खादीच्या वापराचा थेट लाभ ग्रामविकासाच्या संकल्पनेस होतो. त्यामुळे खादीच्या वापराला दैनंदिन जीवनात प्राधान्य देत ग्रामविकासाच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी तुमचे योगदान द्या, असे आवाहन विभागीय आयुक्त महेश झगडे यांनी केले.
महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळातर्फे हुतात्मा स्मारक येथे आयोजित ‘महाखादी’ यात्रेस झगडे यांनी भेट देऊन प्रदर्शनाची माहिती घेतली. त्या वेळी ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन, पोलिस आयुक्त रवींद्र सिंगल, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी रमेश सुरुंग आदी उपस्थित होते.
झगडे यांनी प्रदर्शनात असलेल्या विविध वस्तूंसोबतच सूतकताई यंत्राची सविस्तर माहिती घेतली. खादी प्रसारासाठी अत्यंत जुन्या पद्धतींची माहिती देण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी जिल्हाधिकारी आणि पोलिस आयुक्तांसह चरखा चालवून सूत कताई केली.
सोमवारी यात्रेचा अखेरच्या दिवशी शालेय विद्यार्थ्यांसह अनेक नागरिकांनी यात्रेला भेट देऊन चरख्याविषयी जाणून घेतले. शालेय विद्यार्थ्यांनी चरख्याची माहिती घेण्यात विशेष रस दाखविला. विद्यार्थ्यांना चरख्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. पेटी चरखा, बूक चरखा, अंबर चरखा, सोलर चरखा, गांधी चरखा आदी चरख्याचे विविध प्रकार एकाच ठिकाणी यात्रेच्या निमित्ताने पाहता आले. खादीच्या विकासातील विविध टप्प्यांची माहिती यानिमित्ताने देण्यात आली.
खादीच्या वस्तूंना चांगली मागणी
खादी ग्रामोद्योग मंडळातर्फे ग्रामोद्योगाला चालना देण्यासाठी अनेक योजना व उपक्रम राबविण्यात येतात. त्या माध्यमातून तयार झालेल्या उत्पादनांच्या विक्रीलादेखील चांगला प्रतिसाद लाभला. दुपारपर्यंत २ लाख ३८ हजार रुपयांच्या वस्तूंची विक्री करण्यात आली. त्यात खादी कापड, अमरावती सोलर चरख्याने तयार केलेले खास कोट, चपला, हर्बल उत्पादने, मातीच्या वस्तू, तांब्याच्या कलात्मक वस्तू आदींचा समावेश होता. प्रदर्शनास भेट देणाऱ्या नागरिकांसाठी दिंडोरी तालुक्यातील संस्थेने बनविलेला मातीचा फ्रीज विशेष आकर्षण होते. राज्यातील एकूण २० जिल्ह्यांना ही यात्रा भेट देणार आहे. नाशिक हा या क्रमवारीतील सातवा जिल्हा आहे. प्रत्येक जिल्ह्यात तीन दिवस प्रदर्शनाचे आयोजन करून खादीचा प्रसार करण्यात येत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट