महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून खासगी शाळांना नोटिसा पाठवून शाळांबाहेर शालेय वाहतुकीची, तसेच खासगी वाहने उभी करण्यास बंदी घालण्यात आली आहे. मुख्याध्यापकांची यासंदर्भात बैठक घेऊन समजदेखील देण्यात आल्याची माहिती प्रशासन अधिकारी नितीन उपासनी यांनी स्थायी समितीत दिली.
शहरातील शाळांपुढील रस्त्यांवरील पार्किंगचा व वाहतुकीचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. बहुसंख्य खासगी शाळांसमोर रस्त्यावरच पार्किंग होत असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढल्याने महापालिकेच्या शिक्षण विभागाने या शाळांविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. शहरात शाळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, या शाळांमुळे रस्त्यांवरच वाहने उभी केली जात असल्याने पार्किंगसह वाहतुकीचा प्रश्न चिघळत चालला आहे. शाळांमुळे शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये वाहतुकीचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. शाळांमध्ये मुलांची वाहतूक करणारी वाहने, तसेच पालकांच्या चारचाकी व दुचाकी वाहनांमुळे रस्त्यांवर कोंडी होत आहे. मुलांना शाळेत सोडण्यासाठी येणाऱ्या पालकांची दुचाकी व चारचाकी वाहने शाळांच्या बाहेर उभी केली जातात. त्यामुळे वाहतूक ठप्प होते. वाहतूक ठप्प झाल्याने अपघातानादेखील निमंत्रण मिळत असल्याच्या तक्रारी शिक्षण विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.
अशोका मार्गावरील अशोका स्कूल, तसेच विस्डम हाय स्कूलसंदर्भातील पार्किंगची लेखी तक्रार महापालिकेकडे प्राप्त झाली होती. त्यासंदर्भात स्थायी समितीमध्ये प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यावर या दोन्ही शाळांना समज देण्यात आली असल्याची माहिती उपासनी यांनी दिली. शाळांबाहेरील पार्किंगमुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्याने त्या अनुशंगाने अॅक्शन प्लॅन तयार करून शाळांना बाहेर वाहने लावण्यास बंदी घालण्यात आल्याची माहिती नितीन उपासनी यांनी स्थायी समितीच्या बैठकी दिली. यापुढे थेट दंडात्मक कारवाई केली जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
--
शाळांमध्ये करणार तपासणी
महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या वतीने शहरातील खासगी मालकीच्या १८९ शाळांना पार्किंगसंदर्भात आतापर्यंत नोटिसा बजावल्या आहेत. त्यात अशोका व विस्डम शाळेने महापालिकेच्या नोटीसांना खुलासाही सादर केला आहे. गुरू गोविंद सिंह, तसेच केंब्रिज शाळेने पार्किंगसदर्भात बदल करण्याची तयारी दर्शविली आहे. शिक्षण विभागाने यासंदर्भात अॅक्शन तयार केला असून, प्रत्येक शाळेत जाऊन पुन्हा पार्किंगबाबत तपासणी केली जाणार असल्याची माहिती उपासनी यांनी दिली. शाळांच्या मुख्याध्यपकांना पुन्हा एकदा समज दिली जाणार असून, त्यानंतरही कार्यवाही केली नाही, तर थेट दंडात्मक कारवाईचा मार्ग स्वीकारला जाणार आहे.
--
पोलिसांचीही घेणार मदत
खासगी मालकीच्या १८९ शाळांपैकी निम्म्यापेक्षा जास्त शाळा या मध्यवर्ती भागात आहेत. काही शाळांमध्ये पार्किंग तर सोडा, जायलाही रस्ता नाही. त्यामुळे अशा शाळांची यादी तयार करून त्यांनाही पार्किंगसंदर्भात तोडगा काढण्यासाठी पर्याय दिले जाणार आहेत. शाळांना पार्किंगसंदर्भात शिस्त लावण्यासाठी वेळप्रसंगी पोलिसांचीही मदत घेतली जाणार आहे. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार असल्याचा दावा शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.
--
मटा भूमिका
शाळांबाहेर शालेय वाहतुकीची व इतर खासगी वाहने उभी करण्यास बंदी घालून महापालिका शिक्षण मंडळाने आग रामेश्वरी अन् बंब सोमेश्वरी या उक्तीचा प्रत्यय दिला आहे. शहरात पार्किंगची समस्या भीषण बनली असताना त्यावर ठोस उपाय शोधण्याऐवजी शाळांना वेठीस धरण्याचा हा प्रकार अघोरी या उपायात मोडणारा आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळी अर्धा तासाच्या वाहतूक कोंडीला तोंड देण्यासाठी महापालिका, वाहतूक पोलिस व संबंधित शाळा प्रशासनाने संयुक्त प्रयत्न केले, तरी हा विषय मार्गी लागू शकतो. त्यासाठी वाहनांवरच बंदीचा तुघलकी निर्णय घेणे योग्य नव्हे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट