म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल पातळीच्या सर्वेक्षणासाठी निश्चित करण्यात आलेल्या विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी जलसुरक्षकांकडून वेळेत प्राप्त झालेल्या नाही. त्यामुळे प्रस्तावित वॉटर सिक्युरिटी प्लॅनचे घोडे वर्षभरानंतरही पुढे सरकू शकलेले नाही. पाणीपातळी नोंद नागपूरच्या महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग ॲप्लिकेशन सेंटरला वेळेत न पोहचल्याने प्रत्येक गावाचा प्रस्तावित वॉटर सिक्युरीटी प्लॅन तयार करण्यात अडचणी निर्माण झालेल्या आहेत.
भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेमार्फत भूजल पातळीच्या सर्वेक्षणासाठी विभागात ५ हजार ७७५ विहिरी निश्चित करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७१७ निरीक्षण विहिरी या जुन्या असून त्यांची ब्रिटीश काळात निवड झाली होती. या सर्व विहिरींच्या पाणीपातळीची नोंद घेऊन त्याची माहिती एमआरसॅकच्या ॲपवर अपलोड करण्याची जबाबदारी संबंधित गावांमधील जलसुरक्षकांवर भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेने सोपविली होती. निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची नोंद कशा घ्याव्यात याबद्दलचे प्रशिक्षण विभागातील सर्व तालुक्यांतील जलसुरक्षकांना वर्षभरापूर्वीच देण्यात आले होते. मात्र, या जलसुरक्षकांकडून निरीक्षण विहिरींच्या पाणी पातळीच्या मासिक नोंदी एमआरसॅकच्या ॲपवर वेळेत अपलोड न झाल्याने प्रत्येक गावासाठीचा प्रस्तावित वॉटर सिक्युरीटी प्लॅन बारगळला आहे.
जलसुरक्षकांचाच दुष्काळ
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेनुसार प्रत्येक ग्रामपंचायत स्तरावर जलसुरक्षकाची नेमणूक करणे बंधनकारक आहे. मात्र, स्वतंत्र ग्रामपंचायतीच्या शिपायांकडेच जलसुरक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. शिवाय ग्रामपंचायत कर्मचारी भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा विभागाच्या थेट प्रशासकीय नियंत्रणाखाली येत नसल्याने निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीच्या नोंदी मिळविणे भूजल विभागाच्या नाकीनऊ आले आहे. याशिवाय कित्येक जलसुरक्षकांकडे स्मार्टफोनचा अभाव असल्यानेही निरीक्षण विहिरींच्या नोंदी एमआरसॅकच्या ॲपवर अपलोड होऊ शकलेल्या नाहीत.
काय आहे वॉटर सिक्युरीटी प्लॅन?
निरीक्षण विहिरींच्या पाणीपातळीची नोंद घेऊन त्यानुसार एमआरसॅकमार्फत प्रत्येक गावातील गटनिहाय भूजल पातळीची सरासरी काढली जाणार होती. त्यानुसार प्रत्येक गावातील भूजल पातळीचा गटनिहाय सांकेतिक नकाशा तयार करून पाणीपातळी कमी असलेल्या गटांतच जलयुक्त शिवार योजनेची कामे केली जाणार होती. त्यामुळे अशा गावांच्या शिवारातील भूजल पातळी उंचावून टंचाईमुक्तीचे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी प्रयत्न केले जाणार होते. विभागात ३०० पाणलोट क्षेत्र असून त्यापैकी गोदावरी आणि तापी खोऱ्यातील ३४ पाणलोट क्षेत्रांतील भूजलाचा मर्यादेपेक्षा जास्त उपसा झालेला आहे. त्यामुळे दोन पाणलोटक्षेत्र अतिधोकेदायक बनलेले आहेत.
विभागातील निरीक्षण विहिरी
जिल्हा.........पूर्वीच्या निरीक्षण विहिरी..........नवीन निरीक्षण विहिरी
अहमदनगर.........२०२.........१,५२७
नाशिक.........१८१.........१,२६०
जळगाव.........१७८.........१,२४८
धुळे...........१०६.........५९७
नंदुरबार.........५०.........४२६
एकूण.........७१७.........५,०५८
विभागातील पाणलोट क्षेत्र स्थिती
जिल्हा.........सुरक्षित.........सेमी क्रिटिकल.........क्रिटीकल.........अति वापर.........एकूण
नाशिक.........५७.........१२.........००.........११......... ८०
धुळे.........४३.........०२.........००.........००.........४५
नंदुरबार.........२९.........००.........००.........००.........२९
जळगाव.........४२.........१२.........०२.........१०.........६६
अहमदनगर.........५५.........१२.........००.........१३.........८०
एकूण.........२२६.........३८.........०२.........३४.........३००
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट