November 7, 2017, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
गेल्या महासभेत महापौरांनी मागच्या दाराने मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या प्रस्तावावरून विरोधी पक्षांनी तीव्र आक्षेप घेतला होता. विरोधी पक्षांच्या आक्षेपानंतर अखेर सत्तारूढ भाजपने २५७ कोटींच्या रस्ते विकासाची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द केली आहे. याअंतर्गत महापालिका क्षेत्रातील ३१ प्रभागांमधील तसेच सातपूर-अंबड औद्योगिक वसाहतीतील सुमारे ६०० कि.मी. लांबींच्या रस्त्यांचे दोन वर्षांत नूतनीकरण केले जाणार आहे.
सत्तारूढ भाजपने गत महिन्यात झालेल्या महासभेत विनाचर्चा मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या योजनेवरून विरोधकांनी रान उठविले होते. या योजनेंतर्गत कोणत्या रस्त्यांचे डांबरीकरण केले जाणार आहे, त्यासंदर्भातील यादी सत्ताधाऱ्यांनी जाहीर करावी, अशी मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्यानुसार महापौर रंजना भानसी यांनी २६ ऑक्टोबर रोजी बैठक घेत रस्त्यांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते.
सहाशे किमी रस्त्यांचे नूतनीकरण
सहाशे किलोमीटरचे रस्ते नूतनीकरण केले जाणार असून, त्यात ५४० कि.मी. रस्त्यांचे डांबरीकरण, ४० कि.मी. रस्त्यांचे खडीकरण तर २० कि.मी. रस्त्यांचे कॉँक्रिटीकरण केले जाणार आहे. त्यामुळे विरोधकांचा धुरळा शांत होण्याची शक्यता आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 7, 2017, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
पावसाने उसंत देऊन थंडीची चाहूल लागली, तरी शहरात डेंग्यूचा प्रकोप कमी होत नसल्याचे चित्र आहे. ऑक्टोबर महिन्यातील डेंग्यू रुग्णांची संख्या वर्षभरातील उच्चांकी पातळीवर पोहोचली असतानाच, नोव्हेंबरमध्येही डेंग्यू नवे रेकॉर्ड नोंदवण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या अवघ्या सहा दिवसांतच शहरात डेंग्यूचे ११४ संशयित, तर ५४ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. ऑक्टोबरमध्ये ४७७ संशयित तर २४८ रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. डेंग्यूच्या वाढत्या प्रकोपामुळे पालिकेच्या उपाययोजना कूचकामी ठरत असून, नाशिककरांच्या आरोग्याला धोका वाढला आहे.
महापालिकेच्या वतीने डेंग्यू संदर्भातील उपाययोजना कागदावरच असल्याचे दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आकडेवारीवरून दिसून येत आहे. यंदा स्वाइन फ्लूपाठोपाठ डेंग्यूची मोठ्या प्रमाणावर लागण झाली आहे. पाऊस चांगला झाल्याने डेंग्यू डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणावर झाली. या डासांची उत्पत्तीस्थाने वाढतच गेली. परिणामी, डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांची संख्याही वाढत गेली. ऑगस्ट महिन्यात डेंग्यू आजाराची साथ शहरात मोठ्या प्रमाणावर फैलावली असून, तिचा प्रकोप दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. महिन्यात या आजाराची लागण ऑगस्टमध्ये ९७ डेंग्यूचे रुग्ण सापडले होते. सप्टेंबर महिन्यात ती आणखी वाढून १०५ वर पोहोचली होती. ऑक्टोबर महिन्यात सर्वाधिक २४८ जणांना डेंग्यूची लागण झाली आहे. डेंग्यू संशयितांचा आकडा ४७७ पर्यंत पोहचला आहे. त्यामुळे नाशिकसाठी ही धोक्याची घंटा मानली जात आहे.
‘स्वाइन फ्लू’ ओसरला
डेंग्यूपाठोपाठ स्वाइन फ्लूनेही नाशिक शहरासह जिल्ह्यात कहर केला होता. राज्यात स्वाइन फ्लूने सर्वाधिक मृत्यू हे नाशिकमध्ये नोंदले गेले आहेत. परंतु, नोव्हेंबरमध्ये स्वाइन फ्लूचा कहर कमी झाल्याचे चित्र आहे. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात स्वाइन फ्लूचा एकच रुग्ण आढळून आला आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात स्वाइन फ्लूचा जोर कमी होत असल्याचे चित्र आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 2:30 pm
डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड
नोटाबंदीच्या काळात संपूर्ण देश बँकांसमोर रांगेत उभा असताना नाशिकची करन्सी प्रेस ही सर्वांच्या मदतीला धावून आली. ऐतिहासिक नोटाबंदीला एक वर्ष पूर्ण झाले आहे. नोटाबंदीत सरकारला नोटांचे रेशनिंग करावे लागले. नोटाबंदीच्या झळा असह्य होण्याच्या आधीपासून नाशिकरोडचे प्रेस कामगार रात्रीचा दिवस करीत होते. गेल्या नोव्हेंबरपासून दहा महिने हे कामगार साप्ताहिक सुटी, रजा न घेता नॉनस्टाप काम करीत अब्जावधींच्या नोटांची छपाई केली.
विमानांद्वारे नोटा रवाना
नाशिक प्रेसमधील नोटा ट्रक आणि रेल्वे वॅगनने रिझर्व्ह बँकेच्या देशातील १८ केंद्रांमध्ये जातात. रोज दोन- तीन वॅगन नोटा रवाना होतात. नोटाबंदीत पाचशेची नवी नोट आली. नोटाबंदीत नोटांची टंचाई दूर करण्यासाठी नाशिक प्रेसच्या नोटा देशभरात पोहोचवण्यासाठी सरकारने ओझर विमानतळावर विमानांचा वापर केला. देशाच्या इतिहासातील ही पहिलीच घटना असावी. सलग पाच महिने विमानाने नोटा जम्मू, भुवनेश्वर, त्रिवेंद्रम, मुंबई, दिल्ली, कोलकाता आदी ठिकाणी रवाना होत होत्या.
मोदींकडून कौतुक
नोटाबंदी काळात प्रेस कामगारांनी दिवस-रात्र काम केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, अर्थमंत्री अरुण जेटलींनीही कामगारांचे कौतुक केले. मोदींनी कामगार नेत्यांना दिल्लीत बोलावून शाबासकी दिली. फोटोसेशन केले. महामंडळाचे तत्कालीन सीएमडी प्रवीण गर्ग, विद्यमान सीएमडी अनुराग अग्रवाल यांनीही प्रशस्तिपत्र दिले. याचीच पावती म्हणून सरकारने महामंडळ असतानाही प्रेस कामगारांना सातवा वेतन आयोग लागू केला. आता नोट पेपर मिलचा कारखाना नाशिकला द्यावा, एवढीच प्रेस नेत्यांची अपेक्षा आहे.
रुपयाच्या नोटेचीही छपाई
नाशिक प्रेसमध्ये दहा, वीस, पन्नास, शंभर व पाचशेच्या नोटांची छपाई होते. नोटाबंदीच्या काळात एक रुपयाच्या नोटेची मोठी ऑर्डर प्रेसने पूर्ण केली. देशात २५ वर्षांनंतर एकच्या नोटेची छपाई झाली. नोटाबंदीत सर्वांत जास्त छपाई पाचशेच्या नोटेची झाली. गेल्या तीन महिन्यांपासून पाचशेच्या नोटेची छपाई बंद आहे. त्याऐवजी दोनशे व पन्नासच्या नवीन नोटांची छपाई सुरू आहे. एक नोट फायनल होण्यासाठी आठ दिवस लागतात. त्या पार्श्वभूमीवर नोटाबंदीत दिवसाला २१ दशलक्ष नोटा छापून प्रेस कामगारांनी सर्वांना चकित केले.
चारच छपाई केंद्रे
नोटांची छपाई देशात प्रेस महामंडळाच्या नाशिक व देवास (मध्य प्रदेश) येथे होते. अलीकडे रिझर्व्ह बँकेने म्हैसूर व सालबोनी (बंगाल) येथे स्वतःच्या दोन प्रेस सुरू केल्या. नोटाछपाईच्या नाशिकला चार, देवासला तीन, तर रिझर्व्ह बँकेच्या चौदा मशीन आहेत. नोटाबंदीत या चौदा मशिन्सवर अब्जावधींच्या नोटांची छपाई करण्यात आली. नाशिक प्रेसमध्ये दिवसाला १५ ते १८ दशलक्ष नोटांची छपाई होते. नोटाबंदीच्या दहा महिन्यांत रविवारीही काम केल्यामुळे दररोज २१ दशलक्ष नोटांची विक्रमी छपाई झाली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, आडगाव
उद्यानाच्या आजूबाजूच्या परिसरासह आवारात वाढलेले गवत, तुटलेल्या खेळणी, जुन्या कंपाऊंडचे भंगार, कचऱ्याचे ढीग, उघड्या डीपी व वायर, बाकड्यांची झालेली दुरवस्था अशी अवस्था आहे म्हसरूळ येथील प्रभाग क्रमांक एकमधील सावरकरनगर कॉलनी परिसरातील वीर सावरकर उद्यानाची.
येथील मध्यवस्तीतील भव्य व मोकळ्या जागेत उभारण्यात आलेल्या उद्यानाची दुरवस्था होऊनदेखील परिसरातील लोकप्रतिनिधी व महापालिकेच्या उद्यान विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने परिसरातील रहिवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे. याप्रश्नी संबंधित घटकांनी त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी परिसरातून करण्यात येत आहे.
प्रभाग क्रमांक एका हा विद्यमान महापौरांचा प्रभाग म्हणून ओळखला जातो. मात्र, या प्रभागातील म्हसरूळमधील सावरकरनगर कॉलनीतील वीर सावरकर उद्यानात ठिकठिकाणी कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. या उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या शेजारीच मोटर बसविण्यात आलेली असून, येथील डीपी आणि केबल उघडी असल्याने उद्यानात येणाऱ्या लहान मुलांचा धक्का लागून अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. येथे गवतही अस्ताव्यस्त वाढलेले आहे. शिवाय कचऱ्याचेदेखील साम्राज्य पसरलेले आहे. येथील खेळण्यांची तर मोडतोड होऊन दयनीय अवस्था झालेली आहे. या उद्यानाची देखभाल करण्यासाठी पूर्णवेळ कर्मचारीच नसल्यामुळे येथे साफसफाई, देखभाल होत नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत.
--
जुन्या कंपाउंडचे भंगार
या उद्यानात खेळण्यांच्या बाजूला जुन्या कंपाउंडचे भंगार पडलेले आहे. उद्यानात अनेक लहान मुले खेळत असतात नकळतपणे खेळताना या लोखंडी जाळ्यांमुळे दुखापत होण्याचीदेखील भीती निर्माण होते. शिवाय उद्यान मोकळे असणे अपेक्षित असताना जुने भंगार साचवलेले असल्याने नागरिक नाराजी व्यक्त करीत आहेत.
--
तक्रारी करूनदेखील दुर्लक्ष
या उद्यानातील बाकडी व अन्य वस्तूंसह खेळण्यांचीदेखील मोडतोड झालेली आहे. त्यामुळे या उद्यानाची दुरुस्ती करणे गरजेचे बनले आहे. मात्र, असे असूनदेखील या उद्यानाच्या दुरवस्थेसंदर्भात अनेक वेळा तक्रारी व पाठपुरावा करूनही कोणतीही दखल घेतली जात नसल्याच्या नागरिकांच्या तक्रारी अाहेत. दिवाळीच्या सुटीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या तक्रारींची अद्यापही दखल घेतली नसल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. या परिसरासाठी हे एक मध्यवर्ती उद्यान असल्याने त्याची त्वरित दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातून जोर धरत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे महापालिकेचे स्वप्न पूर्ण होण्याची शक्यता वाढली आहे. या अभ्यासक्रमाच्या मान्यतेसाठी कॉलेज ऑफ फिजिशियन्स अॅण्ड सर्जनचे एक पथक पंधरा दिवसांत मनपा रुग्णालयांच्या पाहणीसाठी येणार आहे. त्यामुळे अभ्यासक्रम सुरू होण्याच्या आशा बळावल्या आहेत. दुसरीकडे या अभ्यासक्रमासाठी खासगी क्षेत्रातील ६६ वैद्यकीय व्यावसायिकांची प्राध्यापकपदी मानधनावर नियुक्ती केली जाणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक राजेंद्र भंडारी यांनी दिली.
महापालिकेच्या माध्यमातून वैद्यकीय पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू करण्याचे प्रयत्न अनेक दिवसांपासून केले जात आहेत. महापालिका आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने हे अभ्यासक्रम सुरू केले जाणार होते. परंतु, करारनाम्यावरून हा सर्व विषय फिस्कटला. त्यामुळे महापालिकेचा हा प्रकल्प पिंपरी-चिंचवड महापालिकेने पळविला. संदर्भसेवेचा प्रयत्नही अयशस्वी झाला. त्यानंतर आता पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी बिटको रुग्णालयाच्या नूतन इमारतीत स्वतंत्र ११ विभाग तयार करण्यात येत आहेत. त्यासाठी महासभेने दीड कोटी रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यतादेखील दिली असून, त्याअंतर्गत सीपीएससी बोर्डाचे परवाना शुल्क, कॉलेज शुल्क, लेक्चर हॉल, डेमो रूम आदींची उभारणी केली जाणार आहे. या दोन वर्षांच्या अभ्यासक्रमांतर्गत प्रत्येक विद्यार्थ्यांकडून मनपाला पाच ते सहा लाखांचे शैक्षणिक शुल्कदेखील उपलब्ध होणार आहे. या शुल्कातून मनपाला अभ्यासक्रमाचा खर्च भागविता येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 7, 2017, 2:30 pm
सुरेश गायधनी यांचा सवाल
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांनी एका पत्राचे उत्तर देताना ‘आपण निवडणूक निर्णय अधिकारी नसल्याने पुन्हा पत्रव्यवहार करू नये’ अशा आशयाचे पत्र दिलेले असताना त्यांना फेरमतमोजणी घेण्याचा अधिकार आहे का, असा सवाल जनस्थान पॅनलचे तत्कालीन उमेदवार सुरेश गायधनी यांनी विचारला आहे.
सुरेश गायधनी यांनी ८ जून रोजी निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना पत्र दिले होते. त्यात नमूद केले होते की, चुकीच्या घटनेचा आधार घेऊन ही निवडणूक घेण्यात आली आहे. नियमानुसार एक वर्ष सभासद नसताना, वेळेवर सभासद फी भरलेली नसताना सभासद यादीत समावेश केला आहे. याबाबत ते पत्र असून नव्याने निवडणुका घेण्यात याव्यात असे नमूद केलेले होते. यावर उत्तर म्हणून संस्थेची पंचवार्षिक निवडणूक संपन्न झाली असून या संदर्भातील फेरफार अर्ज ३० जून रोजी संस्थेने धर्मादाय उपायुक्त यांच्याखडे दाखल केला आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीसंदर्भातील कोणतीही बाब आता माझ्या अखत्यारित राहिलेली नाही. फेरमतमोजणीसंदर्भात धनंजय बेळे यांनी धर्मादाय उपायुक्त यांच्याकडे अर्ज दाखल केला असून, त्यामुळे ही बाब न्यायप्रविष्ट झालेली आहे. न्यायप्रविष्ठ बाबीबद्दल कोणीही काहीही प्रतिक्रिया व्यक्त करणे न्यायोचित होणार नाही. त्यामुळे मी आपल्या निवडणुकीसंदर्भातील कोणत्याही प्रश्नांना उत्तरे देऊ शकत नाही. यासंदर्भात आपण यापुढे माझ्याशी पत्रव्यवहार करू नये अशी विनंती भणगे यांनी केली होती. याचा सरळसरळ अर्थ ‘आपण निवडणूक निर्णय अधिकारी नसल्याने पुन्हा पत्रव्यवहार करू नये’ असा होत असल्याने त्यांना फेरमतमोजणी घेण्याचा अधिकार आहे का, असा सवाल गायधनी यांनी केला आहे.
तीन मतांचा घोळ नेमका कुठे?
३ एप्रिल रोजी झालेल्या मतमोजणीत वाघ यांना ८९४ तर बेळे यांना ८९५ मते पडली होती. आताच्या फेरमतमोजणीत बेळे यांना ८९४ तर वाघ यांना ८९७ मते पडली आहेत. मग ही तीन मते आली कुठून अशी चर्चा काही काळ रंगली होती. निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना याबाबत विचारले असता, ‘मतमोजणी अधिकारी शेवटी माणसेच आहेत. त्यांच्याकडून चुका होणारच. एखादी टीकमार्क खाली वर झाली असेल’ असे उत्तर त्यांनी दिले. तर मते मोजण्यास बसलेल्या बी. जी. वाघ यांच्या एका प्रतिनिधीने, वाघ यांच्या दोन मतांची टीकमार्क हंसराज वडघुले यांच्यापुढे झाली असल्याचे सांगितले.
दोघांपैकी कोणीही निवडून आले असते तरी आमच्यासाठी सारखेच असते. फेरमतमोजणीचे कोणी राजकीय भांडवल करू नये, त्यामुळे वाचनालयाची बदनामी होते. मात्र आता सत्याचा विजय झाला आहे.
- प्रा. विलास औरंगाबादकर, अध्यक्ष सावाना
सावानाला उद्योजकांपेक्षा साहित्यिकांची जास्त गरज आहे. बी. जी. वाघ साहित्यातील माणूस आहे. खरे तर आमच्या एका डोळ्यात हसू आहे तर एका डोळ्यात आसू आहे.
- श्रीकांत बेणी, प्रमुख सचिव, सावाना
फेरमतमोजणी आणि तेथे लागलेला निकाल याविषयी जनस्थान पॅनल एकत्र जमून चर्चा करणार आहे. हा अन्यायही सहन करणार नाही. दिशा ठरवावी लागणार आहे.
- अभय ओझरकर, जनस्थान पॅनल प्रणेते
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 2:30 pm
म. टा. प्रतनििधी, नाशिक
आधारकार्ड एनरोलमेंट आणि अपडेशनबाबत नागरिकांच्या अडचणी दूर व्हाव्यात, यासाठी जिल्हा प्रशासनाने शहरात १७ केंद्रे सुरू केली. परंतु, यापैकी काही सेंटर्सकडे सेंटरचालक फिरकतच नसल्याने तेथील किट जप्त करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
आधारकार्ड काढणे किंवा ते अपडेट करणे या कामांसाठी नागरिकांना आधार सेंटर्सचा शोध घ्यावा लागत आहे. आधार केंद्रांबाबतच्या तक्रारी वाढू लागल्याची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली. शहरातील महापालिकेच्या शाळा, सरकारी कार्यालयांमध्ये एकूण १७ सेंटर्स सुरू करण्यात आली. परंतु, त्यापैकी काही सेंटर्स सुरूच नसल्याचे निदर्शनास आले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसने याबाबत जिल्हा प्रशासनाकडे पाठपुरावा केला. आधार केंद्रे सुरू राहत नसल्याची तक्रार राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी चिन्मय गाडे यांनी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. त्यानंतरही आधार केंद्र सुरू राहत नसल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांनी पंचवटीतील काही केंद्रांना भेट दिली. त्यावेळी ही केंद्र बंद असल्याचे निदर्शनास आले. या केंद्रांवर तत्काळ कारवाई करा, असे आदेश उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी दिले आहेत. सरकारी कार्यालय परिसरात केंद्र सुरू न करणाऱ्या केंद्राचे आधार किट जमा करण्यात येणार असल्याची माहिती मंगरूळे यांनी दिली.
सरकारी कार्यालयांच्या परिसरात जागा उपलब्ध करून देऊनही आधार केंद्र सुरू करण्यात आलेले नाहीत. अशा केंद्रांचे आधार किट जमा करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. अनेक ठिकाणी आधार केंद्र सुरू करण्यात आली असली तरी ते बंद राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. अशा केंद्रांवरही कारवाई केली जाणार आहे.
- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 2:30 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
जिल्ह्यातील इगतपुरी आणि त्र्यंबक नगरपरिषद निवडणुकीचा बिगूल वाजला असून, १० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्ही नगरपरिषदांमध्ये आजपासूनच आचारसंहिता लागू झाली आहे. निवडणूक जाहीर झाल्याने खऱ्या अर्थाने रणधुमाळीला सुरुवात होणार आहे.
राज्यातील विविध १७ नगरपरिषदा/ नगरपंचायतींचे सदस्य व अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मंगळवारी जाहीर केला. त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीसाठी १० डिसेंबर रोजी मतदान घेण्यात येणार असून, ११ डिसेंबरला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्याचा कालावधी १६ ते २२ नोव्हेंबर असेल. नामनिर्देशनपत्रांची छाननी २३ नोव्हेंबरला होणार आहे. न्यायालयात अपील नसलेल्या ठिकाणी २८ नोव्हेंबर, तर अपील असलेल्या ठिकाणी अपिलाचा निर्णय आल्यानंतर तिसऱ्या दिवसापर्यंत नामनिर्देशनपत्रे मागे घेता येणार आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 2:30 pm
म. टा प्रतिनिधी, नाशिक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिजिटल इंडिया संकल्पनेचा नाशिकमध्ये पुरता फज्जा उडाला आहे. जिल्हा प्रशासन, जिल्हा परिषद आणि बँकांमधील समन्वयाच्या अभावामुळे कॅशलेस गावांच्या उपक्रमाला खीळ बसली आहे. परिणामी ‘कॅशलेस’साठी निवडलेल्या गावांतही रोखीनेच व्यवहार सुरू असल्याचे दिसत आहे.
नोटाबंदीनंतर सर्वत्र ‘कॅशलेस’चा डंका पिटण्यात आला. रोखीचे व्यवहार कमी करून कॅशलेस व्यवहारांवर भर देण्याचे आवाहन केंद्र आणि राज्य सरकारकडून केले जात होते. जिल्ह्यात कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण वाढावे यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्न सुरू केले. प्रायोगिक तत्त्वावर १०० गावे कॅशलेस करण्याचा निर्णय झाला होता. याखेरीज बँकांनाही प्रत्येकी दोन गावे कॅशलेससाठी दत्तक घेण्याचे आवाहन करण्यात आले. मात्र, या सर्वच यंत्रणांची अत्यंत संथ गतीने कॅशलेसकडे वाटचाल सुरू आहे. निवड करण्यात आलेल्या बहुतांश गावांमध्ये मार्च २०१७ पर्यंतच कॅशलेस करण्याचे उद्दिेष्ट होते. मात्र, हे उद्दिष्ट पूर्ण होऊ शकलेले नाही.
सिन्नर तालुक्यात चापडगाव कॅशलेस करण्यात आले, तसेच सय्यद प्रिंपी, दरी-मातोरी, भोयेगाव, अवनखेड, अंबोली, अंदरसूल यांसारखी गावेही कॅशलेसच्या प्राधान्य यादीमध्ये घेण्यात आली. सय्यद पिंप्रीमध्ये १० ते १५ व्यावसायिकांनी स्वाइप मशीन खरेदी केली. ही मशीन मिळविण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा काळ गेला. १५ हजार रुपयांचे हे मशिन पेट्रोलपंप, रासायनिक खतांची दुकाने किंवा तत्सम व्यावसायिकांनी खरेदी केले. मात्र, स्वाइपद्वारे अधिक पैसे मोजावे लागत असल्याचा अनुभव पेट्रोलपंप व तत्सम ठिकाणी ग्रामस्थांना आल्याची माहिती शंकर ढिकले यांनी दिली. स्वाइपद्वारे एक हजार रुपयांचे डिझेल भरणाऱ्या ग्राहकांना ३० रुपये अधिक मोजावे लागत होते. त्यामुळे कॅशलेस व्यवहार करणाऱ्यांचे प्रमाण घटले आहे. दिंडोरी तालुक्यातील अवनखेड या गावाचाही कॅशलेसच्या यादीमध्ये समावेश होता. मात्र, या गावातील एकाही दुकानात अद्याप स्वाइप मशीन नाही. त्यामुळे हे गाव अद्याप कॅशलेस झाले नसल्याची माहिती नरेंद्र जाधव यांनी दिली.
कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण कमीच
कॅशलेस ही चांगली संकल्पना असली तरी त्याबाबतची विश्वासार्हता नागरिकांच्या मनात अद्याप निर्माण झाली नसल्याची माहिती एका राष्ट्रीयीकृत बँकेच्या अधिकाऱ्याने दिली. ग्रामीण भागात अद्याप अनेक लोकांचे बँकांमध्ये खाते नाही. गाव कॅशलेस करण्यासाठी सर्वप्रथम सर्व ग्रामस्थांची बँक खाती उघडून ती आधार लिंक करणे अनिवार्य आहे. हीच प्रक्रिया अधिक वेळखाऊ आहे. ‘कॅशलेस’बाबतची अविश्वासार्हता आणि सुप्त भीतीही ग्रामस्थांना अशा व्यवहारांपासून रोखते. ‘कॅशलेस’साठी स्वाइप मशीन आवश्यक असून, पदरमोड करून ते का खरेदी करावे, असा गावातील व्यावसायिकांचा प्रश्न असतो. त्यांना ते मशीन मोफत हवे आहे. अशा सर्व कारणांमुळे कॅशलेस व्यवहारांचे प्रमाण खूप कमी आहेत. तरीही गावोगावी कॅशलेस व्यवहार वाढावेत, यासाठी आम्ही तेथील तरुण पिढीला प्रशिक्षित करीत आहोत, असे या अधिकाऱ्याने सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 7, 2017, 2:30 pm
म. टा. वृत्तसेवा, कळवण
वसंतदादा पाटील सहकारी साखर कारखान्याच्या ३१ व्या गळीत हंगामाच्या माध्यमातून मोठ्या अध्यायाला सुरुवात होणार आहे. कामगारांसह कारखान्याचे भवितव्य पूर्णतः वसाका कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादकांच्याच हातात आहे. या ऐतिहासिक पर्वाचे साक्षीदार होण्यासाठी वसाकाच्या पाठीशी उभे रहा, असे भावनिक आवाहन वसाकाचे मुख्य प्राधिकृत अधिकारी आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.
वसाकाच्या ३१ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ मंगळवारी माजी अध्यक्ष संतोष मोरे यांच्यासह ३१ ऊस उत्पादक सभासदांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी डॉ. आहेर बोलत होते. जिल्ह्यातील इतर कारखान्याच्या बरोबरीने उसाला भाव देण्यासाठी प्राधिकृत मंडळ कटिबद्ध असून कोणत्याही भूलथापांना, अमिषाला बळी न पडता ऊस उत्पादक बांधवांनी वसाकालाच ऊस द्यावा, असे आवाहन आमदार डॉ. राहुल आहेर यांनी केले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत वसाकाचा ३१ वा गळीत हंगाम सुरू करण्यात व्यवस्थापनाला यश आले आहे. वसाका कार्यक्षेत्राबरोबरच कार्यक्षेत्राबाहेरून ऊस गाळपास आणून साडेतीन लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आसवनी प्रकल्पासह सहवीजनिर्मिती प्रकल्पदेखील १७ मेगावॉटने चालविण्यात येणार आहे. तसेच केंद्र शासनाचे ६ कोटींचे अनुदान कारखान्याला मिळणार आहे, अशी माहिती आमदार आहेर यांनी दिली. कळवण येथील ऊस उत्पादक शेतकरी गंगाधर पगार यांनी अहिराणीतून भाषण करून कसमादे परिसरातील सहकारातील एकमेव वास्तू असलेल्या वसाकालाच ऊसपुरवठा करून उर्जितावस्था आणण्याचे भावनिक आवाहन केले. वसाका मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक देवरे, प्राधिकृत अधिकारी केदा आहेर, धनंजय पवार, बाळासाहेब बच्छाव, नितीन पवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कार्यकारी संचालक बी. डी. देसले यांनी केले.
अश्रू अनावर…
वसाकाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी अखेरच्या श्वासापर्यंत प्रयत्न करणाऱ्या स्व. दौलतराव आहेर यांचे स्वप्न आज पूर्णत्वास येत असले, तरी त्यांची उणीव आजच्या कार्यक्रमात जाणवत आहे. त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी ऊस उत्पादक बांधवानी वसाकालाच ऊस पुरवठा करावा, असे आवाहन करताना डॉ. राहुल आहेर यांना अश्रू अनावर झाले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 2:30 pm
फेरमतमोजणीत धनंजय बेळेंवर तीन मतांनी विजय
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
सार्वजनिक वाचनालयाच्या फेरमतमोजणीत ग्रंथमित्र पॅनलच्या बी. जी. वाघ यांचा तीन मतांनी विजय झाला. त्यांना ८९७ मते पडली. त्यांचे प्रतिस्पर्धी जनस्थान पॅनलचे धनंजय बेळे यांचा पराभव झाला असून त्यांना ८९४ मते पडली. या निकालामुळे ग्रंथमित्र पॅनलला एकहाती सत्ता मिळाली असून, त्यांच्या निवडून आलेल्या उमेदवारांची संख्या १७ वरून १८ झाली आहे.
सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेचे निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना फेरमतमोजणीचा अधिकार नसल्याने त्यांना फेरमतमोजणी घेण्यास मनाई करावी अशा आशयाचा धनंजय बेळे यांचा अर्ज दिवाणी न्यायलयाने फेटाळल्याने धनंजय बेळे आणि भालचंद्र वाघ यांच्यात फेरमतमोजणी करण्याचा मार्ग मोकळा झाला. त्यानुसार मंगळवारी मु. शं. औरंगाबादकर सभागृहात ही फेरमतमोजणी घेण्यात आली.
सकाळी ८ वाजता फेरमतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ झाला. सीलबंद मतपेट्या औरंगाबादकर सभागृहात आणण्यात आल्या. त्यानंतर पार पडलेल्या अनेक सोपस्कारानंतर ८.४५ वाजता फेरमतमोजणीस प्रत्यक्षात सुरुवात झाली. प्रारंभीच धनंजय बेळे यांचे प्रतिनिधी सुरेश गायधनी यांनी निवडणूक निर्णय अधिकारी माधवराव भणगे यांना ही फेरमतमोजणी बेकायदेशीर असून, ती मान्य नसल्याचे पत्र दिले. भणगे यांनी ते पत्र स्वीकारून त्यावर नंतर विचार करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर मतमोजणीच्या आठ फेऱ्या झाल्या. या आठ फेऱ्यांमध्ये कधी धनंजय बेळे पुढे तर कधी बी. जी. वाघ यांना मताधिक्य आढळून आले. शेवटी आठ फेऱ्यांनंतर १२.१५ वाजता वाघ तीन मतांनी पुढे असल्याची चर्चा सुरू झाली. त्यानंतर शहानिशा झाल्यावर १.०५ वाजता भणगे यांनी निकाल जाहीर केला. त्यानुसार बी. जी. वाघ हे तीन मतांनी निवडून आले. निकाल जाहीर होताच ग्रंथमित्र पॅनलने एकच जल्लोष केला. उपाध्यक्ष नानासाहेब बोरस्ते यांच्या हस्ते वाघ यांचा सत्कार करण्यात आला.
फेऱ्यांनिहाय मोजणी
धनंजय बेळे यांना पहिल्या फेरीत १२१ तर बी. जी. वाघ यांना पहिल्या फेरीत ११५ मते पडली. दुसऱ्या फेरीत बेळे यांना १०९, वाघ यांना १२४, तिसऱ्या फेरीत बेळे यांना १२०, वाघ यांना ११९, चौथ्या फेरीत बेळे ११४, वाघ १२६, पाचव्या फेरीत बेळे ११४, वाघ १२६, सहाव्या फेरीत बेळे १२१, वाघ ११६, सातव्या फेरीत बेळे यांना ११८ तर वाघ यांना १२० मते पडली तर आठव्या फेरीत बेळे यांना ६४ तर वाघ यांना ६९ मते पडली. निकालासाठी बेळेंना ८९४ तर वाघ यांना एकूण ८९७ मते पडली. एकूण मते १९९५ होती पैकी १११ मते बाद होती. १८८४ मते मोजायची होती.
मी निवडणूक प्रक्रियेचा आदर करतो. सावानाशी माझे फार जुने ऋणानुबंध आहेत. यश-अपयश हा वेगळा भाग आहे. या विजयाकडे मी तटस्थपणे पाहतो. विजयामुळे हुरळून जाण्याचे काही कारण नाही. हा विजय पॅनलचा आहे, असे मी समजतो. मी अनेकदा या प्रक्रियेतून माघार घेण्याचा प्रयत्न केला परंतु निवडणूक प्रकिया सुरू झाल्यामुळे तसे करता येत नव्हते. मात्र माझे वाचनालयावर फार प्रेम आहे.
- बी. जी. वाघ, विजयी उमेदवार
अपेक्षेप्रमाणे निकाल लागला. ही सर्व निकाल लावून घेण्याची धडपड होती. दोन दिवसांपूर्वी मतपेट्या फोडण्यात आल्या होत्या. कामकाज पाहणाऱ्यांचे संगनमत होते. सर्वांच्या संगनमताने हे घडले आहे. नाशिककरांना हा निकाल माहीतच होता. पुढील निर्णय वकिलांशी बोलून घेण्यात येईल. निवडून आलेल्या वाघ यांचे मी अभिनंदन करतो.
-धनंजय बेळे, पराभूत उमेदवार
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 2:30 pm
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
महापालिकेच्या ३५ व्या वर्धापनदिनानिमित्त मंगळवारी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यक्रमांबाबत नाशिककरांसोबतच प्रमुख पदाधिकारी, नगरसेवक व कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड निरुत्साह दिसून आला. पदाधिकाऱ्यांनी किरकोळ कार्यक्रमांना हजेरी लावून मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमांपासून लांब राहणेच पंसत केले. गायकवाड सभागृहातील मुख्य सांस्कृतिक कार्यक्रमाला फक्त शंभर लोकांनी हजेरी लावल्याने संपूर्ण वर्धापन दिन कार्यक्रमाचा फियास्को झाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे यातील ५० जण हे अधिकारी व कर्मचारी होते. त्यामुळे वर्धापन दिनावर केलेला खर्चही वाया गेला आहे.
