Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

ब्रह्मगिरीवर जंगल निर्माण करणे शक्य

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

गोदावरीचे नैसर्गिक पद्धतीने प्रवाह वाढवितानाच ब्रह्मगिरी पर्वतावरही जंगल निर्माण करण्यासाठीच्या उपाययोजनांवर जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाली. या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांनी सर्व राष्ट्रीयकृत बँकांना केले आहे.

नमामि गोदा फाउंडेशनच्या वतीने गोदावरी सन्मान अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांसह निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, फाउंडेशनचे राजेश पंडित, किरण भालेराव, सुनील मेंढेकर, रोहन देशपांडे, सुनीता पलोड आदींसह सर्व राष्ट्रीयकृत बँकांचे प्रतिनिधी उपस्थ‌ित होते. ब्रह्मगिरी पर्वतावर पुन्हा नैसर्गिक पद्धतीने जंगल कसे निर्माण करता येईल? ब्रह्मगिरी परिसर ते रामुकंड या दरम्यान ९२ कुंड असून त्यांच्या पुनर्जिवनाबाबतही बैठकीत चर्चा झाली. गोदावरीचा नैसर्गिक पद्धतीने प्रवाह वाढव‌िणे, शालेय विद्यार्थी, विविध स्तरातील लोकांचा सहभाग घेऊन ब्रह्मगिरीचे व प्राचीन कुंडांचे पूनर्जिवन केल्यास संस्कृतीचे जतन आणि निसर्गाचेही संरक्षण होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यटनवाढीलाही याचा फायदा होणार असून सर्व राष्ट्रीयीकृत बँकांनी मोहिमेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


भाजपच्या आमदारांना रस्त्यासाठी जास्त निधी

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

भाजपाच्या आमदारांना ७० टक्के निधी आणि शिवसेनेच्या आमदारांना केवळ ३० टक्के निधी दिला जात आहे. म्हणून ग्रामीण भागाचा विकास होत नसल्याचा आरोप आमदार योगेश घोलप यांनी केला आहे.

ग्रामीण भागातील रस्त्यांना वाढीव निधी मिळावा या मागणीसाठी नागपूर विधानभवनाबाहेर देवळाली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेश घोलप यांनी आंदोलन केले. आमदार प्रकाश आबिटकर, आमदार किशोर पाटील, आमदार डॉ. मिणचेकर आदी सहभागी झाले.

ग्रामीण भागात रस्त्यांना वाढीव निधी मिळावा यासह इतर मागण्यांचा फलक फडकावून आमदार घोलप व ग्रामीण भागातील चार आमदारांनी विधानभवनासमोर अनोखे आंदोलन केले. नागपूर येथे सध्या हिवाळी अधिवेशन सुरू आहे. त्यानिमित्ताने ग्रामीण भागातील रस्त्यांच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधावे, या रस्त्यांसाठी वाढीव निधी द्यावा यासाठी हे आंदोलन होते. घोलप म्हणाले, की ग्रामीण भागात रस्त्यांअभावी विद्यार्थ्यांना कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागते. या भागात वाहतूकीची कोणतीही सुविधा नसल्याने महिलांना मोठा त्रास सहन लागतो. ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाल्याने बससेवा पूर्णपणे मिळत नाही. रस्त्याच्या कामांसाठी मिळणाऱ्या अपुऱ्या निधीमुळे मोठी समस्या निर्माण होत असून स्थानिक नागरिकांना श्रमदानाशिवाय पर्याय उरत नाही. शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याची अंतिम तारीख १५ डिसेंबर होती. मात्र, अद्याप रस्त्यांची अवस्था जैसे थे आहे. याबाबत शासनाने योग्य कार्यवाही करून ग्रामीण भागातील रस्त्यांना न्याय द्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थकबाकी वसुलीसाठी सरसावल्या बँका

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

मार्च महिना जवळ येऊ लागल्याने बँकांनी कर्जदारांकडे थकलेल्या हप्त्यांचा तगादा लावणे सुरू केले आहे. वसुलीचे उद्दिष्ट्य गाठण्यावर प्रत्येक बँक वसुली प्रतिनिधींनी भर दिला आहे.

मार्च महिना जवळ येत असल्याने बँकांनी आपली वसुली कडक करण्यास सुरुवात केली आहे. अनियमित कर्जदारांच्या घरी वसुलीसाठी माणसे पाठविणे सुरू केले असून काही लोकांना नोटिसा बजावल्या जात आहेत. मार्च अखेरीस बँकांना आपल्याकडील ताळेबंद रिझर्व बॅँकांना सादर करावा लागतो. पैसे देण्याचे प्रमाणे आणि वसुलीचे प्रमाण योग्य असेल तर बँकांचे कौतुक केले जाते; परंतु वसुली व्यवस्थित नसेल तर कारवाईलाही तोंड द्यावे लागते. यासाठी बँकांनी आतापासून थकबाकीदारांच्या घरचे वसुलीसाठी कर्जदारांचे उंबरठे झिजवणे सुरू केले आहे. मोठ्या रकमेचे हप्ते शिल्लक आहेत अशा कर्जदारांना नोटिसा बजावल्या जात आहेत. काहींच्या घरी पोस्टाने पोच दिली जात आहे. काही बँकांनी वृत्तपत्रांमध्ये जाहिरात प्रसिद्ध केल्या आहेत. थकलेले कर्ज एकरकमी भरण्यास तयार असलेल्या कर्जदारांना व्याजात सवलत देऊ केली आहे.

सरकारी बँका आपल्या थकबाकीदारांना सौम्य शब्दात माह‌िती ‌देत आहेत. तर काही खासगी बँकांनी वसुलीसाठी ‘खास’ माणसे नेमली आहेत. काही लोकांनी वसुलीसाठी चेक दिले, ते चेक बाउन्स झाले आहेत. त्यानाही नोटिसा प्रसिध्द केल्या जात आहेत. जे कर्जदार सापडत नाहीत अशा थकबाकीदारांसाठी जामीनदार राहिलेल्या व्यक्तींवर कर्जवसुलीसाठी दबाव टाकला जात आहे. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेल्या नावांमध्ये समावेश असलेले जामीनदारही हवालदिल झाले आहेत.

सध्याच्या अस्वस्थ व सामाजिक अर्थिक परिस्थितीमध्ये सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचेही नेते थकबाकी वसुलीत अडथळे निर्माण करतात. तसे त्यांनी करू नये. कर्जमाफी हवी; परंतु तिच्या बऱ्या वाईट परिणामांपैकी एक परिणाम म्हणजे बँकेची कर्जपरतफेड होय. बँकानी वसुली करताना एक तंत्र जपावे. बडे मालदार व कर्जबुडव्यांची वसुली सक्तीने करावी.
- अरुण कुकडे, निवृत्त बँकर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बालाजीनगरमध्ये गुदामाला आग

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

जेलरोड येथील पवारवाडीजवळील बालाजीनगरमध्ये बुधवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास कुशनच्या गुदामाला मोठी आग लागली. त्यात सुमारे तीन लाखाचे नुकसान झाले. अग्नीशमन दलाच्या तीन बंबांनी आग वेळीच विझविल्याने मोठी हानी झाली नाही.

बालाजीनगरमध्ये आरीफ अन्सारी यांचे क्लासिक कुशन नावाचे आहे. त्यांनी शाहीद अन्सारी यांच्या परवान्याच्या आधारे पत्र्याचे कुशनसाठी दीड वर्षांपूर्वी गुदाम उभे केले आहे. सायंकाळी गुदामामध्ये कोणी नसताना अचानक आग लागली. शेजारी दाट लोकवस्ती असल्याने दुर्घटनेची भीती होती. नाशिकरोडच्या दोन व पंचवटीच्या एका बंबाने २० मिनिटात आग आटोक्यात आणली. नगरसेवक शरद मोरे, विशाल संगमनेरे, प्रकाश बोराडे, गणेश सातभाई, नाशिकरोडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाचे अधिकारी सी. एन. भोळे, एस. के. गायकवाड, डी. आर. गाडे, एस. एस. पगारे, व्ही. के. ताजनपुरे, वाय. व्ही. मोरे, एस. एल. पाटील, आर. एस. बैरागी, बी. व्ही. आहिरे, आर. एक. मानकर आदींनी पराकष्टा करून आग आटोक्यात आणली. शार्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्वाध्याय परिवारातर्फे आज वक्तृत्व स्पर्धा

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

श्रीमद भगवद्गीता जयंतीनिमित्त स्वाध्याय परिवाराच्या वतीने आयोजित गीताजयंती वक्तृत्व स्पर्धेची अंतिम फेरी गुरुवारी (दि. २१) पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी स्वाध्याय परिवाराच्या प्रमुख मार्गदर्शक धनश्री तळवलकर उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबक रोडवरील लवाटेनगर परिसरातील ठक्कर डेव्हलपर या मैदानावर ही स्पर्धा सायंकाळी ५.३० वाजता होणार आहे.

स्पर्धेला यंदाही नाशिक विभागातून युवकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नाशिकसह धुळे, जळगाव, नंदुरबार आदी जिल्ह्यांमधून सुमारे ३७ हजार तरुणांनी या स्पर्धेत सहभाग घेतल्याची माहिती स्वाध्याय परिवाराच्या वतीने देण्यात आली. या अंतिम फेरीत स्पर्धक ‘गीता तेजाचे दर्शन : मानवमूल्य संवर्धन’या विषयावर विचार मांडणार आहेत. नागरिकांनी या उपक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन स्वाध्याय परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

स्पर्धेचे यंदा ४१ वे वर्ष आहे. यंदाच्या वर्षी भारतातील विविध राज्यांसह इग्लंड, अमेरिका, आखाती देश, ऑस्ट्रेलिया, केनिया, युगांडा, सिंगापूर, थायलंड आदी देशांमध्येही या स्पर्धा स्वाध्याय परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आल्या. विशेष म्हणजे गीताजयंती निमित्त ही स्पर्धा विविध १८ भाषांमध्ये पार पडली. देशभरातून सुमारे साडेचार लाख तरुणांनी याधेत सहभाग घेतला. तरूण पिढीमध्ये गीता या ग्रंथातील विचारांचे चिंतनास या उपक्रमातून प्रेरणा दिली जात आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बँक खात्यातून रोकड लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

बँक खात्यामधून अज्ञात चोरट्याने सुमारे १४ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने परस्पर लांबविले. एचडीएफसी बँकेच्या थत्तेनगर शाखेमध्ये हा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी गंगापूर पोलिसांनी माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
संदीप धोंडीराम गुंडरे (४४, रा. निशिगंध अ‍ॅव्हेन्यू, दत्त मंदिर स्टॉप, उंटवाडी) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. गुंडरे यांचे एचडीएफसी बँकेच्या थत्तेनगर शाखेत बचत खाते आहे. रविवारी अज्ञात भामट्यांनी त्यांच्या खात्यातील १४ हजार रुपये परस्पर लांबविली. पैसे काढल्याचा मेसेज मोबाइलवर आल्याने ही घटना उघडकीस आली.

तोतया पीएसआयची महिलेस शिवीगाळ

पीएसआय असल्याची बतावणी करीत फायनान्स कंपनीच्या थकबाकी वसुलीसाठी एकाने आपल्याला दमदाटी व शिवीगाळ केल्याची फिर्याद एका महिलेने दिली आहे. या प्रकरणी इंदिरानगर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.

नयना सातपुते (रा. कोहिनूर कॉलनी, राजीवनगर) यांनी तक्रार दिली आहे. सातपुते यांनी एका फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले आहे. सातपुते यांचे पती प्रितेश सातपुते घरी असताना त्यांच्या मोबाइलवर शनिवारी (दि. १६) सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास धमकीचा फोन आला. मी पीएसआय राणा बोलत असून तुम्ही फायनान्सचे पैसे तात्काळ भरा; अन्यथा अटक करील अशी धमकी देत त्यांना शिवीगाळ करण्यात आली. अधिक तपास हवालदार राणे करीत आहेत.

जुगार अड्ड्यावर काठेगल्लीत छापा

काठे गल्लीतील कॅमल हाउस परिसरात जुगार खेळणाऱ्या १२ जुगारींना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत जुगाराचे साहित्य व रोकड असा सुमारे दोन हजार ७०० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.

कॅमल हाउस परिसरातील मोकळ्या जागेत काही नागरीक जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी मंगळवारी (दि. १९) सायंकाळी तेथे छापा टाकला. सुरेश वलटे याच्यासह ११ साथीदार पत्त्यांद्वारे जुगार खेळताना आढळून आले. संशय‌ितांच्या ताब्यातून दोन हजार ७०० रुपयांच्या रोकडसह जुगाराचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.

सोशल मीडियावरून बदनामी

बनावट फेसबुक अकाउंटद्वारे महिलेच्या पतीची बदनामी करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सायबर पोलिस स्टेशनमध्ये माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्नपूर्णा त्रिपाठी (रा. पपया नर्सरीजवळ) या महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीने त्रिपाठी यांच्या पतीचा फोटो वापरून अनू त्रिपाठी नावाचे बनावट फेसबुक अकाउंट सुरू केले. या अकाउंटवर पतीचे बदनामीकारक फोटो टाकण्यात आले. याबाबत पत्नीने सदर अकाउंटवर चॅटिंग करून जाब विचारला असता अज्ञाताने त्यांना अश्लिल भाषेत चॅटिंग केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट सिटीसाठी पुण्याचा अभ्यास

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटी मोहिमेअंतर्गत पुण्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची, विकासकामांची पाहणी करण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटीचे सीईओ प्रकाश थविल यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पुण्याचा एकदिवसीय अभ्यास दौरा केला. यावेळी पुणे स्मार्ट सिटीच्या कामाचे कौतुक करून नाशिककरांसाठी अशाच पद्धतीने केंद्र सरकारला अपेक्षित विकासकामे राबविण्याचा विचार असल्याचे थविल यांनी सांगितले.

या दौऱ्यात थविल यांच्यासह मुख्य नगररचनाकार कांचन बोधले, मुख्य अभियंता मनोहर पोकळे, कंपनी सेक्रेटरी महेंद्र शिंदे यांचाही समावेश होता. नाशिक शहराचा स्मार्ट सिटी मोहिमेतील समावेश दुसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्याचे काम एक वर्ष अगोदर सुरू झाल्याने ते आघाडीवर आहे. नाशिकच्या पथकाने औंधमधील पुनर्रचना करण्यात आलेला रस्ता, सायकल लेन, प्लेसमेकिंग, नागरी समस्या निवारण व्यवस्था, आधुनिक वास्तुरचनाशास्त्रानुसार बनविलेले पदपथ, स्पीडब्रेकर, लोकांना बसण्यासाठीची खास व्यवस्था पाहिली. तसेच, सिंहगड रस्त्यावरील कमांड अँड कंट्रोल सेंटरला भेट देऊन पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप आणि इतर सहकाऱ्यांकडून स्मार्ट सिटीअंतर्गत दृष्ट‌िपथात असणाऱ्या प्रकल्पांबद्दल माहिती घेतली. कामाच्या पारंपरिक पद्धतींमध्ये बदल करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा यथाशक्ती वापर करत ‘कॉर्पोरेट टच’ देऊन कामे करणे आवश्यक आहे. विकासकामांमध्ये जास्तीत जास्त नागरिकांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभागी करून घेतल्यास कामे अधिक लोकाभिमुख होतात. कार्यपद्धतीचा ढाचा स्मार्ट सिटी मोहिमेत बदलला जात आहे, असे प्रतिपादन पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

थर्टी फर्स्टलाच उड्डाण!

$
0
0

२३ डिसेंबरला केवळ शुभारंभाचा सोपस्कार

नाशिक : येत्या २३ डिसेंबरला विमानसेवेचा उद्‍घाटन समारंभ मोठ्या दिमाखात होणार असला तरी नाशिककरांना मात्र विमानसेवेसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. तांत्रिक कारणास्तव एअर डेक्कनची विमानसेवा ३० डिसेंबरनंतरच उपलब्ध होणार आहे. तशी अधिकृत माहिती एअर डेक्कनने ‘मटा’ला दिली.

केंद्र सरकारच्या उडाण योजनेंतर्गत एअर डेक्कन कंपनीने नाशिक, जळगाव, पुणे, कोल्हापूर आणि मुंबई या शहरांना जोडणारी विमानसेवा सुरू करण्याचे निश्चित केले आहे. यातील मुंबई-कोल्हापूर ही सेवा आठवड्याभरासाठी लांबणीवर पडली आहे. त्यासाठी मुंबई विमानतळावर स्लॉट उपलब्ध नसल्याचे कारण दिले जात आहे. तर, नाशिक आणि जळगाव या दोन शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे उद्‍घाटन येत्या २३ डिसेंबरला होत आहे. जळगाव-मुंबई या सेवेचा उद्‍घाटन सोहळा जळगाव विमानतळाच्या ठिकाणी दुपारी दीड वाजता तर नाशिक-पुणे या सेवेचा शुभारंभ सायंकाळी साडेसहा वाजता ओझर विमानतळाच्या ठिकाणी होणार आहे.

‘त्या’ दिवसांचे बुकिंग नाहीच

एअर डेक्कनने १५ डिसेंबर रोजी विमानसेवेसाठी तिकीट बुकिंग सुरू केले. सेवा २३ डिसेंबरपासून सुरू होत असताना बुकिंग मात्र २२ डिसेंबरपासून सुरू करण्यात आले. मात्र, कंपनीने २२ ते ३० या कालवधीत स्लॉट बुक झाल्याचे त्यांच्या वेबसाईटवर जाहीर केले. तसेच, ३१ डिसेंबरनंतरचेच बुकिंग एअर डेक्कनने त्यांच्या वेबसाईटवर घेतल्याची खात्रीलायक माहिती ‘मटा’ला मिळाली आहे. बुकिंगला मोठा प्रतिसाद असून, तब्बल १५ दिवसांचे तिकीट बुक झाल्याचे त्यांच्या वेबसाईटवरच दिसून येत होते. प्रत्यक्षात अशा प्रकारचे बुकिंगच झाले नसल्याचे यातून स्पष्ट होत आहे.

विमानसेवा शनिवारपासून

नाशिक आणि जळगाव या दोन शहरांना जोडणाऱ्या विमानसेवेचे उद्‍घाटन येत्या शनिवारी, २३ डिसेंबर रोजी होत आहे. जळगाव-मुंबई या सेवेचा उद्‍घाटन सोहळा जळगाव विमानतळाच्या ठिकाणी दुपारी दीड वाजता तर नाशिक-पुणे या सेवेचा शुभारंभ सायंकाळी साडेसहा वाजता ओझर विमानतळाच्या ठिकाणी होणार आहे. या समारंभास उपस्थित राहण्याची विनंती एअर डेक्कनचे चिफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर (सीईओ) कॅप्टन गोपीनाथ यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना केली आहे.

विमानसेवेच्या उद्‍घाटन सोहळ्यास पालकमंत्री गिरीश महाजन, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांच्यासह विविध संस्था संघटनांचे अध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सोहळ्यासाठी मान्यवारांना निमंत्रण पाठविले जात असून, त्याची जय्यत तयारी केली जात आहे. मात्र, नाशिककरांना अपेक्षित विमानसेवा या शुभारंभादिवशी सुरू होणार नसल्याची बाब स्पष्ट होत आहे.

विमानाची उपलब्धता

एअर डेक्कन कंपनीने नवीन विमानाची खरेदी करून नाशिक, जळगाव, पुणे आणि कोल्हापूर या सेवा सुरू करीत असल्याचे सांगितले. मात्र, हे विमान सेवेसाठी रुजू होण्यासाठी अवधी असल्याचे हवाई क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळेच केवळ शुभारंभावेळी हिरवा झेंडा दाखविण्याच्या सोपस्कारापुरता कंपनीकडून विमान उपलब्ध केले जाणार आहे. मात्र, प्रवासी विमानसेवा देण्यासाठी विमान उपलब्ध होणार नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच येत्या ३० डिसेंबरपर्यंत कंपनीकडून नाशिक, मुंबई, जळगाव किंवा पुणे या शहरांसाठी कुठलीही सेवा दिली जाणार नाही. तशी अधिकृत माहिती कंपनीच्याच अधिकाऱ्याने ‘मटा’शी बोलताना दिली आहे. त्यामुळे २२ किंवा २३ डिसेंबरपासून सेवेच्या प्रतीक्षेत असलेल्या नाशिककरांना यंदाही विमानसेवेने हुलकावणी दिली आहे. विश्वसनीय सूत्रांच्या म्हणण्यानुसार, नवीन वर्षातच नाशिककरांना सेवा मिळण्याची शक्यता आहे. तोपर्यंत प्रतीक्षा करण्याशिवाय पर्याय नाही.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


अद्वय हिरेंवरही गुन्हा दाखल

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील भाजप नेते अद्वय हिरे यांचे समर्थक खैरनार बंधूंवर सोमवारी रात्री झालेल्या हल्लाप्रकरणी शिवसेना-भाजप रस्त्यावर उतरलेली असतांना त्यात कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. या हल्ल्यानंतर राज्यमंत्री दादा भुसे यांच्या पुत्रांसह अन्य दोघांवर गुन्हा दाखल झाला होता. तर बुधवारी खैरनार यांच्यावरील हल्ल्यातील जखमी आरोपी राहुल गायकवाड यांनी देखील अद्वय हिरे व खैरनार बंधूंविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी येथील छावणी पोल‌सि ठाण्यात अद्वय हिरेंसह खैरनार बंधूंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संपूर्ण प्रकरणाने मालेगावातील राजकीय वातावरण तापले आहे. सोमवारी मध्यरात्री खैरनार बंधुवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ भाजप नेते अद्वय हिरे यांनी मंगळवारी मूकमोर्चा काढून मंत्री भुसे यांचे पुत्र अविष्कार यांना अटक करण्याची मागणी केली होती. तसेच अटक न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा दिला होता. दरम्यान, या हल्ल्यानंतर दुसरा आरोपी राहुल गायकवाड हा जखमी असल्याने त्यास नाशिक येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. बुधवारी त्याच्या फिर्यादीवरून छावणी पोल‌सि ठाण्यात अद्वय हिरे, विकी खैरनार, लकी खैरनार व रोहित भामरे या चौघांवर ३०७सह विविध कलमांनुसार गुन्हे दाखल झाले आहेत.

राहुल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीत सोमवारी रात्री शहरातील साठफुटी रोडजवळ शिवनेरी कट्टा येथे गायकवाड हे मित्रांसोबत बसलेले असतांना अद्वय हिरे, लकी खैरनार, विकी खैरनार व रोहीत भामरे कार घेऊन आले. कुरापत काढून त्यांनी गायकवाड यांना शिवीगाळ करून चाकूने हल्ला केला. तसेच जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मात्र, खैरनार यांच्यावरील हल्ल्याच्या दोन दिवस उशिराने गायकवाड यांनी फिर्याद का दिली? असा प्रश्न उपस्थित झाला असून, या संपूर्ण प्रकरणास राजकीय रंग घेतला आहे.

हिरेंच्या अटकेची मागणी

खैरनार बंधूच्या हल्ल्याप्रकरणी भाजप व सेनेच्या दोन्ही गटाकडून एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली असून, शिवसेनेच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकारी अजय मोरे यांना निवेदन देत अद्वय हिरे यांसह तिघांना अटक करण्याची मागणी केली आहे. शिवसेनेचे तालुकाप्रमुख संजय दुसाने,

शहरप्रमुख रामा मिस्तरी, नेते बंडू बच्छाव, उपसभापती सुनील देवरे, विनोद वाघ आदींसह शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. हिरेंसह

तिघांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. अन्यथा शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्यात येवून शहर बंद आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

भाजपकडून उपोषण

खैरनार बंधू हल्ला प्रकरणी भाजपच्या वतीने बुधवारी अपर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन, उपोषण करण्यात आले. मंगळवारी अद्वय हिरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात येऊन अविष्कार भुसे यास अटक करण्यात यावी अन्यथा उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. उपोषणात आमदार अपूर्व हिरे यांच्यासह उपसभापती अनिल तेजा, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, लकी गिल, काशिनाथ पवार सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार मेडल्स जिंकली पण हरपला सुवर्णअश्व!

$
0
0

नाशिक : माणूस अन् मुक्या जनावरांमधील प्रेमाचा भावनिक धागा नेहमी चर्चेचा विषय असतो. त्यात ते मुके जनावर म्हणजे सैनिकी शाळेतला रूबाबदार अश्व असेल आणि त्याच्यावरून जीव ओवाळून टाकण्यास तयार असणारी सैनिकी शिक्षण घेणारी नवतरूण असतील, तर त्यांच्यातल्या ऋणानुबंधाची गोष्टच निराळी. पण अशाच एका भावूक प्रसंगात भोंसला मिल‌िटरी स्कूलच्या रामदंडींनी त्यांच्या लाडक्या ‘वीरा’ नावाच्या सुवर्णअश्वाला ज्या मैदानावर अखेरचा निरोप दिला, त्याच मातीत अश्वारोहणात चार पदके पटकावून त्याला अनोखी श्रद्धांजलीही त्यांनी अर्पण केली.

भोंसला सैनिकी शाळेतील विद्यार्थ्यांना सैनिकी प्रशिक्षणाचा सराव व्हावा, या उद्देशाने विविध स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. अशाच एका स्पर्धेचे आयोजन नुकतेच पुण्यातील एका रेसकोर्स मैदानावर करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये येथील भोसला मिल‌िटरी स्कूलच्या वतीने चार उमद्या अश्वांसह १६ प्रशिक्षित विद्यार्थ्यांनी अश्वारोहणाच्या क्रीडाप्रकारात सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील काही टप्पे यशस्वी पार पडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी प्रतिस्पर्धकांना तगड्या चालीने आव्हान देत ‘वीरा’ या भोंसलाच्या उमद्या अश्वाने अवघ्या मैदानाचे लक्ष खेचले होते. स्पर्धेच्या एका थरारक क्षणाला रेसकोर्सवर उभारण्यात आलेल्या ‘हर्डल’ची उंची उडी घेऊन ओलांडताना ‘वीरा’ चा पाय त्यात अडकला अन् क्षणार्धात जमिनीवर मान मुडपल्याने त्याला जखमी अवस्थेत प्राण गमवावे लागले. या घटनेने सुन्न झालेल्या मैदानाने त्याला श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर त्याच्यासोबत आलेले भोंसला मिल‌िटरी स्कूलचे रामदंडी (विद्यार्थी) हमसून रडू लागले. पदकांपेक्षाही त्यांना ‘वीरा’ अतिशय प्यारा होता.

या अनपेक्षित आघाताने रामदंडी स्पर्धेतून माघारी परतण्याच्या काही क्षण विचारात असताना ‘शो मस्ट गो ऑन’ या न्यायाने त्यांनी आव्हान जिवंत ठेवण्याचा निर्णय एकमुखी घेतला. अन् पुढे उत्कृष्ट खेळ सादर करत त्यांनी स्पर्धेत वेगवेगळी चार पदके पटकाविली. या पदकांमध्ये वीराच्या पाठीवर रोहण करीत या दुर्घटनेच्या आदल्या दिवशीच पटकाविलेल्या एका पदकाचा समावेश आहे. या अपघात प्रसंगी आपल्या पाठीवर स्वार असलेल्या रामदंडीलाही वीराने स्वत: कोसळताना मोठी इजा होऊ दिली नसल्याची भावनाही यावेळी संघ समन्वयक आणि रामदंडीजने व्यक्त केली. रामदंडींनी या कटू प्रसंगातून उभारी घेत स्पर्धेत मिळविलेली पदके ही वीराला श्रद्धांजली म्हणून अर्पण करण्यात आल्याचे समन्वयक मेजर चंद्रसेन कुलथे यांनी ‘मटा’ शी बोलताना सांगितले.

भोंसला परिवारास चुटपूट

भोंसला मिल‌िटरी स्कूल हे अश्वारोहण स्पर्धेत स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. ‘वीरा’ या घोड्याबाबत घडलेली अपघाताची घटना ही भोंसला परिवारासाठी चुटपूट लावून जाणारी आहे. या अपघाती घटनेचा व्ह‌िड‌ीओ देखील उपलब्ध आहे. आर्मीनेही या घटनेनंतर या मृत अश्वाचे पोस्टमार्टेम केले आहे.

- दिलीप बेलगांवकर, कार्यवाह, सीएचएमई, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

त्र्यंबक न्यायालयाला ‘न्याय’ कधी म‌ळिणार?

$
0
0


म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

त्र्यंबकेश्वर येथे ग्राम न्यायालय सुरू होऊन दीडवर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला. मात्र सुविधांना न्याय मिळालेला नाही. त्र्यंबकेश्वर येथील लोकमान्य टिळक व्यापारी संकुलात ग्राम न्यायालय थाटण्यात आले. मात्र या न्यायालयात सुव‌धिांची वाणवा असल्यामुळे पक्षकारांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत आहे.

तालुका निर्मितीनंतर सतरा वर्षांनी येथे आठवड्यातून एक दिवस दर बुधवारी ग्रामन्यायालय सुरू करण्यात आले. देशविदेशातून येथे भाविक येत असतात. त्यांच्या निवासाच्या सुविधांसाठी येथे बांधकामांचा अतिरेक म्हणावा अशी वस्तुस्थिती आढळते. तथापि सरकारी कार्यालयांना येथे इमारतींची वाणवा आहे. शासकीय भुखंड अतिक्रमीत झालेले असताना सरकारी कार्यालय चालविण्यासाठी सरकारी धर्मशाळा आणि व्यवसायीक संकुलांचा आधार घ्यावा लागत आहे. त्र्यंबकेश्वर येथे अशाच पद्धतीने ग्राम न्यायालय सुरू झाले. तालुक्यातील खटले येथे चालविले जातात.

स्वतंत्र इमारतीची गरज

ग्राम न्यायालय म्हटल्यावर कौटूंब‌कि केसेस अधिक असतात. साहज‌कि महिला पक्षकार मोठ्या संख्येने येतात. मात्र प्रसाधनगृहाच्या गैरसोयीमुळे महिलांची कुचंबणा होते. वास्तव‌कि पाहता या दीड वर्षाच्या कालावधीत हे न्यायालय स्थलांतरीत करणे गरजेचे होते. केवळ बस स्थानकापसून जवळ हा एकमेव निकष या वास्तुला उपयुक्त ठरला आहे. अन्यथा न्यायालयासाठी स्वतंत्र इमारतीची आवश्यकता आहे.

मागण्यांसाठी निवेदन

येथील वकील संदीप मोरे यांनी त्र्यंबक नगरपालिकेचे मुख्याधिकारी आणि प्रधान जिल्हा सत्र न्यायाधिश यांना पत्र दिले आहे. येथे आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात याव्यात अशी मागणी केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुर्गंधीने नागरिक हैराण

$
0
0

गोडसे मळ्यातील नाल्यात वाढली डासांची उत्पत्ती

म. टा. वृत्तसेवा, देवळाली कॅम्प

येथील वॉर्ड क्रमांक दोनमधील आनंद रोडच्या त्रिमूर्ती चौकातून थेट संसरीपर्यंत वाहत असणाऱ्या नाल्यात आजूबाजूच्या रहिवासी भागातून टाकण्यात आलेल्या भूमिगत नाल्यांच्या पाइपमधून गटारांचे पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे चौकापासून थेट संसरी नाक्यापर्यंत मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी झाली असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.

देवळालीत गेल्या पंधरा दिवस स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, मात्र स्वच्छता मोहिमेदरम्यान केवळ औपचारिकता म्हणून नाल्याची काही भागात स्वच्छता करण्यात आली. मात्र त्रिमूर्ती चौक ते संसरीदरम्यान एकदाही नाला ज्याप्रकारे स्वच्छ करण्याची गरज होती. त्याप्रमाणे करण्यात न आल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. नवीन बसस्थानक, पोलिस स्टेशन, स्टेट बँक असा गजबजलेल्या परिसरात हा भाग असल्याने नागरिक दुर्गंधीने हैराण झाले आहे.

कॅन्टोन्मेंट बोर्ड व लष्करी हद्दीलगत गोडसे मळा येथून वाहत येणाऱ्या नाल्यात लष्करातील रहिवाशी इमारतींचे पाणी सोडण्यात आले. तेथूनही मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी फैलावत आहे. उच्चभ्रू वस्तीसह गोडसे मळा भागातील नागरिकांना या दुर्गंधीचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत आहे. या भागात डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण वाढीस लागले असून, डेंग्यूसारखा आजार फैलावण्याची भीती स्थानिकांमध्ये निर्माण झाली आहे.

लोकप्रतिनिधींना जाणीव नाही

पहाटेच्या सुमारास आनंद रोड मैदानावर मॉर्निंग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडणारे अनेक नागरिक व व्यायामासाठी खंडेराव टेकडी, सह्याद्री नगर, आनंद रोड मैदानावर येणारे खेळाडू, जवळच्या डायमंड लॉज येथील मोफत दवाखान्यात येणारे रुग्ण व साईबाबा मंदिरात येणारे भक्तगण यांची या भागात सतत वर्दळ असते. याशिवाय परदेशी पर्यटकदेखील याच भागात येत असल्याने पसरलेल्या दुर्गंधीने अनेकजणांना नाकाला रुमाल लावून ये-जा करावी लागते. आनंदरोड परिसरात अनेक आजी-माजी लोकप्रतिनिधी राहतात मात्र त्यांच्या वाहनांच्या काचा बंद असल्याने त्यांना या समस्येची जाणीव होत नसल्याची तक्रार परिसरातील नागरिकांनी केली आहे. जर हा नाला नियमित स्वच्छ केला तर आनंदरोड परिसरात दुर्गंधी फैलावणार नाही, असेही नागरिकांनी म्हटले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गोदापात्रात पुन्हा वाढताहेत पाणवेली

$
0
0

तपोवन कपिला संगमापर्यंत नदीपात्रात घाण

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

शहराच्या भागातून बाहेर पडून तपोवनाकडे वाहत जाणाऱ्या गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह टाळकुटेश्वर पूलापासून स्थिर होतो. पुढे तपोवनाच्या कपिला संगमापर्यंत हा प्रवाह स्थिर असल्यामुळे सध्या या पाण्यावर शेवाळाचा हिरवा थर साचलेला दिसतो. त्यावर पाणवेलीची वाढ होत असल्याचेही काही ठिकाणी दिसू लागले आहे. गोदापात्रात ड्रेनेजचे पाणी मिसळत असलेल्या भागात ही समस्या गंभीर बनत असलेली दिसत आहे.

ड्रेनेजचे पाणी गोदापात्रात मिळू नये यासाठी खास ड्रेनेज लाईन तपोवनातील मलनिस्सारण केंद्रापर्यंत टाकण्यात आलेली असली तरी अनेक ठिकाणांपासून थेट गोदावरी पात्रात ड्रेनेजचे पाणी मिसळत असल्याचे दिसते. सध्या गोदावरीला गंगापूर धरणातून पाणी सोडणे बंद असल्यामुळे गोदावरीच्या पाण्याचा प्रवाह स्थिर झालेला आहे. या स्थिर पाण्यात शेवाळ वाढण्याचे प्रमाण वाढले आहे. तसेच या शेवाळाबरोबरच लहान अवस्थेतील पाणवेलीदेखील वाढण्यास सुरुवात झाल्याचे कन्नमवार पूल ते कपिला संगमापर्यंतच्या गोदापात्रात दिसत आहे. हे शेवाळ आणि पाणवेली आताच काढणे सोयी होणार आहे. जर ते लवकर काढण्यात आले नाही तर या पाणवेलींचा पसारा वाढून काढण्याचा खर्च वाढू शकतो.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकांना यापुढे पालिका इतमामात मानवंदना!

$
0
0

कारभाऱ्यांचा अजब निर्णय; नव्या वादाला फुटले तोंड

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विद्यमान नगरसेवकांना मरणोपरांत मानवंदना देण्याचा निर्णय नाशिक महापालिकेने घेतला आहे. निधन पावलेल्या नगरसेवकांना पालिकेच्या अग्निशमन विभागाच्या वतीने मानवंदना दिली जाणार आहे. खरे तर महापालिकेच्या कारभाऱ्यांनी आता आणखी एका नव्या वादाला तोंड फोडले आहे. अशी प्रथा इतरत्र कोठेही नसल्याने याबाबत योग्य विचारांती व नियमांच्या चौकटीत निर्णय व्हायला हवा, असा सूर ज्येष्ठांमध्ये व्यक्त होत आहे.

मनसेच्या नेत्या सुरेखा भोसले यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या शोकप्रस्तावाच्या सभेत यासंदर्भात नगरसेवकांनी केलेल्या विविध मागण्यांची दखल घेत महापौर रंजना भानसी यांनी यापुढे विद्यमान नगरसेवकाचे निधन झाल्यास पालिकेच्या अग्निशमन विभागातील कर्मचारी-जवान त्यांना मानवंदना देतील असा निर्णय जाहीर केला. नागरिकांची सेवा करताना निधन पावलेल्या लोकप्रतिनिधींना अंत्यसंस्कारावेळी पालिकेकडून मानवंदना द्यायला हवी, अशी मागणी अनेकांनी केली होती. पालिकेच्या वतीने महापौर अशाप्रसंगी पुष्पचक्र वाहतात, अशी परंपरा आहे. आजपर्यंत नगरसेवकांना मानवंदना देण्याचा असा प्रसंग कधी आलेला नाही. त्यामुळे याबाबत नियमांची चाचपणी करूनच निर्णय व्हावा, असा सूर व्यक्त होत आहे. विधानसभा अथवा विधान परिषद सदस्याचे निधन झाल्यास सभागृहात शोकप्रस्ताव मांडला जाऊन त्यावर सदस्य शोकभावना व्यक्त करतात व नंतर ठराव केला जातो. सदर ठराव संबंधितांच्या कुटुंबीयांकडे पाठविला जातो. संसद अधिवेशन सुरू असताना जर विद्यमान लोकसभा अथवा राज्यसभा सदस्याचे निधन झाले, तर त्यादिवशीचे कामकाज स्थगित केले जाते. माजी मंत्र्यांनाही मानवंदना देण्याची पद्धत काही ठिकाणी आहे. पण त्यासाठी लिखित स्वरुपाची नियमावली आहे.

निर्णयावर चर्चा महत्त्वाची

भावनेच्या भरात घेतलेल्या या मानवंदनेच्या निर्णयालाही नंतर बंदुकीची सलामी, तोफाची सलामी अशा पर्यायांचे फाटे फुटले तर प्रशासनाच्यादृष्टीने ते अवघड जागचे दुखणे तर होईलच; शिवाय पुढे त्याला विविध अस्मितांची जोड मिळाली तर अनवस्था प्रसंग ओढवू शकतो. त्यामुळेच असे समाजावर दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतांना त्यावर साधकबाधक चर्चा व्हावी, त्याला नियमांची चौकट असावी असा सल्ला काही ज्येष्ठ नेत्यांनी दिला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रहस्यमय ‘एक शून्य तीन’

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘एक शून्य तीन’ या नावापासूनच नाटकाचा चकवा सुरू होतो. कारण एक शून्य तीन हा आहे महाराष्ट्र राज्य पोलिसांचा महिला आणि बालकांसाठीचा हेल्पलाइन नंबर. त्याचा आणि नाटकातल्या गोष्टीचा थेट कोणताही संबंध नाही. मात्र नाटक स्त्रियांच्या अत्याचारावर काही भाष्य करतं, बलात्कार आणि त्यानंतर खुनाची शिकार झालेल्या काही स्त्रियांच्या अनुषंगाने एका गायब झालेल्या तरुणीच्या शोधाची गोष्ट सांगतं किंवा या गायब तरुणीचा अनुषंग घेऊन हर्षदा या तरुणीच्या गायब होण्याच्या रहस्यापर्यंत पोचतं. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लबतर्फे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदाही खास महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब सदस्यांसाठी ‘एक शून्य तीन’ या नाटकाचे आयोजन करण्यात आले आहे.

येत्या २५ डिसेंबर रोजी सायं ६.३० वाजता प. सा. नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. सुमित राघवन आणि स्वानंदी टिकेकर यांची प्रमुख भूमिका असलेले हे नाटक संपूर्ण महाराष्ट्रात गाजत आहे.

या नाटकातील तरुणीचा शोध अत्यंत उत्कंठावर्धक आणि खिळवून ठेवणारा होतो, तो त्याच्या मांडणीमुळे आणि संपूर्ण घटनेला असलेल्या वेगळ्या बॅकड्रॉपमुळे. स्त्री अत्याचाराशी संबंधित या नाटकातले धागेदोरे विशिष्ट धर्मसूत्रांपर्यंत पोहोचतात आणि एका हिंसक प्रवृत्तीला धार्मिकतेचं पवित्र आवरण असण्याकडे निर्देश करतात. हेच खरंतर या नाटकाचं वेगळेपण आहे. कल्चर क्लब सदस्यांना एका तिकिटावर एक तिकीट मोफत मिळणार आहे. तसेच नव्याने सदस्य होणाऱ्यांना या नाटकाची दोन तिकिटे मोफत मिळणार आहेत. तेव्हा आजच कल्चर क्लबचे सदस्य व्हा आणि मनोरंजनाचा आस्वाद घ्या. या नाटकाच्या रजिस्ट्रेशनसाठी ०२५३-६६३७९८७, ७०४०७६२२५४ या क्रमांकावर संपर्क साधावा. ऑनलाइन सभासदत्वासाठी www.mtcultureclub.com या वेबसाईटला भेट द्यावी.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


नीलकंठेश्वर नगर ‘स्मार्टनगर’मध्ये

$
0
0

प्रभाग सभापतींकडून पाहणी

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

केंद्र सरकारच्या स्वच्छ सर्वेक्षणात सातपूर परिसरातील नीलकंठेश्वर नगरचा समावेश स्मार्टनगर (मोहल्ला) म्हणून करण्यात आला आहे. त्यासाठी पुढील महिन्यात केंद्र सरकारची टीम पाहणी करण्यास येणार आहे.

सातपूर परिसरातील नीलकंठेश्वर नगरचा स्मार्टनगर या योजनेत समावेश करण्यात आला. त्यानंतर केंद्राकडून स्वच्छतेवर काम करणारी टीम नीलकंठेश्वर नगरची पाहणी करण्यासाठी येणार आहे. याकरीता सभापती माधुरी बोलकर यांनी स्मार्टनगरची नुकतीच पाहणी केली. तसेच ज्याठिकाणी त्यांना काही त्रुटी आढळल्या त्याठिकाणी दुरुस्तीसाठी संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.

या योजनेत स्मार्टनगरातील रस्त्यांवर कचरा टाकला जाणार नाही, याची काळजीदेखील घेण्याबाबत सल्ला सभापती बोलकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. याप्रसंगी सातपूरच्या विभागीय अधिकारी निर्मला गायकवाड, बांधकाम उप अभियंता संजय पाटील, पाणीपुरवठा उप अभियंता ए. व्ही. जाधव, उद्यानाचे जगदीश लोखंडे, महावितरणचे गायकवाड, आरोग्य विभागाचे संजय गांगुर्डे यांच्यासह परिसरातील रहिवाशी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

संवादातून मिळाला ‘आधार’

$
0
0

आधारकार्ड नोंदणी आणि दुरुस्तीसाठी नागरिकांना अनंत अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. नागरिकांना त्यांच्या समस्या खुलेआम मांडता याव्यात, यासाठी महाराष्ट्र टाइम्सने ‘मटा संवाद’ हे व्यासपीठ उपलब्ध करून दिले. नागरिकांनी त्यांना येणाऱ्या अडचणी भरभरून मांडल्या. त्या कशा प्रकारे सोडविता येतील, सोडविताना प्रशासनाला काय अडचणी येतात, त्यावर काय उपाययोजना करण्यात येत आहेत, याविषयी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांनी नागरिकांच्या अडचणी ऐकून घेऊन त्यांच्या शंकांचे समाधान केले. गंगापूर रोड येथील मविप‍्रच्या केबीटी इंजिनियरींग कॉलेजमध्ये ‘आधार हवाय’ या विषयावर ‘म. टा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, महापालिकेचे सहायक आयुक्त संतोष ठाकरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलास होळकर, जिल्हाधिकारी कार्यालयातील डिस्ट्र‌िक्ट प्रोजेक्ट मॅनेजर चेतन सोनजे आदी उपस्थ‌ित होते. आधार बाबतच्या समस्या मांडण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती.

नागरिकांच्या प्रश्नांना उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे यांनी उत्तरे दिली..

एका अशिक्षित विधवा महिलेकडे मतदान कार्ड, रहिवाशी दाखला आहे. मात्र, जन्मदाखला नाही. यामुळे आधारकार्ड मिळत नाही. यावेळी तिने काय करावे? - शहाणे, नागरिक

- मतदान कार्ड व आमदार किंवा खासदारांनी दिलेला रहिवाशी दाखला आधार कार्डसाठी ग्राह्य कागदपत्रे आहेत. यामुळे आधार कार्ड मिळणे शक्य आहे. मात्र, तरीही आधार कार्ड काढून देण्यास नकार मिळत असेल तर संबंधित केद्रांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्या. पुढील कार्यवाही करण्यात येईल.

सात वेळा आधार कार्डासाठी नोंदणी केली आहे. मात्र, अद्याप आधार कार्ड मिळाले नाही. यावर उपाय काय? – संतोष गवांदे, प्रकाश जाधव, नागरिक

- एकदा आधार कार्ड नोंदणी केल्यास तुमचा आधार कार्ड क्रमांक तयार होतो. काही तांत्रिक कारणास्तव आधार कार्ड तुमच्यापर्यंत पोहोचत नाही. एकदा नोंदणी केल्यावर पुन्हा-पुन्हा नोंदणी करणे टाळावे. असे केल्यास तुमचे आधार कार्ड कायमचे ब्लॉक होऊ शकते. नोंदणी करुनही आधार कार्ड मिळाले नाही, तर त्याची रीस‌िट घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयात यावे. आताचे स्टेटस तपासून कार्यवाही करता येते.

आधारकार्डच्या अपडेटचे काम ६० ते ७० टक्के बाकी आहे. ज्येष्ठ नागरिकांची फिंगर प्रिंट येत नाही. त्यासाठी काय करावे?.......दीपाली कुलकर्णी (नगरसेविका)

- खासगी आधार सेंटर्स बंद करण्यात आली आहेत. अधिकृत ६० केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. फिंगर प्रिंटच्या संदर्भातील तक्रारी खूप आहेत. त्यावर केंद्र पातळीवर काम सुरू असून लवकरच उपाययोजना केल्या जातील. सुप्रीम कोर्ट आणि यूडीएआय यांच्याकडे आधार केंद्रांची अनुमती देण्याचे अधिकार आहेत. त्यांनी सर्वत्र खासगी आधार केंद्रांची सुविधा बंद केली आहे. यामुळे व्यक्तिगतरित्या आधार केंद्र सुरू करता येणार नाही. पण लवकरच प्रत्येक प्रभागात एक दिवस अशी आधार केंद्रांची सुविधा देऊ.

आधार कार्डांवरील फोटो अतिशय अस्पष्ट आहेत. यामुळे अनेकदा त्याची झेरॉक्स काढल्यास ती प्रत बँक किंवा इतर कार्यालये ग्राह्य धरत नाहीत. यामुळे फोटो अपडेटेशन करण्याची सुविधा सुरू करता येईल का? - अॅड. चिन्मय गाढे

- आधार कार्ड क्रमांक आणि तुमचे नाव ही मुख्य माहिती आहे. आधार कार्डावरील फोटो अस्पष्ट असल्यामुळे ते ग्राह्य न धरणे गैर आहे. कारण, आधारमध्ये फोटो बदलण्याची सुविधा नाही. ज्या ठिकाणी फोटो अस्पष्टचे कारण देत आधार नाकारले जाईल, त्या कार्यालयाची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडे द्या. गरज भासल्यास तेथील वेब कॅमेरेही बदलण्यात येतील.

शहरात आधार केंद्र कमी आहेत. वृद्धांना तेथे जाणे शक्य होत नाही. अशा नागरिकांसाठी मूव्हिंग आधार मश‌िन्स केव्हा सुरू होतील? - स्वाती भामरे, नगरसेविका

- मूव्हिंग आधार मशिन्स सुरू आहेत. एका दिवसात फारतर चार-पाच नागरिकांचे आधार कार्ड त्यांच्या घरी जाऊन काढण्याची सुविधा त्याद्वारे उपलब्ध होते. आमच्याशी जिल्हाधिकारी कार्यालयात संपर्क साधल्यास दखल घेतली जाईल. परंतु, जे लोक वृद्धापकाळ किंवा तत्सम कारणामुळे सेंटरपर्यंत येऊच शकत नाहीत त्यांच्यासाठी ही सुविधा आहे.

नीट, जेईई तसेच बोर्डाच्या परिक्षा अर्जात आधार कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे. मात्र, आधार कार्डावरील नाव हे संबंधित परीक्षेच्या फॉरमॅटमध्ये नाही. यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाहीत ना? – टी. पी. देवी, नागरिक

- परीक्षा अर्जासोबत आधार कार्ड हे ओळखपत्र म्हणून जोडणे अनिवार्य आहे. जर आधार कार्डावरील नाव चुकीचे असेल, तर ते अपडेट करून घ्या. प्रथम नाव, वडिलांचे नाव व आडनाव हा आधार कार्डाचा फॉरमॅट आहे. यामुळे योग्य नाव असल्यास परीक्षा अर्ज भरताना विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येणार नाही.

माझा मुलगा विदेशात आहे. त्याच्याकडे आधार कार्ड नाही. माझे आणि मुलाचे जॉइंट बँक अकाउंट आहे. माझे आधार बँकेत दिले आहे. पण मुलाचे आधार नसल्याने माझे बँकेतील व्यवहार होत नाहीत. काय करावे? – सुनील चाटी, नागरिक

- तुमच्या मुलाचे आधार कार्ड बँकेत लिंक करावेच लागेल. मुलाचे आधार काढण्यासाठी त्यांना भारतात बोलावून सदरची प्रक्रिया पूर्ण करवून घ्या. मुलाचे आधार लिंक न केल्यास बँकेचे व्यवहार नंतर ठप्प होऊ शकतात.

ज्येष्ठ नागरिकांच्या आधार कार्डवर जन्मतारीख नाही, ती कशी टाकता येईल? - शहाणे.

- ज्येष्ठ नागरिक आधार केंद्रावर येऊ शकत असतील तर त्यांना त्यांच्या जन्म तारखेची नोंद करून घेता येऊ शकेल. त्यासाठी जन्मतारखेचा पुरावा सोबत ठेवावा. ज्यांना शक्य नाही त्यांच्यासाठी मूव्हेबल नोंदणीची व्यवस्था आहे.

आधार कार्डवरील पत्ता बदलायचा असेल तर बँकेत अपडेट करून मिळतो का? - प्रा. टी. बी. सांळुके

- काही बँका आणि पोस्ट ऑफिसमध्ये अशी व्यवस्था करण्यात आली आहे. त्यात येस बँक, कोटक महिंद्रा, डीसीपी बँक, अॅक्सिस बँक आदी ठिकाणी अपडेट करताना बँकेजवळचे आधार केंद्र लोकेट होते.

बँकांच्या कामकाजासाठी ज्या विवाहीत महिलांचे आधार कार्डवर माहेरचे नाव लागले आहे, त्यांना अडचणी येतात, त्यांनी काय करावे?- रमेश कडलग

- विवाहीत महिलांचे आधार कार्ड माहेरच्या नावाने असण्याची शक्यता असते. त्यांना बँकांच्या व्यवहारासाठी नाव बदलण्याचा साध्या कागदावर अर्ज करता येतो.

दहावीच्या गुणपत्रिका आणि आधारकार्ड यांच्या नावाच्या सिक्वेन्समध्ये बदल असल्याने जेईई, नीट यांसारख्या परीक्षांचे फॉर्म भरताना अडचणी येत असल्यास काय करावे?

- या बाबी आज कंपल्सरी नाहीत. विद्यार्थ्यांना परीक्षेला काही अडचणी येणार नाहीत. या परीक्षेसाठी अर्ज भरता येतो.

लहानपणी आधारकार्ड काढले असेल, तर ते १८ वर्षांनंतर अपडेट करण्याची गरज आहे का?

- १८ वर्षांनंतर आधार कार्ड अपडेट करता येऊ शकते. करायलाच हवे, अशी तूर्तास सक्ती नाही.

आधार कार्डला मोबाइल नंबर लिंक कसा करायचा?- प्रदीप पाटणकर

- घरबसल्या मोबाइल आधारला लिंक करता येईल. त्यासाठी तीन वेगवेगळ्या पद्धती आहेत.

आधार कार्ड काढताना दिलेला मोबाइल नंबरच आधारशी लिंक होतो का?- वृषाली मते

- आधार कार्ड काढताना दिलेल्या मोबाइल नंबर व्यतिरिक्त दुसरा नंबर लिंक करता येतो. सध्या एकापेक्षा जास्त आधारला एकच मोबाइल नंबर लिंक होत असला तरी भविष्यात अडचणी येऊ शकतात. त्यामुळे शक्यतो आधारला स्वतःच्या नावेच स‌िम असलेला मोबाइल नंबरच लिंक करावा. सीमकार्ड स्वतःच्या नावावर सहज करून घेता येऊ शकते. त्यासाठी आधारची सक्ती नाही.

रविवारी सुटीच्या दिवशी आधार केंद्र सुरू राहील का?- जयश्री कुलकर्णी

- रविवारी सुटीच्या दिवशीही आधारकेंद्र सुरू ठेऊ. तसेच ज्यांना आधार केंद्रावर जाणे शक्य नाही, अशा ज्येष्ठ नागरिकांसाठी मूव्हेबल क‌िटद्वारे आधार कार्ड काढून देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

मटाच्या या उपक्रमामुळे आमच्या आधार कार्डविषयीच्या समस्यांवर तोडगा मिळाला. त्यामुळे मटाचे आभार. आधार कार्ड अपडेशनअभावी अनेकांची पेन्शन अडकून पडली आहे. त्रस्त नागरिकांचा सरकारने विचार करावा.

- समाधान पाटील

माझा मुलगा विदेशात राहातो. त्याचे आधार कार्ड नसल्याने बँकेत व्यवहार करताना अडचणी येत आहेत. उपजिल्हाधिकारी मंगरुळे यांनी मला त्यावर पर्याय काढून दिला. त्यामुळे माझी समस्या सुटेल असा विश्वास वाटतो.

- सुनील चाटी

या उपक्रमामुळे प्रत्येकाकाला आधारबाबतच्या समस्या सर्वांसमोर मांडता आल्या. त्या समस्यांवर अधिकाऱ्यांकडून अचूक मार्गदर्शनही मिळाले. धन्यवाद.

- रामचंद्र निजामपूरकर

‘मटा संवाद’ सारख्या उपक्रमामुळे नागरिकांच्या आधार कार्ड विषयक समस्या दूर होत आहेत. लोकांच्या मनात आधारबाबत अनेक प्रश्न असून आधारसक्तीबद्दल भीतीही आहे. या उपक्रमामुळे शंकांचे समाधानकारक निरसन होण्यास मदत होईल. नगरसेवकांची मदत घेऊन आणखी काही सेंटर्स सुरू करायला हवीत, अशी अपेक्षा आहे.

- दीपाली कुलकर्णी, नगरसेविका

पाल्यांच्या आधारकार्डबद्दल आम्हाला मोठे टेन्शन होते. याचे पूर्णपणे समाधान ‘मटा संवाद’मध्ये झाले. आधारविषयक जनजागृतीची गरज असून, असे उपक्रम राबवायला हवेत.

- डॉ. सुनीता संकलेचा

हा उपक्रम अत्यंत चांगला आहे. आधार नागरिकांच्या जिव्हाळ्याचा विषय बनला आहे. याबाबत अधिक माहिती मिळणे महत्त्वाचे होते, जे ‘मटा संवाद’सारख्या उपक्रमातून साध्य झाले. नागरिकांच्या समस्यांचे निरसन होण्यासाठी असे उपक्रम व्हायला हवेत.

- स्वाती भामरे, नगरसेविका

मला हा उपक्रम खूप छान वाटला. शंकांचे समाधान थेट अधिकाऱ्यांनी केले. ज्येष्ठ नागरिकांना योग्य मार्गदर्शन मिळाले.

- निवृत्ती जाधव

कार्यक्रम खरंच चांगला आणि आवश्यक होता. आधारविषयक समस्यांचे निरसन झाले. विशेषतः सीनियर स‌िट‌िझनला योग्य सल्ला मिळाला.

- रमेश चव्हाण


बँक खाते आणि आधार कार्डविषयक समस्या होती, ज्याचे समाधान झाले. उपक्रम अतिशय उपयुक्त आहे आणि यासाठी ‘मटा’चे विशेष आभार. आम्हाला मिळालेली माहिती इतरांपर्यंत पोहचवू.

- काशिनाथ पवार

शहरात २१ सेंटर्स सुरू

शहरात ६० सेंटर्सची मागणी केली आहे. त्यापैकी २१ सेंटर्स सुरू आहेत. लवकरच येस बँकेच्या माध्यमातून १० सेंटर्स सुरू होतील. उर्वरित सेंटर्ससाठी आम्ही परवानगीची वाट पाहात आहोत. बहुतांश तक्रारी आधार अपडेशनबाबतच्या असल्यामुळे केवळ याच कामासाठी आम्ही स्वतंत्र सेंटर्स सुरू करू. तेथे नवीन एनरोलमेंट होणार नाही. नागरिकांच्या मागणीनुसार रविवारीदेखील सकाळी १० ते सायंकाळी सहा यावेळेत आधार सेंटर्स सुरू ठेवण्यात येतील. ज्या ज्येष्ठ नागरिकांना आधार सेंटर्सपर्यंत येणेच शक्य नाही अशा नागरिकांच्या घरी किट पाठवून अपडेशन करून देण्यात येईल. अनेकदा आधार कार्ड काढूनही ते रिजेक्ट होत असेल, तर अशा नागरिकांच्या आधार कार्डचे स्टेटस तपासून डेटा रिट्राइव्ह करून द्यावा लागणार आहे. त्यासाठी तक्रारदारांनी गुरुवार, २८ डिसेंबर रोजी सकाळी १० ते सायंकाळी सहा या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालयात यावे. जिल्हाधिकारी कार्यालयातील चारपैकी एक कीट फक्त ज्येष्ठांसाठी राखीव ठेवण्यात आले आहे.

- डॉ. शशिकांत मंगरूळे, उपजिल्हाधिकारी

आधार सेंटर - मोबाइल नंबर- पत्ता

रवींद्र खैरे- ९९२२४४०१९९-जिल्हाधिकारी कार्यालय

रवींद्र गायकवाड- ८२३७७८८००२- जिल्हाधिकारी कार्यालय

रवींद्र विशे - ९५०३५६६०१४- जिल्हाधिकारी कार्यालय

योग‌िता वाघचौरे - ८४४६०२७८०६- मनपा शाळा क्र. ९९, शिवाजीनगर, सातपूर

महेश जगताप - ७७९८६३०४८२ - सेतू कार्यालय, विभागीय आयुक्त, नाशिकरोड

जीवन बर्वे- ९९२२४६८१६४- मखमलाबाद सर्कल कार्यालय

जीवन बर्वे - ९९२२४६८१६४- मनपा शाळा शॉपिंग सेंटर, आनंदवली

कमलेश सोनवणे - ८९८३०९९९०८- मनपा शाळा क्र. २२, विश्वासनगर, सातपूर

अशोक माळी- ७०२०५२७८३६- मनपा शाळा १५७९, चेहेडी

वैभव सूर्यवंशी - ७५८८५५८६६९- मनपा शाळा क्र. ३४, नांदूर, पंचवटी

अनिल आठवले - ७७९८५८९६८०- मनपा शाळा क्र. १०७, तोरणानगर, सिडको

राधाकिसन शिंदे - ९८२३९५८६७४- माडसांगवी सर्कल, ऑफिस

मीनाक्षी जोर्वेकर - ९३७३३५९८८८- मनपा शाळा क्र. २२, विश्वासनगर, सातपूर

रवी जाधव - ८००७८५३०५४- मनपा कार्यालय, राजीव गांधी भवन

सागर बेदरकर- ९५०३६५००७२- फिरते किट, (वृद्ध व विशेष मुलांसाठी)

माधुरी जाचक - ९७६५५०१३११- अजय मित्र मंडळ हॉल, रथचक्र चौक, इंदिरानगर

नारायण जाचक- ८७९६११८०२३- गीतांजली हॉल, गंगापूर रोड

अशी करा घरबसल्या दुरुस्ती..

आधार कार्डमध्ये नाव, पत्ता, जन्मतारीख, मोबाइल क्रमांक यांसारख्या दुरुस्त्या करायच्या असतील, तर त्या घरबसल्यादेखील करता येऊ शकतात. त्यासाठी युन‌िक आयडेंट‌िफिकेशन अॅथोरिटी ऑफ इंडियाच्या uidai.gov.in या वेबसाइटवर जाऊन आपला आधार क्रमांक टाकावा. तेथे अनेक पर्याय दिसतात. त्यापैकी हव्या त्या पर्यायावर जाऊन दुरुस्ती करवून घेता येते. या वेबसाइटवर रिक्वेस्ट टाकल्यानंतर रजिस्टर्ड मोबाइलवर वन टाइम पासवर्ड पाठविला जातो. तो वापरून दुरुस्त्या करता येतात. या वेबसाइटवरून आधारचे स्टेटस तपासता येते. तसेच डिज‌िटल फॉरमॅटमध्ये आधार कार्ड डाऊनलोड करता येते. याच वेबसाइटवर रिक्वेस्ट टाकून पत्ताही बदलता येतो. असे बदल करण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची यादी या वेबसाइटवर दिली आहे. ही ओरिज‌िनल डॉक्युमेंटस स्कॅन करून ते अपलोड करता येतात.

- चेतन सोनजे, डिस्ट्र‌िक्ट प्रोजेक्ट मॅनेजर

दुरुस्तीसाठी कागदपत्रे (यापैकी आवश्यक ती अपलोड करावीत)

- सरकारी फोटो ओळखपत्र

- सर्व्ह‌िस फोटो ओळखपत्र

- इलेक्ट्र‌िसिटी ब‌िल

- टेलिफोन लँडलाइन ब‌िल

- प्रॉपर्टी टॅक्स रिसिट

- क्रेडिट कार्ड स्टेटमेंट

- इन्शुरन्स पॉलिसी

- नरेगा जॉब कार्ड

- एआरएमएस परवाना

- पेन्शनर कार्ड

- स्वातंत्र्य सैनिक कार्ड

- किसान पासबुक

- सीजीएचएस / इसीएचएस कार्ड

- इन्कम टॅक्स अॅसेसमेंट ऑर्डर

- व्हेईकल रजिस्ट्रेशन सर्ट‌िफिकेट

- पासपोर्ट

(संकलन : रामनाथ माळोदे, सौरभ बेंडाळे, अक्षय शिनकर, योगेंद्र देवरे)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महिला पोलिसाचा भाऊच निघाला चेनचोर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

नाशिकरोड परिसरात तीन ठिकाणी चेन स्नॅचिंगच्या घटना घडल्या. जयभवानीरोडला एक महिलेने मंगळसूत्र चोराच्या स्कूटीला जिद्दीने पकडले. चोर गाडी सोडून पळून गेला. मात्र, महिलेने त्वरित उपनगर पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर चोराला पकडण्यात यश आले. संशयित हा उपनगर पोलिस ठाण्यामधील महिला कर्मचाऱ्याचा भाऊ असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

तीनच दिवसांपूर्वी नाशिकरोडच्या उड्डाणपुलावर ट्रकचालक प्रकरणी त्र्यंबकेश्वर येथील बीडीओच्या मुलाला अटक करण्यात आली होती. उपनगर पोलिस सूत्रांनी दिलेली माहिती अशी - २० डिसेंबरला दुपारी एकच्या सुमारास जयभवानीरोडवरील तुळजा भवानी मंदिराच्या कडेला फिर्यादी इंदरानी धनजंयकुमार सिंग (४२, आनंदनगर, कदम लॉन्सजवळ, उपनगर) या चालल्या होत्या. पांढऱ्या रंगाच्या प्लेजर स्कूटीवरील व्यक्तीने त्यांची सव्वादोन तोळ्याची चेन ओढून पलायनाचा प्रयत्न केला. सिंग यांनी स्कूटी पकडून ठेवली. चोरट्याने त्यांना फरपटत नेले असतानाही सिंग यांनी गाडी सोडली नाही. आरोपीही खाली पडला. त्याने गाडी तेथेच सोडून पोबारा केला. सिंग यांनी उपनगर पोलिसांशी संपर्क साधला. वरिष्ठ निरीक्षक बाजीराव महाजन यांनी गस्तीवरील पोलिसांनी कळवले. उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे, विजयकुमार मगर आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सिंग यांच्याकडे विचारपूस केली. स्कूटीच्या नंबरवरुन माहिती घेऊन पोलिसांनी वेगाने तपासचक्रे फिरवली. चेन स्नचिंग करणारा संशयित संजय रघुनाथ म्हसदे (३७, जयभवानीरोड, नाशिकरोड) याला ताब्यात घेतले व महिलेचे मंगळसूत्र हस्तगत केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

अर्भक मृत्यूप्रकरणी सारवासारव

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात झालेल्या नवजात अर्भक मृत्यूप्रकरणी पालिकेच्या वैद्यकीय विभागाने सारसारव सुरू केली आहे. रुग्णालयातील डॉक्टर, तसेच कर्मचाऱ्यांनाच वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांच्या प्राथमिक चौकशी अहवालात सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करण्यात आला आहे. संबंधित अर्भकाची परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेल्यामुळेच पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलवणे क्रमप्राप्त होते, असा दावा करण्यात आला आहे. महापौर रंजना भानसी यांनीही या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे. त्यामुळे आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश अतिरिक्त आयुक्तांना दिले आहेत. दरम्यान, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दोषी असतील तर चौकशीअंती त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्त कृष्णा यांनी सांगितले.

नवजात अर्भकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात मंगळवारी घडली. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नवजात अर्भकाचा बळी गेल्याचा आरोप प्रसूत महिलेच्या नातेवाईकांनी केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्त कृष्णा यांनी वैद्यकीय अधीक्षक डॉ. राजेंद्र भंडारी यांना चौकशीचे आदेश दिले आहेत. भंडारी यांनी केलेल्या प्राथमिक चौकशीत सर्वकाही आलबेल असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यांच्या खुलाशावरून रुग्णालय दोषीच नसल्याचे भासवले जात आहे. सदर नवजात बालकाने गर्भातच शौच केल्यानंतर ती नाकातोंडावाटे फुफ्फुसात गेल्याने श्वास गुदमरला होता. प्रसुतीनंतर रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी नवजात अर्भकावर प्राथमिक उपचार केले. परंतु, परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती. जन्मल्यानंतर बाळ रडलेही नव्हते. त्यामुळे पुढील उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात हलविणे क्रमप्राप्त बनले होते. शताब्दी रुग्णालयात उपचार करताना नवजात बालकाचा मृत्यू झाला, असा दावा केला. आयुक्तांनीही या प्राथमिक चौकशीच्या आधारे रुग्णालयाची चूक नसल्याचा दावा केला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील डॉक्टरांसह कर्मचाऱ्यांना वाचविण्याचे प्रयत्न केले जात असल्याचा आरोप केला जात आहे.

रुग्णालय कर्मचाऱ्यांसाठी आचारसंहिता
पंचवटीतील इंदिरा गांधी रुग्णालयात घडलेल्या नवजात अर्भकाच्या मृत्यूप्रकरणाची चौकशी सुरू असतानाच, रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय यांच्या वर्तनासंदर्भातील तक्रारींचीही गंभीर दखल आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतली आहे. महापालिकेच्या रुग्णालयांमधील वैद्यकीय अधिकारी, नर्स, वॉर्डबॉय आणि सुरक्षारकांच्या कामकाजात सुधारणा करण्यासाठी आचारसंहिताच तयार करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त अभिषेक कृष्णा यांनी घेतला आहे. यासंदर्भातील निर्देश आयुक्तांनी प्रभारी वैद्यकीय अधीक्षकांना दिले आहेत.

रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळेच नवजात अर्भकाचा बळी गेल्याचा आरोप प्रसूत महिलेच्या नातेवाईकांनी केला होता. नर्स तक्रारीची दखल घेण्याऐवजी मोबाइल खेळत होत्या, अशा तक्रारीही करण्यात आल्या होत्या. शिवाय त्यांनी आपल्यासोबत असभ्य वर्तन केल्याचा आरोपही करण्यात आला होता. मायको रुग्णालयाबाहेर रिक्षातच महीलेची प्रसूती होत असताना, सुरक्षारक्षक पतंग उडवत होते. तसेच रुग्णालयातील डॉक्टर रुग्णालयातून गायब असतात. या प्रकरणाची गंभीर दखल महापालिका आयुक्त कृष्णा यांनी घेतली आहे. पालिकेची सर्व रुग्णालये, प्रसुतीगृहे, शहरी आरोग्य केंद्रांत कार्यरत असलेले सर्व डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय, सुरक्षारक्षक यांच्यासाठी स्वतंत्र आचारसंहिता बनवण्याचा निर्णय घेतला आहे. रुग्णालयातील रुग्णांनी पेशंटसह त्यांच्या नातेवाईकांसोबतचे वर्तन कसे ठेवावे, त्यांच्याशी नेमके कोणी बोलावे, नम्रपणा आदिंबाबत नियम ठरवले जाणार आहेत. त्यामुळे पालिका रुग्णालयांतील वाद काही अंशी कमी होण्याची शक्यता आहे.
महापौरांकडून चौकशीची मागणी

या घटनेची गंभीर दखल सत्ताधाऱ्यांनीही घेतली आहे. महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, स्थायी समिती सभापती शिवाजी गांगुर्डे, सभागृहनेते दिनकर पाटील, भाजप गटनेते संभाजी मोरूस्कर यांनी आयुक्त अभिषेक कृष्णा यांची भेट घेतली. महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे नवजात अर्भकाचा मृत्यू ओढावल्याची घटना दुदैवी असल्याचे सांगत या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी महापौरांनी केली.

अतिरिक्त आयुक्तांकडे चौकशी

प्राथमिक चौकशी अहवालानंतरही महापौरांनी सखोल चौकशीची मागणी केली. त्यानंतर आयुक्त कृष्णा यांनी पुन्हा अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मदतीने सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. सदर चौकशी अहवालात पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दोषी असतील तर चौकशीअंती त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असे आयुक्त कृष्णा यांनी सांगितले.

म्हणून खासगीचा पर्याय

खासगी रुग्णलयासंदर्भातही आयुक्तांनी वैद्यकीय विभागाची पाठराखण केली आहे. नवजात अर्भकाला मनपाचे बिटको रुग्णालय अथवा जिल्हा शासकीय रुग्णालयात हलविण्यासाठी एनआयसीयू सुविधा असलेली रुग्णवाहिका आवश्यक होती. तशी रुग्णवाहिका मनपा अथवा जिल्हा रुग्णालयाकडे उपलब्ध नव्हती. तसेच प्रसूत महिलेचे कुटुंब बीपीएल रेशनकार्ड धारक आहे. त्यामुळे बालकावर राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत उपचार करता येणे शक्य होते. त्यामुळे संबंधित नातेवाईकांशी चर्चा करूनच एनआयसीयू सुविधा असलेली रुग्णवाहिकाही या रुग्णालयाकडे असल्याने नवजात बालकाला शताब्दी हॉस्पिटलमध्ये हलविण्याचा निर्णय घेण्यात आल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

डिजिटलमुळे होणार दप्तराचे ओझे कमी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

सर्व विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल शिक्षण पोहोचविण्याबरोबरच त्यांच्या पाठीवरील दप्तराच्या ओझ्याचा त्रासही कमी करण्यासाठी शिवसेना प्रयत्नशील आहे. त्यासाठी स्वतंत्र अभ्यासप्रणालीची निर्मिती करण्यात आली असून इयत्ता आठवी ते दहावीच्या मराठी, हिंदी, इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना यावरून सर्व विषयांचा अभ्यास सहजपणे करता येणार असल्याची माहिती शिवसेनेच्या युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी दिली.

रावसाहेब थोरात सभागृहात बुधवारी शिवसेनेच्या ‘टॉप स्कोअरर’ या ई-लर्निंग सॉफ्टवेअरचा वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांनी डिजिटल शिक्षण पद्धती अवलंबण्यामागील उद्देश सांगितला. टॉप स्कोअररच्या माध्यमातून विद्यार्थी कधीही, कोणत्याही वेळी फोन, टॅब, लॅपटॉप, कॉम्प्युटर यावर अभ्यास करू शकतात. यामुळे शिकवणीसाठी अतिरिक्त वेळही विद्यार्थ्यांना खर्च करावा लागणार नाही. हा वेळ विद्यार्थ्यांनी क्रीडागुणांना वाव देण्यासाठी उपयोगात आणावा, तसेच परीक्षेत मिळणारे मार्क्स म्हणजेच सर्व काही नसून अभ्यासातून काय शिकतो आणि त्याचा कसा उपयोग करतो हे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना सामावून घेत त्यांनी यावेळी आपल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यासाच्या सॉफ्टवेअरसाठी प्रोमो कार्डचे वाटप केले.

व्हर्च्युअल क्लासरुमचे उद््घाटन

नाशिक महानगरपालिकेच्या सहा शाळांमध्ये खासदार निधीतून डिजिटल क्लासरुम बनविण्यात आल्या आहेत. पोलिस वसाहतीतील मनपा शाळा क्रमांक १६ मध्ये या व्हर्च्युअल क्लासरुम स्टुडिओचे उद्घाटन बुधवारी आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये शिवसेनेने तयार केलेल्या आधुनिक वेबसाइटवरून विद्यार्थ्यांना डिजिटल अभ्यास करणे शक्य झाल्यानंतर नाशिकमधील शाळांमध्ये हा प्रयोग करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून महानगरपालिकेच्या इतर व्हर्च्युअल क्लासरूम असलेल्या शाळांच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी कर्मवीर दादासाहेब गायकवाड फोटो गॅलरीचे उद््घाटनदेखील त्यांनी केले. याठिकाणी ठाकरे बोलतील असे अपेक्षित असल्याने स्टेजची बांधणी, सजावट करण्यात आली होती. परंतु, त्यांनी स्टेजकडे पाठ फिरवत थेट विद्यार्थ्यांमध्ये जाऊन बसणेच पसंत केले. यावेळी खासदार हेमंत गोडसे, महानगरप्रमुख नगरसेवक अजय बोरस्ते, जिल्हाध्यक्ष विजय करंजकर, माजी महापौर विनायक पांडे, नगरसेवकर सुधाकर बडगुजर यांची उपस्थिती होती.

सेल्फीची क्रेझ

रावसाहेब थोरात सभागृहातील कार्यक्रमाला उपस्थित विद्यार्थी व कार्यकर्ते यांमुळे सभागृहात प्रचंड दाटीवाटी झाली होती. अशा परिस्थितीतही विद्यार्थी व कार्यकर्त्यांनी सेल्फीसाठी ठाकरे यांच्याभोवती मोठा गराडा घातला होता.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images