Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

‘आधार’चे काम, अडीच महिने थांब!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तुम्हाला नवीन आधारकार्ड काढायचे असेल अथवा आहे त्या आधारकार्डमध्ये केवळ काही दुरुस्ती करावयाची असेल तर किमान अडीच महिने प्रतीक्षेशिवाय पर्याय नाही. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार केंद्रावर कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची घोर निराशा होत असून, प्रतीक्षा यादी २० फेब्रुवारी‌पर्यंत पोहोचली आहे. त्यामुळे आधारशी संबंधित काही मिनिटांच्या कामांसाठी नागरिकांना अड‌ीच महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे.

आधार कार्ड काढणे किंवा त्यामध्ये दुरुस्ती करवून घेणे नागरिकांसाठी शिक्षा ठरू लागले आहे. आर्थिक व्यवहारांसह मोबाइल, विमा व तत्सम अनेक गोष्टींशी केंद्र आणि राज्य सरकारने आधार लिंकिंग बंधनकारक केले आहे. त्यामुळे लहान-सहान गोष्टींसाठी नागरिकांची कामे अडत असून, आधारमधील दुरुस्त्यांसाठी त्यांना धावपळ करावी लागत आहे.

शहरासह जिल्ह्यातील खासगी आधार सेंटर्स बंद करण्यात आले असून, त्यामुळे आधार यंत्रणा पूर्णत: कोलमडून पडली आहे. सरकारी कार्यालये, शाळा व तत्सम काही ठिकाणांवर आधारशी संबंधित कामे होत असल्याचा दावा जिल्हा प्रशासन करीत असले, तरी त्या ठिकाणांवर घोर निराशा होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी वाढतच आहेत. सातपूर शिवाजीनगर परिसरातील दोन महापालिका शाळांसह आनंदवली येथील केंद्रावरही सेवा मिळत नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील आधार सेंटरवर सेवा पुरविली जात असली तरी तेथे दिवसभरात शेकडो लोक येत असल्याने नागरिकांची गैरसोय तसूभरही कमी होऊ शकलेली नाही. एका दिवशी आधार कार्डशी संबंधित फारतर ३० ते ३५ जणांचीच कामे होत असल्याने येथे एका रजिस्टरमध्ये प्रतीक्षा यादी बनविण्यात आली आहे. दररोज येथे शेकडो लोक नाव नोंदवित असल्याने ही यादी दिवसेंदिवस वाढतेच आहे. आजमितीस येथील रजिस्टरवर २० फेब्रुवारीपर्यंतची नावे नोंदविण्यात आली आहेत. त्यामुळे उद्यापासून या केंद्रावर कामे घेऊन जाणाऱ्या नागरिकांना पुढील तारखा दिल्या जाणार आहेत.

वादाच्या ठिणग्या

आधारमधील दुरुस्त्या होत नसल्याने नागरिकांची वेगवेगळ्या कार्यालयांमधील कामे खोळंबली आहेत. अवघ्या वीस मिनिटांच्या कामासाठी नागरिकांना अडीच महिने थांबण्यास सांगितले जात असल्यामुळे आधार सेंटरवरील कर्मचारी आणि नागरिक यांच्यामध्ये वादाच्या ठिणग्या उडू लागल्या आहेत. नागरिकांना उत्तरे देताना कर्मचाऱ्यांची दमछाक होऊ लागली आहे. येथील रजिस्टरवर तुमचे नाव आणि मोबाइल नंबर टाकून संबंधित दिवशी या असे त्यांना सांगितले जात आहे.


जिल्हाधिकारी कार्यालयातील सेंटरवर एकच क‌िट होते. नागरिकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन आता चार क‌िट सुरू करण्यात आले आहेत. महापालिका क्षेत्रातील १४ सीएसस‌ी सेंटर्सवरदेखील सोमवारपासून (दि. ११) आधार सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय दूर होण्यास मदत होईल.

- शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


वसंतदादा सर्वसामान्यांचे नेते

0
0

ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे प्रतिपादन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

वसंतदादा पाटील हे सर्वसामान्य माणसांचे नेते होते. दादा हे महाराष्ट्रातील सर्वात कमी शिकलेले परंतु, सर्वात जास्त हुशार माणूस. त्यांच्याकडे निर्णय घेण्याची क्षमता आणि अंमलबजावणी करण्याची ताकदही होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी केले.

सांस्कृतिक क्षेत्राचा मानबिंदू अशी ओळख असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय, नाशिक या संस्थेच्या ग्रंथालय सप्ताहास शुक्रवारपासून सुरुवात झाली. सप्ताहाचे उद्घाटन भावे यांच्या व्याख्यानाने करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर सावानाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. माजी मुख्यमंत्री तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक वसंतदादा पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शुक्रवारी ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले. सर्वसामान्यांचा आधारवड स्व. वसंतदादा पाटील असा व्याख्यानाचा विषय होता. हे व्याख्यान क्रांतिकारक हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात आले.

भावे पुढे म्हणाले, की दादांनी स्वातंत्र्यलढ्यात गोळी झेलली होती आणि अनंत कान्हेरे यांनी स्वातंत्र्यलढ्यासाठी गोळी झाडली होती. अशा दोन्ही क्रांतिकारकांचा संगम या व्याख्यानमालेच्या निमित्ताने झालेला आहे. वसंतदादा म्हटले की त्यांचा इतिहास क्षणात समोर येतो. त्याग, समर्पण, सेवा आपण सर्वजण विसरूनच गेलो आहोत. ग्रामीण भागातील मुलांना शिकण्याची जेव्हा उमेद होती त्या काळात त्यांना कॉलेज मिळत नव्हते. दादांनी कॉलेज उभी करून दिली. राज्यात वैद्यकीय व अभियांत्रिकी कॉलेजेस उभी करण्यात दादांचा सिंहाचा वाटा होता.

कार्यक्रमाप्रसंगी काँग्रेसचे पदाधिकारी यशवंत हापे यांनीही छोटेखानी मनोगत व्यक्त केले. संजय करंजकर यांनी प्रास्ताविक केले. मधुकर भावे यांचा परिचय श्रीकांत बेणी यांनी करून दिला. डॉ. शंकर बोऱ्हाडे यांनी सूत्रसंचालन केले. संस्थेच्या मु. शं. औरंगाबादकर सभागृहात पुढील आठवडाभर मान्यवर वक्त्यांची व्याख्याने होणार आहेत.

आजचे व्याख्यान

महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती या विषयावर आज (दि. ९) मोहसिना मुकादम, डॉ. सुषमा पौडवाल, मुंबई यांचे व्याख्यान होणार आहे. यावेळी एम. लिब., बी. लिब अभ्यासक्रमात प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना कै. मु. शं. औरंगाबादकर स्मृती पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गांधीनगर प्रेसची ताकद वाढणार

0
0

डॉ. बाळकृष्ण शेलार, नाशिकरोड

कोईमतूरच्या पेरियनीकेनिपलम येथील सरकारी प्रेसचे उत्पादन या महिनाअखेरीपर्यंत थांबविण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ही प्रेस नाशिक येथील गांधीनगर प्रेसमध्ये विलीन केली जाणार आहे.सरकारी दस्त, गोपनीय कागदपत्रे, जनगणनेचे अर्ज आदींची छपाई या मुद्रणालयांमध्ये होत होती. विलीनीकरणानंतर ही छपाई आता गांधीनगर प्रेसमध्ये होईल. गांधीनगरच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोईमतूरबरोबरच कोराटी आणि म्हैसूर येथील दोन सरकारी मुद्रणालये गांधीनगरमध्ये विलीन होणार आहेत. त्यामुळे या प्रेसची ताकद वाढून संजीवनी मिळणार आहे. गांधीनगर व नाशिकरोड प्रेस कामगारांच्या समर्पण व कौशल्यावर दाखवलेल्या विश्वासाचे हे प्रतीक असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

१८ प्रेस बंद करणार

सरकारने तांत्रिक कारणास्तव देशातील लहान १८ सरकारी प्रेस बंद करून फक्त पाच प्रेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, आजपर्यंत कृती झाली नव्हती. आता कोईमतूरपासून सुरुवात झाली आहे. सुरू राहणाऱ्या पाच प्रेसमध्ये नाशिकची गांधीनगर प्रेस आहे. १९६४ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या पेरियनीकेनिपलम प्रेसचे उत्पादन ३१ डिसेंबरपर्यंत थांबविण्यात येणार आहे. या प्रेसमधील ६६ कामगारांना गांधीनगरला पाठविण्यात येणार असल्याचे समजते. कोईमतूर प्रेस सुरू झाली तेव्हा ९०० कामगार होते. १९९० ते ९५ दरम्यान या प्रेसमधून अनेक कामगार निवृत्त झाल्यानंतर सरकारने भरती केली नाही. ही प्रेस १३२ एकरमध्ये आहे. प्रेस कामगांराची ४६३ निवासस्थाने असून, ती मोडकळीस आली आहेत. दरम्यान, प्रेस बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयाला कामगार संघटनेचे नेते पी. ए. जेकब यांनी तीव्र विरोध दर्शविला आहे.

ताकद वाढणार

सूत्रांनी दिलेली माहिती अशी, की पहिल्या टप्प्यात सरकार कोईमतूर, कोराटी आणि म्हैसूर या तीन प्रेस गांधीनगर प्रेसमध्ये विलीन करणार आहे. कोईमतूर प्रेसमध्ये ६६, कोराटीमध्ये २८ आणि म्हैसूर येथे २५ कामगार आहेत. ते जानेवारीत गांधीनगरला येतील. या कामगारांच्या याद्या तयार करण्याचे काम सुरू असून, त्यांचे जानेवारीचे वेतन गांधीनगरला काढले जाणार आहे. मशीन, बाइंडिंग, क्लर्क आदी विभागांतील कामगार प्रथम येतील.

गांधीनगरचा विजय

कुशल व कष्टाळू कामगार, दर्जेदार उत्पादन यासाठी गांधीनगर प्रेस प्रसिद्ध आहे. सध्या येथे पोस्टाचे व केंद्र सरकारी दस्त, गोपनीय कागदपत्रे, जनगणनेचे अर्ज, सरकारी शिक्षण संस्थांच्या प्रश्नपत्रिका आदींची छपाई होते. अडीच वर्षांपूर्वी गांधीनगर प्रेस बंद करण्याचे पत्र केंद्राने पाठविले, तेव्हा खळबळ उडाली होती. मात्र, न खचता प्रेस कामगारांनी एकजूट दाखवत लढा उभारला. प्रेस कामगार संघटनेचे सरचिटणीस मनोहर बोराडे, अध्यक्ष संजय घुगे, संयुक्त सचिव रवी आवारकर, माजी सरचटणीस विजय वागळे, समद शेख, हरीश परदेशी, भिकाभाऊ जाधव, रामभाऊ जाधव, सुनील पवार, संजय डोंगरे आदींनी जोरदार प्रयत्न केले. खासदार हेमंत गोडसे, नाशिकरोड प्रेस मजदूर संघाचे सरचिटणीस जगदीश गोडसे, मनोहर बोराडे यांच्या टीमने नवी दिल्लीत वरिष्ठांची भेट घेतली. गांधीनगर प्रेसची जागा विस्तीर्ण असून, ही प्रेस महामार्गावर आहे. नाशिकमध्ये दोन विमानतळे, रेल्वेस्थानक आहे. त्यामुळे प्रेस सुरू ठेवणे फायद्याचे असल्याचे या टीमने पटवून दिल्यानंतर सरकारने प्रेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आता तीन प्रेस विलीन होणार असल्याने या प्रेसला संजीवनी मिळाली आहे.

आधुनिकीकरणही लवकरच व्हावे

गांधीनगर प्रेसमध्ये कामगार व अधिकारी असे दोनशेचे मनुष्यबळ आहे. कमी मनुष्यबळात येथील कामगार दर्जेदार उत्पादन घेतात. कोईमतूर, कोराटी व म्हैसूरचे मनुष्यबळ येथे आल्यानंतर उत्पादन दुपटीने वाढेल. गांधीनगर प्रेसचे आधुनिकीकरण करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. त्याबाबत त्वरित कृती करावी.

- मनोहर बोराडे, सरचिटणीस, प्रेस कामगार संघटना

गांधीनगर प्रेस टिकवण्यात संघटनांना यश आले त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. तीन प्रेसच्या विलीनीकरणानंतर जे कामगार येणार आहेत. त्यांची थोडीच सेवा शिल्लक आहे. ती संपल्यानंतरही गांधीनगर प्रेस कायम सुरूच राहणार आहे. तिचे आधुनिकीकरण व्हावे, हीच अपेक्षा.

- जगदीश गोडसे, सरचिटणीस, नाशिकरोड प्रेस मजदूर संघ

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शंभरावर जागांसाठी ३७२ अर्ज

0
0

निवडणूक रंग आरोग्य विद्यापीठ

--

शंभरावर जागांसाठी ३७२ अर्ज

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा विविध प्राधिकरण मंडळाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून, या निवडणुकीतील शंभरावर जागांसाठी एकूण ३७२ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती देताना विद्यापीठ निवडणूक निर्णय अधिकारी तथा विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी सांगितले, की विद्यापीठातर्फे नागपूर, मुंबई, पुणे व औरंगाबाद विभागीय केंद्रांवरदेखील अर्ज जमा करण्याची सोय करण्यात आली होती. तेथील अर्ज एकत्रित केल्यानंतर एकूण उमेदवारांच्या अर्जांची संख्या ३७२ झाली आहे. विद्यापीठाच्या अधिसभेसाठी राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर, अमरावती व नाशिक या महसूल विभागातून प्रत्येकी एक याप्रमाणे एकूण सहा प्राध्यापकांच्या जागांसाठी एकूण ६८ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहे. यात मुंबई विभागासाठी १५, पुणे विभागासाठी १९, औरंगाबाद विभागासाठी १३, नाशिक विभागासाठी ९, नागपूर विभागासाठी ९, अमरावती विभागासाठी ३ असे उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत.

विद्यापीठाच्या विद्या परिषदेसाठी वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, होमिओपॅथी आणि तत्सम विद्याशाखेतील प्रत्येकी एक याप्रमाणे पाच प्राचार्यांची विद्याशाखानिहाय निवडणूक घेण्यात येईल. यामध्ये वैद्यकीय विद्याशाखा महिला, तर दंत विद्याशाखा अनुसूचित जमाती प्रवर्गाकरिता सोडतीद्वारे आरक्षित आहे. वैद्यकीय, दंत, आयुर्वेद, युनानी, होमिओपॅथी व तत्सम विद्याशाखांच्या अभ्यास मंडळाकरिता सदस्यांची निवडणूक घेण्यात येईल. या सर्व जागांसाठी एकत्रित ३०४ उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. यात वैद्यकीय विद्याशाखेसाठी ५५, दंत विद्याशाखेसाठी ४४, आयुर्वेद विद्याशाखेसाठी १२५, युनानी विद्याशाखेसाठी ६, होमिओपॅथी विद्याशाखेसाठी ३४, तर तत्सम विद्याशाखेसाठी ४० उमेदवारी अर्ज प्राप्त झाले आहेत. विविध सदस्य निवडीकरिता विद्यापीठातर्फे ही निवडणूक घेण्यात येणार आहे. याबाबतची अधिक माहिती व सूचना विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या विविध प्राधिकरणांसाठी पार पडणाऱ्या या निवडणूक प्रक्रियेसाठी तयारी पूर्ण झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. चव्हाण यांनी दिली. या निवडणुकीसाठी राज्यभरातून सुमारे १४ हजार मतदारांनी नोंदणी केली आहे. निवडणुकीतील बहुतांश जागा बिनविरोध होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. निवडणुकीची यापूर्वीही बिनविरोध निवडीची परंपरा राहिली आहे. दरम्यान, २० डिसेंबर रोजी अर्ज माघारीची मुदत असून, २१ डिसेंबर रोजी निवडणूक रिंगणातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. त्यामुळे अर्ज माघारीनंतरच लढतींचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. डॉक्टर घडविणाऱ्या या विद्यापीठातील निवडणुकीकडे राज्याचे लक्ष लागले आहे.


