यांची नजर चुकवून सोनवणेने धूम ठोकली होती. या प्रकरणी नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये सोनवणेविरोधात आणखी एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली. आरोपी पसार झाल्यानंतर पोलिसांनी त्याचा तपास सुरू केला. मात्र, वर्षभर पोलिसांना गुंगारा देण्यात सोनवणे यशस्वी ठरला. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक अशोक करपे यांना नुकतीच यासंबंधी महत्त्वाची मिळाली होती. वसंत सोनवणे प्रतापपूर (ता. साक्री, जि. धुळे) येथे शेतमजूर म्हणून काम करीत असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिस पथक प्रतापपूर येथे पोहचले. पोलिसांना हुलकावणी देण्यात यशस्वी ठरलेल्या सोनवणेला कोणताही संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी शेतमजुरांचे कपडे घातले. यामुळे गाफील राहिलेला आरोपी पोलिसांच्या हाती लागला.

बैलगाडीतून पोहचले पोलिस

सोनवणेला अटक करण्याची चांगली संधी मिळाल्याने पोलिसांनी अगदी विचारपूर्वक सापळा रचला. रविवारी (दि. ५) हवालदार नामदेव खैरनार, दीपक आहिरे, अशोक जगताप, सुनील पानसरे, शिपाई प्रदीप बहिरम यांनी गावातच बैलगाडीची उपलब्धता केली. अगदी शेतमजुरांची वेशभूषा करीत परिसरात वावर ठेवला. या पथकाने रात्रीच्या सुमारास आरोपी राहत असलेल्या शेतात बैलगाडीवर जाऊन त्यास अटक केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इंद्रधनुष्य’चा आजपासून दुसरा टप्पा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बालकांच्या लसीकरणासाठी विशेष मिशन इंद्रधनुष्य लसीकरण मोहिमेचा दुसरा टप्पा जिल्ह्यात ७ नोव्हेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये जिल्ह्यातील ३३७ ठिकाणी लसीकरण केले जाणार आहे. यामध्ये १५९८ लाभार्थी बालकांना आणि २२३ मातांना लसीकरण केले जाणार आहे.

इंद्रधनुष्य मोहिमेचा दुसरा टप्पा राज्यभरात राबविला जात असून, या अंतर्गत ९ जिल्हे व १३ महानगरपालिका येत आहेत. यासाठी केंद्र सरकार, युनिसेफ, जागतिक आरोग्य संघटना व राज्याचा आरोग्य विभाग यांच्या वतीने संयुक्तपणे मोहिमेची अंमलबजावणी केली जात आहे. ही

मोहीम १५ नोव्हेंबरपर्यंत चालणार असून, जन्मापासून लसीकरण न झालेली बालके यापूर्वी पूर्ण डोस न दिलेली बालके व लसीकरणापासून वंचित गरोदर मातांना लाभ मिळणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र व आशा सेविका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन वंचित माता व बालकांचे सर्वेक्षण करून यादी तयार करण्यात आली आहे. तसेच, मोहिमेच्या जनजागृतीसाठी गावांमध्ये शाळांच्या मदतीने रॅलीचे आयोजन बॅनर, पोस्टर, स्टीकर, होर्डिंग्ज व रेडिओ जिंगल्स याद्वारे प्रसिद्धी करण्यात येत आहे. या विशेष मोहिमेदरम्यान वीटभट्टी कामगार, ऊसतोड कामगार, अतिदुर्गम भाग, डोंगराळ भाग व जोखीमग्रस्त भागावर लक्ष केंद्रित केले जाणार आहे. मोहिमेत सगळयांनी सहभाग देऊन एकही बालक व माता लसीकरणापासून वंचित राहणार नाही यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वृक्षराजी अन् शहराचे असे व्हावे सौंदर्यसंवर्धन

$
0
0

दाद-फिर्याद

---

वृक्षराजी अन् शहराचे असे व्हावे सौंदर्यसंवर्धन


सुरेश देशपांडे, मटा वाचक

महापालिकेच्या क्षेत्रामध्ये जुने नाशिक, सिडको व पंचक्रोशीतील गावे समाविष्ट आहेत. शहरातून अनेक महामार्ग जातात, तसेच जेथे वस्ती तेथे रस्ते आहेत. महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाच्या अखत्यारित शहरातील सार्वजनिक क्षेत्रावरील वृक्ष, रस्त्यांच्या दुतर्फा असलेेले जुने वृक्ष, अनेक हौसिंग सोसायट्यांमधील रस्त्याच्या कडेने लावलेले वृक्ष, उद्यानांतील वृक्ष आणि अनेकांच्या बंगल्यांच्या प्रांगणात लावलेली छोटी-मोठी शोभेची, सावली देणारी, फळे देणारी झाडे, परदेशांतून आणलेली झाडे येतात.

अनेक सोसायट्यांतील वृक्षांना महापालिकेने दिलेले लोखंडी जाळीचे पिंजरे लावलेले आहेत. मात्र, अशा उंच वाढलेल्या वृक्षांकडे पाहत शहरातून फिरताना प्रामुख्याने खालील गोष्टी मला मी स्वतः सेवानिवृत्त वनाधिकारी आणि वृक्ष प्राधिकरण समितीचा माजी नियुक्त सदस्य असल्याने आढळून आल्या. त्यामुळे शहराच्या सौंदर्यवर्धनासाठी काही सूचना मला कराव्याशा वाटत आहेत. त्या अशा...

--

अ) शहरातील वृक्षांची स्थिती

-रस्त्याच्या कडेला असलेले अनेक वृक्ष लगत असलेल्या विजेच्या खांबांवरील ट्यूब-फ्लडलाइट, स्ट्रीट लाइटभोवती विस्तारलेले आहेत. त्यामुळे रस्त्यांवर हवा तसा प्रकाश पडत नाही.

-रस्त्यावर वृक्षांच्या फांद्या लांबवर पसरलेल्या असतात. त्या योग्य ठिकाणी छाटणे गरजेचे आहे.

-रस्त्याच्या कडेला उभे असलेले वृक्ष मोठे झाले, तरी त्यांना लहान असताना लावलले लोखंडी पिंजरे अजूनही काढलेले नाहीत. त्या पिंजऱ्यांचे गज-पट्ट्या वृक्षखोडात घुसून त्यांना उपसर्ग करीत असल्याची स्थिती आहे.

-पिंजरा वाकडा झाल्यामुळे त्यात लावलेली झाडे वाकडी झालेली असून, तशीच तग धरून आहेत.

-रस्त्याच्या कडेचे जुने वृक्ष निर्जिव झालेले असले, तरी त्या जागेवरच अनेक महिने कुजत उभे आहेत. त्यांना वेळेवर काढून घेऊन त्यांची विक्री करणे गरजेचे आहे.

-अनेक ट्री गार्ड रिकामे उभे आहेत. त्यात झाडे लावण्याची गरज आहे.

-रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लावले असल्यास रोड डिव्हायडरवर विजेचे दिवे उभे असणे संयुक्तिक आहे. तसे करण्याचा नियम महापालिकेने करावा.

--

ब) सुटसुटीतपणासाठी हे करायलाच हवे

-शहरातील वाहतुकीची बेटे कधी रुंद, कधी अाकुंचित केली जातात. त्यामुळे सर्व रस्त्यांच्या अभ्यास करून त्यांच्या सौंदर्यवर्धनाचा दूरगामी आराखडा करण्यात यावा. हे काम टाउनप्लॅनिंग व उद्यान विभाग यांनी एकविचाराने एकदाच करावे. त्यामुळे पैसे वाचतील व सातत्यही राहील.

-शहरातील रस्त्यांवर, चौकांत, वळणांवर कुणाही थोर, प्रख्यात व्यक्तीचे पुतळे उभारू नयेत. ते उभारल्याने त्यांच्या जयंती, पुण्यतिथीला तेथे गर्दी वाढते. वाहनांना त्यांचा त्रास होतो व कचरादेखील वाढतो.

-शहरातील सर्व पुतळे महापालिकेने सन्मानपूर्व काढून त्यांची स्थापना शहरातील उद्यानांत करावी. विविध उद्यानांत एकेक पुतळा उभारावा व त्याची देखभाल त्या परिसरातील नागरिकांनी करावी.

-शहरात अनेक चौकांत कारंजे बसविल्यास त्याला नागरिकांचे सहकार्य लाभेल. कारंजाचा खर्च महापालिका किंवा उद्योग-कंपन्यांना देण्यासाठी विनंती करावी.

-शहरात चौकाचौकांत वाढदिवस वा अन्य शुभेच्छा फलक लावलेले आढळतात. असे प्रकार करणाऱ्यांकडून परवाना फी, तसेच दंड वसूल करावा.

-सर्व मोठ्या, उंच होर्डिंग्जना सीरियल नंबर्स द्यावेत व त्यांच्या नियमावली फीचा तक्ता प्रसिद्ध करावा.

-दिशादर्शक फलकांवरील मजकुरावर कोणी जाहिरातीचा कागद चिकटवला, तर ज्याची जाहिरात केली

गेली असेल, अशा घटकांकडूनच दंड वसूल करण्यात यावा.

-शहरात अनेक फ्लायओेव्हर उभे आहेत. त्यांच्यावरून खाली उतरण्याचा व वर चढण्याचा फलक वेगळ्या रंगांत सुस्पष्ट प्रिंटिंग केलेला असावा.

-प्रत्येक रस्त्यावर महापालिकेच्या जबाबदार अधिकाऱ्यांचे फोन नंबर ठळकपणे दिसतील असे बोर्ड लावावेत.

-वाहतुकीचे नियम (सिग्नल तोडून वाहन हाकणे, चुकीच्या बाजूने वाहन नेणे) तोडणाऱ्यांवर कडक कारवाई करावी.

-स्वच्छ परिसर, डेरेदार वृक्ष, रस्ते, मैदाने यासाठी प्रयत्न करणारी मंडळे, नागरिक, सोसायट्यांना प्रोत्साहनपर बक्षिसे द्यावीत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

धार्मिक स्थळांचा तिढा वाढला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांवरील पालिकेच्या कारवाईचा त‌िढा अधिकच वाढला असून, कारवाईवरून सत्ताधारी व प्रशासन आमने-सामने आले आहे. धार्मिक स्थळांविरोधातील महापालिकेची कारवाई चुकीची असल्याचा आरोप करीत याविरोधात थेट कायदा हाती घेण्याचा इशारा हिंदुत्ववादी संघटनांनी दिला आहे. त्यामुळे आमदारांच्या उपस्थितीत महापौर रंजना भानसी यांनी आठ दिवसांत धार्मिक स्थळांचे फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश दिले. परंतु, प्रशासनाने हायकोर्टाचे आदेश असल्याचे सांगत, दोन दिवसांत काय ते पुरावे जमा करा. मात्र, कारवाई होणारच असा पवित्रा घेतला. फेरसर्वेक्षणाची मागणी प्रशासनानेच धुडकावून लावल्याने या कारवाईवरून शहरात तणावाची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

महापालिकेने २००९पूर्वीच्या धार्मिक स्थळांना कारवाईची नोटीस बजावली आहे. येत्या ८ नोव्हेंबरपासून १५० धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे आक्रमक झालेल्या धार्मिक स्थळांचे विश्वस्त, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मंगळवारी महापालिकेवर जोरदार हल्लाबोल करीत जाब विचारला. भाजप शहराध्यक्ष आमदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे यांच्या प्रमुख उपस्थितीत यावेळी महापौर रंजना भानसी, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेता दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, भाजपचे प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी आदींसह अधिकाऱ्यांची तातडीची बैठक झाली. सुप्रीम कोर्ट व हायकोर्टाच्या निर्देशांनुसारच महापालिकेने शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळांविरोधात कारवाई सुरू केल्याचा दावा अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे, उपायुक्त रोहिदास बहिरम यांनी या बैठकीत केला. मात्र, न्यायालयाच्या निर्देशांची पुरेपूर अंमलबजावणी न करता पालिकेचे अधिकारी धार्मिक स्थळांवर सरसकट हातोडा मारत असल्याचा आरोप धार्मिक स्थळांचे विश्वस्त तसेच कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. रस्त्याला अडथळा ठरत नसलेल्या तसेच १९६० पूर्वीच्या धार्मिक स्थळांनादेखील कारवाईच्या नोट‌िसा बजावण्यात आल्याने फेरसर्वेक्षण करून धार्मिक स्थळांना चुकीच्या कारवाईतून मुक्त करावे, अशी मागणी करण्यात आली. प्रशासनाच्या कार्यपद्धतीचा निषेधही संतप्त कार्यकर्त्यांकडून यावेळी करण्यात आला.

सर्वपक्षीय चर्वितचर्वण

धार्मिक स्थळांवर चुकीच्या पध्दतीने केल्या जाणाऱ्या कारवाईमुळे शहरात दंगली उसळण्याचा धोका व्यक्त करीत फेरसर्वेक्षणानंतरच पुढील कार्यवाही करण्याची सूचना आमदार देवयानी फरांदे यांनी केली. यावेळी लोकांच्या आस्था, विश्वासाला तडा जाऊ नये यासाठी न्यायालयीन आदेशांचा सन्मान राखून या प्रश्नावर तोडगा काढला जावा, अशी सूचना दिगंबर आखाड्याचे महंत शास्त्रीजी व महंत भक्तिचरणदास महाराज यांनी केली. रस्त्याला अडथळा न ठरणाऱ्या धार्मिक स्थळांवरील कारवाई निषेधार्ह असल्याने नमूद करीत आमदार सानप यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दहा दिवसांत फेरसर्वेक्षण करण्याची सूचना केली. मनसे गटनेते सलीम शेख यांनी प्रशासनाची कारवाई चुकीची असल्याचे दाखले देत न्यायालयाच्या आदेशाचा चुकीचा अर्थ लावल्याचा आरोप केला. राष्ट्रवादीचे गटनेते गजानन शेलार, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे, हिंदू एकता आंदोलन पक्षाचे रामसिंग बावरी, नंदन भास्करे, आदींनी भूमिका मांडल्या. चर्चेअंती महापौर भानसी यांनी धार्मिक स्थळांच्या बाबतीत राजकारण न करता फेरसर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. फेरसर्वेक्षण करताना न्यायालयाकडून वेळ मागून घ्यावा तसेच स्थानिक नगरसेवक, धार्मिक स्थळांचे विश्वस्त आणि कार्यकर्त्यांची समिती नियुक्त करून हे सर्वेक्षण केले जावे, असे आदेशही महापौरांनी दिलेत.

प्रभारी आयुक्तांची भेट

यानंतर या पदाधिकाऱ्यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी आयुक्त तथा जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी. यांची भेट घेतली. मात्र सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार कारवाई क्रमप्राप्त असल्याचे नमूद करत १९६०पूर्वीच्या धार्मिक स्थळांचे पुरावे सादर केल्यास कारवाईतून ती धार्मिक स्थळे वगळण्याचे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. तसेच ही कारवाई दोन दिवसाच्या आत करा, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यामुळे फेरसर्वेक्षण होण्याची शक्यता कमीच असून, कारवाई अटळ मानली जात आहे.

विश्वस्तांचे आक्षेप

धार्मिक स्थळांचे सर्वेक्षणच चुकीच्या पद्धतीने

लोकमान्य धार्मिक स्थळांवरही कारवाई

कारवाईपूर्वी निर्णयाची प्रसिद्धी नाही

१९६० पूर्वीच्या धार्मिक स्थळांनाही नोट‌िसा

नोट‌िसा चिकटवताना त्यावर तारीख नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘जिल्हा परिषदेचा निधी अन्यत्र वर्ग करू नका’

$
0
0

म. टा. प्रत‌निधी, नाशिक

जिल्हा परिषदेच्या हक्काचा सुमारे २७ कोटींचा निधी जलयुक्त शिवार योजनेसाठी वर्ग करण्याच्या हालचाली जिल्हाधिकारी कार्यालयाने सुरू केल्यामुळे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी खडबडून जागे झाले आहेत. जिल्हा परिषदेचा हा निधी इतरत्र वर्ग करू नये, अशी आग्रही मागणी या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने सोमवारी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांची भेट घेतली. या भेटीमध्ये जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे आदिवासी उपाययोजनेतील २७०२ लेखाशिर्षकातंर्गत मंजूर २७ कोटींच्या निधीबाबत चर्चा करण्यात आली. मंजूर झालेला निधी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जलयुक्तसाठी वर्ग केला जात असल्याची माहिती आम्हाला मिळाल्याचे या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले. हा जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा निधी आहे. त्यांना विश्वासात न घेताच तो परस्पर वर्ग केल्यास आदिवासींवर अन्याय होईल, अशी भावना यावेळी काही सदस्यांनी व्यक्त केली. तसेच हा निधी वर्ग करू नये, अशी विनंतीही पदाधिकाऱ्यांनी केली. हा निधी जलयुक्त शिवारसाठी वर्ग करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून त्यांना देण्यात आली. निधी वर्ग करण्याबाबत जिल्हा परिषदेशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आल्याचे पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. शिष्टमंडळात उपाध्यक्षा नयना गावित, सभापती सुनीता चारोस्कर, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, धनराज महाले, दीपक शिरसाठ, उदय जाधव आदींचा समावेश होता.

