Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सापांचा मुक्त संचार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

येथील उड्डाणपुलाखालील नवले चाळीत विषारी साप व नागांची घुसखोरी सुरू झाल्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या आठ दिवसांत सर्पमित्रांच्या मदतीने येथून सुमारे दहा साप पकडून निसर्गात सोडून देण्यात आले आहेत. परिसरातील गवत साफ करून सापांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

प्रेस मेनगटजवळील प्रेसच्या मालकीच्या साडेतीन एकर जागेवर गवताचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळेच सापांचा वावर वाढल्याची रहिवाशांची तक्रार आहे. नाशिक-पुणे मार्गावर प्रेस मेनगेटवर पूर्वी प्रेस कामगारांसाठी चाळी होत्या. नेहरूनगरला वसाहत झाल्यानंतर या चाळी हटविण्यात आल्या. प्रेसचे महामंडळात रुपांतर झाल्यानंतर येथे मैदान तयार करण्यात आले. या मैदानावर २०११ पर्यंत प्रेसच्या खेळाडूंसाठी इनडोअर स्टेडियम तयार करण्याचे नियोजन होते. महामंडळाचे तत्कालीन अध्यक्ष एस. एस. राणा यांच्या हस्ते भूमिपूजनही झाले. त्यानंतर मैदानाकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रेस कामगारांतर्फे गणेशोत्सव, सभा, संमेलन व करमणूक कार्यक्रम नाशिकरोड पोलिस ठाण्याशेजारील मैदानात साजरे केले जातात.

पूर्वेकडील नवले चाळीकडील भागात आता पाच-सहा फूट उंचीचे गवत व काटेरी झुडपे उगवली आहेत. येथे अस्वच्छताही पसरली असून, त्यामुळे सापांचा वावर वाढला आहे. हे साप नवले चाळीतील नागरिकांच्या घरात घुसखोरी करत आहेत. जवळच पोलिस लाइन, शासकीय चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. त्यांच्याही घरात सापांचा शिरकाव वाढला आहे.

--

मैदानाची करावी स्वच्छता

या मैदानातील काटेरी झुडपे, गवत काढून साफसफाई करावी, कचरा हटवावा व मैदान स्वच्छ ठेवावे, अशी मागणी नागरिकांनी प्रेसकडे केली आहे. परंतु, कार्यवाही झालेली नाही. प्रेस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच सापांची समस्या निर्माण झाल्याची त्यांची तक्रार आहे. प्रेसने या मैदानाची साफसफाई करून स्टेडियम उभारावे, अशी मागणी गवळी समाजाचे अध्यक्ष जगन गवळी, दीपक नागमोती, महेश कोळसे पाटील, प्रकाश सानप, अशोक नेहे आदी रहिवाशांनी केली आहे.

--

नाशिकरोड प्रेस व्यवस्थापनाने नवले चाळीशेजारील आपल्या मालकीच्या साडेतीन एकर जमिनीची स्वच्छता करावी, गवत व काटेरी झुडपे काढावीत. विषारी सापांचा नवले चाळीतील रहिवाशांना दंश होण्याआधीच ही कार्यवाही त्वरित करावी. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल.

-जगन गवळी, स्थानिक रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नायलॉनच्या मांजाला ‘ढील’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

न्यायालयाने नायलॉन मांजाच्या वापरावर बंदी घातली असतानादेखील नाशिक शहरातील काही भागांमध्ये या धोकादायक मांजाची खुलेआम विक्री होत असल्याची स्थिती आहे. प्रशासन मात्र हातावर हात ठेवून बसले असल्याचे चित्र दिसून येत आहे.

संक्रांतीचा आनंद साजरा करण्याच्या हेतूलाच त्यामुळे हरताळ फासला जात असून, वेळीच या मांजाची विक्री रोखल्यास संभाव्य दुर्घटना टळू शकतील, असे मत नागरिक व्यक्त करीत आहेत. विशे, म्हणजे बंदी घातलेल्या या मांजाची विक्री अव्वाच्या सव्वा दराने होत आहे. नायलॉनच्या मांजामुळे पशू-पक्षी, पर्यावरणास मोठी हानी होत आहे. अनेक वेळा नायलॉनमुळे अपघात झालेले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. त्यामुळे नायलॉनच्या मांजावरील बंदीची कडक अंमलबजावणी करावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

इमारती, झाडांवर अडकलेला मांजादेखील तितकाच घातक आहे. ही बाब लक्षात घेता जिल्ह्यात नायलॉन मांजानिर्मिती, विक्री व वापरावर बंदी घालण्यात आली होती. त्यापाठोपाठ पोलिस आयुक्‍तालयातर्फे नायलॉन मांजावर बंदी घालण्यात आलेली आहे. मात्र, असे असतानाही बंदी केवळ कागदावरच असल्याचे चित्र आहे. जुने नाशिक परिसरासह शहरातील बहुतांश पतंग व मांजा विक्रेत्यांकडे सर्रासपणे नायलॉन मांजाची विक्री होत आहे. उलट बंदी असल्याने मांजाची अव्वाच्या सव्वा किमतीत विक्री होत आहे. यावर पोलिसांची भूमिका मात्र बघ्याचीच असल्याचे चित्र आहे. भद्रकालीतील काही दुकानांमध्ये होलसेल व्यापारीदेखील या मांजाची खरेदी करीत असून, ग्राहक पाहून मांजा दाखवला जात आहे.

--

येथे होतेय विक्री

शहरातील भद्रकाली, रविवार पेठ येथे या मांजाच्या विक्रीने जोर पकडला असून, मागील दरवाजाने याची ने-आण होताना दिसत आहे. जिल्हा प्रशासनाने या मांजाच्या विक्रीवर बंदी घातलेली असताना छुप्या मार्गाने होणाऱ्या विक्रीबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले असून, त्याची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात येत आहे. शहराच्या उपनगरांतही अशीच स्थिती दिसून येत आहे.

--

मांजाचा प्रकार आणि दर

--

प्रकार- दर

मोनोकाइट - १२० रुपये रीळ

मोनोगोल्ड - १०० रुपये रीळ

मोनोफिल - १५० रुपये रीळ

आयव्हीके - ७० रुपये रीळ

---

शंभरावर व्यक्तींना इजा

नायलॉन मांजाच्या वापरामुळे मागील वर्षी शंभरच्या वर व्यक्ती जखमी होण्याच्या घटना घडल्या आहेत; परंतु नायलॉनचा मांजा वापरणारेही त्यापासून बोध घेत नाही व तयार करणारेही बोध घेत नाही. खासगी रुग्णालयांत या मांजामुळे जखमी झालेल्या शंभराहून अधिक रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे. यात अनेकांच्या कान, नाक, गळा आणि हाताला इजा झाल्याचे आढळून आले होते. नायलॉनच्या मांजावरील बंदीची कडक अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने अनेक स्वयंसेवी संघटनांनी पोलिसांना साकडे घातले होते. केवळ मनुष्यच नव्हे, तर पक्षीदेखील या मांजामुळे जखमी झालेले आहेत. नाशिकच्या पक्षीमित्र संघटनेने व नेचर क्लबने अनेक जखमी पक्षी रुग्णालयात दाखल केले होते.

--

सिडकोत बालिका जखमी

सिडको परिसरातील गणेश चौकात रहाणारी कल्याणी पाटील ही मुलगी आईसोबत दळण आणायला जात असताना अचानक नायलॉनचा मांजा खाली आला व त्याचा फास तिच्या गळ्याला बसला. त्यामुळे तिच्या गळ्याला मोठी जखम झाली अाहे. जिवावर बेतू शकणाऱ्या प्रकारानंतर नायलॉन मांजाच्या प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लसीकरणाचा टक्का वाढला

$
0
0

तुषार देसले, मालेगाव

शहरातील लसीकरणाचे अत्यल्प प्रमाण लक्षात घेता केंद्राच्या विशेष मिशन इंद्रधनुष्य अभियान शहरात सध्या राबविले जात आहे. एकूण चार टप्पात राबविण्यात येणाऱ्या या अभियानाचे दोन टप्पे पार पडले असून, लसीकरणाचे प्रमाण ६३ टक्क्यापर्यंत गेले आहे. शहरातील मुस्ल‌िमबहुल भागात लसीकरणास नकार देणाऱ्यांचे मत आता बदलत असल्याचे या आकडीवारीवरून दिसत आहे.

लसीकरणाने टाळता येणाऱ्या आजारामुळे बालमृत्यू होऊ नये तसेच राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी राज्यात ७ ऑक्टोबरपासून विशेष मिशन इंद्रधनुष्य योजनेतंर्गत ही मोहीम राबविण्यात येत आहे. मालेगावात राज्यस्तरीय शुभारंभ ८ ऑक्टोबर रोजी येथील सामान्य रुग्णालय प्रांगणात आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या हस्ते करण्यात आला होता. यानंतर ८ ते १७ ऑक्टोबर दरम्यान पहिला टप्पा राबविण्यात आला. यात एकूण ३६२ सत्रात लसीकरण करण्यात आले. या पहिल्या टप्प्यात आरोग्य विभागाने एकूण १४ हजार ८ बालकांना लसीकरण करण्याचे लक्ष निश्चित करण्यात आले होते. पालिकेच्या आरोग्यविभागने राबविलेल्या या मोहिमेत प्रामुख्याने मुस्ल‌िमबहुल पूर्व भागातील बालकांना लसीकरण करण्यासाठी प्रयत्न केले. यात ६ हजार २६१ बालकांना लसीकरण करण्यात यश आले असून पहिल्याच टप्प्यात लसीकरणाची टक्केवारी ४५ पर्यंत पोहोचली आहे. तर दुसरा टप्पा ७ ते १६ नोव्हेंबर दरम्यान राबविण्यात आला. या टप्प्यात एकूण ११ हजार ४५७ बालकांपैकी ७ हजार ५४६ बालकांना लसीकरण करण्यात आले. या अभियानामुळे जेमतेम ३५ ते ४० टक्के लसीकरणाचे प्रमाण आता ६३ टक्क्यांपर्यंत पोहचले आहे.

अभियानाचे अद्याप दोन टप्पे बाकी असून डिसेंबर व जानेवारी २०१८ मध्ये होणार आहेत. त्यामुळे या पुढील दोन टप्प्यात लसीकरण करण्यास नकार देणा-यांचे मतपरिवर्तन घडवून त्यांच्या बालकांना देखील लसीकरण करण्यासाठी प्रवृत्त करण्याचे आव्हान आरोग्य विभागापुढे असणार आहे.

गरोदर मातांना लसीकरण

विशेष मिशन इंद्रधनुष्य अभियानअंतर्गत ० ते २ वयोगटातील बालकांसह गरोदर मातांना देखील यात लसीकरण केले जाते. त्याअंतर्गत पहिल्या टप्यात १ हजार २५९ तर दुसऱ्या टप्प्यात एक हजार २२५ गरोधर मातांना लसीकरण करण्यात आले. पूर्व भागात बहुतांशी कामगार व मजुरी करणाऱ्या महिला असल्याने आरोग्य विभागाकडून त्यांना लसीकरण करण्यात येत आहे.

धर्मगुरूंची होतेय मदत

शहरातील पूर्व भागावर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. मुस्ल‌िम बांधवांमध्ये लसीकरणबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी मुस्ल‌िम धर्मगुरूंची मदत घेतली जात आहे. येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर डांगे यांच्या समवेत डॉ. पाडवी यांची शासनाने नियुक्ती केली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. मोहम्मद अब्दुल अझर यासाठी प्रयत्न करीत आहेत.

अशी आहे यंत्रणा
१५ वैद्यकीय अधिकारी
६३ परिचारिका
१३२ आशा वर्कर्स
२१० अंगणवाडी सेविका
९ केंद्राद्वारे लसीकरण


इंद्रधनुष्य अभियान

पहिला टप्पा
४५ टक्के (१ हजार २५९ )
दुसरा टप्पा
६३ टक्के (एक हजार २२५)
६ हजार २६१ बालकांना लसीकरण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विज्ञान गटात सोहम, तनय प्रथम

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

भगूर येथील शिक्षण मंडळ संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त नूतन विद्यामंदिरच्या प्रांगणात भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम विज्ञाननगरीमध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शन व गणित कार्यशाळेचा निकाल निुकताच जाहीर झाला. विज्ञान गटात सोहम सावंत, तनय पवार, उमेश गोसावी, तर गणित कार्यशाळेत अलिशा मणियार, प्राची गायकवाडने प्रथम क्रमांक मिळविला.

शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांची विज्ञान व गणित विषयातील गोडी बघून मुलांच्या प्रात्यक्षिक ज्ञानात भर घालण्यासाठी प्रकल्प साकारत त्यांच्या बौद्धिक विकासाला वाढ देण्याचे कार्य केले आहे. २१ व्या शतकात भारताला प्रगत करण्यासाठी त्याची गरज असल्याचे प्रतिपादन मेळाव्याच्या समारोपप्रसंगी शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी केले. संस्थेचे कार्याध्यक्ष एकनाथ शेटे अध्यक्षस्थानी होते. प्राचार्य किशोर पवार, नगरसेवक भगवान कटारिया, कावेरी कासार, गंगाधर कुकडे, राधाकृष्ण गामणे, कचरू वीर, निवृत्ती रौंदळे, मधुकर कापसे, जितेंद्र भावसार आदी प्रमुख पाहुणे होते.

प्रवीण रोकडे यांनी प्रदर्शनातील प्रकल्पांचा अहवाल सादर केला. प्रदर्शनात ग्रामीण भागातील ६० शाळांनी सहभाग घेत १५० विज्ञान प्रकल्प, तर गणित कार्यशाळेत एकूण ४५ प्रकल्प सादर केले. प्रदर्शन व मेळाव्याच्या मुख्याध्यापक लता जोशी, रामदास जाधव, कैलास वाघ आदींनी संयोजन केले. मधुसूदन गायकवाड, कृष्णा लोखंडे, अनिल कवडे, सुनील कापसे, नीलेश गोसावी, अशोक बोराडे, संदीप गायकवाड, विशाल शिरसाठ, ललित भदे, विलास म्हसाळ, वैशाली गायकवाड, भारती चौधरी, सारिका भावसार, वैशाली मुठाळ आदींनी सहकार्य केले. पारितोषिक वितरणप्रसंगी गोविंद आहेर, शशिकांत वैद्य, रामदास आंबेकर, हसानंद निहलानी, चंद्रशेखर कोरडे, भगवान देशमुख आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कल्चर क्लब’चे डिसेंबरमध्ये गेट टुगेदर

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबच्या सभासदांसाठी डिसेंबर महिना मनोरंजनाने परिपूर्ण असणार आहे. गेट टुगेदर, म्युझिकल प्रोग्रॅम समवेत स्नॅक्सचा आनंद असा हा महिना एन्जॉयमेंटचा राहणार आहे. या एन्जॉयमेंटमध्ये सहभागी व्हायचे असेल तर कलचर क्लबचे सभासद होण्याची संधी चालून आली आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी गेट टुगेदरचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दि. ३ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजता अखिल ब्राह्मण मध्यवर्ती संस्था या ठिकाणी हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमाची सुरुवात म्युझिकल प्रोग्रॅमने होईल. यात मराठी भावगीते, हिंदी चित्रपटातील गाणी तसेच सोबत स्नॅक्स अशी मेजवानी सभासदांना मिळणार आहे. त्यामुळे आजच कल्चर क्लबचे सभासदत्व मिळवले तर तुम्हीही या वेगवगेळ्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊ शकणार आहात. कार्यक्रमाच्या ठिकाणी वेळेवर प्रवेश मिळणार नाही. त्यासाठी आधीच रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन केवळ कल्चर क्लब सदस्यांसाठी असल्याने आजच कल्चर क्लबचे सभासद व्हा. रजिस्ट्रेशनसाठी संपर्क -०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.comवर लॉग इन करा.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पैसे हडपणाऱ्यांना अटक करा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

हजारो गुंतवणूकदारांचे पैसे हडप करणाऱ्या मोतेवारांच्या नातेवाईकांना अटक झालीच पाह‌िजे, गुंतवणूकदारांचे पैसे तातडीने मिळालेच पाह‌िजे अशा मागण्या करत समृद्ध जीवन गुंतवणूकदार बचाव समितीच्या वतीने सोमवारी शहरात मोर्चा काढण्यात आला.

बी. डी. भालेकर मैदानापासून निघालेला मोर्चा शालिमार, महाबळ चौक, मेहेरमार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. यावेळी मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन दिले. संपूर्ण जिल्ह्यातून व महाराष्ट्राच्या काही भागातून आलेल्या मोर्चेकरांनी दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. मोर्चेकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून संस्थेचे ऑफिस बंद आहे. सरकारने संस्थेची मालमत्ता जप्त केली आहे. या संस्थेची जप्त केलेली मालमत्ता विकून ठेवीदारांचे पैसे देण्यात यावेत. त्याचप्रमाणे काही मालमत्ता या संस्थेच्या संचालकांच्या नातेवाईकांच्या नावावर आहेत. त्याच्यावरदेखील जप्ती आणावी. या योजनेमुळे अनेक नागरिकांचे संसार उघड्यावर पडले आहेत. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागेनासा झाला असून, पैशांअभावी मुलींची लग्ने करता येत नाहीत. मागील अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालू, असे आश्वासन दिले होते. परंतु, त्याबाबत काहीही झाले नाही. सरकारने संस्थेवर कारवाई केल्यानंतर संस्थेचे पदाधिकारी राजरोस रस्त्याने फिरत आहेत. त्यांच्यावर काहीही कारवाई झालेली नाही. संस्थाचालक एवढ्यावरच थांबलेला नाही, तर त्याने जेलमध्ये बसून नातेवाईकांमार्फत दुसऱ्या कंपन्यांची स्थापना केली आहे. यावरदेखील संबंध‌ित तपास अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे व पुढे होणारी लोकांची फसवणूक थांबवावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मोर्चामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती. ज्या गुंतवणूकदारांचे पैसे या घोटाळ्यात गेले, अशा गुंतवणूकदारांच्या घरातील ज्येष्ठ नागरिकही मोर्चात सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अपघातात नाशिकरोडचे दोन तरुण ठार

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

सोनगिरी परिसरात ब्राह्मणवाडे-शिंदे रस्त्यावर बुलेटच्या अपघातात सुयश बाळासाहेब पाटील (वय २८) व विशाल विजय वाटपाडे (वय २४, दोघे रा. गणेशनगर, जेलरोड, नाशिकरोड) या दोन तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

सुयश पाटील व विशाल वाटपाडे बुलेट मोटारसायकलने (एमएच १५/ जीबी ५०१६) नायगाव-शिंदे रस्त्याने जात असताना रात्री साडेआठच्या सुमारास सोनगिरी फाट्याजवळ त्यांच्या मोटारसायकलला अपघात झाला. अपघातात दोघांनाही गंभीर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचे समजते. दरम्यान, अपघातानंतर स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन शासकीय रुग्णवाहिकेशी संपर्क साधून अपघाताची माहिती दिली. मात्र, या रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्याने कुठलीही शहानिशा न करता मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे तणावाची परिस्थिती उद््भवली होती. तोपर्यंत एमआयडीसी पोलिसही घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करीत वातावरण शांत केले व खासगी रुग्णवाहिकेतून दोन्ही मृतदेह जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

दोन गटांत हाणामारी

सिन्नर फाटा ः जागेच्या हद्दीवरून झालेल्या वादात सोमवारी कोटमगाव येथे दोन गटांत हाणामारी झाली. हाणामारीच्या घटनेत दोन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर नाशिकरोडमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या दोन्हीही गटांतील सात जणांविरोधात एकमेकांच्या तक्रारींवरून नाशिकरोड पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्हीही गटांतील हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

कोटमगावी तक्रारदार ज्ञानेश्वर गणपत म्हस्के आणि दुसरे तक्रारदार संतोष वाळू म्हस्के शेजारीशेजारी असून घराच्या जागेच्या हद्दीवरून या दोघांमध्ये काही वर्षांपासून वाद सुरू होता. सोमवारी अखेरीस या दोघांतील वाद विकोपाला गेल्याने दोन्हीही गटांत हाणमारी झाली. यात दोघेही जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वर म्हस्के याच्या तक्रारीवरून वाळू रुंझा म्हस्के, राजु रुंझा म्हस्के, संतोष वाळू म्हस्के, विशाल म्हस्के यांच्या विरोधात, तर संतोष वाळू म्हस्के याच्या तक्रारीवरून ज्ञानेश्वर गणपत म्हस्के, विष्णू गणपत म्हस्के व सूरज म्हस्के यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दोन्ही गटांतील समर्थकांनी सोमवारी रात्री नाशिकरोड पोलिस ठाण्याच्या परिसरात मोठी गर्दी केली होती.

सोन्याची चेन लंपास

नाशिक ः कारची काच फोडून चोरट्यांनी शनिवारी हँडबॅग लंपास केली. बॅगेत दीड तोळे वजनाची सोन्याची चेन आणि मोबाइल असा सुमारे ३९ हजार रुपयांचा ऐवज होता. ही घटना वर्दळीच्या गंगापूररोडवर घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

गौरव सुभाष राठोड (रा. वर्तकनगर, ठाणे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, शनिवारी नातेवाइकांना भेटण्यासाठी राठोड शहरात आले होते. गंगापूर रोडवरील दिवट्याबुधल्या हॉटेलसमोर स्विफ्ट कार (एमएच ४६/ व्ही ९९८१) पार्क करून ते नातेवाइकाकडे मुक्कामी थांबले. या वेळी चोरट्यांनी त्यांच्या कारची काच फोडून हँडबॅग लंपास केली. हवालदार कोकाटे तपास करीत आहेत.

सिडकोत तरुणाची आत्महत्या

सिडकोतील सुभाषचंद्र चौकातील १७ वर्षीय तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. तरुणाच्या आत्महत्येचे कारण स्पष्ट होऊ शकले नाही. या प्रकरणी अंबड पोलिस स्टेशनमध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. साकीब आयाज शेख (रा. सुभाषचंद्र बोस चौक) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे. साकीबने रविवारी सायंकाळी आपल्या राहत्या घरात गळफास लावून घेतला होता. ही घटना लक्षात येताच कुटुंबीयांनी त्याला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. हवालदार धरम तपास करीत आहेत.

वाहनाच्या धडकेत एक ठार

अज्ञात वाहनाच्या धडकेत पिंपळगाव बहुला येथील एकाचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी घडली असून, या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश नाना कडाळे (वय ५५, रा. पिंपळगाव बहुला) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कडाळे रविवारी त्र्यंबकरोडने घराकडे पायी जात असताना हा अपघात झाला. पिंपळगाव बहुला गावाजवळ भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिली. अपघातात गंभीर जखमी झाल्याने त्यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. हवालदार खरे तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ला आंतरराष्ट्रीय सन्मान

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रशियन फेडरेशन, मॉस्को ह्या संस्थेतर्फे ‘युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल’मध्ये नाशिकच्या ‘इन सर्च ऑफ विठ्ठल’ ह्या मराठी लघुपटाला ‘बेस्ट डॉक्युमेंटरी’ या विभागात विजेता घोषित करण्यात आले आहे. वेळेनुसार विभागणी करुन दिलेल्या विजेत्यांच्या गटात चाळीस मिन‌िटांतल्या श्रेणीत हा लघुपट सर्वोत्कृष्ट ठरला.

गेल्या काही वर्षांपासून अभिषेक कुलकर्णी आणि प्राजक्त देशमुख ही जोडगळी लघुपटक्षेत्रात वेगवेगळे प्रयोग करीत आहे. अभिषेक कुलकर्णी हा उत्तम फोटोग्राफर, छायांकनकार आणि दिग्दर्शक आहे, तर प्राजक्त देशमुख हे मराठी रंगभूमीवरचे परिच‌‌ित नाव आहे. ‘इन सर्च ऑफ विठ्ठला’ हा लघुपट रशियन फेडरेशन, मॉस्को या संस्थेतर्फे ‘युरेशिया आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल’मध्ये विजेता ठरलेला आहे. तसेच हॉलीवूड फिल्म कॉम्पिट‌िशन, लॉस एंजेलिस २०१७ मध्ये या लघुपटाची अधिकृत निवड झालेली आहे. ‘वारी’ या विषयावर केलेल्या लघुपटात आत्मशोधावर आधारित असलेल्या प्राजक्त देशमुख यांच्या मुक्त काव्याच्या आधारे आणि वारीतल्या दृश्यांची गुंफण करुन एक अमोघ असा अनुभव ह्या लघुपटातून दाखवला गेला आहे. याला तितकीच पूरक सांगीत‌िक साथ आनंद ओक आणि त्यांच्या स्पंदनच्या चमूने दिली आहे. लघुपटातले शब्द ज्येष्ठ रंगकर्मी सदानंद जोशी यांचे आहेत.


दिग्दर्शक म्हणून प्रत्येक पुरस्कारासोबत जबाबदारी वाढत जातेय. पुढंचे काम आणखी वरच्या उंचीवर नेण्याचे चांगल्या अर्थाने दडपण आहे. प्राजक्त आणि मी अनेक विषयांवर चर्चा करीत असतो. लवकरच एक नव्या लघुपटाला आम्ही सुरुवात करणार आहोत. विठ्ठलाचा शोध आम्हाला वेगवेळे सन्मान मिळवून देतोय, हे खूप आनंददायी आहे. मी आणि माझी कारा फिल्म्सचे सगळे सहकारी या सन्मानाने भारावलो गेलो आहोत.

-अभिषेक कुलकर्णी, दिग्दर्शक, छायांकन

हे सगळं अविश्वसनीय आहे. आपली सृजनात्मक कामं ही सॅटेलाइटसारखी असतात, या मतावर मी आलो आहे. सॅटेलाइटमध्ये पृथ्वीची गुरुत्व शक्ती भेदण्यापर्यंतच इंधन असतं. एकदा ते भेदलं की पुढे ते त्याचं त्याचं फिरत राहतं आणि उंची गाठत राहातं. आम्ही या लघुपटासाठी घेतलेली मेहनत तशीच आहे. त्यामुळे वर्षभरानंतरही त्याला विविध सन्मान मिळताहेत. गेलं वर्ष भारतातले सन्मान मिळाले आणि आता हे परदेशी सन्मान. आमच्यामुळे नाशिकच्या नावाचा झेंडा सगळीकडे फडकतोय ही अभिमानाची गोष्ट आहे.

-प्राजक्त देशमुख, लेखक, पटकथा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निधी खर्चच होईना!

$
0
0

कैलास येवला, सटाणा

राज्य शासनाकडून आदिवासी भागातील जनेतेसाठी सुरू करण्यात आलेल्या मानव विकास कार्यक्रमांना सरकारी अनास्थेमुळे अल्प प्रतिसाद मिळत आहे. गरजवंतांपर्यंत संबंधित विभाग वेळेवर पोहोचत नसल्यामुळे या उपक्रमातील निधी तर पडून आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत बागलाण तालुक्यासाठी तब्बल एक कोटी १४ लाख रुपये इतका निधी देण्यात आहे. मात्र या योजना अत्यंत संथ गतीने सुरू आहेत. यातील ५४ लाख ९१ हजार रुपये पडून आहेत.

सन २०१७-१८ अंतर्गत बागलाण तालुक्याकरिता देण्यात आलेल्या निधी खर्च करण्यासाठी आर्थिक वर्ष संपुष्टात येत आहे. त्यामुळे सटाणा येथे झालेल्या बैठकीत या विभागाचे जिल्हा नियोजन अधिकारी प्रतापराव पाटील यांनी सबंधित योजना विभागाच्या प्रमुखांना धारेवर धरले. विद्यमान आमदार दीप‌िका चव्हाण यांनीही नाराजी व्यक्त केली आहे.

मानव विकास कार्यक्रम योजनेतंर्गत गर्भवती मातांची व बालकांची आरोग्य तपासणी करणे, द्रारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुडीत मजुरीचे वाटप करणे, माध्यमिक उच्च माध्यमिक शाळांमध्ये असलेल्या अभ्यासिकांसाठी खर्च देणे, बालभवन विज्ञान केंद्रास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांना अनुदान देणे, ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकल वाटप करणे, तसेच याच मुलींसाठी गाव ते शाळा वाहतूक बस सुविधेसाठी खर्च देणे यासाठी ‌िनधी देण्यात आला आहे. सन २०१६-१७ मध्ये बागलाण तालुक्यातील ८ वी ते १० वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींसाठी गाव ते शाळा पर्यंतच्या प्रवासासाठी ६ बसेसकरिता ४२.२४ लाख रुपये परिवहन मंडळास देण्यात आलेले आहेत. सहा बसेस सुरू आहेत. मात्र गर्भवती मातांची व बालकांची आरोग्य तपासणी व औषधोपचारासाठी तालुक्यातील ११ प्राथमिक आरोग्य केंद्रांना दरमहा २ व ग्रामीण रुग्णालयात दरमहा १ याप्रमाणे आरोग्य शिब‌िरे आयोजित करण्यासाठी २७.५२ लाख रुपये वितरित करण्यात आले आहेत. मात्र ऑक्टोबरअखेर यातील केवळ १७.१९ लाख रुपयेच खर्च झाले. काही शिबिरे कागदारवरच होत असल्याची तक्रार आहे. तपासणीसाठी येणाऱ्या डॉक्टरांच्या मानधनातही तफावत आहे.

साल्हेर आरोग्य केंद्र मागे

तालुक्यातील अकरा आरोग्य केंद्रापैकी बहुतांश आरोग्य केंद्रांनी कमी-अधिक प्रमाणात लाभार्थ्यांपर्यंत सदर योजना पोहोचविली आहे. साल्हेर या १०० टक्के आदिवासी असलेल्या भागातील सर्वच लाभार्थी या योजनेपासून वंचित असल्याचे निर्देशनास आले आहे.यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता बहुतेक लाभार्थ्यांकडे आधार कार्ड नाही. राष्ट्रीयकृत बँकांकडून ओळखपत्राचा पुरावा म्हणून आधारकार्डचा आग्रह धरला जात असल्याने जनता या लाभांपासून वंचित आहे.

सायकल वाटपही रखडले

घर ते शाळा ० ते ५ किलोमिटर अंतरावर राहणाऱ्या ८ वी ते १२ वी पर्यंत शिक्षण घेत असलेल्या गरजू मुलींना सायकलसाठी प्रत‌ि लाभार्थ्यांस तीन हजार रुपये देण्यात येतात. बागलाणमध्ये सन २०१७-१८ करिता ५१ शाळांमधून ६६६ विद्यार्थिनींची निवड करण्यात आली आहे. यासाठी १९.९८ लाख रुपये अदा करण्यात आले आहेत. मात्र अद्यापपर्यंत केवळ नामपूर शाळेतील १८ विद्यार्थिनींना सायकलचे वाटप करण्यात आले आहेत.

बाळंत महिला प्रतीक्षेत

आदिवासी भागातील अनुजाती व अनुसुचित जमातीसह द्रारिद्रय रेषेखालील बाळंत महिलेला बुड‌ित मजुरीचे वाटप धीम्या गतीने सुरू आहे. सन २०१७-१८ या आर्थिक वर्षात सुमारे ३२९५ पात्र लाभार्थ्यांपैकी अवघ्या ७९२ लाभार्थ्यांनाच निधी मिळाला आहे. ७९२ लाभार्भी महिलांना ३०.३४ लक्ष रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रक चालकामुळे बचावले विद्यार्थी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील औंदाणे गावात सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास थांब्यावर बसच्या प्रतिक्षेत असलेली १५ शाळकरी मुले मालवाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाच्या प्रसंगावधानामुळे बालबांल बचावली.

विंचुर-शहादा-प्रकाशा महामार्गावर वसलेले औंदाणे गाव हे सटाणा शहरापासून अवघ्या ५ किमी अंतरावर आहे. या गावात जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहे. यानंतर इयत्ता ५ वीपासून तर उच्चशिक्षणासाठी विद्यार्थी सटाणा येथे दररोज बसने ये-जा करतात. या गावासाठी अधिकृत बस थांबा नाही, की बसेस थांबण्यासाठी निवाराशेड नाही. परिणामी शालेय विद्यार्थी महामार्गाच्या कडेला बसेसची प्रतिक्षेत असतात. सोमवारी सकाळी सात वाजेच्या सुमारास काही मुले या महामार्गावर बसच्या प्रतिक्षेत उभे होते. सुरतकडून सिन्नरकडे ट्रक (जीजे ०५ वायवाय ८०४३) २४ टनांचे लोखंडी पत्रे घेऊन जात होता. त्याचवेळी सटाण्याकडे येणाऱ्या बसने या ट्रकला ओव्हरटेक करून पुढे थांबा घेतला. शालेय विद्यार्थी यावेळी बसमध्ये चढतच असताना समोरून देखील भरधाव ट्रक आला. मागून येणाऱ्या ट्रकचालकाने प्रसंगावधान आळखून काही सेकंदाआधीच ब्रेक दाबल्याने ट्रक महामार्गावर पलटला. यामुळे ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तर ट्रक चालकास कोणतीही इजा झाली नसून, क्लिनर गंभीर जखमी आहे. ट्रकचालक कमलेश पवार यांच्या चाणाक्षपणामुळे १५ विद्यार्थी बचावले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

औरंगाबाद मार्ग हस्तांतरणास नकार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पेठरोडची देखभाल आपण करीत असल्याचे सांगत महापालिकेने पेठरोड हस्तांतरणाची तयारी दर्शवली असून औरंगाबाद रोडबाबत नकार कळविला आहे. औरंगाबाद रोडची देखभाल दुरुस्ती खर्चिक असल्याने महापालिकेने हा रस्ता आमच्याकडे नकोच, असा पवित्रा घेतला आहे.
दारू दुकांनाबाबत सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयातून सुटका करण्यासाठी काही लोकप्रतिनिधी व मद्यविक्रत्यांनी केलेले अतातायी प्रयत्न आता महापालिकेच्या अंगलट येत आहे. सुप्रीम कोर्टाच्या आदेशातून पळवाट काढण्यासाठी पेठरोड आणि औरंगाबादरोड महापालिकेकडे हस्तांतरीत करण्याच्या प्रस्ताव देण्यात आला होता. परंतु, हा निर्णयच आपल्या क्षेत्रात लागू होत नसल्याने महापालिकेनेही हात झटकले आहेत.
महापालिका हद्दीतून जाणाऱ्या पेठरोड आणि औरंगाबाद रोड महापालिकेकडे अवर्गीकृत करण्याचा निर्णय सरकारने घेत त्यासंदर्भातील पत्र महापालिकेला प्राप्त झाले होते. पेठरोडची देखभाल व दुरुस्ती ही महापालिकेकडूनच केली जात आहे. मात्र, औरंगाबाद रोडची देखभाल व दुरुस्ती महापालिकेकडे नसतांनाही हा रस्ता हस्तांतरीत करण्याचा निर्णय झाला होता. दारू दुकाने व बारमालकांना दिलासा देण्यासाठी या दोन्ही रस्त्याचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. परंतु आता सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा महापालिका क्षेत्रासाठी लागू होत नसल्याने महापालिकेनेही आस्तेकदमचे धोरण स्वीकारले आहे. पेठ रोडची देखभाल दुरुस्ती महापालिकाच करत असल्याने हा रस्ता ताब्यात घेण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. मात्र, औरंगाबाद रस्त्याची देखभाल दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभाग यापूर्वी करत होता. त्यामुळे यापुढेही आपण हा रस्ता ताब्यात घेणार नसल्याचे महापालिकेने सार्वजनिक बांथकाम विभागाला कळवले आहे.

चारशे कोटींची गरज
औरंगाबाद रस्ता ताब्यात घेतला तर त्याच्या भूसंपादनासाठी तसेच नवीन रस्ता तयार करण्यासाठी जवळपास साडेतीनशे ते चारशे कोटींचा आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे ही आर्थिक बाब सध्या परवडणारी नसल्याने महापालिकेने हा रस्ता हस्तांतरणाला विरोध केला आहे. त्यामुळे औरंगाबाद रस्त्याची देखभाल व दुरुस्ती सार्वजनिक बांधकाम विभागाला करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पथदर्शी वीज निर्मिती कार्यान्वित

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

जर्मन सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाच्या आंतरराष्ट्रीय पर्यावरण सुधार कार्यक्रमांतर्गत जर्मन सरकार आणि भारत सरकार यांचे संयुक्त प्रयत्नातून नाशिकमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती हा पथदर्शी प्रकल्प बुधवारपासून कार्यान्वित होणार आहे. जर्मनीच्या जीआयझेड कंपनीकडून लाभलेल्या तांत्रिक व आर्थिक सहकार्यातून या प्रकल्पामधून दरमहा एक लाख युनिट विजेची निर्मिती होणार आहे. पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचा प्रारंभ होणार आहे.

सदर प्रकल्पासाठी आठ कोटी इतका खर्च अपेक्षित असून जीआयझेडकडून महापालिकेस सहा कोटी ८० लाख रुपये अनुदान मिळाले आहे. तर उर्वरित रक्कम प्रकल्प उभारणी कंपनी करणार आहे. प्रकल्प उभारणीसाठी महापालिकेने कोणतीही भांडवली गुंतवणूक केलेली नसून केवळ सहा हजार चौरसमीटर जागा उपलब्ध करून दिली आहे. सदर प्रकल्प उभारणीचे काम मे. विल्होळी वेस्ट मॅनेजमेंन्ट प्रा. लि. बंगलोर यांच्यामार्फत करण्यात आले आहे. दहा वर्षांसाठी संपूर्ण प्रकल्प चालविणे, देखभाल व दुरुस्ती करणेचे काम सदर कंपनी मार्फत करण्यात येणार आहे. तसेच प्रकल्पासाठी लागणारा ओला कचरा (हॉटेल वेस्ट व भाजीपाला वेस्ट) व मलजल वाहतुकीची जबाबदारी सुद्धा कंपनीची राहील. सदर कंपनी वेस्ट टू एनर्जी प्रकल्पातून वीज निर्मिती तयार होणाऱ्या वीजेतून नाशिक महापालिकेस दरमहा सुमारे ९९ हजार युनिट इतकी वीज पुरविणार आहे. सदर प्रकल्पात तयार झालेली वीज महावितरण कंपनीच्या पॉवर ग्रीडला जोडण्यात येणार असून जेवढी वीज पॉवर ग्रीडमध्ये टाकण्यात येईल तेवढे युनिट महापालिकेस इतर वीज देयकातून सूट मिळणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अध्यादेशामुळे अडकला ‘राज्य नाट्य’चा निकाल

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ज्या केंद्रांवर १५ पेक्षा जास्त नाटके सादर होतील तेथून दोन नाटके अंतिमला जाणार असल्याची सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांची घोषणा राज्य नाट्य स्पर्धेच्या निकालाच्या मूळावर आली आहे. स्पर्धा होऊन दोन दिवस उलटूनही अद्याप केवळ ‘तो’ अध्यादेश जारी न झाल्याने स्पर्धेच्या निकालाचा त्रिशंकू झाला आहे.

गेल्या आठवड्यात मुंबईमध्ये झालेल्या एका सांस्कृतिक कार्यक्रमात सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी अंतिम फेरीत दोन नाटके जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळे केंद्र्रांनी जल्लोषही केला; मात्र ही घोषणाच आता निकालामध्ये अडसर बनू पहात आहे. तावडे यांच्या घोषणेचा अध्यादेश अद्यापही निघालेला नाही. त्यामुळे केंद्रांवरील स्पर्धांचे निकाल अडवून ठेवण्यात आलेले आहे. राज्यात १९ केंद्रांवर हौशी राज्य नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी झाली असून काही ठिकाणच्या स्पर्धा झाल्या आहेत. मात्र, काही केंद्रांवरील स्पर्धा संपण्यासाठी अद्याप काही दिवस बाकी असल्याने त्यांच्या निकालावर परिणाम होऊ नये म्हणून आधीच्यांचे निकाल थांबविण्यात आल्याची चर्चा आहे. त्यात नाशिकचाही नंबर असून येथील केंद्रावर तब्बल २१ नाटके सादर झाली आहेत. त्यातही अत्यंत चुरस असून एकाहून एक सरस नाटके येथे झालेली असल्याने अंतिमला कोणती दोन नाटके जातात याबद्दल उत्सुकतेचे वातावरण आहे.

आज होणार घोषणा?
नाशिक केंद्रावरील स्पर्धा शनिवारी (दि. २५) संपल्या. मधे रविवार (दि. २६) आल्याने त्यादिवशी निकाल लागला नाही मात्र तिसऱ्या दिवशी, सोमवारी हा निकाल लागणे अपेक्षित असताना तावडे यांच्या घोषणेचा जीआर अद्याप आलेला नसल्याने निकाल रखडला असल्याचे सूत्रांनी सांगितले. जीआर येत नाही तोपर्यंत तरी नाशिकच्या रंगकर्मींना वाटच पहावी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी (दि. २८) उशिरापर्यंत निकालाची घोषणा होणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारचा खोटारडेपणा उघड

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

अच्छे दिनचे स्वप्न दाखवत भाजपने सत्ता मिळवली. मात्र तीन वर्षे झाले, तरी सरकार आश्वासने न पाळता फसव्या घोषणा देत आहे. जनता आता त्यांच्या खोटारडेपणाला कंटाळली आहे. त्यामुळे सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादीने हल्लाबोल आंदोलन पुकारले. त्यामुळे जनता आता या सरकारला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी केले.

राष्ट्रवादीने प्रदेशाद्यक्ष सुनील तटकरे यांच्या नेतृत्वाखाली दिंडोरी तहसील कार्यालयावर सोमवारी मोर्चा काढला. त्यावेळी तटकरे बोलत होते. दुपारी साडेबाराच्या दरम्यान दिंडोरी-कळवण रस्त्यावरून हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. मोर्चाचे नेतृत्व प्रदेशाद्यक्ष तटकरे यांनी केले. मोर्चात कादवाचे अध्यक्ष श्रीराम शेटे, जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार, आमदार नरहरी झिरवाळ, आमदार जयंत जाधव, दीपिका चव्हाण, माजी आमदार दिलीप बनकर, संजय चव्हाण, माजी खासदार देवीदास पिंगळे, जिल्हा बँक संचालक गणपतराव पाटील, कृऊबा सभापती दत्तात्रेय पाटील, महिला आघाडी अद्याक्ष प्रेरणा बलकवडे, भारती पवार, रंजन ठाकरे आदींसह हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले.

मोर्चात काही शेतकरी बैलगाडीसह सहभागी झाले होते. ढोलताशांच्या गजरात सरकार विरोधात घोषणा देत एका तासाने हल्लाबोल मोर्चा दिंडोरी तहसील कार्यालयावर धडकला. तेथे झालेल्या सभेतसर्वच नेत्यांनी सरकारच्या कारभारावर हल्लाबोल केला.

तटकरे यांनी राज्य व केंद्रातील शिवसेना भाजप युतीच्या कारभारावर जोरदार टीका केली. गेल्या तीन वर्षांपासून सत्तेवर असलेले युती सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. अनेक पोकळ आश्वासने देवून युती सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. शेतकरी, शेतमजूर, कामगार, लहान व्यवसायिक, शिक्षक, डॉक्टरांसह सर्वच क्षेत्रांमध्ये युती सरकारबद्दल तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. शेती व शेतकऱ्यांचे प्रश्न, विजेच्या समस्या, वाढती महागाई, बिघडलेली कायदा व सुव्यवस्था, रस्त्यांच्या समस्या, उद्योग, रोजगारात झालेली घसरण, शिष्यवृत्तीचा प्रश्न, शिक्षणाच्या सुविधा यासारख्या विविध समस्या न सुटल्यास राष्ट्रवादी तीव्र आंदोलन करणार असा इशारा तटकरे यांनी दिला. मागण्यांचे निवेदन तहसीलदार बाबासाहेब गाढवे यांना देण्यात दिले.

बारा डिसेंबरला विधानभवनावर हल्लाबोल

विविध मुद्द्यांवर सरकार अपयश ठरले आहे. अनेक समस्या जैसे थे आहेत. सरकारने जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारला जाग आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे नागपूर अधिवेशनात १२ डिसेंबरला हल्लाबोल मोर्चा नेण्यात येणार असल्याचेही तटकरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शाळकरी मुलीचा दिंडोरीत खून

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, दिंडोरी

‌एका शाळकरी मुलीचा खून करून तिचे हातपाय बांधलेला मृतदेह गोणीत दगड भरून तलावात फेकल्याचे आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. तिचा खून नेमक्या कोणत्या कारणातून झाला याबाबत विविध अंदाज व्यक्त केले जात आहेत. तिची ओळख पटली नसल्याने आणि शवविच्छेदन अहवालही मिळाला नसल्याने सोमवारी रात्री उशिरापर्यंत या घटनेचे पोलिसांनी धागेदोर मिळालेले नव्हते.

आंबेगण शिवारातील पाझर तलावात सोळा ते अठरा वयोगटातील अज्ञात शाळकरी मुलीचा मृतदेह एका प्लास्टिक गोणीत हातपाय बांधून तसेच, गोणीत दगड टाकलेल्या अवस्थेत आढळून आला. पाझर तलावालगत राखेचा कार्यक्रम आटोपलनंतर पोलिस पाटील संदीप गायकवाड, आदी हातपाय धुण्यासाठी गेले असता त्या पाझर तलावाच्या कडेला त्यांना एक गोणी आढळली. त्यातून दुर्गंधी येत असल्याचे लक्षात येताच त्यांनी दिडोंरी पोलिस स्टेशनला कळवले.

असे आहे मुलीचे वर्णन

मुलीच्या अंगात काळी जीन्स पॅन्ट असून, त्यावर कंबरेला मविप्र संस्थेचा लोगो असलेला बेल्ट आहे. निळसर डिजाइन व त्यावर फुले असलेला अंगात गुलाबी कलरचा टॉप घातलेला आहे. डाव्या हाताला नेलपॉलिश लावलेली व डाव्या बोटात अंगठी तसेच डोक्याला व चेहऱ्याला मार लागलेला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


साल्हेरसाठी आराखडा तयार करण्याची सूचना

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

संसद आदर्श ग्राम योजनेतून सटाणा तालुक्यातील साल्हेर या गावाचा संपूर्ण विकास करण्यात येणार असून जिल्हा यंत्रणांनी त्या दृष्टीने परिपूर्ण विकास आराखडा तयार करावा, असे निर्देश केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. भामरे यांच्या उपस्थितीत सोमवारी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना, अपर आदिवासी आयुक्त संदीप गोलाईत, निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, बागलाणचे तहसीलदार सुनील सैंदाणे, साल्हेरचे सरपंच दिलीप शिंदे आदि उपस्थित होते.

डॉ. भामरे म्हणाले, की साल्हेरच्या विकासासाठी अधिकाधिक निधी उपलब्ध व्हावा यासाठी पाठपुरावा करण्यात येत असून केंद्र, राज्य सरकार आणि सीएसआर निधीतून विकासाशी संबंधित पायाभूत कामे, शिक्षण सुविधा, रस्ते, वीज, स्वच्छता अशा सुविधांची पूर्तता होण्याच्या दृष्टीने नियोजन करावे. यासाठी उपलब्ध स्त्रोतांचा वापर केला जावा तसेच समन्वयन अधिकारी नेमून कामांना गती दिली जावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. धुळे जिल्ह्यातील गोंदूर या गावाच्या धर्तीवर आदिवासी भागातील साल्हेरची निवड करतांना येथील विकास मार्गातील अडचणी दूर करण्याचे डॉ. भामरे यांनी नमूद केले.

सर्व फ्लॅगशिप उपक्रम

जिल्हाधिकारी म्हणाले, की या गावाच्या विकासासाठी प्रशासन आवश्यक ती सर्व काळजी घेणार असून बागलाण तालुक्यातील तहसीलदार हे समन्वयन अधिकारी म्हणून काम पाहतील. तसेच जिल्हास्तरावरील नियोजन अधिकाऱ्यांच्यामार्फत या कामांवर देखरेख ठेवली जाईल. केंद्र व राज्य सरकारच्या सर्व फ्लॅगशिप उपक्रम साल्हेर येथे राबविण्यात येतील. दरम्यान, बैठकीस सटाण्याचे गटविकास अधिकारी किशोर भामरे, साल्हेरचे ग्रामस्थ, पदाधिकारी व शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकलिस्ट दाम्पत्याची महाराष्ट्र राइड

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सायकलिंगचा प्रचार आणि प्रसार व त्या माध्यमातून होणारे पर्यावरणाचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून देण्यासाठी नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचे सदस्य देवीदास आणि प्रतिभा आहेर हे दाम्पत्य महाराष्ट्र राइडसाठी एक डिसेंबर रोजी रवाना होणार आहे. या अनोख्या राइडदरम्यान हे दाम्पत्य महाराष्ट्रभर सायकलवर २,३०० किमीचा प्रवास करणार असून, विविध शिक्षण संस्थांना भेटी देणार आहे.

महाराष्ट्र राइडमध्ये आहेर दाम्पत्य अष्टविनायक, साडेतीन शक्तिपीठे, साडेतीन गणपती शक्तिपीठे, जेजुरी, पंढरपूर, नांदेडचा गुरुद्वारा यासह महाराष्ट्रातील वीसहून अधिक देवस्थानांना भेट देणार आहे. महाराष्ट्रातील एकूण १९ जिल्ह्यांतून जाणाऱ्या या राइडदरम्यान हे दाम्पत्य विद्यार्थ्यांचे प्रबोधन करणार आहे. पर्यावरणाची, तसेच आदिवासी भागातील विद्यार्थ्यांविषयी आपुलकीचे नाते असलेल्या नाशिक सायकलिस्टचे दिवंगत अध्यक्ष जसपालसिंग विर्दी यांना ही राइड समर्पित असल्याची भावना देवीदास आहेर यांनी व्यक्त केली आहे.

नाशिक सायकलिस्ट सायकलिंगचा प्रचार करताना नाशिक पेलेटॉन, पंढरपूर सायकलवारी, अष्टविनायक सायकल यात्रा, एनआरएमसारख्या उपक्रमांतून आहेर दाम्पत्य सहभागी होत असतात. महाराष्ट्रात असा प्रयोग प्रथमच होत असल्याचे नाशिक सायकलिस्टचे अध्यक्ष प्रवीणकुमार खाबिया यांनी सांगितले. ४६ वर्षीय देवीदास आहेर आणि ३६ वर्षीय प्रतिभा आहेर २०१० पासून सायकलिंग करीत असून, त्यांनी आतापर्यंत २८ हजार किलोमीटर सायकल प्रवास केला आहे. देवीदास आहेर बांधकाम व्यावसायिक असून, प्रतिभा आहेर त्यांना व्यवसायात मदत करीत असतात. अष्टविनायक यात्रा, पंढरपूर सायकलवारी, नाशिक पेलेटॉन त्यांनी सोबत पूर्ण केल्या आहेत. नाशिकच्या त्र्यंबक रस्त्यावर हे दाम्पत्य सायकलिंगचा नियमित सराव करीत असतात.

अशी असेल महाराष्ट्र राइड

नाशिक, धुळे, जळगाव, औरंगाबाद, जालना, बुलडाणा, वाशीम, यवतमाळ, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, पुणे, अहमदनगर, रायगड, ठाणे या वीस जिल्ह्यांतून ही मोहीम आखण्यात आली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जीवघेण्या वाहतुकीकडे होतेय सर्रास दुर्लक्ष

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, निफाड

निफाड येथे पिंपळगाव रस्त्यावर सोमवारी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉलीचे अतिवजनामुळे चाक निखळल्याने ट्रॉली पलटून उसाच्या ढिगाऱ्याखाली दोन जण दाबले गेले होते. दैव बलवत्तर म्हणून ते वाचले. हा प्रसंग ताजा असूनही या रस्त्यावरून दोन ट्रॉलींसह ऊस वाहतूक सर्रास सुरू आहे. यामुळे प्रशासन आणखी एखाद्या अपघाताची वाट पाहतेय का? असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. याकडे आरटीओ विभागाचे दुर्लक्ष झाल्याने अवैध वाहतूक करणाऱ्यांचे मात्र फावले आहे.

निफाड परिसरातील रानवड व निफाड साखर कारखाने बंद असल्याने येथील ऊस शेतकऱ्यांनी संगमनेर, कोळपेवाडी, कादवा आदी कारखान्यांना दिला आहे. या कारखान्यांसाठी ऊस वाहणाऱ्या ट्रॅक्टरला दोन ट्रॉली जोडल्या जात असून, सुमारे २० टनापेक्षा जास्त ऊस वाहतूक केली जात आहे. हा प्रकार अनधिकृत आहे. ट्रॅक्टरची २० टन वाहतूक क्षमता नसतानाही केवळ पैसे कमावण्याच्या उद्देशाने ही वाहतूक केली जात आहे. यामुळे मात्र अपघातांना आमंत्रण मिळत असून, इतर वाहनधारकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. अनेक ट्रॅक्टर टॉलींना नंबरच नसतो. यामुळे अपघातानंतर ट्रॅक्टरचालक पसार होतात.दोन ट्रॉली एका ट्रॅक्टरला जोडून त्यामध्ये उसाची आणि इतरही वाहतूक करणे बेकायदेशीर आहे. मात्र सर्रासपणे ही वाहतूक सुरू असून, आरटीओकडून ग्रामीण भागातील रस्त्यांवर सुरू असलेली ही जीवघेणी वाहतूक बंद का केली जात नाही. अशा वाहतुकीला अभय देऊन एकप्रकारे ग्रामीण भागातील रस्त्यावरील सुरक्षा वाऱ्यावर सोडत आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो.

रस्त्यावरील ही अवैध वाहतूक रोखण्याची व संबंधितांवर कारवाई करण्याची जबाबदारी आरटीओ विभागाची आहे. ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ऊस जास्त भरलेला असतो. यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होता.

- रणजित डेरे, पोलिस निरीक्षक, निफाड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्हा बँक अध्यक्ष नरेंद्र दराडेंचा राजीनामा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष व शिवसेना नेते नरेंद्र दराडे यांनी मंगळवारी शेतकरी कर्जमाफीचे कारण देत पावणेतीन वर्षांनंतर अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून जोरदार दबावतंत्र सुरू होते. त्यांच्या राजीनाम्यामुळे आता जिल्हा बँकेवर भाजपचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अडचणीत सापडलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला वाचविण्यासाठी दोन महिन्यांपूर्वी नरेंद्र दराडे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. परंतु, प्रत्यक्षात मंगळवारी त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र बकाल यांच्याकडे तो सादर केला. हा राजीनामा बकाल यांनी मंजुरीसाठी विभागीय सहनिबंधकांकडे पाठविला आहे. ३ जून २०१५ रोजी नरेंद्र दराडे यांची अध्यक्षपदी निवड झाली होती. या निवडीप्रसंगी एक-एक वर्षाचा कालावधी ठरला होता. मात्र दीड वर्षे उलटूनही दराडे यांनी राजीनामा दिला नव्हता. त्यावेळी संचालकांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात अविश्वास दाखल करण्याची तयारी केली होती. मात्र, संचालक मंडळातील काही संचालकांनी हा प्रयत्न हाणून पाडला. नोटाबंदी अन् बँकेची रखडलेली वसुली यामुळे जिल्हा बँक वर्षभरापासून अडचणीत सापडली होती. सेनेच्या ताब्यात बँक असल्याने मदत मिळत नसल्याची चर्चा रंगली होती. त्यात अध्यक्ष दराडे यांनी अनेकदा राजीनामा देण्याची तयारी दर्शवली होती.

बँक भाजपच्या ताब्यात?

दराडे यांनी शेतकरी कर्जमाफीचा घोळ असल्याचे सांगत राजीनामा दिला असला तरी प्रत्यक्षात राजीनाम्यासाठी भाजपकडूनच त्यांच्यावर दबाव होता. दराडे यांचा राजीनामा मंजूर झाल्यानंतर भाजपकडून अध्यक्षपदासाठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात झाली आहे. माणिकराव कोकाटे, केदा आहेर, सीमा हिरे, खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांची नावे चर्चेत असून, कोकाटे यांचे नाव आघाडीवर आहे.

शेतकरी कर्जमाफीच्या घोळामुळे बँक चालवणे अवघड झाले आहे. सव्वा लाख शेतकऱ्यांपैकी नऊ हजार शेतकऱ्यांनाच कर्जमाफी मिळाली. त्यामुळे आपण राजीनामा दिला आहे.

- नरेंद्र दराडे, अध्यक्ष, जिल्हा बँक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुत्री पळवण्यासाठी सिडकोत‘लाल बाटल्या’

$
0
0

कुत्री पळवण्यासाठी सिडकोत‘लाल बाटल्या’

म. टा. वृत्तसेवा सिडको

मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी स्थानिक नगरसेवक व महानगरपालिका अधिकाऱ्यांना सांगूनही काहीही होत नसल्याने नागरिकांनीच अनोखी शक्कल लढवित या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. सिडकोतील नागरिकांनी घरासमोर लाल रंगाचे पाणी बाटलीत ठेवून कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा प्रयत्न केला आहे. यात काही अंशी यश आले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. यापूर्वी ग्रामीण भागातून असे प्रयोग करण्यात आलेले आहेत. मात्र, याला अद्याप कुठलाही शास्‍त्रीय आधार नसल्याने याबाबत चर्चाही सुरू आहेत.

सिडकोत सर्वच भागात मोकाट कुत्रे मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. रस्त्याने ये जा करतांना हे कुत्रे सरळ नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या अंगावर धावून जात असतात. यामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांनी याबाबत अनेकदा नगरसेवक व सिडकोतील महानगर पालिकेत तक्रारीसुद्धा केल्या आहेत. मात्र, त्यावर कोणतीही कारवाई होताना दिसत नाही. सिडकोच्या जवळच कुत्र्यांचे निर्बीजीकरण केंद्र असल्याने निर्बीजीकरण केलेल्या कुत्र्यांना सिडको परिसरातच सोडण्यात येत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. या कुत्र्यांचा बंदोबस्त कसा करावा यासाठी महानगरपालिकासुद्धा हतबल झालेली आहे. नागरिकांनीच या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याचा निर्णय घेतल्याचे दिसत आहे. यासाठी घरासमोर लाल रंगाचे पाणी असलेल्या बाटल्या ठेवून कुत्र्यांना अटकाव करण्याची शक्‍कल लढविली असल्याचे दिसत आहे. लाल कुंकू किंवा लाल रंगाचा वापर करून हे पाणी तयार करण्यात येत आहे. हे पाणी एका प्लास्टिकच्या बाटलीत भरून ते घराच्या दाराजवळ ठेवल्यास कुत्रे याठिकाणी येत नाहीत, असा तर्क नागरिकांनी काढला असून त्याची अंमलबजावणीसुद्धा सुरू केली आहे. परिसरातील एका नागरिकाने हे केल्यावर आता सिडकोतील बऱ्याच ठिकाणी या बाटल्या बघावयास मिळत आहेत. या बाटल्या पाहून कुत्रे पळत असल्याचे नागरिकांनी सांगितले. एखादी नवीन वस्तू दिसल्यानंतर माणूसही त्या वस्तूला पाहून घाबरतो. त्याचप्रमाणे कुत्रेही त्या बाटल्यांचा पाहून घाबरत असावेत, असा काहींचा कयास आहे.

पालिकेला जाग येणार का?

सिडको परिसर हा कामगार वस्तीचा भाग असल्याने याठिकाणी रात्री अपरात्रीसुद्धा नागरिक कंपनीतून येत असतात. त्यावेळी रात्री या मोकाट कुत्र्यांचे टोळके अक्षरशः नागरिकांवर धावू जात असतात. त्यामुळे या कुत्र्यांचा बंदोबस्त तातडीने होण्याची मागणी होत असते. मात्र, महानगरपालिका याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. सिडकोतील मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी आता तरी महानगरपालिकेने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्‍त होत आहे.

रायगड चौक परिसरातील प्रत्येक घरासमोर लाल बाटली असल्याचे लक्षात आल्यावर याची सखोल माहिती घेतली. महानगर पालिकेा नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देत नसल्याने नागरिक अशी शक्‍कल लढवित आहेत. मात्र हे किती दिवस चालणार हा एक प्रश्नच आहे.

- योगेश गांगुर्डे, एकनिष्ठ सामाजिक संस्था

लाल पाणी पाहून कुत्रे घाबरतात हे चुकीचे आहे. लाल पाण्याची बाटली ही अनैसर्गिक गोष्ट असून ही पाहून कुत्रे घाबरत असले तरी एक दिवस हेच कुत्रे या लाल पाण्याच्या बाटलीजवळ खेळतांना दिसून आले तर आश्चर्य वाटू नये. हा एक गैरसमज आहे.

- गौरव क्षत्रिय, प्राणिमित्र संघटना

मागील दोन तीन दिवसांपासून घरासमोर लाल कुंकूंचे पाणी भरून ठेवल्याने एकही कुत्रे आलेले नाही. कुत्र्यांचा बंदोबस्त महानगर पालिकेकडून होत नसल्याने ही शक्‍कल शोधून काढली आहे.

- भागाबाई सूर्यवंशी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images