२८ रोजी मतदान, ३० ला मोजणी

प्राप्त अर्जांची विद्यापीठ मुख्यालयात ११ डिसेंबर रोजी छाननी करण्यात येईल. त्यानंतर उमेदवारांच्या वैध अर्जांची यादी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी २० डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत मुदत राहणार आहे. निवडणुकीकरिता उमेदवारांची अंतिम यादी २१ डिसेंबर रोजी प्रसिद्ध करण्यात येईल. विद्यापीठाची विविध प्राधिकरण निवडणूक दि. २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते दुपारी ४ वेळेत विविध मतदान केंद्रांवर होणार आहे. या निवडणूक प्रक्रियेची मतमोजणी ३० डिसेंबर रोजी विद्यापीठ मुख्यालयात करण्यात येईल. त्यानंतर निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. कालिदास चव्हाण यांनी दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बचतगटांवर पालिकेची मेहेरबानी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या महिला व बालकल्याण विभागांतर्गत सहाही विभागातील ४१८ अंगणवाड्यांमधील बालकांना सकस पोषण आहार पुरविणाऱ्या बचत गटांची मुदत मे २०१७ मध्येच संपली आहे. पोषण आहाराची मुदत संपली असतांनाही,प्रशासनाकडून मात्र नव्याने निविदा पद्धती राबविण्याऐवजी त्याच बचत गटांना वारंवार मुदतवाढ दिली जात आहे.त्यामुळे निविदा पद्धतीबाबत आयुक्तांचेही आदेश धाब्यावर बसविण्यात आले असून, स्थायी समितीने पुन्हा त्याच बचतगटांना मुदतवाढ दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

महापालिकेमार्फत ४१८ अंगणवाड्यांमधील सुमारे १३ हजार बालकांना गूळ, शेंगदाणे लाडू, केळी, मटकी, मोडाची उसळ, गव्हाची लापशी, राजगिरा लाडू हा आहार पुरवठा केला जातो. हा पोषण आहार पुरविण्याचे काम निविदा प्रक्रिया राबवून बचत गटांना देण्यात आले होते. या बचतगटांचा ठेका ३१ मे २०१७ रोजी संपुष्टात आला आहे. त्यामुळे पुन्हा त्याला सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. आता नोव्हेंबरमध्ये पुन्हा मुदत संपली आहे. त्यामुळे स्थायी समितीवर पुन्हा शुक्रवारी मुदतवाढीचा प्रस्ताव मागच्या दाराने ठेवण्यात आला होता. त्याला स्थायी समितीने पुन्हा मंजुरी दिली. कोणत्याही कामांची मुदत संपण्यापूर्वीच तीन-चार महिने अगोदर नवीन निविदा प्रक्रिया राबविण्याचे स्पष्ट आदेश आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी आपल्या सर्व खातेप्रमुखांना दिलेले आहेत. परंतु, आयुक्तांच्या या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत नसल्याचे या सकस आहार पुरवठ्यावरून समोर आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वावीत सशस्र दरोडा

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

वावी येथे गुरुवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास सहा दरोडेखोरांनी घराचा दरवाजा तोडून दरोडा टाकल्याची घटना सिन्नर- शिर्डी महामार्गालगतच्या साईभक्त निवासासमोर घडली. वावी परिसरात एकाच आठवड्यातली ही तिसरी घटना असून, वावीसह परिसरात भीतीचे वातावरण आहे.

व्यवसायाने खासगी पशुचिकित्सक असलेले डॉ. रमेश कारभारी देव्हाड (वय ३९) नाशिक- पुणे महामार्गावरील वावी परिसरातील साईभक्त निवासासमोरील बंगल्यात कुटुंबीयांसह राहतात. रात्री अडीचच्या सुमारास निर्मला देव्हाड यांना अचानक आवाज आल्याने त्या हॉलमध्ये झोपलेल्या मुलांना पाहण्यासाठी बेडरूममधून बाहेर आल्या. मुलांना व्यवस्थित पाहून पुन्हा बेडरूमकडे जात असताना त्यांना अचानक किचनमधून आवाज आला. त्यांनी किचनमध्ये जाऊन पाहिले असता दरोडेखोर दरवाजा तोडत असल्याचे निदर्शनास आले. त्यांनी आरडाओरडा केल्याने पती डॉ. रमेश हेदेखील जागे झाले. त्यांनी दरोडेखोरांना विरोध केला. मात्र, सहा दरोडेखोरांसमोर दोन्ही दाम्पत्य हतबल ठरल्याने दरोडेखोरांनी काही क्षणातच दरवाजा तोडला. त्यांनी आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला. मात्र, सशस्र दरोडेखोरांनी देव्हाड दाम्पत्यांना चाकूचा व पिस्तुलाचा धाक दाखवून सर्वांना बेडरूममध्ये एकत्र केले व कपाटाच्या किल्ल्यांची मागणी केली. देव्हाड दाम्पत्यांनी त्यांना नकार दिला. त्यामुळे दरोडेखोरांनी दोघांचे हातपाय बांधून ठेवले व पिस्तूल मुलांवर रोखले. मात्र, किल्ल्या सापडत नसल्याने कटावणी व हातोडीच्या साह्याने कपाट तोडून कपाटातील अंदाजे १ लाख १५ हजार रुपये व दहा ग्रॅमचे मंगळसूत्र, पाच ग्रॅमचे कानातील झुबे, दीड ग्रॅमची अंगठी, दोन सॅमसंग कंपनीचे मोबाइल असा सुमारे १ लाख ६६ हजार ५०० रुपयांचा ऐवज घेऊन पोबारा केला. संपूर्ण कुटुंबाचे हातपाय बांधून ठेवलेल्या अवस्थेत असल्याने त्यांची मुलगी वैष्णवी हिने आपली सुटका करून आईवडिलांची सुटका केली व शेजाऱ्यांना जागे केले. मात्र, तोपर्यंत दरोडेखोर पसार झाले होते. घटनेची माहिती मिळताच वावी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक रणजित आंधळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणी वावी पोलिस स्टेशनमध्ये दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ना‌‌शिकचे मॉडेल पथदर्शी

0
0

बायोमेडिकल वेस्ट व्यवस्थापनाचा शुभारंभ; अॅपचेही लॉँचिंग

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे जैव वैद्यकीय कचरा (बायोमेडिकल वेस्ट) व्यवस्थापनात पथदर्शी जिल्हा म्हणून नाशिकची निवड झाली आहे. त्याचा उद्‍घाटन सोहळा शुक्रवारी मान्यवरांच्या उपस्थित झाला. यावेळी जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासंबंधी जनजागृती करणाऱ्या मोबाइल अ‍ॅपचेही लॉँचिंग करण्यात आले. संपूर्ण राज्यात आता या मॉडेल प्रोजेक्टचा प्रचार केला जाणार आहे.

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे हॉटेल एक्स्प्रेस इनमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. उद्‍घाटन सोहळ्यात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रधान वैज्ञानिक अधिकारी डॉ. अमर सुपाते व पर्यावरण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई यांच्या हस्ते जैव-वैद्यकीय कचरा व्यवस्थापन व निर्मूलनासंबधी जनजागृती करणाऱ्या मोबाइल अ‍ॅपचे लॉँचिंग करण्यात आले. जिल्हा रुग्णालयाचे शल्य चिकित्सक सुरेश जगदाळे यांना जैव वैद्यक कचऱ्यांच्या व्यवस्थापनासाठी आवश्यक डब्यांचे प्रातिनिधीक स्वरुपात वितरणही करण्यात आले. या कार्यक्रमाला नाशिकच्या महापौर रंजना भानसी, आमदार देवयानी फरांदे,

आमदार सीमा हिरे यांच्यासह प्रदूषण मंडळ व युनिडोचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमात या मॉडेलवर दिवसभर विविध चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यात ऑस्ट्रेलिया येथील युनिडो मुख्यालयाचे प्रकल्प व्यवस्थापक एर्लिन्डा गॅलवन, युनिडोचे प्रतिनिधी रेणे व्हॅन बेरकेल, केंद्रीय पर्यावरण विभागाचे संचालक मनोजकुमार गांगेय, महाराष्ट्र पर्यावरण अतिरिक्त सचिव सतीश गवई, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीपकुमार व्यास, युनिडोचे प्रादेशिक समन्वयक डॉ. शक्ती प्रसाद धुआ हे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संयोजन प्रदूषण मंडळाचे प्रधान वैद्यकीय अधिकारी डॉ. अमर सुमाते यांनी केले. सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत हा कार्यक्रम सुरू होता. या कार्यक्रमाला सर्व हॉस्पिटलच्या प्रतिनिधींनी उपस्थित होते. महाराष्ट्र प्रदूषण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी आर. यू. पाटील, उपप्रादेशिक अधिकारी अ. ज. कुडे, युनिडोचे राज्य प्रकल्प अधिकारी डॉ. सूरज भांगे यावेळी उपस्थित होते.

मगच अंमलबजावणी

हॉस्पिटल्स, औषध दुकाने आणि प्रयोगशाळेतून निर्माण होणाऱ्या बायोमेडिकल वेस्टची विल्हेवाट लावणारा हा प्रोजेक्ट आहे. नाशिकला यासाठी गेल्या दोन वर्षांपासून काम चालू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. त्यासाठी १३ हॉस्पिटलची निवड करण्यात आली व येथे हे या कचऱ्याचे यशस्वी व्यवस्थापनही करण्यात आले. प्रारंभी त्यासाठी प्रशिक्षण दिल्यानंतर या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, ग्लोबल इनव्हायरमेंट फॅसिलिटी, युनिडो, केंद्रीय पर्यावरण व वने वातावरणीय बदल मंत्रालय यांच्यातर्फे बायोमेडिकल वेस्टचे पर्यावरणदृष्ट्या सुयोग्य व्यवस्थापन प्रकल्पातंर्गत मॅनेजमेटेंचे हे मॉडेल तयार करण्यात आले आहे.

शॉर्टफिल्म ठरली प्रभावी

या कार्यक्रमात बायोमेडिकल वेस्टचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणारी पध्दत व त्यातील आरोग्यास असणारे धोके यावर केलेली शॉर्टफिल्म सर्वांत प्रभावी ठरली. या शॉर्टफिल्मला सर्वांनी टाळ्या वाजवून दादही दिली.

‘बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्ट अभिमानास्पद’

जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाबाबतचा प्रकल्प हा नाशिक शहरात सुरू होणे ही अभिमानाची बाब आहे. यामुळे शहरातील रोगराई कमी होण्यास मदत होणार असून, शहरातील हॉस्पिटलमधील जबाबदारी ही फार्मसिस्टकडे दिली पाहिजे, असे प्रतिपादन आमदार देवयानी फरांदे यांनी केले. बायोमेडिकल वेस्ट प्रोजेक्टच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. नाशिक शहरात प्रथम घंटागाडी सुरू झाल्यानंतर त्याची पाहणी सर्वच राज्यातून करण्यात आली होती. त्यानंतर नाशिकला खत प्रकल्प उभा राहिला आणि आता जैव वैद्यकीय कचऱ्याचे नियोजन करण्याचा प्रकल्प नाशिकमध्ये साकारत असल्याने नाशिकची चांगलीच सुधारणा होणार असल्याचा विश्वास आमदार फरांदे यांनी व्यक्‍त केला. त्याचबरोबर परदेशाप्रमाणे नाशिकमध्येही हॉस्पिटलची जबाबदारी फार्मसिस्टकडे देणे गरजेचे आहे. फार्मसिस्ट हा केवळ मेडिकल चालविणे किंवा मेडिकल कंपनीत काम करणे यापुरताच मर्यादित नसून, त्यांना हॉस्पिटल मॅनेजमेंटची पूर्ण कल्पना असते. त्यामुळे त्यांना महत्त्वाचे स्थान देणे गरजेचे आहे. नाशिक हे उत्तर महाराष्ट्राचे मेडिकल हब असून, या प्रकल्पाने नाशिकचा विकासच होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

रोगराईला होणार अटकाव

आमदार सीमा हिरे म्हणाल्या, की कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे यासाठी महापालिका कायमच प्रयत्न करीत असते. मात्र आता हॉस्पिटलमधील जैव वैद्यकीय कचऱ्याचे व्यवस्थापन होणार असल्याने नाशिकमध्ये चांगले काम होणार आहे. तसेच, शहरातील रोगराईला अटकाव होणार असल्याचा विश्वासही आमदार हिरे यांनी व्यक्त केला.

नाशिक हे स्वच्छतेचे माहेरघर

शहरात खत प्रकल्प सुरू असून, यामुळे कचऱ्याचे योग्य नियोजन होत आहे. आता या प्रकल्पावर वीज निर्मितीसुद्धा होत आहे. त्यामुळे नव्याने येणाऱ्या जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाच्या प्रकल्पामुळे नाशिक हे स्वच्छतेचे माहेरघरच ठरेल, असा विश्वास महापौर रंजना भानसी यांनी व्यक्त केला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अश्व संग्रहालय ठरेल पर्यटकांचे आकर्षण

0
0

म. टा. प्रतिनिधी, नंदुरबार

तब्बल तीनशे वर्षांची परंपरा असलेल्या सारंगखेडा येथील यात्रोत्सव आणि अश्व बाजार पर्यटकांचे आगामी काळात आकर्षण ठरणार आहे. तसेच अश्व संग्रहालय देशविदेशातील अश्वप्रेमी व पर्यटकांचे आकर्षण ठरेल. नंदुरबार जिल्ह्यातील पर्यटनस्थळांचा विकास करून रोजगार निर्मितीवर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

सारंगखेडा, ता. शहादा, जि. नंदुरबार येथे यात्रोत्सवानिमित्त आयोजित चेतक फेस्टिव्हलनिमित्त मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी राज्याचे पर्यटन, रोजगार हमी योजना व नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल, खासदार डॉ. हीना गावित, आमदार डॉ. विजयकुमार गावित, चेतक फेस्टिवल समितीचे अध्यक्ष जयपाल रावल, जिल्हा परिषद सदस्या ऐश्वर्या रावल, सरपंच भारती कोळी, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, नाशिक विभागीय महसूल आयुक्त महेश झगडे, प्रभारी जिल्हाधिकारी अनिल पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, सहव्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोड, महाव्यवस्थापक स्वाती काळे, विक्रांत रावल, रेखा चौधरी, आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, सारंगखेडा येथील चेतक महोत्सवासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे अधिकारी यांनी परिश्रम घेत कमी कालावधी आयोजित फेस्टिव्हल कौतुकास्पद आहे. जिल्हा माहिती कार्यालय, धुळे यांच्यातर्फे प्रकाशित होणाऱ्या यशार्थच्या माध्यमातून या महोत्सवाचे संदर्भ थेट महाभारत काळात असल्याचे समजले.

घोड्यांबद्दल सर्वांनाच आकर्षण आहे. चेतक फेस्टिवल आगामी काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल. येथे होणाऱ्या अश्व संग्रहालयानिमित्त अतिप्राचीन, प्राचीन काळापासून आजपर्यंतचा घोड्यांचा इतिहास, घोड्यांच्या वेगवेगळ्या प्रजाती, त्यांचे ब्रीडिंग यासह घोड्यांबद्दलच्या विविध गोष्टी येथे येणाऱ्या पर्यटकांना अश्व संग्रहालयाच्या माध्यमातून समजतील. त्यामुळे येथे घोडा विकास व संशोधन केंद्र, पशुचिकित्सालय कार्यान्वित करण्याबाबत विचार केला जाईल.

जगातील पर्यटकांना आदिवासी संस्कृतीचे मोठे आकर्षण आहे. नंदुरबार जिल्ह्यातील होळी महोत्सव पर्यटकांसाठी पर्वणी ठरेल. त्यामुळे या कालावधीत देशविदेशातील पर्यटक येण्यासाठी ब्रॅडिंग करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

पर्यटन मंत्री रावल म्हणाले, सारंगखेडा येथील यात्रोत्सव म्हणजे बहुआयामी यात्रोत्सव आहे. यात्रेच्या माध्यमातून येथील परंपरा, संस्कृती सर्वोच्च पदाला नेण्याचे प्रयत्न असून जगासमोर येण्यास मदत होईल. सारंगखेडा बॅरेज येथे वॉटर स्पोर्ट विकसित करण्यात येईल. याशिवाय प्रकाशे, रावलापाणी, तोरणमाळ, नंदुरबारचा इमाम बादशाह दर्गा विकसित करण्यात येईल. त्यामुळे जिल्ह्यातील शेकडो युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे.

अश्व कसरतींची पाहणी

चेतक फेस्टिव्हलनिमित्त येथे घोड्यांचा व्यापार भरलेला आहे. यानिमित्त घोडे व्यावसायिक अनेक थरारक कसरती करतात. या कसरतींची अत्याधुनिक आणि वातानुकूलीत अशा प्रेक्षक गॅलरीतून मुख्यमंत्री फडणवीस, पर्यटन मंत्री रावल यांच्यासह लोकप्रतिनिधी, अधिकारी यांनी पाहणी केली. चेतक फेस्टिव्हलनिमित्त येथे अश्वांवर आधारीत चित्र व छायाचित्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. या प्रदर्शनाची सर्वांनी पाहणी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौपदरी उड्डाणपुलाचे काम लागणार मार्गी

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
द्वारका ते दत्त मंदिर या ५.९ किलोमीटर चाैपदरी उड्डाणपुलासंदर्भातील सर्वेक्षण अखेर पूर्ण झाले आहे. येथील वाहतुकीच्या दृष्टीने तांत्रिक सल्लागार आकार अभिनव या कंपनीने तीन पर्याय सुचविले आहेत. त्यापैकी सोयीस्कर पर्याय निवडून राज्य, तसेच केंद्र सरकारला पाठविण्यात येणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. त्यामुळे आता या उड्डाणपुलाचा मार्ग सुकर झाला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून द्वारका ते दत्त मंदिर या मार्गावर चौपदरी उड्डाणपूल व्हावा याकरिता केंद्रीय दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता. प्रस्तावित मार्ग नाशिक महापालिका क्षेत्रात येत असल्याने त्याचे काम करण्यास राष्ट्रीय महामार्गाने नकारघंटा दर्शविली होती. मात्र, राज्य सरकारकडे पाठपुरावा करून राष्ट्रीय महामार्गाकडे रस्ता वर्ग केला, तर केंद्र सरकार चारशे कोटींचा निधी देईल, त्याचप्रमाणे उड्डाणपूल कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करू असे आश्वासन दिले होते. प्रस्तावित उड्डाणपुलाकरिता कन्सल्टिंग नेमणूक करण्याची सूचना गडकरी यांनी दिली होती. त्याप्रमाणे राष्ट्रीय महामार्गाच्या मुख्य अभियंत्यांनी आकार अभिनव कंपनीचे संचालक अमोल खैर यांना काम दिले होते. या भागाच्या सर्वेक्षणानंतर खैर यांनी शुक्रवारी द्वारका ते दत्त मंदिर चौपदरी उड्डाणपुलासंदर्भात तीन पर्याय सुचविले आहेत. या संदर्भातील सादरीकरण करण्यात आले. तीन पर्यायांपैकी आवश्यक एक पर्याय निवडला जाणार आहे. त्या संदर्भातील अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्र सरकारकडे पाठविला जाईल. त्यामुळे आता द्वारका ते दत्त मंदिर या मार्गावरील चौपदरी उड्डाणपुलाचा मार्ग सुकर झाला आहे. केंद्राची मान्यता मिळाल्यानंतर रस्त्याच्या कामाला सुरुवात होण्याची चिन्हे आहेत.
येथे राहणार रॅम्प
या रस्त्यावर सारडा सर्कल, द्वारका, काठे गल्ली, फेम टॉकीज, आंबेडकरनगर, उपनगर, दत्त मंदिर, बिटको या ठिकाणी चढण्यासाठी व उतरण्यासाठी रॅम्प तयार केले जाणार आहेत. सध्या महामार्गाकडे ३० मीटरची जागा ताब्यात आहे. पुलासाठी एकूण ४५ मीटर रुंदीची जागा लागणार आहे. जंक्शनच्या ठिकाणी ४८ मीटर जागा लागेल. हा रस्ता सध्या सहा लेनचा असून, त्यात पुलाच्या चार लेनची भर पडणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सीएमच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

0
0

नाशिक

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामागचं हेलिकॉप्टरचं शुक्लकाष्ठ काही सुटताना दिसत नाही. आज सकाळी हेलिकॉप्टरमध्ये मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याने फडणवीस यांच्या हेलिकॉप्टरचं नाशिकमध्ये इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलं. टेक ऑफ झाल्याबरोबर हेलिकॉप्टरचं लँडिंग करण्यात आल्याने कोणतीही अनुचित घटना घडली नाही. मुख्यमंत्र्यांसहीत हेलिकॉप्टरमधील सर्वजण सुखरूप असल्याचं सांगण्यात आलं. खानसाम्याला हेलिकॉप्टरमधून उतरविल्यानंतर या हेलिकॉप्टरने औरंगाबादच्या दिशेनं उड्डाण घेतलं.

आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस औरंगाबादला जायला निघाले होते. नाशिकच्या पोलीस परेड मैदानावरून हेलिकॉप्टरने टेक ऑफ करताच उड्डाणात अडचणी निर्माण झाल्याने सर्वच घाबरले. हेलिकॉप्टर वरच्यावर घिरट्या घेऊ लागल्याने त्यात मर्यादेपेक्षा जास्त वजन झाल्याचं लक्षात येताच हेलिकॉप्टरचे तातडीने लँडिंग करण्यात आले. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून खानसामा सतीश याला उतरविल्यानंतर हेलिकॉप्टरने टेक ऑफ घेतले. या हेलिकॉप्टरमधून मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासोबत जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचे स्वीय सचिव प्रवास करत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आईच्या बँक खात्यावर मुलाने मारला डल्ला

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

स्वत:ची मालमत्ता आईने बक्षीसपत्राद्वारे बहिणीस दिल्याने संतप्त झालेल्या मुलाने आईची बनावट स्वाक्षरी करून तिच्या बँक खात्यातून ४५ हजारांची रोकड परस्पर काढून घेतली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विजयराजकुमारी नारायणा येनमंड्रा (वय ६६, रा. केतकी सोसायटी, संभाजीनगर, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली. त्यामध्ये म्हटल्यानुसार मुलगा चंदनकुमार नारायणा येनमंड्रा हा २०१०पासून स्वतंत्र राहातो. येनमंड्रा यांच्या नावावर असलेले घर, ओम्नी कार आणि अन्य वाहने त्यांनी मुलगी उमा हिस बक्षीसपत्राद्वारे दिले. संशय‌तिांनी मायलेकींना शिवीगाळ करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. उमा यांच्या एसबीआय बँक खात्यावरील ४५ हजारांची रोकड बनावट स्वाक्षरीद्वारे काढून घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पावणेदोन लाख लांबवले

मदतीचा बहाणा करीत एटीएम कार्ड लांबविणाऱ्या भामट्यांनी तिघा बँक खातेदारांच्या खात्यातील तब्बल पावणेदोन लाख रुपये लांबवले. यातील दोघांची रक्कम एटीएम कार्डधारकांच्या खात्यात ऑनलाइन ट्रान्सफर करून काढण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हरिश्चंद्र जाणू पालवी (रा. नाशिक) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. ते ९ सप्टेंबर रोजी म्हसरूळ येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले. त्यावेळी एकाने त्यांना मदतीचा बहाणा करून कार्ड हातोहात लांबवले. त्यानंतर १३ ऑक्टोबर दरम्यान संबंधिताने त्यांच्या बँक खात्यातील तब्बल ९५ हजारांची रोकड वेगवेगळ्या ठिकाणाहून काढली. त्यानंतर भामट्यांनी एटीएम कार्डधारकाच्या बँक खात्यातील अनुक्रमे ४० व ८० हजार रुपयांची रक्कम ऑनलाइन पध्दतीने ट्रान्सफर करून काढून नेली.

दोन ठिकाणी घरफोड्या

श्रीरामनगर आणि ओमनगर भागात भरदिवसा झालेल्या दोन घरफोडीच्या घटनांमध्ये चोरट्यांनी सुमारे सव्वा लाखाचा ऐवज चोरून नेला. त्यामध्ये रोकडसह सोने चांदीच्या दागिन्यांचा समावेश आहे. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ज्योती संजय कातकाडे (रा. व्हिला अपार्टमेंट, श्रीरामनगर) यांनी फिर्याद दिली. कातकाडे कुटुंबीय शुक्रवारी सकाळी कामानिमित्त घराबाहेर पडले. याचाच फायदा घेत चोरट्यांनी त्यांच्या घराचे कुलूप तोडून घरफोडी केली. याचदरम्यान ओमनगर परिसरातही अशीच घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी संकल्प सोसायटीतील बंद घराचा कडी कोयंडा तोडून रोकडसह दागिने असा सुमारे एक लाख २२ हजार ७०० रुपयांचा ऐवज चोरून नेला.

जातीवाचक शिवीगाळ प्रकरणी दोघांना अटक

नाशिक : कालिका माता यात्रेतील गाळे व मोकळ्या जागा लिलावावेळी एकास जातीवाचक शिवीगाळ व मारहाण केल्याप्रकरणी सरकारवाडा पोल‌सिांनी दोघांना अटक केली. त्यांना जिल्हा कोर्टात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. ११ डिसेंबरला मात्र त्यांच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. संदीप विधाते व निखील मोटकरी (रा. मुंबई नाका) अशी संशयितांची नावे आहेत. दोघेही शहरातील एका मोठ्या राजकीय पदाधिकाऱ्याचे नातेवाईक असून, दीपक डोके यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. १५ सप्टेंबर रोजी महापालिकेच्या राजीव गांधी भवन कार्यालयात हा प्रकार घडला होता.

पार्किंग कारमधील रोकडची चोरी

नाशिक : पार्क केलेल्या कारची काच फोडून चोरट्यांनी पर्समधील रोकड चोरून नेली. कॉलेजरोड परिसरात ही घटना घडली. या प्रकरणी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. दिव्या नरेशकुमार जस्वानी (रा. प्रियंका ब्लोसम, सिरीन मिडोज गंगापूररोड) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली. त्या शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास डॉन बॉस्को परिसरात गेल्या होत्या. दिव्यदान वसतिगृहाजवळ त्यांनी कार पार्क केली. अज्ञात चोरट्यांनी काच फोडून मागील आसनावर ठेवलेली पर्स चोरून नेली. पर्समध्ये तीन हजाराच्या रोकडसह कागदपत्र आणि एटीएम कार्ड होते असे फिर्यादीत म्हटले आहे.

सरदवाडी रोडवर घरफोडी

सिन्नर : सरदवाडी रोड येथील इंद्रप्रस्थ अपार्टमेंट या इमारतीमध्ये असलेल्या बंद फ्लॅटमध्ये अज्ञात चोरट्याने घरफोडी करीत सुमारे अडीच ते तीन लाख रुपये किमतीचे दहा तोळे सोन्याचे दागिने लांबविले. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. सरदवाडी रोडवरील इंद्रप्रस्थ अपार्टमेंटमध्ये शिक्षक काकासाहेब राजाराम तांबे कुटुंबीयांसह वास्तव्यास आहेत. घरी कुणी नसल्याची संधी साधत दुपारी चार वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने तांबे यांच्या घराचे कुलूप तोडून कपाटात ठेवलेले सोन्याचे नेकलेस, लक्ष्मीहार, कानातील दागिने चोरून नेले.

मोटारसायकल्सची चोरी

नाशिक : मोटारसायकल चोरीचे सत्र सुरूच असून, गेल्या काही दिवसांत चार मोटारसायकली चोरीस गेल्या आहेत. जितेंद्र जाधव (रा. साईनाथ रो हाऊस, त्रिकोणी बंगल्याजवळ) हे बुधवारी भाजीपाला खरेदीसाठी पेठरोड भागात गेले होते. जुन्या पाणपोई परिसरातून त्यांची ड्रीम युगा मोटारसायकल चोरट्यांनी पळवून नेली. या प्रकरणी पंचवटी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे. दुसरी घटना बॉईज टाऊन परिसरात घडली. प्रसाद आंबेकर यांची सुमारे पावणेदोन लाख रुपये किमतीची मोटरसायकल बंगल्याच्या आवारातून चोरट्यांनी चोरून नेली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंग पकडताना शॉक लागून बालकाचा मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

अडकलेली पतंग लोखंडाच्या सहाय्याने काढण्याचा प्रयत्न करत असताना विजेच्या तारेचा झटका लागून आठ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. शनिवारी (दि. ९) दुपारी दोनच्या सुमारास फुलेनगर येथील पाण्याच्या टाकीजवळ ही घटना घडली.

फुले नगर परिसरातील पाण्याच्या टाकीजवळ किशोरसिंग भोंड (कातारी) यांचा मुलगा गुरुसिंग हा पतंग उडव‌ित होता. त्याची पतंग घराजवळील झाडाला अडकली. त्याने त्याच्याजवळ असलेल्या लोखंडी गजाच्या सहाय्याने ती काढण्याचा प्रयत्न केला. हा लोखंडी गज विजेच्या तारेस लागला. गजातून वीजेचा तीव्र प्रवाह उतरल्याने त्याचा झटका लागून गुरूसिंग जखमी झाला. गुरूसिंग याचे काका पप्पू यांनी त्यास जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. गुरूसिंग फुलेनगर परिसरातील शाळा क्रमांक ५६ मध्ये चौथीमध्ये शिकत होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विरोधक धास्तावले!

0
0

मालेगाव बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरेंची सडकून टीका

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

कालपर्यंत एकमेकांचे कट्टर विरोधक असलेले, एकमेकाला पाण्यात पाहणारे आता एकत्र आले आहेत. विकासाचे काही काम घेऊन ते एकत्र आले असते, तर त्यांचे स्वागत केले असते. परंतु, मला सभापतिपदावरून दूर करण्यासाठी ते एकत्र आले आहेत, ही माझ्यासाठी भूषणावह बाब आहे. भविष्यात विधानसभेच्या निवडणुकीला मी पर्याय होईल या भीतीने विरोधकांनी अविश्वास ठराव दाखला केला आहे, असे सांगत मालेगाव बाजार समितीचे सभापती प्रसाद हिरे यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले.

मालेगाव बाजार समितीच्या १७ संचालकांनी सभापती प्रसाद हिरे यांच्यावर अविश्वास ठराव दाखल करण्याची उपनिबंधकांकडे मागणी केली असून, याबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी हिरे यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मामको बँक चेअरमन राजेंद्र भोसले उपस्थित होते. यावेळी सभापती हिरे यांनी विरोधकांवर सडकून टीका करीत आपल्यावरील आरोपांना उत्तर दिले. हिरे पुढे म्हणाले, की सभापतिपदाच्या कार्यकाळात मी पैसे खाल्ले नाही किंवा कुणालाही खाऊही दिले नाहीत. बाजार समिती व शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवून पारदर्शकपणे काम करीत आहे. माझ्यासोबत असलेल्या संचालकांना मी विश्वासात घेतले नाही हे चुकीचे आहे. परंतु, स्वतःच्या राजकीय विरोधकांना दूर ठेवण्यासाठी ज्यांना मी सभापती व्हावे असे वाटत होते, त्यांना आज अचानकपणे अविश्वास ठराव दाखल करण्याची वेळ यावी हे अतिशय दुर्दैवी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच, अविश्वास ठराव दाखल करताना सभापतींवर आमचा विश्वास राहिलेला नाही असे म्हणणे संयुक्तिक आहे. परंतु, हा अविश्वास ठराव दाखल करताना केलेले आरोपही हिरे यांनी धुडकावून लावले.

विरोधकांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना हिरे म्हणाले, की वैयक्तिक प्रसिद्धीसाठी बाजार समितीचा वापर करेल इतका मी दुर्बल नाही. शक्य तेवढी बचत मी केलेली आहे. कर्जाचे हप्ते थकवले आहेत असा आरोप माझ्यावर करण्यात आला आहे. मुळात माझ्या कार्यकाळात कर्ज काढलेले नाही. याउलट आधीच्या संचालकांनी कर्ज काढले असून, त्याचे हफ्ते मी फेडत आहे. मी गैरव्यवहार केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, विरोधकांनी एकही गैरव्यवहार सिद्ध करून दाखवावा. त्यांनी तो सिद्ध केला तर मी सभापतिपदाचा राजीनामाच नव्हे, तर राजकीय संन्यास घेईल. मात्र, आरोप सिध्द झाले नाही तर आरोप करणाऱ्यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे आव्हानदेखील हिरे यांनी दिले आहे. आपल्या कार्यकाळात बाजार समितीच्या प्रगतीची अनेक महत्त्वाची कामे झाली. बाजार समितीचे पैसे कसे कमीत कमी खर्च होतील हाच प्रयत्न केल्याचे हिरे यांनी स्पष्ट केले.

विरोधकांना आवाहन

ज्या विरोधकांनी माझ्यावर अविश्वास ठराव आणला आहे, त्यांनी मुंगसे व्यापारी असोसिएशनला हाताशी धरून बाजार समितीचे शुल्क भरू नका, असा सल्ला देऊन शुल्क रोखले आहे, असा आरोप सभापती हिरे यांनी केला आहे. विरोधकांनी मला तोंड उघडायला लावू नये. जर हे शेतकरी हिताचे असतील तर त्यांनी आमची चूक झाली अशी माझी माफी मागून अविश्वास ठराव मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी विरोधकांना केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अंतर्मुख करणारं ‘नाव झालंच पाहिजे’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

नाटक हे सामाजिकतेचे प्रतिबिंब असते. जे समाजात घडते ते नाटकात दाखवले जाते. त्यामुळे नाटकाला खरेपणाचा आव आणता येत नाही, ते खरेच असते. नाटक अंगात भिनवलेला कलाकार त्यासाठी कोणत्याही थराला जायला तयार होतो. त्याला नाटक रसिकांसमोर सादर करावयाचे असते त्यासाठी तो कोणतीही किंमत मोजायला तयार होतो, हे दाखवणारे नाटक म्हणजे ‘नाव झालं पाहिजे’.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५वा नाट्यमहोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृह येथे सुरू असून, नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘नाव झालंच पाहिजे’ हे नाटक शनिवारी सादर झाले. या नाटकाचे लेखन विद्यासागर अध्यापक यांनी केले होते.

नाटक ही एक कलाकृती, एक जिवंत अभिव्यक्ती असते. स्वत:पासून, समाजापासून ते पूर्णत: भिन्न न करता येणारे कलाकार आजही आहेत. या स्वतंत्र अभिव्यक्तीवर घाला घातला गेला तर कलाकार जाणार कोठे? एका स्पर्धेत एक नाटक सुरू असते. या नाटकातून धर्मावर टीका केली म्हणून ते नाटक बंद पाडायला एक संघटना येते. नाटक जबरदस्तीने बंद पाडले जाते. पण त्याचे अनेक पडसाद उमटू लागतात. जे नाटक बंद पाडायला आलेले असतात त्यांनाही त्याचे कारण माहीत नसते. नाटकवाल्यांना व संघटनावाल्यांना समजावून सांगण्यासाठी एक हवालदार येतो. तो शासनाचा प्रतिनिधी असतो. तोही फक्त चर्चा करतो. नाटक मात्र अर्धवटच राहते, अशा आशयाची ही कथा होती.

बॉश फाईन आर्टस् प्रस्तूत या नाटकाचे लेखन विद्यासागर अध्यापक यांनी केले होते. दिग्दर्शन प्रशांत हिरे यांचे होते. नेपथ्य संजय चौधरी, प्रशांत येवले यांचे तर प्रकाश योजना रवींद्र रहाणे यांची होती. पार्श्वसंगीत रोहित सरोदे यांचे रंगभूषा माणिक कानडे, वेशभूषा विशाल बोढरे यांची होती. नाटकात राजेश अभोणकर, अंबर कुलकर्णी, आनंद कुलकर्णी, सुमित जाधव, माधुरी पठ्ठे, प्रशांत येवले, प्रवीण चव्हाण, धनंजय रहाणे, अभिषेक कोते, सुधीर पोंदे, शिरीष तांदळे, स्वप्निल क्षीरसागर, स्नेहा ओक, ऋतुजा वाबळे, प्रमोद भालेराव, विशाल बोढरे यांनी भूमिका केल्या.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तक्रार दाखल होताच ‘गायब’ मूर्ती जागेवर

0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

रामकुंडातील गोमुखाजवळ असलेली गौतम ऋषींची पुरातन मूर्ती शनिवारी (दि. ९) रोजी गायब झाली होती. ही मूर्ती चोरीस गेल्याबद्दलची तक्रारही पंचवटी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली. मात्र, ही तक्रार दाखल केल्यानंतरच्या थोड्या वेळात ही मूर्ती त्याच जागेवर असल्याचा दावा महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी केला. ही मूर्ती कुठे गेली होती, याविषयी तर्कवितर्क करण्यात येत आहेत.

शुक्रवारी (दि. ८) रोजी रामकुंडाच्या स्वच्छतेसाठी पाणी सोडून देण्यात आल्यानंतर कोरड्या पडलेल्या या कुंडात गोमुखाच्या जवळ असलेली गौतम ऋषींची पुरातन मूर्ती दिसली नसल्याचे अतुल शेवाळे यांच्या लक्षात आले. त्यांनी येथे मूर्ती नसल्याचे फोटो काढून ते सोशल मीडियावरून व्हायरल केले. याबाबतची खात्री करून घेण्यासाठी देवांग जानी, नरेंद्र धारणे, किशोर गरड, यागेश रामैया यांनी जागेची पाहणी केली. या मूर्तीविषयी त्यांनी रामकुंड परिसरात चौकशी केली. पण, कुणीही माहिती देऊ शकले नाही. त्यांनी ही मूर्ती ज्या जागेवर असते, तेथील छायाचित्रे काढली. ही मूती चोरीला गेल्याबद्दलची तक्रारही पंचवटी पोलिस स्टेशनमध्ये केली.


दुपारच्या वेळेतील घटना

दरम्यान, पोलिस स्टेशनमध्ये तक्रार केल्यानंतर सायंकाळी पाच वाजता ही मूर्ती त्याच जागेवर आहे, असे देवांग जानी यांना कळविण्यात आले. त्यांनी रामकुंडाजवळ जाऊन पाहणी केली असता मूर्ती त्याच जागेवर असल्याचे दाखविण्यात आले. गाळामुळे तुम्हाला दिसली नसेल, असेही सांगितले गेले. पण, त्या जागेवर गाळ साचत नसल्यामुळे मूर्ती न दिसण्याचे कारणच नसल्याची वस्तुस्थिती आहे. सायंकाळी साडेपाच वाजता ही मूर्ती गायब झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली, दुपारी सव्वादोन वाजेपर्यंत या जागेवर मूर्ती नसल्याचे जानी यांनी सांगितले. दुपारी साडेचार वाजेपर्यंतच्या काळात ही मूर्ती पुन्हा त्याच जागेवर ठेवून देण्यात आली असावी. पण, या कालावधीत ही मूर्ती नेमकी कुठे होती, हे गुढ मात्र, कुणालाही उलगडले नाही.

--

ही पुरातन मूर्ती असून, रामकुंडाच्या इतिहासात ही मूर्ती या जागेवर असल्याचा उल्लेख आहे. कित्येक पूर आणि महापुरांच्या काळातही ही मूर्ती जागेवरून हलली नाही, तिची काही प्रमाणात झीज झालेली आहे इतकेच. ही मूर्ती काढण्याचा खोडसाळपणा कुणी तरीकेला असावा किंवा दुसऱ्या उद्देशानेही मूर्ती काढली असावी, असा अंदाज आहे.

-देवांग जानी, गोदाप्रेमी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


मतदार नोंदणीसाठी मिळणार संगणक

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मतदार नोंदणीचे काम अधिक गतीने व्हावे, यासाठी निवडणूक आयोगाने प्रत्येक मतदारसंघात मतदान नोंदणी अधिकारी व सहाय्यक मतदान नोंदणी अधिकाऱ्यांना संगणक व स्कॅनर उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. याकरिता नाशिक जिल्ह्यातील पंधरा तालुक्यांसाठी २२ लाखांचा निधीही प्राप्त झाला असून, लवकरच संगणकांची खरेदी प्रक्रिया राबव‌ण्यिात येणार आहे.

मतदार नोंदणी कामात गतिमानता यावी, यासाठी निवडणूक आयोग आग्रही आहे. त्याच अनुषंगाने विविध प्रयोग राबविण्यात येत आहेत. आयोगाचे अध्यक्ष जे. एस. सहारिया यांनी इगतपुरी, त्र्यंबक नगरपालिका निवडणुकीमध्ये ‘कॉप’ अॅपचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात प्रथमच अशा प्रकारचे अॅप राबविण्यात येत असून, त्याद्वारे मतदारांना ऑनलाइन तक्रारी नोंदविता येईल. १८ ते ३० वयोगटातील मतदारांसाठी ऑनलाइन मतदार नोंदणी अर्जही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

निधी प्राप्त

प्रत्येक मतदाराचा अर्ज भरून घेतल्यानंतर तो स्कॅन करून आयोगाच्या संकेतस्थळावर अपलोड करावा लागतो. अशी कामे गतीने व्हावीत यासाठी प्रत्येक मतदारसंघात मतदार नोंदणी अधिकारी तसेच, सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांना एक संगणक व स्कॅनर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसार नाशिक जिल्ह्यातील १५ तालुक्यांना संगणक आणि स्कॅनर दिले जाणार आहेत. याकरिता २२ लाख रुपयांचा निधीही प्राप्त झाला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सिन्नरमध्ये कारने घेतला पेट; चालकासह दोघे बचावले

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर

जायगाव शिवारात देशवंडी फाट्यावर धावत्या ओम्नी कारने अचानक पेट घेतल्याने जळून खाक झाली. ही घटना दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच चालकासह अन्य एका व्यक्तीने गाडी उभी करून बाहेर पळ काढल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. त्या दोघांनी पाण्याने आग विझविण्यासाठी केलेले प्रयत्न अपुरे ठरले आणि कार जळून खाक झाली.

पिंपळगाव निपाणी येथील अशोक रामनाथ बोडके आणि वाल्मीक तुकाराम बांगर हे दोघे ओम्नी कार (एमएच १५, ७४५५) मधून पिंपळगाव निपाणीकडे जात होते. जायगावजवळील देशवंडी फाट्यावर कारमधून धूर निघत असल्याचे लक्षात येताच कार उभी करून दोघे बाहेर पडले. जवळच असलेल्या कौलारू घरातून पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाहता पाहता कार आगीच्या भक्ष्यस्थानी पडून खाक झाली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मालेगावी ३५ हजार प्रकरणे निकाली

0
0

लोकअदालतीला अभूतपूर्व प्रतिसाद

मालेगाव : मालेगावात आयोजित लोकअदालतीला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून, ३५ हजार ८७५ प्रकरणे निकाली निघाले. तसेच, ९ कोटी २ लाख रुपये इतकी थकीबाकी वसूल झाली आहे, अशी माहिती जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समितीचे जिल्हा न्यायाधीश बी. एस. महाजन यांनी दिली.

येथील जिल्हा न्यायालयात शनिवारी लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या अदालतीमध्ये दिवाणी व फौजदारी असे एकूण १ हजार २३१ तर दाखलपूर्व तब्बल ६४ हजार ७२ प्रकरणे ठेवण्यात आली होती. जिल्हा न्यायाधीश बी. एस. महाजन, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. एस. एस. देवरे, सचिव बी. एल. लोखंडे, प्रांताधिकारी अजय मोरे, तहसीलदार शिवकुमार आवळ कंठे यांच्या मार्गदर्शनाखाली या अदालतीचे कामकाज पार पडले. लोकअदालातीत दाखलपूर्व प्रकरणात ग्रामपंचायत वसुलीची सर्वाधिक ५७ हजार प्रकरणे ठेवण्यात आली होती. यातील ३५ हजार प्रकरणे निकाली निघाली असून, २ कोटी ७५ लाख रुपये थकबाकी वसूल झाली आहे.

मनमाडला ८२ लाख वसुली

मनमाड : मनमाड येथील न्यायालयात शनिवारी झालेल्या लोकन्यायालयात दाखलपूर्व व न्यायप्रविष्ठ अशा एकूण १० हजार ६४२ दाखल खटल्यांपैकी तब्बल २४७८ खटले निकाली निघाले. या लोक न्यायालयाद्वारे नगरपालिका, वीज कंपनी, ग्रामपंचायती व बँकांची ८२ लाख रुपये थकबाकी वसूल झाल्याचे न्यायाधीश स्वाती फुलबांधे व शिल्पा हुडगर यांनी सांगितले. मनमाड न्यायालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण समिती व जिल्हा व सत्र न्यायाधीश सूर्यकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी मनमाड येथे लोकन्यायालयाचे उद्घाटन झाले. न्या. स्वाती फुलबांधे, शिल्पा हुडगर, मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर, वकील संघाचे अध्यक्ष अॅड. सुधाकर मोरे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

रेल्वे न्यायालय, शहर न्यायालय संयुक्त न्यायालय यांच्या वतीने हे लोकन्यायालय होत असून, दाखलपूर्व व न्यायप्रविष्ठ असे १० हजार ६४२ खटले या न्यायालयात दाखल होते. यात नगरपालिका, बँका, ग्रामपंचायती, पतसंस्था, वीज कंपनी यांची ८२ लाख एवढी मोठी थकबाकी वसूल झाल्याचे स्पष्ट झाले. अॅड. किशोर चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले. अॅड. सुधाकर मोरे यांनी प्रास्ताविक करून आभार मानले.

८२ लाख रुपये वसुली लोकन्यायालयात होणे ही मोठी आनंद व समाधानाची बाब आहे. लोकन्यायालय आयोजनातून दोन हजारांवर अधिक खटले निकाली निघाल्याने यशस्वी झाले आहे.

- स्वाती फुलबांधे, न्यायाधीश, मनमाड

कळवण येथे दोन कोटी वसुली

कळवण : कळवण न्यायालयात शनिवारी झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीत विविध प्रकरणात एकूण १ कोटी ७९ लाख ४९ हजार ६३५ रुपयांची वसुली झाल्याची माहिती दिवाणी न्यायधीश स्वरा पारखी यांनी दिली. सदरच्या लोकन्यायालयात सहा पॅनल तयार करण्यात आले होते. यात १५,२३६ दावा पूर्व प्रकरणे दाखल होते. पैकी ४८२४ प्रकरणे निकाली निघाली आहेत. तर २०२ दाखल प्रकरणापैकी ११५ प्रकरणे निकाली निघाली आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रेल्वेमार्गाचे दोन महिन्यांत भूमिपूजन

0
0

मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्गाबाबत डॉ. भामरे यांची ग्वाही

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

रेल्वे मंत्रालयाकडे २०१४पासून प्राधान्याने मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्ग व्हावा यासाठी मी प्रयत्नशील आहे. अनेकांनी गेल्या २० वर्षांपासून या रेल्वेमार्गाच्या उद्घाटन तारखा देऊन, थापा मारून जनतेची दिशाभूल केली आहे. मात्र या रेल्वेमार्गाच्या श्रेयवादात मला पडायचे नसून, या मतदारसंघातील लोकांसाठी काम करायचे आहे. लवकरच या रेल्वेमार्गाचा एमओयू होणार असून, येत्या दोन महिन्यांत भूमिपूजन होणार असल्याची माहिती केंद्रीय संरक्षक राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी दिली.

गेल्या कित्येक वर्षांपासून मनमाड-मालेगाव-इंदूर रेल्वेमार्गाचा प्रश्न प्रलंबित आहे. गेल्या काही दिवसांपासून या रेल्वेमार्गावरून भाजप आमदार अनिल गोटे व संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्यात श्रेयवाद रंगला आहे. गेल्या महिन्यात अनिल गोटे यांनी याबाबत पत्रकार परिषददेखील घेतली होती. त्या पार्श्वभूमीवर डॉ. भामरे यांनी येथील शासकीय विश्रामगृहावर शनिवारी (दि.९) पत्रकार परिषद आयोजित केली होती. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजप नेते डॉ. अद्वय हिरे, महानगराध्यक्ष सुनील गायकवाड, तालुकाध्यक्ष दीपक पवार, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील आदींसह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी डॉ. भामरे यांनी रेल्वे मार्गाबाबत माहिती देताना सांगितले, की दि. १४ नोव्हेंबर रोजी या रेल्वेमार्गाबाबत दिल्ली येथे झालेल्या महत्त्वाच्या बैठकीस मी परदेशात असल्याचा गैरफायदा घेत काहींनी आमंत्रण नसताना हजेरी लावत अन्य कुणासही या बैठकीस आमंत्रण नव्हते असा अपप्रचार केला. तसेच, रेल्वेमार्गाबाबत सर्व काही त्यांनीच घडवून आणले असा केविलवाणा प्रयत्न केला आहे, अशा शब्दांत आमदार अनिल गोटे यांचे नाव न घेता टीका केली.

मालेगावी होणार लॉजिस्टिक पार्क

हा रेल्वेमार्ग प्रत्यक्षात आल्यास मालेगाव शहर व तालुक्याचा सर्वाधिक फायदा होणार आहे. यामुळे मालेगावी लॉजिस्टिक पार्कदेखील उभारण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. सुभाष भामरे यांनी दिली. यामुळे शहरात रोजगार वाढणार असून, आर्थिक देवाण-घेवाण वाढेल, शहर देशाशी जोडले जाईल, असेदेखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

मंजुरीसाठी पाठपुरावा सुरू

या रेल्वेमार्गाच्या प्रत्यक्ष कामास सुरुवात होण्यासाठी जेएनपीटीची समंती, रेल्वे मंत्रालयाची संमती, सामंजस्य करार, रेल्वे कॅबिनेट मंजुरी, एसपीयू मॉडेल तयार करणे, भूसंपादन करणे, ८० टक्के भूसंपादन प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कंत्राट व निविदा प्रक्रिया या बाबी बाकी आहेत. त्यासाठी पाठपुरावा सुरू असून, मंजुरी मिळवण्यात येणार असल्याचे डॉ. भामरे यांनी सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

इगतपुरीत दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे मतदारराजा कुणाच्या पारड्यात मत टाकतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. आज (दि. १०) नगरपालिका निवडणुकीसाठी मतदान होत आहे. नगराध्यक्षपदासाठी ७, तर नगरसेवकपदाच्या १८ जागांसाठी ७९ उमेदवारांचे भवितव्य आज मतदान यंत्रात सील होणार आहे.

इगतपुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष या एकमेव जागेसाठी सात उमेदवार आपले नशीब अजमावत आहेत. त्यात शिवसेनेचे संजयभाई इंदुलकर, भाजपकडून फिरोज पठाण, काँग्रेसचे बद्रिनाथ शर्मा, बहुजन विकास आघाडीचे महेश शिरोळे, बाळू पंडित, मेमन महंमद हारून अ करीम, राजू कदम यांच्यात चुरशीची लढाई होणार असल्याचे चिन्ह आहे.

नगरसेवकपदासाठी ९ प्रभागांतील १८ जागांसाठी ७९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात महिला राखीव ९ जागांसाठी ३७ उमेदवार, तर ४२ पुरुष उमेदवार रिंगणात आहेत. त्यात एका महिला उमेदवाराचाही समावेश आहे. एकूणच नगराध्यक्ष व नगरसेवकपदाच्या १९ जागांसाठी ४८ पुरुष तर ३८ महिला उमेदवार रिंगणात आहेत.

इगतपुरी नगरपालिका निवडणुकीसाठी २४ हजार ४६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. शहरातील ९ प्रभागांतील ३२ मतदार केंद्रावर सकाळी साडेसात वाजेपासून मतदानाला सुरुवात होणार आहे. त्यामुळे किती मतदार मतदानाचा हक्क बजावतात यावर उमेदवारांच्या विजयाचे गणित अवलंबून आहे.

सोमवारी मतमोजणी

सोमवारी (दि. ११) सकाळपासून शहरातील महामार्गाला लागून असलेल्या शासकीय आयटीआय इमारतीत मतमोजणी होणार आहे. शहरातील मतदान केंद्रासह मतमोजणीसाठी निश्चित स्थळाची पाहणीही यावेळी करण्यात आली. उपायुक्त ज्ञानेश्वर खिल्लारे, निवडणूक निर्णय अधिकारी संजय बागडे, नपा मुख्याधिकारी विजय मुंढे, उपविभागीय पोलिस अधिकारी अतुल झेंडे उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images