Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

डस्टबीन खरेदीत घोटाळा?

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियावर भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेने डल्ला मारला आहे. आपल्याच ‘झिरो गार्बेज’ संकल्पनेला तिलांजली देत महापालिकेने खरेदी केलेल्या १८९ कचराकुंड्यांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्लास्टिक कचराकुंडी जोडीची किंमत बाजारात हजार ते दीड हजार रुपये असताना महापालिकेने चक्क ११ हजार रुपयांना खरेदी केल्या आहेत. महापालिकेने १८९ कचराकुंड्यांसाठी २१ लाख रुपये ठेकेदाराला मोजले असून यात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे महानगरप्रमुख व विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी केली आहे. महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी कचऱ्यातूनही सोने शोधण्याची टेकनिक विकसित केल्याचा टोमणा बोरस्ते यांनी भाजपला लगावला आहे. डस्टबीन खरेदीप्रकरणी चौकशी करण्याची मागणी शिवसेनेने केली आहे.

केंद्र सरकारच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत शहर स्वच्छतेसाठी महापालिकेने गेल्या आठवड्यात आपल्या झिरो गार्बेज संकल्पनेला तिलांजली देत शहरात पुन्हा कचराकुंड्या उभारण्याचा निर्णय घेतला होता. स्वच्छतेचे गुणांकन सुधारावे यासाठी नाशिक पुन्हा कचराकुंडीयुक्त करण्याचा हा अफलातून निर्णय आता वादात सापडला आहे. महापालिकेने १८९ प्लास्टिकच्या कचराकुंड्यासाठी तब्बल २१ लाख ३१ हजार ५०० रुपये मोजले आहेत. विशेष म्हणजे स्वच्छता अभियानाअंतर्गत मिळालेल्या अनुदानातून ही खरेदी झाली आहे. त्यामुळे कचराकुंडी खरेदी आणि त्याच्या अव्वाच्या सव्वा किंमतीबाबत प्रश्न निर्माण झाला आहे.

विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत, सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला आहे. भाजपकडून पुन्हा शहर कचराकुंडीयुक्त केले जात आहे. कचराकुंड्या खरेदीत मोठा घोटाळा झाला आहे. महापालिकेने कोट्यवधी रुपये मोजून शहर कचराकुंडीमुक्त केले असताना भाजपने ठेकेदारांच्या भल्यासाठी शहराला पुन्हा कचराकुंडीयुक्त केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच १८९ कचराकुंड्याची किंमतही फुगवण्यात आली आहे. बाजारात एक ते दीड हजार रुपयांना मिळणाऱ्या कचराकुंड्या प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी ११ हजार १२१ प्रतिनगाप्रमाणे खरेदी केली. ओला व सुका कचरा वर्गीकरणासंदर्भात जनजागृती आणि नागरिकांचे प्रबोधन करणे आवश्यक असतांना पंतप्रधानाच्या महत्त्वाकांक्षी योजनेवरच महापालिकेतील सत्ताधारी भाजपने डल्ला मारला आहे. महापालिकेला यासाठी अंधारात ठेवण्यात आले. कचऱ्यातून सोने शोधण्याचे तंत्र प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांनी आत्मसात केल्याचा आरोप बोरस्ते यांनी केला. या संपूर्ण खरेदीची चौकशी करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.

पंतप्रधान निधीवर डल्ला
स्वच्छ भारत अभियान ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना असून त्यांनी या योजनेसाठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. परंतु, भाजपचीच सत्ता असलेल्या महापालिकेत या योजनेतील निधीवर डल्ला मारला आहे. आरोग्य विभागाने केलेली २१ लाखांची खरेदी ही स्वच्छ भारत अभियानाच्या निधीतून करण्यात आली आहे. केंद्राने हा निधी शौचालय उभारणी आणि जनजागृतीसाठी दिला असताना आरोग्य विभागाने चक्क या निधीतूनच ठेकेदारांचे भले केले आहे. विशेष म्हणजे या निधी वर्गीकरणासाठी कोणती परवानगीही घेतली नाही. त्यामुळे संपूर्ण खरेदीच वादात सापडली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


ख्रिसमस निमित्त केक वर्कशॉप

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे ख्रिसमसनिमित्त सिझलिंग ब्राउनी आणि ख्रिसमस स्पेशल फ्रूट केक कसा तयार करावयाचा यासंदर्भात वर्कशॉप घेतले जाणार आहे.

येत्या रविवारी (दि. १७ डिसेंबर) हे वर्कशॉप होणार आहे. ख्रिसमस स्पेशल फ्रूट केकमध्ये ड्रायफ्रूटपासून ते मसाले कसे वापरले जातात, तसेच हा केक नेमका कसा बनवितात हे शिकविले जाईल. याच वर्कशॉपमध्ये मोका हेजलनट सिझलिंग ब्राउनी, बेक न करता सिझलिंग ब्राउनी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सिझलिंग ब्राउनी कशा बनवायच्या हे विवेक सोहनी या डेमो वर्कशॉपच्या माध्यमातून दाखविणार आहेत. तेव्हा लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी १०० रुपये, तर इतरांसाठी ३०० रुपये रजिस्ट्रेशन फी आहे. अधिक माहितीसाठी (०२५३)-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा.

www.mtcultureclub.com या वेबसाइटमार्फत ऑनलाइन सभासदत्व मिळविता येईल, असे आवाहन करण्यात येत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शेल्टर प्रदर्शनात असेल वास्तूंचे नावीन्य

0
0

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक शहराच्या वाढत्या विकासात बांधकाम व्यावसायिकांचाही मोठा सहभाग आहे. यासाठी शेल्टर प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. येत्या २१ ते २५ डिसेंबर रोजी गंगापूर रोडवरील डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर शेल्टर प्रदर्शन होणार आहे. यंदा शेल्टर प्रदर्शनात नावीन्यपूर्ण शैलीच्या वास्तू ग्राहकांना मिळणार असल्याचे ‘केड्राई’चे अध्यक्ष सुनील कोतवाल यांनी सांगितले. दरम्यान, शेल्टर २०१७ चे भूमिपूजन महापौर रंजना भानसी यांच्या हस्ते झाले.

तत्पूर्वी शेल्टरच्या सभासदांनी मंत्रघोषात शेल्टर प्रदर्शनाच्या तयारीसाठी पूजा केली. महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष शिवाजी गांगुर्डे, विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, नगरसेवक उद्धव निमसे, श्याम साबळे, शेल्टर आयोजन समितीचे उदय घुगे, जितूभाई ठक्कर, सुरेश पाटील यांच्यासह शेल्टरचे सभासद उपस्थित होते.

महापौर भानसी यांनी शेल्टर प्रदर्शनामुळे शहरातील ग्राहकांना हव्या त्या प्रमाणात वास्तू मिळत असल्याने आनंद व्यक्त केला. प्रदर्शनात घरातील महिलांना हव्या असलेल्या घरांची पूर्ती होत असल्याचेही महापौर म्हणाल्या, तर केड्राईचे अध्यक्ष कोतवाल यांनी शेल्टर प्रदर्शनात दोनशेहून अधिक बांधकाम व्यावसायिक, २५ हून अधिक गृहकर्ज देणाऱ्या कंपन्या, तसेच बांधकाम क्षेत्राशी संबंधित असलेल्या शंभरहून अधिक कंपन्या शेल्टर २०१७ मध्ये सहभागी होणार असल्याचे सांगितले. शेल्टर प्रदर्शनाचे समन्वयक घुगे यांनीदेखील वेगाने वाढणाऱ्या शहराला विविधता असलेल्या घरकुलांची माहिती जाणून घेण्यासाठी प्रदर्शनाला भेट देण्याचे सांगितले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उजवा कालवा होणार मोकळा

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक
शहरातून जाणाऱ्या गोदावरी उजव्या कालव्यावर झालेल्या अतिक्रमणाबाबत जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी झापल्यानंतर महापालिका खडबडून जागी झाली आहे. उजव्या कालव्याच्या सरकारी जागेबाबत सिटी सर्वेने हद्द निश्चित करून दिल्यास, कालव्याच्या जागेवर झालेले अतिक्रमण महापालिका काढून देईल, अशी माहिती आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी दिली आहे. शहरातील अन्य नाल्यांवरही मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाले असून, खासगी एजन्सीच्या मदतीने त्यांचेही सर्वेक्षण करणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली.
शहराच्या हद्दीतून जाणाऱ्या गंगापूर धरण ते एकलहरेपर्यंत जाणाऱ्या गोदावरी उजव्या कालव्याच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होवून पक्की बांधकामे झाली आहेत. त्यामुळे हा कालवाच अतिक्रमणाच्या वेढ्याने वेढला गेला आहे. कालव्यावरील अतिक्रमणाबाबत राज्याचे जमाबंदी आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी जिल्हाधिकाऱ्यांसह महापालिका आयुक्त व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले होते. सरकारच्या जागांवर महापालिकेने कशाच्या आधारे बांधकामाच्या परवानग्या दिल्या, अशी विचारणाही चोक्कलिंगम यांनी केली होती. तसेच ही अतिक्रमणे काढण्याचेही आदेश त्यांनी दिले होते. त्यामुळे महापालिका आयुक्त कृष्णा यांनी याबाबत पत्रकार परिषदेत पालिकेची भूमिका स्पष्ट केली आहे. उजव्या काव्याची हद्द सिटी सर्वेने निश्चित करून द्यायला हवी. अनेक ठिकाणी तर सिटीसर्व्हे झालेला नाही. त्यामुळे या जागा प्रथम रेकॉर्डवर आणाव्या लागणार आहेत. सिटीसर्व्हेने या जागांची हद्द निश्चित केल्यानंतर कालव्याच्या जागांवर जर अतिक्रमण झाले असेल तर महापालिकेकडून निश्चितच अतिक्रमणविरोधी कारवाई केली जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. त्यामुळे या उजव्या कालव्यावरील अतिक्रमणे काढली जाण्याची शक्यता आहे.
उजवा कालव्यातून पाणी जात नसल्याने त्या ठिकाणी अतिक्रमण वाढले आहे. परंतु ही सरकारी जागा असून, यावरील अतिक्रमण काढून सरकारचे नाव लावले जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

शहरातील नाल्यांचाही सर्व्हे


उजव्या कालव्याप्रमाणेच शहरातील नाल्यांचीही स्थिती आहे. अनेक नैसर्गिक नाले बुजवून त्याठिकाणी टोलेजंग इमारतीही उभ्या राहिल्या आहेत. त्यासंदर्भातील तक्रारी देखील पालिकेकडे नागरिकांनी केल्या आहेत. नाल्यांवरील बांधकामे ही नियमानुसार झाली नसल्याचे चित्र असून, अनेक ठिकाणी नियमांची एैसीतैसी करण्यात आली आहे. त्यामुळे अशा बांधकामाचाही शोध घेतला जाणार असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. नाल्यांवरील बांधकामांबाबतचाही सर्वे करण्याचे संकेत दिले आहेत. नगररचना विभागाकडे अपुरे मनुष्यबळ पाहता या सर्वेसाठी महापालिका खासगी एजन्सीचीही मदत घेण्याची शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे नैसर्गिक नाल्यांवरील अतिक्रमणही रडारवर आले आहेत.

अधिकाऱ्यांचा ताफा
सातपूर ः चोक्कलिंगम यांनी दिलेल्या आदेशानंतर सर्वच विभागांतील अधिकाऱ्यांचा ताफा मंगळवारी सकाळीच गंगापूर धरणाच्या पायथ्याशी जमला होता. अगोदर कधीही माहिती न घेणारे महापालिकेचे व भूमी अभिलेख कार्यालयाचे अधिकारीही उजव्या कॅनॉलची माहिती घेण्यासाठी रस्त्यावर उतरले होते. विशेष म्हणजे शहराच्या मध्यवर्ती भागातून तब्बल २३ किलोमीटर गेलेल्या कॅनॉलची माहिती काही अधिकाऱ्यांनाच नसल्याचेही समोर आले आहे.

अतिक्रमित झोपड्या भाड्याने

गंगापूर धरणाच्या पायथ्याशी एका पुढाऱ्याने भाड्याने झोपड्या दिल्या आहेत. सुरुवातीला एक, दोन असलेल्या झोपड्या शेकडोंच्या घरात पोहचल्या आहेत. दुसरीकडे एका नामांकित शिक्षण संस्थेने कॅनॉल बुजवून तेथे पक्के बांधकाम केले आहे. याबाबत ‘मटा’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर त्या संस्थेला जलसिंचन विभागाने नोटीस बजावण्याचे सोपस्कार पार पाडले. मात्र, आता खुद्द जमाबंदी आयुक्तांनी दोन महिन्यांत अतिक्रमणे काढण्याचे आदेश दिले आहेत.

झोपड्यांना सर्व सुविधा

धरणाच्या पायथ्यापासूनच उजव्या कॅनॉलवर झोपड्यांचे अतिक्रमण आहे. गोवर्धन, आनंदवली शिवार, खुडवडनगरच्या शेतकऱ्यांचा पीटीसीमागील भाग, गोविंदनगरकडे जाणारा रस्ता, उपनगरच्या सुरुवातीपासून ते जेलरोडपर्यंत व त्यानंतर पुढे पवारवाडीच्या रेल्वे ट्रॅकपर्यंत झोपड्यांच्या रांगाच रांगा कॅनॉलवर पहायला मिळतात. विशेष म्हणजे सर्वच झोपड्यांना वीज, पाणी, घरपट्टी व विविध सुविधा कशा पुरविण्यात आल्या, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विनायकदादांना काणेकर पुरस्कार

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

राज्य शासनातर्फे उत्कृष्ट वाङ्मयनिर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्मय पुरस्कारांची घोषणा नुकतीच करण्यात आली. यात ज्येष्ठ नेते व माजी मंत्री विनायकदादा पाटील यांच्या ‘गेले लिहायचे राहून’ या पुस्तकाला प्रौढ वाङ्मय- ललित गद्य विभागासाठीचा एक लाख रुपयांचा अनंत काणेकर पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्य सरकारतर्फे दरवर्षी हे पुरस्कार दिले जातात. २०१६ साठीच्या पुरस्कारांची घोषणा सोमवारी झाली.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून ओळखले जाणारे विनायकदादा पाटील यांचा साहित्यिक म्हणूनही महाराष्ट्रात लौकिक आहे. नाशिकचे ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व, सांस्कृतिक, साहित्यिक क्षेत्रातील मोठे नाव म्हणजे विनायकदादा पाटील. त्यांच्या या पुस्तकात चार विभागांतून अनेक अनुभव त्यांनी मांडलेले आहेत. स्मरणांकित या विभागात विविध आठवणी त्यांनी शब्दांकित केल्या आहेत. त्या व्यक्तिगत जरी असल्या तरी त्यांच्या मांडणीमुळे त्या वाचकाला धरून ठेवतात. त्यानंतर रागदरबारी विभाग आहे, साहित्यपौर्णिमा हाही विभाग विविध अनुभव देणारा आहे. प्रा. पुंडलिक गवांदे यांच्या ‘निसर्ग देतो मानव घेतो’ या पुस्तकाला पंजाबराव देशमुख पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. एक लाख रुपयांचा हा पुरस्कार आहे.

‘मटा’मधील सदर ‘गेले लिहायचे राहून’

विनायकदादांनी लिहिलेले ‘गेले लिहायचे राहून’ हे पुस्तक ललित प्रकारात मोडणारे आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स’मधील मोहर पुरवणीत वर्षभर हे सदर विनायकदादांनी चालवले. त्यात तिकीट, पहिले प्रेम, धडा, गुरूजी, लाडू मेथीचे, ताईत, देवावर भारी, देवाघरची लेकरे, चित्र शोधतो...चित्र शोधतो, शल्य, सन्नाटा, मांडा : एक उत्सव, जामीन, माय सन, पंपा सरोवर, रंगनाथ, जय हो यासह अन्य लेख असून, अतिशय सुंदर शैलीत दादांनी हे सदर चालवले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आव्हान पाच लाख गृहभेटींचे!

0
0

म. टा. प‍्रतिनिधी, नाशिक

जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनरीक्षण कार्यक्रमाचा फज्जा उडण्याची शक्यता बळावली आहे. मतदार नोंदणीसाठी १५ डिसेंबर ही अखेरची मुदत असून, जिल्ह्यात ७ लाख ५६ हजार गृहभेटींपैकी केवळ एक लाख ८६ हजार गृहभेटी बीएलओंनी पूर्ण केल्या आहेत. त्यामुळे बीएलओंच्या माध्यमातून तीन दिवसांत पाच लाख गृहभेटी करण्याचे मोठे आव्हान जिल्हा प्रशासनापुढे आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार पुनरीक्षण कार्यक्रम राबविण्यास सुरुवात झाली आहे. घरोघरी जाऊन मतदार सर्वेक्षण करण्याचे काम बीएलओ करीत आहेत. या मोहिमेंतर्गत प्रत्येक मतदाराच्या घरापर्यंत जाऊन बीएलओंनी सर्व्हे करणे अपेक्षित आहे. त्यासाठी त्यांनी गृहभेटी देऊन मतदारांची संपूर्ण माहिती घेण्याचे निर्देश निवडणूक शाखेकडून देण्यात आले आहेत. ही माहिती ऑनलाइन भरण्याची सक्ती करण्यात आली असून, याकामी जिल्ह्यात ४,२२८ बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. एक ते ३१ नोव्हेंबर या कालावधीत ही मोहीम राबविण्यात येणार होती. मात्र, १५ डिसेंबरपर्यंत त्यास मुदतवाढ देण्यात आली. बीएलओंनी काम करण्यास असमर्थता दर्शविल्याने ३१ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यात केवळ २२ हजार मतदारांची नोंद होऊ शकली. जिल्ह्यात बीएलओंना सात लाख ५६ हजार कुटुंबांना भेटी द्याव्या लागणार आहेत. निवडणुकींसदर्भातील कामे शिक्षकांना देऊ नये, असा पवित्रा शिक्षक संघटनांनी घेतल्याने हे काम रखडले. प्रशासनाने कारवाईचा इशारा दिल्यानंतर अखेर बीएलओंनी काम सुरू केले. त्यामुळे आजमितीस जिल्ह्यात एक लाख ८६ हजार ८१० कुटुंबांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांच्याकडून मतदारयादीत नाव नोंदवणे, नाव कमी करणे, पत्ता बदल, मृत व्यक्तीचे नाव काढून टाकणे अशा प्रकारचे अर्ज भरून देण्यात आले आहेत. मात्र, अजूनही जिल्ह्यात सुमारे पाच लाख कुटुबांच्या गृहभेटीचे आव्हान बीएलओंसमोर आहे.

मतदारनोंदणीत नाशिक जिल्हा सातवा

निवडणूक आयोगाने मंगळवारी आढावा बैठक घेतली. या मोहिमेला मुदतवाढ मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, मुदतवाढ देणे शक्य नसून १५ डिसेंबरपर्यंत प्राप्त होणारे सर्व अर्ज ३० डिसेंबरअखेर ऑनलाइन भरण्याची सक्ती आयोगाकडून करण्यात आली आहे. त्यामुळे तीन दिवसांत उद्दिष्ट पूर्ण करण्याचे आव्हान बीएलओंसमोर आहे. मतदार नोंदणीच्या कामात नाशिक जिल्हा सातव्या क्रमाकांवर आहे. राज्यात बीड, सोलापूर, उस्मानाबाद, सांगली, जळगाव आणि पुण्याने या कामात आघाडी घेतली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बंदुकीतून गोळी सुटल्याने मृत्यू

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शहरालगत असलेल्या वार कुंडाणे गावाजवळ ओली पार्टीसाठी गेलेल्या मित्रांनीच त्यांच्या मित्राला बंदुकीची गोळी मारून ठार केल्याची घटना सोमवारी (दि. ११) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास घडली. मात्र नजरचुकीने गोळी चालली असल्याची माहिती मित्रांनी दिली आहे. तर तपासणीत मृत मित्राला काही अंतरापर्यंत ओढून आणून तसेच त्याच्या शरीरावर विविध ठिकाणी गंभीर जखमा असल्याचे आढळून आले आहे. यामुळे हा घातपात असण्याची शक्यता वर्तविली अाहे.

कुंडाणे गावातील दीपक दगडू वाघ (वय २८) हा सोमवारी (दि. ११) रात्री त्याचे मित्र अभय दिलीप अमृतसागर (रा. कुंडाणे ता. जि. धुळे), पंकज परशुराम जिसेजा (रा. मोगलाई, धुळे), मुकेश नाना अमृतसागर (रा. रेल्वेस्टेशन परिसर, धुळे), पंकज जीवन बागले (रा. रमाईनगर देवपूर धुळे), गोटू दगडूसिंग पावरा (रा. कुंडाणे) यांच्यासोबत कुंडाणे गावाच्या शिवारातील पडिक घराजवळ ही पार्टी सुरू होती. यावेळी पंकज जिसेजा याने त्याच्याकडे असलेली बंदूक काढून मित्रांना दाखवत असताना अचानक गोळी चालून ती मृत दीपक वाघ याच्या उजव्या खांद्याला लागली. त्यानंतर जखमी अवस्थेत असलेल्या दीपकला त्याच्या मित्रांनी उपचारासाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर दीपकला मृत घोषित केले. याप्रकरणी दीपकच्या नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेऊन तत्काळ तालुका पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळावर जाऊन पंचनामा केला आणि त्याच्यासोबत असलेल्या पाच मित्रांवर संशय असल्याने चौकशीसाठी ताब्यात घेतले. यावेळी मित्रांनी पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सटाण्यात आजपासून देवमामलेदारांचा जयघोष

0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

शहराचे आराध्य दैवत संतशिरोमणी देवमामलेदार यशवंतराव महाराज यात्रोत्सव बुधवारपासून सुरू होत आहे. यात्रोत्सवासाठी संपूर्ण सटाणा नगरी सजली असून, मंदिरासह रथ मिरवणूक मार्ग भगवेध्वज, विद्युत रोषणाईसह रांगोळ्यांनी सजला आहे.

बुधवारी पहाटे ३.३० वाजता बागलाणचे प्रभारी तहसीलदार दीपक धिवरे, स्नेहा धिवरे, नगराध्यक्ष सुनील मोरे, योगिता मोरे, देवस्थान अध्यक्ष भालचंद्र बागड व अरूणा बागड यांच्या हस्ते देवमामलेदारांची महापूजा होणार आहे. यानंतर दुपारी दोन वाजता शहरातून देवमामलेदार यशवंतराव महाराज यांची सालाबादाप्रमाणे पारंपरिक पद्धतीने रथ मिरवणूक निघणार आहे.

देवस्थानच्या वतीने संपूर्ण मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गुरुवारपासून १७ डिसेंबरपर्यंत देवस्थानच्या वतीने अन्नदानाचे आयोजन करण्यात आले आहे. सोमवारी (दि. १८) रोजी आरमनदीपात्रात कुस्तीदंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. तर याच दिवशी सायंकाळी ६ ते रात्री ८ पर्यंत दहीकाला व कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे. तब्बल एक पंधरवाडा सुरू असणाऱ्या या यात्रोत्सवासाठी देवस्थान विश्वस्त अध्यक्ष भालचंद्र बागड, दादाजी सोनवणे, धर्मा सोनवणे, गंगाधर येवला, सुनील मोरे, अ‍ॅड. विजय पाटील, रमेश देवरे, राजेंद्र भांगडीया, कौतीक सोनवणे, रमेश सोनवणे, हेमंत सोनवणे, प्रवीण पाठक, बाबुराव सोनवणे आदी प्रयत्नशील आहेत.

मिरवणूक मार्ग सजला

रथ मार्गावर भाविकांसह महिलांनी दारापुढे सडा, रांगोळ्या काढल्या आहेत. चौकाचौकात विविध मंडळांनी रथ मिरवणुकीवर फुलांचा वर्षाव करण्याचे नियोजन केले आहे. अनेक मंडळाच्या वतीने चहा, केशर दूध, साबुदाणा खिचडीसह महाप्रसाद वाटपाचे आयोजन केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भावभावनांची गुंतागुंत दाखवणारे ‘एडिपस रेक्स’

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

भविष्यात काय वाढून ठेवले आहे हे कुणालाही कळत नाही. मात्र, भविष्याचा वेध घेण्याचा ज्याने प्रयत्न केला, त्याला त्याची जाणीव थोड्याबहुत फरकाने होते. हाताशी नियती जाणून घेणारा एखादा भविष्यवेत्ता असला की त्याची ही वाट सुकर होते आणि त्याला जे भविष्य कळते ते भयानक असते, अशी मानवी मनाची गुंतागुंत दाखवणारे नाटक ‘एडिपस रेक्स’ होय.

महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाचा ६५ वा नाट्यमहोत्सव परशुराम साईखेडकर नाट्यगृहात सुरू असून, नाशिक विभागातील प्राथमिक स्पर्धेत ‘एडिपस रेक्स’ हे नाटक मंगळवारी सादर झाले. नाट्यक्षेत्रातील बायबल मानल्या जाणाऱ्या सोफोक्लिस लिखित या ग्रीक कलाकृतीचा अनुवाद अभय सदावर्ते यांनी केला होता. शापित राजा लुईस, त्यांची पत्नी जोकाश्टा व राजपुत्र एडिपस यांच्या नात्यातील गुंतागुंतीची ही कथा होती. ‘तुझी तुझ्या मुलाकडूनच हत्या होईल व तुझ्या पत्नीशी तुझ्या मुलाचा विवाह होईल’, असा लुईसला शाप असतो. तो ऐकून लुईस त्याच्या मुलाला-एडिपसला जंगलात फेकून देतो. मात्र, नियतीचा खेळ त्यांना पुन्हा एकत्र आणतो व शापवाणी खरी ठरते, असे नाटकाचे कथानक होते.

प्रा. रवींद्र कदम हे निर्मिती सूत्रधार होते, तर प्रफुल्ल लेले हे सूत्रधार होते. महेश डोकफोडे यांनी दिग्दर्शन व एडिपसची भूमिका केली. अमेय कुलकर्णी, अक्षय मुडावदकर, जयदीप लखलानी, आशिष चंद्रचूड, डॉ. प्राजक्ता लेले, अनिकेत कुलकर्णी, प्रतीक शर्मा, सुरभी पाटील, हर्षल भट आदींच्या भूमिका होत्या. नेपथ्य सुनील परमार, पार्श्वसंगीत तेजस बिल्दीकर, प्रकाशयोजना विनोद राठोड, रंगभूषा माणिक कानडे यांची होती, तर वेशभूषेची जबाबदारी नेहा मुडावदकर यांनी सांभाळली.

आजचे नाटक : ये मामला गडबड है

स्थळ : परशुराम साईखेडकर नाट्यगृह

वेळ : सायंकाळी ६ वाजता

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पिढी घडविण्यासाठी कष्ट घ्या

0
0

व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांची अपेक्षा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नव्या पिढीवरच भारताचे भवितव्य अवलंबून आहे. यामुळे ही पिढी घडविण्यासाठी सोसता येतील तेवढे कष्ट सोसा आणि राष्ट्राभिमानी पिढीची घडवणूक करा, अशी अपेक्षा आयपीएस अधिकारी व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण यांनी व्यक्त केली.

सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी संचलित भोंसला मिलिटरी स्कूलचे संस्थापक, स्वातंत्र्य सैनिक, सैनिकी शिक्षणाचे गाढे अभ्यासक डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे यांची १४५ वी जयंती विद्यालयाच्या प्रांगणात मोठ्या उत्साहात पार पडली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी कायम विद्यार्थ्यांसोबत संवादाला महत्त्व दिले असून, त्यांचा दृष्टिकोन राष्ट्राच्या भवितव्याच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे. भारत भूमीमध्ये श्रीराम आणि हनुमंतासारख्या आदर्श प्रतिमा होऊन गेल्या आहेत. या प्रतिमांचा संस्कार विद्यार्थ्यांच्या मनावर व्हायला हवा. जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी उद्दिष्ट, स्वयंशिस्त आणि राष्ट्रभक्ती हे तीन मूल्य प्राधान्याने अंगीकारावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी सोसायटीच्या सर्व शाखांच्या वतीने धर्मवीर डॉ. मुंजे यांच्या समाधीस मानवंदना देण्यात आली.

प्रमुख पाहुण्यांनी डॉ. मुंजे यांच्या समाधीस माल्यार्पण केले. तसेच हुतात्मा स्मारकास प्रमुख अतिथींच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व परिचय रामदंडी आबुजेद शेख यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा सत्कार रामदंडी कप्तान अक्षय झोपे यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे समादेशक (मेजर) चंद्रसेन कुलथे यांनी केले व संस्थेच्या कार्याचा आढावा सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटीचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी यांनी घेतला.

डॉ. मुंजे संग्रहालयाचे उद््घाटन

या कार्यक्रमाचे औचित्य साधून संस्थेचे संस्थापक डॉ. बाळकृष्ण शिवराम मूंजे यांचा जीवनपट भावचित्र, शस्त्र, दैनंदिन वापरातील पुरातन आशा नानाविध वस्तूंचे संग्रहालय तयार करण्यात आले. त्यास धर्मवीर संग्रहालय असे संबोधले गेले असून, या संग्रहालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.

या कार्यक्रमप्रसंगी संस्थेचे सरकार्यवाह प्रमोद कुलकर्णी, कार्यवाह डॉ. दिलीप बेलगावकर, कार्यकारिणी सदस्य प्रशांत नाईक, राजाभाऊ गुजराथी, मंगला सवदीकर, नितीन गर्गे, नरेंद्र वाणी, नारायण दीक्षित, संजय सराफ, पराग कणेकर, प्रमोद धनगर, आशुतोष रहाळ्कर, प्राचार्या चेतना गौड व सर्व शाखांचे प्राचार्य तसेच सर्व शिक्षक वृंद कर्मचारी, हितचिंतक, पालक, माजी विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रबद्ध संचलनाला मार्गदर्शन सुभेदार शिवाजी पाटील, सर्व सैनिकी प्रशिक्षकांनी केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन रामदंडी साहिल अतुल याने केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पंडित कॉलनीत ‘वन वे’

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महापालिका मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या पंडित कॉलनीतील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ‘वन वे’ मार्गासह सम-विषम पार्किंग सुरू करण्यात येणार आहे. शहर वाहतूक विभागाने तशी अधिसूचना प्रसिद्ध केली असून, २० डिसेंबरपासून ही नियमावली लागू होणार आहे.

पंडित कॉलनीतील दोन प्रमुख रस्त्यांवर कायमच वाहतूक कोंडी होते. दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणावर वाहनांची ये-जा सुरू असते. त्यातच रस्त्यावर एखादे वाहन पार्क झाल्यास निर्माण झालेली कोंडी लवकर सुटत नसल्याची येथील वस्तुस्थिती आहे. सततच्या त्रासाला स्थानिक नागरिकदेखील वैतागले आहेत. या पार्श्वभूमीवर पंडित कॉलनीतील दोन्ही प्रमुख रस्ते ‘वन वे’ करण्यात आले आहेत.

--

गंगापूररोड ते टिळकवाडीचा मार्ग

गंगापूररोडवरील उड्डाणपुलाजवळ असलेल्या सिद्धिविनायक हॉस्पिटलच्या बाजूने जुनी पंडित कॉलनीमार्गे राजीव गांधी भवनशेजारील टिळकवाडी सिग्नलकडे येणाऱ्या वाहतुकीस हा एकेरी मार्ग करण्यात आला आहे. २० डिसेंबरपासून टिळकवाडी सिग्नलकडून गंगापूररोडकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना तनिष्क शोरूमसमोरून राणे डेअरीच्या उजव्या बाजूने नवीन पंडित कॉलनीमार्गे मॅरेथॉन चौकाकडे जावे लागले.

--

राणे डेअरी ते मॅरेथॉन चौकाचा मार्ग

नवीन पंडित कॉलनीतील या रस्त्यावरदेखील बेशिस्त पार्क होणाऱ्या वाहनांमुळे वाहतूक कोंडीची समस्या सातत्याने निर्माण होत होती. त्यामुळे हा मार्गदेखील ‘वन वे’ घोषित करण्यात आला आहे. राणे डेअरी ते मॅरेथॉन चौक असा मार्ग एकेरी करण्यात आला असून, मॅरेथॉन चौकाकडून शरणपूररोडकडे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. या मार्गावरील वाहनांना जुनी पंडित कॉलनीतील मार्गाचा वापर करावा लागेल.

--

सम-विषम पार्किंग

या दोन्ही रस्त्यांवर सम-विषम पार्किंगचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. या नियमाचे उल्लंघन झाल्यास वाहतूक पोलिस कारवाई करतील. या नियमाचे पालन झाल्यास येथील वाहतूक कोंडीची समस्या बहुतांश निकाली निघण्याची चिन्हे आहेत.

--

प्रायोगिक तत्त्वावर महिनाभर पाहणी

या बदलाबाबत बोलताना वाहतूक विभागाचे सहायक आयुक्त अजय देवरे यांनी सांगितले, की या दोन रस्त्यांवर वारंवार होणाऱ्या वाहतूक कोंडीबाबत सतत तक्रारी येत होत्या. बेशिस्त पार्किंग आणि दोन्ही बाजूने होणाऱ्या वाहतुकीमुळे हा प्रश्न उद््भवत असल्याने ‘वन वे’सह सम-विषम पार्किंगचा पर्याय निवडण्यात आला. नवी आणि जुनी पंडित कॉलनीला जोडण्यासाठी अंतर्गत तीन रस्ते उपलब्ध असून, त्यांचाही वापर करून ‘वन वे’ नियमांचे वाहनचालकांनी पालन करणे गरजेचे आहे. एक महिन्याच्या कालावधीनंतर याबाबत पुन्हा निर्णय घेण्यात येईल.

--

एका महिन्याच्या कालावधीत नागरिक आपल्या सूचना वाहतूक विभागास सादर करू शकतील. त्यासाठी शरणपूररोडवरील वाहतूक विभागात नागरिकांनी संपर्क साधावा. येत्या २० तारखेपासून ‘वन वे’चा नियम लागू होणार आहे.

-अजय देवरे, सहायक आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पतंगप्रेमींनो, काळजी घ्या...

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिन्नर फाटा

मकरसंक्रांतीचा सण अवघ्या महिन्यावर येऊन ठेपला असल्याने पतंगप्रेमींकडून पतंगबाजीला सुरुवात झाली आहे. पतंग उडवतांना वीजवाहक तारांपासून सावधानता बाळगण्याचे आवाहन महावितरण प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

पतंग उडवताना वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढताना झालेल्या दुर्घटनेत शहरातील दहा वर्षीय बालकाला जीव गमवावा लागण्याची घटना नुकतीच घडली आहे. या पार्श्वभूमीवर पतंग उडविताना लघु व उच्च दाबाच्या वीजवाहिन्या, फीडर व वीज वितरण यंत्रणांपासून सावधानता बाळगावी व विद्युत सुरक्षेचे नियम पाळावेत, असे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे.

संक्रांतीनिमित्त लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांनाच पतंग उडविण्याचा मोह होतो. मात्र, पतंग उडविताना उत्साहाच्या भरात सुरक्षेची काळजी घेतली जात नाही. परिणामी, अपघातांना निमंत्रण मिळते. शहरासह ग्रामीण भागात वीज वितरणासाठी लघु व उच्चदाब वाहिन्यांचे जाळे पसरलेले आहे. लहान मुले व तरुणही वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवितात. अनेक वेळा पतंग विजेच्या तारांमध्ये अडकतो. अतिउत्साही तरुण व लहान बालकेही असे अडकलेले पतंग काढण्याचा प्रयत्न करतात. पंचवटीतील फुलेनगर परिसरात वीजतारांमध्ये अडकलेला पतंग धातूच्या सळईने काढण्याचा प्रयत्न एका दहा वर्षीय बालकाच्या जिवावर बेतला. असे अपघात टाळण्यासाठी पालकांनी लहान मुलांना धोक्याची पूर्वकल्पना देऊन त्यांच्यावर अधिक लक्ष ठेवण्याची आवश्यकता अधोरेखित करते.

सध्या बाजारात धातुमिश्रित मांजा मिळतो. या मांजावर धातुमिश्रित रसायनांचे कोटिंग (आवरण) असल्याने वीजतारांच्या संपर्कात येताच या मांजात वीज प्रवाहित होऊ शकते. त्यातून दुर्घटनेसह वीज वितरण यंत्रणेत बिघाड होऊन वीजपुरवठा खंडित होण्याचा धोका संभवतो. वीजतारांना स्पर्श झाल्यास विजेचा धक्का लागून अपघात होऊ शकतो. अशा घटना टाळण्यासाठी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन महावितरणने नागरिकांना केले आहे. तारांमध्ये अडकलेला पतंग काढणे जिवावर बेतणारे ठरू शकते, तसेच वीजवाहिन्यांमध्ये पतंग अडकून शॉर्टसर्किट होऊन तासन् तास वीजपुरवठा खंडित होऊ शकतो. त्यामुळे पतंग उडविताना विशेष दक्षता घ्यावी, असे आवाहन महावितरणने केले आहे.

--

हे लक्षात ठेवा...

-वीजतारांवर अडकलेला पतंग काढणे जिवावर बेतू शकते

-वीजतारांमध्ये अडकलेला पतंग काढण्याचा अट्टहास करू नका

-वीजवाहिन्या असलेल्या परिसरात पतंग उडवू नका

-धातुमिश्रित मांजाचा वापर कटाक्षाने टाळा

-दगडाला धागा बांधून तारांवर फेकू नका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पात्रता निकषांचा मदतीत अडथळा

0
0


नाशिक ः शेतकरी आत्महत्येच्या घटनांना निकषांमध्ये ताडून न पहाता सरसकट एक लाखांची मदत देण्याची राज्य सरकारची घोषणा फसवी ठरली आहे. या घोषणेची अंमलबजावणी होऊ न शकल्याने गेल्या पावणेदोन वर्षांत ८३ पीड‌ित कुटुंबे मदतीपासून वंचित राहिली आहेत. सात वर्षांत १५४ शेतकरी आत्महत्या जिल्हा प्रशासनाने निकषांच्या आधारे अपात्र ठरविल्या आहेत.

शेतकरी आत्महत्या हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. म्हणूनच पीडित शेतकरी कुटुंबाला आधार म्हणून एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. परंतु, या मदतीला पात्र ठरण्यासाठी सरकारने काही निकष ठरवून दिले आहेत. नापिकी, दुष्काळ, कर्जबाजारीपणा आणि कर्जवसुलीसाठी तगादा अशा कारणांमुळे शेतकऱ्याने स्वत:ची जीवनयात्रा संपविली असेल, तरच त्याचे पीड‌ित कुटुंब मदतीसाठी पात्र ठरते. महसूल, पोल‌िस आण‌ि कृषी विभागाचा अहवाल त्यामध्ये महत्त्वाचा ठरतो. अशी प्रकरणे संबंधित तहसीलदारांच्या माध्यमातून जिल्हा प्रशासनाकडे दाखल केली जातात. त्यामध्ये पोलिसांचा अभिप्राय आणि शवविच्छेदनाचा अहवाल, नापिकीमुळे शेतकऱ्याने आत्महत्या केली असेल, तर कृषी विभागाचा अहवाल महत्त्वाचा मानला जातो. कर्जबाजारीपणा हे आत्महत्येचे कारण असेल, तर कर्जाचा तपशील आणि कर्ज वसुलीसाठी तगादा लावल्याचे ठोस पुरावे या अहवालासोबत जोडले जातात. त्यानंतर जिल्हाधिकारी संबंधित आत्महत्येचे प्रकरण मदतीस पात्र आहे की नाही, हे ठरवितात. परंतु, आत्महत्येची ही ठोस कारणे पुढे आली नाहीत तर व्यक्त‌िगत कारणांतून आत्महत्या केल्याचे गृहीत धरून अशी प्रकरणे आर्थिक मदतीसाठी अपात्र ठरविली जातात.

जिल्ह्यात गेल्या सात वर्षांमध्ये ३८३ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी १५४ शेतकरी कुटुंबांना सरकार आणि जिल्हा प्रशासनाने अपात्र ठरवून मदत नाकारली आहे. तर २२१ शेतकऱ्यांची कुटुंबे मदतीच्या निकषांना पात्र ठरल्याने त्यांना एक लाखांची मदत देण्यात आली आहे. उर्वरित काही प्रकरणांवर अद्याप प्रशासनाकडून निर्णय झालेला नाही.

सरकारकडून शेतकऱ्यांची निराशा

शेतकरी आत्महत्येची जिल्हा प्रशासनाकडे नोंद झाल्यास संबंधित शेतकऱ्याचे कुटुंब चौकशीच्या फेऱ्यात अडकते. कुटुंबप्रमुख गेल्यामुळे शोकाकूल अस्वस्थेत असणाऱ्या कुटुंब‌ियांना चौकशी तापदायक वाटू लागते. म्हणूनच चौकशी न करताच पीड‌ित कुटुंबाला सरसकट एक लाख रुपयांची मदत केली जाईल, अशी घोषणा तत्कालीन महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी १५ मार्च २०१६ रोजी केली होती. परंतु, खडसे मंत्र‌िपदावरून पायउतार झाल्यानंतर सरकारमधील अन्य मंत्र्यांनी पावणेदोन वर्षांत या घोषणेची दखल घेतलेली नाही. त्यामुळे शेतकरी कुटुंबांची मात्र निराशा झाली आहे.

शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांचा तपशील

वर्ष पात्र अपात्र

२०११ २३ ११

२०१२ १६ ३

२०१३ ७ ८

२०१४ २५ १७

२०१५ ५३ ३२

२०१६ ४६ ४१

२०१७ ५१ ४२

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘एक शून्य तीन’चा रंगणार प्रयोग

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही खास महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी ‘एक शून्य तीन’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या २५ तारखेला सायंकाळी ६.३० वाजता परशुराम साईखेडकर नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक संपूर्ण राज्यात गाजत आहे.

एक शून्य तीन या नावापासूनच नाटकाचा चकवा सुरू होतो. कारण, एक शून्य तीन हा आहे महाराष्ट्र राज्य पोलिसांचा महिला आणि बालकांसाठीचा हेल्पलाइन नंबर. त्याचा आणि नाटकातल्या गोष्टीचा थेट कोणताही संबंध नाही. मात्र, नाटक स्त्रियांवरील अत्याचारावर काही भाष्य करते, बलात्कार आणि त्यानंतर खुनाची शिकार झालेल्या काही स्त्रियांच्या अनुषंगाने एका गायब झालेल्या तरुणीच्या शोधाची गोष्ट सांगते किंवा या गायब तरुणीचा अनुषंग घेऊन हर्षदा या तरुणीच्या गायब होण्याच्या रहस्यापर्यंत पोहोचते. हा शोध अत्यंत उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा होतो, तो त्याच्या मांडणीमुळे आणि संपूर्ण घटनेला असलेल्या वेगळ्या बॅकड्रॉपमुळे. स्त्री अत्याचाराशी संबंधित या नाटकातले धागेदोरे विशिष्ट धर्मसूत्रांपर्यंत पोहोचतात आणि एका हिंसक प्रवृत्तीला धार्मिकतेचे पवित्र आवरण असण्याकडे निर्देश करतात. हेच खरे तर या नाटकाचे वेगळेपण आहे.

---

एकावर एक तिकीट फ्री!

कल्चर क्लब सदस्यांना एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे. नव्याने सदस्य होणाऱ्यांना या नाटकाची २ तिकिटे मोफत मिळणार आहेत. तेव्हा आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि मनोरंजनाचा आस्वाद घ्या, असे आवाहन करण्यात येत आहे. या नाटकाच्या रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकांवर संपर्क साधावा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाइटला भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘स्वरनेत्र पुरस्कार’ १६ डिसेंबरपासून

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॅब, डॉ. मोडक सेंटर आणि कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे १६ आणि १७ डिसेंबर रोजी ‘स्वरनेत्र पुरस्कार’ ही हिंदी-मराठी गीतगायन स्पर्धा कुसुमाग्रज स्मारकात होणार आहे. ही स्पर्धा दृष्टिबाधित व्यक्तींसाठी गायनाची राज्यस्तरीय स्पर्धा असून, यात राज्यभरातून सुमारे १५० दृष्टिबाधित तरुण- तरुणी सहभागी होत आहेत.

सर्व अंध विद्यार्थ्यांची त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाहून नाशिकला येण्या-जाण्याची, तसेच त्यांच्या नाशिकमधील वास्तव्याची सोय करण्यात आली आहे. १६ आणि १७ डिसेंबर अशा दोन टप्प्यांत ही स्पर्धा होणार आहे. १६ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता स्पर्धेचे उदघाटन प्रसिद्ध गायक आणि आझादी ५०, मधुर बाला, माणिक मोती, अमृतलता या कार्यक्रमाचे निर्माते आणि चौरंग, मुंबई या संस्थेचे प्रमुख अशोक हांडे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर स्पर्धेची प्राथमिक फेरी होईल. १७ तारखेला दुपारी स्पर्धेची अंतिम फेरी आणि त्यानंतर स्पर्धेचा समारोप आणि पारितोषिक वितरण होईल. स्पर्धा कुसुमाग्रज स्मारकातील विशाखा सभागृहात होणार आहे.

प्रथम क्रमांकास १० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ७ हजार, तृतीय क्रमांकास ५ हजार आणि दोन हजार रुपयांची तीन उत्तेजनार्थ पारितोषिके देण्यात येतील. स्पर्धेचे संयोजन रोटरी क्लब ऑफ नाशिक, नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड (नॅब) आणि कुसुमाग्रज स्मारकातर्फे करण्यात येणार आहे. आर्थिक व्यवस्थापन रोटरी क्लब ऑफ नाशिक पाहत असून, बापये आय हॉस्पिटल व पी. एन. मेहता ट्रस्ट यांची मदत झाली आहे. स्पर्धेला नाशिककरांनी प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन नॅबचे चेअरमन हेमंत टकले व सचिव शाहीन शेख, शाम पाडेकर, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह मकरंद हिंगणे व रोटरी क्लब ऑफ नाशिकचे अध्यक्ष बेनिवाल आणि सचिव मनीष चिंधडे, मृदुला बेळे आणि इतर यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


दाखल्यांसाठी दिव्यांगांची निदर्शने

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

संजय गांधी निराधार योजनेचा लाभ घेता यावा यासाठी दिव्यांग बाधवांना २१ हजार रुपये उत्पन्न असल्याचा दाखला सादर करावा लागतो. परंतु, असा दाखला मिळण्यात अडचणी येत असून, तो सहजगत्या मिळावा अशी मागणी अपंग साधना संघ संचलित बृहन्मुंबई अपंग विकास संघटनेने जिल्हा प्रशासनाकडे केली आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांना मंगळवारी दुपारी संघटनेच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे द‌िव्यांगांनी अनेक मागण्या मांडल्या आहेत. प्रधानमंत्री घरकुल योजनेतील ब यादीतला अनुशेष भरून काढतानाच ड यादीत नोंद झालेल्या दिव्यांग बांधवांची निवड करण्यात यावी, प्राधान्य कुटुंबांतर्गत दिव्यांगांना रेशनकार्ड देण्यात यावे, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राखीव असलेला तीन टक्के निधी दिव्यांगांच्या हितासाठी खर्च करावा आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या. संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत दिव्यांग बांधवांना दिले जाणारे मानधन ६०० वरून एक हजार रुपयांपर्यंत वाढविण्याची घोषणा राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी चार महिन्यांपूर्वी केली होती. परंतु, अजूनही या योजनेची अंमलबजावणी झाली नसल्याने संघटनेने बडोले यांचा निषेध नोंदविला. यावेळी संघटनेचे श्रीराम पाटणकर, दीपक शेवाळे, मच्छिंद्र मोरे, विठ्ठल पाटील, माधुरी भावसार, सुरेखा हिरे, वैशाली चव्हाण यांसह जिल्हाभरातील दिव्यांग बांधव उपस्थ‌ित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पर्यटनस्थळांवर आता ‘नो सेल्फी’ झोन!

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पर्यटन स्थळांवर सेल्फीच्या नादात पर्यटक हकनाक जीव गमावत असल्याने हळहळ व्यक्त होण्यापलिकडे फारसे काही होत नाही. परंतु, पर्यटकांचा जीव वाचविण्यासाठी आता महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सरसावले आहे. पर्यटन स्थळांवरील धोकादायक पॉईंट्स ‘नो सेल्फी’ झोन म्हणून निश्चित करण्यात येणार असून, उपाययोजना राबविण्याच्या सूचनाही संबंध‌ित विभागांना करण्यात आल्या आहेत.

धकाधकीच्या जीवनात पर्यटन हा छंद नव्हे, तर गरज बनली आहे. त्यामुळेच पर्यटन स्थळांकडे नागरिकांचा ओढा वाढत आहे. निसर्गसौंदर्याने नटलेल्या पर्यटन स्थळांना भेटी देताना ते क्षण कॅमेराबध्द करण्याचा मोह पर्यटकांना आवरता येत नाही. सेल्फीद्वारे हे क्षण अविस्मरणीय करण्यासाठी चढाओढ सुरू असल्याचे सर्रास पहावयास मिळते. परंतु, सेल्फीच्या नादापायी पर्यटक स्वत:चा आणि इतरांचाही जीव धोक्यात घालत असल्याचे अनेक घटनांवरून स्पष्ट झाले आहे. अशा अपघातांमुळे संबंधित पर्यटन स्थळाची देखील बदनामी होते. पर्यटन स्थळांवर अशा जीवघेण्या घटनांची पुनरावृत्ती टाळता यावी, यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सरसावले आहे. उत्साही पर्यटकांच्या सेल्फी नादाला आवर घालण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या नाशिक विभागाने आश्वासक पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे.

ना‌शिक विभागासाठी कार्यवाहीच्या सूचना

पर्यटन स्थळे ही पाटबंधारे, वनविभाग, पुरातत्व विभाग, महापालिका यांच्या अख्त्यारीत असतात. त्यामुळे संबंधित विभागांनी पर्यटन स्थळांवरील धोकेदायक पॉईंटस निश्च‌ित करून तो ‘नो सेल्फी’ झोन होण्यासाठी कार्यवाही करावी, अशा सूचना महामंडळाकडून करण्यात आल्या आहेत. नाशिकसह अहमदनगर, जळगाव, धुळे आणि नंदुरबार येथील जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधित विभागांना या सूचना देण्यात आल्या आहेत. पर्यटन स्थळांवर वावरताना कोणती काळजी घ्यायला हवी याचे मार्गदर्शनही सूचना फलकांद्वारे करण्यात येणार आहे.

पर्यटकांनी सेल्फीच्या नादापायी जीव गमावणे या अत्यंत दुर्दैवी घटना असतात. या घटना टाळता याव्यात यासाठी संबंधित विभागांनी धोकादायक स्थळे न‌िश्चित करावीत. सेल्फीला प्रतिबंधासह तेथे आवश्यक ते सूचना फलक लावावेत, अशा सूचना पाचही जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

- नितीनकुमार मुंडावरे, प्रादेशिक व्यवस्थापक, एमटीडीसी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरपंचायतीसाठी अाज शिंदखेड्यात मतदान

0
0

म. टा. वृत्तसेवा, धुळे

जिल्ह्यातील शिंदखेडा येथील नगरपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा मंगळवारी (दि. १२) सायंकाळी थंडावल्या असून, शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांसह अपक्षांनी आपली पूर्ण ताकद प्रचारासाठी लावल्याचे चित्र होते. या निवडणुकीत नगराध्यक्षपदासाठी ११ प्रभागातून चौरंगी लढत आहे. तर उर्वरित पाच प्रभागात पंचरंगी व तिरंगी सामना होणार आहे. नगरपंचायतीसाठी आज (दि. १३) सकाळी साडेसात ते साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया होणार असून, मतमोजणी गुरुवारी (दि. १४) पार पडणार आहे.

नगरपंचायत निवडणुकीत भाजपतर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, पाशा पटेल, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्या सभा झाल्या आहेत. तसेच पर्यटन विकास मंत्री जयकुमार रावल हे शिंदखेडा शहरात तळ ठोकून आहेत. या निवडणुकीचे चित्र गुरुवारी मतमोजणीतून स्पष्ट होणार असून, नेमके पर्यटन विकास मंत्री रावल यांना शिंदखेडा नगरपंचायतीची सत्ता मिळते विरोधकांकडे, याकडे आता मतदारांचे लक्ष लागले आहे.

नंदुरबारमध्येही मतदान

नंदुरबार शहर नगरपालिकेच्या ३९ नगरसेवक पदाच्या जागांसाठी ११४ जण तर नगराध्यक्षपदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, एमआयएम, समाजवादी पार्टी व अपक्ष उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. दरम्यान, नगराध्यक्षपदासाठी काँग्रेस विरुद्ध भाजप अशी सरळ लढत होत आहे. शहरातील १९ प्रभागातील ३९ जागांसाठी आज (दि. १३) मतदान होणार असून, गुरुवारी (दि. १४) मतमोजणी प्रक्रियेतून नेमकी सत्ता काँग्रेस की भाजपकडे जाते या निकालावर लक्ष लागले आहे. काँग्रेसचे आमदार चंद्रकांत रघुवंशी आणि भाजपचे आमदार डॉ. विजयकुमार गावित, खासदार डॉ. हीना गावित, आमदार शिरीष चौधरी या दिग्गजांनी आपापल्या पक्षाच्या प्रचारासाठी कंबर कसली आहे. मात्र नेमका विजय कोणाचा होईल हे आता मतमोजणीतून दिसणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘कृषी संजीवनी’कडे पाठ

0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

राज्यातील कृष‌पिंप ग्राहकांना थकबाकीत सवलत देण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मुख्यमंत्री कृषी संजीवनी योजनेस मालेगाव विभागात फारसा प्रतिसाद मिळालेला नाही. ३० नोव्हेंबर अखेर विभागातील केवळ १५ हजार ५४६ कृष‌पिंप धारकांनी या योजनेत सहभाग घेतला आहे. थकीत वीजबिलापोटी ५ कोटी १ लाख ९ हजार ८४४ रुपयांचा भरणा महावितारांकडे करण्यात आला आहे.

थकबाकीदार कृष‌पिंप ग्राहकांना वीजबिले भरणे सोयीचे व्हावे यासाठी राज्य शासनाने नोव्हेंबरच्या सुरुवातीस ही योजना आणली होती. मात्र या योजनेस मालेगाव विभागात अत्यल्प प्रतिसाद मिळाला असल्याचे समोर आले आहे. या योजनेत सहभागी होण्यासाठी ३१ मार्च २०१७ अखेरीस असलेली वीज बिलाची मूळ थकबाकी रक्कम दहा किंवा पाच समान हप्त्यामध्ये दीड व तीन महिन्याच्या कालावधीत भरणे आवश्यक आहे. मात्र योजनेत सहभागी होण्यासाठी कृषीपंप ग्राहकांना १ एप्रिल २०१७ नंतरची सर्व चालू वीज बिले पूर्णपणे भरणे आवश्यक करण्यात असल्याची अट घालण्यात आल्याने देखील या योजनेस शेतकऱ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळाला आहे.

योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीपर्यंत मालेगाव विभागातील ३९ हजार ८६९ कृषीपंप ग्राहकांपैकी केवळ १५ हजार ५४६ ग्राहकांनी थकीतबिलाचा भरणा केला आहे. यात महावितरणची थकबाकी १५ कोटी ६ लाख ९१ हजार ४७२ इतकी आहे. मात्र योजनेत केवळ ५ कोटी १ लाख ९ हजार ८४४ रु इतका भरणा शेतकऱ्यांकडून झाला आहे. एकूण थकबाकीदर कृषीपंप ग्राहकांपैकी केवळ ३८ टक्के ग्राहकांनी या योजनेत सहभाग नोंदवला आहे.

चोवीस हजार कृषीपंपधारक वंचित

मालेगाव विभागातील पाच उपविभागापैकी पाचव्या उपविभागात (मालेगाव ग्रामीण उपविभाग) सर्वाधिक ७ हजार ९४२ कृषीपंप ग्राहकांनी एकूण २ कोटी ४६ लाख ३९ हजार ३७८ रुपये थकबाकी भरणा केला आहे. तर त्या खालोखाल दाभाडी उपविभागात ३ हजार ८१० कृष‌पिंप धारकांनी १ कोटी ३७ लाख ७६ हजार १६८ रुपये इतका भरणा केला आहे. मात्र कृष‌पिंपधारकांची एकूण संख्या लक्षात घेता २४ हजारांहून अधिक कृष‌पिंपधारकांनी यात सहभाग नोंदवलेलाच नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्युत प्रवाह सोडून मृत साठ्यात मासेमारी

0
0


म. टा. वृत्तसेवा, निफाड

नांदूरमध्यमेश्वर धरणातून जाणाऱ्या एक्स्प्रेस कालव्यातील मृतसाठ्यात विद्युत सप्लाय टाकून मासेमारी सुरू असल्याचा धक्कादायक आणि जीवघेणा प्रकार समोर आला आहे. हा प्रकारी त्वरित थांबवून, संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

नांदूरमध्यमेश्वर येथील चंद्रकांत शिंदे यांनी या बाबत माहिती दिली. शिंदे यांची कॅनॉललगत शेती व वस्ती आहे. नांदूरमध्यमेश्वर धरणातून पाणी सोडण्यात येणाऱ्या एक्स्प्रेस कॅनॉलच्या पाचव्या मैलाजवल कॅनॉलमध्ये सध्या पाण्याचा मृतसाठा आहे. या पाण्यात छोटे छोटे मासे असतात. येथे मासेमारी करण्यासाठी चक्क पाण्यात विद्युत सप्लाय सोडला जात आहे.

सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे. बागांच्या कामांसाठी पेठ, सुरगाणा भागातून मजूर आले आहेत. हे मजूर फावल्या वेळात पाणी काढण्यासाठी असलेल्या डिझेल मशीनचा वापर विद्युत सप्लाय घेण्यासाठी करतात. तो विद्युत सप्लाय काही वेळ हे मजूर पाण्यात सोडतात आणि पाण्यात धरणातून वाहत आलेले मासे या सप्लायमुळे तडफडून मरतात. त्यानंतर विद्युत सप्लाय बंद करून मृत मासे हे मजूर बाहेर काढतात. असा प्रकार काही दिवसांपासून सुरू आहे. पाण्यात सोडण्यात येणारा सप्लाय अनेकांच्या जीवावर उठू शकतो. त्यामुळे या प्रकाराकडे पोल‌सि आणि पाटबंधारे विभागाने तातडीने लक्ष घालून कारवाई करावी, अशी मागणी शिंदे यांनी केली आहे.

अघोरी प्रकाराने संताप

गेल्या अनेक दिवसांपासून हा प्रकार सुरू असल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. मासेमारी करण्यासाठी वापरली जाणारी पद्धत कुणाच्याही जीवावर उठू शकते. त्यामुळे हा अघोरी प्रकार बंद करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images