माझ्या कार्यालयात कोणत्याही विभागाच्या फायली पेंडिंग नाहीत, असे ठामपणे सांगत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार यांनी सोमवारी सर्व आरोप फेटाळून लावले. माझ्या कार्यालयातील आवक-जावक नोंदवहीतही तशी नोंद नसून, ग्रामसेवकांच्या कोणत्याही दबावाला बळी पडणार नसल्याचेही त्यांनी ठणकावून सांगितले. पत्रकारांसमोर सोमवारी आपली बाजू मांडताना ते बोलत होते.
ग्रामसेवकांच्या आंदोलनावर बोलताना दीपक कुमार म्हणाले, की जिल्ह्यातील ग्रामपंचायतींमधील भ्रष्टाचार बाहेर काढल्यानेच माझ्या विरोधात ग्रामसेवकांनी आंदोलन पुकारले आहे. त्यांच्या कोणत्याही दबावाला मी बळी पडणार नाही. पदभार स्वीकारल्यानंतर मी पहिल्यांदा ग्रामपंचायतींची सखोल तपासणी करण्यास सुरुवात केली. या तपासणीत अनेक ग्रामपंचायतींमधील दप्तर गायब असल्याचे आढळले. त्याचप्रमाणे काही ठिकाणी हिशेबच नसल्याचे समोर आले. या सर्व प्रकरणांत ग्रामसेवकांवर कारवाई होणार असल्याने ही कारवाई टाळण्यासाठीच हे आंदोलन करण्यात येत आहे.
ग्रामपंचायतींत कोट्यवधीचा भ्रष्टाचार
गोंदे, मुंढेगाव, मुकणे, खंबाळे, माणिकखांब व माळेगाव, विंचूर दळवी ग्रामपंचायतींत कोट्यवधींचा मुद्रांक शुल्क, अनुदान व कर आकारणीत गैरव्यवहार झाल्याचे समोर आल्याची माहितीही दीपक कुमार यांनी या वेळी दिली. ग्रामसेवक युनियनचे ठराविक पदाधिकारी असलेल्या ग्रामसेवकांची जिल्ह्यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायतींत नियुक्ती झाल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामसेवकांच्या कोणत्याही दबावास बळी पडणार नसून, सर्व मोठ्या ग्रामपंचायतींची तपासणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले. या तपासणीत अपहार व गैरव्यवहार झाल्यास कारवाई केली जाईल. स्वच्छ भारत निर्माण व पाणी योजनांमध्ये ग्रामसेवकांनी अपहार केल्याचेही त्यांनी सांगितले. एका ग्रामसेवकावरील निलंबन रद्द करण्यासाठी ग्रामसेवक युनियनचे जिल्हाध्यक्ष कैलास वाघचौरे कार्यालयात आले होते. मात्र, निलंबन रद्द करण्यास नकार दिल्यानंतर हे आंदोलन सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट