कोणती गोष्ट कुणाला काय देऊन जाईल हे सांगता येत नाही, आपल्याच क्षेत्रातला जोडीदार मिळाला तर सोन्याहून पिवळे. काहींना खेळाने जोडीदार दिलेत, काहींना नोकरीने, तर काहींना रंगभूमीने जोडीदार दिलेत. हे जोडीदार त्यांना कसे मिळाले, हे त्यांच्याच शब्दांत…...
'योगायोगा'चा जीवन नाट्यारंभ
प्रसंग १ :
एनडीसीए संगीत नृत्य समारोह. वर्ष १९८१-८२ (नीटसे स्मरत नाही. कारण, आठवतो तो फक्त एक चेहेरा!)
पं. जितेंद्र अभिषेकींचे गाणे संपते. मागे तानपुऱ्यावर साथीला बसलेला मी स्टेजवरून बाहेर येतो. समोर काही युवा कलाकार पुढील नृत्याच्या कार्यक्रमासाठी आलेल्या पं. बिरजू महाराजांना बघण्यासाठी थांबलेले. त्यातील एक नजरेत भरणारी युवती मात्र आठवत राहते.
(काही काळ लोटलेला...)
वर्ष १९८३, मोसम पावसाळी, दिवस पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचे.
एकांकिका 'चिमणीचे मत कुणाला' लेखक अर्थात, विवेक गरुड. दिग्दर्शक अर्थात, मी.
मी सूत्रधाराची भूमिकाही करीत होतो. नटी हवी होती. शोध सुरू होता...
प्रसंग २ :
वेळ दुपारच्या चहाची. संभाव्य नटीच्या म्हणजे विद्या दांडेकर- सध्याच्या विद्याहरीच्या, घरात.
तिच्या वडिलांचा पहिला प्रश्न : चार दिवसांत कसे करणार नाटक?
मी धिटाईने उत्तरलो : हल्ली चार दिवसांत नाटक बसते. अनुभव बराच आहे मला आणि ही नवी पिढी खूप हुशार झाली आहे. त्यातून विद्या एक डान्स परफॉर्मर आहे.
(मी दिग्दर्शकाच्या भासात उत्तरलो. अंदर की बात कशी सांगणार? आधीची नटी गायब झाली वगैरे.......वडील इंप्रेस्ड!)
प्रसंग ३ :
(बाजूच्या रूमचा दरवाजा उघडत दुपारच्या झोपेतून उठून नटीची एन्ट्री. मेरे मेहेबूबच्या साधनासारखी).
बॅकग्राऊंडला गाणे नसतानाही ऐकू येऊ लागलेले...
ऐ हुस्न जरा जाग तुझे इश्क जगाये
बदले मेरी तकदीर जो तू होश में आये...
प्रसंग ४ :
कॉलेजरोड, मलेरिया स्टॉप. सूत्रधार अर्थात, मी कंपनीतून सुटी घेऊन भरदुपारचा प्रॅक्टिसला निघालेला.
स्कूटर कॉलेजरोडवरून चाललेलो. नटी बसची वाट पाहत आहे. नेहमीप्रमाणे बस नाहीच.
भेटीचा योगायोग. नटी थोडे ओढेवेढे घेऊन स्कूटरवर बसते...
(बॅकग्राऊंडला गाणे ऐकू येऊ लागलेले, भर दुपारी.)
दिलके फसाने, दिल भी न जाने
तुमको सजन, दिलकी लगन, कैसे बताये
ठंडी हवाए लहराके आएँ...
प्रॅक्टिस सुरू... नाटकाची हो..!
पसंती लाभली पुरुषोत्तमची
सुरुवात यशस्वी नाटकाची!
-सुनील देशपांडे, लेखक-दिग्दर्शक
…
--------------------------
नाटकातील स्वयंवर.. जीवनातील साथ...
असं म्हणतात, की लग्नाच्या गाठी या स्वर्गातून बांधल्या जातात आणि आपण या जगाच्या रंगभूमीवरील कलाकार केवळ आपापल्या भूमिका करीत असतो. असाच काहीसा योग आमच्याबाबतीत आला.
१९७८ च्या राज्य नाट्य स्पर्धेत 'कला-अर्घ्य'ने प्रा. श्रीरंग गुणे लिखित, रामदास बरकले दिग्दर्शित 'रामलीला' हे नाटक सादर केले होते. पौराणिक रामायण नाट्यरूपात सादर करणाऱ्या कलाकारांच्या कौटुंबिक जीवनात घडणारे रामकथेशी साम्य असलेले अनेक प्रसंग घडत जातात आणि एक आगळेवेगळे नाट्य कसे घडते, हे त्या नाटकात दाखवले होते. त्या नाटकाचा नायक हा रामकथेतीलही नायक राम असतो आणि नायिका ही रामकथेतीलही सीता असते. रंगमंचावर रामाची भूमिका केली होती यशवंत जोशीने, तर सीतेची भूमिका केली होती मी, सुहास जोशी म्हणजे पूर्वाश्रमीची रोबा ऊर्फ रोहिणी बापटने.
प्रयोगाच्या दिवशी साईखेडकर नाट्यगृहावर प्रत्यक्ष विवाह सोहळ्याचे वातावरण निर्मिले होते. त्यासाठी नाट्यगृहाच्या फलकावर स्वयंवराची सुंदर पत्रिकाच रंगवली होती. प्रवेशद्वार केळीचे खांब लावून सुशोभित केले होते. तुतारीवाले स्वागत करीत होते. प्रेक्षागृहात सनईचे सूर वाजत होते. प्रेक्षकांना अक्षताही वाटल्या होत्या. रंगमंचावर शिवधनुष्य भंगून आम्ही रामायणातील स्वयंवराचे प्रेक्षकांना दर्शन घडवले. त्यावेळी मी चित्रकला महाविद्यालयात शिकत होते. नेहमी काहीतरी वेगळे करण्याची माझी आवड होती. त्या वर्षी दसऱ्याला मी आपट्याची पाने वाटली होती. पण, त्यांना सोनेरी रंग लावून ती वाटली होती. त्या सोनेरी पानांनी यशवंतची व अधिक माझी ओळख ही घडवली. 'रामलीला' नाटकातील भूमिकांनी ती घट्ट केली. कला-अर्घ्यच्या वर्धापनदिनी आम्ही साखरपुडा केला व पुढे आम्ही जीवनसाथी झालो. योगायोग म्हणजे संस्थेने अनेक नाटके बसवली, पण आम्हा उभयतांची भूमिका असलेले हे एकमेव नाटक होते, त्यापुढे खरेखुरे जीवननाट्य...
-सुहास जोशी, अभिनेत्री
-------------------
सहजीवनाचा 'चंदेरी' प्रारंभ
माझी आणि दीपकची भेट एका नाटकात झाली, नाटकाचे नाव 'चंदेरी'. नाशिकला या नाटकाचे प्रयोग होणार होते. पण, नाटकाची हीरोइन दोन दिवस आधी नाही म्हणाली म्हणून नवीन प्रोफेशनल अभिनेत्री घेण्याचे ठरवले आणि मी ते नाटक केले, तेव्हा प्रथम आमची भेट झाली. मी त्यावेळी म्हणजे १९८६ मध्ये मुंबईत व्यावसायिक अभिनेत्री म्हणून काम करीत होते. त्या नाटकामुळे आमची मैत्री झाली आणि पुढे १९८७ मध्ये आम्ही लग्न केले. त्यावेळी दीपक नाशिकमध्ये क्रॉम्प्टनला काम करीत होता, म्हणून मी मुंबई सोडून नाशिकला आले आणि आम्ही इथेच स्थायिक झालो. नाशिकला आल्यावर आम्ही बरीच नाटके, एकांकिका, आकाशवाणी व इतर कार्यक्रम केले. मी वृत्तपत्रांत नोकरी करू लागले. पण हौशी, प्रायोगिक नाटके मात्र सुरूच होती. लग्नाआधी मी 'आईशपथ', 'निष्पाप', 'भ्रमाचा भोपळा', 'वट वट सावित्री', 'ब्रह्मचारी' अशी प्रोफेशनल नाटके करीत होते. नाशिकमध्ये राहून तेव्हा व्यावसायिक नाटके करणे शक्य नव्हते. फक्त घर आणि संसार असेच चालू होते. दरम्यान, आमच्या दोन मुलांचा जन्म झाला. वैदेही आणि वर्धन. पुढे दीपकला अमेरिकेत नोकरी मिळाली आणि आम्ही सगळेच अमेरिकेत स्थायिक झालो. दहा वर्षे अमेरिकेत राहून इथे परत आल्यावर खऱ्या अर्थाने आमची सेकंड इनिंग सुरू झाली. इथे आल्या आल्याचं आमचं दोघांचं व्यावसायिक नाटक 'त्या एका वळणावर' खूप गाजले. दीपकला झी गौरव, मटा सन्मान, राज्य नाट्य व इतर बक्षिसे मिळाली. या क्षेत्रात त्याचं नाव होऊ लागल. नंतरही बरीच नाटके व चित्रपट आम्ही एकत्र केले. 'जोगवा' हा चित्रपट, 'प्रेमाच्या गावा जावे, 'भय इथले संपत नाही', 'कसाब आणि मी' इत्यादी नाटके केली. याव्यतिरिक्त अनेक सीरियल्स व चित्रपट केले आहेत. त्यात मी केलेल्या शुभंकरोती, हे बंध रेशमाचे, विवाह बंधन, तू तिथं मी, पुढचे पाऊल, रुंजी, महासंग्राम, लगोरी, अस्मिता, हंड्रेड डेज, तुझ्यावाचून करमेना आणि सध्या सुरू असलेली 'राधा प्रेम रंगी रंगली', चित्रपट जोगवा, वंशवेल, भेट, नासुर, अरुणा ६७, कृतांत, दीपकने केलेल्या सीरियल्स लक्ष्मणरेषा, अग्निहोत्र, अमरप्रेम, पुढचं पाऊल, देवयानी, लगोरी आणि फुलपाखरू, चित्रपट जन्म, जोगवा, बदाम राणी गुलाम चोर, अकिरा, हीरोईन, शूटर, नाटके गांधी आणि सावरकर, दोघांमधले नाते, अर्धसत्य आदींचा समावेश आहे.
-विद्या करंजीकर, अभिनेत्री
…
---------------------
नाटकाने दिलेली देणगी
माझा नाट्यप्रवास सुरू झाला तो शालेय जीवनापासून. खरं तर आमच्या घराण्यात कुणी तोंडाला रंग लावलेला मला तरी आठवत नाही. त्यामुळे वारसाहक्काने मिळालेली ही देणगी निश्चित नाही. पण, मग माझ्यात नाटकाची आवड कशी निर्माण झाली हे सांगता येणार नाही. मी १९६३ मध्ये प्रथम तीनअंकी नाटक केले आणि तिथूनच माझा नाट्यप्रवास जोरात सुरू झाला. १९६८ मध्ये मी व उपेंद्र दाते, दोघांनी मिळून संस्था काढली. नाव ठेवलं नाट्य नम्रता. येथूनच माझ्या प्रवासात अनेक वळणे आली. खरं तर मला नाटक खऱ्या अर्थाने समजू लागलं. नाटकाच्या अभ्यासाची भूक वाढू लागली आणि त्याच वेळी मला कै. बाबुराव सावंत यांच्यासारखा गुरू मिळाला. ही पहिली कलाटणी. नंतर संस्थेच्या आग्रहाखातर प्रथम दिग्दर्शक व मग प्रकाशयोजनाकार बनलो. एव्हाना नाटक माझ्यात भिनू लागलं होतं. १९७४ मध्ये 'वासनाचक्र' ही एकांकिका दिग्दर्शित करताना माझी रोहिणी देशमुख हिच्याशी ओळख झाली. त्याचवेळी उपेंद्रची 'रंगमंच' ही व्यावसायिक संस्था सुरू झाली होती व 'रायगडाला जेव्हा जाग येते' हे नाटक करायचे ठरले. यात रोहिणी भूमिका करीत होती व मी प्रकाशयोजना करीत होतो. त्यामुळे सहवास वाढू लागला. पुढे सहवासाचं मैत्रीत आणि मैत्रीचं प्रेमात रुपांतर कधी झालं ते आम्हा दोघांनाही कळलं नाही. १९७६ मध्ये आमचा प्रेमविवाह झाला. ही मला नाटकाने दिलेली दुसरी देणगी. पुढे आम्ही बरीच नाटकं, एकांकिकांत बरोबर कामं केली. हे सगळं होत असताना आयुष्यात स्थैर्य नव्हतं. ३/४ वर्ष मी नोकरीनिमित्त भिवंडी व मुंबईला काढली. परिस्थिती बेतासबात होती, तरी नाटक सुरूच होतं आणि १९८० मध्ये मी मायको कंपनीत नोकरीला लागलो आणि कंपनीच्या मायको फाइन आर्टसतर्फे नाटक करू लागलो. ही नाटकांनी दिलेली आणखी एक देणगी. पुढे स्थैर्य आल्यामुळे नाटक जोमाने सुरू झालं ते आजतागायत सुरू आहे. एकूणच नाटकामुळे मला रोहिणीसारखी पत्नी, मायको कंपनीत नोकरी, प्रसिद्धी, मोठमोठ्या लोकांच्या ओळखी, मानसन्मान सर्व काही मिळाले. नाटक हा माझ्या जीवनातला अविभाज्य घटक आहे.
-रवींद्र ढवळे, दिग्दर्शक
----------------------
...अन् विवाहबंधनात अडकलो
१९७४ साल. महाराष्ट्र राज्य नाट्य महोत्सव. बाळ भाटे सरांनी लिहिलेलं 'आर्टिस्ट युनायटेड' या संस्थेचं, 'ही एक धर्मशाळा' हे नाटक. दिग्दर्शक कुमुदताई अभ्यंकर. 'शास्त्रीबुवा' एक इतिहास संशोधक आजोबा या भूमिकेसाठी माझी निवड. मी २३ वर्षांचा, भूमिकेचं वय ८५! या नाटकानंतर हे आजोबा आणि ती नात विवाहबंधनात अडकले. २५ नोव्हेंबर १९७६ ला आम्ही विवाहबद्ध झालो. आज बेचाळीस वर्षे झालीत. दोघेही समाधानी आहोत. एकमेकांच्या कल्पना सांभाळत उणिवा भरून काढत आनंद वाटत वाटचाल करीत आहोत. ही सर्व नाटकाचीच देणगी आहे असं मी म्हणेन.
नाटकाने आम्हाला अजूनही बरंच काही दिलं. नाटकाने आम्हाला परस्परांच्या भूमिकेत जाऊन एकमेकांना समजून-सांभाळून घेणं शिकवलं. किरकोळ मतभेदांत समन्वय साधायची दीक्षा दिली. अनेक नाट्य लेखकांचे उत्तम विचार आणि दिग्गज दिग्दर्शकांद्वारे आशय आकलनाची दृष्टी दिली. नाटकानं आदर्श टीमवर्कची सवय लावली. मीपण विसरून कामात एकाग्र-एकरूप व्हायला बिंबवलं. परकाया प्रवेश शिकवला. व्यक्तिमत्त्व ओळखता येऊ लागली. त्यामुळे मित्र, नातेसंबंध, माणसं जपता आली. यश आणि अपयश पचवायची सवय लावली. धैर्य वाढवलं. वक्तृत्व बहाल केलं. कर्तृत्व सकस केलं. आचरणातली लोकाभिमुखता वाढवली. ओघाने लोकसंग्रह आपोआप वाढला.
अगत्य अंगवळणी पडलं. ज्या भूमिका वठवल्या त्यातून आपल्याला शोभणारी वेषभूषा, केशभूषा, शब्दांचे उच्चार, हावभाव, चालणं, बोलणं, उठणं, बसणं कसं असावं किंवा कसं नसावं हे कळालं. शरीरसौष्ठव घडवायला आणि जपायला शिकवलं. त्यासाठी नियमित व्यायामाची सवय लावली. आहे त्या परिस्थितीतून मार्ग काढायला शिकवलं. क्षणात मूड बदलायला, व्यक्तिगत व्यथा, अडचणी झाकून सर्वसमावेशक अभिनित व्हायला शिकवलं.
नाटकाने घराची नेटकी सजावट आकर्षक करताना अनावश्यक गोष्टींचा वापर कसा आणि का टाळायचा याचा संस्कार दिला. नेहमी वापरले जाऊ शकणारे साहित्य सहज हाताशी येईल असं मांडायला शिकवलं. जिथली वस्तू तिथंच ठेवायची सवय नाटकानंच जडवली. शरीराचं वय वाढलं तरी मन तरुण ठेवलं. जगणं समृद्ध केलं. आमच्या बऱ्याचशा आवडीनिवडी भिन्न आहेत. पण, तीच खरी आमची परस्परपूरकता आहे. अजून काय हवं असतं माणसाला? याहून काय असतो सुखी संसार?
-सी. एल. कुलकर्णी, अभिनेता
---
शब्दांकन : फणिंद्र मंडलिक