Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

जातीचे पंच मोकाटच!

$
0
0

बलात्कारप्रकरणी संशयित ताब्यात; प्रशासकीय यंत्रणा गंभीर नाही

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

तालुक्यातील भोकरपाडा (राजेवाडी) येथील अल्पवयीन बलात्कार प्रकरणी संशयित दिनकर शिवा येले यास पोलिसांनी ताब्यात घेत गुरुवारी नाशिक येथील न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे उभे करण्यात आले. जातपंचायतीचा आधार घेत पाच एकर जमिनीच्या बदल्यात अल्पवयीन मुलीच्या आयुष्याचा सौदा करणारे हे प्रकरण संबंधित यंत्रणेने अजूनही अपेक्षित अशा गांभिर्याने घेतलेले दिसून येत नाही.

अल्पवयीन मुलीवर बलात्कार होतो, त्यानंतर तिच्या आईवडिलांना जात पंचायतीत बोलावून करारनामा केला जातो. पाच एकर जमीन साठेखताने दिली जाते, नंतर वाद निर्माण करून पीडितेच्या कुटुंबास जातीतून वाळीत टाकले जाते. हा सर्व घटनाक्रम अत्यंत गंभीर आहे मात्र त्याचे गांभिर्य अद्याप शासन यंत्रणा अथवा लाकप्रतिनिधींना आलेले नाही. या प्रकरणी त्र्यंबक पोलिस ठाण्यात केवळ बलात्काराची कलमे लावून संशयित आरोपीस अटक झाली. परंतु, या प्रकरणाचे साक्षीदार खुलेआम तडजोडी करीत फिरत आहेत. संशयिताचे वडील हे माजी उपसरपंच आहेत. आरोपीने आपण बळजबरी केली असे स्टॅम्पपेपरवर नोटरी करून लिहून दिले आहे. सोबत दोन्ही कुटुंबांचा आप समजूत करारनामा आणि पाच एकर जमिनीचे साठेखत असे तीन नोटरी केलेले स्वतंत्र स्टँम्पपेपर असून त्यावर पंचांनी सह्या केलेल्या आहेत. विशेष म्हणजे यातील बहुतेक स्वाक्षऱ्या इंग्रजीत आहेत.

भोकरपाडा (राजेवाडी) येथे बहिष्कृत केलेल्या घरास भेट दिली असता कौलारू झोपडीवजा घराबाहेर एक वृद्ध बसलेले होते. पीडित मुलगी आणि तिचे आई-वडील पोलिस ठाण्यातून घरी परतल्याने शेतात लपून बसलेली भेदरलेली त्यांची मुले-मुली परतली. आजूबाजूच्या घराच्या ओसरीवर महिला पुरूष होते; मात्र कोणीही त्यांच्याशी बोलले नाही. 'अशा प्रकारे कोणाला वाळीत टाकतात का?' असा प्रश्न परिसरातील एका व्यक्तीला केला असता त्याने होय असे उत्तर दिले. त्यात त्याला काहीही वावगे वाटले नाही.

बहिष्कृत कुटुंबाला न्याय मिळेल का?

आपल्याला वाळीत टाकणाऱ्यांना शिक्षा होणार नाही का? असा प्रश्न या कुटुंबाने उपस्थित केला आहे. पीडितेने सातवीत असताना शिक्षण सोडले आहे. तिला एक-दोन वर्षांनी मोठी बहीण आणि दोन लहान बहिणी व एक भाऊ आहे. घडलेल्या घटनेचा पीडितेसह तिच्या कुटुंबावर परिणाम झाला आहे. पीडितेचे वडील २७ व्यक्तींच्या नावांची यादी घेऊन फिरत आहे; मात्र त्यांना दाद मिळालेली नाही.

जातीच्या पंचांनाही सहआरोपी करावे

पीडितेच्या कुटुंबास बहिष्कृत करणाऱ्या जातपंचायतीच्या पंचांनाही सहआरोपी करावे, त्यांना तात्काळ अटक करावी, अशी मागणी अंधश्रद्धा निमूर्लन समितीचे कृष्णा चांदगुडे यांनी केली आहे. त्यांनी त्र्यंबक पोलिस ठाण्याचे निरीक्षक रवीकांत सोनवणे यांची भेट घेतली. जातपंचायतीस मुठमाती देण्याची गरज असताना झालेले गैरकृत्य झाकण्यासाठी अशा प्रकारे पीडितेच्या कुटुंबास वाळीत टाकण्याची घटना निंदनीय असल्याचे चांदगुडे यांनी सांगितले.

न्यायासाठी उपाशीपोटी खेटा

जागतिक महिला दिन गुरूवारी सर्वत्र जल्लोषात साजरा होत असताना एक महिला, तिच्या लेकीच्या आणि कुटुंबावर झालेल्या अन्यायासाठी सकाळपासून उपजिल्हा रुग्णालय आणि पोलिस ठाण्याच्या आवारात उपाशीपोटी बसलेली होती. मात्र, त्यांच्याकडे बघायलाही कोणाकडे वेळ नसल्याचे विदारक दृश्य दिसून आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


सुविधा भरपूर, वापरणाऱ्यांची कमतरता!

$
0
0


arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : नाशिक शहर पोलिसांनी जवळपास २३ वेगवेगळ्या सुविधा www.mhpolice.maharashtra.gov.in या सिटिझन पोर्टलवर उपलब्ध करून दिल्या आहेत. राज्यात अशा सुविधा पुरविणारी फक्त सहा कार्यालये असून, त्यात नाशिक ग्रामीण तसेच शहर पोलिसांचा समावेश होतो. अपेक्षापेक्षा जास्त सुविधा ऑनलाइन असल्या तरी त्यांचा वापर करणाऱ्यांची संख्या अत्यल्पच आहे. वापरकर्त्यांची संख्या वाढल्यानंतरच खऱ्या अर्थाने या सुविधा उपयोगी पडू शकतात.

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात www.mhpolice.maharashtra.gov.in या सिटिझन पोर्टलचा शुभारंभ झाला. यात दाखल गुन्ह्यांची माहिती (एफआयआर), अटक झालेल्या व्यक्ती, हरवलेले लोक, अनोळखी मृतदेहांची माहिती, फरार आरोपींची माहिती, विविध अॅप्लिकेशन फॉर्म, गुन्ह्यांची आकडेवारी, मोबाइल चोरी, नोंदणी केलेल्या व्यक्तींना ई-तक्रार देण्याची सुविधा, ई-तक्रारीची सद्य:स्थिती, भाडेकरूची माहिती देणे, चरित्र प्रमाणपत्राचे आवेदन अशा सुविधा यात पुरविण्यात आल्या आहेत. यामुळे नागरिकांना दिलासा मिळू शकतो. एखादी तक्रार नोंदविण्यासाठी थेट पोलिस स्टेशनला चकरा मारणाऱ्यांची संख्या यामुळे कमी होऊ शकते. मात्र, याबाबत जनजागृती खूपच कमी असून, आजही नागरिक प्रत्यक्ष पोलिस स्टेशन अथवा संबंधीत विभागात जाण्यास प्राधान्य देतात. पोलिसांच्या म्हणण्यानुसार मागील वर्षी जवळपास ४०० नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने लाउडस्पीकरची मंजुरी घेतली. ७०० नागरिकांनी चरित्र पडताळणीचे काम याद्वारे केले. मागील वर्षातच शहर पोलिसांनी एम-पासपोर्ट हे अॅप्लिकेशनदेखील सुरू केले. याद्वारे अर्जदारास पोलिस स्टेशन अथवा संबंधीत विभागात चकरा माराव्या लागत नाहीत. यासाठी संबंधीत पोलिस कर्मचाऱ्यांना टॅब्लेट्स पुरवण्यात आले आहेत. ई-तक्रारीची सेवा सुरू झाल्यापासून पोलिसांकडे १६७ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. ई-तक्रारी आल्यानंतर पोलिस सर्वप्रथम तक्रारींची चौकशी करतात. यात तथ्य आढळून आल्यास पुढे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात येऊ शकते. १६७ पैकी जवळपास ५० तक्रारी निकाली काढण्यात आल्या असून, ५७ तक्रारींची चौकशी सुरू आहे. यातील दोन तक्रारींमध्ये आढळून आलेल्या तथ्यांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, तर पाच तक्रारी इतर ठिकाणच्या पोलिसांकडे वर्ग करण्यात आल्या आहेत. याबाबत पोलिस सूत्रांनी सांगितले की, वेबपोर्टलवरील सुविधा खरोखर नागरिकांचा त्रास वाचवू शकतात. पण अनेकदा समोरासमोर काम केल्याचे समाधान नागरिक शोधत असतात. किंवा तांत्रिक अडचणींमुळेही नागरिक अशा सुविधांकडे पाठ फिरवतात.

जनजागृतीचा अभाव

पोलिसांनी उपलब्ध करुन दिलेल्या ऑनलाइन सेवांबाबत जनजागृती नसल्याचे दिसून येते. त्यामुळेच त्यास प्रतिसाद नाही. शहर आणि ग्रामीण पोलिसांनी जनजागृतीची मोठी मोहीम ऑनलाइन आणि सोशल मीडियात राबविण्याची गरज आहे. पोलिस स्टेशनमध्येही यासंबंधीची जाहिरात करणे आवश्यक आहे. पोलिस स्टेशन स्तरावर जनजागृती कार्यशाळा घेतल्यास त्याचाही फायदा होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांनी ऑनलाइन सेवांचा प्रचार-प्रसार करण्याची गरज नाशिककरांकडून व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्त चौकातील ५० शेड जमीनदोस्त

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

सिडको परिसरात सुरू असलेल्या अतिक्रमण निर्मूलन मोहिमेत गुरुवारी दत्त चौकातील मटण मार्केट परिसरात असलेल्या दुकानांलगत असलेल्या ५० शेडचे अतिक्रमण काढण्यात आले. सध्या महानगरपालिकेकडून ऑनलाइन येणाऱ्या तक्रारींबरोबरच इतरही अतिक्रमणे काढण्याची तयारी सुरू आहे.

सिडको परिसरात मागील आठवड्यापासून अतिक्रमण हटविण्याची धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्रिमूर्ती चौक, पवननगर, उत्तमनगर या परिसरातील अतिक्रमण काढल्यानंतर सिडकोतील कामटवाडे शिवारातीलही पक्के ओटे काढण्यात आले. दत्तचौकातील भाजी मार्केट व मटण मार्केटचे अतिक्रमण काढण्यास पथकाने सुरुवात केली. या ठिकाणी विक्रेत्यांनी दुकानांबरोबरच दुकानांच्या समोरही पत्र्याचे शेड किंवा टपऱ्या उभ्या करून व्यवसाय सुरू केले होते. दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या अतिक्रमणावर पालिकेने हातोडा घातला. दत्तचौक हा भाग अत्यंत गजबजलेला असून याठिकाणी असलेल्या मटण दुकानांच्या अतिक्रमणामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत होता. गुरुवारी सुमारे पन्नास दुकानांसमोरील शेड पालिकेने तोडले. येथे काही प्रमाणात विरोध झाला, मात्र त्याला न जुमानता संपूर्ण अतिक्रमण हटविण्यात आल्याने दत्तचौक परिसराने मोकळा श्वास घेतला आहे.

पक्के बांधकाम काढण्याची चर्चा

पालिकेकडून लवकरच सिडकोतील पक्के अतिक्रमणसुद्धा पाडण्यात येणार असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे. सिडको कार्यालयात कार्यरत असलेल्या अनेक कर्मचाऱ्यांनी पूर्वी नागरिकांना हव्या तशा बांधकाम परवानग्या दिल्याने मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण आहे. सध्या मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण काढले जात असले तरी लवकरच गल्लीबोळांमधील पक्की बांधकामेसुद्धा पाडण्यात येणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दोन मुलांचा बुडून मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, सटाणा

बागलाण तालुक्यातील वटार येथील दोन बालकांचा पाझर तलावात बुडून करुण अंत झाल्याची घटना गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास घडली. वटार येथील कविता सुरेश सोनवणे(वय १४) व दत्तू छोटू पवार (१२) ही मुले सकाळी विंचुरे शिवारात शेळ्या चारण्यासाठी गेले होते. विंचुरे पाझर तलावात दुपारी अडीचच्या सुमारास ते शेळ्यांना पाणी पाजण्यासाठी गेले असता दत्तूचा पाय घसल्याने तो पाझर तलावात पडला. त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात कविता दत्तूसह बुडाली. दोन्ही मुलांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चार अधिकाऱ्यांवर दोषारोप सिद्ध

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून प्रशासकीय शिस्तीबरोबरच भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही आपले लक्ष केंद्रीत केले आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ११ फायली मुंढे यांनी बाहेर काढल्या असून, पहिल्या टप्प्यात चार बड्या अधिकाऱ्यांची विकेट पाडण्याची तयारी केली आहे. महापालिकेच्या अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन, निलंबित उद्यान अधीक्षक जी. बी. पाटील, निवृत्त अधीक्षक अभियंता आर. के. पवार आणि मायको हॉस्पिटलचे निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी यांच्यावर ठेवलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांत तथ्य आढळून आले असून, त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाले आहेत. त्यामुळे या चारही अधिकाऱ्यांना शेवटची संधी म्हणून खुलासा करण्यासाठी दहा दिवसांची अंतिम नोटीस पाठविण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध चौकशांच्या फाइल्सना गती दिली असून, ही चौकशी प्रक्रिया तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे महापालिकेत गेल्या दोन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चौकशीचे अहवाल आता हळूहळू बाहेर येत आहेत. निवृत्त अधिकाऱ्यांमार्फत या चौकशा केल्या गेल्या असल्या, तरी अद्याप त्यांच्यावर कोणतीही कारवाई झालेली नव्हती. त्यामुळे मुंढे यांनी प्रशासकीय फेरबदल करीत, या भ्रष्ट अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरू केला आहे. प्रशासनातील अनागोंदीला शिस्तीचे वळण लावण्यासाठी त्यांनी बड्या भ्रष्ट अधिकाऱ्यांनाच रडारवर घेतले आहे. चौकशी सुरू असलेल्या ११ पैकी ४ प्रकरणाच्या फायली आयुक्तांनी क्लिअर केल्याने पालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. महापालिकेचे अग्निशमन विभागाचे प्रमुख अनिल महाजन यांच्यावर रुग्णालय व हॉटेलांसंदर्भातील ना-हरकत दाखल्याचे शासकीय परिपत्रक दडवून ठेवत, नागरिकांना त्रास दिल्याचा आरोप होता. त्यासंदर्भात त्यांच्या विरोधात तक्रार करण्यात आली होती. महापालिकेने केलेल्या चौकशीत महाजन हे दोषी आढळून आले आहेत. तर निलंबित उद्यान निरीक्षक जी. बी. पाटील यांच्यावर उद्यान विभागात कोटेशन घोटाळा केल्याचा आरोप आहे. पाटील यांनी या घोटाळ्याशी संबंधित उद्यान विभागातील ४५६ संचिका गायब केल्याचा आरोप आहे. चौकशीत पाटील यांच्यावरील पाचपैकी तीन आरोप सिद्ध झाले आहेत. तर यांत्रिकी विभागाचे निवृत्त अधीक्षक अभियंता आर. के. पवार यांच्यावर खतप्रकल्पात ६७ कोटींच्या यंत्रखरेदीत भ्रष्टाचार केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. प्रशासनाने केलेल्या चौकशीत पवार दोषी आढळून आले आहेत. तर निवृत्त वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण कोकणी हे मायको दवाखान्यात कार्यरत असताना एका महिलेची रिक्षातच प्रसूती झालेली होती. त्यावेळी डॉ. कोकणी हे विनापरवानगी चार दिवस गैरहजर असल्याचे आढळून आले होते. त्यांच्यासंदर्भात झालेल्या चौकशीत डॉ. कोकणीही दोषी आढळून आले आहेत. त्यामुळे त्यांच्यासह या चार अधिकाऱ्यांवर दोषारोप ठेवण्यात आले असून, त्यांना आपली बाजू मांडण्यासाठी दहा दिवसांच्या अंतिम नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दहा दिवसांत या अधिकाऱ्यांनी योग्य खुलासा केला नाही, तर त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल होण्यासह वेतन रोखण्याची कारवाई होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात या कारवाईने खळबळ उडाली आहे.

अधिकारी निरुत्तर

आपल्या भ्रष्टाचार प्रकरणाची फाइल बाहेर निघाल्याची कुणकुण लागताच, यातील काही अधिकाऱ्यांनी मुंढे यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. जनता दरबारात जाऊन यातील काहींनी आयुक्तांची भेट घेऊन असे काही घडलेच नाही, अशी भूमिका घेतली. परंतु, मुंढे यांनी त्यांची बाजू ऐकून न घेता, काय खुलासा करायचा तो नोटिशीत करा, असे सांगून त्यांना जाण्यास सांगितल्याची चर्चा आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांवर आता कारवाई अटळ मानली जात आहे.

पालिकेतल्या चार अधिकाऱ्यांविरोधात असलेल्या आरोपांवरील चौकशीत त्यांच्यावरील दोषारोप सिद्ध झाले आहेत. त्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी नियमानुसार दहा दिवसांची अंतिम मुदत देण्यात आली आहे. खुलासा प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई केली जाईल.

- तुकाराम मुंढे, महापालिका आयुक्त

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ज्येष्ठ नागरिकांसाठी कार सुविधा

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर

इंदिरानगर परिसरात बससेवांची कमतरता असल्याने ज्येष्ठ नागरिकांना अनेकदा पायपीट करीत जावे लागते. उन्हाळ्याच्या तोंडावर गैरसोय टाळण्यासाठी ज्येष्ठांना माफक दरात नॅनो कारची सुविधा शिवसेनेच्या युवा सेनेकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रभाग क्रमांक २३ व ३० मध्ये भगव्या रंगाच्या १० नॅनो कार उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे युवा सेनेच्या ऋषिकेश वर्मा यांनी सांगितले.

इंदिरानगर परिसरात सर्वाधिक ज्येष्ठ नागरिक राहतात. त्यांना इंदिरानगर परिसरात कोणत्याही कामासाठी पायीच प्रवास करावा लागतो. यात अनेकदा चोरट्यांकडून या ज्येष्ठांना लक्ष्य केले जाते. त्यामुळे या ज्येष्ठांच्या सेवेसाठी शिवसेनेतर्फे नॅनो कार उपक्रम हाती घेतला आहे. पक्षाचे संपर्क प्रमुख अजय चौधरी आणि ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाची आखणी केली जात असून येत्या १५ दिवसांत ही सेवा सुरू केली जाणार आहे. या भागाची लोकसंख्या सुमारे लाखभर आहे. त्यामुळे या उपक्रमांचा अनेकांना लाभ होईल, असा विश्वास वर्मा यांनी व्यक्त केला आहे.

असा घेता येणार लाभ

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने ही सेवा सुरू करण्यात येणार आहे. प्रभाग २३ व ३० मधील ज्येष्ठांना मासिक दीडशे रुपये भरून या उपक्रमाचे सभासद होता येणार आहे. नोंदणीकृत सभासदांना या दोन्ही प्रभागात कारमधून फिरण्याची संधी मिळणार आहे. सकाळी सात ते दहा आणि सायंकाळी ५ ते ९ या वेळेत कार उपलब्ध होतील. गाडीत सीसीटिव्ही कॅमेरेही असतील. प्रत्येक गाडीच्या चालकासाठी त्याचा विभाग निश्चित करून देण्यात येणार आहे. त्या त्या विभागातील चालकांशी थेट संपर्क साधून गाडी उपलब्ध होऊ शकेल. तसेच रुग्णावाहिकाही उपलब्ध करण्यात आल्या आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

ओझरचा पाणीपुरवठा होणार बंद

$
0
0


म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

ओझर ग्रामपंचायतीकडे पाणी पुरवठ्यापोटी ३० कोटी ७४ लाख रुपये थकल्यामुळे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने गावाचा पाणीपुरवठा ११ मार्चपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओझर, साकोरा व २ गावे असे नाव असलेल्या या योजनेत इतर गावांनी मात्र नियमीत पाणीपुरवठ्याचे देयक दिले आहे. त्यामुळे त्यांच्यावरही संकट कोसळणार आहे.

पाणी पुरवठा योजनेतून पालखेड डाव्या कालव्यातून पाणीपुरवठा केला जातो. या पाणीपुरवठ्याचे सर्व जलव्यवस्थापन जीवन प्राधिकरणाकडे आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षात जानेवारी पर्यंत या पाणीपुरवठ्यापोटी प्राधिकरणाने वीज देयकाचे ९९ लाख १४ हजार रुपये भरले. पण, त्यांची वसुली फक्त ७७ लाख ७२ हजार झाली आहे. त्यामुळे प्राधिकरणाला आपल्या फंडातून पैसे द्यावे लागले. त्यामुळे प्राधिकरणाने आता कडक पाऊले उचलली असून, ओझर गावात पाण्याचा प्रश्न ऐन उन्हाळयात पेटणार आहे.

ओझर ग्रामपंचायतीकडे या आर्थिक वर्षातील एप्रिल २०१७ ते जानेवारी २०१८ पर्यंत १ कोटी २१ लाख ३८ हजार रुपये थकबाकी आहे. त्यात ओझर ग्रामपंचायतीने ४५ लाखच भरणा केला आहे. चालू थकबाकीसह जानेवारी २०१८ पर्यंत मागील थकबाकी विलंब शुल्कासह २९ कोटी ५३ लाख आहे. त्यामुळे ही पाणीपुरवठा योजना चालवणे प्राधिकरणाही अवघड झाले आहे. पाणीपुरवठ्याचे बील भरावे यासाठी जीवन प्राधिकरणाने वांरवार पत्रांद्वांरे व प्रत्यक्ष भेटी देऊन बैठकाही घेतल्या. पण, थकबाकीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले. सदर योजना चालविण्यासाठी जीवन प्राधिकरणाही कोणते अनुदान व मदत मिळत नसल्याने ही योजना पाणीपट्टीवर अवलंबून आहे.


५० हजार लोकांचा प्रश्न

ओझर ग्रामंपचायती जिल्ह्यात सर्वाधिक लोकसंख्या असेलेली ग्रामपंचायत आहे. २०११ च्या जनगणनेनुसार या गावाची लोकसंख्या ५१ हजार २९७ असून त्यात ११ हजार ६१५ कुटूंब आहे. त्यात २६ हजार ६७१ पुरूष तर २४ हजार ६२६ महिला या शहरात वास्तव करतात. एचएलमुळे या शहराला वेगळे महत्त्व असून त्यामुळे येथील पाणीपुरवठा योजना बंद झाल्यास पाण्याचा प्रश्न तीव्र होणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

एकात्मतेसाठी धावणार हजारो मालेगावकर

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

शहरातील एकात्मता व जातीय सलोखा वृद्धिंगत व्हावा यासाठी नाशिक ग्रामीण पोलिस व शहर शांतता समितीच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ११ मार्च रोजी 'रन फॉर युनिटी' मालेगाव मॅरेथॉन २०१८ चे आयोजन करण्यात आले आहे. मॅरेथॉन बोधचिन्ह तसेच स्पर्धा टी शर्टचे अनावरण जिल्हा पोलिस प्रमुख संजय दराडे यांच्या हस्ते करण्यात आले, अशी माहिती पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने यांनी दिली.

येथील शहर पोलिस मुख्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मालेगाव मॅरेथॉनसाठी येथील पोलिस प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी १०, ५ व ३ किलोमीटर धावणे असे तीन गट करण्यात आले आहे. प्रत्येक गटात वयानुसार पाच विभाग करण्यात आले आहे. रविवारी सकाळी ६ वाजता एकात्मता चौकापासून मॅरेथॉनचा शुभारंभ होणार आहे. मॅरेथॉन मोसमपूल, शिवाजी महाराज पुतळा, नवीन बसस्थानक, भिक्कू हॉटेल, दरेगाव शिवारातील रिलायबल कंपाउंडमार्गे पुन्हा पोलिस कवायत मैदान अशी पूर्ण केली जाईल. तीनही गटात प्रथम, द्वितीय व तृतीय विजेत्या स्पर्धकास बक्षीस देऊन सन्मानित केले जाणार आहे. यासह स्पर्धा पूर्ण करणाऱ्या सर्व स्पर्धकांना पदक व प्रमाणपत्र दिले जाणार आहे.

मॅरेथॉनच्या मार्गावर सर्व धर्मीयाच्या योगदानातून स्पर्धकांसाठी खजूर, फळे,पाणी असे स्टॉल्स उभारण्यात येणार आहे. स्पर्धा पूर्ण करून परतणाऱ्या स्पर्धकास मैदानावर अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आली आहे.

अशी असेल मालेगाव मॅरेथॉन

- ३ , ५ व १० किमी अंतर धावणार

- तिन्ही गटात वयानुसार ५ विभाग

- तीनही गटात विजेत्या स्पर्धकास बक्षीस

- जागोजागी पाणी अल्पोआहार व्यवस्था

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


इन्सानियत बचावसाठी मालेगावी निदर्शने

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

सिरीयात सुरू असलेल्या कलहात हजारो नागरिकांचा बळी जात असून, शांततेसाठी प्रयत्न व्हावेत याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी शुक्रवारी इन्सानियत बचाव संघर्ष समिती व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले.

शहरातील किडवाई रोडवर आमदार असिफ शेख यांचे बंधू खालिद रशीद शेख यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकारी अजय मोरे यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी समितीचे मौलाना हसनैन रहमानी, साफिक राणा, मौ. अयूब्ब कलमी, मौ. अनिस अजहर, अब्दुल सलीम सिद्दिकी, सलीम अन्वर, अस्लम अन्सारी आदी उपस्थित होते.

सिरीया व रशियाने सिरियातील बॉम्बहल्ले थांबवावेत, जखमींवर उपचार व्हावेत, रशियाने सिरीयाचा हुकुमशाह असाबला सहकार्य करू नये, मानवतेच्या भावनेतून येथील सामान्य नागरिक, लहान मुले यांना वाचवावे व शांततेसाठी प्रयत्न व्हावेत अशी मागणी मौलाना व नगरसेवकांनी मनोगतात व्यक्त केली. शेख यांनी देखील याबाबत मुंबईस्थिती रशियन दूतावासास निवेदन दिले असून हिंसाचार थांबवावा अशी मागणी केली आहे. यावेळी आंदोलनस्थळी प्रतीकात्मक स्वरुपात जखमी मुलांना दाखविण्यात आले होते. यावेळी जमित ए उलेमा, इन्सानियत बचाव समिती तसेच काँग्रेस नगरसेवक व पदाधिकारी सहभागी झाले होते.

मानवतेसाठी मानवी साखळी

शहरात एकीकडे काँग्रेसच्या वतीने सिरियातील हिंसाचार थांबवावा यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले. दुसरीकडे माजी आमदार मौलाना मुफ्ती इस्माईल यांच्या नेतृत्वात जमाते उलेमा इ मालेगावच्या वतीने मानवतेसाठी मानवी साखळी तयार करण्यात आली होती. संपूर्ण जगात राजकीय, धार्मिक वर्चस्वासाठी मानवतेविरोधात हल्ले सुरू असून यामुळे निष्पाप जीवांचे बळी जात आहेत. या जागतिक संघर्षात बळी पडणाऱ्यांविषयी सहानुभूती ठेवून मानवतेचे रक्षण व्हावे या उद्देशाने या मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. गांधी पुतळा परिसरात मानवी साखळीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मौलाना मुफ्ती समवेत गिरीश बोरसे, जितेंद्र देसले, निखील पवार, अनिल पाटील आदींसह संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी झाले होते.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्त्री जीवनावर रचली ९४९ ओळींची कविता

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, मनमाड

स्त्री जीवनाचा आलेख मांडणारी व स्त्रियांच्या व्यथांबरोबरच त्यांच्या कर्तृत्त्वाचा गौरव करणारी तब्बल ३२२९ शब्दांची आणि ९४९ ओळींचा एक दीर्घ कविता नांदगावच्या सूनबाई असलेल्या वैशाली सोर यांनी केली असून, या अनोख्या प्रयोगाचे साहित्य व काव्य क्षेत्रात मोठे कौतुक होत आहे.

स्त्रियांच्या आयुष्यावर बरेच लिहिले गेले आहे. अजूनही भरभरून लिहिले जात आहे. मात्र नारी शक्तीचे वेगळेपण, तिचा त्याग, तिची हुशारी आणि घरासाठी चंदनासम झिजणे, तिचे कर्तृत्व हे एकाच कवितेत व तब्बल सव्वा तीन हजार शब्दात मांडून नांदगावच्या वैशाली सोर या सूनबाईंनी सर्वांचे लक्ष वेधले आहे, त्यांचा हा दीर्घ काव्याचा प्रयोग पाहून जणू सर्वांच्या ओठांवर 'शाब्बास सूनबाई' असे शब्द उत्स्फूर्तपणे येत आहेत.

त्यांच्या या काव्याची इंडिया बुक ऑफ रेकार्ड मध्ये दीर्घ काव्य सादरीकरणात नोंद झाली आहे.

नांदगाव येथील सामाजिक कार्यकर्ते रमेश सोर व माधवी सोर यांच्या मोठ्या सूनबाई वैशाली तुषार सोर (वाघमौडे) यांनी मराठी काव्यातील दीर्घ काव्य सादरीकरणात स्त्री आयुष्याची महती सार्थ शब्दात मांडली आहे. चपखल व नेमके ३२२९ शब्द आणि ९४९ ओळीत ही कविता पूर्ण झाली आहे. एका स्त्रीने स्त्रियांच्या आयुष्याचा मोठा सन्मान करत केलेली दीर्घ कविता देशभरात गाजत आहे. नांदगावच्या व महाराष्ट्राच्या साहित्य चळवळीतील हे एक ऐतिहासिक सोनेरी पान ठरेल अशा जाणकारांच्या प्रतिक्रिया आहेत.

कवितेचा ध्यास आहे. कविता लिहिणे व जगणे हा स्थायीभाव असल्याने ही कविता साकारली. स्त्री जीवनाचा वेध घेतला असून, एकाच कवितेत स्त्री जीवनाचे विविध पैलू प्रतिकात्मक रुपात मांडले आहेत. इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये कवितेचा समावेश हा मोठा गौरव आहे. या कवितेचे पुस्तक करण्याचा मानस आहे. - वैशाली सोर, नांदगाव

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तळोशीतील सर्पमित्राचा सर्पदंशाने मृत्यू

$
0
0

म. टा. वृत्तसेवा, घोटी

इगतपुरी तालुक्यातील तळोशी येथील आकाश पांडुरंग गिते (वय २२) या सर्पमित्राचा विषारी सापाने चावा घेतल्यामुळे मृत्यू झाला. आकाश गिते हा चार वर्षांपासून सर्पमित्र म्हणून काम करीत होता. त्याने आतापर्यंत अनेक विषारी साप पकडून ते जंगलात सोडले आहेत. गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास गिरेवाडी येथे शेतात काम करत असताना नाग आढळून आला. त्याने हा नाग पकडला मात्र चपळ असणाऱ्या नागाने आकाशच्या कानाच्यावर चावा घेतला व आकाशच्या तावडीतून सुटला. थोड्याच वेळात आकाशला चक्कर यायला लागली. त्याच्या मित्राने त्याला लागलीच इगतपुरी येथे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र त्याची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी त्याला नाशिक येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगितले. नाशिकला नेत असतानाच त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. या घटनेमुळे तळोशीसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

उपेक्षितांची शिक्षण‘सुधा’!

$
0
0

arvind.jadhav@timesgroup.com

Tweet: @ArvindJadhavMT

नाशिक : 'वेळ नाही', 'आमचा काय संबंध?', 'काय फरक पडणार आहे?' असा नकारात्मक विचार करणाऱ्या पांढरपेशी समाजाला आरसा दाखवण्याचे काम सुधा मेहता या उद्योजिका गेल्या एक तपापासून करीत आहेत. आपला व्यवसाय खंबीरपणे सांभाळणाऱ्या मेहता यांच्यामुळे झोपडपट्टीत राहणाऱ्या शेकडो मुलांच्या जीवनात शिक्षणाचा प्रकाश पडला आहे.

महात्मानगरमध्ये कुरियर कंपनीचे कार्यालय चालवणाऱ्या सुधा मेहता यांना लहानपणापासून शिकविण्याची आवड. सुनील मेहता यांच्याशी विवाह झाल्यानंतर अगदी घरगुती काम म्हणून त्या इयत्ता १०वीपर्यंतच्या मुलांची शिकवणी घ्यायच्या. पुढे कुरिअर कंपनीचा विस्तार झाला. त्यामुळे त्यांचा हा छंद कमी झाला. एक दिवस महात्मानगर येथीलच एका मैत्रिणीच्या बंगल्यावर गेलेल्या मेहता यांच्या आयुष्यात ही संधी पुन्हा चालून आली. बंगल्याच्या वॉचमनचा मुलगा शिक्षण घेत नसल्याचे त्यांना समजले. तेव्हा मेहता यांनी त्याची समजूत घातली. व्रात्यपणा सोडून शिकेन, पण तुम्ही शिकवणार काय? असा प्रश्न मुलाने उपस्थित केला. आपले ज्ञान दुसऱ्यास द्यावे, अशी शिकवण असलेल्या मेहतांनी लागलीच त्यास होकार भरला. या मुलासोबत आणखी मित्र आले. जवळपास १२ वर्षांपूर्वी महात्मानगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत संध्याकाळी पाच ते सहा या वेळेत ज्ञानाजर्नाचे काम सुरू झाले. इमारतीत वॉचमन असलेल्या कामगाराने आपल्या मुलांना यात सहभागी करून घेतले. हळूहळू मुलांची संख्या वाढत असताना इमारतही पूर्ण झाली. इमारतीच्या आडोशाला सुरू असलेला क्लास एकाच दिवसात खुल्या आभाळाखाली आला. मेहता यांच्या फ्री क्लासची माहिती झोपडपट्टी भागात पसरली. महात्मानगरसारख्या भागात वॉचमन, घरकाम करणाऱ्या कुटुंबातील मुलांना शिक्षणाचा अर्थ नव्याने उमगला. विद्यार्थी शाळेत जातो म्हणजे शिक्षण घेतोच, असे नाही. झोपडपट्टीतील मुले शाळेत जातात पण घरी परतल्यानंतर घरातील, आजुबाजूच्या परिस्थितीचा मुलांच्या मनावर परिणाम होतो, याची जाणीव मेहतांना होती. त्यामुळे पहिल्या ठिकाणी नकारघंटा मिळताच त्यांनी विश्वास ठाकूर यांच्याशी संपर्क साधला. ठाकूर यांनी जागा देण्यास होकार दर्शवला. गंगापूररोडवर तेव्हापासून सुरू झालेला ज्ञानयज्ञ आज अविरत सुरू आहे. आजमितीस मेहता यांच्या क्लासमध्ये तब्बल १२५ पेक्षा विद्यार्थी अगदी मोफत शिक्षण तसेच जीवन कौशल्याचे धडे घेतात. यात मुलींची संख्या लक्षणीय आहे. झोपडपट्टीतील मुलींना फारतर दहावी किंवा बारावीपर्यंत शिकवले जाते. यानंतर पैसा नसल्याने मुलींचे शिक्षण थांबवले जाते. ही बाब मेहता यांच्या लक्षात आली. यावेळी जायंट ही संस्था पुढे आली. मेहता यांच्या क्लासमध्ये शिक्षण घेणाऱ्या मुलींपैकी बुद्धिमत्तेची धनी असलेल्या मुलींना ही संस्था पुढील शिक्षण, तसेच करियर घडवण्यासाठी दत्तक घेते. सध्या या क्लाससाठी सेवानिवृत्त किंवा याच ठिकाणी शिक्षण घेतलेल्या मुली शिक्षक म्हणून काम करतात. पावसाळ्याचे चार महिने खूपच त्रासदायक असतात. आजही हा क्लास उघड्यावरच भरतो. मात्र, विद्यार्थ्यांकडून एक पैसाही घेतला जात नाही. काही शिक्षकांना मेहता आपल्या कमाईतील पैसा मानधन म्हणून देतात. फक्त शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नाते प्रस्थापीत व्हावे म्हणून कधीही प्रयत्न केले जात नाही. तर विद्यार्थ्यांमधील चांगला माणूस घडावा, यासाठी मेहता यांच्यासह त्यांचे सहकारी प्रयत्न करतात.

गवसल्या नोकरीच्या वाटा

या संस्थेत शिक्षण घेणारी काही मुले इंजिनीअर झाली. कोणी डिग्री घेऊन नोकरी करत आहे. झोपडपट्टीतील शिक्षित मुलांना पायावर उभे करण्याचे व्रत घेतलेल्या मेहता यांनी आपल्या कुरियर कार्यालयाचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. त्यामुळे येथे किमान पाच मुले आपली उपजीविका भागवतात. वाढती गुन्हेगारी, अल्पवयीन मुलांची गुन्हेगारी याबाबत आगपाखड करणाऱ्या समाजाने कर्तव्य पार पाडणे आवश्यक आहे. आपण भले आणि आपले कुटुंब अशी धारणा असलेल्यांना सुधा मेहता यांनी आपल्या कार्यातून आदर्श घालून दिला. एका मुलाच्या रुपाने लावलेल्या या रोपट्याचे वटवृक्षात रुपांतर झाले ते मेहता यांच्या शिक्षणावरील निस्सीम श्रद्धेमुळेच!

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

'स्थायी'चा सुभेदार शनिवारी ठरणार

$
0
0

विभागीय आयुक्तांकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर; भाजपमधील असंतोष शिवसेना उचलणार फायदा

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विभागीय आयुक्तांनी स्थायी समितीच्या सभापतीदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून येत्या शनिवारी (दि. १७) निवडणूक होणार आहे. या पदासाठी शुक्रवारपर्यंत (दि. १५) अर्ज दाखल करता येणार असून जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. भाजपकडे बहुमत असले तरी पक्षांतर्गत असंतोषाचा फायदा घेण्यासाठी शिवसेनेकडून भाजपविरोधातील सर्वपक्षीयांची मोट बांधली जाणार आहे. शिवसेना उमेदवार देणार असल्याने अध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होणार आहे.

महापालिकेच्या आर्थिक चाव्या असलेल्या स्थायी समितीच्या अध्यक्षपदाची निवडणूक विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी जाहीर केली आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बजेटची अडवणूक करण्यासाठी भाजपने सदस्य निवडीचा ठराव दिला नव्हता. परंतु, मुंढे यांनीही बजेट महासभेवर ठेवण्याची रणनीती तयार करताच सत्ताधारी भाजप नेत्यांनी घाईगर्दीत सभापती निवडणुकीचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांकडे गुरूवारी पाठवला. विभागीय आयुक्तांनी शुक्रवारी निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केली आहे. त्यानुसार १७ मार्च रोजी सकाळी ११ वाजता सभापतीपदाची निवडणूक होणार आहे. १२ ते १५ मार्च दरम्यान सभापती पदाचे अर्ज वितरित केले जाणार आहे. शुक्रवारी (दि. १५) दुपारी १ वाजेपर्यंत सभापतीपदासाठी अर्ज दाखल करता येणार आहेत. शनिवारी (दि. १७) साडेसहा वाजेपर्यंत अर्ज माघारी घेता येणार आहे. सकाळी ११ वाजता निवडणूक होणार आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपसह विरोधकांनी सभापती पदाची रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

स्थायी समितीत १६ सदस्य असून भाजपकडे बहुमतासाठी आवश्यक नऊचा आकडा आहे. शिवसेना ४, राष्ट्रवादी, मनसे व काँग्रेसचे प्रत्येकी एक सदस्य आहेत. स्थायीवर भाजपचे बहुमत असले तरी सभापती पदावरून भाजपमध्ये रस्सीखेच आहे. भाजपकडून हिमगौरी आडके आहेर यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र, पक्षातील दोन आमदारांनी त्यांच्याच विरोधात भूमिका घेतली आहे. तर दिनकर पाटील आणि उद्धव निमसे यांचीही दावेदारी मानली जात आहे. त्यामुळे भाजपमधील या असंतोषाचा फायदा घेण्यासाठी शिवसेनाही आपला उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. गेल्या वेळी शिवसेनेने भाजपला शेवटपर्यंत जेरीस आणले होते. त्यामुळे यंदाही शिवसेनेकडून काँग्रेस, राष्ट्रवादी व मनसेच्या सदस्यांची मोट बांधून भाजपला आव्हान दिले जाणार आहे. त्यामुळे सभापतीपदाची निवडणूक चुरशीची ठरणार आहे.

भाजपमध्ये रस्सीखेच

भाजपकडून स्थायी समितीवर जवळपास ७ महिला आणि दोन पुरूष सदस्यांना संधी देण्यात आली आहे. त्यामुळे भाजप सभापती पदासाठी महिलेलाच संधी देण्याच्या विचारात आहे. मात्र, दिनकर पाटील आणि उद्धव निमसे यांनाही सभापतीपदावर दावा केला आहे. त्यामुळे भाजपमध्ये सभापतीपदासाठी मोठी रस्सीखेच आहे. आमदार डॉ. राहुल आहेर यांची बहीण हिमगौरी आहेर-आडके यांची उमेदवारी निश्चित मानली जात असली तरी दोन आमदारांकडून त्याला शह देण्याचे प्रयत्न केले जाणार आहे. त्यामुळे डोकेदुखी नको म्हणून तडजोडीचा तिसराच उमेदवारही रिंगणात येण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बिनविरोध लढत नाहीच

$
0
0

भाजपसह शिवसेनाही देणार उमेदवार

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १३ (क) ची पोटनिवडणूक जाहीर झाल्यानंतर राजकीय मोर्चेबांधणीला सुरुवात झाली आहे. मनसेने अॅड. वैशाली भोसले यांना उमेदवारी दिली असून भाजपनेही निवडणूक प्रतिष्ठेची करत जिंकण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. भाजप उमेदवार उतरविणार असल्याने शिवसेनेनेही शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता मावळली आहे.

मनसेच्या ज्येष्ठ नगरेसविका सुरेखा भोसले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या प्रभाग क्रमांक १३ (क) च्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार येत्या ६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. मनसेच्या वतीने भोसले कुटुंबातील व्यक्तीला उमेदवारी दिली तर निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केली होती. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, भाजपने ही निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपच्या पदाधिकाऱ्यांची शनिवारी (दि. १०) याबाबत बैठक होत असून इच्छुकांच्या मुलाखतीही घेतल्या जाणार असल्याची माहिती शहराध्यक्ष बाळासाहेब सानप यांनी दिली आहे. भाजप सर्व शक्तीनिशी या निवडणुकीत उतरून जिंकेल, असा दावाही त्यांनी केला.

भाजपने उमेदवार उतरवल्यास शिवसेनाही उमेदवार देईल, अशी घोषणा शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्ते यांनी केली आहे. निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्यासाठी शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक शुक्रवारी झाली. यात बहुतांश पदाधिकाऱ्यांनी भाजपने निवडणूक लढवल्यास शिवसेनेनेही लढतीत उतरावे, असे मत व्यक्त केले. त्यासंदर्भातील अहवाल पक्षश्रेष्ठींना पाठवण्यात येणार असल्याची माहिती बोरस्ते यांनी दिली आहे.

तिरंगी लढत रंगणार

मनसे पाठोपाठ भाजप आणि शिवसेनेचाही उमदेवार रिंगणात असणार आहे. त्यामुळे ही निवडणूक तिरंगी होण्याची शक्यता आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मनसेसोबत गेल्या वेळेस ही निवडणूक एकत्रित लढवली होती. त्यामुळे मनसेला काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून रसद मिळण्याची शक्यता आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

पवारांचा आज ‘हल्लाबोल’

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात हल्लाबोल आंदोलन यशस्वी केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या हल्लाबोल आंदोलनाची उत्तर महाराष्ट्रातील समारोप सभा आज, (दि. १०) नाशिक येथे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थित होणार आहे. यासाठी शनिवारी सायंकाळी ४ वाजता गोल्फ क्लब मैदानावर भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी राष्ट्रवादीने ठिकठिकाणी बॅनर व झेंडे लावले आहेत.

राज्यात राष्ट्रवादीने १ डिसेंबरपासून सरकारच्या विरोधात हल्लाबोल आंदोलन पुकारले आहे. विदर्भ, मराठवाडयामध्ये हे आंदोलन झाल्यानंतर उत्तर महाराष्ट्रात १० दिवसांत २१ सभा घेत हल्लाबोल आंदोलन करण्यात आले. आता या आंदोलनाची सांगता नाशिकच्या जाहीर सभेने होणार आहे. ही सभा व्हावी, यासाठी राष्ट्रवादीने महिनाभरापासून जोरदार तयारी केली आहे. या सभेनंतर आता पश्चिम महाराष्ट्र व कोकणातही हल्लाबोल आंदोलन होणार आहे.

नाशिकमध्ये होणाऱ्या हल्लाबोल आंदोलनाच्या सांगता जाहीर सभेला अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, विधीमंडळ पक्षनेते अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, माजीमंत्री जयंत पाटील, माजी विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील, पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ आदी उपस्थित राहणार आहेत. या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पगार यांनी केले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


आता घरबसल्या मुद्रांक अन् नोंदणीची कामे

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

मुंबई, पुणे व ठाणे पाठोपाठ आता नाशिकमध्ये सुध्दा मुद्रांक व नोंदणी विभागाशी संबंधित कामे घरबसल्या करता यावे, यासाठी ऑथराइज सर्व्हिस प्रोव्हाइडरची नेमणूक करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक अनिल कवडे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या विभागाचा कारभार पारदर्शक व्हावा, यासाठी ऑनलाइन अनेक सुविधा उपलब्ध करून दिल्या असून, त्याचाही वापर नागरिकांनी जास्तीत जास्त करावा, असे आवाहनही त्यांनी केले.

कोणतीही मालमत्ता खरेदी करीत असताना त्याचा ३० वर्षांचा इतिहास, बोजा व वाद याबाबतची माहिती सर्च केल्यानंतर मिळावी, यासाठी कामकाज सुरू आहे. त्यामुळे मालमत्ता खरेदी करताना अधिक सुलभता येणार आहे. त्याचप्रमाणे ई-व्हॅल्यूएशनच्या माध्यमातून मिळकतीची माहिती नमूद करून थेट मूल्यांकन प्राप्त करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देणार असल्याचे कवडे यांनी सांगितले. यामुळे पारदर्शीपणा वाढून मध्यस्थांवरील अवलंबित्व कमी होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

कवडे यांनी मुद्रांक विभागाच्या विविध योजनांची माहिती देणारे प्रेझेन्टेशनही दाखवले. त्यानंतर त्यांनी हा विभाग देशात प्रथम क्रमांकावर असल्याचे सांगितले. आपली प्रणाली आता देशाने स्वीकारली असून, त्याचा सर्वत्र वापर केला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. नोंदणी विभागात असलेले अनेक मसुदे ऑनलाइन उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे त्याचा फॉर्मेट घेऊन नागरिकांनी त्याचा वापर केल्यास त्यांना ही कामे करता येणार आहे.

ई-पेमेंट वाढविण्याचा प्रयत्न

मुद्रांक शुल्क भरण्यासाठी ई-पेमेंट सुविधा, ई-रजिस्ट्रेशन, नागरिकांसाठी पूर्णवेळ हेल्पलाइन, आय सरिता, ई-सर्च, ई-म्युटेशन, ई-एएसआर, मॅरेज रजिस्ट्रेशन, दस्त पडताळणी- एसएमएस सेवा, स्टॅम्प ड्युटी कॅल्क्युलेटर, सारथी हेल्पलाइन या सुविधा उपलब्ध असून, त्याचा वापर जास्तीत जास्त केल्यास नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. ई-रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून नागरिकांची फसवणूक टाळणे हा उद्देश आहे. ई-पेमेंट वाढविण्याचा प्रयत्न होत आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आदेशांचेच दहन!

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

सार्वजनिक ठिकाणी तसेच शासकीय कार्यालयांमध्ये उघड्यावर अस्वच्छता करणाऱ्यांसह कचरा जाळण्यावर राष्ट्रीय हरित लवादाने बंदी घातली असून, उघड्यावर कचरा जाळल्यास ५ ते २५ हजारापर्यंत दंड करण्याचे आदेश दिले आहेत. महापालिकेने एकीकडे या आदेशाची अंमलबजावणी जोरदारपणे सुरू केली असतानाच, पालिका अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांनाच या आदेशाचा विसर पडला आहे. शहरातील नागरिकांना कचऱ्याबाबत उपदेशाचे डोस पाजणाऱ्या महापालिकेच्याच सिडकोतील बांधकाम विभागाच्या शेडमध्ये मात्र कर्मचाऱ्यांनी सर्रासपणे कार्यालयातील कचरा आणि कागदपत्रे उघड्यावर जाळून जणू लवादाच्या आदेशाचेच दहन केले आहे. त्यामुळे नागरिकांवर कारवाई करणारी महापालिका या विभागावर काय कारवाई करते, याकडे नाशिककरांचे लक्ष आहे.

राष्ट्रीय हरित लवादाने उघड्यावर कचरा व प्लास्टिक जाळण्यास बंदी घातली असून, असा उघड्यावर कचरा जाळल्यास संबंधिताला ५ ते २५ हजारांचा दंड करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने देशभर याची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून, त्याची राज्यसरकार व महापालिकांसह अन्य स्थानिक संस्थांकडून अंमलबजावणी केली जात आहे. नाशिक महापालिका क्षेत्रातही हा आदेश लागू करण्यात आले असून, सार्वजनिक ठिकाणी कचरा जाळल्यास त्याला पाच ते पंचवीस हजार दंड करण्याचे आदेश आरोग्य विभागाने काढले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनीही या आदेशाची काटेकोरपणे अंमबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून शहरात सार्वजनिक ठिकाणी उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांविरोधात कारवाई सुरू आहे. गुरुवारी सिडकोत आरोग्य विभागाच्या पथकाने ऑनलाइन तक्रारीच्या आधारे भागू राजाराम मटाले यांना पाच हजारांचा दंड केला. सिडकोतील हा दंडाचा पहिलाच प्रकार असल्याने नागरिकांमध्ये या कारवाईने दहशत बसली आहे.

आरोग्य विभागाने एकीकडे शहरात उघड्यावर कचरा जाळणाऱ्यांविरोधात मोहीम उघडली असतानाच, महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या सिडकोतल्या दुर्गानगरमधील बांधकाम विभागाच्या शेडमध्ये मात्र या आदेशाची होळी करण्यात आली. महापालिका आयुक्तांकडून सध्या कार्यालयांची साफसफाई व स्वच्छता मोहीम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे पालिकेच्या सर्व कार्यालयांची साफसफाई करून त्यातील कचरा बाहेर काढला जात आहे. हा कचरा व कागदपत्रे खत प्रकल्पावर जाणे अपेक्षित असताना, विभागाच्या अधिकाऱ्यांनी व बहाद्दर कर्मचाऱ्यांनी तो चक्क बांधकाम विभागाच्या शेडमध्ये आणून जाळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे 'लोकां सांगे ब्रह्मज्ञान आणि स्वत: कोरडे पाषाण' अशी अवस्था महापालिकेची झाली आहे. नागरिकांना कचराप्रकरणी जबर दंड करणाऱ्या या अधिकाऱ्यांवर आयुक्त काय कारवाई करतात, याकडे नागरिकांचे आता लक्ष लागून आहे.

घाईगडबडीत विल्हेवाट

नागरिकांचे लक्ष जाऊ नये म्हणून कार्यालयाच्या आवारात हा कचरा व कागदपत्रे जाळण्यात येऊन लगोलग त्याची विल्हेवाटही लावण्यात आली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर कचरा जाळल्याची बाहेर बोंबाबोब होऊ नये म्हणून येथील कर्मचाऱ्यांनी जाळलेल्या कचऱ्याचा ढीग एका गाडीत भरून तो बाहेर फेकण्याचाही आटापिटा केला. त्यामुळे नागरिकांनाच उपदेशाचे डोस पाजणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या कृतीने महापालिकेच्या उद्देशांवर वरवंटा फिरवला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हॉकर्स झोनसाठी मार्चएंडचा अल्टिमेटम

$
0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहर फेरिवाला धोरणाच्या अंमलबजावणीवर विशेष भर दिला असून रस्त्यावरील विक्रेत्यांवर कारवाईचे आदेश दिले आहेत. त्यानुसार अतिक्रमण विभागाकडून रस्त्यांवरील फेरिवाल्यांविरोधात जोरदार कारवाई केली जात आहे. त्याचे सकारात्मक पडसाद उमटत असून, आतापर्यंत २२५ पैकी ६६ हॉकर्सझोनची अंमलबजावणी झाली आहे. २५ हॉकर्स झोनबाबत तक्रारी असून, १३४ हॉकर्स झोनची अंमलबजावणी मार्चपर्यंत पूर्ण केली जाणार आहे. त्यामुळे महिनाभरात उर्वरित १३४ हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीचे आव्हान प्रशासनासमोर आहे.

हॉकर्सच्या विरोधामुळे शहरातील हॉकर्स झोनची प्रभावी अंमलबजावणी रखडली होती. परंतु, आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेताच हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीवर भर देण्यात आला आहे. मुख्य रस्त्यांवरील हॉकर्सवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. त्यानुसार गेल्या पंधरा दिवसांपासून हॉकर्स व अतिक्रमण करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाई केली जात आहे. शहरात ९६२० हॉकर्सची नोंदणी झाली असून, त्यांच्यासाठी २२५ हॉकर्सझोन तयार करण्यात आले आहेत. त्यातील २५ हॉकर्स झोनबाबत फेरिवाल्यांचे आक्षेप आहेत. १६६ मुक्त फेरिवाला क्षेत्रे असून, ५९ प्रतिबंधित फेरिवाला क्षेत्रे आहेत. त्यापैकी आतापर्यंत ६६ फेरिवाला झोन तयार करण्यात आले आहेत, तर उर्वरित १३४ हॉकर्स झोनच्या अंमलबजावणीसाठी मार्चचे अल्टिमेटम आयुक्तांनी दिले आहे. त्यामुळे २० मार्चपर्यंत हॉकर्स झोनची अंमलबजावणी केली जाणार असल्याने त्यासाठी अतिक्रमण विभागाकडून जोरदार कारवाई सुरू करण्यात आली आहे. हॉकर्स झोन तयार झाल्यानंतर त्यांची मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यांनतर निवडणूक घेतली जाणार आहे.

विभाग हॉकर्स झोन

नाशिक पूर्व ७

पंचवटी २०

नाशिक पश्चिम ७

नाशिकरोड ८

सिडको १३

सातपूरमध्ये ११

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

गरज 'एमएसटी' बोगीची

$
0
0

प्रवासादरम्यान पंचवटी एक्स्प्रेसमध्ये महिलांचा जागेसाठी रोजचाच संघर्ष

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

जागतिक महिला दिनानिमित्ताने मनमाड व नाशिक येथून पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या महिलांचा बॅच देऊन सत्कार करण्यात येणार आला. मात्र, एक दिवस सत्कार करण्यापेक्षा महिला पासधारकांसाठी स्वतंत्र बोगी (एमएसटी) सुरू करून त्यांना दिलासा देण्याची मागणी केली जात आहे.

महिला दिनानिमित्ताने पंचवटी एक्स्प्रेसमध्ये विविध क्षेत्रातील कर्तबगार भारतीय महिलांचे माहिती देणारे बोर्ड लावण्यात आले. भुसावळ रेल्वेच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले जात असले तरी महिला प्रवाशांचा जीवघेणा प्रवासाचा प्रश्न सोडविण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे.

सत्कार हवाच

पंचवटी एक्सप्रेस ही चाकरमान्यांची गाडी आहे. यामधून मुंबईला अप-डाऊन करणारे नोकरदार, व्यापारी, विद्यार्थी, रुग्ण, पर्यटक यांची संख्या मोठी असते. ही गाडी 21 बोगींची असली तरी ती अपुरी पडत आहेत. मासिक पासधारकांसाठी दोन बोगी आहेत. एक एसी बोगी आहे. नाशिक रेल्वे परिषदेच्या प्रयत्नांमुळे शिस्त, स्वच्छता यामुळे या बोगीचे नाव लिम्का बुकमध्ये नोंदवले आहे. एवढे असतानाही महिलांसाठी मात्र गैरसुविधाच आहे. या गाडीने प्रवास करणे म्हणजे महिलांसाठी दिव्यच आहे. त्यांना प्रचंड हाल सहन करावे लागतात.

चाकरमान्या महिलांचे हाल

पंचवटी एक्स्प्रेसमध्ये मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक येथून महिला प्रवासी बसतात. मात्र, त्यांना जागाच नसते. या गाडीत दोन महिला बोगी आहेत. पण एका बोगीत पुरुषांची घुसखोरी असते. रेल्वे सुरक्षा दलाकडे तक्रार करूनही उपयोग होत नाही. दुसऱ्या बोगीत अप-डाउन न करणाऱ्या महिलांची संख्या जास्त असते. त्यामुळे अप-डाउन करणाऱ्या महिला प्रवाशांचे हाल होतात. त्यातू वाद होतात. अप-डाउन करणाऱ्या महिलांसाठी पासधारक (एमएसटी) बोगी नाही. रोज अप-डाउन करणाऱ्या महिलांना उभा राहूनच प्रवास करावा लागतो. त्यातून गुडघेदुखी, कंबरदुखी आदी समस्या निर्माण होतात. या गाडीत महिला सुरक्षा समस्या नाही. पिण्याचे पाणी व अन्य सुविधा आहेत. छेडछाड व चोरी या घटना शक्यतो होत नाहीत. जागेवरून वाद मात्र नेहमीच होतात, असे महिलांचे म्हणणे आहे.

पंचवटी एक्स्प्रेसमधील आम्ही महिला रोज कसा प्रवास करतो, काय हाल सहन करतो, कोणत्या दिव्यातून रोज जातो हे फक्त आम्हालाच माहित आहे. नोकरदार महिला प्रवाशांसाठी स्वतंत्र बोगी सुरू केल्यास आमची लढण्याची ताकद तरी वाढेल.

- प्रा. आशा कदम, प्रवासी महिला

स्वागताचे ठिकठिकाणी बोर्ड

जेलरोड : पंचवटी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या महिलांचा बॅच देऊन महिला दिनी सत्कार करण्यात आला. तसेच विविध क्षेत्रातील कर्तबगार भारतीय महिलांचे माहिती देणारे आणि स्वागत करणारे बोर्ड लावण्यात आले होते. भुसावळ रेल्वेच्या या अनोख्या उपक्रमाचे स्वागत केले जात असले तरी महिला प्रवाशांचा खास करुन अप-डाउन करणाऱ्या महिला प्रवाशांचा प्रश्न सोडविण्याची उपाययोजना करणे गरजेचे आहे. दरम्यान, भुसावळ विभागीतल नवीन अमरावती रेल्वेस्टेशनमध्ये सर्व महिला नियुक्त करण्यात आल्या आहेत. बडनेरा, शेगाव, नाशिक या रेल्वे स्टेशनवर सॅनिटरी नॅपकीन मशिन्सचे उद्घाटन करण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

नावनोंदणीची आज शेवटची संधी

$
0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महिला दिनाच्या निमित्ताने तमाम महिलांना उत्सुकता असलेली ऑल वुमन पॉवर रॅली येत्या रविवारी (ता. ११) सकाळी सात वाजता पार पडणार आहे. महिलांनी मिळून धम्माल करण्याबरोबरच नारीशक्तीची एकजूट दाखवून देण्याची संधी यानिमित्ताने त्यांना मिळणार आहे.

खास स्पर्धा आणि बक्षिसेही

रॅलीत सहभागी होणाऱ्या महिला व ग्रुपसाठी यावर्षीही खास स्पर्धा होणार आहेत. बेस्ट ड्रेस, बेस्ट हेल्मेट, बेस्ट बाइक सजावट, बेस्ट सामाजिक संदेश आणि ग्रुपसाठी बेस्ट ड्रेसकोड या प्रकारांमध्ये स्पर्धा होणार आहे. विजेत्या महिला व ग्रुपसाठी आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत.

हे नियम लक्षात ठेवा

- रॅलीमध्ये सहभागी होताना लायसन्स, पीयूसी आणि गाडीची कागदपत्रे जवळ ठेवा.
- गाडी चालवताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करा.
- वळणांवर बाईक काळजीपूर्वक चालवा.
- रॅलीसाठी निश्चित केलेल्या मार्गावरूनच सहभागी व्हा.

नोंदणीसाठी

- रॅलीत सहभागी होण्यासाठी नाव नोंदणी करणे आवश्यक आहे..
- सकाळी ६. ३० वाजता ईदगाह मैदान गोल्फ क्लब याठिकाणी नावनोंदणीला सुरुवात होणार असून, प्रत्येक सभासदाला एक माहिती अर्ज भरणे आवश्यक आहे.
- संयोजकांकडून देण्यात येणारे गाडी क्रमांकाचे स्टिकर गाडीवर लावणे आवश्यक आहे.

असा असेल रॅलीचा मार्ग

ईदगाह मैदान (गोल्फ क्लब) - चांडक सर्कल - मायको सर्कल- एबीबी सर्कल- महात्मानगर - जेहान सर्कल - गंगापूर रोड - डोंगरे वसतिगृह - कॅनडा कॉर्नर - जुना सीटीबी सिग्नल - मायको सर्कल - चांडक सर्कल - ईदगाह मैदान (गोल्फ क्लब)

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images