अनिल जोगळेकर, मटा वाचक 'मटा'मध्ये नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या 'उदासीनतेचा भुर्दंड' या वृत्त मालिकेत 'सम-विषम' असून अडचण, नसून खोळंबा' हे वृत्त प्रसिद्ध झाले. त्याबाबत ९० टक्के नागरिक सहमत असतील. दुर्दैवाने जनतेमध्ये आणि व्यापाऱ्यांमध्ये आपण आणि फक्त आपलीच सोय बघण्याची वृत्ती वाढत आहे. स्वार्थी मानसिकतेचा प्रकार वाढत असून, त्यामुळे सम-विषम पार्किंगचा बट्ट्याबोळ होण्यासह वाहतुकीच्या इतर समस्या व्यापक स्वरूपात पुढे येत आहेत. शहरातील वकीलवाडी, गोळे कॉलनी अशा अरुंद रस्त्यांच्या जागेत सम-विषम पार्किंगमुळे भरपूर जागा उपलब्ध होऊ शकते. व्यापाऱ्यांनी त्यांची वाहने दुकानासमोर लावण्यासाठी हरकत नाही. पण, नियमाप्रमाणे वाहने पार्क केली, तर काय फरक पडणार आहे? बरेचसे दुकानदार आपल्या दुकानासमोर पार्किंग होऊ नये म्हणून लोखंडी जाळ्या टाकून ठेवतात. यामुळे पार्किंगची जागा अडते. त्यावर पोलिसांनी दंडात्मक कारवाई करावी. अशोक स्तंभ ते रविवार कारंजा रस्त्याचे काँक्रिटीकरण झाले. त्यावेळी नो एंट्रीमधून वाहने नेण्यास परवानगी देण्यात आली होती. आता रस्त्याचे काम पूर्ण झाले असले, तरी वाहनचालक राँगसाइडनेच जातात. नागरिक नियम धाब्यावर बसवून वाहतुकीस अजूनच अडथळा निर्माण करीत आहेत. यावर कडक कारवाई करीत राहणे हाच उत्तम पर्याय ठरतो. यात वाहतूक पोलिसही तितकेच जबाबदार ठरतात. आपणच आपल्यात सुधारणा केली, तर खूप प्रश्न सुटतील. खडकाळी, सह्याद्री हॉस्पिटल, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक, फेम परिसर, उपनगर, सिटी सेंटर मॉल, त्रिमूर्ती चौक अशा सिग्नल्सवर वाहनचालक वेळेच्या आधीच पुढे जाण्यास सुरुवात करतात. त्यामुळे ज्यांचा सिग्नलत्सुरू आहे त्यांची पंचाईत होते. यामुळे आपणच अपघातांना निमंत्रण देतो, असे वाटते. बहुतेक सिग्नल्सवर दुचाकी आणि रिक्षाचालकांमध्ये सिग्नल्स मोडण्याची स्पर्धा करतात. ट्रिपलसीट वाहन चालविणे हा जणू कायदाच झाला आहे. इंदिरानगर बोगद्याच्या येथे पोलिस असताना सर्व सुरळीत असते. मात्र, पोलिस हटताच वाहनधारक नियम तोडून नो एंट्रीमध्ये प्रवेश करतात. वाहतुकीचे नियम पोलिसांसाठी आहेत, की आपल्या सुरक्षिततेसाठी हे प्रत्येकाने नियम तोडताना लक्षात घ्यावे. लोगो- प्रतिसाद
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट