Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

दहावी बारावीबाबतचा ‘तो’ निर्णय बदलावा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने इयत्ता दहावी, बारावीच्या परिक्षार्थींसाठी परीक्षा ठिकाणी उपस्थितीबद्दल नियम जाहीर केले आहेत. हे नियम कठोर व विद्यार्थी अहिताचे असल्याची भूमिका अध्यापक भारतीने मांडली आहे. हे अन्यायकारक नियम त्वरित रद्द करावेत, अशी मागणी त्यांनी राज्य मंडळाकडे पत्रकाद्वारे केली आहे.

दैनंदिन प्रवासात दळण वळणाच्या साधनांची उपलब्धता, मानसिक वा शारीरिक, नैसर्गिक अडचणी आदी कारणांमुळे शहरी वा ग्रामीण परीक्षार्थींना परीक्षा केंद्रावर पोहचण्यास उशीर होऊ शकतो. ग्रामीण भागातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रवास करून शहरात परीक्षांसाठी येत असतात. यामध्ये त्यांना काही अडचणींचा सामनाही करावा लागतो. त्यामुळे अशा जाचक निर्णयांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागू शकते, अशी भीती विद्यार्थ्यांकडून वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर येण्यास काही कारणाने उशीर झाल्यास पूर्वीच्या नियमाप्रमाणे विद्यार्थ्यास पेपर लिहू द्यावा, अशी मागणी अध्यापक भारतीचे संस्थापक शरद शेजवळ, प्रा. विनोद पानसरे, पालक प्रतिनिधी वनिता सरोदे यांनी पत्रकाद्वारे केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा विनयभंग

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहरात वेगवेगळ्या घटनांमध्ये तीन महिलांचा विनयभंग करण्यात आल्याप्रकरणी मुंबई नाका, पंचवटी आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयितांमध्ये तीन महिलांचाही समावेश आहे.

विनयभंगाची एक घटना मुंबई नाका पोलिस स्टेशन हद्दीतील भाभानगर येथे घडली. शनिवारी (दि. २) दुपारच्या सुमारास जेलरोड येथील संत नरहरीनगर परिसरात राहणाऱ्या काही नातेवाइकांनी घरात बळजबरीने प्रवेश केला. यामुळे वाद सुरू झाला. घरात पीडित महिलेचा नातू असून, त्यास घेऊन जाण्यास महिलेने नातेवाइकांना नकार दिला. यामुळे संशयित आरोपींनी महिलेचा विनयभंग करून तिला शिवीगाळ केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांनी पीडितेच्या फिर्यादीवरून एका महिलेसह इतर तिघा संशयितांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

पंचवटीतील कौशल्यानगर परिसरात राहणाऱ्या २५ वर्षीय तरुणीच्या घरात घुसून संशयित आरोपी नितेश रमेश शिरसाठ (रा. घारपुरे घाट) याने विनयभंग केला. शुक्रवारी (दि. १) सायंकाळच्या सुमारास हा प्रकार घडला. संशयिताने थेट युवतीच्या घरात प्रवेश केला. यावेळी पीडितेच्या आईने मुलीस वाचवण्याचा प्रयत्न केला असता संशयिताने दोघांनाही शिवीगाळ सुरू केली. ‘‘मी कोणाला घाबरत नाही, पुन्हा येईन आणि असाच त्रास देत राहीन’’ अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीनुसार पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसऱ्या घटनेत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या महिलेचा घर खाली करण्याच्या कारणावरून शिवीगाळ करीत विनयभंग करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिकरोड येथील शांतीपार्क परिसरात ही महिला भाडेतत्वावर राहत आहे. ७ ते २१ नोव्हेंबरदरम्यान, संशयित सिद्धार्थ पगारे, शोभा पगारे, मीनाक्षी पगारे (सर्व रा. शांतीपार्क) यांनी पीडितेला घर रिकामे करण्यावरून शिवीगाळ, दमदाटी केली. तसेच संशयित सिद्धार्थने भाडेकरू महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी उपनगर पोलिसांनी संशयितांविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास सुरू आहे.

कुपन चोरी करून गैरवापर

नाशिक : ऑनलाइन शॉपिंगच्या वेबसाइटवरून खरेदीनंतर मिळालेले कुपन चोरी करून संशयिताने त्याचा गैरवापर केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी जयंत दिनेश पाटील (२७, रा. कल्पतरूनगर) याने अंबड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीविरोधात चोरी, फसवणूक आणि आयटी कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. जयंत पाटील यांच्या कंपनीतील व्यवस्थापक उमेश तुपे यांना एका ऑनलाइन वेबसाइटच्या कंपनीकडून २० हजार रुपयांचे कुपन मिळाले होते. मात्र, अज्ञात व्यक्तीने कुपन चोरी करून त्याचा गैरवापर केला. संशयिताने कुपनचा वापर करताना जयंत पाटील यांच्या नावाचा तसेच त्यांच्या कंपनीच्या नावाचाही गैरवापर केला. घटनेचा अधिक तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालकांमध्ये रोखले एचआयव्ही संक्रमण

$
0
0

नाशिक : गर्भवतींमधील एचआयव्हीचे संक्रमण बालकांपर्यंत पोहोचण्याचे प्रमाण शून्य झाले आहे. यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजना प्रभावी ठरत असून, यंदा एचआयव्हीग्रस्त गर्भवतींनी जन्म दिलेल्या एकाही नवजात अर्भकास या जीवघेण्या आजाराची लागण झालेली नाही.

प्रत्येक गर्भवतीची तपासणीदरम्यान एचआयव्ही टेस्ट केली जाते. महिलेला एचआयव्हीचे संक्रमण आढळून आल्यास गर्भवतीवर अँटिरेट्रोव्हायरल सेंटर्समध्ये (एआरटी) उपचार केले जातात. गर्भवतीच्या आहारात काही बदल करून तिला इतर संधिसाधू आजारांपासून वाचवले जाते. गर्भवतीने एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी दिल्या जाणाऱ्या ट्रीटमेंटमध्ये योग्य ती काळजी घेतल्यास संक्रमणाचा धोका ९५ टक्के कमी होतो. याबाबत बोलताना एड्स प्रतिबंध आणि नियंत्रण विभागाचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी योगेश परदेशी यांनी सांगितले, की गेल्या काही वर्षांत सकारात्मक चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात सिव्हिल हॉस्पिटल, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य उपकेंद्र, शहरी आरोग्य केंद्र, तसेच खासगी सरकारी तत्त्वावर सुरू असलेल्या हॉस्पिटलचे जाळे पसरले आहे. या प्रत्येक ठिकाणी गर्भवतींची मोफत रक्त तपासणी केली जाते. त्यात महिलांना एचआयव्ही संक्रमण आढळून आल्यास अशा महिलांना पुढील उपचारासाठी अँटिरेट्रोव्हायरल सेंटर्समध्ये (एआरटी) पाठवले जाते. अर्भक जन्माला आल्यानंतर दीड व सहा महिन्यांनी, त्यानंतर एक आणि दीड वर्षाने बालकाची तपासणी करूनच ते एचआयव्हीबाधित आहे किंवा नाही हे ठरवले जाते, असे परदेशी यांनी स्पष्ट केले. या आजाराबाबत होणारी जागृती, आजाराकडे पाहण्याचा बदललेला दृष्टिकोन, तसेच प्रभावी उपचाराची पद्धत याचा हा परिणाम असल्याचेही परदेशी यांनी स्पष्ट केले. नवजात अर्भकांमधील एचआयव्ही संक्रमण रोखण्यासाठी गर्भवतींना अँटिरेट्रोव्हायरल थेरपी महत्त्वाची ठरते. याबाबत बोलताना एआरटी सेंट्रर्सचे डॉ. सुनील ठाकूर यांनी सांगितले, की ही उपचारपद्धती प्रभावी ठरते आहे. काही वर्षांपूर्वी संक्रमण होण्याचा धोका २५ ते ३० टक्के होता. हळूहळू तो पाच टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. नाशिकमध्ये यंदा नवजात अर्भकांपैकी एकालाही संक्रमण झालेले नाही. पूर्वीच्या उपचारपद्धतीत बदल करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले असून, त्यानंतर ही परिस्थिती सुधारत असल्याचे डॉ. ठाकूर यांनी स्पष्ट केले. उपचार सुरू झाल्यानंतर गर्भवतीने योग्य आहार घेतला, उपचाराचे नियम पालन केले तर संक्रमणाचा धोका ९५ टक्के कमी होतो, असे त्यांनी स्पष्ट केले. एचआयव्ही संक्रमण काळात संधिसाधू आजार दूर राहणे महत्त्वाचे ठरते. त्या दृष्टीने आरोग्य विभाग महिलेची व अर्भकाची योग्य काळजी घेत असल्याचे डॉ. ठाकूर यांनी स्पष्ट केले.

वर्षनिहाय बालकांची तपासणी (कंसात एचआयव्हीग्रस्त बालकांची संख्या)

२०१३-१४ ः ७८ (९), २०१४-१५ ः ८१ (७), २०१५-१६ ः ९४ (२), २०१६-१७ ः ६० (१), २०१७-१८ ः ५५ (०).

(२०१७-१८मधील आकडेवारी ऑक्टोबरपर्यंतची)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अन्न व्यावसायिक एफडीएच्या रडारवर

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

अन्नातील भेसळीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने विनापरवाना अन्न व्यवसाय करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेत परवाना नसणाऱ्यांविरुध्द गुन्हे दाखल केले जाणार आहेत. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अन्न व्यावसायिकांनी नोंदणी करून परवाने घेणे गरजेचे आहे. यासाठी www.flrs.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज दाखल करावे, असे आवाहनही सहआयुक्त उ. शं. वंजारी यांनी केले आहे.

हॉटेल, ढाबा, भगर-तांदूळ उत्पादक, मिरची-मसाले, खाद्यतेले, दूध व दुग्धजन्य पदार्थ आदींचे उत्पादक, किरकोळ व घाऊक विक्रेते, शासकीय व खासगी आश्रमशाळा, वसतिगृहे, महाविद्यालयीन कॅन्‍टीन, रेस्टॉरंट, भोजनालये, खानावळी व केटरिंग आदी १२ लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेल्या व्यावसायिकांनी नोंदणी करून परवाना घेणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. १२ लाख रुपयांपेक्षा कमी वार्षिक उलाढाल असणाऱ्या पाणीपुरी, भेलपुरी, भाजीपाला, फळे, फिरते विक्रेते, चायनिज स्टॉल, लहान गृहउद्योग, किरकोळ अन्नपदार्थ विक्रेते आदी व्यावसायिकांनी योग्य ते शुल्क भरून नोंदणी प्रमाणपत्र घेणे आवश्यक आहे. पण, यातील बहुतांश व्यावसायिक हे परवाणेच घेत नसल्यामुळे ही मोहीम असली तरी त्याला किती प्रतिसाद मिळतो हे महत्त्वाचे आहे.

असा आहे कायदा

अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नियम व नियमन २०११ हा राज्यामध्ये ५ ऑगस्ट २०११ पासून लागू करण्यात आलेला आहे. यानुसार विनापरवाना अन्न व्यवसाय करणाऱ्यास सहा महिन्यांपर्यंत कारावास व पाच लाख रुपये दंडाची तरतूद आहे. परवाना व नोंदणी प्रमाणपत्राची मुदत संपलेली असल्यास ३० दिवसांच्या आत नूतनीकरण करणे आवश्यक आहे.अन्नामधील भेसळीचे प्रमाण वाढले असून, अशी वर्षभर अशी मोहीम राबविणे गरजेचे आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तुमच्यावर माझी भिस्त, कशी चालणार बेशिस्त!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे रविवारी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचा नागरी सत्कार डॉ. आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याजवळ जाहीर कार्यक्रमात करण्यात आला. यावेळी स्टेजवर झालेल्या गर्दी व गोंधळातही आठवले यांनी फटकेबाजी करीत कार्यक्रमात रंगत आणली. आठवले यांनी स्टेजवर बघून एवढी गर्दी, होईल सर्वांना सर्दी असे म्हणताच हशा पिकला. या सत्कार कार्यक्रमात त्यांनी कवितांचा पाऊस पाडला. तुमच्यावर आहे माझी भिस्त, कशी चालणार बेशिस्त ही कविता गोंधळ करणाऱ्यांना प्रेमाचा दम भरणारी ठरली.

रविवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात प्रचंड उत्साह असल्यामुळे कार्यकर्त्यांना रोखणे अवघड झाले होते. सत्काराला उत्तर देताना आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याचा मुद्दा उपस्थित करून सर्व गट एकत्र यायला हवे, त्यासाठी माझा गट कधीही बरखास्त करेल, असे सांगितले. यावेळी त्यांनी या ऐक्य झालेल्या गटाचा अध्यक्ष कुणालाही करा, कोणी होत नसेल तर मला करा असेही नमूद केले. तब्बल तासाभराहून अधिक काळ चाललेल्या या सत्कार कार्यक्रमात अनेक विषयांना हात घातल आठवले यांनी पाकिस्तानवरही जोरदार टीका केली. या सभेत अनेक किस्से सांगत आठवले यांनी अधून-मधून कवितेची पेरणी केल्यामुळे त्यांचे भाषण कार्यकर्त्यांचे मनोरंजनही करून गेले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे, तर प्रमुख पाहुणे म्हणून काकासाहेब खांबाळकर, डॉ. विजय मोरे, नारायण गायकवाड, नगरसेविका दीक्षा लोंढे, दिनेश जाधव, सागर जाधव उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाईने दाखविली ‘सोशल’ भूतदया

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिक

एखाद्या परिचिताचे निधन झाल्याची बाबही सहजतेने घेणाऱ्या सध्याच्या काळात एका श्वानाच्या मृत्यूनंतर तरुणाईला फुटलेला पाझर अन् सोशल मीडियाचा वापर करून त्यांनी श्वानाचा अंतिम प्रवास सुखदायी केल्याची घटना हिरावाडीत घडली.

हिरावाडीमधील शक्तीनगर येथे परिसरातील तरुणांनी एसएफसी फाउंडेशन या सेवाभावी संस्थेची स्थापना केली आहे. या फाउंडेशनमार्फत विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. येथील येथील गणेश मंदिराशेजारील फाउंडेशनच्या कार्यालयात एका श्वानाचा सांभाळ करून कार्यकर्त्यांनी त्याला वाढविले. मात्र, रविवारी या खंड्यानामक श्वानाचा अपघातात मृत्यू झाला. सर्वांनाच लळा लावणाऱ्या या श्वानाचा अचानक मृत्यू झाल्याने तेथे उपस्थित कार्यकर्ते चांगलेच हेलावले. त्यांनी तातडीने सोशल मीडियाच्या माध्यमातून फाउंडेशनच्या सर्वच कार्यकर्त्यांनी या दुर्दैवी घटनेची माहिती दिली. त्यानंतर फाउंडेशनेचे गौरव गोवर्धने आणि इतर कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शनाखाली या श्वानाचा अंत्यविधी फाउंडेशनच्याच मैदानावर करण्यात आला. एखाद्या जवळच्या व्यक्तीसाठी केले जातात असे सारे सोपस्कार यावेळी तरुणाईने पार पाडले. त्यामुळे ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली.

सध्याची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी जात असल्याची टीका होत असली, तरी या माध्यमाद्वारे चांगले काही करण्याची उर्मी बाळगणारे तरुणदेखील मोठ्या संख्येने असल्याची दिलासादायक बाब हिरावाडी परिसरातील घटनेने अधोरेखित केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

जिल्ह्यात दिवसभर गारठा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

ओखी चक्रीवादळाचा परिणाम राज्याच्या हवामानावरही झाला आहे. त्यामुळेच नाशिक शहर परिसरात सोमवारी दिवसभर ढगाळ हवामान होते. तसेच, दिवसभर गारठा असल्याने नाशिककरांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागला. किमान तापमानात वाढ होऊनही गारठा असल्याने ही बाब आरोग्यावर परिणाम करणारी ठरत आहे. म्हणूनच नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेणे गरजेचे आहे.

एक आठवडा थंडी, तर दुसरा आठवडा काहीसा गरम अशा बदलत्या वातवरणामुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. सोमवारी ढगाळ वातावरणामुळे थंडीचा जोर कमी झाला. शहरात सोमवारी कमाल तापमान २८.३, तर किमान १६.१ अंश सेल्यियस तापमानाची नोंद झाली. नोव्हेंबर अखेरपासून थंडीची चाहूल लागल्याने नाशिककर काहीसे सुखावले होते. परंतु, पुन्हा थंडी गायब झाली. थंडीचा कडाका अद्याप सुरू झाला नसला, तरी उष्णतेची तीव्रता मात्र कमी झाली आहे. सायंकाळी सहा ते सकाळी नऊपर्यंत थंडी आणि त्यानंतर ऊन असे दोन्ही बदल नाशिककर अनुभवत आहेत. गेल्या वर्षाची तुलना करता यंदाच्या डिसेंबर महिन्यातील थंडीचे प्रमाण अत्यंत कमी आहे. मात्र महिनाअखेरीस थंडी पूर्वपदावर येण्याची शक्यता आहे. नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात कमाल तापमान २९.५, तर किमान १४.२ अंश एवढे होते. डिसेंबरच्या सुरुवातीला कमाल तापमान २७.७, तर १०.९ अंश एवढे होते, तर रविवारी कमाल २८.३ व किमान १६.१ अंश सेल्सियस होते. थंडीच्या आलेखात सतत चढ-उतार होत असल्याचे दिसते. थंडी कमी-अधिक होत असली, तरी वाढत्या थंडीमुळे चौकाचौकात शेकोट्या व गप्पांचे फड मात्र रंगू लागल्याचे दिसते आहे.

ढगाळ वातावरण

सोमवारी सकाळपासून वातावरणात आमूलाग्र बदल झाला. सकाळी पाऊस पडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. सूर्योदयदेखील उशिराने पहायला मिळाला. यावेळी मात्र थंडीची तीव्रता अत्यंत कमी होती. दुपारीदेखील वातावरण ढगाळ होते. पावासाचा शिडकावा होईल असे वातावारण तयार झाले होते. अरबी समुद्रात येणाऱ्या चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाल्याचे समजते.

अवकाळीचे सावट

मुंबईच्या किनारपट्टीवर ओखी चक्रीवादळाचा धोका असल्याने हवामान विभागाने नाशिकसह उत्तर महाराष्ट्रात पुढील २४ तासांत (५ डिसेंबर) पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
अरबी समुद्रात ओखी चक्रीवादळाचा प्रभाव कायम असून, उंच लाटांचा मारा किनारपट्टी भागास बसत आहे. समुद्राच्या पातळीत वाढ होत असून, वातावरणातही बदल जाणवू लागले आहेत. केरळ, तमिळनाडूला तडाखा देऊन लक्षद्वीपच्या दिशेने सरकलेल्या चक्रीवादळाचा परिणाम कोकणच्या किनारपट्टी भागातही दिसू लागला आहे. मुंबईसह कोकण परिसरात पाऊस पडण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कॉलेजरोडवर वाहनचालकांची त्रेधातिरपीट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शहर वाहतूक पोलिसांनी सोमवारी कॉलेजरोडवर वाहन तपासणी करीत चारशेहून अधिक वाहनचालकांवर कारवाई केली. विशेषतः हेल्मेटचा वापर न करणाऱ्या युवक आणि तरुणांकडे पोलिसांनी लक्ष दिले. अनेक दिवसांनंतर पोलिसांनी कॉलेजरोडवर कारवाई केल्याने वाहनचालकांची त्रेधातिरपीट उडाली.

बेशिस्त वाहनचालकांना वठणीवर आणण्यासाठी सोमवारी शहर वाहतूक शाखेचे कर्मचारी, अधिकारी तसेच गंगापूर आणि सरकारवाडा पोलिसांनी कॉलेजरोडवर नाकाबंदी केली. कॅनडा कॉर्नरपासून भोसला मिल‌िटरी स्कूलच्या गेटसमोरील सर्कलपर्यंत पोलिसांनी ठिकठिकाणी तपासणी सुरू केली. हेल्मेट नसणे, ट्रिपलस‌ीट, लायसन्स नसणे, फ्रंट सीट वाहतूक करणे अशा विविध कारणांमुळे चारशेंहून अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. याबाबत बोलताना वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले की, आजच्या कारवाईसाठी ५० ते ६० पोलिस कर्मचारी तसेच अधिकारी हजर होते. वाहतूक शाखेचे चार युनिट्स असून, त्यातील कर्मचारी तसेच सरकारवाडा आणि गंगापूर पोलिस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली होती. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी विविध कॉलेजेसला भेटी दिल्या. हेल्मेटसह वाहतूक नियमांचे पालन का करावे, याविषयी माहिती देण्यात आली. मात्र, जनजागृतीचा तितकासा परिणाम युवकांमध्ये दिसून आला नाही. या पार्श्वभूमीवर सोमवारी कॉलेजरोडवर कारवाई करण्यात आली.

युवकांवर लक्ष

यावेळी हेल्मेटचा वापर न करणाऱ्या युवकांवर विशेष लक्ष देण्यात आले. चार युनिट्समधील कर्मचाऱ्यांनी एकत्र येऊन कारवाई करण्याची ही पहिली वेळ नसून, यापूर्वी नाशिकरोडला तपासणी मोहीम हाती घेण्यात आली होती, असे देवरे यांनी स्पष्ट केले. यापुढेही कारवाई सुरूच राहणार असून, वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागणार नाही, असेही देवरे यांनी सांगितले. यावेळी टवाळखोरांसह रोडरोमियोंविरोधातदेखील मुंबई पोलिस अॅक्टनुसार कारवाई करण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कपाटांचा प्रश्न निकाली निघणार

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीतील अनधिकृत बांधकामे नियम‌ित करण्याच्या राज्य सरकारच्या धोरणामुळे शहरातील कपाट प्रश्न बऱ्यापैकी सुटण्याची शक्यता आहे. त्यातून पालिकेला आर्थिक पाठबळही मिळणार आहे. कपाटे नियम‌ितीकरणासाठी दंडात्मक आकारणीतून पालिकेच्या तिजोरीत पाचशे कोटींच्या आसपास निधी मिळणार असल्याची शक्यता आहे. परंतु, दंडात्मक आकारणीमुळे बिल्डरांकडून त्याला किती प्रतिसाद मिळतो, याबाबत साशंकता आहे.

राज्य सरकारने ३१ डिसेंबर २०१५ पूर्वीची अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. त्यासाठी महापालिकेने गेल्या आठवड्यात जाहीर नोटीस काढत बांधकामे नियम‌ितीकरणासाठी सहा महिन्यांची मुदत दिली आहे. शहरात अनधिकृत बांधकामांची संख्या जास्त नसली तरी, कपाट प्रश्नामुळे निर्माण झालेली कोंडी या धोरणामुळे सुटणार आहे. सहा व साडेसात मीटर रुंदीच्या रस्त्यावरील इमारतींमध्ये असलेला कपाटांचा प्रश्न सुटणार नसला तरी, नऊ मीटर रस्त्यावरील इमारतींच्या कपाटांचा प्रश्न मात्र निकाली निघण्याची शक्यता आहे. कपाटकोंडी झालेल्या इमारतींची संख्या सहा हजारांच्या आसपास आहे. त्यातील दीड ते दोन हजार इमारती या नऊ मीटरपेक्षा अधिक रुंदीवरील असून दंडात्मक आकारणी करून वाढीव एफएसआयने ही प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. त्यातून पालिकेच्या तिजोरीत पाचशे कोटींपेक्षा अधिकचा महसूल मिळण्याची शक्यता आहे.

प्रतिसादावर प्रश्नचिन्ह

अनधिकृत बांधकामे अधिकृत करण्यासाठी जवळपास १८ ते २० टक्‍क्‍यांपर्यंत दंडात्मक आकारणी केली जाणार आहे. हा दंड मात्र बिल्डरांना परवडणारा नाही. इमारतीचा पूर्ण नफा जरी बिल्डरांनी दंडात भरला तरी, त्यातून प्रश्न सुटणार नाही. एका इमारतीला १५ ते २५ लाखांपर्यंत दंडाची रक्कम जाणार आहे. त्यामुळे बिल्डरांकडून या योजनेला किती प्रतिसाद मिळतो, याबाबत मात्र प्रश्नचिन्ह आहेत. त्यामुळे बिल्डरांच्या प्रतिसादाकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

माझ्यासह सर्वांचीच नार्को करा

$
0
0

आमदार गोटेंचे राष्ट्रवादीच्या नेत्यांना आव्हान

म. टा. वृत्तसेवा, धुळे

माझी आणि कैलास गौडा यांच्यातील संभाषणाची ध्वनीफित ऐकवून मांगले कुटुंबीयांना आमदार गोटे मदत करीत असल्याचा दावा राष्ट्रवादीकडून केला गेला. मात्र हे आरोप खोटे असल्याचे आमदार अनिल गोटे यांनी सांगितले. मी मांगले कुटुंबीयांना मदत केली मात्र मला मांगले कोण आहे, हे समजल्यानंतर त्याला हाकलून लावले, असेही आमदार गोटे सोमवारी (दि. ४) शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत म्हणाले.

याबाबत आता राष्ट्रवादीच्या नेत्यांसह माझीदेखील नार्को टेस्ट करा म्हणजे त्यातून शहरात गेल्या तीन महिन्यांपूर्वी गुड्ड्या खून प्रकरणातील अनेक धागेदोरे पोलिसांना तपासासाठी कामात येतील, असेही आमदार गोटे यांनी यावेळी सांगितले.

शहरातील भाजपचे आमदार अनिल गोटे व खंडणीचा गुन्हा दाखल असलेले सतीश मांगले दाम्पत्य यांचे संबंध असल्याचा आरोप धुळे शहर राष्ट्रवादीचे माजी आमदार राजवर्धन कदमबांडे व शहराध्यक्ष मनोज मोरे यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर या प्रकरणाला तोंड फुटले होते. याबाबत सोमवारी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेत खुलासा केला आहे. माझी व सतीश मांगलेचे संबंध आहेत याविषयी आरोपांची चौकशी उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीशांमार्फत करण्याची मागणी पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्र्यांकडे मी स्वत: करणार आहे, असे आमदार गोटे म्हणाले.

परंतु, त्याआधी महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती कैलास चौधरी आणि कुख्यात गुंड गुड्ड्या यांच्यात काय संबंध होते? खून प्रकरण घडण्याच्याआधी आदल्या दिवशी गुड्ड्याने सभापती चौधरी यांच्या कार्यालयाबाहेर शिवीगाळ केली. तर दुसऱ्या दिवशी शहरात खून प्रकरण झाले. याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती द्यावी, असे आव्हान त्यांनी यावेळी दिले.

राष्ट्रवादीने प्रश्नांची उत्तरे द्यावीत

धुळे शहरात जुलै महिन्यात झालेल्या गुड्ड्या खून प्रकरणाच्या आदल्यादिवशी स्थायी समिती सभापती कैलास चौधरी यांच्या देवपूरातील कार्यालयाजवळ उभे राहून गुड्ड्याने शिवीगाळ केली, हे का केले? मनपा रेकॉर्ड विभागाला गेल्या काही वर्षांपूर्वी अग्निकांड प्रकरण झाले. त्यावेळी आरोपी गुड्ड्याला नाशिक येथील कारागृहात सभापती चौधरी भेटायला का जात होते? गुड्ड्याचा खून झाला त्यानंतर लगेचच ऐंशी फुटी रोडलगत माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या घराबाहेर २० ते २५ मोटारसायकल आणि चार-पाच कार सकाळी कशासाठी आल्या होत्या? यासर्व प्रश्नांची उत्तरे राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन द्यावी, असे आवाहन शेवटी आमदार गोटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सायकल ट्रॅकला ठेंगा

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका हद्दीत त्र्यंबकरोडवर सीएसआर अंतर्गत सायकल ट्रॅक करून देण्याच्या जिल्हा उद्योग मित्र समितीच्या प्रस्तावाबाबत पालिकेने अनास्था दाखवली आहे. सद्यस्थितीत या रस्त्यावरील दीड मीटरच्या साइटपट्टीचा वापर हा सायकल ट्रॅक म्हणून केला जात असल्याचे सांगत, या रस्त्यावर सायकल ट्रॅकची गरज नसल्याचे उत्तर जिल्हा उद्योग मित्र समितीला पालिकेने कळवले आहे. शहरात अन्य ठिकाणाहून मागणी आल्यास कळवले जाईल, असे मोघम उत्तर देऊन जिल्हा उद्योग मित्र समितीच्या स्वतंत्र सायकल ट्रॅकच्या प्रस्तावावर पाणी फिरवले आहे.

जुलै महिन्यात जिल्हा उद्योगमित्र समितीच्या बैठकीत महापालिका हद्दीतून जाणाऱ्या त्र्यंबकरोडवर सायकल ट्रॅक करून देण्यावर चर्चा झाली होती. या रस्त्यावर सायकल ट्रॅक करण्याचे नियोजन करून त्यासंदर्भातील आराखडा व निधी खर्चासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत करण्यात आल्या होत्या. सीएसआरअंतर्गत विविध उद्योगांकडून निधी जमा करून हा सायकल ट्रॅक करण्याचे नियोजन करण्यात येणार होते. त्यासंदर्भातील झूमचे पत्र पालिकेला मिळाले असले तरी, या सायकल ट्रॅकबाबत पालिकेने अनास्था दाखवली आहे. सध्या त्र्यंबकरोडला दीड मीटर लागून साइटपट्टी आहे. त्यामुळे महापालिकेने या साइटपट्टीला सायकल ट्रॅक ठरवत त‌िचा सायकलिस्ट वापर करीत असल्याचा दावा केला आहे. सध्या त्र्यंबकरोडवर सायकल ट्रॅक असल्याचा शोध लावत, सध्या येथे सायकल ट्रॅकची गरज नसल्याचा अहवाल पालिकेने तयार केला आहे. स्वतंत्र सायकल ट्रॅकची गरज नसल्याचे पत्र जिल्हा उद्योग मित्र समितीला कळवले आहे. त्र्यंबकरो़डवर सायकल ट्रॅक अस्तित्वात नसतानाही पालिकेने घेतलेल्या या भूमिकेवरच आता संशय निर्माण झाला असून, आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

मागणी असेल तर कळवू!

त्र्यंबकरोडवर सायकल ट्रॅक करून देण्याच्या जिल्हा उद्योग मित्र समितीचा प्रस्ताव परतवून लावत शहरात अन्य ठिकाणी सायकल ट्रॅक करण्याची मागणी आल्यास समितीला कळवले जाईल, असे मोघम उत्तर पालिकेने दिले आहे. सध्या पालिकेची आर्थिक स्थिती नाजूक असून कामांसाठी निधी नाही. दुसरीकडे सायकल ट्रॅक सीएआरअंतर्गत विकस‌ित करण्याची तयारी उद्योजकांनी दर्शवली असताना त्याबाबत अनास्था दाखवण्यात आली आहे. त्यामळे पालिकेच्या उद्देशावरच आता शंका उपस्थित केल्या जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कबड्डी सामन्यांचा थरार रंगणार

$
0
0

'केपीएल' सिझन २ ला ११ डिसेंबरपासून सुरुवात

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व नाशिक जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने नाशिक महापालिका व क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण प्रसारक संस्था नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने दि. ११ ते १७ डिसेंबरदरम्यान कबड्डी प्रीमियर लीग सिझन २ चे आयोजन करण्यात आले आहे.

सिझन एकच्या यशस्वी आयोजनानंतर यंदाच्या वर्षी या स्पर्धेचे आयोजन राज्यस्तरावर करण्यात आले आहे. या स्पर्धेत दादाजी आव्हाड, आदिनाथ गवळी, मयुर शिवतरकर यांच्यासारखे प्रो कबड्डी खेळलेल्या खेळाडूंबरोबर सिद्धार्थ देसाई, मोबीन शेख, प्रशांत जाधव, विवेक नाडार, यांच्यासारख्या राष्ट्रीय खेळाडूंचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे. या स्पर्धेत यजमान नाशिक जिल्ह्याबरोबरच धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, बीड, जालना, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सांगली, पुणे, या जिल्ह्यातील ७८ खेळाडूंची निवड करण्यात आली असून, त्यांची विभागणी ६ संघात करण्यात आली आहे. सर्वज्ञ रेंडर्स, एबीसी रॉयल फायटर्स, नाशिक लायन्स, सिन्नर सायलेंट किलर, कन्हैया चॅलेंजर, डेरी पॉवर या संघांचा समावेश आहे.

सराव शिबिर आजपासून

ही स्पर्धा ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सायंकाळी ६ ते १० या वेळात खेळवली जाणार आहे. १५ साखळी सामने व ४ बाद फेरीचे सामने असे १९ सामने होणार आहे. पहिले ५ दिवस रोज ३ सामने आणि सहाव्या दिवशी उपांत्य फेरीचे, शेवटच्या दिवशी तृतीय, चतुर्थ व अंतिम सामना खेळविण्यात येईल. स्पर्धेसाठी ६ हजार क्षमतेचे स्टेडियम बनविण्यात येत आहे. संघाचे सराव शिबिर आजपासून सुरू होणार आहे.

विजेत्या संघात

५ लाखांचे बक्षीस

स्पर्धेतील विजेत्यास ५ लाख रुपयांचे रोख बक्षीस व चषक त्याचप्रमाणे उपविजेत्या संघास ३ लाख रुपये व चषक आणि तृतीय विजेत्या संघास २ लाख रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धेतील उत्कृष्ट खेळाडूला ३१ हजार रुपये रोख व चषक, उत्कृष्ट चढाईपटू व पकडपटू यांनाही गौरविण्यात येणार आहे. या स्पर्धेत एकूण १५ लाख ५० हजार रुपयांचे बक्षिसे देण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृउबा सचिवपद कार्यभार वादात

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव अरुण काळे यांच्याकडे पुन्हा सचिवपदाचा कार्यभार देण्यास ११ संचालकांनी विरोध केला आहे. या अगोदर संचालकांच्या बैठकीत काळे यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्याचा ठराव संचालकांनी केला होता. काळे यांची चौकशी सुरू असल्यामुळे त्यांच्याकडील पदभार काढून घ्यावा, अशी मागणी या संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांकडे पत्राद्वारे केली आहे.

या विरोधाचे पत्र शंकर धनवटे, प्रभाकर मुळाणे, तुकाराम पेखळे, विश्वास नागरे, दिलीप थेटे, ताराबाई माळेकर, संपतराव सकाळे, युवराज कोठुळे, श्याम गावित, विमल जुंद्रे, संजय तुंगार या ११ संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहे. या पत्रात काळे यांनी सचिव म्हणून काम करीत असताना बाजार समितीचे आर्थिक नुकसान केले आहे. त्यांनी केलेल्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी संचालक मंडळाने दि. ९ ऑक्टोबरला कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी निवेदन दिलेले आहे. तसेच, संचालक मंडळाने काळे यांचा पदभार काढून घेण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, असे असताना जिल्हा उपनिबंधकांनी काळे यांच्याकडे पदभार देण्याची सूचना केली. या पत्रानुसार सभापती शिवाजी चुंभळे यांनी कार्यवाही केली. मात्र, इतर संचालकांनी काळे यांच्याकडे पुन्हा सचिवपद देण्यास विरोध कायम ठेवला आहे.

--

या कारणांवरून विरोध

नाशिकरोड येथील जागा विक्रीत मुदतीत रक्कम न भरल्यामुळे बाजार समितीचे नुकसान झाले आहे. कर्मचाऱ्यांचे व्यवसाय कर, विमा हप्ता, संघटना वर्गणी व भविष्यनिर्वाह निधीची रक्कम वेळेत न भरल्यामुळे बाजार समितीविरोधात दंड आकारणी होऊन आर्थिक नुकसान झाले आहे. बाजार समितीच्या २०१५-१६ पासून लेखापरीक्षण न होण्यास काळे जबाबदार आहेत, असे मुद्दे या पत्रात संचालकांनी मांडून त्यांना पदभार देण्यास विरोध केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

लाखभर शेतकऱ्यांना ‘कृषी संजीवनी’

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिक जिल्ह्यातील सुमारे एक लाख १० हजार शेतकऱ्यांनी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेत सहभाग नोंदवला असून, या शेतकऱ्यांनी वीजबिलापोटी तब्बल ५३ कोटी २५ लाख रुपयांचा भरणा महावितरणकडे केला आहे.

थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांना वीजबिल भरणे अधिक सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने नोव्हेंबरच्या सुरुवातीला मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजना लागू केली. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना त्यांच्या थकीत वीजबिलातील दंड व व्याज वगळून मूळ रकमेचे सुलभ हप्ते चालू बिलासह वर्षभरात भरण्याची सुविधा देण्यात आली. शेवटच्या टप्प्यात योजनेला प्रतिसाद वाढविण्यासाठी ३० हजार रुपयांपेक्षा कमी थकबाकीसाठी तीन, तर ३० हजारांपेक्षा अधिकच्या थकबाकीसाठी पाच हजार रुपये भरून योजनेचा लाभ देण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली. वीजबिलाबाबतच्या शंकांचे निरसन करण्यासाठी डिसेंबरमध्ये फीडरनिहाय कृषिपंप ग्राहकांच्या शिबिरांचेही नियोजन करण्यात आले.

योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत (दि. ३० नोव्हेंबर) जिल्ह्यातील १ लाख ९ हजार ५३३ कृषिपंप ग्राहकांनी महावितरणकडे भरणा केला आहे. एकूण थकबाकीदार कृषिपंप ग्राहकांच्या तुलनेत ३६ टक्के ग्राहकांनी योजनेत सहभाग नोंदविला आहे.

--

नाशिक मंडलाची स्थिती

नाशिक शहर मंडलातील विभागनिहाय आकडेवारी (अनुक्रमे सहभागी कृषिपंपधारक व जमा केलेली रक्कम) ः नाशिक शहर १- १३४६ ग्राहक, ७९ लाख, नाशिक शहर २- ७८९९ ग्राहक, ५ कोटी १ लाख, नाशिक ग्रामीण- २१ हजार ९७४ ग्राहक, ११ कोटी ६९ लाख, चांदवड- २५ हजार ३२ ग्राहक, १२ कोटी ८२ लाख रुपये. नाशिक शहर मंडल- एकूण ५६ हजार २५१ ग्राहक, ३० कोटी ३२ लाख रुपये.

--

मालेगाव मंडलाची स्थिती

मालेगाव मंडलातील विभागनिहाय आकडेवारी (अनुक्रमे सहभागी कृषिपंप ग्राहक व जमा केलेली रक्कम) ः मालेगाव- १५ हजार ७८३ ग्राहक, ४ कोटी ९३ लाख, मनमाड- १२ हजार ३९० ग्राहक, ४ कोटी ९७ लाख, सटाणा- ११ हजार ८७५ ग्राहक, ५ कोटी १७ लाख, कळवण- १३ हजार २३४ ग्राहक, ७ कोटी ८७ लाख रुपये. मालेगाव मंडल- एकूण ५३ हजार २८२ ग्राहक, २२ कोटी ९४ लाख रुपये.

--

‘त्यांनी’ गमावली संधी

नाशिक जिल्ह्यातील ३ लाख ५ हजार २२२ कृषिपंपधारक शेतकरी मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेसाठी पात्र ठरले होते. या ग्राहकांकडे वीजबिलाची ७६६ कोटी रुपये मूळ रकमेची वीजबिले थकीत आहेत. अंतिम मुदतीपर्यंत योजनेत सहभागी झालेल्या ग्राहकांची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार शेतकऱ्यांनी सुलभ हप्ते, तसेच व्याज व दंडमाफीसह थकबाकीमुक्त होण्याची संधी गमावली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भाजपच्या गोटात चलबिचल

$
0
0

भुजबळांना जामीन मिळाल्यास जिल्हा बँकेतील बिघडणार गणित

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष नरेंद्र दराडे यांनी शेतकरी कर्जमाफीचे कारण देत नुकताच अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. यानंतर भाजपने अध्यक्षपदासाठी फि‌ल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सन २०१५ मध्ये अध्यक्षपदाचा हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेलेल्या भाजपने आता येनकेन प्रकारे अध्यक्षपदासाठी गुप्त बैठकांचा धडाका सुरू केला आहे. मात्र त्यांच्या प्रयत्नांवर पुन्हा भुजबळ फॅक्टरमुळे पाणी फिरण्याची शक्यता आहे. भुजबळांचा मंगळवारी जामीन झाल्यास जिल्हा बँकेची गणिते पुन्हा बदलण्याची शक्यता असून, भाजपच्या प्रयत्नांना खो बसणार असल्याची चर्चा आहे.

जिल्हा बँकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे तब्बल सहा संचालक निवडून आले होते. तर २१ संचालकांपैकी अपूर्व हिरे गटाकडे ९, तर माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्या गटाकडे सहा संचालक होते. राज्यात सत्ता असल्याने जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी भाजपचा उमेदवार असावा, यासाठी प्रयत्न सुरू होते. यासाठी अपूर्व हिरे आणि माजी आमदार माणिकराव कोकाटे यांच्यात स्पर्धा सुरू होती. परंतु, ऐनवेळी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी व काँग्रेसने भाजप नेत्यांना जोरदार धक्का दिला. माजीमंत्री छगन भुजबळ यांनी ऐनवेळी भाजपविरोधी पक्षाच्या नेत्यांना एकत्रीत करीत अध्यक्षपदी नरेंद्र दराडे, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे सुहास कांदे यांना बिनविरोध निवडून आणले. भुजबळांच्या खेळीने भाजपला बँकेत सत्तेपासून दूर रहावे लागले. भुजबळ फार्मवरून चक्रे फिरल्याने बँकेचे अध्यक्षपद येवल्याला मिळाले.

पावणेतीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर नरेंद्र दराडे यांच्या राजीनाम्यामुळे पुन्हा भाजपला अध्यक्षपद मिळण्‍याची संधी प्राप्त झाली आहे. त्यासाठी पालकमंत्र्यांकडून गुप्त बैठकाचां सपाटा लावला जात आहे. जिल्हा बँकेत भाजपचे पूर्वी सहा अधिकृत संख्याबळ होते. मात्र, हिरे बंधूंनी राजीनामा दिल्याने आता भाजपचे संख्याबळ चारवर आले आहे. त्यामुळे भाजपाने राष्ट्रवादीचे परवेज कोकणी आणि नुकताच सेनेचा राजीमाना दिलेले संदीप गुळवे यांना गळाला लावल्याचे बोलले जात आहे. कोकणींना विधान परिषद निवडणुकीची उमेदवारी देण्याचा शब्द देण्यात आला आहे. तर शिवसेनेच्या संचालकांचीही मनधरणी केली जात आहे. अध्यक्षपद ताब्यात ठेवण्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन आणि आमदार बाळासाहेब सानप यांनी हे अवघड शिवधनुष्य उचलले असले तरी, भुजबळांचा करिश्मा त्यांच्या आड येण्याची शक्यता आहे. भुजबळ जेलमधून बाहेर आल्यास पुन्हा बँकेची गणिते फिरण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजपच्या गोटात पुन्हा चलबिचल सुरू झाली असून, भुजबळांना थोपविण्यासाठी रणनितीत बदल केला जात आहे.

आजच्या निर्णयाकडे लक्ष

छगन भुजबळ यांच्यामागे अवैध संपत्तीचे प्रकरण लागून त्यांना १४ मार्च २०१६ रोजी अटक करण्यात आली होती. गेल्या पावणेदोन वर्षांपासून ते कारागृहात आहेत. परंतु, अवैध संपत्ती प्रकरणी त्यांच्यावर लावण्यात आलेले कलम सुप्रीम कोर्टाने नुकतेच रद्द केले आहे. त्यामुळे त्यांना जामीन मिळण्याची शक्यता असून, त्यावर आज (दि. ५) सुनावणी होणार आहे. त्यामुळे हा निर्णय त्यांच्या बाजूने लागल्यास बँकच्या निवडणुकीत पुन्हा चमत्कार घडू शकतो, अशीही राजकीय गोटात चर्चा आहे. त्यामुळे आजच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मिशन इंद्रधनुष्यात मालेगाव केंद्रस्थानी

$
0
0

७ डिसेंबरपासून लसीकरण; टक्का वाढविण्याचे प्रयत्न

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्याचा बालमृत्यू दर कमी करण्यासाठी जिल्ह्यात ७ ते १५ डिसेंबरदरम्यान मिशन इंद्रधनुष्य योजनेंतर्गत लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत मालेगाव शहराकडे विशेष लक्ष देऊन येथे जनजागृती केली जाणार आहे. एकही माता, बालक या मोहिमेत वंचित राहू नये, अशा सूचना जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

विशेष मिशन इंद्रधनुष्य टप्पा क्र. ३च्या सूक्ष्म नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुशील वाकचौरे, जिल्हा माता व

बालसंगोपन अधिकारी डॉ. रवींद्र चौधरी, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दावल साळवे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शैलेश निकम, नाशिक मनपा आरोग्य अधिकारी, मालेगाव मनपा आरोग्य अधिकारी, सर्व तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक तसेच नेहरू युवा केंद्र प्रतिनिधी व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या बैठकीत दोन टप्प्यांमध्ये झाालेल्या कामाचा आढावा घेण्यात आला. लसीकरणापासून वंचित राहिलेल्या माता व बालकांच्या लसीकरणात २० टक्क्यांनी वाढ झाली असून, मनपा क्षेत्रात ७२ टक्के, ग्रामीण भागात ९४ टक्के कामकाज करण्यात आले आहे. मालेगाव येथे लसीकरणाचे कामकाज चांगले व्हावे, यासठी जनजागृती करण्यात यावी तसेच धर्मगुरू, सामाजिक संस्था यांचा सक्रिय सहभाग वाढवावा याबाबत उपाययोजना कराव्यात, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

७ ते १५ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या तिसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त वंचित राहिलेल्या माता व बालकांचे लसीकरण कसे होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. जिल्ह्यातील एकही बालक व माता लसीकरणापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्यात यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीना यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भिकारी झाले उदंड...

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

पवित्र तीर्थक्षेत्र म्हणून ओळख असलेल्या पंचवटी परिसरात भिकाऱ्यांची संख्या अलीकडे चांगलीच वाढली असून, त्यांच्यातील वादाचा जाच भाविकांना सहन करावा लागत आहे. रामकुंडावर एका भिकाऱ्याने दुसऱ्या भिकाऱ्याचा खून केल्याच्या घटनेनंतर या परिसरातील भिकाऱ्यांमध्ये होत असलेले वाद किती विकोपाला गेले आहेत, हे दिसून आले. मात्र, तरीही याप्रश्नी ठोस कार्यवाही होत नसल्याने तीर्थस्थाने भिकाऱ्यांना आंदणच दिलीत की काय, असा सवाल भाविकांकडून उपस्थित होत आहे.

या परिसरातील बहुतांश भिकारी धडधाकट असल्याची स्थिती दिसून येते. या परिसरातील धार्मिक स्थळांच्या ठिकाणी त्यांचा बिनबोभाट वावर असतो. त्यामुळे येथे येणाऱ्या भाविकांना आणि पर्यटकांबरोबरच नाशिककरांनाही या भिकाऱ्यांचा वावर त्रासदायक ठरत आहे. त्यांचा त्याच्याकडे धारदार शस्त्र असल्याचेही या खुनाच्या प्रकारामुळे

उघडकीस आल्याने सुरक्षिततेचा प्रश्नही अधोरेखित झाला आहे. या पार्श्वभूमीवर पवित्र तीर्थस्थानावरील हे चित्र बदलण्याचे मोठे आव्हान स्मार्ट सिटीकडे वाटचाल करणाऱ्या प्रशासनाला पेलवावे लागणार आहे.

विविध कारणांनी घर सोडून आलेले लोक भिकारी बनून नाशिकच्या विविध परिसरात राहत असल्याचे दिसून येते. धार्मिक नगरीत होत असलेल्या अन्नदानामुळे सकाळ-सायंकाळाच्या जेवणाचा प्रश्न सुटतो. रामकुंड परिसरात तर अशा प्रकारचे अन्नदान नेहमीच सुरू असते. पोटाला पुरेसे अन्न मिळत असतानाही हे भिकारी रोख पैशांच्या भिकेसाठी भाविक आणि पर्यटकांकडे हात पसरत असतात. त्यांच्या हातात पैसाही पडत असतो. हा हाती पडलेला पैसा दारू आणि अन्य नशांसाठी वापरला जातो. अशा प्रकारच्या नशा करणारे भिकारी या परिसरात सर्रास नजरेस पडतात.

रामकुंड परिसरात मिळणाऱे अन्न तेथेच बसून खाणे, उरलेले अन्न तसेच टाकून देणे, तेथेच झोपणे, कित्येक दिवस अंघोळ केली नसल्यामुळे त्यांची सुटलेली दुर्गंधी, अंगावरील कपडे धुतलेले नसल्यामुळे त्यांचा दिसणार गलिच्छ अवतार भाविक आणि पर्यटकांना त्रासदायक ठरत आहे. हे चित्र बदलण्याची गरज व्यक्त होत आहे.

--

खुनापर्यंत जातेय मजल

परिसरातील भिकाऱ्यांत अनेक कारणावरून वाद होत असतात. त्यांच्या वादाकडे कुणी फारसे लक्ष देत नाही. त्यांचे वाद कधी-कधी विकोपास जातात. रात्रीच्या वेळी झोपण्याच्या जागेवरूनही वाद होतात. अशाच एका वादातून नरोत्तम भवनसमोरील दुकानांच्या शटरजवळच एका वृद्ध भिकाऱ्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून करण्याचा प्रकार घडला होता. रात्रीच्या वेळी घडलेल्या या प्रकराचा कोणताही प्रत्यक्षदर्शी पुरावा नसल्यामुळे या खुनाची उकल आतापर्यंत झालेली नाही. दुसरा प्रकार रामकुंड परिसरात साईबाबा मंदिराच्या समोरच्या पारावरच घडला. हा वाद दारूच्या नशेत झाल्याचेही स्पष्ट झाले आहे.

--

बेघर हाऊसची निकड

या भिकाऱ्यांना पवित्र तीर्थस्थानावर येण्यास बंदी घालण्यात यावी, त्यांच्यासाठी स्वतंत्र ठिकाणी भोजन, निवासाची व्यवस्था करण्यात यावी, अशी अपेक्षा भाविकांकडून व्यक्त होत आहे. महापालिकेने रामकुंड परिसरात असलेल्या भिकाऱ्यांसाठी बेघर हाऊसच्या उभारणीचा विचार मांडला होता. त्यासाठी जागेचीही पाहणी करण्यात आली होती. मात्र, अशा प्रकारचे बेघर हाऊस अजूनही उभे राहिलेले नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महापौर चषक बजेटमधून गायब?

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेने क्रीडा विभागासाठी राखीव ठेवलेल्या पाच टक्के निधी खर्चात अनास्था दाखवली असतानाच आता बजेटमधूनच महापौर चषक क्रीडा स्पर्धा गायब केल्याची चर्चा आहे. कबड्डी खो खो आणि कुस्ती या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी सुरू असलेल्या महापौर चषकाची परंपरा सन २०१२पासून खंडित करण्यात आली असून, आता थेट बजेटमधूनही या स्पर्धा हद्दपार झाल्याचे समजते. त्यामुळे प्रशासनापाठोपाठ आता लोकप्रतिनिधींमध्येच या स्पर्धेबाबत मोठी अनास्था असल्याचे चित्र आहे.

क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी प्रथम महापौर स्व. शांताराम बापू वावरे यांच्या कार्यकाळापासून महापौर चषक स्पर्धेला सुरुवात झाली होती. कबड्डी खो खो आणि कुस्ती या मातीतल्या खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी तत्कालीन स्थायी समिती अध्यक्ष उत्तमराव कांबळे यांनी महापौर चषक क्रीडा स्पर्धा सुरू केल्या. त्यासाठी बजेटमध्ये दरवर्षी विशिष्ट तरतूदही केली जात होती. गेली अनेक वर्षे ही परंपरा सुरू ‌राहिली. परंतु, सन २०१२ नंतर या परंपरेला ब्रेक देण्यात आला आहे. उद्धव निमसे हे सन २०१२ मध्ये स्थायी समितीचे अध्यक्ष असताना ही शेवटची स्पर्धा घेण्यात आली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ट्रकखाली चौघांना चिरडले

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

मनमाड- मालेगाव रस्त्यावरील दहेगाव शिवारात सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास मोटारसायकलला टँकरने मागून धडक देऊन बोयेगाव (ता. नांदगाव) येथील एकाच कुटुंबातील चौघांना चिरडले. यापैकी तीन जण जागीच ठार झाले, तर एका जखमीचा उपचारादरम्यान मालेगाव येथे मृत्यू झाला. मृतांमध्ये दोन महिलांसह सात वर्षीय बालकाचा समावेश आहे. यात आठ वर्षीय बालक जखमी झाले आहे. सर्व जण बोयेगाव येथील चितळकर परिवारातील आहेत. हा अपघात इतका भीषण होता, की मृतांच्या कवटीचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. या प्रकरणी टँकरचालकाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती प्रभारी पोलिस निरीक्षक एस. के. पांढरे यांनी दिली.

मृतांमध्ये संतोष रामभाऊ चितळकर (वय ३२), पत्नी आशाबाई (वय २७), मुलगा रोशन ( ८), पुतण्या भूषण (७) आणि भावजयी सविता उत्तम चितळकर (२०) यांचा समावेश आहे. टँकरचालक मृतांचा नातेवाईक आहे. हा अपघात नसून, हत्या असल्याचा आरोप मृतांच्या नातेवाइकांनी केला होता. जोपर्यंत खुनाचा गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत शवविच्छेदन न करण्याची भूमिका नातेवाइकांनी घेतल्याने वातावरण तापले होते. या प्रकरणी चांदवड पोलिस ठाण्यात अखेर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. अपघातात संतोष चितळकर याचे संपूर्ण कुटुंब उद््ध्वस्त झाले. संतोष यांना दोन भाऊ असून, एक मिलिटरीत, तर दुसरा भास्कर बोयेगाव येथे शेतकरी आहे. सविता ही भास्करची पत्नी होती.

पूर्ववैमनस्यातून घात

हा अपघात नसून, हा भरधाव टँकर अंगावर घालून मोटारसायकल टँकरखाली चिरडून चार जणांची हत्याच असल्याचा आरोप संतप्त कुटुंबीयांनी केला असून, खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिस अधिकाऱ्यांकडे केली होती. मृत संतोष चितळकर व टँकरचालक संशयित तुकाराम चितळकर एकमेकांचे चुलतभाऊ आहेत. या दोन्ही कुटुंबांत शेतजमिनीवरून वाद व पूर्ववैमनस्य असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी या दोन्ही कुटुंबांत हाणामारीच्या घटना घडल्या असून, २०१२ मध्ये या प्रकरणी मनमाड पोलिस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीही दाखल असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. संतोष व इतर चौघे मोटारसायकलवरून मनमाडकडे निघाले, त्याच वेळी तुकाराम टँकर घेऊन बोयेगावातून मनमाडकडे निघाला. मात्र, मनमाडच्या अलीकडे दहेगाव शिवारात हा भीषण प्रकार घडला. मागून येऊन घात केल्याची भावना संतोषच्या भावांनीही व्यक्त केली होती.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

समावेशक आरक्षणांमध्ये ‘झोल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

समावेशक आरक्षणाच्या (एआर) नावाखाली विकसीत करण्यात येणाऱ्या आरक्षणात बिल्डर, नगररचना आणि मिळकत विभागातील अधिकाऱ्यांनी घोटाळा केल्याचे समोर आले आहे.

शहरातील ३३ समावेशक आरक्षणांपैकी २५ आरक्षणांचा गैरवापर झाला असून, पार्किंगसाठी विविध ठिकाणी २८ आरक्षणे असताना जेमतेम ४ भूखंडांच्या संपादनाची प्रक्रिया सुरू आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली रोटरी, पझल पार्किंगचा बडेजाव मिरवणाऱ्या महापालिकेने पार्किंगच्या जागा ताब्यात घेण्याकडे मात्र काणाडोळा केला आहे. पार्किंगसह अन्य नागरी प्रयोजनांसाठी आरक्षित असलेल्या मोक्याच्या जागांवर काही भूविकासकांनी कब्जा केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. संबंधितावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीही बोरस्ते यांनी केली आहे.

शहर विकास आराखड्यात पार्किंग, रुग्णालये, शाळा, कार्यालये, मैदाने यांसह विविध नागरी प्रयोजनांसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. या सर्व आरक्षणांच्या संपादनासाठी सुमारे पाच हजार कोटी रुपयांहून अधिक निधीची पालिकेला आवश्यकता आहे. मात्र, महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्याचे कारण देत काही आरक्षणे टीडीआरच्या माध्यमातून, तर काही आरक्षणे समावेशक आरक्षण तरतुदीच्या माध्यमातून विकसित करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला होता. त्याअंतर्गतच समावेशक आरक्षणाच्या (अॅकॉमडेशन रिझर्व्हेशन) माध्यमातून ३३ आरक्षित भूखंडांच्या विकासासाठी मंजुरी दिली गेली. संबंधित जागा मालकांनी आरक्षण विकासाच्या नावाखाली स्वत:चे उखळ पांढरे करत आपली मान सोडवून घेतल्याचे समोर आले आहे. गेल्या आठवड्यात आकाशवाणी टॉवरजवळ असेच समावेशक आरक्षणाखाली मैदान विकसित करण्याच्या कामाला शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसने विरोध केला आहे. त्यानंतर समावेशक आरक्षणाबाबत बोरस्ते यांनी माहिती मागविली असता त्यात मोठा घोटाळा झाल्याचे समोर आले आहे.

शहरात समावेशक आरक्षणाखाली ३३ पार्किंगची ठिकाणे विकसित करण्याचे प्रस्ताव दाखल झाले आहेत. त्यातील चार प्रस्ताव भूसंपादनासाठी असून, पाच प्रकरणे विकसित झाली आहेत. विकसित झालेल्या प्रकरणांमध्ये सातपूर गावठाण, टीपी स्किम दोनमधील एकूण तीन तर गोदाघाट परिसरातील एका आरक्षणाचा समावेश आहे. परंतु, यात मूळ आरक्षणे विकसित केली गेलीच नसल्याचे समोर आले आहे. काही प्रकरणांमध्ये आरक्षणे स्थलांतरित करण्यात आली, तर बऱ्याच प्रकरणांमध्ये आरक्षणांचा ताबाच महापालिकेला मिळू शकलेला नाही. विशेषत: शहरात पार्किंगची समस्या गंभीर बनली असताना पार्किंगची आरक्षणे एआरअंतर्गत विकसित करताना महापालिकेची फसवणूक केली गेली. त्यामुळे आयुक्तांनी संबंधित प्रकरणांची चौकशी करून दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी बोरस्ते यांनी केली आहे.

मागच्या दाराने प्रस्ताव

समावेशक आरक्षणे विकसित करू नयेत, असा ठराव सन २००४ मध्ये करण्यात आला असताना अजूनही मागच्या दाराने समावेशक आरक्षणे विकसित करण्याचे प्रस्ताव दाखल होत आहेत. जागा आरक्षणातून सोडवून घेण्यासाठी पुन्हा पालिकेकडे सहा ते सात एआरचे प्रस्ताव दाखल होण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे हा ठराव कागदावरच राहणार असून, त्याची अंमलबजावणी करण्याची मागणी बोरस्ते यांनी केली आहे.

मंजूर पार्किंग, वापर भलताच

मोक्याच्या जागेवर असलेल्या आरक्षणांचा बिल्डर, अधिकाऱ्यांनी बट्ट्याबोळ केला आहे. देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक १२२ चे क्षेत्र शॉपिंग आणि पार्किंगसाठी आरक्षित होते. तेथे पार्किंगची जागा विकसित झाली. परंतु, महापालिकेकडे हस्तांतरित झाली नाही. नाशिक शिवारातील सर्व्हे क्रमांक ४३२ मधील क्षेत्राचे अद्याप बांधकाम झालेले नाही. टीपी स्किम दोनमधील सर्वे क्रमांक ९९९, १००० मध्ये सहाशे चौरस मीटर जागेवर पार्किंग अद्याप महापालिकेकडे हस्तांतरित झालेली नाही. मुंबई नाका येथील शताब्दी हॉस्पिटलच्या चार हजार चौरस मीटर जागेवर भूमिगत वाहनतळ उभारण्यात आले; परंतु, दहा वर्षे उलटूनही महापालिकेने ते वाहनतळ ताब्यात घेतले नसून, तेथे बिल्डिंग उभी राह‌िली आहे. पंचवटी गावठाणात सीतागुंफा येथे १२९० चौरसमीटर वाहनतळ विकसित करण्यात आले. परंतु, अद्याप महापालिकेने त्या वाहनतळाचा वापर केलेला नाही. पंचवटी गावठाणातील सीटीएस क्रमांक ५८७७ मध्ये पार्किंगसाठी इमारत तयार असली, तरी त्याचा अनधिकृतपणे वापर सुरू आहे.

शहरात प्रशासन व बिल्डरांकडून समावेशक आरक्षण विकसित करण्याचे रॅकेट चालविले जात असून, मोक्याच्या जागांवर भूमाफियांनी कब्जा केला आहे. त्यामुळे या सर्वांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करून ही अतिक्रमणे काढण्यासाठी मोहीम राबवण्याची मागणी आयुक्तांकडे करणार आहोत.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेते

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images