निधी वर्गप्रकरणी लवकरच बैठक

नाशिक : जिल्हा परिषदेकडील लघू पाटबंधारे आदिवासी उपाययोजनेतील मंजूर निधी इतरत्र वर्ग करू नये, यासाठी जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांची भेट घेतली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी पुढच्या आठवड्यात या विषयावर बैठक घेऊ, असे पदाधिकाऱ्यांना सांगितले. जिल्हा परिषदेकडील लघू पाटबंधारे विभागाच्या ० ते १०० हेक्टर क्षमतेच्या आतील कामे करण्याबाबत शासनाचे आदेश आहेत. नाशिक जिल्हा परिषदेला २०१७-१८ या आर्थिक वर्षात आदिवासी उपाययोजने अंतर्गत सिमेंट प्लग बंधारे बांधण्यासाठी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. सदरचा निधी जलयुक्त शिवार योजनेंतर्गत वर्ग करण्याची चर्चा आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बेळेंचा अर्ज कोर्टाने फेटाळला

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना फेर मतमोजणीचा अधिकार नसल्याने त्यांना मनाई करावी, अशा आशयाचा धनंजय बेळे यांनी न्यायालयात केलेला अर्ज तिसरे दिवाणी सह न्यायाधीश एस. एस. सस्ते यांनी फेटाळून लावला. त्यामुळे धनंजय बेळे आणि भालचंद्र वाघ यांच्यात फेरमतमोजणी करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, आज मंगळवार दि. ७ रोजी सकाळी ८ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार, टिळकपथ येथे फेरमतमोजणी करण्यात येणार आहे.

सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेची पंचवार्षिक निवडणुकीची मतमोजणी ३ एप्रिल रोजी झाली होती. यावेळी १५ व्या क्रमांकाची मते मिळालेले धनंजय बेळे आणि १६ व्या क्रमांकाची मते मिळालेले भालचंद्र वाघ यांच्या मतांमध्ये केवळ एका मताचा फरक असल्याने भालचंद्र वाघ यांनी फेरमतमोजणी घ्यावी, असा अर्ज मतमोजणी झाल्यानंतर रात्री ९.३० वाजता निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्याकडे दिला होता. या अर्जानुसार ७ एप्रिल रोजी फेरमतमोजणी आयोजित करण्यात आली होती. परंतु, दोघा उमेदवारांना एक महिन्याचा कालावधी देण्यात यावा म्हणून एक महिना फेरमतमोजणी स्थगित करण्यात आली होती.

दरम्यान, बेळे यांनी फेरमतमोजणीला आव्हान देणारा अर्ज मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त, नाशिक यांच्याकडे दाखल केला होता. फेरमतमोजणी हा निवडणूक प्रक्रियेचाच एक भाग असल्याने आणि मुंबई विश्वस्त व्यवस्था अधिनियम, कलम ४१ अ, अन्वये निवडणूक विषयक निर्देश देण्याची तरतूद नसल्याने सहाय्यक धर्मादाय आयुक्त पंडित यांनी १२ ऑक्टोबर रोजी तो अर्ज फेटाळून लावला होता. या पार्श्वभूमीवर दि. ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता फेरमतमोजणी सुरू करण्यात आली. मात्र, बेळे यांनी नाशिक न्यायालयात दावा दाखल केला. या दाव्याची सुनावणी सुरू असल्याने दुपारी १२.२० च्या सुमारास न्यायालयाच्या निर्देशांनुसार फेरमतमोजणीचे काम थांबविण्यात आले होते. त्या दाव्याला दोन तारखा पडून सोमवारी सुनावणी होऊन बेळे यांचा अर्ज फेटाळण्यात आला.

धनंजय बेळे यांनी केलेल्या निवडणूक अर्जामध्ये सार्वजनिक वाचनालयाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली असल्याने निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना निवडणूक विषयक कोणतेही अधिकारी नसल्याने त्यांना फेरमतमोजणी करण्यास प्रतिबंध करावा अशी मागणी केली होती. या अर्जावर न्यायालयाने तात्पुरता मनाई हुकुम दिला होता आणि हा अर्ज कायदेशीर दृष्ट्या कसा योग्य आहे, हे न्यायालयास युक्त‌िवादात सांगावे असे निर्देश सस्ते यांनी दिले होते. त्यानुसार २ नोव्हेंबर रोजी बेळे यांच्या वतीने अॅड. विनयराज तळेकर, निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांच्यावतीने अॅड. विलास लोणारी, भालचंद्र वाघ यांच्या वतीने अॅड. दौलतराव घुमरे आणि अध्यक्ष, सावाना यांच्या वतीने अॅड. अतुल गर्गे यांनी युक्त‌िवाद केला. अॅड. विनयराज तळेकर यांनी युक्त‌िवादात सांगितले की, या प्रकरणात नजरचुकीने निवडणूक अर्ज असे संबोधण्यात आले असून, तो नियमित दावा समजून नोंदविण्यात यावा. यासंबंधीत दोन्ही बाबींची चौकशी होऊन तो निवडणूक अर्ज दिवाणी दावा होऊ शकत नाही आणि निवडणुकीसंबंधी निवडणूक अर्जात केलेल्या मागण्या निवडणूक प्रक्रिया संपलेली नसल्यामुळे फेरमतमोजणी स्थगित करण्याचा अर्ज कायदेशीर होऊ शकत नसल्याने तो अर्ज फेटाळण्यात येत असल्याचा निर्णय दिवाणी सह न्यायाधिश सस्ते यांनी दिला. या पार्श्वभूमीवर सावाना निवडणूक फेर मतमोजणीचा मार्ग मोकळा झाला आहे. मंगळवार दि. ७ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ वाजता मु. शं. औरंगाबादकर सभागृह, सावाना आवार टिळकपथ, नाशिक येथे फेरमतमोजणी करण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वाळूमाफियांचा तलाठ्यावर हल्ला

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वाळूवाहतूक रोखली म्हणून पाच जणांनी वडनेर दुमाला येथील तलाठ्यावर प्राणघातक हल्ला केल्याची घटना सोमवारी सकाळी भाभानगर परिसरातील नागझी चौकात घडली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन हल्लेखोरांची नावे निष्पन्न झाली आहेत. या प्रकरणी तलाठी यादव विठ्ठल बच्छाव (वय ३७, रा. फ्लॅट क्रमांक ११, प्रथम अपार्टमेंट, अशोकामार्ग) यांनी तक्रार दिली आहे.

बच्छाव सोमवारी सकाळी काही कामानिमित्त नागझी चौकात आले होते. त्यांचा पाठलाग करीत आलेले अल्तसम शेख, झिया शेख आणि त्यांच्या तीन- चार साथीदारांनी अचानक बच्छाव यांच्यावर हल्ला चढवला. वाळू तस्करीबाबत सतत आमच्याच वाहनांवर कारवाई का करतो, अशी विचारणा करीत हल्लेखोरांनी हल्ला केल्याचे बच्छाव यांनी पोलिसांना सांगितले. या हल्ल्यानंतर संशयित पसार झाले. बच्छाव यांना प्रदीप तांबे यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धाव घेऊन बच्छाव यांच्या प्रकृतीची चौकशी केली. काही दिवसांपूर्वीच तलाठी बच्छाव यांनी संशयित आरोपींची वाहने पकडून कारवाई केली होती. याचाच राग मनात धरून पूर्वनियोजित हल्ला करण्यात आला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. दरम्यान या प्रकरणी मुंबई नाका पोलिस स्टेशनमध्ये अल्तमस शेख आणि झिया शेख यांच्यासह त्यांच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.

हल्लेखोरांचा तपास सुरू

संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली असून, लवकरच त्यांना अटक करण्यात येईल. वाहनांवर झालेल्या कारवाईमुळे हल्ला झाल्याचे बच्छाव यांनी सांगितले असून, हल्लेखोरांचा माग काढण्यात येतो आहे.

- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त

उत्पादन शुल्क कर्मचाऱ्यावर हल्ला

निफाड ः खेरवाडी येथे अवैध दारू विक्री तपासणी करण्यासाठी आलेले उत्पादन शुल्क कर्मचारी दीपक नेमणगर यांच्यावर सोमवारी दुपारी दगडांचा मारा केल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गोदाकाठ भागात अवैध दारू विक्रीने उच्छाद मांडला असून, आठवड्यापूर्वीच या भागातील सर्वपक्षीय सरपंच व नागरिकांनी उपोषण केले होते. उत्पादन शुल्क विभागाचे कर्मचारी नेमणगर खेरवाडी येथे आले असताना त्यांच्यावर आवारे यांच्या घराजवळ दगडांचा मारा झाला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images