मंगळवारी पालिकेचा ३५ वा वर्धापन दिन विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला. सालाबादप्रमाणे महापालिका मुख्यालयासह विभागीय कार्यालयांना विद्युत रोषणाई करण्यात आली होती. सकाळी महापौरांच्या हस्ते सत्यनारायणाची विधिवत पूजा करण्यात आली. उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृह नेते दिनकर पाटील, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, मनसेचे गटनेते सलीम शेख, भाजप गटनेते संभाजी मोरुस्कर, शिवसेना गटनेते विलास शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते गजानन शेलार यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर कर्मचाऱ्यांचेच रक्तदान करण्यात आले. सायंकाळी मुंबई नाका येथील दादासाहेब गायकवाड सभागृहात आरएम ग्रुपच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
पालिकेचा मुख्य सोहळा असल्याने या ठिकाणी महापौरांसह पदाधिकाऱ्यांनी हजेरी लावणे आवश्यक होते. निदान उद््घाटन तरी महापौर करतील अशी अपेक्षा होती. परंतु, महापौरांसह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी अंतर राखले. त्यामुळे शहर सुधारणा समितीच्या सभापतींसह अतिरिक्त आयुक्तांकडून कार्यक्रमाचे उद््घाटन करण्यात आले. या सोहळ्याला केवळ शंभरच्या आसपास लोकांनीच उपस्थिती लावली. त्यातील निम्मे लोक हे अधिकारी व कर्मचारीच होते. अवघे ५० च्या आसपास प्रेक्षक या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाला गर्दी दिसावी म्हणून पालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना उपस्थित राहण्याचे परिपत्रक काढण्यात आले होते. परंतु, कार्यक्रम सुरू झाला तरी कर्मचारी उपस्थित नव्हते. कार्यक्रम संपत असताना फक्त ५० ते ६० कर्मचारी सभागृहात हजर होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची संख्या पाच हजार आहे. त्यामुळे निम्मे कर्मचारी उपस्थित राहिले असते तरी कार्यक्रम यशस्वी झाला असता. परंतु, पदाधिकाऱ्यांपाठोपाठ कर्मचाऱ्यांनीही प्रचंड अनास्था दाखवल्याने कार्यक्रमाचा फियास्को झाला.
फिरती प्रयोगशाळा अर्पण
अगस्त्य फाउंडेशन व एबीबी कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक महानगरपालिका शाळांसाठी तिसरी फिरती प्रयोगशाळा बस या वाहनाचा लोकार्पण सोहळा सकाळी अकरा वाजता महापौर रंजाना भानसी यांचे हस्ते राजीव गांधी भवन येथे झाला. या प्रयोगशाळेसाठी कर्मचारी वर्गही याच संस्था देणार असून प्रत्येक शाळेत जाऊन मार्गदर्शन केले जाणार आहे. सोबतच कर्मचाऱ्यांच्या वतीने रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. सकाळी महापालिका मुख्यालयात सत्यनारायण पूजा करण्यात आली.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 2:59 pm
म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा
नोटाबंदीनंतर सर्वाधिक फटका महिला वर्गाला बसला. महिलांना किचनचे बजेट सावरणे कठीण झाले. दैनंदिन गरजा भागविणे कठीण झाले. मात्र, पंतप्रधानांच्या निर्णयातून उद्या नक्की काही तरी चांगले होईल, असा आशावाद बाळगल्याचे मत महिला वर्गाने व्यक्त केले.
उद्देश साध्य झाला का?
नोटाबंदीनंतर काही महिने आर्थिक नियोजन करताना प्रचंड त्रास झाला. घरातील बजेट कोलमडले. अनेक बाबतीत तडजोड करावी लागली. परंतु ज्या उद्देशाने सरकारने नोटाबंदी केली तो उद्देश देशहिताचा होता. म्हणून दोन तीन महिने झालेली गैरसोय सहन केली. मात्र, त्याचे परिणाम काय झाले हे सरकारने जाहीर करणे आवश्यक आहे.
- अनिता वाघ
आर्थिक नुकसान झाले
नोटाबंदी जाहीर झाली त्यावेळी बँकेत खात्यावर पुरेसे पैसे होते. त्या पैशांची शेतीच्या रब्बी हंगामातील भांडवलासाठी मोठी गरज होती. मात्र, बँकेत खात्यावर पैसे असूनही काढता आले नाही. परिणामी शेतीसाठी भांडवल उपलब्ध झाले नाही. भांडवलाअभावी रब्बी हंगाम वाया गेला.
- हिराबाई मोरे
देशप्रेमापोटी सर्व सहन केले
नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलन टंचाईमुळे सामान्य नागरिकांना हकनाक त्रास सहन करावा लागला. स्वतःचेच पैसे वापरण्यावरही बंधने लादण्यात आली. देशहिताचा निर्णय असल्याचे त्रास सहन केला. नोटाबंदीनंतर कित्येक गरजा कमी केल्या. परंतु, आता सामान्य नागरिकांना या नोटाबंदीच्या ऐतिहासिक निर्णयाचा फायदा लोकहिताच्या कामांमधून दिला पाहिजे.
- सपना चव्हाण
देशाच्या तिजोरीत भर
नोटाबंदीच्या मास्टर स्ट्रोकद्वारे पंतप्रधानांनी काळे धन जमा करणाऱ्यांना मोठा दणका दिला. देशाच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणात काळ्या धनाचा पैसा जमा झाला. त्यामुळे सरकारला आता हा पैसा लोकोपयोगी कामांसाठी वापरता येईल. अर्थव्यवस्था पोखरणाऱ्या बोगस कंपन्यांनाही टाळे लागले. जमा महसुलाचा वापर गोरगरिबांच्या हितासाठी वापरण्याचे भान केंद्र सरकारने राखले पाहिजे.
- माधुरी पवार
संपत्ती विकेंद्रीकरणास हातभार
नोटाबंदीनंतर गेल्या वर्षभरात भ्रष्टाचाराला आळा बसला आहे. गैरमार्गाने संपत्ती जमा करणाऱ्यांचे पितळ उघडे पडल्याने बेकायदेशीर जमा केलेली संपत्ती आता आपोआप उजेडात आली आहे. सामान्यांसाठी हा निर्णय काही महिन्यांसाठी गैरसोयीचा ठरला असला तरी संपत्तीचे विकेंद्रीकरणास हा निर्णय काही प्रमाणात तरी फायदेशीर ठरला आहे. त्याचा फायदा सामान्य नागरिकांनाच झाला आहे. याशिवाय पैशांचे मूल्यही अधोरेखांकित झाले.
- प्रांजल देशमन
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 7, 2017, 3:04 pm
म. टा. वृत्तसेवा, सटाणा
१९ वर्ष वयोगटाखालील महाराष्ट्र राज्य महिला फुटबॉल संघात वीरगाव येथील कश्मिरा देवरे या विद्यार्थिनीची सलग तिसऱ्यांदा निवड झाली आहे. ओरिसा येथे होणाऱ्या आगामी राष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत ती महाराष्ट्र राज्याच्या संघात गोलकीपर म्हणून प्रतिनिधीत्व करणार असून, या संघात नाशिक जिल्ह्यातून निवड होणारी ती एकमेव विद्यार्थीनी ठरली आहे.
कश्मिरा ही राष्ट्रवादी प्रांतिकेच सदस्य एस. टी. देवरे यांची नात असून, कळवण येथील शरद पवार पब्लिक स्कूलमध्ये ११ वी विज्ञान शाखेत ती शिक्षण घेत आहे. विद्यालयाच्या शालेय महिला फुटबॉल संघाने गत तीन वर्षाच्या कालावधीत तालुका, जिल्हा, विभागीय व राज्य पातळीपर्यंत दरवर्षी मजल मारून संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले आहे. या संघाच्या विजयात कश्मिराचे मोठे योगदान होते. वैयक्तिक कामगिरीच्या जोरावर राज्याच्या संघात सलग तिसऱ्यांदा स्थान मिळविण्यात तिला यश आले आहे.
उस्मानाबाद येथे नुकत्याच राज्यस्तरीय अंडर नाइंटनि महिला फुटबॉल स्पर्धा पार पडल्यानंतर ओरिसा येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र राज्याच्या संघाची निवड जाहीर करण्यात आली आहे. या स्पर्धेसाठी राज्यभरातून १३ खेळाडू निवडण्यात आले. त्यात कश्मिराचा समावेश आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 3:06 pm
म. टा. वृत्तसेवा, नाशिक
महाराष्ट्र टग ऑफ वॉर (रस्सी खेच) असोसिएशनच्या मान्यतेने व जिल्हा टग ऑफ वॉर असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने नाशिक जिल्हा टग ऑफ वॉर मुले, मुली, पुरूष व महिला गटासाठी जिल्हा निवड चाचणी होणार आहे. बुधवारी सकाळी १० वाजता छत्रपती शिवाजी स्टेडिअम येथे ही चाचणी होईल. निवडलेला संघ राज्य स्पर्धेसाठी खेळणार आहे.
वयोगट व वजनगट खालीलप्रमाणे
१३ वर्षाखालील मुली
वजन – ३४० किलो
१३ वर्षाखालील मुले
वजन- ३८० किलो
दोन्हींसाठी जन्मतारीख १ जानेवारी २००५ नंतर
….
१५ वर्षाखालील मुली
वजन- ३६०किलो
१५ वर्षाखालील मुले
वजन – ४४० किलो
दोन्हींसाठी जन्मतारीख १ जानेवारी २००३ नंतर
….
१७ वर्षाखालील मुली
वजन- ४०० किलो व ४२० किलो
१७ वर्षाखालील मुले
वजन – ४८० किलो व ५०० किलो
दोन्हींसाठी जन्मतारीख १ जानेवारी २००१ नंतर
…
१९ वर्षाखालील मुली
वजन ४६० किलो व ४४० किलो
१९ वर्षाखालील मुले
वजन- ५४० किलो व ५०० किलो
दोन्हींसाठी जन्मतारीख १ जानेवारी १९९९ नंतर
….
महिला गट
वजन ४८० किलो
वयाची अट नाही पण १० वी पास असणे आवश्यक
पुरूष गट
वजन – ६४० किलो
वयाची अट नाही पण १० वी पास असणे आवश्यक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 3:15 pm
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
माय लेकास तरुणाने बेदम मारहाण केल्याची घटना नाशिकरोड परिसरातील सानेगुरूजी नगरात घडली. या प्रकरणी संशयित तरुणाविरूध्द उपनगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रोहीत मिलिंद साळवे (वय २७ जिजामाता नगर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. जिजामातानगर येथील आरंभ कॉलेज भागात राहणारा अभिजीत तेजाळे (वय २१) या युवकाने दिलेल्या फिर्यादीनुसार, अभिजीत रविवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास साने गुरुजी नगर येथील आशुतोष किराणा दुकानाजवळ उभा होता. यावेळी लाकडी दांडा हातात घेवून, आलेल्या संशयिताने कुठलेही कारण नसतांना त्यास मारहाण केली. यावेळी रोहितच्या मदतीला आई कविता तेजाळे या धावून आल्या.
वृद्ध महिलेचा मृत्यू
पलंगावरून पडल्याने गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. उपनगर पोलिस स्टेशनमध्ये आकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. नंदा रघूनाथ कदम (वय ७२, रा. खोडदेनगर, नाशिकरोड) असे मृत वृध्देचे नाव आहे.
वडाळागावात जुगारी ताब्यात
वडाळागावातील संजेरी मार्गावर जुगार खेळणाऱ्या चार संशयितांना पोलिसांनी अटक केली. संशयितांच्या ताब्यातून रोकडसह जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले. या प्रकरणी इंदिरानगर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रविवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास पोलिसांनी ही कारवाई केली. हमिद रशिद खान व त्याचे तीन साथीदार जुगार खेळतांना मिळून आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 3:17 pm
म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ साठी पालिकेकडून ४ जानेवारी २०१८ पासून प्रत्यक्षाम सर्वेक्षण होणार आहे. गेल्यावर्षीच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानांतगर्त देशातील पाचशे शहरात मालेगाव महापालिकेला २४९ वा क्रमाक मिळाला होता. त्यात सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न केले जाणार असून, शहर स्वच्छतेबाबत नागरिकांनी सक्रीय व्हावे, असे आवाहन येथील महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांनी केले
स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या अंमलबजावणी संबंधी पालिका सभागृहात मंगळवारी सर्व अधिकारी, कर्मचारी, स्वच्छता निरीक्षक, स्वच्छता ठेकेदार यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीस उपायुक्त अंबादास गरकल, डॉ. प्रदीप पठारे, राजू खैरनार, पंकज सोनवणे, परितोष हिरे यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.
पत्रकारांशी बोलतांना त्यांनी स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत केल्या जाणाऱ्या कामकाजासबंधी माहिती दिली. शहर हागणदारीमुक्त केल्यानंतर आता पालिका प्रशासन स्वच्छ सर्वेक्षण २०१८ च्या तयारीला लागले आहेत. यासाठी कंत्राटीपद्धतीने चारही प्रभाग समित्यांचा स्वच्छतेचा ठेका देण्यात येणार असून, संबंधित ठेकेदारावर त्या प्रभागातील सर्व कचरा संकलनाची जबाबदारी असणार आहे. याबाबतचा ठराव लवकरच महासभेपुढे ठेवण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच स्वच्छता निरीक्षक देखील बदलण्यात येणार आहेत. प्रभागातील स्वच्छता कर्मचारी वेळेवर हजर राहतात की नाही यासाठी हजेरी सेंटरवर बायोमेट्रिक कार्यन्वित केले जाणार आहेत. घंटागाड्यांवर जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून मेपिंगचे काम सुरू आहे. स्वच्छ सर्वेक्षणअंतर्गत नागरिकांचा सहभाग देखील महत्त्वाचा असून, नागरिकांनी ओला व सुका कचरा असे वर्गीकरण करावे, कचराकुंडीचा वापर करावा व स्वच्छतेबाबतच्या तक्रारी कळवाव्यात असे आवाहन त्यांनी केले.
स्वच्छतेबाबत करा तक्रार
या अभियानअंतर्गत नागरिकांना स्वच्छतेबाबतच्या तक्रारी कळवता येणार आहेत. पालिकेतर्फे १८०८३३१५०० हा टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. तसेच स्मार्टफोन यूजर्स मोबाइलद्वारे स्वच्छता हे अॅप डाऊनलोड करून त्यावर स्वच्छतेबाबत फोटो टाकून तक्रार करू शकतात. यावर करण्यात आलेल्या तक्रारीचे निरसन पालिका प्रशासनाकडून झाले की नाही याचा फिडबॅक देखील देता येणार आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
↧
November 7, 2017, 3:19 pm
म. टा. वृत्तसेवा, निफाड
विद्यार्थ्यांना शैक्षणिक कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी सादर करावयाच्या प्रतिज्ञापत्रासाठी लासलगाव येथील मंडल अधिकारी हे विद्यार्थ्यांची अडवणूक करत असल्याची अनेक विद्यार्थ्यांची तक्रार आहे. आपले शिक्षण पूर्ण करायचे की कागदपत्रांसाठी चकरा मारायच्या, असा संतप्त सवाल विद्यार्थ्यांनी उपस्थित केला आहे.
लासलगाव येथे मंडळ अधिकारी म्हणून चंद्रशेखर नगरकर हे कार्यरत आहेत. २३ गावांचा संपूर्ण कारभार नगरकर बघतात. लासलगाव शहरात चार महाविद्यालये व सहा शिक्षण संस्था आहेत. या शिक्षण संस्थेत अनेक विद्यार्थी लासलगाव क्षेत्राच्या बाहेरून शिक्षणासाठी लासलगावमध्ये येतात.
मात्र हद्दीच्या कारणावरून ‘तुमचे गाव माझ्या अधिकारात येत नाही, त्यामुळे मला प्रतिज्ञापत्र करता येत नाही’, असा सल्ला विद्यार्थ्यांना दिला जातो. तसेच ‘तुम्ही निफाडला जा तुमचे काम होईल’, असा फुकटचा सल्लाही मंडलाधिकारी देतात. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
लासलगावच्या लोकप्रतिनिधींनी अनेकवेळा या मंडल अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांची अडवणूक न करण्याबाबत सांगितले होते. मात्र ते आपल्या निर्णयावर ठाम राहून अनेक विद्यार्थ्यांना खेटा घालायला भाग पाडतात, अशी तक्रार विद्यार्थ्यांनी केली आहे.
लासलगावचे मंडळ अधिकारी नगरकर यांच्या विरोधात अनेक विद्यार्थ्यांनी वेळोवेळी तक्रारी केल्या आहेत. विद्यार्थ्यांची त्यांनी अडवणूक केली तर मंडलाधिकारी कार्यालयाला टाळे ठोकले जाईल.
- जयदत्त होळकर, उपसरपंच, लासलगाव
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 3:20 pm
म. टा. वृत्तसेवा, निफाड
तालुक्यातील पिंपळगाव बसवंत येथील कृषी विभागाच्या रोपवाटिकेतून नैताळे येथील शेतकरी भागवत बोरगुडे यांनी भगवा जातीचे डाळिंबाचे रोप खरेदी केले होते. मात्र हे रोप बोगस निघाल्याने त्यांचे नुकसान झाले. त्यांनी नाशिक येथील ग्राहक तक्रार मंचात तक्रार दाखल केली. त्यांच्या बाजूने निकाल लागूनही त्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात असल्याने, अखेर त्यांनी आपली बाग जेसीबी मशिनने काढून टाकली आहे.
कृषी विभागाच्या पिंपळगाव बसवंत येथील रोपवाटीकेतून सन २०१२ मध्ये डाळिंब लागवडीसाठी जवळपास १४० शेतकऱ्यांनी रोपे खरेदी केली होती. खरेदी केलेल्या वानामध्ये भगवा ऐवजी इतर जंगली जातीचा समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादनात लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागला. नैताळे येथील भागवत बोरगुडे यांनी शासनावर संताप व्यक्त करत कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार केली होती.
याप्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाई व्हावी व बोगस रोपामुळे उत्पादनात लाखो रुपयांचा तोटा झाल्याने भरपाई मिळावी, यामागणीसाठी त्यांनी ग्राहक तक्रार निवारणाकडे धाव घेतली. न्याय मंचाने त्यांच्या बाजूने निकाल दिला. दोषी अधिकाऱ्यांनी तक्रारदार शेतकऱ्यांला तीन लाख रुपये भरपाई द्यावी, तसेच १० डिसेंबर २०१४ पासून प्रत्यक्ष रक्कम मिळेपर्यंत द.सा.द.शे.१० टक्के प्रमाणे व्याज अदा करावे, तसेच तक्रारदाराच्या मानसिक त्रासापोटी दहा हजार रुपये तर अर्ज व इतर खर्चापोटी पाच हजार रुपये द्यावे असा निकाल दिला होता.
मात्र हा निकाल कृषी विभागाने झुगारून दिला आहे. यातील दोषी अधिकाऱ्यांनी न्यायालयात अपील केले आहे. दरम्यान या सर्व शासकीय गोंधळनाने संतापलेल्या बोरगुडे यांनी जेसीबी मशिनने डाळिंब बाग काढून टाकली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या रोपवाटिकेतून
फसवणूक झाली आहे. तक्रार निवारण मंचाने माझ्या बाजूने निकाल देवूनही मला न्याय मिळाला नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करुनही दोषी अधिकाऱ्यांवर कार्यवाई होत नाही.
- भागवत बोरगुडे, नैताळे
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧
November 7, 2017, 3:22 pm
म. टा. वृत्तसेवा निफाड
गेल्या वर्षी ८ नोव्हेंबर रोजी करण्यात आलेल्या नोटबंदीला आज एक वर्ष, तर भारतीय जनता पक्षाच्या सरकारला तीन पूर्ण होत आहे. सर्वच आघाड्यांवर भाजप सरकार अपयशी ठरल्याच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपवर टीका केली आहे. तसेच ‘अच्छे दिनाचे तृतीय पुण्यस्मरण’ असे फलक राष्ट्रवादीकडून निफाड येथील चौकांमध्ये लावण्यात आले आहेत. बुधवारी निफाड तहसीलसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत.
वाढती महागाई, नोटबंदी, शेतकरी कर्जमाफीतील घोळ आणि जीएसटीामुळे शेतकरी व सर्वसामान्य माणसांचे कंबरडे मोडले आहे. मोदी सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून युवकांची फसवणूक केली आशा प्रकारचा आशय या फलकावर आहे. फलकावर शोकाकुल म्हणून राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष अनिल कुंदे व विक्रम रंधवे यांची नावे टाकली आहेत.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट
↧