नाशिकमधील नाट्यवर्तुळातील मान्यवरांची सुधाताईंना आदरांजली
म. टा. प्रतिनिधी, नाशिक
बालरंगभूमीसाठी जीवन समर्पित करणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुधा करमरकर यांचे सोमवारी निधन झाले. त्यांच्या जाण्याने बालरंगभूमीचा आधारवड हरपला, अशी प्रतिक्रिया नाशिकमधील नाट्यवर्तुळात उमटली.
करमरकर यांचा बालनाट्याशी घनिष्ठ संबंध होता. त्यांनी साहित्य संघाच्या सहकार्याने 'बालरंगभूमी-लिट्ल थिएटर' सुरू केले. बालनाट्य हे लहान मुलांच्या करमणुकीसाठी असून ते वास्तव असावे म्हणून सुधाताईंनी रत्नाकर मतकरी आणि इतरही काही नाटककारांकडून नाटके लिहून घेतली. ती शाळांच्या हॉलमध्येच नव्हे, तर व्यावसायिक नाट्यगृहांतही सादर केली. यांतून मुलांची भरपूर करमणूक तर झालीच पण मुलांचे नाटक कसे असावे, याचा धडा सुधाताईंनी संबंधितांना घालून दिला. अधिकचे नाट्यशिक्षण घेण्यासाठी सुधाताई अमेरिकेत गेल्या. त्यांनी 'बालरंगभूमी' संकल्पनेचा अभ्यास केला आणि तिथूनच त्यांनी भारतात परत गेल्यावर काय करायचे ते ठरवून टाकले.
शतकाहून अधिक वर्षाची परंपरा सांगणाऱ्या मराठी रंगभूमीला मुलांचे वावडेच होते. नानासाहेब शिरगोपीकर मुलांना घेऊन 'गोकुळचा चोर' नाटक करत असत. दामूअण्णा जोशीही मुलांना घेऊन नाटके करीत असत. अशा नाटकांचा उद्देश मुलांना सर्व भूमिका करायला मिळाव्यात एवढाच असे. झी वाहिनीने ३ मार्च २०१२ रोजी त्यांना जीवनगौरव पुरस्कार दिला. तसेच महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचलनालयाच्या वतीने देण्यात येणारा, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार (२१ फेब्रुवारी २०१२) रोजी बहाल करण्यात आला होता.
बालनाट्यांची संकल्पना बदलली
मुलांचे वेगळे भावविश्व असते, त्यांची वेगळी कल्पनासृष्टी असते, त्यांची मानसिकताही वेगळेच रंग प्रकट करणारी असते. या वेगळेपणाची भूक भागेल असे प्रौढ नाटकापेक्षा सर्वस्वी वेगळे असलेले नाटक मराठी रंगभूमीवर नव्हते. त्यामुळेच शाळेतल्या समारंभातही मुले दाढी, मिशा लावून किंवा कोट पॅन्ट घालून मोठ्यांचीच नाटके करीत असत. त्यांतील संवादांचा अर्थ मुलांना कळो ना कळो. संवाद हातवारे करून धडाधड म्हणायचे आणि आपापल्या भूमिका वठवायच्या, हेच त्यावेळचे बालनाट्य होते. या रुढ बालनाट्यामध्ये सुधाताईंनी अमूलाग्र बदल केले.
बालरंगभूमी पोरकी झाली
सुधाताईंनी महाराष्ट्रात बालरंगभूमीला वेगळा आयाम दिला. त्या लहान मुलांसाठी बालनाट्य शिबिरं भरवित असतं. मी शाळेत शिक्षिका असताना त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ मला मिळाला. कायम हसतमुख असायच्या. काही दिवसांपूर्वी सुलभा देशपांडे यांचे निधन झाले. आता सुधाताई गेल्या. त्यामुळे बालरंगभूमी पोरकी झाली आहे.
- सुषमा अभ्यंकर, बालनाट्य दिग्दर्शिका
...
त्यांच्या प्रयत्नांमुळेच बालनाट्य स्पर्धा
नाशिकच्या नाट्यसंमेलनाच्या वेळी त्यांना भेटण्याचा योग आला होता. यावेळी महाराष्ट्र सरकारतर्फे बालनाट्य स्पर्धा आयोजित कराव्या यासाठी त्यांनी त्यांच्या संस्थेतर्फे व मी आमच्या जिजाई थिएटरतर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते. नाना पाटेकर यांच्या देखील कानावर याबाबत काहीतरी करावे, असे सांगितले होते. त्यांच्या प्रयत्नानंतर बाल राज्यनाट्य स्पर्धा सुरू झाली. त्याचे बालनाट्याच्या क्षेत्रात काम अगाध आहे. त्यांची बरोबरी कुणीही करू शकत नाही.
- सिद्धार्थ आहिरे, जिजाई थिएटर
मुलांमध्ये नाट्याची गोडी
लहान मुलांना घेऊन त्यांच्यासाठी त्यांच्याकडून नाटक करवून घेणे हे सुधाताईंनीच प्रथम केले. गिरगाव, केळेवाडीत मुंबई मराठी साहित्य संघात मुलांना घेऊन त्यांनी बालनाट्य चळवळ उभी केली, ती सातत्याने चालू ठेवली. लिटील थिएटर या आपल्या संस्थेतर्फे त्यांनी अनेक बालनाट्ये सादर केली. मुलांमध्ये नाटक करण्याची तसेच नाटक पहाण्याची गोडी निर्माण केली. बालनाट्य म्हणजे सुधा करमरकर असं समीकरणच तयार झालं होतं. त्यांचं जाणं माझ्या मनाला चटका लावणारं आहे.
- रवींद्र ढवळे, नाट्य दिग्दर्शक
अभ्यासू व्यक्तिमत्व
शाळेत असताना त्यांनी मला भेटायला बोलावले होते. आम्ही एकवर्षी 'इंद्राचं आसन, नारदाची शेंडी' हे नाटक करत होतो. त्यात मी नारदाची भूमिका करायचो. प्रयोगानिमित्त त्या नाशिकला आल्या असताना त्यांनी मला बोलवून घेतले होते. या नाटकाविषयी चांगली चर्चा झाली. अत्यंत विनम्र, अभ्यासू व्यक्तिमत्व होतो. त्यांच्या वागण्या बोलण्यात कधीही अहंभाव आला नाही. हा आपल्या पेक्षा लहान आहे म्हणून त्यांनी कुणाला हिणवले नाही.
- मुकुंद कुलकर्णी, नाट्य दिग्दर्शक
दिग्दर्शिकेसह कलावंतही
पूर्वी लहान लहान मुलांसाठी वेगळी नाटके नव्हती. ही बाब सुधाताईंनी हेरली आणि बालरंगभूमीचा अभ्यास केला आणि बालनाट्य चळवळीला त्यांनी वेगळे वळण दिले. सुधाताईंनी मुंबईत आपल्या वडिलांच्या साहित्य संघ या नाट्यसंस्थेच्या साह्याने 'मधुमंजिरी' हे मराठी रंगभूमीवरील खरेखुरे पहिले बालनाट्य सादर केले. रत्नाकर मतकरी यांनी ते लिहिले होते. सुधाताईं या नाटकाच्या केवळ दिग्दर्शिकाच नव्हत्या तर त्या नाटकात त्यांनी चेटकिणीची अफलातून भूमिकाही केली होती.
- जयंत जातेगावकर, नाट्य व्यवस्थापक
दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी
खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात बाल नाट्य चळवळ रुजविणारे व्यक्तीमत्व म्हणजे सुधाताई! स्वतंत्र बाल रंगभूमी निर्माण करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि निर्मिती अशा सर्वच क्षेत्रात त्यांनी बाल रंगभूमीसाठी कार्य केलं आहे. त्यामुळे त्यांचं योगदान हे चिरकाळ टिकणारं आहे. अलिकडच्या काळात त्या सक्रिय नव्हत्या. परंतु, त्यांनी केलेले काम आजही सर्वांना दीपस्तंभाप्रमाणे प्रेरणादायी असेच आहे.
- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष,
अभामना परिषद, नाशिक शाखा
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट