म. टा. वृत्तसेवा, मालेगाव
राज्यातील शेतकरी अडचणीत आहे ही वस्तुस्थिती आहे. सरकारने शेतकऱ्यांना अडचणीतून काढण्यासाठी ऐतिहासिक कर्जमाफी केली असली तरी शेतकरी समाधानी नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सरकारकडून अपेक्षा आहेत. मी सत्तेत असो अथवा नसो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडणार. त्यासाठी सरकारला जाब विचारणार. सार्वजनिक हिताच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणे म्हणजे विरोध नव्हे, असे प्रतिपादन माजी महसूलमंत्री व भाजप नेते एकनाथ खडसे यांनी केले.
येथील भायगाव रोडवरील राजीव गांधी तंत्रशिक्षण स्कूल येथे आयोजित शेतकरी मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. काँग्रेसचे प्रांतिक सदस्य प्रसाद हिरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी मामको बँकचे हरिलाल अस्मर हे होते. भाजपनेते माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे व ज्येष्ठ साहित्यिक उत्तम कांबळे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर प्रसाद हिरे, इंदिराताई हिरे, आमदार सुधीर तांबे, डॉ. तुषार शेवाळे, दीपक पवार, राजेंद्र भोसले, हेमलता पाटील, अमृता पवार, प्रतिभा सूर्यवंशी, शांताराम लाठर, माणिकराव बोरस्ते, देवराज गरुड आदींसह सर्वपक्षीय पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. या शेतकरी मेळाव्यात प्रसाद हिरे यांच्या जीवनावर आधारित श्रीकांत वाघ यांनी संपादित केलेले 'सर्वसामन्यांचे बापू' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले.
खडसे यांनी प्रसाद हिरे यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत हिरे घराण्याविषयी असलेल्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना त्यांनी उत्तर महाराष्ट्राचा विकासाचा अनुशेष गेल्या ७० वर्षांत देखील भरून निघालेला नाही, अशी खंत बोलून दाखवली. खडसे म्हणाले की, शासनाने हजारो कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी दिली. शेतकरी कर्जमुक्त झाला पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका आहे. असे असले तरी शेतकरी समाधानी नाही. शेतकऱ्यांच्या समस्या संपलेल्या नाहीत. त्यासाठी पाण्याची उपलब्धता व रखडलेले सिंचन प्रकल्प मार्गी लागले पाहिजेत. शेतीकरिता पाणीच्या पाण्यासाठी संघर्ष करण्यासाठी राजकीय जोडे बाजूला ठेवून एकत्र आल्याशिवाय पर्याय नाही. हा संघर्ष करण्यासाठी मी पुढे राहणार आहे. अधिवेशन काळात शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सरकारला जाब विचारणार असल्याची ग्वाही खडसे यांनी दिली. पश्चिम वाहिनी नद्याचे पाणी नार-पारच्या माध्यमातून गिरणा-मोसम खोऱ्यात वळविण्याची गरज आहे. तरच या भागातील पाणी प्रश्न कायमचा सुटेल असेदेखील त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांना संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतमालास योग्य भाव, पिक विम्याचे संरक्षण, सिंचनासाठी पाणी आणि शाश्वत शेतीचा पर्याय स्वीकारणे आवश्यक असल्याचे खडसे यांनी नमूद केले. शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी केवळ सरकारने नव्हे तर सर्वांनी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. दादा भुसे म्हणाले, शेतकरी अडचणीत सापडला आहे ही वस्तुस्थिती आहे. मात्र हा प्रश्न केवळ मागील तीन वर्षात निर्माण झाला नसून, गेल्या काही वर्षातील शासकीय धोरणांमुळे शेतकऱ्यांवर ही परिस्थिती ओढवली आहे. सरकारने ऐतिहासिक कर्जमाफी दिली असली तरी शिवसैनिक म्हणून सरसकट कर्जमाफीची मागणी आम्ही लावून धरली आहे. उत्तम कांबळे यांनी शेतकऱ्यांची व्यथा या विषयावरील व्याख्यानात शेतकऱ्यांच्या आत्महत्या, विज्ञान व तंत्रज्ञाचा शेतीतील वापर आदींविषयी आपले विचार व्यक्त केले.
नाथाभाऊ तुम्हीही दावेदार आहात...
खडसे यांनी गेल्या ७० वर्षांत उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळाले नाही अशी खंत बोलून दाखविली. भाऊसाहेब हिरे, प्रतिभा पाटील, मधुकर चौधरी, बाळासाहेब थोरात, रोहिदास पाटील अशा अनेकांची पात्रता असतांना देखील उत्तर महाराष्ट्राला मुख्यमंत्रीपद मिळवू शकले नाही, असे ते म्हणताच व्यासपीठावरून व श्रोत्यांमधून 'नाथाभाऊ आपण देखील मुख्यमंत्र्यांच्या रेसमध्ये आहेत' असे उत्स्फूर्तपणे बोलून दाखवले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट