Quantcast
Channel: Maharashtra Times
Viewing all 49119 articles
Browse latest View live

सण-उत्सवांमध्येही ‘चीन चीन चू’

0
0



fanindra.mandlik@timesgroup.com
Tweet @FanindraMT
नाशिक : भारतीय संस्कृती उत्सवप्रिय आहे. त्यामुळे देशाच्या विविध भागांत वर्षभरामध्ये बहुविध सण साजरे केले जातात. हीच बाब लक्षात घेऊन चिनी उत्पादनांनी भारतीय सणांची बाजारपेठ काबिज केली आहे. त्यामुळे सण-उत्सवांच्या काळात मोठ्या प्रमाणात चिनी वस्तूंची आयात होत आहे.

अनेक क्षेत्रांमध्ये चीनच्या उत्पादनांचे वर्चस्व असल्याने त्या वस्तू घेणे क्रमप्राप्त आहे. ‘डोकलाम’च्या पार्श्वभूमीवरील चिनीविरोध मावळला असून, नागरिक पुन्हा ‘चायनामेड’ वस्तूंच्या खरेदीकडे वळले आहेत. कमी किमतीत उत्पादने उपलब्ध करून देण्याचे कसब चिनी मार्केटने साध्य केले आहे. त्यामुळेच अमेरिकेसारख्या श्रीमंत देशातही चिनी वस्तूंचाच बोलबाला आहे. वस्तू टिकाऊ नसल्या तरीही त्या अत्यंत कमी दरात मिळणे आणि आकर्षक असणे हे चिनी वस्तूंचे वैशिष्ट्य आहे. नाशिक शहर परिसरात चिनी वस्तूंनी सणांच्या बाजारपेठेवर कब्जा मिळविला आहे. दिवाळीमध्ये देवी-देवतांच्या प्रतिमा, दिव्यांच्या माळा, आकाशकंदील, पणत्या, विविध दिवे आदींची बाजारपेठ जोरात असते. आपल्याकडच्या बाजारपेठेतील मागणी आणि उत्पादन यांचा ताळमेळ बसत नसल्याने भारतीय उत्पादने कमी प्रमाणात होतात. चीनमध्ये मजुरीचे दर अत्यंत कमी असल्याने वस्तूंचे उत्पादन मूल्यही अत्यंत कमी असल्याचे आयातदार सांगतात. त्यामुळे कमी पैशांत मालाची विक्री करणे चिनी लोकांना परवडते. आपल्याकडे मात्र उलट स्थिती आहे. आपल्याकडे मजुरीचे दर जास्त असल्याने तितक्या कमी किमतीत मालाचे उत्पादन होऊ शकत नाही. उत्पादन झालेच तर कमी प्रमाणात होते. त्यामुळे सणांची बाजारपेठ चिनी मालावरच अवलंबून राहते.

व्यापाऱ्यांचाही नाईलाज
दिवाळीत चिनी पणत्यांऐवजी देशी पणत्या विक्रीचा निश्चय व्यापाऱ्यांनी केला खरा;Ḥ पण बाजारपेठेला मुबलक प्रमाणात भारतीय उत्पादनांचा पुरवठा होऊ शकला नाही. त्यामुळे व्यापाऱ्यांना नाईलाजास्तव चिनी पणत्या खरेदी कराव्या लागल्या. परिणामी, चीनच्या मालावरची बंदी क्षणिक ठरली. नुकत्याच झालेल्या संक्रांतीच्या सणातही वाण देण्याच्या हळदी कुंकवाच्या बहुविध वस्तू या चिनीच होत्या. यात मोठी उलाढाल झाली. रंगपंचमीच्या सणासाठीही चिनी पिचकाऱ्या जोरात होत्या. ‘व्हॅलेंटाइन डे’ आणि ‘फ्रेंडशीप डे’साठी आकर्षक बेल्ट, ब्रेसलेट आणि आदी उत्पादने चिनी बनावटीचीच होती. आगामी गुढीपाडव्यासाठी दाखल झालेल्या नॅनो गुढ्या, उन्हाळ्याच्या सुटीत विक्री होणारी विविध खेळणीचेही आगमन आता बाजारपेठेत होऊ लागले आहे.

जोपर्यंत भारतात जास्त उत्पादन होत नाही तोपर्यंत आपल्याला चीनच्या मालावर अवलंबून रहावेच लागेल. आज अनेक क्षेत्रांत त्यांचे वर्चस्व आहे, हे नाकारून चालणार नाही. पूर्णत: बंदी आणणे शक्य होणार नाही. असे झाले तर अनेक भारतीय उद्योग बंद पडतील.
- दिलीप साळवेकर, माजी सरकार्यवाह, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स



मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कविता म्हणजे हृदयाचा आवाज

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

हृदयातील भावना वाचकाच्या मनाला स्पर्श करतात. समाजात जागृती घडविण्याचे कार्य करतात. हा आतला आवाज म्हणजे कविता असे प्रतिपादन ज्येष्ठ कवयित्री शोभा बडवे यांनी केले.

येथील मराठा दरबार सभागृहात महिला दिन व सावित्रीबाई फुले यांच्या स्मृती दिनानिमित्ताने परिवर्तन महिला मंडळ व मराठी साहित्य संघाच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'वेध स्री मनाचा' या काव्यवाचन कार्यक्रमात बडवे बोलत होत्या.

उद्योजक संजय फतनानी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी प्रमुख अतिथी अहिराणी साहित्यिक डॉ. एस. के. पाटील, आशालता देवळीकर, अलका कोठावदे, मनपा गटनेते नीलेश आहेर, नगरसेविका जिजाबाई बच्छाव, राजेंद्र भोसले, परिवर्तनच्या अध्यक्षा विजयालक्ष्मी अहिरे, मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष रमेश उचित आदी उपस्थित होते.

बडवे पुढे म्हणाल्या, कविता समाजाला आरसा दाखवते. कविता अल्पाक्षरी असून, कमी शब्दात प्रभावीपणे आपले मत मांडणे यात कवीचे कसब असते. या कार्यक्रमात नाशिकच्या मुरलीधर गोटू कोतकर सेवाभावी संस्थेतर्फे विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या महिलांचा मानपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अॅड. वैदेही भगिरथ, भारती जाधव, पुष्पा चव्हाण, पिंकी मेहता, वंदना दशपुते, समिना कुरेशी यांचा सत्कार करण्यात आला. काव्यस्पर्धेचे परिक्षण रवीराज सोनार, संतोष कांबळे, सतीश कलंत्री यांनी केले. प्रास्ताविक विजयालक्ष्मी अहिरे यांनी केले. गितांजली बाफना व रवीराज सोनार यांनी सूत्रसंचलन तर नूतन चौधरी व प्रतिभा अहिरे यांनी आभार मानले.

काव्यवाचन स्पर्धेचा निकाल

समाधान शिंपी (प्रथम), विशाल धिवरे (द्वितीय), माधवी नेरकर (तृतीय), नंदकिशोर ठोंबरे, रवीराज थोरात, सीमा कासार (उत्तेजनार्थ).

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कंत्राटी कर्मचाऱ्यांसोबत बैठकीस अखेर मुहूर्त ?

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी विद्यापीठ भरती व कंत्राटी कामगार धोरणाच्या विरोधात केलेल्या आंदोलनास आज ९० दिवस झाले आहेत. इतका मोठा कालावधी उलटूनही पालकमंत्री तथा वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या या समस्या विचारात न घेतल्याने आंदोलनकर्त्यांमध्ये नाराजी आहे. पालकमंत्र्यांच्या प्रतिसादाअभावी नाराज आंदोलकांनी अखेर आमदार बाळासाहेब सानप यांच्या संपर्क कार्यालयावर ठिय्या आंदोलन केले. यावर आमदार सानप यांनी १५ मार्च रोजी दुपारी विधानभवनात या संदर्भात बैठक घेण्याचे आश्वासन दिले आहे.

कर्मचाऱ्यांना वारंवार आश्वासने देऊन तोडगा काढला जात नसल्याबाबत आंदोलकांची नाराजी होती. काही दिवसांपूर्वी सार्वजनिक वाचनालयात आयोजित कार्यक्षम आमदार पुरस्कार वितरणात कर्मचाऱ्यांनी पालकमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी लवकरच बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय शिक्षण तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी दिले होते. मात्र, अद्याप बैठक न झाल्याने संतप्त कर्मचाऱ्यांनी आमदार सानप यांचे संपर्क कार्यालय गाठून ठिय्या मांडला. यावर आमदारांनी आरोग्य विद्यापीठाचे कुलसचिव कालिदास चव्हाण यांना चर्चेसाठी बोलावले. त्या वेळी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी, विद्यापीठाचे कुलसचिव आणि आमदार सानप यांच्यात चर्चा होऊन पालकमंत्री महाजन यांच्यासोबत १५ मार्च रोजी बैठक घेण्याचे आश्वासन आमदार सानप यांनी कर्मचाऱ्यांना दिले असल्याची माहिती कंत्राटी कामगार कर्मचारी संघटनेच्या वतीने सीताराम ठोंबरे यांनी दिली.

सानप यांनी दिलेल्या आश्वासनानुसार आता ही बैठक १५ मार्च रोजी दुपारी १ वाजता विधानभवनात होणार आहे. बैठकीत वैद्यकीय शिक्षणमंत्री महाजन यांच्यासोबत आमदार सानप, तसेच कामगार संघटनेचे सात पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. बैठकीला मंत्र्यांनी बगल देऊ नये, अशी अपेक्षा तीन महिन्यांपासून आंदोलन करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

दत्तक नाशिककरांच्या हाती भोपळाच!

0
0

मुख्यमंत्र्यांसह स्थानिक भाजप नेत्यांकडून उपेक्षाच अधिक

vinod.patil@timesgroup.com

Tweet : @vinodpatilMT

नाशिक : 'नाशिकला कोणी वाली नाही, अशी खंत नाशिककरांना वाटते. त्यामुळे तुम्ही मला एकहाती सत्ता द्या, मी तुम्हाला विकास देतो. मी आजपासून नाशिक दत्तक घेतो', या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भावनिक आवाहनाला नाशिककरांनी प्रतिसाद देत भाजपला महापालिकेत एकहाती सत्ता दिली. त्या भाजपच्या नाशिकमधील सत्तेला आज एक वर्ष पूर्ण होत आहे. परंतु, वर्षभरात नाशिककरांच्या हाती भोपळाच आला आहे. नाशिकच्या विकासाची स्वप्ने दाखविणाऱ्या मुख्यमंत्र्यांसह पालकमंत्री आणि स्थानिक भाजप नेत्यांकडून दत्तक नाशिकची उपेक्षाच अधिक केल्याचे चित्र आहे. एकही आश्वासनाची पूर्तता झाली नसल्याने नाशिककरांचा भ्रमनिरास झाला आहे.

नाशिक दत्तक घेण्याच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे फळ म्हणून गेल्या वर्षी फेब्रुवारीत झालेल्या महापालिका निवडणुकीत १२२ पैकी तब्बल ६६ जागांवर भाजपला विजय मिळाला. निवडणुकांपूर्वी भाजपने पारदर्शक कारभार आणि नाशिकच्या विकासाची मोठ मोठी स्वप्ने दाखवली. आंतरराष्ट्रीय विमानसेवा, मेट्रो आणि मोनोरेल, आय. टी. हब, रोजगार निर्मिती उद्योग, शहरात सीसीटीव्ही, बहुमजली पार्किंग, पर्यावरणपूरक बससेवा, ई-रिक्षा, तपोवन पर्यटन विकास, क्रीडा प्रबोधिनी,'बेटी बचाव' योजनेंतर्गत पाच हजार रुपये भाजपच्या अशा घोषणांनी नाशिककर प्रभावित झाले होते. परंतु, वर्षभरात या आश्वासनांपैकी एकाही आश्वासनाची पूर्तता होऊ शकली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिकेच्या कामकाजाचा आढावा घेतल्याने नाशिककरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु, ही बैठकही निव्वळ स्टंट ठरली असून, गेले वर्षभर नाशिककरांच्या हाती केवळ भोपळाच आला आहे. उलट नाशिकमधील उद्योगांचे इतरत्र स्थलांतर होत असून, नाशिककरांवर कराचा बोजा लादला गेला आहे.

गेल्या वर्षभराच्या भाजपच्या कारकिर्दीत नाशिककरांच्या जीवनमानात काडीमात्रही फरक पडलेला नसून, उलट अडचणी अधिकच वाढल्या आहेत. शहरातील वाहतूक व पार्किंग या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले असून, वादग्रस्त विकास नियंत्रण नियमावलीने नाशिककरांची डोकेदुखी वाढवली आहे. कपाट प्रश्न काही अंशी सुटला असला तरी, सहा व साडेसहा मीटरवरील टीडीआर बंदीमुळे बांधकाम व्यवसायाच्या अडचणी कायम आहेत. सांडपाण्याचा प्रश्न कायम राहिल्याने गोदावरी प्रदूषणाच्या विळख्यात अडकली आहे. वर्षभरात बससेवा ताब्यात घेण्यास चालना देण्याव्यतिरिक्त एकही ठोस काम भाजपकडून झालेले नाही. त्यामुळे दत्तक नाशिककरांची वर्षभरात पूर्णत: उपेक्षा झाली आहे. स्थानिक भाजप नेत्यांनी तर नाशिककरांवर पश्चातापाची वेळ आणली आहे.

-

हे प्रश्न कायम

वादग्रस्त कपाट प्रश्न, निळी व लाल पूररेषा, गावठाण पुनर्विकास, सीसीटीव्ही प्रकल्प, सहा, साडेसहा मीटर टीडीआर धोरण, महापालिकेचा आकृतीबंध, सफाई कर्मचाऱ्यांची भरती, आंतरराष्ट्रीय विमानसेवा, गोदावरी प्रदूषण, पार्किंग, अंतर्गत वाहतूक, उद्योगांचे स्थलांतर

अ'पारदर्शकता'

नालेसफाईची चौकशी दडपली, वादग्रस्त डस्टबिन घोटाळा दडपला, भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशी दडपल्या, एलईडी घोटाळ्यावर कारवाई नाही

वर्षभराची उपलब्धता

बससेवा ताब्यात घेण्याची तयारी, स्मार्ट लायटिंग प्रकल्पाला मंजुरी, तीन नवीन समित्यांची निर्मिती, भूमिगत तारांसाठी ८७ कोटी, नगरसेवकांना ७५ लाख निधी

गेले वर्षभर नागरिकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न केले. नागरिकांना निवडणुकीत दिलेल्या आश्वासनांची पूर्ती करण्याचे काम सुरू आहे. पारदर्शक कारभार आणि विकासकामांना गती देण्याचा प्रयत्न केला आहे.

- रंजना भानसी, महापौर, नाशिक

नाशिककरांचा वर्षभरात सत्ताधाऱ्यांनी भ्रमनिरास केला आहे. दत्तक नाशिक विकासकामांनाच पोरके झाले आहे. शहरात कुठेही विकासाच्या खुणा दिसत नाहीत. नाशिकमध्ये उद्योगधंदे वा मूलभूत सुविधांचीही वानवा झाली आहे.

- अजय बोरस्ते, विरोधी पक्षनेता, मनपा

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

हरसूलच्या केशरचा युरोपात ‘गोडवा’

0
0

म. टा. वृत्तसेवा, त्र्यंबकेश्वर

आंबा म्हंटले की कोकण, असे समिकरणच झाले आहे. आंब्याची निर्यात करण्यातही कोकण बऱ्यापैकी आघाडीवर आहे. मात्र आता त्र्यंबकेश्वर सारख्या अतिदुर्गम भागातील आंबाही युरोपात गोडवा पेरण्यासाठी सज्ज झाला आहे. त्र्यंबक तालुक्यातील दुर्गम डोंगराळ भागात राहणाऱ्या आदिवासी शेतकरी कुटुंबाने आकाशाला गवसणी घालणारे प्रयाग करत ही यशोगाथा रचली आहे. एकरी तीन लाखांची हमी देणाऱ्या केशर आंब्यांची लागवड करण्याचा अनोखा प्रयोग कौतुकास पात्र ठरला आहे.

सुंदराबाई दामोदर वाघेरे आणि विलास त्र्यंबक भोये या दोन शेतकऱ्यांना महाराष्ट्र सरकारच्या कृषी खात्याने नुकतेच आंबा एक्सपोर्ट प्रमाणपत्र दिले आहे. हरसूलच्या अलिकडे साधरणत: पाच किलोमीटर अंतरावर चिंचवड हे गाव आहे. येथील शेतकरी जनार्दन वाघेरे हे नोकरी करतात. त्यांचे आई-वडील सुंदराबाई आणि दामोदर वाघेरे यांनी परिसरात पाच हजार केशर आंब्याची झाडे लावली आहेत. झाडे लावताना त्यांनी जंगली आंबा आणि केशर आंबा यांचे कलम तयार केले. ३ बाय १४ फुटावर एकरी हजार झाडांची लागवड केली. साधरणत: पाच वर्षांपासून त्यांचे प्रयोग सुरू आहेत. नदीतून पाण्याचे ठिबक करून त्यांनी पाणी टंचाईवरही मात केली. स्वत: जनार्दन वाघेरे हे कृषी पदविकाधारक आहेत. तर विलास भोये हे देखील उच्चशिक्षीत आहेत. त्यांच्यासोबत अमोल भोये, नितीन भोये यांनी एकत्रितपणे शेतीत प्रयोग राबविले. मोबाइलचा स्मार्ट वापर करून इस्त्राइल व जर्मन कृषी तंत्रज्ञानाचा अभ्यास केला.

सेंद्रिय खतांचा वापर

वाघेरे आणि भोये यांच्या बागेतील झाडांना दोन वर्षांपासून फळ घेण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षी त्यांनी सेंद्रिय पद्धतीने आंबा पिकवून तो जागेवर ५० रुपये किलोप्रमाणे सहा टन केशर आंबा विकला. झाडांना सेंद्रिय खते घालणे, फवारणी करतांना रसायनांचा वापर टाळणे, आंबा पिकवितांना कोणतेही रासायन न वापरणे आदी नियम त्यांनी पाळले. वर्तमानपत्राचा कागद वापरून पंधरा दिवसात आंबा पिकविण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले आहे.

थायलंडहून मागविल्या पिशव्या

यंदा आंबा निर्यात करायचा असे वाघेरे यांनी ठरविले आहे. त्यासाठी लागणारे सर्व सोपस्कार त्यांनी पूर्ण केले आहेत. त्यांच्या सोबत विलास भोये हे शेतकरी देखील एक्सपोर्ट क्वालिटीचे आंबा घेत आहेत. त्यांच्याकडेही दीड हजार झाडे आहेत. या आंब्यांना लावण्यासाठी थायलंड येथून पिशव्या मागविण्यात आल्या आहेत. तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी, सहायक कृषी अधिकारी जालंदर बारे, उपविभागीय कृषी अधिकारी गोकुळ वाघ, जिल्हा कृषी अधिकारी पी. एम. जगताप यांचे त्यांना मागर्दशन लाभले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्ट नाशिकची स्मार्ट ई-लायब्ररी

0
0

वाचनसंस्कृतीचे दुवे- डॉ. बाळकृष्ण शेलार

नाशिक शहराला ग्रंथालयांची समृद्ध परंपरा आहे. या ग्रंथालयांतूनच अनके उत्तुंग व्यक्तिमत्वे घडली आहेत. काळानुसार ग्रंथालयांच्या रचनेत, सोयी-सुविधांमध्ये बदल झाले आहेत. ग्रंथालये स्मार्ट होऊ लागली आहेत. स्मार्ट इंडिया, स्मार्ट नाशिककरांचे खरे प्रतिनिधित्व करणारी लायब्ररी म्हणजे नाशिकरोडचे अटल ज्ञान संकुल होय. तब्बल नऊ हजार चौरस फूट बांधकाम असलेली ही उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठी ई-लायब्ररी आहे. तीचे उद्घाटन २२ फेब्रुवारी २०१४ रोजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले. नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांच्या राजर्षी शाहू महाराज सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून सुरू झालेल्या महापालिकेच्या या लायब्ररीची घौडदोड वेगाने सुरू आहे. चार वर्षांत येथील ६४ विद्यार्थ्यांना सरकारी तसेच आयटीसारख्या कंपन्यांमध्ये प्रतिष्ठेच्या नोकऱ्या मिळाल्या आहेत.

अत्याधुनिक सुविधा

नाशिकमधील ही पहिली वायफाय अभ्यासिका आहे. माफक फी, शिस्त आणि विनम्र सेवा ही येथील वैशिष्ट्ये. अत्याधुनिक सुविधा, कॉम्प्युटर लॅब, ई-ग्रंथालय, ई-सुरक्षा व्यवस्था, स्वच्छता, ग्रुप डिस्कशन रूम, स्टडी रूम असलेल्या या लायब्ररीची क्षमता साडेचारशे विद्यार्थ्यांची आहे. त्यामुळे अनेकांना प्रवेशासाठी नंबर लावावा लागतो यावरुन या लायब्ररीचे यश दिसते. दहा एमबीपीएस स्पीडची वायफाय सुविधा लायब्ररीत आहे. एमपीएससी, यूपीएससी, बँक, सी. ए., पोलिस दल, सुरक्षा दल, रेल्वे, विक्री कर, इंजिनीअरिंग, मेडिकल आदी परीक्षांच्या तयारीसाठी विद्यार्थी मेहनत घेतात. सकाळी आठ ते रात्री दहा अशी वेळ आहे. आठ कर्मचारी येथे सेवेसाठी आहेत. नाममात्र शुल्क व देणगीतून लायब्ररीचा कारभार चालतो. दोन महिन्यांसाठी प्रवेश दिला जातो. विद्यार्थी नियमित येतो की नाही यासाठी बायोमेट्रिक प्रणाली आहे. त्यामध्ये नोंदणी झाल्यानंतरच ग्रंथालय, संगणक कक्ष व इतर ठिकाणचे प्रवेशद्वार उघडते. यावरून येथील आधुनिकतेची कल्पना यावी. त्या जोडीला प्रत्येक कक्षात सीसीटीव्ही आहे. या दोन्ही यंत्रणांमुळे अनोळखी व्यक्ती येथे प्रवेश करू शकत नाही. दोन्ही मजल्यांवर वायफाय सुविधा सुरुवातीपासून आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना इंटरनेट सेवेचा लाभ घेता येतो. संगणक कक्षात बसून हवी ती पुस्तके, संदर्भ इंटरनेटवरुन घेता येतात. शैक्षणिक व स्पर्धा परीक्षांशी संबंधीत वेबसाइटस येथे बघता येतात. सोशल साइट्स ब्लॉक आहेत. स्वतःचा लॅपटाप वापरण्यास परवानगी आहे. मराठी व इंग्रजी वृत्तपत्रे वाचनासाठी वेगळी सोय आहे. राष्ट्रीय सुट्या वगळल्यास बाराही महिने अटल ज्ञान संकुल सुरू असते. थंड पाण्यासाठी कुलर, पुरेसे पंखे, खेळती हवा, पुरेशी प्रकाशव्यवस्था आहे. विद्यार्थ्यांना चर्चा करायची झाल्यास दोन रुम्स आहेत.

पहिल्या मजल्यावर फक्त मुलांसाठी अभ्यास कक्ष आहे. दुसऱ्या मजल्यावर मुले व मुलींसाठी स्वंतत्र अभ्यास कक्ष आहेत. मुले व मुलींना स्वतंत्र टिफीन रुम, वॉश रूम आहे. संपूर्ण ग्रंथालयाची नियमित स्वच्छता राहील, यासाठी दक्षता घेतली जाते. दोन्ही मजल्यावर व प्रवेशद्वारांवर शू रॅक आहेत. विद्यार्थ्यांच्या वाहनांसाठी पार्किंगची सुविधा आहे. प्रत्येक मजल्यावर वॉटर कुलर आहेत. विद्यार्थ्यांना मदतीसाठी अकरा जणांचा कर्मचारी वृंद आहे. मुलांना गॅलरीत टेबल खुर्ची घेऊन अभ्यासाची सोय आहे.

संघर्षाची प्रेरणा

ग्रंथालय तीन मजली आहे. तळमजल्यावर ग्रुप डिस्कशन हॉल, वाचन कक्ष, संगणक कक्ष, ग्रंथालय, पेपर वाचन दालन आहे. पहिल्या मजल्यावर मुलांसाठी रीडिंग रूम आहे. या ग्रंथालयाचा लाभ घेण्यासाठी मनमाड, निफाड, मालेगाव, औरंगाबाद, नगर आदी ठिकाणांहून विद्यार्थी येतात. काही विद्यार्थी ग्रंथालयाच्या परिसरातच खोली घेऊन राहतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी स्पर्धा व व्यक्तिमत्व विकास शिबिरे घेतली जातात. जे विद्यार्थी ग्रंथालयाची मदत घेऊन शासकीय, खासगी क्षेत्रात उच्च पदावर नोकरी करत आहेत, त्यांचा सत्कार दरवर्षी केला जातो. अटल बिहारी वाजपेयींच्या नावे सुरू केलेल्या या लायब्ररीच्या वर्धापनदिनी हा सत्कार होतो. या विद्यार्थ्यांचे रजिस्टर ठेवलेले आहे. त्यामुळे इतरांना मार्गदर्शनासाठी या विद्यार्थ्यांशी संपर्क साधता येतो.

अडथळे दूर

नाशिकरोडच्या शांत शाहूनगर कॉलनीत अटल ज्ञानसंकुल आहे. इमारत तीन मजली आहे. नऊ हजार चौरस फुटांत बांधकाम आहे. ही जागा महापालिकेच्या तांत्रिक समस्येत अडकली होती. नगरसेवक मोरुस्कर यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे पाठपुरावा करून हा मोक्याच्या जागेवरील भूखंड लायब्ररीसाठी उपलब्ध करून घेतला. त्यातूनच एक आदर्श व भव्य ई-लायब्ररी सुरू झाली. टेक्नोसॅव्ही युवक-युवकांसाठी ही लायब्ररी वरदान ठरली आहे.

यांनी दाखवली चमक

सुरू होऊन चार वर्षे झालेल्या या लायब्ररीचा उपयोग करून ६४ युवक-युवतींनी करिअर घडवले आहे. चिंचोली (ता. सिन्नर) येथील गरीब घरचा विकास नवाळे एमपीएससीमध्ये नाशिकमध्ये सहावा आला. तो आता विक्रीकर अधिकारी आहे. अमोल उगलमुगले एमपीएससी झाला असून मंत्रालयात क्लास वन अधिकारी आहे. पूजा लांडगे, जयश्री कोठुळे मंत्रालयात सेवेत आहेत. दिव्यता कल्पवृक्ष सीए झाली आहे. अचल खापर्डे बँकेत, गौरी भदे वीज कंपनीत, तर श्वेता काळे कारागृहात कर्मचारी आहे.

या हव्यात सुविधा

या ग्रंथालयाची क्षमता साडेचारशे विद्यार्थ्यांची आहे. अनेकांना प्रतीक्षा करावी लागते. त्यामुळे येथील क्षमता वाढविण्याची मागणी आहे. पुरेशा खुर्च्या, संगणक असले तरी ते कमी पडत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे. पार्किंगपासून अन्य सर्व सुविधा उत्तम आहेत. व्हर्च्युअल क्लास रूम, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या सुविधांची गरज आहे. डिस्टन्स लर्निंग, व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून तज्ज्ञ व्यक्ती, संस्थांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळावे यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे नगरसेवक संभाजी मोरुस्कर यांनी सांगितले.

इतर ग्रंथालयांच्या तुलनेत अटल ज्ञान संकुल नक्कीच उत्तम आहे. पिण्याच्या पाण्यापासून पार्किंगपर्यंत तसेच वायफायपासून इंटरनेटपर्यंत सर्व काही अत्याधुनिक आहे. राज्यात आदर्श असलेल्या या ग्रंथालयाला विद्यार्थ्यांनी एकदा तरी भेट द्यावी.

- वरुण पगारे, विद्यार्थी

अटल ज्ञान संकुलातील सोयी-सुविधा अत्यंत उत्तम दर्जाच्या आहेत. येथे आल्यानंतर विद्यार्थ्यांची समर्पण वृत्ती, मेहनत पाहता इतरांनाही ध्येय प्राप्तीची प्रेरणा मिळते. स्मार्ट नाशिकप्रमाणेच ही स्मार्ट लायब्ररी नाशिकचे भूषण आहे.

- स्वाती कांबळे, विद्यार्थी

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

शहरात आजपासून गोदा जागृती

0
0

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

प्राचीन काळापासून मानवी वस्ती नदीलगत वसली आहे. त्याला पाणी हेच मुख्य कारण आहे. मुबलक पाणी नदी देत असल्याने मानवी वस्तीचा विकास होत गेला. मात्र, या विकासाबरोबर नदीचे प्रदूषणही वाढत गेले. नदीशिवाय मानवी अस्तित्व शक्यच नसल्याने नद्या जिवंत ठेवण्यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृतीची गरज आहे. हे ओळखूनच वारसा व गोदावरीशी नाते जोडूया या संस्थांतर्फे आज, १४ मार्च रोजी कृतिशील नदी दिन व २२ मार्च रोजी जागतिक पाणी दिनानिमित्त आठवडाभर विविध कार्यक्रम होणार आहेत.

वारसा व गोदावरीशी नाते जोडूया या संस्थांतर्फे आज नाशिकरोड येथील कारवी ग्रंथालयात दुपारी ४ वाजता भाषातज्ज्ञ अमोल पाध्ये यांच्याशी 'गोदावरी' या शब्दाची उत्पत्ती व नदी या अनुषंगाने नाशिककरांची भूमिका या विषयावर गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे. शिल्पा डहाके व नीलेश गावडे त्यांच्याशी नदी या विषयावर चर्चा करतील.

१६ मार्च रोजी कोपरगाव येथे सकाळी ९ वाजता गोदावरीशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमाचे आयोजन लेखिका मधुमालती जोशी करणार असून, या कार्यक्रमात कोपरगावचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे, स्वच्छतादूत सुशांत घोडके, कोपरगाव ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष छोटूभार्इ जोबनपुत्रा उपस्थित राहतील. या गप्पाटप्पांमध्ये कोपरगावमध्येही गोदावरीचे प्रदूषण थांबविण्यासाठी, तसेच जनजागृतीसाठी प्रयत्न होणार आहेत.

१७ मार्च रोजी उंटवाडी येथील सिटी सेंटर मॉलजवळील म्हसोबा मंदिरात दुपारी ४ वाजता पर्यावरण अभ्यासक जुर्इ पेठे यांच्याशी गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे. या वेळी नंदिनी नदीच्या स्वच्छतेबद्दल काम करणारे अमित कुलकर्णी यांच्याशी चर्चा होणार आहे.

२० मार्च रोजी अबीर क्रिएशनतर्फे गोदाघाटावरील यशवंत महाराज पटांगणात दुपारी ४ वाजता कॅलिओग्राफीतून गोदावरी हा कार्यक्रम होणार आहे. कार्यक्रमात कॅलिओग्राफी कलाकार पूजा, नीलेश व त्यांचा ग्रुप कॅलिओग्राफीतून गोदावरी मांडणार आहेत.

२०-२२ मार्च रोजी गोदाघाटावर गोदावरी या विषयावर फोटोग्राफी प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. प्रदर्शनात प्रसिद्ध फोटोग्राफर नीलेश गावडे गोदावरी व फोटोग्राफी या विषयावर मार्गदर्शन करतील. नदी दिनानिमित्त आयोजित केलेल्या फोटोग्राफी स्पर्धेच्या विजेत्यांना पारितोषिके दिली जाणार आहेत. प्रदर्शनात मुंबर्इ रिव्हर फोटो प्रोजेक्ट आणि मुंबर्इ येथील रिव्हर मार्च फॉर इंडिया या संस्थाही आपला सहभाग नोंदविणार आहेत. त्यामुळे नाशिकसह मुंबर्इच्या नद्यांची स्थिती अनुभवता येणार आहे.

२४ मार्च रोजी कॉलेजरोड येथील पुस्तक पेठ येथे मुंबर्इ रिव्हर फोटो प्रोजेक्ट आणि रिव्हर मार्च फॉर इंडियाचे सदस्य असल्म सय्यद यांच्याशी नदी या विषयावर गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे.

कृतिशील नदी दिन व जागतिक पाणी दिनानिमित्त वारसातर्फे आठवडा विविध कार्यक्रम राबविले जाणार आहेत. या उपक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी गावडे (९६७३९९४९८३), पाध्ये (९८२२११०९१६), डहाके (७०८७१९०७३८) यांच्याशी संपर्क साधावा. गोदावरी नदीबाबत जनजागृती, तसेच गोदावरीचे महत्त्व लक्षात आणून देण्यासाठी हे उपक्रम राबविले जात आहेत.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

स्मार्टवर खैरे, बग्गांची वर्णी

0
0

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर आमदार व खासदारांना घेण्याच्या सत्ताधारी भाजपचा ठराव राज्य सरकारने विखंडित केल्यानंतर अखेर सत्ताधाऱ्यांनी उतरत्या क्रमाने काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सदस्यांना संचालक मंडळावर घेण्याची तयारी दाखवली आहे. स्मार्ट सिटीवर दोन संचालकांच्या निवडीचा प्रस्ताव येत्या २० तारखेच्या महासभेत सादर केला जाणार आहे. त्यामुळे काँग्रेसकडून शाहू खैरे, तर राष्ट्रवादीकडून गुरुमित बग्गा यांची वर्णी लागणार आहे.

स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर महापालिकेतल्या लोकप्रतिनिधींनाच घेण्याचा नियम आहे. महापौर, सभागृहनेता, विरोधी पक्षनेत्यासह गटनेत्यांना स्थान देण्यात आले आहे, तसेच पक्षाच्या उतरत्या क्रमानुसार त्यानंतरच्या दोन पक्षांच्या सदस्यांना संधी देण्याची तरतूद आहे; परंतु भाजपने ही तरतूद मोडीत काढत आमदार, खासदारांना संचालक मंडळावर घेण्याचा ठराव केला होता. त्या विरोधात शाहू खैरे व गुरुमित बग्गा यांनी सरकारकडे तक्रार केली होती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा दावा डावलून केलेला हा ठराव राज्य सरकारनेच बेकायदेशीर ठरवला. त्यामुळे भाजपवर नामुष्की ओढवली. येत्या २० तारखेला महासभा होत असून, त्यावर स्मार्ट सिटीसाठी दोन संचालकांच्या निवडीचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. काँग्रेसकडून गटनेता शाहू खैरे, तर राष्ट्रवादीकडून बग्गा यांची शिफारस करण्यात आली आहे. त्यामुळे खैरे व बग्गा यांची स्मार्ट सिटीच्या संचालक मंडळावर नियुक्ती होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.

रोबोटिक खरेदीचा डाव

महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे एक रोबोट मशीन आधीच डोईजड झाले असताना, गोदावरी नदीच्या प्रदूषणमुक्तीसाठी पुन्हा दुसरे रोबोटिक मशीन खरेदीचा प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात आला आहे. यापूर्वी खरेदी केलेल्या रोबोटिक मशीनचा मेंटेनन्स महापालिकेला परडवडत नाही. त्यात पुन्हा दुसऱ्या रोबोटिक मशीन खरेदीचा प्रस्ताव महासभेवर आला असून, आयुक्तांच्या त्रिसूत्रीत तो अडकण्याची शक्यता आहे. गेल्या महासभेत त्रिसूत्रीमुळे अनेक प्रस्ताव मागे घेण्यात आले होते. त्यामुळे या प्रस्तावावरही बालंट आले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


कोकणखोरे जल आराखड्यात

0
0

शुभवार्ता

म. टा. वृत्तसेवा, जेलरोड

कोकणखोरे जल आराखड्यात सिन्नर पाणी प्रकल्पाचा समावेश करण्यास सरकारने मान्यता दिल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.

गारगाई- वैतरणा- कडवा- देवनदी लिंक या सिन्नर तालुक्यासाठी वरदान ठरणाऱ्या प्रकल्पासाठी अहवाल बनवण्याचे काम सुरू असून, हा अहवाल डिसेंबर २०१८ पर्यंत महाराष्ट्र सरकारला सादर होणार आहे. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण कायदा २००५ अन्वये प्रत्येक नदीखोऱ्याचा आराखडा बनवणे जलसंपदा विभागास बंधनकारक आहे. तसे निर्देशच उच्च न्यायालयाने पाण्यावरून दाखल दोन याचिकांवर निर्णय देताना दिले होते. त्या अनुषंगाने खासदार गोडसे आणि जलसिंचन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी सिन्नर पाणी प्रकल्पाचा समावेश कोकण खोऱ्याच्या बृहत् जल आराखड्यात करण्याची मागणी केली होती. जलसंपदा विभागाने त्यास सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. उत्तर महाराष्ट्राच्या मुख्य अभियंत्यांनी त्याबाबतचे पत्र कोकण प्रदेशच्या मुख्य अभियंत्यांना पाठविले आहे. राज्य सरकारनेही निर्देश दिले आहेत. गोडसे यांच्या मागणीस यश येत असून, नाशिकसाठी वरदान ठरणाऱ्या पाच टीएमसी गंगा (एकदरे)- गोदावरी (गंगापूर धरण) लिंक प्रकल्पाचा समावेश यापूर्वीच कोकण खोऱ्याच्या जल आराखड्यात झाला आहे. सिन्नरसाठी वरदान ठरणाऱ्या सात टीएमसी प्रकल्पाचाही कोकण जल आराखड्यात समावेश करण्याचे आश्वासन कोकण विभागाने दिले आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कुलगुरुंच्या कॅबिनबाहेर मोबाइल जॅमर

0
0

आरोग्य विद्यापीठाने मागविल्या निविदा; निर्णयावर आश्चर्य

jitendra.tarte@timesgroup.com

Tweet : jitendratarte@MT

म. टा. प्रतिनिधी , नाशिक

एरव्ही कुठल्याही विद्यापीठ परिसरात केवळ परीक्षा विभागाभोवती पहारा देणारे मोबाइल जॅमर लवकरच आरोग्य विद्यापीठात कुलगुरूंच्या कार्यालयाबाहेरही लावले जाणार आहे. ही यंत्रणा कार्यान्वित करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने मागविलेल्या निविदा आज (१४ मार्च) उघडल्या जाण्याची शक्यता आहे. या यंत्रणेचे कुलगुरूंच्या कार्यालयाभोवती प्रयोजन काय, असा प्रश्न निविदेचे वृत्त वाचून नागरिकांसह शैक्षणिक वर्तुळालाही पडला आहे.

भविष्यातील डॉक्टर्स घडविणाऱ्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मुख्यालयात कुलगुरुंच्या कॅबिन परिसरात हे 'मोबाइल जॅमर' बसविण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. टूजी, थ्री जी, फोर जी , ब्लू टूथ, सीडीएमए, व्हीएचएफ (वॉकी-टॉकी), यूएचएफ (वॉकी -टॉकी) यासारख्या फ्रिक्वेन्सींना अटकाव करण्यासाठी कुलगुरू कार्यालय परिसरात ५० ते ५०० मीटरपर्यंतच्या अंतरात ही यंत्रणा कार्यान्वित राहणार आहे.

‘जॅमर’साठी मागवली निविदा

म. टा. प्रतिनिधी, नाशिक
विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) फेब्रुवारी २०१६ मध्ये परीक्षा नियंत्रण मंडळाला परीक्षा केंद्रांमध्ये ‘लो पॉवर्ड जॅमर’ बसविण्यासाठी परवानगी दिली होती. यानुसार परीक्षार्थींकडून परीक्षेदरम्यान गैरप्रकार घडू नये, यासाठी परीक्षेशी संबंधित विभागांमध्ये काही ठिकाणी ही सुविधा आढळते. मात्र, कुलगुरूंच्या कार्यालयाचा परिसर जॅमरच्या प्रभावक्षेत्रात आणण्याची ही बहुदा पहिलीच घटना असावी, अशा प्रतिक्रिया शैक्षणिक वर्तुळातून व्यक्त झाल्या. आरोग्य विद्यापीठाने या सेवेसाठी पुरवठादारांना केलेल्या आवाहनात कुलगुरूंच्या कार्यालयात मोबाइल जॅमर बसविण्याचा स्पष्ट उल्लेख असल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते आहे.

विद्यापीठात अनेक कामाच्या निमित्ताने येणाऱ्या पाहुण्यांचे मोबाइल्स महत्त्वाच्या बैठकीदरम्यानही सुरूच राहतात. अनेकदा पेपर प्रेझेंटेशनच्या वेळेतही यास अपवाद राहत नाही. परिणामी महत्त्वाच्या वेळी मोबाइलमुळे निर्माण होणाऱ्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी जॅमरसारखी आधुनिक यंत्रणा विद्यापीठ प्रशासनास आवश्यक वाटल्याचे कुलसचिव डॉ. के. डी. चव्हाण यांनी सांगितले. चांगल्या शैक्षणिक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी ‘मोबाइल जॅमर’चा निर्णय हा उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. चव्हाण यांनी व्यक्त केला. आवश्यकता असेल त्याच वेळेला हे जॅमर कार्यान्वित करता येईल, अशी यंत्रणा यासाठी बसविण्यात येणार आहे, असेही डॉ. चव्हाण म्हणाले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कृषिसेवक नियुक्त्या 'पेसा'मुळे लांबणार

0
0

म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड

पेसा कायद्यातील तरतुदींनुसार स्थानिक अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवार भरण्यास बंधनकारक करण्यात आले आहे. कृषी विभागामार्फत सुरू असलेली कृषिसेवक पदभरतीतील इतर संवर्गांतील उमेदवारांची नियुक्ती लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

कृषी विभागामार्फत राज्यात कृषिसेवक पदभरतीसाठी २०१५ मध्ये जाहिरात प्रसिद्ध झाली होती. भरतीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात आहे. या जाहिरातीवेळी पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रासाठीची पदे वेगवेगळी नव्हती. मात्र, २०१५ मध्येच पेसा आणि नॉन पेसाची पदे वेगळी करण्यात येऊन पेसा क्षेत्रासाठी केवळ स्थानिक अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांची पदभरती करण्यास सरकारने बंधनकारक केले. त्यामुळे आता विभागातील पेसा कार्यक्षेत्रात प्रथम स्थानिक अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांनाच पदनियुक्ती दिली जाणार आहे. उर्वरित संवर्गातील सर्व पात्र उमेदवारांना उपलब्ध पदसंख्येनुसार नॉन पेसा कार्यक्षेत्रात नियुक्ती दिली जाणार आहे. परंतु, पेसा क्षेत्रात यापूर्वी नेमणूक दिलेल्या अनुसूचित जमाती संवर्गाशिवय इतर संवर्गातील कृषिसेवकांनाही नॉन पेसा क्षेत्रात नेमणूक द्यावी लागणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत पदभरती प्रक्रियेत पात्र ठरलेल्या इतर संवर्गातील उमेदवारांना नियुक्तीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

डिसेंबर २०१५ मध्येच राज्यातील सर्व कृषी सहसंचालकांनी कृषी आयुक्तांकडे आदिवासी क्षेत्रातील रिक्तपदांची माहिती सादर केली होती. नाशिक विभागात ३१ कृषिसेवकांची पदे होती. पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेने या पदभरतीच्या परीक्षेचे आयोजन केले. या ३१ पैकी १९ पदे अनुसूचिती जमाती संवर्गासाठी, २ पदे भटके जमाती (क) तर १० पदे खुल्या संवर्गासाठी होती. नाशिक विभागासाठी खुल्या गटातून २ आणि माजी सैनिक गटातून ३ उमेदवारच मिळाले नाहीत. त्यामुळे जाहिरातीत नमूद ३१ पैकी २६ पदेच भरली जाणार आहेत. त्यातही पेसा कायद्याच्या अंमलबजावणीने प्रथम अनुसूचित जमातीतील १९ पदे भरली जातील. या सर्व पदांसाठी उमेदवार स्थानिक अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमातीमधील असणे बंधनकारक आहे. यासाठी नाशिक कृषी सहसंचालक कार्यालयाने वरिष्ठ कार्यालयाकडे मार्गदर्शन मागविले आहे.

पेसा आणि नॉन पेसा क्षेत्रातील कृषिसेवक पदसंख्या वेगवेगळी केली असून पेसा क्षेत्रासाठी स्थानिक अधिसूचित क्षेत्रातील अनुसूचित जमाती संवर्गातील उमेदवारांनाच नियुक्ती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यामुळे पेसा क्षेत्रात यापूर्वी नेमणूक दिलेल्या इतर संवर्गातील उमेदवारांना नॉन पेसा क्षेत्रात नियुक्त करावे लागणार आहे. या नियमामुळे पदस्थापनेत तांत्रिक तिढा निर्माण झाला आहे. याविषयी वरिष्ठांकडे मार्गदर्शन मागविले आहे.

- दिलीप झेंडे, विभागीय कृषी सहसंचालक, नाशिक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

चैत्रोत्सवापूर्वी सुरू होणार फ्युनिक्युलर ट्रॉली

0
0

दीपक महाजन, कळवण

श्री सप्तश्रुंग गडावर दर्शनाची सुलभता व्हावी म्हणून कार्यान्वित झालेला देशातील पहिलाच फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम पूर्ण झाले आहे. मार्च महिन्यात या प्रकल्पाचे लोकार्पण होण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयाला डिझास्टर व क्राऊड मॅनेजमेंट टीमकडून काही लेखी सूचना मिळाल्या आहेत. त्यांचीही पूर्तता लवकर होऊन ही ट्रॉली लवकरच भाविकांच्या सेवेसाठी सुरू होणार आहे. सरकारच्या वतीने टोल नोटीफिकेशन होऊन गॅझेटमध्ये त्याच्या नोंदीचे काम या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. आपत्ती व्यवस्थापन व 'यशदा'च्या टीमकडून सुचविण्यात आलेल्या त्रुटींचीही पूर्तता झाली आहे. त्यामुळे चैत्रोत्सव सुरू होण्यापूर्वी या प्रकल्पाचे उद्घाटन पार पडेल, असे चित्र सध्या गडावर आहे.

गेल्या आठ वर्षांपासून बीओटी तत्वावर फ्युनिक्युलर ट्रॉलीचे काम नागपूर येथील सुयोग गुरुबाक्षणी यांच्यामार्फत सुरू आहे. ३२ कोटींचा प्रकल्प प्रसंगानुरूप आतापर्यंत १०७ कोटीच्या घरात पोहोचला असल्याचा दावा केला जात आहे. २१ वर्षांच्या करारावर हा प्रकल्प सरकारने नागपूरच्या या कंपनीकडे दिला आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठी आठ वर्षांचा कालावधी लागला आहे. करार संपल्यावर याचे हस्तांतरण श्री सप्तश्रुंग देवस्थान ट्रस्टकडे करण्यात येणार असल्याची माहिती कळवणच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या सूचना

गेल्या काही महिन्यांपासून या ट्रॉलीच्या लोकार्पणाबाबत अनेकदा चर्चा झाली. ४ मार्च रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत याचे उद्घाटन होईल अशीही चर्चा होती. मात्र नाशिकचे जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांच्या उपस्थितीत या प्रकल्पाचे सद्यस्थितीतील काम, क्राऊड हॅन्डलिंग, मेटल डिटेक्टर इत्यादी कामांबाबत पाहणी झाली. तेव्हाच आपत्ती व्यवस्थापन व यशदाच्या डिझास्टर टीमने काही महत्त्वाच्या सूचना केल्या. त्यात प्रामुख्याने ट्रॉली व प्लॅटफॉर्म यात अंतर आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ठिकाणी रेलिंग नाही, माकडांचा उपद्रव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक जाळ्या बसविणे, पायऱ्या तीव्र उताराच्या असून, त्या एकसारख्या असाव्यात. जेणेकरून भाविक पडणार नाहीत. दर्शनासाठी श्री गणेश मंदिराची जागा अयोग्य असून त्यात बदल करावा, गर्दी वाढल्यास धक्काबुक्की होऊ नये अशा काही भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाच्या सूचना जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आल्या. त्यांचीही दखल घेण्यात आली असून, कामे पूर्णत्वाकडे आहेत.

अनेकांकडून हिरवा कंदील

ट्रॉलीबाबत भाविकांमध्ये प्रचंड कुतूहल आहे. काम पूर्ण नाही असा दावा केला जात असतांनाही काही व्हीआयपींसाठी ही ट्रॉली चाचणीच्या नावाखाली बिनबोभाट सुरू असते. तेव्हा कुणालाही हिच्या सुरू होण्याची व भाविकांच्या सुरक्षिततेची काळजी वाटत नसल्याची वस्तुस्थिती कुणीही नाकारणार नाही. लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यासाठी नागपूरची कंपनी प्रयत्नशील असली तरी नाशिकच्या चीफ फायर ब्रिगेड ऑफीसरकडून या प्रकल्पाला फायर सेफ्टी सर्टिफिकेट नुकतेच मिळाले आहे. चीफ इलेक्ट्रिक इन्स्पेक्टरकडून 'ना हरकत'ही मिळाले आहे. फॉरेन अर्थात युक्रेनच्या प्रोमेक कंपनीकडूनही या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळालेला आहे. रेल्वेचे सर्टिफिकेशन करणारी रिट्स या संस्थेने तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल व सिव्हिल कमिटीकडूनही या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळालेला आहे

उत्सवकाळात कसोटी

या ट्रॉलीसाठी प्रतिमाणसी ८० रुपये दर आकारला जाणार असून, अवघ्या ३ मिनिटांत ६० भाविक गडाच्या माथ्यावर पोहोचतील. थांब्याकरिता जी व्यवस्था करण्यात आली आहे. त्याठिकाणी १५० भाविक उभे राहू शकतील एवढी व्यवस्था आहे. त्यामुळे दर्शनासाठी वरती गेलेल्या भाविकांच्या खाली येण्याच्या संख्येवर व वेळेवर खाली वेटिंगला असलेल्या भाविकांचा प्रवास अवलंबून असणार आहे. एरवी याबाबत कुठलीही अडचण येणार नसली तरी चैत्र व नवरात्र उत्सवात होणारी गर्दी यापूर्वीच्या पायऱ्यांप्रमाणेच ट्रॉलीच्या ठिकाणी होईल. मात्र ट्रॉली व्यवस्थापनाच्या नियोजनावरच यात्रोत्सवाचे गणित अवलंबून असेल. व्हीलचेअर वरील भाविकांना या ट्रॉलीचा फायदा होणार असून चेअरवरूनच ते मंदिरात जाऊ शकतील. मात्र त्यासाठी जास्त दर त्यांना मोजावा लागेल. ट्रॉली यात्राकाळात रात्रंदिवस चालली तरी अवघे १५ हजार भाविकांची ने-आण होऊ शकते. पायऱ्या चढून जाणाऱ्या व ट्रॉलीद्वारे जाणाऱ्या भाविकांमध्ये संघर्ष होणार नाही याची काळजी घेण्याची मोठी जबाबदारी प्रशासन व व्यवस्थापन घटकांवर आहे.

क्राऊड मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट याद्वारे दिल्या जाणाऱ्या लेखी सूचना ट्रॉली व्यवस्थापनाला मिळाल्या आहेत. त्यांनी दिलेल्या सूचनांची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकरच हा प्रकल्प भाविकांसाठी खुला होईल.

-राजीव लुमबा, व्यवस्थापक, सुयोग गुरुबाक्षणी प्रा. लि.

सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रकल्पाला आवश्यक ती सर्व पूर्तता केली आहे. प्रकल्प सुरू करण्यासाठी शासनाचा हिरवा कंदील मिळावा म्हणून अहवाल दोन दिवसात पाठवण्यात येणार आहे. टोल नोटीफिकेशन झाल्यानंतर लोकार्पण होऊ शकेल. त्यासाठी आता खूप प्रतीक्षा करावी लागणार नाही.

-सुरेंद्र कंकरेज, कार्यकारी अभियंता, कळवण

दीड वर्षाचा प्रकल्प आठ वर्षे चालला असला तरी आता तो भाविकांसाठी खुला करण्यात आला पाहिजे. उद्घाटन सोहळ्याचे सोपस्कार पार पाडून सरकारने सर्व खर्च ठेकेदाराला वर्ग करीत हा प्रकल्प सप्तश्रुंग देवस्थान ट्रस्टकडे वर्ग करावा. यातील काही रक्कम गड ग्रामपंचायतला मिळावी जेणेकरून गडावरील विकासाला कायमस्वरूपी निधी मिळू शकेल.

-हेमंत पाळेकर, सरचिटणीस, माकप,कळवण

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

मलनिस्सारण केंद्राच्या जागी महिला उद्योग भवन

0
0

म. टा. वृत्तसेवा, सिडको

त्रिमूर्ती चौकातील पाटीलनगरलगत असलेले मलनिस्सारण केंद्र अनेक वर्षांपासून बंद आहे. या जागेवर महिलांसाठी उद्योग भवन उभारण्याचा प्रस्ताव महासभेवर येणार असल्याची माहिती नगरसेविका भाग्यश्री ढोमसे यांनी दिली.

सिडको ही कामगार वसाहत आहे. त्यातच याठिकाणी अनेक महिला बचतगटांच्या माध्यमातून किंवा वैयक्तिक रित्या काही ना काही व्यवसाय करीत असतात. या महिलांना व्यवसायाला चांगली जागा किंवा महिलांसाठी स्वतंत्र मार्केट असावे हा यामागचा उद्देश आहे. सुमारे दहा कोटी रुपये खर्च करून हे भवन उभारण्याचा आमचा विचार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून हा ठराव तयार करण्यात आला असल्याचे नगरसेविका ढोमसे यांनी सांगितले. हे भवन केवळ महिलांना व्यवसायासाठीच उपलब्ध करून देण्यात येणार असून, याठिकाणी महिलांना भाडेतत्वावर अत्यल्प दरात हे गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सिडकोत खास महिलांसाठी असे एकही उद्योग भवन नसल्यानेच हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे महिला बचतगटांनासुद्धा उत्पादन विक्रीसाठी स्वतंत्र जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान सिडको परिसरात यापूर्वीही राजे संभाजी स्टेडियम येथे तत्कालीन मंत्री डॉ. शोभा बच्छाव यांच्या निधीतून महिलांसाठी सुपर मार्केट उभारण्यात आले आहे. मात्र याठिकाणी महापालिकेने ठेवलेले भाडे पाहता कोणत्याही बचतगटाला ही जागा घेणे शक्यच होणार नाही. यापूर्वी दोन ते तीन वेळा या मार्केटच्या गाळ्यांचा लिलाव करण्यात आला असून त्यास महिलांकडून प्रतिसाद न मिळाल्याने अखेरीस त्याठिकाणी पालिकेने विविध व्यवसायांना या जागा दिल्या आहेत. त्यामुळे महिलांच्या नावाने उद्योग भवन उभारायचे आणि त्याचा फायदाच महिलांना होणार नाही असे याठिकाणी होऊ नये, याची दक्षता नगरसेवकांना घ्यावी लागणार आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

सरकारी डॉक्टरकी नको रे बाबा

0
0

उमेदवारांच्या शून्य प्रतिसादामुळे न्यूरोसर्जनसह अनेक पदे रिक्त

pravin.bidve@timesgroup.com
Tweet: BidvePravinMT

नाशिक : पोलिस शिपाई पदाच्या एका जागेसाठी अडीचशे तरुणांमध्ये चुरस असल्याचे चित्र असताना सिव्हिल हॉस्पिटलच्या डॉक्टर्स भरतीकडे उच्चशिक्षित उमेदवार पाठ फिरवित असल्याचे खेदजनक वास्तव पुढे आले आहे. उमेदवारांना वारंवार आवाहन करूनही सरकारी नोकरी पत्करण्यास डॉक्टर्स उत्सुक नसल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. अपघाती मृत्यूचे प्रमाण रोखता यावे यासाठी सरकारने जिल्ह्यासाठी न्यूरोसर्जनची दोन पदे मंजूर केली. परंतु, महिनोनमहिने या पदासाठी अर्जच प्राप्त होत नसल्याने गरीब रुग्णांची उपचारांअभावी वाताहत होत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यक्रमांतर्गत सिव्हिल हॉस्पिटल, उपजिल्हा रुग्णालय व ग्रामीण रुग्णालय स्तरावर विविध पदांच्या ४९ जागा भरण्यात येणार आहेत. ही पदे भरण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटलने वर्षभरात तीनवेळा आवश्यक कार्यवाही देखील पूर्ण केली. परंतु, या भरतीकडे प्रत्येकवेळी उमेदवारांनी पाठ फिरविल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. रुग्णांची गैरसोय टळावी आणि गोरगरीब रुग्णांना सरकारी रुग्णालयांत सर्व प्रकारचे उपचार मिळावेत, यासाठी सिव्हिल हॉस्पिटल प्रयत्नशील आहे.

जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयासाठी मेंदूविकार तज्ज्ञांचे पदच मंजूर नव्हते. वाढते अपघात आणि मेंदूला मार लागल्याने होणारे मृत्यू टाळता यावेत यासाठी सरकारकडे या पदांची मंजुरी मागण्यात आली. गतवर्षीचो हा प्रस्ताव मान्य करून सरकारने नाशिक आणि मालेगावसाठी दोन पदेही मंजूर केली. परंतु, ती अद्याप भरली गेली नसल्याने गोरगरीब रुग्णांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. गतवेळी यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. या पदासाठी एकच अर्ज प्राप्त झाला. निवड प्रक्रिया पार पडल्यानंतर संबंधित अर्जदारास रुजू होण्यास सांगण्यात आले. परंतु, संबंधित उमेद्वारही रुजू न झाल्याने ही पदे रिक्त राहिल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. अन्य सरकारी विभागांत नोकरीवर बेरोजगार तरुणांच्या उड्या पडत असताना नाशिकमध्ये मात्र डॉक्टरांची कंत्राटी अनेक पदे उमेदवारांअभावी रिक्त राहात असल्याने जिल्हा प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

खासगी प्रॅक्टिसवर भर

स्त्रीरोग तज्ज्ञांची पाच, भूतज्ज्ञांची ११, शल्य चिकित्सकाची दोन, बालरोग तज्ज्ञांची सात, मेंदूविकार तज्ज्ञांची (न्यूरोलॉजिस्ट) दोन तर नेफ्रोलॉजिस्टचे एक पद भरण्यात येणार आहे. याखेरीज फिजिशियनची सहा, स्टाफ नर्सची १३ आणि लॅब टेक्निशियनची दोन पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी पदानुसार एमबीबीएस, एमएस, एमडी अशी शैक्षणिक पात्रता ठेवण्यात आली आहे. जिल्ह्यात या पात्रता पूर्ण करणारे शेकडो डॉक्टर्स असले तरी त्यांनी सरकारी नोकरीऐवजी खासगी प्रॅक्टिसला प्राधान्य दिले आहे.

उदासिनता कारणीभूत

सरकारी रुग्णालयांमध्ये दाखल होणाऱ्या अपघाती घटनांमधील रुग्णांत २० टक्के रुग्णांना डोक्याला गंभीर स्वरूपाची दुखापत झालेली असते. त्यामुळे रुग्णालयात येणाऱ्या अशा रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. सरकारी रुग्णालयांमधील कामाचा वाढता ताण, डॉक्टरांची धोक्यात आलेली सुरक्षितता, नाशिकबाहेर नोकरी करण्याबाबतची उदासिनता आणि तुलनेने कमी मिळणारा आर्थिक मोबदला अशा काही कारणांमुळे डॉक्टर्स सरकारी नोकरीकडे वळत नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. परिणामी पदानुसार ५० हजार ते सव्वा लाख रुपयांपर्यंत दरमहा पगार देऊनही उमेदवार या नोकरीकडे वळत नसल्याची वस्तुस्थिती आहे.

गरीब रुग्णांना सर्व उपचार सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी सरकारने ही पदे भरण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक रुग्णाला खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेणे शक्य होऊ शकत नाही. त्यामुळे उच्चशिक्षित तरुणांनी मानवतेच्या भावनेतून या नोकरीकडे पहावे आणि अर्ज करावेत.

- डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्य चिकित्सक

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

आधारसाठी पैसे आकारणी; केंद्रचालकास ५० हजार दंड

0
0

म. टा. वृत्तसेवा, इंदिरानगर
इंदिरानगर येथील वंदना पार्क येथे पैसे घेऊन आधारकार्ड काढून देणाऱ्या आधार केंद्रावर मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने छापा टाकून या केंद्रचालकास पन्नास हजार रुपयांचा दंड केला. या केंद्रातील साहित्यही जप्त करण्यात आले. याबाबत नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी तक्रार केली होती. तक्रारीची तत्काळ दखल घेत जिल्हाधिकारी कार्यालयाने एकाच दिवसात कारवाई केल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

इंदिरानगर येथील बापू बंगल्याजवळील वंदना पार्क येथे आधार केंद्र सुरू होते. या केंद्रावर आधार कार्ड काढण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये घेतले जात असल्याची चर्चा होती. वडाळा गावात राहणारे अशोक गणपत तांबे यांच्याकडून या केंद्रचालकाने आधार कार्ड काढण्यासाठी तीनशे रुपये मागितले. याबाबत तांबे यांनी नगरेसविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्याकडे तक्रार केली. डॉ. कुलकर्णी यांनी तातडीने उपजिल्हाधिकारी डॉ. शशीकांत मंगरुळे यांच्याकडे लेखी तक्रार केली. डॉ. मंगरुळे यांनीसुद्धा या घटनेची तातडीने दखल घेऊन प्रवीण भोसले यांना या केंद्राची पाहणी करून कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार भोसले यांनी या केंद्राची पाहणी केली असता, पैसे घेतले जात असल्याचे समोर आले. त्यानंतर या पथकाने आधार कार्ड चालकास पन्नास हजार रुपये दंड करून केंद्रातील सर्व साहित्य जप्त केले. याठिकाणी नवीन कार्ड काढण्यासाठी तीनशे ते पाचशे रुपये घेतले जात होते. कार्डात सुधारणा करण्यासाठीसुद्धा रक्कम आकारली जात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. मात्र, प्रत्यक्ष तक्रार करण्यास कोणीही पुढे येत नसल्याने ही कारवाई होत नव्हती. मंगळवारी अखेर ही कारवाई करण्यात आली.

इंदिरानगरसह सिडको परिसरातही अनेक आधारकार्ड केंद्रावर नवीन आधारकार्ड काढण्यासाठी सर्रासपणे पैसे घेतले जातात. आधार कार्ड काढणे अत्यावश्यक बाब असल्याने नागरिकही याबाबत तक्रार न करता आधार कार्ड हातात पडण्याशी मतलब ठेवत आहेत. याचा अनेक आधार केंद्र चालकांनी गैरफायदा घेणे सुरू केले आहे. मात्र, मंगळवारी झालेल्या या कारवाईनंतर अशा प्रकारांना निश्चितच आळा बसण्यास मदत होणार आहे.

अधिक रक्कम देऊ नका
आधारकार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे पैसे लागत नाहीत. आधारकार्डमध्ये दुरुस्ती करण्यासाठी केवळ तीस रुपये शुल्क आकारले जाते. त्यामुळे नागरिकांनीही याचा विचार केला पाहिजे. अशा प्रकारे पैसे घेऊन काम करणाऱ्याविरोधात नागरिकांनीही पुढाकार घेतला पाहिजे, असे आवाहन नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांनी केले आहे.

नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी यांच्याकडून या आधारकार्ड केंद्रावर पैसे घेतले जात असल्याची तक्रार प्राप्त झाली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. आधारकार्ड काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारले जात नाही. त्यामुळे असे प्रकार लक्षात आल्यास नागरिकांनी तातडीने संपर्क साधावा.
- डॉ. शशीकांत मंगरुळे

इंदिरानगर परिसरात आधार केंद्रांची संख्या कमी आहे. मात्र या केंद्रचालकाबाबत तक्रारी काहीशा कानावर येत होत्या. मात्र प्रत्यक्ष कोणीही माहिती देण्यास तयार नव्हते. आज तांबे नावाच्या व्यक्तीने ही माहिती पूर्णपणे दिली. तीनशे रुपये कमविण्यासाठी आम्हाला खूप दिवस लागतात, असे त्यांनी सांगितले होते. त्यामुळे आज तातडीने याबाबत उपजिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिले. सकाळी पत्र दिल्यानंतर दुपारी लगेच कारवाई झाल्याने समाधान आहे.
- डॉ. दीपाली कुलकर्णी, नगरसेविका

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट


गंगापूररोड उद्यानास अवकळा

0
0

पालापाचोळ्याचा वेढा; खेळणी मोडकळीस

म. टा. वृत्तसेवा, गंगापूररोड

नाशिक महापालिकेने गंगापूररोड भागात सर्वाधिक लहान-मोठी उद्याने उभारली आहेत. परंतु, अनेक उद्यानात पालापाचोळा उघड्यावर पडून असल्याचे बघायला मिळते.

गंगापूररोडवरील शहीद पोलिस स्मारकाच्या रस्त्याला अशोका प्रेसीजन्सी असलेल्या उद्यानाला अवकळा आली आहे. उद्यानात स्वच्छताच केली गेली नसल्याने पालापाचोळा व गाजर गवताने उद्यानास वेढले आहे. तसेच उद्यानात बसविण्यात आलेल्या खेळणीही मोडकळीस आल्या आहेत. महापालिकेच्या उद्यान विभागाने उद्यानाची दुरुस्ती करावी, अशी मागणी गंगापूररोडवासियांनी केली आहे.

महापालिकेत सर्वाधिक उद्यानांचा भाग म्हणून गंगापूररोडची ओळख आहे. अगदी लहान उद्यानांपासून मोठ्या उद्यानांचा समावेशही या भागात आहे. शहीद पोलिस स्मारकाच्या रस्त्याला सुंदर असे उद्यान महापालिकेने उभारले आहे. मुलांना खेळण्यासाठी खेळण्यांची व्यवस्थाही करण्यात आली. परंतु, स्वच्छता केली गेली नसल्याने उद्यानाला अवकळा आल्याचे पहायला मिळते.

उद्यान विभागाने लक्ष द्यावे

स्वच्छता केली जात नसल्याने उद्यानाला गाजर गवत व पालापाचोळ्यांनी वेढा दिला आहे. महापालिकेने बसवलेल्या खेळण्यांचीहीदेखील मोठ्या प्रमाणात मोडतोड करण्यात आली आहे. तर नागरिकांना पायी चालण्यासाठी बनविण्यात आलेल्या जॉगिंग ट्रक दिसेनासाच झाला आहे. उच्चभ्रृ लोकवस्तीत महागडी घरकुले घेत रहिवाशी वास्तव्यास आहेत. या उद्यानाच्या समस्येकडे महापालिकेचा उद्यान विभाग कधी लक्ष देणार, असा सवाल नागरिकांनी केला आहे.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

बुद्धिबळ वादावर पडदा

0
0

सहाय्यक धर्मादाय आयुक्तांकडून संघटनेला नवसंजीवनी

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

वर्षभरापासून सुरू असलेल्या संघटना-विश्वस्त यांच्या मूळ वादाला निर्णायक वळण देत सहाय्यक धर्मादाय आयुक्तांनी नाशिकच्या बुद्धिबळ क्षेत्राला जणू नवसंजीवनी दिली आहे. कायदेशीर कचाट्यातून खेळाची सुटका करून बुद्धिबळ क्षेत्रातील जाणकारांची निवड संस्थेच्या विश्वस्त पदांवर करत नव्या पर्वाची सुरुवात नाशिकमध्ये झाल्याची भावना महाराष्ट्राच्या बुद्धिबळ क्षेत्रातील जुन्या जाणत्या खेळाडूंनी व्यक्त केली.

अख्ख्या महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या जिल्हा संघटनेच्या वादावर अखेरीस नाशिकच्या खेळाडूंच्या हिताचा निर्णय घेत जाहीर मुलाखतीद्वारे २४ अर्जांतून फक्त ९ लोकांची बुद्धिबळ गुणवत्तेच्या निकषांवर निवड करत खेळ संघटनेसंदर्भातील वादांवर एक स्तुत पायंडा घातल्याबद्दल सहाय्यक धर्मादाय आयुक्त वैशाली पंडित यांचे सर्व स्तरांमधून अभिनंदन केले जात आहे.

बुद्धिबळ क्षेत्रामधील अनुभव, संघटनात्मक बांधणीचे कसब, खेळाडू, प्रशिक्षक यांची गुणवत्ता, ग्रामीण भागातील काम तसेच सामाजिक कामांचा अनुभव व कौशल्य, संघटनेला जागतिक स्तरावर घेऊन जाऊ शकण्याची क्षमता अशा कडक निकषांवर खरे ठरून नाशिक बुद्धिबळ क्षेत्राला योगदान देणाऱ्या नऊ लोकांची संघटनेच्या विश्वस्त पदांवर निवड केली आहे. बुद्धिबळ खेळाडू विनय बेळे, धनंजय बेळे, राजेंद्र सोनवणे, सुनील शर्मा, जयेश भंडारी, जयराम सोनवणे, विनायक वाडिले, मिलिंद कुलकर्णी, मंगेश गंभीरे यांच्यावर जिल्हा बुद्धिबळ संघटनेची जबाबदारी सोपविण्यात आली.

जिल्हा बुद्धिबळ संघटना अधिकृतरित्या नियुक्त असून पुढील वाटचालीची दिशा व नियोजन सर्व नाशिक बुद्धिबळ प्रेमींना संघटनेच्या सभेमार्फत कळविण्यात येईल. बुद्धिबळ क्षेत्रांतील जाणकार तसेच तळमळीने कार्य करणाऱ्या लोकांना संघटनेवर नियुक्त केल्यामुळे नाशिकमध्ये उत्साहाचे वातावरण असून मान्यवरांनी नवनियुक्त विश्वस्थांचा जाहीर सत्कार करून आगामी वाटचालींसाठी पाठींबा दर्शविला आहे.

अध्यक्षपदी विनय बेळे

नवनियुक्त विश्वस्तांची प्रथम बैठक घेण्यात आली. त्यांच्या नऊ विश्वस्तांच्या उपस्थितीत व मान्यतेने पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आले आहे. मुख्य पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबत सर्वानुमते अध्यक्ष पदावर विनय बेळे, उपाध्यक्षपदी डॉ. राजेंद्र सोनावणे, सचिवपदी सुनील शर्मा व खजिनदार पदावर जयेश भंडारी यांनी पदभार स्वीकारला.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

कागदावरच दौडले ध्येयनाम्याचे घोडे!

0
0

मटा मालिका- भाजपची वर्षपूर्ती- भाग २

vinod.patil.@timesgroup.com

नाशिक : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने स्वतंत्र पोर्टल सुरू करीत, ४३ हजार लोकांच्या मदतीने नाशिकचा 'ध्येयनामा' तयार केला होता. नागरिकांना आगामी पाच वर्षांत शहरात काय हवे, याच्या सूचना मागवून निवडणुकीत सत्ता आल्यावर त्याची अंमलबजावणी करण्याची घोषणा केली होती. वर्षभरानंतर हा ध्येयनामासुद्धा कागदावरच राहिला आहे. विशेष म्हणजे भाजपलाच या ध्येयनाम्याचा विसर पडला असून, जनतेला उल्लू बनविल्याची टीका विरोधकांना केली आहे. २८ मुद्द्यांपैकी शहर बससेवा व गोदाप्रदूषण मुक्ती व सीसीटीव्ही हे तीन प्रकल्पही स्मार्ट सिटी व शासनाच्या मेहरबानीवर कसेबसे टप्प्यात आहेत. उर्वरित २५ प्रकल्प अजूनही नाशिककरांपासून दूरच असल्याने नाशिककरांची फसवणूक झाल्याची भावना बळावत चालली आहे.

निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने नाशिककरांच्या मदतीनेच ध्येयनामा तयार केला होता. त्यासाठी स्वतंत्र अॅप तयार करीत नागरिकांकडून त्यांना काय हवे आहे याबाबत सूचना मागवल्या होत्या. या अॅपवर शहरातील ४३ हजार नागरिकांनी सूचना केल्या होत्या. भाजप कार्यालयात गेल्या वर्षी १० फेब्रुवारीला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते भाजपच्या ध्येयनाम्याचे प्रकाशन थाटामाटात करण्यात आले होते. संघटनमंत्री किशोर काळकर, शहराध्यक्ष व आमदार बाळासाहेब सानप, प्रदेश उपाध्यक्ष वसंत गिते, आमदार देवयानी फरांदे, प्रदेश चिटणीस लक्ष्मण सावजी, प्रवक्ते प्रा. सुहास फरांदे आदींची उपस्थिती होती. महापालिकेचा कारभार भ्रष्टाचारमुक्त करण्याचे आश्वासन देताना पालकमंत्री महाजन यांनी नाशिक एक विकासाचे मॉडेल तयार करू अशी भावनिक भाषा केली होती. भाजपने जाहीर केलेल्या ध्येयनाम्यात मोनो, मेट्रो रेल प्रकल्पासह उद्योगवाढीसाठी स्वतंत्र औद्योगिक प्राधिकरण, महिलांसाठी सुविधा, नाशिककरांना विमा कवच, गोदावरी प्रदूषणमुक्ती, वायफाय सुविधा तसेच नियमित व स्वच्छ पाणीपुरवठा या आश्वासनांबरोबरच पारदर्शक प्रशासन व कारभाराचीही ग्वाही दिली होती. विशेष म्हणजे जाहिरनाम्यातील अनेक गोष्टी या जुन्याच होत्या. तरीही भाजपने निवडणुका जिंकण्यासाठी त्यांची घोषणा केली होती.

या जाहिरनाम्याच्या पार्श्वभूमीवर महापालिकेत भाजपची बहुमताने सत्ताही आली. त्यामुळे नागरिकांना आपण सूचवलेल्या सूचनांची अमंलबजावणी होईल अशी आशा निर्माण झाली होती. परंतु, गेले वर्षभर भाजपने त्याची पूर्ती तर सोडाच, त्याकडे ढुकूंनही बघितले नाही. शहर बससेवेचे खासगीकरण, सीसीटीव्ही प्रकल्प, गोदाप्रदूषण तीन प्रकल्प भाजपच्या ध्येयनाम्यातील असले तरी तीन प्रकल्प राज्य सरकार आणि स्मार्ट सिटीतूनच केले जात आहेत. शहर बससेवेची प्रक्रिया अजूनही सुरूच आहे. तर गोदाप्रदूषण आणि सीसीटीव्ही प्रकल्प स्मार्ट सिटी व राज्यसरकारच्या मदतीने प्रक्रियेत आहेत. त्यामुळे महापालिकेतील भाजपचे यातील योगदानही तसे शून्यच आहे. जाहिरनाम्यातील २८ पैकी ३ प्रकल्पांना राज्य सरकारनेच बुस्ट दिला आहे. उर्वरीत प्रकल्पांचा तर भाजपलाही विसर पडला आहे. त्यामुळे हा ध्येयनामा नागरिकांच्या फसणुकीसाठीत तर नव्हता ना अशी भावना नाशिककरांमध्ये बळावत चालली आहे. विरोधकांनी तर भाजपने नाशिककरांची फसवणूक केली असून नागरिकांना उल्लू बनविल्याचा हल्लाबोल केला आहे.

घरपट्टीत सूट नव्हे, तर वाढ

भाजपने निवडणूकपूर्व ध्येयनाम्यात महापालिकेत भाजपची सत्ता आल्यास नागरिकांना आपल्या घरपट्टी करात दहा टक्के सवलतीची घोषणा केली होती. मुंबईत शिवसेनेने दिलेल्या वचनाची कॉपी करीत भाजपने नाशिककरांना घरपट्टीत सूट देण्याचे गाजर दाखवले होते. प्रत्यक्षात भाजपची सत्ता आल्यानंतर चित्र उलटे झाले असून, वर्षभरात भाजपने घरपट्टीत १० टक्के सूट तर दूरच उलट १८ टक्के करवाढीची भेट मात्र नाशिककरांना दिली आहे. त्यामुळे नाशिककरांना भाजपने उल्लू बनवल्याची टीका आता होत आहे.

आश्वासन-अंमलबजावणी

पारदर्शक कारभार- नाही

संपूर्ण प्रशासन ऑनलाइन-नाही

शांळांमध्ये लाइव्ह स्ट्रिमिंग व ई-लर्निंग सुविधा -नाही

नियमित स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा- नाही

शहरात उड्डाणपूल उभारणी- नाही

६०० खाटांचे अद्ययावत रुग्णालय-नाही

नागरिकांचा आरोग्य विमा- नाही

पालिकेची शहर बससेवा- प्रक्रिया सुरू

पर्यावरणपूरक बस व ई-रिक्षा- नाही

पार्किंगसाठी स्वतंत्र बहुमजली इमारत- निविदा प्रक्रियेत

शहरात सीसीटीव्ही कॅमेरे- निविदा प्रक्रियेत

तपोवन पर्यटन विकासासाठी योजना- नाही

भक्तनिवाससह सुविधा- नाही

शहरात क्रीडा प्रबोधिनी- नाही

आयटी हबची निर्मिती- नाही

आंतरराष्ट्रीय विमानसेवा- नाही

किकवी धरण प्रकल्प बांधणी- नाही

जन्माला येणाऱ्या मुलीस पाच हजार रुपये-नाही

पूररेषा नियमावली वस्तुनिष्ठ करणार-नाही

गोदा प्रदूषणमुक्त - स्मार्ट सिटीत

मनपाचे स्वतंत्र वैद्यकीय महाविद्यालय-नाही

प्रक्रिया उद्योगनिर्मिती-नाही

मेट्रो आणि मोनोरेलसाठी चाचणी- नाही

महिलांसाठी समुपदेशन केंद्र- नाही

महिलांसाठी स्वच्छतागृहे- नाही

मनपा रुग्णालयांमध्ये जेनेरिक औषधे- नाही

मनपा शाळांमध्ये इंग्रजी शिक्षणाची सोय- नाही

स्वतंत्र औद्योगिक धोरण-नाही

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

वसुलीसाठी पळापळ

0
0

म. टा. वृत्तसेवा, मालेगाव

आर्थिक वर्ष संपत आल्याने येथील महापालिकेने मालमत्ता करवसुलीसाठी मोहीम हाती घेतली आहे. थकबाकी न भरणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. गेल्या तीन दिवसांत एक कोटी रुपयांची रोख करवसुली करण्यात आल्याची माहिती कर उपायुक्त राजू खैरनार यांनी दिली.

शुक्रवारी पालिका आयुक्त संगीता धायगुडे यांनी करवसुलीचा आढावा घेताना करवसुलीत दिरंगाई करणाऱ्या तीन लिपिकावर निलंबन कारवाई केली होती. तसेच सहायक आयुक्त राजू खैरनार यांच्याकडे कर उपायुक्त पदाचा कारभार सोपवला होता. आता मोठे थकबाकीदार पालिकेच्या रडारवर आले आहेत. पालिकेच्या २४ अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या पथकाकडून वसुली मोहीम राबविली जात आहे. प्रत्येक प्रभागनिहाय मोठ्या थकबाकीदारांची यादी तयार करण्यात आली आहे. पाणीपट्टी, घरपट्टी तसेच अन्य कर थकीत असलेल्यांना कर भरण्याचे आवाहन केले जात असून कराचा भरणा वेळीच न करणाऱ्यांच्या मालमत्ता सील केल्या जात आहेत.

बुधवारी करवसुली पथकाने द्याने येथील सायाजिंग सील केली. तसेच चारही प्रभागातून १० नळजोडणी खंडित केल्या असून सायंकाळी उशिरापर्यंत कारवाई सुरू होती. बुधवारी ३२ लाख रुपयांची रोख करवसुली झाल्याची माहिती खैरनार यांनी दिली. मंगळवारी देखील सोयगाव मार्केट येथील तीन व्यापारी गाळे सील करून ३४ लाख रुपयांची थकीत कर वसूल केला आहे. तसेच सायने औद्यगिक वसाहतीतील दोघा गोदामांना सील करण्यात येवून पाच लाख २७ हजार रु थकीत कर वसूल करण्यात आला आहे. प्रभाग ४ मध्ये तीन नळजोडण्या खंडित करण्यात आल्या व १९ हजार रुपयांची पाणीपट्टी वसूल करण्यात आल्याची माहिती प्रभाग अधिकारी पंकज सोनवणे यांनी दिली.

मिशन कर वसुली

सोमवार - ४० लाख

मंगळवार - २८ लाख

बुधवार - ३२ लाख

हे सील

१ सायागिंग

२ गोदामे

३ व्यापारी गाळे सील

१२ नळजोडणी खंडित

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

तहसीलवर महिलांचा मोर्चा

0
0

म. टा. वृत्तसेवा, येवला

'इस्लामी शरिअत' आमचा सन्मान असल्याकडे लक्ष वेधत संसदेत आणलेले 'तिहेरी तलाक' बंदी विधेयक केंद्र सरकारने मागे घ्यावे, या मागणीसाठी येवला शहरातील मुस्लिम महिलांच्या वतीने बुधवारी (दि. १४) येवला तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. मुस्लिम पेहरावात हजारोंच्या संख्येने तहसीलवर धडकलेल्या महिलांनी तहसीलबाहेर एक तास ठिय्या देत तिहेरी तलाक बंदी भूमिकेचा निषेध करण्यात आला.

देशातील मुस्लिम महिलांची तिहेरी तलाकमधून सुटका व्हावी यासाठी मोदी सरकारने संसदेत आणलेल्या 'तिहेरी तलाक' बंदी विधेयकाचा निषेध व्यक्त करण्यासाठी बुधवारी शहरातील मुस्लिम महिलांनी तहसील कार्यालयावर मूक मोर्चा काढला. 'तिहेरी तलाक बिल वापस लो', 'इस्लामी शरिअत हमारा सन्मान है', 'शरिअत हमे जानसे प्यारी है', आदी आशयांचे असंख्य फलक हाती घेवून महिला मोर्चात सहभागी झाल्या होत्या. जवळपास पाच हजार महिलांचा सहभाग असलेला हा मूक मोर्चा चर्चेचा विषय ठरतानाच सर्वांचे लक्ष देखील वेधून गेला. शहरातील मुस्लिमबहुल मोमीनपुरा भागातील पट्टणवाली मशिदपासून सकाळी साडेदहा वाजता या मोर्चास सुरुवात झाली. देवीखुंट, शहर पोलिस स्टेशन, राणा प्रताप पुतळा, काळा मारुती, गंगादरवाजा या मार्गावरून मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचला. तहसीलच्या बाहेरील मैदानात मोर्चात सहभागी सर्वच मुस्लिम स्त्रियांनी यावेळी तब्बल एक तास ठिय्या दिला. मोर्चाच्या वतीने नायब तहसीलदार प्रकाश बुरुंगले यांना निवेदन देण्यात आले.

मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट

Viewing all 49119 articles
Browse latest View live




Latest Images