तुम्हाला नवीन आधारकार्ड काढायचे असेल अथवा आहे त्या आधारकार्डमध्ये केवळ काही दुरुस्ती करावयाची असेल तर किमान अडीच महिने प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्रावर कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची घोर निराशा होत असून, प्रतीक्षा यादी २० फेब्रुवारीपर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आधारशी संबंधित काही मिनिटांच्या कामांसाठी नागरिकांना अडीच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.
आधार कार्ड काढणे किंवा त्यामध्ये दुरुस्ती करवून घेणे नागरिकांसाठी शिक्षा ठरू लागले आहे. आर्थिक व्यवहारांसह मोबाइल, विमा व तत्सम अनेक गोष्टींशी केंद्र आणि राज्य सरकारने आधार लिंकिंग बंधनकारक केले आहे. त्यामुळे लहान-सहान गोष्टींसाठी नागरिकांची कामे अडत असून, आधारमधील दुरुस्त्यांसाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे.
शहरासह जिल्ह्यातील खासगी आधार सेंटर्स बंद करण्यात आले असून, त्यामुळे आधार यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडली आहे. सरकारी कार्यालये, शाळा व तत्सम काही ठिकाणांवर आधारशी संबंधित कामे होत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असले, तरी त्या ठिकाणांवर घोर निराशा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढतच आहेत. सातपूर शिवाजीनगर परिसरातील दोन महापालिका शाळांसह आनंदवली येथील केंद्रावरही सेवा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटरवर सेवा पुरविली जात असली तरी तेथे दिवसभरात शेकडो लोक येत असल्याने नागरिकांची गैरसोय तसूभरही कमी होऊ शकलेली नाही. एका दिवशी आधार कार्डशी संबंधित फारतर ३० ते ३५ जणांचीच कामे होत असल्याने येथे एका रजिस्टरमध्ये प्रतीक्षा यादी बनविण्यात आली आहे. दररोज येथे शेकडो लोक नाव नोंदवित असल्याने ही यादी दिवसेंदिवस वाढतेच आहे. आजमितीस येथील रजिस्टरवर २० फेब्रुवारीपर्यंतची नावे नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे उद्यापासून या केंद्रावर कामे घेऊन जाणाऱ्या नागरिकांना पुढील तारखा दिल्या जाणार आहेत.
वादाच्या ठिणग्या
आधारमधील दुरुस्त्या होत नसल्याने नागरिकांची वेगवेगळ्या कार्यालयांमधील कामे खोळंबली आहेत. अवघ्या वीस मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना अडीच महिने थांबण्यास सांगितले जात असल्यामुळे आधार सेंटरवरील कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये वादाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. नागरिकांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे. येथील रजिस्टरवर तुमचे नाव आणि मोबाइल नंबर टाकून संबंधित दिवशी या असे त्यांना सांगितले जात आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सेंटरवर एकच किट होते. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आता चार किट सुरू करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील १४ सीएससी सेंटर्सवरदेखील सोमवारपासून (दि. ११) आधार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.
- शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी नाशिक
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट