Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

मंत्री महाजनांच्या प्रतिमेला शेण फासले

0
0

राष्ट्रवादी महिला काँग्रेसकडून निषेध

म. टा. वृत्तसेवा, धुळे

दारूला महिलांचे नाव दिले तर अधिक खप होईल, असे जाहीर सभेत व्यक्तव्य करून महिलांचा अवमान करणारे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचा धुळे जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेसने तीव्र शब्दांत निषेध केला आहे. सोमवारी (दि. ६) शहरातील महाराणा प्रताप चौकात मंत्री महाजन यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला शेण लावून चपलांचा मारा महिलांनी दिला.

नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडा सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्रमात मंत्री महाजन भाषण करताना, साखर कारखान्यांनी उत्पादित केलेल्या दारूच्या ब्रॅन्डला महिलांचे नाव दिल्यास त्याचा जास्त खप होईल, असा उघड सल्ला दिला होता. त्यामुळे महिलांविषयी असे बेताल वक्तव्य करून मंत्री महाजन यांनी महिला वर्गाचा अवमान केला आहे. त्यामुळे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मंत्री गिरीश महाजन यांच्या प्रतिकात्मक फोटोला शेण लावून चपला मारण्यात आल्या. या वेळी राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा ज्योती पावरा, प्रियंका पाटील, सुमित्रा चौधरी, राधिका ठाकूर, भारती पवार, वंदना पाटील, सुवर्णा बेहरे, मालती पाडवी, इंदूबाई वाघ उपस्थित होत्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नवीन गाळ्यांप्रश्नी तोडगा नाहीच

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीतील सेल हॉलच्या जागेत नवीन गाळे तयार करून ते जास्तीत जास्त व्यापाऱ्यांना खुले करून देण्याचा बाजार समितीचा विचार आहे. मात्र, अपुरी जागा आणि वाढीव भाडेपट्टी यामुळे हे गाळे घेण्यास व्यापारी तयार नाहीत. सोमवारी (दि. ६) रोजी बाजार समिती संचालक आणि व्यापारी यांच्यात बैठक घेण्यात आली. या बैठकीत तोडगा निघाला नसल्याने व्यापाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दिंडोरीरोडवरील भाजीपाल्याच्या खरेदी-विक्रीचे व्यवहार होणाऱ्या मार्केटमध्ये १२ बाय २५ फूट आकाराचे गाळे उपलब्ध करून देण्यात येणार असून, एका गाळ्याला १५ हजार रुपये भाडे आकारण्यात येणार असल्याचे बाजार समितीने ठरविले आणि बाजार समितीतील व्यापाऱ्यांना तशा नोटिसा पाठविल्या. त्यानंतर काही गाळे सील करण्यात आले होते. तेव्हा व्यापाऱ्यांनी दुपारचे लिलाव बंद पाडले होते. त्यानंतरही या विषयावर काहीच तोडगा निघाला नाही. यावर चर्चा करण्यासाठी सभापती शिवाजी चुंभळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतही ठोस निर्णय झाला नाही.

या बैठकीत गाळ्याचा आकार कायम ठेवून भाडे १२ हजार रुपये करण्यात येईल, त्यामुळे बाजार समितीचा महसूल वाढेल, असे चुंभळे यांनी सांगितले. मोठ्या प्रमाणात भाजीपाला खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांना या गाळ्यांची जागा कमी पडेल, त्यांना जास्त गाळे घ्यावे लागणार आहेत. त्यामुळे गाळ्यांचे भाडे ७ हजार रुपये ठेवावे, अशी मागणी त्यांनी केली. संचालक मंडळाने ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. कोणताही ठोस निर्णय या बैठकीत घेण्यात आला नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आमदार निधीचा फुटेना भोपळा!

0
0

१५ पैकी १२ आमदार उदासीन; चव्हाण, गावित, वाजे खर्चात आघाडीवर

नाशिक : शासनाच्या विविध योजनांमधून मतदारसंघाच्या विकासासाठी जिल्ह्यातील आमदारांनी निधी खर्चात आघाडी घेतली असली तरी हक्काच्या आमदार निधीच्या खर्चात मात्र उदासीनता दाखवली आहे. जिल्ह्यातील पंधरा आमदारांना प्रत्येक दोन कोटी याप्रमाणे ३० कोटी रुपयांचे वितरणही झाले आहे. प्रत्यक्षात ऑक्टोबर अखेरपर्यंत यातील केवळ पाच कोटी ७२ लाखांचाच खर्च झाला आहे. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी सात महिन्यांत आपला शंभर टक्के निधी खर्च केला आहे. सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, इगतपुरीच्या निर्मला गावित यांनी ५० टक्के निधी खर्च केला आहे. अन्य बारा आमदारांनी मात्र निधी खर्चात उदासीनता दाखवली आहे. माजी मंत्री छगन भुजबळ, पंकज भुजबळ, अनिल कदम, डॉ. राहुल आहेर यांच्या खाती अद्यापही भोपळा असल्याचे नियोजन विभगाच्या आकडेवारी दिसून येत आहे.

राज्यातील आमदारांना आपल्या मतदारसंघातील विविध विकासकामांसाठी दरवर्षी दोन कोटींचा निधी दिला जातो. या विकास निधीतून मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा योजना, शाळा दुरुस्ती, आरोग्य सुविधांवर खर्च केला जातो. मतदारसंघातील नागरिकांच्या मागणीनुसार या आमदार निधीच्या खर्चासाठी आमदारांकडून कामे सुचवल्यानंतर नियोजन विभागाकडून निधी खर्चाबाबत पाठपुरावा केला जातो. यंदाही जिल्ह्यातील पंधरा आमदारांना प्रत्येकी दोन कोटी याप्रमाणे ३० कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यात आला आहे. सात महिन्यांत जिल्ह्यातील पंधरापैकी तीनच आमदारांनी आमदार निधी वापरात आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे बागलणाच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी सात महिन्यांतच आपला संपूर्ण निधी खर्ची पाडला आहे. त्या पाठोपाठ इगतपुरीच्या निर्मला गावित यांनी एक कोटी १९ लाख, तर सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे यांनी एक कोटी तीन लाखांचा निधी वापरला आहे. दीड वर्षांपासून छगन भुजबळ हे कारागृहात आहेत. त्यामुळे माजंरपाडासाठी कारागृहातूनच प्रयत्न करणाऱ्या भुजबळांचा आमदार निधी खर्चात अडचणी येत असून, पुत्र पंकज भुजबळ यांच्या खात्यावर खर्चाचा भोपळाच आहे.

युतीचे आमदारही पिछाडीवर

राष्ट्रवादी व काँग्रेसच्या महिला आमदारांनी खर्चात बाजी मारली असताना सत्तारुढ युतीचे आमदार मात्र पिछाडीवर आहेत. शिवसेनेचे ग्रामविकास मंत्री दादा भुसे यांनी आतापर्यंत केवळ पाच लाखांचाच खर्च केला आहे. मंत्रिपदावर असतानाही त्यांना आपला निधी खर्च करता येत नसल्याचे चित्र आहे. निफाडचे आमदार अनिल कदम यांच्याही खात्यावर भोपळाच असून, देवळा-चांदवडचे डॉ. राहुल आहेर यांच्यासारख्या अभ्यासू आमदाराचीही तीच गत आहे. शहरातील आमदार बाळासाहेब सानप, सीमा हिरे, योगेश घोलप, देवयानी फरांदे यासुद्धा खर्चाबाबतीत पिछाडीवर आहेत. शहरातील चारही आमदारांनी मिळून आठ कोटींपैकी एकच कोटी खर्च केले आहेत.

पाच महिने शिल्लक

आमदारांना हा निधी वर्षभरासाठी दिला जातो. त्यामुळे उर्वरित आमदारांना निधी खर्चासाठी अजूनही पाच महिन्यांचा कालावधी शिल्लक आहे. आमदारांनी सुचवलेली कामे मंजूर होऊन निविदा प्रक्रिया तसेच प्रशासकीय बाबींसाठी जवळपास दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो. त्यामुळे या आमदारांजवळ कमी वेळ शिल्लक आहे. यातील काही आमदारांनी कामे सुचवली असून, ती पाइपलाइनमध्ये आहेत. त्यामुळे पुढील तीन महिन्यांतच शिल्लक निधी खर्चासाठी आमदारांना घाई करावी लागणार आहे. नाहीतर हा निधी परत जाण्याचाही धोका आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘महाखादी’ यात्रा शनिवारी नाशकात

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

खादी उत्पादनांचा प्रचार व प्रसारासाठी राजभवन मुंबई ते राजभवन नागपूर अशी २१ जिल्ह्यांतून मार्गक्रमण करणारी ‘महाखादी’ यात्रा नाशिक येथील हुतात्मा स्मारक येथे ११ ते १३ नोव्हेंबर दरम्यान सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत नागरिकांसाठी खुली राहणार आहे.

खादी व ग्रामीण उद्योजकांना प्रोत्साहन देणेसाठी महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ यांचामार्फत ‘महाखादी’ यात्रेचे आयोजन करण्यात आले असून, यात्रेचा शुभारंभ राज्यपाल विद्यासागर राव यांच्या हस्ते नऊ ऑक्टोबर रोजी राजभवन येथे झाला. खादी उद्योजकांना बाजारपेठ मिळावी व ग्रामीण भागातील उद्योग वाढून रोजगार निर्मिती व्हावी यासाठी ‘महाखादी’ हा ब्रॅण्ड विकसित करण्यात आला आहे. यात्रेत खादी, मध तसेच ग्रामीण भागातील ग्रामोद्योगी कारागिरांनी तयार केलेली विविध प्रकारची उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तसेच चरख्यापासून सूत तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील शैक्षणिक संस्थांनी विद्यार्थ्यांना ग्रामीण व्यवसायाची ओळख होण्यासाठी यात्रेस भेट देण्यासाठी पाठवावे.

- रमेश सुरुंग, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ब्लॅक स्पॉटवर वॉच

0
0

आरोग्य सभापतींचे सीसीटीव्ही बसविण्याचे आदेश

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

शहरातील कचऱ्याचे ब्लॅक स्पॉट कायमस्वरूपी बंद करण्यासाठी आरोग्य विभागाने आता नामी उपाय शोधला आहे. ज्या ठिकाणी कचऱ्याचे ब्लॅक असतील, त्या प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची कार्यवाही आरोग्य विभागाने तत्काळ करावी, असे आदेश आरोग्य व वैद्यकीय सभापती सतीश कुलकर्णी यांनी दिले आहेत. भारत प्रतिभूती मुद्रणालयाकडून (आयएसपी) स्वच्छतेचे आदेश पाळले जात नसतील, तर संबंधितांना नोटिसा देऊन तत्काळ कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

मनपाच्या आरोग्य व वैद्यकीय समितीची सभा सभापती सतीश कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी झाली. या सभेत नेहमीप्रमाणे आरोग्याच्या प्रश्नावर सदस्यांनी आक्रमक होत, डेंग्यू, स्वाइन फ्लूसारख्या आजारांच्या प्रश्नांवरून अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या बैठकीत सदस्य अंबादास पगारे यांनी प्रभागात मोठ्या प्रमाणावर डेंग्यूची साथ सुरू असून, प्रशासनाच्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधले. इंडियन सिक्युरिटी प्रेसला दोन वेळा आरोग्य विभागाने पत्र देऊनही त्यांच्याकडून स्वच्छतेविषयीची दखल घेतली जात नाही. यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढत असल्याचा आरोप त्यांनी केला. डॉ. गायकवाड यांनी संबंधित व्यवस्थापनाला पत्र देऊनही आत जाण्याची परवानगी दिली जात असल्याचे सांगितले. त्यावर संबंधित व्यवस्थापन दाद देत नसेल, तर थेट कारवाई का करण्यात येऊ नये, अशी नोटीस बजावण्याचे आदेश सभापतींनी यावेळी दिले.

डेंग्यू व स्वाइन फ्लूवरून सदस्यांनी डॉक्टरांकडून लूट केली जात असल्याचे सांगत आरोग्य विभाग फवारणी करीत नसल्याचा आरोप केला. खासगी डॉक्टर आणि लॅबकडून रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांची फसवणूक केली जात असल्याचे सदस्य पगारे यांनी निदर्शनास आणून दिले. यावेळी त्यांनी एकाच रुग्णाचे दोन वेगवेगळ्या लॅबकडून आलेला अहवाल सभेत मांडला. लॅब आणि खासगी डॉक्टरांकडून रुग्णांची फसवणूक करून केवळ पैसे उकळण्याचे काम सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. यावर सभापती कुलकर्णी यांनी संबंधित लॅबवर कारवाई करण्यात येऊन खासगी रुग्णालयाकडून रुग्णांची फसवणूक होत असल्यास कारवाई करण्याचे आदेश प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांना दिले. दीपालीनगर, मातोश्रीनगरसह परिसरात अनियमित घंटागाडी येत असल्याची तक्रार सदस्या रुपाली निकुळे यांनी केली. यामुळेच अनियमितपणा वाढत असून, नगरसेवकांच्या तक्रारी आल्यास अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरले जाईल, असे सभापती कुलकर्णी यांनी सांगितले.

सहाही विभागीय स्वच्छता निरीक्षकांकडून ब्लॅक स्पॉटसंदर्भातील आढावा घेण्यात येऊन संबंधित ब्लॅक स्पॉटवर सीसीटीव्ही लावण्याचे आदेश सभापतींनी आरोग्य विभागाला यावेळी दिले.

फॉगिंगच्या नावाने बोंबा!

शहरात सर्वत्र डेंग्यू आजाराने थैमान घातले असून, धूर फवारणीचा काहीच उपयोग होत नसल्याचा आरोप किरण गामणे, शांताबाई हिरे, अंबादास पगारे, रंजना बोराडे यांनी केला. आठ-आठ दिवस औषध व धूर फवारणी होत नसल्याचे त्यांनी सांगितले. धूर फवारणीची केवळ शोबाजी होत असेल तर महापालिकेचा पैसा कशासाठी वाया घालवायचा असा प्रश्‍न सदस्यांनी उपस्थित केला. विभागीय स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरीक्षकांनी दररोज आपापल्या कार्यक्षेत्रातील एका प्रभागातील स्वच्छतेची पाहणी करून तसेच, नगरसेवकांना भेटून अहवाल सादर करण्याचे आदेश सभापतींनी दिले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मटा’तर्फे सिझलर मेकिंग वर्कशॉप

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स आपल्या वाचकांसाठी नेहमीच विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत असते. येत्या शनिवारी म्हणजेच ११ नोव्हेंबर रोजी कल्चर क्लबतर्फे सिझलर मेकिंग वर्कशॉपचे आयोजन करण्यात आले आहे. हे वर्कशॉप अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था, पी. अँड टी. कॉलनी, त्र्यंबक रोड या ठिकाणी होणार आहे.

अबालवृद्धांमध्ये लोकप्रिय झालेला पदार्थ म्हणजे सिझलर. हॉटेलमध्ये मिळणारे सिझलर आपल्यालाही बनविता आले पाहिजे, असे अनेकांना वाटते. येत्या शनिवारी दुपारी तीन वाजता होणाऱ्या वर्कशॉपमध्ये सहभागी झालेल्यांना सिझलरचे वेगवेगळे प्रकार शिकायला मिळणार आहेत. यात प्रामुख्याने चाट सिझलर, इटालियन सिझलर, मेक्सिकन सिझलर असे प्रकार शिकवले जाणार आहे. वंदना साधवानी या सिझलर्सचे विविध प्रकार शिकवणार आहेत. या वर्कशॉपसाठी रजिस्ट्रेशन आवश्यक आहे. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब मेंबरसाठी १०० रुपये, तर जे मेंबर नाहीत त्यांच्यासाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'सरकारने दाखविले विकासाचे गाजर'

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

राज्यातील भाजप सरकारला तीन वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. मात्र या तीन वर्षांत सरकारने फक्त घोषणाबाजी आणि आश्वासने देत जनतेला विकासाचे गाजर दाखविले आहे,असा आरोप धुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून करण्यात आला.

सोमवारी (दि. ६) राज्य सरकारने जनतेला दाखविलेल्या विकासाच्या गाजरचा निषेध करण्यात आला. यावेळी सरकारचा निषेध करीत राष्ट्रवादी युवक काँग्रेसने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गाजर आंदोलन केले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे मुखवटे लावत हातात गाजर धरून आंदोलन केले. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रणजित भोसले, प्रदेश सरचिटणीस सत्यजित सिसोदे, कुणाल पवार, महेंद्र शिरसाठ, कमलाकर गर्दे, मयूर ठाकरे, भटू पाटील, विनोद बच्छाव, सागर पाटील, कृष्णा गवळी, बंटी भदाणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दलितांना सैन्यात अारक्षण मिळावे

0
0

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आठवलेंची मागणी

म. टा. वृत्तसेवा, धुळे

आम्हाला देशाच्या सीमेवर लढायला पाठवा आम्ही पाकिस्तानला वठणीवर आणल्याशिवाय परतणार नाहीत. अपघातात आणि हृदयविकाराने मरण्यापेक्षा देशाचे संरक्षण करताना आलेले मरण चांगले आहे. यासाठी दलितांना सैन्यात अारक्षण मिळाले पाहिजे, अशी मागणी पुन्हा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केली. सोमवारी (दि. ६) ते धुळे जिल्हा क्रीडा संकूल येथे आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते.

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालयांतर्गत राष्ट्रीय वयोश्री योजना, एडीप योजनेंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने जिल्हा क्रीडा संकुलात सोमवारी सकाळी जिल्ह्यातील दिव्यांगाना व्हीलचेअर, बैसाखी, ऐकू येण्याचे मशिन, टेट्रापॉड, ट्राइपॉड, वॉकिंग स्टिक, चष्मे, बत्तिशी आदी कृत्रिम साहित्य मोफत वाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे, जिपचे अध्यक्ष शिवाजीराव दहिते, खासदार डॉ. हीना गावित, समाजकल्याण सभापती मधुकर गर्दे, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे उपस्थित होते.

रिपाईचा ८ नोव्हेंबरला 'व्हाइट-मनी डे'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी विमुद्रीकरण जाहीर केले होते. त्यानंतर जनतेला थोडाफार त्रास सहन करावा लागला. परंतु, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनेत सांगितल्यानुसार दर दहा वर्षांनी विमुद्रीकरण होणे आवश्यक आहे. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या विमुद्रीकरणाला आमचा पाठिंबा असून, काँग्रेसकडून काळा दिवसाला आमचा विरोध आहे. रिपाईतर्फे यादिवशी 'व्हाइट-मनी डे' साजरा केला जाणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. माझे हार्दिक पटेलला खुले आवाहन आहे की, पाटीदार समाजाला न्याय आम्ही मिळवून देऊ. तेथे मी मध्यथी करण्यास तयार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले. काँग्रेसचे उपाध्यक्ष राहूल गांधी यांनी निष्फळ हवा पसरविण्याचे काम चालविले असून, येत्या डिसेंबर महिन्यात गुजरात निवडणुकीच्या निकालानंतर चित्र स्पष्ट होईल. तसेच २०१९ च्या लोकसभा निवडणुकीची आम्हाला चिंता नाही, असेही मंत्री आठवले यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


उमंग अॅपचा ‘पीएफ’धारकांना सहारा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

केंद्र शासनाच्या भविष्यनिर्वाह निधी कार्यालयाने ‘पीएफ’धारकांसाठी घरबसल्या माहिती मिळण्याची व्यवस्था केली आहे. ‘पीएफ’धारकांनी उमंग अॅप आपल्या मोबाइलमध्ये डाऊनलोड केल्यावर आपल्या खात्यातील माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे.

‘पीएफ’धारकांसाठी सुविधा उपलब्ध करतानाच पेन्शनधारकांनी हयातीचा दाखला पीएफ कार्यालयात अथवा सर्वसामान्य सुविधा केंद्रात जमा करण्याचे आवाहन ‘पीएफ’चे क्षेत्रीय आयुक्त अर्शख खान यांनी केले आहे. पीएफ भरणाऱ्यांना अनेकदा घरगुती कामासाठी पैशाची गरज भासत असते. परंतु, स्वतःच्या मालकीचे असलेले पैसै काढण्यासाठी भविष्यनिर्वाह निधी कार्यालयात फेऱ्या मारण्याची वेळ कामगारांवर येत असते. यावर उपाय म्हणून ‘पीएफ’ने उमंग अॅपची अभिनव योजना आणली आहे. ‘पीएफ’धारकांनी त्यांच्या मोबाइलमध्ये उमंग अॅप डाऊनलोड केल्यास त्यांच्या खात्यावरील माहिती तात्काळ उपलब्ध होणार आहे. उमंग अॅप डाऊनलोड करताना ‘पीएफ’धारकांनी त्यांची वैयक्तिक माहिती, तसेच आधार कार्ड लिंक करण्याची गरज असल्याचे खान यांनी पत्रकारांना सांगितले.

--

तालुका स्तरांवर सेवा केंद्रे

दरम्यान, पेन्शनधारकांना हयातीचा दाखल देण्यासाठी नाशिक विभागात व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्यांमध्येही ‘पीएफ’च्या कामासाठी लागणारी सुविधा केंद्रे उभारण्यात आली आहेत. त्याचप्रमाणे तालुका स्तरावरही पेन्शनधारकांनी त्यांचा हयातीचा दाखला जमा करावा, असे आवाहन खान यांनी केले आहे. सर्वसामान्य सुविधा केंद्रांची उभारणी नाशिक विभागातील जळगाव, धुळे, नंदुरबार व अहमदनगर येथे करण्यात आली आहे. त्यांचा लाभ ‘पीएफ’धारकांनी घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

--

पेन्शनधारकांना अनेक बाबींसाठी पीएफ कार्यालयाच्या फेऱ्या माराव्या लागतात. याकरिता नाशिक विभागात अनेक ठिकाणी सर्वसामान्य सुविधा केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. उमंग अॅप डाऊनलोड केल्यास तात्काळ पीएफची माहिती पेन्शनधारकांना जागेवरच मिळणार आहे. याकरिता केवायसी करणे गरजेचे आहे.

-अर्शद खान, क्षेत्रीय आयुक्त, भविष्यनिर्वाह निधी, नाशिक विभाग

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नर रस्त्यावर लवकरच टोल

0
0

नाशिकरोड-सिन्नर रस्त्याचे काम ८० टक्के पूर्ण

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिकरोड ते सिन्नर या महामार्गाचे ८० टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाल्यामुळे महिनाभरात या महामार्गावरील टोल नाका सुरू होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने जोरदार तयारी केली असून, टोल नाक्याचे कामही अंतिम टप्प्यात आले आहे.

नाशिकरोड ते सिन्नर या महामार्गावर या अगोदर ९.५ किलोमीटरचा सिन्नर बायपास तयार करण्यात आला आहे. हा बायपास वाहतुकीसाठी पूर्णतः खुला करण्यात आला आहे. त्यानंतर नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर ते खेड हा १३७ किलोमीटरचा मार्ग या अगोदरच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. त्यामुळे रटाळवाणा वाटणारा नाशिक-पुणे रस्तेप्रवास सुखद होणार आहे. यामुळे या रस्त्यावर खर्च होणारा सहा तासांचा वेळ आता अर्ध्यावर येणार आहे.

नाशिकरोड-सिन्नर रस्त्यावरील दारणा पुलापासून नाशिकरोडच्या रेल्वे ओव्हरब्रीजपर्यंत असलेल्या २.३ कि.मी रस्त्याचे काम बाकी आहे. न्यायालयात या विरोधात दावा
असल्यामुळे हे काम रखडले आहे. त्याचा अंतिम निकाल १५ नोव्हेंबरला लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर हा रस्ता केला जाणार आहे. त्याचप्रमाणे शिंदे गावाजवळील उड्डाणपुलाचेही काम रखडले होते. पण गावकऱ्यांनी या पुलाविरोधात घेतलेली हरकत मागे घेतल्यामुळे या पुलाचे काम सुरू झाले असून, ते चार महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे. या रस्त्यावरील दारणा नदीवरील बांधलेल्या नव्या पुलावरही एक मार्ग येत्या दोन तीन दिवसांत सुरू करण्यात येणार आहे.

वाहतूक कोंडी फुटणार

गेल्या काही वर्षांपासून या रस्त्याचे काम सुरू असल्यामुळे ठिकठिकाणी वाहतुकीची कोंडी होत होती. त्यामुळे आता त्यातून वाहनधाराकांना दिलासा मिळणार आहे. सिन्नर रस्त्यावर मात्र अजूनही चार ते पाच किमी रस्त्याचे काम बाकी असल्यामुळे त्याचा त्रास सहन करावा लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वैद्यकीय अ‌धीक्षकांना कोंडले

0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड येथील उपजिल्हा रुग्णालयात दोन महिलांवर भूल उतरली असताना कुटुंब नियोजन शस्त्रक्र‌िया करण्यात आल्याच्या प्रकरणाचे शहरात तीव्र प्रतिसाद उमटले आहेत. सोमवारी दुपारी संतप्त सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढला. वैद्यकीय अधीक्षक जी. एम. नरवणे याना घेराव घालून कोंडून ठेवले. या प्रकरणी उपजिल्हा रुग्णालयाकडून समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने संतप्त आंदोलकांनी मनमाड चौफुलीवर रस्त्यावर ठिय्या मांडून रास्ता रोको करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर रास्ता रोको मागे घेऊन आंदोलकांनी पोल‌िस व रुग्णालय प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले.

मनमाड येथील नाजमिन शेख व विद्या सानप या दोन महिला उपजिल्हा रुग्णालयात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी आल्या असता त्यांना सकाळी भूल देण्यात आली. भूल उतरल्यानंतर दुपारी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. त्यामुळे दोघींना प्रचंड वेदनेला सामोरे जावे लागले. या प्रकरणाच्या निषेधार्थ व दोषी वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तातडीने कारवाई व्हावी या मागणीसाठी रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष उपनगराध्यक्ष राजाभाऊ आहिरे व पदाधिकारी गंगाभाऊ त्रिभुवन यांच्या नेतृत्वाखाली रिपाइं भवन येथून उपजिल्हा रुग्णालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी व कार्यकर्ते सामील झाल्याने मोर्चाला व्यापक स्वरूप आले. नगराध्यक्ष गणेश धात्रक, शिवसेनेचे अल्ताफ खान, मयूर बोरसे, रिपाइंचे योगेश निकाळ,े राष्ट्रवादीचे नगरसेवक छोटू पाटील, अमजद पठाण, सर्वपक्षीय नगरसेवक कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले. रुग्णालयात येऊन आंदोलकांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. नरवणे यांना जाब विचारत दोषी डॉक्टरांवर कारवाईची मागणी केली. आंदोलकांनी त्यांना त्यांच्या कक्षात कोंडले. वैद्यकीय अधीक्षकांनी या प्रकरणात डॉक्टरची चूक नसल्याचे सांगत त्यांचे समर्थन केल्याचा आरोप आंदोलकांनी केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पत्नीपाठोपाठ पतीचेही नामपूरला निधन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

अल्प आजाराने त्यांच्या पत्नीचे निधन होते…सतत पाठ‌िशी राहणारी पत्नी अर्ध्यावर साथ सोडून गेल्याने ते पुरते कोसळले…कसेबसे सावरत पत्नी गेल्याची बातमी आप्तांना सांगताना त्यांच्या छातीत अचानक कळ येते…आणि काही कळायच्या आतच त्यांचेही निधन होते…अंगावर शहारे आणणारी ही करुण कहानी आहे नामपूर येथील बागूल दांपत्याची.

बागलाण तालुक्यातील नामपूर येथील दिलीप किसन बागुल (वय ४८) हे पालघर जिल्ह्यातील जव्हार मोखाडा येथे आरोग्य विभागात नोकरीस होते. घरातील बेताची परिस्थिती असल्याने ते तब्बल २५० किलोमीटरवर आपल्या कुटूंबियांच्या उदरनिर्वाहासाठी वास्तव्यास आहेत. आपल्या कुटूंबियांचे एकुलते एक सुपुत्र असतांना दिलीप बागुल केवळ परिवाराच्या सुखासाठी घरापासून दूर नोकरीस होते. त्यांचे वडील किसन बागुल यांचेही काही वर्षांपूर्वी निवृत्त‌िनाथ महाराज यांच्या वारीप्रसंगी अपघातील निधन झाले आहे.

दिलीप बागुल यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. मुलगा पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असून, मुलगी नामपूर येथेच इयत्ता अकरावीत आहे.

बागुल यांची पत्नी मीनाक्षी (वय ४२) यांना दोन ते तीन महिन्यांपासून शारिरीक व्यांधीने ग्रासले होते. त्यांच्या उपचारासाठी देखील त्यांना जव्हार मोखाडा येथून नामपूर येथे उपचारासाठी आणले होते. घरात वृद्ध आई, पत्नी व्याधींनी त्रस्त व, मुलगा पुण्यात शिकत असल्याने त्यांना कोणत्याही गोष्टीची जाणीव होवू नये याची काळजी ते स्वतः घेत असत. यामुळेच त्यांनी कधीही आपले दुःख चेहऱ्यावर उमटू दिले नाही.

मात्र नियतीच्या मनात काही वेगळेच होते. शनिवारी (दि. ४) रोजी सायंकाळी मिनाक्षी यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचे निधन झाले. पत्नी, सहचरिणीने अनेक सुख-दुःखात आपली साथ दिली. मात्र हे सगळे अर्ध्यांवर सोडून तिने जगाचा निरोप घेतला हे दुःख दिलीप यांना सहन झाले नाही. त्यांच्या निधनानंतर आप्तस्वकीयांना मोबाइलवर निरोप देत असतांनाच बागूल यांनाही हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. यामुळे या परिवारावर मोठा आघात झाला आहे.

या कुटूंबियांची सर्व जबाबदारी आता दिलीप यांचा मुलगा सचिन (वय २२) यांच्यावर आली असून, एक लहान बहीण व आजीचा सांभाळ करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. या घटनेमुळे नामपूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दिव्यांगांच्या मार्गात दगडधोंडे

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

सरकारी कार्यालयातील ‘रॅम्प’ म्हणजे दिव्यांगांसाठी एक मोठा आधार. मात्र येथील पंचायत समितीतील रॅम्पवर अक्षरशः दगडधोंडे टाकून दिव्यांगांची कुचेष्ठा करण्यात आली आहे. पंचायत समिती प्रशासनाने दगड तसेच लांब लोखंडी पाइप आडवा टाकून रॅम्पवर अडथळा निर्माण केला आहे. पंचायत समितीती या रॅम्पवरुन कुणीही दुचाकी थेट वर आणू नये यासाठी पंचायत समितीने ही अनोखी युक्ती शोधून काढली असली, तरी दिव्यांगासह वृद्धांना मात्र हाल सहन करावे लागत आहेत.

पंचायत समितीत येणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध अन् दिव्यांगांचे प्रमाण अधिक असते. या सर्वांना पंचायत समितीची पायरी विनाकष्ट सहज चढता यावी यासाठी येवला पंचायत समितीच्या देखण्या व टुमदार अशा वास्तूमध्ये रॅम्पची निर्मिती इमारत साकारतानाच करण्यात आली आहे. समितीच्या पश्चिम दिशेला असणाऱ्या मुख्य प्रवेशद्वाराच्या डाव्या व उजव्या बाजूला उभारलेल्या रॅम्पच्या तोंडाशीच गेल्या काही महिन्यांपासून पंचायत समिती प्रशासनाने मोठे दगड तसेच लोखंडी पाईप टाकून अडथळा उभारला आहे. दिव्यांगांना हा अडथळा पार करणे म्हणजे तारेवरची कसरत ठरत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कांद्याचे दर घसरण्याची शक्यता

0
0

म. टा. वृत्तसेवा, पिंपळगाव बसवंत

येथील कृषी उत्पन्न बाजार सम‌ितीत नवीन लाल कांदा दाखल झाला असून, देशातंर्गत बाजारपेठेतून या कांद्याला चांगली मागणी आहे. जुना गावठी कांद्याचा मोठा साठा शिल्लक असल्याने भाव अजून काही दिवस तेजीत राहतील. मात्र व्यापाऱ्यांकडे असलेला गावठी कांद्याचा साठा संपल्यानंतर लाल कांद्याच्या भावात घसरण होण्याची शक्यता आहे.

सोमवारी येथील बाजार समीतीत जुन्या गावठी कांद्याची अंदाजे अकरा हजार क्विंटल आवक झाली. बाजारभाव किमान १७०० रुपये कमाल ३८०० रुपये होते. नवीन लाल कांद्याची अंदाजे चार हजार क्विंटल आवक झाली. लाल कांद्याला कमाल ३५०० रुपये किमान १३०० रुपये तर सरासरी २६०० रुपये क्विंटल भाव मिळाला.

पिंपळगाव, लासलगाव परिसरातील अनेक व्यापाऱ्यांकडे अजूनही गावठी कांद्याचा काही प्रमाणात साठा आहे. हा साठा संपेपर्यत कृत्र‌िम टंचार्इचे राहील. मात्र व्यापाऱ्यांचा गावठी साठा संपताच कांद्याचे भाव घसरतील, असा अंदाज आहे.

मार्च-एप्रिलमध्ये शेतकऱ्यांच्या शेतातून कांदा बाजारात आला तेव्हा कांद्याला ५०० ते ६०० रुपये प्रति क्विंटल भाव होता. मात्र काही चाळीधारक मोठे शेतकरी वगळता शेतकऱ्यांचा कांदा विक्री झाल्यानंतर तोच कांदा व्यापाऱ्यांच्या चाळीत स्थिरावला. कृत्रिम टंचार्इ निर्माण करून तेजी मंदीचा खेळ सुरू झाला.

आगामी पंधरा दिवसात व्यापाऱ्यांकडे असलेला गावठी कांदा संपलेला असेल. तर पंधरा दिवसात शेतकऱ्यांचा लाल कांदा बाजारात आल्यानंतर मागणी असली तरी प्रचंड उत्पादनाच्या नावाखाली लाल कांद्याचे भाव पाडण्यात येतील.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कळवणच्या मेनरोडला धुळीचे ग्रहण

0
0

म. टा. वृत्तसेवा, कळवण

शहरातील सर्वाधिक वर्दळीचा रस्ता असलेल्या मेनरोडला खड्ड्यांनी ग्रासलेले असतांना आता उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग, नगरपंचायतीला कसलेही सोयरसुतक दिसत नाही. या धुळीमुळे वाहनधारकांना सर्दी, खोकला, दमा या आजारांचा सामना करावा लागत आहे. तसेच रस्त्यालगतच्या व्यावसाय‌िकांच्या व्यवसायावरही या धु‌ळीचा परिणाम होत आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून मेनरोडला धुळीने ग्रासले असून, दिवसभर या परिसरात तोंडाला रुमाल बांधूनच प्रवास करावा लागत आहे. धुलीकणांमुळे फुफुसांचे आजार बळावण्याची भीती व्यक्त होत आहे. थंडीच्या दिवसात निर्माण झालेल्या या स्मस्येमुळे नागरिकांना त्वचेचे आजार होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत.

कुठून आली धूळ?

कळवणच्या मेनरोडवर सर्वाधिक वाहनांची वर्दळ असते. सार्वजनिक बांधकाम खात्याला अनेकदा निवेदने देऊनही रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यात आलेले नाहीत. या खात्याच्या अधिकाऱ्यांसह शासनकर्त्यांना झोपेतून जागे करण्यासाठी तसेच लाजवण्यासाठी कळवण शहरातील काही सेवाभावी तरुणांनी व्यापारी बांधवांच्या मदतीने रस्त्यावरील खड्ड्यांना बुजवण्यासाठी पुढाकार घेतला. मुरूम टाकत खड्डे बुजव‌िण्यात आले. कळवणकरांनी या तरुणांना शाबासकीची थाप दिली. मात्र तरीही सार्वजनिक बांधकाम खात्याला व शासनाच्या प्रतिनिधींना जाग यायला तयार नाही. मात्र आता मेनरोडवर धूळ वाढली आहे.

करायला गेले गणपती..

मेनरोडवर खड्ड्यात मुरूम टाकत काही तरुणांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला लाजवण्यासाठी गांधीगिरीचे दर्शन दाखवले. मात्र शासकीय यंत्रणेला घाम फुटला नाही. मेनरोडवर आता त्या मुरुममुळे रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरले आहे. तरुण कार्यकर्त्यांचा हेतू शुद्ध होता, मात्र शासकीय यंत्रणेला जाग आणण्यात त्यांनाही अपयश आले. मेनरोडवर सध्या सर्व वाहनधारकांना व नागरिकांना धुळीचा सामना करावा लागत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


जिल्ह्यात ९६ शेतकरी आत्महत्या

0
0

म. टा. प्रत‌िनिधी, नाशिक

जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच असून गतवर्षीपेक्षाही यंदा आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. गतवर्षी जिल्ह्यात ८७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली होती. यंदा नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच जिल्ह्यात ९६ आत्महत्यांची नोंद झाली आहे.

निसर्गाचा लहरीपणा, कर्जबाजारीपणा यामुळे शेतकरी आत्महत्येच्या घटना घडतात. शेतमालाला मिळणाऱ्या कवडीमोल भावाने बळीराजा चिंतेत आहे. एक ना अनेक कारणांमुळे शेतकऱ्यांनी आत्महत्येचा मार्ग अवलंबला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०१७ या ११ महिन्यांमध्ये जिल्ह्यात तब्बल ९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. गतवर्षी जानेवारी ते डिसेंबर २०१६ या काळात जिल्ह्यात ८७ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली होती. यंदा आत्महत्या करणाऱ्यांमध्ये निम्मे शेतकरी तरुण आहेत. मालेगावात यंदा सर्वाधिक १४ आत्महत्या झाल्या असून बागलाण तालुक्यात अशा १३ घटनांची नोंद झाली आहे. निफाडसारख्या बागायतदारांच्या तालुक्यातही १२ शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपविली. गत आठ दिवसात तीन शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. सरकार आणि प्रशासनाला या आत्महत्या रोखण्यात अपयश येऊ लागले आहे.

कर्जमाफी अंमलबजावणीची प्रतीक्षा

राज्य सरकारने शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज सन्मान कर्जमुक्त योजना लागू केली. त्या योजनेंतर्गत जिल्ह्यातील ३२ शेतकरी कुटुंबीयांना या योजनेचा लाभ देण्यात आला. मात्र, नोव्हेंबरचा पहिला आठवडा उजाडूनही बहुतांश शेतकऱ्यांना प्रत्यक्ष कर्जमाफी मिळू शकलेली नाही. त्यामुळेही शेतकऱ्यांचे मनोबल खच्ची होत आहे.

आत्महत्यांचा आलेख चढताच

वर्ष शेतकरी आत्महत्या
२०१४ ४२
२०१५ ८५
२०१६ ८७
२०१७ ९६

तालुकानिहाय शेतकरी आत्महत्या (जानेवारी ते नोव्हेंबर २०१७)

तालुका शेतकरी आत्महत्या
मालेगाव १४
बागलाण १३
निफाड १२
नांदगाव ११
दिंडोरी १०
चांदवड ०९
कळवण ०७
सिन्नर ०६
येवला ०६
नाशिक ०३
त्र्यंबकेश्वर ०३
देवळा ०१
सुरगाणा ०१

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘त्या’ धार्मिक स्‍थळांवर आज हातोडा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी,नाशिक

शहरातील अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या निर्णयाविरोधात शहरातील धार्मिक संघटनांनी बुधवारी नाशिक बंदची हाक दिली असली तरी, प्रशासन धार्मिक स्थळांवरील कारवाईवर ठाम आहे. प्रशासनाने ठरलेल्या कृती आराखड्यानुसार बुधवारपासून (दि. ८) १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाईला सुरुवात होणार आहे. सिडको सातपूरमधून सकाळी ही कारवाई सुरू होईल. पहिल्या टप्प्यात रस्त्यावरील धार्मिक स्थळे हटवली जाणार आहेत. अतिरिक्त आयुक्तांसह अतिक्रमण विभागाचे ३० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटा या पथकात राहणार असून, दंगा नियंत्रण पथकासह पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या संपूर्ण कारवाईचे व्हिड‌िओ चित्रीकरण केले जाणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशानुसार महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात शहरात ६५९ अधिकृत धार्मिक स्थळे आढळून आली होती. त्यात २००९ पूर्वीची आणि नंतरची अशी वर्गवारी करण्यात आली आहे. हायकोर्टाने सन २००९ पूर्वीची अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्यासंदर्भातील डेडलाइन नोव्हेंबर २०१७ दिली आहे. त्यामुळे या धार्मिक स्थळांवर कारवाईसाठी पालिकेने तयारी केली असून, आजपासून रस्त्यांवरील १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर हातोडा चालविला जाणार आहे. यापूर्वी पालिकेने १०५ धार्मिक स्थळांवर कारवाई केली आहे. पहिल्या टप्प्यात २००९ पूर्वीच्या ६५९ धार्मिक स्थळांची यादी तयार करून त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करण्यात आली होती. पालिकेने जवळपास १०५ धार्मिक स्थळांवर कारवाईदेखील केली होती. परंतु, शिवसेनेसह काही संस्था-संघटनांनी कारवाईविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. परंतु, आता कोर्टाने अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत दाखल केलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्याने महापालिकेच्या कारवाईचा मार्ग मोकळा झाला

महापालिका हद्दीतील १४२ आणि सिडकोच्या हद्दीतील ८ अशा एकूण १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर आजपासून कारवाई केली जाणार आहे. तसेच २००९ नंतरच्या खुल्या जागांवरील ५७ आणि सिडकोतील १४ अशा ७१ अनधिकृत धार्मिक स्थळांचाही कारवाईत समावेश आहे.

धार्मिक संघटना आक्रमक

या कारवाईविरोधात शहरातील धार्मिक संघटना आक्रमक झाल्या असून, त्यांनी कारवाईलाच विरोध केला आहे. सोमवारी महापौर व आमदारांच्या उपस्थितीत बैठक होऊन फेरसर्वेक्षणाची मागणी करण्यात आली होती. परंतु, प्रशासनाने हायकोर्टाचे आदेश असल्याचे सांगत, कारवाई होणारच असा दावा केला होता. त्यानुसार बुधवारपासून या कारवाईला सुरुवात केली जाणार आहे. बुधवारी सिडकोतील सहा तर सातपूरमधील १० धार्मिक स्थळांवर कारवाई केली जाणार असून, त्याचे नियोजन पूर्ण झाले आहे.

प्रशासनाकडून तयारी

अनधिकृत धार्मिक स्थळांवरील कारवाईसाठी अतिक्रमण विभागाचे विशेष पथक तयार करण्यात आले आहे. यात अतिरिक्त आयुक्तांसह उपायुक्त, सहा विभागीय अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यात दोन जेसीबी, नगररचना व बांधकाम विभागाचे अभियंतेही असणार आहेत. या पथकाला पोलिसांचे संरक्षण राहणार असून, दंगा नियंत्रण पथकासह पोल‌िसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

व्हिड‌िओ चित्रीकरण होणार

अनधिकृत धार्मिक स्थळावरील कारवाईला धार्मिक संघटनांचा तीव्र विरोध आहे. सर्व्हेक्षण चुकीचे झाल्याचा आरोप करत नागरिकांनी या कारवाई विरोधात उद्या बंदची हाक दिली आहे.त्यामुळे या कारवाईवरून गोंधळ निर्माण होण्याची शक्यता गृहीत धरून पालिकेच्या वतीने कारवाईचे व्हिड‌िओ चित्रीकरण केले जाणार आहे. कारवाईला अडथळा करणाऱ्यांवर नियंत्रण मिळवता यावे, तसेच वाद झाल्यास हायकोर्टात जमा करता यावा यासाठी पालिकेने तजवीज केली आहे.

तगडा बंदोबस्त

सिडको आणि सातपूर परिसरातील धार्मिक स्थळ हटवण्याची मोहीम आज बुधवारी (दि. ८) पहाटेपासून सुरू होणार आहे. यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून, नाशिक बंदच्या हाकेच्या पार्श्वभूमीवर आढावा घेण्याचे काम पोलिसांकडून सुरू होते.

मुंबई हायकोर्टाच्या आदेशाने महापालिका प्रशासनाने काही धार्मिक स्थळे हटविण्याची मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेविरोधात हिंदुत्ववादी संघटना, तसेच सर्वपक्षीय नेते एकटवले असून, नाशिक बंदची हाक देण्यात आली आहे. कोर्टाच्या निर्णयानुसार बुधवारी पहाटेपासून पोलिस बंदोबस्तात अतिक्रमण निर्मूलन मोहीम सुरू होणार आहे. यासाठी चार वरिष्ठ पोलिस निरीक्षक, १० एपीआय तसेच पीएसआय, ५० कॉन्स्टेबल, २० महिला पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील संवेदनशील भागात बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याबाबत सूत्रांनी सांगितले की, बंदच्या पार्श्वभूमीवर फिक्स पॉइंट नेमण्यात येणार आहेत. याशिवाय दंगा नियंत्रक पथक, शीघ्र कृती दले मुख्यालयात तैनात असतील.

हायकोर्टाच्या आदेशाप्रमाणे महापालिका प्रशासनाने अतिक्रमण निर्मूलनाची मोहीम हाती घेतली असून, त्यास पोलिस बंदोबस्त पुरवण्यात आला आहे. हायकोर्टाच्या आदेशाचे पालन करीत सर्वांनी प्रशासनास सहकार्य करावे.

- राजू भुजबळ, सहायक पोलिस आयुक्त


जिल्हा कोर्टात सात अर्ज

मनपाच्या धार्मिक स्थळांवरील कारवाईविरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात सात अर्ज दाखल झाले आहेत. या अर्जांवर मंगळवारी सुनावणी झाली. त्यात प्रतिवादी असलेल्या महापालिका, जिल्हा प्रशासन, पोलिस आणि मनपाचा पूर्व विभागीय कार्यालयांच्या प्रमुखांचा जबाब नोंदविण्यास १३ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली. तोपर्यंत पूर्व विभागातील धार्मिक स्थळांच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे. या अर्जावर जिल्हा व सत्र न्यायाधीश जे. डब्ल्यू. गायकवाड यांच्या कोर्टात सुनावणी झाली. दरम्यान, धार्मिक स्थळे हटवण्याबाबत हायकोर्टाने आदेश दिले असून, ज्या सर्व्हेक्षणाच्या आधारे हा निर्णय झाला, तो सर्व्हेच चुकीचा असल्याचा दावा करीत शहरातील १५ नागरिकांनी जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेतली. यात धार्मिक स्थळांच्या विश्वस्तांसह, संस्था संघटनांचा समावेश आहे. अल उस्मानिया वेल्फेअर, इम्रान युसूफ शेख, सय्यद इकरार नासिर, अजहर मुस्ताक शेख, हजरत सय्यद जलालशहा हुसेनी, सय्यद मिरमुखतार अशरफी आणि क्रांती फ्रेंड सर्कल आदींचा समावेश आहे. कोर्टाने या अंतरिम अर्जावर प्रतिवादांना म्हणणे मांडण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत दिली असून, संबधीतांच्या जबाबानंतरच पूर्व विभागातील धार्मिक स्थळांचा प्रश्न निकाली लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यापीठाने मागवल्या नागरिकांकडून सूचना

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
राज्यातील अग्रगण्य विद्यापीठ असलेल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी जागतिक विद्यापीठ योजनेत स्थान मिळावे, असे वाटत असेल तर तुम्ही थेट विद्यापीठ प्रशासनास आणखी सुधारणेसाठी सूचना करू शकतात, असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांनी नागरिकांना केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील प्रत्येकी दहा सरकारी आणि खासगी अशी एकूण २० विद्यापीठे जागतिक दर्जाची करण्यासाठी ‘इन्स्टिट्यूशन्स ऑफ एमिनन्स’ योजना जाहीर केली आहे. या योजनेत विद्यापीठाचा समावेश व्हावा, यासाठी पुणे विद्यापीठाच्या वतीने डॉ. करमळकर आग्रही आहे. ही योजना जाहीर होताच विद्यापीठाने तज्ज्ञांची समिती स्थापन करत हालचाली सुरू केल्या आहेत. या समितीच्या सदस्यांवर योजनेत सहभागी होण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याची जबाबदारी आहे.
१५ नोव्हेंबरपूर्वी
साधा संपर्क
या विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडलेले माजी विद्यार्थी आणि नागरिक यांनी विद्यापीठाची प्रतिमा उंचाविण्यासाठी सूचना पाठवाव्यात असे आवाहन प्रशासनाने केले आहे. यासाठी नाग‌रिकांनी १५ नोव्हेंबरच्या अगोदर आपली मते आणि सूचना sppuforeminence@gmail.com या इ मेल आयडीवर मेल कराव्यात असे आवाहन केले आहे. आपली मते आणि सूचना मांडताना काही प्रश्नांवर कुलगुरूंनी लक्ष केंद्रीत केले आहे. या प्रश्नांमध्ये विद्यापीठाची बलस्थाने काय आहेत, उच्च शिक्षणाच्या दृष्टीने विद्यापीठ कसे असावे, विद्यापीठाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत, नवीन अभ्यासक्रम काय असावेत, विद्यापीठाचा समाजाशी संवाद कसा आसावा, संशोधन, अध्यापन, लोकांशी संवाद या गोष्टी सुधारण्यासाठी आणखी काय व्हायला हवे या प्रश्नांवर प्रामुख्याने नागरिकांनी विचार लिहावेत, अशी विद्यापीठाची अपेक्षा आहे.
सबकॅम्पसचा मुद्दा
पुणे विद्यापीठातील मोठी विद्यार्थीसंख्या आणि कॉलेजेस संख्या नाशिक जिल्ह्यात आहे. विद्यापीठाचा प्रशासकीय कारभार पुण्यात केंद्रीत असल्याने निकालापासून तर अनेक तांत्रिक कामकाजातील तक्रारी व दुरुस्त्यांसाठी सातत्याने नाशिककरांना पुणे विद्यापीठ गाठावे लागते. विद्यापीठाच्या विकेंद्रीकरणास काही वर्षांपूर्वी झालेली सुरूवात सद्यःस्थितीत लालफितीच्या कारभारात अडकली आहे. जागा ताब्यात असूनही केवळ निधीच्या उपलब्धतेअभावी विद्यापीठ उपकेंद्राच्या भाडोत्री जागेचा तिढा सुटेना. दिंडोरीत सबकॅम्पसच्या कामाचा मुहूर्तही साधला जाईना. या विकेंद्रीकरणाअभावी नाशिककर विद्यार्थ्यांना लहान-सहान कामांसाठी विद्यापीठाकडे धाव घ्यावी लागते. यादृष्टीने नाशिककरांनी या संधीचा उपयोग करून सबकॅम्पसचा मुद्दा उचलून धरावा, असे आवाहनही विद्यार्थी संघटनांच्या वतीने करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आज नाशिक बंदची हाक

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

उच्च न्यायालयाच्या आदेशाचा विपर्यास करून नाशिकमधील मंदिरांचे चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात आले आहे. नाशिक महापालिकेने २००९ नंतरचे जी काही मंदिरे बांधण्यात आली त्यांना अनधिकृत ठरविले आहे. अशी धार्मिक स्थळे हटविण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्यामुळे आज (दि. ८) नाशिक बंद ठेवण्याचे आवाहन मठ मंदिर बचाव संघर्ष समितीने केले आहे.

धार्मिक स्थळे अतिक्रमण असल्याचे ठरवून ते पाडण्याचा प्रयत्न होणार असल्यामुळे सर्व धर्मियांनी महापालिकेच्या विरोधात नाशिक बंद पुकारला आहे. यानिमित्ताने सर्वधर्मियांतर्फे पत्रकार परिषद घेऊन याविषयी माहिती देण्यात आली. महंत भक्त‌िचरणदास महाराज, महंत रामकिशोरदास शास्त्री, महंत शिवमदास महाराज, सतीश शुक्ल, सुनील बागूल, गजानन शेलार, रामसिंग बावरी आदी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

भक्त‌िचरणदास महाराज यांनी हा सर्व्हे चुकीचा झाला असून, तो पुन्हा करण्यात यावा अशी मागणी केली. रामकिशोरदास शास्त्री यांनी मोगलांच्या आणि इंग्रजांच्या काळातही धार्मिक स्थळे तोडण्यात आली नाही, कोणाची तक्रार नसतानाही कारवाई का केली जात आहे, असा प्रश्न उपस्थित केला.

सतीश शुक्ल यांनी नाशिक तीर्थक्षेत्रात मंदिर हा आस्थेचा विषय आहे. महापालिकेची परवानगी घेऊन बांधण्यात आलेल्या बळी मंदिरालाही नोटीस काढण्यात आल्याची खंत व्यक्त केली. इजाज रझा यांनी महापालिकेने धार्मिक भावनांना ठेच पोहचू देऊ नये, असे आवाहन केले.

मंदिरे अनाधिकृत ठरवित नाशिक महापालिकेने आतापर्यंत १५० मंदिरांवर हातोडा चालविला आहे. त्यानंतर सन १९६० नंतरच्या मंदिरांवर निशाणा साधत धार्मिक स्थळे अनाधिकृत ठरविण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने सन १९६० किंवा सन २००९ असा कुठल्याही तारखांचा उल्लेख केलेला नाही. अथवा कुठल्याही प्रकारची अंतिम मुदत दिलेली नाही. कोणाची काही तक्रार नाही अशा मंदिरांना धक्का लावू नये. असे असताना चुकीच्या पद्धतीने धार्मिक स्थळे हटविण्याचा निषेध म्हणून सर्वधर्मिय शांततेत हा बंद पाळणार आहेत, असे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाविकांनी फुलली गणेश मंदिरे...

0
0

सोशल कनेक्ट

--

भाविकांनी फुलली गणेश मंदिरे...


म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी अंगारकी म्हणून संबोधली जाते. हा योग वर्षातून मोजक्याच चतुर्थींना येतो. असाच योग मंगळवारी आल्यामुळे भाविकांची शहर परिसरातील गणेश मंदिरांत दर्शनासाठी गर्दी झाली होती. गणेशाला आवडणाऱ्या दुर्वा, लाल रंगाचे फूल, जास्वंदीची फुले वाहण्यात येत होती.

शहरातील सिद्धिविनायक मंदिर, ढोल्या गणेश मंदिर, साक्षी गणेश, नवश्या गणपती आदी गणेश मंदिरांत सकाळपासूनच गणेशाच्या दर्शनासाठी भाविक येत होते. मंदिरांच्या बाहेर पूजेसाठी लागणारी फुले, हार, दुर्वा, नारळ, प्रसाद यांची दुकाने सजली होती. गणरायाचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या श्रद्धेने भाविक गणेश मंदिरांत येत होते. संकष्ट चतुर्थी हा वर्षातील दुर्मिळ अंगारकी योग मानला जात असल्यामुळे आपल्या मनोकामना पूर्ण होण्याच्या श्रद्धेने, तसेच अडकलेले महत्त्वाची इप्सित कामे मार्गी लागण्यासाठी या दिवशी उपवास करून भाविकांकडून गणेशाची आराधना केली जाते. शहरातील असंख्य भाविकांकडून दिवसभर उपवास धरून रात्री चंद्रदर्शन घेत गणेशाचे श्लोक म्हणत उपवास सोडण्यात आले.

---

‘नवश्या’ परिसरात विविध उपक्रम

गंगापूररोड ः नाशिककरांचे श्रद्धास्थान असलेल्या नवश्या गणपती मंदिरात अंगारकी चतुर्थीनिमित्त भाविकांची गर्दी झाली होती. नवश्या गणपती मंदिर ट्रस्टतर्फे सकाळी पालखीचे आयोजन करण्यात आले होते. आनंदवली गावातून पालखी मंदिरात पोहोचल्यावर नगरसेवक तथा शिवसेना गटनेता विलास शिंदे, नगरसेवक संतोष गायकवाड, नगरसेविका नयना गांगुर्डे, नवश्या गणपती मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष राजू जाधव यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर दिवसभर भाविकांसाठी साबुदाणा फराळचे वाटप ट्रस्टच्या वतीने करण्यात आले. अर्पण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबिराची व्यवस्था करण्यात आली होती. रात्री उशिरापर्यंत भाविकांची नवश्या गणपती मंदिरात भाविकांची दर्शनासाठी गर्दी झाली होती.

---

नाशिकरोडला भाविकांचा उत्साह

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

अंगारकी चतुर्थीनिमित्त नाशिकरोडच्या गणेश मंदिरांमध्ये भक्तांनी पहाटेपासून गर्दी केली होती. उपनगर येथील इच्छामणी गणेश मंदिरात सकाळी अभिषेक, महापूजा झाली. आकर्षक मूर्ती व प्रशस्त परिसर असल्यामुळे येथे चतुर्थीला भाविक लांबून येतात. अंगारकीमुळे मंगळवारी उपनगर परिसराला यात्रेचे स्वरूप आले होते.

पूजेच्या साहित्याबरोबरच खेळणी व गृहपयोगी वस्तूंचे स्टॉल्स लागले होते. विहितगाव परिसरातील अण्णा गणपती नवग्रह मंदिराकडे नदीकाठचा शांत व भव्य परिसर, स्वच्छता, सुंदर बगीचा यामुळे भाविकांचा ओढा वाढला आहे. येथे अण्णा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अभिषेक झाला. येथे दिवसभर भाविकांची गर्दी होती. सायंकाळनंतर येथील दीपोत्सव पाहण्यासाठीही मोठ्या संख्येने भाविक येत होते. देवळालीगावातील गणेश मंदिरातही भाविकांनी रांगा लावल्या होत्या. जेलरोड येथील मॉडेल कॉलनी व चंद्रेश्वरनगर, चेहेडीतील गणेश मंदिर, डीजीपनगर क्रमांक दोन येथील गणेश मंदिर, दत्त मंदिररोडवरील गणेश मंदिरातही गर्दी झाली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images