Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

एमआयडीसीत एकाची लूट

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

पायी जाणाऱ्या तरुणास दगड मारून दोघांनी लुटले. ही घटना औद्योगिक वसाहतीत घडली असून, या प्रकरणी सातपूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेमंत संजय साळुंखे (वय २०, रा. महालक्ष्मी चौक, सावतानगर, सिडको) या तरुणाने दिलेल्या तक्रारीनुसार, २१ जानेवारी रोजी काही कामानिमित्त हेमंत सातपूर एमआयडीसीत गेला होता. दुपारी साडेतीनच्या सुमारास कांदा फॅक्टरीजवळच्या वीज वितरण कार्यालयासमोरून हेमंत जात असताना लूटमारीचा प्रकार घडला. रस्त्याच्या पलीकडे उभ्या असलेल्या दोन तरुणांनी त्याला दगड मारून जखमी केले, तसेच हेमंतच्या खिशातील सुमारे ११ हजार रुपये किमतीचा मोबाइल काढून पोबारा केला. सहाय्यक निरीक्षक वऱ्हाडे तपास करीत आहेत.

केवडीबनात दोघांना अटक

लूटमार करण्याच्या उद्देशाने चॉपर घेऊन फिरणाऱ्या दोन सराईतांना पोलिसांनी तपोवनातील केवडीबनात अटक केली. शस्त्रबंदी आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी दोन्ही संशयितांविरोधात आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमेश रामदास कुमावत (वय ३०) आणि आकाश पांडुरंग भालेराव (२४, रा. दोघे संत कबीरनगर, भगतसिंग चौक, द्वारका) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. निसर्गरम्य आणि एकांतात असलेल्या केवडीबनात प्रेमीयुगलांना लुटण्याच्या घटनांत वाढ झाल्याने पोलिसांनी गस्तीत वाढ केली आहे. आडगाव पोलिस स्टेशनचे हवालदार मनोज खैरे शुक्रवारी सकाळी या भागात गस्तीवर असताना दोन संशयितांच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्या. पोलिसांनी लागलीच दोघांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली. यात त्यांच्या ताब्यात धारदार लोखंडी चॉपर आणि फायटर मिळून आले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पोलिस नाईक केदारे तपास करीत आहेत.

ऑटो रिक्षासह दुचाकी चोरी

शहरातून ऑटो रिक्षासह मोटारसायकल लंपास केल्याप्रकरणी मुंबईनाका आणि नाशिकरोड पोलिस स्टेशनमध्ये नोंद करण्यात आली आहे. सुचितानगर येथील मनोज चांगो सोळंके (वय ४२ रा. मेरी अपार्टमेंट, इनायत कॅफेमागे) यांची ऑटो रिक्षा (एमएच १५/जे ६६५०) गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास त्यांच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये चोरट्यांनी लंपास केली. या प्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्ह्याची नोंद केली असून, उपनिरीक्षक वराळ तपास करीत आहेत. दुसरी घटना नाशिकरोड परिसरात घडली. जयंत सदाशिव बुऱ्हाडे (रा. धनराजनगर, सायखेडा रोड) २७ जानेवारी रोजी सकाळी के. एन. केला हायस्कूलमध्ये गेले होते. प्रवेशद्वाराजवळ पार्क केलेली त्यांची हिरोहोंडा (एमएच १५/ बीव्ही ६८२५) चोरट्यांनी लंपास केली. नाशिकरोड पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली असून, हवालदार भोईर तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चौकशीअंती दोषींवर कारवाई

$
0
0

संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांचे आश्वासन; धर्मा पाटील यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

म. टा. वृत्तसेवा, धुळे

शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्याबाबत झालेली घटना दुर्दैवी असून, याप्रकरणी सर्वंकष चौकशी होऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी दिले.

केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी शनिवारी (दि. ३) सकाळी शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथे जाऊन मंत्रालयात न्याय मागण्यासाठी गेलेल्या शेतकरी धर्मा पाटील यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली होती, त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन केले.

औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी विखरण येथील धर्मा पाटील यांची जमीन संपादित करण्यात आली होती. या संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून त्यांनी मुंबई येथे मंत्रालयात विष प्राशन केले होते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी विखरण येथे जाऊन पाटील कुटुंबीयांचे सांत्वन केले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य कामराज निकम, तहसीलदार सुदाम महाजन यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

योग्य मोबदल्यासाठी प्रयत्नशील
औष्णिक वीज निर्मितीसाठी कोळसा आवश्यक असतो. मात्र, विकासाच्या दृष्टीने सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प सरकारने हाती घेतले आहेत. पाटील कुटुंबीयांच्या संपादित जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून आपण प्रयत्नशील राहू. सौरऊर्जा निर्मितीसाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली आहे व ज्या शेतकऱ्यांना जमीन उपलब्ध करून द्यावयाची असेल त्या सर्व शेतकऱ्यांना प्रकल्पग्रस्ताचा दाखला देऊन त्यांच्या पाल्यांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी पर्यटन मंत्री जयकुमार रावल व आपल्या पातळीवर प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांनी यावेळी बोलताना दिले. याशिवाय जमीन संपादित होणाऱ्या शेतकऱ्यांना २०१४ च्या नवीन भूसंपादन कायद्यानुसार वाढीव मोबदला दिला जाईल, असेही ते म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

महाराष्ट्रात जलव्यवस्थापनाची हत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

राज्यात असलेल्या ३४५२ धरणात ११८० टीएमसी पाणी साठले असताना केवळ जलव्यवस्थापनातील नियोजनाचा अभाव आणि त्यात प्रामुख्याने राजकीय हितसंबंध आड येत असल्यामुळेच राज्यातील शेती उजाड होत चालली आहे. नव्हे तर, महाराष्ट्राची वाटचाल ही वाळवंटीकरणाकडे सुरू आहे. आपल्या राज्यात जलव्यवस्थावनाच हत्या झाली आहे, असे परखड मत औरंगाबाद येथील शासकीय पाणी व्यवस्थापण क्षेत्र अर्थातच 'वाल्मी'चे निवृत्त अभियंता व जलतज्ज्ञ प्रदीप पुरंदरे यांनी येवल्यात बोलताना व्यक्त केले.

येथील समता प्रतिष्ठान शिक्षण संस्थेच्या तालुक्यातील शाळांच्या 'समता फेस्टिवल'चा एकत्रित समारोप समारंभ शहरातील महात्मा फुले नाट्यगृहात झाला. यावेळी 'पाणी वाचवा, पाणी आडवा, पाणी जिरवा' या विषयावर पुरंदरे बोलत होते. प्रसिद्ध लोककवी तथा 'बळीराजाच्या मुली-मुला' या संवाद अभियानाचे सक्रीय कार्यकर्ते अरुण म्हात्रे यांची कार्यक्रमास विशेष अतिथी म्हणून उपस्थिती होती. प्रारंभी पाणी या विषयावर पथनाट्य, नृत्यगीते आणि विविध गाणी सादर करून संस्थेच्या विविध विद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात रंगत आणली होती.

पुरंदरे म्हणाले, महाराष्ट्र असे एकमेव राज्य आहे की, येथे पाणी वापराबाबत कुठलेही नियम किंवा नियोजन नाही. महाराष्ट्रापुरता विचार केल्यास केल्यास उपलब्ध पाण्याचा वापर या दुष्काळग्रस्त राज्याने जितका घ्यायला हवा तितका प्रत्यक्षात घेतला जात नाही. पाण्यासारख्या नैसर्गिक आणि अनमोल संपत्तीचे नियोजन नसणे ही धक्कादायक व तितकीच क्लेषदायी बाब आहे. लोककवी अरुण म्हात्रे यांनी काही कविता सादर करून उपस्थित विद्यार्थ्यांना मंत्रमुग्ध केल. यावेळी माती आमदार मारुतीराव पवार, उद्योगपती अरुण गुजराथी, रायभान काळे, संचालक अंबादास बनकर, प्रा. प्रकाश देवरे, राजाराम पाटील कुशारे आदींची चर्चेत सहभाग घेतला.

प्रास्ताविक करतांना समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष अर्जुन कोकाटे यांनी केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ग्रामपंचायतींसाठीही आता ऑनलाइन पद्धतीने अर्ज

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

राज्यात ग्रामपंचायतींच्या होऊ घातलेल्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी ऑनलाइन पध्दतीनेच अर्ज स्वीकारा, असे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. ही ऑनलाइन प्रक्रीया राबविताना जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढणार आहे.

मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींसाठी तसेच काही ग्रामपंचायतींमधील रिक्त पदांसाठी २५ फेब्रुवारीला राज्यभर मतदान प्रक्रिया राबिवण्यात येणार आहे. १० फेब्रुवारी ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत असून, जिल्ह्यातील २७८ ग्रामपंचायतींमधील ४९३ रिक्त पदे या निवडणुकीच्या माध्यमातून भरली जाणार आहेत. परंतू यंदा उमेदवारी अर्ज ऑनलाइन पध्दतीनेच भरा, असे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. अर्ज भरण्याची आठवडाभरच मुदत असून, एवढ्या अल्पावधीत ही प्रक्रिया यशस्वीरित्या राबविता येणार का, याची चिंता जिल्हा प्रशासनाला सतावू लागली आहे. ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया क्लिष्ठ असून, त्यामध्ये बराचसा कालावधी खर्च होतो. ऑनलाइन अर्जाबाबतचे अज्ञान, ग्रामीण भागात नेटवर्कची समस्या यामुळे यापूर्वी ऑनलाइन अर्जप्रणालीत अडचणी आल्या आहेत. यंदा मात्र ही प्रक्रिया यशस्वीरित्या राबिवण्यासाठी प्रशासनाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कर्जमाफीतील गोंधळाचा कर्मचाऱ्यांकडून निषेध

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीबाबत सरकार स्तरावरच गोंधळाची परिस्थिती आहे. त्याचा विपरित परिणाम सहकार विभागातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांवर होत असल्याची कैफियत महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह डीपार्टमेंट ऑडिटर्स असोसिएशनने मांडली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांना शनिवारी याबाबतचे निवेदन देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची २०१७ मध्ये घोषणा करण्यात आली. मात्र, सरकार स्तरावर कर्जमाफीच्या धोरणांमध्ये सातत्याने बदल होत असून, सहकार विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. रोजच्या नवनवीन सूचना, अर्जंट माहिती पाठविण्यासाठीचे भरमसाट नमुने, तातडीच्या बैठकी, तसेच व्हिडीओ कॉन्फरन्स यामुळे कर्जमाफी योजनेचे काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. त्यांना रोज जीवघेण्या मानसिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या तीन महिन्यांत सहकार विभागातील दोन अधिकाऱ्यांना याच मानसिक त्रासामुळे जीव गमवावा लागला आहे. सरकारी धोरणातील विस्कळीतपणा आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांची अनावश्यक घाईगडबड कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. हा प्रकार धुळे, नंदुरबारमध्ये काही कर्मचाऱ्यांच्या जीवावर बेतला असून, त्यांनी शनिवारी सामूहिक काम बंद आंदोलनही केले. त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी नाशिकमध्ये सहकार विभागातील कर्मचाऱ्यांनी काळ्या फिती लावून काम केले. कर्मचाऱ्यांची व्यथा सरकारपर्यंत पोहोचवावी, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. या वेळी संघटनेचे नाशिक विभागीय अध्यक्ष एस. व्ही. कुंवर, नितीन जोशी आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरूणांसमोर क्रॉनिक कॅन्सरचे आव्हान!

$
0
0

नाशिक : काही वर्षांपासून क्रॉनिक (हळू वाढणारा) या ब्लड कॅन्सरच्या प्रमाणात झपाट्याने वाढ होते आहे. पूर्णत: बरा होऊ शकणारा ब्लड कॅन्सरचा हा प्रकार तरुणांसमोर आव्हान निर्माण करीत असून, तरुण पिढीने आपला आहार-विहार समतोल करणे आवश्यक झाले आहे.

गेल्या काही वर्षांत वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनामुळे दुर्धर आजारांवर रामबाण उपाय शोधून काढण्यात आले, तरीही कॅन्सर म्हंटले, की आजही आपले डोळे विस्फारले जातात. त्यात ब्लड कॅन्सर असेल तर पेशंटसह त्याच्या कुटुंबाची घालमेल वाढते. ब्लड कॅन्सरमध्ये दोन प्रकार असतात. एक असतो क्रॉनिक! या प्रकारात कॅन्सरचा फैलाव हळुवार होत असतो. यामुळे या कॅन्सरचे लवकर निदान होत नाही. दुसरा असतो तो झपाट्याने होणारा कॅन्सर. यात पेशंटसह त्यावर उपचार करणाऱ्या तज्ज्ञांना फारसा वेळ मिळत नाही. गेल्या काही वर्षांत क्रॉनिक कॅन्सरच्या पेशंटची संख्या झपाट्याने वाढते आहे. ही संख्या सर्वांसाठी धोक्याची घंटा असून, बदलत्या आहार-विहाराचा हा परिणाम ठरतो आहे. याबाबत बोलताना डॉ. प्रीतीश जुनागडे यांनी सांगितले, की क्रॉनिक कॅन्सर पूर्णत: बरा होऊ शकतो. मात्र, त्यासाठी त्याचे निदान होणे आवश्यक आहे. या कॅन्सरचा महत्त्वाचा गुणधर्म हा असतो, की तो खूप हळुवारपणे आपल्या रक्ताच्या माध्यमातून शरीरच कमकुवत करतो. दुर्दैवाने सध्या या पेशंटचे प्रमाण वाढते असून, अगदी लहान मुलांपासून वयस्कर लोकांनाही याची लागण होते.

बऱ्याच प्रकरणांमध्ये पेशंटला ब्लड कॅन्सरची लागण झाली आहे, हे अगदी शेवटच्या टप्प्यात समजते. वाढत्या लोकसंख्येचा विचार करता, अशा पेशंटची संख्या भविष्यात वाढण्याची शक्यता आहे. पूर्वी झपाट्याने होणाऱ्या कॅन्सरची लागण व्हायची. आता गुणसूत्रांमधील बदलांमुळे क्रॉनिक कॅन्सरची लागण अगदी सहजतेने होते आहे. कोणत्याही कॅन्सरची लागण होण्यासाठी आहार आणि जीवनशैली महत्त्वाची ठरते. ब्लड कॅन्सरही त्यास अपवाद नाही. कॅन्सरची लागण कोणत्याही सर्वसामान्य व्यक्तीला होऊ शकते. त्यात गुणसूत्रे महत्त्वाची असतात. अल्कोहोल, मांसाहार, उशिरा झोप अशा वेगवेगळ्या कारणांमुळे गुणसूत्रांवर परिणाम होतो आणि कॅन्सर होण्याचा धोका वाढतो, असे डॉ. जुनागडे यांनी स्पष्ट केले. सध्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उपचाराच्या पद्धती बदलत असून, भविष्यात फक्त एका रक्ताच्या साध्या टेस्टमधूनही एखाद्या व्यक्तीला कॅन्सरची लागण झाली आहे किंवा नाही, किंवा त्याचा प्रार्दुभाव किती प्रमाणात आहे, हे स्पष्ट होऊ शकेल.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

‘मुल्हेर’च्या संवर्धनासाठी श्रमदान; कुंडाचे मोजमाप

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेची ५६ वी गडकोट संवर्धन मोहीम किल्ले मुल्हेरवर झाली. ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाच्या अशा मुल्हेर किल्ल्यावरील भडंगनाथ मंदिर व जमिनीतील कुंडातील हनुमान मूर्तीच्या ठिकाणी गडसंवर्धकांनी श्रमदान केले. किल्ल्यावरील टाके, दरवाजे, कुंड, मंदिर यांचे मोजमाप, मॅपिंग, स्केच तयार करण्यात आले.

किल्ल्यावरील राम मंदिराची वास्तू पूर्ण ढासळली आहे. गणपती मंदिरातील पाण्याने भरलेले टाके, आजूबाजूला असलेल्या मूर्ती, पुढे सोमेश्वर महादेव मंदिर, प्राचीन कोरीव वास्तू आहेत. जंगल व जाळीतून मार्ग काढत मोरा व हरगड किल्ल्याच्या मधोमध असलेल्या किल्ले मुल्हेरवरील माथ्यावर कोरडे पडलेले जुने तळे, समोर द्वारे, भग्न जोते, वाडे, टेहळणी बुरूज, उतराईत किल्ल्याच्या कोरीव गुहा, त्यात शस्रागारे, हनुमंताच्या मुर्ती, घसरत्या वाटा, खाली उतराईला असलेल्या तोफा, एकूणच किल्ले मुल्हेर भरपूर अवशेष असलेला किल्ला आहे. वन विभागाने पर्यटकांसाठी बांधलेले गोल सिमेंटचे निवारा घुमट बांधण्यात आलेले आहेत. मुल्हेरसारख्या महत्त्वाच्या किल्ल्यावरील अनेक दरवाजे, भिंती, जुनी मंदिरे पडण्याच्या स्थितीत आहेत.

जिल्ह्यातील विविध किल्ले मोहिमेत आढळणारी एकूणच किल्ल्यांची दुरवस्था, असुरक्षितता व त्या कामी संवर्धनाचे प्रयत्न हे मुद्दे अभ्यासपूर्ण मांडण्यासाठी वन, पर्यटन, पुरातत्त्व विभागांची बैठक घ्यावी, यासाठी लेखी पत्र शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी बी. राधाकृष्णन यांच्याकडे देण्यात आले आहे. किल्ले मुल्हेर मोहिमेत शिवकार्य गडकोट संवर्धन संस्थेचे संस्थापक राम खुर्दळ, निमंत्रक प्रा. सोमनाथ मुठाळ, संयोजक योगेश कापसे आदी मुल्हेर मोहिमेत सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आठ दिवसांची मुदत

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

जिल्हा प्रशासनाचा सुमारे ७४ लाखांचा थकीत महसूल भरण्यासाठी मालेगाव महापालिकेने जिल्हाधिकाऱ्यांकडे आठ दिवसांची मुदत मागितली आहे. या मुदतीत थकीत महसूल जमा करा, असे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी शनिवारी मालेगाव महापालिकेच्या आयुक्तांना दिले.

मालेगाव महापालिकेच्या आयुक्त संगीता धायगुडे यांनी शनिवारी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेतली. मालेगाव शहरातील सर्वे नं. ५४४ व ५४८ या सरकारी मिळकतीची भाडेपट्टी थकविल्याप्रकरणी मंगळवारी महसूल प्रशासनाने महापालिकेची दोन वाहने जप्त केली. या कारवाईमुळे संतप्त झालेल्या महापालिका प्रशासनाने थकीत पाणीपट्टी व घरपट्टी करापोटी महसूल विभागाची कार्यालये सील केली. या दोन्ही कार्यालयांमध्ये जुंपल्याने प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर शनिवारी महापालिका आयुक्त धायगुडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर, उपजिल्हाधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे आदी उपस्थित होते. महसूलच्या कार्यालयांवर आकसापोटी कारवाई करण्यात आली नसल्याचे धायगुडे यांच्याकडून सांगण्यात आले. परंतु, ४५ हजारांहून अधिक थकबाकी असलेल्या अन्य किती सरकारी कार्यालयांवर आपण कारवाई केली याबाबत धायगुडे यांना विचारणा करण्यात आली. मात्र, त्याबाबत समाधानकारक उत्तर मिळू शकले नाही. मालेगाव महापालिकेकडे ८९ लाख रुपये महसूल येणे अपेक्षित असून, त्यापैकी १४ लाख ६० हजार रुपये महापालिकेने जमा केला आहे. उर्वरित महसूल जमा करण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

घरपट्टी, पाणीपट्टी मार्चपर्यंत भरणार

जिल्हा प्रशासनानेही एक लाख ५४ हजारांपैकी एक लाख ३४ हजार रुपये घरपट्टी व पाणीपट्टीपोटी भरले आहेत. उर्वरित २० हजार रुपये मार्चपर्यंत भरण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

महापालिकेकडे थकलेला महसूल : ८९ लाख

जमा केलेला महसूल : १४ लाख ६० हजार रुपये

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


निर्मोही आखाड्यात मोबाइल लंपास

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

तपोवनातील निर्मोही आखाड्यात आलेल्या दोन चोरट्यांनी चार मोबाइल लंपास केले. ही घटना २ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. या प्रकरणी आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी ललितकुमार सतीशप्रसाद दुवेदी (वय २८, भारत सेवाश्रम, तपोवन) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, तपोवनातील निर्मोही आखाड्यात भाविकांची दर्शनासाठी नेहमी वर्दळ असते. दोन फेब्रुवारी रोजी या ठिकाणी एमएच १५/एफएल २०७२ या वाहनावर आलेल्या दोघांनी दोन सॅमसंग आणि दोन लावा कंपनीचे असे एकूण चार मोबाइल लंपास केले. या प्रकरणी दोन जणांविरुद्ध आडगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीएसआय धनश्री पाटील तपास करीत आहेत.

सायबर कॅफे फोडले

दिंडोरी रोडवरील बाणगंगा सोसायटीतील गाळा क्रमांक ११ मधील साईकृष्ण सायबर कॅफे फोडून चोरट्यांनी ५२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना ३ फेब्रुवारीस पहाटेच्या सुमारास झाली. या प्रकरणी बाळकृष्ण पुंडलीक पवार (वय ५२, किशोर सूर्यवंशी मार्ग, म्हसरूळ) यांनी फिर्याद दिली आहे. चोरट्यांनी मध्यरात्री ते पहाटेच्या सुमारास दुकान फोडून आत प्रवेश केला. दुकानातील एक अॅसुस कंपनीचा सीपीयू, सीसीटीव्ही डीव्हीआर मशीन, सीसीटीव्ही कॅमेरा, रोख रक्कम, तसेच एचपी कंपनीचा एक लॅपटॉप असा मुद्देमाल लंपास केला. दुकान फोडल्याची घटना सकाळच्या सुमारास उघडकीस आली. या प्रकरणी म्हसरूळ पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला असून, पीएसआय व्होंडे तपास करीत आहेत.

कारच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

भरधाव कारने दिलेल्या धडकेत मोहन चंद्रभान कदम (वय २५, रा. भरविहीर बुद्रुक, ता. इगतपुरी) याचा मृत्यू झाला. ही घटना पाथर्डी- अंबड रोडवरील जनता स्वीट दुकानासमोर शनिवारी (दि. ३) पहाटे पावणेचारच्या सुमारास घडली. अंबड गावातील गोंधळाचा कार्यक्रम आटोपून मोहन भाऊ प्रवीण खंडेराव कदम (वय २८, रा. पाटीलनगर, त्रिमूर्ती चौक, सिडको) याच्या दुचाकीवर (एमएच १५/बीएफ ४०८५) घराकडे परतत असताना अपघात झाला. जनता स्वीटसमोर पाथर्डी फाट्याकडून भरधाव कारने (एमएच ०४/जीयू ५४३७) समोरून धडक दिली. यात दुचाकीस्वार मोहनच्या डोक्यासह इतर शरीरावर गंभीर दुखापत झाली. त्यातच त्याचा मृत्यू झाला. मोहनचा भाऊदेखील गंभीर जखमी झाला. या प्रकरणी प्रवीणच्या फिर्यादीनुसार, अंबड पोलिसांनी कारचालक राजेश रमेश खैरनार (वय ४६, रा. उत्तमनगर, एकता चौक, सिडको) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, संशयित कारचालकास पोलिसांनी अटक केली आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक खडके तपास करीत आहेत.

जुगार अड्ड्यांवर छापे

शहर पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सुरू असलेल्या चार जुगार अड्ड्यांवर छापे टाकले. या ठिकाणाहून रोकड, जुगाराचे साहित्य जप्त करण्यासह संशयितांना अटक करण्यात आली आहे. अंबड पोलिसांनी शुक्रवारी (दि. २) रात्री केलेल्या कारवाईत किरण संजय जाधव (वय २७, रा. हरिओम रो हाऊस ४, साईग्राम, अंबड) या संशयितासह आणखी सहा जणांना अटक केली. अंबड लिंक रोडवरील एन. एम. एंटरप्राइजेस या दुकानाच्या पत्र्याच्या शेडमध्ये संशयित पत्त्यावर जुगार खेळत होते. अंबड पोलिसांनी रात्री सव्वाअकराच्या सुमारास येथे कारवाई करून रोकड आणि जुगाराचे साहित्य असा २० हजार ७८० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी अंबड पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, हवालदार मल्ले तपास करीत आहेत. नाशिकरोड पोलिसांनी सामनगावरोडवरील एकलहरा गेट परिसरातील मोकळ्या जागेत मटका खेळणाऱ्या दोन जणांना शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास अटक केली. दीपक रामा धोत्रे आणि एकनाथ बाबूराव बोरोडे (दोघे रा. एकलहरा गेट, सामनगाव रोड) अशी मटका खेळणाऱ्या आरोपींची नावे आहेत. नाशिकरोड पोलिसांनी संशयितांविरोधात जुगार प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल केला असून, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक दळवी तपास करीत आहेत. दरम्यान, सातपूर पोलिसांनी कार्बन नाका, भाजी मार्केट, सातपूर या ठिकाणी शनिवारी दुपारच्या सुमारास कारवाई करीत संजय रामलाल बागूल (४५, द्वारकामाई अपार्टमेंट, धर्माजी कॉलनी, शिवाजीनगर, सातपूर) याला अटक केली. कल्याण नावाचा मटका खेळताना, तसेच खेळवताना बागूल पोलिसांच्या हाती लागला होता. पोलिस शिपाई कासार तपास करीत आहेत.

गावठी कट्टा बाळगणाऱ्या दोघांना अटक

गावठी कट्टा बाळगणाऱ्या चेतन आनंदा ठमके (वय १९, रा. नवजीवन डे स्कूल, त्रिमूर्ती चौक, सिडको) आणि पंकज विनोद आहेर (वय १८, रा. शिवशक्ती चौक, साईबाबा मंदिरासमोर, त्रिमूर्ती चौक, सिडको) या दोघांना सरकारवाडा पोलिसांनी अटक केली. व्ही. एन. नाईक कॉलेजच्या भिंतीजवळ शनिवारी दुपारी अडीचच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक भालेराव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सरकारवाडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक सारिका आहिरराव तपास करीत आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दुधाच्या एटीएमला प्रतिसाद

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या दुधाला कमी भाव मिळतो व ग्राहकांना जास्त दराने दूध विकत घ्यावे लागते. यावर उपाय म्हणून सिन्नर तालुका दूध उत्पादक संघाने शेतकरी ते ग्राहक थेट सेवा सुरू केली आहे. ग्राहकांना चांगल्या प्रतीचे दूध मिळावे यासाठी महाराष्ट्रात प्रथमच 'एनी टाइम मिल्क सेंटर' (ATM) सुरू करण्यात आले आहे. या एटीएमला अभूतपूर्व प्रतिसाद मिळत असून, विसेमळा परिसरात असलेल्या सेंटरमधून दररोज तीनशे लिटर दुधाची विक्री होत आहे.

हा उपक्रम महाराष्ट्रात पहिल्यांदाच नाशिक येथे सुरू झाला आहे. या सेंटरनंतर शहराच्या विविध भागांत दुधाची एटीएम सुरू होणार आहेत. शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव देणे व ग्राहकांना चागल्या प्रतिचे दूध उपलब्ध करून देणे या सेंटरचा उद्देश आहे. या सेंटरमधून घेतलेले दूध त्याच ठिकाणी तपासून घेण्याचीदेखील सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर टाळावा यासाठी हा संघ प्रयत्न करतो आहे. शेतकऱ्यांनी गोठ्यात आणलेले दुध दोन तासात या केंद्रा उपलब्ध होत आहे. गेल्या ५ वर्षापासून हा संघ संरक्षण खात्याला दुधाचा पुरवठा करीत आहे. ग्राहकांना एक कार्ड देण्यात आले आहे. त्या कार्डच्या आधारे ग्राहकांना हव्या तेवढ्या रकमेचे हवे तेवढे दूध उपलब्ध होत आहे. या ठिकाणी सायवाल जातीच्या गायीच्या दुधाचा भाव ८० रुपये लिटर, गायीच्या दुधाचा भाव ४५ रुपये लिटर तर म्हशीच्या दुधाचा भाव ६५ रुपये लिटर आहे.

५० सेंटर सुरू करणार

याप्रकारचे नाशिक शहरात ५० एटीम लवकरच सुरू करणार असल्याची माहिती दूध संघाचे चेअरमन माणिकराव कोकाटे यांनी दिली. प्रत्येक गावात दूध सहकारी संस्था स्थापन करून संगणकीकृत संकलन केंद्रातर्फे सुरू केले आहे. शेतकऱ्यांना दुधाला योग्य भावाची हमी मिळावी यासाठी संघ नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. या केंद्रात दुधाबरोबरच दुग्धजन्य पदार्थदेखील थोड्याच दिवसांत मिळणार आहेत. ज्यांनी एटीएम कार्ड काढले नसेल, अशांनादेखील या केंद्रात दूध मिळण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्याच प्रमाणे हे सेंटर २४ तास उघडे राहत असल्याने रात्री उशिरा घरी येणाऱ्यांची सोय झाली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

भुजबळ समर्थकांचा मार्चमध्ये मोर्चा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

माजी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर होत असलेल्या कथित अन्यायाच्या विरोधात मार्च महिन्यात मुंबई येथे भुजबळ समर्थकांचा मेळावा काढण्याचे निश्चित झाले आहे. विधीमंडळ अधिवेशन काळात हा मोर्चा काढला जाणार असून त्याची तारीख लवकरच निश्चित केली जाईल, अशी माहिती समता परिषदेचे प्रदेश कार्याध्यक्ष कृष्णकांत कुदळे यांनी जाहीर केले.

अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या राज्य कार्यकारीणीची रविवारी बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. तपोवन परिसरातील जयशंकर लॉन्स येथे झालेल्या बैठकीस संघटनेचे उपाध्यक्ष बापू भुजबळ, ओबीसी महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. कैलास कमोद, आमदार जयंत जाधव, दिलीप खैरे, मधुकर जेजुरकर आदींसह राज्यभरातील विविध पदाधिकारी उपस्थित होते.

कृष्णकांत कुदळे म्हणाले, की मुंबई जवळच्या जिल्ह्यातून मोठ्या संख्येने भुजबळ समर्थक मोर्चात कसे सामील होतील याची तयारी करायला हवी. विविध जिल्ह्यातील आजी-माजी खासदार, आमदार, पदाधिकारी यांची हाय पॉवर कमिटी तयार करण्यात येणार आहे.

आमदार जयंत जाधव म्हणाले, की आपली शक्ती संघटीत आहे. ज्या क्षणाला मोर्चाची तारीख कळेल तेव्हा निघता आले पाहिजे. विधीमंडळाच्या अधिवेशनाची सांगड घालून तारीख निश्चित करायची आहे. हा मोर्चा भुजबळ समर्थकांचा आहे. शिस्तबद्धपणे हा मोर्चा काढायचा आहे.

अन्याय झाल्यानंतर समाज एकसंघ होऊन पेटून उठतो हे अनेकदा बघायला मिळाले आहे. 'अन्याय पे चर्चा' हा नाशिकला सुरू झालेला उपक्रम राज्यातील इतरही जिल्ह्यांमध्ये राबविण्याची उपस्थितांनी तयारी दर्शविली. मुंबईला होणाऱ्या मोर्चासाठी राज्यभरात वातावरण निर्मिती करण्याचे काम करण्याचे काम केले जावे, अशा सूचना उपस्थितांनी मांडल्या. मोर्चाच्या तयारीसाठी अहोरात्र प्रयत्न करून पाच लाख भुजबळ समर्थकांसह विधानभवनावर मोर्चा घेऊन जाण्यासाठी तयारी करण्याची उपस्थितांनी शपथ घेतली.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एसटीला लाखोंचा फटका

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

तोट्यात चाललेल्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसला डिझेल दरवाढीमुळे जिल्ह्यात दररोज २ लाख ६४ हजार रुपयांचे नुकसान सहन करावे लागते. नाशिक जिल्ह्यात एसटीच्या ११०२ बस असून त्या रोज ३ लाख किलोमीटर धावतात. एका दिवसाला या बसला ६६ हजार लिटर डिझेल लागते. पण, गेल्या वर्षभरात डिझेलमध्ये झालेल्या भाववाढीमुळे सरासरी ४ रुपये खर्चाचा बोजा वाढला आहे. त्यामुळे एसटीला महिन्याला ७९ लाख २० हजाराचा फटका बसतो आहे. राज्यात हाच आकडा कोट्यवधींच्या घरात आहे. राज्यात एसटीच्या १७ हजार आसपास गाड्या रोज धावतात त्यांना १२ लाख लिटर लागते. त्यामुळे राज्यात एसटीला दररोज ४८ लाखांचे नुकसान होते.

वेगवेगळ्या कारणांनी एसटीचा तोटा वाढत असला तरी, त्यावर अद्याप उत्तर मिळाले नाही. हा तोटा भरण्यासाठी भाडेवाढ हा सरळ विषय एसटीसमोर आहे, मात्र त्यातून प्रवाशांच्या संख्येत घट होईल ही भीती आहे. त्यामुळे एसटीने गेल्या तीन वर्षांत भाडेवाढ केली नाही. पर्यायाने दरवर्षी डिझेल दरवाढीचा फटका एसटीला सहन करावा लागतो. तोट्यामुळे एसटीच्या सेवेवर त्याचा परिणाम होतो व त्यातून प्रवाशांनाच त्याचा त्रास सहन करावा लागतो.

जिल्ह्यात एसटीचे १३ आगार असून राज्यातील कानाकोपऱ्यात या डेपोतून बस धावतात. नाशिक महानगरात एसटीच्या सिटी बससुद्धा आहेत. त्यामुळे एसटीवर जिल्ह्यात डिझेलचा बोजा वाढला आहे. गेल्या काही महिन्यांत एसटीने कात टाकण्यास सुरुवात केली असून, शिवशाही बसने एसटीला उभारी दिली आहे. खासगी वाहतुकीशी सामना करीत महामंडळाने प्रवाशांना आकर्षित केले आहे. पण, तरीही इतर ठिकाणी सुरू असलेल्या बसमध्ये प्रवाशांची संख्या घटल्यामुळे त्याचा बोजाही वाढतो आहे. त्यामुळे डिझेल दरवाढीवर भविष्यात एसटीला तोटा भरून काढण्यासाठी मार्ग शोधावा लागणार आहे.

असा आहे एसटीचा खर्च

राज्यातील एसटीला वार्षिक कमाई ही ७०५६ कोटी आहे. त्यातून एकूण खर्च ७५७४ कोटी होतो. पगारावर ३१५७ कोटी, डिझेल खर्च २९६८ कोटी आहे. त्यामुळे एसटीला वार्षिक तोटा ५२८, तर संचित तोटा २३०० कोटी होतो. या सर्व खर्चात डिझेलच्या दरवाढीचा फटका आता वाढत आहे.

डिझेल दरवाढीमुळे मोठ्या प्रमाणात एसटीला मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यामुळे त्यातून काही मार्ग काढल्यास प्रवाशांना अधिक सुविधा देता येतील. जिल्ह्यात दररोज सरासरी २ लाख ६४ हजार रुपयांच्या आसपास हा जादा खर्च येतो.

- राजेंद्र जगताप, वाहतूक नियंत्रक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मेगाब्लॉकमुळे अनेक गाड्या रद्द

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

परेल आणि करीरोड येथे उड्डाण पुलाचे गर्डर लावण्याचे काम रविवारी (दि. ४) करावे लागल्याने मध्य रेल्वेच्या सर्व मार्गांवर रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात आला. मुंबईच्या लोकलसह नाशिकच्या पंचवटी, राज्यराणीसह काही गाड्या रद्द करण्यात आल्या.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई आणि दादरदरम्यान सर्व चार मार्गांवर विशेष ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक झाला. सकाळी साडेआठ ते सायंकाळी साडेचार असा आठ तासांचा हा ब्लॉक होता. सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेतीनदरम्यान अप फास्ट तर डाऊन स्लो मार्गावर सहा तासांसाठी ब्लॉक होता. या काळात लोकल सेवा बंद होती. सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी राज्यराणी एक्सप्रेस, सीएसएमटी-मनमाड-सीएसएमटी पंचवटी एक्सप्रेस, सीएसएमटी-नागपूर सेवाग्राम एक्सप्रेस रविवारी धावल्या नाहीत. सीएसएमटी मुंबई -हावडा एक्स्प्रेस ३.३५ वाजता निघाली. सीएसएमटी मुंबई - हावडा कोलकाता मेल ५ फेब्रुवारीला रात्री १२.१० वाजता सुटेल. ट्रेन क्रमांक ११०९३ सीएसएमटी मुंबई - वाराणसी महानगरी एक्स्प्रेस ५ फेब्रुवारीला १.१० वाजता सुटेल. मेगाब्लॉकमुळे नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या तसेच येणाऱ्यांना त्रास झाला. रविवार असल्यामुळे चाकरमान्यांची गर्दी कमी असते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कौटुंबिक जबाबदारीचे भान समाजातून मिळते

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

कौटुंबिक जबाबदारी पेलण्यासाठी आपण आरोग्यदायी हवे. आपण सक्षम असू तरच समाजातील वंचित घटकांना न्याय देता येऊ शकतो. कुटुंब आणि समाजातील वंचितांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी खांद्यावर घेताना स्ट्रेस येऊ शकतो. अशा वेळी आपल्या कुटुंबातील सदस्याकडे पाहा आणि कामाला लागा, असा सल्ला पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांनी पोलिस अधिकाऱ्यांना दिला.

पोलिस दलातर्फे सर्व पोलिस अधिकाऱ्यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे फोटो फ्रेम करून देण्याची सुरुवात शहर पोलिस आयुक्तालयाने केली असून, त्याच्या पहिल्याच कार्यक्रमादरम्यान पोलिस आयुक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कौटुंबिक पातळीवर मनुष्य समाधानी असेल तर तो पूर्ण क्षमतेने आपल्या कामाला न्याय देतो. विशेषत: आरोग्याच्या दृष्टिकोनातून ही बाब महत्त्वाची ठरते. पोलिसांना कौटुंबिक आणि सामाजिक पातळीवर काम करताना अनेकदा स्ट्रेसला सामोरे जावे लागते. त्यातून वेगवेगळ्या आणि तेवढ्याच जटिल समस्या निर्माण होतात. अशा वेळी आपल्या कुटुंबातील सदस्यांना समोर ठेवून विचार करा. त्यांचा आनंद, गरजा या तुमच्यापासून सुरू होतात. एक कुटुंब म्हणून तुम्ही जशी कुटुंबातील सदस्यांची काळजी घेता, तसेच तुमच्याकडे न्याय मागण्यासाठी आलेला व्यक्तीही कोणत्या तरी कुटुंबातील सदस्य असतो, याची जाणीव सदैव असू द्या, असे आवाहन पोलिस आयुक्तांनी केले. पोलिस अधिकाऱ्यांच्या कुटुंबातील सदस्यांचा वैयक्तिक फोटो काढून त्यांची फ्रेम तयार करून अधिकाऱ्यांना देण्यात येत आहे. सुमारे ४० अधिकाऱ्यांना फोटो फ्रेम्स देण्यात आल्या. पुढील टप्प्यात उर्वरित अधिकाऱ्यांना अशा फोटो फ्रेम्स देण्यात येणार आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

विद्यार्थिनींनी गिरवले निर्भयतेचे धडे

$
0
0

मसगा महाविद्यालयात निर्भय कन्या कार्यशाळा

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

येथील महाराजा सयाजीराव गायकवाड महाविद्यालय व पुणे विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने निर्भय कन्या अभियानांतर्गत कार्यशाळा झाली. यात कॉलेज विद्यार्थिनींनी आत्मरक्षणाचे धडे गिरवले. प्राचार्य डॉ. वाय. टी. पवार हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दामिनी पथकाच्या पोलिस उपनिरीक्षक पूनम राऊत व उपप्राचार्य बी. ए. अहिरे होते.

या कार्यशाळेत १०० युवतींनी सहभाग घेतला. प्रथम सत्रात कराटे प्रशिक्षक विनोद जाधव यांनी प्रात्यक्षिक दाखवून प्रशिक्षण दिले. अली अजगर यांनी १० मी. रायफल शूटिंगचे प्रात्यक्षिक करून घेतले. याबरोबर कमवा व शिका योजनेच्या विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक करून घेतले. युवतींमध्ये सर्वोत्कृष्ट रायफल शूटिंग प्राविण्य मिळवलेल्या सूचिता बच्छाव, अलकुमा कौसर व योगिता बच्छाव यांना मेडल देऊन सन्मानित करण्यात आले.

दुसऱ्या सत्रात सर्पमित्र नितीन सोनवणे यांनी वेगवेगळ्या सापांची माहिती दिली. विषारी, बिनविषारी सर्पांबद्दल मार्गदर्शन केले. कार्यक्रमाप्रसंगी प्राचार्य आरती महाजन, एस. बी. पाटील, डॉ. वसईत, प्राचार्य आव्हाढ, अकबर आदी उपस्थित होते. यू. व्ही. सूर्यवंशी यांनी सूत्रसंचालन केले.

दरम्यान, औषध निर्माणशास्त्र महाविद्यालयात निर्भय कन्या अभियानचे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. इंदिराताई हिरे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. पोलिस उपनिरीक्षक पूनम राउत, नितीन खैरनार, यांनी मार्गदर्शन केले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


चांदवड अभियांत्रिकेचे अभिनव पेटंट फाईल चांदवड अभियांत्रिकीच्या प्रकल्पाला पेटंट

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

अचानक भूस्खलन झाले तर जीवितहानी टाळता येऊ शकते व तातडीने मदत करून पीडितांचे प्राण वाचवणे शक्य होऊ शकते हे चांदवड येथील एसएनबीजे संस्थेच्या जैन महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी शोधून काढले आहे. या संशोधन प्रकल्पाचे पुणे विद्यापीठ पातळीवर कौतुक झाले असून, या प्रकल्पाचे पेटंटसुद्धा चांदवड महाविद्यालयातील या गुणवंताना मिळाले आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सर्वोत्कृष्ट महाविद्यालय ठरलेल्या चांदवडच्या श्री. नेमिनाथ जैन ब्रह्मर्याश्रम संचलित स्व. सौ. कांताबाई भवरलाल जैन अभियांत्रिकी महाविद्यालयाने विद्यापीठ पातळीवर संशोधनात आपल्या यशाचा ठसा उमटवला आहे. या महाविद्यालयातील स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे पहिले अभिनव विषयावरील प्रकल्पाचे पेटंट महाविद्यालयाने फाइल केले आहे. विद्यापीठ निर्धारीत अभ्यासक्रम पूर्ण करताना विद्यार्थीवर्गात रिसर्च अॅप्टिट्यूड रुजविण्यात महाविद्यालय यशस्वी झाल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांनी दिली.

शैक्षणिक वर्ष २०१७-१८ मध्ये स्थापत्य अभियांत्रिकी विभागाचे पहिले पेटंट फाइल झाल्याचे स्थापत्य विभागप्रमुख प्रा. वाय. एल. भिरुड यांनी सांगितले. स्थापत्य अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील विद्यार्थी मधुर गुजराथी, अंकिता चोभारकर, बबलू जगताप, समिक्षा घोगरे, प्रणाली हांडगे या विद्यार्थ्यांनी पुणे जिल्ह्यातील माळीण गावातील भूस्खलनसारख्या प्रकारावर उपाययोजना म्हणून 'स्लाइडिंग सेगमेंटल रिटेनिंग वॉल' या प्रकल्पाचे पेटंट फाइल केले आहे. तसेच हा प्रकल्प भूस्खलन झाल्यानंतर होणारी जीवितहानी टाळण्यासाठी उपयुक्त आहे. हे संशोधन प्रा. वाय. एल. भिरुड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यासाठी त्यांना प्रा. आर. एम. सोनार यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल संस्थेचे सहमानद सचिव व समन्वयक झुंबरलाल भंडारी, दिनेशकुमार लोढा, सुनीलकुमार चोपडा, प्राचार्य डॉ. एम. डी. कोकाटे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

संशोधनपर प्रकल्पामुळे पुणे विद्यापीठात महाविद्यालयाची मान उंचावली आहे. स्थापत्य अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या प्रकल्पाद्वारे पहिले पेटंट फाइल केले हे कौतुकास्पद व अभिनंदनीय आहे.

- अजित सुराणा, पदाधिकारी, एसएनजेबी चांदवड

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नगरसेवकाचे उपोषण मागे

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

मुख्याधिकाऱ्यांच्या लेखी आश्वासनानंतर सटाणा नगरपरिषदेचे भाजपचे नगरसेवक मुन्ना शेख यांनी तिसऱ्या दिवशी आपले बेमुदत उपोषण मागे घेतले. सटाण्याचे नगराध्यक्ष व मुख्याधिकारी यांच्या कार्यालयांच्या नूतनीकरणाच्या खर्चाची माहिती मिळत नसल्याच्या निषेधार्थ शेख उपोषणाला बसले होते.

समिती सभागृह, नगराध्यक्ष दालन, मुख्याधिकारी दालन नूतनीकरणाबाबतच्या माहिती अधिकारात केलेल्या मागणीबाबत ५ फेब्रुवारी २०१८ रोजी चार वाजेच्या अपील सुनावणीच्या वेळी आपणास माहिती उपलब्ध करून देण्यात येईल तसेच, जिल्हाधिकारी नाशिक यांच्याकडे केलेल्या तक्रारीअर्जाबाबतचा नगरपरिषद कार्यालयाकडील चौकशीचा संपूर्ण अहवाल जिल्हाधिकारी नाशिक यांच्या कार्यालयाकडे पाठविण्यात आला असल्याचे लेखी आश्वासन पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांनी शेख यांना दिल्याने त्यांनी बेमुदत उपोषण मागे घेतले.

यावेळी मुख्याधिकारी हेमलता डगळे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष डॉ. विलास बच्छाव, नगरसेवक दिनकर सोनवणे, व्यापारी आघाडीचे बिंदूशेठ शर्मा, नगरसेवक काका सोनवणे, राहुल पाटील, साहेबराव सोनवणे, फईम शेख, धर्माआबा सोनवणे, महेंद्र सोनवणे आदी उपस्थित होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

रंगीत कारंजाला अवकळा

$
0
0

देखभाल व्यवस्थित नसल्याने दुरवस्था; पर्यटकांचा हिरमोड

म. टा. वृत्तसेवा, पंचवटी

गोदाघाटाचे सौंदर्य खुलविण्यासाठी होळकर पूलावरून गोदापात्रात सोडण्यात आलेला रंगीत कारंजा सध्या आचके देत असल्याच्या स्थितीत दिसतोय. देखभाल आणि दुरुस्ती योग्य पद्धतीने होत नसल्यामुळे या पुलावरील कारंजे काही सुरू तर काही बंद अवस्थेत आहेत. त्यांच्यावरील रंगीत दिव्यांच्या झगमगाट मंदावला असून, कुठे तरी एखादाच रंगीत दिवा मिणमिणण्याचा प्रयत्न करीत असल्याचे चित्र या पूलावर दिसत असल्याने पर्यटकांचा हिरमोड झाला आहे.

सिंहस्थ कुंभमेळ्याच्या काळात गोदावरीचे सौंदर्य खुलविण्यासाठी बसविण्यात आलेल्या या कारंजामुळे होळकर पूलावरून पडणारे पाणी आणि त्यावर विविध रंगांच्या दिव्यांच्या पडणारा प्रकाश यांच्यामुळे कारंजासह गांधी तलावात त्याचे पडणारे प्रतिबिंब हे या भागातील आकर्षण ठरले होते.

पावसाळ्यात पूराच्या काळात या पूलावरील बसविण्यात आलेला हा कारंजा दुर्लक्षित झाला. त्यानंतर या कारंजासाठी गोदावरी पात्रात बसविण्यात आलेल्या जलपरींची दुरुस्ती करण्यात आली. ज्या पाईपमधून पाण्याचा प्रवाह कारंजाकडे जातो, ते पाइपही दुरुस्त करण्यात आले. गांधी तलावाच्या भागाकडे असलेली जलपरी दुरुस्त करण्यासाठी गांधीतलाव पूर्णपणे रिकामा करण्यात आला होता. तेथील जलपरी बसविण्यात आल्यानंतर हे कारंजे सुरू करण्यात आले.

पंचवटीकडील बाजूचे कारंजे सुरू झाले मात्र रविवार कारंजाकडील कारंजे अर्ध्याच भागात सुरू आहेत. त्यात ज्या भागात कारंजे सुरू होते, तेथे रंगीत दिवे बंद होते आणि ज्या भागात दिवे सुरू होते तेथे कारंजातून पाणी पडत नव्हते अशी स्थिती आहे. आज नाही तर उद्या हे कारंजे सुरळीत सुरू होतील, असे वाटत असताना सध्या कारंजातून पंचवटीकडील बाजूस अत्यंत वेगाने पाणी पडत आहे. तर रविवार कारंजाच्या बाजूचे कारंजे बंद पडले आहेत. त्यांची अवस्था अत्यंत बिकट झालेली दिसून येते. कुठला तरी एखादा दुसरा दिवा मिणमिण करीत असल्याचे दिसत असल्यामुळे सौंदर्य वाढविणारा हा कारंजा जणू काही शेवटचे आचके देत असल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जनतेच्या पैशातून उभारण्यात येणारे प्रकल्पांचा सुरवातीला मोठा गाजावाजा केला जातो. मात्र, असे प्रकल्पांच्या देखभाल आणि दुरुस्तीकडे कानाडोळा केला जात असल्यामुळे हे प्रकल्प बंद पडतात. होळकरपूलावरील रंगीत कारंजाचीही अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. कारंज्याची जबाबदारी ज्यांच्याकडे आहे त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी.

किशोरभाई पटेल, रहिवासी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गॅस ग्राहकांची आर्थिक पिळवणूक

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

घरगुती गॅस सिलिंडरची घरपोच देताना डिलीव्हरी बॉयकडून ग्राहकांची आर्थिक फसवणूक होत आहे. निर्धारित किमतीपेक्षा केवळ पोच देण्यासाठी प्रतिसिलिंडर तब्बल ३० ते ४० रुपये आकारले जात असल्याने ग्राहकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात पुरवठा विभाग ढिम्म असल्याचे चित्र आहे. या प्रकाराची दखल घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.

शहरात अनेक गॅस वितरक आहेत त्यांनी आपल्याकडील गॅस वितरणाची जबाबदारी मुलांकडे सोपवली आहे. या मुलांकडून पावतीच्या रकमेपेक्षा जास्त पैसे ग्राहकांकडून वसूल केले जात आहेत. सिडको, नाशिकरोडमध्ये हा प्रकार सर्रास सुरू असून, याबाबत वितरकांकडे तक्रार केली असता ठीक आहे, बघून घेतो अशी उत्तरे देऊन ग्राहकांची बोळवणूक केली जात आहे. सिडको येथील मयूर खैरनार यांनी वितरकांकडे तक्रार करतो असे डिलीव्हरी बॉयला सांगितले. आमचे कुणीही काहीही करू शकत नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, असे डिलिव्हरी बॉयकडून उत्तर देण्यात आले. यावर खैरनार यांनी आम्ही जास्त पैसे घेऊन डिलीव्हरी करतो, असे लिहून दे, असे डिलीव्हरीबॉयला सांगितले असता त्याने तसे लिहूनही दिले. पावतीपेक्षा जास्त पैसे न दिल्यास सिलिंडर परत नेण्याची धमकी दिली जात आहे. परिसरातील काही ग्राहकांनी पैसे दिले नाही तर त्यांचे सिलिंडर परस्पर विकल्याचे त्यांच्या लक्षात आले. डिलीव्हरी बॉयच्या या वर्तणुकीने अनेक ग्राहक त्रस्त असून, कंपनीचे अधिकारी व पुरवठा अधिकारी मात्र या प्रकरणावर हेतुपुरस्सर कानाडोळा करीत असल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे.

मी पावतीवर जेवढी रक्कम आहे तेवढी देण्यास तयार होतो; परंतु मला तेवढ्या रकमेवर सिलिंडर देण्यास डिलीव्हरी बॉयकडून नकार देण्यात आला. पावतीच्या तीस रुपये जास्त रक्कम देत असाल तरच सिलिंडर दिले जाईल, असे सांगण्यात आले. असाच प्रकार आमच्या संपूर्ण विभागात सुरू आहे.

- मयूरकुमार खैरनार, विनयनगर

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तरुणाची प्रेमप्रकणातून आत्महत्या

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सातपूर

मूळचा मालेगाव तालुक्यातील मोरदर टिप्पे येथील भरत तानाजी ठुमरे याने अशोकनगर भागातील रामेश्वर संकुलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. तो पुण्यात इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत होता. सातपूर पोलिसांनी भरतचे मोबाइल तपासल्यावर नेमके कारण उघडकीस आले. भरतचे तीन वर्षांपासून एका मुलीवर प्रेम होते. त्यांच्या विवाहाला कुटुंबीयांचीही परवानगी होती. मात्र, प्रेयसीनेच नकार दिल्याने भरतला नैराश्याने ग्रासले. नाशिकमध्ये मित्राच्या घरी त्याने आत्महत्या केली. मला प्रेयसीने धोका दिल्याचे भरतने मोबाइलवर पाठविलेल्या एका मेसेजमध्ये नमूद केलेले होते, असे पोलिसांनी सांगितले. हवालदार शेजवळ तपास करीत आहेत.

अपघातात एक जखमी

सिन्नर फाटा : नाशिक-पुणे महामार्गावर पळसे येथील फुलेनगर परिसरात रस्ता ओलांडताना भरधाव कारने धडक दिल्याने अर्जुन रमेश पवार (वय २५, रा. पळसे) याला गंभीर जखमी झाल्याची घटना नुकतीच घडली. अर्जुन दुचाकी (एमएच १७/जी ७५४१) महामार्गाच्या कडेला उभी करून पेट्रोल आणण्यासाठी महामार्ग ओलांडण्याचा प्रयत्न करीत होता. त्याच वेळी सिन्नरकडून नाशिकरोडच्या दिशेने भरधाव येणाऱ्या एमएच १२/एनजे ३५३० या क्रमांकाच्या कारने त्याला जोरात धडक दिली. अपघातानंतर कारचालकाने पोबारा केला. स्थानिक नागरिकांनी जखमी अर्जुनला पालिकेच्या बिटको रुग्णालयात व नंतर नाशिकच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी संबंधित कारचालकाविरुद्ध नाशिकरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images