विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर व मध्य महाराष्ट्रात पुढील तीन दिवस तुरळक पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता पिकांचे नुकसान टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वातावरणात सातत्याने चढ-उतार अनुभवास येत आहेत. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरणही पाहावयास मिळत आहे. त्यामुळेच भारतीय हवामान विभागाने तुरळक पावसाची शक्यता वर्तविली आहे. नाशिकमध्ये ७ फेब्रुवारी रोजी किमान तापमान १५ डिग्री सेल्सिअस एवढे नोंदविले गेले. हेच तापमान पुढील दोन दिवसांत म्हणजेच ९ फेब्रुवारी रोजी ९.४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली उतरले. कमाल तापमानही २८.३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले. त्यामुळे नाशिककरांना कधी उकाडा, तर कधी गारठ्याचा सामना करावा लागत आहे.
गारपिटीची शक्यता नाही!
राज्यातील सर्वांत कमी ११.७ अंश सेल्सिअस तापमान नाशिकमध्ये शनिवारी नोंदविले गेले. वातावरणात सातत्याने होणाऱ्या चढ-उतारांमुळे १० ते १३ फेब्रुवारी या कालावधीत मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. पावसाच्या हलक्या सरी कोसळणार असल्या तरी गारपीट होणार नाही, असा अंदाज हवामान अभ्यासक किरणकुमार जोहरे यांनी व्यक्त केला आहे. पावसामुळे होणारे द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला पिकांचे नुकसान टाळण्यासाठी अनावश्यक औषध फवारणी टाळावी. द्राक्षघड, डाळिंब झाकण्यासाठी पेपरचा वापर करावा, असे आवाहनही जोहरे यांनी केले आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट