शहरातील सर्वात व्यस्त असलेल्या महात्मा गांधीरोडवर दुचाकी, चारचाकी हटवण्याचा मुद्दा मंगळवारी पुन्हा ऐरणीवर आला. ‘नो पार्किंग’मध्ये लावलेल्या दुचाकी वाहतूक विभागाच्या टोइंग व्हॅनवरील कर्मचाऱ्यांनी उचलल्यानंतर वादास सुरुवात झाली. चारचाकी वाहनांवर कारवाई का करीत नाही, असा प्रश्न उपस्थित करून नागरिकांनी उपस्थित पोलिस कर्मचाऱ्यांना कारवाई करण्यास मज्जाव केला. या गोंधळामुळे अर्धा तास वाहतुकीचा खोळंबा झाला होता.
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास महात्मा गांधीरोडवर टोइंग व्हॅनने काही दुचाकी उचलल्या. मात्र, याठिकाणी दुचाकींच्या जागी कार पार्क करण्यात आल्या होत्या. सातत्याने कारवाई होत असल्याने हैराण झालेल्या दुचाकीचालकांनी वाहतूक पोलिसांना याबाबत जाब विचारला. दुचाकी पार्किंगच्या जागेवर चारचाकी वाहने लावलेली असतात. त्यामुळे दुचाकी पार्क करण्यासाठी जागाच राहत नाही, याकडे दुचाकीचालकांनी लक्ष वेधले. दुचाकीधारकांच्या थेट प्रश्नांमुळे पोलिसांची चांगलीच पंचाईत झाली. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांनी लागलीच सरकारवाडा पोलिसांशी संपर्क साधून अधिक मदत बोलावली. मात्र, अतिरिक्त कुमक आल्यानंतरही दुचाकीधारक आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. चारचाकी वाहने उचलण्यासाठी टोइंग वाहन का नाही, असा प्रश्न सातत्याने उपस्थित करण्यात आला. पोलिसांकडे याचे कोणतेही उत्तर नसल्याने त्यांनी संबंधित नागरिकांची कशीबशी समजूत काढून एम. जी. रोडवरून काढता पाय घेतला.
रोजचेच रडगाणे
एम. जी. रोड परिसरात दररोज शेकडो वाहनांची वर्दळ असते. मात्र अवघ्या पाच ते दहा मिनिटांसाठी वाहन पार्क केलेले असताना टोइंग करण्यात आले तर ३०० रुपयांचा भुर्दंड सहान करावा लागतो. याउलट चारचाकी वाहने उचलण्यासाठी टोइंग व्हॅनच नसल्याने त्या कोठेही उभ्या केल्या जातात. कारवाईत होत असलेला हा दुजाभाव कमी होऊन वाहतुकीला शिस्त लागावी यासाठी पोलिसांकडून प्रयत्न होणे गरजेचे झाले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट