म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर
तालुक्यातील भोकरपाडा (राजेवाडी) येथील अल्पवयीन बलात्कार प्रकरणी संशयित दिनकर शिवा येले यास पोलिसांनी ताब्यात घेत गुरुवारी नाशिक येथील न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे करण्यात आले. जातपंचायतीचा आधार घेत पाच एकर जमिनीच्या बदल्यात अल्पवयीन मुलीच्या आयुष्याचा सौदा करणारे हे प्रकरण संबंधित यंत्रणेने अजूनही अपेक्षित अशा गांभिर्याने घेतलेले दिसून येत नाही.
अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो, त्यानंतर तिच्या आईवडिलांना जात पंचायतीत बोलावून करारनामा केला जातो. पाच एकर जमीन साठेखताने दिली जाते, नंतर वाद निर्माण करून पीडितेच्या कुटुंबास जातीतून वाळीत टाकले जाते. हा सर्व घटनाक्रम अत्यंत गंभीर आहे मात्र त्याचे गांभिर्य अद्याप शासन यंत्रणा अथवा लाकप्रतिनिधींना आलेले नाही. या प्रकरणी त्र्यंबक पोलिस ठाण्यात केवळ बलात्काराची कलमे लावून संशयित आरोपीस अटक झाली. परंतु, या प्रकरणाचे साक्षीदार खुलेआम तडजोडी करीत फिरत आहेत. संशयिताचे वडील हे माजी उपसरपंच आहेत. आरोपीने आपण बळजबरी केली असे स्टॅम्पपेपरवर नोटरी करून लिहून दिले आहे. सोबत दोन्ही कुटुंबांचा आप समजूत करारनामा आणि पाच एकर जमिनीचे साठेखत असे तीन नोटरी केलेले स्वतंत्र स्टँम्पपेपर असून त्यावर पंचांनी सह्या केलेल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतेक स्वाक्षऱ्या इंग्रजीत आहेत.
भोकरपाडा (राजेवाडी) येथे बहिष्कृत केलेल्या घरास भेट दिली असता कौलारू झोपडीवजा घराबाहेर एक वृद्ध बसलेले होते. पीडित मुलगी आणि तिचे आई-वडील पोलिस ठाण्यातून घरी परतल्याने शेतात लपून बसलेली भेदरलेली त्यांची मुले-मुली परतली. आजूबाजूच्या घराच्या ओसरीवर महिला पुरूष होते; मात्र कोणीही त्यांच्याशी बोलले नाही. 'अशा प्रकारे कोणाला वाळीत टाकतात का?' असा प्रश्न परिसरातील एका व्यक्तीला केला असता त्याने होय असे उत्तर दिले. त्यात त्याला काहीही वावगे वाटले नाही.
बहिष्कृत कुटुंबाला न्याय मिळेल का?
आपल्याला वाळीत टाकणाऱ्यांना शिक्षा होणार नाही का? असा प्रश्न या कुटुंबाने उपस्थित केला आहे. पीडितेने सातवीत असताना शिक्षण सोडले आहे. तिला एक-दोन वर्षांनी मोठी बहीण आणि दोन लहान बहिणी व एक भाऊ आहे. घडलेल्या घटनेचा पीडितेसह तिच्या कुटुंबावर परिणाम झाला आहे. पीडितेचे वडील २७ व्यक्तींच्या नावांची यादी घेऊन फिरत आहे; मात्र त्यांना दाद मिळालेली नाही.
जातीच्या पंचांनाही सहआरोपी करावे
पीडितेच्या कुटुंबास बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीच्या पंचांनाही सहआरोपी करावे, त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. त्यांनी त्र्यंबक पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवीकांत सोनवणे यांची भेट घेतली. जातपंचायतीस मुठमाती देण्याची गरज असताना झालेले गैरकृत्य झाकण्यासाठी अशा प्रकारे पीडितेच्या कुटुंबास वाळीत टाकण्याची घटना निंदनीय असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.
न्यायासाठी उपाशीपोटी खेटा
जागतिक महिला दिन गुरूवारी सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना एक महिला, तिच्या लेकीच्या आणि कुटुंबावर झालेल्या अन्यायासाठी सकाळपासून उपजिल्हा रुग्णालय आणि पोलिस ठाण्याच्या आवारात उपाशीपोटी बसलेली होती. मात्र, त्यांच्याकडे बघायलाही कोणाकडे वेळ नसल्याचे विदारक दृश्य दिसून आले.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट