म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड विभागीय लोकशाहीदिनात दाखल करण्यात येणाऱ्या प्रत्येक तक्रार अर्जावर संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करून अर्ज निकाली काढावेत, तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयास सादर करण्यात यावा, अशी सूचना विभागीय महसूल आयुक्त राजाराम माने यांनी अधिकाऱ्यांना दिली. विभागीय आयुक्त कार्यालयातील समिती कक्षात आयोजित विभागीय लोकशाहीदिनात ते बोलत होते. यावेळी उपायुक्त दिलीप स्वामी, रघुनाथ गावडे, सुखदेव बनकर,अर्जुन चिखले, सहाय्यक आयुक्त उन्मेश महाजन यांच्यासह सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते. विभागीय लोकशाहीदिनात सोमवारी ३० नवीन तक्रारी दाखल करण्यात आल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. फार्स ठरू लागल्याची भावना प्रशासनातील विविध विभागांतील जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडून न्याय न मिळाल्यास अशा नागरिकांकडून विभागीय लोकशाहीदिनात न्याय मागितला जातो. परंतु, येथेही तक्रारकर्त्यांच्या पदरी काही पडत नाही. कारण, विभागीय लोकशाहीदिनात दाखल तक्रारीवर येथे फक्त चर्चा होते. तात्काळ निर्णय होत नाही. पुन्हा या तक्रारी जिल्हा स्तरावरील संबंधित विभागप्रमुखांकडे पाठविल्या जातात. त्यामुळे तक्रारदारांचा हिरमोड होतो. पुन्हा शासकीय कार्यालयांच्या पायऱ्या झिजविण्याची वेळ येते. या अर्जांचा निपटारा करण्यासाठी तीस दिवसांची मुदत असते. वास्ताविक सर्व विभागप्रमुख विभागीय लोकशाहीदिनाला हजर असतात. त्यामुळे तक्रारकर्त्यांचा अर्ज तात्काळ निकाली काढणे अपेक्षित आहे. मात्र, सर्व विभागप्रमुख हजर असतानाही तक्रारी अर्ज पुन्हा तीस दिवसांच्या कालावधीसाठी जिल्हास्तरावरील अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात येत असल्याने विभागीय लोकशाहीदिन केवळ फार्स ठरू लागल्याची भावना तक्रारदारांकडून व्यक्त होत आहे. -- शिंदे टोल नाकाप्रश्नी शिवसेनेचे आज आंदोलन म. टा. वृत्तसेवा, जेलरोड नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे गावाजवळील टोल नाका बंद करण्यासाठी आज, मंगळवारी (दि. १०) शिवसेना व ग्रामस्थ आंदोलन करणार आहेत. आमदार योगेश घोलप व सिन्नरचे आमदार राजाभाऊ वाजे, शिवसेना तालुकाप्रमुख प्रकाश म्हस्के, जगन आगळे, केशव पोरजे, सुदाम ढेमसे, योगेश म्हस्के, नितीन चिडे, योगेश देशमुख, नितीन खर्जुल, उत्तम कोठुळे, पोपट जाधव, बाळासाहेब गोडसे, शिवाजी भोर, मसूद जिलानी, अजीम सय्यद, राहुल धात्रक, किरण डहाळे, दिनकर पाळदे आदी त्यात सहभागी होणार आहेत. काही महिन्यांपूर्वी शिंदे गावाजवळ टोल नाका सुरू झाला आहे. वाहनचालक, शेतकरी, तसेच ग्रामस्थांनी टोल नाक्यावर मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची तक्रार केली आहे. टोल नाका सुरू झाला तेव्हा शिवसेनेने आंदोलन करून तो बंद करण्याचा इशारा दिला होता. सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची घोलप यांनी भेट घेतली असता मंत्री शिंदे यांनी त्यांना दिलासा दिला होता. मात्र, टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यांची मनमानी सुरूच असून, वाहनधारकांची लूट केली जात आहे. त्यामुळे जनता त्रस्त झाली असून, आमदार घोलप यांनी जनता व वाहनचालकांना न्याय मिळण्याची मागणी केली. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपताच या टोल नाक्यावर तोडफोड आंदोलन करण्याचा इशारा आमदार घोलप यांनी दिला होता. घोलप म्हणाले, की टोल नाक्यामुळे शेतकरी व सामान्यांची लूट होत आहे. त्याचा त्रास शिंदे, पळसेबरोबरच सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांनाही सहन करावा लागत आहे.
मोबाइल अॅप डाउनलोड करा आणि राहा अपडेट