तपोवनातील साधुग्रामसाठी असलेल्या महापालिकेच्या खुल्या जागेवर पुन्हा झोपड्यांचे अतिक्रमण झाले आहे. या जागेवरील झोपड्या एक महिन्यापूर्वीच काढण्यात आल्या होत्या. पुन्हा त्याच जागेवर झोपड्या उभ्या करण्यात आल्या आहेत. येथे वारंवार होणाऱ्या अतिक्रमणावर कायम स्वरुपीची उपाय योजना का केली जात नाही असा प्रश्न पडत आहे.
तपोवनातील महापालिकेची जागा सिंहस्थ कुंभमेळा संपल्यानंतर मोकळीच पडून असते. या मोकळ्या जागेवर जडीबुटी विक्री करणारे, विविध ठिकाणी मजुरी करणारे तसेच म्हैशी, उंट असे प्राणी पाळणारे लोक येथे पाल टाकण्यास सुरुवात करतात. या पालांची संख्या वाढत जाऊन येथील सर्वच परिसर व्यापून टाकतात. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाला कधी तरी जाग येते आणि ते येथील अतिक्रमण काढण्याची मोहीम राबवतात. येथील पाल काढले जातात. मात्र, थोड्याच दिवसात पुन्हा ते उभेही राहतात. भुछत्रांसारखी त्यांची संख्या वाढत जाते.
तपोवनात वाढलेल्या झोपड्यांमुळे त्यांना लागणारे पाणी, स्वच्छता आदींच्या समस्या निर्माण होतात. एकीकडे शहर पूर्णपणे हागणदारीमुक्त झाल्याच्या घोषणा केल्या जातात. तर अशा अनधिकृतपणे झोपड्यांमधील नागरिकांच्या उघड्यावरील शौचास बसल्याने होणाऱ्या आरोग्याच्या समस्या वाढत आहेत. त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. पाण्यासाठी हे लोक जनार्दन स्वामी आश्रमाच्या पश्चिमेला असलेल्या सार्वजनिक नळाकडे जातात. त्यासाठी त्यांना रस्ता ओलांडून ये-जा करावी लागते. तपोवनाच्या मुख्य मार्गाने वाहतुकीची वर्दळ वाढलेली आहे. या झोपड्यांमधील महिला, लहान मुले हा रस्ता सतत ओलांडतात. त्यामुळे अपघाताची भीती वाढली आहे.
जागेचा करा सदुपयोग
मोकळ्या जागेचा उपयोग महापालिकेने चांगले उपक्रम राबविण्यासाठी केला पाहिजे. जेणेकरून त्यातून महापालिकेला उत्पन्न मिळू शकेल. एक ते दीड वर्ष या जागेचा वापर आणि त्यानंतर सिंहस्थ येईपर्यंत ही जागा नुसती पडून असते. त्यामुळे तेथे अशा प्रकारचे अतिक्रमण होतच राहणार आणि ते काढण्यासाठी पुन्हा महापालिकेची यंत्रणेचे वेळ वाया जाणार अशीच स्थिती बघायला मिळत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट